Wednesday 22 December 2021

हसायला बंदी नि रडायची चोरी

 

मनुष्यप्राण्याला हसण्याची अद्भुत देणगी मिळालेली आहे म्हणतात. ह्या देणगीचं रहस्य शोधण्यासाठी खूप संशोधन झालं, चालू आहे. त्यातून काही निष्कर्ष संशोधकांनी काढले आहेत. हसण्याचे खूप फायदे सांगितले जातात नि कारणंही. का हसतो माणूस - एखादा विनोद झाला म्हणून? कुणाची फजिती झाल्यामुळं? ही दोन्ही कारणं खरी असली, तरी ती तेवढीच नाहीत. हसणं संवादाचं एक साधन आहे. चेहऱ्यावर फुलणारं हसू समाजातील नातेसंबंध वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं, असं संशोधक-अभ्यासकांचं मत आहे.

हसू बऱ्याच वेळा भावनांचं दर्शन घडवतं, असं म्हणतात. हसण्याने ताण हलका होतो, मन मोकळं होतं. सिग्मंड फ्रॉईड ह्यांनी म्हटलंय की, 'हसण्यामुळे मानसिक कोंडी दूर होते. मनावरचं दडपण आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते.' हसणं आरोग्यासाठी चांगलं आहे, असं मानलं जातं. 

...तर ह्या हसण्यावर अचानक कुणी बंदी आणली तर? अमूक इतके दिवस अजिबात हसायचं नाही! एखादी तरी स्मितरेषा... नाव नको. कठोरपणे पालन झालंच पाहिजे निर्बंधाचं. तो मोडला तर शिक्षा. ही शिक्षा काय असेल, ह्याचा अंदाज करणं कठीण. संबंधित व्यक्ती कुटुंबीयांना, आप्तांना, मित्र-स्नेहीजनांना भविष्यात कधीही न दिसण्याची दाट भीती.

'शोकमग्न' उत्तर कोरियात ही बंदी आलेली आहे. देशाचा कारभार ज्याच्या लहरीवर चालतो, तो हुकुमशहा किम जोंग-उन शुक्रवारपासून (दि. १७ डिसेंबर)  सुतकात आहे. त्याचे वडील आणि आधीचे अध्यक्ष किम जोंग-इल ह्यांच्या निधनाला शुक्रवारी १० वर्षं झाली. मरणाचा दशकपूर्ती सोहळा करताना ११ दिवसांचा सार्वत्रिक शोक व्यक्त केला जात आहे. ह्या काळात कुणी हसायचं नाही, कसली खरेदी करायची नाही आणि मद्यपान करायचं नाही, असा सक्त आदेश आहे. तसं करताना कुणी आढळलंच तर कठोर शिक्षा. आदेशाचं कुणी उल्लंघन करीत नाही ना, हे पाहण्यासाठी पोलीस खातं दिवस-रात्र लक्ष ठेवून आहे.

बंधनं एवढ्यावरच संपत नाहीत. अजूनही आहेत. स्मृतिदिनी साधं किराणा सामान आणण्याचीही परवानगी नव्हती. ह्या शोकपर्वाच्या दरम्यान कुणाचा वाढदिवस येत असल्यास, त्यानं तो मुळीच साजरा करायचा नाही. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, तर त्याचं दुःखही मर्यादेत व्यक्त करायचं. रडण्याचा आवाज घराबाहेर मुळीच येता कामा नये. मृताला शेवटचा निरोप देण्यासाठीही वाट बघायची. हा अकरा दिवसांचा शोककाल संपल्यावरच 'राम नाम सत्य है' म्हणायचं! हसायला बंदी आणि रडायची चोरी.

उत्तर कोरियातील ह्या तुघलकी फर्मानाच्या बातमीने आंतरराष्ट्रीय पातळीवर माध्यमांचं स्वाभाविकच लक्ष वेधून घेतलं. 'द गार्डियन', 'न्यूजवीक', ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतील पोर्टल ह्यांनी बंदीची बातमी ठळकपणे प्रसिद्ध केली. भारतातील वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरचित्रवाणी वाहिन्या ह्यांच्या संकेतस्थळावर तर ही बातमी शुक्रवारीच झळकली. ह्या सर्वांच्या बातमीचा स्रोत एकच आहे - 'रेडिओ फ्री एशिया'. 'द गार्डियन'नं ह्या बातमीचा व्हिडिओ संकेतस्थळावर दिला आहे. त्यात म्हटलंय की, (ह्या शोककाळात) कुठल्याही प्रकारे आनंदाची भावना व्यक्त करण्यासच सक्त मनाई आहे.


प्योंगयांगमध्ये उभे असलेले किम-संग आणि किम जोंग ह्यांचे पुतळे.
शोकपर्वाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. 
(छायाचित्र सौजन्य - किम वोन जिन)

मग औत्सुक्य वाटलं की, खुद्द उत्तर कोरियातील दैनिकांनी ही बातमी कशा पद्धतीनं प्रसिद्ध केली असेल? तिथल्या पाच-सहा दैनिकांची संकेतस्थळं पाहिली. बहुतेक सारी दैनिकं सरकारी मालकीची किंवा सरकारच्या वर्चस्वाखालची आहेत. कोणत्याही संकेतस्थळावर अशा प्रकारच्या बंदीची बातमी दिसली नाही. ती खोडून काढणारीही बातमी कुठं आढळली नाही. 'किम जोंग-उनच्या नेतृत्वावर देशाचा अढळ विश्वास आहे,' अशा आशयाचे लेख, संपादकीय मात्र त्या दिवशी प्रसिद्ध झाल्याचं 'कोरिया टाइम्स'च्या वृत्तान्तामध्ये म्हटलं आहे. 

देशाचा सर्वेसर्वा असलेल्या किम जोंग-उन ह्यानं काढलेलं फर्मान मोडण्याचा परिणाम काय होतो, ह्याची उत्तर कोरियाई जनतेला पूर्ण जाणीव आहे. त्याच्या एक दशकाच्या राजवटीत आतापर्यंत २७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा जाहीरपणे देण्यात आलेली आहे.

योगायोगाची गोष्ट अशी की, ज्या दिवशी उत्तर कोरियात ह्या 'राष्ट्रीय शोका'ची आणि त्यानिमित्तच्या निर्बंधांची घोषणा झाली, त्याच दिवशी दक्षिण कोरियातील 'कोरिया जूंगअँग' दैनिकानं एक बातमी ठळकपणे प्रसिद्ध केली. ती बातमी आहे संयुक्त राष्ट्रांत मंजूर झालेल्या निषेध ठरावाची. उत्तर कोरियात सलग १७ वर्षांपासून मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे आणि त्याचा संयुक्त राष्ट्र महासभेने निषेध केला. महासभेनं एक दिवस आधीच (गुरुवार, १६ डिसेंबर) हा ठराव एकमतानं मंजूर केला. नागरिकांचा अनन्वित छळ, अमानवी पद्धतीच्या शिक्षा, राजकीय कैद्यांच्या छावण्या, लैंगिक अत्याचार, स्वदेशी आणि परदेशी नागरिकांचं अपहरण, आचार-विचार स्वातंत्र्यावर बंदी, परदेशात गेलेल्या कामगारांचे शोषण अशा अनेक प्रकारे मानवी हक्क पायदळी तुडविले जात असल्याचं निषेधाच्या ठरावात म्हटलं आहे.

दक्षिण कोरियातील 'द डोंग-ए' दैनिकानंही (त्याचा अर्थ 'मूळ' किंवा 'अस्सल' असा आहे.) ह्या निषेध ठरावाच्या निमित्तानं संपादकीय लिहिलं आहे. त्याचं शीर्षक आहे - North Korea is like a time-bomb set into motion. त्यात म्हटलं आहे की, किम जोंग कुटुंब तीन पिढ्यांपासून सत्तेवर आहे. किम जोंग-इल ह्यांच्या मृत्यूला एक दशक होत असताना उत्तर कोरिया अजिबात बदललेला नाही. किम कुटुंबाबद्दल निष्ठा व्यक्त करण्याची शपथ घेण्यासाठी जनतेवर जुलूम-जबरदस्ती केली जाते. मानवी हक्कांचं उल्लंघन हे तिथलं अतिकटू वास्तव आहे.

कोरोनाच्या अर्थात कोविड-१९च्या महामारीनं अवघं जग त्रस्त असताना उत्तर कोरियामध्ये नेमकी काय परिस्थिती होती, हे काही फारसं स्पष्ट झालेलं नाही. जगभरात कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या येऊ लागताच ह्या देशानं जानेवारी २०२०मध्ये आपल्या सर्व सीमा कडेकोट बंद केल्या. कोरोनावर लसीकरणाचा उपाय जगानं स्वीकारला असताना, उत्तर कोरियानं मात्र त्याकडे पाठ फिरविली. विविध देशांनी लस देण्याची तयारी दाखवली असताना उत्तर कोरिया सरकारनं त्याबद्दल थोडंही औत्सुक्य दाखवलं नाही. 'कोव्हॅक्स'नं चीनमध्ये विकसित केलेल्या 'साइनोव्हॅक' लशीचे तब्बल ३० लाख डोस देऊ केले होते. तेही स्वीकारले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियात कोरोनावरचं लसीकरण झालेलंच नाही.

किम जोंग-उन तुघलकी वागण्याबद्दल (कु)प्रसिद्ध आहेच. त्यामुळे त्याच्या ह्या नव्या फर्मानाबद्दल फारसं आश्चर्य वाटलेलं नाही जगभरात. कोरियातील रहिवाशांना दोन वर्षांपूर्वी लांबलचक कातडी कोटात आपल्या अध्यक्षाचं दर्शन झालं. तो कोट लोकप्रिय झाला. पण आपल्या पोषाखाची कुणी नक्कल करू नये म्हणून त्यानं जनतेला तसा कोट वापरण्यावर बंदी आणली. 'राजा प्रजेसारखा नव्हे, तर तिच्याहून वेगळाच दिसला पाहिजे. तेच त्याचं वैशिष्ट्य असावं,' अशी काहीशी किम जोंगची भावना असावी.


उत्तर कोरियाचा हुकtमशहा किम जोंग-उन याने प्योंगयांगमधील कुमसुसान राजवाड्यात
आपल्या पित्याला दहाव्या स्मृतिदिनी आदरांजली वाहिली.
(छायाचित्र सौजन्य - योनहॅप)

चमचमीत खाणे, बेहोश होण्याएवढे पिणे, बेभान जल्लोष करणे ह्यावर सुतकाच्या काळातली बंदी समजून घेता येईल कदाचित. पण हसण्यावर बंदी? उत्तर कोरियात एकूणच राज्यकर्त्यांना हसण्याचा तिटकारा आहे का? किम जोंग-उनची अनेक छायाचित्रं उत्तर कोरियातील दैनिकांच्या संकेतस्थळावर पाहायला मिळतात. त्यातली दोन लक्षणीय वाटतात. एका छायाचित्रात सैन्यदलातील महिला जवान-अधिकाऱ्यांच्या घोळक्यात किम आहे. त्याच्या जवळच्या सर्व महिला रडताना दिसतात. दुसरं छायाचित्र शाळेतलं आहे. त्यात दिसतात किमच्या मागे धावणारी, आसपास घोटाळणारी चिमुकली मुले. त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहताना पाहायला मिळतात.

हसण्याचं एवढं वावडं का असावं बरं? हसणं म्हणजे नेहमीच विनोदावर किंवा कुणाची फजिती झाली म्हणून नसतं. बी. बी. सी. इंग्रजी संकेतस्थळावर आरोग्य विभागात हसण्याची कारणमीमांसा करणारा लेख आहे. त्यात लिहिलं आहे की,  माणसे का हसतात? आपण समाधानी, आनंदी आहोत, हे ते त्यातून दाखवून देऊ इच्छित असतात. परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते हसताना दिसतात.

मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट प्रोव्हिन ह्यांना अभ्यासात असं आढळलं की, माणसं विनोदापेक्षा मित्रांशी बोलताना अधिक वेळा हसतात. आपण इतर कुणाबरोबर असलो की, तीसपटीनं जास्त हसतो. आपण हसतो ते प्रतिक्रियांवर, विधानांवर - अनेक वेळा त्यात विनोदाचा दूरवर संबंध नसतो.

हसणं म्हणजे संवादाचं एक साधन आहे. ते नेहमीच काही प्रतिक्रियेदाखल नसतं. लोक आपल्याला आवडतात आणि आपण त्यांना समजून घेतो, हे दाखवून देण्याचं हास्य एक साधन आहे, असंही ह्या लेखात म्हटलं आहे.

हसण्यावरची मराठी विश्वकोशातली नोंद आहे - हसण्याची शारीरिक प्रतिक्रिया सर्व माणसांत सारखी असली, तरी या प्रतिक्रियेला जन्म देणाऱ्या मानसिक कारणांत मात्र विविधता आहे. बालकांमध्ये हास्य केवळ आनंदाचे निदर्शक असते. परंतु प्रौढांमध्ये मात्र हास्यामागची मानसिक भूमिका विविध प्रकारची असू शकते. ही विविधता हास्याचे वर्णन करणाऱ्या विविध शब्दयोजनांनी स्पष्ट होते. उदाहरणार्थ, निरागस हास्य, तिरस्कारयुक्त हास्य, तुच्छतादर्शक हास्य, उपहासात्मक हास्य, निंदाव्यंजक हास्य, छद्मी हास्य वगैरे. हास्य हे शरीर व मन दोन्हींचे टॉनिक आहे, उपकारक आहे, आरोग्यकारक आहे. हास्याची खरी उपयुक्तता त्याच्या सामाजिकतेत आहे.

