Tuesday 23 April 2024

पुस्तकांची गोष्ट


हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झाल्यामुळे तेव्हा ती ब्लॉगवर घेतली नाही किंवा फेसबुकवरही टाकली नाही. व्हॉट्सॲपच्या एका गटावर मध्यंतरी प्रा. डॉ. निधी पटवर्धन ह्यांनी विचारलं होतं - गटातील सदस्यांपैकी कोणी पुस्तकांवर लिहिलेली कविता आहे का? किंवा अशी (इतर कोणाची) कविता माहीत आहे का?

एकदम आठवलं - आपण लिहिलेलं आहे खरं. पाठवून देऊ. डॉ. पटवर्धन ह्यांना ती कविता पाठवून दिली. मग त्यांनी कळवलं की, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या कला शाखेच्या मराठी विभागाच्या अभ्यासक्रमासाठी दहा कविता निवडल्या आहेत. त्यात ही एक! कम्प्युटरमध्ये बंदिस्त असलेल्या ह्या रचनेचं भाग्य असं अचानक उजळलं. जागतिक पुस्तकदिनाचा मुहूर्त साधून ती आता इथे देत आहे.

--------

पुस्तकांचाही दिवस
साजरा केला जातो
वर्षातून एकदा कसाबसा
बेंदुराला नि श्रावणी पोळ्याला
‘सण एक दिन...’
कविता आठवावी अगदी तसा

















जागतिक ग्रंथ दिनानिमित्त
उजाडतं भाग्य पुस्तकांचं
उघडली जातात कपाटाची दारे
त्यातून निघतात पुस्तकांचे भारे
मिळते मोकळी हवा खायला
दाटीवाटीच्या इमारतींना चुकवून
आलेल्या प्रकाशाचा कवडसाही पाहायला
महिनोन् महिने त्यांनी वागवलेली
धूळ फडक्याने झटकली जाते
फोटोसाठी छान सजवले जाते

लिहिणारे, वाचणारे,
न वाचता लिहिणारे,
न लिहिता वाचणारे,
उत्साहाने सोशल मीडियावर
पुस्तकांवर लिहितात-बोलतात
मुहूर्त साधून केलेल्या खरेदीची
यादी आणि फोटो टाकतात
थोडं पुस्तकांचं, वाचनप्रेमाचं जादा
प्रदर्शन आयोजित करतात
अंगठे उठतात, बदाम मिळतात
सोशल मीडियाच्या चावडीवरचे
वाहवा वाचनवेड्यांची करतात

‘वाचन कमी झालंय हल्ली’
तबकडी जुनीपुराणी झिजते
दिवसभर तीच वाजत राहते
‘वाचायला वेळच कुठंय आता?’
कुणी तरी सहज विचारतो
मोबाईलमधून क्षणभरासाठी
का होईना तोंड वर काढतो

















पुस्तकं काय करतात?
पुस्तकं कुठं दिसतात?
पुस्तकं कुठं वसतात?
प्रशस्त दिवाणखान्याची
शोभा वाढवतात
कुटुंब ‘वेल रेड’ असल्याची
ठळक जाहिरात करतात

खरं तर ती तशी कुठंही राहतात
खास बनवलेल्या कपाटात
शिळ्या वर्तमानपत्रांच्या रद्दीत
टेबल, खुर्ची, टिपॉय, माळ्यावर
आणि धान्याच्या कोठीतही क्वचित,
नांदत असतात न कुरकुरता
राहण्यापुरती जागा आहे ना
असं परस्परांना समजावतात

थोड्याशा जागेत दाटीवाटीने
चुरगाळलेल्या पानांच्या
दुखावलेल्या अवयवांसह
नशिबाचे भोग भोगत
आणि लेखकाला बोल लावत
जगतात बिचारी पुस्तकं

पुस्तकं कुठं मिळतात?
आडबाजूच्या दुकानांत
गाईड-वह्यांच्या पेठांत
रद्दीच्या दुकानांत
रस्त्याकडेच्या पथाऱ्यांवर
झगमगत्या मॉलमध्ये
प्रदर्शऩांच्या हॉलमध्ये

