Sunday 19 November 2023

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

 


‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!!

‘आवाज’ आणि ‘खिडकी’ हेही जवळचंच नातं आहे. खिडकी-चित्रांसाठी प्रसिद्ध असलेला हा दिवाळी अंक.

दिवाळी अंकांच्या फराळामध्ये ह्या विनोदी वार्षिकाला मागणी भरपूर. तो नित्यनियमाने प्रकाशित होतो, त्याला यंदा ७३ वर्षं पूर्ण झाली. आणि यंदाच्या अंकाच्या माध्यमातून एका लेखकानं अर्धशतकही गाठलं. तीच खेळपट्टी, तोच फलंदाज...अर्धशतकानंतरही तीच उमेद अन् तोच उत्साह.

दिवस दिवाळीचे आहेत, तसेच क्रिकेट विश्वचषकाचेही आहेत. म्हणून हे अर्धशतक आवर्जून नोंद घेण्यासारखं. त्याची माहिती काहीशा गमतीनेच मिळाली.


लेखक विजय ना. कापडी
.....................
विनोदी कथालेखक विजय ना. कापडी ह्यांना दोन वर्षांपूर्वी ‘चिकूची कृपा’ ही कथा आवडल्याचं कळवलं. दरम्यानच्या काळात आमचा फारसा संपर्क झाला नाही.

दिवाळीच्या पंधरवडाभर आधी श्री. कापडी ह्यांचा निरोप आला. ‘खिडकी’ वाचून त्यांना वाटलं की, माझा ‘आवाज’शी काही संबंध आहे की काय? तसा तो येण्याची एक अंधूक शक्यता वीस वर्षांपूर्वी निर्माण झाली होती.

‘लोकमत’च्या विनोदी कथा स्पर्धेत टोपणनावाने लिहिलेल्या कथेला पारितोषिक मिळालं होतं. त्यावरून ‘आवाज’च्या संपादकांनी पत्र लिहून ‘चांगली कथा’ पाठविण्यास कळवलं होतं. तशी कथा काही सुचली नाही आणि ‘आवाज’चा लेखक होण्याची संधी हुकली.

मूळ विषयापासून भरकाटायला नको. तर श्री. विजय कापडी ह्यांच्याशी संवाद सुरू राहिला. दिवाळीच्या अगदी पहिल्या दिवशी त्यांच्याकडे ‘आवाज’चा अंक पोहोचला. त्यातील कथेच्या पानाचं छायाचित्र त्यांनी पाठवलं. कळवलं, ‘‘अद्दल’ ही माझी कथा, ‘आवाज’मध्ये प्रसिद्ध झालेली पन्नासावी कथा! पहिली १९७२मध्ये पहिली आणि यंदा पन्नासावी!’

हे वाचून चकितच झालो. एक दिवाळी अंक, एक लेखक आणि त्याच्या सलग ५० कथा. अद्भुतच! क्रिकेटच्या परिभाषेत बोलायचं तर ‘स्ट्राईक रेट’ शंभराला भिडणारा!

पहिला प्रश्न पडला, असा काही विक्रम अन्य कोण्या लेखकाच्या किंवा दिवाळी अंकाच्या नावावर असेल का? एवढं दीर्घ काळ कोणी लिहिलं असेल का? आणि कोणत्या संपादकानं ते प्रसिद्ध केलं असेल का?

हे सारे प्रश्न थेट लेखक श्री. विजय कापडी ह्यांनाच विचारावं म्हटलं. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून ‘बोलायची’ तयारी दाखविली.

हा लेखक ब्याऐंशीच्या घरात असून, पणजीजवळच्या ताळगाव येथे निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखात जगतो आहे. त्यांचं बालपण हुबळीमध्ये गेलं. गणित व संख्याशास्त्र विषयांमध्ये पदवीधर झाल्यावर त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेत तीन तपं नोकरी केली.

