शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

चंदनापुरीत भेटलेला अजिंक्य रहाणे

 


देखणा फटका... ही बॅट आता निवृत्त झाली!
(छायाचित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सौजन्याने.)

..........................................

ही गोष्ट १४ वर्षांपूर्वीची. आय. पी. एल. गाजवलेल्या अजिंक्य रहाणे ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली होती. घरगुती कार्यक्रमानिमित्त
तो आपल्या मूळ गावी, म्हणजे चंदनापुरीला येणार होता.
त्याला भेटायचं, जमलंच तर बोलायचं आणि बातमी करायची,
म्हणून तिथे गेलो होतो. त्या दिवसभराची त्या वेळी केलेली ही बातमी...
त्याच्या निवृत्तीनंतर ही भेट आठवली.
.............

अजिंक्‍य रहाणेच्या शब्दांत...

क्रिकेट : क्रिकेटची आवड कशी लागली, कधी लागली असं काही नेमकं नाही सांगता येणार; पण लहानपणापासून खेळायला आवडतं हे नक्की. डोंबिवलीत जेथे राहत होतो, त्या इमारतीत खेळायला सुरवात केली. पुढे खेळतच गेलो. खातू सर माझे पहिले मार्गदर्शक. त्यांच्याच हाताखाली क्रिकेटचे पहिले धडे गिरवले. अर्थात, त्या वेळी सचिन तेंडुलकरचा आदर्श आणि त्याच्यासारखं बनण्याची प्रेरणा होतीच.

कसोटी, मर्यादित षटकांच्या लढती आणि टी-20 यातला कोणता प्रकार अधिक आवडतो? छे! हा प्रश्‍नच नाही. मला हा खेळच आवडतो आणि त्यामुळे त्यातल्या या तिन्ही प्रकारांमध्ये खेळायला मनापासून आवडतं.

पहिला सामना : चौदा वर्षांखालील गटात पहिला सामना ठाण्यात खेळलो. तो सामना नक्कीच लक्षात राहणारा आहे, कारण पहिल्याच सामन्यात मी मॅन ऑफ द मॅचठरलो होतो.

माझे आयडॉल’ : सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड. त्या दोघांचा खेळ पाहत मी वाढलो. त्यांच्या बरोबर खेळताही आले. तेच माझे आदर्श, प्रेरणास्थान, ‘आयडॉलआहेत. राहुल द्रविड यांच्याशी माझी जोडी जमली. ते स्वतःहून बोलतात, युक्तीच्या चार गोष्टी सांगतात; खेळात सुधारणा सुचवितात.

पहिल्या निवडीनंतर : जो कोणी क्रिकेट खेळायला सुरवात करतो, त्याचं भारताकडून खेळण्याचं स्वप्न असतंच. भारतीय संघात निवड झाली, तेव्हा साहजिकच मला मनस्वी आनंद झाला. इथं टिकायचं असेल, तर दीर्घ काळ मेहनत करावी लागेल, याचीही जाणीव झाली.

आई-बाबांविषयी : कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. मला खेळायला जाण्यासाठी, सामन्यासाठी लवकर जावं लागायचं. माझ्याबरोबर तेही लवकर उठत; कधी मला सोडायला येत. बाबांनी ऑफिस सांभाळून माझ्या खेळासाठी बरंच केलं. बाकीचे खर्च बाजूला ठेवून खेळासाठी हवे तेव्हा आवश्‍यक पैसे दिले. खरं सांगू? त्यांनी काय काय केलं, याबद्दल सांगीन तेवढं थोडंच.

खाणे, वाचणे : घरचं जेवण मला आवडतं. काहीही. त्यात अमूकच हवं, तमूकच हवं, असं काही नाही. घरी तयार केलेलं काहीही खायला आवडतं. वाचायलाही मला आवडतं. सध्या मी मेडिटेशनविषयी जरा गांभीर्यानं वाचतो आहे.

------

संगमनेरपासून जेमतेम पाच किलोमीटरवर, नाशिक-पुणे रस्त्यावर असलेले चंदनापुरी जणू आता शहराचे उपनगरच बनलं आहे. त्याची विशेष वेगळी ओळख राहिली नव्हती; पण गेल्या वर्षापासून या गावाची नवी ओळख झाली आहे - अजिंक्‍य रहाणेचे गाव चंदनापुरी! आणि या ओळखीवर अख्ख्या गावाने जणू शिक्कामोर्तबच केलं.

संगमनेरहून पुण्याला नेणाऱ्या रस्त्यावर सगळीकडे काल फ्लेक्‍सदिसत होते. चंदनापुरीसारख्या छोट्या गावात या फलकांची गर्दी होती. सगळ्या फलकांवर एकच छबी झळकत होती, ती अर्थातच अजिंक्‍य रहाणेची. त्याच्या वस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरही फ्लेक्‍स दिसत होते आणि अजिंक्‍य रहाणेच्या वस्तीकडेअसे दिशादर्शक फलक त्याच्या छायाचित्रासह!

अजिंक्यचे वडील जेथे शिकले, वाढले, त्या गावातील गावकरी आणि जयहिंद युवा मंच यांनी अजिंक्‍यचा सत्कार केला. सेलिब्रिटी क्रिकेटपटू आमचा गाववाला आहे, त्याचा सत्कार करण्यात आम्हाला मनापासून आनंद होत आहे, हेच गावात सळसळलेल्या उत्साहाने दाखवून दिलं.

इंडियन प्रीमियर लीगचा पाचवा हंगाम गाजविणारा, सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजासाठी असलेली ऑरेंज कॅपह्या हंगामातील पूर्वार्धापर्यंत बाळगणारा अजिंक्‍य रहाणे. राहुल द्रविडने ज्याच्याबद्दल कौतुकोद्‌गार काढले तो अजिंक्‍य रहाणे. ज्याच्यावर गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट समीक्षक आणि रसिक न थकता स्तुतिसुमने उधळत आहेत, तो अजिंक्‍य रहाणे.

