शनिवार, १८ जुलै, २०२६

अखेरचा राम राम, पावनं!

  डॉ. कुमार सप्तर्षी : सदर लेखन ते निवडणूक - पाहिलेला प्रवास 

'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडवून दिला.
त्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉक्टरांचं नगरी भाषेतलं
साप्ताहिक सदर - 'राम राम पावनं'. ह्याच सदराच्या
लोकप्रियतेचा आपल्याला निवडणुकीत फायदा होणारच,
असं सांगत ते १९९६मध्ये नगरमधून
लोकसभेच्या निवडणूक मैदानात उतरले.


हातात माईक म्हणजे समोरच्यांचं संमोहन निश्चित! - डॉ. कुमार सप्तर्षी

.........................

डॉ. कुमार सप्तर्षी ह्यांचे नाव पहिल्यांदा ऐकले ते सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाच्या वेळी. त्या वेळी करमाळ्यात प्राथमिक शाळेत होतो. महात्मा गांधी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इथे गडबड झाल्याचं ऐकायला मिळालं. त्या आंदोलनाचं नेतृत्व डॉ. सप्तर्षी करीत होते, असं समजलं नंतर. हा एवढा मोठा माणूस आपल्या जवळच्या राशीनचा, हे ऐकल्यावर तर आश्चर्यच वाटलं. सगळी मोठी माणसे शहरातलीच असतात, असा तेव्हाचा समज. 😀
पुढे विशीत असताना डॉक्टरांनी करमाळ्यातून विधानसभेची निवडणूक लढविली. मतदानाचा अधिकार अजून मिळायचा होता. त्या निवडणुकीत त्यांची भाषणे दोन वेळा ऐकायला मिळाली. श्रोत्यांना जिंकणारं त्यांच्या भाषेतलं वक्तृत्व होतं ते. त्यांच्या प्रचारासाठी नामवंत अभिनेते निळू फुले आले होते. त्यांचा संवाद तर एकदम मनमोकळा. त्या सभेत डॉ. सप्तर्षी ह्यांनी करमाळ्याचे तेव्हाचे नगराध्यक्ष गिरधरदास देवी ह्यांच्यावर जोरदार टीका केल्याचे आठवते. ह्या टीकेला करमाळकर कसा प्रतिसाद देतात म्हणून पाहिलं, तर गंमत म्हणजे हे ऐकायला गिरधरदास ह्यांची पुतणी व आमची वर्गमैत्रीण संगीता देवी नागर तिथे होती!😀 तिलाही ते कदाचीत आठवणार नाही आता. मतदानाच्या आदल्या दिवशी गल्लीत काही महिला हळदी-कुंकू देण्यासाठी आल्या होत्या. चौकशी केल्यावर त्या डॉक्टरांच्या कार्यकर्त्र्या असल्याचं समजलं. 🤔
राम राम पावनं...
'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडविला. त्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉक्टरांचं साप्ताहिक सदर - 'राम राम पावनं' खास नगरी भाषेत लिहिलेलं आणि आरंभीचा काही महिने झकास चाललेलं. काही काळानंतर त्यांनी आपल्या पद्धतीनं त्याला वळण दिलं. नगरपालिकेच्या एका सभेत बाकावर उभे राहून गोंधळ घालणाऱ्या सदस्याचे छायाचित्र आम्ही प्रसिद्ध केले. त्याच्या वर्तणुकीचा उपहास करणाऱ्या ओळी मी दिल्या होत्या. पण पुढच्या आठवड्यात डॉक्टरांनी त्या नगरसेवकाचं कौतुक करण्यात अख्खं सदर खर्ची केलं!
त्याच दरम्यान कधी तरी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे डॉक्टरांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एन्रॉन प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात कोल्हेसाहेब सहभागी झाले. त्या काळात कोल्हेसाहेबांच्या तोंडून डॉक्टरांचंच कौतुक ऐकायला मिळे. म्हणजे संमोहन किती तगडे असेल बघा. ह्या आंदोलनात भाग घेतल्याची काही ना काही राजकीय किंमत त्यांना बहुदा चुकवावी लागली असणार.

तरुणपणीचे डॉ.सप्तर्षी
................
निवडणुकीत फायदा होणारच
हे सदर फार लोकप्रिय झाल्याचा फायदा आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात होणार, असं गृहित धरून डॉ. सप्तर्षी ह्यांनी लोकसभेच्या १९९६च्या निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्या वेळी प्रचार चांगला महिना-दीड महिना चालायचा. त्यामुळे जवळपास रोजच ते 'लोकसत्ता'च्या कार्यालयात येत. खास निवडणुकीच्या बातम्यांसाठी केलेल्या पानावर पट्टी होती. त्यात सर्व प्रमुख राष्ट्रीय पक्षांची निवडणूक चिन्हं दिलेली. फक्त त्यांच्या समता पक्षाची 'मशाल' नव्हती. 'त्या पट्टीत आमची 'मशाल' घ्या, नाही तर तुमच्याविरुद्ध मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे,' असं ते दर दोन दिवसांनी बजावत. अतिशय गंभीरपणे ते बोलत आहेत, असं तेव्हा वाटे. पण तशी काही तक्रार त्यांनी शेवटपर्यंत केली नाही.
ह्या निवडणुकीच्या काळातच बिंदुमाधव ठाकरे ह्यांचे अपघातात निधन झाले. रात्रीचे ११ वाजले होते. संपादकीय विभागात मी एकटाच होतो.काम पूर्ण झालेले, निघायची तयारी आणि फोन वाजला. डॉक्टर बोलत होते. 'बिंदुमाधव ह्यांना मी वाहिलेली श्रद्धांजली उद्या मुंबईच्या अंकात पहिल्या पानावर आली पाहिजे. मी सांगतो ते लिहून घे,' असं त्यांनी सांगितलं. अंकाचं सगळं काम संपलं आहे, कम्प्युटर ऑपरेटरही गेले, असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. बाळासाहेबांचे आणि माझे, मीनाताईंचे आणि माझे किती जवळचे संबंध आहेत, हेच सांगत राहिले - 'माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हव्यात.' त्यांची श्रद्धांजली लिहून घेतली, पुन्हा वाचून दाखविली आणि फोन ठेवला. ती बातमी मुंबईला जाण्याचा प्रश्नच नव्हता!
घाईत असूनही अर्धा तास बसले
असेच एका रात्री ते आले. दिवसभराच्या दौऱ्यात कोठे कोठे सभा घेतल्या, ह्याची पत्रके दिली. 'राम राम पावनं'मुळं वातावरण कसं चांगलं आहे आणि निवडून कसा येणार, हे त्यांनी (कितव्यांदा तरी) सांगितलं. त्यांना म्हणालो, 'बसा थोडा वेळ.'त्यावर त्यांचं उत्तर होतं - 'घाईत आहे आता.' सहज म्हणून विचारलं, 'तुम्ही एवढं छान मासिक ('सत्याग्रही विचारधारा') काढता, त्यात तुमचे मित्र डॉ. अनिल अवचट ह्यांना का लिहायला सांगत नाही?' हे विचारलं आणि 'फार घाई असलेले' डॉक्टर शेजारच्या खुर्चीत ठाण मांडून बसले. 'अनिलला मीच कसं लिहायला लावलं' येथून त्यांनी सुरुवात केली आणि पुढे अर्धा तास ते बोलत राहिले. आपलं लेखन बाळासाहेब ठाकरे ह्यांना कसं आवडतं, हे ते पुनःपुन्हा सांगत होते.
त्या वेळी (आणि आधीही काही भाषणं ऐकली होती, तेव्हा) एक लक्षात आलं की, त्यांच्या बोलण्यात विलक्षण ताकद आहे. मुद्दे पटवून देण्याची हातोटी जबरदस्त आहे. ऐकताना समोरचा संमोहित होतो. निवडणूक काळातील त्यांच्या त्या बोलण्यानंतर मलाही काही दिवस वाटत होतं की, डॉक्टर निवडून येणार नाहीत; पण शर्यतीत असतील. दुसरा नाही तरी तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर राहतील. पण मतदारांनी त्यांना लांबूनच 'राम राम' ठोकला. डॉक्टरांना अडतीसशे (०.७ टक्के) मतं मिळाली. निकालानंतर ते पुन्हा कधीच 'लोकसत्ता' कार्यालयात आले नाहीत.
त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि ह्यासह बरंच काही आठवलं.
...
(छायाचित्रं 'सत्याग्रही विचारधारा'च्या सौजन्याने)
....
#Dr_Kumar_Saptarshi #Kumar_Saptarshi_Death #ram_ram_pawane #Satyagrahi_Vichardhara, #Loksabha_1996 #Loksatta #Ahmednagar #Karmala

