सोमवार, ७ जुलै, २०२५

नवा नेता, नवा इतिहास

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट
बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं.
पावसानं हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही.
दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून भारतीय संघानं
एजबॅस्टनवर नवीन इतिहास लिहिला.
कर्णधार शुभमन गिल, आकाशदीप, सिराज, जाडेजा,
सुंदर हे त्याचे शिल्पकार होत!
......................................


सामन्याचा मानकरी तो ठरला असला, तरी त्या पदकावर आणि शाम्पेनच्या
बाटलीवर ह्यानंही अधिकार सांगितला होताच की!

------------------------------
सामना जवळपास पाच दिवस चालला. धावा निघाल्या सतराशेच्या आसपास. दोन्ही संघांचे मिळून ३६ गडी बाद झाले. म्हणजे रोज सरासरी तीनशेहून अधिक धावा आणि पाच गडीही बाद. एकूण शतकं चार आणि अर्धशतकं सहा. सामन्यात १० बळी घेणारा एक गोलंदाज आणि डावात पाच वा अधिक गडी बाद करणारे त्याच्यासह दोघं. आणि सामन्याचा निकाल लागलेला. दणदणीत म्हणावा असा विजय पाहुण्या संघानं यजमानांवर मिळवला. आठवड्यापूर्वीच्या पराभवाची साभार नि सहर्ष परतफेड!

एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इथे झालेल्या भारत व इंग्लंड संघांमधील दुसऱ्या कसोटी सामन्याची ही रंगलेली कहाणी. सामन्याचा निकाल एकतर्फी लागेल, हे चौथ्या दिवशी आणि त्यातही शेवटच्या सत्रात स्पष्ट झालं. इंग्लंडपुढे एव्हरेस्ट सर करण्यासारखं आव्हान होतं आणि दुसऱ्या डावातले तीन गडी त्यांनी गमावलेले.

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं. ते अवघड होतंच आणि पावसानं दिवसाच्या सुरुवातीलाच हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही. ह्या पावसामुळे भारतीय चाहत्यांची धडधड सकाळी वाढली होती. पण निसर्गानंही साथ दिली. बर्मिंगहॅममध्ये आठपैकी सात कसोटी सामन्यांत पराभूत झालेल्या भारतानं नवव्या सामन्यात नव्या दमाच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास लिहिला.

एकटा गिलच भारी
आकड्यांचाच आधार घेऊन बोलायचं तर ह्या सामन्याची किती तरी वैशिष्ट्यं सांगता येतील. भारताचा कर्णधार शुभमन गिल ह्यानं सामन्यात एकूण ४३० धावा केल्या. इंग्लंडला एकाही डावात तेवढ्या करता आल्या नाहीत. त्यानं पहिल्या डावात केल्या, त्याहून फक्त दोन अधिक धावा इंग्लंडला दुसऱ्या डावात करता आल्या. (शेवटच्या दोन जोड्यांनी टोलवाटोलवी करीत ४५ धावांची भर घातलेली, इथे लक्षात घेतली पाहिजे.)

शुभमनचं पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात आक्रमक दीडशतक. इंग्लंडकडून पहिल्या डावात तुफानी खेळ करणाऱ्या यष्टिरक्षक जेमी स्मिथच्या नाबाद १८४ धावा. दुसऱ्या डावातही त्याच्याच धावा सर्वाधिक - ८८. पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर इंग्लंडच्या फलंदाजांनी चार षट्कार ठोकले. त्यातले दोन नवव्या व अकराव्या क्रमांकावरच्या गोलंदाजांचे. भारताने चौथ्या दिवशी, दुसऱ्या डावात एक दिवशीय सामना खेळत असावा, त्या गतीने धावा केल्या. त्यात एकूण १३ षट्कार आणि पैकी आठ गिलचे. इंग्लंडच्या दोन्ही डावांतील षट्कारांची संख्या ११ आणि दोन्ही डावांमध्ये स्मिथने षट्कारांचा चौकार मारलेला.

सर्वांत मोठी भागीदारी पराभूत संघाची
सामन्यातली सर्वांत मोठी भागीदारी विजयी संघाची नव्हती, तर पराभूत संघाकडून झालेली. निम्मा संघ शंभराच्या आत गारद झालेला. समोर आव्हानं ६०० धावांच्या जवळचं. त्याचं अजिबात दडपण न घेता, किंबहुना ते झुगारून हॅरी ब्रूक व स्मिथ ह्यांनी सहाव्या जोडीसाठी त्रिशतकी भागीदारी केली. त्या डावातली त्यांच्याकडून तेवढीच एक शतकी भागी. संपूर्ण सामन्यातील चौदापैकी दोनच सत्रांवर इंग्लंडचं वर्चस्व होतं आणि त्याचं कारण ही भागीदारी आकार घेत होती.

गंमत अशी की, दुसऱ्या डावातही सर्वांत मोठी भागीदारी सहाव्या जोडीसाठीच झाली. त्यातला एक भागीदार पुन्हा स्मिथच होता आणि त्याचा जोडीदार कर्णधार बेन स्टोक्स. पहिल्या डावात ५ बाद ८४ आणि दुसऱ्या डावात ८३. ह्या वेळची भागीदारी डावातली सर्वाधिक असली तरी फक्त ७० धावांची. पराभवाची नामुष्की थांबविण्याची ताकद तीत नव्हती.


जाडेजा आणि गिल. पहिल्या डावातील ह्यांच्या भागीदारीनं
विजयाचा पाया रचला.
------------------------------
भारतीय संघाची सामन्यातील सर्वांत मोठी द्विशतकी भागीदारी पहिल्याच डावातली आणि सहाव्या जोडीसाठी. ती गिल आणि रवींद्र जाडेजा ह्यांची. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या रूपाने पुन्हा एका फिरकी गोलंदाजाला साथीला घेऊनच गिलने सातव्या जोडीसाठी दीडशतकी भागीदारी केली. गिल व जाडेजा ह्यांनी दुसऱ्या डावातही पावणेदोनशे धावांची भागीदारी केली. सातव्या आणि सहाव्या क्रमांकावर येऊन अर्धशतकं झळकावण्याची कामगिरी एकट्या जाडेजालाच साधली!

सहा जणांचा भोपळा
ब्रूक आणि स्मिथ ह्यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं फॉलो-ऑन वाचविला. पण संघाच्या फलंदाजीची वैगुण्यं त्याच डावात दिसून आली. संघाच्या धावा चारशे पार आणि तरीही सहा फलंदाजांना भोपळा फोडण्यात अपयश! दोघे शतकवीर सोडले, तर इतर दोघांनाच दुहेरी धावा करता आलेल्या.

दुसऱ्या डावात मात्र सलामीवीर झॅक क्रॉली हा एकटाच भोपळ्याचा मानकरी. तळाच्या दोघांसह आठ फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठलेली. पण खेळपट्टीवर टिकाव कोणी धरला नाही. अपवाद स्मिथ आणि काही काळ स्टोक्स ह्यांचा. परिणामी पावणेतीनशे धावा करताना संघाची दमछाक झाली.

पहिल्या कसोटीत भारताच्या तळाच्या फलंदाजांनी दोन्ही डावांची माती केली. ते चित्र एजबॅस्टनला दिसलं नाही आणि त्याहून ते फार जाणवलं नाही. पहिल्या डावात सहाशेचा उंबरठ्यावर आणि दुसऱ्या डावात सव्वाचारशेच्या वर एवढ्या धावा निघाल्या. धावांची गंगा वाहत असताना कोरडा राहिला तो एकटा नितिशकुमार आणि काही प्रमाणात करुण नायर. ब्रिडन कार्स ह्यानं तर पहिल्या डावासारखंच दुसऱ्या डावातही नायरला मामा बनवलं.

तिघांहून आकाशदीप फार सरस!
आकाशदीपनं सामन्यात १० बळी घेतले - पहिल्या डावात चार नि दुसऱ्या डावात सहा. यजमानांचे आघाडीचे तीन गोलंदाज - ख्रिस वोक्स, ब्रिडन कार्स आणि जॉश टंग ह्यांनी मिळून भारताचे सोळापैकी आठ गडी बाद केले. त्यासाठी त्यांनी दोन्ही डावांत मिळून ११८ षट्कं टाकली. आकाशदीपपेक्षा ७७ षट्कं अधिक!

फलंदाजीप्रमाणंच आघाडीच्या गोलंदाजांचं अपयश स्टोक्सला सतावत असणार. जेमतेम बाविशीच्या घरात असलेल्या शोएब बशीर ह्यानं पहिल्या डावात ४५ षट्कं टाकत इंग्लिश गोलंदाजीचा भार वाहिला. त्याला तीन बळी मिळाले, ते दीडशेहून अधिक धावा देऊन. पहिल्या डावात पाच षट्कं टाकणारा हॅरी ब्रूक आणि नितिशकुमार रेड्डी, हे दोघेच बळी न मिळालेले गोलंदाज.

नव्या चेंडूवर भारतीय जलदगती गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांपेक्षा किती तरी अधिक सरस ठरले. विजय आणि पराभवातलं हेच अंतर होतं. जगातला पहिल्या क्रमांकाच्या गोलंदाजाला विश्रांती देण्याच्या भारतीय व्यवस्थापनाच्या निर्णयावर सामना सुरू झाला तेव्हा बरीच टीका झाली. तथापि महंमद सिराज आणि आकाशदीप ह्यांनी जसप्रीत बुमराह ह्याची उणीव भासू दिली नाही. ही जमेची फार मोठी बाजू म्हणावी लागेल.

अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी चाललेल्या ह्या मालिकेतील पहिलाच सामना गमावल्यानंतर लगेच भारतीय संघ एवढ्या ताकदीनं उसळून आला. अशी उदाहरणं पाहायची झाल्यास ऑस्ट्रेलियाचा २०२०-२१चा दौरा आठवतो. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावांत नीचांकी ३६ धावांमध्ये गुंडाळला गेलल्या भारतीय संघाने नंतरच्या तीनपैकी दोन सामन्यांत कागांरूंना नमवलं. त्या आधी २००१च्या ऑस्ट्रेलियानं केलेल्या दौऱ्यात पहिली कसोटी हरल्यावर खचून न जाता भारतानं मालिका जिंकली होती. शुभमन गिलचा संघ तोच कित्ता गिरवणार काय, हे पाहायला हवं.

पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारणाऱ्या बेन स्टोक्सवर मोठी टीका झाली. पण 'बेझबॉल' शैलीनं विजय मिळवून स्टोक्सनं टीकाकारांना उत्तर दिलं. त्यामुळेच ह्या कसोटीतही त्यानं तसाच निर्णय घेतला. तो मात्र पूर्ण अंगलट आला. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोनशेच्या आसपास धावा आणि पाच गडी बाद, ही परिस्थिती म्हटलं तर दोन्ही संघांसाठी सारखीच होती. आधीच्या सामन्यातील दोन्ही डावांत भारतीय संघ कोलमडून पडलेला. त्यामुळे स्टोक्सला फार काही वाईट वाटलं नसावं.

लाजवाब द्विशतक
गिल, जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर ह्यांच्या मनात मात्र वेगळं काही होतं. ते दुसऱ्या दिवशी दिसून आलं. गिलनं खणखणीत द्विशतक झळकावलं. त्याचा स्ट्राईक रेट दीड शतकानंतर कमालीचा वाढलेला दिसला. प्रतिस्पर्ध्याला एकही संधी न देता त्यानं केलेला खेळ लाजवबाच! पहिल्या दिवशीच्या ३१० धावांत गिलचा वाटा होता ११४ धावांचा आणि  दुसऱ्या दिवशी केलेल्या २७७ धावांमध्ये १५५. सुंदरने आधी खेळपट्टीवर ठिय्या मांडून नंतर केलेली फटकेबाजी महत्त्वाची ठरली.

