Monday 11 July 2016

... पाऊस कोसळू लागतो जेव्हा

घाई पोस्ट करण्या पटापट
फेसबुकावरी सुरू झटापट
ट्विटरवरीही चिवचिवाट
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

झारा घेऊनि कळ्या पाडिती
लाडू गोड शब्दांचे वळिती
कविता कविता तयां म्हणती
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

चिंब चिंब साऱ्या ‘भिंती’
अवघे एकमेकां ‘लाईकती’
आणिक ‘कमेंटा’ही बरसती
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

खमंग बटाटवडा नि चिवडा पाहा
कुर्रुमकुर्रुम कांदा भजी अहाहा!
कपात वाफाळता आल्याचा चहा
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

गाऊही लागते ‘आकाशवाणी’
मनात दडलेली पाऊसगाणी
फिरुनी जाग्या जुन्या आठवणी
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

वर्षासहलींचे आखले जातात बेत
आंबोली, भुशी डॅम, भंडारदरा थेट
जिवाच्या जिवलगांची तिथेच भेट
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

डबकी रस्त्यात साचतात
लेकरे खट्याळ नाचतात
कागदी नावा तिथेच बुडतात
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

कोठे कोठे कोसळती झाडे
खचून जाई भिंत, पत्राही उडे
गोरगरिबांचे तेव्हा संसार उघडे
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

थकले पाय, कोंडून गेला दम
घोटभर पाण्यासाठी किती श्रम
मिळेल त्यांना थोडासा आराम
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

ओढे खळाळती, नद्याही वाहती
नवे नवे पाणी धरणाचिया पोटी
हसू हळू फुटे कुणब्याच्या ओठी
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

नका थांबू, करू आता जुपणी
जल्दी करा, सुरू भाताची आवणी
चाड्यावरी मूठ, खरिपाची पेरणी
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

आधी उगवे, उदंड पिके
शेत-शिवाराचे पांग फिटे
डोळ्यांमध्ये स्वप्न मोठे
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

अवकाळ हटला, चेहरे हसरे
हिर्वीहिर्वीगार गावची शिवारे
जगण्याच्या आशेला नवे धुमारे

...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।
...पाऊस कोसळू लागतो तेव्हा।।


(पूर्वप्रसिद्धी : दैनिक सकाळ, ५ जुलै २०१६)

Friday 1 July 2016

पेपरवाला पोरगा? …वृत्तपत्र विक्रेता!

मी गेल्या 20 वर्षांमध्ये राहण्याच्या तीन जागा बदलल्या. या काळात दोन महत्त्वाच्या गोष्टी मात्र कायम राहिल्या. एक म्हणजे घरी पेपर (दैनिक वृत्तपत्र) टाकणारा विक्रेता. आणि दुसरा केशकर्तनकार. हा पेपरवाला स्वतः बऱ्याच वर्षांपासून माझ्याकडे अंक टाकत नाही. त्याचा मदतनीस हे काम करतो. तो स्वतः उपनगरामधला (अधिक मोठा) व्याप सांभाळतो.

आपण पेपरवाला असं सरसकट म्हणतो खरं; पण त्याचा तसा उल्लेख करायला गेल्या काही वर्षांपासून माझी तरी जीभ रेटत नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. एवढ्या वर्षांच्या संबंधांनंतर आमच्यामध्ये स्वाभाविकच आपुलकी निर्माण झाली आहे. पुन्हा मी वृत्तपत्र व्यवसायातच काम करतो. अस्मादिक एक चांगला पत्रकार असल्याचा त्याचा (गैर)समज आहे. ते प्रत्येक भेटीत बोलून दाखविल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. (आपुलकी, समान व्यवसाय आणि माझ्याबद्दलचा समज, अशा त्रिसूत्रीमुळेच तो माझ्याकडून टाकणावळ घेत नाही.) कोणत्या नव्या दैनिकांच्या काही योजना (स्कीम) आल्या, तर परवानगी वगैरे न विचारता, परस्पर पैसे भरून माझं नाव नोंदवून टाकतो. म्हटलं तर आम्ही गल्लीवालेच आहोत. तो अचानक कधी तरी येतो, तेव्हा तासभर गप्पा मारत बसतो.