सुतळीने करकचून बांधलेल्या
रद्दीच्या गठ्ठ्यांमध्ये
बिचारी पुस्तकं
स्वस्तात दिसतात
कारण ती सहसा कुणी
वाचलेली नसतात

...हल्ली म्हणे पुस्तकं
किलोवरही विकली जातात
भेंडी, बटाटे, कांदे, वांगी
भाज्यांसारखं तागडीत तोलतात
पाणी शिंपडून ती ताजी टवटवीत
केलेली दिसत नाहीत, एवढंच!
चार-पाच किलोंचे ठोकळे
विकत घेतल्यावर
चाळीस-पन्नास पानांचं
पुस्तक तसंच देत नाही
विक्रेता, हेही खरं तेवढंच!

दिवस संपताच कपाटात
बंद केली जातात पुस्तकं
संपलेली असते पॅरोलची मुदत
बंदिस्त कप्प्यात, माळ्यावर
दिवसभर तिष्ठलेली वाळवी
वाटत पाहतच असते त्यांची
तिच्या भरण-पोषणाची
जबाबदारी पुन्हा वर्षभराची

पुस्तकं मनाची मशागत
करतात, हे निव्वळ ‘मिथ’
पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांकडे
परंपरेनं सोपवलेलं सफेद झूठ

कोणे एके काळी
पुस्तकांतून गोष्ट
सांगितली जायची
मुला-नातवंडांना,
आजूबाजूच्या मुलांना
आणि विद्यार्थ्यांना











उद्या बहुतेक
पुस्तकांची गोष्ट
सांगितली जाईल
कोणी ऐकायला
असलंच तर...
त्यासाठी शोधावं लागेल
निमित्त जागतिक ग्रंथदिनाचं.
.........
© सतीश स. कुलकर्णी

sats.coool@gmail.com

...........

#पुस्तके #जागतिक_पुस्तकदिन #पुस्तकांची_गोष्ट #लेखक

...........

ताजा कलम - ह्यातील खालची तीन चित्रे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने काढलेली आहेत.

(सौजन्य - www.bing.com)

Sunday 24 March 2024

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या
निमित्तानं अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं.
त्यातल्या तीन पिढ्यांमधल्या तीन खेळाडूंशी भेट झाली,
त्यांच्याशी थोड्या-फार गप्पा झाल्या.
दिवसाचं फलित हेच!
........................

घरच्या मैदानावर घरचा सत्कार. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत शनिवारी अर्जुन, द्रोणाचार्य, ध्यानचंद
पुरस्कारविजेत्या कबड्डीपटूंचा खास गौरव करण्यात आला. राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर ह्यांच्या हस्ते पंकज शिरसाट ह्याचा सन्मान. सोबत आहेत संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत गाडे.
(छायाचित्र - अनिल शाह)
------------------------------------------------------
सगळं काम संपवून शनिवारी रात्री अंथरुणावर पडता पडता मी मलाच समजा प्रश्न विचारला असता - ‘आजच्या दिवसाचं फलित काय?’ त्याचं साधं नि तेवढंच सोपं उत्तर (स्वतःलाच) दिलं असतं - ‘तीन अर्जुनवीरांची थेट भेट आणि थोड्या गप्पा!’

पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने नगरमध्ये आज जवळपास २५ अर्जुन पारितोषिक विजेते खेळाडू जमले. ध्यानचंद, द्रोणाचार्य पारितोषिकांचे मानकरी वेगळेच. त्यामध्ये ८७ वर्षांचे सदानंद शेट्टी होते आणि ह्याच स्पर्धेत चंडिगड संघाकडून खेळत असलेला पवन शेरावत हाही. द्रोणाचार्य पुरस्काराबरोबरच ‘पद्मश्री’ने सन्मानित हरयाणाच्या श्रीमती सुनील डबास ह्याही नगरच्या वाडिया पार्कवर संध्याकाळी उपस्थित होत्या.