असं असताना हसण्याबाबत एवढी टोकाची भूमिका का? एकट्या किम जोंगलाच हसण्यावर बंदी आणावी वाटते की जगभरातील सगळ्याच हुकूमशहांना हसण्याबद्दल भीती वाटते? 'हुकूमशहा हसत नसतात,' असं मुसोलिनीनं म्हटल्याची आठवण लिंकन मेमोरियल विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. स्टुअर्ट डब्ल्यू. मॅकक्लेलंड ह्यांनी लॉस एंजेलेस इथल्या व्याख्यानात (१९४२) सांगितली आहे.

बी. बी. सी.च्या लेखात म्हटलेलं आहे की, उंदीर हसतात, चिंपांझी हसतात आणि कुत्रीही. उंदीर विनोदावर हसत नाहीत, तर खेळताना हसतात. प्रसिद्ध लेखक राल्फ वाल्डो इमर्सन ह्यांनी लिहिलंय - पृथ्वी फुलांच्या रूपात हसते. एका वचनानुसार आशावादी सगळं विसरण्यासाठी हसतो आणि निराशावादी हसायचंच विसरतो.

उत्तर कोरियातील लोकप्रिय विनोद

उत्तर कोरियातील जनतेला हसण्याचं वावडं आहे का? काहींच्या म्हणण्यानुसार त्या माणसांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलत नाही. पण ही माणसंही हसतात, त्यांना विनोद प्रिय आहे, ह्याचे दाखले देणारेही आहेत. उत्तर कोरियामध्ये लोकप्रिय असलेले काही विनोद संकेतस्थळांवर सहज सापडतात. त्यात खूप नवीन किंवा वेगळे विनोद आहेत असं नाही. बरेच विनोद असे असतात की, ते फिरत जातील तिथली वेषभूषा स्वीकारतात, त्या मातीचे संदर्भ अंगीकारतात. उत्तर कोरियातील विनोदांचंही तसंच आहे. त्याचा थोडा मासला -

हा पहिला...

सामाजिक माध्यमावर कुणी तरी प्रश्न विचारलेला असतो - 'डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया' ह्या देशात खटकण्यासारखं काय आहे?

...काही क्षणांत उत्तर मिळतं - पहिलाच शब्द, डेमोक्रॅटिक!


कोरोनाबद्दलचे दोन विनोद...

उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण कसा नाही आढळला बुवा?

त्यात काय. तिथं नेहमीच 'लॉकडाऊन' चालू असतं!

आणि हा दुसरा...

देशातील कोरोनाच्या रुग्णांची दर अर्ध्या तासाने दिली जाणारी ताजी माहिती -

सकाळी ८.०० -

८.३० -

९.०० -

९.३० -

१०.०० -

१०.३० -


हा थोडासा राजकीय विनोद -

उत्तर कोरियातील एका तुरुंगातील कैदी तिथल्या ग्रंथालयात पुस्तक आणायला जातो. एका चळवळ्या कार्यकर्त्याचं गाजलेलं पुस्तक त्याला वाचायचं असतं.

ग्रंथपाल म्हणतो, ''पुस्तक काही नाही गड्या. पण तो लेखक इथंच आहे!''

आणि हा समारोपादाखल...

कलादालनात चित्रप्रदर्शन चालू असतं. हातात सफरचंद घेऊन असलेल्या ॲडम आणि इव्ह ह्यांचं चित्र अगदी मन लावून पाहताना इंग्रज नागरिक म्हणतो, 'हे अगदी शंभर टक्के इंग्लिश नागरिक आहेत. कारण त्यातला पुरुष सर्वोत्तम खाणं एका स्त्रीबरोबर वाटून घेतोय.'

त्याला अडवत फ्रेंच नागरिक म्हणतो, 'काही तरीच काय! निर्वस्त्र असूनही किती मोकळेपणाने, विनासंकोच वावरताना दिसतात ते. फ्रेंचच आहेत ते मुळी.'

त्या दोघांनाही झिडकारत उत्तर कोरियाचा नागरिक म्हणतो, 'हे दोघं उत्तर कोरियाचेच. शंकाच नाही. त्यांच्याकडे कपडे नाहीत, जवळ पुरेसं खायला नाही आणि तरी त्यांचा आविर्भाव आपण स्वर्गात बागडत असल्यासारखा आहे बघा!'

------------------------------

(संदर्भ - koreatimes.co.kr, donga.com, rfa.org, hankookilbo.com, mirror.co.uk koreajoongangdaily.joins.com, koryogroup.com/jokes, upjoke.com/north-korea-jokes, mirror.co.uk)

------------------------------

#northkorea #nolaughing #kim_jong_un #mourning #corona #covid19 #vaccination #UN #dictator #koreanjokes #smile #southkorea #humanrights


Thursday 16 December 2021

कार्यकर्ताही नि पत्रकारही!


सुधीर मेहता. नगरमध्ये पत्रकारिता आणि राजकारण करणाऱ्या (आणि एकाच वेळी ह्या दोन्ही गोष्टी करणाऱ्या) माणसांना हे नाव माहीत नाही, असं होणारच नाही. साधारण दोन हजारच्या आधी पत्रकारितेत आलेल्या, सत्तरनंतर राजकारणात आलेल्या बहुतेक सगळ्यांची सुधीरशी ओळख होती. काही अपवाद वगळले तर त्यांचे सुधीरशी अरे-तुरेचे संबंध होते. पत्रकार त्याला पत्रकार कमी नि राजकीय कार्यकर्ता अधिक मानत आणि राजकारणी त्याला पत्रकार म्हणत. थट्टा, क्वचित टवाळी केली जात असली, तरी ह्या दोन्ही क्षेत्रांतल्या अनेकांना तो आपला वाटत राहिला. त्यांचे त्याच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते.

नगरमध्ये ३३ वर्षांपूर्वी आलो मी. 'केसरी'मध्ये रुजू झालो. सर्जेपुऱ्यातल्या प्रियदर्शनी संकुलातील कार्यालयात सुधीरला पहिल्यांदा पाहिलं. तेव्हा तो 'एन. एस. यू. आय.'चं आणि युवक काँग्रेसचं काम करीत होता. प्रसिद्धिपत्रकं घेऊन तो येत असे. त्याची ओळख 'पत्रकार' अशीही होती. कोणत्याच वर्तमानपत्रात काम न करणारा हा माणूस पत्रकार कसा, असा (भाबडा) प्रश्न तेव्हा पडला होता. त्यानं आधी कोणकोणत्या वर्तमानपत्रात ('गावकरी', 'नवा मराठा', 'लोकयुग' आदी) काम केलं होतं, हे माहीत असण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळंच ते आश्चर्य वाटायचं. तेव्हा तो साप्ताहिक चालवत होता - 'बिरादर' नाव असावं त्याचं. युवक बिरादरीशी संबंधित. ते क्वचित कधी पाहायला मिळे.

सोनईच्या प्रवीणसिंह परदेशी ह्यांचं पत्र 'केसरी'मध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यात राजीव गांधी ह्यांच्यावर जोरदार टीका केलेली. त्याला सुधीरनं उत्तर दिलं, ते पत्रक काढून नव्हे, तर पत्रच लिहून. राजीव गांधी ह्यांच्या करिष्म्यावर लुब्ध असलेल्या तरुण-तडफदार काँग्रेसजनांपैकी तो होता. त्या पत्रात त्यानं सणसणीत उपहासाचा आधार घेतला होता. त्याचं तसं लिखाण नंतर पाहायला मिळालं नाही. दोन-चार भेटीनंतर सुधीरची ओळख झाली. ती पुढे वाढणार होती. तो नेमकं करतो काय, ह्या प्रश्नाचं उत्तर तेव्हा मिळालं नव्हतं. पण पत्रकारांचा तो मित्र आहे, एवढं नक्की कळलं होतं.

विधानसभेची १९९०ची निवडणूक नगरसाठी वेगळी ठरली. अनिल राठोड ह्यांनी बाजी मारत शिवसेनेचा भगवा फडकावला. सुधीर त्यांचा 'भय्या, भय्या' असा एकेरी उल्लेखानं कौतुक करत होता. वाटलं की, नव्या सत्तास्थानाजवळ जाण्याची त्याची ही धडपड आहे. हा काँग्रेसचा कार्यकर्ता लगेच संधी साधून शिवसेनेचा झाला काय, असा प्रश्न पडला. सहकारी वार्ताहरानं माझा संभ्रम दूर केला. हे दोघं चांगले मित्र आहेत, त्याचा शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ता असण्याशी काही संबंध नाही, हे त्यानं सांगितलं. भय्या आणि सुधीर ह्यांचे संबंध कशा पद्धतीचे आहेत, ह्याचा उलगडा यथावकाश झाला. अर्थात सुधीरने ऐकवलेल्या किश्शांमधूनच.

त्यानंतर काही दिवसांतच सुधीर आमचा सहकारी बनला. तो 'केसरी'मध्ये वार्ताहर म्हणून रुजू झाला. हा कार्यकर्ता माणूस एकदम श्रमिक पत्रकार कसा झाला, हे तेव्हा पडलेलं कोडंच होतं. 'केसरी'मध्ये तसा तो 'पर्सोना नॉन ग्राटा' असल्यासारखा होता. माझे आणि त्याचे सूर मात्र जुळून आले. आमचे संबंध एकेरीचे झाले, मैत्रीचे झाले. तेव्हाच्या 'केसरी'मध्ये बातमी लिहिण्याचे, संपादित करण्याचे व प्रसिद्ध करण्याचे अनेक यम-नियम होते. ते सारे नियम सुधीरसारख्या 'फ्री बर्ड'ला जाचकच होते. तो बातमी लिहून टाकायचा. संपादनाचे सारे सोपस्कार करून मी ती छापण्यायोग्य बनवायचो. त्यातूनच त्याचं माझ्याबद्दलचं, माझ्या लिखाणाबद्दलचं कौतुक वाढत गेलं.

फोटोत आपण दिसलो पाहिजे, बातमीत आपलं नाव आलं पाहिजे, ही सुधीरची मूळची कार्यकर्ता वृत्ती. पत्रकारानं असं बातमीत झळकायचं आणि दिसायचं नसतं, हे काही त्याच्या पचनी पडत नव्हतं. एका गणेशोत्सवात त्याच्याकडं देखाव्यांची बातमी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. तो रोज एका मंडळाच्या देखाव्याचं उद्घाटन करायचा आणि रंगवून बातमी लिहायचा. बातमीचा लीड त्यालाच असे. छायाचित्रातही अपरिहार्यपणे तो असायचा. ती बातमी उपसंपादक म्हणून माझ्याकडे आली की, त्याला सांगून त्याचं नाव उडवून टाकायचो. कात्री घेऊन फोटोतून त्याला अलगद कापायचो. हे करताना 'फोटो असा कापायचा असतो बरं का...' असं शिकवण्याचा आव आणत त्याला सांगायचो. खोट्या रागानं तो पाठीत धपाटा मारायचा. कधी गाल ओढायचा. कधी तरी त्याची पूर्ण बातमीच नाकारायचो. उपसंपादकाला असलेला तो अधिकार त्यानं मान्य केला होता. 'सतीश मुद्दाम माझ्या बातम्या कापतो,' अशी तक्रार त्यानं वरिष्ठांकडे कधीच केली नाही किंवा माझा रागराग केला नाही.

'केसरी'तलीच ही गंमत. एका बंडखोर, तरुण तुर्क नेत्याच्या वैयक्तिक आयुष्यातली मोठी घडामोड होती. त्यानं ज्या तरुणीला आधी वचन दिलं होतं; तिच्याशी लग्न करण्याचं नंतर नाकारलं. पुण्याच्या कार्यालयातून ही माहिती आली. बातमीचा स्रोत राशीनमध्ये होता. अन्य कुणी तिथं जाण्यास तयार नसल्यानं सुधीरला पाठवण्यात आलं. त्याच्यातील कार्यकर्त्यासाठी ही मोठीच संधी होती. राशीन-कर्जतमध्ये त्याचे जवळचे नातेवाईक होते, कार्यकर्ता म्हणून ओळखी होत्या. त्यामुळं बारीकसारीक माहिती काढण्यात त्याला काहीच अडचण आली नाही. संध्याकाळी सातच्या सुमारास फोनवरून त्यानं बातमी दिली. माहिती भरपूर असल्यामुळं ती अतिशय छान रंगवली आणि 'सुधीर मेहता यांजकडून' अशा नामोल्लेखासह पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली. पुण्याच्या अंकातही ती लागली. पुणे कार्यालयातील वरिष्ठ त्या बातमीवर खूश झाले. त्यामुळे स्वाभाविकच सुधीरही माझ्यावर खूश झाला. 'मला बातमी अशी रंगवता आलीच नसती,' असं नंतर त्यानं मला प्रांजळपणानं सांगितलं.

राजीव गांधी ह्यांची हत्या झाल्याची बातमी मी रात्री साडेअकराच्या सुमारास बी. बी. सी.वर ऐकली. तिथून तडक सुधीरच्या घरी गेलो. त्याच्या घरून राजीव गांधी ह्यांची छायाचित्रं असलेले विविध मासिकं घेऊन आम्ही केडगावला 'केसरी'च्या कार्यालयात गेलो. ती रात्र आम्ही कार्यालयात काढली. सोबतीला होते सुधीर सांगत असलेले राजीव ह्यांचे ऐकीव किस्से. ती आठवण तो नंतर नेहमी सांगत असे. राजीव हत्येनंतर दुसऱ्या दिवशी आमची जेवणाची मोठीच अडचण झाली. खानावळ, हॉटेलं, टपऱ्या बंद. तेव्हा सुधीरच्या घरी जायचं सुचलं नाही. हे नंतर सांगितल्यावर तो बराच हळहळला.