हे सारं जे सांगतो आहे, ते गिरीश दिगंबर काळे याच्याबद्दल. खरं तर अरे-तुरे करण्याच्या वयाचा राहिला नाही तो आता. चाळिशीच्या पुढे गेला आहे. पण इतक्या वर्षांची सवय जात नाही. आता महत्त्वाचा मुद्दा. पेपरवाला असं म्हणण्याता एका स्वाभाविक तुच्छता, क्षुद्रत्वाचा उल्लेख जाणवतो. गिरीशला आणि त्याच्या वागण्या-बोलण्याला पाहून तसं मुळीच म्हणावं वाटत नाही. तसं बोलल्यानं त्याचा अवमान होतो, याची जाणीव मला आहे.

...तर गेल्या शनिवारी ( 25 जूनला) संध्याकाळी कार्यालयात असतानाच गिरीशचा फोन आला. त्याचं एक महत्त्वाचं काम होतं. ते माझ्याकडूनच होईल, असा त्याला विश्वास होता. काम काय आहे, हे त्यानं लगेच सांगितलं. मला बायोडाटा लिहून पाहिजे. तुम्हाला कधी वेळ आहे?’, असं त्यानं फोनवरूनच विचारलं. (मलाही तो कधी अरे-तुरे, तर कधी अहो-जाहो असं बोलतो.) ते उशिरात उशिरा कधीपर्यंत मिळालं तर चालेल, हेही त्यानं सांगितलं. त्यानुसार रविवारी सकाळी भेटण्याचं ठरलं आमचं.  गिरीशला या वयात बायोडाटा कशासाठी हवा, हे न कळून मी बुचकळ्यातच पडलो. पण त्यानंच त्याचं उत्तर दिलं. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरनं त्याची रोटरी व्होकेशनल अॅवॉर्डसाठी निवड केली होती. संयोजकांना त्याचा परिचय हवा होता. तो लिहायचा कसा आणि कोणत्या भाषेत याचा ताण त्याच्या मनावर होता. याचं नेमकं उत्तर माझ्याकडे सापडेल, अशी त्याची खात्री होती आणि ती त्यानं बायकोला बोलूनही दाखविली होती.

ठरल्याप्रमाणं दुसऱ्या दिवशी सकाळी गिरीश आला. माझ्याकडे कोणी आलेलं आहे, हे पाहून त्यानं नंतर यायचा वायदा केला. पुन्हा फोन करून संध्याकाळी येण्याचं कबूल केलं. तो आलाच नाही संध्याकाळी. वाट पाहून फोन केला आणि पाचच मिनिटांत तो घरी पोहोचला. काहीसा उत्तेजित होता तो. स्वाभाविकच होतं ते. सचोटीनं केलेल्या सामाजिक/व्यावसायिक कामाबद्दल त्याची या पुरस्कारासाठी रोटरी क्लबनं निवड केली होती. त्या कार्यक्रमात परिचय करून देण्यासाठी क्लबनं माहिती मागितली होती. तीच त्याला लिहून हवी होती. या पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली, कुणी नाव सुचविलं याची काही म्हणता काही माहिती त्याला नव्हती. पुरस्कारासाठी फिल्डिंग लावणाऱ्या अव्वल क्षेत्ररक्षकांच्या जगाबाबत तो पूर्ण अज्ञानी होता!

प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते गिरीशनं रोटरी क्लबचा पुरस्कार स्वीकारला. (छायाचित्र सौजन्य :  दत्ता इंगळे)


गिरीशला वाटत होतं की, मी ते कागदावर लिहून द्यावं. मी संगणक सुरू केला आणि त्याला म्हटलं, बोल आता. स्वतःविषयी सांगायचं म्हटल्यावर भल्याभल्यांना किती सांगू नि किती नको, असं होऊन जातं. गिरीशचं तसं मुळीच झालं नाही. त्यानं दोन-तीन मिनिटांतच काय ते सांगून टाकलं. कितव्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली, कुणाकुणाबरोबर काम केलं, कुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची एवढंच त्यानं सांगितलं. फापटपसारा नाही, अवाच्या सवा वाढवून सांगणं नाही. आपल्या कामाचं अवडंबर नाही की, उगीचच उदात्तीकरण नाही. नेमकं आणि सुस्पष्ट.

