Wednesday 30 March 2022

कवी(?) असणं, कविता लिहिणं...

‘तू कविता(ही) लिहितोस?’ काहींनी दोन दिवसांत हा प्रश्न थेट विचारला. काहींच्या बोलण्या-प्रतिक्रियांतून तो जाणवला. ह्याचं कारण दैनिक लोकसत्ताच्या रविवारच्या (दि. २७ मार्च) अंकात प्रसिद्ध झालेली अस्मादिकांची रचना. दैनिक लोकसत्तानं ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज. शेळके ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या ‘कविता मनोमनी’ उपक्रमाचं निमित्त. कवयित्री नीरजा व कवी दासू वैद्य ह्या जोडगोळीनं पसंतीची मोहोर उठविलेल्या १६ कवितांपैकी एक.

मित्रांच्या-स्नेह्यांच्या ह्या प्रश्नानंतर मी स्वतःलाही विचारलं - ‘तू कवी आहेस का?’ ह्या प्रश्नाचं मनातल्या मनातलं उत्तर तरी ‘नाही!’ असंच आहे. ते होकारार्थी आलेलं आवडेल. मुंबईच्या आर. जे. गौरी कुलकर्णी ह्यांनी लिहिलं होतं की, कमीत कमी शब्दांमध्ये भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे कविता. त्यांची ही प्रतिक्रिया अगदी अलीकडची असल्यानं अजून लक्षात राहिलेली.

कवी नाही, असं जाहीरपणे मान्य केलं, तरी नावावर काही कविता आहेत. त्या छापून आल्या आहेत. विनायक लिमये आणि प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या आग्रहामुळे ‘शब्ददीप’ दिवाळी अंकामध्ये सलग दोन वर्षं कविता प्रसिद्ध झाल्या. ‘सकाळ साप्ताहिक’च्या दिवाळी अंकातही एक कविता प्रसिद्ध झाली. ती माझी सर्वांत लाडकी कविता. शास्त्रानुसार त्या कितपत कविता होत्या, ह्याबाबत मला (काहीशी) शंका आहे. पण तशी ती घेणं वा व्यक्त करणं योग्य नाही. कारण तसं करणं म्हणजे लिहायला लावणाऱ्या, निवड करणाऱ्या  आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या संपादकांवर अन्याय केल्यासारखं आहे.

ह्या प्रसिद्ध झाल्या एवढ्याच कविता मी प्रसवल्या असं मुळीच नाही. साधारण २०११पासून तत्कालीन महत्त्वाच्या घडामोडींवर मुक्तछंदात लिहू लागलो. त्याचं नामकरण ‘पद्याचा आभास निर्माण करणारं गद्य’ किंवा ‘पद्यासारखं वाटणारं गद्य’ असं केलं. चार वर्षांच्या काळात अशा साधारण पन्नास-साठ रचना झाल्या. त्यातील काही ‘रविवार जत्रा’च्या विशेषांकात व दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या.

ह्या रचना लिहीत होतो, तेव्हा फेसबुकवर वावरत नव्हतो. मग मी ओळखीच्या पाच-पंचवीस जणांना त्या इ-मेलने पाठवत होतो. त्याचं खूप जणांनी कौतुक केलं. ‘आप’चा उदय झाला तेव्हाची परिस्थिती, नारायणदत्त तिवारी ह्यांच्या मुलानं खटला जिंकून त्यांना आपलं जनकत्व स्वीकारायला भाग पाडणं, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पुण्यात आलेल्या नरेंद्र मोदी ह्यांना लतादीदींना पंतप्रधान होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा... ह्या आणि अशा काही विषयावरच्या कविता मनापासून लिहिल्या होत्या.

दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ‘ढिंग टांग’ सदरासाठी बदली खेळाडू म्हणून भूमिका बजावताना तीन-चार कविता लिहिल्या. मोदी सरकारचा दुसरा वर्धापनदिन, पाऊस आल्यावर काय होतं आणि लेखक मुरुगन ह्यांच्याबाबत न्यायालयानं दिलेला निर्णय ह्या त्यातील मला आवडलेल्या रचना. त्यांना नाद आहे आणि त्या मीटरमध्ये आहेत. दैनिकाच्या वाचकाला समजेल, आवडेल, पचेल नि पटेल अशी शब्दरचना त्यात मला बऱ्यापैकी साधली आहे. (त्यातल्या काही कविता ह्याच ब्लॉगवर ‘पद्यासारखं गद्य’ सदरात पाहायला मिळतील.)

‘पद्यासारखं वाटणारं गद्य’ची संख्या वाढली, तेव्हा त्यांचा संग्रह प्रकाशित व्हावा, असंही वाटू लागलं. काहींनी तयारी दाखवली. पण प्रकरण पुढं सरकलंच नाही. ह्यातल्या काही रचनांसाठी प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार प्रशांत कुलकर्णी ह्यांनी त्या वेळी अर्कचित्रंही काढून दिली. पण संग्रहच आला नाही आणि ते नाराज झाले. अगदी स्वाभाविक! त्यांची नाराजी दूर करणं मला अजूनही शक्य झालेलं नाही.

अलीकडच्या तीन-चार वर्षांत अशा व्यंग्यकविता लिहिणं थांबलं. कारण माहीत नाही. आतून लिहावं वाटावं लागतं, तसं वाटलं नाही. अर्थात अजून एक कारण आहे - मला उत्स्फूर्त सुचत नाही. एखाद-दोन ओळी सुचतात किंवा मध्यवर्ती कल्पना मनात येते. त्यानुसार पंचवीस-तीस ओळींची कविता लिहिण्यासाठी ती घटना मला पुनःपुन्हा वाचावी लागते. सहसा रात्रीनंतर बैठक जमवावी लागते. एका प्रयत्नात मनासारखं लिहून होत नाहीच. प्रयत्न करावे लागतात. शब्द बदलावे लागतात. आता काय होतंय की, एखादी घटना घडली की, सामाजिक माध्यमांवर त्याच्यावर तातडीने प्रतिक्रिया उमटतात. त्यातल्या खूप प्रतिक्रिया चटकदार, धारदार, नेमक्या असतात. त्या वाचल्यावर ‘आपण काय वेगळं लिहिणार’ असं वाटतं आणि उत्साह मावळतो.

