Wednesday, 20 September 2023

सचिऽऽन, सचिऽऽन!

 विश्वचषकातील सर्वोत्तम - ४

(दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया - २००३)


‘शांतपणे खेळा’  हा  गांगुलीचा आदेश सचिन-सेहवाग जोडीनं धुडकावला. पण त्यामुळं कर्णधार रागावला नव्हता. पाकिस्तानी गोलंदाजाची पिटाई होताना पाहून तो हसत होता. ‘मी पेटलो आहे...भारतीय फलंदाजांचं काही खरं नाही,’  ही शोएब अख्तरची दर्पोक्ती सीमापार गेली. दक्षिण आफ्रिकेतील ह्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर सर्वोत्तम ठरला. दुखापतींवर विजय मिळवित आणि नेटमध्ये एकही चेंडू न खेळताही! 


स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक सचिनने सर गॅरी सोबर्स ह्यांच्याकडून स्वीकारलं.
(छायाचित्र सौजन्य : cricket.yahoo.net)
................................................

‘गणपती बाप्पा मोरया...’ किंवा ‘सचिssन सचिssन’ असा गगनभेदी गजर होत असतो, तेव्हा भारताचा क्रिकेट सामना चालू असतो, हे सांगण्याची गरज नाहीच. गजर स्टेडियममध्ये चालू असतो आणि टीव्ही.च्या माध्यमातून तो कोट्यवधी क्रिकेट रसिकांना रोमांचित करतो.

बरोबर २० वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या स्टेडियममध्ये ‘सचिssन सचिssन’ असे उत्साहाने ओरडणारे भारतीय प्रेक्षक हजर होते. भारतीय संघ स्पर्धेसाठी दाखल झाला, तेव्हा एका हिंदी वाहिनीची बातमी होती, ‘साऊथ आफ्रिका में सचिन का जादू चल गया...’ ही भविष्यवाणी होती आणि १०० टक्के खरी ठरणारी.

‘जपून खेळा, अशी सूचना मी सलामीच्या जोडीला दिली होती; विशेषतः सेहवागला. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला भक्कम सलामी आवश्यक होती. खेळपट्टी चांगली आहे; उगीच धोका पत्करण्याची गरज नाही, असं वीरूला सांगून मी म्हणालो होतो की, दहा षटकांनंतर आपण वेग वाढवू.’

‘...गंमत बघा. कर्णधाराच्या सूचनेची पार वाट लागली होती. आणि तरीही तो अभागी कर्णधार तक्रार करण्याऐवजी खिदळत होता. सचिन आणि सेहवाग ह्यांनी पाकिस्तानी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. पाचच षटकांत त्यांनी संघाचं अर्धशतक झळकावलं होतं!’

‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’मध्ये कर्णधार सौरभ गांगुलीनं ही मजेशीर गोष्ट सांगितली आहे. हा सामना अर्थातच २००३च्या विश्वचषक स्पर्धेतला. भारतानं सहा गडी व २६ चेंडू राखून सहज विजय मिळविला. सामन्याचा मानकरी होता ७५ चेंडूंमध्ये ९८ धावा करणारा सचिन तेंडुलकर.

सामना एकतर्फीच
शोएब अख्तर आणि तेंडुलकर सामना रंगण्याचं भाकित होतं. ते खोटं ठरवत सामना एकतर्फी झाला. शोएबचे चेंडू ज्या गतीनं येत, त्याच्या दुप्पट गतीनं सीमापार जात!

आफ्रिका खंडातील ही पहिली स्पर्धा ९ फेब्रुवारी ते २३ मार्च २००३ या दरम्यान रंगली. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया ह्यांनी ती आयोजित केली. त्यात सर्वाधिक १४ संघ सहभागी झाले. त्यामुळे सामन्यांची संख्या ५४ झाली. संघांची विभागणी दोन गटांत. गटवार साखळीनंतर प्रत्येक गटातून तीन संघ ‘सुपर सिक्स’साठी पात्र. त्यातील पहिले चार संघ उपान्त्य फेरीत, हे मागच्या स्पर्धेचं स्वरूप कायम होतं.

बलाढ्य दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड ‘सुपर सिक्स’साठी अपात्र ठरले. त्या ऐवजी झिम्बाब्वे संघ मात्र तिथपर्यंत गेला. कसोटी क्रिकेटसाठी पात्र नसतानाही उपान्त्य फेरीपर्यंत धडक मारणारा एकमेव संघ म्हणजे केनिया. त्याची कारणंही तशीच होती. झिम्बाब्वेतील मुगाबे सरकारचा निषेध म्हणून इंग्लंडने सामना न खेळता पुढे चाल दिली. न्यूझीलंडने सुरक्षिततेच्या कारणावरून केनियात खेळणं टाळलं.

सचिन पुढे, गांगुली मागे
स्पर्धेचा अंतिम सामना चालू असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम खेळाडूचं नाव जाहीर केलं – सचिन तेंडुलकर! गांगुलीला चार गुणांनी मागं टाकून तो सर्वोत्तम ठरला.

सचिनची कामगिरी होतीच तशी! एकूण ११ सामन्यांतील तेवढ्याच डावांत ७५४ चेंडू खेळून ६७३ धावा. स्पर्धेतील विक्रम. त्यात एक शतक व सहा अर्धशतकं. स्ट्राइक रेट ८९.२५, सरासरी ६१.१८. शिवाय दोन बळी व चार झेल.

धावांमध्ये सचिननंतर येतात, गांगुली (४६५), रिकी पाँटिंग (४१५) व अॅडम गिलख्रिस्ट (दोघेही ऑस्ट्रेलिया – ४०८). गिलख्रिस्ट स्ट्राइक रेटमध्ये मात्र सचिनहून सरस – १०५.४२.

‘बीस साल बाद’ अशी भारतीयांना वाटणारी आशा अंतिम सामन्यात फोल ठरली, तरी स्पर्धेवर छाप राहिली सचिनचीच. त्यानं एका शतकासह सलग चार अर्धशतकं झळकावली. अगदी शतकाच्या उंबरठ्यावर तो दोनदा बाद झाला.

पहिल्याच सामन्यात द नेदरलँड्सविरुद्ध भारताची फलंदाजी काही बहरली नाही. संघाच्या २०४ धावांमध्ये सचिनचा वाटा होता ५२. नंतरच्या सामना ऑस्ट्रेलियाशी. ब्रेट ली व जेसन गिलेस्पी यांच्यासमोर नांगी टाकणाऱ्या भारतानं जेमतेम सव्वाशे धावा केल्या. त्यात सर्वोच्च ३६ सचिनच्या आणि खालोखाल २८ हरभजनच्या. हा सामना कांगारूंनी सहज जिंकला.

हरारेतील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापासून सेहवाग-सचिन जोडी जमली. त्यांनी १७.४ षट्कांमध्ये ९९ धावांची सलामी दिली. सचिनच्या ८१ धावा झाल्या ९१ चेंडूंमध्ये. त्यात १० खणखणीत चौकार होते.

संघहित जपणारा सौरभ
इथे गांगुलीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. कर्णधार म्हणून त्यानं संघहिताचा जो विचार केला, त्याचं कौतुक करायला हवं. स्पर्धेसाठी संघ निवडताना सचिनची मधल्या फळीतला फलंदाज म्हणून निवड झाली. पण त्याची इच्छा होती सलामीला खेळण्याची.

गांगुली-सेहवाग ही डावखुऱ्या-उजव्या फलंदाजांची जोडी चांगली जमलेली होती. चौथ्या क्रमांकावर येणारा सचिन मधल्या फळीचा आधारस्तंभ असेल आणि डावाला आकार देईल, असं संघाच्या व्यवस्थापनाचं धोरण होतं.

पण सचिनच्या इच्छेला गांगुलीनं मान दिला. स्वतः मधल्या फळीत खेळणं त्यानं स्वीकारलं. सचिन-सेहवाग जोडी जमली. त्याचा त्यानं आत्मचरित्रात कौतुकानं उल्लेख केला आहे.

भरात असलेल्या सचिनचा दुबळ्या नामिबियाला फटका न बसता तरच आश्चर्य. त्याच्या (१५१ चेंडूंत १५२) व गांगुलीच्या शतकामुळं भारतानं मोठी धावसंख्या उभी केली. सचिनएवढ्याही धावा नामिबियाला करता आल्या नाहीत. सामन्याचा निर्विवाद मानकरी तोच ठरला.

त्यानंतर कॅडीक, अँडरसन, फ्लिंटॉफ ह्यांच्या माऱ्यापुढंही सचिननं अर्धशतक (५० धावा ५२ चेंडू) झळकावलं. डावखुऱ्या आशिष नेहराच्या सहा बळींमुळे इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला.

शोएबची दर्पोक्ती
महत्त्वाचा सामना होता एक मार्चचा. गाठ पाकिस्तानशी होती. ताशी १०० मैल वेगाचा पल्ला गाठलेला शोएब अख्तर फुरफुरत होता. आधीच्या दोन स्पर्धांमधील पराभवाचा वचपा काढण्याची खुमखुमी त्याला होती. सामन्याच्या आदल्या दिवशी तो म्हणाला होता, ‘मी पेटलो आहे. मला एकदा लय सापडली की, भारतीय फलंदाजांचं काही खरं नाही.’

सामन्यातलं चित्र उलटंच होतं. सईद अन्वरच्या शतकामुळे पाकिस्तानने सात गडी गमावून २७३ धावांची मजल मारली. वसीम अक्रम-अख्तर-वकार युनूस असा तोफखाना असल्यामुळंच कर्णधार गांगुलीनं ‘थोडं जपून’ खेळायला सांगितलं होतं.

पाचमध्येच पन्नास!
सेहवाग-सचिन वेगळ्या इराद्यानं मैदानात उतरले. अक्रमच्या पहिल्याच षट्कात दोन चौकार गेले. मिजाशीत असणाऱ्या शोएबच्या पहिल्या षट्कातील चौथा चेंडू थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि सचिनचा थर्ड मॅनवरून षट्कार. त्याच्या पुढचे दोन चेंडू सीमापार! षट्कात १८ धावा. त्याच्या जागी आलेल्या युनूसच्या षट्कातही ११ धावा फटकावल्या गेल्या. या जोडीनं पाचवं षट्क संपतानाचा संघाचं अर्धशतक पूर्ण केलं.

सचिनच्या बॅटचा हा तडाखा पाकिस्तानला आणि तोंडाळ शोएबला.
(छायाचित्र सौजन्य : thequint.com)
......................................................
सचिनची ही खेळी जबरदस्त होती. त्यानं अवघ्या ७५ चेंडूंमध्ये ९८ धावा केल्या. त्यात १० चौकार व एक षट्कार होता. उद्दामपणाची किंमत शोएबनं १० षटकांत ७२ धावा मोजून चुकविली! स्फोटक व निर्णायक खेळी करणारा सचिन सामन्याचा मानकरी होता. गटात दुसरा क्रमांक मिळवून भारत ‘सुपर सिक्स’साठी पात्र ठरला.

‘सुपर सिक्स’च्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतानं सहज विजय मिळविले. केनियाविरुद्ध सचिन व सेहवाग स्वस्तात बाद झाल्यानंतर गांगुलीच्या नाबाद शतकानं व युवराजच्या नाबाद अर्धशतकामुळं भारतानं सहा गडी राखून विजय मिळविला.


श्रीलंकेविरुद्ध शतक फक्त तीन धावांनी हुकलं.
(छायाचित्र सौजन्य : sachinist.in)
...........................................
श्रीलंकेविरुद्ध सचिन (१२० चेंडूंमध्ये ९७) व सेहवाग (७६ चेंडू, ६६ धावा) यांनी दीडशतकी सलामी दिली. श्रीनाथ, नेहरा व झहीर खान यांनी लंकेला १०२ धावांमध्येच गुंडाळलं. सलामीवीरांसह गांगुलीही अपयशी झाल्यानंतर महंमद कैफ व राहुल द्रविड यांच्या शानदार फलंदाजीमुळं न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय मिळाला.