सलामीच्या या फलंदाजाची श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

खरे तर अजिंक्‍यची काही पहिल्यांदाच भारतीय चमूत निवड झालेली नाही. ह्या आधी गेल्या सप्टेंबरमध्येच इंग्लंडविरुद्ध एक दिवसाच्या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं. पाहुण्या वेस्ट इंडिजविरुद्धही तो चेन्नईत शेवटचा सामना खेळला.

चंदनापुरीकरांना सत्कारासाठी त्याची वेळच मिळत नव्हती. अजिंक्‍यची पुन्हा भारतीय संघात निवड झाली आणि ही संधी साधून गावाने त्याच्यावरचं प्रेम उत्साही स्वरूपात दाखवून दिलं.

अजिंक्‍यने वस्तीवर मस्त, आलिशान घर बांधलं आहे. त्याला नाव दिलं आहे – झेलू’. त्याच्या लाडक्‍या आजीचं हे नाव. या बंगल्याची वास्तुशांती करायची होती. हा कार्यक्रम आणि गाववाल्यांकडून होणारा सत्कार, ह्यासाठी तो एक दिवस आधीच गावी पोहोचला. गावात त्याने मुक्कामही केला.

रहाणे कुटुंब मुंबईहून पहाटे साडेतीन वाजता निघालं. संगमनेरपर्यंत अजिंक्‍य स्वतः मोटर चालवत होता, असं त्याच्या बाबांनी सांगितलं. संगमनेरजवळ आल्यावर मात्र त्याने सारथ्याची भूमिका सोडली आणि नकळत उत्सवमूर्तीच्या भूमिकेत तो शिरला.

गावात दीड-पावणेदोन तास चाललेली मिरवणूक, त्यानंतर सत्कार समारंभ. व्यासपीठावर तोबा गर्दी. बाह्या दुमडलेला साधा शर्ट, तशीच पॅंट, अशा साध्या वेशातच सत्कारमूर्ती व्यासपीठावर होती. आभाळ काहीसं भरून आलेलं होतं आणि सभागृह गच्च भरलेलं होतं. त्यामुळे उकडतही होतं; पण हे सगळं सहन करीत, व्यासपीठावर शांतपणे बसून न्याहाळत, कौतुकाचे शब्द ऐकत अजिंक्य बसला होता.

तुरेबाज फेटा त्याने बांधून घेतला; तशी कौतुकाने दिलेली शिंदेशाही पगडीही काही वेळ सांभाळली. समोरच्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट त्याला सुखावून जात होता.


निवृत्तीची घोषणा आणि भावूक अजिंक्य.

....................
अब ऑटोग्राफ नही, फोटोग्राफ का जमाना हैअसं विराट कोहली एका जाहिरातीत सांगत असला, तरी अजिंक्‍यच्या सहीसाठी गर्दी उडाली होती आणि त्याच्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी झुंबडही. व्यासपीठावर वक्‍त्यांची बोलंदाजीचालू असताना अजिंक्‍य सहीसाठी पुढे केलेल्या प्रत्येक कागदावर लफ्फेदार सही करीत गाववाल्या चाहत्यांना खूश करून टाकत होता. एका छोट्या खेळाडूनेसहीसाठी बॅटच आणली होती. त्यालाही अजिंक्‍याने खूश केलं.

फलंदाजीसारखं खणखणीत भाषण त्यानं केलं नाही; पण आपल्याला नेमका काय संदेश द्यायचा आहे, तो त्याने दोन मिनिटांच्या भाषणातून नक्कीच दिला.

अजिंक्‍यच्या आगमनाने उसळलेली उत्साहाची लाट दिवसभर गावात तशीच सळसळत होती. सत्कारानंतर त्याच्या बरोबर छायाचित्र काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तेथून तो एका बंगल्यावर गेला, तेही फोटो सेशनसाठीच.

सत्काराचा कार्यक्रम संपवून विश्रांतीसाठी अजिंक्‍य वस्तीवर गेला, तेथेही उत्साही चाहत्यांची गर्दी होतीच. शाळकरी मुले वह्या, कागद घेऊन त्याच्या सहीचा अनमोल ठेवा मिळवण्यासाठी जमले होते. छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश लखलखत होते.

दमलेला अजिंक्‍य थोडा वेळ विश्रांतीसाठी गेला, तेव्हाही दर पाच-दहा मिनिटांनी तेथे कोणी ना कोणी येत होते; चौकशी करत होते. वास्तुशांतीच्या तयारीत गुंतलेली घरची मंडळी, मामा, आत्या, काका हे सारे या चाहत्यांना थोड्या वेळाने याअसे सांगत होते.

अजिंक्‍यचे वडील मधुकर रहाणे दहावीनंतर अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमासाठी मुंबईला गेले. आझाद मैदानासमोरच तंत्रनिकेतन होतं. आझाद मैदानावर चाललेले क्रिकेटचे रंगलेले डाव पाहता पाहता त्यांनाही ह्या खेळानं वेड लावलं. त्यांनी खेळण्याचे स्वप्न पाहिलं की नाही माहीत नाही; पण त्यांच्या मुलाने ते प्रत्यक्षात आणून दाखवलं.

अजिंक्य खेळत राहिला आणि आई-वडील त्याला प्रोत्साहन देत राहिले. अजिंक्‍य कसोटी क्रिकेटचा खेळाडू आहे, असा शिक्का पडल्यासारखा होता; पण तो या खेळाच्या तिन्ही प्रकारांत उत्तम खेळतो. त्याने हे सिद्ध केले आहे,’ असंही मधुकर रहाणे ह्यांनी बोलण्याच्या ओघात सांगून टाकलं.

