Monday 28 October 2019

थोडं चाखू, थोडं राखू... बाकीचं पुढे ढकलून टाकू!

कोजागरी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी व्हॉट्सपवर संदेश आला. बहुतेक फॉरवर्ड केलेलाच असावा. पण वाचण्यासारखा. वाचून गालातल्या गालात हसण्यासारखा. त्यात म्हटलं होतं - ‘दसऱ्यानिमित्त आलेली झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं आता कुठं मोबाईलमधून काढून टाकली. थोडं साफसुफ वाटतंय तेवढ्यात मसाला दुधाचे ग्लास आणि चंद्राची गर्दी झाली.

हा संदेश पूर्ण वाचणं काही जड गेलं नाही. दोन-तीन ओळींचाच होता तो म्हणून. वाचल्यानंतर पुढे पाठवण्याचा मोह झाला क्षणभर. पण आवरला. कारण तो फार फिरणार असं वाटलं होतं. ते खरं ठरलं. दिवसभरात अजून दोन-तीन ठिकाणांहून आला तो.

दिवस सणांचे आहेत. उत्सवाच्या उत्साहाचे आहेत. या उत्साहावर यंदा पावसानं चांगलं धो धो पाणी टाकलं, हे खरं. त्यामुळं की काय, दिवाळीच्या अगदी दोन-तीन दिवस आधीपर्यंत बाजारपेठेत उत्साह कमी दिसत असेल कदाचितपण मोबाईलमध्ये तो कधीचा ओसंडून वाहायला लागला होता. अशा उत्साही संदेशांनी व्हॉट्स फसफसून वाहतंय. बऱ्याचदा हे फसफसणं विटण्यापर्यंत जाऊन पोहोचतं, ही बाब वेगळी.

दिवाळी चालू झालीच आहे. अगदी मुहुर्तावर शुभेच्छा देण्यात काय मजात्या तर सगळेच देतात. आपण त्यात आघाडीवर असलंच पाहिजे, म्हणून मग काही व्हॉट्सॅपवीर आठवडाभर आधीच सुरुवात करतात. त्यांच्याकडे स्टॉक असतोच. गेल्या वर्षीचा, त्याच्या आदल्या वर्षीचा. शुभेच्छांमध्येच म्हटलेलं असतं सगळ्यांच्या आधी आणि एक (किंवा दोन) दिवस) आधी शुभेच्छा मीच दिल्या(याच धर्तीवर आम्ही यंदा वर्षाअखेरीस २०२१ या वर्षाच्या आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी २०२२साठी शुभेच्छा देणार आहोत!)

वसुबारसेपासून शुभेच्छांचा 'ताप' (फीव्हर हो) वाढत जातो आणि पाडव्यादिवशी तो १०४ वगैरे होतो. तो उतरणीला लागल्याची लक्षणं भाऊबीजेपासून जाणवू लागतात. त्या दिवशी ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ फॉर्मात असते. त्यानंतरही अधूनमधून कुणाला तरी हुक्की येतेच. आलेल्यातला एखादा मेसेज तो फॉरवर्ड करून टाकतो बसल्या बसल्या. फॉरवर्ड तर फॉरवर्डत्यातून शुभेच्छा दिल्याचं आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झाल्याचं समाधान. त्यानं दिवाळीच्या आनंदावर तृप्तीची कशी जाड साय येते.

एव्हाना लाडू, चकल्या, चिवडा, फटाके, रांगोळ्या, आकाशकंदील, पणत्या... हे सारं पचवताना मोबाईलला अजीर्ण होऊन जातं. क्वचित कधी तरी त्याला याचा हँगओव्हरही येतो आणि तो लडखडायला लागतो. अशा वेळी एकच उपाय असतो लंघन करणं. सरसकट सगळे संदेश उडवून टाकत व्हॉट्स एकदम स्वच्छ करून बंद ठेवायचं. यानं तुमच्या अँड्रॉईडची किंवा अन्य कुठल्याही स्मार्ट फोनची प्रकृती पूर्वपदावर येण्यास मदत होते.

दिवाळीच्या शुभेच्छा म्हटलं की, काही गोष्टी अनिवार्य असतात. घरावर लखलखीत लायटिंग केलं असलं तरी इथं इवलीशी (आणि शक्यतो मिणमिणती!) पणती आवश्यक असते. प्रकाशाची अंधारावर मात, उडणारे बाण आणि भुईनळे, कानठळ्या बसविणारे हिरवे टमबाँब, अंगालाच मुंग्या लागतात की काय, अशी शंका येणारे पाकात मुरवून ठेवलेले गोग्गोड शब्द इत्यादीही असतंच. एरवी असंस्कृत भासणाऱ्या या जगात दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणारी संस्कृत वचनं आणि श्लोक पाहिले की, या देववाणीला आपण उगीच अभ्यासातून हद्दपार केलं असं वाटतं. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ या संतश्रेष्ठांचे अभंग-ओव्याही शुभेच्छांमधून आढळतात. अलीकडच्या काही वर्षांत शुभेच्छांसाठी ज्ञानदेवांच्या ‘मी अविवेकाची काजळी। फेडुनी विवेकदीप उजळी।’ ओवीला फार मागणी आहे. ही काजळी दिवाळीपुरती काढली म्हणजे भागलं, असंच आपली विवेकबुद्धी सांगत असावी, बहुतेक!