आकड्यांमध्ये गुरफटलेले श्री. कापडी लेखनाकडे, त्यातही विनोदी लेखनाकडे कसे काय वळाले? ते म्हणाले, ‘‘विनोदाकडेच माझा कल होता. चौथी-पाचवीत असताना पहिल्यांदा ‘चांदोबा’ वाचला. त्यात विनोदी काही नाही म्हणून पोस्टकार्डावर एक विनोद लिहून थेट मद्रासला पाठवला. गंमतीचा भाग म्हणजे तो ‘चांदोबा’मध्ये प्रसिद्ध झाला. त्याबद्दल हेडमास्तरांनी पुस्तक बक्षीस दिलं - 
केशवकुमारांचा विडंबन संग्रह ‘झेंडूची फुलें’. त्यातली ‘परिटास--’ एवढीच कविता कळाली.’’

शाळेतील पुस्तक-पेटीत श्री. विजय कापडी ह्यांना एक दिवस ‘किर्लोस्कर’ मासिक मिळालं. त्यामधील गंगाधर गाडगीळ ह्यांची ‘बंडूच्या छत्र्या’ त्यांना बेहद्द आवडलेली कथा. घरी येणाऱ्या पाहुण्यांची त्यांची आत्या फर्मास नक्कल करी. त्यातूनच विनोद मुरत गेला. वयाच्या विशीपासूनच त्यांचं ‘मार्मिक’मध्ये लेखन सुरू झालं. त्यानंतर दहा वर्षांनी ‘आवाज’मध्ये पहिली कथा प्रसिद्ध झाली.

ह्या आगळ्या अर्धशतकाच्या निमित्ताने श्री. विजय कापडी ह्यांच्याशी झालेला संवाद असा - 


पन्नासावी कथा.
............
एकाच दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध होणाऱ्या कथांचं अर्धशतक हे ऐकायला-वाचायलाच मोठं रोमांचक, विलक्षण आहे. ‘आवाज’मध्ये यंदा तुमची पन्नासावी कथा प्रसिद्ध झाली. काय भावना आहे?
- ‘आवाज’मध्ये पन्नासावी कथा प्रसिद्ध झाल्याचं पाहताच मला जग जिंकल्याचा आनंद झाला. (कदाचित माझं जग खूपच लहान असण्याचाही हा परिणाम असावा!) माझ्या आतापर्यंतच्या विनोदी साहित्य लेखनातील ही फार मोठी घटना आहे, असं मला वाटलं. इतरांना तसं वाटतं की नाही, मला ठाऊक नाही!

एवढं सातत्यानं एकाच दिवाळी अंकासाठी कोणी लिहिल्याचं तुम्हाला माहिती आहे?
- ‘आवाज’ व इतर अंकांसाठी सातत्यानं लिहिणाऱ्या काही लेखकांची नावं माझ्या माहितीची आहेत. पण पन्नास-बावन वर्षांच्या दीर्घ काळात त्यांच्या ५० कथा प्रसिद्ध झाल्या असतील की नाही, ह्याबद्दल मी साशंक आहे. अशी माहिती माझ्या कानांवर आलेली नाही किंवा वाचनातही नाही.



पहिली कथा.
........................

तुम्ही पहिली कथा स्वतःच ‘आवाज’ला पाठविली की, संस्थापक-संपादक श्री. मधुकर पाटकर ह्यांनी पत्र पाठवून कथा मागितली? पहिलीच कथा प्रसिद्ध झाली की, आधी एखाद-दुसरी नापसंत करण्यात आली? त्यामुळे तेव्हा तुम्ही नाराज झाला होता का?
- माझी पहिली कथा १९७२ साली ‘आवाज’मध्ये प्रसिद्ध झाली. संपादकांनी पत्र पाठवून माझ्याकडून कथा मागवावी; त्यातल्या त्यात  ‘आवाज’चे संपादक पाटकर ह्यांनी कथा मागवावी, इतकं काही त्या काळात माझं नाव झालेलं नव्हतं. त्यांनी तोंडी सांगितल्यावरूनच मी १९७०मध्ये कथा पाठवली होती. ती काही त्यांना पसंत पडली नाही.
मग पुढच्या वर्षी म्हणजे १९७१मध्ये कथा पाठविलीच नाही. पण १९७२ साली तोंडी आमंत्रण मिळाल्यावर मी पाठवलेली ‘अिंटरव्ह्यूच्या लखोट्याचं सोमायण’ ही कथा त्यांनी प्रसिद्ध केली. त्यांनी नापसंत केलेल्या पहिल्या कथेच्या बाबतीत मी नाराज झालो नाही.