... त्या वेळी अजिंक्य रहाणे नवखा होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी असलेल्या करारानुसार त्याला मुलाखत देणं शक्य नव्हतं. त्यानं तसं ते सांगितलंही. पण मी आणि माझा सहकारी त्याची विश्रांती होईपर्यंत वाट बघत थांबलो. अखेर क्रिकेट सोडून अन्य विषयांवर पाच मिनिटं तो बोलला आणि बातमी तयार झाली!
.........
(दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी थोडी संपादित करून.)
.........

#अजिंक्य_रहाणे #चंदनापुरी #संगमनेर #गावचा_सत्कार #मधुकर_रहाणे #निवृत्ती
.........
हेही लेख तुम्हाला आवडतील वाचायला -

रो-को ह्यांनी मिळवून दिलेल्या विजयाची कहाणी 
https://khidaki.blogspot.com/2025/12/Ro-Ko.html

ओह! लॉर्ड्स... 😭😭
https://khidaki.blogspot.com/2025/07/OhLords.html

‘सूर्योदया’चा सुवर्णमहोत्सव
https://khidaki.blogspot.com/2021/03/sunny.html

शनिवार, १८ जुलै, २०२६

अखेरचा राम राम, पावनं!

  डॉ. कुमार सप्तर्षी : सदर लेखन ते निवडणूक - पाहिलेला प्रवास 

'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडवून दिला.
त्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉक्टरांचं नगरी भाषेतलं
साप्ताहिक सदर - 'राम राम पावनं'. ह्याच सदराच्या
लोकप्रियतेचा आपल्याला निवडणुकीत फायदा होणारच,
असं सांगत ते १९९६मध्ये नगरमधून
लोकसभेच्या निवडणूक मैदानात उतरले.


हातात माईक म्हणजे समोरच्यांचं संमोहन निश्चित! - डॉ. कुमार सप्तर्षी

.........................

डॉ. कुमार सप्तर्षी ह्यांचे नाव पहिल्यांदा ऐकले ते सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाच्या वेळी. त्या वेळी करमाळ्यात प्राथमिक शाळेत होतो. महात्मा गांधी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इथे गडबड झाल्याचं ऐकायला मिळालं. त्या आंदोलनाचं नेतृत्व डॉ. सप्तर्षी करीत होते, असं समजलं नंतर. हा एवढा मोठा माणूस आपल्या जवळच्या राशीनचा, हे ऐकल्यावर तर आश्चर्यच वाटलं. सगळी मोठी माणसे शहरातलीच असतात, असा तेव्हाचा समज. 😀

पुढे डॉक्टरांनी करमाळ्यातून विधानसभेची निवडणूक लढविली, तेव्हा मी विशी ओलांडली होती नुकतीच. मतदानाचा अधिकार अजून मिळायचा होता. त्या निवडणुकीत त्यांची भाषणे दोन वेळा ऐकायला मिळाली. श्रोत्यांना जिंकणारं त्यांच्या भाषेतलं वक्तृत्व होतं ते.

प्रचारासाठी नामवंत अभिनेते निळू फुले ह्यांनाही डॉक्टरांनी खास आणलं होतं. त्यांचा संवाद तर एकदम मनमोकळा. त्या सभेत डॉ. सप्तर्षी ह्यांनी करमाळ्याचे तेव्हाचे नगराध्यक्ष गिरधरदास देवी ह्यांच्यावर जोरदार टीका केल्याचे आठवते. ह्या टीकेला करमाळकर कसा प्रतिसाद देतात म्हणून पाहिलं, तर गंमत म्हणजे हे ऐकायला गिरधरदास ह्यांची पुतणी व आमची वर्गमैत्रीण संगीता देवी नागर तिथे होती!😀 तिलाही ते कदाचित आठवणार नाही आता. मतदानाच्या आदल्या दिवशी गल्लीत काही महिला हळदी-कुंकू देण्यासाठी आल्या होत्या. चौकशी केल्यावर त्या डॉक्टरांच्या कार्यकर्त्र्या असल्याचं समजलं. 🤔

राम राम पावनं...
'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली (दि. १ मे १९९४) आणि तिनं धमाका उडवला. त्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉ. सप्तर्षी ह्यांचं सदर - 'राम राम पावनं'! खास नगरी भाषेत लिहिलेलं आणि सुरुवातीचे काही महिने झकास चाललेलं. ते लोकप्रिय झालं आणि मग नंतर त्यांनी आपल्या पद्धतीनं त्याला वळण दिलं. नगरपालिकेच्या एका सभेत बाकावर उभे राहून गोंधळ घालणाऱ्या सदस्याचे छायाचित्र आम्ही प्रसिद्ध केले. त्याच्या वर्तणुकीचा उपहास करणाऱ्या ओळई मी दिल्या होत्या. पण पुढच्या आठवड्यात डॉक्टरांनी त्या नगरसेवकाचं कौतुक करण्यात अख्खं सदर खर्ची केलं!

त्याच दरम्यान कधी तरी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे डॉक्टरांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एन्रॉन प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात कोल्हेसाहेब सहभागी झाले. त्या काळात कोल्हेसाहेबांच्या तोंडून डॉक्टरांचंच कौतुक ऐकायला मिळे. म्हणजे संमोहन किती तगडे असेल बघा. ह्या आंदोलनात भाग घेतल्याची काही ना काही राजकीय किंमत त्यांना बहुदा चुकवावी लागली असणार.


