Friday 15 December 2023

मुंबई, मॅजेस्टिक, पुस्तकं...


पाहिली, चाळली आणि आवडली ती घेतलीही!
......................................................
मुंबईशी नातं तसं दूरचंच. त्यामुळंच की काय, आकर्षण कायमचं. कोविडची साथ येण्याच्या तीन महिने आधी ते ह्या वर्षातला हा अखेरचा महिना, ह्या चार वर्षांमध्ये मुंबईच्या सहा चकरा झाल्या.

ह्यातला काल-परवाचा (म्हणजे ११-१२ डिसेंबरचा) आणि वर्षाच्या पहिल्या महिन्यातील दौरा मुक्कामी होता. जानेवारीत विश्व मराठी संमेलनासाठी गेलो होतो. त्यामुळं बाहेर कोठे जाणं जमलंच नाही. तीन दिवस संमेलन एके संमेलन.

आता गेलो होतो ते एका गंभीर कौटुंबिक कार्यक्रमासाठी. त्यामुळे तिथे हजेरी लावण्याशिवाय बाकी काही ठरवलं नव्हतं.

सांगायचा मुद्दा हा की, चार वर्षांमध्ये सहा वेळा जाऊनही मनातली मुंबई पाहायचा योग काही जमून येत नाही. बरंच काही मनात आहे. ते प्रत्यक्षात यायला मुहूर्त हवा.

दादरला सेनापती बापट रस्ता, रानडे रस्ता ह्यांवरून फिरायचं आहे. बबनचा चहा प्यायचा आहे.  मामा काणे आहार इथं जाणं बाकी आहे. गिरगावला पणशीकरांकडे जायचं आहे. मरीन ड्राइव्हवर समुद्रकिनारी निरुद्देश चकरा मारायच्या आहेत.

नरिमन पॉइंटपासून चालण्याच्या अंतरावर असलेल्या नॅशनल बुक ट्रस्टच्या दुकानात वेळ घालवायचा आहे. ‘पुढच्या भेटीत नक्की...’ असं म्हणत ते राहूनच जातं दर वेळी.

आताच्या दौऱ्यातली ही गोष्ट. पश्चिम रेल्वेनं दादरला उतरायचं होतं. तिथून मग मध्ये रेल्वेची लोकल पकडून छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस इथं संध्याकाळी पावणेपाच वाजेपर्यंत पोहोचायचं होतं.

दादरला पोहोचल्यानंतर दोन-अडीच तास वेळ हाताशी होता. आहे वेळ तर म्हटलं, ‘मॅजेस्टिक’मध्ये जाऊन येऊ. पुस्तकं चाळू. बऱ्यापैकी जुन्या आवृत्त्यांची पुस्तकं मिळतील. सहज पाहायला न मिळालेली पुस्तकं दिसतील.

‘मॅजेस्टिक’चा शोध घेताना आधी वनमाळी सभागृह दिसलं. त्याच्या प्रवेशद्वारातच एका पुस्तक प्रदर्शनाचा फलक पाहायला मिळाला. वाटलं की जावं आणि पाहावीत थोडी पुस्तकं. तो मोह टाळून पुढे निघालो. कारण ‘मॅजेस्टिक’मध्ये पुरेसा वेळ देता येणार नाही म्हणून.

अजून चार पावलं पुढे आल्यावर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दिसलं. तिकडे वळणारे पाय मागं खेचले. एकच लक्ष्य - मॅजेस्टिक.

इंटरनेटच्या मदतीने पत्ता शोधला. त्यानुसार मॅजेस्टिक ग्रंथदालन ‘प्लाझा सिनेमा’समोर आहे. शोध घेत चाललो आणि ‘प्लाझा सिनेमा’चं दर्शन झालं. वाटलं, वा! सोपंय की काम. ‘मॅजेस्टिक’चं नाव आणि लौकिकही मोठा. त्यामुळं मोठी पाटी दिसेल, असा समज.

मोठीच काय छोटीही पाटी दिसली नाही. त्यामुळे पुढे पुढे चालत राहिलो. दुकान मागं सोडून फारच पुढे आलो, हे कळलं ‘मॅप’ची मदत घेतल्यावर. रिव्हर्स गीअर टाकणं भागच होतं.

भर दुपारची वेळ असूनही दादरच्या पदपथावर तोबा गर्दी होती. धक्का न खाता किंवा न देता चालणं मुश्किलच. त्यात परत हातातली बॅग संभाळण्याचं काम.

एका विक्रेत्याला विचारलं तर त्यानं सांगितलं, ‘शिवाजी मंदिरात जा. तिथं आहे ‘मॅजेस्टिक’चं दुकान.’ त्याचे आभार मानून गेलो आणि आत शिरल्यावर ‘मॅजेस्टिक’ची पाटी!

खूप मोठं, प्रशस्त आणि ऐसपैस दालन असेल, असं मनातलं चित्र. पण हा समज पहिल्या झटक्यातच दूर झाला. नाटकाचं तिकीट काढायला आलेली मोजकी मंडळी बसली होती.

उत्साहात दुकानामध्ये शिरलो. पण त्याच वेळी मनाला बजावलं, घड्याळाकडं लक्ष द्यायचं. फार वेळ रमायचं नाही. संध्याकाळची दख्खनची राणी गाठायची आहे.

आधी नव्या पुस्तकांच्या दालनात गेलो. बरीच पुस्तकं होती. पण हवीहवीशी वाटणारी त्यात फारच कमी होती. त्यांच्या किमतीही चांगल्या. प्रश्न तो नव्हता. ‘अर्रऽऽ, हे घेतलंच पाहिजे हं!’, असं वाटणारी कमी दिसली.

खट्टू झालो बराचसा. मनाशी म्हटलं आता निघू. काही न घेताच टाटा करू. काउंटरवर बसलेल्या दोघांच्या नजरेला नजर न देता बाहेर पडू.

मिठाईच्या दुकानातून, तयार कपड्यांच्या दालनातून आणि पुस्तक प्रदर्शनातून रिकाम्या हातांनी आणि खिसा हलका न होता बाहेर पडणं शास्त्रसंमत नाही, असं म्हणतात. ह्या ‘तत्त्वा’नुसार आजवर वागत आलो.

ह्या तत्त्वाला हरताळ फासला जाण्याचा योग आला होता. वाटलं की, चला पहिल्यांदाच असंच निघावं लागणार.

तसं काही व्हायचंच नव्हतं. पुढे आलो आणि मनात, डोक्यात असलेली (शिवाय सवलत मिळणारी!) बरीच पुस्तकं दिसली. मग रेंगाळू लागलो. वाकून, हात उंच करून, गुडघ्यावर बसून पुस्तकं काढू लागलो. चाळू लागलो.

अच्युत बर्व्यांचं ‘सुखदा’ संग्रहात होतं. मध्यंतरी कसे कुणास ठाऊक, त्याला पाय फुटले. त्याच्या अर्पणपत्रिकेतल्या ओळी मनात घर करून आहेत. अप्रतिम! बर्वे लिहितात - 
‘मी चालत होतो रस्त्यातून अनवाणी
डोळ्यांत माझिया म्हणून आले पाणी
संपलेच रडणे परंतु जेव्हा दिसला
शेजारी माणुस पायच नव्हते ज्याला!’


...बाकी काही नाही, तरी निव्वळ ह्या चार ओळींसाठी ते पुस्तक संग्रहात असणं फार महत्त्वाचं वाटतं. तर तिथल्या कप्प्यात ‘सुखदा’ दिसलं. सुखद धक्का. एक प्रत घ्यावी की दोन घ्याव्यात? मनात संभ्रम. मोह टाळत एकच घेतली.

तेवढ्यात लक्ष वेधलं ‘लँडमाफिया’च्या मुखपृष्ठानं. ‘लोकसत्ता’मधला जुना सहकारी बबन मिंड ह्याची ही कादंबरी. तीही घ्यायलाच हवी. नियोजित संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे ह्यांचं ‘पांढर’ही दिसलं. ते वाचलं की नाही आठवत नव्हतं. संग्रहात नाही, हे नक्की.


‘सेंट्रल बस स्टेशन’ लिहिणारे वसंत नरहर फेणे आवडते लेखक. त्यांची ‘शतकान्तिका’ आणि ‘निर्वासित नाती’ ह्यासह आणखी एक-दोन पुस्तकं सहज दिसली.  ‘शतकान्तिका’ बहुतेक संग्रहात आहे. पण नसलंच तर? सोडलेल्या संधीबद्दल नंतर हळहळ वाटायला नको. म्हणून ते आणि ‘निर्वासित नाती’ घेऊन ठेवलं.

अशी ही हवीहवीशी पुस्तकं चाळण्यात वेळ जाऊ लागला. यशवंत पाठक छान ललित लिहितात. त्यांचं ‘मोहर मैत्रीचा’ नजरेस पडलं आणि ‘हवंच हे’ असा मनाचा कौल मिळाला.


पुरुषोत्तम धाक्रसांचं ‘चित्तपावन’ दिसलं. लेखक म्हणून त्यांचं फारसं वाचलेलं नाही. पुस्तक पाहिलं की नाही, हेही आठवत नाही. त्यामुळेच ते दिसताक्षणी घेऊन टाकलं.

राजेन्द्र बनहट्टी ह्यांचे दोन-तीन संग्रह, एक कादंबरी कपाटात आहे. त्यांचं ‘गंगार्पण’ दिसलं. (हेही आधी आणलेलं असावं, असा संशय आहे! 🤔 😀). पुन्हा तेच. नंतर खेद नको म्हणून तेही घेतलं.


त्या दिवशीची खरेदी.
.......................
बघता बघता सात-आठ पुस्तकं झाली. आता बास झालं, असं स्वतःला बजावत होतो. तेवढ्यात अचानक ‘चिद्घोष’ डोकावलं. लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी. पन्नास वर्षांपूर्वीच्या कथांचा तो संग्रह. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं.

एका कोपऱ्यात ‘युद्धस्य कथा रम्या’ शीर्षकाचं छोटंसं ७६ पानांचं पुस्तक होतं. लेखकाचं नाव - चित्रकार डी. डी. रेगे! चित्रकार आणि लेखक असा संगम असल्यामुळं तेही घेतलं.