काही काळानंतर सुधीर 'केसरी'तून बाहेर पडला. पण त्यामुळे आमचे संबंध कमी झाले नाहीत. आदेश्वर कॉलनीतील त्याचं घर आमचं हक्काचं झालं. दुपारी कधी गेलो, तर त्याचं जेवण तीन-साडेतीन वाजता असायचं. त्याच्या बरोबर जेवायचा हमखास आग्रह व्हायचा. 'लोकसत्ता'मध्ये 'नगरी नगरी' सदर दीर्घ काळ लिहिलं. सुधीर त्याचा हक्काचा वाचक. त्याला मनापासून आवडत होतं ते. त्या विनोदी, टवाळी-उपहास करणाऱ्या सदरातून दोन-चार वेळा त्यालाच लक्ष्य केलं. त्यानं 'नगर फेस्टिव्हल' सुरू केला, तेव्हा त्याबद्दल मोठ्ठं लिहिलं होतं. म्हटलं तर ती टिंगल होती आणि मानलं तर त्याचं कौतुक होतं. भपकेदार 'पुणे फेस्टिव्हल' आयोजित करणाऱ्या सुरेश कलमाडी ह्यांच्याशी थेट तुलना केल्यामुळं सुधीर मनोमन सुखावला होता. तसाही तो काही हळवा नव्हता. त्यामुळं त्याच्यावर टीका करायला सोपं जायचं. तो हे सारं मोकळ्या मनाने घेई.

खरं सांगायचं झालं, तर सुधीर पत्रकारापेक्षा चळवळ्या कार्यकर्ता अधिक होता. कल्पकता हा त्याचा मोठाच गुण. वेगवेगळ्या प्रश्नांवर त्याला आंदोलनं सुचत. ती तापवत कशी ठेवायची, हेही त्याला माहीत होतं. त्यात पुन्हा हे प्रश्न कोणत्या तरी समाजघटकाच्या अगदी जिव्हाळ्याचे असायचे. औद्योगिक वसाहतीच्या 'डी झोन'चा मुद्दा त्यानं दीर्घ काळ तापवत ठेवला होता. त्यामुळं उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाला 'सुधीर मेहतांकडूनच तुमचे प्रश्न सोडवून घ्या ना...' असं शरद पवार ह्यांनी तेव्हा सुनावलं होतं. सुधीर ते नेहमी कौतुकानं सांगायचा. महाविद्यालयीन जीवनात केलेल्या गमती, आंदोलनं ह्याबद्दल अलीकडे तो भरभरून सांगे. गोविंदराव आदिक, मग यशवंतराव गडाख आणि नंतर बाळासाहेब विखे ह्यांचा तो काही काही काळ आवडता होता. त्यांच्याबद्दल सुधीरला फार बारकाईनं माहिती होती. त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्यं, आवडीनिवडी तो अलगद टिपून घेई.

'युवक बिरादरी' म्हणजे सुधीरची घरची चळवळ. एकविसाव्या शतकात संघटनेचं मोठं पद त्यानं भूषवलं. राज्याच्या राजकारणात मोठं झालेल्या अनेकांशी त्याचा परिचय झाला तो बिरादरीच्या माध्यमातून. 'बिरादरी'ला विलासराव गमतीनं 'युवक धराधरी' म्हणायचे, हे तो कौतुकानं सांगायचा. मुख्यमंत्री झाल्यावर विलासरावांनी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नगरला झालेल्या अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी भरपूर वेळ दिला. सुधीर त्या अधिवेशनाचा संयोजक होता. 'बिरादरी'च्या क्रांती शाह ह्यांच्याशी सुधीरचं फार जवळचं नातं होतं. संघटनेची बातमी सुधीरनं दिलेली असली की, त्यात क्रांती शाह नाव असायचंच. बिचाऱ्या पत्रकारांना 'त्या' क्रांती शाह वाटत. त्यांच्या नावामागे हमखास 'श्रीमती' लिहिलं जाई. 'श्रीमती'चं 'श्रीयुत' करण्याचं काम मी खूप वेळा केलं. सुधीरला म्हणालोही बऱ्याच वेळा की, 'माझी एकदा क्रांती शाह ह्यांच्याशी ओळख करून दे. 'लिंगबदल' होण्यापासून मी त्यांना अनेक वेळा वाचवलं, हे सांगायचं आहे!'

पत्रकारांच्या असो की अन्य कुठल्या, सुधीरला संघटनेत राहणं फार आवडे. 'नगर फेस्टिव्हल' त्यानं उत्साहानं सुरू केला. पण त्याला वाटलं तशी पुण्याची रंगत आली नाही. तरीही तो अनेक वर्षं नेटानं चालवत राहिला. माझ्यासह बरेच पत्रकार त्या नगर व्यासपीठाचे 'विश्वस्त', पदाधिकारी होते. अंध-अपंगांसाठीही सुधीरनं नव्वदीच्या काळात संघटना चालवली होती. अलीकडे तो नवनीत विचार मंचाच्या माध्यमातून सक्रिय राहण्याचा प्रयत्न करीत होता. नगर पर्यटनही त्याच्या डोक्यात होतं. हे सगळं तब्येत साथ देत नसताना.

मूळचा करमाळ्याचा हे कळाल्यावर त्याला माझ्याबद्दल थोडी जास्त आपुलकी वाटू लागली. 'तुमचं कर्जत-करमाळा' असा उल्लेख तो त्याच्या आईच्या संदर्भात नेहमी करायचा. पत्रकार म्हणून किंवा सक्रिय राजकीय कार्यकर्ता म्हणून सुधीरला त्याच्या काही मर्यादा होत्या. राजकीय क्षेत्रामध्ये मुंबईत काम करण्याची संधी त्याला तरुण वयात मिळाली होती. पण घरगुती अडचणींमुळे जाता आलं नाही. तरुण वयात गमावलेल्या अशा अनेक संधी त्याला अलीकडच्या काही वर्षांत व्यथित करत होत्या. अर्थात त्या तो जाहीरपणे सांगत नसे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ह्यांचं पहिलं आंदोलन झालं, ते सुधीरनं बाहेर काढलेल्या सामाजिक वनीकरणमधील प्रकरणाचा पाठपुरावा करण्याच्या निमित्तानं. कालानंतरानं तो त्यापासून लांब गेला.

दीर्घ काळ राजकारण-समाजकारण-पत्रकारिता ह्यामध्ये वावर असल्याने सुधीरकडे असंख्य अफाट आठवणी होत्या. एकदा शरद पवार कुठल्या कार्यक्रमासाठी नगरला येणार होते. त्यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणजे सुधीरचे विरोधक. ते आपल्याला पवारसाहेबांना भेटू देणार नाही, हे ओळखून ह्या गड्याने वेगळीच चाल खेळली. नगरच्या आधी काही किलोमीटर हार-गुच्छ घेऊन तो थांबला. गाडी दिसताच ती थांबवून त्यानं पवारसाहेबांचा सत्कार केला आणि त्यातच बसून तो नगरकडे निघाला. डाक बंगल्यावर मोटर येताच कार्यकर्ते अदबीने पुढं आले. त्यांनी मोटारीचं दार उघडून विनम्रपणे नमस्कार केला, तो स्वीकारायला त्यांच्या समोर होता सुधीर! हा किस्सा तो रंगवून सांगायचा. बिरादरीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिनेजगतातील तनुजा, जया भादुडी अशी मोठी व्यक्तिमत्त्वं त्याला जवळून अनुभवायला मिळाली. बिरादरीच्या एका शिबिराच्या निमित्ताने अभिनेत्री तनुजा काही दिवस नगर मुक्कामी होती. त्या काळात आपण छोट्या काजोलला कसं खेळवलं, हेही सुधीर रंगवून रंगवून सांगायचा. एखाद्याला वश कसं करायचं, ह्याची खुबी त्याला चांगलीच माहीत होती. (त्याच्या भाषेत 'नॅक'!) स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारलेल्या शैलेंद्र गौड ह्यांना त्यानं इतकं आपलंसं केलं की, ते दोघे जणू शाळासोबती आहेत, असं कुणा त्रयस्थाला वाटावं.

माझ्यासारख्या बऱ्याच समकालीन पत्रकारांना सुधीरचं घर आपलं वाटे. त्याच्या आतिथ्यप्रियतेचा अनेकदा अतिरेक होई. त्याचा त्रास घरच्या मंडळींना व्हायचा. त्यामुळेच प्रसंगी आम्ही कल्पनाभाभींची बाजू घेऊन त्याच्याशी वादही घालत असू. कोणत्याही माणसाप्रमाणे सुधीरमध्येही गुण-दोष होतेच. पण मैत्री जोडण्याचा आणि निभावण्याचा त्याचा गुण अफलातून होता. 'पत्रकार' म्हटल्यावर तो कधीही, कसल्याही मदतीसाठी तयार असायचा. एरवी त्याच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांनाही तो अडचणीच्या काळात मित्र म्हणूनच वागवी. '...प्रसंगानुसार आम्ही १०५' अशी त्याची तेव्हाची वागणूक असायची. आधीच्या काळात ज्यांच्याशी जमत नव्हतं, अशा अनेक व्यक्ती नंतर त्यांच्या मित्रयादीत समाविष्ट झाल्या. तेव्हा जुनं सगळं विसरण्याची कला त्याला अवगत होती.

अलीकडच्या पाच वर्षांत वेगवेगळ्या व्याधींनी सुधीरला त्रस्त केलं होतं. मधुमेहानं उचल खाल्ली. त्यामुळे दोन-तीन वेळा त्यांना दीर्घ काळ रुग्णालयात राहावं लागलं. त्या काळात माझी आणि त्याची अगदी नित्यनेमानं भेट होई. गप्पा रंगत. 'केसरी'तले काही किस्से तो अशा थाटात सांगायचा की, वाटे मी तिथे नव्हतोच कधी. नवनव्या नि मोठमोठ्या उपक्रमांची स्वप्नं तो रंगवी. त्यासाठी माझी कशी मदत लागेल, हेही पटवून देई. 'नगर व्यासपीठ'तर्फे गुणिजनांना 'नगरभूषण' पुरस्कारानं गौरवायचं त्याच्या मनात होई. पाच वर्षांपूर्वी त्यानं अशी पाच नावं काढली. त्यांची मानपत्रं लिहिण्याचं काम माझ्यावर सोपवलं. त्यातलं एक नाव होतं अभिनंदन थोरात ह्यांचं. 'कार्यक्रम कधी करायचा, पाहुणा कोण बोलवायचा, हे अभिनंदनला विचारून तू ठरव,' असं त्याचं म्हणणं होतं. काही ना काही अडचणी येत राहिल्या आणि तो कार्यक्रम काही झालाच नाही. तो सरचिटणीस असलेल्या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचं अधिवेशन त्याला शिर्डीत घ्यायचं होतं. कोरोनामुळं तेही शक्य झालं नाही.

मध्यंतरीच्या काळात सुधीरनं वेगवेगळ्या दैनिकांमध्ये काम केलं. पण मूळ चळवळ्या वृत्तीचा असल्यानं तो कुठंच फार काळ स्थिरावला नाही. ह्या काळात त्यानं जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांतली माणसं मात्र मोठ्या प्रमाणात जोडली.

पत्रकारितेचं स्वरूप फार बदललं. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र ह्यातही नवीनं माणसं आली. स्वाभाविकच सुधीर त्यापासून थोडा लांब गेला. पण समकालीन राहण्याची त्याची धडपड कायम होती. त्याच्याकडे असंख्य आठवणी होत्या. अनेक किस्से होते. ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न त्यानं कधी केला नाही. 'आपण ब्लॉग चालू करू. तू सांगत जा, मी लिहीत जाईन,' ह्या माझ्या ऑफरला त्यानं मनापासून कधीच देकार दिला नाही. 'डॉक्युमेंटेशन'च्या बाबत त्याच्यातला पत्रकार निरुत्साही राहिला. लिहिण्यापेक्षा बोलणं त्याला आवडे. त्याच्या उमेदीच्या काळात आजच्या एवढ्या दूरचित्रवाणी वाहिन्या असत्या, तर पक्षप्रवक्ता म्हणून त्यानं जोरदार कामगिरी केली असती. तेवढा बहुश्रुत होता तो.

अलीकडच्या पाच वर्षांत सुधीर थकला होता. तरुणपणी केलेली धावपळ आता शरीर कुरकुरून बोलून दाखवत होतं. त्याच्या शारीरिक हलचालींवर मर्यादा आली होती. पण त्याच्यामधला उत्साहाचा झरा कायम होता. त्याचं दर्शन तो ॲडमिन असलेल्या व्हॉट्सॲप ग्रूपवरून व्हायचं.

उत्साहाचा हा खळाळता झरा काल रात्री शांत झाला. कायमसाठी. काहीसा अकालीच!

-----------------

#journalism #Ahmednagar #MarathiJournalism #journalist #politics #activist #sudheer_mehata

Friday 5 November 2021

रंग उडालेली, दयनीय 'परी'

 

दिवाळी पाडव्याच्या दिवशी तालुका किंवा छोट्या जिल्ह्याच्या पातळीवरच्या कोणत्याही एस. टी. आगारातून सकाळची पहिली बस कशी बाहेर पडायची? विशेषतः ती पुणे-मुंबई-नागपूर ह्यासारख्या मोठ्या शहरांकडे जाणारी दिवसातली पहिली बस असेल तर? फार आठवण्याची गरज नाही. पंधरा-वीस वर्षांपूर्वीची तर गोष्ट आहे. बस चकाचक असे. हौशी वाहक-चालकांनी टपोऱ्या झेंडूच्या फुलांचा हार पुढे काचेला लावलेला दिसायचा. क्वचित कधी चालकाच्या केबिनमध्ये उदबत्तीचा उग्र सुवास दरवळे. अभ्यंगस्नान करून आलेले चालक व वाहक उत्साही असत. ते हसऱ्या चेहऱ्यानं प्रवाशांचं स्वागत करीत.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली बलिप्रतिपदा, अर्थात दिवाळी पाडवा आज (शुक्रवार, ५ नोव्हेंबर) आहे. 'एस. टी.' ह्या तीन अक्षराने प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा राज्यभर व्याप आहे. महामंडळाच्या २५८ आगारांपैकी किती आगारांतून आज भल्या सकाळी अशी सजविलेली बसगाडी बाहेर पडेल? किती चालक-वाहक तणावमुक्त दिसतील?