सोमवार, ९ मार्च, २०२६

आगीत वितळला बर्फ

 
.......................................
इंग्लंडमधल्या उपान्त्य सामन्यासारखं अहमदाबादेत झालं नाही.
इथे आगीची आच लागताच बर्फाचं पाणी पाणी झालं.
सँटनर सामन्याआधी जे काही म्हणाला, ते फुकाचे बोल ठरले. पहिल्या सहा षट्कांमध्ये भारतीय सलामीवीरांनी पॉवर दाखवून दिली.
मग गोलंदाजांनी किवी फलंदाजांना लगाम घातला.
पाहुण्यांच्या गोलंदाजांची शरणागती आणि फलंदाजांचे साफ लोटांगण!
-------------------------------------

एक दिवशीय विश्वचषक स्पर्धेत २०१९मध्ये उपान्त्य फेरीत भारताची गाठ न्यू झीलँडशी पडली होती. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचं वर्णन तेव्हा आगीचा लोळ केलं गेलं. आणि केन विल्यम्सन ह्याचा संघ बर्फासारखा. त्या लढतीत भलतंच झालं. थंडगार बर्फानं आगीचा लोळ गिळून टाकला.

अहमदाबादेत मात्र फार वेगळं झालं. आगीची नुसती आच लागताच बर्फ वितळणं सुरू झालं. यजमानांनी टी20 विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावणारा हा पहिलाच संघ. विश्वचषक यजमानांन धार्जिणा नाही, हा एक दिवशीय क्रिकेटमधला समज भारतानंच २०११मध्ये मोडून काढला.

पॅट कमिन्स आणि मिचेल सँटनर. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोघेही विश्वचषक पटकावण्यासाठी आले होते. प्रतिस्पर्धी अर्थातच तगडा, यजमान भारतीय संघ.

एक दिवशीय विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर २३ रोजी झाला. आधीचे सर्व सामने दिमाखात जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत आलेला. सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार बैठकीत कमिन्स म्हणाला होता, स्टेडियममधील प्रेक्षकांची बोलती आम्ही बंद करू!’

टी20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीपूर्वी रविवारी पत्रकारांशी बोलताना सँटनर हेच म्हणाला. तीच भाषा. किवी कर्णधाराच्या नव्हे, तर ऑस्ट्रेलियाई कप्तानाच्या तोंडी शोभणारी.

नाणेफेक जिंकल्यावर कमिन्सने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सँटनरने आज तेच केलं. पण तो निर्णय त्याच्या सपशेल अंगलट आला.

खरे झाले होते कमिन्सचे बोल. सँटनरचं वक्तव्य फोल. नरेंद्र मोदी स्टेडियममधील अदमासे लाखभर प्रेक्षक पहिल्या षट्कापासून कल्ला करीत होते. आणि सामन्याचा शेवटचा चेंडू पडला, तेव्हा तो आवाज टिपेला गेला होता. किवीजचा आवाज बंद!

बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाचा उपान्त्य फेरीत लीलया पाडाव करणाऱ्या सँटनरच्या संघाला अंतिम लढतीत सूर सापडलाच नाही. आधी त्यांच्या गोलंदाजांनी शरणागती पत्करली. नंतर त्यांच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. अपवाद एखाद-दोन. सामन्याच्या एकतर्फी निकालात बदल घडविण्याची ताकद ह्या अपवादांमध्ये नव्हती.

उपान्त्य सामन्यात अडीचशेचा उंबरठा ओलांडल्यानंतरही भारताला विजयासाठी झुंजावं लागलं. सलग दुसऱ्या सामन्यात त्यांनी ही धावसंख्या ओलांडली. गोलंदाजीची वेळ आली तेव्हा प्रतिस्पर्ध्यांना वरचढ होऊ देण्याची चूक ह्या वेळी घडली नाही.

कोणत्याही षट्कात भारतीय संघाच्या धावसंख्येची बरोबरी साधणं पाहुण्यांना जमलं नाही. भारतीय डावात सात षट्कं अशी होती की, ज्यात दहापेक्षा कमी धावा निघाल्या. त्याच्या उलट भारतीय गोलंदाजांनी असा लगाम घातला की, ब्लॅक कॅप्स संघाला केवळ सहा षट्कांमध्ये दहापेक्षा अधिक धावा करता आल्या.

अंतिम सामन्यापूर्वी अनेक प्रश्नांची चर्चा माध्यमात, सामाजिक माध्यमावर चालू होती. सतत अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला वगळणार का? त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणार का?


वादळी सलामी... पॉवर-प्लेमध्ये विक्रमी धावसंख्या.
...........
ह्या सगळ्या चर्चा फोल ठरल्या. अभिषेक आणि संजू सॅमसन हीच जोडी सलामीला आल्या. मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्स ह्यांच्या पहिल्या दोन षट्कांत डझनभरच धावा निघाल्या. त्यातही फिलिप्सनं फक्त पाच धावा दिल्या.

वादळापूर्वीची शांतता म्हणतात तशी ती होती, हे नंतरच्या चार षट्कांमध्ये दिसलं. ह्या जोडीनं समोर कोण आहे, तो काय टाकतो आहे, ह्याची पर्वा न करता ८० धावा कुटल्या. पॉवर प्लेमध्ये ९२. जलदगती गोलंदाजांना घेऊन खेळण्याची चूक किवीजना भोवली.