संगणकावर काम सुरू केलं. सात-आठ मिनिटांमध्ये साडेतीनशे शब्दांचा मजकूर तयार झाला. साधा, सरळ, सोपा. त्याला हवा तसा. तो टंकित करण्याचं काम सुरू असताना गिरीशनं एकदाच अडवलं. मी त्याचा उल्लेख वृत्तपत्र वितरक केला होता. तो म्हणाला, वृत्तपत्र विक्रेता लिहा. आपण एजंट नाहीत. त्यानं केलेल्या या दुरुस्तीनं मला तो पुन्हा एकदा आवडून गेला. जे आहे ते लिहू आणि तेच सांगू, असा त्याचा बाणा.

गिरीशच्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार. तोही न मागता, इच्छा व्यक्त न करता मिळालेला. तो कशामुळं मिळाला, रोटरी क्लबसारख्या मोठ्या संस्थेला आपलं नाव कुणी सुचविलं, याचं त्याला खरोखर औत्सुक्य होतं. त्याला कदाचित माहीत असेल-नसेल; त्यानं अलीकडच्या काळात एक मोठं काम केलं. एका वयोवृद्ध, एकाकी आणि आजारानं त्रासलेल्या प्राध्यापकाची त्यानं गेल्या 10 वर्षांत स्वतःच्या वडिलांसारखी काळजी घेतली. निधनानंतर त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. या काळात त्यांच्या घरची एक काडी इकडची तिकडं झाली नाही. त्यांचे वारस परदेशातून आले तेव्हा गिरीशनं त्यांना काय झालं, कसं झालं याची सगळी माहिती आणि सगळ्या वस्तूंसह त्यांच्या बंगल्याचा ताबा दिला. हे सगळं पाहून, अनुभवून तेही चकित झाले. हे सगळं गिरीशनंच मला सांगितलं. आणखी बऱ्याच गोष्टी त्यानं सांगितल्या; त्या इथं देण्याचा मोह टाळलेला बरा. आपलं एवढं कौतुक झालेलं त्याला कदाचित आवडणार नाही.

वयाच्या तेराव्या वर्षी गिरीशनं एका विक्रेत्याकडं कामाला सुरुवात केली. महिना 40 रुपये पगारावर. तिथनं पुढं तो या व्यवसायातली एक-एक खुबी शिकत गेला आणि पंचविशीतच त्याला सूर गवसला. त्यानं कधीच मागं वळून पाहिलं नाही. तो अतिशय अभिमानानं सांगत होता, एवढ्या वर्षांत एकही खाडा नाही, सतीशराव. उन-वारा-पाऊस काही असलं, तरी रोजच्या रोज घरी पेपर पोहोच म्हणजे पोहोच!”

गिरीशनं गेल्या 20-22 वर्षांमध्ये स्वतःला फार बदलवलंय. त्यानं पुढच्या 10 वर्षांचं आर्थिक नियोजन केलं आहे. एसआयपी, पीपीएफ आणि म्युच्युअल फंड हे त्याचे गुंतवणुकीचे, बचतीचे आवडते पर्याय. गेल्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक भेटीत मला तो विचारतो, एसआयपी चालू केली की नाही एखादी?’ त्याचं स्वतःचं असं आवडतं दैनिक आहे. (तिथे मी दीर्घ काळ काम केलंय.) वृत्तपत्राच्या व्यवसायाबद्दल एवढ्या वर्षांनंतर त्याची काही मतं बनली आहेत. ती तो मोकळेपणानं सांगतो. माणसं तो पटकन ओळखतो. त्याला वाचायला आवडतं. त्यामुळं भेटल्यावर प्रत्येक वेळी तो `सध्या काय वाचताय?` आणि `नवीन वाचण्यासारखं काय आहे?` हे दोन प्रश्न आवर्जून विचारतो. (आता मला कटाक्षानं जाणवलं. माझं आलेलं पहिलं पुस्तक त्याला द्यायलाच पाहिजे!)