भारतानं दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात तीन गडी बाद करीत इंग्लंडला झटका दिला. पहिल्याच षट्कात १२ धावांची खिरापत वाटणाऱ्या आकाशदीपनं दुसऱ्या षट्कात कमाल केली. बेन डकेट ह्याचा गिलनं सुंदर झेल घेतला. त्याच्या पाठोपाठच्या चेंडूवर ओली पोप के. एल. राहुलकडे झेल देऊन परतला. महंमद सिराज ह्यानं क्रॉलीला बाद केलं.

सामना रंगतदार ठरणार, असं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर स्पष्ट झालं होतं. तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर पहिल्या तासातच सिराजनं लागोपाठच्या चेंडूंवर रूट आणि स्टोक्स ह्यांचा अडथळा दूर केला. निम्मा संघ गारद! आणखी ५०० आणि फॉलो-ऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान ३०० तरी धावा करायला हव्या. मोठंच आव्हान होतं हे.

धडाकेबाज ब्रूक-स्मिथ
हे दडपण ब्रूक आणि स्मिथ ह्यांनी झुगारून दिलं. उपाहारपर्यंतच्या २७ षट्कांमध्ये १७२ धावांची भर पडलेली. म्हणजे षट्कामागे जवळपास साडेसहा धावांची गती. वरची फळी कापलेली आणि सहा शतकी लक्ष्य असताना ह्या दोघांनी केलेला खेळ धडाकेबाज म्हणावा असाच होता. त्यातही स्मिथचा तडाखा औरच होता. त्याचं अर्धशतक ४३ चेंडूंमध्ये आणि शतकासाठी लागले ८० चेंडू.


ब्रूक-स्मिथ ह्यांची त्रिशतकी भागीदारी.
------------------------------
उपाहार ते चहापान ह्या दोन तासांमध्ये ह्या जोडीनं भारतीय गोलंदाजांची अजिबात डाळ शिजू दिली नाही. त्यात त्यांनी १०६ धावांची भर घातली. कारकिर्दीतलं दुसरं शतक करणाऱ्या स्मिथची गती दीडशे धावा करेपर्यंत चेंडूमागे धाव अशीच होती. त्यानंतर मात्र तो काहीसा संथ झाला. तरीही त्याची नाबाद १८४ धावांची खेळी फक्त २०७ चेंडूंमधली. त्यात २१ चौकार आणि ४ खणखणीत षट्कार.
 
चहापानानंतर पाच षट्कं झाली आणि भारताला नवा चेंडू उपलब्ध झाला. ब्रूक-स्मिथ जोडीनं फॉलो-ऑन टाळला आणि लगेचच आकाशदीप ह्यानं कमाल केली. त्यानं आधी ब्रूकचा त्रिफळा उडवला. त्या पाठोपाठ ख्रिस वोक्स बाद झाला. पुढे धमाल केली महंमद सिराज ह्यानं. त्यानं इंग्लंडचं शेपूट झटपट गुंडाळत खात्यात अर्धा डझन बळींची नोंद केली. सकाळच्या पहिल्या तासात आणि इंग्लंडचा डाव गुंडाळताना त्यानं केलेला मारा बुमराहची उणीव जाणवू न देणारा ठरला.

इंग्लंडचे शेवटचे पाच गडी फक्त २० धावांमध्ये बाद झाले. पाहुण्यांचं यजमानांनी केलेलं नकोसं अनुकरण!
 
पहिल्या डावातली १८० धावांची आघाडी फारशी नाही, असं समजूनच भारतानं चौथ्या दिवशी खेळ केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताच्या चाहत्यांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तीनपैकी अडीच सत्रांमध्ये गिल, ऋषभ पंत, जाडेजा ह्यांनी दिली. ‘एकही गिल, सबका दिल’ असंच कर्णधाराच्या दणकेबाज दीड शतकाचं वर्णन करताना लिहावं लागेल.

ह्याची सुरुवात पंतनं केली. त्यानं एक दिवशीय सामन्याला साजेशी फलंदाजी केली. तो सुटला होता, तेव्हा समोर कर्णधारानं दुय्यम भूमिका स्वीकारलेली. पंत एवढ्या सैल हाताने खेळतो की, त्याची बॅट दोन वेळा लांबपर्यंत उडून गेली. परिस्थिती अशीच राहिली तर ह्यानंतर पंत खेळत असताना ३० यार्ड वर्तुळाच्या आतल्या सगळ्याच क्षेत्ररक्षकांना हेल्मेट घालणं अनिवार्य होईल! 😂😃

अवघ्या एका धावेवर असताना पंतला दोन जीवदानं मिळाली - एक कठीण आणि दुसरं सोप्पं! त्याची पुरेपूर किंमत इंग्लंडनं मोजली. पंत बाद झाला, तेव्हा गिल ५८ धावांवर (७० चेंडू) खेळत होता. पुढच्या १०३ धावा त्यानं ९२ चेंडूंमध्ये करीत धावफलक हलता नव्हे तर पळता ठेवला. ख्रिस वोक्स, जो रूट ह्यांच्या गोलंदाजीच्या त्यानं निर्दयीपणे चिंधड्या केल्या.

महंमद सिराजनं झॅक क्रॉली ह्याला बाद करून सुरुवात करून दिली. मग आकाशदीपनं बेन डकेटची दांडी उडवली. त्यानं क्रीजचा सुंदर वापर केला. रूट ज्या चेंडूवर बाद झाला, त्याची तर फारच चर्चा झाली. त्या बळीचं वर्णनं ‘द गार्डियन’ दैनिकाने ‘द शाम्पेन मूमेंट ऑफ द एंटायर मॅच’ असं केलं!

पावसानं व्यत्यय आणल्यावरही पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा एजबॅस्टनचं स्टेडियम भारतीय प्रेक्षकांनी भरलेलं. ‘आपण जिंकलंच पाहिजे’ एवढीच त्यांची अपेक्षा. आकाशदीपनं आली ओले पोपचा त्रिफळा उडवला आणि नंतर लगेच ब्रूकला पायचित पकडलं. भारतीय संघाला विजयाचा वास तेव्हाच आला. सावध खेळणारा स्टोक्स डावाला आकार देऊ पाहत होता ते स्मिथच्या साथीने. स्मिथचा धावा काढण्याचा वेग ह्या डावातही सुरुवातीला तसाच होता - जवळपास चेंडूमागे धाव. कर्णधारपदाचं ओझं असलेला स्टोक्स तुलनेनं संथ.

वॉशिंग्टनच्या फिरकीनं स्टोक्सला परत धाडलं. त्यानंतर यजमानांनी शंभर धावांची भर घातली, तरी पराभव टळेल, असं क्वचितच कधी वाटलं. स्मिथला ख्रिस वोक्स साथ देत होता, तेव्हा काहीशी काळजी वाटत होतीच. नाही असं नाही. पण महंमद सिराजनं त्याचा फार अफलातून झेल घेतला. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात एक बळी जमा झाला.

आकाशदीपला स्मिथनं सलग दोन षट्कार खेचले, तेव्हा निकाल लांबणार असं वाटत होतं. पण पुढचा चेंडू हळुवार बाउन्सर टाकून आकाशदीपनं त्याला बरोबर जाळ्यात अडकवलं. आकाशदीपच्या रूपानं भारतीय भात्यात चांगलं अस्त्र असल्याचं, त्याच्या ह्या सामन्यातील गोलंदाजीवरून वाटतं.

काही न सुटलेले प्रश्न
विजय मिळविला असला, तरी भारतीय संघापुढचे काही प्रश्न सुटलेले नाहीतच. क्षेत्ररक्षण हा त्यातला महत्त्वाचा. के. एल. राहुलच्या हातून आज एक सोपा झेल सुटला. चेंडू अडवतानाही गोंधळ होताना दिसला. पुढच्या कसोटीत करुण नायर, प्रसिद्ध कृष्णा, रेड्डी ह्यांना सक्तीची विश्रांती मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. साई सुदर्शन, कुलदीप, अर्षदीपसिंग देवाची प्रार्थना करीत असतीलच असं नाही. पण त्यांनाही ‘संधी’ हवी आहे. बुमराहचंही पुनरागमन होईल.

ह्या विजयानं एजबॅस्टनवरचा नवा इतिहास लिहिला आहेच. ह्याच इतिहासातली पुढची पानं अधिक दमदारपणे उरलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये लिहिल्या जातील, अशा अपेक्षा उंचावलेल्या असणं स्वाभाविकच.

(छायाचित्रं ‘आय. सी. सी.’,  ‘द गार्डियन’ व ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’  संकेतस्थळांवरून साभार.)
--------------------------
#भारत_इंग्लंड #कसोटी_मालिका #अँडरसन_तेंडुलकर_करंडक #एजबॅस्टन_कसोटी #शुभमन_गिल #आकाशदीप #जेमी_स्मिथ #बेन_स्टोक्स #महंमद_सिराज #नवा_इतिहास
......

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

...चला पुस्तकांचं सोनं लुटू!

 


‘वाचावं की वाचू नये’, असा ‘हॅम्लेट’ कधीच होत नाही माझा.
‘हे आधी वाचू की ते वाचू?’, असा प्रश्न असतो.
तुम्हाला माहितीये का, पुस्तकं वाचणारा जगातला
पहिल्या क्रमांकावरचा देश आपला आहे.
आमची पिढी वाचत नसती, तर झालो असतो
आपण जगात नंबर वन?
--------------

‘मोरू’ आणि त्याचे बाबा ही मराठी साहित्यातली तशी ऐतिहासिक पात्रं. नवरात्र संपून दसरा उजाडला की, त्या दोघांची कोणाला ना कोणाला आठवण होतेच.

सोनं लुटायचं म्हणून मोरूला दसऱ्याच्या दिवशी बाबा उठवित. काळ बदलला आहे. साडेतीन मुहूर्तांसह आणखी काही मुहूर्त इंटरनेटकृपेने आले आहेत. त्यांना ‘डेज’ म्हणतात. काळाबरोबरच चालत आता काही विशिष्ट दिवशीही त्याला झोपेतून जागं करणं, बाबांना आपलं कर्तव्य वाटते.

काळाप्रमाणे भाषाही बदलली आहे. पूर्वीसारखं ‘मोऱ्या’ असं खेकसत त्याच्या कटिप्रदेशाशी आपल्या चरणकमलानं आघात करणं बाबांनी सोडलं आहे. ते आता ‘मोरूबाळ’ असं संबोधतात. 'खेकसत म्हणणे, आय लव्ह यू' कादंबरी त्यांनी वाचलेली आहे. पण वसकणं सोडून ते 'गुड मॉर्निंग, बेटा' म्हणतात. मोरूही त्यांचा उल्लेख (पाठीमागे) ‘आमचा बाप’ असा थेट न करता, ‘आमचे पिताश्री’ असा करतो. (त्यात आदर असतो की उपहास, हा संशोधनाचा विषय आहे.)

