Saturday 23 April 2022

बातमी...मराठीतली नि इंग्रजीतली

 

‘वागशीर’ला जलावतरणानिमित्त तुताऱ्यांनी सलामी.
(छायाचित्र नौदलाच्या संकेतस्थळावरून साभार.)

बातमी म्हणजे काय? तिची व्याख्या? पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण घेणाऱ्यांना आठवेल कदाचित की, ‘बातमी’ आणि ‘बातमी-लेखन’ विषय शिकविणाऱ्या कोण्या मुरब्बी पत्रकारानं त्यांना पहिल्याच तासाला हा प्रश्न विचारला असेल. त्यानंतर पाच-सहा-सात व्याख्या पुढे आल्या असतील. त्यातली NEWS : North-East-West-South ही सोपी, सुटसुटीत व्याख्या बहुतके भावी पत्रकारांना पटली असेल. सोपी व्याख्या आहे ती.

बातमीत काय हवं? तर त्यात ‘5 W & 1 H’ ह्याची (Who? What? When? Where? Why? How?) उत्तरं मिळायला हवीत. कोण, काय, का, कधी, कुठे आणि कसे, हे ते सहा प्रश्न. मराठीत सहा ‘क’ -  विद्यार्थ्यांना हेही शिकवलं जातं. ‘Comment is free, but facts are sacred.’ वयाच्या सव्विसाव्या वर्षी ‘द मँचेस्टर गार्डियन’च्या (आताचं प्रसिद्ध दैनिक द गार्डियन) संपादकपदी नियुक्ती झालेल्या सी. पी. स्कॉट ह्यांचे हे प्रसिद्ध उद्धृतही जाणत्या पत्रकार-संपादकानं विद्यार्थ्यांना ऐकवलं असेलच. बातमी देणं किती जोखमीचं काम आहे, हेच शिकवायचं असतं त्यातून. कारण बातमी म्हणजे तथ्य आणि फक्त तथ्य. (त्यामुळेच आम्हाला कदाचित ‘News is sacred and comment is free.’ असं शिकवलं गेलं.)

पत्रकारितेला सुरुवात केली आणि त्यानंतर वर्षभरातच ‘केसरी’च्या नगर कार्यालयात एक माध्यमतज्ज्ञ प्राध्यापक आले होते. आम्ही दीड-दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या ‘रानडे इन्स्टिट्यूट’मध्ये जे शिकलो होतो, ते त्यांनी वीस-पंचवीस मिनिटांत मोडीत काढलं. अमेरिकी पत्रकारितेची साक्ष देत त्यांनी सांगितलं की, बातमीत ती देणाऱ्याचं मत आलं तरी चालतं. किंबहुना ते यायला हवंच. त्यानंतरची बरीच वर्षं आम्ही जुन्या चौकटींची मर्यादा संभाळतच काम करीत राहिलो. ती ताणली; नाही असं नाही. त्याचं कारणही ज्येष्ठ संपादक चंद्रकांत घोरपड्यांनी शिकवलं होतं - संपादकांनी घालून दिलेली चौकट जास्तीत जास्त ताणतो, तोच चांगला उपसंपादक!  

हे सगळं आठवण्याचं-लिहिण्याचं कारण तीन दिवसांपूर्वी वाचलेली एक बातमी. त्याच्या संदर्भात ‘फेसबुक’वर लिहिलेलं एक टिपण आणि त्यावर आलेल्या काही मोजक्या प्रतिक्रिया.

आपल्या नौदलाची ताकद वाढविणाऱ्या ‘आयएनस वागशीर’ पाणबुडीचे बुधवारी (दि. २० एप्रिल) जलावतरण झाले. स्कॉर्पिन श्रेणीतली ही सहावी पाणबुडी. हिंद महासागरात खोलवर आढळणाऱ्या शिकारी माशावरून (सँडफिश) तिचे नामकरण करण्यात आले. (संदर्भ - दै. लोकसत्ता आणि The Economic Times - Named after sandfish, a deadly deep water sea predator of the Indian Ocean.)