पूर्वी एका मुद्द्यावरून गिरीशबरोबर नेहमी वाद होई. महिन्याचं बिल! तो कधी तरी, आठवण करवून दिल्यावर, आठ-दहा महिन्यांनंतर उगवतो आणि पैसे घेऊन जातो. ठरावीक मासिक उत्पन्न असलेल्या माझ्यासारख्याला चार-पाच दैनिकांचे आठ-दहा-बारा महिन्यांचे पैसे एकदम द्यायला थोडं जडच वाटतं. त्यामुळे मी मागे त्याला म्हणालोही, ‘बाबा रे, तू आपला दोन-तीन महिन्यांनंतर पैसे नेत जा बरं. त्यावर त्याचं उत्तर होतं, ‘जाऊ द्या राव. तुमचे पैसे कुठं जातात, सतीशराव? मला एकखट्टी पैसे मिळाले, तर उपयोग होतो.एकदा तर त्यानं तब्बल सव्वा वर्षाचे पैसे नेले. मी आता त्याच्यापुढं या मुद्द्यावर शरणागती पत्करली आहे. चार-सहा महिन्यानंतर रस्त्यात भेटला की, त्याला आठवण करून देतो.

असेच पैसे नेण्यासाठी तो पाच-सात महिन्यांपूर्वी आला होता. या वेळी फार नाही, सात महिन्यांचेच पैसे होते. बोलता बोलता अनेक विषय निघाले. तो म्हणाला, “माझा एका गोष्टीवर फार विश्वास बसला. या धंद्यात भरपूर कष्ट आहेत. पण त्याला पर्याय नाही. प्रामाणिकपणा आणि हार्ड वर्कएवढं पाळलं की, फार फायदा होतो. रात्री पडलं की, मला पटकन झोप लागते.पहाटे चार ते दुपारी बारा, ही त्याची कामाची वेळ. संध्याकाळी पैसे वसूल करतो. तर ऐन तारुण्यात, 20-22 वर्षांपूर्वी तो तसा नव्हता. हातात पैसा खुळखुळत होता. वय अगदीच पंचविशीच्या अल्याड-पल्याड होतं. वय, भरपूर पैसे याचा परिणाम त्याच्यावर होऊ पाहात होता. कसं कुणास ठाऊक; त्यानं स्वतःला सावरलं. धंदा एके धंदाकरायचं ठरवलं. उपनगरातले उच्चभ्रू ग्राहक त्यानं मिळविले. (त्यात एक फायदा असा की, सहसा कुणी पैसे बुडवत नाही. मला एक पुढारी माहिती आहेत. त्यांच्याकडे अंक टाकणारा मुलगा दर सहा-सात महिन्यांनी बदलायचा. कारण ते रोज पाच-सहा अंक घ्यायचे आणि पैसे द्यायची वेळ आली की, टाळाटाळ करायचे.)

पैसे कमावण्याचा आणखी एक प्रामाणिक मार्ग गिरीशला गेल्या पाच-सहा वर्षांत सापडलाय. कोणत्याही दैनिकाचा रोजचा अंक उघडला की, त्यातून किमान एक, कधी कधी दोन-तीन `पॅम्फ्लेट` पडतात. तर ते अंकात टाकण्याची जबाबदारी गिरीश घेतो. याच विषयावर बोलताना त्यानं एका मित्राचं नाव घेतलं. हा आमचा मित्र थोडं-फार सामाजिक काम करतो. फार सरळ आणि सज्जन माणूस आहे तो,’ असं प्रमाणपत्र गिरीशनं त्याला देऊन टाकलं. तर त्या सज्जन माणसाला आपल्या व्यवसायाविषयी काही पॅम्फ्लेटया माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायची होती. त्यानं ते काम सांगितलं नि पैशाबाबत विचारलं. तुमच्यासारख्या माणसाकडून कसले पैसे घ्यायचे राव?’, असा प्रतिप्रश्न करीत गिरीनं त्याचं काम मोफत केलं. याचंही एक कारण आहे, आमच्या या मित्रानं 50 वर्षांपूर्वी दुकानासाठी भाड्यानं घेतलेली जागा मालकाला ठरल्या मुदतीला स्वतःहून परत केली. त्याबद्दल एका नया पैशाची अपेक्षा न ठेवता. भर बाजारपेठेतील ही जागा सोडण्याच्या मोबदल्यात त्याला काही लाख रुपये तर सहज कमावताआले असते. त्यानं तसं काहीच केलं नाही, याचं गिरीशला विलक्षण कौतुक वाटतं; त्यामुळं त्याच्याबद्दल आदरही वाटतो.