तुमची आणि भाऊंची (श्री. मधुकर पाटकर) ओळख आधीची की संपादक-लेखक म्हणून परिचय झाला? तो कसा व कितपत वाढला?
- संपादक पाटकर ह्यांच्याशी माझा अजिबातच परिचय नव्हता. ‘मार्मिक’चे सहायक संपादक आणि ज्यांना मी गुरुस्थानी मानतो, त्या श्री. द. पां. खांबेटे ह्यांच्या निवासस्थानी आमची भेट झाली. पण त्यांनी कथा मागितली नाही. पुढे १९६९ साली ‘हंस’च्या विनोद विशेषांकातील कथा वाचून त्यांना कथा मागावी, असं वाटलं. त्यांचं तोंडी आमंत्रणही मला पुरेसं वाटलं!
आमचा परिचय १९८०नंतर वाढला. मी त्यांच्या निवासस्थानी आणि छोट्याशा छापखान्याच्या जागी मुद्दाम जाऊन भेट घेऊ लागलो. ‘आवाज’च्या सुरुवातीच्या खडतर दिवसांच्या आठवणी, कागद मिळविण्यासाठी त्यांना कराव्या लागलेल्या लटपटी ह्या गप्पा मला आवडायला लागल्या. मी जणू त्यांच्या घरचाच झालो...

कथेची मागणी करणारे संपादकांचे पत्र साधारण केव्हा यायचे? तुम्ही खास ‘आवाज’साठी कथा लिहीत होता की, लिहिलेल्या कथांपैकीच एखादी पाठवत होता?
- ‘दिवाळी अंकासाठी कथा पाठवा’ अशा उत्साहवर्धक मजकुराचे पत्र जून महिन्यात पाठविण्यात येते. कथा पाठविण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट असते. ‘आवाज’व्यतिरिक्त ‘मोहिनी’, ‘जत्रा’, ‘बुवा’ आणि इतर अंकांच्या संपादकांकडून पत्रे येत. विनोदी साहित्याचीच मागणी असे. त्यातल्या त्यात मला बऱ्या वाटणाऱ्या गोष्टींपैकी एक मी ‘मोहिनी’साठी आणि दुसरी ‘आवाज’साठी पाठवत असे. पाठवलेली कथा संपादकांना पसंत पडत असे, हाच अनुभव आहे.

कशा प्रकारची कथा हवी, हे भाऊ पाटकर तुम्हाला सांगत? की तुमचे सूर चांगले जुळल्यामुळे तुम्ही पाठवाल ती कथा ते प्रसिद्ध करीत?
- कथा वाचताना आपल्याला हसू यायला हवं, एवढी एकच अट असे. विषय, मांडणी ह्याबद्दलचं सर्व स्वातंत्र्य लेखकांना देण्यात येई.

ह्या प्रवासातली दोन वर्षं अशी आहेत की ‘आवाज’च्या अंकात तुमचं नाव नव्हतं. काय कारण त्याचं?
- माझी १९७९ सालची कथा पसंत पडून आणि कथाचित्र तयार असूनही प्रकाशित झाली नाही. तशी चौकट अंकात पाहून मला खूप राग आला होता. माझ्या बरोबरच शिरीष कणेकर ह्यांचाही लेख मागे राहिला.

मग ती कथा ‘वाया’ गेली म्हणायचं का..?
- तीच कथा १९८०च्या अंकात समाविष्ट केली. तेव्हा वर्षभराचा राग पुरता निवळला! तुम्ही म्हणता तशी ती ‘वाया’ गेली नाही.