विविध मराठी दैनिकांमध्ये गुरुवारी ही बातमी प्रसिद्ध झाली. माझ्याकडे सहा दैनिकं येतात. त्यातील चार दैनिकांची आवृत्ती स्थानिक - नगरची आहे आणि दोन पुण्याच्या आवृत्ती. ‘लोकसत्ता’ने पहिल्या पानावर पाणबुडीच्या छायाचित्रासह तिची वैशिष्ट्ये मुद्द्याच्या रूपांत दिली आहेत. त्यात कुणाची नावं नाहीत. वाराची मात्र चूक झाली आहे. बुधवारी जलावतरण झालं असताना, मुद्द्यांमध्ये गुरुवार पडलं आहे. ‘दिव्य मराठी’ने आतील पानात मोठे छायाचित्र आणि आटोपशीर बातमी प्रसिद्ध केली.

जलयुद्धयान म्हणून की काय माहीत नाही, पण ‘सकाळ’ने तिला पहिल्या पानावर तळाव्याची (‘अँकर’) जागा दिली आहे. पानावरील मुख्य बातमीनंतर वाचकाचे लक्ष तळाच्या बातमीकडे - ‘अँकर’कडे वेधले जाते म्हणतात. ही बातमी सर्वांत तपशीलवार आहे. त्यात ‘वागशीर’ची वैशिष्ट्ये वेगळ्या चौकटीत दिली आहेत. ‘लोकमत’ने अग्रलेखासमोरच्या पानावर अगदी वरच्या बाजूला पाणबुडीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि सोबतीची बातमी कऱ्हाडची आहे. ‘आयएनस वागशीर’ची वातानुकूलित यंत्रणा तिथे तयार झाल्याची माहिती ही बातमी देते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पहिल्या पानावर नेमकं घडीवर छायाचित्र प्रसिद्ध केलं आणि त्याच्या ओळीच थोड्या तपशिलानं दिल्या.

प्रामुख्यानं अर्थविषयक दैनिक अशी ओळख असलेल्या ‘बिझनेस स्टँडर्ड’च्या पुणे आवृत्तीत प्रसिद्ध झालेली ‘वागशीर’ची बातमी मला मराठी दैनिकांहून खूप वेगळी वाटली. ‘सेकंड फ्रंट पेज’ म्हणजे शेवटच्या पानावर अगदी ठळकपणे प्रसिद्ध झालेल्या ह्या बातमीचे शीर्षक ‘Launched with a coconut, a boost to submarine fleet’ असे तीन स्तंभांमध्ये तीन पायऱ्यांचे (मराठी पत्रकारितेच्या परिभाषेत - तीन कॉलमी, तीन डेकचे!) आहे. दोन ओळींच्या उपशीर्षकात बातमी नेमकी काय आहे ते समजून येते.

बातमीचा पहिला परिच्छेद ‘लीड’ किंवा ‘इंट्रो’ म्हणून ओळखला जातो. तो जेवढा गोळीबंद होतो, तेवढी बातमी अधिक प्रमाणात शेवटापर्यंत वाचली जाते. जुन्या पत्रकारितेत मोजक्या शब्दांत आणि मोजक्या वाक्यांमध्ये बातमीतील सर्वांत महत्त्वाचा भाग सांगणाऱ्या ‘लीड’ला फार महत्त्व होते. बातमीचा हा पहिला परिच्छेद पस्तीस ते चाळीस शब्दांचा आणि तीन ते चार वाक्यांचा असावा, असा आग्रह असे.

बातमीत माहिती असावी, मतप्रदर्शन नसावे, असा आग्रह धरला जाई. बातमीदाराने मनाचे काही लिहू नये किंवा टिप्पणी करू नये, असे सांगितले जाई. हा कर्मठपणा किंवा सोवळेपणा एकविसाव्या शतकाच्या आधीपासून संपला. इंग्रजी दैनिकांनी जुने निकष मोडून नवे रूढ केले.

