रोज ठरल्यानुसार संध्याकाळी फिरायला चाललो होतो. ‘मॉर्निंग वॉक’ आपल्या नशिबात नाही. अरुणोदयाऐवजी सूर्यास्त पाहावा लागतो. संध्याकाळी तर संध्याकाळी. चालणं महत्त्वाचं.
खिडकी
कठीण भलतेच लिहिणे, त्याहून कठीण बंद लेखणी करणे...
Monday, 9 May 2022
टकमक टकमक का बघती मला?
Saturday, 23 April 2022
बातमी...मराठीतली नि इंग्रजीतली
![]() |
‘वागशीर’ला जलावतरणानिमित्त तुताऱ्यांनी सलामी. (छायाचित्र नौदलाच्या संकेतस्थळावरून साभार.) |
बातमी म्हणजे काय? तिची व्याख्या? पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण घेणाऱ्यांना आठवेल कदाचित की, ‘बातमी’ आणि ‘बातमी-लेखन’ विषय शिकविणाऱ्या कोण्या मुरब्बी पत्रकारानं त्यांना पहिल्याच तासाला हा प्रश्न विचारला असेल. त्यानंतर पाच-सहा-सात व्याख्या पुढे आल्या असतील. त्यातली NEWS : North-East-West-South ही सोपी, सुटसुटीत व्याख्या बहुतके भावी पत्रकारांना पटली असेल. सोपी व्याख्या आहे ती.
बातमीत काय हवं? तर त्यात ‘5 W & 1 H’ ह्याची (Who? What? When? Where? Why? How?) उत्तरं मिळायला हवीत. कोण, काय, का, कधी, कुठे आणि कसे, हे ते सहा प्रश्न. मराठीत सहा ‘क’. विद्यार्थ्यांना हेही शिकवलं जातं. ‘Comment is free, but facts are sacred.’ वयाच्या सव्विसाव्या वर्षी ‘द मँचेस्टर गार्डियन’च्या (आताचं प्रसिद्ध दैनिक द गार्डियन) संपादकपदी नियुक्ती झालेल्या सी. पी. स्कॉट ह्यांचे हे प्रसिद्ध उद्धृतही जाणत्या पत्रकार-संपादकानं विद्यार्थ्यांना ऐकवलं असेलच. बातमी देणं किती जोखमीचं काम आहे, हेच शिकवायचं असतं त्यातून. कारण बातमी म्हणजे तथ्य आणि फक्त तथ्य. (त्यामुळेच आम्हाला कदाचित ‘News is sacred and comment is free.’ असं शिकवलं गेलं.)
पत्रकारितेला सुरुवात केली आणि त्यानंतर वर्षभरातच ‘केसरी’च्या नगर कार्यालयात एक माध्यमतज्ज्ञ प्राध्यापक आले होते. आम्ही दीड-दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या ‘रानडे इन्स्टिट्यूट’मध्ये जे शिकलो होतो, ते त्यांनी वीस-पंचवीस मिनिटांत मोडीत काढलं. अमेरिकी पत्रकारितेची साक्ष देत त्यांनी सांगितलं की, बातमीत ती देणाऱ्याचं मत आलं तरी चालतं. किंबहुना ते यायला हवंच. त्यानंतरची बरीच वर्षं आम्ही जुन्या चौकटींची मर्यादा संभाळतच काम करीत राहिलो. ती ताणली; नाही असं नाही. त्याचं कारणही ज्येष्ठ संपादक चंद्रकांत घोरपड्यांनी शिकवलं होतं - संपादकांनी घालून दिलेली चौकट जास्तीत जास्त ताणतो, तोच चांगला उपसंपादक!
हे सगळं आठवण्याचं-लिहिण्याचं कारण तीन दिवसांपूर्वी वाचलेली एक बातमी. त्याच्या संदर्भात ‘फेसबुक’वर लिहिलेलं एक टिपण आणि त्यावर आलेल्या काही मोजक्या प्रतिक्रिया.
आपल्या नौदलाची ताकद वाढविणाऱ्या ‘आयएनस वागशीर’ पाणबुडीचे बुधवारी (दि. २० एप्रिल) जलावतरण झाले. स्कॉर्पिन श्रेणीतली ही सहावी पाणबुडी. हिंद महासागरात खोलवर आढळणाऱ्या शिकारी माशावरून (सँडफिश) तिचे नामकरण करण्यात आले. (संदर्भ - दै. लोकसत्ता आणि The Economic Times - Named after sandfish, a deadly deep water sea predator of the Indian Ocean.)
विविध मराठी दैनिकांमध्ये गुरुवारी ही बातमी प्रसिद्ध झाली. माझ्याकडे सहा दैनिकं येतात. त्यातील चार दैनिकांची आवृत्ती स्थानिक - नगरची आहे आणि दोन पुण्याच्या आवृत्ती. ‘लोकसत्ता’ने पहिल्या पानावर पाणबुडीच्या छायाचित्रासह तिची वैशिष्ट्ये मुद्द्याच्या रूपांत दिली आहेत. त्यात कुणाची नावं नाहीत. वाराची मात्र चूक झाली आहे. बुधवारी जलावतरण झालं असताना, मुद्द्यांमध्ये गुरुवार पडलं आहे. ‘दिव्य मराठी’ने आतील पानात मोठे छायाचित्र आणि आटोपशीर बातमी प्रसिद्ध केली.
जलयुद्धयान म्हणून की काय माहीत नाही, पण ‘सकाळ’ने तिला पहिल्या पानावर तळाव्याची (‘अँकर’) जागा दिली आहे. पानावरील मुख्य बातमीनंतर वाचकाचे लक्ष तळाच्या बातमीकडे - ‘अँकर’कडे वेधले जाते म्हणतात. ही बातमी सर्वांत तपशीलवार आहे. त्यात ‘वागशीर’ची वैशिष्ट्ये वेगळ्या चौकटीत दिली आहेत. ‘लोकमत’ने अग्रलेखासमोरच्या पानावर अगदी वरच्या बाजूला पाणबुडीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि सोबतीची बातमी कऱ्हाडची आहे. ‘आयएनस वागशीर’ची वातानुकूलित यंत्रणा तिथे तयार झाल्याची माहिती ही बातमी देते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पहिल्या पानावर नेमकं घडीवर छायाचित्र प्रसिद्ध केलं आणि त्याच्या ओळीच थोड्या तपशिलानं दिल्या.
बातमीचा पहिला परिच्छेद ‘लीड’ किंवा ‘इंट्रो’ म्हणून ओळखला जातो. तो जेवढा गोळीबंद होतो, तेवढी बातमी अधिक प्रमाणात शेवटापर्यंत वाचली जाते. जुन्या पत्रकारितेत मोजक्या शब्दांत आणि मोजक्या वाक्यांमध्ये बातमीतील सर्वांत महत्त्वाचा भाग सांगणाऱ्या ‘लीड’ला फार महत्त्व होते. बातमीचा हा पहिला परिच्छेद पस्तीस ते चाळीस शब्दांचा आणि तीन ते चार वाक्यांचा असावा, असा आग्रह असे.
बातमीत माहिती असावी, मतप्रदर्शन नसावे, असा आग्रह धरला जाई. बातमीदाराने मनाचे काही लिहू नये किंवा टिप्पणी करू नये, असे सांगितले जाई. हा कर्मठपणा किंवा सोवळेपणा एकविसाव्या शतकाच्या आधीपासून संपला. इंग्रजी दैनिकांनी जुने निकष मोडून नवे रूढ केले.
‘इंट्रो’च्या किंवा बातमीच्या सोवळेपणाच्या कुठल्याही (जु्न्या) निकषांमध्ये ‘बिझनेस स्टँडर्ड’ची ही बातमी बसत नाही. तिचा पहिलाच परिच्छेद मजेशीर नि वेगळी माहिती देणारा आहे. त्याचा ‘वागशीर’शी, त्या पाणबुडीच्या मालिकेशी, भारतीय नौदलाशी किंवा कार्यक्रम जिथे झाला त्या माझगाव गोदीशी थेट काही संबंध नाही. ‘जगभरातील कोणत्याही नौदलात एखादे लढाऊ जहाज दाखल केले जाते, तेव्हा त्या युद्धनौकेला मानवंदना दिली जाते, ती महिलेच्या हस्ते फेसाळत्या शाम्पेनची बाटली फोडून.’ बातमीचं हे पहिलं वाक्य. ही परंपरा २०१४मध्ये ब्रिटिश महाराज्ञी एलिझाबेथ (दुसरी) ह्यांनी काही पाळली नाही. ब्रिटनच्या शाही नौदलात विमानवाहू नौका दाखल करण्यात आली, तेव्हा राणीनं खास स्कॉटिश ‘बोमोर सिंगल माल्ट व्हिस्की’ची बाटली फोडली. ब्रिटिश महाराज्ञी (शत्रूराष्ट्र) फ्रान्सची शाम्पेन का म्हणून बरे वापरील? आणि तेही आपलं आरमार अधिक सज्ज होत असताना? ही व्हिस्की शाम्पेनप्रमाणे फेसाळती होती की तिच फवारे उडाले की नाही, ह्याची माहिती मात्र बातमीत नाही.
पहिले दोन परिच्छेद असे लिहिल्यानंतर वार्ताहर अजय शुक्ल ‘वागशीर’कडे वळतात. तिसऱ्या परिच्छेदात ते लिहितात फेसाळती शाम्पेन किंवा स्कॉटिश सिंगल माल्ट वापरण्याची पद्धत भारतात नाही. इथे प्रमुख पाहुण्या महिलेने नारळ फोडून (आपल्या भाषेत ‘श्रीफळ वाढवून’!) सलामी दिली. तो मान मिळाला संरक्षण सचिवांच्या गृहमंत्री वीणा अजयकुमार ह्यांना. त्यानंतर स्कॉर्पिन शब्दाच्या स्पेलिंगमधली गंमतही त्यांनी सांगितली आहे. बातमीत त्यांनी ‘Scorpene’असंच लिहिताना कंसात स्पष्टीकरण केलं आहे - scorpion हा इंग्रजी शब्द फ्रेंच असा लिहितात!