दिग्गजांचा सत्कार
वाडिया पार्क मैदानावर शनिवारी स्पर्धेतील बाद फेरीचे सामने झाले. उपान्त्यपूर्व फेरीचे चार आणि त्या आधी हे संघ ठरविणारे आठ सामने. त्यातले किमान तीन सामने कमालीच्या चुरशीचे झाले. उपान्त्यपूर्व फेरीतील आठ संघ निश्चित झाल्यावर स्टेडियमवर एक छोटेखानी कार्यक्रम झाला. विविध पुरस्काराचे मानकरी असलेल्या खेळाडूंचा शानदार सत्कार.

त्यामध्ये ई. प्रसाद ‘कबड्डी’ राव, क्रिशनकुमार हुडा, शांताराम जाधव, राजू भावसार, रमा सरकार, माया आक्रे, विश्वजित पलित, हरदीपसिंग, पी. गणेशन, बी. सी. रमेश आणि अजून बरेच. ह्या सर्वांचा नगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला.

त्यातील तीन अर्जुनवीरांची दिवसभरात भेट झाली आणि थोडा वेळ गप्पाही रंगल्या. हे तिन्ही खेळाडू अगदी वेगळ्या पिढ्यांमधले. म्हणजे त्यांच्या वयातलं अंतर एवढं की, पहिला मैदान गाजवत होता, तेव्हा तिसऱ्याचा जन्मही झालेला नव्हता!

हे तिन्ही खेळाडू कबड्डीशी आजही संबंध टिकवून आहेत. आणि त्यांच्याबद्दलचं कबड्डीच्या चाहत्यांना आजही कुतूहल वाटतं. त्यांच्या सोबत फोटो काढावे वाटतात. थोडक्यात, त्यांचं ‘स्टारडम’ पूर्वीएवढंच कायम. किंबहुना त्यात अधिक भर पडलेली, थोडं अधिक परिपक्व झालेलं.

निर्मल थोरात ह्याचा सकाळीच फोन आला आणि अशोक शिंदे ह्यांना भेटायला जायचं ठरलं. चढाया, चपळाई आणि पदन्यास ह्याबद्दल अशोक शिंदे प्रसिद्ध. नगरमध्ये तीन दशकांपूर्वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा झाली, तेव्हा ते पुणे जिल्ह्याकडून खेळत होते. शांताराम जाधव, अशोक शिंदे ह्यांच्यासाठी निर्मलनं घरी खास जेवणाचा बेत आखला होता. त्यांच्या पंगतीला मीही होतो.

त्या वेळी शांतारामबापूंची घेतलेली ‘बोनस’ लाईनबाबत मुलाखत कबड्डी वर्तुळात बऱ्यापैकी गाजली होती. ‘केसरी’च्या इथल्या आवृत्तीत ती चक्क अग्रलेखाच्या शेजारी प्रसिद्ध झाली होती.

संघात आहे की नाही?
त्यानंतर थोड्याच काळाने पुण्यात झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अशोक शिंदे ह्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यासाठी महाराष्ट्राचा जो संघ जाहीर झाला, त्यात अशोक शिंदे ह्यांचा समावेश नव्हता. प्रत्येक संघातील खेळाडूंची नावे आणि त्यांचे ‘चेस्ट नंबर’ ह्याची यादी संयोजन समितीकडून मिळे. त्या यादीत अशोक शिंदे ह्यांचं नाव नव्हतं. प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात झाली, तेव्हा ते खेळताना दिसले. त्याचा बातमीत स्वाभाविकच उल्लेख केला. तोच धागा पकडून हेमंत जोगदेव ह्यांनी कबड्डी संघटकांना दोन चिमटे आवर्जून काढले होते.

तेच हे अशोक शिंदे. आधी महाराष्ट्र बँकेत आणि नंतर ‘एअर इंडिया’मध्ये त्यांनी काम केलं. वर्षभरापूर्वीच त्यांनी निवृत्ती स्वीकारली. प्रो कबड्डी लीगच्या नव्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावणाऱ्या ‘पुणेरी पलटण’ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिलेली. सध्या ते त्या संघाचे ‘मेंटॉर’ आहेत. मग स्वाभाविकच त्यावर बोलणं झालं.

