Sunday 29 January 2023

धावा कमी, तरी सामना नामी!


कमी धावसंख्येच्या सामन्यात निर्धाव षट्क एकच.
युजवेंद्र चहलची फिरकी पाहुण्यांना ‘पॉवर प्ले’मध्ये खेळता आली नाही.

निव्वळ चौकार-षट्कारांची आतषबाजी, अफलातून फटके, उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण आणि प्रामुख्याने धावांचा डोंगर ह्यासाठी टी-20 क्रिकेट सामने ओळखले जातात. षट्कामागे साडेआठ धावांची किमान सरासरी असेल, तर सामना पाहायला आलेल्यांना फटकेबाजीचा आनंद मनमुराद लुटता येतो. ‘पैसा वसूल सामना पाहिल्याचा’ आनंद त्यांना मिळतो!

पण षट्कामागे जेमतेम पाच धावांच्या सरासरीने तब्बल ४० षट्के खेळला गेलेला सामनाही भलताच चुरशीचा होतो, हे आज लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर दिसून आलं. भारत आणि न्यू झीलंड ह्यांच्यातील सामन्यात कशाबशा २०० धावा निघाल्या. पण सामन्याचा निकाल लागण्यासाठी शेवटच्या षट्कातील पाचवा चेंडू टाकण्याची वाट पाहावी लागली.

कमी धावसंख्येच्या ह्या सामन्यातही बऱ्याच गमती घडलेल्या दिसतात. थर्ड मॅनलाही जिथं फलंदाज सहज षट्कार मारतात, यष्टिरक्षकाच्या बरोबर डोक्यावरून गेलेल्या चेंडूचा पहिला टप्पा सीमेबाहेर पडतो, असे टी-20 सामने. पण आज दोन्ही संघांमधल्या एकाही फलंदाजाला षट्कार मारता आला नाही. २३९ चेंडूंमध्ये एकही षट्कार नसावा, हा विक्रमच म्हणावा की काय!

तीच गत चौकारांची. ते किती? तर रामाच्या वनवासाच्या वर्षांएवढे - म्हणजे १४. न्यू झीलंडचे सहा नि भारताचे आठ. फलंदाजांचा स्ट्राईक रेट जेवढा अधिक, तेवढा तो धोकेबाज. दीडशे-पावणेदोनशेच्या स्ट्राईक रेटने खेळणारे फलंदाज इथे दिसतात. ह्या सामन्यात शंभरहून अधिक स्ट्राईक रेट फक्त चार फलंदाजांचा दिसला. न्यू झीलंडचा सलामीवीर फिन ॲलन ह्यानं ११ धावा काढल्या १० चेंडूंमध्ये - स्ट्राईक रेट ११०. डावातील सर्वाधिक म्हणजे दोन चौकार त्याचेच होते. पाहुण्यांकडून सर्वाधिक स्ट्राईक रेट राहिला शेवटच्या क्रमांकावरच्या जेकब डफी ह्याचा - २००. तीन चेंडूंमध्ये सहा धावा!

यजमानांकडून शतकी स्ट्राईक रेट असणारे फलंदाज दोन - सलामीचा शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर. दोघे प्रत्येकी नऊ चेंडू खेळले. गिलने ११ धावा केल्या आणि सुंदरने १०.


'स्काय'साठीही आज लिमिट होतं. सामन्यातील सर्वाधिक धावा त्याच्या.
पण त्याचा एकमेव चौकार सामन्यातल्याच शेवटच्या चेंडूवर!

सूर्यकुमार यादव ह्या नावाला अलीकडच्या काळात एक अद्भुत वलय लाभलेलं आहे. त्याच्यासाठी ‘स्काय’ इज द लिमिट! एबीडी ह्याच्यानंतरचा ‘मि. ३६०’ काय आणि कसा खेळेल हे सांगता येत नाही. आज मात्र त्याच्याही बॅटला किवी गोलंदाजांनी लगाम घातला होता. एकतीस चेंडूंमध्ये २६ धावा ही सूर्यकुमारची खेळी सामन्यातील सर्वाधिक धावांची. ह्या तडाखेबाज फलंदाजाने फक्त एक चौकार मारला. तो सामन्यातील शेवटच्या चेंडूवर आणि विजयावर शिक्कामोर्तब करणारा! भारताच्या डावात चौकारांमध्ये किती अंतर होतं? सुंदरनं बारावं षट्क टाकणाऱ्या ग्लेन फिलिप्स ह्याच्या पहिल्याच चेंडूवर शॉर्ट फाईन लेगला स्वीपचा चौकार मिळवला. त्यानंतरचा चौकार मिळण्यासाठी तब्बल ४६ चेंडूंची वाट पाहावी लागली.

लखनौची खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी होती, हे नक्की. लॉकी फर्ग्युसन ह्यानं एकोणिसावं (म्हणजे सामन्यातलं एकोणचाळिसावं) षट्क टाकलं. त्यातही चेंडू हवेत वळताना आणि सूर्यकुमार-हार्दिक पंड्या ह्यांना चकवताना दिसला. फिरकी गोलंदाजांनीही मजा केली. एवढ्या कमी धावा होऊनही दोन्ही संघांनी जास्तीत जास्त गोलंदाजांचा वापर केला. पाहुण्यांनी आठ गोलंदाज वापरले. त्यातल्या चौघांनी चार-चार षट्कं टाकली. बाकीचे चौघे एका षट्काचे मानकरी. त्यांच्या मायकेल ब्रेसवेल ह्यानं चार षट्कांत फक्त १३ धावा देताना शुभमन गिल ह्याच्यासारखा मोहरा टिपला. एरवी भारताला त्रास देणाऱ्या मिचेल सँटनर ह्याला फार काही करता आलं नाही. त्याच्या चार षट्कांत वीसच धावा गेल्या, हे खरं. पण त्याला बळी मिळाला नाही. ईश सोढी ह्यानं राहुल त्रिपाठीला बाद केलं. त्याच्या चार षट्कांत सहाच्या सरासरीनं धावा निघाल्या.