बातमीत मग पुढे स्कॉर्पिन पाणबुडी मालिकेची सविस्तर माहिती आहे. त्यात तांत्रिक तपशील आहेत नि आर्थिक माहितीही आहे. मालिकेतील आधीच्या पाच पाणबुड्यांबद्दलही लिहिलं आहे. सर्वांगानं माहिती देणारी अशी ही बातमी म्हणावी लागेल. मराठी माध्यमांच्या तुलनेनं खूप सविस्तर.
ही बातमी वाचताना मजा आली. हे काही पहिलंच उदाहरण नव्हे. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये असं चालूच आहे. बातमी वाचल्यावर विचार करताना लक्षात आलं की, आता कुठलीही बातमी ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’, विविध संकेतस्थळांमुळं काही मिनिटांत कळते. वृत्तपत्रांमध्ये काही तासांनंतर छापून येणारी बातमी तुलनेने शिळीच म्हटली पाहिजे. ती ताजी नसणार, हे उघडच. पण ती किमान वेगळी वाटण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी ती लिहिण्याची धाटणी, तिचे शीर्षक देण्याची पद्धत बदलली पाहिजे. नित्य नवे प्रयोग करायचे स्वातंत्र्य वार्ताहर-उपसंपादकांना मिळायला हवे. मुद्रित माध्यमांमध्ये पूर्वी आग्रह असलेला ‘गोळीबंद लीड’ आता डिजिटल, सामाजिक माध्यमांसाठी आवश्यक आहे. त्यांना थोडक्यात आणि तातडीनं वाचकांपर्यंत ‘बातमी’ पोहोचवायची असते.
सहज म्हणून एक उदाहरण - नगरच्या जुन्या नगरपालिकेच्या इमारतीत वरच्या मजल्याला आग लागली. ‘कौन्सिल हॉल’ म्हणून ते सभागृह प्रसिद्ध आहे/होते. आग लागली ती एक मेच्या सायंकाळी पाच-साडेपाच वाजता. दैनिकांनी कामगार दिनाची सुटी घेणे नुकतेच सुरू केले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणताच अंक प्रकाशित होणार नव्हता.
ही बातमी आता थेट तिसऱ्या दिवशी, म्हणजे तीन मे रोजी सकाळी वाचकांना दिसणार होती - घटना घडल्यानंतर किमान ३६ तासांनी. आमच्या वार्ताहराने सरधोपट पद्धतीने बातमी लिहिली आणि उपसंपादकाने ‘कौन्सिल हॉल आगीत खाक’ असे चाकोरीबद्ध, पठडीतले शीर्षक दिले.
आग लागल्यानंतर बरेच नगरकर थेट घटनास्थळी जाऊन पाहून आणि आवश्यक ती हळहळ व्यक्त करून आले होते. त्यांना माहीत असलेलीच बातमी आम्ही दीड दिवसाने त्यांच्या समोर टाकणार होतो. उपसंपादकाला तसे म्हटल्यावर त्याचे उत्तर होते, ‘बातमीत तसं वेगळं काही लिहिलंच नाही.’
थोडा वेळ थांबून शीर्षक दिलं - ‘आग माथ्याला, बंब पायथ्याला!’ आग लागलेल्या ह्या इमारतीला अगदी खेटूनच अग्निशामक दलाचं मुख्य कार्यालय आहे. त्यांना ही आग लगेच आटोक्यात आणता आली नव्हती. अर्थात, हे शीर्षक म्हणजे फक्त मलमपट्टी होती. तथापि त्यानं वाचक बातमी वाचण्याकडे वळेल, एवढं तरी साधणार होतं.
उद्या असं काही होईल का? बातमी जाणून घेण्याची ओढ असलेले डिजिटल माध्यमांकडे, सामाजिक माध्यमांकडे वळतील आणि बातमीमागची बातमी किंवा घटनेमागचा कार्यकारण भाव, विश्लेषण वाचण्यासाठी ते मुद्रित माध्यमांवर अवलंबून राहतील?
....
#वागशीर #पाणबुडी #नौदल #वृत्तपत्रे #बातमी #मराठी_इंग्रजी #लीड #बातमीची_व्याख्या #5W&1H #media #print_media #digital_media #social_media #thebusinessstandard
Wednesday, 6 April 2022
मुंबईच्या धावत्या दौऱ्यातील नोंदी
![]() |
‘लोकसत्ता-तरुण तेजांकित’ ठरलेला ओंकार कलवडे. त्याच्या ह्या कार्यक्रमानिमित्तच मुंबईचा धावता दौरा झाला. |
गोष्ट जुनी आहे; पण शिळी नाही. अगदी आठवडाभरापूर्वीची. मार्चअखेरीची. लिहू लिहू म्हणताना उशीर झाला. ‘मायानगरी’, ‘मोहनगरी’ म्हणविल्या जाणाऱ्या मुंबईला गेलो होतो. देशाची आर्थिक राजधानी आणि आर्थिक वर्षाची अखेर. पण हा केवळ योगायोग. निमित्त वेगळंच होतं.
मुंबई फिरायची, फिरत फिरत पाहायची बाकी आहेच. तिथला जगप्रसिद्ध वडा-पाव खायचा आहे. ‘माहीम हलवा’ घ्यायचा आहे. फॅशन स्ट्रीटला जाऊन घासाघीस करीत मस्त कपडे-खरेदीचा आनंद लुटायचा आहे. पुस्तकांचे ढीगच्या ढीग उचकून एखादं-दुसरं पुस्तकं बाळगायचं आहे. नॅशनल बुक ट्रस्टचं कार्यालय समुद्राच्या समोर आहे. तिथं जायचं आहे. असं खूप खूप करायचं आहे. त्याला मुहूर्त काही लागत नाही...
फार वर्षांपूर्वी, बरोबर पाच दशकांपूर्वी तब्बल महिनाभर ह्या महानगरीत राहिलो होतो. माझ्या आत्येभावानं - नानानं बऱ्याच ठिकाणी फिरवलं होतं. तो अकलूजहून तिथं रुजू पाहत होता. त्याचा मोठा भाऊ - आप्पानं मिसळ-पावची दीक्षा दिली होती. तेव्हा ‘उषाकिरण’ म्हणे तिथली सर्वांत उंच इमारत होती. आता सूर्याच्या किरणांना मज्जाव करणारे कैक टोलेजंग टॉवर ह्या शहरात उभे आहेत. मानेला रग लागेपर्यंत आकाशाकडे पाहत त्या मनोऱ्याबाबत अचंबा व्यक्त करायचा आहे.
अलीकडच्या १०-१२ वर्षांत चार-पाच वेळा तरी मुंबईसहल झाली. ‘लोकसत्ता’मध्ये असताना लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकींच्या निमित्ताने मुंबई मुख्यालयात आमच्या बैठका झाल्या. पुण्याहून गाडीत बसायचं नि मुंबईतल्या कार्यालयात उतरायचं. तिथली बैठक संपली की, परत गाडीत बसून पुण्याकडे कूच. मुंबई काय, समुद्र पाहायलाही वेळ नसायचा. त्यातल्या शेवटच्या बैठकीच्या वेळी वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास केला, एवढं आठवतं. तो नुकताच खुला झाला होता. पुण्याला परतताना त्यावरून गेलो, तेव्हा टोल नव्हता. त्या नव्याकोऱ्या पुलावरून जाण्याचं थ्रिल वेगळंच होतं.
अलीकडं ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेचं पारितोषिक घ्यायला गेलो होतो - ‘खिडकी’ नंबर एक ठरली होती, त्यांच्या स्पर्धेत. त्यालाही आता तीन वर्षं झालं. पुण्याहून निघाल्यावर आम्ही वाहतुकीच्या कोंडीत अडकलो आणि कार्यक्रम सुरू झाल्यावर तिथे पोहोचलो. अंधेरीचं ते हॉटेलही मस्त होतं. त्या वेळी फक्त मुंबादेवीचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि घाईतच परत निघालो. त्या वेळी आधी कळवूनही मृदुलाताई (जोशी) ह्यांची भेट घेणं जमलंच नाही. ती रुखरुख आजही कायम आहे.
‘लोकसत्ता’च्या तरुण तेजांकित पुरस्कारांचं वितरण रविवारी (दि. २७ मार्च) परळच्या ‘आयटीसी ग्रँड सेंट्रल’मध्ये झालं. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये आमचा एके काळचा सख्खा शेजारी उद्योजक ओंकार कलवडे याचा समावेश होता. आमचं शनिवारी मध्यरात्रीनंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बोलणं झालं. कार्यक्रमासाठी तो फ्रँकफर्टहून दिल्लीमार्गे आणि मी नगरहून पुण्यामार्गे साधारण एकाच वेळी मुंबईत पोहोचलो. तारांकित ‘आयटीसी ग्रँड सेंट्रल’कडे जाताना ओळखीच्या खुणा दिसत होत्या...माटुंगा, माहीम. मग लक्षात आलं की, लहानपणी खेळलेल्या ‘व्यापार’च्या आठवणी वर येताहेत.
![]() |
कोलकता नाईट रायडर्सचा मुक्काम असल्याच्या खाणाखुणा. |
तारांकित हॉटेलांमधला चहा फार काही चांगला नसतो, असं तिथला (नेहमीचा) अनुभव असणाऱ्यांनी सांगून-लिहून ठेवलंच आहे. म्हणून मग कॉफीला प्राधान्य दिलं. तीही बिचारी चहाच्या भांड्याशेजारीच असल्यानं ‘वाण नाही पण गुण लागला’ अशी अवस्था होती. एवढ्या मोठ्या ठिकाणी मुंबईतला प्रसिद्ध भटाचा मसाला चहा किंवा माटुंग्याच्या ‘द मद्रास कॅफे’सारखी फिल्टर कॉफी मिळणार नाही, हे गृहीतच होतं. तरीही... एक गंमत सांगायची राहिलीच. तिथं म्हणे चहा-कॉफीत टाकण्यासाठी साखरेच्या पुड्यांप्रमाणंच गुळाच्या भुकटीच्या पुड्याही होत्या. सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत असलेला गुळाचा चहा! दुसऱ्या वेळी आमच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्यानं गूळ घातलेला चहा पाजला.