केनियाविरुद्ध अष्टपैलू खेळ
उपान्त्य सामन्यात २० मार्च रोजी गाठ होती केनियाशी. सचिननं सेहवागला साथीला घेऊन पुन्हा एकदा ७४ धावांची भक्कम सलामी दिली. त्यानं ८३ धावा केल्या, तर गांगुलीनं पुन्हा एक नाबाद शतक झळकावलं. केनियाला १७९ धावांत गुंडाळण्यासाठी तेंडुलकरनं दोन बळी घेत हातभार लावला.

अंतिम सामन्याचा वेध घेताना ‘द गार्डियन’मध्ये माईक सेल्व्ही यानं लिहिलं होतं, ‘तेंडुलकरनं गेल्या काही आठवड्यांत अद्भुत कौशल्य दाखवून दिलं आहे. त्यात फक्त भक्कम बचाव नाही, तर मिड-ऑन व मिड-ऑफच्या क्षेत्ररक्षकांना उल्लू बनविणारे दिमाखदार ड्राइव्ह, शानदार फ्लिक आहेत.’

पाँटिंगचं नाबाद शतक
विजेतेपदाची लढत एकतर्फीच झाली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने फक्त २ गडी गमावून ३५९ धावा केल्या. ही स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या. गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन यांच्या शतकी सलामीनंतर तिसऱ्या जोडीसाठी कर्णधार रिकी पाँटिंग व डेमियन मार्टिन यांनी नाबाद २५४ धावांची भागी केली.

सचिन (एका चौकारासह चार) अपयशी ठरल्यानंतर भारताला जेमतेम २३४ धावांपर्यंत मजल मारता आली. सेहवागने ८१ चेंडूंमध्ये ८२ धावा केल्या. नाबाद शतकवीर पाँटिंग (१२१ चेंडूंमध्ये आठ षट्कार व तीन चौकारांसह १४०) याची सामन्याचा मानकरी म्हणून निवड झाली. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविणारा ऑस्ट्रेलिया दुसरा संघ ठरला. पूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ अपराजित राहिला आणि भारताने गमावलेले दोन्ही सामने कांगारूंविरुद्धचे होते!

अबाधित विक्रम
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी चुरस होती सचिन आणि सौरभ ह्यांच्यातच. केनियाविरुद्धच्या दोन बळींनी सचिन पुढे सरकला. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्यानं दुसऱ्यांदा नोंदविला. ह्या आधी भारतात १९९६मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं सात सामन्यांमध्ये ५२३ धावा केल्या होत्या. ह्या वेळी ६७३. त्याचा हा विक्रम अजून कोणाला गाठता आला नाही. मागच्या स्पर्धेत रोहित शर्मा त्या टप्प्यापासून पाव शतक दूर राहिला!

हा विक्रम झाला तो सचिन पूर्ण तंदुरुस्त नसताना! ‘इंडिया टुडे’च्या संकेतस्थळावर त्याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. सचिनच्या घोट्याला आणि गुडघ्याला दुखापत होती. त्यामुळे फलंदाजीसाठी मैदानात उतरताना त्याला पायाला पट्टी बांधावी लागे.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा चालू असताना सचिननं नेटमध्ये एकदाही फलंदाजी केली नाही. त्याच्या वाढदिवसानिमित्त पी. टी. आय. वृत्तसंस्थेला हरभजनसिंग ह्यानं जी मुलाखत दिली, त्यात ह्याचा उल्लेख आहे.

आपल्या ‘पा जीं’चं कौतुक करताना हरभजन म्हणाला, ‘स्पर्धा चालू असताना जावगल श्रीनाथ, आशिष नेहरा, झहीर खान, अनिल कुंबळे किंवा मी त्याला एकदाही नेटमध्ये गोलंदाजी केल्याचं आठवत नाही.’

सध्याच्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही ह्या आठवणीला दुजोरा देतो. ‘स्पोर्ट्सकीडा’ संकेतस्थळाशी बोलताना राहुल म्हणाला, ‘त्या विश्वचषक स्पर्धेत सचिन नेटमध्ये एकही चेंडू खेळला नाही. आम्हा सगळ्यांनाच प्रश्न होता, ‘तो असं का करतोय?’ त्याबद्दल मी विचारल्यावर तो म्हणाला, ‘मला सूर सापडलाय. नेटमध्ये तो घालवायचा नाही. माझी भावना खरी असेल तर मैदानात उतरल्यावर धावा होतीलच.’

सचिननं कोट्यवधी रसिकांना जिंकलं
महान अष्टपैलू खेळाडू गॅरी सोबर्स ह्यांच्या हस्ते सचिनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक देण्यात आलं. ह्या स्पर्धेचे कार्यकारी संचालक डॉ. अली बाकर ह्यांनी व्यक्त केलेली भावना बरंच काही सांगणारी आहे. ते म्हणाले, ‘हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट विश्वचषक व्हावा अशी आमची इच्छा होती. सचिनच्या शानदार फलंदाजीमुळे ह्या स्पर्धेने क्रिकेटजगतातील कोट्यवधी रसिकांना लोकांना मोहित केलं. ह्या सन्मानासाठी, कौतुकासाठी तो खरोखर पात्र आहे.’
.................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक2003 #दक्षिण_आफ्रिका #सचिन_तेंडुलकर #भारत #सौरभ_गांगुली #सेहवाग #शोएब_अख्तर #पाकिस्तान #राहुल_द्रविड #ऑस्ट्रेलिया #स्पर्धेतील_सर्वोत्तम #सुपर_सिक्स #सामन्याचा_मानकरी #धावांचा_विक्रम  

#CWC #CWC2023 #CWC2003 #ODI #South_Africa #Sachin_Tendulkar #India #Bharat #Sourav_Ganguly #Sehwag #Rahul_Dravid #Shoaib_Akhtar #Pakistan #Aurstralia #Allrounder #icc #Best_Player #super_six #MoM #run_record
.................

(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात  मे २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख अधिक माहितीसह आणि विस्तारित स्वरूपात.)
.................

आधीचा लेख इथे वाचता येतील - 

https://khidaki.blogspot.com/2019/06/WcupCrowe.html

https://khidaki.blogspot.com/2019/06/WC-Jaysurya.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/cwc-LanceKlusener.html
.................
मालिकेतील पुढच्या लेखांसाठी कृपया फॉलो करा...


Saturday, 16 September 2023

खणखणीत अष्टपैलू कामगिरी

विश्वचषकातील सर्वोत्तम - ३
(इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि द नेदरलँड्स - १९९९)

‘चोकर्स’  विशेषण द. आफ्रिकेच्या संघासाठी लावायला सुरुवात झाली ह्याच स्पर्धेपासून. कांगारूंविरुद्ध  बरोबरीत सुटलेल्या उपान्त्य सामन्यात त्यांचा हीरोच त्यांच्यासाठी व्हिलन ठरला! पण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचीच निवड झाली  - लान्स क्लूसनर. ‘झुलू’नं संपूर्ण स्पर्धेत अफाट अष्टपैलू खेळ केला. तडाखेबंद फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी. प्रतिस्पर्ध्यांना त्यानं चारी मुंड्या चित केलं होतं. 


निर्णायक क्षणी तडाखेबंद फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेचा
तारणहार बनलेला लान्स क्लुसनर. (छायाचित्र सौजन्य -icc-cricket.com)
---------------------------------------------------

‘चोकर्स’! दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी वारंवार वापरलं जाणारं हे विशेषण. त्याचा अर्थ काय? CHOKER ह्या एकवचनी शब्दाची Britannica Dictionaryमध्ये दिलेली व्याख्या अशी - 1. a necklace that fits closely around the neck. 2. informal : a person who fails to do something because of nervousness : a person who chokes.

थोडक्यात, निर्णायक क्षणी गळपटणारा, मोक्याच्या क्षणी दम कोंडणारा म्हणजे ‘चोकर’. अशा दम टाकणाऱ्यांचा समूह, संघ म्हणजे ‘चोकर्स.’ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे विशेषण लागलं १९९९च्या विश्वचषक स्पर्धेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा उपान्त्य सामना जिंकता जिंकता बरोबरीत सुटला आणि अंतिम सामना खेळण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. ते हताशपणे पाहण्याची वेळ आली, त्या वेळी मैदानात असलेल्या लान्स क्लुसनर ह्याच्यावर.

नायक आणि खलनायकही?
योग बघा, प्रामुख्याने क्लुसनरच्याच अष्टपैलू खेळामुळे त्याच्या संघाने इथवर झेप घेतली होती. नेमक्या वेळी, निर्णायक क्षणी संघानं कच खाल्ली, तेव्हा तोच होता त्याचा साक्षीदार. त्या अपयशाचं माप त्याच्या पदरात पुरेपूर घालण्यात आलं. नायक तो आणि काही प्रमाणात खलनायकही तोच!

इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि द नेदरलँड्स अशा पाच देशांनी आयोजित केलेली ही स्पर्धा १४ मे २० जून एवढा काळ खेळली गेली. दीर्घ काळानंतर इंग्लंडला यजमान बनण्याची संधी मिळाली. एकूण डझनभर देशांचा सहभाग असलेल्या ह्या स्पर्धेतूनच बांगला देश व स्कॉटलंड ह्या संघांचं पदार्पण झालं.

स्पर्धेचं स्वरूपही काहीसं बदललं. दोन गटांमध्ये साखळी सामने आणि प्रत्येक गटातील पहिले तीन संघ ‘सुपर सिक्स’मध्ये. अव्वल साखळीनंतर पहिल्या चार स्थानांवर आलेले संघ उपान्त्य फेरीत असं स्वरूप असलेल्या स्पर्धेत एकूण ४२ सामने झाले.

ह्या स्पर्धेची वैशिष्ट्यं काय? बरीच सांगता येतील. त्यातली महत्त्वाची अशी - पांढऱ्या ‘ड्यूक’ चेंडूचा वापर, बरोबरीत सुटलेला स्पर्धेतील पहिलाच सामना, नवा विश्वविजेता देण्याची चार स्पर्धांची खंडित झालेली पंरपरा, गट साखळीतील गुण ‘सुपर सिक्स’मध्ये पुढे नेण्याची पद्धत (पॉइंट्स कॅरी फॉरवर्ड), ‘अ’ गटामध्ये झिम्बाब्वेचे बलाढ्य भारत व दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध विजय.

क्लुसनर सर्वोत्तम
अंतिम सामना खेळण्याची हाता-तोंडाशी आलेली संधी ज्या संघानं गमावली, त्याच दक्षिण आफ्रिकेचा लान्स क्लुसनर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याची अष्टपैलू कामगिरी तेवढी खणखणीत होतीच मुळी. ‘अ’ गटातील साखळी सामन्यांमध्ये क्लुसनरच्या खेळामुळेच संघाला पराभवाच्या उंबरठ्यावरून विजयाच्या महाद्वाराकडे जाता आलं.

मधल्या फळीत खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येणाऱ्या डावखुऱ्या क्लुसनरने अफलातून खेळ केला. स्पर्धेत तो पहिल्यांदा बाद झाला ते ‘सुपर सिक्स’मधील न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत. गेविन लार्सनने त्रिफळा उडवून त्याला बाद करता येतं, हे दाखवून दिलं.

चौथा किंवा पाचवा गोलंदाज म्हणून क्लुसनरच्या हाती कर्णधार चेंडू द्यायचा. तिथंही त्यानं कमाल दाखवली. त्याच्या उजव्या हाती मध्यमगती गोलंदाजीने अवघड होऊ पाहणाऱ्या भागीदाऱ्या मोडून संघाला दिलासा दिला. सलग तीन वेळा आणि एकूण चारदा सामन्याचा मानकरी म्हणून त्याची निवड झाली.

हीरो होता ‘झुलू’
‘झुलू’ म्हणून ओळखला जाणारा क्लुसनर संघाचा हीरो होता. संकटकाळी धावून येणारा तरणाबांड, दमदार नायक. प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चित करणारा हीरो. फलंदाजीच्या सरासरीत तो अव्वल ठरला. संघाचे प्रमुख गोलंदाज अॅलन डोनाल्ड व शॉन पोलॉक ह्यांच्यापेक्षा जास्त बळी त्याच्या खात्यावर होते. खऱ्या अर्थानं त्यानं संघासाठी ह्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी बजावली.