यजमानांनी सात गोलंदाज वापरले. दीपक हुड्डाला गोलंदाजी द्यायचं विसरतो म्हणून रोहित शर्मावर टीका होते. त्याच हुड्डा ह्याच्याकडून कर्णधार हार्दिक पंड्यानं आज कोटा पूर्ण करून घेतला. चार षट्कांचा कोटा पूर्ण करणाऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वांत महागडा होतो तो पंड्या. त्याची ६.२५ ही इकॉनॉमी एरवी नावाजली गेली असती.

भारताकडून बळी मिळवता न आलेला गोलंदाज होता शिवम मावी. डावातलं एकोणिसावं षट्क त्याला टाकावं लागलं. आपल्या संघाला गेल्या कैक सामन्यांपासून शेवटून दुसऱ्या षट्काचा जणू शाप लागलेला आहे. तसंच आजही झालं. मावीच्या षट्कात सर्वाधिक ११ धावा फटकावल्या गेल्या!

एवढ्या कमी धावसंख्येचा सामना म्हणजे निर्धाव षट्कांची संख्या बऱ्यापैकी असणार, असं स्वाभाविक वाटतं. तसंही झालेलं नाही. सामन्यात एकच निर्धाव षट्क पडलं. ते टाकणारा होता युजवेंद्र चहल. हे निर्धाव षट्क ‘पॉवर प्ले’मध्ये टाकलं गेलं, ही भलतीच गंमत.

मालिकेचा निकाल अहमदाबादच्या स्टेडियममधील सामना ठरवणार आहे. तिथंही अशीच फिरणारी, फलंदाजांना चकवणारी खेळपट्टी असावी, असं दोन्ही संघांमधील गोलंदाजांना वाटत असणार. तसं होण्याची शक्यता कमीच. कारण बहुसंख्येने प्रेक्षक येतात, ते फलंदाजांनी गोलंदाजांवर गाजवलेली हुकूमत पाहायला.


.......

(दोन्ही छायाचित्रं https://www.espncricinfo.com ह्यांच्या सौजन्यानं.)
.......
#क्रिकेट #टी20_क्रिकेट #भारतxन्यूझीलंड #लखनौ #सूर्यकुमार_यादव #युजवेंद्र_चहल #हार्दिक_पंड्या #फटकेबाजी #चौकार #षट्कार #निर्धाव_षट्क

#cricket #t-20 #india_nz #lucknow #surya #sky #chahal #pandya #boundries #sixers #maiden_over #power_play

Friday 27 January 2023

‘पद्मश्री’च्या घरी


लेखक चुलत्याचा सत्कार लेखक पुतण्याकडून...
निमित्त पद्मश्री जाहीर झाल्याचे! डॉ. प्रभाकर मांडे आणि डॉ. अरुण मांडे.

त्यांच्या सख्ख्या पुतण्यानं ठरवलं होतं, त्या प्रमाणे सकाळीच त्यांच्या घरी गेलो. अकरा वाजत आले होते. घरात वर्दळ नव्हती. मुलगा, सून  आणि स्वतः ते. छान प्रशस्त घर. बाजूला एक-दोन पुष्पगुच्छ. टी-पॉयवर काही पुस्तकं. वाटलं त्यांचीच असावीत. नव्हती. लेखकाचं नाव वेगळं दिसलं. भेटीदाखल आलेली असावीत. ताजी ताजी.

निवांत होते ते. पुतण्याच सोबत असल्यानं मी ओळख करून देण्याचा प्रश्न आला नाही. त्यांनीच ओळख करून दिली.

चेहऱ्यावरून, तब्येतीवरून वय जाणवत होतंच. चालण्यासाठी वॉकर दिसत होता ठेवलेला. नव्वदीच्या घरात असावेत असं वाटलं. अंदाज बरोबर ठरला. महिनाभरापूर्वी त्यांनी ८९ वर्षं पूर्ण केलेली. सुनेच्या आणि मुलाच्या मोबाईलवर त्यांच्यासाठी फोन येत होते.

वयोमानानुसार त्यांची ऐकण्याची शक्ती कमी झालेली. म्हणून मग फोन स्पीकरवर ठेवलेला - हँड्स फ्री. तरीही त्यांना पुरेसं स्पष्ट ऐकू येत नसावं. पण फोन कशासाठी येत आहेत, ह्याची पूर्ण कल्पना त्यांना होतीच. आपलं अभिनंदन करण्यासाठीच हा संवाद आहे, हे जाणून ते पहिल्याच वाक्यात तिकडून बोलणाऱ्याचे आभार मानत होते, ‘धन्यवाद’ म्हणत होते.

... पद्मपुरस्कारांची यादी प्रथेप्रमाणं प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या रात्री जाहीर झाली. त्यातलं एक नाव होतं - प्रभाकर भानुदास मांडे. त्यांच्याच घरातलं गुरुवार सकाळचं हे चित्र.

पुरस्काराच्या मानकऱ्यांची केंद्र सरकारकडून जी यादी प्रसिद्ध झाली, त्यात डॉ. मांडे ह्यांच्या नावापुढं ‘शिक्षण आणि साहित्य’ असा उल्लेख आहे. ह्या दोन क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांची निवड झाली. खरं तर ‘साहित्य’ हा उल्लेख तसा फार ढोबळ म्हणावा लागेल. डॉ. मांडे ह्यांचा प्रांत आहे, लोकसाहित्य-लोकसंस्कृती. गावगाड्याबाहेरचं जगणं. त्यात ते अर्धशतकाहून अधिक काळ काम करीत आहेत.