धावांची बरसात करणारा अभिषेक पुन्हा दिसला. त्याचं अर्धशतक १८ चेंडूंमध्येच. रचिन रवींद्रचा पहिलाच चेंडू वाईड होता. त्याची छेड काढली नसती तर... पण तसा विचार करण्याची वेळ ईशान किशननं येऊ दिली नाही. पहिल्या तिन्ही फलंदाजांनी एवढी अफाट फटकेबाजी केली की, तीनशे धावाही शक्य वाटू लागल्या होत्या.

पण १५ ते १९ ह्या पाच षट्कांमध्ये फक्त दोन चौकार आणि चार जण बाद झालेले. ही कसर शिवम दुबे ह्यानं अखेरच्या षट्कात भरून काढली. सूर्यकुमारच्या जागी त्याला बढती दिली असती तर? आधीच्या तीन षट्कांमध्ये फक्त २२ धावा देऊन तीन बळी मिळविणाऱ्या जिमी नीशम ह्याचं पृथक्करण दुबेने पार बिघडवून टाकलं.

डावातील आणि अर्षदीपसिंगच्या पहिल्या षट्कातील पाचव्याच चेंडूवर फिन ॲलन सुदैवी ठरला. शिवम दुबेच्या हातून सीमारेषेवर चेंडू सुटला. मग टिम सैफर्ट ह्यानं हार्दिक पंड्याला दोन दोन षट्कार आणि चौकार खेचले, तेव्हा जेकब बेथल ह्याचीच आठवण झाली.

किवी संघाचं हे अवसान उसनं ठरलं. सुरुवात अक्षर पटेलने केली. ॲलनचा फटका लाँग ऑनवरच्या तिलक वर्माच्या हाती जाऊन स्थिरावला. मग बुमराहला पहिल्याच चेंडूवर बळी मिळवून दिला किशनने. काय अफलातून झेल होता तो.


आणखी एक अडथळा दूर... विजयाकडे पुढचे पाऊल.
...................................
वरुण चक्रवर्ती ह्यानं अर्धशतकवीर सैफर्टचा अडथळा दूर केला, तेव्हा न्यू झीलँड संघ विजयापासून अधिक दूर गेला. सोळाव्या षट्कात बुमराहनं लागोपाठ दोन ठेवणीतले चेंडू टाकले – हळुवार यॉर्कर. परिणाम? जिमी निशम आणि मॅट हेन्री ह्यांचा त्रिफळा उडालेला! काय षट्क होतं ते...

त्याच्या आधी डॅरील मिचेल आणि सँटनर ह्यांची जोडी थोडी जमल्यासारखी वाटत होती. अकराव्या षट्कात अर्षदीपने केलेला प्रकार थोडा अतीच होता. आवेशात फेकलेला चेंडू हातावर लागल्यानं मिचेल संतापला होता. खरं तर अर्षदीपनं त्याच वेळी जाऊन मिचेलची माफी मागायला हवी होती.


चेंडू उंच उडाला;
ईशानच्या हाती स्थिरावला!
....................
अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह ह्यांनी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, त्याला तोडच नाही. त्यांना आज साथ लाभली ईशानच्या चपळ क्षेत्ररक्षणाची. त्यानं तीन झेल घेत मागच्या सामन्यातील अक्षरच्या कामगिरीची आठवण करून दिली. त्यामुळंच सामन्याचा मानकरी ठरण्याच्या शर्यतीत तोही आला होता.

सूर्यकुमार यादवच्या संघानं विजेत्याच्या थाटात खेळ केला – पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत. उपान्त्य सामना रडतखडत जिंकणारा हाच का तो संघ, अशी शंका वाटावी, एवढी सफाईदार कामगिरी.

न्यू झीलँडबाबत नेमकं उलटं घडलं. एक गड्याच्या मोबदल्यात पावणेदोनशे धावा करणारा संघ १६० धावांतच ढेपाळला कसा? ह्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये न्यू झीलँडचे दोन्ही सलामीवीर आहेत. आणि गोलंदाजीत रचिन रवींद्र सातव्या क्रमांकावर. पहिल्या पाचात भारताच्या प्रत्येकी दोघांनी जागा पटकावली आहे.

ह्या विजयानं अहमदाबादेतील सव्वादोन वर्षांपूर्वीची जखम बुजवली आहे. गौतम गंभीरच्या कर्तृत्वाबद्दल उपस्थित केलेल्या सगळ्या शंका विरल्या नाहीत. पण त्यातला चेव नक्कीच कमी होईल. कर्णधार सूर्याची कामगिरी काही काळ तरी फलंदाज सूर्याचं अपयश नजरेआड करील. स्पर्धेत सर्वाधिक झेल सोडणारा संघ आपला होता. तेही आपण तूर्त विसरून जाऊ.

युद्ध हिंद महासागराच्या दाराशी आल्याच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बातम्या ऐकायला-पाहायला मिळत आहेत. ते मळभ दूर करणारं, ती चिंता आज-उद्यापर्यंत तरी विसरायला लावणारं हे विश्वविजेतपद आहे.

.....
(छायाचित्र सौजन्य भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व दैनिक गार्डियन)
......
#टी20_विश्वचषक #भारत_विश्वविजेता #भारत_न्यूझीलँड #संजू_सॅमसन #बुमराह #अक्षर_पटेल_बापू #मिचेल_सँटनर #ईशान_किशन #सूर्यकुमार_यादव
......


शुक्रवार, ६ मार्च, २०२६

रडतखडत आणि कण्हत-कुथत!

 


अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न आणि बेथल धावबाद.
मोठा अडथळा दूर झाल्याचा आनंद भारतीय खेळाडूंना आवरता न येणाराच...
...........
भारतीय संघ जिंकला! धापा टाकत, दमत, कण्हत आणि कुथत!!
संजू सॅमसन ह्याची सामन्याचा मानकरी म्हणून भले निवड झाली असो.
सामन्याचा हीरो होता जेकब बेथल
!
ह्या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत गेला आहे,
 तो अनेक अनुत्तरित प्रश्न आणि डोक्याला खुराक देणाऱ्या
अडचणींचे ओझे बरोबर घेऊनच
!
--------------------------

सांगा कसं जिंकायचं?

अडीचशे धावा केल्यानंतर अगदी हसत-खेळत, प्रतिस्पर्ध्याला दमवत, आक्रमक खेळत?

वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ जिंकला! कसा? तर धापा टाकत, दमत, कण्हत आणि कुथत!!

टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपान्त्य एकतर्फी झाला आणि दुसरा त्याच्या अगदी टोकाचा. क्रिकेट संकेतस्थळांचे मॅच प्रेडिक्टर भारताच्या विजयाची हमी देणारी कोणतीही टक्केवारी दाखवत असोत; ही लढत शेवटच्या दोन षट्कांपर्यंत अतिशय चुरशीची झाली.

