Monday, 1 May 2023

मित्राची आठवण अन् आठवणीतला मित्र!


अचानक एखाद्या जुन्या मित्राची फाऽऽर आठवण येते. त्यानं पोटापाण्यासाठी गाव/शहर सोडलेलं असतं. त्या दूर देशी तो स्थायिक झालेला असतो.


अधूनमधून वर्गमित्र भेटतात. गप्पा होतात; खळखळून हसतो, तेव्हाही त्याची आठवण होते. त्याचं कसं चाललंय, मुलं काय करतात, ह्याची एकमेकांकडं विचारपूस होते. बस तेवढंच!


कधी तरी कुठल्या कामासाठी जाताना त्या भागातलं त्याचं घर दिसतं रस्त्यावरून. कुणीच राहात नसतं. त्या बंद घराकडे पाहून पुन्हा आठवतो तो दोन-चार मिनिटांसाठी. कामात गुंतल्यावर त्याची सय मनातल्या तळघरात जाते आपसूक.

अध्येमध्ये मित्राची गोष्ट कळते दुसऱ्या मित्राकडून, त्याच्या दूरच्या नातेवाइकाकडून. छान चाललेलं असतं. समाधानाची दोन उद्गारचिन्हं उमटवून वळतो आपल्या व्यापाकडे.

असंच कधी कधी त्याची आठवण टकटक करून जाते मनाच्या दारावर. ‘बोलू नंतर’, ‘शोधू नंबर’… आळस करतो थोडा.

आजच्यासारखा एखादा दिवस, त्याची कातर संध्याकाळ येते. खूपच आठवण येते मित्राची. कारण काहीच नसतं; पण बोलावं वाटतं.

पण संपर्क साधणार कसा त्याच्याशी?
पत्ता नाही, फोन नंबर नाही, इ-मेल आयडी माहीतच नाही…
बोलायचं तर आहेच.

अचानक लक्षात येतं, अनेक वर्षं न भेटलेला मित्र ज्या गावी राहातो, तिथंच आपला नव्यानं झालेला एक मित्र आहे की. विचारू त्याला ह्याचा काही ठावठिकाणा, पत्ता वगैरे.

पण तो ओळखत असेल का ह्याला? ती शक्यता कितपत? अंधूकच.  दोघांचं कामाचं क्षेत्र वेगळं. वयात बऱ्यापैकी अंतर. आपला मित्र वरच्या वर्तुळात वावरणारा. हा नवा मित्र सगळीकडे फिरणारा.

ऐकलं असेल का त्यांनी नाव एकमेकांचं? आला असेल का संबंध त्यांचा?

नशीब जोरावर असेल, तर भेटलेही असतील ते एकमेकांना. जग छोटंय म्हणतातच की.आशा वाटते.

चला, आता उशीर नको. नव्या मित्राला फोन लगेच करून जुन्या मित्राचा शोध घ्यायला सांगावं. त्याचा नंबर वगैरे मिळवून दे म्हणावं. काहीही कर, कुणाशीही बोल. त्याचा काही संपर्काचा मार्ग शोध. पण देच मिळवून त्याचा पत्ता. आज फाऽऽर फाऽऽर आठवण येतेय त्याची. ख्यालीखुशाली विचारायची आहे त्याला. इकडं का येत नाहीस? येतोस तेव्हा आम्हाला भेटत का नाहीस?

‘याद पिया की आए...’ ही ठुमरी आता मनातून बाहेर आली. ‘याद न जाए बीते दिनों की...’ हे गाणंही त्याला सांगायचंय.

नव्या मित्राला फोन केला तो खूप दिवसांनी. तरीही त्यानं पटकन् प्रतिसाद दिला. थोडं प्रास्ताविक केलं. एक छोटं काम आहे, असं सांगितलं. ते तुझ्याकडूनच होईल, अशी खातरी वाटत असल्याचंही मुद्दाम म्हणालो. ‘तुमच्या गावात अमूक अमूक नावाचा माझा मित्र राहतो. तो कुठं आहे सध्या, काय करतो... काही कळेल का? बघता जरा चौकशी करून?’

जग खरंच छोटंच आहे! आशा खरी ठरताना दिसतेय.

फक्त आडनाव सांगितलं आणि समोरून मित्राचं नावच घेतलं गेलं! तो कोणत्या कंपनीत काम करत होता, हेही सांगितलं. किती वेळा भेटी झाल्या, ह्याचाही तपशील पुरवण्यात आला. त्याच्या दोन-तीन वरिष्ठ सहकाऱ्यांची नावंही त्यानं धडाधड घेतली.

आश्चर्यच वाटलं. ह्याला माहीत असेल की नाही, ह्याची शंका. पण तसं काही नाही. ओळखतो तो त्याला. मग तुमची ओळख कशी वगैरे विचारलं. जुन्या मित्राशी असलेलं संबंध किती जुने, भेट होऊन किती काळ लोटला, कॉलेजजीवनात आम्ही कसे घट्ट मित्र होतो, त्याचे अगदी जवळचे नातेवाईक आमच्याच शहरातल्या मोठ्या उद्योगात वरिष्ठ पदावर असतानाही त्याचा मुळीच (गैर)फायदा न घेता तो बाहेर कसा गेला आणि तिथलाच कसा झाला... सगळं भडाभडा बोलत बसलो. त्याच्याशी संपर्क होणारच, हे नक्की झालं होतं ना!

जुन्या मित्राची नेमकी माहिती देण्यासाठी नव्या मित्राचा फोन उद्या किंवा दोन दिवसांनी येईल, असं धरून चाललो होतो. हा नवा मित्र बऱ्यापैकी संपर्क असलेला. आमच्या मित्राच्या उद्योगातील खूप जणांना ओळखणारा. त्यामुळेच त्याच्याकडून माहिती मिळेल, ह्याबद्दल निश्चिंत झालो.
पाचच मिनिटांत फोन आला. उत्कंठेनं उचलला.

नव्या मित्राकडं जुन्या मित्राबद्दल बातमी होती. अतिशय अनपेक्षित अशी.

‘ते आता ह्या जगात नाहीत. बरीच वर्षं झाली आता...’ धक्कादायकपणे त्यानं सांगितलं.
बरीच वर्षं? बारा-पंधरा वर्षं? छे, छे! अशक्यच!! तुमची बातमी चुकीची आहे. तुम्ही चुकीच्या माणसाबद्दल बोलताय बहुतेक.

त्याच वेळी धस्स झालं होतं. एवढी वर्षं आम्ही भेटलो नव्हतो? भेट जाऊ द्या; सव्वा-दीड तपापासून त्याची साधी माहितीही घ्यावी वाटली नव्हती आपल्याला?

पाच-दहा मिनिटं गेली आणि त्याचा पुन्हा फोन आला. आता आमच्या मित्राच्या अधिक जवळच्या माणसाकडून त्यानं माहिती मिळवली होती. मित्र गेला हे खरंच होतं; बऱ्याच वर्षांपूर्वी. त्याची आठवण येऊन कधी तरी उचकी लागायची, त्याच्याही आधी तो निरोप घेता झाला होता. त्याची पत्नीही दोन-तीन वर्षांपूर्वी देवाघरी गेली होती. एक मुलगा परदेशात आणि दुसरा परराज्यात असल्याची माहितीही नव्या मित्रानं दिली. त्यांच्या नावासह.

संपर्कात नसला म्हणून काय झालं?
इथं, त्याच्या जुन्या आणि मूळ गावी येत नसला म्हणून काय झालं?
चुकून कधी आलाच, तर आम्हाला भेटल्याविनाच परतला म्हणून काय झालं?
‘तो आहे’ आणि आज किंवा उद्या, कधी तरी भेट होईल; त्या वेळी गप्पा मारू, असा दिलासा होता. जेव्हा कधी भेटू, तेव्हा कडकडून मिठी मारू, साचलेलं सगळं बाहेर काढू, असं मनात होतं.

एक फोन केला आणि तो दिलासाच उद्ध्वस्त झाला!

आता वाटतंय, त्याच्या आठवणी येत होत्या, त्याला खूप दिवसांत भेटलो नाही, ह्याची लागणारी हंगामी चुटपूटच बरी होती.

फोन केला आणि काळीज कुरतडणारी सल देऊन गेला.

......

#मित्र #आठवणी #जुना_मित्र #नवा_मित्र #ललित
___

(छायाचित्रं महाजालावरून साभार)

Saturday, 22 April 2023

आखाडा, गदा, कुस्ती, राजकारण...

 


छत्रपती शिवराय केसरी स्पर्धा. प्रेक्षकांना दर्शन महाराजांचे आणि खेळाचेही.

विजेत्याला लक्षाधीश करणारी, तब्बल अर्ध्या किलोची सोन्याची गदा बहाल करणारी छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा नगरमध्ये आजपासून सुरू झाली. वाडिया पार्क मैदानावर सुरू झालेल्या ह्या स्पर्धेस राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आखाड्याशेजारी बसलेले हौशी निवेदक वारंवार सांगत होते. स्पर्धेत साडेआठशे मल्ल सहभागी झाल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमातील भाषणात सांगून टाकलं. म्हणजे संख्या लक्षणीय आहे, हे नक्की.

राज्यातील सत्ताधारी युतीने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, जिल्हा तालीम संघ ह्यांनी ही घवघवीत बक्षिसांची स्पर्धा आयोजित केली आहे. वाडिया पार्क मैदानात दोन्ही पक्षांचे झेंडे एका आड एक लागलेले असले आणि इथे तरी फडफडण्याचे समान वाटप झाले असले, तरी उद्घाटन समारंभावर वर्चस्व होतं ते भा. ज. प.चंच. उद्घाटक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रमुख पाहुणे श्री. विखे पाटील व त्यांचे खासदार-पुत्र डॉ. सुजय आणि पक्षाचेच प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी. शिवसेनेची उपस्थित होती ती सगळी स्थानिक मंडळी. उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांना कार्यबाहुल्यामुळे खेळाच्या उद्योगाकडे यायला वेळ मिळाला नसावा.

खेळ आणि राजकारण

खेळ आणि राजकारण ह्या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी. त्या कधी एकमेकांच्या पायात पायही घालतात. त्यातही कुस्तीचं आणि राजकारणाचं नातं अधिक जवळचं. कुस्तीसारखाच राजकारणाचा आखाडा असतो. डाव-प्रतिडाव, खडाखडी, नुरा, चितपट, लोळविणे, मातीला पाठ लावणे, दंड थोपटणे... हे सारे शब्दप्रयोग कुस्तीएवढेच राजकारणातही चलतीचे आहेत. स्वाभाविकच कुस्ती स्पर्धेतील भाषणात राजकारण येणार!

आपलं छोटेखानी भाषण संपविता संपविता श्री. राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी हळूच राजकारणाला स्पर्श केला. कबड्डीतील एखादा कसबी चढाईपटू कळेल ना कळेल अशा पद्धतीने निदान रेषेला स्पर्श करतो तसं. ‘उद्याच्या सर्व कुस्त्या आम्ही चितपट करू,’ असं ते म्हणाले, तेव्हा त्यांच्या आणि ऐकणाऱ्यांच्याही डोळ्यांपुढे आल्या त्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका ह्या निवडणुका. त्याही पुढच्या ‘महाराष्ट्र केसरी’ आणि ‘हिंद केसरी’ अर्थात विधानसभा, लोकसभा निवडणुका त्यांच्या मनात असणारच. त्या ओठांवर आल्या नाहीत, एवढंच.

नगर राजकारणाकरिता प्रसिद्ध, तेवढाच कोणे एके काळी कुस्तीसाठी. पालकत्र्यांनीच त्याची आठवण करून दिली.  तालमींकरिता  प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आणि शहर मागे पडलं, अशी खंत व्यक्त करताना ते म्हणाले की, कुस्तीचं आकर्षण ग्रामीण भागात आजही कायम आहे. ते टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी गरज आहे ती राज्य सरकारने आश्रय देण्याची गरज. मंत्रीमंडळातील ज्येष्ठ सहकाऱ्याची, ज्यानं मुख्य आणि उपमुख्यमंत्र्यापाठोपाठ शपथ घेतली त्या ज्येष्ठाची. स्वाभाविकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या साथीनं रविवारी सोन्याची गदा विजेत्याला देताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना त्याबद्दल काही तरी आश्वासन द्यावंच लागेल. ते रेवड्यांचं असणार नाही, अशी अपेक्षा आपण करू. जत्रेतल्या कुस्त्या पूर्वी रेवड्यांवर खेळल्या जात आणि ‘रेवडी-संस्कृती विकासासाठी घातक आहे,’ असं मा. नमो नमो ह्यांनी पूर्वी सांगितलेलं आहेच. अगदी ठासून!