पुण्यातून काल रात्री उशिरा पत्रकारितेतल्या जुन्या सहकाऱ्यानं संपर्क साधला आणि विचारलं ‘प्रभाकर मांडे म्हणजे तुमच्या नगरचेच ना?’ ते औरंगाबादला असतात, असं सांगितलं खरं आणि मग एकदम आठवलं - प्रसिद्ध लेखक-अनुवादक डॉ. अरुण मांडे त्यांचे पुतणे. पुतण्याच्या अमृतमहोत्सवासाठी काका आले होते. डॉक्टरांना ही बातमी द्यावी आणि आपण दिलेल्या माहितीला दुजोरा घ्यावा असं वाटलं. डॉ. अरुण ह्यांना फोन केला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘काका आता इथंच (नगरला) स्थायिक झाले आहेत.’’

नगर की औरंगाबाद? हा संभ्रम माझा एकट्याचाच नव्हता. तसा तो प्रशासकीय यंत्रणेलाही पडलेला होता. तो वेळीच दूर झाला असता, तर डॉ. प्रभाकर मांडे हे नाव पद्म-पुरस्काराच्या यादीत कदाचित दोन किंवा तीन वर्षांपूर्वीच आलं असतं. तीन-चार वर्षांपूर्वी त्यांची माहिती घेण्यासाठी यंत्रणेनं औरंगाबादेत चौकशी केली, तेव्हा ते नगरमध्ये होते. नंतर उलटा प्रकार घडला. तर ते असो!

म्हणजे पद्म पुरस्कारांच्या नगरच्या यादीत आता भर पडली. डॉ. मांडे ह्यांचं अभिनंदन करावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून सकाळीच डॉ. अरुण ह्यांच्यासोबत घर गाठलं. आधी म्हटलं तसं आम्ही गेलो तेव्हा कुटुंबातले हे तीन सदस्यच होते. पुतण्यानं ऊबदार शाल देऊन काकांचा सत्कार केला. मग खाऊचा पुडाही दिला, तेव्हा नव्वदीतले काका निर्व्याज हसले.

बातमी कधी कळाली?
पुरस्कार जाहीर झाल्यावर काय वाटलं? हा फार उगाळला जाणारा प्रश्न. तो आम्ही काही विचारला नाही. नंतर तो ऐकायला मिळालाच. आमचा प्रश्न होता - ‘बातमी कधी कळाली?’ बुधवारी सकाळनंतर कधी तरी एक फोन आला. अनोळखी नंबर असला, तर सहज फोन घ्यायचा नाही, हा सर्वसाधारण रिवाज. त्यानुसार त्यांनी तो फोन घेतला नाही. मग दीड-दोन तासांनंतर ‘कुणी फोन केला, हे बघू तर...’ म्हणून कुटुंबीयांनी संपर्क साधला. कळलं की, देशाच्या राजधानीतून संपर्क साधला गेलाय. ‘पुरस्कार जाहीर झाला, तर तुम्ही तो स्वीकारणार ना?’, ह्याची खातरजमा करून घेण्यासाठी तो फोन होता.

‘अधिकृतरीत्या जाहीर झाल्याशिवाय ही बातमी तुम्ही कुणाला सांगायची नाही,’ असं संबंधित यंत्रणेतील व्यक्तीनं पुनःपुन्हा बजावून सांगितलं. आता उत्सुकता वाढलेलीच. अधिकृत घोषणेसाठी किती वेळ वाट पाहायची? संध्याकाळी टीव्ही. सुरू केला. हे चॅनेल, ते चॅनेल. बातम्यांमध्ये आधी यादी आली, तीत जेमतेम पंचवीस-एक नावं होती. त्यात महाराष्ट्रातलं एकच. मग रात्री नऊ-सव्वानऊ वाजता आली एकदाची बातमी - प्रभाकर भानुदास मांडे ह्यांना शिक्षण व साहित्य क्षेत्रातील कामाबद्दल पद्मश्री जाहीर!


अभिनंदनाचे फोन घेतलेच पाहिजेत ना!
आता फोन सुरू झाले. रात्री दहानंतर. त्यातलाच एक माझा होता. ज्यांना माहिती देण्यासाठी इथं फोन केला होता, त्यांच्या वर्तमानपत्राच्या वेगवेगळ्या कार्यालयांतून रात्रीतून तीन-चार जणांनी संपर्क साधला. एका टीव्ही. वाहिनीच्या प्रतिनिधीनं तेवढ्या रात्री घरी येऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

वृत्तपत्रात बातमी आल्यावर सकाळपासून फोनच फोन सुरू झाले. मराठवाड्यातून, नगरमधून, बाकी महाराष्ट्रातून. फोन सतत वाजत होता. एकदा सूनबाईंचा, लगेच चिरंजिवांचा. डॉ. मांडे सर बोलत होते. अभिनंदनाचा स्वीकार करून त्यांची गाडी दुसऱ्या विषयाकडे जाई...
‘अरे हो! तुमचं अभिनंदन. तुम्ही आता प्रोफेसर झालात.’
‘तुमची किती पुस्तकं प्रसिद्ध झालीत? आता हे नवीन कधी येतंय?’
हा आणि अशा पद्धतीचा संवाद चालू होता. ते औरंगाबादमध्ये जिथं राहात, त्या कॉलनीतील शेजाऱ्यांनी संपर्क साधला. त्यांना वाटणारा आनंद फोनच्या स्पीकरमधून आमच्यापर्यंत पाझरत होता. ते म्हणाले, ‘आम्हालाच ‘पद्मश्री’ मिळालीय असं वाटतंय बघा सर.’ नंतर घरातल्या बाई बोलल्या. म्हणाल्या, ‘आमच्या शेजारी मांडे सर राहत होते, हे सांगताना किती अभिमान वाटतोय म्हणून सांगू...’