क्लुसनरच्या अष्टपैलू खेळाची झलक गटातील पहिल्याच सामन्यात भारताविरुद्ध दिसली. चौथा गोलंदाज म्हणून चेंडू हातात पडल्यावर त्यानं सचिन तेंडुलकर, अर्धशतकवीर राहुल द्रविड व कर्णधार महंमद अजहरुद्दीन हे तीन महत्त्वाचे बळी मिळविले. फलंदाजीसाठी आठव्या क्रमांकावर येऊन त्याने चार चेंडूंमध्ये नाबाद १२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना चार गडी राखून जिंकला.

विश्वविजेत्या श्रीलंकेशी पुढचा मुकाबला होता. त्यांच्याविरुद्ध मिळविलेल्या ८९ धावांच्या विजयाचा मानकरी ठरला तो क्लुसनरच. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं ४५ चेंडूंमध्ये नाबाद ५२ (पाच चौकार व दोन षट्कार) फटकावल्या. नवव्या व दहाव्या जोडीसाठी तब्बल ७७ धावांची भर घातली. मग उपुल चंदन, चमिंडा वास व प्रमोदया विक्रमसिंघे ह्यांना त्यानं बाद केलं, ते फक्त २१ धावांचं मोल देऊन. सामन्याचा मानकरी? स्वाभाविकपणे तोच!

इंग्लंडविरुद्धची धमाकेदार खेळी
गटातील पुढच्या दोन्ही सामन्यांवर छाप होती क्लुसनरचीच. यजमान इंग्लंडवर १२२ धावांनी मिळविलेल्या दणदणीत विजयात त्याच्या नाबाद खेळीचं महत्त्व मोठं होतं. सातव्या क्रमांकावर येऊन त्यानं इंग्लिश गोलंदाजी पिटून काढली. त्याची धमाकेदार खेळी होती ४० चेंडूंतील ४८ धावांची. त्यात तीन चौकार व एक षट्कार. हा हल्ला चढवत त्यानं संघाची धावसंख्या समाधानकारक स्थितीत नेली. गोलंदाजी करताना सहा षट्कांमध्ये फक्त १६ धावा देऊन एक गडी बाद केला.


क्लुसनरची मध्यमगती गोलंदाजी भेदक ठरली.
(छायाचित्र ट्विटरवरून साभार)
केनियाविरुद्ध सात गडी व नऊ षट्कं राखून विजय मिळविताना लान्सच्या गोलंदाजीला धार चढली. सलामीवीरांनी ६६ धावांची भागीदारी करूनही केनियाला १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. टिकोलो, ओडुम्बे यांच्यासह पाच फलंदाजांचे बळी लान्सने मिळविले, ते साडेआठ षट्कांत फक्त २१ धावा मोजून. फलंदाजीला उतरण्याची वेळच त्याच्यावर आली नाही.

शेवटच्या साखळी सामन्यात मात्र दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेनं ठेवलेल्या २३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांची अवस्था सात बाद १०६ होती. क्लुसनरनं (५८ चेंडू, नाबाद ५२, ३ चौकार व २ षट्कार) दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या. संघाला विजय मिळवून देणं त्याला शक्य झालं नाही. पण त्यानं पराभवाचं अंतर खूप कमी केलं.

तारणहार
‘सुपर सिक्स’मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला हरवताना दक्षिण आफ्रिकेचा तारणहार बनला तो लान्स क्लुसनरच. विजयासाठी २२१ धावांचा पाठलाग करताना संघाची अवस्था दयनीय म्हणावी अशी झाली होती - सहा बाद १३५. समोर अक्रम, शोएब अख्तर, अजहर महमूद, सकलेन मुश्ताक असे बिनीचे गोलंदाज होते. त्या सामन्यात क्लुसनर आठव्या क्रमांकावर फलंदाजी आला. त्यानं कॅलिसबरोबर सातव्या जोडीसाठी ४१ आणि नंतर बाऊचरबरोबर नाबाद ४५ धावा जोडल्या.

क्लुसनरची खेळी होती ४१ चेंडू, नाबाद ४६, प्रत्येकी तीन चौकार व षट्कार. डावातील सेहेचाळिसाव्या षट्कात त्यानं शोएब अख्तरला मिडविकेटवरून षट्कार खेचला आणि लगेच फाईन लेगला चौकार मारला. त्या आधी गोलंदाजी करताना त्यानं एक बळी मिळविला आणि एका धावचितला हातभार लावला. तोच सामन्याचा मानकरी ठरला. पुन्हा एकदा!

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघनायकानं वेगळा निर्णय घेतला. त्यानं क्लुसनरला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. पण तिथं त्याला काही करता आलं नाही. स्पर्धेत तो पहिल्यांदाच बाद झाला, ते अवघ्या चार धावांवर. ती कसर त्याने दोन बळी घेऊन भरून काढली. हार पत्कराव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही क्लुसनर चमकला. त्याच्या २१ चेंडूंतील ३६ धावांमुळेच संघाला २७१ धावांची मजल मारता आली. रिकी पाँटिंगला बाद करून त्यानं शतकी भागीदारी केलेली चौथी जोडी फोडली.

कांगारूंशी बरोबरी
उपान्त्य फेरीत दक्षिण आफ्रिकेची गाठ पुन्हा कांगारूंशी पडली. बर्मिंगहॅम इथं १७ जून रोजी झालेला हा सामना विलक्षण रंगला आणि बरोबरीत सुटला. सरस गुणांच्या आधारे कांगारूंनी अंतिम फेरी गाठली.

विजयासाठी २१४ धावांचं लक्ष्य कॅलिस (५३) व जाँटी ऱ्होडस (४३) यांनी जवळ आणलं होतं. त्याच वेळी शेन वॉर्नने चार बळी घेऊन सामना चुरशीचा केला. आठव्या क्रमांकावर आलेल्या क्लुसनरने (१६ चेंडूंत नाबाद ३१) संघाला विजयाजवळ नेलं.


उपान्त्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्वप्नभंग.
(छायाचित्र सौजन्य - www.mirror.co.uk)
--------------------------------------
सामन्याचं शेवटचं षट्क बाकी आणि द. आफ्रिकेला विजयासाठी हव्या होत्या नऊ धावा. डॅमियन फ्लेमिंगच्या पहिल्या दोन चेंडूंना क्लुसनरनं सीमापार केलं. पण विजयासाठीची एक धाव धावताना गडबड होऊन डोनाल्ड धावबाद झाला! अंतिम सामन्याचं उघडलेलं दार धाडकन् बंद झालं. दक्षिण आफ्रिकेचा स्वप्नभंग!!

पश्चातबुद्धी...असो! 
त्या सामन्याची (नकोशी) आठवण काढताना क्लुसनर म्हणतो, ‘मी अस्वस्थ होतो. उतावीळपणा दाखवायला नको होता. थोडं थांबायला हवं होतं. पण ही पश्चातबुद्धी झाली. कदाचित पुढचे दोन चेंडू अचूक यॉर्कर पडले असते तर... असो!’

‘झुलू’ची ह्या स्पर्धेतली कामगिरी सर्वोत्तम होती, ह्यामध्ये संशय मुळीच नाही. एकूण नऊ सामन्यांमध्ये सहा वेळा नाबाद राहत त्यानं १४०.५ एवढ्या सरासरीनं आणि १२२.१७ स्ट्राईक रेटने २८१ धावा केल्या. संघाकडून सर्वाधिक १७ बळी त्यानेच घेतले; तेही २०.५८ अशा सरासरीने. प्रत्येक वेळी संघाच्या हाकेला ओ देऊन निर्णायक खेळ क्लुसनरने केला. त्यामुळेच तो सर्वोत्तम ठरला.

त्या स्पर्धेत बी. बी. सी. टेलिव्हिजनचे समालोचक होते ज्येष्ठ क्रिकेटपटू रिची बेनॉ. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून क्लुसनरची निवड करण्याचा निर्णय त्यांना पुरेपूर पटला होता. त्यांचं म्हणणं होतं, ‘प्रत्येक वेळी तो मैदानावर अशा आविर्भात उतरे की, वाटायचं हा सामना फिरवणार बरं. (ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या प्रसिद्ध सामन्यातील शेवटच्या षटकात) त्यानं डॅमियन फ्लेमिंगच्या चेंडूवर मारलेले ते दोन चौकार माझ्या डोळ्यांचं पारणं फेडणारे होते.’

लान्सची कामगिरी ११० टक्के
दिमाखदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ‘झुलू’बद्दल त्यांच्या संघाचे प्रशिक्षक बॉब वूल्मर म्हणाले, ‘‘संपूर्ण संघानं १०० टक्के कामगिरी बजावली; पण लान्सची कामगिरी ११० टक्के होती!’’ त्याच्या कामगिरीची दखल घेणाऱ्या ‘द गार्डियन’च्या लेखाचं शीर्षक मोठं बोलकं आहे - When Lance Klusener set the standard for cricketing all-rounders!
...............

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक1999 #दक्षिण_आफ्रिका #लान्स_क्लुसनर #झुलू #नायक_खलनायक #ऑस्ट्रेलिया #अष्टपैलू #स्पर्धेतील_सर्वोत्तम #चोकर्स #सुपर_सिक्स #ड्यूक_चेंडू #सामन्याचा_मानकरी #इंग्लंड #न्यूझीलंड #भारत #टाय #बॉब_वूल्मर  

#CWC #CWC2023 #CWC1999 #ODI #South_Africa #Lance_Klusener #Zulu #hero&villain #Aurstralia #Allrounder #icc #Best_Player #chokers #super_six #duke_ball #England #NewZealand #India #Bharat #tie_match #Bob_Woolmer
.................

(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात ३ मे २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख अधिक माहितीसह आणि विस्तारित स्वरूपात.)
.................
.................
आधीचा लेख इथे वाचता येतील - 

https://khidaki.blogspot.com/2019/06/WcupCrowe.html

https://khidaki.blogspot.com/2019/06/WC-Jaysurya.html
.................
मालिकेतील पुढच्या लेखांसाठी कृपया फॉलो करा...


Wednesday, 30 August 2023

विखे साहित्य पुरस्काराच्या पडद्याआड


विखे साहित्य पुरस्कार वितरण - २०२२. केरळचे तेव्हाचे राज्यपाल आरिफ महंमद खान, साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, डॉ. रावसाहेब कसबे ह्यांच्यासह
पुरस्कारप्राप्त सर्व लेखक आणि कलावंत. 
......................................................
नोकरीनिमित्त नगरमध्ये (१९८८) आलो, तेव्हा #साहित्य_संमेलनाचा वाद नुकताच कुठं थंड होऊ लागला होता. प्रवरानगरला होणारं साहित्य संमेलन रद्द झालं होतं. त्याबद्दल फार काही माहीत नव्हतं; तुरळक बातम्या वाचल्या होत्या. पुढे १९९६मध्ये नगरकरांनी - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोनई शाखेनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी आम्ही उत्सुक असल्याचं कळवलं. त्या विनंतीचा विचार झाला नाही. संमेलन आळंदीला झालं. त्या वेळी #‘लोकसत्ता’मध्ये ‘नगरी नगरी’ सदर लिहीत होतो. नगरकर असल्यामुळे संमेलन नाकारल्याचा स्वाभाविकच राग आला. मग ‘प्रवरेचं पाणी पचेना आणि मुळेचं पाणी रुचेना’ शीर्षकानं लिहिलं. ते वाचून खूश झालेल्या नामदेवराव देसाई ह्यांनी शाबासकी दिली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी #अहमदनगरला संमेलन झालं. ते भरपूर गाजलं. त्या संमेलनाच्या भरभरून बातम्या लिहिल्या.