तरुणपणीचे डॉ.सप्तर्षी
................
निवडणुकीत फायदा होणारच
हे सदर फार लोकप्रिय झाल्याचा फायदा आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात होणार, असं गृहित धरून डॉ. सप्तर्षी ह्यांनी लोकसभेच्या १९९६च्या निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्या वेळी प्रचार चांगला महिना-दीड महिना चालायचा. त्यामुळे जवळपास रोजच ते 'लोकसत्ता'च्या कार्यालयात येत.

खास निवडणुकीच्या बातम्यांसाठी केलेल्या पानावर पट्टी होती. त्यात सर्व प्रमुख राष्ट्रीय पक्षांची निवडणूक चिन्हं दिलेली. फक्त त्यांच्या समता पक्षाची 'मशाल' नव्हती. 'त्या पट्टीत आमची 'मशाल' घ्या, नाही तर तुमच्याविरुद्ध मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे,' असं ते दर दोन दिवसांनी बजावत. अतिशय गंभीरपणे ते बोलत आहेत, असं तेव्हा वाटे. पण तशी काही तक्रार त्यांनी शेवटपर्यंत केली नाही.

ह्या निवडणुकीच्या काळातच बिंदुमाधव ठाकरे ह्यांचे अपघातात निधन झाले. रात्रीचे ११ वाजले होते. संपादकीय विभागात मी एकटाच होतो.काम पूर्ण झालेले, निघायची तयारी आणि फोन वाजला. डॉक्टर बोलत होते. 'बिंदुमाधव ह्यांना मी वाहिलेली श्रद्धांजली उद्या मुंबईच्या अंकात पहिल्या पानावर आली पाहिजे. मी सांगतो ते लिहून घे,' असं त्यांनी सांगितलं. अंकाचं सगळं काम संपलं आहे, कम्प्युटर ऑपरेटरही गेले, असं सांगण्याचा प्रयत्न केला.

पण डॉक्टर काही ऐकायलाच तयार नव्हते. बाळासाहेबांचे आणि माझे, मीनाताईंचे आणि माझे किती जवळचे संबंध आहेत, हे सांगत म्हणाले - 'माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हव्यात.' त्यांची श्रद्धांजली लिहून घेतली, पुन्हा वाचून दाखविली आणि फोन ठेवला. ती बातमी मुंबईला जाण्याचा प्रश्नच नव्हता!

असेच एका रात्री ते आले. दिवसभराच्या दौऱ्यात कोठे कोठे सभा घेतल्या, ह्याची पत्रके दिली. 'राम राम पावनं'मुळं वातावरण कसं चांगलं आहे आणि निवडून कसा येणार, हे त्यांनी (कितव्यांदा तरी) सांगितलं. त्यांना म्हणालो, 'बसा थोडा वेळ.' त्यावर त्यांचं उत्तर होतं - 'घाईत आहे आता.'

घाईत असूनही अर्धा तास बसले
सहज म्हणून विचारलं, 'तुम्ही एवढं छान मासिक ('सत्याग्रही विचारधारा') काढता, त्यात तुमचे मित्र डॉ. अनिल अवचट ह्यांना लिहायला का सांगत नाही?' हे विचारलं आणि 'फार घाई असलेले' डॉक्टर जाता जाता थांबले. शेजारच्या खुर्चीत ठाण मांडून बसले. 'अनिलला मीच कसं लिहायला लावलं' येथून त्यांनी सुरुवात केली आणि पुढे अर्धा तास बोलत राहिले. आपलं लेखन बाळासाहेब ठाकरे ह्यांना कसं आवडतं, हे ते पुनःपुन्हा सांगत होते.

त्या वेळी (आणि आधीही काही भाषणं ऐकली होती, तेव्हा) एक लक्षात आलं की, त्यांच्या बोलण्यात विलक्षण ताकद आहे. मुद्दे पटवून देण्याची हातोटी जबरदस्त आहे. ऐकताना समोरचा संमोहित होतो.

निवडणूक काळातील त्यांच्या त्या बोलण्यानंतर मलाही काही दिवस वाटत होतं की, डॉक्टर निवडून येणार नाहीत; पण शर्यतीत असतील. दुसरा नाही तरी तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर राहतील. पण मतदारांनी त्यांना लांबूनच 'राम राम' ठोकला. डॉक्टरांना अडतीसशे (०.७ टक्के) मतं मिळाली. निकालानंतर ते पुन्हा कधीच 'लोकसत्ता' कार्यालयात आले नाहीत.

त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि ह्यासह बरंच काही आठवलं.

...
(छायाचित्रं 'सत्याग्रही विचारधारा'च्या सौजन्याने)
....
#Dr_Kumar_Saptarshi #Kumar_Saptarshi_Death #ram_ram_pawane #Satyagrahi_Vichardhara, #Loksabha_1996 #Loksatta #Ahmednagar #Karmala

सोमवार, ९ मार्च, २०२६

आगीत वितळला बर्फ

 
.......................................
इंग्लंडमधल्या उपान्त्य सामन्यासारखं अहमदाबादेत झालं नाही.
इथे आगीची आच लागताच बर्फाचं पाणी पाणी झालं.
सँटनर सामन्याआधी जे काही म्हणाला, ते फुकाचे बोल ठरले. पहिल्या सहा षट्कांमध्ये भारतीय सलामीवीरांनी पॉवर दाखवून दिली.
मग गोलंदाजांनी किवी फलंदाजांना लगाम घातला.
पाहुण्यांच्या गोलंदाजांची शरणागती आणि फलंदाजांचे साफ लोटांगण!
-------------------------------------

एक दिवशीय विश्वचषक स्पर्धेत २०१९मध्ये उपान्त्य फेरीत भारताची गाठ न्यू झीलँडशी पडली होती. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचं वर्णन तेव्हा आगीचा लोळ केलं गेलं. आणि केन विल्यम्सन ह्याचा संघ बर्फासारखा. त्या लढतीत भलतंच झालं. थंडगार बर्फानं आगीचा लोळ गिळून टाकला.