असो. ‘कविता मनोमनी’ उपक्रमाच्या बातम्या वाचल्या आणि वाटलं की, आता लिहावं. कविता सादर करण्याच्या मुदतीच्या दोन दिवस आधी एक कल्पना मनात घोळत होती. तिलाच शब्दरूप द्यायचं ठरवलं होतं. शेवटचा दिवस उगवला, तरी प्रत्यक्षात एक ओळही लिहून झाली नव्हती. ‘पाठविली का कविता?’ असं मित्रानं रात्री दहाच्या सुमारास विचारलं आणि जाग आली. संगणक उघडून बसलो आणि आधी सुचलेलं काहीच आठवेना. मित्राला शब्द दिला म्हणून लिहायचंच असं ठरवलं. साधारण साडेदहा ते रात्री पावणेबारा असं झगडत राहिले. संगणकाच्या वर्डपॅडवर बरंच काही लिहिलं आणि खोडलं. त्यातून जे राहिलं ते मुदत संपण्याच्या जेमतेम पाच मिनिटं आधी इ-मेलवरून पाठवून दिलं.

निकाल कधी लागणार, ह्याची काही कल्पना नव्हती. कविता प्रसिद्ध झाली त्या रविवारी मी सकाळीच प्रवासासाठी निघालो. आपली कविता परीक्षकांना पसंत पडली, हे मला थेट संध्याकाळी समजलं. योगायोग किंवा गंमत अशी की, ‘लोकसत्ता - तरुण तेजांकित’ पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमस्थळीच मला ही बातमी कळली!

अशी आहे ती कविता...



नपुसंकलिंगी...

एकटेपणाचा खूप खूप

कंटाळा आला म्हणून

आणि धावत्या जगाबरोबर

दोन पावलं चालत

थोडं ‘सोशल’ व्हावं म्हणून

भराभरा, उत्साहाने

सामाजिक माध्यमांवर

‘लॉग-इन’ झालो

रोज नवनवे पाहत राहिलो

आवडल्याक्षणी दाद देत राहिलो

अंगठा, बदाम, हसरा चेहरा

दुःखी आणि काळजी दाखवणारा

 

यांच्या-त्यांच्या गटात येण्याचं

निमंत्रण ह्यांनी-त्यांनी दिलं

‘सहर्ष’ म्हणत स्वीकारताना

टक्क डोळ्यांनी स्वप्न पाहिलं

आता लाईक वाढतील

प्रतिक्रिया लिहितील

‘छान लिहिता हं’ म्हणत

कुणी कौतुक करतील


अपेक्षिलं तसं काहीच नाही झालं

त्यांच्यात राहूनही त्यांचा न झालो

ह्यांच्यात असूनही एकटाच पडलो


‘बघता काय सामील व्हा’

आवाहनावर गप्प बसलो,

म्हणून काहींनी धुत्कारलं

पलीकडच्याला कचकचीत

शिव्या देत नाही,

म्हणताना काहींनी फटकारलं

धाड घालणाऱ्या ट्रोलांना

जणू आमंत्रण दिलं


मग ह्यांनी मला जात विचारली

उत्तर देणं टाळलं

मग त्यांनी मला धर्म विचारला

ओठ न उघडणं पसंत केलं

आमचा? त्यांचा? की कुंपणावरचा?

सवाल होता त्यांचा लाखमोलाचा


कुणी पाकिस्तानात धाडलं

कुणी युरेशियात पाठवलं

आणखी कुणी आफ्रिकेत जा म्हटलं

थोडक्यात, आपला म्हणायला

सगळ्यांनी त्वेषानं नाकारलं

मौनामुळं सगळंच बिघडलं


बधिरपणाला कंटाळून माझ्या

पिच्छा सोडून जातानाही पिचकारले,

‘xxला, ‘हे ’ माणसांतही जमा नाही!’

----------

#कविता  #कवी #कविता_मनोमनी #कविता_स्पर्धा #लोकसत्ता #पद्यासारखं_गद्य  #सामाजिक_माध्यमे #सोशल_मीडिया

Wednesday 16 March 2022

न झालेला (अजून एक) मुख्यमंत्री

 


पंतप्रधान मोदी ह्यांच्या हस्ते सत्कार.

नगर जिल्ह्यात ‘न झालेले’ मुख्यमंत्री किती? यादी करायचीच झाली, तर फार मोठी होईल. त्यातल्याच एका दिग्गजानं आज अखेरचा निरोप घेतला. आपल्यावर सोपवलेली कामगिरी काळानं बजावली. त्याच्या यादीत आज शंकरराव कोल्हे ह्यांचं नाव होतं. आणखी आठ दिवसांनी कोल्हे ह्यांनी चौऱ्याण्णवाव्या वर्षात पदार्पण केलं असतं. पण नियतीनं तसं लिहिलेलं नव्हतं. नाशकामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शंकरराव कोल्हे ह्यांचा ‘सहकारतज्ज्ञ’ असा उल्लेख आज-उद्या-परवाच्या बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांतील संपादकीय पानांवर प्रसिद्ध होणाऱ्या स्फुटांमध्ये होईल. पण फक्त तेवढंच बिरूद त्यांच्यावर अन्याय करणारं असेल. सहकाराबरोबरच विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास असणारा, स्वतःची ठाम मतं असणारा आणि ती व्यक्त करणारा हा नेता होता.

‘सहकार-महर्षी’, ‘सहकार-सम्राट’ अशी पदवीसदृश विशेषणं माध्यमांमधून कित्येक वर्षांपासून वापरली जातात. त्यातून बहुदा उपरोध, काहीसा हेवा, क्वचित तुच्छता व्यक्त होत असते. ग्रामीण महाराष्ट्र, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र व्यापलेल्या सहकार चळवळीने असे ‘महर्षी’ वा ‘सम्राट’ निर्माण केले, ह्यात काही खोटं नाही. पण ह्या उपरोधाच्या आणि हेव्याच्या पार पुढे जाऊन काम करणारे नेते ह्याच चळवळीनं दिले. त्यांच्या कामानं त्या परिसराचा, तालुक्याचा कायापालट झाला. भले त्या परिसराला ‘नेत्याचं संस्थान’ म्हणून हिणवलं गेलं असेल.