‘इंट्रो’च्या किंवा बातमीच्या सोवळेपणाच्या कुठल्याही (जु्न्या) निकषांमध्ये ‘बिझनेस स्टँडर्ड’ची ही बातमी बसत नाही. तिचा पहिलाच परिच्छेद मजेशीर नि वेगळी माहिती देणारा आहे. त्याचा ‘वागशीर’शी, त्या पाणबुडीच्या मालिकेशी, भारतीय नौदलाशी किंवा कार्यक्रम जिथे झाला त्या माझगाव गोदीशी थेट काही संबंध नाही. ‘जगभरातील कोणत्याही नौदलात एखादे लढाऊ जहाज दाखल केले जाते, तेव्हा त्या युद्धनौकेला मानवंदना दिली जाते, ती महिलेच्या हस्ते फेसाळत्या शाम्पेनची बाटली फोडून.’ बातमीचं हे पहिलं वाक्य. ही परंपरा २०१४मध्ये ब्रिटिश महाराज्ञी एलिझाबेथ (दुसरी) ह्यांनी काही पाळली नाही. ब्रिटनच्या शाही नौदलात विमानवाहू नौका दाखल करण्यात आली, तेव्हा राणीनं खास स्कॉटिश ‘बोमोर सिंगल माल्ट व्हिस्की’ची बाटली फोडली. ब्रिटिश महाराज्ञी (शत्रूराष्ट्र) फ्रान्सची शाम्पेन का म्हणून बरे वापरील? आणि तेही आपलं आरमार अधिक सज्ज होत असताना? ही व्हिस्की शाम्पेनप्रमाणे फेसाळती होती की तिचे फवारे उडाले की नाही, ह्याची माहिती मात्र बातमीत नाही.

पहिले दोन परिच्छेद असे लिहिल्यानंतर वार्ताहर अजय शुक्ल ‘वागशीर’कडे वळतात. तिसऱ्या परिच्छेदात ते लिहितात फेसाळती शाम्पेन किंवा स्कॉटिश सिंगल माल्ट वापरण्याची पद्धत भारतात नाही. इथे प्रमुख पाहुण्या महिलेने नारळ फोडून (आपल्या भाषेत ‘श्रीफळ वाढवून’!) सलामी दिली. तो मान मिळाला संरक्षण सचिवांच्या गृहमंत्री वीणा अजयकुमार ह्यांना. त्यानंतर स्कॉर्पिन शब्दाच्या स्पेलिंगमधली गंमतही त्यांनी सांगितली आहे. बातमीत त्यांनी ‘Scorpene’असंच लिहिताना कंसात स्पष्टीकरण केलं आहे - scorpion हा इंग्रजी शब्द फ्रेंच असा लिहितात!

बातमीत मग पुढे स्कॉर्पिन पाणबुडी मालिकेची सविस्तर माहिती आहे. त्यात तांत्रिक तपशील आहेत नि आर्थिक माहितीही आहे. मालिकेतील आधीच्या पाच पाणबुड्यांबद्दलही लिहिलं आहे. सर्वांगानं माहिती देणारी अशी ही बातमी म्हणावी लागेल. मराठी माध्यमांच्या तुलनेनं खूप सविस्तर.

ही बातमी वाचताना मजा आली. हे काही पहिलंच उदाहरण नव्हे. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये असं चालूच आहे. बातमी वाचल्यावर विचार करताना लक्षात आलं की, आता कुठलीही बातमी ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’, विविध संकेतस्थळांमुळं काही मिनिटांत कळते. वृत्तपत्रांमध्ये काही तासांनंतर छापून येणारी बातमी तुलनेने शिळीच म्हटली पाहिजे. ती ताजी नसणार, हे उघडच. पण ती किमान वेगळी वाटण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी ती लिहिण्याची धाटणी, तिचे शीर्षक देण्याची पद्धत बदलली पाहिजे. नित्य नवे प्रयोग करायचे स्वातंत्र्य वार्ताहर-उपसंपादकांना मिळायला हवे. मुद्रित माध्यमांमध्ये पूर्वी आग्रह असलेला ‘गोळीबंद लीड’ आता डिजिटल, सामाजिक माध्यमांसाठी आवश्यक आहे. त्यांना थोडक्यात आणि तातडीनं वाचकांपर्यंत ‘बातमी’ पोहोचवायची असते.