बघता बघता दहा पुस्तकं झाली की. बरोबरच्या ओझ्यात किती भर टाकायची हा प्रश्नच होता. कारण आपल्याच खांद्यावर आपलंच ओझं नंतरचे आठ ते दहा तास बाळगायचं होतं. साडेतीन-चार तासांच्या प्रवासानंतर गाडी बदलायची होती.

अजून बराच वेळ घालवायला आवडलं असतं. पाच-दहा पुस्तकांची भर टाकायलाही परवडलं असतं. कमी पडत असलेल्या वेळेचा आणि सामान वागवण्याच्या मर्यादेचा विचार केला. मनाविरुद्धच आवरतं घेतलं. गंमत म्हणजे घेतलेल्या पुस्तकांपैकी दोन तर निम्मी-अर्धी प्रवासात वाचूनही झाली.

‘मॅजेस्टिक’मध्ये जायचंच, पुस्तकं चाळायची असा हट्ट का बरं होता? स्वतःच्या पैशाने पुस्तकं खरेदी करण्याची सुरुवात त्यांच्या पुण्यातल्या नारायण पेठेतील दालनातून झाली. पुस्तकांवर लिहिलेल्या एका लेखात त्याचा उल्लेख केला आहेच.

... पुस्तकदिन असेल तेव्हा असेल. ‘मॅजेस्टिक’च्या दालनात माझ्यापुरता तो  छोट्या स्वरूपात साजरा झाला.
आणि हो, पुस्तकाच्या दुकानातून ‘रिकाम्या हातानं बाहेर पडायचं नाही’ हे तत्त्वही पाळलं गेलं! 👍
....
#पुस्तक #मॅजेस्टिक #सुखदा #मुंबई #वसंत_नरहर_फेणे #ज्ञानेश्वर_नाडकर्णी #पुस्तक_दिन

Sunday 19 November 2023

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

 


‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!!

‘आवाज’ आणि ‘खिडकी’ हेही जवळचंच नातं आहे. खिडकी-चित्रांसाठी प्रसिद्ध असलेला हा दिवाळी अंक.

दिवाळी अंकांच्या फराळामध्ये ह्या विनोदी वार्षिकाला मागणी भरपूर. तो नित्यनियमाने प्रकाशित होतो, त्याला यंदा ७३ वर्षं पूर्ण झाली. आणि यंदाच्या अंकाच्या माध्यमातून एका लेखकानं अर्धशतकही गाठलं. तीच खेळपट्टी, तोच फलंदाज...अर्धशतकानंतरही तीच उमेद अन् तोच उत्साह.

दिवस दिवाळीचे आहेत, तसेच क्रिकेट विश्वचषकाचेही आहेत. म्हणून हे अर्धशतक आवर्जून नोंद घेण्यासारखं. त्याची माहिती काहीशा गमतीनेच मिळाली.


लेखक विजय ना. कापडी
.....................
विनोदी कथालेखक विजय ना. कापडी ह्यांना दोन वर्षांपूर्वी ‘चिकूची कृपा’ ही कथा आवडल्याचं कळवलं. दरम्यानच्या काळात आमचा फारसा संपर्क झाला नाही.

दिवाळीच्या पंधरवडाभर आधी श्री. कापडी ह्यांचा निरोप आला. ‘खिडकी’ वाचून त्यांना वाटलं की, माझा ‘आवाज’शी काही संबंध आहे की काय? तसा तो येण्याची एक अंधूक शक्यता वीस वर्षांपूर्वी निर्माण झाली होती.

‘लोकमत’च्या विनोदी कथा स्पर्धेत टोपणनावाने लिहिलेल्या कथेला पारितोषिक मिळालं होतं. त्यावरून ‘आवाज’च्या संपादकांनी पत्र लिहून ‘चांगली कथा’ पाठविण्यास कळवलं होतं. तशी कथा काही सुचली नाही आणि ‘आवाज’चा लेखक होण्याची संधी हुकली.

मूळ विषयापासून भरकाटायला नको. तर श्री. विजय कापडी ह्यांच्याशी संवाद सुरू राहिला. दिवाळीच्या अगदी पहिल्या दिवशी त्यांच्याकडे ‘आवाज’चा अंक पोहोचला. त्यातील कथेच्या पानाचं छायाचित्र त्यांनी पाठवलं. कळवलं, ‘‘अद्दल’ ही माझी कथा, ‘आवाज’मध्ये प्रसिद्ध झालेली पन्नासावी कथा! पहिली १९७२मध्ये पहिली आणि यंदा पन्नासावी!’

हे वाचून चकितच झालो. एक दिवाळी अंक, एक लेखक आणि त्याच्या सलग ५० कथा. अद्भुतच! क्रिकेटच्या परिभाषेत बोलायचं तर ‘स्ट्राईक रेट’ शंभराला भिडणारा!

पहिला प्रश्न पडला, असा काही विक्रम अन्य कोण्या लेखकाच्या किंवा दिवाळी अंकाच्या नावावर असेल का? एवढं दीर्घ काळ कोणी लिहिलं असेल का? आणि कोणत्या संपादकानं ते प्रसिद्ध केलं असेल का?

हे सारे प्रश्न थेट लेखक श्री. विजय कापडी ह्यांनाच विचारावं म्हटलं. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून ‘बोलायची’ तयारी दाखविली.

हा लेखक ब्याऐंशीच्या घरात असून, पणजीजवळच्या ताळगाव येथे निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखात जगतो आहे. त्यांचं बालपण हुबळीमध्ये गेलं. गणित व संख्याशास्त्र विषयांमध्ये पदवीधर झाल्यावर त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेत तीन तपं नोकरी केली.

आकड्यांमध्ये गुरफटलेले श्री. कापडी लेखनाकडे, त्यातही विनोदी लेखनाकडे कसे काय वळाले? ते म्हणाले, ‘‘विनोदाकडेच माझा कल होता. चौथी-पाचवीत असताना पहिल्यांदा ‘चांदोबा’ वाचला. त्यात विनोदी काही नाही म्हणून पोस्टकार्डावर एक विनोद लिहून थेट मद्रासला पाठवला. गंमतीचा भाग म्हणजे तो ‘चांदोबा’मध्ये प्रसिद्ध झाला. त्याबद्दल हेडमास्तरांनी पुस्तक बक्षीस दिलं - 
केशवकुमारांचा विडंबन संग्रह ‘झेंडूची फुलें’. त्यातली ‘परिटास--’ एवढीच कविता कळाली.’’

शाळेतील पुस्तक-पेटीत श्री. विजय कापडी ह्यांना एक दिवस ‘किर्लोस्कर’ मासिक मिळालं. त्यामधील गंगाधर गाडगीळ ह्यांची ‘बंडूच्या छत्र्या’ त्यांना बेहद्द आवडलेली कथा. घरी येणाऱ्या पाहुण्यांची त्यांची आत्या फर्मास नक्कल करी. त्यातूनच विनोद मुरत गेला. वयाच्या विशीपासूनच त्यांचं ‘मार्मिक’मध्ये लेखन सुरू झालं. त्यानंतर दहा वर्षांनी ‘आवाज’मध्ये पहिली कथा प्रसिद्ध झाली.

ह्या आगळ्या अर्धशतकाच्या निमित्ताने श्री. विजय कापडी ह्यांच्याशी झालेला संवाद असा - 


पन्नासावी कथा.
............
एकाच दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध होणाऱ्या कथांचं अर्धशतक हे ऐकायला-वाचायलाच मोठं रोमांचक, विलक्षण आहे. ‘आवाज’मध्ये यंदा तुमची पन्नासावी कथा प्रसिद्ध झाली. काय भावना आहे?
- ‘आवाज’मध्ये पन्नासावी कथा प्रसिद्ध झाल्याचं पाहताच मला जग जिंकल्याचा आनंद झाला. (कदाचित माझं जग खूपच लहान असण्याचाही हा परिणाम असावा!) माझ्या आतापर्यंतच्या विनोदी साहित्य लेखनातील ही फार मोठी घटना आहे, असं मला वाटलं. इतरांना तसं वाटतं की नाही, मला ठाऊक नाही!

एवढं सातत्यानं एकाच दिवाळी अंकासाठी कोणी लिहिल्याचं तुम्हाला माहिती आहे?
- ‘आवाज’ व इतर अंकांसाठी सातत्यानं लिहिणाऱ्या काही लेखकांची नावं माझ्या माहितीची आहेत. पण पन्नास-बावन वर्षांच्या दीर्घ काळात त्यांच्या ५० कथा प्रसिद्ध झाल्या असतील की नाही, ह्याबद्दल मी साशंक आहे. अशी माहिती माझ्या कानांवर आलेली नाही किंवा वाचनातही नाही.



पहिली कथा.
........................

तुम्ही पहिली कथा स्वतःच ‘आवाज’ला पाठविली की, संस्थापक-संपादक श्री. मधुकर पाटकर ह्यांनी पत्र पाठवून कथा मागितली? पहिलीच कथा प्रसिद्ध झाली की, आधी एखाद-दुसरी नापसंत करण्यात आली? त्यामुळे तेव्हा तुम्ही नाराज झाला होता का?
- माझी पहिली कथा १९७२ साली ‘आवाज’मध्ये प्रसिद्ध झाली. संपादकांनी पत्र पाठवून माझ्याकडून कथा मागवावी; त्यातल्या त्यात  ‘आवाज’चे संपादक पाटकर ह्यांनी कथा मागवावी, इतकं काही त्या काळात माझं नाव झालेलं नव्हतं. त्यांनी तोंडी सांगितल्यावरूनच मी १९७०मध्ये कथा पाठवली होती. ती काही त्यांना पसंत पडली नाही.
मग पुढच्या वर्षी म्हणजे १९७१मध्ये कथा पाठविलीच नाही. पण १९७२ साली तोंडी आमंत्रण मिळाल्यावर मी पाठवलेली ‘अिंटरव्ह्यूच्या लखोट्याचं सोमायण’ ही कथा त्यांनी प्रसिद्ध केली. त्यांनी नापसंत केलेल्या पहिल्या कथेच्या बाबतीत मी नाराज झालो नाही.