कुस्ती महाराष्ट्राचं वैभव आहे. कुस्तीवरच्या प्रेमामुळे नागपूरहून नगरला (उद्घाटनासाठी) आलो, असं श्री. बावनकुळे ह्यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केलं. पण नंतर लगेच त्यांची गाडी राजकीय आखाड्याकडे वळली. दोन्ही पक्षांचे झेंडे (सारख्याच) डौलाने मैदानात फडकत असल्याबद्दल खुशी व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘आखाड्याच्या माध्यमातून युतीचं उत्कृष्ट प्रदर्शन घडत आहे!’’

भिस्त तुमच्यावरच!


तूर्त भिस्त पुडीतल्या
शेंगदाण्यावरच बुवा.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ह्यांची नजर मग पालकमंत्र्यांकडे वळली. ‘कर्तृत्ववान आणि यशस्वी मंत्री,’ असा श्री. राधाकृष्ण विखे पाटील ह्यांचा आवर्जून उल्लेख करीत ते म्हणाले की, ते आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. विकासासाठी त्यांनी राजकीय आयुष्य वाहून घेतलं आहे. एवढं सगळं झाल्यावर त्यांनी स्पष्टपणे हेही सांगून टाकलं की, आमची भिस्त तुमच्यावरच आहे! म्हणजे विखे व खासदार चिरंजीव. आता ही भिस्त पुढच्या छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेच्या आयोजनासाठी आहे की, येणाऱ्या सर्व निवडणुकांमधील युतीच्या यशासाठी, हे त्यांनाच ठाऊक. त्यांच्या ह्या निःसंदिग्ध वाटणाऱ्या पण तेल लावलेल्या पैलवानासारख्या असलेल्या वक्तव्यामुळं दोन गोष्टी घडण्याची शक्यता आहे - लोणीचं आयोजन म्हणजे उत्तम, ह्याची कल्पना असलेले तमाम जिल्ह्यांतील पेहेलवान खूश झाले असतील. दुसरी शक्यता अशी की, निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढाव्या लागणार, हे खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच सांगितल्यामुळे पक्षातील असंतुष्ट आत्मे अधिक अस्वस्थ होण्याची भीती. दरम्यान, ते भिस्त कुणावर हे अगदी आवर्जून सांगत असताना खासदार डॉ. सुजय व्यासपीठावर  शिवसेनेच्या दोन-तीन पदाधिकाऱ्यांसह कागदी पुडीतून एक एक शेंगदाणा तोंडात टाकत मस्त बसले होते.

उद्घाटनाच्या कार्यक्रमात सर्वांत मोठं भाषण झालं श्री. बावनकुळे ह्यांचंच. त्यात त्यांनी सर्वच मुद्द्यांना स्पर्श केला. ऑलिंपिकमध्ये भारताला पहिलं व्यक्तिगत पदक जिंकून देणाऱ्या खाशाबा जाधव ह्यांची आठवण त्यांनीच काढली. मागच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (२०१८) भारतानं आतापर्यंतची सर्वाधिक पदकं जिंकली, हे अभिमानानं सांगताना त्यांनी त्याचं श्रेय अर्थात पंतप्रधानांना दिलं. अगदी ‘मोदी है तो मुमकिन है’ असा सूर त्यांनी लावला नाही; पण त्यांच्यामुळे खेळाला चांगले दिवस आले, असं त्यांचं म्हणणं होतं. महाराष्ट्र सरकारनं क्रीडा खात्यासाठी अंदाजपत्रकात पाचशे कोटींहून अधिक तरतूद केल्याचं त्यांनी अगदी आठवणीनं सांगितलं. त्यातला मोठा वाटा छत्रपती संभाजीनगरला आणि उपराजधानी नागपूरकडं वळणार आहे, हे सांगायला विसरले असतील.

टोलेबाजीनंतर तत्त्वज्ञान!

‘एकनाथराव व देवेंद्रभाऊ रोज उत्तम फलंदाजी करीत आहेत. एका मागोमाग एक छक्के आणि चौके लगावत आहेत,’ असं खुशीत सांगताना श्री. बावनकुळे ह्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे ह्यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात शिवसेनाही आहे, हे जाहीर झालं. एवढी सगळी टोलेबाजी करून झाल्यावर प्रदेशाध्यक्षांना एकदम त्या जागतिक तत्त्वाची आठवण झाली - खेळात राजकारण नको! मग ते म्हणाले, ‘‘हा खेळ आहे. ह्यात पक्षीय भूमिका नाही. कुणी तरी एकानं आयोजनासाठी पुढाकार घ्यावा लागतो म्हणून युतीनं ही स्पर्धा आयोजित केली. त्यामुळे इथं कुस्त्या पाहायला सर्व पक्षाच्या मंडळींनी यावं!’’

भा. ज. प.चा ठसा उमटलेल्या ह्या कार्यक्रमामुळं शिवसेनेचे पदाधिकारी आता समारोपाच्या कार्यक्रमाची वाट पाहत असतील. त्या दिवशी आपले नाथ, अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार टोलेबाजी करतील, ह्यावर त्यांची भिस्त आहे. नुसते फडफडते झेंडे समान असून चालत नाही. छापही तशीच समसमान उमटावी लागते.  कुस्ती काय नि राजकारण काय; संघ समान असला, तरी पुढच्या वाटचालीसाठी आपापले डाव टाकणं भागच असतं!



उद्घाटनाचा कार्यक्रम विलंबानं झाला, तरी
कुस्त्या मात्र वेळेवर सुरू झाल्या.

जाता जाता महत्त्वाचं - उद्घाटन समारंभ चारऐवजी सहा-सव्वा सहा वाजता सुरू झाला. पण पाहुण्यांची वाट पाहत खेळ थांबला नाही. संयोजक आणि प्रत्यक्ष स्पर्धेची सूत्रं हाती असलेल्या तांत्रिक समितीनं ठरल्या वेळीच लढती चालू केल्या होत्या. एकाच वेळी तीन ठिकाणी कुस्त्या चालू होत्या. तिसरा पुकार होता क्षणीच हजर नसलेल्या खेळाडूला बाद करण्याचा निर्णय घेतला जाई. उद्या आणि परवा तांत्रिक समिती ह्याच पद्धतीनं स्पर्धा पुढे नेईल. मानाच्या गदेची कुस्ती निकाली होईपर्यंत आहे. त्या दिवशी खडाखडी किती होते, ते पाहावं लागेल.


#छत्रपती_शिवराय_केसरी #कुस्ती #सोन्याची_गदा #नगर #वाडिया_पार्क #भाजप_शिवसेना #चंद्रशेखर_बावनकुळे #राधाकृष्ण_विखेपाटील #खासदार_विखेपाटील #खेळ_राजकारण

Friday, 7 April 2023

बँका - सार्वजनिक क्षेत्रातील विरुद्ध खासगी!


महाराष्ट्र बँक कर्मचारी संघटना अधिवेशनानिमित्त संघटनेचे नेते
देवीदास तुळजापूरकर ह्यांचा पत्रकारांशी संवाद.
बाजूला आहेत शैलेश टिळेकर.
संघटित क्षेत्रातील, विशेषतः सरकारी-निमसरकारी कार्यालये, राष्ट्रीयीकृत अर्थात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा आणि वीज कंपन्या - युनियनबाजीबाबत सर्वसामान्यांमध्ये आता कमालीची नाराजीची भावना आहे. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, ह्या मागणीसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांनी मागच्या महिन्यात पुकारलेल्या संपाच्या वेळी हे दिसून आलं. तुलनेने एस. टी. कर्मचारी-कामगार ह्यांच्या संपाला अधिक सहानुभूती होती.

‘बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन’च्या पुणे विभागाचे अधिवेशन शुक्रवारपासून (७ एप्रिल) नगरमध्ये सुरू झाले. अधिवेशनाचे उद्घाटन होण्यापूर्वी सकाळी पत्रपरिषद झाली. ‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन’चे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर ह्यांनी त्यात प्रामुख्याने संघटनेची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या सोबत महाराष्ट्र बँकेचे माजी संचालक शिरीष धनक, संघटनेचे नेते शैलेश टिळेकर व संजय गिरासे (धुळे) होते. बँकिंग क्षेत्रापुढचे प्रश्न मांडताना त्यांचा भर प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँका व खासगी क्षेत्रातील बँका ह्यांच्यातील (असमान?) स्पर्धेवर राहिला.

श्री. तुळजापूरकर ह्यांनी आणि अर्थात संघटनेने पत्रकारांना देण्यासाठी जे निवेदन तयार केले त्यात ठळक मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या (अपुऱ्या) संख्येचा. त्यात म्हटले आहे की, सरकारी योजनांचा भार वाढला; कर्मचारीसंख्येत मात्र लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळेच ग्राहकसेवेवर अनिष्ट परिणाम झाला आहे.

नव्याने सुरू झालेल्या विविध योजनांचे खातेदार प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातील व आर्थिक साक्षरता नसलेले आहेत. तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टींची कमतरता आहे - कनेक्टिव्हिटी नसणे, सर्व्हरची क्षमता नसणे आदी. ग्रामीण भागात ती विशेषत्वाने जाणवते. त्याचा अनिष्ट परिणाम ग्राहकांना सेवा देण्यात होतो. तंत्रज्ञान आधुनिक असले, तरी (बँकेत काम करण्यासाठी) माणसांची आवश्यकता आहे.

थोडक्यात आणि त्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असा की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पुरेशी नोकरभरती करावी!

निवेदनापेक्षा वेगळे मुद्दे पत्रकारांशी बोलताना मांडले गेले. ते असे :

⦁ सार्वजनिक क्षेत्रातील बँका पाहिल्या तर एका शाखेमध्ये सरासरी नऊ कर्मचारी आहेत. हेच प्रमाण खासगी बँकांमध्ये १८ आहे.

⦁ चलनवाढीशी तुलना केली तर बँकांकडून (बचतखात्यातील शिलकीवर) मिळणारा व्याजदर उणा आहे.

⦁ जगात सगळीकडे ऑनलाईन सेवा स्वस्त आहे. बँकांमध्ये मात्र उलट आहे. ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर वेगवेगळ्या पद्धतीने भुर्दंड लादला जातो. (अधिक वेळा व्यवहार करणे, कमी मूल्याच्या नोटा भरणे, वेगळ्या बँकेचे एटीएम महिन्यातून तीन पेक्षा अधिक वेळा वापरल्यास अधिभार आदी.) थेट बँकेत येऊन व्यवहार केल्यास त्यासाठीचा बँकेचा खर्च २७ रुपये आहे आणि एटीएमच्या साहाय्याने व्यवहार केल्यास हाच खर्च नऊ रुपयांवर येतो.

⦁ बँकांचा ‘एनपीए’ कमी झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्रालय करीत असले, तरी परिस्थिती आनंद मानण्यासारखी नाही. एक कोटीहून अधिक रकमेचे थकबाकीदार २०१७मध्ये १७ हजार २३१ होते आणि ही रक्कम २ लाख ५८ हजार कोटी रुपये होती. पाच वर्षांनंतर (२०२२) थकबाकीदारांची संख्या ३० हजार ९०५ एवढी वाढली आणि रक्कम गेली ८ लाख ७३ हजार कोटी रुपयांवर.

⦁ कर्ज बुडवण्याचीच मनोवृत्ती (विलफुल डिफॉल्टर - अशी मनोवृत्ती नसणारे काही अपवाद असू शकतात.) असलेल्यांची आकडेवारीही अशीच आहे. ही संख्या २०१७मध्ये ८ हजार ६३९ होती आणि रक्कम होती ९९ हजार कोटी रुपये. विलफुल डिफॉल्टरची संख्या २०२२मध्ये १४ हजार ८६० झाली आणि रक्कम फुगून ३ लाख ४ हजार कोटी रुपयांपर्यंत गेली. केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेची दिशाभूल करीत आहेत.

खासगी बँकांबाबत - सामान्य माणसांचा बळी देऊन त्या नफा कमावत आहेत. बचतगट किंवा तत्सम (सामाजिक) उपक्रमांना पतपुरवठा करणाऱ्या स्मॉल फायनान्ससारख्या बँका ३२ ते ४२ टक्के व्याजदराने वसुली करतात. पूर्वीचे सावकारही एवढे व्याज घेत नव्हते. एवढा प्रचंड व्याजदर घेण्याची परवानगी ह्या बँकांना आहे का, असे भारतीय रिझर्व्ह बँकेला विचारायला हवे.

⦁ वसुलीसाठी एजंट नेमू नयेत, असा रिझर्व्ह बँकेचा आदेश आहे. नेमलेच तर ते गुंड असू नयेत. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे?

⦁ आम्ही (बँक कर्मचारी संघटनांनी) ३० वर्षांत ५१ वेळा संप केला. बहुतेक वेळा तो खासगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात होता. पण सर्वसामान्यांचा सर्वसाधारण समज असा की, आम्ही पगारवाढीसाठीच संप करतोय!