‘सोनई’नं (थाटात) संमेलन घेतल्यावर, ‘प्रवरा’ मागं राहणार नाही, अशी अटकळ तेव्हा अनेकांनी बांधली होती. पण जुना अनुभव लक्षात घेऊन प्रवरा परिसरानं पुन्हा कधी साहित्य संमेलनाचं यजमानपद मिळावं म्हणून प्रयत्न केले नाहीत. दरम्यानच्या काळात प्रवरानगरला #साहित्य_पुरस्कार सुरू झाले. सहकारी साखर कारखानदारीचे जनक विठ्ठलराव विखे ह्यांच्या जयंतीदिनी - नारळी पौर्णिमेला, #‘पद्मश्री_विखे_साहित्य_पुरस्कार’ समारंभपूर्वक वितरित होऊ लागले. प्रा. रंगनाथ पठारे ह्यांना १९९३मध्ये हा पुरस्कार जाहीर झाला. हे लक्षात आहे दोन कारणांमुळं - माझी अगदी स्पेशल ओळख करून दिलेला, त्याच्याबरोबर चहा पिलेला आणि जेवण करण्याची संधी लाभलेला हा एकमेव मोठा लेखक. ‘केसरी’तील मित्र-सहकारी पद्मभूषण देशपांडे ह्यानं त्यांची ओळख करून दिलेली. दुसरं कारण म्हणजे त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली ‘हारण’ पूर्ण वाचलेली होती. चित्रपटीय वाटूनही ती आवडलेली! त्या वर्षी ठरवलं की, आवडत्या लेखकाला मिळणारा हा पुरस्कार पाहायला आणि त्याला ऐकायला जायचं. पण ते जमलं नाहीच.

‘लोकसत्ता’मध्ये रुजू झाल्यावर ह्या कार्यक्रमाला जायचं ठरवलंच. त्याचं कारण झालं #‘कोल्हाट्याचं_पोर’ला मिळालेला पुरस्कार. #ग्रंथालीच्या सुदेश हिंगलासपूरकर ह्यांनी आवर्जून ते घ्यायला लावलेलं. #डॉ._किशोर_शांताबाई_काळे ह्यांचं हे आत्मकथन फार आवडलं, चटका लावून गेलं. पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल आत्मीयता वाटावी अशा आणखी काही गोष्टी होत्या - लेखक नेरल्याचा. आमच्या करमाळा तालुक्यातलं गाव. त्याच गावी वडिलांनी अडीच-तीन वर्षं शिक्षक म्हणून नोकरी केलेली. डॉ. काळे ह्यांची मुलाखत घ्यायची ठऱवलं. त्यानुसार ती मिळालीही. सोबत होता अशोक तुपे. डॉ. काळे अगदी मनमोकळं बोलले. राज्य पातळीवरच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली ही त्यांची बहुतेक पहिलीच मुलाखत असावी. (त्या मुलाखतीला मला ‘बायलाईन’ मिळाली नाही आणि विशेष असूनही ती आतल्या पानात प्रसिद्ध झाली, ही अजून एक आठवण!) त्या कार्यक्रमाला प्राचार्य राम शेवाळकर आणि प्राचार्य डॉ. म. वि. कौंडिण्य उपस्थित होते. दोघांचीही भाषणं विलक्षण झाली. कोणाचं किती भाषण बातमीत घ्यायचं हे ठरवताना तारांबळ उडाली. पण दुसऱ्या दिवशी अंक पाहिल्यावर वाटलेलं समाधान सांगता न येणारं.

‘रुची’ आणि ‘नगरी नगरी’
त्यानंतरची पुढची चार-पाच वर्षं परिपाठ बनला. विखे साहित्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला जायचं. त्याची बातमी करायची. रात्री अशोक तुपे ह्याच्यासह आणखी काही मित्रांबरोबर मनसोक्त गप्पा मारायच्या. ते सारेच कार्यक्रम फार मनापासून ऐकले, त्याच्या बातम्या लिहिल्या. ह्याच पुरस्काराबद्दल एक गमतीची आठवण - पुरस्कारासंबंधीचं एक पत्र होतं. ते प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील ह्यांनाही मिळालं. त्यांनी त्या पत्रातल्या शुद्धलेखनाच्या-प्रमाणलेखनाच्या पाच-पंचवीस चुका काढल्या आणि ‘रुची’ मासिकाला पाठविल्या. मासिकाच्या मुखपृष्ठावरच ते पत्र प्रसिद्ध झालं! प्रसिद्ध लेखक-अनुवादक विलास गिते ह्यांनी तो अंक दिला आणि ‘नगरी नगरी’मध्ये त्यावर दणकून लिहिलं!

पुढे बातमी देण्याची जबाबदारी माझ्याकडून (का कुणास ठाऊक!) काढून घेतली. पण कार्यक्रमाला जाण्याचं सोडलं नाही. रजा टाकून कार्यक्रमाला जात होतो, ते थेट २००२पर्यंत. बातमी मला लिहायची नसली, तरी ती देणारा ‘लीड’बद्दल चर्चा करायचाच. पुण्याला बदली झाल्यामुळे प्रवरेच्या ह्या साहित्य संमेलनाला हजेरी लावणं खंडित झालं. आसाराम लोमटे ह्यांच्या ‘इडा पिडा टळो’वर विखे साहित्य पुरस्काराची मुद्रा उमटली, त्या वर्षी जायचं होतं. ते राहूनच गेलं...

कार्यक्रमाला जाणं थांबलं तरी त्याच्या बातम्यांकडे नेहमीच लक्ष असायचं. नारळी पौर्णिमेच्या काही दिवस आधी पत्रपरिषद घेऊन पुरस्कारांची घोषणा होई. निवडसमितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. रावसाहेब कसबे ह्यांचं नाव वृत्तपत्रीय टिप्पणीत असे. प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमध्ये त्यांनीच घोषणा केल्याचा उल्लेख असायचा. पुरस्काराच्या पहिल्या वर्षापासून डॉ. कसबे निवडसमितीत काम करीत आहेत. असा पुरस्कार देण्याची कल्पनाही काही अंशी त्यांचीच. समितीतील नावं बदलत गेली. पण पद्धत बदलली नाही. त्यामुळेच कुतूहल होतं की, ही समिती खरंच अस्तित्वात आहे की कागदोपत्री? समितीचे सदस्य पुस्तकं वाचून निवड करतात की कुणी तरी एक जण सांगतो आणि त्यावर सह्या होतात? संयोजक-यजमान म्हणून विखे कुटुंबीयांचा कोणा एखाद्याच्या नावासाठी, कोणत्या पुस्तकासाठी आग्रह असतो का?

दीर्घ काळ चाललेला उपक्रम
... असे सारे प्रश्न पडण्यात गैर काहीच नसावं. त्याची उत्तरं मिळवायची, तर निवडसमितीतल्या सदस्यांशीच बोलायला हवं. विखे साहित्य पुरस्काराचं यंदाचं तेहेतिसावं वर्ष आहे. साहित्यबाह्य संस्थेकडून असा एखादा उपक्रम एवढा दीर्घ काळ चालविला जाणं, हे फार महत्त्वाचं आहे. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे ह्यांनी ह्या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर कुठलाही खंड न पडू देता हा मोठा साहित्य उपक्रम त्याच थाटात चालू ठेवण्यात मंत्री राधाकृष्ण विखे ह्यांनी अजिबात हयगय केलेली नाही. मधली दोन वर्षं कोविडमुळं जाहीर कार्यक्रम झाला नाही. पण पुरस्कारांची नेहमीप्रमाणं घोषणा झाली आणि सर्वांना ते त्यांच्या घरी जाऊन सन्मानाने देण्यात आले. ह्या पुरस्कारांमध्ये आणखी काही गटांची दोन दशकांमध्ये भर पडली आहे. साहित्याबरोबर संस्कृतीशी, विशेषतः लोककला-लोककलावंतांशी नातं जोडण्यात आलं. म्हणूनच थोडं पडद्याआड डोकावून निवडसमितीतल्या सदस्यांशी बोलून ही सर्व प्रक्रिया नेमकी कशी चालते, ह्याची माहिती करून घ्यायचं ठरवलं.

वर म्हटल्याप्रमाणे डॉ. कसबे निवडसमितीचे अध्यक्ष आहेत. प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर निमंत्रक सदस्य म्हणून काम पाहतात. साहित्य अकादमी आणि मराठी भाषा समितीच्या कामात सहभागी असलेले डॉ. दिलीप धोंडगे आणि प्राचार्य एकनाथ पगार सदस्य म्हणून काम करतात. डॉ. कसबे सोडून ह्या तिन्ही सदस्यांशी बोलणं झालं आणि त्यातून ही प्रक्रिया समजून घेता आली.

‘‘समितीतल्या कुणाचाच कोणत्याच नावाबद्दल आग्रह नसतो. आम्ही सारे चर्चा करून एकमतावर येतो आणि मगच पुरस्कारविजेत्याचं नाव जाहीर होतं. एवढी साधी सोपी प्रक्रिया आहे ही,’’ असं प्रा. डॉ. दिलीप धोंडगे म्हणाले. वर्षभरात आमच्या चार-पाच बैठका होतात. प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचा आम्ही बारकाईने विचार करतो. वर्षभरात येणारी पुस्तकं प्रत्येक जण आपापल्या परीनं वाचतो, त्याची नोंद ठेवतो. यादी करतो. ती यादी बैठकीत ठेवली जाते. त्यातून निवड होते, असं त्यांनी स्पष्ट केलं. समिती कुणाकडून पुस्तकं मागवत नाही किंवा पुरस्कारासाठी ती पाठविण्याचं आवाहनही करीत नाही, ह्या मुद्द्यावर त्यांचा भर होता.

पुरस्कारांसाठी काही निकष असतीलच ना? प्रा. धोंडगे म्हणाले, ‘‘जीवनगौरव पुरस्कारासाठी नाव ठरवताना त्या लेखकाच्या पूर्ण कारकिर्दीचा, त्याच्या कार्याचा विचार केला जातो. एके काळी उत्तम काम करून जनतेला रिझविणाऱ्या आणि आता विस्मृतीत गेलेल्या लोककलावंताचा खास शोध घेतो आम्ही. विशेष ग्रंथ पुरस्कारासाठी त्या लेखकाचं योगदान, विशेष साहित्यकृती ह्याच विचार करतो. समाजप्रबोधनाचं काम करण्यात माणसांप्रमाणेच काही नियतकालिकं, संस्थाही पुढे असतात. त्यामुळे यंदा त्यासाठी ‘समाजप्रबोधन पत्रिका’ची निवड झाली.’’

पुरस्काराआधी संमती
बैठकांनंतर अंतिम निकाल तयार झाल्यावर तो डॉ. रावसाहेब कसबे ह्यांच्यापुढे ठेवला जातो. त्यांचंही वाचन असतंच. पुरस्काराची घोषणा करण्याआधी ते संबंधित व्यक्तीशी आम्हा सगळ्यांच्या साक्षीनं दूरध्वनीवरून संपर्क साधतात आणि तिची संमती घेतात. तिच्यासाठी हा सुखद धक्काच असतो. कुणी निवड केली, हा प्रश्न समोरून हमखास येतो आणि मला वाटतं, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, असंही प्रा. धोंडगे म्हणाले.

प्रा. धोंडगे ह्यांच्या मते हा नगर जिल्ह्यातील अतिशय उत्तम उपक्रम आहे. साहित्यिक-सांस्कृतिक भरणपोषण करण्यासाठी हा पुरस्कार मोलाचं काम करीत आहे.

प्रा. एकनाथ पगार ह्यांचंही म्हणणं काही वेगळं नाही. ह्या समितीत विनादडपण काम करण्याचा आनंद ते काही वर्षांपासून उपभोगत आहेत. योग्यता हाच सर्वांत महत्त्वाचा निकष आम्ही लावतो, असं सांगून ते म्हणाले, ‘‘जीवनगौरव पुरस्कारासाठी नाव शोधताना आम्ही त्या लेखकाची समाजाशी आणि साहित्य-कलांशी असलेली निष्ठा, नाते पाहतो. त्याच्या कामामुळे प्रगतिशील समाज निर्माण होण्यास मदत होते आहे आणि त्याच्याकडून उद्बोधनाबरोबरच प्रेरणा मिळते, हेही बघतो. वाङ्मयकृती निवडताना ती त्या वर्षातील अतुलनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण असावी, हाच आमचा आग्रह असतो. विचारदर्शन, तत्त्वचिंतन, समीक्षा, ललित... असं कोणतंही बंधन त्यासाठी नाही.’’