तुमची आणि भाऊंची (श्री. मधुकर पाटकर) ओळख आधीची की संपादक-लेखक म्हणून परिचय झाला? तो कसा व कितपत वाढला?
- संपादक पाटकर ह्यांच्याशी माझा अजिबातच परिचय नव्हता. ‘मार्मिक’चे सहायक संपादक आणि ज्यांना मी गुरुस्थानी मानतो, त्या श्री. द. पां. खांबेटे ह्यांच्या निवासस्थानी आमची भेट झाली. पण त्यांनी कथा मागितली नाही. पुढे १९६९ साली ‘हंस’च्या विनोद विशेषांकातील कथा वाचून त्यांना कथा मागावी, असं वाटलं. त्यांचं तोंडी आमंत्रणही मला पुरेसं वाटलं!
आमचा परिचय १९८०नंतर वाढला. मी त्यांच्या निवासस्थानी आणि छोट्याशा छापखान्याच्या जागी मुद्दाम जाऊन भेट घेऊ लागलो. ‘आवाज’च्या सुरुवातीच्या खडतर दिवसांच्या आठवणी, कागद मिळविण्यासाठी त्यांना कराव्या लागलेल्या लटपटी ह्या गप्पा मला आवडायला लागल्या. मी जणू त्यांच्या घरचाच झालो...

कथेची मागणी करणारे संपादकांचे पत्र साधारण केव्हा यायचे? तुम्ही खास ‘आवाज’साठी कथा लिहीत होता की, लिहिलेल्या कथांपैकीच एखादी पाठवत होता?
- ‘दिवाळी अंकासाठी कथा पाठवा’ अशा उत्साहवर्धक मजकुराचे पत्र जून महिन्यात पाठविण्यात येते. कथा पाठविण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट असते. ‘आवाज’व्यतिरिक्त ‘मोहिनी’, ‘जत्रा’, ‘बुवा’ आणि इतर अंकांच्या संपादकांकडून पत्रे येत. विनोदी साहित्याचीच मागणी असे. त्यातल्या त्यात मला बऱ्या वाटणाऱ्या गोष्टींपैकी एक मी ‘मोहिनी’साठी आणि दुसरी ‘आवाज’साठी पाठवत असे. पाठवलेली कथा संपादकांना पसंत पडत असे, हाच अनुभव आहे.

कशा प्रकारची कथा हवी, हे भाऊ पाटकर तुम्हाला सांगत? की तुमचे सूर चांगले जुळल्यामुळे तुम्ही पाठवाल ती कथा ते प्रसिद्ध करीत?
- कथा वाचताना आपल्याला हसू यायला हवं, एवढी एकच अट असे. विषय, मांडणी ह्याबद्दलचं सर्व स्वातंत्र्य लेखकांना देण्यात येई.

ह्या प्रवासातली दोन वर्षं अशी आहेत की ‘आवाज’च्या अंकात तुमचं नाव नव्हतं. काय कारण त्याचं?
- माझी १९७९ सालची कथा पसंत पडून आणि कथाचित्र तयार असूनही प्रकाशित झाली नाही. तशी चौकट अंकात पाहून मला खूप राग आला होता. माझ्या बरोबरच शिरीष कणेकर ह्यांचाही लेख मागे राहिला.

मग ती कथा ‘वाया’ गेली म्हणायचं का..?
- तीच कथा १९८०च्या अंकात समाविष्ट केली. तेव्हा वर्षभराचा राग पुरता निवळला! तुम्ही म्हणता तशी ती ‘वाया’ गेली नाही.

...आणि नंतर एका वर्षीही तुमची कथा नव्हती. त्याबद्दल वाचकांची काही प्रतिक्रिया समजली?
- हो; १९९६च्या अंकात. त्याचं कारण फार दुर्दैवी आहे. त्या वर्षी खुद्द पाटकर, माझे स्नेही हास्य-चित्रकार श्री. वसंत गवाणकर आणि माझे बाबा, ह्यांचं लागोपाठ निधन झालं. त्याचा मला बसलेला धक्का फार मोठा होता. त्यामुळेच लिहू शकलो नव्हतो. त्यामुळे त्या वर्षीचा ‘आवाज’ माझ्या कथेविना प्रसिद्ध झाला. त्या काळात मी चेन्नई येथे होतो. त्यामुळे कुणाचीही काही प्रतिक्रिया असल्यास ती माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही!

‘आवाज’ने ‘लेखक’ म्हणून तुम्हाला काय दिले? ह्या वार्षिकाविना लेखक कापडी अशी कल्पना करता येईल का?
- ‘‘आवाज’चा लेखक’ ह्या शब्दांना लेखक / इतर संपादक महत्त्व देतात, असं मला वाटतं. ‘आवाज’च्या आधी दहा वर्षे मी ‘मार्मिक’, ‘मोहिनी’मधून लक्षवेधी लेखन (माझ्या मते!) केलं. पण ‘विनोदी लेखक’ हे (हवं हवंसं) लेबल ‘आवाज’मध्ये कथा येऊ लागल्यावरच मिळालं. इतर अंकांच्या संपादकांची ‘कथा पाठवा’ अशी मागणी करणारी पत्रे येऊ लागली. मुळात ‘आवाज’व्यतिरिक्तही इतर अंकांमध्ये लेखन केलं / करतो आहे, त्यामुळे ‘आवाजविना लेखक कापडी’ अशी कल्पना करणंच अप्रस्तुत वाटतं.

तुम्हाला ‘आवाज’मध्ये कोणाचं लेखन वाचायला आवडे?
- सुरुवातीच्या काळात जयवंत दळवी, शं. ना. नवरे, बा. भ. पाटील, वि. आ. बुवा ह्यांच्या कथा मी आवर्जून वाचत असे. मला त्या आवडतही. नंतरच्या काळात प्रभाकर भोगले, अशोक पाटोळे, अशोक जैन ह्यांच्या कथा / लेख मला आवडत. मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले ह्यांच्या कथा मी वाचतो. श्रीकांत बोजेवार हे अलीकडचं नाव आहे. ह्या व्यतिरिक्त ‘आवाज’ सोडून ‘मोहिनी’, ‘जत्रा’, ‘बुवा’ ह्या अंकांतील लेखनही मी आवर्जून वाचायचो.

ह्या अर्धशतकामध्ये ‘आवाज’मध्ये काय काय स्थित्यंतरं झाली?
- ‘आवाज’ म्हणजे काहीशा चावट कथा, घडीचित्रांमधून निर्माण झालेला विनोद, हे स्वरूप फारसं बदललं नाही. लेखक / चित्रकार काळानुरूप बदलले; पण त्यांच्या मांडणीत लक्षवेधी फरक जाणवला नाही. विनोद ह्या विषयाला वाहिलेल्या अंकात आजही ‘आवाज’ला पसंती मिळते, हे खरं आहे.
मराठी विनोदी साहित्याचा आढावा घेण्यासाठी अभ्यासकाला ‘आवाज’ आणि ‘मोहिनी’ ह्यांना डावलून चालण्यासारखं नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. हास्यचित्रं ह्या दोन्ही अंकांचा ‘स्ट्राँग पॉइंट’ आहे. पूर्वीच्या मानानं कथाचित्रं अधिक उठावदार वाटतात.
....................................

#दिवाळी_अंक #विनोदी_दिवाळी_अंक #आवाज #लेखक #विजय_कापडी #कथा #कथांचे_अर्धशतक #विनोदी_कथा #मधुकर_पाटकर #खिडकी #खिडकी_चित्रं
....................................

Thursday 9 November 2023

मॅक्सवेलचे मायाजाल, अफगाणी आत्मघात


,,, तर बुधवारी सकाळी कधी तरी व्हॉट्सॲपवरच्या एका गटात आलेला हा संदेश. मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर मंगळवारी (दि. ७ नोव्हेंबर) झालेल्या सामन्याचं एवढ्या कमी शब्दांत नेमकं वर्णन करणाऱ्या ह्या माणसाचं कौतुकच करावं तेवढं थोडंच!

वानखेडे स्टेडियमवरच्या लढतीत - लढत कसली, एकतर्फी सामन्यात दिसत होती सपशेल शरणागती.  पाच वेळा विश्वचषक जिंकणारा संघ लीन-दीन भासत होता. आशिया खंडातला एक नवा संघ नव्या उमेदीसह पुढे येत होता. आधी तीन विश्वविजेत्यांना पराभूत करणारा अफगाणिस्तानचा संघ सलग चौथ्या विजयाकडे आणि चौथ्या विश्वविजेत्यांना हरविण्याच्या दिशेने घोडदौड करत होता. 

समुद्र किनाऱ्यालगतच्या मुंबईत त्या दिवशी, त्या संध्याकाळी वादळ धडकण्याचा कसलाही अंदाज हवामान खात्यानं वर्तविलेला नव्हता. त्यामुळे त्याचं नामकरण करण्याचाही प्रश्न नव्हता. बाकी मुंबई सोडून फक्त वानखेडे स्टेडियमवर वादळ येणार, असंही काही कोणाला वाटलं नसावं.

शक्यता चिरडल्या, स्वप्नं चुरडली
‘वादळापूर्वीची शांतता’ असं आपण वाचतो, ऐकतो ते हेच असणार. कोणाला काही न सांगता, काही चिन्हं न दिसता सामन्याच्या शेवटच्या पावणेदोनशे चेंडूंमध्ये झंझावात आला. त्यानं अनेक शक्यता चिरडल्या, नाना स्वप्नं चुरडली. त्या कल्पनातीत वादळाचं, चक्रावर्ताचं नाव - ग्लेन मॅक्सवेल.

सामन्यातील साधारण ७० षट्कं अफगाणिस्तानचा खेळ उजवा झालेला. त्यातही पूर्वार्धातली शेवटची दहा आणि उत्तरार्धातील पहिली २० षट्कं त्यांचं एकहाती वर्चस्व दाखविणारी. विश्वचषकात आता सवयीचा झालेला आणखी एक धक्का हा संघ देणार, हे जवळपास नक्की झालेलं. परिणामी उपान्त्य फेरीच्या जागेवर लक्ष ठेवून असलेल्या दोन संघांची धडधड वाढलेली.


विजयी वीर. त्यानं एकहाती सामना जिंकून दिला.
(सौजन्य : क्रिकेट ऑस्ट्रेलिया)
.......................................
हे चित्र बदलण्यास कारणीभूत ठरले १२ चेंडू. विसावं षट्क संपलं तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था होती ७ बाद ९८. ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार पॅट कमिन्स हीच भरवशाची जोडी उरलेली. त्यांच्यावर तरी भरवसा किती ठेवायचा? बादही व्हायचं नाही आणि दोनशेच्या आसपास धावाही काढायच्या? टिकून राहणं, पळत राहणं, धावा जोडणं... सगळंच साधायचं होतं.