अहमदाबादेत मात्र फार वेगळं झालं. आगीची नुसती आच लागताच बर्फ वितळणं सुरू झालं. यजमानांनी टी20 विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावणारा हा पहिलाच संघ. विश्वचषक यजमानांन धार्जिणा नाही, हा एक दिवशीय क्रिकेटमधला समज भारतानंच २०११मध्ये मोडून काढला.

पॅट कमिन्स आणि मिचेल सँटनर. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोघेही विश्वचषक पटकावण्यासाठी आले होते. प्रतिस्पर्धी अर्थातच तगडा, यजमान भारतीय संघ.

एक दिवशीय विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर २३ रोजी झाला. आधीचे सर्व सामने दिमाखात जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत आलेला. सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार बैठकीत कमिन्स म्हणाला होता, स्टेडियममधील प्रेक्षकांची बोलती आम्ही बंद करू!’

टी20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीपूर्वी रविवारी पत्रकारांशी बोलताना सँटनर हेच म्हणाला. तीच भाषा. किवी कर्णधाराच्या नव्हे, तर ऑस्ट्रेलियाई कप्तानाच्या तोंडी शोभणारी.

नाणेफेक जिंकल्यावर कमिन्सने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सँटनरने आज तेच केलं. पण तो निर्णय त्याच्या सपशेल अंगलट आला.

खरे झाले होते कमिन्सचे बोल. सँटनरचं वक्तव्य फोल. नरेंद्र मोदी स्टेडियममधील अदमासे लाखभर प्रेक्षक पहिल्या षट्कापासून कल्ला करीत होते. आणि सामन्याचा शेवटचा चेंडू पडला, तेव्हा तो आवाज टिपेला गेला होता. किवीजचा आवाज बंद!

बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाचा उपान्त्य फेरीत लीलया पाडाव करणाऱ्या सँटनरच्या संघाला अंतिम लढतीत सूर सापडलाच नाही. आधी त्यांच्या गोलंदाजांनी शरणागती पत्करली. नंतर त्यांच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. अपवाद एखाद-दोन. सामन्याच्या एकतर्फी निकालात बदल घडविण्याची ताकद ह्या अपवादांमध्ये नव्हती.

उपान्त्य सामन्यात अडीचशेचा उंबरठा ओलांडल्यानंतरही भारताला विजयासाठी झुंजावं लागलं. सलग दुसऱ्या सामन्यात त्यांनी ही धावसंख्या ओलांडली. गोलंदाजीची वेळ आली तेव्हा प्रतिस्पर्ध्यांना वरचढ होऊ देण्याची चूक ह्या वेळी घडली नाही.

कोणत्याही षट्कात भारतीय संघाच्या धावसंख्येची बरोबरी साधणं पाहुण्यांना जमलं नाही. भारतीय डावात सात षट्कं अशी होती की, ज्यात दहापेक्षा कमी धावा निघाल्या. त्याच्या उलट भारतीय गोलंदाजांनी असा लगाम घातला की, ब्लॅक कॅप्स संघाला केवळ सहा षट्कांमध्ये दहापेक्षा अधिक धावा करता आल्या.

अंतिम सामन्यापूर्वी अनेक प्रश्नांची चर्चा माध्यमात, सामाजिक माध्यमावर चालू होती. सतत अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला वगळणार का? त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणार का?


वादळी सलामी... पॉवर-प्लेमध्ये विक्रमी धावसंख्या.
...........
ह्या सगळ्या चर्चा फोल ठरल्या. अभिषेक आणि संजू सॅमसन हीच जोडी सलामीला आल्या. मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्स ह्यांच्या पहिल्या दोन षट्कांत डझनभरच धावा निघाल्या. त्यातही फिलिप्सनं फक्त पाच धावा दिल्या.

वादळापूर्वीची शांतता म्हणतात तशी ती होती, हे नंतरच्या चार षट्कांमध्ये दिसलं. ह्या जोडीनं समोर कोण आहे, तो काय टाकतो आहे, ह्याची पर्वा न करता ८० धावा कुटल्या. पॉवर प्लेमध्ये ९२. जलदगती गोलंदाजांना घेऊन खेळण्याची चूक किवीजना भोवली.

धावांची बरसात करणारा अभिषेक पुन्हा दिसला. त्याचं अर्धशतक १८ चेंडूंमध्येच. रचिन रवींद्रचा पहिलाच चेंडू वाईड होता. त्याची छेड काढली नसती तर... पण तसा विचार करण्याची वेळ ईशान किशननं येऊ दिली नाही. पहिल्या तिन्ही फलंदाजांनी एवढी अफाट फटकेबाजी केली की, तीनशे धावाही शक्य वाटू लागल्या होत्या.

पण १५ ते १९ ह्या पाच षट्कांमध्ये फक्त दोन चौकार आणि चार जण बाद झालेले. ही कसर शिवम दुबे ह्यानं अखेरच्या षट्कात भरून काढली. सूर्यकुमारच्या जागी त्याला बढती दिली असती तर? आधीच्या तीन षट्कांमध्ये फक्त २२ धावा देऊन तीन बळी मिळविणाऱ्या जिमी नीशम ह्याचं पृथक्करण दुबेने पार बिघडवून टाकलं.

डावातील आणि अर्षदीपसिंगच्या पहिल्या षट्कातील पाचव्याच चेंडूवर फिन ॲलन सुदैवी ठरला. शिवम दुबेच्या हातून सीमारेषेवर चेंडू सुटला. मग टिम सैफर्ट ह्यानं हार्दिक पंड्याला दोन दोन षट्कार आणि चौकार खेचले, तेव्हा जेकब बेथल ह्याचीच आठवण झाली.