काळे आणि कोल्हे

नगर जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल बोलताना नव्या सहस्रकापर्यंत ‘काळे-कोल्हे’ असा उल्लेख अपरिहार्य असे. ही दोन आडनावं सयामी जुळ्याप्रमाणे येत. जणू एकाच्या उल्लेखाविना दुसरा कोणीच नाही. विसाव्या शतकाची शेवटची साधारण तीन-साडेतीन दशकं कोपरगाव तालुक्याचं राजकारण शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे ह्याच नावांभोवती फिरत राहिलं. त्याबद्दल भरपूर लिहून आलं. ह्या दोन नेत्यांचं भांडण लुटुपुटीचं आहे; आपापल्या कारखान्यांच्या निवडणुका ते कसे बरोबर बिनविरोध घडवून आणतात, अशी चर्चा नेहमीच व्हायची. तालुक्यात ‘तिसरी शक्ती’ उदयास येऊ नये म्हणून ह्या दोन नेत्यांची नुरा कुस्ती चालते, असंही पत्रकारांचं, राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांचं मत होतं. ते बरंचसं खरंही म्हणता येईल. हे दोघे पूर्ण भरात असेपर्यंत तालुक्यात तिसरी शक्ती लक्षणीयरीत्या काही दिसली नाही.

राजकारण्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल तुच्छतेनं बोललं जाण्याच्या आणि बहुतांशी प्रमाणात ते वास्तव असण्याच्या काळात हे दोन्ही शंकरराव उच्चशिक्षित होते. आज ज्याचा ‘व्यावसायिक शिक्षण’ म्हणून खास उल्लेख होतो, ते त्यांनी मिळवलं होतं. दत्ता देशमुख, शंकरराव काळे १९४०च्या दशकातले अभियंते होते. पुण्याच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळविली होती. शंकरराव कोल्हे कृषिशास्त्राचे पदवीधर होते. त्यानंतर युरोप आणि अमेरिकेत त्यांनी ह्या विषयाचं पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलं.

सहकार, शेती, पाणी, शिक्षण हे कोल्हे ह्यांच्या आवडीचे विषय. समोर ऐकणारा असेल, तर त्या विषयावर तासन् तास बोलण्याची त्यांची क्षमता होती. तो अनुभव मी एकदा घेतला. ‘लोकसत्ता’ची नगर आवृत्ती चालू होऊन जेमतेम वर्ष झालं असेल. आम्ही काही मित्र येवल्याहून नगरकडे येत होतो. त्या वेळी कोल्हे ह्यांच्या पुण्या-मुंबईतील जनसंपर्काची जबाबदारी अभिनंदन थोरात पाहत होते. अभिनंदन त्या दिवशी कोपरगाव येथे होते. त्यांना भेटायला म्हणून आम्ही गेलो.

संजीवनी साखर कारखान्यात शंकरराव कोल्हे होतेच. अभिनंदन ह्यांनी त्यांची भेट घालून दिली. त्या काळात ‘लोकसत्ता’ त्यांचं आवडतं, अगदी प्रेमाचं दैनिक होतं. त्या दैनिकाचा माणूस आहे म्हटल्यावर त्यांनी खळखळ न करता वेळ दिला. नंतरचा सव्वा ते दीड तास साखर, पाणी, परदेशातली शेती ह्या विषयावर अखंड बोलत राहिले. आम्ही सारे मित्र त्या वाक्गंगेमुळे आणि त्यातून ओसंडून वाहत असलेल्या ज्ञानप्रवाहामुळे अचंबित झालो. सारा वेळ आम्ही श्रवणभक्ती केली. ‘पत्रकार’ असल्याची जाणीव कधी तरी व्हायची. एखादा प्रश्न विचारायला जायचो. त्याला थोडक्यात उत्तर देऊन कोल्हेसाहेब आपली बॅटिंग मागील डावावरून पुढे अशा रीतीनं चालू ठेवायचे. ‘साहेब, ही मुलाखत नाही बरं. सहज गप्पा आहेत,’ असं अभिनंदन ह्यांनी त्यांना सांगितलं. हे कुठं छापून येणार नाही हे माहीत असूनही ‘...शहाणे करुनी सोडावे सकळ जन’ ह्या बाण्याप्रमाणे त्यांनी आम्हा चार-पाच मित्रांना खूप काही सांगितलं.

मुलाखतीवरून एक गंमत आठवली. नव्वदीच्या दशकात कोल्हेसाहेब पुण्याच्या एका संपादकांचे लाडके होते. छोट्या-मोठ्या गोष्टींबाबत त्यांना कोल्हेसाहेबांचे मत महत्त्वाचं वाटायचं (तसं ते असायचंही, हा भाग वेगळा!) आणि ते नगरच्या कार्यालयातील प्रमुखाला ते घ्यायला सांगायचे. एकदा त्यांनी नगर कार्यालयातील ह्या सहकाऱ्याला कोल्हेसाहेबांची मुलाखत घेऊन यायला सांगितलं. बहुतेक पाण्याचा विषय असावा. नगरहून हा पत्रकार प्रश्नांची पद्धतशीर यादी बनवून गेला.

आपलीच मुलाखत आपल्याशी

कोल्हेसाहेबांनी ते प्रश्न पाहिले. मग ते त्याच्या पद्धतीनं गडगडाटी हसले. ‘मुलाखत कशी घ्यायची मी सांगतो,’ असं म्हणत त्यांनीच स्वतःला प्रश्न विचारले आणि त्याची (सविस्तर) उत्तरं दिली! निरोप घेताना ‘झाली ना चांगली मुलाखत?’ असं विचारायलाही ते विसरले नाहीत. त्यांचं हसू मनमोकळं, दिलखुलास होतं. आमच्या त्या गप्पांमध्येही ते अनुभवायला आलं.

पत्रकारांचं ‘पक्षांतर’

असंच एकदा कोल्हेसाहेब ‘लोकसत्ता’च्या पुणे कार्यालयात आले होते. मी तेव्हा तिथेच होतो. संपादकांनी ‘हा तुमच्या नगरचा बरं का!’ अशी ओळख करून दिली त्यांना माझी. संपादकीय विभागातल्या मंडळींशी त्यांनी तासभर ऐसपैस गप्पा मारल्या. त्या ओघात कुणी तरी नेत्यांच्या पक्षांतराबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही लोक नाही का, ह्या पेपरमधून त्या पेपरमध्ये जात? कुणी वृत्तसंपादक केलं म्हणून जातं, तर कुणाला संपादक व्हायचं असतं म्हणून तो दुसऱ्या पेपरमध्ये जातो. तसंच असतं हे.’’