श्रीमंती आणि ऐश्वर्य 
कुठून कुठून फोन आले, ह्याचं अप्रुप मांडे सरांनाही स्वाभाविकपणे वाटत होतं. ‘अहो, पिशोरला मी शिक्षक होतो. ही गोष्ट १९५५-५६मधली. तेव्हाच्या पाचवी-सहावीतल्या विद्यार्थ्यांनी आठवणीनं फोन करून अभिनंदन केलं. परभणीहूनही फोन आले.’ अशी फोन करणाऱ्यांची माहिती सांगतानाच सर म्हणाले, ‘‘शिक्षकाच्या जीवनातली ही श्रीमंती, हे ऐश्वर्य आहे. इतर कुठल्या क्षेत्रात ते मिळत नाही हो!’’

तेवढ्यात टीव्ही. वाहिन्यांचे तीन-चार प्रतिनिधी येऊन धडकले. त्यांनी तो नेहमीचा प्रश्न विचारलाच की. ‘पुरस्कार जाहीर झाल्यावर तुम्हाला काय वाटलं?’ त्यांनाही आणि त्याच्या आधीही फोनवर बोलताना सर म्हणालेच होते, ‘आनंद वाटलाच, त्या पेक्षाही जास्त समाधान वाटतं. बरं वाटलं. आपल्या हातून घडलं ते कुठं तरी रुजू झालं. त्याचीच ही पावती. एकूण कामाचीच दखल घेतली गेली. समाजाने नेहमीच चांगली दखल घेतली.’

मग ह्या बोलण्यात चुकून आत्मप्रौढी वगैरे आली की काय, असं बहुतेक सरांना वाटतं. ते म्हणाले, ‘‘हे मी केलं नाही. माझ्या हातून घडलं! त्याच्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं.’’


वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना बाईट... प्रत्येकाला स्वतंत्र.

वाहिन्यांच्या प्रतिनिधींना स्वतंत्र बाईट हवे होते. त्यातल्या लैलेश बारगजे ह्याला थोडा अधिक वेळ, छोट्याशा मुलाखतीएवढा वेळ हवा होता. वाहिन्यांच्या प्रतिनिधींना अडचण नको म्हणून आम्ही निरोप घ्यायचं म्हटलं. पण आम्ही तिथं असणं त्यांना आवश्यक वाटत होतं. कारण मग सर थोडे मोकळेपणाने बोलले असते.

त्या अर्ध्या तासात डॉ. मांडे सर चौघांशी स्वतंत्रपणे बोलले. त्या प्रत्येक बाईटमध्ये वेगळेपण होतं. उपचार म्हणून ते बोलले नाहीत. भरभरून आणि खुलून. शब्द वेगळे होते, प्रत्येक वेळी; त्या साऱ्याचा आशय मात्र एकच होता.

प्रेरणा डॉ. आंबेडकर ह्यांची
‘माझ्या कामाचं खरं श्रेय जातं डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना. त्यांनीच प्रेरणा दिली, हे आवर्जून सांगावं वाटतं,’ असं म्हणून डॉ. मांडे सर तो जवळपास सत्तर-बाहत्तर वर्षांपूर्वीचा प्रसंग काल-परवा घडल्यासारखा सांगतात. ते औरंगाबादच्या (मग कधी तरी त्यांच्या तोंडून ‘संभाजीनगर’ असाही उल्लेख येतो!) मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी. बी. ए.चे विद्यार्थी. प्राचार्य होते म. भि. चिटणीस. मांडे सरांनी लिहिलेला निबंध बऱ्यापैकी मोठा झालेला. डॉ. बाबासाहेब त्या वेळी औरंगाबाद मुक्कामीच होते. त्यांना प्राचार्य चिटणीस ह्यांनी तो निबंध दाखवला. कारण छापण्यासाठी त्यांची परवानगी आवश्यक होते. सर म्हणाले, ‘‘बाबासाहेबांनी मला शेजारी बसवलं. पाठीवर हात ठेवला. प्राचार्यांना निबंधासाठी संमती दिली. ‘असंच समाजाचं काम करीत राहा,’ असं मला सांगितलं. वंचितांच्या विषयाकडं त्यांनी माझं लक्ष वळवलं.’’ 

डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या ह्या विषयाकडे वळावं, असं अधिक असोशीनं वाटलं ते शिक्षक म्हणून भूमिका स्वीकारल्यावर. विद्यार्थ्यांच्या कथा आणि अनुभव ऐकून सरांचं लक्ष लोकसंस्कृतीच्या अभ्यासाकडे गेलं. गावगाड्याबाहेरचा समाज हा त्यांच्या कुतुहलाचा, अभ्यासाचा विषय बनला. त्यांच्याबद्दल मनापासून बोलताना सर म्हणाले, ‘‘गावगाड्यात वतनं होती, बलुतेदारी होती. गावगाड्याबाहेरच्या ह्या भटक्यांना वतन नव्हतं की जमीन. पण त्यांनी स्वतःची संरचना तयार केली.’’

डॉ. मांडे सरांचं बव्हंशी लेखन लोकसाहित्य, लोकसंस्कृतीबद्दल आहे. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात (आता डॉ. बाबासाहेब मराठवाडा आंबेडकर विद्यापीठ) १९७३मध्ये ‘लोकसाहित्य’ विषय सुरू करण्यात आला. थोड्याच काळात महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच विद्यापीठांमध्ये तो सुरू झाला. अभ्यासक्रम आहे म्हटल्यावर त्यासाठी संदर्भ ग्रंथ पाहिजेत ना. ‘लोकसाहित्याचे स्वरूप’ आणि ‘लोकसाहित्याचे अंतःप्रवाह’ हे ग्रंथ त्यासाठी सिद्ध करण्यात आले. सर म्हणतात, ‘त्यानंतर मी लिहीतच राहिलो. थांबलोच नाही.’ लोकसंस्कृती हा उपेक्षित विषय होता. त्याच्या अभ्यासामुळं सरांना भटक्या-विमुक्तांचं विलक्षण नवं जग त्यांना पाहायला मिळालं.