आधीच्या दोन षट्कांमध्ये मार्कस स्टॉयनिस व मिचेल स्टार्क ह्यांचे बळी मिळाल्यामुळे राशिद खान भरात आलेला. त्यांचे चेंडू चांगले वळत होते. डावातलं एकविसावं आणि स्वतःचं चौथं षट्क राशिद टाकत होता. पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलनं स्वीप मारायचा प्रयत्न केला. बॅटच्या वर कुठे तरी लागून चेंडू मि़ड-ऑफ भागात उंच उडाला.

नशीब खूश - तीन वेळा
राशिद मागे धावला आणि थांबला. त्यानं कर्णधार हशमतुल्ला शाहिदी ह्याला धावताना पाहिलं. तो धावला खरा; पण उशीरच झाला. मॅक्सवेलचा झेल काही त्याला पकडता आला नाही. मॅक्सवेलवर नशीब खूश होतं. पहिली वेळ.

पुढचं षट्क डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमदचं. त्याचा दुसरा चेंडू मॅक्सवेल सहज खेळायला गेला आणि तो निघाला गुगली. झपकन त्याच्या पॅडवर आदळला. पंचांनी अपील उचलून धरलं.

उगीच शंका नको म्हणून मॅक्सवेलनं ‘रीव्ह्यू’ घेतला. त्यालाच फारसा विश्वास नसावा. पॅव्हिलियनची वाट त्यानं पकडली होती.

आश्चर्य! चेंडूची उसळी थोडी जास्तच होती. मॅक्सवेल बचावला. नशीब पुन्हा खूश. दुसऱ्या वेळी.


मुजीब उर रहमानच्या हातून झेल सुटला?
छे:, सामना निसटला!!
...................................
त्याच षट्कातला पाचवा चेंडू होता टॉप स्पिनर. आधीच्या अनुभवातून मॅक्सवेल शहाणा झाला नव्हता काय? एवढा काय तो जिवावर उदार झाला होता? त्यानं पुन्हा एकवार स्वीप मारण्याचा प्रयत्न केला.

असा बेदरकार फटका झेलण्यासाठी शॉर्ट फाईन लेगला सापळा लावलेला होताच. 
अजिबात नियंत्रण नसलेला मॅक्सवेलचा फटका. तिथं उभ्या असलेल्या मुजीब उर रहमानच्या हातात गेलेला. चेंडूभोवती हात फक्त घट्ट पकडण्याचंच काम होतं. तेही त्यानं केलं नाही. तिसरी सोनेरी संधी अफगाणिस्तानने सोडली. सामना बहुदा तिथंच त्यांच्या हातून निसटला.

नशीब तिसऱ्या वेळी मॅक्सवेलवर खूश. ती नियती किंवा कोण असते, ती अफगाणिस्तानच्या दुर्दैवाला खदखदून हसत म्हणाली असेल, ‘जा बाळ मॅक्सवेल. खेळ मनसोक्त. इथून पुढचा डाव तुझा असेल. केवळ तुझाच असेल रे!’

अफगाणिस्तान संघानं आत्मघात करून घ्यायचंच ठरवलं होतं. त्याला मॅक्सवेल किंवा त्याला खंबीर साथ देणारा कमिन्स तरी काय करणार? त्यांंनी जिंकण्याची संधी देऊ केली होती.

रहमानच्या हातून लोण्याचा गोळा निसटला, तेव्हा मॅक्सवेल ३४ धावांवर (३९ चेंडू) होता. ऑस्ट्रेलियाच्या धावा होत्या ११२. त्यानंतर सामन्यात १५० चेंडूंचा खेळ झाला. त्यात १८१ धावा निघाल्या. मॅक्सवेल त्यातले ८९ चेंडू खेळला आणि त्याने धावा केल्या १६७.

काय चूक केली, हे मुजीब उर रहमानला सामन्याच्या शेवटच्या षट्कात मॅक्सवेलनं दाखवून दिलं. दुसरा चेंडू ऑफ यष्टीच्या बाहेर. मिडविकेटवरून षट्कार. मग पुन्हा तसाच, पण थोडा अधिक वेगाचा चेंडू. परिणाम लाँग-ऑनवर षट्कार. नंतरच्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. षट्कातला पाचवा आणि इतिहासात स्थान मिळविणारा सामन्यातला शेवटचा चेंडू मधल्या यष्टीवर आणि डीप मिडविकेटवर उत्तुंग षट्कार!

विश्वचषकातच्या इतिहासातलं कोणत्याही फलंदाजाचं हे पहिलंच द्विशतक. आणि तेही अशा कठीण परिस्थितीत. ह्या अप्रतिम खेळीत मॅक्सवेलनं अनेक विक्रमांची मोडतोड केली.

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे
मागच्या आठवड्यात गोल्फ कार्टवरून पाठीवर पडून डोक्याला इजा झालेला मॅक्सवेल पार दमला होता. त्याचे पाय धावायला तयार नव्हते. त्याच वेळी हात थांबायला तयार नव्हते. ना. वा. टिळकांच्या कवितेतील ‘क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे’ ओळीची आठवण करून देत मॅक्सवेल खेळत होता. धावण्याला आलेली मर्यादा त्यानं उत्तुंग फटके मारून भरून काढली.


उत्तुंग! मॅक्सवेलचा फटका आणि त्याची नाबाद द्विशतकी खेळीही.
(सौजन्य : एक्स संकेतस्थळ)
.................................

आतड्यापर्यंत गेलेला घास. फक्त पचवणं बाकी. पण जबड्यात हात घालून तोच घास एकहाती बाहेर काढण्याची किमया मिस्टर मॅक्सवेल ह्यांनी केली!

मॅक्सवेलच्या १५२, म्हणजे ७५ टक्के धावा कव्हर ते मिडविकेट ह्या पट्ट्यात आहेत. दहापैकी नऊ षट्कार लाँग-ऑन ते मिडविकेट ह्या पट्ट्यात आहेत. एकच षट्कार आणि तीन चौकार थर्ड मॅनला आहेत. लेगला चारच चौकार आहेत. यष्ट्यांच्या मागे त्याला मिळालेल्या धावा आहेत ४९. त्यात जवळपास अर्धा डझन चौकार.


मॅक्सवेलच्या विक्रमी डावातील फटक्यांचा नकाशा.
(सौजन्य : क्रिकेट ऑस्ट्रेलिया)
.................................
पॉइंट ते यष्टिरक्षक ह्या कोपऱ्यात मॅक्सवेलच्या २६ धावा आहेत. ह्या धावा भाषेत म्हणजे नगरी भाषेत ‘कत्त्या’ लागून मिळालेला बोनस. मॅक्सवेल हुकुमी खेळला. त्याला हव्या त्या ठिकाणी त्यानं चेंडू धाडला. चेंडू त्याची आज्ञा विनातक्रार पाळत होता. असे डाव कधी तरीच पाहायला मिळतात.

ग्लेन मॅक्सवेल आपल्या संघात असणं म्हणजे देवानं दिलेली किती अमूल्य देणगी आहे, हे संघनायक पॅट कमिन्सला त्या दिवशी कितव्यांदा तरी कळलं असेल. त्याचा अफलातून खेळ 
२२ यार्डांवरून पाहण्याची संधी कमिन्सला मिळाली!

कमिन्स त्या बद्दल स्वतःला भाग्यवान मानत असेल का? त्याचे एकाहून एक सरस फटक पाहताना त्याने आ वासला असेल ना? खणखणीत हुकमी षट्कार आणि नेत्रदीपक ड्राइव्ह साठवण्यासाठी त्याने डोळे किती मोठे केले असतील?

कमिन्सची साथ मोलाचीच
ह्याच मॅक्सवेलला मोलाची साथ दिली कर्णधारानं. ह्या साऱ्या दोन तासांच्या नाट्यात न डगमगता ठामपणे मैदानावर उभा राहिला तो. त्यानं धावा डझनभरच काढल्या; पण तब्बल ६८ चेंडू कोणत्याही मोहाला बळी न पडता खेळून काढले. त्याच्या पहिल्या पाच धावा सात चेंडूंमध्ये होत्या. म्हणजे नंतर त्यानं किती संयम दाखवला असेल, ह्याची कल्पना येते.

नवीन उल हक आणि राशिद खान ह्यांनी प्रारंभी केलेल्या मेहनतीवर मॅक्सवेल-कमिन्स जोडीनं पाणी पाडलं. बदाबदा. त्यात विजयाचं स्वप्न कुठल्या कुठे वाहून गेलं.

काही प्रश्न विचारावेत का?
मॅक्सवेलच्या खेळीचं महत्त्व तसूभरही कमी न करता काही प्रश्न विचारता येतील. ह्या सामन्याच्या दुसऱ्या डावात कर्णधाराचीच भूमिका बजावणारा महंमद नबी एवढ्या उशिरा गोलंदाजीला का आला? कांगारूंना जिंकण्यासाठी १०६ धावा हव्या असताना आणि मॅक्सवेलचं शतक झाल्यावर चौतिसाव्या षट्कात तो गोलंदाजीला आला.

सव्वाचार धावांची इकॉनॉमी असलेला नबी पहिल्या षट्कापासूनच धावा दाबून ठेवायच्या अशाच मनोवृत्तीनं गोलंदाजी का करीत होता, हेही न उलगडलेलं कोडं.

राशिदनं सात षट्कं टाकल्यानंतर मधली दहा षट्कं त्याला बंद का केलं? विशेषतः त्याला सूर सापडलेला असताना... नंतरही त्याला दोन षट्कांचा हप्ता देऊन शेवटचं षट्क राखून ठेवण्यानं काय साधलं?

विश्वचषकात अफगाणिस्तानकडून पहिलं शतक काढलं
सलामीवीर इब्राहीम जदरान ह्यानं. त्याची ही खेळी
सुंदरच होती.
(सौजन्य : एक्स संकेतस्थळ)
.................................

नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी करण्याचा निर्णय अफगाणिस्तानचा सलामीवर इब्राहीम जदरान ह्यानं सार्थ ठरवलं. देशातर्फे विश्वचषकातील पहिलं शतक (१२९ नाबाद १४३ चेंडू, ८ चौकार व ३ षट्कार) त्यानं झळकावलं.