नव्वदीच्या दशकानंतर वर्तमानपत्रांचे वर्धापनदिन साजरे करण्याची आणि त्यानिमित्त विशेष पुरवण्या प्रसिद्ध करण्याची पद्धत रूढ झाली. त्यातून मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळायच्या. आधीच्या काळात अशा पुरवण्यांच्या माध्यमातून वाचकांना वेगळं काही वाचायला मिळायचं बरंचसं. (आता त्या निव्वळ जाहिरात पुरवण्या झाल्या आहेत.) अशाच एका वर्धापनदिनासाठी जाहिरातीची विनंती करण्यासाठी जाहिरात विभागाचे दोघे-तिघे कोल्हेसाहेबांकडे गेले. वजन पडावं म्हणून सोबत संपादकीय विभागप्रमुख होतेच. विषय निघाला आणि जाहिरातीची अपेक्षा सांगितली गेली. त्यावर कोल्हेसाहेब म्हणाले, ‘‘अहो साहेब, तुमचा वर्धापनदिन. त्या आनंदानिमित्त तुम्ही आम्हाला, वाचकांना काही तरी द्यायचं. ते सोडून आम्हालाच मागत बसलात!’’ अर्थात नंतर त्यांनी जाहिरात मंजूर केली, हा भाग वेगळा.

आम्ही तिघं-चौघं, पोपट पवार, निर्मल थोरात आणि मी परवाच नगरच्या सावेडीच्या ‘स्वीट होम’मध्ये जेवायला गेलो होतो. निर्मलला अचानक आठवलं नि तो म्हणाला, ‘‘कोल्हेसाहेब नेहमी इथंच जेवायचे बरं का.’’ मला ते माहीत होतं. त्यांना ‘बॉइल्ड फूड’ लागायचं - उकडलेल्या भाज्या. असंच एकदा ते संध्याकाळी ‘लोकसत्ता’च्या नगर कार्यालयात आले होते. तिथून पुण्याला जाणार होते. पोहोचायला रात्रीचे साडेनऊ-दहा वाजणार. अचानक त्यांनी मला सांगितलं, ‘‘अहो, तेवढा अभिनंदनला फोन करा हो. त्याला सांगा, मी येतोय. ते आमचं जेवण कुठं मिळतं त्यालाच चांगला माहितीय. नाही तर उपाशी राहायचो मी.’’ आणि नंतर तेच प्रसिद्ध गडगडाटी हास्य. 

‘उत्तम वाचक’ अशीही कोल्हेसाहेबांची ओळख होती. ‘लोकसत्ता’मध्ये त्या काळी रविवारी प्रसिद्ध होणारे ‘नगरी-नगरी’ सदर त्यांना आवडायचे, असे त्यांचे स्वीय सहायक वीरेंद्र जोशी नेहमी सांगत. त्या सदरात प्रसिद्ध झालेले ‘पत्रकार लोग आयोडेक्स मलिए, पाकिट लेने के काम चलिए’ हे टिपण त्यांना खूप आवडलं. इतकं की, त्यांनी तेव्हाचे मुख्य वार्ताहर महादेव कुलकर्णी ह्यांना फोन करून ‘तुम्ही रोज का नाही छापत हे सदर?’ असं विचारलं.

काळे आणि कोल्हे ह्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या ऐन मध्यावर कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला. ऊसमळे जगतील का आणि कारखाने टिकतील का, अशी अवस्था होती. दोघेही त्या प्रश्नाला आपापल्या पद्धतीने भिडले. त्यांनी परस्परांवर जोरदार टीकाही केली. पण ती करताना मूळ प्रश्नाचा विसर पडणार नाही, ह्याची पूर्ण काळजी घेतली. तुटेपर्यंत ताणायचं नाही, हाच दोघांच्याही राजकारणाचा मंत्र होता.

मंत्रिपदाची छोटी इनिंग्स 

लायक असूनही ह्या दोन्ही नेत्यांना फार काळ सत्ता उपभोगता आली नाही. शंकरराव काळे ह्यांना तर केवळ एकदा राज्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये. कोल्हे ह्यांना मंत्रिपदासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागली. वयाच्या एकसष्टीत म्हणजे १९९०मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. तेही पूर्ण पाच वर्षांसाठीच नाहीच. महसूल, कृषी व फलोत्पादन, परिवहन, राज्य उत्पादनशुल्क अशी विविध खाती त्यांनी छोट्या इनिंग्समध्ये संभाळली. त्यानंतर तीस वर्षांत कोपरगाव मतदारसंघाच्या वाट्याला काही लाल दिव्याची गाडी आली नाही.

‘एन्रॉन’विरोधात सत्याग्रह

हेच कारण होतं की काय माहीत नाही, पण नंतरच्या पाच-एक वर्षांत कोल्हेसाहेब आक्रमक होते. डॉ. कुमार सप्तर्षी ह्यांनी त्यांच्यावर गारूड केल्यासारखं होतं. त्यांच्या बरोबर जाऊन त्यांनी एन्रॉन प्रकल्पाच्या विरोधात सत्याग्रहही केला! खरं तर ते राजकारणातल्या वसंतदादा गटाचे. जिल्ह्यात ते, प्रसाद तनपुरे, शिवाजीराव नागवडे, दादा पाटील शेळके, मधुकर पिचड ह्यांचा ‘दादा गट’ होता. तो १९९५नंतर हळुहळू विलयाला गेला. पु. लो. द.ची स्थापना झाली, तेव्हा कोल्हे इंदिरा काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे त्यांचा समाजवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्याच्या वेळी मात्र त्या पक्षाला पसंती देणारे ते जिल्ह्यातले पहिले मातब्बर नेते होते. तसे ते काही पवार ह्यांच्या खास गोटातले नव्हते. पण जिल्ह्यातल्या, त्यातही कोपरगावच्या राजकारणात त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न चालू होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी तो निर्णय घेतला.