पद्मश्री म्हणजे सजग समाजाने घेतलेली दखल!
ग्रामीण समाज, तिथल्या लोकांचं जगणं ह्याबद्दल डॉ. मांडे सरांना मनापासून आपुलकी आहे. ते म्हणाले, ‘‘ग्रामीण जीवन समाजाचा मुख्य प्रवाह आहे. आपली बलस्थानं, गाभा तिथंच आहे. त्यांच्यामुळे आपण (भारतीय समाज म्हणून) टिकलो. शेतकरी आणि बलुतेदार ह्यांनी आपली परंपरा जपली. आपल्या परंपरेला नावं ठेवणारा एक अभिजन वर्ग तयार झाला आहे. समाजजीवनाशी नाळ तुटलेला! खरं तर समाजजीवन फार गुंतागुंतीचं आहे. जितकं खोल जाऊ, तितकं कळत जातं. एक आयुष्य पुरेसं नाही, हे समजून घ्यायला. ह्यात अनेकांनी काम करायला हवं. तसे लोक पुढे येत आहेत, ही आनंदाचीच गोष्ट होय.’’

जमीन सुपीक आहे...
पद्मपुरस्कार म्हणजे समाजाने घेतलेली दखल आहे, अशी सरांची भावना आहे. त्याबद्दलची कृतज्ञ भावना व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘समाज अजून जिवंत आहे, सजग आहे. म्हणून तर अशी दखल घेतली गेली. पेरलेलं उगवतं. ही जमीन सुपीक असल्याचंच हे लक्षण. पेरलेलं उगवून आल्यावर शेतकऱ्याला जसा आनंद होतो, अगदी तसाच मला झाला आहे!’’

टीव्ही. वाहिन्यांच्या प्रतिनिधींना वेगवेगळे चार बाईट देऊनही मांडे सर थकले नव्हते. त्यांची स्मरणशक्ती तल्लख असल्याचं तासाभरात वारंवार जाणवलं. पंढरपूरच्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विदूषी दुर्गाबाई भागवत होत्या. व्याख्यान ऐकल्यावर त्या कशा सद्गदित झाल्या. त्यानंतर ‘सोबत’मध्ये संपादक ग. वा. बेहेरे ह्यांनी ‘पाषाणाला पाझर फुटला’ शीर्षकाचा पानभर लेख कसा प्रसिद्ध केला, हे सारं त्यांना स्पष्ट आठवतं.

पद्मपुरस्कारांचे मानकरी ‘लोकांमधून’ निवडून काढले जातात, ह्याचं अजून एक उदाहण मांडे सरांच्या रूपाने समोर दिसतं.
---------------

#पद्म_पुरस्कार #प्रभाकर_मांडे #पद्मश्री #लोकसंस्कृती #लोकसाहित्य #बाबासाहेब_आंबेडकर #औरंगाबाद #समाजजीवन #भटके_विमुक्त #गावगाडा #ग्रामीण_समाज

Friday 20 January 2023

गोलांच्या पावसाविना विजय

 


जोरदार आक्रमण आणि तेवढ्याच तडफेने बचाव.
डावीकडे सुखजित आणि उजवीकडे अभिषेक.

‘विजयातलं अंतर फार महत्त्वाचं नसतं. लक्षात राहतो तो मिळवलेला जय!’, असं म्हणतात. त्यात तथ्य असलं, तरी ते नेहमीच असत नाही. बऱ्याच वेळा ह्या अंतरानं बराच फरक पडतो. उदाहरणार्थ, विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ‘ड’ गटातील शेवटच्या साखळी सामन्यातील भारत-वेल्स सामन्याचा निकाल. इंग्लंड आणि भारत ह्यांचे समान गुण असूनही, गोलफरकामुळंच इंग्लंडला गटातलं अव्वल स्थान मिळालं. त्यामुळे त्यांना थेट उपान्त्यपूर्व फेरी गाठता आली. तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला आणखी एक सामना खेळावा नि जिंकावा लागेल.

भुवनेश्वर इथल्या कलिंग हॉकी स्टेडियमध्ये गटातली शेवटची लढत खेळणाऱ्या भारताला गटातलं अव्वल स्थान मिळवायचं तर गोलांचा पाऊस पाडायला हवा होता. वेल्सविरुद्ध संघाला आठ किंवा त्यापेक्षा जास्त गोलफरकाने विजय मिळवणं आवश्यक होतं. सामन्यात आठपेक्षा अधिक गोल केले असते, तर कदाचित आपण गटात पहिल्या क्रमांकावर दिसलो असतो. अशी अजून दोन-तीन समीकरणं मांडली गेली. त्या साऱ्याचं सार एकच होतं - वेल्सविरुद्ध मोठ्या संख्येनं गोल झाले पाहिजेत. आठ किंवा त्याहून अधिक गोलांची अपेक्षा ह्या एकाच सामन्यात असताना, प्रत्यक्षात गोलफलक काय दाखवतो? गटातील तीन सामन्यांत मिळून सहा गोल! इंग्लंडचे आपल्या दीडपट आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि एकच सामना जिंकता आलेल्या स्पेन आपल्यापेक्षा फक्त एकाने कमी.