⦁ ‘तुमच्या हितासाठीच आम्ही संप करीत आहोत,’ असे आता सामान्य माणसांना (समजावून) सांगणार.

⦁ आता आम्ही ग्राहक सेवा उपक्रम सुरू करीत आहोत. आर्थिक साक्षरता निर्माण केली की, लोक आमच्या सोबत येतील. सायबर क्राईमबाबत जागृती करण्यासाठी गावोगावी भित्तीचित्रांचे, पोस्टरचे प्रदर्शन आयोजित करीत आहोत.

साधी नगरपालिकेची निवडणूक लढवायची असली, तरी उमेदवाराला थकबाकीदार नसल्याचा दाखला सादर करावा लागतो. विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून असा दाखला अर्जासोबत सादर करणे बंधनकारक करायला हवे.

दोन दिवसांच्या ह्या अधिवेशनाचा उद्देश बँकांच्या खासगीकरणाला विरोध, नोकरभरतीसाठी आग्रह ह्याच दोन प्रमुख गोष्टी आहेत, असे दिसते. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी परिणामकारक उपाययोजनाच्या सूचनाही ठरावाद्वारे करण्यात येतील.

एक गोष्ट नक्की की, अधिवेशन कर्मचारी संघटनेचे आहे. त्यामुळे विषयपत्रिकेचा भर कर्मचारी हाच आहे. बँकेत मिळणाऱ्या ‘सेवे’बद्दल सर्वसामान्य ग्राहकाचे काय मत आहे, ह्याबद्दल आत्मपरीक्षण होणार की नाही, हे माहीत नाही. ग्राहकांना दर्जेदार सेवा न मिळण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण अपुरे कर्मचारी असेलच. पण तेच एकमेव कारण म्हणता येईल का? तसेच मानले, तर ती आत्मवंचना ठरेल बहुतेक. त्यावरही थोडे मंथन होऊन सदस्य कर्मचाऱ्यांना काही धडे दिले गेले, तर सामान्य माणूसही संघटनांकडे आणि त्यांच्या अधिवेशनाकडे थोड्या सहानुभूतीने पाहील, एवढे खरे!
...
#महाराष्ट्र_बँक #कर्मचारी_संघटना #बँकिंग_क्षेत्र #सार्वजनिक_बँका #खासगीकरण_विरोध #ग्राहक_सेवा #नोकरभरती #नगर_अधिवेशन

Wednesday, 5 April 2023

वडीलधारा पत्रकार


(छायाचित्र : फेसबुकवरून साभार)
‘केसरी’च्या
नगर आवृत्तीमध्ये उपसंपादकाची जागा होती, असं समजलं. म्हणून अर्ज केला. मुलाखतीसाठी तोंडी निरोप आला. नगरहून पुणे कार्यालयात आणि तिथून मला. आठवण पक्की आहे. मुलाखत द्यायला गेलो, तो दिवस होता १४ किंवा १५ डिसेंबर १९८७. सर्जेपुऱ्यातील प्रियदर्शनी संकुलातील कार्यालयात सकाळी साडेदहा-अकरा वाजता पोहोचलो, तेव्हा तिथे दोनच माणसं होती. वृत्तसंपादक रामदास नेहुलकर मुलाखत घेणार होते. त्यांनी प्राथमिक चौकशी केली. कुठपर्यंत पाण्यात आहे, ह्याची चाचपणी केली. मग एक बातमी अनुवादासाठी आणि एक संपादनासाठी दिली.

लिहिण्यासाठी मोकळ्या टेबलाजवळ गेलो. तिथं बसलेल्या मध्यमवयीन गृहस्थाने अतिशय ऋजूपणे स्वत:ची ओळख करून दिली. “नमस्कार. मी श्रीपाद मिरीकर. इथला मुख्य वार्ताहर. मुलाखतीसाठी आलात ना? वा, वा. शुभेच्छा!”

वृत्तपत्रांतील प्रस्थापित नवोदितांशी कसं वागतात, ह्याचा अनुभव यायचा होता. तरीही ही आपुलकी वेगळी वाटली, एवढं खरं.

संपादन करण्यासाठी योगायोगानं मला मुख्य वार्ताहराचीच बातमी देण्यात आली होती. तेव्हाचे उपनगराध्यक्ष कृष्णा जाधव ह्यांची बातमी होती ती. ‘अर्धवट राहिलेली कामे पालिका आधी पूर्ण करणार’ असं दोन कॉलमी दोन ओळींचं शीर्षक दिलं होतं. तो अंकही बहुतेक संग्रहात आहे.

संपादित केलेली बातमी (दुसऱ्या दिवशीच्या) ‘केसरी’च्या अंकात प्रसिद्ध झाली, तर निवड नक्की, असं आत्येभावाशी बोललो होतो. अगदी तसंच झालं. दुसऱ्या दिवशी ती बातमी ठळकपणे होती.

यथावकाश दीड महिन्याने, १ फेब्रुवारी रोजी मी ‘केसरी’त, लोकमान्यांच्या ‘केसरी’मध्ये रुजू झालो. पहिला दिवस भांबावलेला. चाचपडण्यातच पाच-सहा तास गेल्यावर संध्याकाळी चहा पिण्यासाठी गेलो. मी, उपसंपादक शरद फटांगरे आणि मिरीकर. माझ्या जवळ एक-एक रुपयाच्या नोटा होत्या.

चहा पिऊन झाल्यावर पैसे देऊ लागलो, तर मिरीकरांनी दटावलं. “सतीश, आजच आला आहेस. आता महिनाभर तू अजिबात पैसे द्यायचे नाहीत. पहिला पगार झाल्यावर वाटलं तर चहा पाज आम्हाला,” वडीलधाऱ्याच्या अधिकारानं त्यांनी सांगितलं. नवख्याला कसं संभाळून घ्यायचं असतं, हे त्यांनी दाखवून दिलं सहजपणे.

एव्हाना सगळे म्हणतात, तसं मीही त्यांना ‘अण्णा’ म्हणू लागलो होतो. पण आम्ही फार काळ सहकारी राहणार नव्हतो. फेब्रुवारी संपता संपता त्यांनी ‘केसरी’तील नोकरीचा राजीनामा दिला. नोकरी का सोडतोय, हेही त्यांनी हळुवार आवाजात सांगितलं. जेमतेम महिनाभराची ओळख असतानाही त्यांनी विश्वासानं मन मोकळं केलं होतं माझ्याकडे. तेव्हाच जाणवलं की, अण्णा (नको एवढे) सज्जन आहेत.

काही महिन्यानंतर अण्णा ‘सकाळ’मध्ये रुजू झाले. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा नगरमध्ये झाली. कोणत्याही राज्य स्पर्धेचं वार्तांकन करण्याची माझी पहिलीच वेळ. उत्साहानं बागडत होतो. भरपूर लिहीत होतो. रोज किमान तीन बातम्या.

महाराष्ट्र केसरीसारखी मानाची स्पर्धा. ‘सकाळ’मध्ये रोज हरिश्चंद्र बिराजदार ह्यांचा ‘एक्सपर्ट कॉलम’ प्रसिद्ध होई. आखाड्यातच बिराजदार बोलत आणि ते काय म्हणतात, तो शब्द न् शब्द अण्णा टिपून घेत. कार्यालयात जाऊन पक्कं लिखाण करीत. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी ते दोघं बोलत असताना मी तिथं पोहोचलो. “सतीश, तूही घे की हे मुद्दे. छान होईल तुझ्या बातमीसाठी,” अण्णा म्हणाले! कसं कोण जाणे, पण बिराजदार सांगत आहेत, ते खास आहे आणि आपल्यासाठी नाही, हे मला कळलं.

त्याही वेळी लक्षात राहिला तो अण्णांचा भाबडेपणा. वर्तमानपत्रांमध्ये स्पर्धा वगैरे असते आणि पुण्याच्या क्रीडा प्रतिनिधीनं आपल्या दैनिकासाठी म्हणून केलेली ही खास व्यवस्था आहे, हे काही त्यांच्या गावीही नव्हतं. व्यवसायबंधूला होता होईल ती मदत करावी, हा उदात्त हेतू!

नंतरही अण्णांच्या नियमित भेटी होत. ते चौकशी करीत. काही सांगत. आपण लिहिलेलं काही वाचण्यात आलं असेल, तर स्वभावधर्मानुसार कौतुक करीत. नेहमीच्याच हळुवारपणे. काही विनोद झाला की, त्यांच्या शैलीत हसत टाळी देत.

पद्मभूषण देशपांडे ‘केसरी’तला सहकारी. वार्ताहर म्हणून रुजू झाल्यावर त्याला कानमंत्र देताना अण्णा म्हणाले होते, ‘हे बघ, पत्रकारितेत आपल्यापेक्षा कुणाला लहान नाही हं समजायचं.’ हे सांगून पद्मभूषण मिश्किलपणे म्हणाला होता, “आपलं तत्त्व अण्णांना माहीत नाही - आपल्यापेक्षा कुणी मोठा नाही नि आपण कुणाहून लहान नाही!”

नगर, इथली माणसं ह्याबद्दल अण्णांना भरपूर माहिती होती. त्यांचं ह्या सगळ्या गोष्टींवर मनस्वी प्रेम होतं. काहीसं पसरट, पण भरपूर माहिती देणारं लिहीत ते. खऱ्या अर्थानं ते शहर वार्ताहर किंवा ‘सिटी रिपोर्टर’ होते. शहराबद्दल, माणसांबद्दल, इतिहासाबद्दल विलक्षण आस्था, जिव्हाळा होता त्यांना.

माध्यमातील व्यवस्थेला, ती राबवणाऱ्यांना अण्णा कधीच समजले नाहीत. इथं त्यांचा सज्जनपणा दुर्गुण ठरलेला दिसला. ह्या व्यवस्थेनं त्यांच्या पदरी पुरेपूर माप टाकलं नाही, हे खरं.

ऋजू स्वभावी, नवोदितांशी आपुलकीनं वागणाऱ्या अण्णांना श्रद्धांजली!

#नगर #पत्रकारिता #श्रीपाद_मिरीकर #अण्णा_मिरीकर #सिटी_रिपोर्टर #केसरी

Saturday, 25 March 2023

नंतर आणि आधी... पुरती बरबादी

 


(छायाचित्र सौजन्य - www.livehindustan.com )

थोडी पार्श्वभूमी...

गोष्ट दहा वर्षांपूर्वीची आहे. न्यायालयीन निकालाची आहे. कायदेमंडळाची आहे. लोकप्रतिनिधींची आहे. त्यांना न्यायालयाच्या निर्णयापासून संरक्षण देणाऱ्या अध्यादेशाची आहे.

...आणि गोष्ट राहुल गांधी ह्यांची आहे. लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षांची.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता - खासदार वा आमदाराला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा झाली, तर त्याचे (संसदेचे/विधीमंडळाचे) सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द होईल आणि पुढची निवडणूकही लढवता येणार नाही.

त्या वेळी केंद्रात सरकार होते संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आणि पंतप्रधान होते डॉ. मनमोहन सिंग. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयापासून लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार सरसावले. तसा अध्यादेश सरकारने काढला. आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या लालूप्रसाद यादव ह्यांच्यासाठी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. आजचा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व डावे पक्ष ह्यांनी तेव्हा अध्यादेशाला विरोध केला होता.

वाढता विरोध पाहून काँग्रेसने ह्या अध्यादेशाबाबत बाजू मांडण्यासाठी पत्रपरिषद आयोजित केली होती. अजय माकन पक्षाची बाजू तावाने मांडत होते. ते बोलत असतानाच राहुल गांधी तेथे आले. हा अध्यादेश म्हणजे ‘निव्वळ मूर्खपणा’ आहे, अशी शेलकी टिप्पणी करीत, त्यांनी पत्रपरिषदेत तो टराटरा फाडला!

त्या फा़डलेल्या अध्यादेशाच्या कपट्यांमध्ये वेगळ्याच भविष्याची पाने काळाने लिहिली होती. ते भविष्य कुणाला वाचता आलं होतं तेव्हा?

ह्या घटनेनंतर ‘पद्यासारखं वाटणारं गद्य’ लिहिलं होतं. घटना दोन असल्यामुळं दोन भाग. उत्तरार्ध आणि पूर्वार्ध नंतर! तेव्हा लिहिलेलं आज साडेनऊ वर्षांनंतरही ताजं वाटतं की नाही, हे वाचणाऱ्यांनी ठरवायचं...

..............................................


(सौजन्य - ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंजूल)


 

(उशिराचं शहाणपण)

 
झोपेतून उठलं लेकरू
बोलायलं की चुरूचुरू
आजोबा लागले कुरकुरू
 
सोनियाचा दिवस गडे
ऐकून त्यांचे बोल खडे
कानाला का बसले दडे?
 