वाङ्मयीन मूल्यांचा-जीवनमूल्यांचा मिलाफ

निवडसमितीच्या कार्यपद्धतीबद्दल प्रा. पगार ह्यांनी विस्तारानं माहिती दिली. (कै.) विठ्ठलराव विखे ह्यांनी हयातभर केलेल्या कामाचा संदर्भ निवडसमिती मानते, असं स्पष्ट सांगून ते म्हणाले, ‘‘सर्वच सदस्यांनी वर्षभर पुस्तकं वाचणं, वाचलेल्या पुस्तकांची यादी करणं, परस्परांशी चर्चा अशा पद्धतीनं काम चालतं. आमच्या बैठकांमध्ये लेखक किंवा साहित्यकृतीचं वैशिष्ट्यं सांगितलं जातं. वाङ्मयीन मूल्ये आणि जीवनमूल्ये ह्यांचा मिलाफ आम्ही जाणीवपूर्वक पाहतो. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात, त्या विठ्ठलराव विखे पाटील ह्यांच काम गोरगरीब समाज, शेतकरी, कामकरी, मजूर ह्यांच्यासाठी होतं. त्या वर्गाशी नातं दृढ करणाऱ्या लेखक, कलावंत ह्यांचा विचार होतोच. आमच्या निवडीमध्ये हा घटक निश्चित असतो. सहकार, कृषिउद्योग विकास ह्याच्याशी निष्ठा असलेल्या लेखकाच्या बाजूनं सामान्यत: पारडं झुकतंच.’’

यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ समीक्षक निशिकांत ठकार आहेत. त्यांच्याबद्दल अगदी भरभरून बोलताना प्रा. पगार म्हणाले, ‘‘ठकार सरांचं सगळं काम हिंदीतील साहित्य मराठीत आणणं आणि आणि मराठीतलं साहित्य हिंदी वाचकांपर्यंत नेणं असं आहे. इतकी वर्षं अतिशय ताकदीने ते हे काम करीत आले. शिवाय उत्तम समीक्षक आहेत. अनुवाद म्हणजे भाषिक देवघेवीचं सांस्कृतिक कार्य आहे. त्यांच्या कामामुळे आपल्या जीवनाच्या कक्षा विस्तारित होण्यास मोठी मदत होते.’’

‘‘निवडसमितीत इतकी वर्षं काम करतो आहे, कारण मला त्यातून आनंद मिळतो. वर्षभर वाचत राहतो, मराठीतले महत्त्वाचे लेखक त्यामुळे कळतात,’’ अशी भावनाही प्रा. पगार ह्यांनी व्यक्त केली.

निमंत्रक असलेले प्रा. डॉ. सलालकर समितीतील वयाने सर्वांत लहान सदस्य. पुन्हा ते लोणीच्या महाविद्यालयात काम करीत असलेले. पण ‘ते तटस्थ आणि साहित्याचे उत्तम अभ्यासक आहेत,’ असं प्रा. धोंडगे अगदी आग्रहानं सांगतात आणि त्यांच्या निरपेक्षपणाची ग्वाहीच देतात.

सात्रळ महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. सलालकर ह्यांच्याकडे प्रा. शंकर दिघे ह्यांचं लक्ष गेलं. प्रसिद्ध लेखक अरुण साधू ‘पायोनीअर’ ग्रंथाचं काम करीत होते, तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी ह्या तरुण प्राध्यापकावर सोपविण्यात आली. ते साहित्याचे अभ्यासक असल्याचं प्रा. दिघे ह्यांनी एव्हाना ओळखलं आणि त्यांना निवडसमितीच्या बैठकीला येण्यास त्यांनी सांगितलं. त्यानंतर २००७पासून ते काम करीत आहेत.

निवडसमितीचे सदस्य आणि संस्थेशी संबंध ह्यामुळे डॉ. सलालकर ह्यांना खूप काही माहिती आहे. त्याबद्दल ते दिलखुलासपणे सांगतात, ‘‘निवडसमितीचं काम निरपेक्षपणे चालतं. सर्व सदस्य प्रसिद्धिपराङ्मुख आहेत. कुणालाही चमकोगिरी करण्याची सवय नाही. शक्य तेवढं चांगलं निवडण्याचा प्रयत्न असतो. ‘हे पुस्तक बघा, ते वाचून पाहा’, असं आम्ही एकमेकांना सुचवतो. अनेकदा असं घडलं की, आमच्याकडे पुस्तकं आलेली नसतातच. आमच्यापैकी कुणाच्या तरी वाचनात ती येतात. मग तो सदस्य बैठकीत ते ठेवतो. इतर सदस्य वाचतात आणि पुरस्कार मिळतो.’’

...पारडं स्वाभाविकच झुकतं
डॉ. सलालकर म्हणाले, ‘‘आमचं सर्वांचं व्यक्तिगत वाचन भरपूर आहे. वर्षभर आमचा संवाद चालूच असतो. नवीन काही दिसलं-पाहिलं-वाचलं का, हाच त्या संवादातला मुख्य मुद्दा असतो. आमच्या बैठकी खेळीमेळीत होतात. वाङ्मयीन दर्जा महत्त्वाचा आम्ही मानतोच; पण सर्वांत महत्त्वाचा ठरतो तो जीवनविषयक दृष्टिकोण. पद्मश्री विखे पाटील ह्यांनी केलेलं काम आमच्यापुढे आहेच. त्यामुळे बहुजनांच्या दबलेल्या आवाजाला वाचा फोडणाऱ्या लेखकाकडं आमचं पारडं स्वाभाविकपणे झुकतं.’’
 
पुरस्कारांना आता तीस वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. एवढ्या वर्षांत विखे कुटुंबीयांचा काही तरी हस्तक्षेप झाला असेल? कुणासाठी तरी त्यांनी शिफारस केली असेल? निवडसमितीतलं तिन्ही सदस्य ह्याबाबत ठामपणे नकारार्थी बोलतात. प्रा. सलालकर म्हणाले, ‘‘विखे कुटुंबातील कोणी कसली शिफारस केल्याचं मला आठवत नाही. अमक्यालाच पुरस्कार का दिला, तमक्याचं नाव का नाही, असं आम्हाला कुणीही कधीही विचारलं नाही. आम्ही निर्णय घेतो, माध्यमांमध्ये जाहीर करतो आणि मग विखे कुटुंबीयांना कळवतो. कुणाच्या शिफारशीमुळे पुरस्कार मिळत नाही, हा संदेश डॉ. कसबे ह्यांनी अचूकपणे दिलेला आहे.’’

हस्तक्षेप? अजिबात नाही!
‘‘हस्तक्षेप? अजिबात नाही! शिफारस नाही, नाव सुचवणं नाही - सरळ नाही किवा आडवळणाने नाही. काहीही नाही. ही आमच्या दृष्टीने आनंददायी गोष्ट. समिती निर्णय घेईल, हे त्यांचं मत. निवडसमितीला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे,’’ असं प्रा. धोंडगे म्हणाले. अगदी तसंच मत व्यक्त करीत प्रा. पगार म्हणाले, ‘‘कुणाचाही, कुठल्याही पातळीवर हस्तक्षेप नसतो. पुरस्कारासाठी पुस्तकं मागविली जात नाहीत किवा शिफारशी मागविल्या जात नाहीत. महत्त्वाचं काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घ्यायची, हाच मुख्य उद्देश आहे.’’

महाराष्ट्रात दर वर्षी विविध साहित्य संमेलनं होतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दर खेपेला नवीन वाद जन्म घेतो. अशी लाखो रुपयांची उधळपट्टी करून संमेलन घेण्यात अर्थ नाही इथपासून ते संमेलन ही मराठी भाषेची-महाराष्ट्राची विशेष ओळख आहे, ती व्हायलाच हवीत, अशी मतं हिरीरीनं मांडली जातात. संमेलन आयोजित करण्याचा एक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर प्रवरानगर परिसर त्या वाटेकडं पुन्हा गेला नाही. पण विखे साहित्य पुरस्काराच्या निमित्तानं तिथं एक परंपरा सुरू झाली आहे. ती तीस वर्षं अखंड चालू आहे. हे एक छोट्या प्रकारचं संमेलनच म्हणायला हवं. कारण तिथे लेखक दिसतात, दर वर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण ऐकायला मिळतं. सामान्य वाचकाला ह्यापेक्षा अधिक काय हवं असतं?
----------
#विखे_साहित्य_पुरस्कार #साहित्य_संमेलन #विठ्ठलराव_विखे #प्रवरा_परिसर #कोल्हाट्याचं_पोर #रंगनाथ_पठारे #रावसाहेब_कसबे #विखे_कुटुंबीय #जीवनगौरव_पुरस्कार #विखे #ग्रंथाली #नगरी_नगरी #नगर

---------------
(अशा लेखांचे दुवे इ-मेलवर मिळण्यासाठी कृपया Follow करा, ही विनंती.)

Saturday, 19 August 2023

भेट त्याची-माझी...


तुमच्या-माझ्या आयुष्यात अनेक #खोट्या_वाटणाऱ्या_खऱ्या_गोष्टी घडतात. चालता चालता अनुभव येतो. पण ह्या गोष्टी प्रत्येक वेळी त्या सांगितल्या जातातच, असं नाही. काही वेळा वाटतं, ‘कशाला कुणाला सांगायचं? विश्वास नाही बसणार. जाऊ द्या.’ काही वेळा त्या विसरून जातात. काही मात्र, का कुणास ठाऊक, लक्षात राहतात. तसा अनुभव पुनःपुन्हा येतो. आणि मग ते सांगितल्याशिवाय राहावत नाही.
 
कारण काहीच नव्हतं. पण अलीकडेच ‘त्याची’ आठवण आली. सहज. चालत असताना त्यानं दिलेले दोन अनुभव आठवले.  बऱ्याच दिवसांत त्याचं दर्शन घडलं नाही, हे अचानक लक्षात आलं. त्याची भेट घडणार होती किंवा ठरावीक काळानं दिसतो, असं काही नाही. योगायोग बघा, त्यानंतर काही दिवसांतच तो भेटला.

स्वातंत्र्यदिनी कार्यक्रम होता. मित्र, स्नेही, ओळखीची मंडळी भेटतात म्हणून त्या कार्यक्रमाला गेलो. रेंगाळलो होतो. बरेच जण भेटत होते. ख्याली-खुशाली विचारली जात होती. मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो टिपले जात होते. पुन्हा भेटण्याचे वायदे केले जात होते.

तेवढ्यात तो समोर आला. दोन्ही हात जोडून नमस्कार करीत आणि चेहऱ्यावर ओळखीचं लाघवी हसू आणत म्हणाला, ‘‘साहेब नमस्कार. लय दिवसांनी भेटलात.’’

हा इसम कोण आहे, हे लक्षात यायला थोडा वेळच लागला. तेवढ्यात तो म्हणाला,   ‘‘मी नाव विसरलो बघा तुमचं.’’ मग सहज आढळणाऱ्यांतली दोन-तीन आडनावं घेऊन त्यानं खडा टाकला. त्याचा अंदाज काही बरोबर आला नाही. पण जवळपास पोहोचला. त्यालाच होकार देऊन टाकला.

ओळख असल्याचं मी मान्य करतोय, हे लक्षात आल्यामुळे धीर चेपला त्याचा. थोडं अधिकच जवळ येऊन बोलायला लागला. त्यामुळे त्याच्या तोंडाचा ‘वास’ आला. ट्यूब पेटली...अरे तोच हा!

दोन्ही हातांमध्ये माझा हात आदराने घेऊन त्याची टकळी सुरू झाली. ‘‘आपली बहीण हितंच काम करती. ती बघा त्या तिकडे आहे...’’ कार्यक्रमाच्या यजमान संस्थेशी जवळीक दाखवून तो विश्वासार्हता सिद्ध करू पाहत होता.