जागतिकीकरण उंबरठ्यावर असताना त्याची चाहूल लागून त्याबद्दल बोलणारे जिल्ह्यात दोन नेते होते - बाळासाहेब विखे पाटील आणि शंकरराव कोल्हे. सहकार चळवळीच्या माध्यमातून शिक्षणाचेही मोठे काम झाले. त्याची नगर जिल्ह्यात अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. संजीवनी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय त्यापैकीच एक. गुणवत्तेबद्दल हे महाविद्यालय ओळखले जाते. ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणखी दोन वेगळे उपक्रम चालू झाले. कोल्हेसाहेबांचे सहकारी लहानुभाऊ नागरे ह्यांना सैनिकी शिक्षणाबद्दल मोठी ओढ. त्याची त्यांना जाण होती आणि उपयुक्तताही माहीत होती. लष्करातील मोठ्या अधिकाऱ्यांशी त्यांची ओळख होती. त्यातूनच ‘संजीवनी प्री-कॅडेट ट्रेनिंग सेंटर’ चालू झाले. आणखी एक नोंद घेण्यासारखी वेगळी संस्था म्हणजे - ‘संजीवनी मोटर ड्रायव्हिंग स्कूल’. सह-वीजनिर्मिती, इथेनॉल निर्मिती, आधुनिकीकरण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यांच्या राजकारणाएवढ्याच, किंबहुना काकणभर अधिक महत्त्वाच्या ह्याच गोष्टी होत.

कोल्हेसाहेब आणखी एका गोष्टीमुळे लक्षात राहिले. संजीवनी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याला त्यांचे नाव देण्याचा ठराव आला. त्याला त्यांनी त्या क्षणी विरोध केला! आपण संस्थापक असलो, तरी आपल्या नावाने कारखाना ओळखला जाऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. जिल्ह्यात त्या काळात आलेल्या नामांतराच्या लाटेत ती वेगळी होती. पण त्यांची ही भूमिका त्यांच्याच कार्यकर्त्यांना पटली नि पचली नाही. काही काळानंतर त्यांचे नाव कारखान्याला लाभले.

साधारण गेल्या दहा वर्षांपासून कोल्हेसाहेब राजकारणापासून लांबच होते. प्रकृतीमुळे जाहीर समारंभातील वावरावरही मर्यादा आल्या होत्या. सहकार-शेती-शिक्षण-राजकारणाच्या इतिहासातील एक प्रकरण त्यांच्या निधनामुळे संपले!

---

(सर्व छायाचित्रे - कोपरगावचे पत्रकार महेश जोशी ह्यांच्या सौजन्याने)

---

#ShankarraoKolhe #kopargaon #NagarPolitics #cooperative #sanjeevani #Kale_Kolhe #politics #maharashtapolitics #sugarindustries #enron

Wednesday 9 March 2022

भिवंडीत घुमला नगरचा दम


श्रीकृष्ण करंडक पटकावणारा नगरचा कबड्डी संघ.

इतके जवळ आणि तरीही फार दूर..! कबड्डी-कबड्डीचा दम घुमवत चढाई करताना पकड झाल्यावर आक्रमकाने मोठ्या त्वेषाने मध्यरेषा गाठावी. त्याच्या हाताचा रेषेला स्पर्श होण्याआधीच संरक्षकांपैकी कोणी तो अलगद उचलावा आणि त्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम द्यावा! आक्रमक बाद होतो. इतक्या जवळ असूनही लक्ष्यापासून दूर राहिल्याची सल कायम राहते. त्याला वाट पाहावी लागते पुन्हा चढाई करण्याच्या संधीची.

नगरच्या पुरुष कबड्डी संघाने ही सल जवळपास २३ वर्षे बाळगली. ती दूर झाली मागच्या आठवड्यात. काल्हेरच्या (भिवंडी) बंदऱ्या मारुती क्रीडानगरीमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेत नगरच्या नवख्या संघाने बाजी मारली. एकोणसत्तर वर्षांतले पहिले विजेतपद. उपान्त्य फेरीत मुंबई उपनगर आणि अंतिम सामन्यात मुंबई शहर अशा बलाढ्य संघांना पराभूत करण्याची किमया शंकर गदई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी करून दाखवली.

राज्यातील अव्वल, पहिल्या नंबरचा संघ ठरण्याची ही कामगिरी लीलया झालेली नाही. विजेतेपदाकडे नेणारी आणि त्यावर शिक्कामोर्तब करणारी - दोन्ही लढती ‘जिंकू किंवा मरू’ एवढ्या अटीतटीच्या झाल्या. उत्तम संघभावना, आत्मविश्वास, दडपण झुगारून टाकण्याची आणि शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची वृत्ती ह्यामुळेच नगरला हे यश खेचून आणता आले. मैदानातील कौशल्यांबरोबरच कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता कणखरपणे उभे राहण्याची त्यांची तयारी होती. त्याचे पारितोषिक राज्य अजिंक्यपदाच्या रूपाने मिळाले.

नगरचा एकमेव अर्जुन पुरस्कारविजेता पंकज शिरसाट ह्या अभुतपूर्व विजयाचा साक्षीदार होता. त्याच्याच नेतृत्वाखाली इस्लामपूरमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नगरने पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. यजमान सांगलीकडून त्यांचा पराभव झाला आणि विजयश्रीने हुलकावणी दिली. पण त्या स्पर्धेचा ‘हीरो’ पंकज ठरला होता. चतुरस्र चढायांनी त्याने तिथल्या शेकडो प्रेक्षकांना जिंकले होते. ह्या संघातून खेळलेले सातही जण हीरोच आहेत, असं पंकज अगदी दिलखुलासपणे म्हणतो.

श्रीकृष्ण करंडक ‘डार्क हॉर्स’ला 

फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी भिवंडीत सुरू झालेल्या एकोणसत्तराव्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नगरचा संघ तसा फार कुणाच्या खिसगणतीत नव्हता. अजिंक्यपदाचा श्रीकृष्ण करंडक सर्वसाधारण दिसणाऱ्या मुलांच्या ह्या संघाला मिळेल, असंही वाटलं नसेल कुणाला. ‘डार्क हॉर्स’ ठरला हा संघ. चाळीस वर्षांपूर्वी विश्वचषक जिंकणाऱ्या कपिलदेवच्या संघासारखा!

पुरुषांच्या ‘ब’ गटात बलाढ्य मुंबई शहर, सोलापूर, औरंगाबाद व नगरचा समावेश होता. पहिल्याच सामन्यात मुंबई शहराला बरोबरीत थोपवून नगरकरांनी चुणूक दाखवली. खरं तर पूर्वार्ध संपला तेव्हा नगरकडे ९-७ आघाडी होती. राहुल खाटीक, प्रफुल्ल झावरे, शंकर गदई ह्यांनी मिळवून दिलेली ही छोटी आघाडी निर्णायक ठरली नाही. अनुभवी मुंबईकरांनी नंतर जोर लावला आणि सामना २०-२० बरोबरीत सुटला.

