रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

प्रतापराव....


प्रतापरावांचं हे छायाचित्र त्यांच्या गावच्या शिवारातील. आम्ही हुरडा खायला गेलो होतो,
त्या वेळचं. त्यांच्या खांद्याला अडकवलेली पिशवी माझी आहे. मला फोटो काढायला अडचण
होऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण वेळ बाळगली. दुसऱ्याची जबाबदारी आपलीच असल्याच्या
त्यांच्या स्वभावाला जागून...

----------------------------------------------------------

‘केसरी’च्या नगर आवृत्तीच्या कार्यालयात त्यांना ‘देशपांडे’, ‘प्रताप’ आणि ‘प्रतापराव’ अशा वेगवेगळ्या तऱ्हेनं संबोधलं जाई. वरिष्ठ त्यांच्या मागे क्वचित ‘प्रताप’ असा उल्लेख करीत. एरवी त्यांना आडनावानं, नावापुढं राव लावूनच हाक मारली जाई.

प्रतापरावांची थेट भेट होण्याआधीच त्यांची वेगळ्या तऱ्हेनं ओळख झाली. त्यांचं लग्न ज्या दिवशी झालं, त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी माझी नगरला ‘केसरी’तील प्रशिक्षणार्थी उपसंपादक/वार्ताहर ह्या पदासाठी मुलाखत झाली. डिसेंबरची १५ तारीख होती आणि साल होतं १९८७. त्यानंतर दीड महिन्याने आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष भेटलो.

सुरुवातीचे काही दिवस फार जवळची ओळख झाली नाही. कधी तरी चहा प्यायला जाण्याएवढेच संबंध. ‘केसरी’तले आम्ही तीन तरुण तुर्क एका खाणावळीत जाऊ लागलो. त्या चालविणाऱ्या ताई प्रतापरावांच्या बहीण असल्याचं काही दिवसांनी समजलं. नकळत थोडी जवळिक झाली.

‘केसरी’चा बाडबिस्तारा सर्जेपुऱ्यातून केडगावच्या औद्यागिक वसाहतीमध्ये हलल्यानंतर प्रतापरावांशी थोडे अधिक संबंध येऊ लागले. कारण छपाई नगरमध्ये सुरू झाली होती. रात्रपाळीला सहसा आम्ही दोघे एकत्र असायचो. ते असले तर माझी रात्री जाण्याची सोय व्हायची.

अंकाची छपाई सुरू झाली की, प्रतापरावांच्या एम-80वरून निघायचो आणि जुन्या बसस्थानकावरील शेट्टीच्या कळकट कँटीनमध्ये उकळून उकळून काढा झालेला स्टीलच्या बुटक्या कपातला एक कप चहा व्हायचा. खरं तर त्यांना चहा प्यायचा नसायचा, पण मला कंपनी म्हणून ते चहा पित.

हळू हळू लक्षात आलं की, प्रतापरावांचं कोणत्याच गोष्टीबाबत आग्रही किंवा अनाग्रही असं काही नसतं. प्रूफ रीडर म्हणून काम करताना सोलापुरातून ते इथे उपसंपादक म्हणून आले आणि बहुदा तेथेच त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्या. 

एखाद्या बातमीवरून ते कधी उत्तेजित झालेले दिसले नाहीत; किंवा एखादी बातमी आली नाही वा व्यवस्थित लागली नाही म्हणून हळहळताना दिसले नाहीत.

ह्याचा अर्थ असा नक्कीच नाही की, ते कामाबाबत उदासीन होते. वाट्याला आलेले काम ते चोखपणे बजावत. शांत राहून. पोक्तपणा दाखवत.

त्यांना आपल्या क्षमता आणि मर्यादा ह्याची चोख जाणीव होती, हे आता कळतं.

एकदा असंच झालं. रात्रपाळी होती माझी. काही तरी बिनसलं होतं त्या दिवशी. कार्यालयात येऊन टेकलो. पुढच्या मिनिटाला प्रतापरावांनी एक बातमी पुढे केली.

ते संपादकीय सहकाऱ्यांशी कधीच अरे-तुरे बोलत नसत. आम्ही सगळे त्यांच्याहून वयानं आणि अनुभवानं बरेच लहान. तरीही त्यांच्या तोंडून एकेरी हाक कधी आली नाही. त्या दिवशी ते म्हणाले, ‘‘सतीश, एवढी एक बातमी सोडता का?’’

एस. टी.च्या टपालाने दुपारी कधी तरी आलेली बातमी होती ती. एव्हाना संपादन वगैरे होऊन ती आतल्या कोणत्या तरी पानावर चिकटायला पाहिजे होती. ते पाहून म्हणालो, ‘‘अहो देशपांडे, मी रात्रपाळीला आहे. मला पहिल्या पानाच्या बातम्या सोडायच्या आहेत. मग दोन पानं लावायची आहेत. तुम्हीच सोडायला पाहिजे ती.’’

असं ऐकायला मिळाल्यावर दहा-बारा पावसाळे अधिक पाहिलेला कोणताही अनुभवी माणूस चिडला असता. पण चिडतील ते प्रतापराव कसले!

समजूत काढावी तसं ते म्हणाले, ‘‘बरोबर आहे. पण ही बातमी वेगळी आहे. तुम्ही ती चांगली कराल म्हणून तुमच्याकडे दिली. तुमच्याकडे असलेल्या सगळ्या बातम्या मी सोडतो. हवं तर तुमची दोन्ही पानं मीच लावतो. पण ही बातमी तुम्हीच संपादित करावी, असं मला वाटतं...’’

खरं तर त्यांचा राग आला होता. पण त्यांच्या स्वभावामुळे तो दाखविता येणंही शक्य नव्हतं. बातमी घेतली. खरंच थोडी हट के होती. ती अधिक चांगली केली. प्रतापरावांच्याच पानात ती सजवून लागली.

अयोध्येत ६ डिसेंबर रोजी जो इतिहास घडला, तो दिवस आमच्यासाठीही ऐतिहासिक होता. पद्मभूषण देशपांडे ह्याच्याबरोबर मी त्या दिवशी अकोल्याहून संगमनेरला आलो होतो. फोन-टीव्ही. ह्याच्यापासून लांबच असल्यानं काय ‘रामायण’ घडलं ह्याबद्दल आम्ही अनभिज्ञच होतो.

संगमनेरहून नगरला यायला एस. टी. बस नाही. माझी रात्रपाळी. कशीबशी संध्याकाळी साडेसात-पावणेआठ वाजता बस मिळाली. ती रखडत सव्वाअकराच्या सुमारास नगरला पोहोचली. तिथनं केडगावला जायचं कसं? एकाला दादापुता करून स्कूटर काढायला लावली आणि पोहोचलो.

कार्यालयात सगळीच शांतता. प्रतापराव, दोन पेस्टर आणि दोन कम्प्युटर ऑपरेटर. पानं लावण्याच्या टेबलवर तयार होऊन आलेल्या बातम्याच बातम्या पडलेल्या. तीन पानं लावायची बाकी. एकटा माणूस काय करणार!

मला पाहून प्रतापराव खूश झाले. खरं तर एवढ्या उशिरा आल्याबद्दल त्यांनी रागवायला हवं होतं. किमान काही शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करायला हवी होती.

तसं काहीही न करता प्रतापराव म्हणाले, ‘‘आलात का! बरं झालं. ह्या बघा बातम्या. तुम्ही पहिलं पान लावा. तुमच्याकडे जाणार नसलेल्या बातम्या मला सांगा. माझ्या पानांमध्ये जिरवतो. बाकी सगळं सोडा. तुम्ही पहिलं पान बघा फक्त...’’

बऱ्याच लटपटी करून त्या दिवशीचा अंक वेळेत दिला. चांगला नाही, बरा निघाला असावा. कारण आम्हाला त्यावरून कोणीच काही बोललं नाही.

प्रतापरावांमधला सांभाळून घेणारा सहकारी पुन्हा एकदा दिसला.

केडगावच्या आरती हॉटेलमध्ये चहा प्यायला प्रतापरावांबरोबर जायचं म्हणजे मजा असायची. ते सोबत असल्यावर आम्ही वडीलकीचा मान राखून त्यांनाच बिल द्यायला लावायचो. तिथं गेल्यावर भेळ खावी वाटली तर तसं सांगायचो. त्यांचा कोणत्याच गोष्टीला आक्षेप नसायचा.

पुढे पुढे आमची सलगी वाढली आणि आमचा डोळा त्यांच्या डब्यावर जाऊ लागला. त्यांच्या डब्यातली मेथीची मोकळी भाजी आणि वांग्याचं भरीत केवळ अफ्लातून. 

कधी तरी पद्मभूषणला किंवा मला रात्री आठ-सव्वाआठ वाजताच भूक लागायची. खाणावळीचा डबा यायला वेळ असायचा. तो येई तेव्हा कामाची घाई सुरू झालेली.