निवृत्तीनंतर आता त्यांना चिपळूण येथे कबड्डी प्रबोधिनी चालू करायची आहे. कोकणाबद्दलचं प्रेम, तिथं असलेली गुणी खेळाडूंची संख्या ह्यावर ते भरभरून बोलत होते. गुणवान खेळाडू शोधण्यासाठी त्यांची भटकंती चालूच असते.

नंतर थेट मैदानावर भेट झाली ती पंकज शिरसाट ह्याची. पालघरमध्ये पोलीस उपायुक्त असलेल्या पंकजशी संध्याकाळी फोनवर बोलणं झालं होतं. घरच्या मैदानावर होणाऱ्या स्पर्धेसाठी तो खास वेळ काढून आला होता.

नगरमध्ये वाढलेला, इथंच खेळायला शिकलेला आणि प्रा. सुनील जाधव ह्यांचं प्रशिक्षण मिळालेला पंकज फाऽऽर पुढे गेला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करीत त्यानं सुवर्णपदक जिंकलं. मग भारतीय संघाचा कर्णधार बनला. अर्जुन पुरस्काराचा ह्या जिल्ह्याचा तोच पहिला मानकरी!

पंकजच्या ‘एक्सपर्ट कमेंट’
स्वाभाविकच पंकजला भेटण्यासाठी गर्दी झालेली. त्यात जुने मित्र, सहकारी खेळाडू, नव्या दमानं मैदानात उतरलेले... सगळ्यांचा त्याच्याभोवती गराडा. त्या गर्दीतून नजरानजर झाली आणि भेटण्यासाठी आम्ही दोघंही दोन-दोन पावलं पुढे सरसावलो. पुढे मग उपान्त्यपूर्व फेरीची महाराष्ट्र-कर्नाटक लढत त्याच्या शेजारीच बसून पाहिली. सामना अगदी जवळून पाहण्याचा आनंद त्याच्या ‘एक्सपर्ट कमेंट’मुळे अधिकच वाढला.

अर्जुन पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या पहिल्या महिला कबड्डीपटू म्हणजे शकुंतला खटावकर. त्यांना हा पुरस्कार मिळाला १९७८मध्ये; पंकजचा तेव्हा जन्मही झालेला नव्हता. ‘स्पर्धेसाठी कधी येताय?’, असं त्यांना मेसेज करून विचारलं होतं. त्यांचं काहीच उत्तर आलं नाही. पण संध्याकाळी त्या व्यासपीठावर दिसल्या. ह्या सगळ्या ज्येष्ठ खेळाडूंचे सत्कार अजून व्हायचे होते.

तीस वर्षांनंतर भेट
सत्कार स्वीकारून व्यासपीठाकडे परतत असताना त्यांना अडवलं. पाहताक्षणीच विचारत्या झाल्या, ‘‘सतीश कुलकर्णी ना? अहो, तुमचा फोनच लागत नाहीये...’’ जवळपास ३०- वर्षांनंतर भेट होऊनही त्यांनी क्षणात ओळखलं. तोपर्यंत महाराष्ट्राच्या उपान्त्यपूर्व लढतीची घोषणा झाली होती. मग तो सामना आटोपल्यावरच भेटायचं ठरलं.

जिल्हा कबड्डी संघटनेचं मुख्यालय नगरमध्ये आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ आणि संघटनेच्या कामाची नव्यानं रुजवात करायची म्हणून निमंत्रितांची राज्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रा. शशिकांत गाडे, प्रा. सुनील जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दादा कळमकर ह्यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केलं होतं.

त्या स्पर्धेसाठी राज्यातले बडे बडे संघ आले होते. शकुंतला खटावकरही आल्या होत्या. ती संधी साधून त्यांची मुलाखत घेतली. राष्ट्रीय पातळीवरचा एक नामांकित खेळाडू आणि स्थानिक दैनिकाचा एक तरुण पत्रकार असा संवाद होता तो.