सहज म्हणून एक उदाहरण - नगरच्या जुन्या नगरपालिकेच्या इमारतीत वरच्या मजल्याला आग लागली. ‘कौन्सिल हॉल’ म्हणून ते सभागृह प्रसिद्ध आहे/होते. आग लागली ती एक मेच्या सायंकाळी पाच-साडेपाच वाजता. दैनिकांनी कामगार दिनाची सुटी घेणे नुकतेच सुरू केले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणताच अंक प्रकाशित होणार नव्हता.

ही बातमी आता थेट तिसऱ्या दिवशी, म्हणजे तीन मे रोजी सकाळी वाचकांना दिसणार होती - घटना घडल्यानंतर किमान ३६ तासांनी. आमच्या वार्ताहराने सरधोपट पद्धतीने बातमी लिहिली आणि उपसंपादकाने ‘कौन्सिल हॉल आगीत खाक’ असे चाकोरीबद्ध, पठडीतले शीर्षक दिले.

आग लागल्यानंतर बरेच नगरकर थेट घटनास्थळी जाऊन पाहून आणि आवश्यक ती हळहळ व्यक्त करून आले होते. त्यांना माहीत असलेलीच बातमी आम्ही दीड दिवसाने त्यांच्या समोर टाकणार होतो. उपसंपादकाला तसे म्हटल्यावर त्याचे उत्तर होते, ‘बातमीत तसं वेगळं काही लिहिलंच नाही.’

थोडा वेळ थांबून शीर्षक दिलं - ‘आग माथ्याला, बंब पायथ्याला!’ आग लागलेल्या ह्या इमारतीला अगदी खेटूनच अग्निशामक दलाचं मुख्य कार्यालय आहे. त्यांना ही आग लगेच आटोक्यात आणता आली नव्हती. अर्थात, हे शीर्षक म्हणजे फक्त मलमपट्टी होती. तथापि त्यानं वाचक बातमी वाचण्याकडे वळेल, एवढं तरी साधणार होतं.

उद्या असं काही होईल का? बातमी जाणून घेण्याची ओढ असलेले डिजिटल माध्यमांकडे, सामाजिक माध्यमांकडे वळतील आणि बातमीमागची बातमी किंवा घटनेमागचा कार्यकारण भाव, विश्लेषण वाचण्यासाठी ते मुद्रित माध्यमांवर अवलंबून राहतील?

....

#वागशीर #पाणबुडी #नौदल #वृत्तपत्रे #बातमी #मराठी_इंग्रजी #लीड #बातमीची_व्याख्या #5W&1H #media #print_media #digital_media #social_media #thebusinessstandard

Wednesday 6 April 2022

मुंबईच्या धावत्या दौऱ्यातील नोंदी


‘लोकसत्ता-तरुण तेजांकित’ ठरलेला ओंकार कलवडे.
त्याच्या ह्या कार्यक्रमानिमित्तच मुंबईचा धावता दौरा झाला.

गोष्ट
जुनी आहे; पण शिळी नाही. अगदी आठवडाभरापूर्वीची. मार्चअखेरीची. लिहू लिहू म्हणताना उशीर झाला. ‘मायानगरी’, ‘मोहनगरी’ म्हणविल्या जाणाऱ्या मुंबईला गेलो होतो. देशाची आर्थिक राजधानी आणि आर्थिक वर्षाची अखेर. पण हा केवळ योगायोग. निमित्त वेगळंच होतं.