गटातील नंतरचे दोन्ही सामने नगरच्या संघाने सहज जिंकले. कर्णधार शंकर, प्रफुल्ल व संभाजी वाबळे ह्यांच्या जोरदार खेळामुळे सोलापूरवर ५४-१३ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. औरंगाबादचाही नगरपुढे टिकाव लागला नाही. ह्या गटात मुंबई शहर व नगर ह्यांचे समसमान पाच गुण होते. पण गुणफरक कमी असल्यामुळे मुंबई शहर संघाला गटात अव्वल स्थान मिळाले.

आता होती बाद फेरी. प्रत्येक सामना जिंकलाच पाहिजे. उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करताना नगरच्या संघाने कोल्हापूर संघाला ४७-१५ अशी धूळ चारली. ह्या विजयात देवीदास जगताप, संभाजी वाबळे चमकले. उपान्त्यपूर्व फेरीत नंदुरबारला हरवताना (३३-२०) नगरने पूर्वार्धात व उत्तरार्धात एक-एक लोण चढविले. ह्या सामन्यात गदई व खाटीक ह्यांना उत्तम साथ मिळाली, ती राम आडागळेची.

नगरकरांची लढाऊ वृत्ती

नगरच्या संघाची आतापर्यंतची वाटचाल आश्वासक होती. त्याच पद्धतीच्या खेळातून उपान्त फेरी गाठली. समोर संघ होता मुंबई उपनगराचा. व्यावसायिक, सातत्याने खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असलेला, ज्याचं नाव ऐकूनच प्रतिस्पर्धी गळाठून जातो, असा संघ. इथेही नगरकरांनी लढाऊ वृत्ती दाखवली. नियमित वेळेत गुणफलक बरोबरी दाखवत होता. मग पाच-पाच चढायांच्या अलाहिदा डावात नगरचा संघ सरस ठरला. ही लढत ३३-३० (७-४) अशी जिंकून नगरने अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेत सलामीला गाठ पडलेलाच मुंबई शहरचा संघ अंतिम फेरीत नगरसमोर उभा होता. उत्तम कामगिरीचा इतिहास, प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळणारे, वर्षातले सात-आठ महिने विविध स्पर्धांमध्ये कस अजमावणारे खेळाडू असा बलाढ्य संघ. तुलनेने नगरचा संघ पोरसवदा. स्पर्धात्मक वातावरणाचा फारसा अनुभव नसलेला. जमेची बाजू एवढीच की, ह्या संघानेच आधी मुंबई शहरशी बरोबरी केलेली.

गमावण्यासारखं काहीच नसलेल्या नगरची सुरुवात धडाकेबाज होती. पण काही मिनिटांतच मुंबई शहरने चोख प्रत्युत्तर देत बाजू सावरली. मध्यंतराला मुंबई शहर संघाकडे १४-८ आघाडी होती. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत निर्विवाद ठरावी, अशी आघाडी.

पण सामन्याचा उत्तरार्ध अधिक चुरशीचा झाला. सगळं दडपण झुगारून नगरची तरुण पोरं खेळली. मिनिटा-मिनिटाला पारडं बदलत होतं. पाच मिनिटं बाकी असताना नगरकडे एका गुणाची (२३-२२) आघाडी होती. ती तोडत मुंबईने तीन गुणांची आघाडी घेतली. अखेरच्या क्षणी नगरने २५-२५ अशी बरोबरी साधली. विजेता ठरविण्यासाठी झालेल्या ५-५ चढायांच्या डावातही बरोबरी (३१-३१) झाली.

सुवर्ण चढाई नि नवी आवृत्ती

कबड्डीचा राज्यविजेता ठरणार होता सुवर्ण चढाईतून. त्यासाठी पुन्हा नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणाऱ्या संघालाच चढाईची संधी मिळते. जो संघ चढाई करतो, त्याच्या यशाची खातरी अधिक असते, असे राज्य कबड्डी संघटनेचे माजी संयुक्त चिटणीस प्रा. सुनील जाधव ह्यांचे निरीक्षण. सुदैव म्हणा किंवा योगायोग म्हणा, शंकर गदईने नाणेफेक जिंकली. सुवर्ण चढाई करण्यासाठी तोच गेला. त्याने पहिल्याच फटक्यात बोनस गुण वसूल केला आणि कबड्डीच्या इतिहासाची नवी आवृत्ती लिहिली! तेवीस वर्षांपूर्वी हुलकावणी दिलेले स्वप्न आपलेसे झाले.

कोणत्याही खेळात एखादा संघ अजिंक्य ठरतो, तेव्हा त्यासाठी केलेली काही मेहनत असते. विचारपूर्वक केलेली आखणी असते. नगरच्या संघाचे प्रशिक्षक होते शंतनु पांडव. इस्लामपूरला उपविजयी ठरलेल्या संघाचे सदस्य. ते म्हणतात, ‘‘तेव्हा इस्लामपूर आणि आता भिवंडी. कबड्डीपटू म्हणून माझ्या आयुष्यातले हे दोन महत्त्वाचे, सुवर्णक्षण - तेवीस वर्षांच्या अंतराने आलेले.’’

स्वतःसाठी नको, तर संघासाठी खेळू

तुलनेनं नवख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या ह्या संघावर कशी मेहनत घेतली? त्यांना कोणत्या चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या? शंतनु पांडव म्हणाले, ‘‘कबड्डी सांघिक खेळ आहे. कुणा एकाच्या खेळावर एखादा सामना जिंकता येतो; स्पर्धा नाही. निवडचाचणी असल्यामुळे काही खेळाडू स्वतःला(च) सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात. पण मी सर्वांना सांगितलं की, स्वतःसाठी खेळाल, तर संघभावना राहणार नाही. मग संघ जिंकणार नाही. संघ विजयी झाला तर सर्वांचाच फायदा, हे त्यांना पटलं. सराव तसा  घेतला. नवीन, तरुण खेळाडूंचा हा संघ. मोठ्या स्पर्धा किंवा सलग एकत्र खेळण्याचा त्यांना अनुभव नव्हता. पण महत्त्वाचे म्हणजे हे सगळे किमान चार-पाच वर्षांपासून नियमित सराव करणारे आहेत. मूलभूत कौशल्यात सगळेच पक्के आहेत. त्यामुळे सांगितलेलं ते पटकन शिकत गेले.’’