मग एका समव्यावसायिकाचा किस्सा गिरीशनं सांगितला. हा माणूस अडचणीत असलेला; घरच्या काळज्यांनी त्रस्त. पण महिनाभरापूर्वी त्याला सकाळच्या वेळी बसस्थानकावर एक तिशी-बत्तीशीचा तरुण अत्यंत अल्प कपड्यात दिसला. तेव्हा थंडी भयानक होती. तर थंडीत कुडकुडणाऱ्या त्या तरुणाला पाहून त्यानं अंगातलं नवं कोरं जर्कीन त्याला देऊन टाकलं. वर नाश्ता करायला, चहा प्यायला पैसेही दिले. त्याच्याबद्दल सांगताना गिरीशच्या बोलण्यातला अभिमान आणि कौतुक लपत नव्हतं.

चांगल्याला चांगलंच म्हणण्याचा गिरीशचा हा गुण त्या भेटीत माझ्या (पुन्हा एकदा) लक्षात आला. निघता निघता तो पुन्हा म्हणाला, “चांगलं चाललंय आपलं. पैसे मिळतात मनासारखे. पण कष्ट भरपूर घ्यावे लागतात. मी इथपर्यंत आलो ते असंच - प्रामाणिकपणा आणि `हार्ड वर्क`. त्याला तर काही पर्याय नाही ना!
....

(नगरचा वृत्तपत्र विक्रेता गिरीश काळे याला सचोटीनं केलेल्या व्यवसायाबद्दल रोटरी क्लबचा पुरस्कार मिळाला. नाव बदलून त्याच्याबद्दल दीड वर्षापूर्वी एक छोटं टिपण लिहिलं होतं. ते फेसबुकवर टाकलं आणि काही मित्रांना इ-मेलनं पाठविलं होतं. या पुरस्कारामुळं त्याच्याबद्दल लिहावं वाटलं. म्हणून त्या मजकुरात थोडी भर घालून गिरीशचं खरं नाव टाकून लिहिलेला हा लेख.)

जिssवलगाsss


दाटून येतात ढग काळे।
पांगून, आभाळ मोकळे।
बरसतील कधी या धारा।
अंदाज कुणी सांगील जरा?




आठवडा तरी उलटून गेला आता. पुन्हा पाऊस नाही. आधी तो आलापण हजेरी लावण्यापुरता. गेल्या आठवड्यात कार्यालयात असताना दुपारी पुन्हा गच्च भरलं आभाळ. छायाचित्रकाराला म्हटलं, ‘मार दोन-तीन कोनातून. संध्याकाळी पान लावेपर्यंत येईलच पाऊस. नाही आला तर हाच वापरू.’  त्याला घेऊन कार्यालयाच्या गच्चीवर गेलो. दोन-चार वेगवेगळ्या कोनातून टिपलं ढगांना. तेच हे…आशा लावून निराश करणारे!




Thursday 2 June 2016

नको आता आढेवेढे, ताई तुम्ही याच गडे!

(सौजन्य - 'इंडिया टुडे' / creativegaga.artstation.com)
---------------------------------------------

आदरणीय, प्रातःस्मरणीय आणि नित्य आमंत्रणीय 
प्रियांका नेहरू-गांधी-वद्रा, अर्थात ताईंच्या सेवेशी, 

काँग्रेसचा चार आण्यांचाच सभासद असलेल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचा साष्टांग दंडवत! (आता देशाच्या राजकारणात काँग्रेसचा वाटा चार आण्यांचाच राहिलेला नाही, हे वेगळं!) बरं वाटतं म्हणून दंडवत लिहिलं. प्रसंग आलाय बाका, काय करील दिग्विजयकाका! लोटांगण घातलं तरी कमीच, अशी स्थिती सांप्रत काळी ओढवलीय. म्हणजे आपणच ओढवून घेतलीय.

खरं तर तुम्हाला दीदीच म्हणणार होतो. पण मग तुम्हाला आम्ही मां, माटी, मानुषवाले वाटायचो. वंगभंगऐवजी भ्रुकुटीभंग व्हायचा! अम्माम्हणावंही वाटलं मनात. लगेच लक्षात आलं की, तो (अखिल भारतीय अण्णा) द्राविडी प्राणायम होईल. आणि सलमान खुर्शीदसाहेबांना म्याडम म्हणजे राष्ट्रमाताअसं जाहीर करून टाकलंय ना! तो सोनियाचा दिनुजंता अजून विसरलेली नाही. (म्हणून तर हे दिवस आले नशिबी.)