- वरच्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर 'नाही' असंच असेल. आपण सारे दिवाळी उत्साहानं आणि आनंदानं साजरी करीत आहोत. त्याच वेळी आपल्या समाजाचा घटक असलेली साधारण एक लाख कुटुंबं ह्या सगळ्या आनंदापासून दूर आहेत. काहींनी कर्ते गमावलेले आहेत. आपला कुटुंबप्रमुख एस. टी. महामंडळात नोकरी करतो, हेच दुर्दैव आणि आपल्या कमनशिबाचं कारण, अशी त्यांची भावना असल्यास नवल नाही!

जागतिक महामारी असलेल्या कोरोनाची पहिली नि नंतर दुसरी लाट आली. ती ओसरू लागली आहे. त्याच वेळी एस. टी. महामंडळात जणू आत्महत्या करण्याची लाट आली, असं वाटण्यासारखी भीषण परिस्थिती दिसते. साधारण वर्षभरापूर्वी, दिवाळीच्याच आधी दोन एस. टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण थकलेला पगार हेच होतं. तेव्हापासून सुरू झालेलं आत्महत्येचं सत्र थांबताना दिसत नाही. आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी हा मार्ग निवडून स्वतःपुरती मुक्ती मिळवली. ती संख्या गेल्या अडीच-तीन महिन्यांमध्ये लक्षणीय आहे.

चालक दिलीप हरिभाऊ काकडे (शेवगाव आगार) बसच्या मागच्या शिडीलाच गळफास घेऊन आत्महत्या केली. आठवडाभरापूर्वी ही दुर्घटना झाली.

अंबड (जिल्हा जालना) आगारातील शंकर झिने ह्यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील चालकाने काल विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. औसा (जिल्हा लातूर) आगारातील एका चालकानंही हाच मार्ग निवडण्याचं ठरवलं होतं. झाडाला गळफास घेऊन त्याला जीवनप्रवास संपवायचा होता.

पगार, बोनस मिळून फक्त साडेचार हजार रुपये मिळाले. घरात आई आणि पत्नी, दोघीही आजारी. त्यांची औषधं, दिवाळीसाठी मुलांना कपडे हा खर्च ह्यात भागवायचा कसा, ह्याचा विचार करकरून कळवण आगारातील कर्मचारी सुन्न झाला. 'आपण तरी ह्यातून सुटका करून घेऊ...' ह्या विचारातूनच त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला.

...ही मालिका थांबायला तयार नाही. एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं कोणत्याही महिन्याचं वेतन थकलेलं नाही. पण ते ठरावीक तारखेलाच बँकेत जमा होईल, ह्याची सहा महिन्यांपासून कोणतीही खातरी राहिलेली नाही. 'कुणी तरी आत्महत्या केल्याशिवाय आमच्या त्या महिन्याच्या पगाराची व्यवस्थाच होत नाही,' असं एक वाहक कडवटपणे म्हणाला.

दिवाळीचा हंगाम म्हणजे एस. टी. महामंडळासाठी जणू सुगीच. अशा ऐन सुगीत राज्यातील अनेक आगारांमध्ये चालक, वाहक व कामगार ह्यांनी 'काम बंद' आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. बहुतांशी आगारातील कामकाज सुरळीत चालल्याचा यंत्रणेचा दावा आहे. काही कर्मचाऱ्यांशी थेट बोलल्यावर माहिती मिळाली की, अडीचशेपैकी जवळपास ७० आगारांमध्ये हे आंदोलन चालू आहे. त्यात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, खान्देश व कोकणातील आगारे आहेत. कोणत्याही संघटनेचा झेंडा न लावता कामगार-कर्मचारी एकवटले आहेत. मागणी तडीस नेण्यासाठी संघटनेचा आधारही त्यांनी सोडला आहे.

अशा आंदोलनासाठी प्रवाशांची गर्दी असण्याचा मुहूर्त निवडणं अयोग्य आहे, असं अनेकांना वाटेल. चार वर्षांपूर्वी (२०१७) एस. टी. कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी संप पुकारला होता. तेव्हा वेळ चुकली. त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती वाटण्याऐवजी सर्वसामान्यांना त्यात अडवणूक दिसली. त्याची जाणीव ह्या वेळी कर्मचाऱ्यांना झालेली दिसते. व्यवस्थेचे, यंत्रणेचे आणि सरकारचेही लक्ष वेधण्यासाठी त्यांनी दिवाळीच्या बऱ्यापैकी आधीच आंदोलन चालू केलं. त्यानंतरही मागण्या मान्य होत नाहीत म्हटल्यावर बेमुदत संप करण्याचं ठऱवलं. असा संप करण्यास मनाई करणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला. त्यानंतरही दिवाळीच्या पहिल्या दिवशी बऱ्याच आगारांमधील सेवा विस्कळितच होती. कोविड-कृपेमुळे शाळा-महाविद्यालयं पूर्णपणे सुरू झालेली नव्हती. अनेक कर्मचाऱ्यांचं काम अजूनपर्यंत घरातूनच चालू आहे. त्यामुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची संख्या यंदा तुलनेनं कमी असावी.

एस. टी. महामंडळात कामगार-कर्मचाऱ्यांच्या विविध २२ संघटना आहेत. अनेक प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी सर्व संघटनांची एकत्रित कृतिसमिती स्थापन करण्यात आली. अधिक सभासद असलेल्या महत्त्वाच्या पाच-सहा संघटनांनी त्यासाठी उपोषणाचा इशाराही दिला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांएवढाच महागाईभत्ता एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळावा, घरभाडेभत्ता वाढवावा, करारात ठऱल्यानुसार वार्षिक वेतनवाढ तीन टक्क्यांनी द्यावी ह्या व अशा अन्य मागण्या प्रलंबित आहेत, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची त्याहून सर्वांत महत्त्वाची मागणी आहे ती महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची. सरकारनं आम्हाला आपलं म्हणावं आणि नंतर मग इतर राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच आमचं काय भलं-बुरं करायचं ते करावं, असं हे कर्मचारी आता आवेशानं सांगतात. कृतिसमिती व महामंडळाचे अध्यक्ष असलेले परिवहनमंत्री अनिल परब ह्यांच्यामध्ये बैठक झाली. महागाईभत्ता १६ टक्क्यांवरून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के देणे, घरभाडेभत्त्यात वाढ ह्या दोन मागण्या बैठकीत मान्य झाल्या. तथापि कृतिसमितीने केलेली ही तडजोडच बहुसंख्य कर्मचारी-कामगारांना मान्य नाही. ही आपली फसवणूक आहे, असं त्यांना वाटतं. त्यातूनच संघटनांना टाळून वाहक-चालक-यांत्रिक कामगार ह्यांनी 'काम बंद'चा निर्णय घेतला. बऱ्याच आगारांनी 'पावतीमुक्त' होण्याचं ठरवलं. (म्हणजे कोणत्याच संघटनेचं सदस्यत्व स्वीकारायचं नाही.) काही आगारांतून संघटनांच्या जिल्हा कार्यालयांकडे सदस्यत्व पावतीपुस्तके परत करण्यात आली.

राज्य सरकारमध्ये एस. टी. महामंडळाचं विलीनीकरण करावं, हीच आजघडीची सर्वांत महत्त्वाची आणि म्हटलं तर एकमेव मागणी उरली आहे. मागणी मान्य झाली, तर आताच होईल; आता त्याबद्दल तडजोडीची भूमिका घेऊन उपयोग नाही, अशी बहुसंख्य कर्मचारी-कामगारांची धारणा आहे. त्यामुळेच सेवासमाप्ती वा तत्सम कोणत्याही कडक कारवाईला तोंड देण्याची मानसिक तयारी त्यांनी केल्याचं, काही वाहक-चालकांशी बोलताना लक्षात आलं.

विलीनीकरण हाच आपल्या परिस्थितीत सुधारणा होण्याचा अंतिम तोडगा आहे, असं कर्मचाऱ्यांना का वाटतं? ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या कोणत्याही विभागातील व एस. टी. महामंडळ ह्यांतील पगाराची तफावत. एकाच श्रेणीत एकाच वेळी राज्य सरकारमध्ये व महामंडळात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरक १० ते १५ हजार रुपये आहे, असं मराठवाडा विभागातील एका वाहकानं सांगितलं. एकीकडे पगार कमी आणि दुसरीकडे बदलत्या जीवनशैलीने खर्चाच्या वाटा वाढल्या. कोरोनानंतर शिक्षणासाठी मुलांच्या हाती इंटरनेट असलेला मोबाईल देणं आवश्यक झालं. 'दोन मोबाईल घेण्याची ऐपत नसतानाही मला ते घ्यावे लागले. इंटरनेट असलेला मोबाईल मुलांकडे असतो आणि मी साधा फोन वापरतो,' असं आणखी एका वाहकानं सांगितलं. बदलत्या जीवनशैलीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. तेही अधिक व्याजदराचं. ह्या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावं, त्यातून आपले प्रश्न सुटतील, असं बहुसंख्य कर्मचाऱ्यांना वाटतं.

एस. टी. महामंडळातली नोकरी दोन-अडीच दशकांपूर्वी प्रतिष्ठेची मानली जाई. राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरीला रामराम करून महामंडळात अधिकारीपदावर रुजू झालेला एक जण परिचित आहे. आता विचारलं तर तो निर्णयाबद्दल पश्चात्तापच व्यक्त करील. लातूर जिल्ह्यातील असंच एक बोलकं उदाहरण आहे. जिल्हा परिषदेची प्राथमिक शिक्षकाची नोकरी सोडून एक तरुण एस. टी.च्या सेवेत रुजू झाला. तीस-बत्तीस वर्षं नोकरी करून तो अलीकडेच निवृत्त झाला. महामंडळातील सहकाऱ्यांशी बोलताना तो म्हणाला, 'मला तेव्हा काय अवदसा सुचली कुणाला माहीत! तेव्हा माझ्या बरोबर लागलेल्या शिक्षकांना आता ३०-३२ हजार रुपये पेन्शन पडतीय. मी बसलो ३२०० रुपयांची पेन्शन घेऊन.'

'चालक आणि वाहक, हीच महामंडळाची दोन चाकं आहेत,' असं सांगत बारा-चौदा वर्षांपूर्वी आलेल्या एका व्यवस्थापकीय संचालकांनी सगळं काही मुळापासून बदलण्याचं ठरवलं होतं. पण थोड्या कालावधीनंतरच त्यांच्याकडून महामंडळाचं 'स्टिअरिंग' काढून घेण्यात आलं.

पैसा नाही आणि प्रतिष्ठाही नाही, अशी मुख्यत्वे चालक-वाहकांची कोंडी झाली आहे. नव्या शतकात नोकरीला लागलेले बहुतेक चालक-वाहक बऱ्यापैकी शिकलेले आहेत. माझ्या पाहण्यात तर असे अनेक चालक आहेत की, प्रवाशांचे दोन-पाच रुपये आपल्याकडं राहाणं त्यांना लाजिरवाणं वाटतं. (महामंडळाने आता तिकिटे पाच व दहाच्या पटीत करून तो प्रश्नही निकाली काढला आहे.) महामंडळाचे जनमानसात जे प्रतिनिधित्व करतात, प्रवासी वाहतुकीचं महत्त्वाचं काम करतात, त्यांच्या सोयीकडे महामंडळाचं, प्रशासनाचं कधीच विशेष लक्ष नव्हतं.

साधारण बारा-पंधरा वर्षांपूर्वी चालक-वाहकांचे रात्रीच्या मुक्कामाचे भत्ते काय होते, हे नुसतं ऐकलं तरी हसायला येईल. मुंबईमुक्कामी गाडी घेऊन जाणाऱ्या वाहकाला त्या वेळी नगद १५ रुपये भत्ता मिळे. त्यात त्याने चहा, जेवण हा खर्च भागवणं अपेक्षित होतं. अलीकडच्या काळात त्यात सुधारणा झाली आहे. आता हा भत्ता शंभर रुपयांपर्यंत मिळतो. जिल्ह्याच्या व तालुक्याच्या गावी तो थोडा कमी असतो. महामंडळाच्या बऱ्याच स्थानकांवरची उपाहारगृहं बंद झालेली दिसतात. पुणे जिल्ह्यातल्या शिरूरचं उदाहरण बोलकं आहे. त्या स्थानकावर २०१०पर्यंत उडुपी पद्धतीचं कँटीन होतं. ते बऱ्यापैकी स्वच्छ आणि वाजवी दर असलेलं. बहुसंख्य गाड्यांचे चालक-वाहक तिथं थांबत. ते बंद झाल्यापासून ह्या बस ढाब्यावर थांबतात.

'जेवणासाठी गाडी १५ मिनिटं थांबेल,' असं वाहकानं प्रवाशांना कितीही सांगितलं तरी त्यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. कारण हा थांबा किमान अर्धा ते कमाल पाऊण तासाचा होतोच. 'फुकट मिळतं म्हणून ड्रायव्हर-कंडक्टर बसले खात', अशी सर्वसाधारण प्रवाशाची तुच्छतेची प्रतिक्रिया असते. पण वास्तव काय आहे ह्यामागचं?