...आणि नंतर एका वर्षीही तुमची कथा नव्हती. त्याबद्दल वाचकांची काही प्रतिक्रिया समजली?
- हो; १९९६च्या अंकात. त्याचं कारण फार दुर्दैवी आहे. त्या वर्षी खुद्द पाटकर, माझे स्नेही हास्य-चित्रकार श्री. वसंत गवाणकर आणि माझे बाबा, ह्यांचं लागोपाठ निधन झालं. त्याचा मला बसलेला धक्का फार मोठा होता. त्यामुळेच लिहू शकलो नव्हतो. त्यामुळे त्या वर्षीचा ‘आवाज’ माझ्या कथेविना प्रसिद्ध झाला. त्या काळात मी चेन्नई येथे होतो. त्यामुळे कुणाचीही काही प्रतिक्रिया असल्यास ती माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही!

‘आवाज’ने ‘लेखक’ म्हणून तुम्हाला काय दिले? ह्या वार्षिकाविना लेखक कापडी अशी कल्पना करता येईल का?
- ‘‘आवाज’चा लेखक’ ह्या शब्दांना लेखक / इतर संपादक महत्त्व देतात, असं मला वाटतं. ‘आवाज’च्या आधी दहा वर्षे मी ‘मार्मिक’, ‘मोहिनी’मधून लक्षवेधी लेखन (माझ्या मते!) केलं. पण ‘विनोदी लेखक’ हे (हवं हवंसं) लेबल ‘आवाज’मध्ये कथा येऊ लागल्यावरच मिळालं. इतर अंकांच्या संपादकांची ‘कथा पाठवा’ अशी मागणी करणारी पत्रे येऊ लागली. मुळात ‘आवाज’व्यतिरिक्तही इतर अंकांमध्ये लेखन केलं / करतो आहे, त्यामुळे ‘आवाजविना लेखक कापडी’ अशी कल्पना करणंच अप्रस्तुत वाटतं.

तुम्हाला ‘आवाज’मध्ये कोणाचं लेखन वाचायला आवडे?
- सुरुवातीच्या काळात जयवंत दळवी, शं. ना. नवरे, बा. भ. पाटील, वि. आ. बुवा ह्यांच्या कथा मी आवर्जून वाचत असे. मला त्या आवडतही. नंतरच्या काळात प्रभाकर भोगले, अशोक पाटोळे, अशोक जैन ह्यांच्या कथा / लेख मला आवडत. मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले ह्यांच्या कथा मी वाचतो. श्रीकांत बोजेवार हे अलीकडचं नाव आहे. ह्या व्यतिरिक्त ‘आवाज’ सोडून ‘मोहिनी’, ‘जत्रा’, ‘बुवा’ ह्या अंकांतील लेखनही मी आवर्जून वाचायचो.

ह्या अर्धशतकामध्ये ‘आवाज’मध्ये काय काय स्थित्यंतरं झाली?
- ‘आवाज’ म्हणजे काहीशा चावट कथा, घडीचित्रांमधून निर्माण झालेला विनोद, हे स्वरूप फारसं बदललं नाही. लेखक / चित्रकार काळानुरूप बदलले; पण त्यांच्या मांडणीत लक्षवेधी फरक जाणवला नाही. विनोद ह्या विषयाला वाहिलेल्या अंकात आजही ‘आवाज’ला पसंती मिळते, हे खरं आहे.
मराठी विनोदी साहित्याचा आढावा घेण्यासाठी अभ्यासकाला ‘आवाज’ आणि ‘मोहिनी’ ह्यांना डावलून चालण्यासारखं नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. हास्यचित्रं ह्या दोन्ही अंकांचा ‘स्ट्राँग पॉइंट’ आहे. पूर्वीच्या मानानं कथाचित्रं अधिक उठावदार वाटतात.
....................................

#दिवाळी_अंक #विनोदी_दिवाळी_अंक #आवाज #लेखक #विजय_कापडी #कथा #कथांचे_अर्धशतक #विनोदी_कथा #मधुकर_पाटकर #खिडकी #खिडकी_चित्रं
....................................