इब्राहीमनं सहाव्या जोडीसाठी राशिद खानबरोबर २७ चेंडूंमध्येच ५८ धावांची भागीदारी केली. राशिदनं तीन षट्कार व दोन चौकारांसह १८ चेंडूंमध्ये तडाखेबंद ३५ धावा केल्या. हे दोघे, अजमत उमरजाई व महंमद नबी ह्यांच्यामुळेच अफगाणिस्तानने शेवटच्या १० षट्कांमध्ये ९६ धावा केल्या.

पहिल्या पन्नास षट्कांतला हा विक्रम, पराक्रम शेवटच्या वीस-पंचवीस षट्कांमध्ये पुसून टाकण्यात आला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी स्टार्क, हेजलवूड, कमिन्स, झम्पा ह्या गोलंदाजांना तोंड देऊन ऑस्ट्रेलियापुढे मोठं लक्ष्य ठेवलं होतं. तीनशेच्या उंबरठ्याला जवळ असलेलं. दुर्दैवानं त्यांचं महत्त्व धावपुस्तिकेतील आकड्यांपुरतं उरलं.

दिवस मॅक्सवेलचा होता.
डाव मॅक्सवेलचा होता.
हा दिवस आणि हा डाव अद्भुतरम्य चमत्कारांचा होता.
हे चमत्कार घडविणारा एकमेवाद्वितीय ग्लेन मॅक्सवेल होता!
....................

(दैनिक नगर टाइम्समधील सदरात बुधवारी प्रसिद्ध झालेला लेख विस्ताराने.)
....................

#विश्वचषक23 #ग्लेन_मॅक्सवेल #पॅट_कमिन्स #ऑस्ट्रेलिया #अफगाणिस्तान #द्विशतक #वादळ
#ऑस्ट्रेलिया_अफगाणिस्तान #इब्राहीम_जदरान #राशिद_खान 

#cricket #CWC23 #Glenn_Maxwell #Pat_Cummins #Australia #Afghanistan #double_century #AustraliavsAfghanistan #Maxwell_mirracle #Ibrahim_Zadran #Rashid_khan

Wednesday 25 October 2023

‘चित्रमय’ आठवणी



श्रीरंग उमराणी ह्यांचं रेखाटण.

हे चित्र ‘साधं’ आहे. एका चतकोर कार्डशीटवर पॉइंट पेनाने केलेलं रेखाटण. त्यात सफाई आहे. रेषांची गुंतागुंत दिसते. ही सारी सफाई आणि गुंतागुंत ह्या मिश्रणातून आकारला आलं आहे एक डेरेदार झाड. फार उंच नाही. पण आडवं वाढलेलं.

अभ्यासकांना, दर्दी मंडळींना आणि जाणकारांना ह्या चित्रात विशेष काही वाटणार नाही कदाचीत. पण आधी ‘साधं चित्र’ म्हटलं असलं, तरी ते माझ्यासाठी फार ‘स्पेशल’ आहे.  चित्रकलेच्या बाबत ‘नर्मदेतला गोटा’ असूनही ते जवळपास ३७ वर्षं जपून ठेवलेलं. ते पाहिलं की, अजूनही छान वाटतं. जुन्या आठवणी फिरून जाग्या होतात.

हे चित्र आधी एका वहीवर डकवलेलं होतं. कधी तरी तिथून ते काढून व्यवस्थित ठेवलं. जेव्हा केव्हा ते पाहतो, तेव्हा त्याबद्दल लिहायचं ठरवतो. पण राहून जातं. खरं तर ते छान ‘स्कॅन’ करून इथं द्यायचं होतं. पण ते जमेना. म्हणून मोबाईलवरच त्याचं छायाचित्र काढलं.

चित्राच्या उजव्या कोपऱ्यात तळाला सहज लक्षात येईल, ना येईल अशी सही आहे - ‘श्री ८६’. चित्रकाराची सही; चित्रकाराचं नाव - श्रीरंग उमराणी.

पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात श्रीरंग उमराणी होते. त्यांच्यासह आम्ही चार चौघे जवळचे होतो. आता इथे ‘त्यांचा’ असा आदरपूर्वक उल्लेख केला असला, तरी ते सहा-सात महिने मी त्याला एकेरीच आणि थेट नावाने संबोधत होतो. त्यात त्यालाही तेव्हा काही वावगं वाटलेलं जाणवलं नाही.

वर्गात आमची ओळख झाली. त्यानं नाव सांगितलं.  दोन-तीन महिने आधी  ‘हंस’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका कथेवर ‘श्रीरंग उमराणी’ नाव वाचलं होतं. नाव ऐकल्यावर ती कथा आठवली आणि विचारलं, तूच लिहिलीस का ती कथा?

उत्तरादाखल त्यानं होकार दिला आणि मला विलक्षण आनंद झाला. कारण त्या काळात मी लेखक फक्त मासिका-पुस्तकांतच पाहिले होते. त्यातलाच एक लेखक आपल्या शेजारी बसतो, आपल्याशी बोलतो, हसतो ह्याने फार हरखून गेलो. ‘हंस’ त्या काळात भरात असलेलं मासिक होतं. त्यांच्या कथांची शीर्षकं सहसा एका शब्दाची, बुटकी नि जाडगेली असत. अर्थातच वैशिष्ट्यपूर्ण. कथाही वेगळ्या असत - पानवलकर वगैरेंची ओळख त्यातूनच झालेली. आनंद अंतरकर संपादक म्हणून जोरात होते.

श्रीरंग रोजच्या तासांना नियमित येई. बहुतेक वेळा आम्ही शेजारी बसत असू. क्वचित मी पुढच्या बाकावर. तो पुढे बसण्याचं टाळे. स्वतःहून फारसा बोलत नसे. पण आपण बोललो तर मौन पाळायचा नाही कधी.  अतिशय शांत. कधीही आवाज न चढविता किंवा हातवारे न करता तो संथपणे बोलायचा. सुमित्रा भावे ह्यांचा सख्खा भाऊ असल्याचं त्याच्या तोंडूनच कळलं. त्यांचं नाव ऐकलेलं; पण तेव्हा सुमित्रा भावे नावाच्या ‘बाई’चं मोठेपण कळलं नव्हतं.

आता सदतीस वर्षांनंतर श्रीरंगचा पूर्ण चेहरा आठवत नाही. ते स्वाभाविकच. पण चष्मा लावे तो. त्याच्या अंगात खादीचा छान कुडता दिसायचा. त्याच्या अंगावर कुडत्याशिवाय काहीच पाहिलेलं आठवत नाही. गुडघ्याच्या किंचित खाली येणारा झब्बा (त्याच्या बाह्या मनगटापासून किंचित वर सरकवून घेतलेल्या), पँट आणि बहुतेक शबनमसारखी पिशवी असे. फार जाडी-भरडी नव्हे आणि अगदी रेशमी मुलायम पोताचीही नव्हे ती खादी. लक्ष्मी रस्त्यावरच्या खादी भांडारात मिळते तशीच अगदी. असा एक तरी झब्बा घ्यायची तेव्हा माझी इच्छा होती. ती नंतर सहा-आठ महिन्यांनी पूर्ण केली. पत्रकारिता आणि झब्बा ह्यांचं नातं तेव्हा फार जवळचं होतं.

अभ्यासक्रमात माहिती गोळा करून लेख लिहिण्याची स्पर्धा होती. वृद्धांच्या प्रश्नांवर लिहायचं होतं. ती माहिती मिळविण्यासाठी आम्ही चौघं एकत्रच दोन-तीन ठिकाणी गेलो - श्रीरंग, प्रसाद पाटील, डॉ. प्रदीप सेठिया आणि मी. त्याच कामासाठी आम्ही पु. शं. पतके ह्यांच्याकडेही गेलो होतो. ते फार मोठं व्यक्तिमत्त्व होतं. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असलेल्या आमच्यासाठी त्यांनी अगदी भरपूर वेळ दिला होता. त्या वेळी बोलताना त्यांनी मराठी माणसांबद्दल केलेली दोन विधानं अजून लक्षात आहेत. अर्थात त्याचा संदर्भ इथे देण्यासारखा नाही.

हिंडून, संस्थेत जाऊन, लोकांशी बोलून जमवलेल्या माहितीच्या आधारे वर्गात बसून एक तासात लेख लिहायचा होता. पहिले तीन क्रमांक काढून त्यांना रोख बक्षिसं दिली जाणार होती. ‘लेख लिहिण्याचा तास’ संपल्यानंतर आम्ही चौघे आपटे रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या ‘तुलसी’मध्ये चहा प्यायला गेलो. श्रीरंग लेखक. त्यामुळे त्यानं अगदी सहज मोठा लेख लिहिला असणार, हा माझा स्वाभाविक समज. तसं विचारल्यावर तो म्हणाला, ‘मला नाही बुवा असं ठरावीक वेळेच्या मर्यादेत काही लिहायला जमत.’ त्याच्यासारख्या ‘लेखकाला’ हे अवघड जातं म्हटल्यावर आश्चर्यच वाटलं. त्याच वेळी वाटलं की, त्याला हे प्रकरण जमत नाही म्हटल्यावर आपली काय डाळ शिजणार!

स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अभ्यासक्रमाचे समन्वयक गोपाळराव पटवर्धन म्हणाले होते, ‘निकालात वेगळं सांगावं असं काही नाही. अपेक्षित विद्यार्थ्यांनाच यश मिळालं आहे.’ हे ऐकून तर आपला त्याच्याशी काही संबंधच नाही, असं वाटलं होतं. पण गमतीचा भाग म्हणजे स्पर्धेत डॉ. प्रदीप सेठियासह मला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं! (त्यातील माहितीबद्दल बक्षीस मिळालं की ते लिहिण्याच्या शैलीबद्दल, हे अजूनही कळलेलं नाही!!)

फर्ग्युसन महाविद्यालयात शिकवणाऱ्या शर्मिष्ठा खेर आमच्या आणखी एक सहअध्यायी होत्या. का ते माहीत नाही, पण त्यांना माझ्याबद्दल आपुलकी वाटत असे. दोन-तीन प्रसंगातून ते जाणवलं. तर तो बक्षिसाचा कार्यक्रम संपल्यावर त्या म्हणाल्या, ‘अहो कुलकर्णी, तुमचा लेख ‘माणूस’ला पाठवून द्या. तिथं माझी मैत्रीण (मेधा राजहंस) असते. तिला सांगते मी...’ आणखी एक आश्चर्य - तो लेख ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध झाला!