प्रशिक्षक शंतनु पांडव आणि
कर्णधार शंकर गदई
कबड्डीचा खेळ आता अधिक गतिमान झाला नाही. तिसऱ्या अनुत्पादक चढाईचा (अनप्रॉडक्टिव्ह रेड) आणि चढाई तीस सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचा नियम ह्यामुळे गती वाढली आहे. संरक्षण व आक्रमण ह्या दोन्ही आघाड्यांवर संघ सरस ठरला. एकदा बाद फेरी गाठल्यावर प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी खेळाडूंची कशी तयारी केली? विशेषतः उपान्त्य सामना मुंबई उपनगरसारख्या बलाढ्य संघाबरोबर होता. शंतनु म्हणाले, ‘‘मुंबई उपनगरमध्ये मातब्बर, नाव असलेले, प्रो-कबड्डी लीगमध्ये दबदबा असलेले खेळाडू होते. ह्या नावांचं अजिबात दडपण घ्यायचं नाही, असं मी सगळ्यांना सांगितलं. त्यांना समजावलं की, पाच सामने खेळून आपण सेट झालो आहोत. तुमची क्षमता आहे म्हणूनच संघ इथपर्यंत पोहोचला. त्यांच्या नावावर जाऊ नका. आपण समान आहोत, हे समजून खेळा. मग खेळ आपोआप उत्कृष्ट होईल. त्यांनी हे अंगीकारलं, हे निकालानंतर दिसलंच.’’

‘‘अंतिम लढतीत जोरदार सुरुवात केल्यामुळे आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास जरा अतीच वाढला. त्याचा परिणाम असा झाला की, मध्यंतराच्या वेळी आपण मागं पडलो. मग ‘टाईमआऊट’च्या सोयीचा चांगला उपयोग केला. मुलांना थोडं रागवलो, थोडं समजून सांगितलं. अजूनही सामना जिंकता येईल, हे पटवून दिलं. पुढे काय झालं, ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. संघातल्या सगळ्यांचाच खेळ छान झाला. शेवटी हा सांघिकच खेळ आहे ना. शंकर, राहुल खाटीक, राम आडागळे, संभाजी वाबळे, देवीदास जगताप, प्रफुल्ल झावरे, राहुल धनवटे, आदित्य शिंदे... सगळेच संघासाठी खेळले.’’

श्वास कबड्डी...

मैदानात उतरण्याआधीचा सरावही फार महत्त्वाचा असतो - ‘नेट प्रॅक्टिस’. खो-खो, कबड्डी ह्या देशी खेळांच्या राज्य अजिंक्य स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून जिल्हा संघाचं सराव शिबिर घेतलं जातं. संघभावना रुजण्यासाठी, कौशल्ये गिरवून पक्की करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बऱ्याच वेळा ही शिबिरं म्हणजे उपचार असतात. नगरच्या संघाला मात्र यंदा भेंडे (ता. नेवासे) इथं जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या शिबिराचा निश्चित फायदा झाला. रणवीर स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्यानं झालेल्या ह्या शिबिराचे ‘द्रोणाचार्य’ होते प्रशिक्षक सतीश मोरकर. त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्स प्रोफाईलवर सहज दिसतं - ‘श्वास कबड्डी - ध्यास कबड्डी - खेळ कबड्डी’!

भेंड्याच्या कबड्डी, कुस्ती आणि ॲथलेटिक्स ह्या खेळांचं प्रशिक्षण रणवीर क्लबमध्ये दिलं जातं. कबड्डी संघाचं शिबिर आम्ही घेतो, असं मोरकर ह्यांनी आग्रहानं सांगितलं. ह्याच क्लबच्या शंकर गदई, राहुल धनवडे, राम आडागळे, राहुल खाटिक ह्यांची नगरच्या संघात निवड झाली होती.


भेंड्यांमधील सराव शिबिरामुळं संघबांधणी भक्कम झाली.

आठ दिवसांच्या शिबिरात प्रामुख्याने फिटनेस व कौशल्ये गिरवणे ह्यांवर भर दिला होता, असं मोरकर ह्यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘दिवसातल्या दोन वेळांचं तंदुरुस्तीचं वेळापत्रक तयार केलं होतं. सकाळच्या सत्रात धावणे, वेट ट्रेनिंग ह्यासह कोन प्रॅक्टिस, शिडी प्रॅक्टिस होती. संध्याकाळी प्रत्यक्ष खेळातील कौशल्यांचा सराव केला जायचा. त्यात चढाई, कव्हर ह्यावर भर दिला.’’

शिबिरामुळं संघबांधणी


सराव शिबिराची जबाबदारी
घेणारे सतीश मोरकर
खेळाडूंचा दमसास वाढला पाहिजे, हालचाली सहजपणे व लवचीक व्हायला हव्यात, कव्हर कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे ह्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्यासाठी एक पूर्ण दिवस जिम, एक दिवस लांब पल्ल्याचे पळणे, एक दिवस स्प्रिंट मारणे याचाही सराव करून घेण्यात आल्याचं मोरकर म्हणाले. खेळाडू एकदम तरबेज, पण त्याच्यात स्पर्धात्मक खेळण्याचा आत्मविश्वासच नसेल तर? त्यांचा आत्मविश्वास बळकट होईल, ह्याकडेही शिबिरात विशेष लक्ष देण्यात आलं. सकाळी पौष्टिक नाश्ता, दोन्ही वेळा व्यवस्थित जेवण होतं. दर दिवसाआड मांसाहार होता. ह्या शिबिरामुळं संघबांधणी उत्तम झाली, असं मोरकर ह्यांनी सांगितलं.

नगर जिल्हा कबड्डी संघटनेचं मुख्यालय श्रीरामपूरला होतं. ते नगरला आणण्याचा निर्णय कबड्डी महर्षी बुवा साळवी ह्यांनी घेतला. त्याची पहिली बातमी त्यांनी मला दिली होती. त्या गोष्टीला यंदा तीन दशकं झाली. ह्या काळात पुरुष-महिला, कुमार-कुमारी व किशोर-किशोरी ह्या गटांच्या आठ ते दहा राज्य स्पर्धांचं आयोजन नगरमध्ये झालं. ह्या संघटनेवर बुवांचं विशेष प्रेम होतं. बहुतेक सर्व स्पर्धांना ते पूर्ण काळ हजर असत. बुवा असते, तर नगरकरांच्या ह्या यशावर मनापासून खूश झाले असते, ह्यात शंकाच नाही.

............

‘एक जिवानं खेळलो म्हणून जिंकलो!’