मागे एकदा प्रवासात कन्नड (जि. औरंगाबाद) आगाराच्या एका बोलक्या वाहकानं आपली व्यथा व्यक्त केली होती. तो म्हणाला, 'कुठल्याही ढाब्यावर आम्हाला गेल्या गेल्या जेवण किंवा खायला मिळत नाही. ड्रायव्हर-कंडक्टरचं जेवण झाल्यावर ते थांबत नाही. त्यामुळं मग प्रवासीही थांबत नाहीत, हे ढाबेमालकांना माहितीय. ह्यावर उपाय म्हणून ड्रायव्हर-कंडक्टरनाच उशिरा खायला द्यायचं, असं त्यांचं धोरण असतं. इकडे प्रवासी आमच्या नावानं ओरडत बसतात.'

मुक्कामाची जागा अतिशय अस्वच्छ, तिथली गलिच्छ स्वच्छतागृहं, पाण्याची सोय नसणं अशा अडचणींना तोंड देणं चालक-वाहकांसाठी नित्याचंच आहे. अशा परिस्थितीत ते काम करतात. शिवाजीनगर (पुणे) स्थानकात मुक्कामी बसवरच रात्र काढणारे चालक-वाहकही पाहिले आहेत. विश्रांती कक्षाऐवजी त्यांना हे अधिक सोयीचं वाटत असे. स्थानकावर सफाई कर्मचारी नेमण्याऐवजी ते काम कंत्राटी पद्धतीनं देण्याचा प्रकार बऱ्याच वर्षांपूर्वी सुरू झाला. त्यात कुणाचे काय हितसंबंध असतात, हे प्रशासनालाच ठाऊक. दक्षिण महाराष्ट्रातील एका मोठ्या शहरातील बसस्थानकाच्या स्वच्छतेचं कंत्राट दरमहा ५० हजार रुपये होतं. काही वर्षांपूर्वी फतवा आला आणि तेच कंत्राट साडेतीन लाख रुपयांना देण्यात आलं, अशी चर्चा आहे! ह्यातलं खरं-खोटं (हित)संबंधितांनाच माहीत!!

राज्यभरातील रस्ते आणि महामंडळाच्या बसगाड्या, ह्यामध्ये अधिक खिळखिळं काय, हे ठरवणं अवघडच. महामंडळाच्या ताफ्यात चार वर्षांमध्ये नवीन बसगाड्यांची भर पडलेली नाही. अनेक गाड्या, त्यांतली आसनं खराब झाली आहेत. त्यामुळे गाड्या नादुरुस्त होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्याच्या उलट निमआराम व वातानुकुलित गाड्यांच्या संख्येत भरच पडत आहे. महामंडळाच्या तीन कार्यशाळा आहेत. पण मध्यंतरीच्या काळात 'बॉडी बिल्डिंग'चं काम बाहेर देण्याचा अनाकलनीय निर्णय झाला. ह्या साऱ्या कटकटींमुळं एस. टी. महामंडळाची मुख्य दोन चाकंच पंक्चर झाल्यागत आहेत. त्यामुळेच महामंडळाचं स्वतंत्र अस्तित्व आता त्यांना अभिमानास्पद वाटत नाही. त्या ऐवजी राज्य सरकारमध्ये विलीन होणं किती तरी चांगलं, असं त्यांना वाटतं.

नाइलाजानं महामंडळाच्या बसमधून प्रवास करावे लागणारे काही जण 'लाल डब्बा' म्हणून हिणवतात. पण सर्वसामान्य प्रवासी 'लाल परी' असंच तिचं कौतुक करत आलाय. त्या 'लाल परी'चा तोरा, दिमाख नाहीसा झालाय. तिच्या वस्त्रांची लक्तरं झालेली दिसतात. तिची अवस्था दयनीय झाली आहे.  'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे. ही सेवा कधी संपणारी नाही. किमान त्यासाठी ह्या प्रकाशपर्वात तरी 'लाल परी'च्या नशिबीचा अंधकार जावो, एवढीच अपेक्षा.

---

(टीप - हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने काही चालक-वाहक, अधिकारी व कामगार संघटनेचे पदाधिकारी ह्यांच्याशी चर्चा केली. आपले नाव प्रसिद्ध होऊ नये, ह्या त्यांच्या इच्छेचा आदर केला आहे.)

---

#msrtc #driver-conductor #STstrike #maharashtra #roadtransport  #corona #ST

Sunday 3 October 2021

द. मा. - पाहिलेले, ऐकलेले


'परमेश्वर प्रसन्न झाला, तर पुढचा जन्म मी लेखकाचाच मागीन! उत्तम लेखक होणे, हीच माझी महत्त्वाकांक्षा होती. माझ्या भाषेतील हजारो, लाखो लोकांच्या जीवनात माझ्या लेखनामुळे आनंद निर्माण करावा, हीच माझी इच्छा आहे...'

...आपल्या हजारो, लाखो चाहत्यांना हळहळ करायला लावीत, ह्या जगाचा काल निरोप घेतलेल्या प्रसिद्ध लेखक प्रा. द. मा. मिरासदार ह्यांचे हे म्हणणे आहे. नगरमध्ये २४ वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत झाली. तिचा समारोप करताना त्यांनी ही इच्छा बोलून दाखविली.

द. मा. मिरासदार आपल्या अनेकांचे आवडते लेखक. लहानपणी कधी तरी त्यांच्या कथांची ओळख झाली. बहुतेक जुन्या मॅट्रिकच्या (अकरावीला) मराठी पाठ्यपुस्तकात त्यांची नागू गवळीची कथा होती. मी ऐकलेली-वाचलेली त्यांची ती पहिली कथा. आपल्या म्हशींवर लेकरांप्रमाणे प्रेम करणारा, कुंभकर्णी झोपेतच दोन-तीन चोरांना लोळवणारा नागू फार आवडला. मग संधी मिळेल, तेव्हा करमाळ्याच्या ज्ञानेश्वर वाचनमंदिरातून त्यांची पुस्तके आणून वाचू लागलो. भोकरवाडी आणि नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, आनशी, महादा, ज्ञानू वाघमोडे ह्या त्यांच्या पात्रांच्या प्रेमात पडलो.

'नावेतील तीन प्रवासी' ही लघुकादंबरी खरं तर द. मा. ह्यांच्या धाटणीतली नव्हती. ती मला बेहद्द आवडलेली. पुस्तकांची खरेदी सुरू केल्यावर त्यांची बरीच पुस्तकं घेतली. पण हे 'तीन प्रवासी' सापडेपर्यंत चैन पडत नव्हतं. जेरोम के. जेरोम ह्यांच्या गाजलेल्या 'थ्री मेन इन ए बोट' पुस्तकाचं हे रूपांतर. स्वैर रूपांतर. तीन प्रवाशांची ही कथा मराठीत आणताना ती अनुवादित वाटणार नाही ह्याची काळजी त्यांनी घेतली आणि पूर्ण कथेलाच मराठमोळा साज चढवला. त्यांनी मनोगतात म्हटलं नसतं, तर हा अनुवाद वा रूपांतर आहे, हे आपल्यासारख्या सामान्य वाचकाच्या कदाचीत लक्षातही आलं नसतं.
आवडू लागलेल्या ह्या लेखकाला पहिल्यांदा ऐकण्याची संधी शाळकरी वयात मिळाली. करमाळ्याच्या नगरपालिकेत त्यांचं व्याख्यान झालं. पालिकेची ती सुबक, ठेंगणी, आटोपशीर इमारत. पुढे मोकळ्या जागेत फरशा टाकलेल्या. त्या फरशांवर बसून त्यांचं ते किस्सेवजा भाषण ऐकलं. कोणत्याही मोठ्या माणसाचं आणि अर्थात लेखकाचं ऐकलेलं ते पहिलं भाषण. लेखक कसा असतो, हे प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याचा आनंद वेगळाच होता. द. मा. मूळचे पंढरपूरचे हे कळल्यावर तर भयानक आश्चर्य वाटलं होतं. कारण मोठी, प्रसिद्ध माणसं आपल्या आसपास नसतात, असा तेव्हा समज होता. पंढरपूर तर आमच्याच सोलापूर जिल्ह्यातलं. त्या भाषणात त्यांनी रोजच्या जीवनातल्या विसंगतीवर बोट ठेवणारे भरपूर किस्से सांगितले आणि जमलेल्या आम्हा पाच-पन्नास श्रोत्यांना मनमुराद हसवलं, एवढंच आता आठवतं. केळाच्या सालावरून घसरलेला कोणी एक असामी आधी कसा खजिल होतो, मग उठण्याऐवजी तो आपली फजिती कोणी पाहिली नाही हे आधी बघतो. तसं घडलेलं नाही, हे समजल्यावर उठून कपडे झाडत 'काही झालंच नाही' अशा थाटात कसा ऐटीत चालू लागतो, हे त्यांनी साभिनय सांगितलं होतं.

ह्या भेटीला बरीच वर्षं लोटली. दरम्यान त्यांची पुस्तकं वाचत होतोच. 'केसरी'मध्ये नोकरी सुरू केली. रविवारच्या पुरवणीत द. मा. ह्यांचं सदर चालू होतं. ती अर्थातच मेजवानी वाटायची. 'केसरी'च्या गणेशोत्सवात कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. द. मा. आणि शंकर पाटील त्यासाठी आले होते. व्यंकटेश माडगूळकर नव्हते. त्यांची तब्येत तेव्हा ठीक नसावी बहुतेक. नगरमध्ये 'कौन्सिल हॉल' म्हणून ओळखला जातो, त्या नगरपालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. फार काही गर्दी झाली नव्हती. दोघांनी कोणत्या कथा सांगितल्या, ते आता लक्षातही नाही. लक्षात राहिलं ते नंतरचं.

ह्या दोन पाहुण्यांच्या मुक्कामाची व जेवणाची सोय 'हॉटेल संकेत'मध्ये केली होती. कार्यक्रम संपल्यावर त्यांचं जेवण चालू होतं. आवडत्या लेखकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही काही उपसंपादक-वार्ताहर मंडळी उत्साहानं वाढत होतो. शंकर पाटील ह्यांचं त्या दिवशी काही तरी बिघडलेलं होतं. कार्यक्रम बहुतेक त्यांच्यासारखा मनासारखा रंगलेला नव्हता. 'वेटर' समजून ते आमच्यावर ओरडत होते, पोळ्या गरम नाहीत किंवा 'मला तेल लावलेली चपाती चालत नाही म्हणून सांगितलं ना...' असं कुरकुरत होते. द. मा. त्यांना शांतपणे समजावत होते. डोळ्यांनी खुणा करीत आम्हालाही दिलासा देत होते. काहीसे हिरमुसले होऊनच आम्ही आमच्या जेवणाकडं वळालो. तेव्हा दिसले होते सगळ्यांनाच समजून घेणारे द. मा.

नगरला १९९७मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. आदल्या वर्षी नाकारलेलं आमंत्रण आणि दशकापूर्वी रद्द झालेलं प्रवरानगरचं संमेलन ह्या पार्श्वभूमीवर संमेलनाबद्दल फार मोठा उत्साह होता. मी पाहिलेलं, अनुभवलेलं हे पहिलंच संमेलन. उपसंपादक असलो, तरी संमेलनाच्या वार्तांकनात आघाडीवर होतो. कार्यक्रम निवडण्याची संधी मिळाली, तेव्हा संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होणारी द. मा. मिरासदार ह्यांच्या मुलाखतीची जबाबदारी उत्साहानं घेतली.



संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ४ जानेवारी रोजी ही मुलाखत झाली. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांची सुरुवातच मुळी तिनं झाली. ना. वा. टिळक मुख्य मंडपात दीड तास रंगलेल्या मुलाखतीला मोठी गर्दी होती. मंगला गोडबोले, बाळकृष्ण कवठेकर व प्रा. निशिकांत ठकार ह्यांनी द. मा. ह्यांना बोलतं केलं. मुलाखत कशी असावी, ह्याचं हे उत्तम उदाहरण ठरलं. कुणी कुणावर कुरघोडी करायचा प्रयत्न केला नाही. अनेकदा असं होतं की, प्रश्न लंबेचवडे असतात आणि उत्तरं थोडक्यात. द. मा. मनापासून बोलले. काही प्रश्न त्यांनी हळुवारपणे, कळेल-नकळेल अशा पद्धतीनं सोडून दिले. मुलाखतीची वेळ होती सकाळी नऊची. ती सुरू झाली तासभर उशिराने. 'कार्यक्रम तासभर उशिरा सुरू झाला. त्याची कुणी खंत बाळगण्याचं कारण नाही', असा षट्कार ठोकूनच द. मा. ह्यांनी सुरुवात केली.

विविध दैनिकांमध्ये आज प्रसिद्ध झालेल्या द. मा. ह्यांच्या निधनाच्या बातम्यांमध्ये त्यांनी प्रारंभी गंभीर व वेगळ्या विषयांवर लेखन केल्याचे उल्लेख दिसतात. खरंच त्यांनी असं काही गंभीर लेखन केलं होतं का? असेल तर नंतर त्या वाटेकडे त्यांनी दुर्लक्ष का केलं? गंभीर साहित्य लिहिण्याकडे दुर्लक्ष केल्याची हळहळ वाटत नाही का, असा नेमका प्रश्न मंगला गोडबोले ह्यांनी त्यांना विचारला.