बदल आणि आव्हानं
नव्या जमान्यात कबड्डीपुढं कोणती आव्हानं आहेत, कोणत्या बदलांना सामोरं जावं लागेल, हे खटावकर ह्यांनी त्या मुलाखतीमध्ये अगदी सविस्तर सांगितलं होतं. कोणकोणत्या देशांचं आव्हान भारतापुढं असेल आणि त्यासाठी काय करावं लागेल, ह्याबद्दल त्या बोलल्या होत्या.

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा मागच्या वर्षी नगरमध्ये झाली. मॅटवर खेळली जाणारी कबड्डी, खेळाडूंच्या पायात बूट, धावता गुणफलक... हे सगळे बदल पाहून आठवण झाली ती त्या मुलाखतीची. 

स्पर्धेच्या निमित्तानं लिहिलेल्या लेखात मुलाखतीचा उल्लेख केला. कसं कोण जाणे, पण व्हॉट्सॲप कृपेने त्या लेखाची लिंक शकुंतला खटावकरांपर्यंत पोहोचली. त्या अगदी भारावून गेल्या. क्रीडा प्रशिक्षक अजय पवारच्या माध्यमातून फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि दीर्घ काळानंतर संपर्क सुरू झाला.

व्हॉट्सॲपवर नानाविध मेसेज शकुंतलाताई पाठवित असतात. असं असतानाही स्पर्धेसाठी नगरमध्ये येणार की नाही, हे त्यांनी का कळवलं नाही बरं?

ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष भेट झाल्यावर मिळालं. घरच्या काही अडचणींमुळे त्यांचं येणं निश्चित नव्हतं. पण ती समस्या आदल्या दिवशी काही प्रमाणात दूर झाली आणि एक दिवसासाठी त्या आपल्या आवडत्या जागी आणि जगी - कबड्डीच्या गजबजलेल्या मैदानावर आल्या.

‘पाय लागू...’ 
नगरनं उपान्त्यपूर्व फेरीत कर्नाटकाला सहज हरवलं आणि मैदानात जल्लोष चालू झाला. त्या जल्लोषी गर्दीतून वाट काढतच व्यासपीठाकडे गेलो. शकुंतला खटावकर वाटच पाहत होत्या. आम्ही बोलायला सुरुवात केली की, दोन खेळाडू आल्या. ताईंना ‘पाय लागू’ करीत त्या जुन्या सोनेरी आठवणींना उजाळा देऊ लागल्या. मग स्वाभाविकच फोटोही आला. त्या फोटोतून दूर होण्याचा प्रयत्न खटावकरांनी हाणून पाडला. ‘हे पत्रकार आहेत,’ अशी आपल्या विद्यार्थिनींशी ओळख करून दिली.


(छायाचित्र - अनिल शाह)
------------------
आमच्या बोलण्याची सुरुवात व्हायची आणि लगेच असा ‘व्यत्यय’ यायचा. व्यासपीठावरून खाली आलो, तर त्यांना सातारकर मंडळी भेटली. त्यांची परस्परांची भेटही बऱ्याच दिवसांनंतर झाली असावी, हे रंगलेल्या संवादातून समजलं. क्रीडा (आचार)संहितेबद्दल त्यांना शकुंतला खटावकरांकडून काही माहिती हवी होती. त्या सांगत होत्या. मध्येच माझ्याकडे बघत ‘आता फार सांगत नाही. हे पत्रकार आहेत ना शेजारी...’ असं मिश्कीलपणे म्हणत होत्या. 

सातारकर मंडळींना घरी येण्याचं आमंत्रण देताना म्हणाल्या, ‘‘पुणेकराचं आमंत्रण नाही बरं हे. पुण्यात (अनेक वर्षांपासून) राहत असले, तरी शेतकऱ्यांच्या कुटुंबातली आहे मी!’’ आडनावातील ‘खटाव’कडे त्यांचा अप्रत्यक्ष संकेत होता. पुन्हा निवांत भेटायचा वायदा करून आम्ही निरोप घेतला.

अशोक शिंदे ह्यांच्याशी गप्पा मारताना जाणवली ती त्यांची नवीन गुणी खेळाडू शोधण्याची धडपड. ‘आपल्या कोकणासाठी’ काही करण्याची तळमळ.