किवी संघाचं हे अवसान उसनं ठरलं. सुरुवात अक्षर पटेलने केली. ॲलनचा फटका लाँग ऑनवरच्या तिलक वर्माच्या हाती जाऊन स्थिरावला. मग बुमराहला पहिल्याच चेंडूवर बळी मिळवून दिला किशनने. काय अफलातून झेल होता तो.


आणखी एक अडथळा दूर... विजयाकडे पुढचे पाऊल.
...................................
वरुण चक्रवर्ती ह्यानं अर्धशतकवीर सैफर्टचा अडथळा दूर केला, तेव्हा न्यू झीलँड संघ विजयापासून अधिक दूर गेला. सोळाव्या षट्कात बुमराहनं लागोपाठ दोन ठेवणीतले चेंडू टाकले – हळुवार यॉर्कर. परिणाम? जिमी निशम आणि मॅट हेन्री ह्यांचा त्रिफळा उडालेला! काय षट्क होतं ते...

त्याच्या आधी डॅरील मिचेल आणि सँटनर ह्यांची जोडी थोडी जमल्यासारखी वाटत होती. अकराव्या षट्कात अर्षदीपने केलेला प्रकार थोडा अतीच होता. आवेशात फेकलेला चेंडू हातावर लागल्यानं मिचेल संतापला होता. खरं तर अर्षदीपनं त्याच वेळी जाऊन मिचेलची माफी मागायला हवी होती.


चेंडू उंच उडाला;
ईशानच्या हाती स्थिरावला!
....................
अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह ह्यांनी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, त्याला तोडच नाही. त्यांना आज साथ लाभली ईशानच्या चपळ क्षेत्ररक्षणाची. त्यानं तीन झेल घेत मागच्या सामन्यातील अक्षरच्या कामगिरीची आठवण करून दिली. त्यामुळंच सामन्याचा मानकरी ठरण्याच्या शर्यतीत तोही आला होता.

सूर्यकुमार यादवच्या संघानं विजेत्याच्या थाटात खेळ केला – पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत. उपान्त्य सामना रडतखडत जिंकणारा हाच का तो संघ, अशी शंका वाटावी, एवढी सफाईदार कामगिरी.

न्यू झीलँडबाबत नेमकं उलटं घडलं. एक गड्याच्या मोबदल्यात पावणेदोनशे धावा करणारा संघ १६० धावांतच ढेपाळला कसा? ह्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये न्यू झीलँडचे दोन्ही सलामीवीर आहेत. आणि गोलंदाजीत रचिन रवींद्र सातव्या क्रमांकावर. पहिल्या पाचात भारताच्या प्रत्येकी दोघांनी जागा पटकावली आहे.

ह्या विजयानं अहमदाबादेतील सव्वादोन वर्षांपूर्वीची जखम बुजवली आहे. गौतम गंभीरच्या कर्तृत्वाबद्दल उपस्थित केलेल्या सगळ्या शंका विरल्या नाहीत. पण त्यातला चेव नक्कीच कमी होईल. कर्णधार सूर्याची कामगिरी काही काळ तरी फलंदाज सूर्याचं अपयश नजरेआड करील. स्पर्धेत सर्वाधिक झेल सोडणारा संघ आपला होता. तेही आपण तूर्त विसरून जाऊ.

युद्ध हिंद महासागराच्या दाराशी आल्याच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बातम्या ऐकायला-पाहायला मिळत आहेत. ते मळभ दूर करणारं, ती चिंता आज-उद्यापर्यंत तरी विसरायला लावणारं हे विश्वविजेतपद आहे.

.....
(छायाचित्र सौजन्य भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व दैनिक गार्डियन)
......
#टी20_विश्वचषक #भारत_विश्वविजेता #भारत_न्यूझीलँड #संजू_सॅमसन #बुमराह #अक्षर_पटेल_बापू #मिचेल_सँटनर #ईशान_किशन #सूर्यकुमार_यादव
......


शुक्रवार, ६ मार्च, २०२६

रडतखडत आणि कण्हत-कुथत!

 


अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न आणि बेथल धावबाद.
मोठा अडथळा दूर झाल्याचा आनंद भारतीय खेळाडूंना आवरता न येणाराच...
...........
भारतीय संघ जिंकला! धापा टाकत, दमत, कण्हत आणि कुथत!!
संजू सॅमसन ह्याची सामन्याचा मानकरी म्हणून भले निवड झाली असो.
सामन्याचा हीरो होता जेकब बेथल
!
ह्या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत गेला आहे,
 तो अनेक अनुत्तरित प्रश्न आणि डोक्याला खुराक देणाऱ्या
अडचणींचे ओझे बरोबर घेऊनच
!
--------------------------

सांगा कसं जिंकायचं?

अडीचशे धावा केल्यानंतर अगदी हसत-खेळत, प्रतिस्पर्ध्याला दमवत, आक्रमक खेळत?

वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ जिंकला! कसा? तर धापा टाकत, दमत, कण्हत आणि कुथत!!

टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपान्त्य एकतर्फी झाला आणि दुसरा त्याच्या अगदी टोकाचा. क्रिकेट संकेतस्थळांचे मॅच प्रेडिक्टर भारताच्या विजयाची हमी देणारी कोणतीही टक्केवारी दाखवत असोत; ही लढत शेवटच्या दोन षट्कांपर्यंत अतिशय चुरशीची झाली.

हा सामना मुंबईऐवजी पर्थ किंवा अ‍ॅडलेड येथील मैदानांवर, द लॉर्ड्स किंवा ओव्हलच्या स्टेडियमवर, कोलंबो किंवा कँडी... असा अन्य कोठे खेळला गेला असता, तर हाच निकाल लागला असता का? ह्याचं उत्तर देणं मोठं कठीण आहे. घरच्या मैदानावर, नेहमीच्या वातावरणात खेळताना सूर्यकुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांची मोठी दमछाक झाली. कशीबशी अंतिम फेरी गाठली ह्या संघाने. हा निकाल दिलासा देणारा नक्कीच नाही. उलट अंतिम सामन्यासाठी इशारे देणारा असा हा विजय आहे.