असंच एकदा प्रतापरावांना म्हणालो, ‘भूक लागली राव.’ ‘माझा डबा आहे की,’ असं म्हणत त्यांनी तो आणून दिला. लाजेकाजेखातर आम्ही त्यांच्यासाठी अर्धी भाकरी आणि घासभर भाजी ठेवून बाकी सगळ्याचा फन्ना उडवला.

मग तो महिन्यातून एक-दोन वेळचा रिवाजच बनला. शेवटी शेवटी तर आम्ही एवढे निर्ढावलो की, त्यांच्या पिशवीतून डबा घेऊन त्यांनाच सांगत असू, ‘भूक लागलीय. संपवतो तुमचा डबा.’

आपण त्यांचा डबा संपवला तर ते काय खाणार, त्यांना भूक लागणार नाही का, एवढ्या रात्री घरी जाऊन ते काय जेवणार आणि समजा घरचा स्वयंपाकच संपला असेल तर... असला काही पाचपोच आम्हाला नव्हताच. पण त्यांनीही त्याची चुकूनही जाणीव कधी करून दिली नाही. उलट मला आवडते म्हणून ते अधूनमधून वहिनींनी बनवलेली मेथीची भाजी किंवा भरीत आणत.

मग आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. अधूनमधून भेट होई. चहा पिण्या-पाजण्याचा आग्रह होई. गल्लीत आले क्वचित तर घरी चक्कर मारीत. त्यांच्या पत्रकारितेचा प्रवासही इकडून तिकडे असा झाला. पण ते कोठेच मनापासून रमले नाहीत. खऱ्या अर्थानं ते ‘ओल्ड स्कूल’चे विद्यार्थी होते. बातमी लिहिण्यातील अनौपचारिकपणा किंवा प्रयोग, जुन्या संकेतांना धक्का लावणारी शीर्षके त्यांना कधी पटली नाहीत. हे असले प्रयोग त्यांना रुचत किंवा पचत नसत. पण बोलून दाखवणं त्यांचा स्वभाव नव्हता.

आमच्या अतिउत्साहाला ते कधी कधी फार खळखळून हसत. पण त्यात टिंगल किंवा कुत्सितपणा नसायचा. आम्ही नावाने बातम्या येण्यासाठी, लेख लिहिण्यासाठी धडपड करत असू. अशा परिस्थितीत प्रतापराव काहीच कसं लिहीत नाहीत, ह्याचं आश्चर्य वाटे. तसं त्यांना कधी तरी विचारलंही. त्यांनी हसून आणि टाळी देत उत्तर टाळलं!

अलीकडच्या दहा वर्षांमध्ये आमचे संबंध पुन्हा वाढले. सात-आठ दिवसांतून कधी तरी फोन, आठ-पंधरा दिवसांतून जमलंच तर भेटणं चालू आहे.

थोडं चालून झालं की, त्यांचा चहा पिण्याचा आग्रह असतो. आम्ही चहा पितो. ते घाईघाईत उठतात. ‘माझ्याकडे सुटे पैसे आहेत,’ असं म्हणत बिल देण्याची लगबग करतात.

सर्व प्रकारची बिलं देण्याचा प्रतापरावांचा अधिकार आम्ही केव्हाच मान्य केलेला आहे. त्या साध्या-सरळ माणसाच्या हे अजून लक्षात आलेलं नाही. 🤣 कोविडच्या आधी आम्ही त्यांच्या गावी हुरडा खायलाही जाऊन आलो. मजा केली.


प्रतापरावांचे दोन मित्र एका चौकटीत. डावीकडे आहेत ते
त्यांचे बालमित्र. उजवीकडे व्यवसायबंधू. हे खुद्द त्यांनीच टिपलेलं
छायाचित्र. गावाच्या शिवारात, हुरडा खाल्ल्यानंतर.

--------------------------------------------------

कधी तरी फिरायला बरोबर येताय का, हे विचारण्यासाठी प्रतापरावांना फोन करतो. त्यांना त्या दिवशी शक्य नसतं. मग ते अतिशय तळमळीनं सांगत बसतात, येणं का शक्य नाही ते. त्यांचं हे स्पष्टीकरण आवडत नाही. मग बहुतेक माझा आवाज तुटक होतो. ‘अहो प्रतापराव, यायला जमत नाही तर तेवढंच सांगा की,’ असं तोडून टाकतो. मग थोडं पुढे गेल्यावर मलाच वाईट वाटतं.

प्रतापरावांच्या डोळ्यांचं मध्ये ऑपरेशन झालं. त्यामुळे फारसं वाचायला जमत नाही, ह्याबद्दलचा खेद ते बोलून दाखवतात. ‘अहो, आता वाचण्यासारखं राहिलंच काय!’, असं म्हणत मी त्यांना दिलासा देतो. मीही फार काही वाचत नाही, असं सांगून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. ‘#खिडकी’मध्ये डोकावता येत नाही, ह्याची खंतही व्यक्त करतात. मग मी पुन्हा समजूत काढतो.

मध्यंतरी त्यांना सवय लागली होती. फोनवरचं पहिलं वाक्य असायचं, ‘तब्येत ठीक ना?’ मला ते अजिबात आवडायचं नाही. बोलून बोलून त्यांची सवय घालवली.

एखाद्या दिवशी फोन येतो. खूप दिवस बोललो नाही म्हणून फोन केल्याचं सांगतात ते. मग आम्ही दहा-पंधरा मिनिटं बोलतो. ‘गेले ते दिन गेले...’च्या त्यांच्या सुरात मी कोरसची भूमिका बजावतो. त्यांच्याकडून जेवण घ्यायचं असल्याचं बजावून सांगतो. तेही बिचारे होकार देतात. नकार देणं किंवा विरोध करणं त्यांच्या स्वभावात नाहीच.

प्रतापराव म्हणजे सीधे-साधे, सरळ. राग-लोभ-द्वेष आदी विकारांपासून लांब असलेले. म्हणजे त्याचं प्रदर्शन तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कधी दिसलं नाही.

असे तीन तपांपूर्वीचे सहकारी आणि तरीही अजून (ज्येष्ठ) मित्र असलेल्या प्रतापराव देशपांडे ह्यांचा २२ सप्टेंबर हा वाढदिवस. सत्तरी ओलांडून ते आता अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हे आठवलं तसं नि तेवढं लिहिलं.

💗🌻💗🌻

....................................................
(लेखाखाली असलेल्या निवडक प्रतिक्रिया फेसबुकवरील आहेत. तेथे टाकलेल्या पोस्टवर अनेक जण भरभरून व्यक्त झाले.)
....................................................

#केसरी #मित्र #प्रतापराव #प्रताप_देशपांडे #मेथीचीभाजी_भरीत #बातमी #उपसंपादक #चहा #रात्रपाळी

बुधवार, २४ जुलै, २०२४

तृप्त, कृतज्ञ आणि चिंब!



सूर्यकुमार यादव, रिंकूसिंह ह्यांच्या 360 degree फलंदाजीची आठवण करून देतो आहे वडोदऱ्यातला पाऊस.  🌧️☔️

जोर धरून आहे बुधवारी सकाळपासून. मन्ना डे ह्यांच्या आवाजातलं ‘घन घन माला…’ ऐकायला भाग पाडणाऱ्या कोसळत्या धारा.

कवाड-अंगणानं कोणत्या गवळणीला अडवलंय का माहीत नाही. पण मी राहतो आहे, तिथल्या अतिथिगृहाच्या उपाहारगृहातला बल्लवाचार्य काही उगवलाच नाही.

इथं ‘कालिंदी’ नसली तरी विश्वामित्री नदी आहे. तिच्यात म्हणे भरपूर मगरी 🐊🐊 आहेत. त्यातल्या एका मगरीने मागच्या शनिवारी एका भटक्या कुत्र्याला मोक्ष दिला! त्याला बिचाऱ्याला वाचवायला कोणी धावलं नाही. हे चित्र असल्यामुळे तिच्या काठी कोणी बासरी घुमवायला आज तरी बाहेर पडणार नाही, एवढं खरं. 

ताजा कलम - पावसाचं एक दिवसाचं भयकारी रूप संपलं आणि ह्या मगरी खरंच रस्त्यावर आल्या. त्याचे व्हिडिओ बडोद्यामध्ये फिरत आहेत.

बंद खोलीच्या बाल्कनीतून पाऊस पाहायला मजा वाटते; पण मग पोटोबाचं काय? यजमानांना तीच काळजी. ते निघाले होते हालहवाल पुसायला. मना केलं त्यांना. म्हटलं, माझ्या खाण्याची काळजी मीच घेतो. फूड डिलिव्हरीचं असता ॲप, कशाला निष्कारण डोक्याला ताप!