हा सामना मुंबईऐवजी पर्थ किंवा अ‍ॅडलेड येथील मैदानांवर, द लॉर्ड्स किंवा ओव्हलच्या स्टेडियमवर, कोलंबो किंवा कँडी... असा अन्य कोठे खेळला गेला असता, तर हाच निकाल लागला असता का? ह्याचं उत्तर देणं मोठं कठीण आहे. घरच्या मैदानावर, नेहमीच्या वातावरणात खेळताना सूर्यकुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांची मोठी दमछाक झाली. कशीबशी अंतिम फेरी गाठली ह्या संघाने. हा निकाल दिलासा देणारा नक्कीच नाही. उलट अंतिम सामन्यासाठी इशारे देणारा असा हा विजय आहे.

ह्या तीनच दिवसांत सर्वांचा लाडका ठरलेला संजू सॅमसन ह्याची सामन्याचा मानकरी म्हणून भले निवड झाली असो. सामन्याचा हीरो होता जेकब बेथल!

संजू सॅमसन चांगलाच खेळला. सलग दुसऱ्या सामन्यातील त्याच्या अर्धशतकामुळे (आणि हुकलेल्या दुसऱ्या शतकाची चुटपुट लावणाऱ्या खेळीमुळे) भारताला इंग्लंडविरुद्ध धावांचा डोंगर उभा करता आला.

निर्णायक लढतीत भारताने मिळविलेल्या विजयात संजूचा वाटा मोठाच. पण ह्या उत्तुंग धावसंख्येचा पाठलाग निडरपणे करणारी जेकबची खेळीही तेवढीच महत्त्वाची.

संजू सलामीला आलेला. जेकब चौथ्या क्रमांकावर. दोन गडी झटपट बाद झाल्यावर. दडपणाखाली. संजूच्या ८९ धावा ४२ चेंडूंमध्ये. जेकबने ४८ चेंडूंमध्ये १०५ धावा केलेल्या. त्या करताना आपण लढतीतून अजून बाहेर पडलो नाही असा समोरच्या सहकाऱ्याला दिलासा देणाऱ्या. योगायोग असा की, ह्या दोघांचेही चौकार व षट्कार समान – आठ आणि सात. ह्याचा दुसरा अर्थ असा की, संजूपेक्षा जेकब एकेरी-दुहेरी धावा अधिक पळाला. तेही धावांचा पाठलाग करताना.

पहिल्या काही मिनिटांतच पाहुण्यांचा कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं संजूवर कृपा केली होती. डावातलं तिसरं षट्क टाकणाऱ्या जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर हॅरीनं संजूचा झेल सोडलेला. त्या जीवदानाचा त्यानं पुरेपूर फायदा उठवला.

षट्कार मारण्याच्या प्रयत्नात संजू बाद झाला, तेव्हा संघाच्या दीडशेहून अधिक धावा झालेल्या. तेव्हा जवळपास सहा षट्कांचा डाव बाकी होता. अब तुम्हारे हवाले वतन साथीयों... असं म्हणण्याचं स्वातंत्र्य त्याला होतं.


आपल्या आधी दोन आणि समोर चार गडी बाद होत असल्याचे पाहणाऱ्या जेकबला ही मुभा नव्हती. संघ जिंकायचा असेल तर आपल्यालाच खेळावं लागेल, ह्याची जाणीव असल्यामुळं दुसरी धाव घेताना तो बाद झाला. त्या वेळी संघाला विजयासाठी २९ धावा आवश्यक होत्या. तो धावचित झाला आणि भारतीय संघानं खऱ्या अर्थानं निःश्वास टाकला.

बेथल सुदैवी नव्हता, असं नाही. त्याचं शतक साजरं झालं ते सुटलेल्या झेलाच्या षट्कारावर. पण अक्षर पटेल ह्यानं प्रयत्न करूनही न झालेला तो झेल अवघड होता. त्यात यश मिळतं तर अक्षरच्या नावावर आणखी एका अफ्लातून झेलाची नोंद झाली असती. त्याच्या अफाट क्षेत्ररक्षणाचा आजच्या विजयातील मोठा वाटा विसरता येणार नाही.

पहिल्या सहा षट्कांमध्ये बिनीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतरही इंग्लंड संघानं प्रयत्न सोडले नाहीत. ह्या झुंजारपणाला दाद द्यायलाच हवी. आणि ही कडवी झुंज दिली बेथलं ह्यानं.

विजयासाठी १८ चेंडूंमध्ये ४५ धावांची गरज असताना जसप्रीत बुमराह ह्यानं टाकलेलं अठरावं षट्क कमाल होतं. त्यात त्यानं फक्त सहा धावा दिल्या. नंतरच्या षट्कात पहिल्याच चेंडूवर बेथल ह्यानं षट्कार ठोकल्यानंतरही हार्दिकनं नऊच धावा दिल्या. शिवाय त्यानं सॅम करन ह्याला तिलक वर्माच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं होतं. भारताचा विजय तिथे नक्की झाला होता. किती धावांनी?’, एवढाच प्रश्न होता.

अखेरच्या षट्कात हे अंतरही झपाट्यानं कमी झालं. आता सामना आपलाच ह्या समजुतीनं कर्णधारानं चेंडू शिवम दुबे ह्याच्या हाती सोपवला. वेस्ट इंडिजविरुद्ध दोनच षट्कांत ४६ धावांची खिरापत वाटणाऱ्या दुबेवर हा मोठाच विश्वास दाखवलेला. जोफ्रा आर्चर ह्यानं त्याला तीन षट्कार मारले. दुबेनं २२ धावा दिल्या. अर्थात त्यानं फलंदाजीत बढती मिळाल्यावर २५ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या, हे विसरता येणार नाही. पण षट्कामागे पावणेबारा धावा मोजणारा अक्षरही तेथे चालला असता.

ह्या सामन्यात ४० षट्कांत ४९९ धावा झाल्या. अनेक विक्रम रचले गेले. दोन्ही संघांकडून ३९ चौकार आणि ३४ षट्कारांची आतषबाजी झाली. मग गोलंदाजांचं काय? सामन्यात एकूण १२ खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यापैकी बुमराह व हार्दिक पंड्या ह्या दोघांनीच षट्कामागे दहापेक्षा कमी धावा दिल्या. फलंदाजांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून गोलंदाजांनी शिमगा करावा, हे काही योग्य नाही.

अहमदाबादेत विजेतेपदासाठी भारतीय संघाला चिवट न्यू झीलँडशी लढावे लागणार आहे. वरुण चक्रवर्तीनामक शस्त्र धार पूर्णपणे गमावून बसल्याचे दिसते. एक एकच सामना वाट्याला आलेले कुलदीप यादव व महंमद सिराज आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे मैदानात उठून दिसणारा रिंकू ह्यांचा संघात समावेश होईल का? काही दिवसांपूर्वी संजू सॅमसन ट्रोलरचे आवडते गिऱ्हाईक होते. त्याची जागा आता अभिषेक शर्मा ह्यानं घेतली आहे. अभिषेकला संघाबाहेर ठेवण्याचं धाडस कोणी करील? की एका स्फोटक खेळीच्या अपेक्षेवर त्याला पुन्हा संधी दिली जाईल?