त्या दिवशी असंच झालं. सवयीप्रमाणे बाबा मोरूला उठवायला गेले. त्याच्या प्रायव्हसीचा भंग होऊ नये आणि उपचार म्हणून त्यांनी दारावर दोनदा ‘टक टक’ केलं. प्रतिसादाची वाट न पाहताच घुसले. मोरू आपला पसरलेलाच. डोळ्यांसमोर मोबाईल. परमपूज्य पिताश्रींच्या आगमनाची दखल घेतल्या न घेतल्यासारखं त्यानं केलं. मोबाईलवरची त्याची नजर हटत नाही, हे पाहून पूर्वीच्याच (लाडक्या) भूमिकेत जात बाबा खेकसलेच!

‘‘मोऱ्या, सकाळी उठल्यापासूनच मोबाईल! किमान आजच्या दिवशी तरी पुस्तक हातात धर की रे.’’

‘‘माझी परीक्षा संपून आठवडा झालाय, बाबा. मग आता कसलं पुस्तक हातात घेऊ म्हणताय?’’

बाबांना चिडल्यासारखं वाटू लागलं. म्हणाले, ‘‘अभ्यासाचं पुस्तक म्हणत नाहीये मी. आज जागतिक पुस्तक दिवस आहे. विल्यम शेक्सपीअर माहितीये ना? त्या महान लेखकाचा जन्मदिन आहे आज. चारशे आठवा. आठ वर्षं झालीत चारशे पार होऊन..!’’

‘‘त्या गुगलमध्ये सारखं डोळे खुपसून बसलेला असतो. एवढंही माहीत नाही? त्या ऐवजी पुस्तकात थोडं डोकं खुपसत जा.’’ बाबांचा सात्त्विक वगैरे म्हणणारा संताप शब्दांमधून झिरपत ईअरफोनला भेदत मोरूच्या कानापर्यंत पोहोचला.

‘‘अच्छा, पुस्तक दिनाचं महत्त्व सांगताय तुम्ही बाबा. या मुहूर्तावर सकाळी सकाळी मी एखादं पुस्तक हातात घेऊन बसावं, अशी तुमची अपेक्षा आहे. म्हणजे ‘किमान आजचा दिवस तरी’ मी पुस्तक वाचावं. असंच ना?’’

‘‘आजच्या दिवशी म्हणजे? रोजच वाजत जा असं कित्येक वर्षांपासून सांगतोय मी. रोजचं सोडा, आठवड्यातला एखादा दिवस तरी पु्स्तक धरत जा हातात,’’ बाबा तळमळीने म्हणाले.

‘‘बाबा, वाचून फायदा काय? म्हणजे पुस्तकंच का वाचायची?’’. मोरूनं भाबडेपणानं विचारलेला हा प्रश्न म्हणजे ऑफस्पिनर अश्विननं टाकलेला लेगस्पिन! किंवा हरभजननं टाकलेला ‘दूसरा’!! मोरूला इतकी वर्षं पुरेपूर ओळखून असलेल्या बाबांना हे पुरतं माहीत होतं. त्यांची अवस्था मैं इधर जाऊँ या उधर जाऊँ’ अशी गंडलेल्या फलंदाजासारखी झालेली...

‘‘पुस्तकाच्या वाचनाचे फायदे सांगता येतील का तुम्हाला बाबा? म्हणजे ‘वाचाल तर वाचाल’ अशी वर्षानुवर्षं वाचत आलेली सुभाषितं नका सांगू. ‘ज्याचं मस्तक पुस्तकात, त्याच्या मस्तकात पुस्तक!’, हे सुभाषितही माहिती आहे मला.’’

‘‘...आणि हो, ती खास आजचा दिवस साजरा करण्यासाठी इंटरनेटवरून शोधून काढलेली कोटही ऐकवू नका.’’ मोरून पुढचा गुगली किंवा दूसरा टाकला.

‘‘मोरू, मोरू... पुस्तकवाचनाचे किती म्हणून फायदे सांगू तुला,’’ बाबा म्हणाले. त्यांनी आठवायला सुरुवात केली. मनातल्या मनात यादी सुरू झाली. बाबा सांगू लागले -
  • पुस्तकं वाचल्याने आपल्या जगाबाहेर काय चाललंय, हे कळतं.
  • काय होतं पुस्तकं वाचल्यानं? ज्ञान मिळतं, मनोरंजन होतं, माहितीच्या साठ्यात भर पडते.
  • पुस्तकं वाचायला लागला की, तुमची एकाग्रता आपोआप वाढते. त्याचा फायदा अभ्यास करताना, तुमचा व्यवसाय वा नोकरी करताना होतो.
  • तर्क करण्याची शक्ती वाचनातून विकसित होते.
  • तुमच्या भाषेत सांगायचं तर पुस्तकं वाचण्याएवढं दुसरं चांगलं ‘स्ट्रेस बस्टर’ नाही.
  • समजा तुला फिजिक्सचा पेपर अवघड गेला. तो ताण विसरायला म्हणून तू द. मा. मिरासदार यांचं ‘माझ्या बापाची पेंड’, पु. ल. देशपांडे यांचं ‘खोगीरभरती’, शंकर पाटील यांचं ‘खुळ्याची चावडी’, शरद वर्दे यांचं ‘फिरंगढंग’ किंवा ‘बोलगप्पा’... असं कुठलंही पुस्तक वाचायला घे. हवं तर शिरीष कणेकरांचं निवड. आठ-दहा पानं वाचली की, तू फिजिक्स वगैरे सगळं विसरून जाशील. खरं म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळी तसं ते विसरल्यामुळेच तुला या ‘स्ट्रेस बस्टर’ची गरज पडलीय.
बाबांना नेमक्या वेळी फिजिक्सचा पेपर आठवल्यामुळं मोरूचा स्ट्रेस किंचित वाढलेलाच.

फायद्याची यादी पुढे चालू राहाते -
  • ‘मस्तकात पुस्तक’ वगैरे तुला आवडत नाही. पण वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. कल्पनाशक्ती सुधारते.
  • आपलं जग, आपली (आणि इतरांचीही) संस्कृती, आपला इतिहास याची उमज वाढते ती वेगवेगळी पुस्तकं वाचल्यानेच. विविध दृष्टिकोण वाचल्यामुळं खरं-खोटं कळायला लागतं.
  • वाचनामुळे प्रेरणा मिळते. जग बदलून जातं. मला स्वतःला ‘एक होता कार्व्हर’सारखी अनेक पुस्तकं प्रेरणा देणारी वाटतात.
  • वाचनामुळे संवाद करण्याची क्षमता अधिक चांगली होते.
  • महत्त्वाचं म्हणजे भरपूर वाचलं की (थोडं तरी) चांगलं लिहिता येतं. मी नाही का दोन वर्षांपासून साप्ताहिक सदर लिहितोय...
आता बाबा स्वतःच्या सदराबद्दल आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल भरभरून बोलू लागणार हे मोरूच्या आतल्या आवाजानं सांगितलं. त्यानं ब्रेक लावला.

‘‘आम्ही, म्हणजे हल्लीची मुलं, वाचतच नाही, हे तुम्ही कशावरून ठरवता बाबा? फेसबुक, एक्स, इन्स्टा, चॅट हे सगळं सांभाळत आम्हीही वाचतो. पुस्तक थेट हातात कमी घेत असू. इंटरनेटवरच्या ‘अर्काइव्ह’सारख्या ग्रंथालयातून जुन्या पुस्तकांच्या पीडीएफ वाचत असतो. ‘पब्लिक लायब्ररी ऑफ इंडिया’, प्रोजेक्ट गुटेनबर्गची ‘फ्री इ-बुक्स’, ‘ई-साहित्य’... असं बरंच कुठून कुठून खूप काही वाचत असतो. तुम्हाला वाटतं आम्ही मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये डोळे खुपसून बसलोय. दिसतं तसं नसतं, बाबा...’’

‘‘...आणि खरं सांगू बाबा तुम्हाला, ‘वाचावं की वाचू नये’, असा ‘हॅम्लेट’ कधीच होत नाही माझा. ‘हे आधी वाचू की ते वाचू?’, असा प्रश्न असतो. तुम्हाला माहितीये का, पुस्तकं वाचणारा जगातला पहिल्या क्रमांकावरचा देश आपला आहे. आमची पिढी वाचत नसती, तर झालो असतो आपण जगात नंबर वन?’’ मोरूलाही सात्त्विक संताप आलाय, हे बाबांनी ओळखलं.

मोरू पुढं सांगू लागला, ‘‘पुस्तक दिनानिमित्त तुम्हाला एखादं छान पुस्तक भेट द्यायचंय. त्यासाठीच मी एवढ्या सकाळी सकाळी मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसलोय.’’

आता बाबांचे डोळे किंचित पाणावलेच. पुस्तकांचं सोनं लुटायचंय, या कल्पनेनं त्यांना भरून आलं.
........
जागतिक पुस्तकदिनानिमित्त दैनिक सकाळमध्ये बरोबर वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेला लेख.
धन्यवाद श्री. निरंजन आगाशे.
........
#जागतिक_पुस्तकदिन #मोरू_बाबा #विल्यम_शेक्सपीअर #मस्तक_पुस्तक 
#खिडकी_ब्लॉग
........

सोमवार, १७ मार्च, २०२५

आजोबा सांगतात, ‘ॲक्ट पॉझिटिव्ह’



 डॉक्टर खास कौतुक करतात - ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू होतात. स्पेशल रूम आहे. दुपारपर्यंत चार-पाच सलाईन देतात. मग हे दोघं परत नगरला आणि तिथून मिळेल ती गाडी पकडून गावाकडे परततात. रविवारची दुपार सुरू होताच सुरू झालेली त्यांची ही दगदग सोमवारी रात्री कधी तरी संपते.
-------------
साधारण दहा-अकरा वर्षांचा नातू आणि (कागदोपत्री तरी!) पंचाहत्तरी पार केलेले आजोबा. त्यांचा दर आठवड्याचा प्रवास ठरलेला आहे. दोन टप्प्यांचा प्रवास. आजोबांच्या हातात काठी नाही. उलट त्यांचंच बोट धरून नातू असतो. अनुभवी आणि आश्वासक हातात कवळेपण.

हे असं खूप दिवसांपासून चाललेलं आहे. अंदाजे किती दिवस, आठवडे व महिने असं विचारायला नको. आजोबांकडे हिशेब आहे - आतापर्यंत सलग ११४ आठवडे त्यांनी हा प्रवास केला आहे. आताशी कुठे तो मध्यावर आलेलाय.

‘पॉझिटिव्ह थिंकिंग’चा डोस पाजणाऱ्या कोणत्याही खपावू पुस्तकापेक्षा अगदी थेट व्यावहारिक अनुभव आज मिळाला. कृपा ‘लाल परी’ची! तिच्यामुळे होत असलेल्या आरामदायी प्रवासाची.

नगरहून काल जाताना एस. टी. बस जेवण्यासाठी थांबली नाही. सगळे थांबे व्यवस्थित घेऊनही वेगाने धावली. तो सुखद धक्का जेमतेम पचनी पडत होता. परतताना मात्र बस थांबलीच. नगर २५ किलोमीटर राहिलेलं असताना. घरचं जेवण वाट पाहत असताना. रुई छत्तिशीजवळच्या थोडंस पुढे (चिंचोली कोयाळ फाटा?) असलेला हा ढाबा आता बहुतेक सर्व एस. टी. बससाठी हक्काचा थांबा बनला आहे.

‘जेवणासाठी गाडी १५-२० मिनिटं थांबेल,’ अशी घोषणा करून विसावा घेणारी ही बस तिसाव्या मिनिटाला पुन्हा फुरफुरू लागली. त्याच वेगाने इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी.