पत्रास कारण... एक काय लय आहेत. (आपल्या पार्टीला लयच सापडत नाही, हे त्यातलं महत्त्वाचं.) कम्युनिस्ट रशियन अस्वलाच्या अंगावरच्या केसाएवढी! अगदी आजचीच कमीत कमी पाच. आसामपासून केरळपर्यंत. मधल्या पुद्दुचेरीला वळसा घालून.

फटाक्यांचा दणकाय, धुराचा खकाणाय. मूँह मीठा’ करण्यासाठी खोकी भरभरून लाडू आणताहेत मंडळी. (नंतर थेट खोकीच दिली जातात.) हार-गुच्छ दिले जाताहेत. गुलाल उधळला जातोय. टीव्ही.च्या पडद्यावर हे सगळं लाइव्हबघताना मेल्याहून मेल्यासारखं झालंय, ताई.

यातलं काहीच आमच्या नशिबात नाही. यून यून येनार कोन, कांग्रेसशिवाय हायेच कोन!असं ओरडत फटाक्याच्या धुरात नाचता येत नाही. तो अश्रुधूर वाटतोय. अख्खा लाडू सोडाच; बुंदीची कळी पण नाही वाट्याला. हाराचं जाऊ द्या, फूलही नको; त्याची पाकळी? ती पण सध्या येत नाही वाट्याला. गुलाल विसरलो, कपाळी बुक्का आलाय!

11, अशोक रोडवर लखलखाट. आणि ‘24, अकबर रोडवर शुकशुकाट. पूर्ण अंधार. तिकडं दिवाळी आणि इकडं होळी? ‘ऐ दुनिया बता हमने बिगाड़ा है क्या तेरा, घर-घर में दिवाली है, मेरे घर में अंधेरा...

...ही सगळी परिस्थिती बदललीच पाहिजे, ताई. आज-आत्ता-ताबडतोब!

डिग्गीराजा काल हैदराबादी बिर्याणी खाऊन काय बोलले वाचलं ना तुम्ही आज पेपरात? तुम्हाला सक्रिय राजकारणात यायचं आवतण दिलंय त्यांनी. आमच्यासारख्या लाखोंच्या पोटातलं आणलं त्यांनी ओठांवर.

पीकेनी तर तुम्हाला मागंच सल्ला दिलाय. पी. के. कोण? अहो, प्रशांतकुमार. दोन वर्षांपूर्वी 36 इंची छाती 56 इंचांपर्यंत फुगविण्यात त्यांचाच हवेचा वाटा होता. राहुलभय्यांनी दोन राज्यांची जबाबदारी त्यांच्यावरच टाकलीय. मैं तो आया हूँ यूपी, पंजाब लुटने...असं गाणंय त्यांचं. त्यांनी सांगितलंय, अमेठी-रायबरेली सोडा आणि देशभर फिरा. प्रचार करा.

ताई, तुम्ही अगदी अम्मांसारख्या दिसता. अम्माम्हणजे ओरिजनल. इंदिरा नेहरू-गांधी. त्यांच्यासारखंच तुमचं धारदार नाक. बॉबकट केलेल्या केसांच्या बटा तशाच. थोड्या त्या आँधीमधल्या सुचित्रा सेनसारख्या पांढऱ्या करून घ्या. जे नाही ते आहे, असं दाखवणं म्हणजे राजकारण हो. 

ताई, तुम्ही याच. ‘24, अकबर रोडवर रोषणाई करण्यासाठी. ‘7, रेसकोर्स रोडकडे आगेकूच करण्यासाठी. 

ताई, संकोच सोडा आता. रॉबर्टभौजींना सांगा आणि राजकारणाच्या जनपथावर या! 

पक्ष जिंकला तर तुमच्यामुळे आणि हरला तर आमच्यामुळे. वर्षानुवर्षाचं सूत्र ठरलेलंय हे. चिंता ती सोडी, राजकारणी घ्यावी उडी. 

उशीर तर खूप झालाय. पण तरीही हरकत नाही. काँग्रेसयुक्त राजकारण चालू ठेवायचं असेल, तर तुम्हीच पाहिजे. काँग्रेसधर्म राहिला काही तो तुम्हां कारणे।अशी नोंद नव्या इतिहासात होऊन जाऊ द्या! म्हणून तरी तुम्ही या.