तीन-चार वर्षांपूर्वीची संध्याकाळ. फिरून घरी परत चाललो होतो. दहा हजार पावलांच्या लक्ष्यापैकी बऱ्यापैकी अंतर चालून झालेलं. पण बाकी असलेलं अंतरही अगदीच कमी नव्हतं. आपल्याच नादात चालत होतो. रस्त्यातल्या एका पेट्रोल पंपाच्या जवळ मोटरसायकल उभी करून फाटकासा तरुण उभा होता. त्याचा अवतार पाहून वाटावं की, बिचारा दिवसभर काम करून पार दमलाय. अतिशय अदबीनं त्यानं हाक मारली,  ‘नमस्कार सर... ओळखलंत का?’ त्यानं स्वतःचं आडनाव (पुन्हा तेच. सगळीकडे सहज आढळणारं) सांगितलं, महापालिकेत कामाला आहे असंही म्हणाला. जुनी ओळख असल्यासारखा आणि रोज नाही, पण नियमित भेटत असल्यासारखा संवाद होता त्याचा. मग मी कुठे काम करतो, ह्याचा अंदाज बांधायला लागला.

एवढ्या जवळिकीनं बोलतोय म्हटल्यावर वाटलं, असेल कुठे तरी ओळख झालेली. मग सांगितलं त्याला की, आता अमूक अमूक करतोय. आधीच्या ऑफिसात नाही आता. तोच धागा पकडून तो चटकन् म्हणाला, ‘‘तरीच बरं का. परवा मी ऑफिसात जाऊन आलो, तर तुम्ही दिसला नाहीत! चौकशी केली मी तुमची तिथं. पण कुणी काही नीट सांगितलं नाही.’’

हे ऐकल्यावर वाटलं, नक्कीच ओळखीचा आहे बरं  हा. तशा खुणा माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या त्याला दिसल्या असतील का? बहुतेक. कारण लगेच म्हणाला, ‘‘पेट्रोल संपलं गाडीतलं. नेमके पैसे नाहीत आज. महिनाअखेर आहे ना. तीस-एक रुपये द्या, आतापुरते.’’ खिशात पाकीट नव्हतं. पण असावेत म्हणून शर्टाच्या खिशात ठेवलेली विसाची एक नि दहाची एक नोट होती. त्या दिल्या. तो खूश झाला. नमस्कार करीत निरोप घेताना म्हणाला, ‘दोन दिवसांत ऑफिसांत आणून देतो बघा...’

आता हा कुठल्या ऑफिसात पैसे परत आणून देणार, ही शंका त्या क्षणी आली नाही. पाच मिनिटं पुढं चालत आल्यावर ते लक्षात आलं. मनाशीच म्हणालो, असो!

मग बरेच दिवस गेले. तो लक्षातून गेला. असं कुणी फसवलं हे आत कुठं तरी दडून बसलं. रक्कंम फार नव्हती. फक्त ३० रुपये.

पण तो पुन्हा भेटणार होता. आमच्या दोघांच्या नशिबात परस्परांच्या भेटी लिहिलेल्याच जणू. पुन्हा तशीच एका संध्याकाळ. नेहमीप्रमाणंच चालण्यासाठी बाहेर पडलो होतो. एका चौकात अचानक तो समोर आला. त्याच अदबीनं हाक. तीच ओळख दाखवण्याची पद्धत. तसाच लीनपणे नमस्कार. तोच नाव-आडनावाचा खेळ. स्वतःची तीच ओळख पटवून देणं...

एव्हाना अंदाज आला होता. तो खरा ठरवत त्यानं ह्या वेळी ५० रुपयांची मागणी केली. जवळ गाडी नव्हती. त्याला एक अत्यावश्यक औषध घेऊन रिक्षानं घरी जायचं होतं. पाकीट कुठं तरी हरवलेलं किंवा फार गर्दी नसलेल्या रस्त्यावरही मारलेलं. औषधाची एकच गोळी घेऊन त्याला घरच्या कुणाची तरी तातडीची गरज भागवायची होती.

अक्कलखाती जमा केलेल्या ३० रुपयांची एंट्री पुन्हा वर आली. हा गडी ‘सराईत’ आहे, हे लक्षात आलं. त्याला नकार देऊन पुढे चालू लागलो. ‘साहेब, साहेब...’ अशा हाका मारत तो चार पावलं मागे मागे आला. मग थांबला.

दोन्ही वेळा त्यानं स्वतःचं आडनाव एकच सांगितलं होतं. आणि नोकरीचं ठिकाणही! खरंही असेल ते. कारणं मात्र वेगळी. सहज पटतील अशी.

त्या भेटीलाही दोन वर्षं सहज उलटून गेली असावीत. पण कशी कुणास ठाऊक ‘त्याची’ त्या दिवशी अचानक आठवण झाली. तो पुन्हा भेटलं, तर काय सांगायचं, हेही मनाशी ठरवलं. तो पुन्हा भेटेलच, असं कशावरून? पण तसं वाटत होतं खरं.

...आणि वाटलं ते खरं ठरलं. आठवण झाल्यानंतर महिनाभरातच तो दिसला. भेटला. एकदम समोर येऊन. वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखी सलगी दाखवत.

तो बोलत होता. आपली ओळख किती घट्ट आहे, ते पटवत देऊन पाहत होता. त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडत म्हणालो, ‘‘अरे, ओळखतो ना मी तुला. चांगलं ओळखतो. तुला दोन वेळा पैसे दिले होते. एकदा त्या अमूक तमूक ठिकाणी दीडशे रुपये पेट्रोलला आणि मग नंतर इथं इथं १०० रुपये. अडीचशे रुपये दिलेत की मी तुला.’’

मी एकदा नव्हे, तर दोन वेळा पैसे दिल्याचं ठिकाणाचा दाखला देत सांगताच तो एकदम सर्दावला. सलगी दाखवताना दिसणारा आत्मविश्वास एकदम गेला. तो गरीब बापुडा झाला. हे बोलायचं ठरवलं मागं, तेव्हा वाटलं होतं की, तो पैसे घेतल्याचं मान्यच करणार नाही. तो अंदाज मात्र चुकला. पैसे घेतल्याचं लगेच मान्य करून म्हणाला, ‘‘हो साहेब. दिले तुम्ही पैसे. दोनदा दिलेत.’’

‘‘परत देतोस ना आता? एवढ्या दिवसांनी भेटला आहेस, तर देऊन टाक लगेच!’’ ह्या मागणीनं तो अधिकच खचला. ‘आत्ता नाहीत ना पैसे,’ म्हणत मागं मागं सरकू लागला.

तेवढ्यात कुणी तरी ओळखीचं आलं. त्याच्याशी हात मिळवत होतो. त्याचा फायदा घेत तो दिसेनासा झाला. न मिळालेल्या २२० रुपयांचं ओझं घेऊन गायब झाला. त्या छोट्याशा जागेतील मोजक्या गर्दीत ‘तो’ जणू विरघळून गेला...
................

(चित्रांचं सौजन्य : www.dreamstime.com)
................

#खोट्या_वाटणाऱ्या_खऱ्या_गोष्टी #भेट #अनुभव #पैसे #तो #संध्याकाळ #चालता_चालता #अनुभव

................

(अशाच लेखनासाठी कृपया  Follow करा, ही विनंती)

Friday, 4 August 2023

महानोर आणि ‘संवाद’

 


(छायाचित्र आंतरजालावरून साभार)

सकाळी उठल्यावर सहज टीव्ही. चालू केला आणि पहिलीच बातमी कानी पडली ती निसर्गकवी ना. धों. महानोर ह्यांच्या निधनाची. ती ऐकल्यावर एक गोष्ट लगेच आठवली. त्यांच्याशी झालेल्या फोन-संवादाची.

गोष्ट जुनी आहे. साधारण १४-१५ वर्षांपूर्वीची. महिना होता डिसेंबरचा. ‘लोकसत्ता’च्या ‘मराठवाडा वृत्तान्त’मध्ये पहिल्या पानावर रोज एक लेख प्रसिद्ध केला जाई.  सदराचं नाव होतं ‘संवाद’.

हे सदर माझ्या फार आवडीचं. कारण रोजच्या कामाची सुरुवातच मुळी लेखाच्या संपादनानं होई. नवं असं काही वाचायला मिळण्याचा आनंद वेगळाच! रोज नवा लेखक. ‘मराठवाडा वृत्तान्त’च्या ‘संवाद’मध्ये लिहिण्याला प्रतिष्ठा होती. थोडी अतिशयोक्ती करायची, तर त्यासाठी थोडी स्पर्धाही होती हौशी लेखक-कवींमध्ये. कारण विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये ते लेखन जाई. जिल्हानिहाय वेगळी आवृत्ती आणि काही तालुक्यांसाठी उपआवृत्ती  असण्याच्या काळात हे थोडं दुर्मिळच होतं.

त्या वर्षीसाठी जवळपास पाच-सहा लेखक निश्चित झाले होते. शेवटची एक-दोन नावं ठरवायची होती. त्यातलं एक नाव तरी बिनीचं हवं होतं. सहज मनात आलं, ना. धों. महानोर लिहितील? होतील सहजासहजी तयार? प्रयत्न तर करू, असं म्हणत त्यांचा क्रमांक मिळवला. तो बहुतेक त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणाचा तरी असावा. दोन-तीन वेळा प्रयत्न केला; पण त्यावरून त्यांच्याशी संपर्क होतच नव्हता.

पण तो योग लिहिलेला असावा. त्या दिवशी दुपारी सहज क्रमांक फिरविला आणि पलीकडे साक्षात महानोर होते! त्यांना ओळख करून दिली. सदराविषयी सांगितलं आणि म्हणालो, ‘‘ह्या वर्षी तुम्ही सदरासाठी आठवड्यातील एक दिवस लिहावं, अशी फार इच्छा आहे. आमची विनंती आहे...’’

दुसऱ्याच क्षणी पलीकडून उत्तर आलं, ‘‘लिहीन की. आवडेल मला.’’ 

ना. धों. ह्यांनी बहुतेक ह्या सदराबद्दल ऐकलं होतं. वाचण्यातही आलं असणार त्यांच्या. आधी कुणी कुणी लिहिलंय ह्यातली दोन-चार नावं त्यांना माहीत असावीत. त्यांचा होकार ऐकला आणि फार मोठी उडी मारल्याचा आनंद झाला.

वरिष्ठांच्या दालनात त्या दिवशीच्या बातम्यांची चर्चा चालू होती - बहुतेक ‘पुणे वृत्तान्त’ची. तिथे गेलो आणि सांगितलं,  ‘‘शेवटचं नाव पक्कं झालं. महानोर! लिहायचं मान्य केलं त्यांनी!!’’

तिथेही क्षणभर सन्नाटाच. महानोर ह्यांच्यासारखा अतिशय प्रसिद्ध कवी-लेखक विभागीय आवृत्तीसाठी लिहायला तयार झाला, ही खरंच मोठी गोष्ट होती. भानावर येऊन एका सहकाऱ्यानं विचारलं, ‘‘तुमची नि महानोरांची एवढी ओळख आहे, सांगितलं नाही कधी!’’

ओळख? श्री. महानोर ह्यांच्याशी  पहिल्यांदाच बोललो होतो. तरीही त्यांनी लिहिण्याचं मान्य केलं होतं. मानधन किती, कोणत्या दिवशी वगैरे काही चौकशी न करता ते होकार देते झाले. त्याचं साधं-सोपं कारण मला वाटलं होतं, तेच सांगितलं - ‘लोकसत्ता’ नावाची पुण्याई! म्हणून तर ओळख नसताना पहिल्या फटक्यात त्यांनी माझी विनंती मान्य केली होती.

नवं वर्षं उजाडलं आणि महानोरांचं लेखन चालू झालं. ते बहुतेक सांगत असावेत आणि कुणी तरी लिहून घेत असावं. कारण माझ्याकडे जो मजकूर येई, त्याचा ओघ लिहिण्याचा नव्हता, तर बोलण्याचा होता. इतर लेखकांना जेवढं मानधन होतं, तेवढंच श्री. महानोर ह्यांना मिळत असे. त्याबद्दल त्यांनी कधीही चौकशी केली नाही किंवा ते मिळायला उशीर झाला, तर तक्रार केली नाही.

नंतर का कुणास ठाऊक मे किंवा जूनमध्ये श्री. महानोर ह्यांनी आपला मोहरा जळगावच्या साहित्य संमेलनाकडे (१९८४) वळवला. त्याच्या स्वागत किंवा संयोजन समितीत ते होते. संमेलनाची धुरा बहुतेक ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी ह्यांच्याकडे होती. सलग तीन किंवा चार आठवडे ते ह्याच संमेलनाच्या संयोजनाबद्दल टीका करीत होते. त्यांचा रोख श्री. चौधरी ह्यांच्याकडे होता.