ह्या तीनच दिवसांत सर्वांचा लाडका ठरलेला संजू सॅमसन ह्याची सामन्याचा मानकरी म्हणून भले निवड झाली असो. सामन्याचा हीरो होता जेकब बेथल!

संजू सॅमसन चांगलाच खेळला. सलग दुसऱ्या सामन्यातील त्याच्या अर्धशतकामुळे (आणि हुकलेल्या दुसऱ्या शतकाची चुटपुट लावणाऱ्या खेळीमुळे) भारताला इंग्लंडविरुद्ध धावांचा डोंगर उभा करता आला.

निर्णायक लढतीत भारताने मिळविलेल्या विजयात संजूचा वाटा मोठाच. पण ह्या उत्तुंग धावसंख्येचा पाठलाग निडरपणे करणारी जेकबची खेळीही तेवढीच महत्त्वाची.

संजू सलामीला आलेला. जेकब चौथ्या क्रमांकावर. दोन गडी झटपट बाद झाल्यावर. दडपणाखाली. संजूच्या ८९ धावा ४२ चेंडूंमध्ये. जेकबने ४८ चेंडूंमध्ये १०५ धावा केलेल्या. त्या करताना आपण लढतीतून अजून बाहेर पडलो नाही असा समोरच्या सहकाऱ्याला दिलासा देणाऱ्या. योगायोग असा की, ह्या दोघांचेही चौकार व षट्कार समान – आठ आणि सात. ह्याचा दुसरा अर्थ असा की, संजूपेक्षा जेकब एकेरी-दुहेरी धावा अधिक पळाला. तेही धावांचा पाठलाग करताना.

पहिल्या काही मिनिटांतच पाहुण्यांचा कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं संजूवर कृपा केली होती. डावातलं तिसरं षट्क टाकणाऱ्या जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर हॅरीनं संजूचा झेल सोडलेला. त्या जीवदानाचा त्यानं पुरेपूर फायदा उठवला.

षट्कार मारण्याच्या प्रयत्नात संजू बाद झाला, तेव्हा संघाच्या दीडशेहून अधिक धावा झालेल्या. तेव्हा जवळपास सहा षट्कांचा डाव बाकी होता. अब तुम्हारे हवाले वतन साथीयों... असं म्हणण्याचं स्वातंत्र्य त्याला होतं.


आपल्या आधी दोन आणि समोर चार गडी बाद होत असल्याचे पाहणाऱ्या जेकबला ही मुभा नव्हती. संघ जिंकायचा असेल तर आपल्यालाच खेळावं लागेल, ह्याची जाणीव असल्यामुळं दुसरी धाव घेताना तो बाद झाला. त्या वेळी संघाला विजयासाठी २९ धावा आवश्यक होत्या. तो धावचित झाला आणि भारतीय संघानं खऱ्या अर्थानं निःश्वास टाकला.

बेथल सुदैवी नव्हता, असं नाही. त्याचं शतक साजरं झालं ते सुटलेल्या झेलाच्या षट्कारावर. पण अक्षर पटेल ह्यानं प्रयत्न करूनही न झालेला तो झेल अवघड होता. त्यात यश मिळतं तर अक्षरच्या नावावर आणखी एका अफ्लातून झेलाची नोंद झाली असती. त्याच्या अफाट क्षेत्ररक्षणाचा आजच्या विजयातील मोठा वाटा विसरता येणार नाही.

पहिल्या सहा षट्कांमध्ये बिनीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतरही इंग्लंड संघानं प्रयत्न सोडले नाहीत. ह्या झुंजारपणाला दाद द्यायलाच हवी. आणि ही कडवी झुंज दिली बेथलं ह्यानं.

विजयासाठी १८ चेंडूंमध्ये ४५ धावांची गरज असताना जसप्रीत बुमराह ह्यानं टाकलेलं अठरावं षट्क कमाल होतं. त्यात त्यानं फक्त सहा धावा दिल्या. नंतरच्या षट्कात पहिल्याच चेंडूवर बेथल ह्यानं षट्कार ठोकल्यानंतरही हार्दिकनं नऊच धावा दिल्या. शिवाय त्यानं सॅम करन ह्याला तिलक वर्माच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं होतं. भारताचा विजय तिथे नक्की झाला होता. किती धावांनी?’, एवढाच प्रश्न होता.

अखेरच्या षट्कात हे अंतरही झपाट्यानं कमी झालं. आता सामना आपलाच ह्या समजुतीनं कर्णधारानं चेंडू शिवम दुबे ह्याच्या हाती सोपवला. वेस्ट इंडिजविरुद्ध दोनच षट्कांत ४६ धावांची खिरापत वाटणाऱ्या दुबेवर हा मोठाच विश्वास दाखवलेला. जोफ्रा आर्चर ह्यानं त्याला तीन षट्कार मारले. दुबेनं २२ धावा दिल्या. अर्थात त्यानं फलंदाजीत बढती मिळाल्यावर २५ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या, हे विसरता येणार नाही. पण षट्कामागे पावणेबारा धावा मोजणारा अक्षरही तेथे चालला असता.

ह्या सामन्यात ४० षट्कांत ४९९ धावा झाल्या. अनेक विक्रम रचले गेले. दोन्ही संघांकडून ३९ चौकार आणि ३४ षट्कारांची आतषबाजी झाली. मग गोलंदाजांचं काय? सामन्यात एकूण १२ खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यापैकी बुमराह व हार्दिक पंड्या ह्या दोघांनीच षट्कामागे दहापेक्षा कमी धावा दिल्या. फलंदाजांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून गोलंदाजांनी शिमगा करावा, हे काही योग्य नाही.