मुंबई फिरायची, फिरत फिरत पाहायची बाकी आहेच. तिथला जगप्रसिद्ध वडा-पाव खायचा आहे. ‘माहीम हलवा’ घ्यायचा आहे. फॅशन स्ट्रीटला जाऊन घासाघीस करीत मस्त कपडे-खरेदीचा आनंद लुटायचा आहे. पुस्तकांचे ढीगच्या ढीग उचकून एखादं-दुसरं पुस्तकं बाळगायचं आहे. नॅशनल बुक ट्रस्टचं कार्यालय समुद्राच्या समोर आहे. तिथं जायचं आहे. असं खूप खूप करायचं आहे. त्याला मुहूर्त काही लागत नाही...

फार वर्षांपूर्वी, बरोबर पाच दशकांपूर्वी तब्बल महिनाभर ह्या महानगरीत राहिलो होतो. माझ्या आत्येभावानं - नानानं बऱ्याच ठिकाणी फिरवलं होतं. तो अकलूजहून तिथं रुजू पाहत होता. त्याचा मोठा भाऊ - आप्पानं मिसळ-पावची दीक्षा दिली होती. तेव्हा ‘उषाकिरण’ म्हणे तिथली सर्वांत उंच इमारत होती. आता सूर्याच्या किरणांना मज्जाव करणारे कैक टोलेजंग टॉवर ह्या शहरात उभे आहेत. मानेला रग लागेपर्यंत आकाशाकडे पाहत त्या मनोऱ्याबाबत अचंबा व्यक्त करायचा आहे.

अलीकडच्या १०-१२ वर्षांत चार-पाच वेळा तरी मुंबईसहल झाली. ‘लोकसत्ता’मध्ये असताना लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकींच्या निमित्ताने मुंबई मुख्यालयात आमच्या बैठका झाल्या. पुण्याहून गाडीत बसायचं नि मुंबईतल्या कार्यालयात उतरायचं. तिथली बैठक संपली की, परत गाडीत बसून पुण्याकडे कूच. मुंबई काय, समुद्र पाहायलाही वेळ नसायचा. त्यातल्या शेवटच्या बैठकीच्या वेळी वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास केला, एवढं आठवतं. तो नुकताच खुला झाला होता. पुण्याला परतताना त्यावरून गेलो, तेव्हा टोल नव्हता. त्या नव्याकोऱ्या पुलावरून जाण्याचं थ्रिल वेगळंच होतं.

अलीकडं ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेचं पारितोषिक घ्यायला गेलो होतो - ‘खिडकी’ नंबर एक ठरली होती, त्यांच्या स्पर्धेत. त्यालाही आता तीन वर्षं झालं. पुण्याहून निघाल्यावर आम्ही वाहतुकीच्या कोंडीत अडकलो आणि कार्यक्रम सुरू झाल्यावर तिथे पोहोचलो. अंधेरीचं ते हॉटेलही मस्त होतं. त्या वेळी फक्त मुंबादेवीचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि घाईतच परत निघालो. त्या वेळी आधी कळवूनही मृदुलाताई (जोशी) ह्यांची भेट घेणं जमलंच नाही. ती रुखरुख आजही कायम आहे.

‘लोकसत्ता’च्या तरुण तेजांकित पुरस्कारांचं वितरण रविवारी (दि. २७ मार्च) परळच्या ‘आयटीसी ग्रँड सेंट्रल’मध्ये झालं. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये आमचा एके काळचा सख्खा शेजारी उद्योजक ओंकार कलवडे याचा समावेश होता. आमचं शनिवारी मध्यरात्रीनंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बोलणं झालं. कार्यक्रमासाठी तो फ्रँकफर्टहून दिल्लीमार्गे आणि मी नगरहून पुण्यामार्गे साधारण एकाच वेळी मुंबईत पोहोचलो. तारांकित ‘आयटीसी ग्रँड सेंट्रल’कडे जाताना ओळखीच्या खुणा दिसत होत्या...माटुंगा, माहीम. मग लक्षात आलं की, लहानपणी खेळलेल्या ‘व्यापार’च्या आठवणी वर येताहेत.


कोलकता नाईट रायडर्सचा
मुक्काम असल्याच्या खाणाखुणा.