इंग्लंडवर फक्त सात धावांनी विजय मिळविलेला भारतीय संघ अंतिम फेरीत गेला तो अनेक अनुत्तरित प्रश्न आणि डोक्याला खुराक देणाऱ्या अडचणी घेऊनच!

….

(छायाचित्रे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद व भारतीय क्रिकेट मंडळ ह्यांच्या संकेतस्थळांवरून साभार.)

….

#टी20_विश्वचषक #उपान्त्य_सामना #भारत_इंग्लंड #संजू_सॅमसन #जेकब_बेथल #अक्षर_पटेल





शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

रो-को विजय

रोक सको तो रोक लो... तीन सामन्यांमध्ये दोन शतकं!
............
मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर पंधरवड्याच्या आतच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एक दिवशीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर (की निवृत्ती घ्यायला लावल्यानंतर?) विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्यांदाच भारतात खेळले.

अजून दोन वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी हे दोघे संघात असतील का नाही? चर्चेचा हा मोठा विषय. पण ह्या मालिकेतील तिन्ही सामन्यांतून त्यांनी आपल्या बॅटने ह्या चर्चेला चोख उत्तर दिले आहे. ह्या मालिकेवर त्यांचीच ठळक छाप उमटली.

मालिकेतील पहिले दोन सामने तुलनेने चुरशीचे झाले. रायपूरच्या लढतीत साडेतीनशेच्या पार जाऊनही भारताला पराभव चाखावा लागला. त्यामुळेच विशाखापट्टणम येथे आज झालेला सामना निर्णायक होता. तो अगदीच एकतर्फी झाला. त्याचे श्रेय आधी कुलदीप यादवला आणि नंतर मैदानात उतरलेल्या तिन्ही फलंदाजांना. त्यातल्या यशस्वीचे शतक, तर रोहित व विराट ह्यांची अर्धशतके. नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला यजमानांनी.

मालिकेचा मानकरी विराट ठरला, ह्यात नवल नाही. त्यानं दोन शतकांसह ३०२ धावा केल्या. मालिकेत भारताच्या मिळून ९७८ धावा. म्हणजे संघाच्या धावसंख्येपैकी ३०.८७ टक्के धावा एकट्या विराटच्या. अलीकडच्या काही वर्षांत आणि काही महत्त्वाच्या लढतींमध्ये दिसून आलं की, विराट फटकेबाजी न करता एकेरी, दुहेरी धावांवर भर देतो. ती शैली ह्या मालिकेत विराटनं बदलली. तीन डावांमध्ये त्यानं २४ चौकार आणि १५ षट्कार अशी आतषबाजी केली. रोहितचे जेवढे चौकार आहेत, तेवढे विराटचे षट्कार.

ह्या टायगरनंही डरकाळ्या फोडल्या!
............
वय झालं असं ज्याच्या बाबतीत म्हटलं जातं, असा दुसरा खेळाडू रोहित शर्मा. त्यानंही मालिकेत दोन अर्धशतकं झळकावली. त्याच्या एकूण १४६ धावा (१५ चौकार षट्कार) आणि त्या संघाच्या धावांच्या १४.९२ टक्के. विराट आणि कोहली ह्यांच्या मिळून धावा ४५. टक्के! कर्णधार राहुल (दोन अर्धशतकं), ऋतुराज गायकवाड व यशस्वी जयस्वाल (प्रत्येकी एक शतक) ह्यांनीही आपली भूमिका बजावली.

महत्त्वाचं म्हणजे मालिकेत पाहुण्यांचा संघ दोनदा पूर्ण बाद झाला. त्याच्या उलट भारताने फक्त १४ गडी गमावले. कुलदीप यादवनं सर्वाधिक नऊ बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णानं सात बळी घेतले, पण त्यासाठी बऱ्यापैकी धावा मोजल्या. अर्शदीप सिंग ह्यानं पाचच बळी घेतले खरे; तथापि त्यानं षट्कामागे दिलेल्या धावा जेमतेम साडेपाच होत्या.

भारतानं मालिका जिंकली, हे महत्त्वाचं. पण त्याहून सुखद गोष्ट म्हणजे टायगर अभी ज़िंदा है... हे सांगणाऱ्या विराट व रोहित ह्यांच्या डरकाळ्या!

(छायाचित्र सौजन्य – bcci.tv)
.........


#भारत_दआफ्रिका #विराट_कोहली #रोहित_शर्मा #कुलदीप_यादव #अर्शदीप_सिंग #एकदिवशीय_मालिका

सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

पोरी... खेळणाऱ्या, जिंकणाऱ्या!


ह्या विजयानं अनेक गोष्टी बदलतील. बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे.
काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल.
मुलींना अंग चोरून मुलांच्या ॲकॅडमीमध्ये सराव करावा लागणार नाही.
मुलींच्या आय. पी. एल. स्पर्धेच्या प्रेक्षकांमध्ये आणि टीव्ही.वर ती पाहणाऱ्यांमध्ये किती तरी पटीने वाढ होईल ...महत्त्वाचं म्हणजे लक्षावधी क्रिकेटवेड्यांना रणरागिणी, दुर्गा सापडल्या आहेत!
------------------------

नंबर वन ठरलेल्या संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना वेगळी भेट.
संघातील सर्व खेळाडूंच्या सह्या असलेली नमो १ जर्सी सहर्ष, साभिमान सादर.
(छायाचित्र सौजन्य - https://www.pmindia.gov.in/)
..............................
महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने टीव्ही.वर चालू असताना दोन षट्कांमध्ये हमखास एक जाहिरात पाहावी लागे. त्यात दिसायचा गोंधळलेला तरुण – अरे, महिला क्रिकेटपटूंची नावं असलेला तो प्रसिद्ध निळा टी-शर्ट आपण (पुरुष असल्याने!) कसा घालायचा बुवा? काही तरीच हं...
 
मनात अशी शंका असलेल्या त्या तरुणाला पाच-दहा मिनिटांच्या प्रवासात बरंच काही दिसतं. आणि, त्याच्या मनात एक अपराधभाव निर्माण होतो. काही वेळातच तो १८ नंबरचा, पण विराट नव्हे तर स्मृती नाव असलेला टी-शर्ट मोठ्या आनंदानं (अर्थातच अभिमानानेही!) घालतो.
 
पुरुषी मनोवृत्ती वगैरे कंठाळी विशेषणं न वापरता क्रीडा क्षेत्रातील (आणि एकूणच) लैंगिक भेदभावाची वृत्ती दूर करणारी ही जाहिरात. महिला क्रिकेट संघाला आणि त्यातील खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला लावणारी. स्मृती, दीप्ती, हरमन, जेमिमा ह्या नावांच्या जर्सी तेवढ्याच अभिमानानं घातलेले अनेक पुरुष मग आपल्या आसपास पाहायला मिळाले.
 