पटकन् ॲप उतरवलं. संकष्टी एकादशी. खिचडी शोधली. चार-पाच ठिकाणी मिळाली. मागणी नोंदवेपर्यंत किमती वाढल्या - १०० रुपयांवरून १६०-१७०. त्यातली एक खिचडी निवडली, मागणी नोंदवली. पैसे द्यावेत म्हटलं तर पुढच्या मिनिटाला ती मागणीच गायब!

पावसाचा जोर बघून बहुतेकांनी डिलिव्हरी देणं बंद केलेलं. तशा सूचना झळकू लागल्या. 😩 खाऊची दुकानं ऑनलाईनची शटर धडाधड बंद करीत होती. जी उघडी होती, त्यांनी ‘भाव खाणं’  ⬆️  चालू केलेलं. स्वाभाविक गोष्ट आहे ही.

‘उपवासाला सुट्टी!’ असं ठरवलं आणि अन्य पदार्थांचा शोध चालू केला. हुश्श मिळालं एकदाचं. किंमत झाली होती अर्थातच उम्मीदसे दुगनी! 🤭

ॲप पहिल्यांदाच वापरत असल्यानं चाचपडत होतो. एका मागणीवर अर्धवटच पत्ता गेला. येईल की नाही, काळजी वाटत होती. आपण काही चुका तर केल्या नाहीत, अशीही शंका.

एवढा पाऊस कोसळत असतानाही दोन्ही ठिकाणचे  पदार्थ वेळेत आले! 😇 शंकासुर शांत बसला!


हे घरपोहोच आलेलं जेवण...
...........................
दोघंही तरुण. पावसात त्यांना फार त्रास नको म्हणून बाहेर दरवाजात जाऊन उभा राहिलो. पहिला आला तो रजतसिंह ठाकोर!

मनापासून आभार मानल्यावर रजतसिंह म्हणाला, “सर… उसमें क्या। हमारा काम ही तो है यह..!” 

विचारलं त्याला, रेटिंग किती देऊ? “आपकी मर्जी सर। चाहे वह दे दो।” पाचपैकी सहा देऊ का, असं विचारल्यावर मनापासून हसला! 😍 गडी खूश होऊन परतला.

नंतर आला चेतनकुमार चावडा. पूर्ण पत्ता नसल्यामुळे थोडासा गोंधळात पडलेला. पण वेळेत आला.
चेतनशीही असाच संवाद. रेटिंग आणि टिप डह्यामुळे दोघंही खूश 🥰🥰 दिसले. त्यांच्या खुशीनं अर्थातच आनंद झाला.

वडोदऱ्याचे रस्ते प्रशस्त. पण पाण्याशी मैत्री करणारे. आधीचे दोन दिवस पाहिलं की, थोड्या पावसानंतरही रस्त्यांच्या कडेला पाणी साचतं. आजच्या धो धो धुमाकुळानंतर त्यांना कालिंदी किंवा विश्वामित्री नदीचंच 🏞️ रूप आलं असणार नक्की. पाहायला कोण जातंय!


टक टक. कोण आहे?
वेळेच्या मागणीनुसार चहा हजर!
.......................
अशा हवेत खास गुज्जू मसाला चहा मिळाला तर? दोन-चार कप तर सहज पोटात जाईल. अतिथिगृहाचं व्यवस्थापन बघणाऱ्या काकांना विनंती केली. ‘तुम्हा मंडळींसाठी चहा मागवाल, तेव्हा माझ्यासाठीही आणाल कपभर? आल्यावर सांगा. खाली येईन मी…’

खोलीच्या दारावर पाचच मिनिटांत टकटक. गरमागरम चाय की प्याली ☕️☕️ घेऊन काका हजर!

तिथल्या एका प्रमुख अधिकाऱ्यानं तिथल्याच दीदींच्या घरचा चहा प्यायची इच्छा व्यक्त केली. वाफाळता चहा आला. त्यावर माझं नाव कोणी, कधी, कसं लिहिलं होतं? 🤗🙏

थोडा वेळ असाच गेला.
पुन्हा दरवाजावर टकटक.
पुन्हा एकदा तेच काका.
ह्या वेळी त्यांच्या हातात पेढ्यांचा द्रोण.

कोण्या अधिकारी बाईंच्या घरी बनविलेले गायीच्या दुधाच्या खव्याचे पेढे! चांगले सात-आठ.

आधी चहा, मग पेढे खोलीवर पोहोचते झाले. भरून आलं. काकांना आग्रह करून एक पेढा खायला लावला.

हे सगळं लिहीत असताना पाऊस थांबलेला नाही. त्याचा जोर वाढलेलाच आहे.

पण मी अतिशय सुरक्षित स्थळी आहे.

आता जेवणाचे डबे उघडीन.

पण त्या आधीच तृप्त झालो आहे. भर पावसात काम चोख बजावणारी मुलं, चहाची इच्छा बोलून दाखविताच ती पूर्ण करणारे काका ह्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं माझी आताची गरज आहे.

ह्या तिघांनी पोटाची भूक भागवलीच; पण मनाचीही भागवली!!
…….

#पाऊस #मुसळधार #वडोदरा #जेवण #चहा #delivery_boys #तृप्त_आणि_कृतज्ञ #विश्वामित्री

सोमवार, १५ जुलै, २०२४

... भेटीत तृप्तता मोठी


शेंगा, माउली आणि पेढे... ह्या समान धागा काय बरं!
---------------------------------------------
खरपूस भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा.
‘प्रसिद्ध’ विशेषण लावलेले स्वादिष्ट पेढे.
आणि
संत ज्ञानेश्वरांची सुबक मूर्ती.

... एकाच दिवशी मिळालेल्या ह्या तीन गोष्टींमध्ये समान धागा तो काय असावा? एकदम बरोबर. त्या भेट मिळालेल्या आहेत. आणखी एक गंमत म्हणजे अतिशय प्रेमपूर्वक भेट देणारा आणि ती स्वीकारणाऱ्या दोघांचं नावही एकच - सतीश. पहिला कळंबचा नि दुसरा नगरचा. त्यांच्यातले समान दुवे पुन्हा तीन - पत्रकारिता, मराठवाडा आणि 
‘लोकसत्ता’.

कळंब येथील पत्रकार सतीश टोणगे ह्याच्याशी माझी ‘ओळख’ फार वर्षांपूर्वीची. ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’च्या छोट्या संघात कळंबचा वार्ताहर म्हणून तो साधारण २००६/
७च्या सुमारास सहभागी झाला. त्यानंतरच्या सोळा-सतरा वर्षांच्या काळात आम्ही शेकडो वेळा फोनवरून बोललो असू.

थेट भेट शनिवारी झाली. आमची पहिलीच भेट. ती धाराशिवमध्ये. कळंबपासून ६० किलोमीटर आणि नगरपासून २०० किलोमीटर दूरवर. आता फेसबुकवर जोडलो गेलो आहोत म्हणून ठीक; नसता एकमेकांना ‘तोंडदेखलं’ ओळखणंही आम्हाला मुश्कील होतं. सतीशचे मोठे भाऊ, भावजय, पुतणे, पत्नी... ह्या सर्वांची एकाहून अधिक वेळा भेट झालेली. आम्हांलाच एकमेकांना पाहण्यासाठी दीर्घ वाट पाहावी लागली!

सतीशचे दोन पुतणे प्रवरानगरच्या पब्लिक स्कूलचे विद्यार्थी. लेकरांना भेटायच्या ओढीपायी त्यांचे वडील, अर्थात सतीशचे मोठे बंधू (त्यांना मी ‘वकीलसाहेब’ म्हणत होतो; प्रत्यक्षात ते एंजिनीअर असल्याचा उलगडा काल झाला! ), त्यांची पत्नी महिन्या-दीड महिन्याने कळंबहून प्रवरानगरला जात. मग सतीश त्यांच्याबरोबर माझ्यासाठी खास गावाकडची भाजी पाठवत असे. दोन पिशव्या भरून. पालेभाज्या, फळभाज्या आणि हिर्व्यागार तिखटजाळ मिरच्या.  मला काकवी आवडते, हे कळल्यावर दोन-तीन वेळा तीही पोहोच झाली. 

‘काकवी? म्हणजे काय?... हां, हां सर... आमच्याकडे त्याला ‘पाक’ म्हणतात,’ पहिल्यांदा विचारल्यावर सतीश हसत हसत म्हणाला होता. ‘पाक होय! इकडं काय फार कुणी आवडीनं खात नाही. पाठवतो की तुम्हाला...’
कदाचित ह्या ‘पाका’मुळेच आमचे संबंध अधिक घट्ट आणि तेवढेच गोड झाले असावेत!