हॉटेलचा व्याप बाहेरून अर्थातच लक्षात येत नाही. आत गेल्यावर आय. पी. एल.च्या खाणाखुणा दिसल्या. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ तिथंच मुक्कामी होता. आम्ही गेलो तेव्हा खेळाडू सराव करून नुकतेच परतले असावेत. कारण आरामबस उभी होती. कुणी तरी चाहता फोटो काढत होता आणि सुरक्षारक्षक कुणावर तरी ओरडत होता. कार्यक्रम सुरू होण्याच्या थोडं आधी पाहिलं, तर के. के. आर.चा परिसर अगदी कडेकोट बंदोबस्तात होता. बाहेर त्यांचे फलक आणि त्यावर कर्णधार श्रेयस अय्यरचे फोटो झळकत होते.

कार्यक्रम सुरू होण्याच्या बरंच आधी आम्ही पोहोचलो. चहा-कॉफी-बिस्किटं अशी सोय होती. मला कॉफी हवी होती. तेवढ्यात अभिनेता पुष्कर श्रोत्रीही तिथे आले. त्यांनाही कॉफीच हवी होती. माझ्यासाठी तयार केलेली कॉफी देऊ केली. त्यांनीही ‘घेऊ ना नक्की?’ असं हसत विचारत कप उचलला. इथं त्यांची नेमकी भूमिका कोणती ह्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळालं.

तारांकित हॉटेलांमधला चहा फार काही चांगला नसतो, असं तिथला (नेहमीचा) अनुभव असणाऱ्यांनी सांगून-लिहून ठेवलंच आहे. म्हणून मग कॉफीला प्राधान्य दिलं. तीही बिचारी चहाच्या भांड्याशेजारीच असल्यानं ‘वाण नाही पण गुण लागला’ अशी अवस्था होती. एवढ्या मोठ्या ठिकाणी मुंबईतला प्रसिद्ध भटाचा मसाला चहा किंवा माटुंग्याच्या ‘द मद्रास कॅफे’सारखी फिल्टर कॉफी मिळणार नाही, हे गृहीतच होतं. तरीही... एक गंमत सांगायची राहिलीच. तिथं म्हणे चहा-कॉफीत टाकण्यासाठी साखरेच्या पुड्यांप्रमाणंच गुळाच्या भुकटीच्या पुड्याही होत्या. सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत असलेला गुळाचा चहा! दुसऱ्या वेळी आमच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्यानं गूळ घातलेला चहा पाजला.


हॉटेलच्या दालनातलं एक चित्र.

सभागृहात जाण्यापूर्वी असलेल्या त्या प्रशस्त दालनात खूप मंडळी येताना दिसत होती. अनिल काकोडकर, ज्यांच्या पुस्तकावर खूप पूर्वी लिहिलं त्या प्रियदर्शिनी कर्वे आणि अजून बरीच; ज्यांचे चेहरे ओळखीचे वाटायचे नि नाव आठवायचं नाही, असे.

कार्यक्रमाची सुरुवात सुरेल होती. त्याची जबाबदारी ‘द म्यूझिशियन्स’ ह्या बँडवर होती. फक्त आणि फक्त वाद्यसंगीत. कार्यक्रम अर्ध्या-पाऊण तासाचाच झाला. पण तेवढ्या वेळात जमलेले सारेच मंत्रमुग्ध झाले. सत्यजित प्रभू, अमर ओक, महेश खानोलकर, नीलेश परब, दत्ता तावडे, आर्चिस लेले अशी दिग्गज वादकमंडळी होती आणि सूत्रसंचालनाला पुष्कर श्रोत्री. कॉफीपानावेळी पडलेल्या प्रश्नाचं उत्तर. खानोलकरांनी व्हायोलीनवर मजा आणली. ‘ते गाण्याची चाल नाही, तर शब्द वाजवून दाखवतात,’ असं पुष्कर श्रोत्री ह्यांनी सांगितलं ते खरंच होतं. हिंदी-मराठी अशी बरीच गाणी ऐकायला मिळाली.