पंकज तर घरचाच माणूस. एकेरी संबोधनातला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं वजन आणि वलय बाजूला ठेवून महाराष्ट्राचा सामना समरसून पाहणारा. नेमक्या क्षणी खेळाडूंना सूचना देणाऱ्यां पंकजचं मैदानाशी तेच जुनं नातं कायम असल्याचं दिसलं.

भेटायला आलेल्या प्रत्येकाला ‘कसे आहात तुम्ही?’ असं शकुंतलाताई अगदी आवर्जून विचारत होत्या. गुरू, प्रशिक्षक, ताई ह्या नात्यानं संवाद साधत होत्या. बोलता बोलता त्यांनी एकाला ‘पाया कसं पडावं!’ ह्याचा धडा दिला आणि ‘आता नको. पुढच्या वेळी सांगितलं तसा नमस्कार कर...’ असंही सांगितलं.

... तीन पिढ्यामधील तीन खेळाडू. त्यांना जोडत आली आहे कबड्डी. त्या खेळाबद्दल तिघेही कृतज्ञ आहेत!
.....
#कबड्डी #अर्जुन_पुरस्कार #शकुंतला_खटावकर #अशोक_शिंदे #पंकज_शिरसाट #नगर #राष्ट्रीय_स्पर्धा #वाडिया_पार्क
.....

Friday 22 March 2024

अरविंदा? ...गोविंदा!

 

(दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांना अटक झाल्याची बातमी वाचली आणि बरोबर दहा वर्षं आणि एक महिन्यापूर्वी लिहिलेली ही रचना आठवली. प्रस्थापित लोकशाहीतील बड्या खेळाडूंविरुद्ध ते लढतील, त्यांना नडतील आणि  अंतिमतः जिंकतील, असा (भाबडा) विश्वास वाटत होता. त्याच अपेक्षेतूनच हे लिहिलं होतं. नंतर जे काही घडत गेलं, त्यातून राजकारण आपल्याला कळत नाही,
हा समज दृढ झाला.)


आलाय खेळात
घेऊ या घोळात
देऊ या दणका
दिल्लीच्या बोळात

पाठिंब्याचा झोका
दिला एक मोका
सापडल्या क्षणी
मारू मस्त ठोका

आपलाच खेळ
आपलाच मेळ
घुसला हा कसा
घातलान् घोळ

खुर्चीवर बसतो
रस्त्यावर येतो
लाल दिवा फुंकून
धरणे कसा धरतो

विनाशर्त खास
समर्थनाचा गॅस
परि सोडेचिना
लोकपालाचा ध्यास

आधी धरली गल्ली
आता लक्ष्य दिल्ली
हमसे ही म्यांव
अरे! अपनीच बिल्ली

वाटले होते कोंडू
खोड याची मोडू
कचऱ्यातच काढतोय
हाती घेऊन झाडू

त्यांची मेणबत्ती
ह्यांची उदबत्ती
म्हणाला, खाली
लगाव बत्ती!

अण्णांचा चेला
सवाई निघाला
रामलीला करून
लईच पुढे गेला

कुणी जुने तपस्वी
काही नवे तेजस्वी
विरोधाला पुरून उरे
केवढा हा मनस्वी

वाटले होते गोड
लागेल त्याला खुर्ची
भलतीच की तिखट
निघाली ही मिर्ची

कुछ पाने के लिए
पडता है कुछ खोना
मुख्यमंत्रिपद त्यजून
प्रधानमंत्री है बनना?

सत्तेचे लोणी
सोडतोय कोणी
झालाय गोविंदा...
अरे, हा तर अरविंदा!

उद्याचे कोणी
सांगावे काय
प्रस्थापितांना होईल
दे माय धरणी ठाय

बाप रे बाप
आप रे आप
`व्यवस्थे`च्या
डोक्याला ताप!
.
.
.
परिवर्तनाची चाहूल?
की पुन्हा एक हूल?
होणारेय ऑपरेशन?
की नुसतीच भूल?
.....................