![]() |
हॉटेलच्या दालनातलं एक चित्र. |
कार्यक्रमाची सुरुवात सुरेल होती. त्याची जबाबदारी ‘द म्यूझिशियन्स’ ह्या बँडवर होती. फक्त आणि फक्त वाद्यसंगीत. कार्यक्रम अर्ध्या-पाऊण तासाचाच झाला. पण तेवढ्या वेळात जमलेले सारेच मंत्रमुग्ध झाले. सत्यजित प्रभू, अमर ओक, महेश खानोलकर, नीलेश परब, दत्ता तावडे, आर्चिस लेले अशी दिग्गज वादकमंडळी होती आणि सूत्रसंचालनाला पुष्कर श्रोत्री. कॉफीपानावेळी पडलेल्या प्रश्नाचं उत्तर. खानोलकरांनी व्हायोलीनवर मजा आणली. ‘ते गाण्याची चाल नाही, तर शब्द वाजवून दाखवतात,’ असं पुष्कर श्रोत्री ह्यांनी सांगितलं ते खरंच होतं. हिंदी-मराठी अशी बरीच गाणी ऐकायला मिळाली.
छोट्या पडद्यावर नेहमी दिसणारे नीलेश परब इथे होते. तिथल्यासारखेच हसत, बेभान वाजवत. ह्या छोट्या कार्यक्रमातही ते अगदी तल्लीन झाले होते. त्यांना विविध वाद्यं वाजवताना पाहिल्यावर वाटलं की, हा माणूस स्वतःसाठीच वाजवत असतो आणि त्याचा हर एक क्षणाचा आनंद लुटत असतो! त्यात सहभागी होता येतं, हे आपलं भाग्य. अमर ओक त्याच तल्लीनपणे बासरीतून सूर काढत होते आणि आर्चिस लेले तबल्यावर ठेका धरत होते.
‘ज्वेल थीफ’मधलं ‘होठों पे ऐसी बात...’ गाणं लागलं की, पुण्यातल्या नातूबागेचा गणपती आठवतो. गणेशोत्सवात त्यांचा देखावा रोषणाईचा असायचा आणि ह्या गाण्याच्या तालावर हजारो रंगबिरंगी दिवे नाचत असत. अर्धा तास रेंगाळल्यावर दोनदा तरी ही बात कानी पडायचीच. कार्यक्रमाची सांगता ह्याच गाण्यानं झालं. तो अनुभव भलताच थरारक होता. सारेच वादक कसे बेभान झाले होते. निवेदकाचं काम संपवून पुष्कर श्रोत्रीही वादकाच्या भूमिकेत शिरला होता.
![]() |
कार्यक्रम संपल्यानंतरचा छोटा सा ब्रेक कॉफीच्या कपाच्या साथीनं. |
![]() |
मानसी जोशी... तरुण तेजांकित (छायाचित्र तिच्या ट्विटर खात्यावरून) |
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांची छोटी मुलाखतही छान झाली. पुरस्कार देताना प्रत्येक विजेत्याशी ते एखादा मिनिट आवर्जून बोलत होते. क्वचित एखाद्याच्या पाठीवर हात टाकत होते. एकूणच हा तीन-साडेतीन तासांचा कार्यक्रम फार छान झाला आणि तो जवळून अनुभवता आला.
...फक्त एकच - मुंबई पाहायची राहूनच गेलं की पुन्हा!
आणि ‘ये है बॉम्बे, ये है बॉम्बे मेरी जान...’ गुणगुणायचं राहून गेलं!!
.........
#तरुण_तेजांकित #ओंकार_कलवडे #लोकसत्ता #मुंबई #ब्लॉग_माझा #मानसी_जोशी #नीलेश_परब #पुष्कर_श्रोत्री #द_म्यूझिशियन्स_बँड
Wednesday, 30 March 2022
कवी(?) असणं, कविता लिहिणं...
‘तू कविता(ही) लिहितोस?’ काहींनी दोन दिवसांत हा प्रश्न थेट विचारला. काहींच्या बोलण्या-प्रतिक्रियांतून तो जाणवला. ह्याचं कारण दैनिक लोकसत्ताच्या रविवारच्या (दि. २७ मार्च) अंकात प्रसिद्ध झालेली अस्मादिकांची रचना. दैनिक लोकसत्तानं ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज. शेळके ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या ‘कविता मनोमनी’ उपक्रमाचं निमित्त. कवयित्री नीरजा व कवी दासू वैद्य ह्या जोडगोळीनं पसंतीची मोहोर उठविलेल्या १६ कवितांपैकी एक.
मित्रांच्या-स्नेह्यांच्या ह्या प्रश्नानंतर मी स्वतःलाही विचारलं - ‘तू कवी आहेस का?’ ह्या प्रश्नाचं मनातल्या मनातलं उत्तर तरी ‘नाही!’ असंच आहे. ते होकारार्थी आलेलं आवडेल. मुंबईच्या आर. जे. गौरी कुलकर्णी ह्यांनी लिहिलं होतं की, कमीत कमी शब्दांमध्ये भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे कविता. त्यांची ही प्रतिक्रिया अगदी अलीकडची असल्यानं अजून लक्षात राहिलेली.
कवी नाही, असं जाहीरपणे मान्य केलं, तरी नावावर काही कविता आहेत. त्या छापून आल्या आहेत. विनायक लिमये आणि प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या आग्रहामुळे ‘शब्ददीप’ दिवाळी अंकामध्ये सलग दोन वर्षं कविता प्रसिद्ध झाल्या. ‘सकाळ साप्ताहिक’च्या दिवाळी अंकातही एक कविता प्रसिद्ध झाली. ती माझी सर्वांत लाडकी कविता. शास्त्रानुसार त्या कितपत कविता होत्या, ह्याबाबत मला (काहीशी) शंका आहे. पण तशी ती घेणं वा व्यक्त करणं योग्य नाही. कारण तसं करणं म्हणजे लिहायला लावणाऱ्या, निवड करणाऱ्या आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या संपादकांवर अन्याय केल्यासारखं आहे.
ह्या प्रसिद्ध झाल्या एवढ्याच कविता मी प्रसवल्या असं मुळीच नाही. साधारण २०११पासून तत्कालीन महत्त्वाच्या घडामोडींवर मुक्तछंदात लिहू लागलो. त्याचं नामकरण ‘पद्याचा आभास निर्माण करणारं गद्य’ किंवा ‘पद्यासारखं वाटणारं गद्य’ असं केलं. चार वर्षांच्या काळात अशा साधारण पन्नास-साठ रचना झाल्या. त्यातील काही ‘रविवार जत्रा’च्या विशेषांकात व दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या.
ह्या रचना लिहीत होतो, तेव्हा फेसबुकवर वावरत नव्हतो. मग मी ओळखीच्या पाच-पंचवीस जणांना त्या इ-मेलने पाठवत होतो. त्याचं खूप जणांनी कौतुक केलं. ‘आप’चा उदय झाला तेव्हाची परिस्थिती, नारायणदत्त तिवारी ह्यांच्या मुलानं खटला जिंकून त्यांना आपलं जनकत्व स्वीकारायला भाग पाडणं, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पुण्यात आलेल्या नरेंद्र मोदी ह्यांना लतादीदींना पंतप्रधान होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा... ह्या आणि अशा काही विषयावरच्या कविता मनापासून लिहिल्या होत्या.
दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ‘ढिंग टांग’ सदरासाठी बदली खेळाडू म्हणून भूमिका बजावताना तीन-चार कविता लिहिल्या. मोदी सरकारचा दुसरा वर्धापनदिन, पाऊस आल्यावर काय होतं आणि लेखक मुरुगन ह्यांच्याबाबत न्यायालयानं दिलेला निर्णय ह्या त्यातील मला आवडलेल्या रचना. त्यांना नाद आहे आणि त्या मीटरमध्ये आहेत. दैनिकाच्या वाचकाला समजेल, आवडेल, पचेल नि पटेल अशी शब्दरचना त्यात मला बऱ्यापैकी साधली आहे. (त्यातल्या काही कविता ह्याच ब्लॉगवर ‘पद्यासारखं गद्य’ सदरात पाहायला मिळतील.)
अलीकडच्या तीन-चार वर्षांत अशा व्यंग्यकविता लिहिणं थांबलं. कारण माहीत नाही. आतून लिहावं वाटावं लागतं, तसं वाटलं नाही. अर्थात अजून एक कारण आहे - मला उत्स्फूर्त सुचत नाही. एखाद-दोन ओळी सुचतात किंवा मध्यवर्ती कल्पना मनात येते. त्यानुसार पंचवीस-तीस ओळींची कविता लिहिण्यासाठी ती घटना मला पुनःपुन्हा वाचावी लागते. सहसा रात्रीनंतर बैठक जमवावी लागते. एका प्रयत्नात मनासारखं लिहून होत नाहीच. प्रयत्न करावे लागतात. शब्द बदलावे लागतात. आता काय होतंय की, एखादी घटना घडली की, सामाजिक माध्यमांवर त्याच्यावर तातडीने प्रतिक्रिया उमटतात. त्यातल्या खूप प्रतिक्रिया चटकदार, धारदार, नेमक्या असतात. त्या वाचल्यावर ‘आपण काय वेगळं लिहिणार’ असं वाटतं आणि उत्साह मावळतो.
