Sunday 3 May 2015

कळियांसी आला...

काही दिवसांपूर्वी, दीड-एक वर्षापूर्वी बायको एका नातेवाइकाच्या वास्तुशांतीला गेली होती लातूरला. त्यानं परतभेट म्हणून दोन रोपं दिली. त्यातलं एक मोगऱ्याचं. दुसरं असंच काही तरी; नेमकं आठवत नाही. मोगरा, निशिगंध, जाई-जुई, पारिजात...ही आवडती फुलं माझी. मंद दरवळणारी. त्यामुळे मोगऱ्याचं रोप पाहिलं आणि लगेच ताब्यात घेतलं. ते वाढवण्याची, फुलवण्याची जबाबदारी माझी, असं जाहीर केलं.

आमचं घर म्हणजे छोटा फ्लॅट. त्याला मागच्या बाजूला बाल्कनी आहे. काही कुंड्या वगैरे ठेवायच्या तर तिथंच. तिथं वर्षातले बाराही महिने उन्ह येत नाही. दक्षिणायनाच्या वेळी दुपारचा काही वेळ उन्ह पडतं. त्यामुळे की काय, कुणास ठाऊक, पण तिथं छोटी बाग फुलविण्याचा आमचा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही आजवर. तुळशीची दोन रोपंही चांगली वाढून मग जळून गेली.

बाल्कनीतल्या दोन-तीन कुंड्यांमध्ये काही तरी वाढवायचंच, असं या वेळी ठरवूनच टाकलं होतं. त्यानुसार आधी तुळशीच्या मंजिऱ्या चुरगाळून टाकल्या. एकाच कुंडीत दोन-चार रोपं आल्यावर, त्यातल्या एकाला दुसऱ्या कुंडीमध्ये अगदी निगुतीनं हलवलं. दोन्ही रोपं छान वाढली. त्यांच्या साथीनं आत्मविश्वासही. बंगल्यातल्यासारखी बाग फुलवणं काही शक्य नाही, पण आपल्यापुरती दोन फुलझाडं वाढवता येतील, असं वाटू लागलं.

आत्मविश्वास असा वाढलेला असतानाच हातात हा मोगरा आला. त्याची विधिवत कुंडीत प्रतिष्ठापना केली. प्लास्टिकचीच कुंडी. कारण मातीची जड कुंडी बाल्कनीच्या जाळीला अडकवणार कशी? मोगरा आणि आधी लावलेली तुळस कशी वाढवायची, याचं नियोजन केलं होतं. बायको रोज पाणी घालायचीच. मोगऱ्याला मात्र मी आठवणीने पाणी घालत होतो. त्याची जादा पानं खुडत होतो. तुळशीची पिकलेली-वाळलेली पानं तोडून ती मोगऱ्याच्या कुंडीत टाकायची. चहाचा गाळ आठवणीनं या दोन्ही कुंड्यांमध्ये टाकायचा. कारण त्याचं चांगलं खत होईल, असं मला (उगीचंच) वाटत होतं. चहाचा गाळ असा टाकण्यास बायकोचा विरोध. मग तिची नजर चुकवून तो टाकण्याचं काम आलंच.

चांगली वाढलेली  तुळशीची 
दोन्ही रोपं मधल्या काळात खंगली. त्यांची पानं झडू लागली. मग पुन्हा काळजी. आधीचा अनुभव लक्षात घेऊन मंजिरी काढून ठेवल्या होत्या. पण तो तेवढा आठवडा गेला आणि तुळशीची दोन्ही रोपं वाचली. व्यवस्थित.

बाजूच्या एका कुंडीत नुसताच चहाचा गाळ टाकत राहिलो. त्यात अशाच टाकलेल्या लिंबाच्या बियांतील दोन अंकुरल्या. त्याची आता चांगली फूटभर रोपं तयार झाली आहेत. त्यांच्या वाढत्या वयाला त्या छोट्याशा कुंडीत किती वाव मिळेल, याची थोडी शंकाच आहे. त्याचं एखादं पान तोडून कुस्करल्यावर एकदम प्रसन्न करणारा मंद आंबूस गंध येतो.