छोट्या भावासह शंकर गदई

ह्या सगळ्या यशामागचं गणित संघाचा कर्णधार शंकर गदई अगदी सहजपणे त्याच्या ग्रामीण शैलीत सांगतो. तो म्हणाला, ‘‘आम्ही सगळे एक जिवानं राहायचो-खायचो, एक जिवानं खेळलो. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. सगळे एक जिवाचे! कर्णधार म्हणून माझं सगळे ऐकायचे. सामना संपल्यावर राहण्याच्या ठिकाणी आमची चर्चा व्हायची - आज काय चुकलं, उद्या कसं खेळायचं! प्रशिक्षक पांडवर सर, व्यवस्थापक मोरकर सर काय चुकलं - काय बरोबर, ते समजावून सांगायचे.’’

‘‘पूर्ण स्पर्धेचं म्हणून काही आमचं नियोजन नव्हतं. आजचा सामना मारायचा, एवढंच आमचं ठरलेलं असायचं. उद्याचं उद्या. एक एक सामना जिंकायचा, हेच आमचं टार्गेट होतं. मुंबई उपनगरविरुद्ध सेमीफायनल होती. मोरकर आणि पांडव सरांनी मोठा आत्मविश्वास दिला - तुम्ही जिंकू शकता. आम्ही ठरवलं की ते खेळाडू आणि आपणही. त्यांच्यात नि आपल्यात वेगळं काही नाही. एवढा सामना जिंकायचाच, असा जबरी कॉन्फिडन्स होता आमच्यामध्ये,’’ शंकर म्हणाला.

टर्निंग पॉइंट

अंतिम लढतीतील एक टर्निंग पॉइंटबद्दल शंकर तपशिलानं बोलला. ‘‘मॅचची सुरुवात चांगली झाली. पण नंतर आमच्यावर आठचं लीड बसलं. सगळ्या मुलांची तोंडं बारीक झालं. मी म्हणालो, ’टेन्शन घेऊ नका रे. शेवटच्या दोन-तीन मिनिटांत मॅच रिकव्हर करू.’ कॅप्टन असं म्हणतो म्हटल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढला. वेळ संपत आली होती. आम्ही दोघंच आत होतो - एक कव्हर आणि मी रेडर. पाच गुणांनी मागं होतो आम्ही. मग मी ‘टाईम आऊट’ घेतला. सरांना म्हणालो, एक चेंज करू. आदित्य शिंदे आत आला. त्याचा खेळ मुंबईला माहीत नव्हता. त्याने एक बोनस आणला. मग एक पकड केली. अशा पद्धतीने बरोबरी साधली. तो होता टर्निंग पॉइंट. पाच-पाच चढायांमध्येही तेच झालं. आता ‘गोल्डन रेड’ची वेळ आली.’’

‘अशी मॅच झाली नाही,’ असं सांगताना शंकरच्या आवाजातला थरार लपत नाही. निर्णायक चढाईबद्दल तो म्हणाला, ‘‘टॉस जिंकला. नशीब भारी. मीच रेड मारली. मुलं सांगत होती अशी मार तशी मार. माझा कॉन्फिडन्स होता. समोरची टीम हबकलेली होती. मी बोनस टाकणार नाही, असं त्यांना वाटत होत. रेड टाकायला गेला आणि लगेच बोनस मारून मध्य रेषेजवळ रेंगाळत राहिलो. कोणाला वाटत नव्हतं नगरची ही टीम फायनल मारील म्हणून!’’

खरं खेळत होतो आम्ही

‘‘स्पर्धा मातीवर झाली, ते आमच्या फायद्याचंच ठरलं. मॅटचा आणि आमचा संपर्कच नाही आलेला. आम्हाला भरपूर लोकांची साथ मिळाली. आम्ही जिंकावं असं खूप जणांना वाटत होतं. कारण खरं खेळत होतो आम्ही. कव्हरसेट एक जिवाचा. आम्ही कुणी सिलेक्शनसाठी नाही, तर टीम म्हणून खेळलो. तसं नसतं तर आम्ही आधीच हरलो असतो,’’ असंही शंकर म्हणाला.

....

जबरदस्त टीम स्पिरीट

नगरच्या संघाचं यश पाहायला आणि नंतर ह्या मुलांचं कौतुक करायला अर्जुन पुरस्कारविजेता पंकज शिरसाट त्या रात्री भिवंडीत होता. तो म्हणाला, ‘‘मस्तच झाला सामना. मुंबई उपनगरविरुद्धचा सामना लॅपटॉपवर पाहिला. पोरं जिंकली. मग म्हणालो की, आता फायनल थेट पाहायला पाहिजे. आपली मुलं खूप शांतपणे खेळली. मैदानावरचा त्यांचा वावर मॅच्युअर होता. सुरुवात एकदम चांगली. त्याच्यानंतर जवळपास दहा मिनिटं आपल्याला पॉइंटच नव्हता. मुलं हताश दिसत होती. मला वाटलं, एक गुण मिळाला की, त्यांच्यात उत्साह संचारेल. आपण पुन्हा मॅचमध्ये येऊ. तसंच झालं. एक बदल केला आणि पुढं निकालच बदलला. ही पोरं मोठ्या चुका करतील, असं पूर्ण सामन्यात कधीच वाटलं नाही. मैदानावर एकमेकांवर ओरडणं नाही, भांडणं नाहीत. ही संघभावना आवडली आपल्याला!’’

इस्लामपूरच्या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या संघाचं नेतृत्व पंकजने केलं. तो संघ आणि हा संघ ह्यांची तुलना करता येईल? पंकज म्हणाला, ‘‘दोन्ही टीममध्ये भरपूर गुणवत्ता आहे. त्या वेळी एक-दोन चुका झाल्या आमच्या. आताच्या संघात राइडर भरपूर आहेत - स्वतः शंकर, खाटिक, देविदास, झावरे, शिंदे. आमच्या टीममध्ये मला पर्याय नव्हता त्या वेळी. ते जाऊ द्या... ही मुलं खूप चांगलं खेळली. टीम म्हणून खेळ झाला. कुणा एका खेळाडूनं जिंकून दिलं नाही. कॅप्टन छान. बाकीची मुलंही छान. वय कमी आहे. खेळायला मिळेल आणि अजून चांगलं खेळतील, एवढं नक्की.’’

-------------

#kabaddi #Nagar #kabaddi_state_championship #maharashtra #maharashtra_kabaddi #pankaj_shirsat #shankar_gadai #kabaddiproleague #Bhivandi #Mumbai #team_spirit

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...