श्रीरंग उमराणीबद्दल सांगण्याच्या ओघात स्वतःबद्दल बरंचसं लिहून झालं. आता मूळ मुद्द्याकडे. एकदा वर्गात शिकवणं चालू असताना सहज बाजूला बसलेल्या श्रीरंगकडे पाहिलं. तो खाली मान घालून अगदी तन्मयतेनं काही गिरवत होता, रेखाटत होता. तास संपल्यावर त्याला विचारलं तर कळलं की कार्डशीटवर तो काही काही रेखाटत असे. एकूणच त्याचा त्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाबद्दल असलेला रस आटून गेलेला, हे लक्षात आलं होतं.

अरे वा! हा लेखकाबरोबर चित्रकारही आहे तर... (आपल्याला अगम्य असलेली आणखी एक कला.) त्याच्याबद्दल मला फारच कौतुक वाटू लागलं. सहज त्याला म्हटलं पाहू दे ना चित्र. तर त्यानं कसलेही आढेवढे न घेता रेखाटण दाखवलं.

जाड पिवळसर कागदाच्या तुकड्यावर काळ्या पॉइंट पेनानं केलेलं होतं ते रेखाटण. ते पाहून पुन्हा ‘हंस’ची आठवण झाली. ते चित्र/रेखाटण फारच आवडलं. तो ते शबनममध्ये सरकवत असताना विचारलं, ‘फारच छान आहे रे. मी घेऊ - देतोस?’

श्रीरंग फार सज्जन माणूस. मला चित्रकलेतलं किवा एकूणच कलेतलं काय कळतं, ह्याचा फार विचार न करता त्यानं देऊन टाकलं - आवडलंय तर राहू दे तुला. जितक्या सहजतेनं त्यानं ते रेखाटलं होतं, त्याच सहजपणे देऊन टाकलं! आयुष्यात पाहिलेली पहिली ताजी ताजी कलाकृती. ती माझ्याकडे आली होती. ‘मालकीची’ झाली होती.

अभ्यासक्रमाची टिपणं ज्या वहीत काढत होतो, तिच्या मुखपृष्ठावर हे छोटं चित्र छान चिटकवलं. बरीच वर्षं ते तसंच होतं. एकदा त्या वह्या दिसल्या आणि चित्रही. मग ते वहीवरून अलगद काढलं. कसलाही धक्का न लागता ते निघालं.

सहज पाहिलं, तरी लक्षात येतं की त्या डेरेदार झाडाच्या उजवीकडे एक ठिपका दिसतो. पाण्याचा एक थेंब चुकून पडलेला. पण त्यानं चित्राचं फार नुकसान केलेलं नाही. आता तर असं वाटतं की ते एक झाडावरचं हिरवं पानच आहे. वरच्या बाजूची एक रेष त्याच्या देठाचा भास निर्माण करते.

अभ्यासक्रम संपला. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. पुढे मग वेगवेगळ्या बातम्यांमधून श्रीरंग उत्तम संगीतकार असल्याचंही समजलं. एका मोठ्या कलावंतानं कुठलाही तोरा न दाखवता किती सहजपणे आपल्याशी तेव्हा जुळवून घेतलं, हे आता समजतंय.

नंतरची काही वर्षं दिवाळी अंक चाळताना/वाचताना एखाद्या कथेवर ‘श्रीरंग उमराणी’ नाव दिसतंय का, हे मोठ्या औत्सुक्याने पाहत होतो. नाही दिसलं कधी. असंही असेल की, त्याचं लिहिणं माझ्या वाचनात आलं नसणार. किंवा बहुतेक त्यानं लिहिणं सोडलं असावं.

ते सहा-सात महिने सोडले, तर पुढे श्रीरंग कधीही भेटला नाही. तो अभ्यासक्रम, त्यातले आम्ही सहकारी त्याच्या लक्षात असण्याची शक्यता अगदीच पुसट आहे. त्यात गैरही काही नाही. पण त्या चित्रभेटीच्या रूपानं त्याच्याशी मैत्री अतूट आहे, असंच मी मानतो. आता कधी भेटलाच तर एकेरीत बोलायला कचरायला होईन. श्रीरंग उमराणी नाव एका मोठ्या कलाकाराचं आहे, हे चटकन् मनात येईल.

एका चित्राच्या ह्या आठवणी. बरेच दिवस लिहायच्या राहून गेलेल्या.
................

#चित्र #रेखाटण #रानडे_इन्स्टिट्यूट #श्रीरंग_उमराणी #पत्रकारिता

Wednesday 18 October 2023

गिलचा चौकार... इथं आहे, तिथं नाही!

त्याला सगळे मुक्या स्कोअरर म्हणायचे...हंपायरप्रमाणंच तो स्कोअरर एकदम महत्त्वाचा असतोय हे गल्लीतल्या बिट्ट्या पोरांनाही माहीत असणार. आपल्या टीमचा स्कोअरर जादा रना लावणार आणि विरुद्ध टीमचा कमी. म्हणजे आपण बॅटिंग करत असलो तर. त्यातून शेवटी सणसणीत मारामाऱ्या होणार हे नक्कीच. मॅच समाप्त.

‘‘सबंध गावात प्रामाणिक स्कोअरर म्हणजे एकच. मुक्या स्कोअरर.’’ असं सगळीच पोरं म्हणतात.

- ‘झुंबर’मध्ये लंपन अचूक स्कोअरिंगचं महत्त्व सांगत असतो. ते करणाऱ्याबद्दल त्याच्या मनात अतीव आदर आहे. 

डेंगीच्या डासांनी चावा घेतल्यामुळं शुभमन गिल ह्याला मैदानापासून लांब राहावं लागलं. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तेराव्या अध्यायातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळता आलं नाही.

‘अंतिम सामना नाही; पण त्याहून किंचितही उणा नाही’, असं वर्णन केलं जातं तो भारत-पाकिस्तान सामना शनिवारी (१४ ऑक्टोबर) अहमदाबादेत झाला. एक दिवशीय क्रिकेटच्या विश्वचषकात आठव्या वेळी हे संघ समोरासमोर उभे ठाकले होते. झुंज झालीच नाही. ८-० की ७-१ ही उत्सुकता पहिल्या डावाच्या उत्तरार्धातच मावळली.


शुभमन...आणखी एका चौकाराचा मोह
....................
ह्या सामन्यासाठी भारतानं संघात एक बदल केला होता. ईशान किशन बाहेर आणि शुभमन आत. डेंगीसारख्या आजारातून नुकताच बरा झालेल्या गिलला (एवढ्या महत्त्वाच्या लढतीत) खेळवावं की नाही? ह्या प्रश्नावर तज्ज्ञ, अनुभवी-जाणते क्रिकेटपटू ह्यांच्यापासून सोशल मीडियावरील कट्ट्यावरच्या चर्चेत कुठेच एकमत नव्हतं.

‘गिल आमच्यासाठी वर्षभरात अतिशय खास खेळाडू ठरला आहे. विशेषतः ह्या मैदानावर (नरेंद्र मोदी स्टेडियम) आणि म्हणूनच तो संघात हवाच,’ असं नाणेफेकीनंतर कर्णधार रोहित शर्मा ह्यानं स्वच्छ शब्दांत सांगितलं.

रोहितबरोबर सलामीला आलेला शुभमन फार काळ टिकला नाही. डावातील तिसऱ्या षट्कातल्या पाचव्या चेंडूवरच तो बाद झाला.

पहिल्या षट्कात शाहीन शहा आफ्रिदीला दोन चौकार बसले होते. त्यामुळं तो जरा चिडूनच होता. त्याचा हा चेंडू किंचित आखूड आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा. आधीच्या षट्कांत चौकाराची आतषबाजी केल्यामुळं गिल उत्साहात होता. पुन्हा आमंत्रण मिळाल्यावर मोह आवरता येणं कठीण.

गिलनं कट मारला. चेंडू बॅटवर व्यवस्थित बसलाही. पण...तो थेट बॅकवर्ड पॉइंटला उभ्या असलेल्या शदाब खानच्या हातात विसावला. पाकिस्तानला दिलासा देणारं पहिलं यश.

गिलची ती अवघ्या ११ मिनिटांची खेळी देखणीच होती. पण अल्पकालीन. ‘चमक विजेची, परि क्षणाची’ असं कवीनं म्हटलंय, तसा तो डाव.


बी. सी. सी. आय.च्या
संकेतस्थळावरील नोंद.
.................
गिल बाद झाला आणि थेट प्रक्षेपण दाखविणाऱ्या टीव्ही. वाहिन्यांवर पट्टी दिसली, संकेतस्थळांच्या वृत्तान्तामध्ये आहे, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालं - शुभमन गिल झे. शदाब खान, गो. शाहीन शहा आफ्रिदी १६ (११ चेंडू, चौकार)

ह्याला अपवाद एकच. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आय. सी. सी.) संकेतस्थळावरील धावफलक. त्यात नोंद आहे - शुभमन गिल झे. शदाब खान, गो. शाहीन शहा आफ्रिदी १२ (११ चेंडू, चौकार)

क्रिकेटचं ‘बायबल’ मानलं जाणारं ‘विस्डेन’, बी. बी. सी. न्यूज, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, ईएसपीएनक्रिकइन्फो, क्रिकट्रॅकर, क्रिकबझ... अशा विविध संकेतस्थळांवर भारत-पाकिस्तान सामन्याचा वृत्तान्त आणि धावफलक दिसतो.

आय. सी. सी.च्या धावफलकात
गिलच्या धावा १२ व चौकार ३.
............................ 

हे सारे वृत्तान्त, ही संकेतस्थळं गिलच्या धावा १६ आणि चौकार चारच दाखवितात. प्रश्न असा पडतो की, आय. सी. सी.नं गिलच्या चार धावा कुठं हरवल्या? एक चौकार कसा ‘गायब’ केला? आणि तेवढंच महत्त्वाचं म्हणजे ह्या गायब केलेल्या चौकाराचा हिशेब कुठं दाखवला?

आय. सी. सी.च्या धावांचा हिशेब चोख आहे. भारतीय डावात इतर धावांच्या खाती जमा दोन आहेत, असं बहुतांशी माध्यमं दाखवतात. एक लेगबाय, एक वाईड. आय. सी. सी. मात्र ह्या खात्यात सहा धावा दाखविते. लेगबायच्या पाच.