धाराशिवमध्ये शनिवारी दुपारी भेटल्यावर पुतण्याला समोर बोलावून सतीशनं सुरुवात केली, ‘‘सरांचा फोन यायचा. झापायला सुरुवात करायचे...’’ नशिबाला बोल लावला! म्हटलं ह्या पठ्ठ्यानं एवढ्या वर्षांतलं नेमकं तेवढंच लक्षात ठेवलेलं दिसतंय. पण पुढे मग तो म्हणाला, ‘‘त्यामुळंच मला वेगळं पाहायची-लिहायची सवय लागली.’’

कळंबच्या बाजारातून टपोरी, पांढरीशुभ्र ज्वारी घेऊन माझ्या घरी पोहोचविण्याची जबाबदारी घेतलेला त्याचा सहायकही ह्या संवादाला साक्ष आहे. ह्या मित्राचे आजोळ नगरच्या माळीवाड्यात.

कळंबसारख्या तुलनेने छोट्या गावात राहून सतीशनं उच्चशिक्षण घेतलंय. तो व्यवसाय करतो आहे. ह्या सगळ्यात तो वाचन, पत्रकारिता ह्याची विलक्षण आवड टिकवून आहे. वेगळं काही लिहिलं पाहिजे, हा त्याचा नेहमीचा आग्रह आहे.

भाऊ-भावजय प्रवरानगरला निघत, त्याच्या आदल्या दिवशी सतीश विचारून आणि त्यानुसार पिशव्या भरभरून भाज्या पाठवत राहिला. त्या भाज्यांचे पैसे किती नि कसे द्यायचे? खूप आग्रह केल्यावर सतीश एकदा म्हणाला, ‘‘त्या भाजीचे कसले पैसे हो... तुम्हाला लईच वाटत असेल तर पुस्तकं द्या पाठवून. इथं चांगली चांगली मिळत नाहीत...’’

लोकसभेच्या २००९च्या निवडणुकीत ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’चं शेवटचं पान वेगवेगळ्या सदरांसाठी राखून ठेवलं होतं. त्यात प्रामुख्याने वाचकांचा सहभाग होता.

एके दिवशी पाहिलं तर सतीशच्या पत्नीच्या नावाने मजकूर आला होता. त्याला फोन लावला आणि विचारलं, ‘‘खरंच वहिनींनी लिहिलंय की, तूच हाणलं आहेस त्यांच्या नावानं?’’

नेहमीच आर्जवानं बोलणारा सतीश ते ऐकून अधिकच मवाळ झाला. म्हणाला, ‘‘मी कशाला लिहू हो सर तिच्या नावानं? ती चांगली शिकलेलीय... एम. एस्सी. झालेली आहे की.’’

एरवीही सतीशचं बोलणं विश्वास ठेवण्यासारखंच. त्या दिवशीच्या प्रश्नानं तो किंचित दुखावला असणार. शंका नाही.  त्या दिवशी तो मजकूर अर्थातच प्रसिद्ध झाला. वार्ताहराच्या घरचा माणूस ही जशी पात्रता ठरत नाही, तशीच ती अपात्रताही असत नाही!

जेवढा काळ वार्ताहर होता, तेवढ्या काळात सतीशनं वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिल्या. आपण निवडलेला विषय ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’च्या दर्जाला साजेसा आहे का नाही, ह्याची त्याला फार काळजी असे. तशी थोडी जरी शंका त्याच्या मनात आली की, लगेच फोन करून विचारत असे. अमूक एखादी बातमी प्रसिद्ध झालीच पाहिजे, असा आग्रह त्यानं कधी धरलेला आठवत नाही. बातमी प्रसिद्ध झाली नाही, ह्याचा अर्थ आपणच कोठे तरी कमी पडलो, असं तो मानत असावा.

येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीची यात्रा म्हणजे भूम-कळंब-येरमाळा परिसरातील मोठा उत्सव. सतीशला ‘हद्दीची काळजी’ पोलिसांपेक्षा अधिक! येडेश्वरीच्या यात्रेची बातमी कळंबवरून कशी द्यावी? कारण ते आपल्या हद्दीत नाही. पण ती आपल्या वाचकांना वाचायलाही मिळालीच पाहिजे. त्यानं त्याच्या घाबरल्या स्वरातच बातमी देऊ की नको विचारलं. होकार मिळताच मग खुलून दणकेबाज बातमी दिली.

प्रसिद्ध लेखक प्राचार्य भास्कर चंदनशिव ह्यांनी एक वर्ष ‘संवाद’ सदरासाठी लेखन केलं. त्या वर्षभरातील दर आठवड्याला सदराचा लेख व्यवस्थित पोहोचतो की नाही, ह्याची काळजी सतीशनं घेतली. त्या सदराचं पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याची प्रत मला पोहोच होईल, हे आवर्जून पाहिलं.

‘लोकसत्ता’नं निर्णय घेतला आणि लहान व मध्यम तालुक्याच्या वार्ताहरांचं काम थांबविण्यात आलं. त्याचं प्रचंड दुःख झालेले वार्ताहर प्रामुख्याने दोन - सतीश टोणगे आणि लोह्याचा हरिहर धुतमल. ‘काही दोष नसतानाही आपली लिहिण्याची संधी जाते’, ह्याचं त्यांना फार वाईट वाटलेलं. ती खंत दोघांच्या बोलण्यांतून आजही जाणवते. अर्थात मी दोघांशीही नियमित संपर्कात आहेच.

... तर अशा सतीश टोणगे ह्या आर्जवी, उत्साही पत्रकारमित्राशी ओळख झाल्यापासून दीड दशकानंतंर पहिली भेट झाली. नात्यातल्या लग्नानंतर मला नगरला परत निघायचं होतं. माझी बस चुकू नये म्हणून तो बरोबर साडेबाराच्या ठोक्याला आला.

कार्यालयात सतीश मला नि मी त्याला शोधत होतो; नजरानजर झाली आणि आम्ही ओळखलं एकमेकांना! 
मग खास मऱ्हाटवाडी पद्धतीनं ‘दर्शन’ घेत त्यानं मला संकोचित आणि (शारीरिकदृष्ट्या संकुचितही!) केलं.


सतीशनं टोपी घातली, शाल पांघरली
आणि पुस्तकही भेट दिलं!

---------------------------------------------
पाच-दहा मिनिटं झाल्यावर सतीश म्हणाला, ‘‘चला सर, सत्कार करू.’’ हेही पुन्हा खास मराठवाडी अगत्य. त्यानिमित्तानं  त्याच्यासारख्या सरळ माणसानं मला टोपी घातली! मग खास शाल. कळंबचे प्रसिद्ध पेढे. आणि रंगबिरंगी चमकदार कागदात गुंडाळेली खास भेटवस्तू. मला ती आवडते की नाही, ह्याची त्याच्या मनात शंका. ती त्यानं थेट विचारलीही. सोबत दोन पुस्तकं. सतीशच्या नावावर दोन पुस्तकंही आहेत आता!

सतीशचा पुतण्या पुण्यात शिकायला आला, तेव्हा आमची भेट झाली. ती त्याच्या एका तपानंतरही लक्षात राहिली. समर्थला भेट म्हणून दिलेलं एक पुस्तक त्याला कालही आठवलं.

गप्पा संपत नव्हत्या. निघताना सतीशनं हातात आणखी एक प्लास्टिकची पिशवी दिली. ‘‘काही नाही सर... भाजलेल्या शेंगा आहेत. तुम्हाला गाडीत खायला होतील. वांगी आणावीत म्हटलं होतं...’’

भूमच्या घाटातलं पावसाळी वातावरण त्या शेंगांना न्याय देणारं होतं खरं तर. पण तुळजापूर-नगर बसमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे त्या खाता आल्या नाहीत. नगरमुक्कामी पोहोचल्यावर त्या खाल्ल्या.

टोपी, ती खास शाल, श्रीफळ, ते पेढे, ती पुस्तकं, त्या शेंगा आणि माउलींची ती मूर्ती... ह्या सगळ्यांमधलं आणखी एक आणि सर्वांत मोलाचा समान धागा सांगायचा राहिलाच की.

त्या सगळ्या गोष्टींमधून सतीशचं प्रेम एखाद्या नितळ, निखळ झऱ्यासारखं वाहत होतं. त्या साऱ्या वस्तूंमध्ये विलक्षण आपुलकीची, प्रेमाची असलेली ऊब मला आताही हे लिहिताना जाणवत आहे.
.........
#भेट #कळंब #नगर #सतीश_टोणगे #लोकसत्ता #मराठवाडा_वृत्तान्त #भुईमुगाच्या_शेंगा #प्रवरानगर #सतीश 

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

नज़दीकियां फिर भी ये दूरियां...