असो. ‘कविता मनोमनी’ उपक्रमाच्या बातम्या वाचल्या आणि वाटलं की, आता लिहावं. कविता सादर करण्याच्या मुदतीच्या दोन दिवस आधी एक कल्पना मनात घोळत होती. तिलाच शब्दरूप द्यायचं ठरवलं होतं. शेवटचा दिवस उगवला, तरी प्रत्यक्षात एक ओळही लिहून झाली नव्हती. ‘पाठविली का कविता?’ असं मित्रानं रात्री दहाच्या सुमारास विचारलं आणि जाग आली. संगणक उघडून बसलो आणि आधी सुचलेलं काहीच आठवेना. मित्राला शब्द दिला म्हणून लिहायचंच असं ठरवलं. साधारण साडेदहा ते रात्री पावणेबारा असं झगडत राहिले. संगणकाच्या वर्डपॅडवर बरंच काही लिहिलं आणि खोडलं. त्यातून जे राहिलं ते मुदत संपण्याच्या जेमतेम पाच मिनिटं आधी इ-मेलवरून पाठवून दिलं.
निकाल कधी लागणार, ह्याची काही कल्पना नव्हती. कविता प्रसिद्ध झाली त्या रविवारी मी सकाळीच प्रवासासाठी निघालो. आपली कविता परीक्षकांना पसंत पडली, हे मला थेट संध्याकाळी समजलं. योगायोग किंवा गंमत अशी की, ‘लोकसत्ता - तरुण तेजांकित’ पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमस्थळीच मला ही बातमी कळली!
अशी आहे ती कविता...
नपुसंकलिंगी...
एकटेपणाचा खूप खूप
कंटाळा आला म्हणून
आणि धावत्या जगाबरोबर
दोन पावलं चालत
थोडं ‘सोशल’ व्हावं म्हणून
भराभरा, उत्साहाने
सामाजिक माध्यमांवर
‘लॉग-इन’ झालो
रोज नवनवे पाहत राहिलो
आवडल्याक्षणी दाद देत राहिलो
अंगठा, बदाम, हसरा चेहरा
दुःखी आणि काळजी दाखवणारा
यांच्या-त्यांच्या गटात येण्याचं
निमंत्रण ह्यांनी-त्यांनी दिलं
‘सहर्ष’ म्हणत स्वीकारताना
टक्क डोळ्यांनी स्वप्न पाहिलं
आता लाईक वाढतील
प्रतिक्रिया लिहितील
‘छान लिहिता हं’ म्हणत
कुणी कौतुक करतील
अपेक्षिलं तसं काहीच नाही झालं
त्यांच्यात राहूनही त्यांचा न झालो
ह्यांच्यात असूनही एकटाच पडलो
‘बघता काय सामील व्हा’
आवाहनावर गप्प बसलो,
म्हणून काहींनी धुत्कारलं
पलीकडच्याला कचकचीत
शिव्या देत नाही,
म्हणताना काहींनी फटकारलं
धाड घालणाऱ्या ट्रोलांना
जणू आमंत्रण दिलं
मग ह्यांनी मला जात विचारली
उत्तर देणं टाळलं
मग त्यांनी मला धर्म विचारला
ओठ न उघडणं पसंत केलं
आमचा? त्यांचा? की कुंपणावरचा?
सवाल होता त्यांचा लाखमोलाचा
कुणी पाकिस्तानात धाडलं
कुणी युरेशियात पाठवलं
आणखी कुणी आफ्रिकेत जा म्हटलं
थोडक्यात, आपला म्हणायला
सगळ्यांनी त्वेषानं नाकारलं
मौनामुळं सगळंच बिघडलं
बधिरपणाला कंटाळून माझ्या
पिच्छा सोडून जातानाही पिचकारले,
‘xxला, ‘हे ’ माणसांतही जमा नाही!’
----------
Wednesday, 16 March 2022
न झालेला (अजून एक) मुख्यमंत्री
पंतप्रधान मोदी ह्यांच्या हस्ते सत्कार. |
शंकरराव कोल्हे ह्यांचा ‘सहकारतज्ज्ञ’ असा उल्लेख आज-उद्या-परवाच्या बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांतील संपादकीय पानांवर प्रसिद्ध होणाऱ्या स्फुटांमध्ये होईल. पण फक्त तेवढंच बिरूद त्यांच्यावर अन्याय करणारं असेल. सहकाराबरोबरच विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास असणारा, स्वतःची ठाम मतं असणारा आणि ती व्यक्त करणारा हा नेता होता.
‘सहकार-महर्षी’, ‘सहकार-सम्राट’ अशी पदवीसदृश विशेषणं माध्यमांमधून कित्येक वर्षांपासून वापरली जातात. त्यातून बहुदा उपरोध, काहीसा हेवा, क्वचित तुच्छता व्यक्त होत असते. ग्रामीण महाराष्ट्र, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र व्यापलेल्या सहकार चळवळीने असे ‘महर्षी’ वा ‘सम्राट’ निर्माण केले, ह्यात काही खोटं नाही. पण ह्या उपरोधाच्या आणि हेव्याच्या पार पुढे जाऊन काम करणारे नेते ह्याच चळवळीनं दिले. त्यांच्या कामानं त्या परिसराचा, तालुक्याचा कायापालट झाला. भले त्या परिसराला ‘नेत्याचं संस्थान’ म्हणून हिणवलं गेलं असेल.
काळे आणि कोल्हे
राजकारण्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल तुच्छतेनं बोललं जाण्याच्या आणि बहुतांशी प्रमाणात ते वास्तव असण्याच्या काळात हे दोन्ही शंकरराव उच्चशिक्षित होते. आज ज्याचा ‘व्यावसायिक शिक्षण’ म्हणून खास उल्लेख होतो, ते त्यांनी मिळवलं होतं. दत्ता देशमुख, शंकरराव काळे १९४०च्या दशकातले अभियंते होते. पुण्याच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळविली होती. शंकरराव कोल्हे कृषिशास्त्राचे पदवीधर होते. त्यानंतर युरोप आणि अमेरिकेत त्यांनी ह्या विषयाचं पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलं.
सहकार, शेती, पाणी, शिक्षण हे कोल्हे ह्यांच्या आवडीचे विषय. समोर ऐकणारा असेल, तर त्या विषयावर तासन् तास बोलण्याची त्यांची क्षमता होती. तो अनुभव मी एकदा घेतला. ‘लोकसत्ता’ची नगर आवृत्ती चालू होऊन जेमतेम वर्ष झालं असेल. आम्ही काही मित्र येवल्याहून नगरकडे येत होतो. त्या वेळी कोल्हे ह्यांच्या पुण्या-मुंबईतील जनसंपर्काची जबाबदारी अभिनंदन थोरात पाहत होते. अभिनंदन त्या दिवशी कोपरगाव येथे होते. त्यांना भेटायला म्हणून आम्ही गेलो.
संजीवनी साखर कारखान्यात शंकरराव कोल्हे होतेच. अभिनंदन ह्यांनी त्यांची भेट घालून दिली. त्या काळात ‘लोकसत्ता’ त्यांचं आवडतं, अगदी प्रेमाचं दैनिक होतं. त्या दैनिकाचा माणूस आहे म्हटल्यावर त्यांनी खळखळ न करता वेळ दिला. नंतरचा सव्वा ते दीड तास साखर, पाणी, परदेशातली शेती ह्या विषयावर अखंड बोलत राहिले. आम्ही सारे मित्र त्या वाक्गंगेमुळे आणि त्यातून ओसंडून वाहत असलेल्या ज्ञानप्रवाहामुळे अचंबित झालो. सारा वेळ आम्ही श्रवणभक्ती केली. ‘पत्रकार’ असल्याची जाणीव कधी तरी व्हायची. एखादा प्रश्न विचारायला जायचो. त्याला थोडक्यात उत्तर देऊन कोल्हेसाहेब आपली बॅटिंग मागील डावावरून पुढे अशा रीतीनं चालू ठेवायचे. ‘साहेब, ही मुलाखत नाही बरं. सहज गप्पा आहेत,’ असं अभिनंदन ह्यांनी त्यांना सांगितलं. हे कुठं छापून येणार नाही हे माहीत असूनही ‘...शहाणे करुनी सोडावे सकळ जन’ ह्या बाण्याप्रमाणे त्यांनी आम्हा चार-पाच मित्रांना खूप काही सांगितलं.
मुलाखतीवरून एक गंमत आठवली. नव्वदीच्या दशकात कोल्हेसाहेब पुण्याच्या एका संपादकांचे लाडके होते. छोट्या-मोठ्या गोष्टींबाबत त्यांना कोल्हेसाहेबांचे मत महत्त्वाचं वाटायचं (तसं ते असायचंही, हा भाग वेगळा!) आणि ते नगरच्या कार्यालयातील प्रमुखाला ते घ्यायला सांगायचे. एकदा त्यांनी नगर कार्यालयातील ह्या सहकाऱ्याला कोल्हेसाहेबांची मुलाखत घेऊन यायला सांगितलं. बहुतेक पाण्याचा विषय असावा. नगरहून हा पत्रकार प्रश्नांची पद्धतशीर यादी बनवून गेला.
आपलीच मुलाखत आपल्याशी
कोल्हेसाहेबांनी ते प्रश्न पाहिले. मग ते त्याच्या पद्धतीनं गडगडाटी हसले. ‘मुलाखत कशी घ्यायची मी सांगतो,’ असं म्हणत त्यांनीच स्वतःला प्रश्न विचारले आणि त्याची (सविस्तर) उत्तरं दिली! निरोप घेताना ‘झाली ना चांगली मुलाखत?’ असं विचारायलाही ते विसरले नाहीत. त्यांचं हसू मनमोकळं, दिलखुलास होतं. आमच्या त्या गप्पांमध्येही ते अनुभवायला आलं.
पत्रकारांचं ‘पक्षांतर’
असंच एकदा कोल्हेसाहेब ‘लोकसत्ता’च्या पुणे कार्यालयात आले होते. मी तेव्हा तिथेच होतो. संपादकांनी ‘हा तुमच्या नगरचा बरं का!’ अशी ओळख करून दिली त्यांना माझी. संपादकीय विभागातल्या मंडळींशी त्यांनी तासभर ऐसपैस गप्पा मारल्या. त्या ओघात कुणी तरी नेत्यांच्या पक्षांतराबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही लोक नाही का, ह्या पेपरमधून त्या पेपरमध्ये जात? कुणी वृत्तसंपादक केलं म्हणून जातं, तर कुणाला संपादक व्हायचं असतं म्हणून तो दुसऱ्या पेपरमध्ये जातो. तसंच असतं हे.’’