समोरचे श्रोते काय ऐकायला आले आहेत, आपल्याकडून त्यांची काय अपेक्षा आहे ह्याची पूर्ण जाणीव असलेल्या द. मा. ह्यांना तो प्रश्न टाळणं किंवा विनोदी अंगानं काही तरी उत्तर देऊन वेळ मारून नेणं शक्य होतं. तसं न करता त्यांनी 'प्रवाहपतित' झाल्याचं प्रांजळपणे सांगितलं. ते म्हणाले होते, ''गंभीर कथा लिहायची इच्छा मला आजही आहे. मला ती लिहिता येईल, असा आत्मविश्वासही आहे. पण लोकांना जे आवडतं, तेच मी लिहीत गेलो. तो माझा दुबळेपणा आहे. मी प्रवाहपतित झालो!'' लोकांना काय आवडतं, ह्याचं दडपण न बाळगता लेखकानं मनाला पटेल ते लिहायला हवं, असंही ते म्हणाले. त्यांनी कोणे एके काळी लिहिलेल्या 'कोणे एके काळी' शीर्षकाच्या गंभीर कथेचा प्रवासही त्यांनी सांगितला. त्यांच्या ह्या वक्तव्यानं मला बातमीचा (मनाजोगता) 'लीड' दिला होता!

संमेलनाचा पहिला दिवस गाजवला होता तो गिरीश कार्नाड ह्यांनी. तेव्हा केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं. राज्यात मात्र युतीचं सरकार होतं. त्यामुळेच कार्नाड ह्यांनी सांगितलेली 'सैनिकांची गोष्ट' खूप जणांना शिवसेनेवर केलेली टीका वाटली. तथापि त्यांचा रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच होता. संमेलनाध्यक्ष म्हणून ना. सं. इनामदार ह्यांची झालेली निवडही अनेकांना रुचलेली नव्हती. कारण ते 'उजवे' मानले जात. मुलाखतीत ठकार ह्यांनी विचारलं की, '(संघ) परिवारात एवढी विनोदाची सामग्री आहे. पण तुम्ही सदरात, कथेमध्ये ते कधी लिहिले नाही...' तो काळ 'उजवे' असणे जाहीरपणे मिरवण्याचा नव्हता. ह्या प्रश्नालाही बहुतेक आदल्या दिवशीच्या भाषणाची पार्श्वभूमी असावी. उत्तर देताना द. मा. म्हणाले, ''मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, याचा अभिमान आहे. लेखनात मी राजकीय मते, तत्त्वप्रणाली आणत नाही. पण परिवारावर कधी लिहिले नाही. कारण आपल्याच बापाची टिंगल करणे मला जमणार नाही!''
कवितांकडे कधी वळला नाहीत का, ह्या प्रश्नावर द. मा. ह्यांनी 'नाही. कविता करण्याचा वाईट नाद मला लागला नाही!' असं उत्तर दिलं होतं. आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी ह्या आवडत्या लेखकांबद्दलही ते मनापासून बोलले. प्राध्यापक म्हणून आपले अनुभव फारसे सुखाचे नसल्याची खंत व्यक्त केली. इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा ध्यास पालकांनी सोडला नाही, तर मराठीचे भवितव्य वाईट आहे, असंही ते म्हणाले होते. ही मुलाखत ऐकून तृप्त झालो. त्या वेळी वाटलं होतं, हे सगळंच्या सगळं बातमीत लिहिता आलं तर... पण तसं शक्य नव्हतं. त्या मुलाखतीच्या टिपणाची नोंदवहीही आता कुठे तरी पडली आहे. ती सापडायला हवी.

ह्याच संमेलनाच्या निमित्ताने साधारण वर्षभरानंतर द. मा. मि. ह्यांच्यासह अनेक दिग्गजांना पुन्हा ऐकण्याची संधी आली. त्याला 'संमेलनाचं मावंदं' म्हणण्यात आलं. त्या कार्यक्रमात संमेलनाचा पूर्ण आढावा घेणाऱ्या 'संवाद'चं प्रकाशन झालं. द. मा. ह्यांनी मिश्कील भाषण करीत कवींची खिल्ली उडवली. आचार्य अत्रे, पु. भा. भावे ह्यांचे किस्से सांगून सहकार सभागृहात हास्याची कारंजी उसळवली.

साहित्य संमेलन आणि द. मा. अशी हॅटट्रिक महिनाभरातच जुळून यायची होती. परळी वैजनाथ संमेलनाचे अध्यक्ष म्हणून द. मा. ह्यांची निवड झाली. तेव्हाचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे स्वागताध्यक्ष होते. ह्या दोघांचं नातं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून. त्यामुळेच हे संमेलन आधीपासूनच माध्यमांनी, विशेषतः मुंबईतील काही वृत्तपत्रांनी लक्ष्य केलं होतं. 'संमेलन भगवं होणार,' असा त्यांचा मुद्दा होता. प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. संमेलनाचा आढावा घेणाऱ्या लेखात मग मी लिहिलंही, 'पुस्तक प्रदर्शनाची फित कापण्यासाठी असलेल्या कात्रीची मूठ सोडली, तर संमेलनात भगवं काही दिसलं नाहीच!'
'संमेलनाला कोणता रंग येणार याचे तर्क-कुतर्क लढविले जात होते,' अशी खंत मुंडे ह्यांनी समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केली. तो संदर्भ घेत द. मा. मि. ह्यांनी समारोपाच्या भाषणात टीकेचा उचित समाचार घेतला - 'टीकेला बिचकायचे कारणच नाही. कितीही चांगले झाले तरी टीका करणारे त्यात उणे-दुणे काढतातच. परळीचे संमेलन उत्तम झाले!'

'मी अध्यक्ष असतो, तेव्हा मुंडे मंत्री असतात,' असं द. मा. उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले होते. त्याचा संदर्भ अ. भा. वि. प.चा होता. समारोपाला आलेल्या मुख्यमंत्री मनोहर जोशी ह्यांनीही तो पकडत मुंडे ह्यांना कोपरखळी मारली - 'माझ्या कार्यक्रमाचे पर्मनंट अध्यक्ष आणि पर्मनंट उपमुख्यमंत्री!' संमेलनाध्यक्षाची निवडणूक होऊ नये, असं द. मा. मि. समारोपाच्या भाषणात म्हणाले होते. 'तशी ती मुख्यमंत्रिपदासाठीही होऊ नये. सध्याचाच मुख्यमंत्री कायम राहावा,' अशी टोलेबाजी पंतांनी केल्याचं लक्षात आहे. त्या संमेलनाच्या बातम्यांची फारशी कात्रणं माझ्याकडे नाहीत. शोध घेऊन टिपणंही सापडली नाहीत. त्यामुळे अध्यक्षीय भाषणात द. मा. मि. ह्यांनी कोणते मुद्दे मांडले होते, ते लक्षात नाही. संमेलनाच्या उद्घाटनावर सावट होतं, ते त्या पहाटे परळी रेल्वेस्थानकावर झालेल्या भीषण अपघाताचं. पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अस्मादिक द. मा. व मुंडे ह्यांच्या इतके जवळ होते की, प्रयत्न केला असता, तर एक-दोन फोटोंमध्ये चमकताही आलं असतं!

मिरासदारांची बरीच पुस्तकं संग्रहात आहे. अचानक ती कधी तरी हाती येतात. मग दोन-अडीच तास मस्त मजेत जातात. मागच्या वर्षी 'पंचायत' वेब सीरिज पाहताना उत्तररात्रीच त्यांच्या 'भुताचा जन्म' कथेची आठवण झाली. त्या मालिकेतील एक भाग ‘भूतिया पेड’ अगदी द. मा. ह्यांच्या कथेच्या वळणानं जातो. त्यांना हे कुणी सांगितलं होतं का?

विंदा - बापट - पाडगावकर ह्या त्रयीनं कविता गावोगावी नेली. माडगूळकर - शंकर पाटील - मिरासदार ह्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम केले. येत्या होळीला जाहीर कथाकथनाच्या पहिल्या कार्यक्रमाला सत्तावन वर्षं पूर्ण होतील. पहिला कार्यक्रम नागपूरला झाल्याची आठवण द. मा. ह्यांनी मुलाखतीत सांगितली होती. शंकर पाटील अगदी रंगून कथा सांगत, मिरासदारांची धाटणी वेगळीच होती. 'कवितेचे बघे निर्माण केले', असा आरोप ज्येष्ठ कवींवर झाला होता. अशी काही टीका ह्या तिघांवर झाली होती का? तसं काही वाचल्याचं आठवत नाही.

मिरासदारांच्या कथा आता वाचताना बऱ्याच वेळा वाटतं की, आजच्या काळात ते लिहीत असते आणि तशाच कथा त्यांनी लिहिल्या असत्या, तर त्याचं किती स्वागत झालं असतं? त्यातल्या 'जातिवाचक उल्लेखांनी' किती जणांच्या भावना दुखावल्या असत्या? सामाजिक माध्यमांतून त्यांचा कसा उद्धार झाला असता? अन्य कोणत्याही संमेलनाप्रमाणे परळीच्या संमेलनातही समारोपाच्या कार्यक्रमात डझनभर ठराव मंजूर झाले. त्यातल्या एका ठरावात म्हटले आहे, 'ज्ञानाच्या निकोप वाढीसाठी मराठी जनतेने उदार मनोवृत्तीचा स्वीकार करावा.' खुद्द संमेलनाध्यक्ष सूचक असलेला बारावा ठराव आहे - 'संशोधनाच्या व विचाराच्या क्षेत्रात साधार 'सत्य' हेच सर्वश्रेष्ठ मूल्य असते. एखाद्या संशोधकाने/विचारवंताने आधार व प्रमाणे देऊन केलेले विवेचन/मूल्यमापन कुणास पटले नाही,तर त्याचा प्रतिवाद वैचारिक पातळीवरच केला पाहिजे. दुर्दैवाने मराठी विचारविश्वात अनेकदा असहिष्णू वृत्ती दिसून येते.'

खळखळून हसायला लावणाऱ्या आवडत्या लेखकाला मी एवढंच पाहिलं नि ऐकलं.
---------
(छायाचित्रं - व्हॉट्सॲपच्या विविध गटांवर आलेली.)

#दमामि #द.मा. #साहित्य_संमेलन #नगर_संमेलन #परळी_संमेलन #कथाकथन #मिरासदार #DaMaMi #Mirasdar #MarathiAuthor 


Tuesday 21 September 2021

राजीव-स्मृती नि खारीचा वाटा!

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्याला, आपल्या सभोवतालाला अनेक धक्के दिले. जवळची माणसं पाहता पाहता कायमची दूरच्या प्रवासाला गेली. त्यातल्या काहींचं निधन 'अकाली' शब्दाची व्याप्ती पुरेशी स्पष्ट करणारं होतं. त्यापैकीच एक म्हणजे काँग्रेसचे तरुण खासदार राजीव सातव. मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात त्यांच्या निधनाची बातमी अक्षरशः कोसळली. अवघा महाराष्ट्र, देश हळहळला. पक्षीय अभिनिवेश लांब ठेवून लोक मोकळेपणानं आपल्या दुःखाला वाट मोकळी करून देत व्यक्त होत राहिले. त्यात हळहळ होती, खंत होती. पक्षीय राजकारण ह्या दुःखापासून शेकडो मैल दूर होतं.

राजीव सातव ह्यांच्या निधनाला जेमतेम चार महिने झाले. त्यांचा आज (दि. २१ सप्टेंबर) जन्मदिन. ह्यानिमित्ताने कळमनुरी येथे आज  'संसदरत्न राजीव सातव स्मृतिपुष्प' ह्या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन होत आहे. नांदेडच्या अभंग पुस्तकालयानं प्रकाशित केलेलं हे पुस्तक कॉफी-टेबल आकाराचं आणि २७२ पानांचं आहे. सातव ह्यांच्या निधनानंतर अवघ्या चार महिन्यांत त्यांच्या कारकिर्दीचा सर्वांगीण आढावा घेणारा हा स्मृतिग्रंथ प्रकाशित होत आहे. ह्या कामात सहभागी होण्याची संधी मिळाली, ते काम उत्तम होईल, ह्यासाठी चांगल्यापैकी हातभार लागला, ह्याचं मोठं समाधान आहे.

पुस्तकाचे संपादक व नांदेडचे पत्रकार संजीव कुळकर्णी ह्यांनी जूनमध्ये ह्या पुस्तक-प्रपंचाची कल्पना दिली. त्यासाठी आम्ही एकदा औरंगाबाद येथे भेटलोही. तिथं त्यांनी सातव ह्यांचे स्वीय सहायक दत्ता सुतार ह्यांचा लेख संपादनासाठी दिला. (खरं म्हणजे नंतर लेख पाहिल्यावर लक्षात आलं की, त्याचं पुनःलेखनच करणं आवश्यक आहे.) दरम्यान, पुस्तक अधिक विविधांगी व्हावं, ह्यासाठी मीही संजीव कुळकर्णी ह्यांना काही नावं सुचविली. त्यापैकी पत्रकार मंगेश वैशंपायन व अभिजित घोरपडे ह्यांना ती कल्पना पसंत पडली आणि त्यांनी लिहिण्याचं मान्य केलं. मंगेशनं तर लेख माझ्याकडेच पाठवून 'पुढचं सगळं तूच बघ' असं सांगितलं. राजीव ह्यांचा महाविद्यालयीन सहअध्यायी असलेल्या एकालाही लेखाची विनंती केली होती. 'मला आवडेल लिहायला,' असं कळवून त्याला काही लिहायला जमलंच नाही. नगर जिल्ह्यातील एका नेत्यालाही ह्याबाबत विनंती केली. 'माझे चांगले संबंध होते त्यांच्याशी. नक्की लिहिणार मी,' असं आश्वासन देणाऱ्या त्या नेत्यानं नंतर फोनला उत्तर दिलं नाही आणि न लिहिण्यासाठी काही सबबही सांगितली नाही. असो!