अटल सेतू...
----------------------
महानगरी
मुंबईत होतो गुरुवारी. दीड-दोन तासांच्या कामासाठी. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कार्यक्रम ज्या वानखेडे स्टेडियमवर होता, तिथून जेमतेम दीड-दोन किलोमीटरवर.

पुन्हा एकदा मुंबईचा धावता दौरा. काही पाहण्यासाठी वेळ न देणारा. ह्या तीन वर्षांमधला तिसरा किंवा चौथा.

ह्या वेळी अटल सेतूवरून जायचं ठऱवलं. झटक्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलो. हा जो वेळ वाचला, तो आधी सेतू शोधण्यात गेला. ‘गूगलबाईं’चे नीट न ऐकल्याचा परिणाम!

मध्येच एकाला विचारलं. गळाभर सोन्याचे दागिने, हातात अंगठ्या, टॅटूचीही सजावट. चौकाच्या बाजूला मोटरसायकल उभी केलेली. ‘दादा’ असल्याची सारी लक्षणं व्यवस्थित दिसणारा.

त्यानं अतिशय व्यवस्थित पत्ता सांगितला. आभार मानून आम्ही निघालो आणि त्याचा फोन वाजला.  ‘बोले रे बिनडोका...’ त्याचा टपोरीपणा आवाजातून दिसला. त्यानंच फार सविस्तर आणि कळेल असा पत्ता नम्रपणे सांगितलेला अर्ध्या मिनिटांपूर्वी.

सेतू शोधताना वेळ गेला खरा; पण त्यावरून जाताना फार मस्त वाटलं. टप्प्याटप्यानं तो वर चढत जातो. आजूबाजूला पाणी, काही तरंगणाऱ्या बोटी.

मंत्रालयाजवळच काम होतं. ते संध्याकाळी चार-साडेचार वाजता संपलं. बाहेर आलो आणि पाहिलं तर सारेच रस्ते वानखेडेच्या दिशेने जात होते. पाऊसही मध्येच येत होता आणि विश्रांती घेत होता.

मंत्रालयावजळच्या रस्त्यावर खाऊगल्ली. शोधलं तर तिथे वृत्तपत्राचा एकही स्टॉल नव्हता. भरल्यापोटी वर्तमान कळू नये, ह्याची काळजी?

निळ्या दिव्याच्या गाड्या सायरन वाजवत बाहेर पडत होत्या आणि प्रवेश करीत होत्या. त्यांची गैरसोय होऊ नये हे पाहताना पोलिसांची तारांबळ उडत होती.

साडेसहा-सात वाजता मुंबई सोडू, असा कयास होता. एवढ्या गर्दीतून जायचं कसं? मोठाच प्रश्न होता. सुदैवाने तो उद्भवलाच नाही.

टीव्ही.वर त्याच बातम्या चालू होत्या. क्रिकेट, ‘टीम इंडिया’ आणि वानखेडे. मुलानंही फोनवर सांगितलं, ‘प्रचंड गर्दी आहे. कसं जाणार तुम्ही?’

इतके आहोत जवळ जरी
तितकेच राहिलो दूरवरी
... अशी खंत वाटत होती. तिथं जाण्याचं, तो सगळा उत्साह अनुभवण्याचं आणि विराट गर्दीचा एक भाग होण्याचं ‘धाडस’ नाही केलं.

काहीही म्हणा. निघायला उशीर झाला. बाकीच्यांचं काम संपत होतं म्हणून खाली रस्त्यावर येऊन उभा राहिलो. मंत्रालयासमोरच्या दुहेरी रस्त्यावरच्या एकाच बाजूला वाहनांची रांग लागलेली होती. मोजक्या दुचाकी, चारचाकी आणि ‘बेस्ट’च्या त्या नव्या-कोऱ्या दुमजली गाड्या.

पायी येणाऱ्या बहुतेकांच्या अंगावर ‘टीम इंडिया’ची ‘जर्सी’... कुणी विराटप्रेमी, कुणी रोहितचा चाहता, तर कोणी बुमराहचा. ती चाह, ते प्रेम टी-शर्टवरील क्रमांकावरून दिसणारं.

वानखेडे स्टेडियमवरून क्रिकेटप्रेमी परतत होते. मिळेल त्या मार्गाने. दोन तरुण मुलं आली आणि विचारलं, ‘काका, चर्चगेटकडे कसं जायचं?’ पाचच मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यांना दिशा दाखविली.

एक मध्यमवयीन सायकलवरून राँग साईडने येत होता. वाहनांच्या गर्दीत त्याला जागा मिळाली नसावी. पुढच्या नळीवर पाच-सात वर्षांचा मुलगा आणि त्याच्या हातात गुंडाळी केलेला तिरंगी ध्वज.

अस्सल मुंबईकर वाटणारे (आणि असणारे!) दोन तरुण पदपथावर बसलेल्या शेंगदाणे विक्रेत्याजवळ थांबले. ‘चचा, सिंग दो’, असं त्यातला एक  म्हणाला. तेवढ्यात दुसरा त्याला म्हणाला, ‘थांब रे. फोन-पेनं देतो पैसे...’

हे मराठीच आहेत, हे समजून खारे दाणे घेणाऱ्याला विचारलं, ‘कसा झाला कार्यक्रम?’
‘एकदम कडक! सॉल्लिड गर्दी होती,’ तो त्याच उत्साहात म्हणाला.


डबल डेकरमधील रात्रीच्या वेळची प्रवाशांची गर्दी
------------------------------------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरून येणाऱ्या देखण्या, चकचकीत दुमजली बसगाड्या भरभरून येत होत्या. वरच्या मजल्यावरही प्रवासी दाटीवाटीनं उभे असल्याचे रस्त्यावरून दिसत होतं. त्या बसगाड्यांचे दिसलेले क्रमांक ११५ आणि ११५ ए.

हा सारा वीस-पंचवीस मिनिटांचा खेळ. हळू हळू गर्दी कमी होऊ लागली. चारचाकींची संख्या विरळ झाली. शेवटची बस पाहिली तर निम्मीशिम्मी रिकामीच.

एव्हाना नऊ वाजले होते. सहकारी खाली आले. गाडीत बसलो. आता गर्दीची अडचण येणार नाही, भर्रकन निघून जाऊ, असं वाटत होतं.

तो गोड गैरसमज काही मिनिटांचाच. मरीन ड्राइव्हच्या रस्त्याला लागलो आणि समुद्र दिसू लागला. माणसांचा. तिथं इतकी माणसं बसली होती की, खरा समुद्र दिसतच नव्हता. मंत्रालयाच्या मतलबी वाऱ्याकडे पाठ करून ती समुद्रावरून येणारं वारं खात होती.

रस्त्यावर चपलांचा खच पडलेला. हाजी अलीकडून येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद. कार्यक्रम संपून किमान तासभर झालेला. पण त्या बाजूची गर्दी काही कमी झालेली नव्हती.

रस्ता दुभाजकावर पोलिसांनी अडथळे लावलेले. ते ओलांडण्याची कसरत करीत मुंबईकर ‘पब्लिक’ इकडून तिकडे जात होतं. सेल्फी काढत होतं. पोलिसांचं काम संपलेलं नव्हतंच.


मरीन ड्राइव्हवरचं रात्री उशिराचं दृश्य.
------------------------------------------------------------------
डाव्या बाजूला लोक निवांत बसले होते. त्यात आई-बाबांचं बोट धरून आलेल्या मुलांसह, मुलांचं बोट धरून आलेले थकलेले आई-बाबाही दिसत होते. सगळ्या वयोगटांतली माणसं. पण तरीही गर्दीचं सरासरी वय पस्तिशीच्या आत-बाहेरच.

ही सारी गर्दी रोहित, विराट, बुमराह, पंड्या, स्काय ह्यांचं दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेण्यासाठी. त्यांनी उंचावलेला विश्वचषक डोळ्यांत साठवून घेण्यासाठी. मोबाईलच्या कॅमेऱ्यात तो क्षण पकडण्यासाठी.

सण साजरा करीत होते मुंबईकर काल संध्याकाळी. पावसाची, गर्दीची, जाताना होणाऱ्या अडचणीची... कशाचीच तमा न करता. क्रिकेट हे त्यांचं प्रेम आहे. ते काल पुन्हा दिसून आलं.

ह्या साऱ्यांनी संध्याकाळ होण्याच्या आधीच कधी तरी घर सोडलेलं. वानखेडे स्टेडियमचे दरवाजे उघडण्याची वाट पाहताना त्यांना सूर्यनारायणानं चटका दिलेला. मग त्यावर दिलासा म्हणून भरल्या आभाळानं थोडं भिजवलेलं. कार्यक्रम संपल्यावर बऱ्याच उशिरा ते घरी परतणार होते. स्वतःचं वाहन असलेले थोडेच. बाकी सारा जनांचा प्रवाहो चर्चगेटकडे चाललेला.