बस सुरू होता होता आजोबा आणि नातू प्रवेश करते झाले. बरेच प्रवासी आधीपासून उभे होते. ढाब्यापासून प्रवासी कसे काय घेतले, हा प्रश्न पडला. आजोबा नातवाला सांभाळून, जपून आणत होते. तो आजारी असावा, चालताना त्रास होत असल्याचं दिसलं.

पांडुरंगाचं दर्शनानं खूश होऊन कोल्हारला परत चाललेल्या मावशी शेजारी होत्या. त्यांची परवानगी गृहीत धरून ह्या मुलाला आमच्या मधली जागा देऊ केली. (कारण त्याच्या पाच मिनिटंच आधी त्यांनी आपल्या गाववाल्या शेजारणीला तिच्या आसनावर एका तरुण मुलीची सोय करून द्यायला बजावलं होतं.) ‘ओ पैलवान, ये बस इथं’, असं म्हणाल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर खुशी दिसली.

मुलगा आजारी दिसत असला, तरी त्याचे कपडे एकदम व्यवस्थित होते.  अंगात जीन्ससारखी पँट. पूर्ण बाह्यांचा सदरा. त्या बाह्या छान दुमडून किंचित वर घेतलेल्या. गोबरे गाल, वाटोळा चेहरा; पण त्यावर उदासवाणा भाव. वयाच्या मानाने चेहऱ्यावर असलेल्या पोक्तपणा जाणवणारा. कोवळेपणा कायम ठेवूनही.

आजोबांनी मला उठायला सांगितलं आणि आपल्या नातवाला हळूच तिथं बसवलं. ‘पलीकडं सरकून बस थोडं, बाबांना जागा दे बरं...’, असं मग ते नातवाला म्हणाले. तिकीट काढून झालं आणि आजोबांच्या गप्पा चालू झाल्या. अपंग म्हणून नातवाला ७५ टक्के सवलत आणि आजोबा पंचाहत्तरीपुढचे म्हणून मोफत. हे झालं नगरपर्यंतचं. मग तिथून पुढचा पुण्यापर्यंतचा प्रवास किती रुपयांना पडतो, हे त्यांनी सांगितलं. बस साधी नसेल, तर जास्त पैसे लागतात. पण आम्ही मिळेल त्या बसने जातो, अशी पुष्टी जोडली.

शेजारच्या मावशींनी मुलाद्दल विचारलं आणि जणू त्याचीच वाट पाहत असल्यासारखे आजोबा सांगू लागले, ‘‘पुण्याला चाललोय. दीनानाथ मंगेशकरमध्ये. दर सोमवारी जातोय. ११४ आठवडे झाले. सलाईन द्यावे लागतेत चार-पाच. आज जायचं आणि उद्या परत यायचं.’’

त्या छोट्या मुलाचे कमरेखालचे स्नायू दुबळे होते. काही तरी मोठा आजार होता. त्या साठी दर आठवड्याला ह्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात. दसरा नाही, दिवाळी नाही आणि शिमगा नाही... उपचार सुरू झाले तेव्हापासून आजोबांनी एकदाही खाडा केला नाही त्याला तिथं नेण्यात. ‘फक्त एकदाच त्याला त्याचा बाप घेऊन गेल्ता,’ आजोबांनी प्रांजळपणे सांगितलं.

आमचा प्रवास जेमतेम अर्धा तास बाकी होता. तेवढ्या वेळात हा मुलगा, आजोबा आणि त्यांचं कुटुंब ह्यांची संपूर्ण माहिती मिळाली. ह्या कोवळ्या मुलाच्या आजारावर अजून उपचार सापडलेले नाहीत. एक अमेरिकी संस्था त्याबाबत संशोधन वा अभ्यास (आजोबांच्या भाषेत ‘रीसर्च’!) करीत आहे. त्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मदत घेतली जात असावी. ह्या उपचारांसाठी अशा दहा-बारा रुग्णांची निवड केलेली आहे. ते उपचार मंगेशकर रुग्णालयात होतात.

‘पांडुरंगाची कृपा!’, आजोबा कृतज्ञपणे म्हणाले आणि पुढं सांगू लागले, ‘‘आपल्याला काय परवडतंय हे न्हाई तर. किती खर्च असंल ह्याचा?’’, असा प्रश्न विचारून त्यांनीच पुढच्या क्षणाला उत्तर दिलं - १२ कोटी रुपये!

‘उमेश सरांची कृपा!’ नातवाला मिळत असलेल्या उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आजोबा अजिबात सोडत नव्हते. सर म्हणजे डॉक्टर हे लक्षात आलं. डॉ. उमेश कलाणे. बालकांच्या न्यूरोलॉजीचा विशेष अभ्यास असलेले डॉक्टर.

उपचारांबद्दल आजोबा म्हणाले, ‘‘उमेश सरांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं, एकदा यायला सुरुवात केली की, मधूनच सोडून चालणार नाही. नाही तर आमची सगळी मेहनत गेली बघा वाया. मी म्हणालो, ‘तुम्ही सांगान तवा येईल.’ तेव्हापासून दर आठवड्याला जातोय बघा. एकदा तर लक्ष्मीपूजन करून रात्री निघालो.’’

खंड पडू न देता दोन वर्षांहून अधिक काळ रुग्णाला नियमित आणणाऱ्या आजोबांचं उमेश सरांनी स्वाभाविकच कौतुक केलं. ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ ही माहिती देऊन मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू होतात. स्पेशल रूम आहे. दुपारपर्यंत चार-पाच सलाईन देतात. म्हणजे आपण समजून घ्यायचं की, शिरेतून विशेष औषधे दिली जात असावीत. दुपारपर्यंत औषधयोजना संपते. मग हे दोघं परत नगरला आणि तिथून मिळेल ती गाडी पकडून गावाकडे परततात. हमरस्त्यापासून काही किलोमीटरवर हे गाव. रविवारची दुपार सुरू होताच सुरू झालेली त्यांची ही दगदग सोमवारी रात्री कधी तरी संपते.

आणि ही दगदग, हा प्रवास ११४ आठवड्यांपासून चालू आहे. असं अजून किमान ९४ आठवडे त्यांना करायचं आहे. कारण ह्या उपचाराचा कालावधी चार वर्षांचा आहे.

ह्या दगदगीबद्दल आजोबांच्या बोलण्यात खेद, खंत, त्रास असं काही डोकावत नसतं. अतिशय शांतपणे, हसतमुखाने ते सांगत असतात. ‘बाकी काही नाही हो. ह्यो आपला गडी धडधाकट झाला पाहिजे. बघू त्या पांडुरंगाच्या मनात काय आहे ते,’ असं म्हणत ते पांडुरंगावर भार सोडून देतात.

नातवाचं कौतुक करताना आजोबा रंगतात. ‘‘तिथं हॉस्पिटलात चार-पाच वेळा सुया टोचतात सलाईनसाठी. गडी कधी हं की चूं करत नाही. रडायचं तर सोडाच! नर्सबाई पण लई कौतुक करताते ह्याचं.’’

आजोबांचा नातू चौथीत आहे. इंग्रजी शाळेत घातलाय त्याला. ‘लय हुशार बघा. प्रत्येक विषयात तीसपैकी २८-२९ मार्क मिळवतोय. त्याच्या बाईपण खूशयेत त्याच्यावर.’ मग ते त्याच्या शाळेच्या बसचा खर्च, शाळेची फी सांगतात. चांगल्यापैकी रक्कम आहे ही. गावापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आपला दुबळा नातू तिथंच शिकला पाहिजे आणि उभा राहिला पाहिजे, ही आजोबांची इच्छा. नातू शाळेत अजिबात त्रास देत नाही, असं कौतुकाने सांगतात आणि हळूच म्हणतात, ‘हां, आता घरी आमाला देतो अधनंमधनं तरास. पण चालायचंच...’

एवढी सगळी कहाणी मस्त सांगत असताना आजोबांचा एकदाही कणसूर लागत नाही. परिस्थितीचं रडगाणंही ते गात नाहीत. कारण परिस्थिती तशी नाहीचंय मुळी. ते म्हणाले, ‘‘तसं बरं आहे आपलं. देवानं बरं चालवलंय. शेती आहे. दुधाचा धंदा आहे. सात-आठ गाया आहेत. ह्येचा बाप बघतो दुधाचा धंदा. परवाच त्याला ट्रॅक्टर घेऊन दिला. पांडुरंगाची कृपा...’’

गळ्यात तुळशीमाळ, आणिक कसल्या तरी एक-दोन बारीक मण्यांच्या माळा असणाऱ्या आजोबांचा पांडुरंगावर फार विश्वास. त्याला ते बोलण्यात घेऊन येतातच. पोराची आजी आता चार धाम यात्रेला चाललीये, असं ते शेजारच्या मावशीला सांगतात. ‘‘आलो परवाच १५ हजार रुपये भरून यात्रेचे. चांगले धा-बारा दिवस आहे. तिला म्हणलं, पाय चालतेत तोवर ये फिरून, बघून.’’

मग मावशींच्या कपाळीचा टिळा पाहून ‘कसं झालं पांडुरंगाचं दर्शन?’ विचारून आपल्या पंढरीच्या वारीचं वर्णन सांगतात. पुढे पुस्ती जोडतात, ‘‘आता एवढ्यात न्हाई गेलो. आता बघा ना आमचे दोन दिवस पुण्याला येण्या-जाण्यातच जातात. मग आठवड्याचे राहिले पाच दिवस. त्यात किती तरी कामं करायची असतात बघा...’’

मावशी आणि माझ्यामध्ये बसलेला नातू सगळं ऐकत असतो. पण गप्पगप्प. आजोबा ज्याला त्याला काय हे पुराण सांगतात उगीच, असा काही भाव त्याच्या चेहऱ्यावर नसतो. दहा वाक्यं आपण बोलावीत, पाच प्रश्न विचारावेत तेव्हा तो एखाद्या शब्दाचं उत्तर देतो. आवडीचा विषय इंग्रजी आहे असं सांगतो. त्याच्या सुंदर शर्टचं कौतुक केल्यावरही तो लाजत नाही किंवा चेहऱ्यावर कसलेही भाव उमटू देत नाही. त्यानं शर्टाच्या बाह्या खरंच फार छान दुमडलेल्या असतात. ते ऐकून आजोबांच्या मनात कौतुकाची नवी लाट येते, ‘त्याला हाप शर्ट आजिबात आवडत नाहीत. सगळेच्या सगळे फुल्ल बाह्यांचे आहेत.’

पुण्याच्या एवढ्या आठवड्यांच्या प्रवासात आलेला एक अनुभव आजोबा आवर्जून सांगतात, ‘‘गाडीला कितीबी गर्दी असूं द्या; आमच्या गड्याला कुणी ना कुणी बसायला जागा देतोच. ह्या पठ्ठ्याला एकदाबी उभं राहावं लागलं नाही. पांडुरंगच त्या जागा देणाऱ्याला तशी बुद्धी देत असंल बघा. आज नाही का तुम्ही बोलावलं चटसरशी, तसंच.’’

प्रवास संपतो. उतरणाऱ्यांना घाई असते. आजोबा, त्यांचा नातू ह्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. त्यांना एखादा धक्का बसतोच घाईचा. आजोबाच सांगतात त्याला, ‘बाळा, बाजूला राह्य बरं थोडा. त्यांना उतरूंदे.’