आणखी काही शुभेच्छांमध्ये दिवाळीचा फराळही आवर्जून असतो. दगडासारखा कडक लाडू, वातड चकली, चिवट कडबोळी, खवट करंजी याचे जुनाट ('स्वराज्य'छाप) विनोद त्यात असतात. ‘छायाचित्र हजार शब्दांहून बोलकं असतं’ या उद्धृताला जागून बरेच जण फराळाच्या ताटांचे फोटोच पाठवतात. साधारण सहा-सात वर्षांपासून फॉरवर्ड होत असलेल्या या पदार्थांना वास कसा येत नाही किंवा ते तेवढे जुने आहेत, याचा वासही फॉरवर्ड करणाऱ्यांना येत नाही, ही तशी आश्चर्याचीच गोष्ट. पण आपल्याला कुठे वाचायचंय/पाहायचंय, फॉरवर्ड तर करायचंय ना, अशी संबंधितांची स्थितप्रज्ञ भूमिका असते. त्यातून ते फिरत राहतात.

तसाही फराळ आणि फॉरवर्ड यांचा संबंध जुनाच आहे. ‘गेले ते दिन गेले...’ आळवणाऱ्यांना आणि ‘आमच्या काळी असं होतं...’ असे कढ काढणाऱ्या वयोगटातल्या ('सोशल') मंडळींना हे लगेच पटेल. पूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून फराळाची ताटं शेजारच्या घरोघर पोहोचवण्याची पद्धत होती. घरातला बंड्या बेसनाचा लाडू खाण्यासाठी हट्ट धरून बसला असला, तरी तो आधी शेजारच्या खंड्याच्या घरी कसा पोहोचता होईल, यावर त्याच्या प्रेमस्वरूप आईचा कटाक्ष असे. ‘त्या खंड्याच्या आईचा फराळ येण्याआधी आपला त्यांच्या घरी जाऊ दे रे,’ असं बंड्याच्या भावाला किंवा बहिणीला सांगतानाच सोबत ‘उगीच नको त्या मेलीचा तोरा...’ असा थेट शब्दांत न दिला जाणारा संदेशही असायचा. बोलण्याची पट्टी कमी करत असल्याचा आभास करीत आपल्या ह्यांना नेमकं ऐकू जाईल, अशा पद्धतीनं ‘खंडूच्या बाबांना माझ्या चकल्या भारी आवडतात. म्हणून लवकर नेऊन दे जा...’ अशी पुष्टीही जोडली जायची. व्हॉट्सच्या मेसेजचंही असंच असतं नात्याचा मेसेज यायच्या आधी माझा मेसेज गेलेला बरा!

(घरच्या) फराळाची ताटं भरून शेजारीपाजारी देण्याचं काम पहिले दोन दिवस उत्साहाने चालायचं. तोपर्यंत शेजारूनही फराळाची ताटं आलेली असत. मग सुरू होई फॉरवर्डचं काम. घरची चकली खमंग झाली असली, तर ती न पाठवता पाटलांची किंवा जोश्यांची वातड चकली द्यायच्या ताटात जाई. ‘बेसन कसं नि किती भाजायचं कळतच नाही, कुलकर्णीबाईंना’ असा उद्धार करीत त्यांचे लाडू जाधवांच्या किंवा गायकवाडांकडे पाठवायच्या ताटात जात. दिवाळीतला चिवडा भाजक्या पोह्यांचाच. पण एखाद्या घरातून चुरमुऱ्याचा चिवडा आलेला असेल, तर नाकं मुरडत त्याची चवही न पाहता तो तसाच्या तसा कुणाकडे तरी लगोलग फॉरवर्ड केला जाई. आपण कसं थोडे चांगले मेसेज सरसकट फॉरवर्ड न करता जवळच्या मित्रांना (आणि शक्यतो मैत्रिणींनाच!) पाठवतो, तसं फराळाचंही असे. आत्या-मामा-काका यांच्यासाठी डब्यात घरचेच फराळाचेच पदार्थ भरण्याची दक्षता घेतली जाईल. क्वचित कोणा जळकुट्या जाऊबाईंच्या डब्यात एखाद-दुसरा पदार्थ फॉरवर्डेड असायचा.