हे जळगावचं प्रकरण अचानक थांबलं. श्री. महानोर ह्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होणार होती. त्यामुळे काही महिने तरी लिहायला जमणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ‘संवाद’मध्ये सहा महिने लिहून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर पुन्हा कधी त्यांना फोन करण्याचा प्रसंग आला नाही.

महानोरांची अजून एक आठवण आहे ती परभणी संमेलनाची. त्या संमेलनातल्या त्यांच्या मुलाखतीने मोठे आकर्षक, सनसनाटी मथळे मिळवले होते. ‘करंदीकर, बापट, पाडगावकर यांनी काव्यवाचनाची गोडी घालवली’ असा बॉम्बगोळाच त्यांनी टाकला होता. त्याचे पडसाद बराच काळ (मराठी) साहित्यविश्वात उमटत राहिले. त्यांच्या त्या मुलाखतीनंतर काही महिन्यांनीच श्री. मंगेश पाडगावकर नगर येथे आले होते. तेव्हा ह्याबाबत विचारल्यावर त्यांनी ‘मी बोललंच पाहिजे असं नाही’ असं सांगून विषयाला पूर्णविराम दिला होता. (ती आठवण इथे वाचता येईल - https://khidaki.blogspot.com/2015/12/blog-post_30.html)

पुण्यात २०१०मध्ये झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी. (दोन वर्षांनी त्यांनी माझ्या ‘शब्दसंवाद’ पुस्तकाला एक विस्तृत ब्लर्ब लिहिला, हा वेगळाच योगायोग!) त्या संमेलनावर एक दुःखद छाया होती कविवर्य विंदा करंदीकर ह्यांच्या निधनाची. संमेलनाच्या दोन आठवडे आधी हा कवी हे जग सोडून गेला होता. संमेलनाचं उद्घाटन श्री. महानोर ह्यांच्या हस्ते झालं. त्या वेळी त्यांचं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्याच्या दोन आठवणी आहेत - एक तर हे त्यांचं भाषण खूप लांबलं. त्यात त्यांचा सारा भर राहिला तो विंदा करंदीकर ह्यांचं आपल्यावर किती प्रेम होतं, हे सांगण्यावर.

महानोरांनी ‘मराठवाडा वृत्तान्त’साठी जवळपास सहा महिने लिहिलं. त्यांचा लेख असलेला एकही अंक संग्रहात नाही. वाटलं होतं की, ते वर्षभर लिहितील आणि त्याचं एक सुंदर पुस्तक येईल. पण ती सगळीच कहाणी अर्ध्यावर राहिलेली... त्यांच्या निधनासारखीच हळहळ लावणारी!
....
#महानोर #निसर्गकवी #लोकसत्ता #मराठवाडा_वृत्तान्त #सदर_लेखन #संवाद #पुणे_साहित्य_संमेलन #विंदा_करंदीकर #जळगाव_साहित्य_संमेलन

Wednesday, 12 July 2023

असं राजकारण, अशा गमती

 



माध्यमांमधून वाचायला-ऐकायला-पाहायला मिळणारं राजकारण म्हणजे हिमनगाचं टोक असतं, असं नेहमीच बोलून दाखवलं जातं. त्यात तथ्य आहेच. खऱ्या राजकारणातील डाव-प्रतिडाव, शह-मात, प्याद्यांचे बळी आपल्यासारख्या सामान्यांपर्यंत सहसा येत नाहीत. तुम्ही अगदी आतल्या वर्तुळातले, गोटातले असाल किंवा हल्लीच्या माध्यमांच्या लोकप्रिय भाषेत बोलायचं तर तुम्हीच ‘खातरीशीर सूत्र’ असाल, तर हे पाहण्या-अनुभवण्याची संधी मिळते. रोज घडणाऱ्या राजकारणात तिरक्या, अडीच घरांच्या चाली असतात, तशा अनेक गमतीजमतीही घडत असतात. पडद्याआड होणाऱ्या आणि आपल्यापर्यंत येताना मीठ-मसाला लेवून किंवा पाणी टाकून येणाऱ्या अनेक गमती.

राजकारण करणाऱ्या मंडळींचा असाच एक धमाल किस्सा अलीकडे ऐकायला मिळाला. सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबात वाढलेला एक मुलगा सामाजिक जीवनात सहभागी होतो आणि एकाहून अधिक वेळा आमदार म्हणून निवडून येतो. सत्तेच्या अगदी आतल्या वर्तुळापर्यंत पोहोचतो. हे कसं साध्य होतं?

पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी असलेला त्या नेत्याचा जवळचा कार्यकर्ता, अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांच्या काम करण्याची रीत उलगडून दाखवत असतो - फार खोलात जाऊन नाही; पण अगदी वरवरचंही नाही. कार्यकर्त्यांचा चमू कसा आहे, ते कशा पद्धतीनं काम करतात, त्यातली सफाई तो स्पष्ट करतो. त्याच्या नेत्याचे - भाऊ म्हणू आपण त्यांना - एक गुरू आणि मार्गदर्शक असतात. व्यवसायाने वकील. संबंधित एका कोणत्या तरी संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी. निवडणूक असली की, व्यूहरचना कशी करायची, कोणती पावलं उचलायची, हे सगळं ते ठरवातात आणि भाऊ त्यांचं मनोभावे ऐकतात. कारण त्यांच्या यशाचे ते मुख्य शिल्पकार असतात. ह्या गुरू-मार्गदर्शकाचं ‘मामा’ हे सार्वत्रिक आदरार्थी संबोधन.

अशीच एक निवडणूक. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. नेत्याची जल्लोषात मिरवणूक निघालेली असते. त्याच वेळी मामा आणि पक्षाचे तालुकाध्यक्ष वेगळ्या कामात गुंतलेले. मिरवणुकीशी त्यांना काही देणं-घेणं नाही. जणू त्यांचा कुठल्या प्रक्रियेशी संबंधच नाही. पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचं शिक्कामोर्तब करणारा ‘ए-बी फॉर्म’ त्यांना पक्षाच्या जिल्हा कार्यालयातून आणायचा होता. हा फॉर्म म्हणजे पक्षाचा उमेदवार असल्याची आणि अधिकृत चिन्ह मिळण्यासाठीची अतिशय महत्त्वाची, अनिवार्य अशी कागदपत्रं. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत तो मिळालाच पाहिजे. त्यात काही त्रुटी राहिली नाही ना, हे अगदी डोळ्यांत तेल घालून तपासावं लागतं.


खरं तर नेत्यानं निवडणुकीसाठी अर्ज आधीच भरलेला होता. त्याच अर्जाला ‘ए-बी फॉर्म’ जोडायचं काम बाकी. शेवटच्या दिवशीची जल्लोषातली मिरवणूक फक्त कार्यकर्त्यांमध्ये जोष आणण्यासाठी. हवा तयार करण्यासाठी. आपली ताकद दाखविण्यासाठी - आपल्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि विरोधकांना धडकी भरवण्यासाठी. जिल्हा मुख्यालयावरून ही जोडगोळी मतदारसंघात परतली, तेव्हा मिरवणूक पूर्ण भरात आलेली. फटाक्यांची आतषबाजी आणि गगनभेदी घोषणा. कार्यकर्त्यांचा उत्साह टिपेला गेलेला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालय अगदी जवळच आलं होतं.

मिरवणूक अशी जोषात असताना भाऊंच्या कार्यालयात मोजकेच कार्यकर्ते बसले होते. महत्त्वाचं काम वेळेत आणि चोखपणे पार पडल्याचं समाधान त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. गरमागरम चहाचे कप आले होते. चहा घेताना मामांना अस्वस्थ वाटू लागलं. अंग थरथर कापू लागलं. घाम आला. हा हृदयविकाराचा झटका असल्याचं जवळच्यांनी ओळखलं. तिथल्याच कुणा एकाजवळ सॉर्बिट्रेटची गोळी होती. त्यानं लगेच ती त्यांच्या जिभेखाली सरकवली. डॉक्टरांना बोलावणं गेलं. ते आले आणि तपासून त्यांनी दुजोरा दिला - हृदयविकाराचाच झटका. तातडीनं रुग्णालयात घेऊन चला.

रुग्णवाहिका आली. एवढी मोठी मिरवणूक चालू असताना तिला वाट कशी मिळणार? सुदैवानं भाऊंना ही माहिती मिळाली होती. त्यांच्या सांगण्यानुसार मिरवणूक लगेच विसर्जित करण्यात आली. रुग्णवाहिका मामांना घेऊन मुंबईकडे धावू लागली. सोबत तालुकाध्यक्षांसह दोन-तीन महत्त्वाचे कार्यकर्ते. प्राथमिक उपचारांना यश आलं. रुग्णवाहिका तासभर धावल्यानंतर मामांची परिस्थिती बरी झाली. थोडं बोलण्याइतपत त्राण त्यांच्या अंगी आलं. तोंडावरचा ऑक्सिजनचा मुखवटा सरकवत त्यांनी विचारलं, ‘‘अरे, तुम्ही सगळे इथे. तो ‘ए-बी फॉर्म’ वेळेत कोण पोहोचवणार?’’ कार्यकर्त्यांनी त्यांना शांत राहायला सांगितलं आणि ‘सगळं व्यवस्थित होतंय’ असा दिलासा दिला.

तेवढ्याशा बोलण्यानं मामांना पुन्हा धाप लागली. कार्यकर्त्यांनी ऑक्सिजनचा मास्क व्यवस्थित बसविला. त्यांना श्वास घेण्यास सांगितलं. मुंबई येईपर्यंत मामा एकच प्रश्न पुनःपुन्हा विचारत होते - ‘ए-बी फॉर्म वेळेत पोहोचला ना? काही गडबड झाली नाही ना?’

सुदैवानं सगळं काही सुरळीत पार पडलं. मुंबईत वेळेवर आणि आवश्यक ते उपचार झाले. मामा ठणठणीत बरे झाले. निवडणुकीच्या कामाची सूत्रं हाती घेण्यासाठी आणि व्यूहरचना आखण्यासाठी ते पुन्हा मतदारसंघात दाखल झाले. तोंडाला बँडेज गुंडाळून अनिल कुंबळे गोलंदाजीसाठी उतरला होता ना, अगदी तसेच.

मामांची उपस्थिती मोलाची ठरली. मार्गदर्शकाचा सल्ला पुन्हा एकदा उपयोगी पडला. त्यांचा शिष्य निवडणुकीत पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी झाला. भाऊ सत्तासोपानावर चढले.

निवडणुकीच्या निकालानंतर दोन-तीन दिवसांची गोष्ट. भाऊ मुंबईला रवाना झालेले कार्यकर्ते निवांत बसले होते. चर्चा तीच - कुठे अपेक्षेएवढं लीड मिळालं, कुठं थोडं कमी झालं, कुणी काम केलं...वगैरे.

मामांनी अचानक विचारलं, ‘‘का रे भावड्यांनो, समजा मी त्या हार्ट ॲटॅकमधून वाचलो नसतो  तर? तुम्ही काय केलं असतं, कसे लढला असता?’’

तालुकाध्यक्ष मामांच्या तालमीत तयार झालेले. ते लगेच हजरजबाबीपणेम्हणाले, ‘‘मामा, तुम्ही शिकवलेलं काहीच विसरलो नाही आम्ही. कोणत्याही परिस्थितीचा कसा (अनुकूलच) उपयोग करून घ्यायचा माहिती आहे आम्हाला. तुम्ही म्हणता तसं झालंच असतं दुर्दैवाने, तर आम्ही प्रचारात एकंच सांगितलं असतं - भाऊंना मंत्री करायचं मामांचं स्वप्न होतं. भाऊ मंत्री झाल्याशिवाय मामांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. त्यासाठी भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करा..!’’

अशा असतात राजकारणातल्या पडद्याआडच्या गमतीजमती.

...........................

(चित्रं-सौजन्य - https://www.voicesofyouth.org आणि https://cleverharvey.com आणि https://swarajyamag.com)

...........................