थेट उपान्त्यपूर्व फेरी गाठायची, हेच दडपण घेऊन भारतीय संघ आज बहुतेक खेळत होता. कर्णधार हरमनप्रीत सिंगला पुन्हा एकदा सूर सापडलाच नाही. त्याचे ड्रॅग फ्लिक दमदार नव्हते. परिणामी पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या संधी हुकल्या. सामन्यातील पहिली वीस मिनिटं साधारण खडाखडीतच गेली. भारताला पहिली संधी मिळाली ती दहाव्या मिनिटाला. नीलकांत शर्मा ह्यानं ‘डी’मध्ये धडक मारली खरी. पण रेनल्ड कॉटरील ह्यानं डाव्या पायानं चेंडूला बाहेरची दिशा दाखवली. सामन्याच्या पहिल्या चतकोरात फारशी आक्रमणं झाली नाही. परिणामी कोणत्याही संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही.


गोलचा आनंद साजरा करणारे भारतीय खेळाडू.
 विवेक सागर, मनजित आणि अमित रोहिदास.

अभिषेक आणि डॅनियल ह्यांच्यात चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात थोडा गोंधळ झाला आणि सोळाव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण हरमनप्रीतच्या ड्रॅग फ्लिकमध्ये दम नसल्याने तो सहज अडवला गेला. सामन्यातला पहिला गोल झाला तो एकविसाव्या मिनिटाला. वेल्श खेळाडू भारताच्या भागात असताना आपल्या खेळाडूंनी प्रतिआआक्रमण केलं. अमित रोहिदासचा पास घेऊन मनदीप खोलवर घुसला. वेल्सच्या बचावफळीतील खेळाडूचा फाऊल झाल्याने पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतचा ड्रॅग फ्लिक अडवणं काही अवघड गेलं नाही. पण धडकून परत आलेल्या चेंडूचा शमशेर सिंगने ताबा घेतला आणि गोलजाळ्याच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू धाडला. त्यानंतरच्या नऊ मिनिटांत फार काही घडलं नाही आणि त्याच गोलफरकावर मध्यंतर झालं.

उत्तरार्धात भारत किती गोल करणार, ह्याचीच चर्चा विश्रांतीच्या वेळी चालू होती. उत्तरार्धाचा खेळ सुरू होताच दुसऱ्या मिनिटाला गोल झाला. मनदीप व अक्षपदीप ह्यांनी सुरेख चाल रचली. ‘डी’च्या जवळ मनदीप सिंगने चेंडूचा ताबा मिळवला आणि अक्षदीप सिंगला पास दिला. त्यानं अगदी जीव खाऊन मारलेला चेंडू आधी डाव्या खांबावर आदळून मग उजव्या कोपऱ्यात विसावला. पुढच्या तीन मिनिटांनी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतच्या ड्रॅग फ्लिकचं दुखणं नडलं. सदतिसाव्या मिनिटाला वरुण आणि मनप्रीत ह्यांनी उजव्या बाजूनं रचलेली चाल अपयशी ठरली.

वेल्सच्या गॅरेथ फुरलाँग ह्याला एकोणचाळिसाव्या मिनिटाला ग्रीन कार्ड दाखवण्यात आलं. म्हणजे पुढची दहा मिनिटं वेल्सला दहा खेळाडूंसह खेळावं लागणार होतं. त्याचा फायदा उठवणं भारताला साधलं नाही. गॅरेथ बाहेर पडल्यानंतर पुढच्याच मिनिटाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यातून काहीच साधलं नाही. पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर करण्यात आलेलं अपयश ठळकपणे जाणवलं.

सामना रटाळ, संथ चालला आहे, असं वाटत असतानाच खळबळजनक अध्यायाला सुरुवात झाली. वेल्स संघाला पहिली संधी मिळाली बेचाळिसाव्या मिनिटाला. जरमनप्रीत सिंगने हवेतला पास चुकीच्या पद्धतीने घेतला. पेनल्टी कॉर्नरची संधी साधत गॅरेथने डाव्या कोपऱ्यात चेंडू मारला. त्यानंतर दोनच मिनिटांनी वेल्स संघाला बरोबरी साधता आली, ती जरमनप्रीतच्या फाऊलमुळे. पेनल्टी कॉर्नरचा पहिला फटका श्रीजेशने अडवला. त्याच्याकडून परत आलेला चेंडू द्रेपर याकोब (ड्रेपर जेकब) ह्यानं नेमका हेरला. त्यानं श्रीजेशच्या डोक्यावरून बरोबर चेंडू मारला. दोन-दोन. बरोबरी! वेल्सचा हा आनंद जेमतेम तीन मिनिटं टिकला. सुखजित सिंगच्या रिटर्न पासवर अक्षदीपनं गोल लगावत संघाला आघाडीवर नेलं. त्यामुळं जोशात आलेल्या भारतीय खेळाडूंनी सत्तेचाळिसाव्या मिनिटाला जोरदार हल्ला केला. सुखजितनं मारलेला फटका थेट गोलरक्षकाकडे केला.

दोन्ही संघांनी त्यानंतरची दहा मिनिटे जोरदार प्रयत्न केले. त्यातून गोलफलक काही बदलला नाही. सामना संपायला दोन मिनिटं बाकी असताना निकराचा प्रयत्न म्हणून वेल्स संघाने गोलरक्षकाऐवजी जादा खेळाडू घेतला. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. गॅरेथची चूक झाल्यानं भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतनं ह्या वेळी नावाला जागला. त्याचा सरळ फटका गोलजाळ्यात विसावला, तेव्हा सामना संपायला जेमतेम एकेचाळीस सेकंद बाकी होते. त्याचा हा स्पर्धेतला पहिलाच गोल! उपान्त्यपूर्व फेरीत जाण्यासाठी भारताला आता ‘क्रॉस ओव्हर’मध्ये न्यू झीलंडशी खेळावं लागेल. ‘क’ गटात आज मलेशियाकडून २-३ असा पराभव झाल्यानं न्यू झीलंड तिसऱ्या स्थानावर गेलं. मलेशियाची लढत स्पेनशी होईल.