जवळपास दोन-तीन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना क्रिकेटवेडं पब्लिक दिसत होतं.
त्या गर्दीचा भाग होता आलं नाही, ह्याची सल मनात घेऊनच परतीचा प्रवास चालू झाला...
-------------

#मुंबई #अटल_सेतू #वानखेडे_स्टेडियम #टी_20 #क्रिकेट #विश्वविजेते #क्रिकेट_उत्सव #क्रिकेटप्रेमी #गर्दी

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

पुस्तकांची गोष्ट


हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झाल्यामुळे तेव्हा ती ब्लॉगवर घेतली नाही किंवा फेसबुकवरही टाकली नाही. व्हॉट्सॲपच्या एका गटावर मध्यंतरी प्रा. डॉ. निधी पटवर्धन ह्यांनी विचारलं होतं - गटातील सदस्यांपैकी कोणी पुस्तकांवर लिहिलेली कविता आहे का? किंवा अशी (इतर कोणाची) कविता माहीत आहे का?

एकदम आठवलं - आपण लिहिलेलं आहे खरं. पाठवून देऊ. डॉ. पटवर्धन ह्यांना ती कविता पाठवून दिली. मग त्यांनी कळवलं की, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या कला शाखेच्या मराठी विभागाच्या अभ्यासक्रमासाठी दहा कविता निवडल्या आहेत. त्यात ही एक! कम्प्युटरमध्ये बंदिस्त असलेल्या ह्या रचनेचं भाग्य असं अचानक उजळलं. जागतिक पुस्तकदिनाचा मुहूर्त साधून ती आता इथे देत आहे.

--------

पुस्तकांचाही दिवस
साजरा केला जातो
वर्षातून एकदा कसाबसा
बेंदुराला नि श्रावणी पोळ्याला
‘सण एक दिन...’
कविता आठवावी अगदी तसा

















जागतिक ग्रंथ दिनानिमित्त
उजाडतं भाग्य पुस्तकांचं
उघडली जातात कपाटाची दारे
त्यातून निघतात पुस्तकांचे भारे
मिळते मोकळी हवा खायला
दाटीवाटीच्या इमारतींना चुकवून
आलेल्या प्रकाशाचा कवडसाही पाहायला
महिनोन् महिने त्यांनी वागवलेली
धूळ फडक्याने झटकली जाते
फोटोसाठी छान सजवले जाते

लिहिणारे, वाचणारे,
न वाचता लिहिणारे,
न लिहिता वाचणारे,
उत्साहाने सोशल मीडियावर
पुस्तकांवर लिहितात-बोलतात
मुहूर्त साधून केलेल्या खरेदीची
यादी आणि फोटो टाकतात
थोडं पुस्तकांचं, वाचनप्रेमाचं जादा
प्रदर्शन आयोजित करतात
अंगठे उठतात, बदाम मिळतात
सोशल मीडियाच्या चावडीवरचे
वाहवा वाचनवेड्यांची करतात

‘वाचन कमी झालंय हल्ली’
तबकडी जुनीपुराणी झिजते
दिवसभर तीच वाजत राहते
‘वाचायला वेळच कुठंय आता?’
कुणी तरी सहज विचारतो
मोबाईलमधून क्षणभरासाठी
का होईना तोंड वर काढतो

















पुस्तकं काय करतात?
पुस्तकं कुठं दिसतात?
पुस्तकं कुठं वसतात?
प्रशस्त दिवाणखान्याची
शोभा वाढवतात
कुटुंब ‘वेल रेड’ असल्याची
ठळक जाहिरात करतात

खरं तर ती तशी कुठंही राहतात
खास बनवलेल्या कपाटात
शिळ्या वर्तमानपत्रांच्या रद्दीत
टेबल, खुर्ची, टिपॉय, माळ्यावर
आणि धान्याच्या कोठीतही क्वचित,
नांदत असतात न कुरकुरता
राहण्यापुरती जागा आहे ना
असं परस्परांना समजावतात

थोड्याशा जागेत दाटीवाटीने
चुरगाळलेल्या पानांच्या
दुखावलेल्या अवयवांसह
नशिबाचे भोग भोगत
आणि लेखकाला बोल लावत
जगतात बिचारी पुस्तकं

पुस्तकं कुठं मिळतात?
आडबाजूच्या दुकानांत
गाईड-वह्यांच्या पेठांत
रद्दीच्या दुकानांत
रस्त्याकडेच्या पथाऱ्यांवर
झगमगत्या मॉलमध्ये
प्रदर्शऩांच्या हॉलमध्ये

सुतळीने करकचून बांधलेल्या
रद्दीच्या गठ्ठ्यांमध्ये
बिचारी पुस्तकं
स्वस्तात दिसतात
कारण ती सहसा कुणी
वाचलेली नसतात

...हल्ली म्हणे पुस्तकं
किलोवरही विकली जातात
भेंडी, बटाटे, कांदे, वांगी
भाज्यांसारखं तागडीत तोलतात
पाणी शिंपडून ती ताजी टवटवीत
केलेली दिसत नाहीत, एवढंच!
चार-पाच किलोंचे ठोकळे
विकत घेतल्यावर
चाळीस-पन्नास पानांचं
पुस्तक तसंच देत नाही
विक्रेता, हेही खरं तेवढंच!

दिवस संपताच कपाटात
बंद केली जातात पुस्तकं
संपलेली असते पॅरोलची मुदत
बंदिस्त कप्प्यात, माळ्यावर
दिवसभर तिष्ठलेली वाळवी
वाटत पाहतच असते त्यांची
तिच्या भरण-पोषणाची
जबाबदारी पुन्हा वर्षभराची

पुस्तकं मनाची मशागत
करतात, हे निव्वळ ‘मिथ’
पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांकडे
परंपरेनं सोपवलेलं सफेद झूठ

कोणे एके काळी
पुस्तकांतून गोष्ट
सांगितली जायची
मुला-नातवंडांना,
आजूबाजूच्या मुलांना
आणि विद्यार्थ्यांना











उद्या बहुतेक
पुस्तकांची गोष्ट
सांगितली जाईल
कोणी ऐकायला
असलंच तर...
त्यासाठी शोधावं लागेल
निमित्त जागतिक ग्रंथदिनाचं.
.........
© सतीश स. कुलकर्णी

sats.coool@gmail.com

...........

#पुस्तके #जागतिक_पुस्तकदिन #पुस्तकांची_गोष्ट #लेखक

...........

ताजा कलम - ह्यातील खालची तीन चित्रे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने काढलेली आहेत.

(सौजन्य - www.bing.com)

रविवार, २४ मार्च, २०२४

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या
निमित्तानं अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं.
त्यातल्या तीन पिढ्यांमधल्या तीन खेळाडूंशी भेट झाली,
त्यांच्याशी थोड्या-फार गप्पा झाल्या.
दिवसाचं फलित हेच!
........................

घरच्या मैदानावर घरचा सत्कार. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत शनिवारी अर्जुन, द्रोणाचार्य, ध्यानचंद
पुरस्कारविजेत्या कबड्डीपटूंचा खास गौरव करण्यात आला. राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर ह्यांच्या हस्ते पंकज शिरसाट ह्याचा सन्मान. सोबत आहेत संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत गाडे.
(छायाचित्र - अनिल शाह)
------------------------------------------------------
सगळं काम संपवून शनिवारी रात्री अंथरुणावर पडता पडता मी मलाच समजा प्रश्न विचारला असता - ‘आजच्या दिवसाचं फलित काय?’ त्याचं साधं नि तेवढंच सोपं उत्तर (स्वतःलाच) दिलं असतं - ‘तीन अर्जुनवीरांची थेट भेट आणि थोड्या गप्पा!’

पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने नगरमध्ये आज जवळपास २५ अर्जुन पारितोषिक विजेते खेळाडू जमले. ध्यानचंद, द्रोणाचार्य पारितोषिकांचे मानकरी वेगळेच. त्यामध्ये ८७ वर्षांचे सदानंद शेट्टी होते आणि ह्याच स्पर्धेत चंडिगड संघाकडून खेळत असलेला पवन शेरावत हाही. द्रोणाचार्य पुरस्काराबरोबरच ‘पद्मश्री’ने सन्मानित हरयाणाच्या श्रीमती सुनील डबास ह्याही नगरच्या वाडिया पार्कवर संध्याकाळी उपस्थित होत्या.

दिग्गजांचा सत्कार
वाडिया पार्क मैदानावर शनिवारी स्पर्धेतील बाद फेरीचे सामने झाले. उपान्त्यपूर्व फेरीचे चार आणि त्या आधी हे संघ ठरविणारे आठ सामने. त्यातले किमान तीन सामने कमालीच्या चुरशीचे झाले. उपान्त्यपूर्व फेरीतील आठ संघ निश्चित झाल्यावर स्टेडियमवर एक छोटेखानी कार्यक्रम झाला. विविध पुरस्काराचे मानकरी असलेल्या खेळाडूंचा शानदार सत्कार.