गांधी-नेहरू घराण्याच्या
सज्ज सदा स्वागता
असाच एक कार्यकर्ता! 
.... 
(पूर्वप्रसिद्धी - दैनिक सकाळ, 20 मे 2016) 

Sunday 29 May 2016

मत्प्रिय नगरा...

(अहमदनगर असं कागदोपत्री नाव असलेलं आणि साऱ्यांच्या बोलण्या-लिहिण्यात कायम  नगर असाच उल्लेख येत राहिलेल्या या शहराचं वयोमान पाचशेहून अधिक आहे. त्याचा स्थापनादिन 28 मे. गेल्या अडीच दशकांपासून तो साजरा होतो. त्याच आठवणी, तेच कढ, तीच महता आणि तीच गाथा... उत्सवी स्थापनादिनापलीकडे कधीच काही होत नाही. या शहराबद्दलची आपुलकी व्यक्त करणारी ही कविता. अडीच वर्षांपूर्वी केलेली... आणि वर्तमान पाहता भविष्यातही तशीच लागू राहील, असंच खंतावून म्हणावंसं वाटतं.)

भोऐतिहासिक नगरा
उपेक्षेचे वारे सोसत
परी ना कण्हतना कुथत
संथ गतीने सुरूच आहे 
तुझी वाटचालअखंडित


पारतंत्र्याच्या सोसून अनेक
 ‘शाही
अनुभवतोयस सध्या लोकशाही
पण तुझ्या गौरवाच्या आणि कुचेष्टेच्या 
लिखाणाची अजूनही आहे ओली शाई 

पाचशतकी वयाचा तुझ्या 
उल्लेख होतो वारंवार
पण बा नगरानाहीत दिसत 
वार्धक्याच्या काहीबाही खुणा 
तुझ्या अंगावर... 
हांदिसताहेत सुरकुत्या कधीच्या 
झालेल्या त्या तरुणपणीच्या 
उपेक्षेच्याकुपोषणाच्या... 

लढायांतल्या तलवारींचा 
तू ऐकला आहेस खणखणाट 
आणि मंदिरात वाजणाऱ्या  
टाळ-घंटांचा किणकिणाट
तरीही स्तब्ध आणि सुज्ञ
नेहमीसारखाच स्थितप्रज्ञ! 

ऋषी-मुनीसाधू-संतांचा 
नित्य लाभलाय सहवास 
आणि हव्यासी सत्ताधीशही 
करून गेलेत येथे वास 
पण आहे तीच परिस्थिती 
झकासमानत राहतोयस खास 

भरण-पोषणाच्या
नि सुजाण पालकत्वाच्या 
कल्पनाच आहेत तुझ्या वेगळ्या 
देगा उसका भला
न देगा उसका भी भला 
धुंदीत जगतोयस आगळ्या... 

कुणीही यावे 
टिकली मारुनी जावे
तसे कुणीही यावे नि 
राज्य करुनी जावे... 
तुझे त्याला ना सोयर - ना सुतक 

प्रश्न पडत राहतात
उत्तरे कधी तरीच 
सापडत असतात
अनुत्तरित समस्या 
चिघळून लसलसतात... 
मिरवतोस तू त्या अंगावर 
लखलखत्या दागिन्यांगत! 

उसाच्या हिरव्यागार मळ्यांतून 
घोंगावतात दुष्काळी वारे 
आणि वाहत्या कालव्यांतून 
पुढे जातात तहानेचे झरे 
भुकेला-तहानलेला तू
आहेस तेथेतसाच राहा बरे 

खुणावणारे पुणे
हिणवणारे नाशिक
चमकणारे औरंगाबाद 
या त्रिकोणात तुझा 
न दिसणारा चौथा कोन 
बोथटन टोचणारा... 

झगमगत्या त्या महानगरांकडे
पाहून नाहीत तुझे दिपत डोळे 
कोठूनकाही कळत नाही
पण मिळवलेस हे शहाणपण खुळे

ग्लोबल युगापासून तू 
नसशी रे लांब फार
पण नाही तुझा हात 
त्याच्या खांद्यावर 
सबबइतके जवळ 
तरीही दूर
पडले हे केवढे अंतर 

नव्या जगात जगताना 
कितीही आले जिवावर 
रोज करावे वाटते हाऽऽय
तरीही म्हणावे लागते बाऽऽय 

फेसबुकावर तुला मानाचे पान 
कितीक लाईककॉमेंट्‌स छान 
दुरावा तुझा साहवेना
परि तुझ्याजवळ राहवेना!