डझनाहून जास्त!

द नेदरलँडसने ‘क’ गटात अव्वल स्थान नक्की करताना आज अखेरच्या साखळी सामन्यात नवीन विक्रमाची नोंद केली. चिली संघाचा त्यांनी १४-० (मध्यंतर ५-०) असा फडशा पाडला. सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा आधीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेत २०१०मध्ये झालेल्या स्पर्धेत कांगारूंनी यजमानांना १२-० हरवलं होतं.


गोलांचा चौकार मारणारा यान्सेन जिप
सामन्याचा मानकरी ठरला.
डच संघासाठी हीरो ठरला यान्सेन जिप. त्यानं चार पेनल्टी कॉर्नरची संधी साधली. सहाव्या मिनिटाला पहिला गोलं करून त्यानं सधी साधली. त्याचा  चौथा गोल चव्वेचाळिसाव्या मिनिटाला झाला. ब्रिंकमन थिएरी ह्यानं तीन गोल करून यान्सेनला मोलाची मदत केली. त्यानं बाविसाव्या व तेविसाव्या मिनिटाला सलग दोन फिल्ड गोल केले. उत्तरार्धात विजेत्यांनी तब्बल नऊ गोल केले. त्यातही ४२, ४४, ४५, ४८ या सात मिनिटांत गोलांचा चौकार लागला. त्यातले तीन फिल्ड गोल होते.

‘क’ आणि ‘ड’ गटांचं चित्र आज स्पष्ट झालं. इंग्लंडनं पहिलं स्थान मिळवताना स्पेनला ४-० असं नमवलं. साखळी सामन्यांत कोणत्याच संघाला इंग्लंडचा बचाव भेदून गोल करणं जमलेलं नाही. ‘अ’ आणि ‘ब’ गटांतील चित्र शुक्रवारी स्पष्ट होईल.

...

(माहिती व छायाचित्रांचा स्रोत - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, ‘ईएसपीएन’ व ‘स्पोर्टस्टार’ ह्यांची संकेतस्थळं.)

.....

#हॉकी #विश्वचषक२०२३ #हॉकी_इंडिया #भारतxवेल्स #ओडिशा #कलिंग_स्टेडियम #अक्षदीप_सिंग #हरमनप्रीत #गोलविक्रम #नेदरलँड्सxचिली #यान्सेनxजिप #HWC2023

....


Saturday 14 January 2023

विजयी सलामी


पेनल्टी कॉर्नर आणि गोल. पहिला गोल केल्याचा आनंद
उपकर्णधार अमित रोहिदासच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे.
(छायाचित्र सौजन्य - https://www.fih.hockey)

खरोखर आहे की नाही, माहीत नाही; पण बहुसंख्य भारतीयांसाठी ‘आपला राष्ट्रीय खेळ’ अशीच हॉकीची ओळख आहे. त्याच खेळाच्या विश्वचषक स्पर्धेस ओडिशामध्ये सुरुवात झाली आहे. पाच वर्षांच्या खंडानंतर (धन्यवाद कोविड!) होणाऱ्या ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ओडिशामध्ये होणारी ही सलग दुसरी स्पर्धा. स्पर्धेचं गुरुवारी उद्घाटन झालं आणि आजपासून लढतींना सुरुवात झाली.

‘अ’ आणि ‘ड’ गटातील प्रत्येकी दोन सामने आज झाले. दोन सामने मोठ्या गोलफरकाचे आणि दोन गोलफलकावरून चुरशीचे झाल्याचे वाटावेत, असे. गंमतीची गोष्ट म्हणजे चारही सामन्यांतील विजयी संघांनी प्रतिस्पर्ध्यांना आपल्याविरुद्ध गोल करण्याची संधी दिली नाही. 

‘ड’ गटात यजमानांनी विजयी सलामी दिली. दिवसातला हा शेवटचा सामना. ऑलिंपिकमधलं पदक आपण दीर्घ काळानंतर टोक्योमध्ये जिंकलं आणि हॉकी पुन्हा एकदा आकर्षणाचा विषय झाली. राऊरकेला इथल्या बिरसा मुंडा क्रीडागारात भारतीय संघानं अपेक्षांना तडा दिला नाही. एरवी सातत्याने त्रासदायक ठरणाऱ्या स्पेनचं आव्हान त्यांनी मोडून काढलं. स्पेनच्या आघाडीच्या फळीनं पहिल्याच मिनिटाला भारतीय क्षेत्रात धडक मारली. पण इग्लेसियास अल्वारो ह्यानं मारलेला फटका गोलजाळ्याच्या आसपासही गेला नाही.

भारतीय संघ लगेच सावरला. त्याच्या परिणामी बाराव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंगला ती संधी साधता आली नाही म्हणून फार काही बिघडलं नाही. कारण लगेचच पुढचा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि अमित रोहिदास ह्यानं नेत्रदीपक गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. विश्वचषक स्पर्धेतला हा भारताचा द्विशतकी गोल होता! त्याचे मानकरी होते अमित आणि नीलम संजीप एक्सेस. हे दोघंही ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातले. ‘भूमिपुत्रांनी’ केलेल्या ह्या कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आलं नसतं तरच नवल!