म्हणजे गिलच्या त्या हरवलेल्या चौकाराची एंट्री इतर धावांच्या खात्यात पडली आहे.

हा चौकार कुठला? डावातील दुसऱ्या आणि हसन अलीच्या पहिल्या षट्कातील शेवटचा चेंडू.

शाहीन शहा आफ्रिदीच्या पहिल्याच षट्कात दोन चौकार गेले. त्याचीच पुनरावृत्ती गिलने हसन अलीच्या तिसऱ्या चेंडूवर केली. मिड-ऑफ व एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमापार. पाचव्या चेंडूवर देखणा कव्हर ड्राइव्ह. पुन्हा चौकार

षट्कातला शेवटचा चेंडू. पॅडवर आलेला हा चेंडू शुभमन लेग ग्लान्स करतो. फाईन लेगला चौकार! षट्कातला तिसरा आणि गिलचा चौथा. एका संकेतस्थळावरील धावत्या वर्णनानुसार तो फ्लिकचा फटका होता.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या संकेतस्थळावर दिसतं ते असं - ...good length ball, pitching on leg stump, Shubman Gill glances it down the leg past the keeper and ends the over with a boundary!


गिलचा चौकार ‘गायब’ करणारा हाच तो वादग्रस्त चेंडू आहे. आय. सी. सी.चं संकेतस्थळ ह्या चेंडूबद्दल म्हणतं - Good line and length from Hassan Ali. Shubman Gill is struck on the body while trying a leg glance, resulting in 4 leg byes back behind square.

त्या पहिल्या षट्कात हसन अली ह्यानं १२ धावा दिल्याचं बाकी सगळे सांगतात. आय. सी. सी.च्या मते त्यानं आठच धावा दिल्या.

हे चुकून झालं असावं का? मानवी त्रुटी? तसंही दिसत नाही. हा चारचा हिशेब इतर धावांमध्ये लागतो, तसाच गोलंदाजीच्या अंतिम पृथक्करणातही.

हसन अलीच्या गोलंदाजीची सगळीकडे दिसणारे आकडे असे : ६-०-३४-१
त्याने दिलेल्या धावांतून आय. सी. सी.ने चार बरोबर वजा केल्या आहेत. त्यांनी दाखविलेलं पृथक्करण आहे - हसन अली ६-०-३०-१

विश्वचषक स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची आहे. त्यामुळे त्यांनी नोंदविलेली धावसंख्या व तपशीलच भविष्यात अधिकृत मानला जाईल. गिलने चार नाहीत, तर तीनच चौकार मारले, हेच कायम राहील.

धावांची आणि चेंडूंची बिनचूक नोंद ठेवणारा ‘मुक्या स्कोअरर’ आणि त्याचं महत्त्व जाणून असलेला ‘लंपन’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहोचले पाहिजेत बुवा.

मारामाऱ्या होणार नाहीत, मॅच समाप्त होणार नाही. पण वाद तर होतील. कारण असेल एका चौकाराचं.

हा चौकार चोरलेला नाही किंवा दाखविलेलाच नाही, असं नाही. त्याची एंट्री ह्या खात्यातून त्या खात्यात झालेली. दोन्ही पासबुकांतला, अर्थात स्कोअरशीटमधला हिशेब एकदम तंतोतंत जुळतो.

... तरीही प्रश्न पडतोच. चौकार कोणाचा? गिलचा की लेगबायचा?
चुकतंय कोण? आय. सी. सी. की बाकीचे सगळे?
--------------------------------------------------
#क्रिकेट #विश्वचषक_क्रिकेट #विश्वचषक23 #भारत_पाकिस्तान #शुभमन_गिल #आयसीसी #बीसीसीआय #चौकार #हसन_अली #विस्डेन #मुक्या_स्कोअरर

#cricket #world_cup #CWC2023 #India_Pakistan #Shubman_Gill #icc #bcci #boundary #Hassan_Ali #wisden #scorer
#leg_byes

Friday 13 October 2023

‘सप्तपदी’नंतर आवृत्ती आठवी

 

‘विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानचा पराभव ही विश्वातली
अटळ गोष्ट आहे,’ अशी मार्मिक टिप्पणी ‘मिरर’ ह्या इंग्लंडमधील दैनिकानं मागच्या स्पर्धेच्या वेळी केली. त्याच अटळ गोष्टीची अहमदाबामध्ये पुनरावृत्ती होईल, असं कोट्यवधी क्रिकेटरसिकांना वाटतंय. अहमदाबादमध्ये 
शनिवारी होणाऱ्या लढतीनिमित्त विश्वचषकातील
भारताच्या ‘सप्तपदी’ची झलक. 
----------------------------------------------------

गोष्ट आहे सहा वर्षांपूर्वीची. म्हणजे १८ जून २०१७ रोजीची. इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाची अंतिम लढत होती. त्यासाठी समोरासमोर उभे ठाकले होते कट्टर प्रतिस्पर्धी – भारत आणि पाकिस्तान.

टीव्ही. वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग वाढतो, जाहिरातींचा महसूल वाढतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या गल्ल्यात भर पडते, तिकिटांचा काळा बाजार होतो आणि सट्टाबाजार गरम होतो, अशी ही लढत.

‘बीबीसी’च्या हिंदी सेवेमध्ये दीर्घ काळ काम केलेल्या विजय राणा यांनी त्या लढतीच्या आदल्या दिवशी ‘फेसबुक’वर पोस्ट टाकली होती – ‘Indian media can’t differentiate between cricket and war.’

हाच मजकूर ‘री-पोस्ट’ करण्याचा मोह विजय राणा यांना कदाचित होईलही. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत मोठी लढत शनिवारी होत आहे. त्याकडे तमाम भारतीयाचं लक्ष लागलेलं असेल.

अहमदाबादेत ‘अष्टक’
विराट कोहलीच्या संघानं इंग्लंडमध्ये ‘सप्तपदी’ पूर्ण केली. सलग सातव्या वेळी विश्वचषकात भारतानं पाकिस्तानला हरविलं. आता रोहितच्या नेतृत्वाखाली ‘अष्टक’ पूर्ण होण्याची उत्सुकता भारतीयांना आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या ह्या सामन्याचा थाट काही और असेल. स्पर्धेचं उद्घाटन भारतीयांना हव्या असलेल्या उत्सवी आणि उत्साही स्वरूपाचं झालं नाहीच. तीच कसर अहमदाबादेत भरून काढली जाईल.

अमिताभ बच्चन, रजनीकांत, सचिन तेंडुलकर अशा ‘सुवर्ण तिकीट धारकां’साठी सामन्याच्या दीड तास आधी संगीताचा कार्यक्रम होईल. सव्वा लाख क्षमतेचं स्टेडियम ओसंडून वाहील, असा अंदाज आहे. तिकिटं, हॉटेलात जागा मिळविण्यासाठी झालेल्या लटपटी-खटपटीच्या बातम्या आल्याच आहेत.

दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. आधीचे दोन्ही सामने जिंकले असल्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात ‘...काम बिघाडा’ होऊ नये, अशीच संघांची इच्छा असणार.

खुन्नस आणि जिगर
‘अन्य कोणत्याही क्रिकेट सामन्यासारखंच आम्ही हा सामना खेळतो,’ असं दोन्ही बाजूंचे खेळाडू सांगतात, बोलतात. पण तो उपचार असावा. दोन्ही संघांमध्ये खुन्नस असते आणि जिंकण्याची जिगर दिसून येते.

विश्वचषक स्पर्धांमध्ये आतापर्यंत सात वेळा दोन्ही संघ एकमेकांशी खेळले आहेत. जिंकण्याचा एकही ‘मौका’ आतापर्यंत पाकिस्तानला लाभलेला नाही, हे विशेष! भारताच्या विजयी मालिकेबद्दल टीव्ही. वाहिन्यांवर आलेल्या जाहिराती चांगल्याच गाजल्या आहेत.

विश्वचषकाच्या पहिल्या चार स्पर्धांमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने आलेच नाहीत. इंग्लंडमध्ये झालेल्या तिन्ही प्रुडेन्शियल चषक स्पर्धांमध्ये दोन्ही संघ वेगळ्या गटांत होते. पहिल्या दोन स्पर्धांमध्ये भारताची अवस्था दयनीय होती. कपिलदेवच्या संघांनं विश्वचषक जिंकला तेव्हा पाकिस्तान संघाशी गाठ पडलीच नाही.

भारत आणि पाकिस्तान संयुक्त यजमान असलेल्या रिलायन्स चषकाची (१९९६) अंतिम लढत दोन यजमानांमध्ये होईल, ही अनेकांची अपेक्षा होती. पण अपेक्षाभंग झाला. उपान्त्य फेरी गाठूनही तेथेच दोन्ही संघांचा प्रवास संपला. भारताला इंग्लंडनं आणि पाकिस्तानला ऑस्ट्रेलियानं हरवलं.

विजयमालिका सुरू
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये १९९२मध्ये झालेल्या बेन्सन अँड हेजेस चषक स्पर्धेत त्यांची पहिल्यांदा गाठ पडली. सलामीची ही लढत भारतानं ४३ धावांनी जिंकली. सामन्याचा मानकरी ठरलेल्या सचिन तेंडुलकरनं नाबाद ५४ धावा केल्या व एक बळी मिळविला.


जावेद मियाँदादच्या माकडउड्या. पाकिस्तानने चषक
जिंकला; पण भारताकडून हारच झाली.
...........................
विश्वचषकातील विजयमालिकेची ही सुरुवात होती. हा सामना लक्षात राहतो तो जावेद मियाँदादच्या माकडउड्यांमुळे! अपील करणाऱ्या यष्टिरक्षक किरण मोरे याला खिजवण्यासाठी त्यानं अशा उड्या मारल्या.

आशियात दुसऱ्यांदा झालेल्या विल्स विश्वचषक स्पर्धेच्या (१९९६) उपान्त्यपूर्व सामन्यात पाकिस्तानच्या नशिबी पुन्हा एकदा लिहिलेला होता पराभव – ह्या वेळी ३९ धावांनी. भारताच्या विजयाचे मानकरी ठरले नवज्योतसिंग सिद्धू (९३) व व्यंकटेश प्रसाद (तीन बळी).