अहमदाबादेत विजेतेपदासाठी भारतीय संघाला चिवट न्यू झीलँडशी लढावे लागणार आहे. वरुण चक्रवर्तीनामक शस्त्र धार पूर्णपणे गमावून बसल्याचे दिसते. एक एकच सामना वाट्याला आलेले कुलदीप यादव व महंमद सिराज आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे मैदानात उठून दिसणारा रिंकू ह्यांचा संघात समावेश होईल का? काही दिवसांपूर्वी संजू सॅमसन ट्रोलरचे आवडते गिऱ्हाईक होते. त्याची जागा आता अभिषेक शर्मा ह्यानं घेतली आहे. अभिषेकला संघाबाहेर ठेवण्याचं धाडस कोणी करील? की एका स्फोटक खेळीच्या अपेक्षेवर त्याला पुन्हा संधी दिली जाईल?

इंग्लंडवर फक्त सात धावांनी विजय मिळविलेला भारतीय संघ अंतिम फेरीत गेला तो अनेक अनुत्तरित प्रश्न आणि डोक्याला खुराक देणाऱ्या अडचणी घेऊनच!

….

(छायाचित्रे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद व भारतीय क्रिकेट मंडळ ह्यांच्या संकेतस्थळांवरून साभार.)

….

#टी20_विश्वचषक #उपान्त्य_सामना #भारत_इंग्लंड #संजू_सॅमसन #जेकब_बेथल #अक्षर_पटेल





शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

रो-को विजय

रोक सको तो रोक लो... तीन सामन्यांमध्ये दोन शतकं!
............
मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर पंधरवड्याच्या आतच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एक दिवशीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर (की निवृत्ती घ्यायला लावल्यानंतर?) विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्यांदाच भारतात खेळले.

अजून दोन वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी हे दोघे संघात असतील का नाही? चर्चेचा हा मोठा विषय. पण ह्या मालिकेतील तिन्ही सामन्यांतून त्यांनी आपल्या बॅटने ह्या चर्चेला चोख उत्तर दिले आहे. ह्या मालिकेवर त्यांचीच ठळक छाप उमटली.

मालिकेतील पहिले दोन सामने तुलनेने चुरशीचे झाले. रायपूरच्या लढतीत साडेतीनशेच्या पार जाऊनही भारताला पराभव चाखावा लागला. त्यामुळेच विशाखापट्टणम येथे आज झालेला सामना निर्णायक होता. तो अगदीच एकतर्फी झाला. त्याचे श्रेय आधी कुलदीप यादवला आणि नंतर मैदानात उतरलेल्या तिन्ही फलंदाजांना. त्यातल्या यशस्वीचे शतक, तर रोहित व विराट ह्यांची अर्धशतके. नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला यजमानांनी.

मालिकेचा मानकरी विराट ठरला, ह्यात नवल नाही. त्यानं दोन शतकांसह ३०२ धावा केल्या. मालिकेत भारताच्या मिळून ९७८ धावा. म्हणजे संघाच्या धावसंख्येपैकी ३०.८७ टक्के धावा एकट्या विराटच्या. अलीकडच्या काही वर्षांत आणि काही महत्त्वाच्या लढतींमध्ये दिसून आलं की, विराट फटकेबाजी न करता एकेरी, दुहेरी धावांवर भर देतो. ती शैली ह्या मालिकेत विराटनं बदलली. तीन डावांमध्ये त्यानं २४ चौकार आणि १५ षट्कार अशी आतषबाजी केली. रोहितचे जेवढे चौकार आहेत, तेवढे विराटचे षट्कार.

ह्या टायगरनंही डरकाळ्या फोडल्या!
............
वय झालं असं ज्याच्या बाबतीत म्हटलं जातं, असा दुसरा खेळाडू रोहित शर्मा. त्यानंही मालिकेत दोन अर्धशतकं झळकावली. त्याच्या एकूण १४६ धावा (१५ चौकार षट्कार) आणि त्या संघाच्या धावांच्या १४.९२ टक्के. विराट आणि कोहली ह्यांच्या मिळून धावा ४५. टक्के! कर्णधार राहुल (दोन अर्धशतकं), ऋतुराज गायकवाड व यशस्वी जयस्वाल (प्रत्येकी एक शतक) ह्यांनीही आपली भूमिका बजावली.

महत्त्वाचं म्हणजे मालिकेत पाहुण्यांचा संघ दोनदा पूर्ण बाद झाला. त्याच्या उलट भारताने फक्त १४ गडी गमावले. कुलदीप यादवनं सर्वाधिक नऊ बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णानं सात बळी घेतले, पण त्यासाठी बऱ्यापैकी धावा मोजल्या. अर्शदीप सिंग ह्यानं पाचच बळी घेतले खरे; तथापि त्यानं षट्कामागे दिलेल्या धावा जेमतेम साडेपाच होत्या.

भारतानं मालिका जिंकली, हे महत्त्वाचं. पण त्याहून सुखद गोष्ट म्हणजे टायगर अभी ज़िंदा है... हे सांगणाऱ्या विराट व रोहित ह्यांच्या डरकाळ्या!

(छायाचित्र सौजन्य – bcci.tv)
.........


#भारत_दआफ्रिका #विराट_कोहली #रोहित_शर्मा #कुलदीप_यादव #अर्शदीप_सिंग #एकदिवशीय_मालिका

चंदनापुरीत भेटलेला अजिंक्य रहाणे

  देखणा फटका... ही बॅट आता निवृत्त झाली! (छायाचित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सौजन्याने.) .......................................... ...