त्यामध्ये ई. प्रसाद ‘कबड्डी’ राव, क्रिशनकुमार हुडा, शांताराम जाधव, राजू भावसार, रमा सरकार, माया आक्रे, विश्वजित पलित, हरदीपसिंग, पी. गणेशन, बी. सी. रमेश आणि अजून बरेच. ह्या सर्वांचा नगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला.

त्यातील तीन अर्जुनवीरांची दिवसभरात भेट झाली आणि थोडा वेळ गप्पाही रंगल्या. हे तिन्ही खेळाडू अगदी वेगळ्या पिढ्यांमधले. म्हणजे त्यांच्या वयातलं अंतर एवढं की, पहिला मैदान गाजवत होता, तेव्हा तिसऱ्याचा जन्मही झालेला नव्हता!

हे तिन्ही खेळाडू कबड्डीशी आजही संबंध टिकवून आहेत. आणि त्यांच्याबद्दलचं कबड्डीच्या चाहत्यांना आजही कुतूहल वाटतं. त्यांच्या सोबत फोटो काढावे वाटतात. थोडक्यात, त्यांचं ‘स्टारडम’ पूर्वीएवढंच कायम. किंबहुना त्यात अधिक भर पडलेली, थोडं अधिक परिपक्व झालेलं.

निर्मल थोरात ह्याचा सकाळीच फोन आला आणि अशोक शिंदे ह्यांना भेटायला जायचं ठरलं. चढाया, चपळाई आणि पदन्यास ह्याबद्दल अशोक शिंदे प्रसिद्ध. नगरमध्ये तीन दशकांपूर्वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा झाली, तेव्हा ते पुणे जिल्ह्याकडून खेळत होते. शांताराम जाधव, अशोक शिंदे ह्यांच्यासाठी निर्मलनं घरी खास जेवणाचा बेत आखला होता. त्यांच्या पंगतीला मीही होतो.

त्या वेळी शांतारामबापूंची घेतलेली ‘बोनस’ लाईनबाबत मुलाखत कबड्डी वर्तुळात बऱ्यापैकी गाजली होती. ‘केसरी’च्या इथल्या आवृत्तीत ती चक्क अग्रलेखाच्या शेजारी प्रसिद्ध झाली होती.

संघात आहे की नाही?
त्यानंतर थोड्याच काळाने पुण्यात झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अशोक शिंदे ह्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यासाठी महाराष्ट्राचा जो संघ जाहीर झाला, त्यात अशोक शिंदे ह्यांचा समावेश नव्हता. प्रत्येक संघातील खेळाडूंची नावे आणि त्यांचे ‘चेस्ट नंबर’ ह्याची यादी संयोजन समितीकडून मिळे. त्या यादीत अशोक शिंदे ह्यांचं नाव नव्हतं. प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात झाली, तेव्हा ते खेळताना दिसले. त्याचा बातमीत स्वाभाविकच उल्लेख केला. तोच धागा पकडून हेमंत जोगदेव ह्यांनी कबड्डी संघटकांना दोन चिमटे आवर्जून काढले होते.

तेच हे अशोक शिंदे. आधी महाराष्ट्र बँकेत आणि नंतर ‘एअर इंडिया’मध्ये त्यांनी काम केलं. वर्षभरापूर्वीच त्यांनी निवृत्ती स्वीकारली. प्रो कबड्डी लीगच्या नव्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावणाऱ्या ‘पुणेरी पलटण’ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिलेली. सध्या ते त्या संघाचे ‘मेंटॉर’ आहेत. मग स्वाभाविकच त्यावर बोलणं झालं.

निवृत्तीनंतर आता त्यांना चिपळूण येथे कबड्डी प्रबोधिनी चालू करायची आहे. कोकणाबद्दलचं प्रेम, तिथं असलेली गुणी खेळाडूंची संख्या ह्यावर ते भरभरून बोलत होते. गुणवान खेळाडू शोधण्यासाठी त्यांची भटकंती चालूच असते.

नंतर थेट मैदानावर भेट झाली ती पंकज शिरसाट ह्याची. पालघरमध्ये पोलीस उपायुक्त असलेल्या पंकजशी संध्याकाळी फोनवर बोलणं झालं होतं. घरच्या मैदानावर होणाऱ्या स्पर्धेसाठी तो खास वेळ काढून आला होता.

नगरमध्ये वाढलेला, इथंच खेळायला शिकलेला आणि प्रा. सुनील जाधव ह्यांचं प्रशिक्षण मिळालेला पंकज फाऽऽर पुढे गेला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करीत त्यानं सुवर्णपदक जिंकलं. मग भारतीय संघाचा कर्णधार बनला. अर्जुन पुरस्काराचा ह्या जिल्ह्याचा तोच पहिला मानकरी!

पंकजच्या ‘एक्सपर्ट कमेंट’
स्वाभाविकच पंकजला भेटण्यासाठी गर्दी झालेली. त्यात जुने मित्र, सहकारी खेळाडू, नव्या दमानं मैदानात उतरलेले... सगळ्यांचा त्याच्याभोवती गराडा. त्या गर्दीतून नजरानजर झाली आणि भेटण्यासाठी आम्ही दोघंही दोन-दोन पावलं पुढे सरसावलो. पुढे मग उपान्त्यपूर्व फेरीची महाराष्ट्र-कर्नाटक लढत त्याच्या शेजारीच बसून पाहिली. सामना अगदी जवळून पाहण्याचा आनंद त्याच्या ‘एक्सपर्ट कमेंट’मुळे अधिकच वाढला.

अर्जुन पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या पहिल्या महिला कबड्डीपटू म्हणजे शकुंतला खटावकर. त्यांना हा पुरस्कार मिळाला १९७८मध्ये; पंकजचा तेव्हा जन्मही झालेला नव्हता. ‘स्पर्धेसाठी कधी येताय?’, असं त्यांना मेसेज करून विचारलं होतं. त्यांचं काहीच उत्तर आलं नाही. पण संध्याकाळी त्या व्यासपीठावर दिसल्या. ह्या सगळ्या ज्येष्ठ खेळाडूंचे सत्कार अजून व्हायचे होते.

तीस वर्षांनंतर भेट
सत्कार स्वीकारून व्यासपीठाकडे परतत असताना त्यांना अडवलं. पाहताक्षणीच विचारत्या झाल्या, ‘‘सतीश कुलकर्णी ना? अहो, तुमचा फोनच लागत नाहीये...’’ जवळपास ३०- वर्षांनंतर भेट होऊनही त्यांनी क्षणात ओळखलं. तोपर्यंत महाराष्ट्राच्या उपान्त्यपूर्व लढतीची घोषणा झाली होती. मग तो सामना आटोपल्यावरच भेटायचं ठरलं.

जिल्हा कबड्डी संघटनेचं मुख्यालय नगरमध्ये आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ आणि संघटनेच्या कामाची नव्यानं रुजवात करायची म्हणून निमंत्रितांची राज्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रा. शशिकांत गाडे, प्रा. सुनील जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दादा कळमकर ह्यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केलं होतं.

त्या स्पर्धेसाठी राज्यातले बडे बडे संघ आले होते. शकुंतला खटावकरही आल्या होत्या. ती संधी साधून त्यांची मुलाखत घेतली. राष्ट्रीय पातळीवरचा एक नामांकित खेळाडू आणि स्थानिक दैनिकाचा एक तरुण पत्रकार असा संवाद होता तो.

बदल आणि आव्हानं
नव्या जमान्यात कबड्डीपुढं कोणती आव्हानं आहेत, कोणत्या बदलांना सामोरं जावं लागेल, हे खटावकर ह्यांनी त्या मुलाखतीमध्ये अगदी सविस्तर सांगितलं होतं. कोणकोणत्या देशांचं आव्हान भारतापुढं असेल आणि त्यासाठी काय करावं लागेल, ह्याबद्दल त्या बोलल्या होत्या.

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा मागच्या वर्षी नगरमध्ये झाली. मॅटवर खेळली जाणारी कबड्डी, खेळाडूंच्या पायात बूट, धावता गुणफलक... हे सगळे बदल पाहून आठवण झाली ती त्या मुलाखतीची. 

स्पर्धेच्या निमित्तानं लिहिलेल्या लेखात मुलाखतीचा उल्लेख केला. कसं कोण जाणे, पण व्हॉट्सॲप कृपेने त्या लेखाची लिंक शकुंतला खटावकरांपर्यंत पोहोचली. त्या अगदी भारावून गेल्या. क्रीडा प्रशिक्षक अजय पवारच्या माध्यमातून फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि दीर्घ काळानंतर संपर्क सुरू झाला.