माळीवाड्याच्या स्टँडवर उतरल्यावर आजोबांना लाडक्या नातवाला घेऊन पुण्याची गाडी पकडण्याकरिता पाचशे मीटरवरच्या दुसऱ्या स्टँडकडे जावं लागणार आहे. नातवाला चालता येईल ना? ते म्हणतात, ‘सपाट जागा असली ना, आमचा गडी दोन किलोमीटरबी चालतोय.’

दोघांमध्ये इवलीशी जागा दिल्याबद्दल आजोबा दिलखुलास हसून माझे आभार मानतात. म्हणतात, ‘आपले तर प्रयत्न चालूयेत. यश द्यायचं त्या पांडुरंगाच्या हाती.’

पांडुरंग तुमच्या पदरात यश टाकणारच, असं कितव्या तरी वेळा सांगून निरोप घेतो. हार न मानणाऱ्या आजोबांची एक अतिशय सकारात्मक गोष्ट मनात रुजवून!
.......
(छायाचित्रं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने.)

मंगळवार, ११ मार्च, २०२५

खणखणीत आणि निर्विवाद

चॅम्पियन्स करंडक - 

अहमदाबादेतल्या ठसठसत्या जखमेवर दुबईत पुन्हा एकदा
हळुवार फुंकर मारण्यात आली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावून. उपान्त्य सामन्याचा जणू पुढचा अंक असावा, अशी ही दुबईतली लढत. आधी फिरकीनं ब्लॅक कॅप्सच्या नाड्या आवळल्या.
मग रोहित-गिल ह्यांची शतकी सलामी. संयमाच्या परीक्षेत अय्यर आणि राहुल उत्तीर्ण झाले. ह्या सांघिक परिश्रमाचं फळ म्हणजे दहा महिन्यांमधलं
दुसरं विश्वविजेतेपद!
----------------------
साधारण दहा महिन्यांच्या काळात दुसरं जागतिक विजेतेपद. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील मागच्या चोवीसपैकी २३ सामन्यांमध्ये विजय. पराभव एकमेव; पण त्याचा घाव न पुसला गेलेला. विश्वचषक स्पर्धेतील अहमदाबादच्या अंतिम सामन्यातील हार.

त्या घावावर मलम लागला २९ जून रोजी ब्रिजटाऊनमध्ये. टी-20 विश्वचषक भारतीय संघानं पटकावला.
आणि आता पुन्हा एकदा त्या ठसठसत्या जखमेवर हळुवार फुंकर मारली गेली दुबईतल्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये. आठ देशांच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतानं बाजी मारली. स्पर्धेतले पाचही सामने जिंकून कमावलेलं हे विजेतेपद. खणखणीत आणि निर्विवाद.

शेवटच्या सामन्यात न्यू झीलँड संघाचा प्रतिकार पद्धतशीरपणे मोडून काढत भारतानं गटात अव्वल स्थान मिळविलं. उपान्त्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ समोर असल्याचं दडपण झुगारून दिलं. चार गडी राखून विजय.

त्याच उपान्त्य सामन्याची थोडी-फार पुनरावृत्ती अंतिम सामन्यात झाली. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा नाणेफेक हरलेला. धावांचा पाठलाग करण्याची वेळ. पुन्हा एकदा लोकेश राहुल आणि रवींद्र जाडेजा ह्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलेलं.

राहुलचा कबुलीजबाब
अजून काही वर्षांनी निकाल सांगेल - भारत चार गडी राखून विजयी. तेव्हा असंही वाटेल कदाचीत की, सहज सोपा विजय होता. पण सामना किती चुरशीचा झाला, हे राहुलनं रविवारी कॅमेऱ्यासमोर काहीशा असभ्य भाषेत सांगितलेलं आहेच.

इंग्लंडमध्ये सहा वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अतिशय अटीतटीच्या लढतीत न्यू झीलँडला यजमान इंग्लंड संघानं हरवलं. तेव्हा चौकारांची संख्या महत्त्वाची ठरली होती. किवीज त्यातून काही शिकले असावेत बहुदा. ह्या अंतिम सामन्यात त्यांचे चौकार भारताहून दोन अधिकच होते. षट्कारांमध्ये मात्र ते मागे राहिले. पण निकाल ठरविण्यासाठी ते मोजण्याची वेळ आलीच नाही.

कुलदीप, वरुण, अक्षर आणि जाडेजा ह्या फिरकी चौकडीनं मधल्या षट्कांमध्ये न्यू झीलँडला बांधून ठेवलं होतं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकच फलंदाज गमावून संघानं ६९ धावांची मजल मारली होती. फिरकीचं आक्रमण सुरू झालं आणि त्या गतीला खीळ बसली.

चौकारांचा दुष्काळ
न्यू झीलँडच्या डावात चौकारांचा दुष्काळ दिसत होता. तब्बल ८१ चेंडू एकही फटका सीमेच्या पलीकडे गेला नाही. चौदाव्या षट्कातील दुसऱ्या चेंडूला डॅरील मिचेलने अक्षर पटेलला स्लॉग स्वीप मारून स्क्वेअर लेगला चौकार मिळवला. त्यानंतर थेट सत्ताविसाव्या षट्कातल्या कुलदीपच्या अखेरच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने षट्कार मारला. गती किती संथ झाली होती? तर नऊ ते त्रेचाळीस ह्या षट्कांमध्ये चारच चौकार गेले.

फिरकी गोलंदाजांनी किवी फलंदाजांच्या नाकात दम आणला होता खरा. ही पकड अशीच राहती, तर न्यू झीलँडला निर्धारित षट्कांत जेमतेम सव्वादोनशेचा टप्पा गाठता आला असता.

पण मायकेल ब्रेसवेल ह्यानं कमाल केली. शेवटच्या सात षट्कांमध्ये ६७ धावा निघाल्या. त्यातही महंमद शमी आणि हार्दिक पंड्या ह्यांनी अखेरच्या तीन षट्कांमध्ये खैरातच केली. त्यांनी ३५ धावा दिल्या. सत्तेचाळिसावं षट्क संपलं तेव्हा ब्रेसवेलच्या ३५ धावा होत्या ३३ चेंडूंमध्ये. पुढं तो सुटला.

ब्रेसवेलची ही तोफ अखेरच्या षट्कातही धडाडावी म्हणून कर्णधार मिचेल सँटनरनं धावचित होणं पत्करलं. ब्रेसवेलच्या ४० चेंडूंमधील ५३ धावांच्या खेळीनं डॅरील मिचेलच संथ अर्धशतक स्वाभाविकच झाकोळून गेलं.

ढेपाळलेलं क्षेत्ररक्षण
भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण ह्या महत्त्वाच्या सामन्यातही ढेपाळलेलंच दिसलं. चार झेल सुटले. त्याची सुरुवात शमीनं केली आणि शेवट शुभमन गिल ह्यानं. श्रेयस अय्यर, रोहित शर्मा आणि गिल ह्यांच्या हातून सुटलेले झेले मिडविकेट, डीप मिडविकेट ह्याच क्षेत्रातले होते, ही एक गंमतच.


जादूगार...ग्लेन फिलिप्स
.......................

स्पेशल झेलानंतरची स्पेशल पोज...
................

बहुदा श्रेयसला ह्याची भरपाई प्रतिपक्षानं करून दिली. फक्त खातं उघडलेलं असताना काईल जेमिसन ह्यानं त्याचा झेल सोडला. तो कमनशिबी गोलंदाज कोण होता? ग्लेन फिलिप्स! ज्यानं अफलातून झेल घेत गिलचा ऑफ ड्राइव्ह पकडला होता. जादूगार हवेतून कबुतर काढून दाखवतो, त्या लीलया पद्धतीनं फिलिप्सनं चेंडू पकडला होता.

ह्याच जेमिसनच्या गोलंदाजीवर गिलला जीवदान मिळालं तेव्हा तोही एकच धाव काढून खेळत होता. न्यू झीलँडच्या पराभवाला तो झेल कारणीभूत ठरला का? कारण मग रोहित आणि गिल ह्यांनी शतकी भागीदारी केली. पहिल्या दोन षट्कांमध्ये २२ धावा करणारा भारतीय संघ पहिला पॉवर प्ले संपल्यावर धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या मागेच होता.

मधल्या षट्कांमध्ये न्यू झीलँडच्या फिरकी गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजीच्या नाड्या आवळल्या. ते दडपण घेऊनच रोहित पुढे सरसावला आणि रचिन रवींद्रला यष्टिचित झाला.

शतकी सलामी महत्त्वाची का, तर दुबईच्या स्टेडियमवर मधल्या षट्कांमध्ये धावा करणं कठीण होतं. तिथेच पाच सामने खेळलेल्या भारतीय संघाला ह्याची कल्पना असणं स्वाभाविकच. म्हणूनच त्या काळात दाखवावा लागतो संयम. श्रेयस, अक्षर, राहुल आणि पंड्या ह्यांनी तो दाखवला. त्या संयमाचं फळ म्हणून नाव सुखरूप पैलतिरी लागली. मॅट हेन्रीची उणीव ब्लक कॅप्सना नक्कीच जाणवली. त्याचं रडगाणं सँटनरनं काही गायिलं नाही, हे कौतुकास्पदच.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपान्त्य लढतीतील डावच जणू राहुलने पुन्हा सुरू केला होता. विजय मिळविताना आधी पंड्या आणि शेवटी जाडेजा हेच त्याचे पुन्हा सहकारी होते. रोहित सामन्याचा मानकरी ठरणं स्वाभाविक. स्पर्धेत दोन शतकं झळकावणारा रचिन रवींद्र स्पर्धेतील सर्वोत्तम ठरला. अफ्लातून झेल घेणाऱ्या ग्लेन फिलिप्सचा त्या साठी विचार करायला काही हरकत नव्हती.

आयसीसीनं निवडलेला संघ
अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ह्या ‘स्पर्धेचा संघ’ निवडला. विजेता कर्णधार रोहितला त्यात स्थान नाही. एवढंच काय, सहभागी आठपैकी पाच देशांचा एकही खेळाडू नाही. ह्या सर्वोत्तम संघाची धुरा न्यू झीलँडचा कर्णधार मिचेल सँटनर ह्याच्या हाती सोपविण्यात आली आहे. पहिलीच चॅम्पियन्स स्पर्धा खेळणाऱ्या अफगाणिस्तानचे दोन खेळाडू ह्या संघात आहेत.

हा संघ असा -
रचिन रवींद्र (न्यू झीलँड दोन शतकं), इब्राहीम जदरान (अफगाणिस्तान, एक शतक, सरासरी ७२), विराट कोहली (एक शतक, सरासरी ५४.५), श्रेयस अय्यर (दोन अर्धशतकं), के. एल. राहुल (यष्टिरक्षक, सरासरी १४०, तेवढ्याच धावा, तीन वेळा नाबाद. लक्ष्याचा पाठलाग करताना निर्णायक खेळी, यष्टिरक्षणाचंही कौतुक), ग्लेन फिलिप्स (न्यू झीलँड, ५९ सरासरीनं २१७ धावा, दोन बळी आणि पाच अफ्लातून झेल), अजमतुल्ला ओमरजाई (अफगाणिस्तान, १२६ धावा, एकूण सात बळी - एका सामन्यात पाच), मिचेल सँटनर (कर्णधार, न्यू झीलँड २६.६ सरासरीनं नऊ बळी. इकॉनॉमी ४.८०), महंमद शमी (नऊ बळी आणि एका सामन्यात पाच बळी), मॅट हेन्री (दहा बळी १६.७ सरासरीनं. एकदा पाच बळी), वरुण चक्रवर्ती (नऊ बळी, सरासरी १५.१, इकॉनॉमी ४.५३) आणि बारावा खेळाडू - अक्षर पटेल.
....
(सर्व छायाचित्रे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या संकेतस्थळावरून साभार.)
....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #अंतिम_सामना #भारत_न्यूझीलँड #रोहित_शर्मा #श्रेयस_अय्यर #फिरकीचे_जाळे #ग्लेन_फिलिप्स #राहुल #ICC_Champions_Trophy #Champions_Trophy_Final #Ind_NZ #Black_Caps #Rohit_Sharma #Shreyas_Iyer #Glenn_Phillips #Rachin_Ravindra
....