नव्वदीच्या दशकानंतर वर्तमानपत्रांचे वर्धापनदिन साजरे करण्याची आणि त्यानिमित्त विशेष पुरवण्या प्रसिद्ध करण्याची पद्धत रूढ झाली. त्यातून मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळायच्या. आधीच्या काळात अशा पुरवण्यांच्या माध्यमातून वाचकांना वेगळं काही वाचायला मिळायचं बरंचसं. (आता त्या निव्वळ जाहिरात पुरवण्या झाल्या आहेत.) अशाच एका वर्धापनदिनासाठी जाहिरातीची विनंती करण्यासाठी जाहिरात विभागाचे दोघे-तिघे कोल्हेसाहेबांकडे गेले. वजन पडावं म्हणून सोबत संपादकीय विभागप्रमुख होतेच. विषय निघाला आणि जाहिरातीची अपेक्षा सांगितली गेली. त्यावर कोल्हेसाहेब म्हणाले, ‘‘अहो साहेब, तुमचा वर्धापनदिन. त्या आनंदानिमित्त तुम्ही आम्हाला, वाचकांना काही तरी द्यायचं. ते सोडून आम्हालाच मागत बसलात!’’ अर्थात नंतर त्यांनी जाहिरात मंजूर केली, हा भाग वेगळा.
आम्ही तिघं-चौघं, पोपट पवार, निर्मल थोरात आणि मी परवाच नगरच्या सावेडीच्या ‘स्वीट होम’मध्ये जेवायला गेलो होतो. निर्मलला अचानक आठवलं नि तो म्हणाला, ‘‘कोल्हेसाहेब नेहमी इथंच जेवायचे बरं का.’’ मला ते माहीत होतं. त्यांना ‘बॉइल्ड फूड’ लागायचं - उकडलेल्या भाज्या. असंच एकदा ते संध्याकाळी ‘लोकसत्ता’च्या नगर कार्यालयात आले होते. तिथून पुण्याला जाणार होते. पोहोचायला रात्रीचे साडेनऊ-दहा वाजणार. अचानक त्यांनी मला सांगितलं, ‘‘अहो, तेवढा अभिनंदनला फोन करा हो. त्याला सांगा, मी येतोय. ते आमचं जेवण कुठं मिळतं त्यालाच चांगला माहितीय. नाही तर उपाशी राहायचो मी.’’ आणि नंतर तेच प्रसिद्ध गडगडाटी हास्य.
‘उत्तम वाचक’ अशीही कोल्हेसाहेबांची ओळख होती. ‘लोकसत्ता’मध्ये त्या काळी रविवारी प्रसिद्ध होणारे ‘नगरी-नगरी’ सदर त्यांना आवडायचे, असे त्यांचे स्वीय सहायक वीरेंद्र जोशी नेहमी सांगत. त्या सदरात प्रसिद्ध झालेले ‘पत्रकार लोग आयोडेक्स मलिए, पाकिट लेने के काम चलिए’ हे टिपण त्यांना खूप आवडलं. इतकं की, त्यांनी तेव्हाचे मुख्य वार्ताहर महादेव कुलकर्णी ह्यांना फोन करून ‘तुम्ही रोज का नाही छापत हे सदर?’ असं विचारलं.
काळे आणि कोल्हे ह्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या ऐन मध्यावर कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला. ऊसमळे जगतील का आणि कारखाने टिकतील का, अशी अवस्था होती. दोघेही त्या प्रश्नाला आपापल्या पद्धतीने भिडले. त्यांनी परस्परांवर जोरदार टीकाही केली. पण ती करताना मूळ प्रश्नाचा विसर पडणार नाही, ह्याची पूर्ण काळजी घेतली. तुटेपर्यंत ताणायचं नाही, हाच दोघांच्याही राजकारणाचा मंत्र होता.
मंत्रिपदाची छोटी इनिंग्स
लायक असूनही ह्या दोन्ही नेत्यांना फार काळ सत्ता उपभोगता आली नाही. शंकरराव काळे ह्यांना तर केवळ एकदा राज्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये. कोल्हे ह्यांना मंत्रिपदासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागली. वयाच्या एकसष्टीत म्हणजे १९९०मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. तेही पूर्ण पाच वर्षांसाठीच नाहीच. महसूल, कृषी व फलोत्पादन, परिवहन, राज्य उत्पादनशुल्क अशी विविध खाती त्यांनी छोट्या इनिंग्समध्ये संभाळली. त्यानंतर तीस वर्षांत कोपरगाव मतदारसंघाच्या वाट्याला काही लाल दिव्याची गाडी आली नाही.
‘एन्रॉन’विरोधात सत्याग्रह
जागतिकीकरण उंबरठ्यावर असताना त्याची चाहूल लागून त्याबद्दल बोलणारे जिल्ह्यात दोन नेते होते - बाळासाहेब विखे पाटील आणि शंकरराव कोल्हे. सहकार चळवळीच्या माध्यमातून शिक्षणाचेही मोठे काम झाले. त्याची नगर जिल्ह्यात अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. संजीवनी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय त्यापैकीच एक. गुणवत्तेबद्दल हे महाविद्यालय ओळखले जाते. ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणखी दोन वेगळे उपक्रम चालू झाले. कोल्हेसाहेबांचे सहकारी लहानुभाऊ नागरे ह्यांना सैनिकी शिक्षणाबद्दल मोठी ओढ. त्याची त्यांना जाण होती आणि उपयुक्तताही माहीत होती. लष्करातील मोठ्या अधिकाऱ्यांशी त्यांची ओळख होती. त्यातूनच ‘संजीवनी प्री-कॅडेट ट्रेनिंग सेंटर’ चालू झाले. आणखी एक नोंद घेण्यासारखी वेगळी संस्था म्हणजे - ‘संजीवनी मोटर ड्रायव्हिंग स्कूल’. सह-वीजनिर्मिती, इथेनॉल निर्मिती, आधुनिकीकरण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यांच्या राजकारणाएवढ्याच, किंबहुना काकणभर अधिक महत्त्वाच्या ह्याच गोष्टी होत.
कोल्हेसाहेब आणखी एका गोष्टीमुळे लक्षात राहिले. संजीवनी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याला त्यांचे नाव देण्याचा ठराव आला. त्याला त्यांनी त्या क्षणी विरोध केला! आपण संस्थापक असलो, तरी आपल्या नावाने कारखाना ओळखला जाऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. जिल्ह्यात त्या काळात आलेल्या नामांतराच्या लाटेत ती वेगळी होती. पण त्यांची ही भूमिका त्यांच्याच कार्यकर्त्यांना पटली नि पचली नाही. काही काळानंतर त्यांचे नाव कारखान्याला लाभले.
साधारण गेल्या दहा वर्षांपासून कोल्हेसाहेब राजकारणापासून लांबच होते. प्रकृतीमुळे जाहीर समारंभातील वावरावरही मर्यादा आल्या होत्या. सहकार-शेती-शिक्षण-राजकारणाच्या इतिहासातील एक प्रकरण त्यांच्या निधनामुळे संपले!
---
(सर्व छायाचित्रे - कोपरगावचे पत्रकार महेश जोशी ह्यांच्या सौजन्याने)
---
#ShankarraoKolhe #kopargaon #NagarPolitics #cooperative #sanjeevani #Kale_Kolhe #politics #maharashtapolitics #sugarindustries #enron
Wednesday, 9 March 2022
भिवंडीत घुमला नगरचा दम
श्रीकृष्ण करंडक पटकावणारा नगरचा कबड्डी संघ. |
नगरच्या पुरुष कबड्डी संघाने ही सल जवळपास २३ वर्षे बाळगली. ती दूर झाली मागच्या आठवड्यात. काल्हेरच्या (भिवंडी) बंदऱ्या मारुती क्रीडानगरीमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेत नगरच्या नवख्या संघाने बाजी मारली. एकोणसत्तर वर्षांतले पहिले विजेतपद. उपान्त फेरीत मुंबई उपनगर आणि अंतिम सामन्यात मुंबई शहर अशा बलाढ्य संघांना पराभूत करण्याची किमया शंकर गदई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी करून दाखवली.
राज्यातील अव्वल, पहिल्या नंबरचा संघ ठरण्याची ही कामगिरी लीलया झालेली नाही. विजेतेपदाकडे नेणारी आणि त्यावर शिक्कामोर्तब करणारी - दोन्ही लढती ‘जिंकू किंवा मरू’ एवढ्या अटीतटीच्या झाल्या. उत्तम संघभावना, आत्मविश्वास, दडपण झुगारून टाकण्याची आणि शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची वृत्ती ह्यामुळेच नगरला हे यश खेचून आणता आले. मैदानातील कौशल्यांबरोबरच कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता कणखरपणे उभे राहण्याची त्यांची तयारी होती. त्याचे पारितोषिक राज्य अजिंक्यपदाच्या रूपाने मिळाले.
नगरचा एकमेव अर्जुन पुरस्कारविजेता पंकज शिरसाट ह्या अभुतपूर्व विजयाचा साक्षीदार होता. त्याच्याच नेतृत्वाखाली इस्लामपूरमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नगरने पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. यजमान सांगलीकडून त्यांचा पराभव झाला आणि विजयश्रीने हुलकावणी दिली. पण त्या स्पर्धेचा ‘हीरो’ पंकज ठरला होता. चतुरस्र चढायांनी त्याने तिथल्या शेकडो प्रेक्षकांना जिंकले होते. ह्या संघातून खेळलेले सातही जण हीरोच आहेत, असं पंकज अगदी दिलखुलासपणे म्हणतो.