टाका फाडून, द्या फेकून
अध्यादेश तो द्या टाकून
सांगतोय मीच, घ्या ऐकून
 
पक्ष आमचा, आम्हीच सरकार
आमचा आदेश आम्हीच बेजार
कसा करावा मतांचा बाजार?
 
केलात निव्वळ मूर्खपणा
कधी येणार शहाणपणा?
आता चूप! मम म्हणा!!
 
ओशाळवाणे केवढे माकन
कबुली देते झाले पटकन,
पार्टीने नही खायो माखन!
 
सत्तेत आम्ही पाय पसरू
जबाबदारीचं तेवढं विसरू
लक्षात आहे ना गाय-वासरू?
.
.
.

(...आणि आधीचं मूर्खपण)

 
काय होई काळ्या दगडा?
न्यायाचा पडता हातोडा
त्याच्याच उडती ठिकऱ्या
छिन्न-भिन्न।
 
सह्याजीरावांचा फटकारा
निकालाचा क्षणात कचरा
सुटला मुक्तीचा सुस्कारा
हाश्श-हुश्श सारे।
 
अपात्रतेची होती तलवार
तियेची केली बोथट धार
अहो! असे विशेषाधिकार
हा माननीयांचा।
 
खंडणी, खून, बलात्कार
चारा किंवा गैरव्यवहार
जनतेला करा बेजार
शुभ्रढवळे तरी तुम्ही।
 
‘बागी’ असो वा ‘दागी’
‘केशरिया’ किंवा ‘खादी’
व्यवस्था इथली सांगी
सुरक्षित तुम्ही।
 
चरा आणि राहा चरत
नवीन गुन्हे राहा करत
निवडून या परत परत
सिद्ध आम्ही स्वागता।
 
किल्ल्या जामदारखान्याच्या
कायमच्याच हाती चोरांच्या
व्यथा घालू कानी कोणाच्या
ना दाद, ना फिर्याद।
 
कोल्ह्यां-लांडग्यां अभय
वनराजा बनो निर्भय
काननी असाच न्याय
मिळणार सदा।
 
अभयारण्य असे आगळे
भय जयांचे, तेच मोकळे
कसे ओरडावे न कळे
मौनची परवडे।
.
.
.
आता एकची सांगणे
लई नाही हो मागणे
आम्हां पामरां अडकवणे
सुरक्षित गजाआड।
............................
- गोत्यातून पोत्यात आलेला ‘आम आदमी’ 

......................

(`गुन्हेगार नेता, भूषण भारता` हे जणू ब्रीद असल्याप्रमाणेच केंद्र सरकारने अध्यादेश काढण्याचे ठरविले. युवराज धो-धो बरसले आणि त्यात अध्यादेशाच्या कागदी होड्या वाहून गेल्या.)

लेखन - अनुक्रमे २८ व २६/सप्टेंबर/२०१३
......................

#राहुल_गांधी #अध्यादेश #केंद्र_सरकार #मनमोहनसिंग #आमदार_खासदार #सर्वोच्च_न्यायालय #फाडलेला_अध्यादेश

Monday, 6 March 2023

मित्रत्व बहाल करणारा गुरू

 

अमृतमहोत्सवानिमित्त नाशिकमध्ये मानपत्र देऊन सत्कार. प्रवीण ठिपसे,
विनायकदादा पाटील, वि. वि. क. आणि शांताराम जाधव.
मंदार देशमुख ह्यांनी आयोजित केलेला देखणा, अविस्मरणीय सोहळा.

‘वि. वि. करमरकर यांचं वेगळेपण कशात?
भाषेत? अभ्यासात? तपशिलात? शैलीत?
या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर अगदी थोडक्यात देता येईल - ‘सगळ्याच बाबतीत.’
त्यांची भाषा वेगळी असे; पण सर्वसामान्यांना समजणारी.
लेखात-बातमीत त्यांनी केलेला अभ्यास दिसे; पण तो दडपून टाकणारा नसे.
आवश्यक तेवढा तपशील ते देत; त्यांच्या लेखनाची शैली, धाटणी वेगळी होती. पण तो केवळ शब्दांचा फुलोरा नसे. या साऱ्याचा अनोखा, गुंगवून टाकणारा संगम म्हणजे वि. वि. क.’

- साधारण चौदा वर्षांपूर्वी वि. वि. करमरकर, अर्थात सर्वसामान्य क्रीडाप्रेमी वाचकांचे वि. वि. क. ह्यांचं व्यक्तिचित्र रंगवताना हे लिहिलं होतं. ‘शब्दसंवाद’ पुस्तकाची ओळख करून देताना ह. मो. मराठे ह्यांनी ते नेमकं उचलून धरलं होतं.

हे लिहिलं तेव्हा वि. वि. क. ह्यांच्याशी ओळख नव्हती. म्हणजे दुहेरी नव्हती. पुण्याच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दहा दिवस त्यांच्याशी नियमित बोलणं झालं होतं खरं; म्हणून ते मला ओळखत असतील, असं काही वाटत नव्हतं. त्यामुळे त्या लेखात सगळं काही त्यांच्यातील पत्रकाराबद्दल होतं; माणसाबद्दल नव्हतं.
.....

माहितीच्या महाजालात मिळणारं
 वि. वि. क. ह्यांचं चांगलं म्हणावं,
असं एकमेव छायाचित्र.
सौजन्य - दैनिक प्रहार
शाळकरी वयात वाचत होतो, तेव्हा वि. वि. क. ह्यांच्याशी कधी ओळख होईल, असं स्वप्नही पाहिलं नव्हतं. त्यांनी लिहायचं आणि आपण वाचून खूश व्हायचं. त्या काळात ‘महाराष्ट्र टाइम्स’ अग्रलेख व संपादकीय पानासाठी वाचला जाई म्हणे. ‘डाक एडिशन’चीही वाट पाहिली जाई. माझ्यासारखे असे असंख्य वाचक असतील की, जे ‘म. टा.’ची वाट पाहायचे क्रीडा पानासाठी. त्यावर वि. वि. क. आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काय लिहिलंय, ते वाचण्यासाठी.

पत्रकारितेत आल्यावर वाटत होतं की, कधी तरी योग येईल आणि आपली त्यांच्याशी भेट होईलही. मराठी क्रीडा पत्रकारांची संघटना स्थापन झाल्यावर वाटलं की, हा योग आता नक्कीच आहे. पण त्या संघटनेपासून ते लांबच राहिले. हुलकावणी. पुण्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ती संधी मिळाली. त्यांना पाहता आलं, बोलता आलं, त्यांनी हातात हात घेतला, खांद्यावर हात टाकला, एकेरी, अगदी पहिल्या नावानं हाक मारली... ह्या सगळ्याचं केवढं तरी अप्रुप. सत्तर एम. एम.च्या विशाल पडद्यावरून उतरून नायक थेट तुम्हाला भेटतो, तेवढंच!
.....
मध्ये मग खूप वर्षं गेली. ते लिहीत होते. आम्ही वाचत होतो. कळत-नकळत बातम्या लिहिताना त्यांचं अनुकरण करत होतो. शैलीचंच. पण अंधळेपणानं नव्हे. झेपेल तेवढं, आपल्याला कळलेलं असेल तितकंच. नगरचे नगराध्यक्ष शंकरराव घुले होते. ‘अण्णा’ म्हणायचे सगळे त्यांना. माझ्या क्रीडा बातमीदारीचं त्यांना कौतुक वाटे. कुणाशीही ओळख करून देताना ते म्हणायचे, ‘मुंबईला ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वि. वि. करमरकर आहेत ना, तसे हे आपल्या नगरचे!’ हौशी क्रीडा पत्रकार म्हणून दीर्घ काळ काम केल्यावर कोणते पुरस्कार मिळाले नाहीत; पण अशी प्रशस्तिपत्रं भरपूर मिळाली!

वि. वि. क. ह्यांच्याशी नंतर भेट किंवा बोलणं होण्याचं काहीच कारण नव्हतं. तो योग १५ वर्षांनी आला. त्यांचं कारण वर सांगितलेलं व्यक्तिचित्र. त्याबद्दल त्यांचा फोन आला. ‘अरे सतीश...’ असं म्हणत. जणू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच आम्ही भेटत होतो.
.....
बहुतेक २०११चं वर्ष असावं. बारामतीत राष्ट्रीय खो-खो स्पर्धा होती. ती संपवून मंदार देशमुख नगरमार्गे नाशिकला जाणार होता. तिथं त्याच्या सोबत वि. वि. क.ही होते. निर्मल थोरात, मी आग्रह केला - त्यांनाही सोबत घेऊन ये. रात्री गप्पा मारू, जेवू. आम्ही त्यांना सकाळी मुंबईच्या बसमध्ये बसवून देतो. त्या रात्री वि. वि. क. भेटले, बोलले. आमच्यातील दीर्घ काळाच्या संवादाची ती नांदी होती.

रात्री हॉटेलवर सोडताना त्यांना सकाळी नाश्त्याला काय आणू, असं विचारलं. वि. वि. क. म्हणाले होते, ‘मला उपिट आवडतं. बघ जमलं तर.’ दुसऱ्या दिवशी सकाळीच सुधीर चपळगावकर आणि मी हॉटेलात गेलो. त्यांना घेऊन जवळच्या स्टँडवर आलो. बस आली. सुधीरनं त्यांचं तिकीट काढलं. तो नको म्हणत असतानाही त्यांनी तिकिटाचे पैसे लगेच दिले. आग्रहानं. तिकिटाच्या रकमेपेक्षा पाच रुपये जास्त होते. तोवर आमची घट्ट ओळख झालेली नव्हती. त्यांचं एकूण (हिशेबी?) वागणं बघून मग मीही जवळचे पाच रुपये त्यांना परत केले. ‘थँक्यू’ म्हणत त्यांनी ते नाणं खिशात टाकलं.

मुंबईला पोहोचल्याचं सांगायला वि. वि. क. ह्यांचा फोन. काहीसं औपचारिक वाटेल असा आभाराचा फोन. बोलणं संपवण्याच्या आधी म्हणाले, ‘आणि हो, उपिट छान होतं रे. वहिनींना माझा नमस्कार सांग.’ मग हे उपिट पुढची सात-आठ वर्षं त्यांच्या बोलण्यातून नेहमी येत राहिलं. ‘वहिनींना नमस्कार सांग. त्यांनी केलेलं उपिट छानच होतं.’ वाटीभर उपिट आणि ढीगभर आभार! गोड शब्दांत. तशीच आठवण निघायची ती पुढे निर्मल थोरातच्या घरी खाल्लेल्या पिठलं-भाकरीची.
.....
आता आम्ही नियमित फोनवर बोलू लागलो होतो. दरम्यान ‘मैदान बचाव’ मोहिमेची व्याप्ती नगरपर्यंत वाढविण्याचं त्यांनी ठरवलं. ‘महाराष्ट्र क्रीडा विकास संस्था’ हा एक त्यांचा उपक्रम होता. ती संस्था आणि स्थानिक क्रीडा मंडळ ह्यांनी जिल्हा पातळीवर चार-पाच खेळांची स्पर्धा वर्षातून एकदा घ्यावी. खेळाडूंना स्थानिक पातळीवर खेळायला मिळावं, असा उद्देश. महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थेची शाखा नगरलाही सुरू करायची होती. त्यांनी आग्रह धरला म्हणून एकलव्य क्रीडा मंडळातर्फे दोन दिवसांची खो-खो व व्हॉली़बॉल स्पर्धा आयोजित केली. त्यासाठी वि. वि. क. आणि त्यांचे घट्ट मित्र भास्कर सावंत नगरला आले होते. रत्नागिरीनंतर नगरलाच असे सामने होत होते. राज्य खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष अशोक पितळे ह्यांनी त्यांच्या सन्मानार्थ छान जेवण आयोजित केलं. तिथं आलेल्या सगळ्यांशी वि. वि. क. मनमोकळेपणानं बोलले. सगळ्यांची ओळख करून घेतली. त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या माणसाचं नाव आणि फोन नंबर टिपून घेतला. त्याच दौऱ्यात आम्ही त्यांना बाळू चंगेडे ह्याची नगरमधली ‘जगप्रसिद्ध मिसळ’ खायला भर दुपारी घेऊन गेलो होतो. मूळचे नाशिककर असलेल्या वि. वि. क. ह्यांना ती नगरी मिसळही आवडली. पण उपिट किंवा पिठलं-भाकरीप्रमाणे त्या मिसळीची त्यांनी नंतर कधी आठवण काढली नाही, हेही खरं.