बुधवार, ५ मार्च, २०२५

पुनःपुन्हा...विराट आणि विजय!

 चॅम्पियन्स करंडक - ५


हा घ्या विजयाकडे नेणारा षट्कार...कांगारूंविरुद्ध हार्दिक.
(छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी.)

...............................

‘एक दिवशीय क्रिकेटमधला तो अफ्लातून खेळाडू आहे!’
‘त्यानं संघासाठी अशी कामगिरी अनेक वेळा केलेली आहे.’
अनुक्रमे गौतम गंभीर आणि रोहित शर्मा ह्यांची ही विधानं अर्थात
विराट कोहलीचं महत्त्व ठळक करणारी.
कांगारूंविरुद्ध विजय मिळवून वनवास संपवणाऱ्या भारतीय संघानं
दुबईत मंगळवारी एका दगडात बरेच पक्षी मारले.
----------------------
दोन्ही संघांची मिळून विजेतेपद मोजली तर ती १६ होतात. अशा दिग्गज संघांमधील उपान्त्य सामन्यात पाच झेल सुटत असतील तर काय म्हणावं! अर्थात ह्या लढतीचा निकाल कमी झेल सोडणाऱ्या संघाच्या बाजूनेच लागला.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या चॅम्पियन्स करंडकाच्या पहिल्या उपान्त्य सामन्यात भारतानं विजय मिळविला. हे करताना भारतीय संघानं एका दगडात बरेच पक्षी मारलेले दिसतात. आय. सी. सी.च्या कोणत्याही स्पर्धेत असं चित्र दिसलं आहे की, बाद पद्धतीच्या सामन्यात भारतीय संघ कांगारूंपुढे नांगी टाकतो. त्याचं ताजं उदाहरण विश्वचषक स्पर्धेतला अहमदाबादचा अंतिम सामना! 

संपता वनवास विजयाची गुढी
हा १४ वर्षांचा वनवास दुबईत संपला. विजयाची गुढी उभारली विराट कोहली, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या ह्यांनी. कांगारूंचं आणि त्यांच्याविरुद्धच्या पराभवाच्या इतिहासाचं दडपण त्यांनी घेतलं नाही.

ह्या विजयी दगडाने दुसरा पक्षी टिपला तो यजमान पाकिस्तानचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धेचं यजमानपद घेऊनही स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या देशात खेळला जाणार नाही, ह्याचं दुःख त्यांना दुसऱ्यांदा होईल. ह्या आधी आशियाई चषक स्पर्धेत तसंच झालं.

स्पर्धेचा दुसरा सामना लाहोरमध्ये होईल. त्यातील विजेत्याला अंतिम सामना खेळण्यासाठी हवाई मार्गाने दोन हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. त्यात त्यांची दमछाक होणं गृहीत आहे. त्यातही दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला, तर दुबईतला त्यांचा तो पहिलाच सामना असेल. भारतानं टिपलेला हा अजून एक पक्षी.

‘खरोखर अद्भुत खेळाडू!’, अशी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर ह्यांनी ज्याची स्तुती केली, तो विराट कोहली ह्या सामन्याचा मानकरी ठरला, ह्यात आश्चर्य नाही. लक्ष्याचा नियोजनपूर्वक पाठलाग कसा करायचा, हे त्यानं ह्या स्पर्धेत दुसऱ्यांदा दाखवून दिलं. त्याच्या ९८ चेंडूंच्या खेळीत (८४ धावा) फक्त पाच चौकार होते. त्याच्या तंदुरुस्तीला सलामच करावा लागेल.

विराटच्या महत्त्वाच्या भागीदाऱ्या
सलामीवीर झटपट परतल्यावर कोहलीनं डावाला आकार दिला. तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचत त्यानं धावसंख्येला आकार दिला आणि संघाला विजयाच्या दारापर्यंत नेलं. श्रेयस अय्यरबरोबर ९१, अक्षर पटेलबरोबर ४४ आणि के. एल. राहुल ह्याच्या बरोबर त्यानं ४७ धावांच्या भागीदाऱ्या केल्या. म्हणजे २०९ चेंडूंमध्ये ह्या चौघांनी १८२ धावांची भर घातली.

सामाजिक माध्यमांवर अलीकडच्या काळात जल्पकांचं सर्वाधिक आवडतं गिऱ्हाईक म्हणजे के. एल. राहुल. ‘केळ्या’ ही त्याची ओळख. ‘त्याला का खेळवतात? वशिल्याचा तट्टू म्हणून!’ ट्रोलरमंडळींनी काढलेला हा निष्कर्ष. पण राहुलची आजची फलंदाजी ह्या ट्रोलरना सीमापार करणारी होती.

चेंडूंपेक्षा धावा अधिक असं समीकरण भेडसावू लागल्यावर राहुल कोशातून बाहेर पडला. तन्वीर संघा ह्याला दोन चौकार आणि ॲडम झम्पा ह्याला उत्तुंग षट्कार मारत त्यानं इरादा स्पष्ट केला होता. म्हणूनच झम्पाला फटकावण्याच्या नादात कोहली बाद झाल्यावर राहुल काहीसा नाराज झालेला दिसला.

तणाव वाढवला नि संपवलाही!
पहिले सहा चेंडू शांतपणे खेळणाऱ्या हार्दिक पंड्याने तणाव काहीसा वाढविला होता. तो त्यानंच तीन षट्कार खेचत संपवला. गोलंदाजीत सर्वांत महागडा ठरलेल्या हार्दिकनं मोक्याच्या क्षणी फटकेबाजी केली. श्रेयस अय्यर ह्या स्पर्धेत प्रेयस खेळताना दिसतो आहे. त्यानं कोहलीबरोबर महत्त्वाची भागीदारी केलीच; त्या बरोबर भरात आलेल्या कॅरीला थेट फेकीवर धावचित करण्याची कामगिरीही बजावली.

कर्णधार रोहित शर्मानं सुरुवात तर झकास केली होती. तीन-तीन जीवदानं मिळूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही. कूपर कॉनली ह्यानं डावऱ्या फिरकीवर त्याला पायचित पकडलं. कॉनली ह्याच्यासाठी तो ह्या सामन्यातला सर्वांत आनंदाचा क्षण असावा.


आनंदाचा क्षण. कूपर कॉनली ह्यानं रोहितला पायचित केलं.
(छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी.)

...............
सलामीला नऊ चेंडू खेळून कॉनली ह्याला एकही धाव करता आली नाही. त्यातले सात चेंडू तर त्याच्या बॅटमधून हुकलेच. मग बेन ड्वारशुईस ह्याच्या गोलंदाजीवर त्यानं बॅकवर्ड पॉइंटवर रोहितचा झेल सोडला होता. त्याच रोहितला बाद केल्यावर त्याचा आनंद गगनात न मावणारा होता! प्रथम श्रेणी क्रिकेटमधला त्याचा हा पहिला बळी. पण त्याच्या निवडीबद्दल ऑस्ट्रेलियाई पत्रकारांनी व्यक्त केलेली शंका त्यानं सार्थ ठरवली एवढं खरं.

शमीनं सामन्याची सुरुवातच वाईड चेंडू टाकून केली, तेव्हा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची आठवण झाली. त्याचा कित्ता हार्दिक पंड्यानंही पहिल्याच षट्कात गिरवला. आपल्याच गोलंदाजीवर ट्रेव्हिस हेडचा झेल पकडण्यात शमीला यश आलं नाही. हे जीवदान महाग पडणार, असं वाटलं होतंच. हेडनं मग ३३ चेंडूंमध्ये ३९ धावा करताना कर्णधार स्टिव्हन स्मिथबरोबर अर्धशतकी भागीदारी केली. वरुण चक्रवर्तीनं त्याचा अडथळा दूर केला.

कोहलीप्रमाणंच स्मिथनेही तीन महत्त्वाच्या, अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या - आधी हेडला घेऊन, मग लाबुशेन ह्याच्या जोडीने ५६ धावांची आणि कॅरीला घेऊन ५४ धावांची. स्टिव्ह स्मिथ ७३ (९६ चेंडू) व ॲलेक्स कॅरी ६१ (५७ चेंडू) ह्यांनी भारतीय फिरकी चौकडीला चांगले तोंड दिले.

ह्या जोडीला सूर सापडला असताना भारताच्या मदतीला धावला महंमद शमी. त्यानं स्मिथचा त्रिफळा उडवला. ग्लेन मॅक्सवेलला अक्षर पटेलचा चेंडू यष्ट्यांवर आदळल्यावरच कळाला! ड्वारशुईस ह्यानं मात्र कॅरीच्या जोडीला उभं राहायचं ठरवलं होतं. जमू लागलेली ही भागीदारी वरुण चक्रवर्तीनं संपुष्टात आणली.

पाच षट्कांमध्ये चौघे बाद
अय्यरच्या अचूक फेकीनं कॅरी बाद झाला. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या पाच षट्कांमध्ये चार गडी गमावले ते फक्त २९ धावांची भर टाकून. जाडेजाने बऱ्याच दिवसांनी गोलंदाजीत चमक दाखविली. अलीकडे फारसा यशस्वी ठरत नसलेल्या मार्नस लाबुशेन व जोश इंग्लिस ह्यांचे बळी त्यानं मिळविले. शमीनं तीन गडी बाद करून आपली जबाबदारी चोख बजावली. त्यानं आपल्याच माऱ्यावर हेड आणि स्मिथचे झेल पकडले असते, तर कांगारूंच्या डावाचं चित्र विचित्र झालं असतं, एवढं नक्की. कुलदीपची पाटी मात्र आज कोरीच राहिली.

रोहितचा झेल लाबुशेन ह्यानं सोडला, तेव्हा अहमदाबादच्या सामन्याची आणि हेडनं घेतलेल्या अफलातून झेलाची आठवण होणं स्वाभाविकच. अर्धशतक पूर्ण केलेल्या कोहलीवरही मॅक्सवेलनं कृपा केली. तेव्हा दुर्दैवी गोलंदाज कॉनली होता!

धावांचा पाठलाग करताना पहिली सहा षट्कं भारत कांगारूंच्या पुढे होता. नंतर चाळिसाव्या षट्कापर्यंत पारडं थोडं इकडे, थोडं तिकडे झुकत राहिलं. चाळिसावं षट्क संपलं तेव्हा भारत १३ धावांनी मागं होता. जमेची बाजू म्हणजे आपण दोन गडी कमी गमावले होते. शेवटची पाच षट्क राहिली तेव्हा कांगारू दोन धावांनी पुढे होते. मग हार्दिकच्या षट्कारांनी धमाल केली.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या पहिल्या उपान्त्य सामन्याची ही कहाणी... सोडलेल्या झेलांची, विराटच्या हुकमी डावाची आणि भारताच्या सफाईदार विजयाची!
.....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #उपान्त्य_सामना #भारत_ऑस्ट्रेलिया #विराट_कोहली #एका_दगडात  #श्रेयस_अय्यर #स्टिव्ह_स्मिथ #कूपर_कॉनली #हार्दिक #ॲलेक्स_कॅरी #ICC_Champions_Trophy #ICC_Champions_Trophy #first_semifinal #Ind_Aus #Virat_Kohli #Shreyas_Iyer #Hardik_Pandya #Steve_Smith #Alex_Carey #Cooper_Connolly

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

अफगाणी सनसनाटी

 चॅम्पियन्स करंडक - ४


चितपट! मिरवा रे पठ्ठ्याला...
इंग्लंडला हरवल्याचा आनंद साजरा करताना अफगाणिस्तानच्या नवीद ज़दरान ह्यानं
अजमतुल्ला ह्याला खांद्यावरच उचलून घेतलं!
(छायाचित्र सौजन्य : ‘द गार्डियन’)
..................................

धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ पहिल्यापासून अठ्ठेचाळिसाव्या षट्कापर्यंत पुढेच होता. एकोणपन्नासाव्या षट्कात १० धावांनी मागे पडले आणि अखेर आठ धावांनी पराभूत. अफगाणिस्तानचा सनसनाटी विजय. श्रेय शतकवीर ज़दरान आणि अष्टपैलू अजमतुल्ला ह्यांना!
-------------------------------------------
सामना संपला. निकाल लागला. सामन्याचा मानकरी कोण?
शतकवीर इब्राहीम ज़दरान? पाच बळी घेणारा आणि ४१ धावा करणारा अजमतुल्ला ओमरजाई?
निर्णय घेणं मोठं कठीण होतं. पण ज़दरानचं पारडं जड ठरलं. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सर्वाधिक व्यक्तिगत धावा करणारा, अफगाणिस्तानला तीनशेच्या पार नेणारा ज़दरान ह्या ऐतिहासिक विजयातला सर्वांत मोलाचा खेळाडू ठरला!

अफगाणिस्तानच्या सनसनाटी म्हणाव्या, अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा बळी ह्या दोघांची संयुक्त कामगिरी होती. आदिल रशीदने सर्व ताकदीनिशी लगावलेला फटका ज़दरान ह्यानं लाँग ऑफला झेलला. गोलंदाज होत अजमतुल्ला!

फारसा गाजावाजा होत नाही, टीव्ही.च्या पडद्यावर आक्रमण करणाऱ्या जाहिरातींचा ओघ नाही, प्रेक्षकांनी तुडुंब भरलेली स्टेडियम नाहीत... अशा वातावरणात ‘नको नकोशी’ झालेली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुढे पुढे जात आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आज झालेल्या चुरशीच्या सामन्याने तिला थोडी धुगधुगी मिळेल.

दुसऱ्यांदा लोळवलं
जागतिक स्पर्धेत इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा लोळवण्याची कामगिरी अफगाणिस्ताननं केली. ही लढत धावांच्या पावसाची, तरीही मोठ्या अटीतटीची झाली. तिचा निकाल सामन्याच्या अखेरच्या षट्कात लागला. तोवर विजयाचा लंबक कधी इकडे, तर कधी तिकडे झुकत होता.

तीन-तेरा वाजणं म्हणजे काय, ह्याचा (कडवट!) अनुभव जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला बुधवारी आला. विजयासाठी शेवटच्या १४ चेंडूंमध्ये १६ धावांची गरज आणि तीन गडी बाकी, अशी स्थिती होती त्यांची. पण मोक्याच्या १३ चेंडूंमध्ये अखेरचे तिन्ही गडी त्यांनी गमावले. धावा केल्या फक्त आठ एकेरी. त्यातले दोन बळी होते अजमतुल्ला ह्याचे. आणि उंच उडालेल्या फटक्यांचं झेलात व्यवस्थित रूपांतर करण्याची जबाबदारी महंमद नबी ह्यानं पेलली.

भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करण्याच्या उंबरठ्यावर होता. त्या वेळी ग्लेन मॅक्सवेल आडवा आला. त्याला साथ दिली अफगाणी खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणाने. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हं लाहोरमध्ये दिसत होती. चेंडू अडवताना क्षेत्ररक्षक गोंधळत होते. फेकी व्यवस्थित होत नव्हत्या. ही सगळी दडपण आल्याचीच चिन्हं होती. मैदानावर सतत सळसळत्या उत्साहात असणाऱ्या रशीद खानकडून अठ्ठेचाळिसाव्या षट्कातील पहिल्या चेंडूवर एक अवघड झेल सुटला.

त्या जीवदानाचा फायदा आर्चरला घेता आला नाही. त्यानंतर फक्त तीन धावांची भर घालून तो बाद झाला. पण त्या षट्कात अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या त्या जेमी ओव्हरटनच्या बळीने. ह्या सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज होता जेमी. ते अपयश त्याला फलंदाजीतून धुवायचं होतं. शतकवीर जो रूटच्या साथीनं त्यानं अर्धशतकी भागीदारी करून यशाला खुणावलं होतं. पण अजमतुल्लाच्या हळुवार चेंडूनं घात केला. लाँग ऑनला महंमद नबीनं त्या झेलाचा सहर्ष स्वीकार केला. सामन्याचा निकाल तिथंच ठरला.

रूटचं सहा वर्षांनी शतक
सलामीवीर फिल सॉल्ट आणि जेमी स्मिथ लवकर बाद झाल्यावर दुसरा सलामीवीर बेन डकेट (३८) व जो रूट ह्यांनी तिसऱ्या जोडीसाठी ६८ धावांची भागीदारी केली. डकेट बाद झाल्यावर सगळी सूत्रं जो रूटनं स्वीकारली. एक दिवशीय सामन्यातलं त्याचं शतक तब्बल सहा वर्षांनी झालं! त्याचं ह्या आधीचं शतक मायदेशी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत होतं.


हताश, निराश...
संघाला विजयाजवळ आणलं, पण ध्येय पूर्ण होण्याआधीच बाद
झाल्यानं जो रूटला आपली निराशा लपवणं कठीण गेलं.
(छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी. ) 
...........................

जो रूट ह्यानं किल्ला जवळपास लढवलाच होता. कर्णधार जोस बटलरला (३८) साथीला घेऊन त्यानं पाचव्या जोडीसाठी ८३ धावा जोडल्या. पुल मारायला गेलेल्या बटलरच्या बॅटच्या वरच्या भागाला लागून उडालेला चेंडू रहमत शहानं झेलला. तरीही सामना पूर्णपणे अफगाणिस्तानच्या बाजूने गेलेला नव्हता. दमलेला, स्नायू आखडलेला रूट जोमानं खेळत होता. चेंडूमागे धाव ह्या गतीनं शतक पूर्ण करणारा रूट यष्टिरक्षकाकडं झेल देऊन बाद झाला. त्याचा संघ तेव्हा विजयापासून ३८ धावा दूर होता.

धावांच्या पाठलागाचं समीकरण पाहिलं, तर अठ्ठेचाळिसावं षट्क संपेपर्यंत इंग्लंड अफगाणिस्तानच्या पुढेच होतं. एकोणपन्नासाव्या षट्कात ते १० धावांनी मागे पडले आणि अखेरच्या षट्कात आठ धावांनी पराभूत झाले.

यष्टिरक्षक सलामीवर रहमनुल्ला गुरबाज, सादिकुल्ला अटल, रहमतुल्ला शहा हे तिघे तंबूत परतले तेव्हा अफगाणिस्तानच्या धावा होत्या ३७. ही सगळी करामत जोफ्रा आर्चरच्या धारदार माऱ्याची. पण पहिल्या सहा षट्कांत २२ धावा देऊन ३ बळी घेणाऱ्या आर्चरच्या कामगिरीवर शेवटच्या चार षट्कांत पाणी पडलं. त्यात ४२ धावा निघाल्या.

ह्या पडझडीतून सावरलं सलामीवीर ज़दरान व कर्णधार हशमतुल्ला शाहिदी ह्यांनी. सावध खेळत त्यांनी १०३ धावाची भागीदारी केली. शाहिदी बाद झाला तिसाव्या षट्कात आणि संघाच्या धावा होत्या १४०. त्यानंतर ज़दरान ह्यानं टॉप गीअर टाकला. तो व अजमतुल्ला ओमरजाई (तीन षट्कारांसह ३१ चेंडूंमध्ये ४१) ह्यांनी ६३ चेंडूंमध्ये ७२ धावांची भागीदारी केली.

ज़दरानचा झंझावात

कृतज्ञ...
शतकानंतर इब्राहीम ज़दरान ह्याचे प्रेक्षकांना,
संघातील सवंगड्यांना अभिवादन.
(छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी. )
......................... 
पुढच्या शतकी भागीदारीनं चित्र बदललं म्हटलं तरी चालेल. अनुभवी महंमद नबी (२४ चेंडूंमध्ये २ चौकार व ३ षट्कारांसह ४०) आणि ज़दरान ह्यांनी १११ धावांची भागीदारी केली. ज़दरानचं शतक १०६ चेंडूंमध्ये आणि त्याला पुढच्या ७७ धावांसाठी लागले फक्त ४० चेंडू. ह्या महत्त्वाच्या खेळीत त्यानं डझनभर चौकार आणि अर्धा डझन षट्कारांची आतषबाजी केली. अफगाण संघाला शेवटच्या षट्कात दोन गडी गमावून फक्त दोन धावा करता आल्या.

ह्या पराभवानंतर इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध साडेतीनशेहून अधिक धावा केल्यावरही संघाला पराभवच पाहावा लागला. ‘नशीब आपल्या बरोबर नव्हतं,’ अशी खेळाडूंनी त्या वेळी स्वतःचीच समजूत घालून घेतली असेल. पण आजच्या पराभवानंतर चित्र विपरीत झालं. ‘जंटलमन क्रिकेटर’ असणाऱ्या बटलरचं कर्णधारपदही स्वाभाविकच धोक्यात आलं आहे.

सामना तो आणि हा
विश्वचषक स्पर्धेमध्ये दिल्लीतील सामन्यात अफगाणिस्ताननं इंग्लंडवर ६९ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात रूट, बटलर, ज़रदान, अजमतुल्ला ह्यांची कामगिरी डावीच होती. त्या वेळी सर्वाधिक ८० धावा करणारा रहमनुल्ला गुरबाज सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तीन बळी घेऊन इंग्लंडचं शेपूट गुंडाळणाऱ्या आणि झटपट २३ धावा करणाऱ्या रशीद खानच्या कामगिरीकडं दुर्लक्षच झालं. त्याची पुनरावृत्ती इथंही झाली. सॉल्ट, रूट, बटलर हे महत्त्वाचे फलंदाज बाद करणाऱ्या अजमतुल्ला ओमरजाई ह्याच्या अष्टपैलू कामगिरी निश्चितच सामन्यातील सर्वोत्तम ठरण्याएवढी महत्त्वाची होती. पण आपल्याला सगळ्यांना गोलंदाजांपेक्षा फलंदाजच जास्त आवडतात!
.....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #अफगाणिस्तान_इंग्लंड #इब्राहीम_ज़दरान #अजमतुल्ला_ओमरजाई #जो_रूट #रशीद_खान #महंमद_नबी #जोस_बटलर #ICC_Champions_Trophy #Afghanistan_England #Ibrahim_Zadran #Azmatullah_Omarzai #Joe_Root #Mohammad_Nabi #Rashid_Khan #Jos_Buttler

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

विराटने पुन्हा साधलेला ‘मौका’

चॅम्पियन्स करंडक - ३


शतक पूर्ण आणि विजयावर शिक्कामोर्तब!
(छायाचित्र सौजन्य : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद)

-------------------------------------
यजमान पाकिस्तानची सगळी भिस्त आता ‘जर आणि तर’च्या
समीकरणावर आहे. स्पर्धेतील त्यांच्या गच्छंतीवर भारतीय
संघानं दुबईत रविवारी जवळपास शिक्कामोर्तब केलं!
विराट कोहलीनं दमदार शतक झळकावत
‘टायगर अभी...’ अशी जणू डरकाळीच फोडली.
----------------------
आधी कुलदीपच्या फिरकीचं जाळं आणि नंतर कोहलीची झळाळती खेळी. ह्या दोन करामती पाकिस्तानला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यासाठी पुरेशा ठरणार आहेत, असं दिसतं.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत गटामध्येच सलग दुसरा पराभव यजमानांच्या वाट्याला आला. आता त्यांच्या स्वप्नाचा डोलारा ‘असं झालं तर...’ आणि ‘तसं झालं तर...’ ह्या दोन पोकळ वाशांवर उभा आहे. स्वप्न स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठण्याचं. आपण यजमान असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्याच देशातील प्रेक्षकांसमोर खेळायचं आणि करंडक उंचवायचा, हे स्वप्न. पण लाहोर गाठणं फार दूर दिसतंय तूर्त तरी.