#राजकारण #गमतीजमती #राजकीय_गमतीजमती #राजकारण_पडद्यामागचं #माध्यमं #एबी_फॉर्म 


Tuesday, 27 June 2023

‘काळ’ नायकाचे दुसरे पर्व - ‘अश्वमेध’

अंमळनेर येथे नव्या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे ह्यांची निवड झाली. संमेलनाध्यक्षपदी निवड होण्याआधी ज्यांची भेट झाली किंवा बोलण्याची संधी मला लाभली, असे हे तिसरे अध्यक्ष. त्यामुळे त्यांच्या निवडीचा स्वाभाविकच आनंद आहे. वडोदऱ्याच्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, वर्धेत झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ह्यांनी ‘लोकसत्ता’च्या मराठवाडा आवृत्तीसाठी सदरलेखन केले होते. त्यामुळे आवृत्तीचा समन्वयक ह्या नात्याने त्यांच्याशी बोलण्याची व भेटण्याची संधी आधीच मिळाली होती.

खरं तर प्रा. शोभणे ह्यांनी अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी ह्या आधीच जाहीर केली होती. पण त्या पदानं त्यांना दोन-तीन वर्षं हुलकावणी दिली. त्याबद्दल एकदा त्यांच्याशी सविस्तर बोलणंही झालं. ही संधी न मिळाल्याबद्दल त्या वेळी त्यांनी काहीशी खंतही व्यक्त केली होती. ती स्वाभाविकही होती, असं वाचकाच्या नात्यानं मला तेव्हा वाटलं होतंच.

प्रा. शोभणे ह्यांचा एक कथासंग्रह - बहुतेक ‘ओल्या पापाचे फुत्कार’ - वाचला आणि त्यांना प्रतिक्रिया कळवावी वाटली. संग्रहात दिलेल्या क्रमांकावर त्यांना प्रतिक्रिया कळविली आणि थेट त्यांचा फोनच आला. ही गोष्ट साधारण सात-आठ वर्षांपूर्वीची. ‘ह्या पुस्तकातील कथांबद्दल फार छान व्यक्त झाला आहात. मग तुम्ही परीक्षणच का लिहीत नाहीत?’, अशी अपेक्षावजा पृच्छा तेव्हा त्यांनी केली होती. पण तसं शक्य नव्हतं. योगायोगाने त्यानंतर काहीच दिवसांनी ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीचं काम पाहणारा मित्र विनायक लिमये ह्यानं पुस्तक-परिचय सदरासाठी प्रा. शोभणे ह्यांचं ‘अश्वमेध’ पाठवलं. त्याचा परिचय करून दिला आणि तो दि. ९ ऑगस्ट २०१५च्या अंकात सप्तरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाला. त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी ‘अश्वमेध’चा परिचय...
........

आपल्या देशात ‘एकविसाव्या शतकाची’ भाषा सुरू केली, राजीव गांधी ह्यांनी. पंतप्रधान झाल्यावर. त्याच एकविसाव्या शतकानं आपल्याला, जगाला खूप काही दिलं. ह्या शतकाची भाषा करणाऱ्या राजीव गांधी ह्यांना देशातील जनतेनं लोकसभेत अभूतपूर्व बहुमत दिलं आणि नंतर अवघ्या पाच वर्षांमध्ये सत्तेवरून पायउतारही केलं. त्यांचं पंतप्रधानपद ते तमीळ वाघांकडून हत्या ह्या जेमतेम साडेसहा वर्षांच्या काळात ह्या खंडप्राय देशात खूप काही घडलं आणि बिघडलंही. नेमकं काय घडलं, कसं घडलं, त्याचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत कसे उमटत गेले, ह्याचं चित्रण प्रा. रवींद्र शोभणे ह्यांच्या ‘अश्वमेध’मध्ये पाहायला मिळतं.

अर्थात, ह्या कालखंडातील घटना-घडामोडींवर कादंबरी लिहिणे, हा लेखकाचा उद्देश नाहीच. त्याला ह्या कालखंडावर लिहायचं आहे आणि त्या काळात घडल्या म्हणूनच या साऱ्या घटना कादंबरीत येतात. त्रिखंडात्मक कादंबरी लेखनाचा संकल्प प्रा. शोभणे ह्यांनी सोडला. त्याचा काळ त्यांनी ठरवून घेतला. आणीबाणी जाहीर झाल्यापासून विसाव्या शतकाच्या अखेरच्या वर्षापर्यंत; म्हणजे १९७५ ते २०००. ह्यातील  पहिला खंड ‘पडघम’ शीर्षकाने प्रसिद्ध झाला. ‘अश्वमेध’ हा त्यातील दुसरा टप्पा. तिसरा खंड येईल तो ‘होळी’ या शीर्षकाने. ‘या त्रिखंडात्मक लेखनाची प्रकृती काळकेंद्री अशी आहे,’ असं लेखकानं मनोगतामध्ये स्पष्ट केलं आहे.

आणीबाणीचा काळ अस्वस्थतेचा होताच; पण त्यानंतरच्या काळात ती अधिकच वाढत गेली. राजकारण, समाजकारण, साहित्य, करमणूक, माध्यमं... अशा साऱ्याच क्षेत्रांमध्ये ती जाणवत गेली. त्यातून बरंच काही घडत गेलं. सामान्यांना अस्वस्थ करायला लावणारं आणि विचार करणाऱ्यांना अंतर्मुख करायला लावणारं. ते सारं ह्या कादंबरीत पाहायला मिळतं.

कोणत्याही कथा-कादंबरीमध्ये नायक-नायिका, सहनायक, खलनायक अशी पात्रं असतात. इथे मात्र ‘काळ’ हा आणि हाच नायक आहे. म्हणजे लेखकाची भूमिका ती आहे. प्रसिद्ध लेखक-समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ह्यांनीही प्रस्तावनेत ते अधोरेखित केलं आहे. पण ह्या प्रवाही काळात माणसं असणं स्वाभाविक. कारण त्यांच्याशिवाय त्या काळाला अर्थच काय! म्हणजेच ही एका अर्थाने माणसांचीच कहाणी आहे... प्रवाहपतित किंवा प्रवाहाविरुद्ध पोहोणाऱ्या माणसांची; काळानुसार बदलणाऱ्या किंवा बदलत्या काळाशी जुळवून घेता न आलेल्या माणसांची; लौकिक प्रगतीची शिखरं गाठणाऱ्या किंवा शिखरावरून गर्तेत कोसळणाऱ्या माणसांची; भोगणाऱ्या माणसांची किंवा सोसणाऱ्या माणसांची!

कुणाला आवडो वा ना आवडो, राजकारण आपल्याला अगदी विळखा घालून बसलं आहे. ही कादंबरी राजकीय नसली, तरी त्यातील बहुसंख्य प्रसंग राजकारणातले आहेत. सत्तेच्या शक्तिकेंद्राचे कसे आणि कुठवर परिणाम होतात, ह्याचं वर्णन त्यात आहे. ह्या केंद्राला प्रसन्न करण्यासाठी, त्या केंद्रात आपली जागा मिळविण्यासाठी माणसं काय काय करतात, त्यासाठीच्या पडद्याआडच्या हालचाली आणि खेळ्या कशा असतात, माणसंच माणसांचा कसा वापर करतात, ह्याचं थेट चित्रण कादंबरीमध्ये आहे. राजकारण्यांच्या गुणावगुणांचं, घराणेशाहीचं यथार्थ दर्शनही घडतं. पण कादंबरीत केवळ राजकारण नाही. राजकीय निर्णयांचे किंवा घडामोडींचे सर्वसामान्यांच्या जीवनातल्या विविध क्षेत्रांवर कसे परिणाम होतात, हेही दिसतं. इथं वृत्तपत्रं आहेत, नाटक आहे, वृद्धाश्रम आहे, कॉलेज आहे, बार आहे, पुस्तकांचं प्रकाशन, पुरस्कारासाठीच्या लटपटी... जीवनातलं कोणतंही अंग वर्ज्य नाही.

विविध माणसं ह्या कादंबरीत भेटतात. मुलीला मंत्री करणाऱ्या खासदारापासून ते विजयाच्या कोणत्याही मिरवणुकीत बेधुंद नाचणाऱ्या कार्यकर्त्यापर्यंत. दलित महापौर, त्याची ब्राह्मण बायको आणि प्राध्यापक असलेला मेव्हणा, ह्या मेव्हण्याची देहविक्रय करणारी आई, गांधीवादी नेता आणि त्याचा प्रवाहपतित मुलगा, सारे यम-नियम धाब्यावर बसवून बेबंद वागणारा त्याचा मुलगा, राजकीय सोय लक्षात घेऊन त्याची होणारी सोयरिक, समाजवादी विचारवंताची अभिनेत्री मुलगी, लेखक, वृत्तपत्राचा राजकारणी मालक आणि त्याचे संपादक, मनातील खदखद पत्रांद्वारे व्यक्त करणारी दोन ‘कालबाह्य’ माणसं... अशी असंख्य माणसं गरजेनुसार येत राहतात. त्यांच्या ठसठशीत व्यक्तिरेखा हे दंबरीचं वैशिष्ट्य.

कालखंड साडेसहा वर्षांचा असला, तरी त्यात सतत काही घडत असतं. दोन पंतप्रधान, चार मुख्यमंत्री, लोकसभा-विधानसभेच्या दोन-दोन निवडणुका, बोफोर्सकांड, शाहबानो खटला, आंदोलनं - अयोध्येचं, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठीचं, शेतकरी संघटनेचं आंदोलन आणि अर्थातच त्या साऱ्यावरून उमटणाऱ्या क्रिया व प्रतिक्रिया. माणसं कशी वागतात आणि ती तशी का वागतात, हे शोधण्याचाही प्रयत्न आहे. बऱ्याच घटना-घडामोडी, असंख्य माणसं असा मोठा व्याप असूनही हे कथानक कंटाळवाणं होत नाही. एखाद्या वेगवान चित्रपटासारखी ती कथा वाचकाला सतत पुढे पुढे नेत राहते.

तुलनेने छोट्या कालखंडाचा विस्ताराने आढावा घेताना काही त्रुटी राहिल्या आहेत. इंदिरा गांधी ह्यांच्या हत्येची बातमी नागपुरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजण्यापूर्वीच कळते, हे त्या काळातील संपर्काच्या सोयी पाहता पटण्याजोगं नाही. हेमा यावलकर वयाची २५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच आमदार आणि मंत्रीही कशी होते, हे अनाकलनीय आहे. तिचे खासदार असलेले वडील नारायण यावलकरच ‘ती अजून चोविशीचीही नाही,’ असं सांगतात.  इचलकरंजीचे आमदार अण्णा गावीत वऱ्हाडी हेल काढत बोलतात आणि आयुष्यभर राजकारण करणाऱ्या ह्या शिक्षकाला नागपूरचा खासदार कोण, आपल्या नेत्याचा जावई कोण हे माहीत नसणंही न पटणारं. ‘प्रत्यक्षातील काही व्यक्ती सोडल्या, तर अन्य व्यक्तिरेखा पूर्णतः काल्पनिक आहेत,’ असं लेखकाने सुरवातीलाच सांगून टाकलं आहे. मुख्यमंत्री खरे, पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्यातील मंत्र्यांची नावं खरी आणि विदर्भातील मात्र काल्पनिक. वास्तवातील पत्रकार मो. ग. तपस्वी दिल्लीतून ‘भारती’ या कल्पनेतील दैनिकासाठी लिहितात आणि खरेखुरे प्रमोद महाजन एका काल्पनिक दलित नेत्याला निवडणुकीत ‘डमी’ म्हणून लढण्याची विनंती करतात. वास्तव आणि कल्पना यांचं हे मिश्रण अजब वाटत राहतं, एवढं खरं!
--------------------------------------
#अश्वमेध #रवींद्र_शोभणे #साहित्य_संमेलन #संमेलनाध्यक्ष #आणीबाणी #त्रिखंडात्मक_कादंबरी #अंमळनेर_संमेलन

सचिऽऽन, सचिऽऽन!

  विश्वचषकातील सर्वोत्तम - ४ (दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया - २००३) ‘शांतपणे खेळा’  हा  गांगुलीचा आदेश सचिन-सेहवाग जोडीनं धुडकावला. ...