आमच्या 'शब्दकुल मीडिया'तर्फे दोन पुस्तकांच्या संपादनाची-निर्मितीची कामं झाली आहेत. शब्दांकनापासून, लिहिण्यापासून, मुद्रितशोधन-ब्लर्ब ह्यापासून ते थेट पृष्ठरचनेपर्यंत. छापण्यास तयार, अशा स्वरूपात. नगरचे उद्योजक दिलीप चंदे ह्यांच्या व्यक्तित्वाचा व कर्तृत्वाचा सर्वांगीण आढावा घेणारं 'समर्पयामी' सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झालं. कॉफी-टेबल बुक पद्धतीची त्याची निर्मिती आहे. एकदम वेगळी, आकर्षक. त्याचे चार विभाग आहेत. चारही विभागांना नेमकी शीर्षकं व त्याला जुळणारा श्लोक/अभंग आहे. हे पुस्तक पाहण्यासाठी म्हणून संजीव कुळकर्णी ह्यांना दिलं होतं. आनंदाची बाब म्हणजे 'संसदरत्न'ची निर्मिती 'समर्पयामी'च्या धर्तीवर, ते डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली. साधारण तोच आकार, ('समर्पयामी' चौरस, तर हे आयताकृती.) तीच पद्धत. तिथं चार विभाग होते, इथं तीन आहेत. म्हणजे 'समर्पयामी'च्या कामाला एक प्रकारे मिळालेली ती दादच होय.

दत्ता सुतार ह्यांचा लेख पाहिला आणि हबकलोच. तो होता ६ हजार १७९ शब्दांचा. स्वीय सहायक ह्या नात्यानं गेलं दशकभर सातव ह्यांच्या अगदी जवळ राहिल्यानं सुतार ह्यांच्याकडं सांगण्यासारखं बरंच काही होतं आणि अजूनही असेल. त्यांचं नातंही मुरलेलं होतं. त्यामुळे त्यांनी अगदी भावनावश होऊन लिहिलं होतं. स्वाभाविकच होतं ते. त्यांनी हा लेख लिहिला, तेव्हा सातव ह्यांचं निधन होऊन महिनाही लोटला नव्हता. लेखकाच्या भावपूर्ण शैलीचा सूर न बदलता, त्याच्या आशयाला नि मांडणीला फार धक्का न लावता लेखाचं पुनःलेखन आणि संपादन करायचं होतं.संदर्भ जोडून घेणं, काही गाळलेल्या जागा भरणं, नित्य परिचयामुंळ थोडक्यात येणाऱ्या गोष्टींना काही सविस्तर संदर्भ जोडणं असं काम करायचं होतं. कम्प्युटरसमोर तीन रात्री ठाण मांडून बसून, हा लेख पूर्ण केला, तेव्हा त्यात जवळपास साडेसातशे शब्दांची भर पडलेली होती. लेखाचे शब्द झाले होते, तब्बल ६ हजार ९०९! पुनःलेखन, संदर्भ जोडून घेणं आणि वाक्यरचना व्यवस्थित करणं, असं हे मोठं काम होतं. आपण लिहिलेला लेख त्याच सुरात एवढा नेटका झाल्याचं पाहून सुतारही मनस्वी खूश झाले.

सुतार ह्यांचा हा लेख खरंच फार सुंदर आणि खूप काही सांगणारा आहे. त्यामुळे त्याला शीर्षकही वैशिष्ट्यपूर्ण हवं, असं ठरवलं होतं. त्यानुसार लेखाला एक नव्हे, तर पाच शीर्षकं दिली -  

'आकाशी तो चमचमणारा अवचित कोसळला तारा...', हे मला आवडलेलं शीर्षक.

पण जातीचा उपसंपादक एकाच शीर्षकावर कधी समाधान मानत नाही. तो हातचे असावेत म्हणून अजून दोन-तीन शीर्षकं मनात योजून ठेवतो. मी नुसती मनात योजून न ठेवता आणखी शीर्षकं दिली -  'उल्कापात!', 'लखलखत्या ताऱ्याचा अस्त', 'हे दुःख कोण्या जन्माचे...' आणि 'राजकारणातील संत'. त्यातलं कोणतं शीर्षक निवडलं हे आता पुस्तक पाहूनच समजेल.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम, कळमनुरीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व सातव ह्यांचे कॉलेजमित्र डॉ. बबन पवार ह्यांचेही लेख संजीव कुळकर्णी ह्यांनी संपादनासाठी पाठविले. त्या लेखांचं संपादन करताना सातव ह्यांच्याविषयी नवं काही समजलं. मंगेशच्या लेखातून त्यांची लोकसभेतील आणि विशेषतः गेल्या वर्षी शेतकरी कायद्यांच्या विरोधातली कामगिरी लक्षात आली. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व संजीव कुळकर्णी ह्यांचेही लेख प्रकाशनाआधीच वाचायला मिळाले... एक नजर टाकण्यासाठी, त्यामध्ये काही कमी-जास्त नाही ना, हे बारकाईने बघण्यासाठी म्हणून. काम संपता संपता विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या-लेखांचं संकलन असलेला एक लेखही संपादकांनी पाठवला. तोही नीटनेटका करून दिला. सुरुवात आणि शेवट आकर्षक! त्यात काही गुजराती दैनिकांची कात्रणं होती. अलीकडे दोन महिन्यांत दोनदा मी गुजरातेत जाऊन आल्याने मला गुजराती वाचता येतं, असा का कोण जाणे त्यांचा समज झालेला.


गुजरातमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी
व्यक्त केलेलं दुःख.

सातव ह्यांच्या निधनानंतर सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात लिहून आलं. त्याचं संकलन झालं पाहिजे, अशी चर्चा आमच्या औरंगाबाद भेटीत झाली. ते काम अस्मादिकांवरच सोपविण्यात आलं. त्यासाठी खूप वाचून बरेच मुद्दे काढले होते; साधारण अडीच ते तीन हजार शब्द. पण संपादनाच्या आणि पुनःलेखनाच्या कामात लिहायला वेळच मिळत नव्हता. अखेर म्हटलं, लेख भरपूर झाले असतील. ह्या लेखावाचून पुस्तकाचं काही अडणार नाही. नकोच लिहायला. पण हा लेख असावा, असं कुळकर्णी ह्यांना अगदीच शेवटच्या टप्प्यात वाटलं. त्यामुळं पुन्हा एकदा 'फेसबुक', 'ट्विटर'ची पानं चाळून पाहिली. देशभरातील कार्यकर्त्यांना सातव ह्यांच्या निधनाचं मनापासून दुःख झाल्याचं त्यांचे 'ट्वीट' पाहताना जाणवलं. त्यात गुजरातमधील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.  त्यातून मग 'सामाजिक माध्यमांवर उसळलेल्या भावलाटा' हा साधारण चोवीसशे शब्दांचा लेख आकाराला आला. त्यासाठी वेगवेगळ्या पोस्टमधून सात-आठ छायाचित्रंही काढली.

लेखकांनुसार, म्हणजे राजकीय नेते, पत्रकार-संपादक, कार्यकर्ते-स्नेही-मित्र असे विभाग पुस्तकात करावेत, असं उशिरा ठरलं. ह्या विभागांची शीर्षकं देण्याची जबाबदारीही माझ्याकडे आली. चार विभाग करावेत असं माझं मत होतं. त्यानुसार त्याला नावं सुचविली - 'राजस सुकुमार...', 'श्रेयस', '...अधुरी एक कहाणी', 'नेता... खरा नि हिरा', 'चमक विजेची, परी क्षणाची...'. ह्या शीर्षकाच्या विभागात काय असेल ह्याचा अंदाज येण्यासाठी स्वतंत्र सात-आठ ओळीही लिहिल्या.

पुस्तकाचे तीन विभाग ठरले व त्यानुसार शीर्षकंही निवडली. त्यानंतर प्रश्न आला तो विभागणी करणाऱ्या ह्या पानांच्या मागे मजकूर काय टाकायचा? अवांतर वाचन त्यासाठी उपयोगाला आलं आणि ह्या तिन्ही विभागांना सोयीचा होईल, असा मजकूर मिळाला मला.

संपादन, पुनःलेखन, शीर्षकं देणं हे माझं आवडतं काम. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ते करताना बरं वाटलं. एका तरुण नेत्याच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा स्मृतिग्रंथ आहे. त्याच्या निर्मितीत चांगला हातभार लागल्याचं समाधान मोठंच आहे.

-------------

#RajeevSatav #SansadRatna #ShabdkulMedia #AbhangNanded #Kalamnuri #Corona #SocialMedia #Congress #GujaratCongress #RajeevSatav_Memoirs

Friday 10 September 2021

राहू जपून, थोडं अजून...

मत्प्रिय भक्तांनो...

नमस्कार, प्रणाम, नमस्ते.

वणक्कम.

सलाम वालेकुम.

सत् श्री अकाल.

आणि, हाय..!

हे म्हणजे अगदी रेडिओवरच्या निवेदकांसारखं झालं ना? त्या 'एफ. एम.'वरच्या चिवचिव चिमण्या नि मिठूमिठू पोपट करतात तसं. एका दमात सगळ्यांना साद घालायची! अभिवादन करतानाच सगळ्यांना आपलंसं करायचं.

... तर सांगायचा मुद्दा तुम्ही सगळेच माझे आहात की. मांडवात आरती म्हणताना काय, विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचताना काय... तिथं कुणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन नसतो. तिथं दिसतो तो माझा भक्तच. म्हणून मग मी पण थोड्या वेळासाठी 'आर. जे.' झालो. कसं वाटतंय 'आरजे गणेशा' किंवा 'आरजे विनायका' ऐकायला? की 'आरजे विघ्नहर्ता' अधिक योग्य राहील?

रेडिओवरनं आठवलं, खरं तर ठरवलं होतं की, तुम्हाला 'मित्रों...' अशी साद घालायची. नंतर विचार केला नको बुवा. तशी हाक मारली की, सावरून बसता तुम्ही. हातातलं सगळं काम सोडून रेडिओ, टीव्ही.पुढं ठाण मांडता. मग त्याच्यावरून पुढचे काही दिवस फेसबुक, ट्विटर इत्यादी माध्यमांतून एकमेकांवर तुटून पडता. 'भक्त'-'अंधभक्त'-'गुलाम' ही आणि अशी शेलकी विशेषणं वापरता. नको म्हटलं. तुम्ही सगळेच्या सगळे माझे लाडके भक्त. माझ्या 'मन की बात'वरून तुमच्यात लठ्ठालठ्ठी नको. ह्या उत्सवाच्या काळात तर नकोच.


छायाचित्र सौजन्य - www.devillierart.com
हे पत्र कशासाठी आणि तेही अगदी शेवटच्या क्षणी, असा प्रश्न पडला असेलच तुमच्यातल्या बऱ्याच जणांना. मनात बऱ्याच दिवसांपासून होतं संवाद साधण्याचं. मनातलं ओठांवर आलं. तेच सांगावं म्हटलं. 'होठों में ऐसी बात' म्हणणार होतो. पण लगेच तुम्हाला आठवायची त्या गाण्यावरची पुण्याच्या नातूबागेतली सजावट. नजरेसमोर यायचे त्या गाण्यावर थिरकरणारे शेकडो, हजारो रंगबिरंगी लखलखते दिवे. तुमचं, सार्वजनिक मंडळांचं आवडतं गाणंय ते. इतकी वर्षं ऐकून ऐकून मलाही पाठ झालंय. असो! मुद्द्यावर येतो. ओठांवर आलेलं मी काही गिळून नाही टाकणार. भले-बुरे सगळे अनुभव पचवावेत, पोटात साठवावेत, असा माझ्या तुंदील तनूचा अर्थ आहेच. पण आता पोटातून ओठांवर आलेलं जे काही सांगतोय, त्यानं खळबळ वगैरे काही माजणार नाही. जे पाहायला मिळालं, जे ऐकायला मिळतंय त्यावरून मनात आलं ते सांगतो.

निघण्याची सगळी तयारी करून, आवरून बसलो होतो. अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी नवी पितांबरं, उपरणी भरून झाली. ह्या उत्सवाच्या दिवसात खिरापत, पंचखाद्य, फळं, पेढे, मोदक ह्याचा मारा होणार हे माहिती असल्यानं श्रावणात एकभुक्तच राहिलो होतो. मोदकांच्या कल्पनेनंच तोंडाला पाणी सुटलं होतं. पार्वतीआईनं नेहमीप्रमाणं मायेनं नि काळजीनं सल्ला दिलाच निघताना, 'थोडं जपून खा रे बाळा! तळलेलं कमी खा.' 'मोदक श्रेष्ठ कोणते? तळणीचे की उकडीचे?' तुमचा हा फेसबुकीय वाद आमच्या मातुःश्रींपर्यंत पोहोचलेला आहे बरं! आपला मतलब त्या तसल्या कळकट, शिळ्या वादाशी नाही; ताटभरून मोदक असल्याशी!!

मेघराजाच्या रूपात तांडव करून बाबा दमले होते. त्यामुळे लांबूनच त्यांचा निरोप घेतला. तेवढ्यात आमचे मूषकमहाराज आले नि म्हणाले, ''देवाधिदेवा, अहो काय चाललंय पृथ्वीवर, तुमच्या प्रिय भारतवर्षात! केवढी गर्दी बघा ती. तुमची मूर्ती, नारळ, फुलं-दूर्वा, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी रस्ते कसे वाहताहेत बघा. अहो, जिकडं बघावं तिकडं 'ट्राफीक ज्याम' दिसतंय. कसं काय होणार हो!''

मी म्हणालो त्याला, ''बा मूषका, इतकी वर्षं मला घेऊन जातोस आणि ही गर्दी, हा उत्साह पहिल्यांदाच पाहिल्यासारखं काय सांगतोस. नवं काही बोल.. ट्विटरवरचा नवा ट्रेंड सांग, फेसबुकवरचा खमंग रंगलेला वाद सांग...''