Thursday 9 November 2023

मॅक्सवेलचे मायाजाल, अफगाणी आत्मघात


,,, तर बुधवारी सकाळी कधी तरी व्हॉट्सॲपवरच्या एका गटात आलेला हा संदेश. मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर मंगळवारी (दि. ७ नोव्हेंबर) झालेल्या सामन्याचं एवढ्या कमी शब्दांत नेमकं वर्णन करणाऱ्या ह्या माणसाचं कौतुकच करावं तेवढं थोडंच!

वानखेडे स्टेडियमवरच्या लढतीत - लढत कसली, एकतर्फी सामन्यात दिसत होती सपशेल शरणागती.  पाच वेळा विश्वचषक जिंकणारा संघ लीन-दीन भासत होता. आशिया खंडातला एक नवा संघ नव्या उमेदीसह पुढे येत होता. आधी तीन विश्वविजेत्यांना पराभूत करणारा अफगाणिस्तानचा संघ सलग चौथ्या विजयाकडे आणि चौथ्या विश्वविजेत्यांना हरविण्याच्या दिशेने घोडदौड करत होता. 

समुद्र किनाऱ्यालगतच्या मुंबईत त्या दिवशी, त्या संध्याकाळी वादळ धडकण्याचा कसलाही अंदाज हवामान खात्यानं वर्तविलेला नव्हता. त्यामुळे त्याचं नामकरण करण्याचाही प्रश्न नव्हता. बाकी मुंबई सोडून फक्त वानखेडे स्टेडियमवर वादळ येणार, असंही काही कोणाला वाटलं नसावं.

शक्यता चिरडल्या, स्वप्नं चुरडली
‘वादळापूर्वीची शांतता’ असं आपण वाचतो, ऐकतो ते हेच असणार. कोणाला काही न सांगता, काही चिन्हं न दिसता सामन्याच्या शेवटच्या पावणेदोनशे चेंडूंमध्ये झंझावात आला. त्यानं अनेक शक्यता चिरडल्या, नाना स्वप्नं चुरडली. त्या कल्पनातीत वादळाचं, चक्रावर्ताचं नाव - ग्लेन मॅक्सवेल.

सामन्यातील साधारण ७० षट्कं अफगाणिस्तानचा खेळ उजवा झालेला. त्यातही पूर्वार्धातली शेवटची दहा आणि उत्तरार्धातील पहिली २० षट्कं त्यांचं एकहाती वर्चस्व दाखविणारी. विश्वचषकात आता सवयीचा झालेला आणखी एक धक्का हा संघ देणार, हे जवळपास नक्की झालेलं. परिणामी उपान्त्य फेरीच्या जागेवर लक्ष ठेवून असलेल्या दोन संघांची धडधड वाढलेली.


विजयी वीर. त्यानं एकहाती सामना जिंकून दिला.
(सौजन्य : क्रिकेट ऑस्ट्रेलिया)
.......................................
हे चित्र बदलण्यास कारणीभूत ठरले १२ चेंडू. विसावं षट्क संपलं तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था होती ७ बाद ९८. ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार पॅट कमिन्स हीच भरवशाची जोडी उरलेली. त्यांच्यावर तरी भरवसा किती ठेवायचा? बादही व्हायचं नाही आणि दोनशेच्या आसपास धावाही काढायच्या? टिकून राहणं, पळत राहणं, धावा जोडणं... सगळंच साधायचं होतं.

आधीच्या दोन षट्कांमध्ये मार्कस स्टॉयनिस व मिचेल स्टार्क ह्यांचे बळी मिळाल्यामुळे राशिद खान भरात आलेला. त्यांचे चेंडू चांगले वळत होते. डावातलं एकविसावं आणि स्वतःचं चौथं षट्क राशिद टाकत होता. पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलनं स्वीप मारायचा प्रयत्न केला. बॅटच्या वर कुठे तरी लागून चेंडू मि़ड-ऑफ भागात उंच उडाला.