ती स्पर्धा एकाच अध्यायावर थांबली. वि. वि. क. पुढची दोन-तीन वर्षं त्याबद्दल चौकशी करीत होते. कधी तरी त्यांच्या लक्षात आलं की, आता हे होणार नाही. मगच ते थांबले. अन्यथा पिच्छा पुरविण्याबाबत त्यांना तोड नव्हती. निर्मलनगरच्या एकलव्य क्रीडा मंडळात आता किती खेळाडू आहेत, अशी चौकशी ते अधूनमधून करीत. निर्मलनं काय केलं पाहिजे, हेही सांगत.

का कुणास ठाऊक, पण निर्मल थोरातचा नंबर त्यांच्याकडून सेव्ह झाला नाही. कधी आठवण आली किंवा माझ्याशी बोलणं झाल्यावर म्हणत, ‘अरे, मला तेवढा निर्मलचा नंबर पाठवतोस? बोलतो एकदा त्याच्याशी.’
‘तुम्हाला मागच्याच वेळी दिला की त्याचा नंबर,’ अशी आठवण करून दिल्यावर ते म्हणत, ‘सेव्ह नाही झाला तो बहुतेक. जाऊ दे. आता एवढ्या वेळी दे. मी नक्की सेव्ह करतो.’ पुन्हा हा नंबर लगेच तोंडी सांगून उपयोग नसे. कारण हाताशी कागद-पेन असेलच, असं काही नाही. एस. एम. एस.च पाठवणं अनिवार्य असायचं. असं आठ-दहा वेळा झाल्यावर एकदा त्यांना एस. एम. एस.मध्ये निर्मलच्या आधी माझं नाव लिहून नंबरही दिला. त्यांचा लगेच फोन, ‘तुझा कशाला नंबर पाठवलास? तो आहे ना माझ्याकडे.’
‘कधी तरी माझाही नंबर विसराल आणि मलाच मागाल. त्या पेक्षा आधीच देऊन ठेवलेला बरा!’ हे उत्तर ऐकल्यावर खळखळून हसले होते.

एकदा त्यांना कुरिअरनं काही तरी पाठवायचं होतं, लेख किंवा कातरण. त्यांचा ‘३२, मोघे भवन, दादर’ हा पत्ता वहीत लिहिलेला होता. सहज विचारलं की, दादरच्या पत्त्यावरच पाठवायचं ना, तो मोघे भवन वगैरे... ते लगेच म्हणाले, ‘किती वेंधळायेस रे तू. मागच्याच आठवड्यात तुला पत्ता सांगितला ना. घोळ घालू नकोस. घे पुन्हा लिहून.’ मी वहीत पत्ता आहे, असं सांगेपर्यंत त्यांनी पुन्हा तो सांगितला आणि माझ्याकडून वदवून घेतला.
....
असाच कधी तरी सकाळी वि. वि. क. ह्यांचा फोन येई. ‘बाळ बोलतोय... बाळ करमरकर. कसायेस?’ खरं तर त्यांचं ‘बाळ’ किंवा ‘बाळासाहेब’ हे नाव आतल्या वर्तुळातलं, असा समज. कदाचित त्यांना ते आवडत असावं किंवा त्या वर्तुळात त्यांनी मलाही सामावून घेतलं असावं.

एखादं मिनिट हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर वि. वि. क. लगेच मुद्द्यावर येत. एकामागून एक प्रश्न असत - ‘तुझ्याकडे ‘लोकसत्ता’ येतो? आजचा अंक आलाय? तू पाहिलास? माझा लेख आलाय का त्यात? वाचलास का नाही? वाचून तुझी प्रतिक्रिया कळव...’ तो लेख वाचून दिवसभरात त्यांना कळवावं लागे. नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन ठरलेलाच. एखादा मुद्दा कळला नाही किंवा पटला नाही, असं सांगितलं तर तसं नेमकं का वाटतं, हे त्यांना स्पष्ट करून सांगावंच लागे.

मधलं वर्षभर, २०१५ किंवा २०१६मध्ये औरंगाबादच्या ‘दिव्य मराठी’मध्ये वि. वि. क. सदर लिहीत होते. त्याचा अंक मात्र त्यांना सहज मिळत नसे. मग पुन्हा तसाच फोन करून माझ्याकडे ‘दिव्य मराठी’चा अंक येतो की नाही, ह्याची चौकशी होई. मग तो अंक कुरिअरने पाठव, असं ते सांगत.

‘दिव्य मराठी’मधलं ते सदर खास वि. वि. क. शैलीचंच होतं. दोन ओळींमध्ये न लिहिलेलं काही असे. एकदा असंच वाटलं की, ज्या भागात हा अंक जातो, तिथल्या वाचकांना हे लेखन कितपत पचत असेल? त्या पेक्षा वि. वि. क. ह्यांनी जुनी शैली थोडी बदलून आणि थोडं अजून सोपं करून लिहावं. त्या दिवशी नेमका त्यांचा फोन आला आणि हे (चुकून) सांगून टाकलं. ते म्हणाले, ‘‘म्हणजे नेमकं कसं करायला पाहिजे म्हणतोस? असं कर, तो लेख तुला वाटतो तसा लिहून, संपादित करून मला पाठव.’’ हे भलतंच झालं, असं समजून टाळाटाळ करू लागलो. ‘‘काय हे... मित्रासाठी एवढं करणार नाहीस का तू?’’ मधाळ आवाजात त्यांनी विचारलं. पण ते धर्मसंकट टाळलंच मी. त्यांच्या लेखाचं संपादन किंवा त्यांची शैली सोपी(?) करायची हिंमत झाली नाही!

‘तुम्ही आत्मचरित्र लिहायलाच पाहिजे!’ दर दोन-चार फोननंतर वि. वि. क. ह्यांना मी म्हणत होतो. असंच एकदा त्यांनी विचारलं, ‘‘आत्मचरित्रात काय काय लिहावं म्हणतोस?’’ सांगू लागलो. माझी दोन-चार वाक्यं होतात न होतात, तोच थांबवून म्हणाले, ‘‘हे तुझे सगळे मुद्दे मला लिहून पाठवशील प्लीज? कुरियर कर. पत्ता आहे ना माझा? पाठवच.’’ त्यांच्या आत्मकथेत काय वाचायला आवडेल, ह्याचा विचार करून एका रात्री बैठक मारून दहा-बारा मुद्दे काढले. दुर्दैव असं की, दुसऱ्याच दिवशी संगणकाची तोळा-मासा असलेली तब्येत ढासळली. डेस्क-टॉपवरची ती फाईल अर्थातच उडाली. चार दिवसांनी त्यांचा पुन्हा फोन आला. नेमकं काय घडलं नि कसं बिघडलं, हे सांगण्याची हिंमत नव्हती. दोन दिवसांनी त्यांना मोठा एस. एम. एस. करून परिस्थिती कशी आहे, हे कळवलं आणि मगच त्यांनी माझा नाद सोडला.
....
पण वि. वि. क. असा एखाद्या गोष्टीचा सहजी नाद सोडत नसत; समाधान होईपर्यंत पिच्छा पुरवत. ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर महाराष्ट्राची कबड्डी लीग झाली तेव्हाची गोष्ट. मित्र विजय सेठी ह्यानं नगरचा संघ घेतला होता. स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी वि. वि. क. ह्यांनी यावं, त्यांच्याकडून काही ऐकावं असं त्याला वाटलं. त्यांना आमंत्रण देण्याची, त्यांच्या सोबत राहण्याची, त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी माझी. ठरल्यानुसार वि. वि. क. आले. सोबत भास्कर सावंत होते. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी विजयशी त्यांनी अर्धा तास गप्पा मारल्या. संघाच्या मालकीचं आर्थिक गणित समजून घेतलं.

स्पर्धा काही त्या अर्थाने यशस्वी झाली नव्हती. गाजलीही नाही. नेमकं काय चुकलं, कुठं चुकलं हे वि. वि. क. ह्यांना जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी ते विजय सेठीशी वारंवार संपर्क साधत. विजय अनेक कामात गुंतलेला. दोन महिन्यांनंतर तो कबड्डी लीगच्या व्यापातून मनोमन दूर झाला. वि. वि. क. काही पिच्छा सोडत नव्हते. अखेर त्यांना एकदा सांगितलं, ‘‘विजयच्या मागे खूप व्याप आहेत. त्याच्या दृष्टीनं हा अध्याय संपलेला आहे.’’ त्यांनी ते मनाविरुद्धच मान्य केलं.

त्याच वेळची एक गंमत. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी त्यांना टॅक्सीच्या भाड्याएवढी रक्कम दिली होती. पण लगेच शिवनेरी बस मिळाली आणि त्यानंच ते गेले. टॅक्सीपेक्षा कमी भाडं लागलं. उरलेल्या पैशाचं काय करायचं?

वि. वि. क. ह्यांचा दोन दिवसांनी फोन. ‘तू टॅक्सीसाठी दिलेल्या पैशातले एवढे एवढे शिल्लक राहिलेत. ते कसे पाठवू तुला?’
सांगितलं की, ते पैसे विजयने दिलेले आहेत. त्याचा पत्ता देतो. त्यालाच पाठवून द्या. त्यांच्याकडून नकार. ‘मला तू पैसे दिले होतेस. तुलाच मी परत करायला हवेत. त्याचं काय करायचं ते तू कर.’

राज्य खो-खो संघटनेचे खजिनदार तुषार सुर्वे एका स्पर्धेनिमित्त शेवगावला येणार होते. त्यांच्याकडे वि. वि. क. ह्यांनी माझा नंबर, ते पैसे, माझ्यासाठी चिठ्ठी दिली. ते तीन दिवस रोज फोन. तुषार सुर्वे ह्यांनी आमच्या शेवगावच्या बातमीदारामार्फत पैसे पाठविले. ते हातात पडताक्षणी फोन करून सांगितलं ‘पैसे आताच मिळाले!’ ते ऐकल्यावर ते स्वस्थ झाले. महाराज गडावर पोहोचले, असं कळाल्यावर वीर बाजीप्रभू आश्वस्त झाले, अगदी तसं.
....

नाशिकमध्ये सत्कार. लाखाचा चेक देऊन!

वि. वि. क. ह्यांचा वाढदिवस ११ ऑगस्ट. वयाचं पाऊण शतक त्यांनी २०१३मध्ये पूर्ण केलं. अमृतमहोत्सवाचा हा मुहूर्त साधून नाशिकच्या मंदार देशमुख ह्यानं जोरदार कार्यक्रम आयोजित केला. ‘मिळून सारे’तर्फे. सायखेडकर नाट्यगृहात. वि. वि. क. ह्यांची ग्रंथतुला, त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश, सत्कार आणि मग सगळ्यांसाठी मस्त जेवण. वनाधिपती विनायकदादा पाटील, भारताचे पहिले ग्रँडमास्टर आणि अर्जुन पारितोषिक विजेता बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे, अर्जुन पारितोषिक विजेता कबड्डीपटू शांताराम जाधव, हे प्रमुख पाहुणे. वि. वि. क. ह्यांची तासभर मुलाखत. विनायकदादांचं खुसखुशीत भाषण. कार्यक्रम फारच अफलातून झाला. मंदारच्या नियोजनाला अगदी साजेसा. तोळाभर उणा नाही. कर्मभूमीनं दखल घेतली नसली, तर जन्मभूमीत सत्कार होतो आहे, ह्यामुळं वि. वि. क. अगदी मनापासून खूश दिसले. तसाही मंदार त्यांचा लाडकाच. वि. वि. क. ह्यांच्यावरील प्रेमापोटी ‘बेळगाव तरुण भारत’चे क्रीडा प्रतिनिधी विवेक कुलकर्णी बेळगावहून नाशिकला आले होते.

कार्यक्रम संपला. जेवण संपवून आम्ही नगरला निघालो. निरोप घ्यावा म्हणून गेलो, तेव्हा वि. वि. क. जेवत होते. त्यांनी गप्पा सुरू केल्या. त्यांच्या शेजारी चंद्रशेखर संत होते. ‘अहो, नंतर बोला. त्यांना आधी जेवू द्या नीट,’ असं ते म्हणाले. आम्ही निघालो.
दोनच दिवसांनी वि. वि. क. ह्यांचा फोन. ‘‘संत तुला बोलले, म्हणून रागावलास का? अरे, मी त्यांना म्हणालो, ही मंडळी आपल्यावरील प्रेमापोटी नगरहून गाडी करून इथं आली. आता रात्री-अपरात्री ते पोहोचतील. असं बोलायचं नव्हतं. चल जाऊ दे... त्यांच्या वतीनं मी तुझी क्षमा मागतो!’’ केवढी ही दिलदारी, मनाचा मोकळेपणा!!
....
पुण्यात मल्लखांबाविषयी काही परिषद किंवा कार्यशाळा होती. नगरचा प्रशांत मोहोळे तिथं होता. परिषद संपल्यावर वि. वि. क. रिक्षाची वाट पाहत असलेले त्याला दिसले. त्यांना मोटारीतून सोडायची तयारी प्रशांतनं दर्शविली. तो नगरचा असं समजताच त्यांनी विचारलं, ‘सतीश कुलकर्णी, निर्मल थोरात  ह्यांना ओळखता?’ त्यानं लगेच फोन लावल आणि म्हणाला, ‘सतीशराव, बोला तुमच्या गुरूंशी.’