नाना पाटेकर आणि विश्वास नांगरे ह्यांचे ब्लॉग वाचण्यासारखे असतात, असं सोशल मीडियाच्या दुनियेत बहुतेकांना (न वाचताच) मान्य आहे. त्यामुळे व्हॉट्सवर (त्यांच्या नावाचं लेबल लेऊन) आलेला आणि सात-आठ वेळा स्क्रोल करत पाहावा लागणारा मेसेज सरसकट पुढे ढकलला जातो. काही खानदानी कुटुंबांचं तसंच असतं. त्यांच्याकडून येणारी फराळाची ताटं किंवा चार पुड्यांचे दोन-दोन डबे नाना पदार्थांनी गच्च भरलेले असतात. ते सारेच चविष्ट असतात, असं सगळ्यांना (ऐकून ऐकूनच) मान्य असतं. हे डबे पाहूनच दडपून जायला होईल. त्यामुळे चव घेण्याऐवजी त्यातील पदार्थ तुकड्यातुकड्यांमध्ये फॉरवर्ड केले जात. त्यातूनही थोडं काही राहिलंच तर कामवाल्या मावशी मदतीला येतातच.

व्हॉट्सवर आलेले सगळेच्या सगळे मेसेज वाचणं या जन्मात तरी कुणाला शक्य नाही. हीच शक्यता पूर्वीच्या जमान्यात वेगळ्या बाबतीत होती. घरात आलेले सगळेच्या सगळे पदार्थ चाखणं एकदम अशक्य गोष्ट. पण काही जणांचे मेसेज वाचण्यासारखेच असतात, हे जसं अनुभवानं ध्यानात येतंतसंच फराळाचंही होतं. काहींचे काही पदार्थ चाखण्यासारखेच असतात, असं घरच्या मंडळींचं मत असे आणि कुटुंबकर्तीला ते नाइलाजानं मान्य करावं लागे. विशेषतः मोतिचूर लाडू, खमंग अनारसे, खुसखुशीत चकल्या असा ऐवज फॉरवर्ड न करता राखून ठेवला जाई आणि चाखून पाहिला जाई.

कितीही काळजी घेतली, तरी हे गणित बिघडे. कोणता लाडू देशपांडे काकूंचा आणि कुठला चिवडा शिंदे मावशींचा, चकली चाकोत्यांकडची आहे की अनारसे आढावांकडचे आहेत, याचा सगळा गोंधळ होऊन जाई. त्यामुळे एक-दोन दिवसांतच ते लक्षात ठेवण्याचा नाद सोडून द्यावा लागे. त्यातही फॉरवर्डची कल्पना यथावकाश सगळ्यांनीच अमलात आणलेली असे. त्यामुळे एखाद्या राजूने पवार आजींकडचा रव्याचा लाडू चांगला असतो म्हणून मागितला, तर आई रागानं वाटी त्याच्यापुढे आदळे. एक तुकडा खाऊन राजू तोंड वाकडं करत म्हणे, ‘‘आई, हा पवार आजींकडचा लाडू नाही गं. तू घरचाच दिलास चुकून. वास येतोय...’’ तेव्हा मग आईच्याही लक्षात येई की, हा लाडू चार घरी फिरून पुन्हा ‘बनविल्या घरीच तू सुखी राहा...’ म्हणत आपल्याकडे आलेला आहे. राजूच्या आईचा अनुभव अस्मादिकांनाही एसएमएसच्या जमान्यात आला आहे. पत्रकारदिनाच्या शुभेच्छा देणारा हा संदेश एवढा फिरला की, सोलापूरच्या एका पत्रकाराकडून तो आम्हाला आला. ‘हा माझाच मेसेज तुम्ही मलाच कसा काय पाठवलात?’ असं विचारल्यावर त्या पॉवरबाज पत्रकारानं माझं नावच फोनबुकमधून उडवून टाकलं.

पूर्वीसारखं आता कुणी घरी फराळाचं सगळंच्या सगळं बनवत नाही. काही इकडून मागवतात, काही तिकडून बनवून घेतात. शुभेच्छांची पत्रही आता कुणी हातानं लिहीत नाही. काही इ-मेलवरून उचलतात आणि व्हॉट्स बऱ्याच जणांच्या मदतीला आलेलं असतं. एकूणच फराळ काय नि व्हॉट्स मेसेज काय, त्यांचा संदेश पूर्वीपासून तोच आहे थोडं चाखू, थोडं राखू... बाकीचं आपलंच म्हणून पुढे ढकलून टाकू!

(छायाचित्रं इंटरनेटवरून साभार.)

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...