त्यानंतर चौदाव्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. नीलकांत शर्माचा तो प्रयत्न फसला. स्पेनच्या आघाडीच्या फळीनं विसाव्या मिनिटानंतर  जोरदार आक्रमण सुरू केलं. त्याचा फारसा उपयो झाला नाही. त्यांना पंचविसाव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पाऊ कनिल ह्यानं मारलेला जोरदार फटका गोलरक्षक क्रिशनबहादूर पाठक ह्यानं अप्रतिम झेप घेत अडवला. त्यामुळं उत्साहात आलेल्या आपल्या आघाडीच्या फळीनं डाव्या बगलेतून मुसंडी मारली. हार्दिक सिंगनं चेंडू घेऊन थेट ‘डी’पर्यंत धाव घेतली. त्यानं डावीकडं असलेल्या ललितकुमार उपाध्यायकडं पास दिला. पण त्याच्या पुढेच उभ्या राहिलेल्या कनिलच्या स्टिकला लागून गोलरक्षक रफी आद्रियन याला चकवत चेंडू गोलजाळ्यात विसावला. आघाडी २-०! त्याच गोलफलकावर पूर्वार्धाची सांगता झाली.

आघाडी मिळाल्यानंतर खेळाडू काहीसे सुस्तावतात. त्याचा परिणाम निकाल बदलण्यात होतो, असं ह्या पूर्वी झाल्याची उदाहरणं आहेत. पण भारतीय संघानं ती ढिलाई उत्तरार्धात दाखवली नाही. उत्तरार्धातली पहिली पंधरा मिनिटं भारताचीच होती. पण गोलसंख्येत भर घालण्यात आपले खेळाडू अपयशी ठरले.


बिरसा मुंडा स्टेडियममधील भारतीय खेळाडूंचा हा जल्लोष
स्पेनवर दुसरा गोल चढविल्यानंतरचा.
(छायाचित्र सौजन्य - विश्वरंजन रौत/‘स्पोर्टस्टार’)

उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच आघाडी वाढविण्याची मोठी संधी भारताला मिळाली होती. ‘डी’च्या जवळ गेलेला अक्षदीप सिंग फटका मारण्याच्या तयारीत असतानाच स्पॅनिश खेळाडूचा फाऊल झाला. परिणामी सदतिसाव्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. कर्णधार हरमनप्रीत ह्याला मात्र ही संधी साधता आली नाही. त्याने गोलजाळ्याच्या डावीकडे तळाला चेंडू ढकलला खरा; पण सजग रफीने तो बरोबर अडवला. हरमनप्रीतने तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. त्याचा उपयोग झाला नाही. भारताला त्रेचाळिसाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. तोही वाया गेला. पुन्हा एकदा हरमनप्रीतला संधी साधता आली नाही.

सामन्याची अखेरची पंधरा मिनिटं राहिली असताना गोलफरक बदललेला नव्हता. स्पेनचा संघ उसळी मारून येतो की काय, अशी थोडी धास्ती होती. त्यात भर पडली ती फॉरवर्ड अभिषेकच्या निलंबनाने. बोनास्त्रे जोरदी ह्याच्याशी त्याची टक्कर झाली आणि त्याच्यावर दहा मिनिटांच्या निलंबनाची कारवाई झाली. म्हणजे शेवटची दहा मिनिटं भारताला दहा खेळाडूंनिशीच खेळावं लागणार होतं. स्पेनला त्रेपन्नाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. चेंडू गोलजाळ्याकडं फिरकणारसुद्धा नाही, ह्याची पुरेपूर काळजी क्रिशनबहादूर पाठकनं घेतली. त्यानंतर चार मिनिटांनी मिळालेला पेनल्टी कॉर्नरही स्पेनला साधता आला नाही. ललितकुमारनं चेंडूला व्यवस्थित बाहेरची वाट दाखवली. 


सामन्याचा मानकरी - अमित

सामन्याच्या उत्तरार्धात एकाही गोलची नोंद झाली नाही. भारतानं दोन संधी दवडल्या खऱ्या; पण समाधानाची बाब ही की, स्पेनला गोल नोंदवण्याची संधी आपण दिली नाही. ह्या विजयानं आपल्या खात्यात तीन गुण जमा झाले. संघाचा उपकर्णधार आणि बचाव फळीतला महत्त्वाचा खेळाडू अमित रोहिदास ह्या सामन्याचा मानकरी ठरला. घरच्या मैदानावर आपल्या माणसांसमोर मिळालेला हा पुरस्कार त्याच्यासाठी महत्त्वाच. पूर्ण सामनाभर जोरजोरात ओरडून संघाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांचे, अर्थात आपल्या माणसांचे त्यानं मनापासून आभार मानले.

कांगारूंचा दणदणीत विजय

स्पर्धेतील सलामीची लढत ‘अ’ गटातील अर्जेंटिना व दक्षिण आफ्रिका ह्यांच्यामध्ये झाली. दोन्ही संघ आक्रमक खेळाबद्दल प्रसिद्ध असूनही पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. ही कोंडी फुटली त्रेचाळिसाव्या मिनिटाला. अर्जेंटिनाच्या माईको कसेल्ला ह्यानं फिल्ड गोल केला. ही एका गोलाची आघाडी शेवटपर्यंत टिकवण्यात त्यांना यश आलं. ह्या गटातलाच दुसरा सामना पूर्ण एकतर्फी झाला. थॉमस ऊर्फ टॉम क्रेग ह्याची हॅटट्रिक आणि जेरेमी हेवार्ड ह्यानंही तीन गोल करून त्याला दिलेली साथ ह्यामुळं कांगारूंनी फ्रान्सचा ८-० असा धुव्वा उडवला. ‘ड’ गटातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं वेल्स संघावर ५-० असा मोठा विजय मिळवला.

...

(संदर्भ व माहितीचे स्रोत - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, हॉकी इंडिया, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, स्पोर्ट्स्टार ह्यांची संकेतस्थळे)

...

#हॉकी #विश्वचषक२०२३ #हॉकी_इंडिया #भारतxस्पेन #ओडिशा #बिरसा_मुंडा_स्टेडियम #अमित_रोहिदास #हरमनप्रीत #क्रिशनबहादूर_पाठक #HWC2023


पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...