ती जाहिरात त्याच्या जोडीनेच आणखी एक गोष्ट सांगत होती - जर्सी वही तो जज़्बा वही! हरमनप्रीतकौर आणि तिच्या एकाहून एक सरस १४ सहकाऱ्यांनी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी (दि. २ नोव्हेंबर) हा जज़्बा दाखवून दिला. हुलकावणी देत राहिलेला विश्वचषक त्यांनी जिंकला.
 
विजयानंतर प्रदीर्घ वेळ जल्लोष चालू राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची भेट घेण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी संघाला मिळाली. भविष्यात तुमचं आमंत्रण आम्हाला जास्तीत जास्त वेळा मिळेल, अशी कामगिरी करू, असं हरमन, स्मृती ह्यांनी त्यांना सांगितलं. भारतीयांना क्रिकेटचं वेड किती आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी आवर्जून अधोरेखित केलं.
 
काय काय होईल?
ह्या विजयानं बरंच काही होणार आहे.
अनेक गोष्टी बदलतील. बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे.
क्रिकेट खेळणाऱ्या पोरी तोंडात बोट घालून पाहण्याची गोष्ट फार पूर्वीची. ते चित्र आता अधिक छोट्या गावांमध्ये दिसू लागलं तर नवल नाही.
आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, झारखंड आणि अशाच राज्यांमधून, काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल.
मुलींना अंग चोरून मुलांच्या ॲकॅडमीमध्ये सराव करावा लागणार नाही.
मुलगी आहोत, हे सहजासहजी कळू नये म्हणून खेळण्यासाठी शफाली वर्मा हिच्यासारखे केस कापावे लागणार नाहीत.
यंदाच्या महिलांच्या आय. पी. एल. स्पर्धेच्या प्रेक्षकांमध्ये आणि ती टीव्ही.वर पाहणाऱ्यांमध्ये किती तरी पटीने वाढ होईल.
... असं बरंच काही झालं आहे, होईल. महत्त्वाचं म्हणजे लक्षावधी क्रिकेटवेड्यांना नवीन दैवतं, खरं तर देवी – रणरागिणी, दुर्गा सापडल्या आहेत!
 
भारतात क्रिकेट हा धर्म झाला आणि क्रिकेटपटू देव बनले ते केव्हा? देव, देश अन् धर्मासाठी... भारतीय वेडे कधी झाले ते कधीपासून? कपिलदेवच्या नेतृत्वाखाली १९८३मध्ये विश्वचषक जिंकला, ती त्याची पायाभरणी म्हणता येईल.
 
कोणी फारशी अपेक्षा न ठेवलेल्या ह्या संघानं त्या स्पर्धेत दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला दोनदा पराभूत केलं. तो खरोखर चमत्कार होता.
 
क्रिकेटधर्माचं बीज रोवलं
असं काही स्वप्नवत घडेल, हे कोणालाही न वाटणं स्वाभाविक होतं. कारण त्या स्पर्धेआधी खेळलेल्या एक दिवशीय ११८ सामन्यांपैकी तब्बल ८३ आपण हरलेलो. आधीच्या दोन स्पर्धांमध्ये केवळ एक विजय आणि तोही कच्चं लिंबू असलेल्या पूर्व आफ्रिकेविरुद्ध. पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा न मिळालेल्या श्रीलंकेकडूनही भारताचा पराभव झालेला.

अशा पार्श्वभूमीवर कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, मदनलाल, रॉजर बिन्नी, यशपाल शर्मा, संदीप पाटील, के. श्रीकांत ह्यांच्या संघानं विश्वचषक जिंकून दिला. क्रिकेट धर्माचं बीज बहुदा त्या विजयानं रोवलं गेलं...
 
त्यानंतर सहाच वर्षांनी सचिन तेंडुलकर नावाचं स्वप्न थेट भारतीय संघात पाहायला मिळालं. ह्या तेव्हाच्या बच्चानं कल्पनेच्या पलीकडचं खूप काही दाखवलं.
 
त्याच्या आधी भारतात क्रिकेटपटूंना ग्लॅमर नव्हतं, असं मुळीच नाही. सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी, गुंडप्पा विश्वनाथ, चंद्रशेखर, नबाब पटौदी, सी. के. नायडू, मुश्ताक अली... अशी बरीच दैवतं होती चाहत्यांची. ग्रामदैवतं किंवा पंचक्रोशीत ख्याती असतात, तशी. त्या अर्थानं पहिला देव म्हणजे सचिन. सर्वांनी अपेक्षांचा भार ज्याच्यावर टाकून निवांत व्हावं, असं दैवत. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय भाविकांची गर्दी खेचणाऱ्या देवस्थानाप्रमाणं.
 
विश्वविजेतेपद दुसऱ्यांदा मिळालं ते २००७मध्ये. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ५० षट्कांच्या विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी झालेली. क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा रोष वाढलेला. असं निराशाजनक चित्र असताना दक्षिण आफ्रिकेत पहिली टी20 विश्वचषक स्पर्धा झाली. त्याच्या आधी भारतीय संघ त्या प्रकारात केवळ एक सामना खेळला होता.
 
ह्या नव्या प्रकारापासून सचिन, राहुल द्रविड, सौरभ गांगुली ही प्रस्थापित दैवतं दूर राहिली. परिणामी क्रिकेट धर्माला नवीन देव सापडले – महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग, इरफान पठाण, रोहित शर्मा आदी...
 
३६० अंशांतला बदल
त्या विजेतेपदामुळे अतिझटपट टी20 प्रकारात इंडियन प्रीमियर लीग चालू झाली आणि त्यानं क्रिकेटची दुनिया ३६० अंशांमध्ये बदलून टाकली. पैसा आला, आडगावीच्या खेळाडूंना संधी मिळाली. नवे तारे, नवे हिरे. त्याच बरोबर मॅच फिक्सिंग आणि अनेक पातळ्यांवरचे हितसंबंधही लख्ख उघड झाले.
 
ह्या पार्श्वभूमीवर महिला संघाच्या पहिल्या विश्वविजेतपदाकडे पाहायला हवं. महिलांची मर्यादित षट्कांच्या सामन्यांची विश्वचषक स्पर्धा काही नवीन नाही. पुरुषांची पहिली स्पर्धा (१९७५) होण्याआधीच इंग्लंडमध्ये (१९७३) सात महिला संघांनी एकमेकांची ताकद जोखली होती.
 
भारतीय महिला पहिल्यांदा उतरल्या त्या १९७८च्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर १९८८च्या एका स्पर्धेत आपला सहभाग नव्हता. संघाची कामगिरी फार लक्षवेधक नसली, तरी दखलपात्र नक्कीच होती. तीन स्पर्धांमध्ये चौथा क्रमांक, एकदा तिसरा क्रमांक. आपल्या मुलींनी १९९७ आणि २००० ह्या वर्षी उपान्त्य फेरी गाठून चमक दाखविली.
 