छोट्या पडद्यावर नेहमी दिसणारे नीलेश परब इथे होते. तिथल्यासारखेच हसत, बेभान वाजवत. ह्या छोट्या कार्यक्रमातही ते अगदी तल्लीन झाले होते. त्यांना विविध वाद्यं वाजवताना पाहिल्यावर वाटलं की, हा माणूस स्वतःसाठीच वाजवत असतो आणि त्याचा हर एक क्षणाचा आनंद लुटत असतो! त्यात सहभागी होता येतं, हे आपलं भाग्य. अमर ओक त्याच तल्लीनपणे बासरीतून सूर काढत होते आणि आर्चिस लेले तबल्यावर ठेका धरत होते.

‘ज्वेल थीफ’मधलं ‘होठों पे ऐसी बात...’ गाणं लागलं की, पुण्यातल्या नातूबागेचा गणपती आठवतो. गणेशोत्सवात त्यांचा देखावा रोषणाईचा असायचा आणि ह्या गाण्याच्या तालावर हजारो रंगबिरंगी दिवे नाचत असत. अर्धा तास रेंगाळल्यावर दोनदा तरी ही बात कानी पडायचीच. कार्यक्रमाची सांगता ह्याच गाण्यानं झालं. तो अनुभव भलताच थरारक होता. सारेच वादक कसे बेभान झाले होते. निवेदकाचं काम संपवून पुष्कर श्रोत्रीही वादकाच्या भूमिकेत शिरला होता.


कार्यक्रम संपल्यानंतरचा छोटा सा ब्रेक कॉफीच्या कपाच्या साथीनं.

ह्या कार्यक्रमानंतर ही सारी मंडळी चहाच्या कपाच्या संगतीने ‘छोटा सा ब्रेक’ घेत होती, तेव्हा त्यांना मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपलं. आठवण म्हणून! दहा मिनिटांपूर्वी काय कहर माजवित होती, ह्याची कल्पनाही येऊ नये इतक्या निवांतपणे हास्य-विनोद करीत ते ब्रेकची मजा घेत होते.


मानसी जोशी... तरुण तेजांकित
(छायाचित्र तिच्या ट्विटर खात्यावरून)
बाकी मुख्य कार्यक्रम फार छान झाला. एकूण १६ तरुण तेजांकितांना गौरवण्यात आलं. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित केलं जाई, तेव्हा त्यांच्या कामगिरीची छोटी चित्रफित दाखविली जाई. बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिचा जीवनप्रवास थक्क करणारा होता. अभियंता असलेल्या ह्या तरुणीला अपघातांना आणि त्यानंतर अनेक वैद्यकीय उपचार-शस्त्रक्रिया ह्यांना सामोरं जावं लागलं. मग बॅडमिंटन खेळू लागली. सलाम! तिची चित्रफित सुरू झाल्यापासून टाळ्यांचा गजर चालू झाला आणि पुरस्कार घेऊन ती खाली आल्यावरच तो थांबला. तिला व्यासपीठावर येण्याकरिता हात देण्यासाठी जॉर्ज वर्गिसही नकळत क्षणभर पुढे आले होते. पण मानसीची कर्तबगारी कानी पडत असल्याने ते तत्क्षणीच मागे झाले.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांची छोटी मुलाखतही छान झाली. पुरस्कार देताना प्रत्येक विजेत्याशी ते एखादा मिनिट आवर्जून बोलत होते. क्वचित एखाद्याच्या पाठीवर हात टाकत होते. एकूणच हा तीन-साडेतीन तासांचा कार्यक्रम फार छान झाला आणि तो जवळून अनुभवता आला.

...फक्त एकच - मुंबई पाहायची राहूनच गेलं की पुन्हा!

आणि ‘ये है बॉम्बे, ये है बॉम्बे मेरी जान...’ गुणगुणायचं राहून गेलं!!

.........

#तरुण_तेजांकित #ओंकार_कलवडे #लोकसत्ता #मुंबई #ब्लॉग_माझा  #मानसी_जोशी #नीलेश_परब #पुष्कर_श्रोत्री #द_म्यूझिशियन्स_बँड

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...