पुढच्या फोन वेळी वि. वि. क. म्हणाले, ‘‘अरे ते मला तुझा गुरू म्हणाले. पण माझ्या काही तसं मनात नव्हतं.’’
‘‘अहो पण तुम्ही आहातच आमचे गुरू. आता आम्हाला शिष्य मानायचं की नाही, हे तुम्ही ठरवायचं,’’ असं म्हणाल्यावर ते मनापासून हसले.
....
वि. वि. क. पुण्यात आले मध्यंतरी. तिथं दीर्घ काळ राहिले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये बातमी वाचण्यात आली. पारनेर तालुक्यातील एका छोट्या गावातील दोन-तीन मुलींनी बांबू उडीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ती वाचून त्यांनी संपर्क साधला. ‘तू त्यांच्या प्रशिक्षकाशी बोल. त्यांना कोणत्या साहित्याची गरज आहे आणि त्याला साधारण किती पैसे लागतील विचार. आपण मिळवून देऊ त्यांना मदत.’ दुर्दैवाने त्या प्रशिक्षकाला वि. वि. क. ह्या नावाचं महत्त्व कळलं नाही आणि नेमकी काय गरज आहे, हे त्याला सांगता आलं नाही. आम्ही दोघांनीही नाद सोडला.

आग्रही होते, ठाम होते, पण समोरच्याचं ऐकून घेण्याची त्यांची नेहमीच तयारी होती. आणि पटलं की मान्य करण्याची. प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू प्रेमचंद ‘डोगरा’ ह्यांच्याबद्दल एकदा बोलत होतो. त्यांची मुलाखत मी घेतल्याचं सांगितलं.
‘कोण म्हणालास?’
‘प्रेमचंद डोगरा.’
‘कोण?’
पुन्हा तेच उत्तर.
‘अरे डोगरा नाही, डेगरा, डेगरा! लक्षात ठेव आता.’

‘रवींद्र जडेजा आपण लिहितो, पण ते खरं जाडेजा असं आडनाव आहे,’ असं एकदा बोलता बोलता म्हणालो मी त्यांना. ‘हो का. मी तपासून इथून पुढे तसंच लिहितो.’
....
मागच्या क्रिकेट विश्वचषकातील अंतिम लढत चुरशीची झाली. इंग्लंड जिंकलं आणि स्पर्धेचा मानकरी म्हणून न्यू झीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ह्याची निवड झाली. सहानुभूती. खरं तर बेन स्टोक्स हाच खरा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, असं माझं मत. वि. वि. क. ह्यांच्याशी तसं बोललो. मग त्यांनी स्टोक्सची कामगिरी मागवून घेतली. प्रत्येक फेरीतील विजेत्या संघाला किती रक्कम मिळाली, विजेत्याला किती, उपविजेत्याला किती हाही तपशील मागवला.

वि. वि. क. ह्यांना ह्या बक्षिसाच्या रकमेबद्दल काही लिहायचं होतं. टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा, फुटबॉलमधल्या विविध स्पर्धांमधील बक्षिसांबद्दल त्यांना तपशील हवा होता. ते त्यांनी सांगितलं. रात्री तीन-चार तास बसून ते सगळे आकडे काढले. पण एस. एम. एस.वर एवढा मजकूर जाईना. तुकडे करून पाठवावेत, तर त्यांचा गोंधळ उडणार. वि. वि. क. व्हॉट्सॲप किंवा इ-मेल ह्यापासून लांब. त्यांना कळवलं, व्हॉट्सॲप वापरणाऱ्या तुमच्या जवळच्या कोणाचा नंबर किंवा इ-मेल द्या. त्यांनी एक नंबर कळवला. त्यावर ती सगळी माहिती पाठवून दिली. 
....
आपल्या ओळखीच्यांनी एकमेकांशी सतत संवाद साधत राहावं, एकमेकांच्या संपर्कात राहावं, असा वि. वि. क. ह्यांचा आग्रह. ‘तू ह्याच्याशी बोललास का, त्याला फोन केलास का... अरे कसे रे तुम्ही. मित्रांशी बोललं पाहिजे ना,’ असं त्यांचं म्हणणं असे.

बडोद्याला सुधीर परब सरांशी मस्त गप्पा मारत होतो. अचानक आठवलं. त्यांना विचारलं वि. वि. करमरकरांशी बोलायचं का? फोन लावून म्हणालो, ‘देशी खेळातल्या पहिल्या अर्जुनवीराशी बोलायचं का तुम्हाला?’
‘अरेsss, सुधीर परब. तुला कुठे भेटला तो?’ मग पंधरा-वीस मिनिटं त्यांच्या गप्पा रंगल्या.
....

‘शब्दसंवाद’मधील वि. वि. क. ह्यांच्यावरील लेखासाठी
नांदेडच्या नयन बाराहाते ह्यांनी रेखाटलेलं चित्र.
लॉकडाऊनच्या काळात वि. वि. क. ह्यांच्याशी नियमित संवाद साधत होतो. एकदा तर सलग तीन दिवस तबलिगी ह्या विषयावर ते बोलत होते. अखेर न राहून म्हणालो, ‘‘आपल्या दोघांचं ह्या विषयावर काही एकमत होणार नाही कधीच. हा विषय टाळूयात का आपण इथून पुढे?’’ त्यांनी पुढे कधीच विषय काढला नाही.

लॉकडाऊनची घोषणा झाली, त्या रात्री आम्हीही धावपळ करून किराणा सामान आणलं. ते खटकत होतं. आपलं चुकल्याची भावना होती. ती बोलून दाखविल्यावर वि. वि. क. म्हणाले, ‘‘तशी काही अपराधी भावना अजिबात बाळगू नकोस. तू बरोबरच केलंस. उलट मी तर म्हणीन की, पैसे असतील जवळ तर अजून दोन महिन्यांचं सामान आणून ठेव. हे किती दिवस चालेल, दर किती वाढतील काही सांगता येत नाही.’’ किती छान समजावून घेतलं होतं त्यांनी.
....
अजून खूप आठवणी आहेत. खूप लिहिता येईल. वि. वि. क. ह्यांच्या लेखनाबद्दल इथं काहीच लिहिलं नाही. कारण त्याबद्दल पूर्वीच लेख लिहिला आहे. त्यांच्यातला प्रेमळ, दिलदार, हट्टी, रागावणारा, हक्कानं दोन गोष्टी सांगणारा माणूस ह्या दहा-बारा वर्षांत अनुभवला. केवढं हे भाग्य! ‘शब्दसंवाद’ प्रकाशित झाल्यावर त्यांना प्रत पाठविली. पुस्तक हातात पडताच त्यांचा फोन आला. ‘हे छानच झालं. पण आता पुढचं पुस्तक एखाद्या विषयाचा अभ्यास करून लिही. लिहिशील तू...’

दि. वि. गोखले आणि दिनू रणदिवे ह्या दोन सहकाऱ्यांच्या निधनानंतर त्यांनी भरभरून लिहिलं. रणदिव्यांवरचा लेख वाचल्यावर २० जून २१ रोजी त्यांना मेसेज केला - लेख आवडला. त्यात त्यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाचा ओझरता उल्लेख केला आहे. त्याबद्दल विचारल्यावर म्हणाले, ‘आता ते महत्त्वाचं नाही. त्यावर नंतर बोलीन कधी. तुला सविस्तर सांगतो.’ ते काही झालं नाही.

चार वर्षांपूर्वी त्यांचा वाढदिवस विसरलो. आठवड्यानंतर मेसेज केला. त्याच वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाटलं आणि त्यांना एस. एम. एस. पाठविला - ‘तुम्हाला वाचत मी खूप काही शिकलो. शिष्योत्तम झालो नसेन; पण शिष्य होण्याचा प्रयत्न केला. गुरुपौर्णिमेनिमित्त हे मनोगत!’

तीच भावना आज पुन्हा व्यक्त करावी वाटते. त्यांनी जे काही दिलं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी वाटते. मनापासून, खूप आतून...
.....

(छायाचित्रं नाशिकच्या सचिन निरंतर ह्यांनी काढलेली आणि मंदार देशमुख ह्यांच्या संग्रहातून.)

.....

#विविक #करमरकर #पत्रकारिता #क्रीडा_पत्रकारिता #मराठी_पत्रकारिता #महाराष्ट्र_टाइम्स #मंदार_देखमुख #निर्मल_थोरात  

Monday, 27 February 2023

शुभेच्छा आणि शुभेच्छा!


(कलाकार - ज्ञानेश शिंदे, नगर)

‘मराठी मुमूर्षू झाली आहे’,
ह्या शतकापूर्वीच्या विधानाला
पाठिंबा देणाऱ्यांना शुभेच्छा!

‘मराठीला ह्या जन्मात मरण नाही’,
मनाशी असा ठाम विश्वास
बाळगणाऱ्यांना शुभेच्छा!

मराठी शिकून पैसे कमावणं,
जगणं कठीण आहे, असं
मानणाऱ्यांना शुभेच्छा!

तांत्रिक शब्दांना मराठी
प्रतिशब्द शोधू पाहणाऱ्यांची
टिंगल उडवणाऱ्यांना शुभेच्छा!

मराठीच्या कमी होणाऱ्या
वापराबद्दल इतर भाषांना सदैव
दूषणं देणाऱ्यांना शुभेच्छा!

मराठीबद्दल न्यूनगंड बाळगून
सार्वजनिक जीवनात परभाषा
बोलणाऱ्या मंडळींना शुभेच्छा!

मराठीबद्दल अहंगड कुरवाळत
परभाषांच्या आक्रमणाबद्दल
तलवार उपसणाऱ्यांना शुभेच्छा!

पोरा-नातवंडांना इंग्रजी माध्यमातून
शिकवून मातृभाषेतील शिक्षणाचं
महत्त्व तावानं सांगणाऱ्यांना शुभेच्छा!

मराठीच्या दुरवस्थेचं खापर
इंग्रजी, हिंदी भाषांवर
फोडणाऱ्यांना शुभेच्छा!

दिनाच्या मुहूर्तावर आठवण
येऊन माय-मराठीची
काळजी करणाऱ्यांना शुभेच्छा!

मुहूर्तावर विनोद करण्यासाठी
आंग्लाळलेले परिच्छेद लिहिणाऱ्या
‘विनोदवीरां’ना शुभेच्छा!

एकादशी, संकष्टी, पांढरा बुधवार
ह्याप्रमाणे मराठी गौरव दिनाच्या
शुभेच्छा देणाऱ्यांना शुभेच्छा!

व्हॉट्सॲप, फेसबुकवर
शुभेच्छांचे वेचक संदेश
पुढाळणाऱ्यांना शुभेच्छा!

ज्ञानोबा, तुकोबा, रामदास,
राजवाडे, कुसुमाग्रज आदींना
वेठीस धरणाऱ्यांना शुभेच्छा!

माय मराठीचा उमाळा येऊन
लेख-कवितांचा रतीब टाकणाऱ्या
माझ्यासारख्यांनाही शुभेच्छा!


परप्रांतांतून, परदेशांतून
इथं येऊन प्रेमापोटी
मराठी शिकणाऱ्यांना शुभेच्छा! 

ह्यातलं काहीच माहिती नसताना
रोज मराठी बोलून-वाचून-ऐकून
 भाषा वाढविणाऱ्यांनाच शुभेच्छा!
....
मराठी ‘आम आदमी’


#मराठी #मराठी_भाषा #मातृभाषा #माय_मराठी #मराठी_गौरवदिन #मराठी_राजभाषा 

#शुभेच्छा


Sunday, 29 January 2023

धावा कमी, तरी सामना नामी!


कमी धावसंख्येच्या सामन्यात निर्धाव षट्क एकच.
यजुवेंद्र चहलची फिरकी पाहुण्यांना ‘पॉवर प्ले’मध्ये खेळता आली नाही.

निव्वळ चौकार-षट्कारांची आतषबाजी, अफलातून फटके, उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण आणि प्रामुख्याने धावांचा डोंगर ह्यासाठी टी-20 क्रिकेट सामने ओळखले जातात. षट्कामागे साडेआठ धावांची किमान सरासरी असेल, तर सामना पाहायला आलेल्यांना फटकेबाजीचा आनंद मनमुराद लुटता येतो. ‘पैसा वसूल सामना पाहिल्याचा’ आनंद त्यांना मिळतो!