नशीब खूश - तीन वेळा
राशिद मागे धावला आणि थांबला. त्यानं कर्णधार हशमतुल्ला शाहिदी ह्याला धावताना पाहिलं. तो धावला खरा; पण उशीरच झाला. मॅक्सवेलचा झेल काही त्याला पकडता आला नाही. मॅक्सवेलवर नशीब खूश होतं. पहिली वेळ.

पुढचं षट्क डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमदचं. त्याचा दुसरा चेंडू मॅक्सवेल सहज खेळायला गेला आणि तो निघाला गुगली. झपकन त्याच्या पॅडवर आदळला. पंचांनी अपील उचलून धरलं.

उगीच शंका नको म्हणून मॅक्सवेलनं ‘रीव्ह्यू’ घेतला. त्यालाच फारसा विश्वास नसावा. पॅव्हिलियनची वाट त्यानं पकडली होती.

आश्चर्य! चेंडूची उसळी थोडी जास्तच होती. मॅक्सवेल बचावला. नशीब पुन्हा खूश. दुसऱ्या वेळी.


मुजीब उर रहमानच्या हातून झेल सुटला?
छे:, सामना निसटला!!
...................................
त्याच षट्कातला पाचवा चेंडू होता टॉप स्पिनर. आधीच्या अनुभवातून मॅक्सवेल शहाणा झाला नव्हता काय? एवढा काय तो जिवावर उदार झाला होता? त्यानं पुन्हा एकवार स्वीप मारण्याचा प्रयत्न केला.

असा बेदरकार फटका झेलण्यासाठी शॉर्ट फाईन लेगला सापळा लावलेला होताच. 
अजिबात नियंत्रण नसलेला मॅक्सवेलचा फटका. तिथं उभ्या असलेल्या मुजीब उर रहमानच्या हातात गेलेला. चेंडूभोवती हात फक्त घट्ट पकडण्याचंच काम होतं. तेही त्यानं केलं नाही. तिसरी सोनेरी संधी अफगाणिस्तानने सोडली. सामना बहुदा तिथंच त्यांच्या हातून निसटला.

नशीब तिसऱ्या वेळी मॅक्सवेलवर खूश. ती नियती किंवा कोण असते, ती अफगाणिस्तानच्या दुर्दैवाला खदखदून हसत म्हणाली असेल, ‘जा बाळ मॅक्सवेल. खेळ मनसोक्त. इथून पुढचा डाव तुझा असेल. केवळ तुझाच असेल रे!’

अफगाणिस्तान संघानं आत्मघात करून घ्यायचंच ठरवलं होतं. त्याला मॅक्सवेल किंवा त्याला खंबीर साथ देणारा कमिन्स तरी काय करणार? त्यांंनी जिंकण्याची संधी देऊ केली होती.

रहमानच्या हातून लोण्याचा गोळा निसटला, तेव्हा मॅक्सवेल ३४ धावांवर (३९ चेंडू) होता. ऑस्ट्रेलियाच्या धावा होत्या ११२. त्यानंतर सामन्यात १५० चेंडूंचा खेळ झाला. त्यात १८१ धावा निघाल्या. मॅक्सवेल त्यातले ८९ चेंडू खेळला आणि त्याने धावा केल्या १६७.

काय चूक केली, हे मुजीब उर रहमानला सामन्याच्या शेवटच्या षट्कात मॅक्सवेलनं दाखवून दिलं. दुसरा चेंडू ऑफ यष्टीच्या बाहेर. मिडविकेटवरून षट्कार. मग पुन्हा तसाच, पण थोडा अधिक वेगाचा चेंडू. परिणाम लाँग-ऑनवर षट्कार. नंतरच्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. षट्कातला पाचवा आणि इतिहासात स्थान मिळविणारा सामन्यातला शेवटचा चेंडू मधल्या यष्टीवर आणि डीप मिडविकेटवर उत्तुंग षट्कार!