श्रीकृष्ण करंडक ‘डार्क हॉर्स’ला
फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी भिवंडीत सुरू झालेल्या एकोणसत्तराव्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नगरचा संघ तसा फार कुणाच्या खिसगणतीत नव्हता. अजिंक्यपदाचा श्रीकृष्ण करंडक सर्वसाधारण दिसणाऱ्या मुलांच्या ह्या संघाला मिळेल, असंही वाटलं नसेल कुणाला. ‘डार्क हॉर्स’ ठरला हा संघ. चाळीस वर्षांपूर्वी विश्वचषक जिंकणाऱ्या कपिलदेवच्या संघासारखा!
पुरुषांच्या ‘ब’ गटात बलाढ्य मुंबई शहर, सोलापूर, औरंगाबाद व नगरचा समावेश होता. पहिल्याच सामन्यात मुंबई शहराला बरोबरीत थोपवून नगरकरांनी चुणूक दाखवली. खरं तर पूर्वार्ध संपला तेव्हा नगरकडे ९-७ आघाडी होती. राहुल खाटीक, प्रफुल्ल झावरे, शंकर गदई ह्यांनी मिळवून दिलेली ही छोटी आघाडी निर्णायक ठरली नाही. अनुभवी मुंबईकरांनी नंतर जोर लावला आणि सामना २०-२० बरोबरीत सुटला.
गटातील नंतरचे दोन्ही सामने नगरच्या संघाने सहज जिंकले. कर्णधार शंकर, प्रफुल्ल व संभाजी वाबळे ह्यांच्या जोरदार खेळामुळे सोलापूरवर ५४-१३ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. औरंगाबादचाही नगरपुढे टिकाव लागला नाही. ह्या गटात मुंबई शहर व नगर ह्यांचे समसमान पाच गुण होते. पण मुंबई शहराचा गुणफरक कमी असल्यामुळे गटात त्यांना अव्वल स्थान मिळाले.
आता होती बाद फेरी. प्रत्येक सामना जिंकलाच पाहिजे. उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करताना नगरच्या संघाने कोल्हापूर संघाला ४७-१५ अशी धूळ चारली. ह्या विजयात देवीदास जगताप, संभाजी वाबळे चमकले. उपान्त्यपूर्व फेरीत नंदुरबारला हरवताना (३३-२०) नगरने पूर्वार्धात व उत्तरार्धात एक-एक लोण चढविले. ह्या सामन्यात गदई व खाटीक ह्यांना उत्तम साथ मिळाली, ती राम आडागळेची.
नगरकरांची लढाऊ वृत्ती
नगरच्या संघाची आतापर्यंतची वाटचाल आश्वासक होती. त्याच पद्धतीच्या खेळातून उपान्त फेरी गाठली. समोर संघ होता मुंबई उपनगराचा. व्यावसायिक, सातत्याने खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असलेला, ज्याचं नाव ऐकूनच प्रतिस्पर्धी गळाठून जातो, असा संघ. इथेही नगरकरांनी लढाऊ वृत्ती दाखवली. नियमित वेळेत गुणफलक बरोबरी दाखवत होता. मग पाच-पाच चढायांच्या अलाहिदा डावात नगरचा संघ सरस ठरला. ही लढत ३३-३० (७-४) अशी जिंकून नगरने अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेत सलामीला गाठ पडलेलाच मुंबई शहरचा संघ अंतिम फेरीत नगरसमोर उभा होता. उत्तम कामगिरीचा इतिहास, प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळणारे, वर्षातले सात-आठ महिने विविध स्पर्धांमध्ये कस अजमावणारे खेळाडू असा बलाढ्य संघ. तुलनेने नगरचा संघ पोरसवदा. स्पर्धात्मक वातावरणाचा फारसा अनुभव नसलेला. जमेची बाजू एवढीच की, ह्या संघानेच आधी मुंबई शहरशी बरोबरी केलेली.
गमावण्यासारखं काहीच नसलेल्या नगरची सुरुवात धडाकेबाज होती. पण काही मिनिटांतच मुंबई शहरने चोख प्रत्युत्तर देत बाजू सावरली. मध्यंतराला मुंबई शहर संघाकडे १४-८ आघाडी होती. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत निर्विवाद ठरावी, अशी आघाडी.
पण सामन्याचा उत्तरार्ध अधिक चुरशीचा झाला. सगळं दडपण झुगारून नगरची तरुण पोरं खेळली. मिनिटा-मिनिटाला पारडं बदलत होतं. पाच मिनिटं बाकी असताना नगरकडे एका गुणाची (२३-२२) आघाडी होती. ती तोडत मुंबईने तीन गुणांची आघाडी घेतली. अखेरच्या क्षणी नगरने २५-२५ अशी बरोबरी साधली. विजेता ठरविण्यासाठी झालेल्या ५-५ चढायांच्या डावातही बरोबरी (३१-३१) झाली.
सुवर्ण चढाई नि नवी आवृत्ती
कबड्डीचा राज्यविजेता ठरणार होता सुवर्ण चढाईतून. त्यासाठी पुन्हा नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणाऱ्या संघालाच चढाईची संधी मिळते. जो संघ चढाई करतो, त्याच्या यशाची खातरी अधिक असते, असे राज्य कबड्डी संघटनेचे माजी संयुक्त चिटणीस प्रा. सुनील जाधव ह्यांचे निरीक्षण. सुदैव म्हणा किंवा योगायोग म्हणा, शंकर गदईने नाणेफेक जिंकली. सुवर्ण चढाई करण्यासाठी तोच गेला. त्याने पहिल्याच फटक्यात बोनस गुण वसूल केला आणि कबड्डीच्या इतिहासाची नवी आवृत्ती लिहिली! तेवीस वर्षांपूर्वी हुलकावणी दिलेले स्वप्न आपलेसे झाले.
कोणत्याही खेळात एखादा संघ अजिंक्य ठरतो, तेव्हा त्यासाठी केलेली काही मेहनत असते. विचारपूर्वक केलेली आखणी असते. नगरच्या संघाचे प्रशिक्षक होते शंतनु पांडव. इस्लामपूरला उपविजयी ठरलेल्या संघाचे सदस्य. ते म्हणतात, ‘‘तेव्हा इस्लामपूर आणि आता भिवंडी. कबड्डीपटू म्हणून माझ्या आयुष्यातले हे दोन महत्त्वाचे, सुवर्णक्षण - तेवीस वर्षांच्या अंतराने आलेले.’’
स्वतःसाठी नको, तर संघासाठी खेळू
तुलनेनं नवख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या ह्या संघावर कशी मेहनत घेतली? त्यांना कोणत्या चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या? शंतनु पांडव म्हणाले, ‘‘कबड्डी सांघिक खेळ आहे. कुणा एकाच्या खेळावर एखादा सामना जिंकता येतो; स्पर्धा नाही. निवडचाचणी असल्यामुळे काही खेळाडू स्वतःला(च) सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात. पण मी सर्वांना सांगितलं की, स्वतःसाठी खेळाल, तर संघभावना राहणार नाही. मग संघ जिंकणार नाही. संघ विजयी झाला तर सर्वांचाच फायदा, हे त्यांना पटलं. सराव तसा घेतला. नवीन, तरुण खेळाडूंचा हा संघ. मोठ्या स्पर्धा किंवा सलग एकत्र खेळण्याचा त्यांना अनुभव नव्हता. पण महत्त्वाचे म्हणजे हे सगळे किमान चार-पाच वर्षांपासून नियमित सराव करणारे आहेत. मूलभूत कौशल्यात सगळेच पक्के आहेत. त्यामुळे सांगितलेलं ते पटकन शिकत गेले.’’
प्रशिक्षक शंतनु पांडव आणि कर्णधार शंकर गदई |
‘‘अंतिम लढतीत जोरदार सुरुवात केल्यामुळे आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास जरा अतीच वाढला. त्याचा परिणाम असा झाला की, मध्यंतराच्या वेळी आपण मागं पडलो. मग ‘टाईमआऊट’च्या सोयीचा चांगला उपयोग केला. मुलांना थोडं रागवलो, थोडं समजून सांगितलं. अजूनही सामना जिंकता येईल, हे पटवून दिलं. पुढे काय झालं, ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. संघातल्या सगळ्यांचाच खेळ छान झाला. शेवटी हा सांघिकच खेळ आहे ना. शंकर, राहुल खाटीक, राम आडागळे, संभाजी वाबळे, देवीदास जगताप, प्रफुल्ल झावरे, राहुल धनवटे, आदित्य शिंदे... सगळेच संघासाठी खेळले.’’
श्वास कबड्डी...
मैदानात उतरण्याआधीचा सरावही फार महत्त्वाचा असतो - ‘नेट प्रॅक्टिस’. खो-खो, कबड्डी ह्या देशी खेळांच्या राज्य अजिंक्य स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून जिल्हा संघाचं सराव शिबिर घेतलं जातं. संघभावना रुजण्यासाठी, कौशल्ये गिरवून पक्की करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बऱ्याच वेळा ही शिबिरं म्हणजे उपचार असतात. नगरच्या संघाला मात्र यंदा भेंडे (ता. नेवासे) इथं जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या शिबिराचा निश्चित फायदा झाला. रणवीर स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्यानं झालेल्या ह्या शिबिराचे ‘द्रोणाचार्य’ होते प्रशिक्षक सतीश मोरकर. त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्स प्रोफाईलवर सहज दिसतं - ‘श्वास कबड्डी - ध्यास कबड्डी - खेळ कबड्डी’!
भेंड्याच्या कबड्डी, कुस्ती आणि ॲथलेटिक्स ह्या खेळांचं प्रशिक्षण रणवीर क्लबमध्ये दिलं जातं. कबड्डी संघाचं शिबिर आम्ही घेतो, असं मोरकर ह्यांनी आग्रहानं सांगितलं. ह्याच क्लबच्या शंकर गदई, राहुल धनवडे, राम आडागळे, राहुल खाटिक ह्यांची नगरच्या संघात निवड झाली होती.