पण षट्कामागे जेमतेम पाच धावांच्या सरासरीने तब्बल ४० षट्के खेळला गेलेला सामनाही भलताच चुरशीचा होतो, हे आज लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर दिसून आलं. भारत आणि न्यू झीलंड ह्यांच्यातील सामन्यात कशाबशा २०० धावा निघाल्या. पण सामन्याचा निकाल लागण्यासाठी शेवटच्या षट्कातील पाचवा चेंडू टाकण्याची वाट पाहावी लागली.

कमी धावसंख्येच्या ह्या सामन्यातही बऱ्याच गमती घडलेल्या दिसतात. थर्ड मॅनलाही जिथं फलंदाज सहज षट्कार मारतात, यष्टिरक्षकाच्या बरोबर डोक्यावरून गेलेल्या चेंडूचा पहिला टप्पा सीमेबाहेर पडतो, असे टी-20 सामने. पण आज दोन्ही संघांमधल्या एकाही फलंदाजाला षट्कार मारता आला नाही. २३९ चेंडूंमध्ये एकही षट्कार नसावा, हा विक्रमच म्हणावा की काय!

तीच गत चौकारांची. ते किती? तर रामाच्या वनवासाच्या वर्षांएवढे - म्हणजे १४. न्यू झीलंडचे सहा नि भारताचे आठ. फलंदाजांचा स्ट्राईक रेट जेवढा अधिक, तेवढा तो धोकेबाज. दीडशे-पावणेदोनशेच्या स्ट्राईक रेटने खेळणारे फलंदाज इथे दिसतात. ह्या सामन्यात शंभरहून अधिक स्ट्राईक रेट फक्त चार फलंदाजांचा दिसला. न्यू झीलंडचा सलामीवीर फिन ॲलन ह्यानं ११ धावा काढल्या १० चेंडूंमध्ये - स्ट्राईक रेट ११०. डावातील सर्वाधिक म्हणजे दोन चौकार त्याचेच होते. पाहुण्यांकडून सर्वाधिक स्ट्राईक रेट राहिला शेवटच्या क्रमांकावरच्या जेकब डफी ह्याचा - २००. तीन चेंडूंमध्ये सहा धावा!

यजमानांकडून शतकी स्ट्राईक रेट असणारे फलंदाज दोन - सलामीचा शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर. दोघे प्रत्येकी नऊ चेंडू खेळले. गिलने ११ धावा केल्या आणि सुंदरने १०.


'स्काय'साठीही आज लिमिट होतं. सामन्यातील सर्वाधिक धावा त्याच्या.
पण त्याचा एकमेव चौकार सामन्यातल्याच शेवटच्या चेंडूवर!

सूर्यकुमार यादव ह्या नावाला अलीकडच्या काळात एक अद्भुत वलय लाभलेलं आहे. त्याच्यासाठी ‘स्काय’ इज द लिमिट! एबीडी ह्याच्यानंतरचा ‘मि. ३६०’ काय आणि कसा खेळेल हे सांगता येत नाही. आज मात्र त्याच्याही बॅटला किवी गोलंदाजांनी लगाम घातला होता. एकतीस चेंडूंमध्ये २६ धावा ही सूर्यकुमारची खेळी सामन्यातील सर्वाधिक धावांची. ह्या तडाखेबाज फलंदाजाने फक्त एक चौकार मारला. तो सामन्यातील शेवटच्या चेंडूवर आणि विजयावर शिक्कामोर्तब करणारा! भारताच्या डावात चौकारांमध्ये किती अंतर होतं? सुंदरनं बारावं षट्क टाकणाऱ्या ग्लेन फिलिप्स ह्याच्या पहिल्याच चेंडूवर शॉर्ट फाईन लेगला स्वीपचा चौकार मिळवला. त्यानंतरचा चौकार मिळण्यासाठी तब्बल ४६ चेंडूंची वाट पाहावी लागली.

लखनौची खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी होती, हे नक्की. लॉकी फर्ग्युसन ह्यानं एकोणिसावं (म्हणजे सामन्यातलं एकोणचाळिसावं) षट्क टाकलं. त्यातही चेंडू हवेत वळताना आणि सूर्यकुमार-हार्दिक पंड्या ह्यांना चकवताना दिसला. फिरकी गोलंदाजांनीही मजा केली. एवढ्या कमी धावा होऊनही दोन्ही संघांनी जास्तीत जास्त गोलंदाजांचा वापर केला. पाहुण्यांनी आठ गोलंदाज वापरले. त्यातल्या चौघांनी चार-चार षट्कं टाकली. बाकीचे चौघे एका षट्काचे मानकरी. त्यांच्या मायकेल ब्रेसवेल ह्यानं चार षट्कांत फक्त १३ धावा देताना शुभमन गिल ह्याच्यासारखा मोहरा टिपला. एरवी भारताला त्रास देणाऱ्या मिशेल सँटनेर ह्याला फार काही करता आलं नाही. त्याच्या चार षट्कांत वीसच धावा गेल्या, हे खरं. पण त्याला बळी मिळाला नाही. ईश सोढी ह्यानं राहुल त्रिपाठीला बाद केलं. त्याच्या चार षट्कांत सहाच्या सरासरीनं धावा निघाल्या.

यजमानांनी सात गोलंदाज वापरले. दीपक हुड्डाला गोलंदाजी द्यायचं विसरतो म्हणून रोहित शर्मावर टीका होते. त्याच हुड्डा ह्याच्याकडून कर्णधार हार्दिक पंड्यानं आज कोटा पूर्ण करून घेतला. चार षट्कांचा कोटा पूर्ण करणाऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वांत महागडा होतो तो पंड्या. त्याची ६.२५ ही इकॉनॉमी एरवी नावाजली गेली असती.

भारताकडून बळी मिळवता न आलेला गोलंदाज होता शिवम मावी. डावातलं एकोणिसावं षट्क त्याला टाकावं लागलं. आपल्या संघाला गेल्या कैक सामन्यांपासून शेवटून दुसऱ्या षट्काचा जणू शाप लागलेला आहे. तसंच आजही झालं. मावीच्या षट्कात सर्वाधिक ११ धावा फटकावल्या गेल्या!

एवढ्या कमी धावसंख्येचा सामना म्हणजे निर्धाव षट्कांची संख्या बऱ्यापैकी असणार, असं स्वाभाविक वाटतं. तसंही झालेलं नाही. सामन्यात एकच निर्धाव षट्क पडलं. ते टाकणारा होता युजवेंद्र चहल. हे निर्धाव षट्क ‘पॉवर प्ले’मध्ये टाकलं गेलं, ही भलतीच गंमत.

मालिकेचा निकाल अहमदाबादच्या स्टेडियममधील सामना ठरवणार आहे. तिथंही अशीच फिरणारी, फलंदाजांना चकवणारी खेळपट्टी असावी, असं दोन्ही संघांमधील गोलंदाजांना वाटत असणार. तसं होण्याची शक्यता कमीच. कारण बहुसंख्येने प्रेक्षक येतात, ते फलंदाजांनी गोलंदाजांवर गाजवलेली हुकूमत पाहायला.


.......

(दोन्ही छायाचित्रं https://www.espncricinfo.com ह्यांच्या सौजन्यानं.)
.......
#क्रिकेट #टी20_क्रिकेट #भारतxन्यूझीलंड #लखनौ #सूर्यकुमार_यादव #युजवेंद्र_चहल #हार्दिक_पंड्या #फटकेबाजी #चौकार #षट्कार #निर्धाव_षट्क

#cricket #t-20 #india_nz #lucknow #surya #sky #chahal #pandya #boundries #sixers #maiden_over #power_play

Friday, 27 January 2023

‘पद्मश्री’च्या घरी


लेखक चुलत्याचा सत्कार लेखक पुतण्याकडून...
निमित्त पद्मश्री जाहीर झाल्याचे! डॉ. प्रभाकर मांडे आणि डॉ. अरुण मांडे.

त्यांच्या सख्ख्या पुतण्यानं ठरवलं होतं, त्या प्रमाणे सकाळीच त्यांच्या घरी गेलो. अकरा वाजत आले होते. घरात वर्दळ नव्हती. मुलगा, सून  आणि स्वतः ते. छान प्रशस्त घर. बाजूला एक-दोन पुष्पगुच्छ. टी-पॉयवर काही पुस्तकं. वाटलं त्यांचीच असावीत. नव्हती. लेखकाचं नाव वेगळं दिसलं. भेटीदाखल आलेली असावीत. ताजी ताजी.

निवांत होते ते. पुतण्याच सोबत असल्यानं मी ओळख करून देण्याचा प्रश्न आला नाही. त्यांनीच ओळख करून दिली.

चेहऱ्यावरून, तब्येतीवरून वय जाणवत होतंच. चालण्यासाठी वॉकर दिसत होता ठेवलेला. नव्वदीच्या घरात असावेत असं वाटलं. अंदाज बरोबर ठरला. महिनाभरापूर्वी त्यांनी ८९ वर्षं पूर्ण केलेली. सुनेच्या आणि मुलाच्या मोबाईलवर त्यांच्यासाठी फोन येत होते.

वयोमानानुसार त्यांची ऐकण्याची शक्ती कमी झालेली. म्हणून मग फोन स्पीकरवर ठेवलेला - हँड्स फ्री. तरीही त्यांना पुरेसं स्पष्ट ऐकू येत नसावं. पण फोन कशासाठी येत आहेत, ह्याची पूर्ण कल्पना त्यांना होतीच. आपलं अभिनंदन करण्यासाठीच हा संवाद आहे, हे जाणून ते पहिल्याच वाक्यात तिकडून बोलणाऱ्याचे आभार मानत होते, ‘धन्यवाद’ म्हणत होते.

... पद्मपुरस्कारांची यादी प्रथेप्रमाणं प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या रात्री जाहीर झाली. त्यातलं एक नाव होतं - प्रभाकर भानुदास मांडे. त्यांच्याच घरातलं गुरुवार सकाळचं हे चित्र.

पुरस्काराच्या मानकऱ्यांची केंद्र सरकारकडून जी यादी प्रसिद्ध झाली, त्यात डॉ. मांडे ह्यांच्या नावापुढं ‘शिक्षण आणि साहित्य’ असा उल्लेख आहे. ह्या दोन क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांची निवड झाली. खरं तर ‘साहित्य’ हा उल्लेख तसा फार ढोबळ म्हणावा लागेल. डॉ. मांडे ह्यांचा प्रांत आहे, लोकसाहित्य-लोकसंस्कृती. गावगाड्याबाहेरचं जगणं. त्यात ते अर्धशतकाहून अधिक काळ काम करीत आहेत.

पुण्यातून काल रात्री उशिरा पत्रकारितेतल्या जुन्या सहकाऱ्यानं संपर्क साधला आणि विचारलं ‘प्रभाकर मांडे म्हणजे तुमच्या नगरचेच ना?’ ते औरंगाबादला असतात, असं सांगितलं खरं आणि मग एकदम आठवलं - प्रसिद्ध लेखक-अनुवादक डॉ. अरुण मांडे त्यांचे पुतणे. पुतण्याच्या अमृतमहोत्सवासाठी काका आले होते. डॉक्टरांना ही बातमी द्यावी आणि आपण दिलेल्या माहितीला दुजोरा घ्यावा असं वाटलं. डॉ. अरुण ह्यांना फोन केला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘काका आता इथंच (नगरला) स्थायिक झाले आहेत.’’

नगर की औरंगाबाद? हा संभ्रम माझा एकट्याचाच नव्हता. तसा तो प्रशासकीय यंत्रणेलाही पडलेला होता. तो वेळीच दूर झाला असता, तर डॉ. प्रभाकर मांडे हे नाव पद्म-पुरस्काराच्या यादीत कदाचित दोन किंवा तीन वर्षांपूर्वीच आलं असतं. तीन-चार वर्षांपूर्वी त्यांची माहिती घेण्यासाठी यंत्रणेनं औरंगाबादेत चौकशी केली, तेव्हा ते नगरमध्ये होते. नंतर उलटा प्रकार घडला. तर ते असो!

म्हणजे पद्म पुरस्कारांच्या नगरच्या यादीत आता भर पडली. डॉ. मांडे ह्यांचं अभिनंदन करावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून सकाळीच डॉ. अरुण ह्यांच्यासोबत घर गाठलं. आधी म्हटलं तसं आम्ही गेलो तेव्हा कुटुंबातले हे तीन सदस्यच होते. पुतण्यानं ऊबदार शाल देऊन काकांचा सत्कार केला. मग खाऊचा पुडाही दिला, तेव्हा नव्वदीतले काका निर्व्याज हसले.