पहिलं उपविजेतेपद
कर्णधार मिताली राज, अंजूम चोप्रा, झुलन गोस्वामी ह्यांच्या संघानं २००५मध्ये पहिल्यांदा चषकासाठी लढत दिली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ह्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बलाढ्य कांगारूंपुढे भारताचा पाडाव लागला नाही. ह्याच देशात दीड वर्षापूर्वी झालेल्या पुरुषांच्या विश्वचषकाची अंतिम लढत त्याच दोन देशांमध्ये झालेली होती. आणि तिचाही निकाल असाच एकतर्फी होता.
 
पुढचा अंतिम सामना खेळण्यासाठी तब्बल एक तप वाट पाहावी लागली. अभेद्य मानल्या जाणाऱ्या कांगारूंच्या गडाला पहिला सुरुंग लावला भारतीय संघानंच – २०१७मध्ये डर्बी येथे झालेल्या उपान्त्य सामन्यात. हरमनप्रीतचं अविस्मरणीय आणि तुफानी शतक. कपिलदेवच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या खेळीची आठवण करून देणारा डाव. दीप्ती शर्माचे पाच बळी. कांगारू पराभूत!
 
अंतिम सामना लॉर्ड्सवर. सगळ्यांना आठवण झाली १९८३ची. पण यजमान महिलांचा संघ किंचित सरस ठरला. त्यांनी नऊ धावांनी बाजी मारली. निसटता, चुटपूट आणि हुरहूर लावणारा पराभव.
 
विजय अनपेक्षित नव्हे
हा इतिहास पाहिला, तर महिलांचा विश्वचषक विजय कपिलदेवच्या संघाएवढा अनपेक्षित नक्कीच नाही. पहिल्या चार क्रमांकात चार वेळा आलेल्या, दोन वेळा उपान्त्य सामन्यांत खेळलेल्या आणि दोन वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या संघाला हा उशिरा मिळालेला हक्काचा चषक म्हणता येईल.
 
स्वदेशात झालेल्या ह्या स्पर्धेतील प्रवास वाटला तेवढा काही सोपा झाला नाही. खरं तर भारतीय संघानं उपान्त्य फेरी गाठली, ती काहीशी रडतखडतच. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्यांच्याविरुद्धचे साखळीतील सामने आपण गमावले. विजय हाताशी असताना निसटलेला.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर ३३० धावा करूनही आपण हरलो. सर्वांत मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या नावापुढे लागला.
 
गंमतीची गोष्ट म्हणजे हा विक्रम अवघे १९ दिवस टिकला. त्याच कांगारू संघाने ठेवलेले अधिक मोठे लक्ष्य भारताने ओलांडले आणि तेही निर्णायक उपान्त्य सामन्यात. कांगारूंना विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य सामन्यात दोन वेळा पराभवाची धूळ चाखायला लावणारी कामगिरी भारतानेच केली आहे.
 
चुटपुटत्या पराभवांच्या तीन चटक्यांमुळे भारतीय संघासाठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मोक्याच्या क्षणी ढिसाळ खेळल्यामुळे ही वेळ आली. न्यू झीलँड आणि बांग्लादेश ह्यांच्याविरुद्धचे सामने जिंकायलाच पाहिजेत. बांग्लादेशविरुद्धचा सामना पावसानं धुतला; पण तोवर आपण कसाबसा हातरुमाल टाकून चौथी जागा मिळवली होती. ते करताना न्यू झीलँडला नमविण्याची कामगिरी चोख बजावली होती.
 
अ(न)मोल कानमंत्र
उपान्त्य सामन्यात सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी गाठ होती. जेमिमा रॉड्रिग्ज हिचं शतक, कप्तानसाब हरमनच्या ८९ धावा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष व अमनज्योत कौर ह्यांच्या छोट्या, पण फार महत्त्वाच्या खेळ्या. आपल्याला त्यांच्यापेक्षा फक्त एकच धाव जास्त करायची आहे, हा प्रशिक्षक अमोल मुजुमदार ह्यांचा कानमंत्र भलताच फायद्याचा ठरला.
 
ह्या स्पर्धेतली गमतीची गोष्ट म्हणजे साखळी सामन्यांनंतर पहिल्या दोन क्रमांकांवर असलेल्या संघांना उपान्त्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यांचे पराभव निर्विवाद होते. साखळीतील दोन सामन्यांमध्ये शतकाचा उंबरठा ओलांडण्यातही अपयशी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेने कमालच केलेली. चषकासाठी गाठ त्यांच्याशी होती.
 
मोक्याच्या क्षणी गळपटणारा संघ, अर्थात चोकर्स’! हे विशेषण आपल्या संघाला अगदी बरोबर लागू पडतं, हे दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघानं वेळोवेळी दाखविलेलं. त्याचं नकोसं अनुकरण त्यांच्या महिला संघानंही केलं. शफाली, स्मृती, दीप्ती आणि ऋचा घोष ह्यांच्यामुळं भारताचा डाव तीनशेच्या उंबरठ्यापर्यंत गेला. ह्या धावा पुरेशा ठरणार की अपुऱ्याच पडणार, हे द. आफ्रिकेची कर्णधार लोरा व्होलवार्ट आणि ॲनरी डर्कसन ठरविणार होत्या.
 

आधी बॅट चालली आणि नंतर चेंडू हाती घेऊन
शफाली वर्माची करामत.
(छायाचित्र सौजन्य - 'द गार्डियन')
...........................
कप्तानसाबचा आतला आवाज
अर्धशतकी सलामीनंतर भारतीय गोटात काळजी वाटत असतानाच अमनज्योत कौरच्या फेकीनं तझमिन ब्रिट्स धावबाद झाली. श्री चरणी हिच्या फिरकीनं दुसरा बळी मिळवून दिला. सून्ये लूस आणि लोरा ह्यांची जमलेली जोडी त्रासदायक ठरण्याची चिन्हं दिसत होती. आतल्या आवाजानं हरमनप्रीतला सांगितलं की, चेंडू शफाली वर्माकडे सोपव. दोन गडी झटपट बाद करीत शफालीनं हा विश्वास सार्थ ठरवला. लूसचा फटका झेलताना शफालीच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आता इतिहासात कायमस्वरूपी राहणार आहे.
 
लोरा व डर्कसन ह्यांचे इरादे स्पष्ट दिसत होते. त्यांनी ६१ धावांची भागीदारी केली. दीप्ती शर्मानं डर्कसनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर शतकवीर लोरा बाद झाली. तो झेल घेताना अमनज्योतला करावी लागणारी कसरत आणि तिनं दाखवलेलं प्रसंगावधान विश्वचषक जवळ आणणारं होतं.
 