व्हॉट्सॲपवर नानाविध मेसेज शकुंतलाताई पाठवित असतात. असं असतानाही स्पर्धेसाठी नगरमध्ये येणार की नाही, हे त्यांनी का कळवलं नाही बरं?

ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष भेट झाल्यावर मिळालं. घरच्या काही अडचणींमुळे त्यांचं येणं निश्चित नव्हतं. पण ती समस्या आदल्या दिवशी काही प्रमाणात दूर झाली आणि एक दिवसासाठी त्या आपल्या आवडत्या जागी आणि जगी - कबड्डीच्या गजबजलेल्या मैदानावर आल्या.

‘पाय लागू...’ 
नगरनं उपान्त्यपूर्व फेरीत कर्नाटकाला सहज हरवलं आणि मैदानात जल्लोष चालू झाला. त्या जल्लोषी गर्दीतून वाट काढतच व्यासपीठाकडे गेलो. शकुंतला खटावकर वाटच पाहत होत्या. आम्ही बोलायला सुरुवात केली की, दोन खेळाडू आल्या. ताईंना ‘पाय लागू’ करीत त्या जुन्या सोनेरी आठवणींना उजाळा देऊ लागल्या. मग स्वाभाविकच फोटोही आला. त्या फोटोतून दूर होण्याचा प्रयत्न खटावकरांनी हाणून पाडला. ‘हे पत्रकार आहेत,’ अशी आपल्या विद्यार्थिनींशी ओळख करून दिली.


(छायाचित्र - अनिल शाह)
------------------
आमच्या बोलण्याची सुरुवात व्हायची आणि लगेच असा ‘व्यत्यय’ यायचा. व्यासपीठावरून खाली आलो, तर त्यांना सातारकर मंडळी भेटली. त्यांची परस्परांची भेटही बऱ्याच दिवसांनंतर झाली असावी, हे रंगलेल्या संवादातून समजलं. क्रीडा (आचार)संहितेबद्दल त्यांना शकुंतला खटावकरांकडून काही माहिती हवी होती. त्या सांगत होत्या. मध्येच माझ्याकडे बघत ‘आता फार सांगत नाही. हे पत्रकार आहेत ना शेजारी...’ असं मिश्कीलपणे म्हणत होत्या. 

सातारकर मंडळींना घरी येण्याचं आमंत्रण देताना म्हणाल्या, ‘‘पुणेकराचं आमंत्रण नाही बरं हे. पुण्यात (अनेक वर्षांपासून) राहत असले, तरी शेतकऱ्यांच्या कुटुंबातली आहे मी!’’ आडनावातील ‘खटाव’कडे त्यांचा अप्रत्यक्ष संकेत होता. पुन्हा निवांत भेटायचा वायदा करून आम्ही निरोप घेतला.

अशोक शिंदे ह्यांच्याशी गप्पा मारताना जाणवली ती त्यांची नवीन गुणी खेळाडू शोधण्याची धडपड. ‘आपल्या कोकणासाठी’ काही करण्याची तळमळ.

पंकज तर घरचाच माणूस. एकेरी संबोधनातला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं वजन आणि वलय बाजूला ठेवून महाराष्ट्राचा सामना समरसून पाहणारा. नेमक्या क्षणी खेळाडूंना सूचना देणाऱ्यां पंकजचं मैदानाशी तेच जुनं नातं कायम असल्याचं दिसलं.

भेटायला आलेल्या प्रत्येकाला ‘कसे आहात तुम्ही?’ असं शकुंतलाताई अगदी आवर्जून विचारत होत्या. गुरू, प्रशिक्षक, ताई ह्या नात्यानं संवाद साधत होत्या. बोलता बोलता त्यांनी एकाला ‘पाया कसं पडावं!’ ह्याचा धडा दिला आणि ‘आता नको. पुढच्या वेळी सांगितलं तसा नमस्कार कर...’ असंही सांगितलं.

... तीन पिढ्यामधील तीन खेळाडू. त्यांना जोडत आली आहे कबड्डी. त्या खेळाबद्दल तिघेही कृतज्ञ आहेत!
.....
#कबड्डी #अर्जुन_पुरस्कार #शकुंतला_खटावकर #अशोक_शिंदे #पंकज_शिरसाट #नगर #राष्ट्रीय_स्पर्धा #वाडिया_पार्क
.....

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

अरविंदा? ...गोविंदा!

 

(दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांना अटक झाल्याची बातमी वाचली आणि बरोबर दहा वर्षं आणि एक महिन्यापूर्वी लिहिलेली ही रचना आठवली. प्रस्थापित लोकशाहीतील बड्या खेळाडूंविरुद्ध ते लढतील, त्यांना नडतील आणि  अंतिमतः जिंकतील, असा (भाबडा) विश्वास वाटत होता. त्याच अपेक्षेतूनच हे लिहिलं होतं. नंतर जे काही घडत गेलं, त्यातून राजकारण आपल्याला कळत नाही,
हा समज दृढ झाला.)


आलाय खेळात
घेऊ या घोळात
देऊ या दणका
दिल्लीच्या बोळात

पाठिंब्याचा झोका
दिला एक मोका
सापडल्या क्षणी
मारू मस्त ठोका

आपलाच खेळ
आपलाच मेळ
घुसला हा कसा
घातलान् घोळ

खुर्चीवर बसतो
रस्त्यावर येतो
लाल दिवा फुंकून
धरणे कसा धरतो

विनाशर्त खास
समर्थनाचा गॅस
परि सोडेचिना
लोकपालाचा ध्यास

आधी धरली गल्ली
आता लक्ष्य दिल्ली
हमसे ही म्यांव
अरे! अपनीच बिल्ली

वाटले होते कोंडू
खोड याची मोडू
कचऱ्यातच काढतोय
हाती घेऊन झाडू

त्यांची मेणबत्ती
ह्यांची उदबत्ती
म्हणाला, खाली
लगाव बत्ती!

अण्णांचा चेला
सवाई निघाला
रामलीला करून
लईच पुढे गेला

कुणी जुने तपस्वी
काही नवे तेजस्वी
विरोधाला पुरून उरे
केवढा हा मनस्वी

वाटले होते गोड
लागेल त्याला खुर्ची
भलतीच की तिखट
निघाली ही मिर्ची

कुछ पाने के लिए
पडता है कुछ खोना
मुख्यमंत्रिपद त्यजून
प्रधानमंत्री है बनना?

सत्तेचे लोणी
सोडतोय कोणी
झालाय गोविंदा...
अरे, हा तर अरविंदा!

उद्याचे कोणी
सांगावे काय
प्रस्थापितांना होईल
दे माय धरणी ठाय

बाप रे बाप
आप रे आप
`व्यवस्थे`च्या
डोक्याला ताप!
.
.
.
परिवर्तनाची चाहूल?
की पुन्हा एक हूल?
होणारेय ऑपरेशन?
की नुसतीच भूल?
.....................

© - अचंबित नि स्तंभित आम आदमी
पंधरा/फेब्रुवारी/चौदा
................................................

(काही सोप्या शब्दांची कठीण स्पष्टीकरणे देणारा एफआरआय -
तपस्वी - यांनी सव्वाशे वर्षे तप केल्याचे तेच सांगतात. त्यामुळे तपोभंग न करता सत्तासुंदरीरूपी मेनका साठ वर्षं यांच्या अंगाखांद्यावर खेळत जनतेला डोळा मारते आहे.
तेजस्वी - अशाच एका (पण तेवढ्या नव्हे) जुन्या `राष्ट्रीय` संघटनेची ही नव्याने स्थापन झालेली `शाखा` आहे म्हणतात.
मेणबत्ती आणि उदबत्ती - खरे तर शेवटच्या ओळीतील `बत्ती` शब्दाशी यमक जुळवण्यासाठी या दोन अनुक्रमे प्रकाशमान करणाऱ्या व सुगंधित करणाऱ्या वस्तू आणल्या आहेत. त्यांचा गिरिजाघरे किंवा मंदिरे याच्याशी नाहक संबंध जोडू नये. आणि गिरिजाघरे वा मंदिरे यांचा संबंध त्या एकाच (बद्द) नाण्याच्या दोन बाजू असलेल्या पक्षांच्या माणसाशी जोडू नये.
गोविंदा होणे - लोचा होणे. आणि लोचा होणे? अर्थातच गोविंदा होणे!!)
....

#अरविंद_केजरीवाल #दिल्ली #मुख्यमंत्री #आप #आम_आदमी

प्रतापराव....

प्रतापरावांचं हे छायाचित्र त्यांच्या गावच्या शिवारातील. आम्ही हुरडा खायला गेलो होतो, त्या वेळचं. त्यांच्या खांद्याला अडकवलेली पिशवी माझी आहे...