बंगलोरच्या ह्याच सामन्यात प्रसाद व आमिर सोहेलची चकमक गाजली. प्रसादच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरला चौकार मारल्यावर आमिरने त्याला ‘जा घेऊन ये तो चेंडू’ असंच जणू खुणावलं.

आक्रमक व्यंकटेश प्रसाद

जशास तसे... व्यंकटेश प्रसादचा बाणा
........................................
प्रसादचा पुढचा चेंडू. पुन्हा तसाच फटका मारू पाहणाऱ्या सोहेलचा त्रिफळा उडाला! मग आक्रमक झालेल्या प्रसादनं त्याला पॅव्हिलियनची दिशा दाखविली! ह्या पराभवानंतर पाकिस्तानात पुतळे जाळणे, टीव्ही. संच फोडणे अशा प्रतिक्रिया उमटल्या. ‘मौका’ जाहिरातीच्या जन्मकथेचं बीज ते असावं.

भारतानं विजयाची हॅटट्रिक साजरी केली, पहिल्या आयसीसी विश्वचषक (इंग्लंड – १९९९) स्पर्धेमध्ये. मँचेस्टर येथे झालेल्या ‘सुपर सिक्स’च्या लढतीत भारतानं ४७ धावांनी विजय मिळविला.

तेंडुलकर, राहुल द्रविड व महंमद अजहरुद्दीन ह्यांच्या अर्धशतकांमुळे भारतानं सव्वादोनशे धावांची मजल मारली. पुन्हा एकदा व्यंकटेशचा ‘प्रसाद’ पाकिस्तानी फलंदाजांना मिळाला. त्याच्या भेदक माऱ्यापुढे (५-२७) पाकिस्तानचे प्रयत्न साफ अपुरे पडले.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेतही ‘मागील पानावरून पुढे चालू’ अशीच कथा पाकिस्तानसाठी राहिली. सेंच्युरियन इथं १ मार्च २००३ रोजी झालेल्या ह्या सामन्यात भारताचा विजय अधिक अधिकारवाणीचा, बराच मोठा होता.

शोएबच्या दर्पोक्तीला सचिनचं उत्तर
सामन्याच्या आधी शोएब अख्तरनं दर्पोक्ती केली होती. त्याला तेंडुलकरनं (पाऊणशे चेंडूंमध्ये ९८) चोख उत्तर दिलं. त्याच्या साथीला वीरेंद्र सेहवाग होताच. युवराजसिंगनं नाबाद ५० धावा केल्या. भारतानं सहा गडी राखून आरामात विजय मिळविला.

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या स्पर्धेत या दोन्ही संघांची मैदानावर भेट झालीच नाही. दोन्ही संघ गटातच बाद झाले, हे त्याचं कारण. दोन्ही संघांसाठी ही स्पर्धा ‘आठवणही नका काढू त्याची’ एवढी वाईट ठरली.

भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला तो घरच्या मैदानावर. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली युवराजसिंग ह्यानं लाडक्या सचिन तेंडुलकरला दिलेली भेट ती. स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात पाकिस्तानचा अडथळा दूर लीलया दूर करीत भारतानं दिमाखात अंतिम फेरी गाठली.


मोहालीत पाकिस्तानला मात आणि अंतिम फेरी गाठली.
विश्वचषक आपलाच होता!
......................................
मोहालीमध्ये ३० मार्च २०११ रोजी झालेल्या ह्या सामन्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर (८५) व वीरेंद्र सेहवाग (३८) ह्यांनी त्रास दिला. ह्या जोडीने ३५ चेंडूंमध्ये ४८ धावांची सलामी दिली होती. पाकिस्तानची मधली फळी गडगडल्याने पुन्हा पराभव पत्करावा लागला.

कोहलीचं शतक
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड ह्यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या २०१५मधील विश्वचषक स्पर्धेत भारताची सलामीची लढतच पाकिस्तानशी झाली. विराट कोहलीनं शतक झळकावलं. पाकिस्तानविरुद्धचं विश्वचषकातील हे कोणत्याही भारतीय फलंदाजाचं पहिलंच शतक होतं.


विराट कोहलीचं शानदार शतक.
विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारतीय फलंदाजाचं पहिलंच शतक हे.
...................................................
महंमद शमीच्या माऱ्याला त्या दिवशी वेगळीच धार चढली होती. त्यानं घेतलेल्या चार बळींमुळे पाकिस्तानचा डाव २२४ धावांमध्ये संपला. सलग सहाव्या लढतीत पराभव – या वेळचं अंतर अधिक मोठं, ७६ धावांचं!

एव्हाना विश्वचषक स्पर्धेत ह्या दोन देशांमधील सामन्याला ‘महाअंतिम लढत’ असं स्वरूप केव्हाच आलं. अब्जावधी प्रेक्षक डोळ्यांत प्राण आणून बघतात, ज्या सामन्यावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जातो, जाहिरात कंपन्या मालामाल होतात, असा हा सामना. मागच्या विश्वचषक स्पर्धेत (२०१९) तो चौथ्या आठवड्यात झाला.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळला गेलेला भारत-पाकिस्तान सामना थेट पाहणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा अधिक मजा लुटली ती सोशल मीडियातील ‘ट्रोलर’नी! जांभई देणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराचं चित्र प्रातिनिधिक होतं.

पराभूत मनोवृत्ती
विश्वचषकात पाकिस्तानला सलग सातव्यांदा पराभूत करताना रोहित, विराट, कुलदीप यांनी कुठलीही कसर सोडली नाही. पाकिस्तानी खेळाडू पराभूत मनोवृत्तीनं खेळत असल्याचं सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या देहबोलीतून दिसून येत होतं.

पावसानं व्यत्यय आणूनही निकाली झालेल्या ह्या लढतीचा वृत्तान्त प्रसिद्ध करताना इंग्लंडमधील ‘मिरर’ वृत्तपत्रानं लिहिलं की, There are only three certainties in this world. Death, taxes and an Indian victory over Pakistan in the Cricket World Cup.

ह्या सामन्यात उत्कृष्ट दर्जाचा खेळ दिसला; पण तो एकाच बाजूनं – भारताकडूनच! सामन्यातल्या नऊपैकी सात टप्प्यांमध्ये भारताचं निर्विवाद वर्चस्व दिसलं.

देशाला एकदा विश्वचषक जिंकून देणाऱ्या तेव्हाच्या पंतप्रधानांनी - इम्रान खान - ‘खेळपट्टी दमट नसल्यास नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी घे’ असा दिलेला आदेश कर्णधार सर्फराज अहमदनं का कानाआड केला? कुणास ठाऊक!

रोहितचं आक्रमक शतक

मँचेस्टरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध शतक. रोहितच्या आनंदात
कर्णधार विराटही सहभागी.
.....................................................
रोहित शर्मा आणि के. एल. राहुल ह्यांनी सावध सुरुवात करीत शतकी सलामी दिली. बॅटच्या आतील कडेला चाटून चेंडू यष्ट्यांजवळून जाताना रोहित चार वेळा वाचला. नशिबानं जी साथ दिली, त्याचा फायदा घेत त्यानं आक्रमक शतक केलं.

विराटनंही जणू मागच्या स्पर्धेतला डावच पुढं खेळायला सुरुवात केली. डावखुऱ्या महंमद अमिरनं दुसऱ्या टप्प्यात अधिक धारदार गोलंदाजी करूनही भारतानं ३३६ अशी चांगली धावसंख्या केली.

डावरा फखर झमान (६२ धावा) व उजवा बाबर आझम (४८) ह्यांनी दुसऱ्या जोडीसाठी शतकी भागीदारी करून पाकिस्तानसाठी थोडी आशा निर्माण केली होती. त्यातच स्नायू दुखावल्याने भुवनेश्वरकुमार मैदानात नव्हता.

कुलदीपची कमाल

कुलदीपचा आनंद गगनात मावेना...
...................................
आणि नेमक्या वेळी कुलदीप यादवनं कमाल केली. त्याचा चेंडू एवढा अफलातून होता की, तो चेंडू-बॅटमधल्या फटीतून कसा जाऊन यष्ट्यांवर आदळला, हे बाबरला समजलंच नाही!

मग हार्दिक पंड्यानं षट्कात दोन बळी घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडलं. पावसानं व्यत्यय आणला, तेव्हाही डकवर्थ-लुईस नियमावलीनुसार पाकिस्तान विजयापासून फार लांब होतं.

विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाकिस्तानला विसरावा वाटणारा असाच आहे. त्याची पुनरावृत्ती अहमदाबादेत करायला रोहित, विराट, हार्दिक पंड्या ह्यांना आवडेलच.
-----------------

खिलाडू कोहली आणि चिडके बिब्बे!

खेळाडूपणा आणि चिडकेपणा ह्याची दोन उदाहरणं ह्या सामन्यात पाहायला मिळाली. चेंडू टाकल्यानंतर खेळपट्टीवर धावत जात असल्याबद्दल अमिर व वहाब रियाझ यांना पंचांनी दोन वेळा ताकीद दिली. पंचांनी स्पष्टपणे दाखवूनही आपण काही चुकीचं करत आहोत, असं वाटत नसल्यासारखाच त्यांचा आविर्भाव होता.

ह्याच सामन्यात ११ हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या कोहलीनं खिलाडूपणाचं उदाहरण घालून दिलं. हूकचा प्रयत्न फसून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेल्यावर पंचाच्या निर्णयाची वाट न पाहता तो सरळ चालू लागला. खरं तर दमट वातावरणामुळं बॅटचं हँडल किंचित सैल होऊन त्याचा किंचित आवाज येतो. हा आवाज बॅटचा चेंडूला स्पर्श झाल्याचा आहे, असाच विराटचा समज झाला.
.................

(छायाचित्रं - विविध संकेतस्थळांच्या सौजन्याने)
..................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक23 #भारत_पाकिस्तान #सप्तपदी #सचिन_तेंडुलकर #वीरेंद्र_सेहवाग #विराट_कोहली #व्यंकटेश_प्रसाद #रोहित_शर्मा #मौका_मौका

#cricket #ODI #CWC #CWC2023 #India_Pakistan #Sachin_Tendulkar #Virendra_Sehwag #Virat_Kohli #Rohit_Sharma #Venkatesh_Prasad #maukaa_maukaa

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...