(पूर्वप्रसिद्धी : दैनिक सकाळ, 22 नोव्हेंबर 2013)

Thursday 26 May 2016

‘दिल की बात!’

बँड वाजवून, ढोल-ताशे बडवून दोन वर्षांपूर्वी मोदी सरकार सिंहासनारूढ झालं. त्या वेळच्या आनंदाच्या लाटा आता काहीशा ओसरल्या आहेत. उत्साहाच्या वाटाही बंद झाल्या की काय, असं वाटू लागलं आहे. मोदी सरकारच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त इथेच वर्षापूर्वी बाई आणि भाई असा लेख लिहिला होता. त्यानंतर अजून एक वर्ष गेलं. या सरकारबद्दल सामान्यजनांच्या मनातले आम आदमीने जाणून घेतलेले भाव.
















पुन्हा एकदा बोलबाला
सव्वीस मे जवळ आला
दिवस हॅप्पी बर्थडेवाला
कसा करावा साजरा बोला!

रांगोळीने सजवावे अंगण
लाल किल्ल्या बांधावे तोरण?
आकाशी सोडावा मोठ्ठा फुगा?
की रोषणाईने दीपवावे जगा?

यमुनेच्या तिरी भरवू मेळा 
भाईयों-बहनों साद घाला
पुन्हा भक्तजन करू गोळा 
जुनाच खेळ नव्यानं खेळा 

केक कापूया भला थोरला,
बर्गर नि पिझ्झा इटलीवाला
नको! बरा अपुला तो ढोकळा
चाट-पापडी अन्‌ मिर्च-मसाला 

नमो-नमोचा जपावा मंत्र
कॉंग्रेसमुक्तचे शिकावे तंत्र
साठ साल-साठ सालचा जप
करीत राहावा अत्र-तत्र-सर्वत्र

नवसा-सायासाचं लेकरू
बोलतंय कधीचं चुरुचुरू
चालेल ना पण तुरुतुरू?
की तेवढंच गेलंय विसरू?

द्यावी त्याला बार्बी विदेशी.
की बरी आपली ठकीच देशी?
मेक इनचा होईल दाखला
मेड इन इंडियाचा बोलबाला

बिहार,
 जेएनयू, उत्तराखंड
तयांमुळे झाला की मुखभंग
पुण्यामधली एफटीआयआय
तिनं केलं दे माय धरणी ठाय

शिजेना डाळ,
 रडवतोय कांदा
त्यामुळं झाला ­खाण्याचा वांधा
दुष्काळामुळं फोडलाय टाहो
सरकार असूनही दिसंना का हो?

झालीत पुरती वर्षं दोन
उरलीत आता बाकी तीन
भाई, कुछ देते क्यूँ नही ?’
विचारतेय जनता चिनभिन

आल्या आहेत योजना बावन
मिळू द्या घर, जनांकडे धन
सुकन्या होईल समृद्ध-संपन्न
कोमात का हो स्वच्छता मिशन?

स्मार्ट होताहेत महानगरे
खेड्यांचेही बदला की चेहरे
स्वच्छ होतेय भगीरथाची गंगा
मंत्र राहू द्या तोच, न खाऊँगा

एवढ्यात कुठला नाही गफला
दृष्ट लागण्याएवढाही नसे घोटाळा
परदेशात रंगवली प्रतिमा छान
ताठही राहिलीय देशाची मान

तरीही घार उडू द्यावी आकाशी
चित्त असो द्यावे पिलापाशी
तळावरच राहू द्यावं विमान
आपला देश नि आपलंच इमान

सांगू नका पेंड खातंय घोडं
बदलू द्या देश, जाऊ द्या पुढं
मन की बातचं एक म्हणणं
लई न्हाई राव आमचं मागणं

नको नको लाखांच्या बाता
दिल्या वचनांची करी पूर्तता
अच्छे दिनची हवीय हमी
आशाळभूत एक आम आदमी
--------
(पूर्वप्रसिद्धी - दैनिक सकाळ, 23 मे 2016)
(व्यंग्यचित्र सौजन्य – श्रेयस नवरे, हिंदुस्तान टाइम्स)

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...