विश्वचषकातच्या इतिहासातलं कोणत्याही फलंदाजाचं हे पहिलंच द्विशतक. आणि तेही अशा कठीण परिस्थितीत. ह्या अप्रतिम खेळीत मॅक्सवेलनं अनेक विक्रमांची मोडतोड केली.

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे
मागच्या आठवड्यात गोल्फ कार्टवरून पाठीवर पडून डोक्याला इजा झालेला मॅक्सवेल पार दमला होता. त्याचे पाय धावायला तयार नव्हते. त्याच वेळी हात थांबायला तयार नव्हते. ना. वा. टिळकांच्या कवितेतील ‘क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे’ ओळीची आठवण करून देत मॅक्सवेल खेळत होता. धावण्याला आलेली मर्यादा त्यानं उत्तुंग फटके मारून भरून काढली.


उत्तुंग! मॅक्सवेलचा फटका आणि त्याची नाबाद द्विशतकी खेळीही.
(सौजन्य : एक्स संकेतस्थळ)
.................................

आतड्यापर्यंत गेलेला घास. फक्त पचवणं बाकी. पण जबड्यात हात घालून तोच घास एकहाती बाहेर काढण्याची किमया मिस्टर मॅक्सवेल ह्यांनी केली!

मॅक्सवेलच्या १५२, म्हणजे ७५ टक्के धावा कव्हर ते मिडविकेट ह्या पट्ट्यात आहेत. दहापैकी नऊ षट्कार लाँग-ऑन ते मिडविकेट ह्या पट्ट्यात आहेत. एकच षट्कार आणि तीन चौकार थर्ड मॅनला आहेत. लेगला चारच चौकार आहेत. यष्ट्यांच्या मागे त्याला मिळालेल्या धावा आहेत ४९. त्यात जवळपास अर्धा डझन चौकार.


मॅक्सवेलच्या विक्रमी डावातील फटक्यांचा नकाशा.
(सौजन्य : क्रिकेट ऑस्ट्रेलिया)
.................................
पॉइंट ते यष्टिरक्षक ह्या कोपऱ्यात मॅक्सवेलच्या २६ धावा आहेत. ह्या धावा भाषेत म्हणजे नगरी भाषेत ‘कत्त्या’ लागून मिळालेला बोनस. मॅक्सवेल हुकुमी खेळला. त्याला हव्या त्या ठिकाणी त्यानं चेंडू धाडला. चेंडू त्याची आज्ञा विनातक्रार पाळत होता. असे डाव कधी तरीच पाहायला मिळतात.

ग्लेन मॅक्सवेल आपल्या संघात असणं म्हणजे देवानं दिलेली किती अमूल्य देणगी आहे, हे संघनायक पॅट कमिन्सला त्या दिवशी कितव्यांदा तरी कळलं असेल. त्याचा अफलातून खेळ 
२२ यार्डांवरून पाहण्याची संधी कमिन्सला मिळाली!

कमिन्स त्या बद्दल स्वतःला भाग्यवान मानत असेल का? त्याचे एकाहून एक सरस फटक पाहताना त्याने आ वासला असेल ना? खणखणीत हुकमी षट्कार आणि नेत्रदीपक ड्राइव्ह साठवण्यासाठी त्याने डोळे किती मोठे केले असतील?

कमिन्सची साथ मोलाचीच
ह्याच मॅक्सवेलला मोलाची साथ दिली कर्णधारानं. ह्या साऱ्या दोन तासांच्या नाट्यात न डगमगता ठामपणे मैदानावर उभा राहिला तो. त्यानं धावा डझनभरच काढल्या; पण तब्बल ६८ चेंडू कोणत्याही मोहाला बळी न पडता खेळून काढले. त्याच्या पहिल्या पाच धावा सात चेंडूंमध्ये होत्या. म्हणजे नंतर त्यानं किती संयम दाखवला असेल, ह्याची कल्पना येते.

नवीन उल हक आणि राशिद खान ह्यांनी प्रारंभी केलेल्या मेहनतीवर मॅक्सवेल-कमिन्स जोडीनं पाणी पाडलं. बदाबदा. त्यात विजयाचं स्वप्न कुठल्या कुठे वाहून गेलं.