लोराचं शतक फार सुंदर होतं. तिच्या नितांत देखण्या फटक्यांना नवी मुंबईकर प्रेक्षकांची दाद अभावानेच मिळाली. दक्षिण आफ्रिकेनं सामना गमावला तो २१ ते ३० ह्या षट्कांमध्ये संथ खेळून. भारतीय फिरकीचा वरचष्मा त्यांना झुगारता आला नाही.
 

केवळ कॅच आणि मॅच नाही, तर विश्वचषक हाती आला!
कप्तानसाबची खुशी गगनात न मावणारी...
(छायाचित्र सौजन्य - बी. बी. सी.)
...................................
जमलेल्या जोडीतल्या दोघी परतल्या आणि मग पुढचं सगळं सोपं होत गेलं. नदीन डी क्लर्क हिचा झेल आणि विश्वचषक हरमीनप्रीतनं एकाच क्षणी हस्तगत केला. कपिलदेवच्या त्या झेलाची आठवण करून देणारा झेल. चषक जिंकायचं स्वप्न स्पर्धेत सहभागी होऊ लागल्यानंतर ४७ वर्षांनी प्रत्यक्षात उतरलं.
 
पांढऱ्या केसांमागचं गुपित
ह्या यशाचे धनी बरेच आहेत. त्यात अग्रस्थानी येतात संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार. उगाच नाही हरमनप्रीतला त्यांच्या पाया पडावं वाटलं! ह्या विजयाची तयारी दोन वर्षांपासून चालू होती. म्हणून तर पंतप्रधान मोदी ह्यांच्याशी बोलताना मुजुमदार गंमतीनं म्हणाले, सर, काय सांगू. ह्या दोन वर्षांत माझे केस पांढरे झाले!’
 
हरमनप्रीत फलंदाज म्हणून फार यशस्वी ठरली नसली, तरी कप्तानसाब म्हणून तिची कामगिरी वरच्या दर्जाची होती. शफालीच्या हाती चेंडू देण्याची तिची चाल निर्णायक ठरली. सगळ्याच खेळाडूंना सर्वोत्तम खेळ करण्यासाठी ती प्रोत्साहित करताना दिसली.
 

घेतला, सुटला, निसटला आणि पुन्हा झेलला.
अमनज्योत कौर हिचा तो अविस्मरणीय झेल.
(छायाचित्र सौजन्य - बी. बी. सी.)
...................................

गरज पडेल तेव्हा संघाच्या उपयोगी पडण्याची सर्वच खेळाडूंची धडपड होती. ती सामन्यागणिक दिसून आली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक बळी मिळविणाऱ्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये दोन दोन भारतीय खेळाडू आहेत.
 
महिला क्रिकेटला आपल्यात सामावून घेण्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ठरवलं. सदस्य देशांना तसा आदेश दिला. त्यानंतर वर्ष-दीड वर्षानं आणि काहीशा नाखुशीनंच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं हे पाऊल उचललं. पण त्याचा महिला खेळाडूंना फार उपयोग झाला. रेल्वेगाडीनं रखडत जाणं, डॉर्मेटरीत किंवा बॅडमिंटन हॉलमध्ये मुक्काम ठोकणं, हे सगळं संपलं. त्यांना विमानानं जाता येऊ लागलं, निवासासाठी उत्तम दर्जाच्या हॉटेलांची सोय होऊ लागली. व्हिडिओ ॲनालिसिस आणि त्यासारख्या अनेक तांत्रिक सोयी सहज उपलब्ध होऊ लागल्या.
 
क्रिकेट नियामक मंडळाची धुरा सौरभ गांगुली आणि जय शहा ह्यांच्या हातात असताना महिला क्रिकेटला चालना देणारे अनेक निर्णय धडाडीने घेतले गेले. त्यात त्यांच्या मानधनात वाढ, महिला आय. पी. एल. सुरू करणं ह्या दोन महत्त्वाच्या पायऱ्या होत्या. त्यामुळे महिला क्रिकेट अधिक गतीनं पुढे सरकलं. महिला क्रिकेटपटूंना नाव मिळालं, प्रसिद्धी मिळू लागली आणि पैसेही.
 
दीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर विश्वचषक जिंकला. पुढे काय?
विजयी संघातील खेळाडूंशी अनौपचारिक गप्पा मारताना पंतप्रधान मोदी ह्यांनी सुचवलं की, तुम्ही एक दिवस तुमच्या शाळेत घालवा. त्यातून तिथल्या विद्यार्थांना स्फूर्ती मिळेलच; पण तुम्हालाही त्यांच्याकडून खूप काही मिळेल.
 
एक गमतीची गोष्ट – १९८३ आणि २००७ ह्या वर्षी विश्वचषक जिंकणाऱ्या पुरुषांच्या संघातील दोन खेळाडूंना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. सुनील वॉल्सन आणि पियूष चावला, हे ते दोन गोलंदाज. महिलांनी पहिलं विजेतेपद मिळवताना, सगळ्या खेळाडूंना किमान एक तरी सामना खेळवलंच!
 
सचिन, विराट आणि रोहित ह्यांची अलीकडच्या तीन दशकांतील क्रिकेटवर मोठी छाप आहे. मिताली राज, हरमनप्रीत, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा ह्या नावांनी तेच केलेलं आहे. त्यांनी मुलींमध्ये आणि त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पालकांमध्ये हा आपला(च) खेळ आहे ही भावना रुजविली. ह्या संघातील विशी-बाविशीतील खेळाडूंना तोच वारसा पुढे न्यायचा आहे.
 
ह्या विजेतेपदानंतर चित्र बदलणार आहे, ह्यात शंकाच नाही. मुलींचं क्रिकेट आता आडवळणी गावातही पोहोचेल. देशातील महिलांच्या स्पर्धा वाढतील. मुलींच्या क्रिकेटकडे दुय्यम नजरेनं पाहणं कालविसंगत ठरेल.
 
... आणि कोणी सांगावं, विराट आणि रोहित २०२७च्या विश्वचषकात खेळत असताना स्मृती, दीप्ती, जेमिमा,  श्री चरणी ह्यांच्या जर्सी अभिमानाने घातलेली मंडळी जाहिरातींमध्ये चमकतील
!
----------------------------------
(दैनिक प्रहारच्या कोलाज पुरवणीमध्ये रविवारी प्रसिद्ध झालेला लेख विस्ताराने.)
----------------------------------
#भारतीय_महिला_क्रिकेट #विश्वचषक2025 #विश्वविजेतेपद #हरमनप्रीत_कौर #स्मृती_मानधना #दीप्ती_शर्मा #शफाली_वर्मा #जेमिमा_रॉड्रिग्ज #अमोल_मुजुमदार #नरेंद्र_मोदी #ऑस्ट्रेलिया #दक्षिण_आफ्रिका #कपिलदेव

अखेरचा राम राम, पावनं!

   डॉ. कुमार सप्तर्षी : सदर लेखन ते निवडणूक - पाहिलेला प्रवास  'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडवून दिला. त्याचं ...