तर गोष्ट मोगऱ्याची सांगत होतो. मोगऱ्याचं ते बाळरोप कुंडीत रुजलं. चहाचा गाळ-फळांच्या सालींचे तुकडे-तुळशीची वाळलेली पानं असं खत त्याला देत होतो. नियमित पाणीही घालत होतो. पानांवरची धूळ जावी म्हणून कधीमधी सचैल स्नानही घातलं जाई त्या रोपाला. हळुहळू पानांच्या संख्येत वाढ होऊ लागली. उंचीही वाढू लागली. रोप जसजसं वाढत चाललं, तसतशी खालची पानं हळुवारपणे तोडून टाकू लागलो.

हिवाळा आला. थंडी कडाक्याची पडली. एक दिवस पाणी घालताना लक्षात आलं की, मोगऱ्याची चार-पाचच पानं तरतरीत आहेत. बाकीची सर्व कोमेजून गेली आहेत. ती तोडून टाकली. पाणी थोडंसंच घातलं. परत पुढच्या आठवड्यात पाहिलं, तर दोनच पानं टवटवीत. बाकीची तीन-चार पानं आधीसारखी कोमेजलेली. पाणी घालून दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्यांनी मान टाकलेली.

आता शिल्लक दोनच पानं! ही दोन पानं गेली, तर रोप गेलं, हे लक्षात आलं. त्यामुळं काळजी घेतली. कुंडीतली माती थोडी भुसभुशीत केली. पाणी बेताबेतानंच घातलं.

अजून एक आठवडा गेला. कुंडी खाली घेतली, तर दिसलं, ती उरलीसुरली दोन्ही पानं कोमेजलेली. रोपाची अवस्था एखाद्या वाळल्याखडंग काटकीसारखी. निव्वळ काटकीच. पानं झडलेली. दुर्मुखलेली. आयुष्य संपलेली काटकी. एवढी काळजी घेऊनही मोगरा काही वाचलाच नाही! वाईट वाटलंच. जड मनानं तीही पानं तोडून टाकून दिली. आणखी एका स्वप्नावर माती लोटल्यासारखं...

तुळशीच्या रोपांना पाणी घालता घालता सवयीनं मोगऱ्याच्या कुंडीतही पाणी टाकत राहिलो. ते वठलेलं रोप जीव धरणार नाही, हे पुरतं कळलं असूनही. मग कधी तरी महिन्याने ती (नसलेल्या) मोगऱ्याची कुंडी खाली घेतली. आणि बघतो तर काय? त्या वाळलेल्या काटकीला दोन चिमुकली पानं फुटलेली! अरे व्वा!!

पुन्हा पानं फुटल्याचं पाहून लॉटरी लागल्याचाच आनंद. मनानं सांगितलं, हे रोप आता जगणार! वा रे पठ्ठे!! पुन्हा चहाचा गाळ, भाज्यांची थोडी देठं वगैरे आणि नियमित पाणी. पानांची संख्या अगदी हळुहळू वाढू लागली. त्या वाळक्या काटकीनं थोडी हिरवाई अंगी ल्यालेली.

गावाला गेलो होतो दोन दिवसांपूर्वी. काल संध्याकाळी परतलो. एवढ्या कडक उन्हात रोपं तहानलेली असतील, हे लक्षात आलं. त्यामुळं पाणी घालण्यासाठी कुंडी खाली घेतली. आनंदाश्चर्याचा धक्काच. त्या इवल्याशा रोपाला सगळ्यात खाली एक कळी आली होती. टपोरी कळी. पांढऱ्याशुभ्र मोगऱ्याची कळी. त्याच क्षणी तो मोगऱ्याचा धुंद वास आला. थंडगार वाऱ्याची झुळूक आल्यासारखं वाटलं. आज सकाळी पुन्हा पाहिलं तर त्या कळीला जोडून अजून एक छोटी कळी आलेली...

मी वाट पाहिली. आता अजून वाट पाहणार आहे. दोन-चार दिवसांनी त्या कळ्या फुलतील. एक फूल देवाजवळ जाईल आणि दुसरं माठात. कालपासून मी फार खूश आहे!
---------------

`फुललेला` आम आदमी
(चोवीस/एप्रिल/पंधरा)

6 comments:

  1. सहर्ष अभिनंदन ! आपण ठरवल्याप्रमाणे अनुदिनीला सुरुवात केलीत ! मनःपूर्वक शुभेच्छा !
    मंगेश नाबर

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या शुभेच्छा मोलाच्या. मनापासून आभार

      Delete
  2. निसर्ग व निर्माणक्षम एक ध्येयवेडा

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...