काही प्रश्न विचारावेत का?
मॅक्सवेलच्या खेळीचं महत्त्व तसूभरही कमी न करता काही प्रश्न विचारता येतील. ह्या सामन्याच्या दुसऱ्या डावात कर्णधाराचीच भूमिका बजावणारा महंमद नबी एवढ्या उशिरा गोलंदाजीला का आला? कांगारूंना जिंकण्यासाठी १०६ धावा हव्या असताना आणि मॅक्सवेलचं शतक झाल्यावर चौतिसाव्या षट्कात तो गोलंदाजीला आला.

सव्वाचार धावांची इकॉनॉमी असलेला नबी पहिल्या षट्कापासूनच धावा दाबून ठेवायच्या अशाच मनोवृत्तीनं गोलंदाजी का करीत होता, हेही न उलगडलेलं कोडं.

राशिदनं सात षट्कं टाकल्यानंतर मधली दहा षट्कं त्याला बंद का केलं? विशेषतः त्याला सूर सापडलेला असताना... नंतरही त्याला दोन षट्कांचा हप्ता देऊन शेवटचं षट्क राखून ठेवण्यानं काय साधलं?

विश्वचषकात अफगाणिस्तानकडून पहिलं शतक काढलं
सलामीवीर इब्राहीम जदरान ह्यानं. त्याची ही खेळी
सुंदरच होती.
(सौजन्य : एक्स संकेतस्थळ)
.................................

नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी करण्याचा निर्णय अफगाणिस्तानचा सलामीवर इब्राहीम जदरान ह्यानं सार्थ ठरवलं. देशातर्फे विश्वचषकातील पहिलं शतक (१२९ नाबाद १४३ चेंडू, ८ चौकार व ३ षट्कार) त्यानं झळकावलं.

इब्राहीमनं सहाव्या जोडीसाठी राशिद खानबरोबर २७ चेंडूंमध्येच ५८ धावांची भागीदारी केली. राशिदनं तीन षट्कार व दोन चौकारांसह १८ चेंडूंमध्ये तडाखेबंद ३५ धावा केल्या. हे दोघे, अजमत उमरजाई व महंमद नबी ह्यांच्यामुळेच अफगाणिस्तानने शेवटच्या १० षट्कांमध्ये ९६ धावा केल्या.

पहिल्या पन्नास षट्कांतला हा विक्रम, पराक्रम शेवटच्या वीस-पंचवीस षट्कांमध्ये पुसून टाकण्यात आला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी स्टार्क, हेजलवूड, कमिन्स, झम्पा ह्या गोलंदाजांना तोंड देऊन ऑस्ट्रेलियापुढे मोठं लक्ष्य ठेवलं होतं. तीनशेच्या उंबरठ्याला जवळ असलेलं. दुर्दैवानं त्यांचं महत्त्व धावपुस्तिकेतील आकड्यांपुरतं उरलं.

दिवस मॅक्सवेलचा होता.
डाव मॅक्सवेलचा होता.
हा दिवस आणि हा डाव अद्भुतरम्य चमत्कारांचा होता.
हे चमत्कार घडविणारा एकमेवाद्वितीय ग्लेन मॅक्सवेल होता!
....................

(दैनिक नगर टाइम्समधील सदरात बुधवारी प्रसिद्ध झालेला लेख विस्ताराने.)
....................

#विश्वचषक23 #ग्लेन_मॅक्सवेल #पॅट_कमिन्स #ऑस्ट्रेलिया #अफगाणिस्तान #द्विशतक #वादळ
#ऑस्ट्रेलिया_अफगाणिस्तान #इब्राहीम_जदरान #राशिद_खान 

#cricket #CWC23 #Glenn_Maxwell #Pat_Cummins #Australia #Afghanistan #double_century #AustraliavsAfghanistan #Maxwell_mirracle #Ibrahim_Zadran #Rashid_khan

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...