हा थट्टेचा सूर मूषकराजांना पटलेला नाही, हे त्यांच्या इवल्याशा चेहऱ्यावर लगेच दिसलं. ''गणराया, गांभीर्यानं घ्या मला कधी तरी. नेहमीसारखी परिस्थिती राहिलेली नाही सध्या. ती कोरोना महामारी आलेली लक्षात आहे ना तुमच्या. यंदा मार्च, एप्रिल, मे महिने कसे गेले आठवतंय ना?''

मूषकराजांचं ऐकावं म्हणून मग मीही एक नजर टाकली, तर काय. सांगत होता ते खरंच होतं की. केवढी गर्दी! नजर टाकावी तिकडं माणसंच माणसं दिसत होती. हातात पिशव्या, एकमेकांना धक्का देत, वाहनांची दाटी चुकवत वाट काढणारी. रस्त्याच्या कडेला बसलेले विक्रेते. कुणाच्या नाकावर मास्कच नाही, तर कुणी तो हनुवटीवर अडकवलेला. कुणी खोकतोय, तर कुणी थुंकतोय. अरे! एवढ्यात सगळं विसरलात की काय, सोळा-सतरा महिने अनुभवलेलं. तो कोरोनानामक राक्षस अर्धमेला झाल्यासारखा वाटत असला, तरी अजून पूर्णपणे खतम नाही झालेला. लस घेतली असेल तुम्ही. पण म्हणून काय झालं! कोरोनाला आव्हान न देता 'तू परत ये, तू परत ये...' असं आवाहन करत असल्यासारखंच वाटलं मला ते सगळं चित्र पाहून.

नाही म्हटलं तरी हे उघड्या डोळ्यांनी बघितल्यावर हादरलोच थोडा मी. म्हणूनच पत्र लिहायला बसलो लगेच. निघण्याची घाई-गडबड सुरू असताना, वेळ काढून लिहितोय. प्रत्येक मंगल कार्याची पहिली अक्षता देऊन तुम्ही मला मनोभावे आमंत्रण देता. उत्सवाचं तुमचं आमंत्रण मिळालंय. 'पुढच्या वर्षी लवकर या' असं तुम्ही मागच्या वर्षी बऱ्यापैकी शांतपणे सांगितलं होतं. म्हणून यंदा थोडं निवांत जावं असं ठरवलं होतं. यायचं तर असतंच की दर वर्षी.

कोरोनामुळं गेल्या वर्षी परिस्थिती नाजूकच होती. म्हणून उत्सव जपूनच साजरा केला ना तुम्ही. विनाकारण बाहेर पडायचं नाही, मोठ्या संख्येनं सगळ्यांनी जमायचं नाही. सूर्य मावळला की, आपापल्या घरात बसायचं... हे सगळे नियम तुम्ही पाळले ना गेल्या वर्षी पाच-सहा महिने? त्याचे चांगले परिणामही दिसले. हो ना? पण काय सांगावं, यंदाही परिस्थिती फार काही बदललेली नाही बुवा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण सगळे चांगलेच पोळून निघालो, आठवतंय ना? आत्ता आत्ताची तर गोष्टंय ती. तिसऱ्या लाटेचा इशारा सगळे तज्ज्ञ देत असताना एवढे कसे बेफिकीर! डॉक्टरचं, कंपौंडरचं कुणाचंही ऐका... पण भल्याचं असेल ते ऐकाच बुवा.


छायाचित्र सौजन्य - www.peepsburgh.com

हे दिवस पावसाचे. आणि उत्सवाचे. दोन्हींत चिंब भिजण्याचे. माझी तुम्ही आतुरतेनं वाट पाहत असता. मीही तेवढाच उत्सुक असतो तुम्हाला भेटायला. एव्हाना गल्लीबोळात, रस्तोरस्ती मंडप उभे राहिलेले असतात. त्यावरून वृत्तपत्रांत बातम्या आलेल्या असतात, काही सजग, जागृत नागरिक पत्रंही लिहितात. मंडळांचे कार्यकर्ते थोडे जास्तच उत्साहात असतात. सजावटी ठरलेल्या असतात. ढोल-ताशा पथकांना सुपारी दिलेली असते. तुम्ही सगळे माझ्या उत्सवात दहा-अकरा दिवस धमाल करता. एक से बढकर एक देखावे असतात. लहान मुलांसाठी, त्यांच्या आई-बाबांसाठी, आजी-आजोबांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरं...असं खूप काही असतं. तुम्हाला नाचायचंही असतं बेफाम. आपला बुवा नाचण्याला बिल्कुल विरोध नाही. नाचायला काय पब किंवा डिस्कोथेकच हवा काय प्रत्येक वेळी? मिरवणुकीतल्या तुमच्यातल्या दोन-पाच जणांचा पदन्यास बघून माझेही पाय थिरकायला लागतात. तसं वागणं योग्य ठरणार नसतं ना. कारण 'उत्सवमूर्ती' असतो मी.

दर वर्षी एक तरी गाणं हिट होतच असतं उत्सवाच्या निमित्तानं. ते 'ज्वेल थीफ'मधलं गाणं तुम्हाला सांगितलंच. पुढं कधी तरी 'गाओ ओम शांति ओम...' आलं. शांतता पाळायला एवढं ओरडून, ढणढण वाजवतं सांगावं लागतं होय. त्या वर्षी हा शांतिजप ऐकताना कान किटून गेले माझे. परत काय आहे की, मला एकाच वेळी अनेक गाणी ऐकणं भाग असतं. एका मंडपाचा ध्वनिवर्धक माझ्या समोर लताबाईंनी गायिलेली आरती ऐकवत असतो, तर दुसऱ्या मंडपाचा कर्णा 'चल छय्या, छय्या' म्हणत माझ्या कर्णाकडेच रोखलेला असतो. 'शांताबाई, शांताबाई...' असं कोण कुणाला पुकारतंय हे ऐकावं म्हटलं तर तिसरीकडून 'पार्वतीच्या बाळा...' अशी लडिवाळ हाक कानी पडते. 'देवा श्री गणेशा' एका बाजूला चालू असतं, तर लांबून कुठून तरी 'देवा हो देवा गणपति देवा...' असं मला आळवत कुणी 'हमसे बढकर कौन?' अशी प्रौढी मिरवत असतं.

हे उत्साहभारित वातावरण मलाही फार सुखद वाटत असतं. कधीच कंटाळा येत नाही. वर्तमानपत्रांत देखाव्याची पान भरून छायाचित्रं येतात. 'देखावे पाहता पाय थकले, पण डोळे नाही निवले' हे नेहमीचंच यशस्वी वाक्य कुणा बातमीदार-उपसंपादकाला द्यायचं असतं. एखादा उत्साही उपसंपादक 'रंग गुलाली ढोल वाजती, आले आले गणपती' असं उत्सवी शीर्षक देऊन बहार आणत असतो.


छायाचित्र सौजन्य - www.subpng.com

पण यंदाही, सलग दुसऱ्या वर्षी ह्या सगळ्यावर नाही, पण बऱ्याचशा कार्यक्रमांपुढं फुली मारायचीच. नियम पाळू. मला छान मखरात बसवा, गौरींची मस्त सजावट करा...पण हे सगळं आपल्यापुरतं; त्याला सार्वजनिक स्वरूप नको. यंदाही सजावटीचा भव्य मांडव नको. दर्शनाला आणि आरतीला गर्दी नकोच. तुम्ही मनोमन केलेला नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचणारच. आशीर्वादासाठी माझा हात उंचावलेलाच आहे. गाणी नको, ढोल-ताशे नको, पाय थिरकावणारा नाच नको आणि गर्दीचा उत्सवी उत्साह नकोच नको.

हे सगळं मलाही थोडंच गोड वाटतं? खंत आहेच की. चुकल्यासारखं वाटतंय. लागोपाठ दुसऱ्या वर्षी भक्तांपासून थोडं लांबच राहायचं? पण इलाज नाही. मला सांगा, मास्क लावलेल्या रूपात माझं दर्शन तुम्हाला आवडेल का? तुमचे फुललेले चेहरे बघताना माझी अवस्था 'रूप पाहता लोचनी, सुख जालें वो साजणी' अशी होते. तुम्ही मास्क बांधूनच येणार. मग मला तुमचा फुललेला चेहरा कसा दिसणार? आणि मास्क न लावताच आलात, तर मला नाही हं आवडणार. नकोच ते! 

फ़िराक़ गोरखपुरीसाहेबांचा शेर आहे - 

तुम मुख़ातिब भी हो, क़रीब भी हो
तुमको देखें कि तुम से बात करें

माझी अवस्था अगदी तशीच आहे मित्रांनो. पण सध्याचा काळ लक्षात घेऊन तुम्हाला जवळून पाहण्यापेक्षा हा दुरून संवाद साधणंच योग्य आहे, असं मला वाटतं. ती म्हण आहे ना, एका जत्रेनं देव काही म्हातारा होत नाही. एकच्या ऐवजी आपण दोन उत्सव म्हणू.

मला बोलावलंत, मी आलोय. दर वर्षीच्या उत्साहानंच तुम्ही 'आधी वंदू तुज मोरया' असं म्हणाच. ऐकताना छान वाटतं. पण तसं म्हणताना मी वर जे काही लिहिलंय ते ध्यानात घेऊन 'सगळं ऐकू तुझे मोरया' असंही वचन मला द्या. पुढच्या वर्षी धमाल करू. दोन वर्षांची कसर पुरेपूर भरून काढू. हो ना?

ऐक्यं बलं समाजस्य तदभावे से दुर्बल:
तस्मादैक्यं प्रशंसन्ति दृढं राष्ट्रहितैषिण:||

... ह्या श्लोकाचा भावार्थ असा की, ऐक्य हीच समाजाची ताकद आहे. ऐक्य नसलेला समाज आणि पर्यायाने तो देश दुबळा ठरतो. म्हणूनच राष्ट्रहिताचा विचार करणारे ऐक्याला प्रोत्साहन देतात. ह्या महामारीला पिटाळून लावण्यासाठी आपल्याला असंच ऐक्य दाखवावं लागेल.

यंदा निश्चयच करू. दीड वर्ष ठाण मांडून बसलेल्या ह्या कोरोना-विघ्नाला हरवू या, पुढच्या वर्षी दुपटीनं आनंद साजरा करू या. तुम्ही म्हणता ना मला, 'पुन्हा पुन्हा तुम्ही यावे, विद्या ज्ञान आम्हा द्यावे'. आतापुरतं एवढं ज्ञान बास झालं की. 

काळजी करू नका, आवश्यक ती काळजी मात्र घ्या. बाकीचं पाहायला मी आहे ना समर्थ! 

तुमचा सगळ्यांचा,

बाप्पा

.....

#Ganesh #GaneshFestival #Covid19 #socialmedia #facebook #twitter #bhakt #LordGanesh #mankibaat #गणेशोत्सव #होठों_में_ऐसी_बात

#भक्तांशी संवाद

Sunday 15 August 2021

...हा माझाच देश आहे!

 


चिडतो, कुढतो, रडतो
नशिबाला बोल लावतो
कधी कधी शिव्या देतो
...तरी हा माझा देश आहे!

दोषांची परवचा म्हणतो
उणे-दुणेच काढत बसतो
तेच ते उगाळत राहतो
...तरी हा माझा देश आहे!

नळ कोरडाठक्क दिसतो
रस्त्यांवरचे खड्डे मोजतो
कुरकुर करीत कर भरतो
...तरी हा माझा देश आहे!

नियम सारे ठोकरतो
कायदे बहुदा मोडतो
मुर्दाडपणे पुढे जातो
...तरी हा माझा देश आहे!

व्यवस्थेच्या नावे बोटे मोडतो
नाहीच सुधारणार, शाप देतो
गरजतो अन् मनातच बरसतो
...तरी हा माझा देश आहे!

कामासाठी लाच देतो
हळूच वशिला लावतो
कधी फक्त तमाशा बघतो
...तरी हा माझा देश आहे!

परदेशाचे कौतुक गातो
संधी मिळता तिकडे जातो
तिथून इथे बोट दाखवतो
...तरी हा माझा देश आहे!

कधी शेतकऱ्यांसाठी हळहळतो
कधी कष्टकऱ्यांसाठी खंतावतो
कधी उपऱ्यांवर पार वैतागतो
...तरी हा माझा देश आहे!

लॉकडाऊन पुरता पाळतो
मनाविरुद्ध घरातच बसतो
लढून हरवू म्हणत राहतो
...तरी हा माझा देश आहे!

सांगितल्यावर टाळ्या पिटतो
अनामिकासाठी दिवा लावतो
मदतीसाठी पुढेही सरसावतो
...तरी हा माझा देश आहे!


हॉकीचे सामने मजेत बघतो
सिंधूला सारखं चिअरिंग करतो
 मग एक भाला काळजात घुसतो
...हा माझा, माझाच देश आहे!

ऑलिंपिक पदकाने खुशीत येतो
वर्ल्ड कप दिमाखात मिरवतो
नीरज, मीरा, दहिया माझे म्हणतो
...हा माझा, माझाच देश आहे!

वीरांची स्मृती जागवतो
तिरंग्याला सलामी देतो
मनाशी खूणगाठ बांधतो
...हा माझा, माझाच देश आहे!

नवीनवी स्वप्ने रोज पेरतो
आशेचे पाणी घालत राहतो
'उद्या आपलाच' मीच सांगतो
...हा माझा, हो माझाच देश आहे!

....

(चित्रांचे सौजन्य - https://hdpng.com आणि https://thumbs.dreamstime.com)

....

#India #IndependenceDay #MyCountry #मेरा_देश #15August #हा_माझाच_देश_आहे

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...