बातमी कधी कळाली?
पुरस्कार जाहीर झाल्यावर काय वाटलं? हा फार उगाळला जाणारा प्रश्न. तो आम्ही काही विचारला नाही. नंतर तो ऐकायला मिळालाच. आमचा प्रश्न होता - ‘बातमी कधी कळाली?’ बुधवारी सकाळनंतर कधी तरी एक फोन आला. अनोळखी नंबर असला, तर सहज फोन घ्यायचा नाही, हा सर्वसाधारण रिवाज. त्यानुसार त्यांनी तो फोन घेतला नाही. मग दीड-दोन तासांनंतर ‘कुणी फोन केला, हे बघू तर...’ म्हणून कुटुंबीयांनी संपर्क साधला. कळलं की, देशाच्या राजधानीतून संपर्क साधला गेलाय. ‘पुरस्कार जाहीर झाला, तर तुम्ही तो स्वीकारणार ना?’, ह्याची खातरजमा करून घेण्यासाठी तो फोन होता.

‘अधिकृतरीत्या जाहीर झाल्याशिवाय ही बातमी तुम्ही कुणाला सांगायची नाही,’ असं संबंधित यंत्रणेतील व्यक्तीनं पुनःपुन्हा बजावून सांगितलं. आता उत्सुकता वाढलेलीच. अधिकृत घोषणेसाठी किती वेळ वाट पाहायची? संध्याकाळी टीव्ही. सुरू केला. हे चॅनेल, ते चॅनेल. बातम्यांमध्ये आधी यादी आली, तीत जेमतेम पंचवीस-एक नावं होती. त्यात महाराष्ट्रातलं एकच. मग रात्री नऊ-सव्वानऊ वाजता आली एकदाची बातमी - प्रभाकर भानुदास मांडे ह्यांना शिक्षण व साहित्य क्षेत्रातील कामाबद्दल पद्मश्री जाहीर!


अभिनंदनाचे फोन घेतलेच पाहिजेत ना!
आता फोन सुरू झाले. रात्री दहानंतर. त्यातलाच एक माझा होता. ज्यांना माहिती देण्यासाठी इथं फोन केला होता, त्यांच्या वर्तमानपत्राच्या वेगवेगळ्या कार्यालयांतून रात्रीतून तीन-चार जणांनी संपर्क साधला. एका टीव्ही. वाहिनीच्या प्रतिनिधीनं तेवढ्या रात्री घरी येऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

वृत्तपत्रात बातमी आल्यावर सकाळपासून फोनच फोन सुरू झाले. मराठवाड्यातून, नगरमधून, बाकी महाराष्ट्रातून. फोन सतत वाजत होता. एकदा सूनबाईंचा, लगेच चिरंजिवांचा. डॉ. मांडे सर बोलत होते. अभिनंदनाचा स्वीकार करून त्यांची गाडी दुसऱ्या विषयाकडे जाई...
‘अरे हो! तुमचं अभिनंदन. तुम्ही आता प्रोफेसर झालात.’
‘तुमची किती पुस्तकं प्रसिद्ध झालीत? आता हे नवीन कधी येतंय?’
हा आणि अशा पद्धतीचा संवाद चालू होता. ते औरंगाबादमध्ये जिथं राहात, त्या कॉलनीतील शेजाऱ्यांनी संपर्क साधला. त्यांना वाटणारा आनंद फोनच्या स्पीकरमधून आमच्यापर्यंत पाझरत होता. ते म्हणाले, ‘आम्हालाच ‘पद्मश्री’ मिळालीय असं वाटतंय बघा सर.’ नंतर घरातल्या बाई बोलल्या. म्हणाल्या, ‘आमच्या शेजारी मांडे सर राहत होते, हे सांगताना किती अभिमान वाटतोय म्हणून सांगू...’

श्रीमंती आणि ऐश्वर्य 
कुठून कुठून फोन आले, ह्याचं अप्रुप मांडे सरांनाही स्वाभाविकपणे वाटत होतं. ‘अहो, पिशोरला मी शिक्षक होतो. ही गोष्ट १९५५-५६मधली. तेव्हाच्या पाचवी-सहावीतल्या विद्यार्थ्यांनी आठवणीनं फोन करून अभिनंदन केलं. परभणीहूनही फोन आले.’ अशी फोन करणाऱ्यांची माहिती सांगतानाच सर म्हणाले, ‘‘शिक्षकाच्या जीवनातली ही श्रीमंती, हे ऐश्वर्य आहे. इतर कुठल्या क्षेत्रात ते मिळत नाही हो!’’

तेवढ्यात टीव्ही. वाहिन्यांचे तीन-चार प्रतिनिधी येऊन धडकले. त्यांनी तो नेहमीचा प्रश्न विचारलाच की. ‘पुरस्कार जाहीर झाल्यावर तुम्हाला काय वाटलं?’ त्यांनाही आणि त्याच्या आधीही फोनवर बोलताना सर म्हणालेच होते, ‘आनंद वाटलाच, त्या पेक्षाही जास्त समाधान वाटतं. बरं वाटलं. आपल्या हातून घडलं ते कुठं तरी रुजू झालं. त्याचीच ही पावती. एकूण कामाचीच दखल घेतली गेली. समाजाने नेहमीच चांगली दखल घेतली.’

मग ह्या बोलण्यात चुकून आत्मप्रौढी वगैरे आली की काय, असं बहुतेक सरांना वाटतं. ते म्हणाले, ‘‘हे मी केलं नाही. माझ्या हातून घडलं! त्याच्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं.’’


वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना बाईट... प्रत्येकाला स्वतंत्र.

वाहिन्यांच्या प्रतिनिधींना स्वतंत्र बाईट हवे होते. त्यातल्या लैलेश बारगजे ह्याला थोडा अधिक वेळ, छोट्याशा मुलाखतीएवढा वेळ हवा होता. वाहिन्यांच्या प्रतिनिधींना अडचण नको म्हणून आम्ही निरोप घ्यायचं म्हटलं. पण आम्ही तिथं असणं त्यांना आवश्यक वाटत होतं. कारण मग सर थोडे मोकळेपणाने बोलले असते.

त्या अर्ध्या तासात डॉ. मांडे सर चौघांशी स्वतंत्रपणे बोलले. त्या प्रत्येक बाईटमध्ये वेगळेपण होतं. उपचार म्हणून ते बोलले नाहीत. भरभरून आणि खुलून. शब्द वेगळे होते, प्रत्येक वेळी; त्या साऱ्याचा आशय मात्र एकच होता.

प्रेरणा डॉ. आंबेडकर ह्यांची
‘माझ्या कामाचं खरं श्रेय जातं डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना. त्यांनीच प्रेरणा दिली, हे आवर्जून सांगावं वाटतं,’ असं म्हणून डॉ. मांडे सर तो जवळपास सत्तर-बाहत्तर वर्षांपूर्वीचा प्रसंग काल-परवा घडल्यासारखा सांगतात. ते औरंगाबादच्या (मग कधी तरी त्यांच्या तोंडून ‘संभाजीनगर’ असाही उल्लेख येतो!) मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी. बी. ए.चे विद्यार्थी. प्राचार्य होते म. भि. चिटणीस. मांडे सरांनी लिहिलेला निबंध बऱ्यापैकी मोठा झालेला. डॉ. बाबासाहेब त्या वेळी औरंगाबाद मुक्कामीच होते. त्यांना प्राचार्य चिटणीस ह्यांनी तो निबंध दाखवला. कारण छापण्यासाठी त्यांची परवानगी आवश्यक होते. सर म्हणाले, ‘‘बाबासाहेबांनी मला शेजारी बसवलं. पाठीवर हात ठेवला. प्राचार्यांना निबंधासाठी संमती दिली. ‘असंच समाजाचं काम करीत राहा,’ असं मला सांगितलं. वंचितांच्या विषयाकडं त्यांनी माझं लक्ष वळवलं.’’ 

डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या ह्या विषयाकडे वळावं, असं अधिक असोशीनं वाटलं ते शिक्षक म्हणून भूमिका स्वीकारल्यावर. विद्यार्थ्यांच्या कथा आणि अनुभव ऐकून सरांचं लक्ष लोकसंस्कृतीच्या अभ्यासाकडे गेलं. गावगाड्याबाहेरचा समाज हा त्यांच्या कुतुहलाचा, अभ्यासाचा विषय बनला. त्यांच्याबद्दल मनापासून बोलताना सर म्हणाले, ‘‘गावगाड्यात वतनं होती, बलुतेदारी होती. गावगाड्याबाहेरच्या ह्या भटक्यांना वतन नव्हतं की जमीन. पण त्यांनी स्वतःची संरचना तयार केली.’’

डॉ. मांडे सरांचं बव्हंशी लेखन लोकसाहित्य, लोकसंस्कृतीबद्दल आहे. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात (आता डॉ. बाबासाहेब मराठवाडा आंबेडकर विद्यापीठ) १९७३मध्ये ‘लोकसाहित्य’ विषय सुरू करण्यात आला. थोड्याच काळात महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच विद्यापीठांमध्ये तो सुरू झाला. अभ्यासक्रम आहे म्हटल्यावर त्यासाठी संदर्भ ग्रंथ पाहिजेत ना. ‘लोकसाहित्याचे स्वरूप’ आणि ‘लोकसाहित्याचे अंतःप्रवाह’ हे ग्रंथ त्यासाठी सिद्ध करण्यात आले. सर म्हणतात, ‘त्यानंतर मी लिहीतच राहिलो. थांबलोच नाही.’ लोकसंस्कृती हा उपेक्षित विषय होता. त्याच्या अभ्यासामुळं सरांना भटक्या-विमुक्तांचं विलक्षण नवं जग त्यांना पाहायला मिळालं.


पद्मश्री म्हणजे सजग समाजाने घेतलेली दखल!
ग्रामीण समाज, तिथल्या लोकांचं जगणं ह्याबद्दल डॉ. मांडे सरांना मनापासून आपुलकी आहे. ते म्हणाले, ‘‘ग्रामीण जीवन समाजाचा मुख्य प्रवाह आहे. आपली बलस्थानं, गाभा तिथंच आहे. त्यांच्यामुळे आपण (भारतीय समाज म्हणून) टिकलो. शेतकरी आणि बलुतेदार ह्यांनी आपली परंपरा जपली. आपल्या परंपरेला नावं ठेवणारा एक अभिजन वर्ग तयार झाला आहे. समाजजीवनाशी नाळ तुटलेला! खरं तर समाजजीवन फार गुंतागुंतीचं आहे. जितकं खोल जाऊ, तितकं कळत जातं. एक आयुष्य पुरेसं नाही, हे समजून घ्यायला. ह्यात अनेकांनी काम करायला हवं. तसे लोक पुढे येत आहेत, ही आनंदाचीच गोष्ट होय.’’

जमीन सुपीक आहे...
पद्मपुरस्कार म्हणजे समाजाने घेतलेली दखल आहे, अशी सरांची भावना आहे. त्याबद्दलची कृतज्ञ भावना व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘समाज अजून जिवंत आहे, सजग आहे. म्हणून तर अशी दखल घेतली गेली. पेरलेलं उगवतं. ही जमीन सुपीक असल्याचंच हे लक्षण. पेरलेलं उगवून आल्यावर शेतकऱ्याला जसा आनंद होतो, अगदी तसाच मला झाला आहे!’’

टीव्ही. वाहिन्यांच्या प्रतिनिधींना वेगवेगळे चार बाईट देऊनही मांडे सर थकले नव्हते. त्यांची स्मरणशक्ती तल्लख असल्याचं तासाभरात वारंवार जाणवलं. पंढरपूरच्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विदूषी दुर्गाबाई भागवत होत्या. व्याख्यान ऐकल्यावर त्या कशा सद्गदित झाल्या. त्यानंतर ‘सोबत’मध्ये संपादक ग. वा. बेहेरे ह्यांनी ‘पाषाणाला पाझर फुटला’ शीर्षकाचा पानभर लेख कसा प्रसिद्ध केला, हे सारं त्यांना स्पष्ट आठवतं.

पद्मपुरस्कारांचे मानकरी ‘लोकांमधून’ निवडून काढले जातात, ह्याचं अजून एक उदाहण मांडे सरांच्या रूपाने समोर दिसतं.
---------------

#पद्म_पुरस्कार #प्रभाकर_मांडे #पद्मश्री #लोकसंस्कृती #लोकसाहित्य #बाबासाहेब_आंबेडकर #औरंगाबाद #समाजजीवन #भटके_विमुक्त #गावगाडा #ग्रामीण_समाज

मित्राची आठवण अन् आठवणीतला मित्र!

अचानक एखाद्या जुन्या मित्राची फाऽऽर आठवण येते. त्यानं पोटापाण्यासाठी गाव/शहर सोडलेलं असतं. त्या दूर देशी तो स्थायिक झालेला असतो. अधूनमधून व...