भेंड्यांमधील सराव शिबिरामुळं संघबांधणी भक्कम झाली. |
शिबिरामुळं संघबांधणी
सराव शिबिराची जबाबदारी घेणारे सतीश मोरकर |
नगर जिल्हा कबड्डी संघटनेचं मुख्यालय श्रीरामपूरला होतं. ते नगरला आणण्याचा निर्णय कबड्डी महर्षी बुवा साळवी ह्यांनी घेतला. त्याची पहिली बातमी त्यांनी मला दिली होती. त्या गोष्टीला यंदा तीन दशकं झाली. ह्या काळात पुरुष-महिला, कुमार-कुमारी व किशोर-किशोरी ह्या गटांच्या आठ ते दहा राज्य स्पर्धांचं आयोजन नगरमध्ये झालं. ह्या संघटनेवर बुवांचं विशेष प्रेम होतं. बहुतेक सर्व स्पर्धांना ते पूर्ण काळ हजर असत. बुवा असते, तर नगरकरांच्या ह्या यशावर मनापासून खूश झाले असते, ह्यात शंकाच नाही.
............
‘एक जिवानं खेळलो म्हणून जिंकलो!’
छोट्या भावासह शंकर गदई |
ह्या सगळ्या यशामागचं गणित संघाचा कर्णधार शंकर गदई अगदी सहजपणे त्याच्या ग्रामीण शैलीत सांगतो. तो म्हणाला, ‘‘आम्ही सगळे एक जिवानं राहायचो-खायचो, एक जिवानं खेळलो. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. सगळे एक जिवाचे! कर्णधार म्हणून माझं सगळे ऐकायचे. सामना संपल्यावर राहण्याच्या ठिकाणी आमची चर्चा व्हायची - आज काय चुकलं, उद्या कसं खेळायचं! प्रशिक्षक पांडवर सर, व्यवस्थापक मोरकर सर काय चुकलं - काय बरोबर, ते समजावून सांगायचे.’’
‘‘पूर्ण स्पर्धेचं म्हणून काही आमचं नियोजन नव्हतं. आजचा सामना मारायचा, एवढंच आमचं ठरलेलं असायचं. उद्याचं उद्या. एक एक सामना जिंकायचा, हेच आमचं टार्गेट होतं. मुंबई उपनगरविरुद्ध सेमीफायनल होती. मोरकर आणि पांडव सरांनी मोठा आत्मविश्वास दिला - तुम्ही जिंकू शकता. आम्ही ठरवलं की ते खेळाडू आणि आपणही. त्यांच्यात नि आपल्यात वेगळं काही नाही. एवढा सामना जिंकायचाच, असा जबरी कॉन्फिडन्स होता आमच्यामध्ये,’’ शंकर म्हणाला.
टर्निंग पॉइंट
अंतिम लढतीतील एक टर्निंग पॉइंटबद्दल शंकर तपशिलानं बोलला. ‘‘मॅचची सुरुवात चांगली झाली. पण नंतर आमच्यावर आठचं लीड बसलं. सगळ्या मुलांची तोंडं बारीक झालं. मी म्हणालो, ’टेन्शन घेऊ नका रे. शेवटच्या दोन-तीन मिनिटांत मॅच रिकव्हर करू.’ कॅप्टन असं म्हणतो म्हटल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढला. वेळ संपत आली होती. आम्ही दोघंच आत होतो - एक कव्हर आणि मी रेडर. पाच गुणांनी मागं होतो आम्ही. मग मी ‘टाईम आऊट’ घेतला. सरांना म्हणालो, एक चेंज करू. आदित्य शिंदे आत आला. त्याचा खेळ मुंबईला माहीत नव्हता. त्याने एक बोनस आणला. मग एक पकड केली. अशा पद्धतीने बरोबरी साधली. तो होता टर्निंग पॉइंट. पाच-पाच चढायांमध्येही तेच झालं. आता ‘गोल्डन रेड’ची वेळ आली.’’
‘अशी मॅच झाली नाही,’ असं सांगताना शंकरच्या आवाजातला थरार लपत नाही. निर्णायक चढाईबद्दल तो म्हणाला, ‘‘टॉस जिंकला. नशीब भारी. मीच रेड मारली. मुलं सांगत होती अशी मार तशी मार. माझा कॉन्फिडन्स होता. समोरची टीम हबकलेली होती. मी बोनस टाकणार नाही, असं त्यांना वाटत होत. रेड टाकायला गेला आणि लगेच बोनस मारून मध्य रेषेजवळ रेंगाळत राहिलो. कोणाला वाटत नव्हतं नगरची ही टीम फायनल मारील म्हणून!’’
खरं खेळत होतो आम्ही
‘‘स्पर्धा मातीवर झाली, ते आमच्या फायद्याचंच ठरलं. मॅटचा आणि आमचा संपर्कच नाही आलेला. आम्हाला भरपूर लोकांची साथ मिळाली. आम्ही जिंकावं असं खूप जणांना वाटत होतं. कारण खरं खेळत होतो आम्ही. कव्हरसेट एक जिवाचा. आम्ही कुणी सिलेक्शनसाठी नाही, तर टीम म्हणून खेळलो. तसं नसतं तर आम्ही आधीच हरलो असतो,’’ असंही शंकर म्हणाला.
....
जबरदस्त टीम स्पिरीट
इस्लामपूरच्या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या संघाचं नेतृत्व पंकजने केलं. तो संघ आणि हा संघ ह्यांची तुलना करता येईल? पंकज म्हणाला, ‘‘दोन्ही टीममध्ये भरपूर गुणवत्ता आहे. त्या वेळी एक-दोन चुका झाल्या आमच्या. आताच्या संघात रेडर भरपूर आहेत - स्वतः शंकर, खाटिक, देविदास, झावरे, शिंदे. आमच्या टीममध्ये मला पर्याय नव्हता त्या वेळी. ते जाऊ द्या... ही मुलं खूप चांगलं खेळली. टीम म्हणून खेळ झाला. कुणा एका खेळाडूनं जिंकून दिलं नाही. कॅप्टन छान. बाकीची मुलंही छान. वय कमी आहे. खेळायला मिळेल आणि अजून चांगलं खेळतील, एवढं नक्की.’’
-------------
#kabaddi #Nagar #kabaddi_state_championship #maharashtra #maharashtra_kabaddi #pankaj_shirsat #shankar_gadai #kabaddiproleague #Bhivandi #Mumbai #team_spirit
Tuesday, 15 February 2022
मोबाईलविना...
‘नोकिया’चा सुबक-ठेंगणा हँडसेट आणि एअर-टेलचं कार्ड. मला बापुड्याला तो चालू कसा करायचा नि बंद कसा करायचा हेही माहीत नव्हतं. एका चटपटीत (माझ्याहून) तरुण सहकाऱ्यानं ते शिकवलं. कार्यालयानं दोन-तीन महिन्यांतच आधीची एअर-टेलची ‘आयडिया’ बाद ठरवून नव्या सेवेची ‘कल्पना’ आपलीशी केली. सांगायचा मुद्दा असा की, कार्यालयामुळं माझ्या हाती मोबाईल आला. तसा मिळाला नसता, तर मी तो कधी घेतला असता, हे सांगता येत नाही. मित्रांनी आग्रह केला असता आणि घरचे मागे लागले असते, तेव्हा कुठं मी त्याला तयार झालो असतो. अगदीच नाइलाज झाला म्हणून...
कार्यालयीन कामाच्या सोयीसाठी दिलेला हा सेलफोन फारच काळजीपूर्वक वापरत होतो. आलेले फोन स्वीकारण्यापुरताच त्याचा वापर. अगदी अत्यावश्यक असेल, तरच त्यावरून संपर्क साधायचा. पहिली तीन वर्षं तर मी त्यावरून घरीही संपर्क साधत नसे. खासगी कामासाठी तर वापर नाहीच. एस. एम. एस.साठी मात्र भरपूर. खूप वेळा असं होई की, फोनकॉलपेक्षा एस. एम. एस.चं बिल (थोडंसं) जास्त असे. तीन-चार दिवसांपेक्षा जास्त रजेवर जायचं असलं की, मी तो बंद करून संपादकांच्या ताब्यात देऊन टाकायचो. एखादी फार मोलाची वस्तू जपून ठेवायला द्यावी अगदी तसं. ते हसायचे. सहकारी विनायक लिमयेही हसायचा. फोन राहू दे की, असं ते म्हणायचे. पण मला ते उगीचंच बंधन वाटायचं.
... हे सगळं लिहायचं कारण म्हणजे माझे दोन दिवस, तब्बल ४८ - अ ठ्ठे चा ळी स - तास मोबाईलविना गेले. परवा दिवशी दुपारी जेवण करून ताणून दिली. उशाजवळ मोबाईल होता, गाणी ऐकवत. एखादं गाणं मध्येच ऐकू यायचं. अर्धजागृत अवस्थेतलं मन त्याची नोंद घ्यायचं. असं तासभर चाललं. त्यानंतर कधी तरी मोबाईलच बॅटरी संपून गेली.
आताही असंच झालं असेल म्हणून पुन्हा त्याला सांगितलं - ‘नो सिम’ दिसतंय रे. मागच्या प्रयोगाची पुनरावृत्ती झाली. पण ह्या वेळी त्या प्रयोगांना मोबाईलनं दाद दिली नाही. बिघाडाचा बहुतेक नवा, प्रगत व्हेरिएंट असावा. आधीच्या उपायांना भिक न घालणारा.
मग शंका आली. फोनच बिघडलाय की काय! धस्स झालं. जेमतेम वर्षभराचं वय त्या फोनचं. एवढ्यात त्याला ऑक्सिजन कमी पडू लागला? व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली पण?
मुलानं दिलासा दिला. असा धीर सोडू नका म्हणाला.
सिमकार्डाची चाचणी करायची ठरवलं. मुलाच्या फोनमध्ये कार्ड टाकलं. तिथं तीच तऱ्हा. त्याचं कार्ड माझ्या मोबाईलमध्ये टाकलं. ते चालू.
म्हणजे बिघाड कार्डमध्ये आहे, मोबाईलमध्ये नाही. धस्सची जागा हुश्शनं घेतली. सिमकार्ड बदलणं हाच उपाय. तुलनेनं कमी खर्च.