पाकिस्तानचा संघ आता ह्या समीकरणांवर अवलंबून आहे -
गटातील लढतीत सोमवारी बांग्लादेशानं न्यू झीलँडला हरवलं पाहिजे.
भारताकडूनही न्यू झीलँडचा पराभव व्हायला हवं.
गटातील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा बांग्लादेशावर दणदणीत विजय.

असंच सगळं झालं, ‘जर आणि तर’ प्रत्यक्षात आल्यावरच पाकिस्तान उपान्त्य फेरीत जाण्याची आशा आहे. ही सगळी समीकरणं जुळून आली, तर पाकिस्तानचं नशीब जोरावर आहे, असंच म्हणणं भाग पडेल.

यजमानपद लाभाचं नाहीच!
पण एकूणच कटकटी करीत मिळविलेलं यजमानपद पाकिस्तानला फारसं लाभकारक ठरत नाही, असं दिसतंय. दोन वर्षांपूर्वी आशिया चषक स्पर्धेच्या वेळी असंच झालं. पाकिस्तानचा संघ काही अंतिम सामन्यात पोहोचला नाही. भारत आणि श्रीलंका ह्यांच्यातील लढत श्रीलंकेतच झाली. आता ती दुबईत होणार का, हे पाहण्याची उत्सुकता आहे.

विराट कोहली कोठे चुकतोय, ह्याबद्दल सुनील गावसकर, अनिल कुंबळे ह्यांच्यासारख्या मातबरांनी हा सामना सुरू होण्यापूर्वी भाष्य केलं होतं. त्यानं आत्मविश्वास गमावलाय की काय, अशीही शंका बऱ्याच जणांनी बोलून दाखवली होती.

पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराटच्या बॅटला अधिकच धार येते, हा अनुभव आहेच. मेलबर्नमधली त्याची ती खेळी आठवतेय ना..! त्याचा तो डाव अधिक आक्रमक आणि निर्णायक. दुबईत आज तो तुलनेनं शांत खेळला. अधिक ठामपणे आणि तेवढ्याच निर्धारानं. त्यानं टीकाकारांची तोंडं बंद केली आणि आपल्या कोट्यवधी पाठीराख्यांना (पुन्हा एकदा) खूश करून टाकलं! पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळी सहकारी खेळाडूंनी त्याची फिरकी घेताना सांगितलं होतं, ‘नव्या खेळाडूनं सचिन पाजींच्या पाया पडावं लागतं!’ त्याच सचिनच्या पंक्तीत तो आज बसला. त्याच्या शतकसंख्येचा मैलाचा दगड ओलांडून.

खुशदिल शहाचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने सीमापार धाडत विराटने शतक पूर्ण केलं. आणि भारतीय विजयावर शिक्कामोर्तबही. हा त्याचा फक्त सातवा चौकार होता. तेवढेच चौकार त्याच्या निम्मे चेंडू खेळून जवळपास निम्म्या धावा करणाऱ्या शुभमन गिल ह्याचेही आहेत. श्रेयस अय्यरचेही पाच चौकार आहेत. पण विराटचा स्ट्राईक रेट ह्या दोघांहून सरस. त्याचं शतक १११ चेंडूंमध्ये. म्हणजे स्पष्ट होतं की, त्यानं फलंदाजीचं आक्रमण कसं धावतं ठेवलं ते...


विराट... पाकिस्तानविरुद्ध आणखी एक अप्रतिम खेळी.
(छायाचित्र सौजन्य : दैनिक डॉन)

.......................................
निर्णायक भागीदाऱ्या
जोरदार फटकेबाजी करीत नसीम शहा आणि शाहीन शहा आफ्रिदी ह्यांच्या माऱ्याची धार बोथट करणारा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यावर विराट मैदानात उतरला आणि विजयी पताका फडकावूनच मैदानाबाहेर आला. अर्धशतक हुकलेल्या शुभमन गिल ह्याच्या जोडीनं त्यानं ६९ धावांची, दोन धावांवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत ५६ धावा टोलविणाऱ्या श्रेयस अय्यर ह्याच्या बरोबर ११४ धावांची भागीदारी केली. ह्याच निर्णायक भागीदाऱ्यांनी पाकिस्तानी गोलंदाजी दुबळी ठरवली.

इथं एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी की, रोहित व गिल ज्या चेंडूंवर बाद झाले, ते अफाटच होते. अन्य कोणताही फलंदाज त्यावर बाद झाला असता.

‘जलदगती गोलंदाजीवर धावा काढायच्या आणि फिरकी जपून खेळायची’, अशा व्यूहरचनेनुसारच विराट व अन्य फलंदाज खेळले. लेगस्पिनर अबरार अहमद ह्यानं एक बळी घेत १० षट्कांमध्ये फक्त २८ धावा दिल्या. ही तूट अन्य गोलंदाजांकडून त्यांनी वसूल केली. दरम्यान, एकेरी-दुहेरी धावा पळत राहून त्यांनी धावफलक हलता ठेवला आणि धावांची गतीही मंदावू दिली नाही. पहिलं षट्क सोडलं तर पाकिस्तानची धावसंख्या भारताहून सरस कधीच नव्हती.

सलामीच्या सामन्यात बांग्लादेशाचा निम्मा संघ गारद करणाऱ्या महंमद शमीची सुरुवातच स्वैर होती. पहिल्याच षट्कात त्यानं पाच वाईड चेंडू टाकले! नंतर त्याला लय सापडली. असं होऊनही पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला फार काही करता आलं नाही. संघानं अर्धशतक गाठलं होतं ते दोन गडी गमावून.

हार्दिक पंड्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल करणारा बाबर आज़म दुसऱ्या चेंडूवर राहुलकडे झेल देऊन परतला. सहाच चेंडू पडले आणि इमाम उल-हक अक्षरच्या अचूक फेकीने धावबाद झाला. इमाम हा इंझमामचा खरा वारस असल्याची खातरी त्यामुळं अनेकांना पटली!

निर्धाव चेंडूंचं शतक
सौद शकील आणि कर्णधार महंमद रिजवान ह्यांनी मग पुढची जवळपास २४ षट्कं पडझड होऊ दिली नाही. त्यांची १०४ धावांची भागीदारी १४४ चेंडूंमधली. ह्या भागीदारीनं धावसंख्येला आकार दिला आणि डावाला खीळही घातली. वरच्या फळीतल्या फलंदाजांना डावातील पहिल्या १६१पैकी १०० चेंडूंवर एकही धाव करता आली नाही. संपूर्ण डावाचा विचार केला, तर तीनशेपैकी १४७ चेंडू निर्धाव गेले.


अक्षरकडून कुलदीपचं कौतुक...
........................
पाकिस्तानच्या डावात १४ चौकार आणि तीन षट्कार होते; त्यातला पहिला षट्कार बेचाळिसाव्या षट्कात होता. शकील व रिजवान जोडी खेळत असताना मधल्या षट्कांमध्ये धावा दाबण्याची चांगली कामगिरी तिन्ही फिरकी गोलंदाजांनी केली. त्यांनी मिळून आज पाच बळी मिळवले. दोन फलंदाज धावबाद झाले, त्या फेकी अक्षर पटेलच्या होत्या.

पराभव का झाला?
आजच्या ह्या लढतीत पाकिस्तानचा पराभव का झाला? ‘डॉन’ दैनिकानं त्याची कारणं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात म्हटलंय - 
ह्या वेळी आपण नेमकं कशामुळे हरलो हो?
भारतीय गोलंदाज चेंडू काय हातभर स्विंग करीत होते की काय?
हार्दिक पंड्या एकदम ताशी दीडशे किलोमीटरच्या वेगानं चेंडू फेकू लागला होता का?
भारतीय फलंदाजांना काही विशेष सवलत किंवा वातावरणाचा फायदा मिळाला का?
भारतीय संघाकडे असं कोणतं अपूर्व किंवा असामान्य कौशल्य होतं?

... ह्या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर एका शब्दाचं - ‘नाही!’ ह्यापैकी काहीही नाही. ‘मध्यमगती’ अशी आपण हेटाळणी केलेल्या त्यांच्या गोलंदाजांनी दिशा आणि टप्पा पकडून मारा केला. त्याच्या उलट आपल्या कथित तेज गोलंदाजांचा मारा स्वैर होता. त्यांनी झेल घेतले, आपण सोडले. त्यांचे फलंदाज टिच्चून खेळले आणि आपल्या खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्या.

थोडक्यात, अशा कुवतीच्या संघाला हरविण्यासाठी कोणालाही खास काही कर्तृत्व बजावण्याची गरजच नाही!

हा सामना चालू असताना पाकिस्तानी चाहत्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या मजेशीर होत्या. काही जण थोडे आशावादी आणि नंतर निकाल स्पष्ट झाल्यावर आपल्याच संघाची टर उडवणारेही भरपूर. शमीचं पहिलं षट्क आणि रोहितचं बाद होणं, ह्याच दोन्ही वेळा पाकिस्तानी संघाच्या पाठीराख्यांच्या अपेक्षा फार उंचावल्या होत्या. अर्थात आशेचा हा फुगा लगेचच फुटला.

चॅम्पियन्स करंडकाच्या २०१७मधील अंतिम सामन्यानंतर भारतानं सलग सहा वेळा पाकिस्तानला धूळ चारली आहे. हे सगळेच विजय मोठे खणखणीत आणि निर्विवाद.

‘शारजा हार जा...’ असं म्हणण्याचा जमाना कधीच मागं पडला. आता ‘दुबई है, दिल जीत जा...’ म्हणण्याचा काळ आहे. पाकिस्ताननं ते रविवारी पुन्हा एकदा अनुभवलं. भारतानं पुन्हा एकदा ‘मौका’ साधला!
.....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #भारत_पाकिस्तान #विराट_कोहली #कुलदीप_यादव #दुबई #महंमद_शमी #अक्षर_पटेल #मौका_मौका #ICC_Champions_Trophy #India_Pakistan #Virat_Kohli #Shami #Kuldeep #Axar_Patel

नवा नेता, नवा इतिहास

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं. पावसानं हजेरी लावल्यानंतरही इंग...