पण ते लगेच शक्य नव्हतं. शनिवारची दुपार होती. भारत संचार निगमचं कार्यालय बंद होण्याची वेळ जवळजवळ आलीच होती. रविवारची सुटी. म्हणजे नवीन कार्ड थेट सोमवारी मिळणार.
मोबाईल दोन दिवस बंद. पण ते अर्धसत्य होतं. कार्ड नव्हतं तरी व्हॉट्सॲप चालूच होतं. घरच्या ब्रॉडबँडचा झरा सदाचाच झुळझुळता. म्हणजे फार काही अडणार नव्हतं. अगदी तातडीनं कुणाशी संपर्क साधायचा तर ‘व्हॉट्सॲप कॉल’ करता येणार होता. त्या विद्यापीठावरून ज्ञानाची देवाणघेवाण चालूच होती. शिवाय घरबशा फोन (लँडलाईन) होताच की शेवटी.
तसं काहीच झालं नाही. कुणाचाही फोन आला नाही. मोबाईलवाचून माझं कसं चालेल, असं एकालाही विचारावंसं वाटलं नाही. कुणालाही सांत्वन करावं वाटलं नाही. म्हटलं चला, आपल्या नशिबीचं दुःख आपणच भोगलं पाहिजे.
फायबर कनेक्शनच्या कृपेनं घरात काही अडचण नव्हतीच. प्रश्न बाहेर पडल्यावरचा होता. म्हटलं चालायला गेल्यावर डाटा वापरू. होऊ दे दोन-तीन तासांत खर्च. फोन करायचा असेल, ते व्हॉट्सॲपवर बोलतील, असं वाटलं. तो विचार वेडगळपणाचा होता, हे घराबाहेर पडल्यावर लक्षात आलं. सिमकार्ड चालूच नसताना डाटा कुठून येणार होता! आडच नसताना पोहोरा कुठं टाकणार?
तास-दीड तास पायी चालताना दोन-तीन वेळा तरी फोन पाहिला जातो. त्याचं मुख्य कारण म्हणजे किती पावलं झालीत आणि किती राहिलीत, हा हिशेब करायचा असतो. रोजचं दहा हजार पावलांचं लक्ष्य आहे. (दि. बा. मोकाशी ह्यांचं ‘अठरा लक्ष पावलं’ असं पुस्तक आहे. तेवढं लक्ष्य सहा महिन्यांमध्ये पुरं होत असेल बुवा.) क्वचित कधी एकटा चालत असेन, तर डाटा चालू करून ‘विद्यापीठा’त काही नवीन (फॉरवर्डेड) परिपत्रकं पडलीत का, तेवढं पाहतो. कुणाचा फोन आलाच तर बोलतो.
फिरताना गप्पा मारायला जोडीदार असल्यानं फोन चालू नसल्याचं काही जाणवलं नाही. रात्रीही सहसा कुणी फोन करत नाही. बेरात्री झोपून बेसकाळी कधी तरी उठल्यावर पहिली झडप फोनवर मारायची, असला अगोचर प्रकार आपल्याकडून होत नाही. बऱ्याच वेळा जाग येते तीच मुळी फोन वाजत असल्यामुळे. रविवारी सकाळी ती शक्यता नसल्याने अंमळ उशिराच उठलो.
मोबाईल-विरह अजून दीड दिवस सहन करावा लागणार, हे माहीत होतंच. तेवढ्यात चेतन भगत ह्यांचा लेख वाचण्यात आला. ‘तुम्ही तुमचा स्क्रीन-टाईम कमी करताय ना?’ असं विचारणारा. लेखकमहोदय रोजचे पाच तास मोबाईल पाहण्यात घालवतात. तशी कबुली त्यांनीच दिली. मग आठवलं की, आपल्यालाही आठवड्याला अहवाल येतो. कधी वेळ वाढल्याचं दाखवणारी, तर क्वचित कधी आधीच्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचं सांगणारी. त्याची फार काळजी नाही करत. कारण त्यातला बराचसा वेळ मोबाईल इंटरनेट रेडिओवरची गाणीच ऐकवत असतो.
चेतन भगत ह्यांच्या लेखावरून एक गोष्ट आठवली - एका अमेरिकी कंपनीनं तीन वर्षांपूर्वी आयोजित केलेली स्पर्धा. मोठ्या बक्षिसाची. एक लाख डॉलरचं बक्षीस. स्पर्धा होती वर्षभर मोबाईलपासून लांब राहण्याची. त्यात भाग घेण्याची तयारी किमान दहा हजार लोकांनी दाखवली होती. किती जण स्पर्धेत उतरले, किती टिकले आणि कोण जिंकलं, हे काही नंतर पाहिलं नाही. फक्त त्यावर लेख लिहिला होता. अशा स्पर्धेत भाग घेऊन स्वतःला तपासावं असं तेव्हा वाटलं होतं. पण ‘व्हिटॅमिन वॉटर’ची ही ‘व्हिटॅमिन वॉटर स्क्रोल फ्री फॉर ए यीअर कॉन्टेस्ट’ फक्त अमेरिकी नागरिकांसाठीच होती.
मोबाईलला आधुनिक जगातली (स्मार्ट) सोय म्हटलं जातं खरं. पण वास्तव वेगळंच आहे. खूप जणांना आता त्याची लत लागल्यासारखी झाली आहे. व्यसन. न सुटणारं. सोडण्याचा प्रयत्न केला की, अजून घट्ट पकडून ठेवणारं.
सिमकार्ड बिघडल्याच्या निमित्तानं आपलंही व्यसन किती हाताबाहेर गेलंय किंवा अजून आटोक्यात आहे, ह्याचा अंदाज येईल म्हटलं. तसं तर दर अर्ध्या-पाऊण तासानं व्हॉट्सॲप उघडून पाहायचा चाळा लागलेलाच आहे. कुणाचा फोन आला नाही, तरी आपण कुणाला तरी लावतो.
कोणतंही व्यसन सोडताना मधला काळ फार खडतर जातो म्हणे. त्याला ‘विड्रॉअल सिम्प्टम्स’ म्हणतात. मोबाईल जवळ नसतो, त्याची कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसते तेव्हा जाणवणारी लक्षणे अशी - राग, तणाव, नैराश्य, चिडचिड आणि अस्वस्थता.
ह्यातलं एकही लक्षण रविवारी लक्षणीयरीत्या जाणवलं नाही, हे प्रामाणिकपणे सांगतो. अधूनमधून वाजणारा फोन एकदाही वाजत नव्हता. त्यामुळे क्वचित थोडं अस्वस्थ वाटलं खरं. पण आपलाच मोबाईल बंद आहे, हे पटवून घेतल्यानं ती अस्वस्थता संपली. न राहवून दोघा-तिघांना व्हॉट्सॲप कॉल केले. दोघांनी नंतर बोलू सांगितलं, तर दोघांनी फोनच उचलला नाही.
‘फोन बंद का?’ असं काळजीनं विचारणारे मेसेजही व्हॉट्सॲपवर दिसले नाहीत. मनाची समजूत घातली - आज रविवार असल्याने सगळे निवांत असतील. फोन बाजूला ठेवून आराम करत असतील. एका मित्राचा रात्री उशिरा मेसेज आला तसा. त्याला मग घरच्या फोनवरून सांगितलं सगळं. गप्पा मारल्या थोडा वेळ; पण सिमकार्ड कसं बंद पडलं वगैरेबद्दल त्यानं काडीचीही उत्सुकता दाखविली नाही. म्हटलं चला - बंद सिमकार्डाचा क्रूस प्रत्येकाला आपापलाच वाहून न्यावा लागतो तर.
फोन बंद असताना जगात उलथापालथ झाली तर काय, अशी शंकाही एकदा चाटून गेली. सुदैवानंच तसं काही झालं नाही. जग आपल्या गतीनं पुढं जात राहिलं.
अखेर सोमवार उजाडला. भीती वाटत होती की, सिमकार्ड बदलायला गेल्यावर भारत संचार निगमवाले काही तरी त्रुटी काढून परत पाठवतील. दोन दिवसांना या म्हणतील. तसं काही झालं नाही. गेल्यावर अर्ध्या तासात कार्ड बदलून मिळालं. दुपारचा झोपेचा रतीब संपल्यावर नवं कार्ड टाकलं. फोन चालू झाला. अठ्ठेचाळीस तासानंतर मी जगाशी पुन्हा जोडलो गेलो.
... पण जगाला त्याची काही खबरबातच नव्हती. फोन चालू होऊन तीन तास लोटले, तरी मला कुणाचाही फोन आला नाही!
एक झालं - सिमकार्ड आणण्याच्या निमित्तानं आज थोडा अधिकच ‘मोबाईल’ झालो. त्या कार्यालयात जाऊन-येऊन तीन हजार पावलं चाललो.
कुणी फोन करो किंवा न करो; फोन चालू आहे, म्हणजे मी जगाशी जोडला गेलेलो आहे, हा माझा (गैर)समज कायम आहे, एवढं नक्की!
......
‘लखपती बनविणारी स्मार्टफोन-मुक्ती’ -
https://khidaki.blogspot.com/2019/01/SmartPhone.html
टकमक टकमक का बघती मला?
रोज ठरल्यानुसार संध्याकाळी फिरायला चाललो होतो. ‘मॉर्निंग वॉक’ आपल्या नशिबात नाही. अरुणोदयाऐवजी सूर्यास्त पाहावा लागतो. संध्याकाळी तर संध्या...

-
श्रीकृष्ण करंडक पटकावणारा नगरचा कबड्डी संघ. इतके जवळ आणि तरीही फार दूर..! कबड्डी-कबड्डीचा दम घुमवत चढाई करताना पकड झाल्यावर आक्रमकाने मोठ्य...
-
'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्या...
-
मनुष्यप्राण्याला हसण्याची अद्भुत देणगी मिळालेली आहे म्हणतात. ह्या देणगीचं रहस्य शोधण्यासाठी खूप संशोधन झालं, चालू आहे. त्यातून काही निष्क...