© - अचंबित नि स्तंभित आम आदमी
पंधरा/फेब्रुवारी/चौदा
................................................

(काही सोप्या शब्दांची कठीण स्पष्टीकरणे देणारा एफआरआय -
तपस्वी - यांनी सव्वाशे वर्षे तप केल्याचे तेच सांगतात. त्यामुळे तपोभंग न करता सत्तासुंदरीरूपी मेनका साठ वर्षं यांच्या अंगाखांद्यावर खेळत जनतेला डोळा मारते आहे.
तेजस्वी - अशाच एका (पण तेवढ्या नव्हे) जुन्या `राष्ट्रीय` संघटनेची ही नव्याने स्थापन झालेली `शाखा` आहे म्हणतात.
मेणबत्ती आणि उदबत्ती - खरे तर शेवटच्या ओळीतील `बत्ती` शब्दाशी यमक जुळवण्यासाठी या दोन अनुक्रमे प्रकाशमान करणाऱ्या व सुगंधित करणाऱ्या वस्तू आणल्या आहेत. त्यांचा गिरिजाघरे किंवा मंदिरे याच्याशी नाहक संबंध जोडू नये. आणि गिरिजाघरे वा मंदिरे यांचा संबंध त्या एकाच (बद्द) नाण्याच्या दोन बाजू असलेल्या पक्षांच्या माणसाशी जोडू नये.
गोविंदा होणे - लोचा होणे. आणि लोचा होणे? अर्थातच गोविंदा होणे!!)
....

#अरविंद_केजरीवाल #दिल्ली #मुख्यमंत्री #आप #आम_आदमी

Thursday 29 February 2024

क्रीडा पत्रकारितेतील ‘आजोबा’


(छायाचित्र सौजन्य : खेलो इंडिया)

मराठी क्रीडा पत्रकारितेतील एक महत्त्वाचं आणि अग्रगण्य नाव
म्हणजे हेमंत जोगदेव. दीर्घ काळापासून मैदानावर रमलेल्या
जोगदेव ह्यांचं गुरुवारी पहाटे निधन झालं. ऑलिम्पिकला जाणारे
ते पहिले मराठी पत्रकार. खो-खो, कबड्डी, कुस्ती ह्या देशी खेळांवर
त्यांनी भरभरून लिहिलं. त्यांच्या काही आठवणी...
------------------
‘संपादकऽऽऽ’!
अधिकृतरीत्या साधा उपसंपादक नसतानाही अशी थेट ‘बढती’ देत, बहुमानाने संबोधणारे आणि बोलावणारे दोघे होते. ‘क्रीडांगण’मध्ये काम करीत असतानाची ही गोष्ट आहे. पहिले होते, ‘प्रेस्टिज’चे सर्वेसर्वा सर्जेराव घोरपडे. दुसरे क्रीडा पत्रकार, समीक्षक श्री. हेमंत जोगदेव. त्या संबोधनात कोठेही गंमत, चेष्टा नव्हती. असलंच तर किंचित कौतुक होतं.

हेमंत जोगदेव नाव ऐकलेलं होतं. ‘केसरी’मध्ये त्यांनी लिहिलेलं वाचलं होतं. ‘क्रीडांगण’मध्ये लिहिण्यासाठी त्यांना पहिल्यांदा पत्र लिहिलं ते श्री. घोरपडे ह्यांच्या सांगण्यावरून. पत्रकारनगरमध्ये राहायचे ते. साधं पोस्टकार्ड तेव्हा दुसऱ्या दिवशी मिळायचं.

असं पत्र मिळालं की, तिसऱ्या दिवशी श्री. जोगदेव लेख घेऊन पंताच्या गोटातील ‘क्रीडांगण’च्या कार्यालयात येत. लेख हातात देत आणि मग श्री. घोरपडे ह्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या केबिनमध्ये जात. तेथून परतताना ‘येतो हो संपादक...’ असा निरोप घेत.

पुण्याच्या क्रीडा जगतात तेव्हा दोन महत्त्वाच्या शर्यती होत्या - मुंबई-पुणे सायकल शर्यत आणि नेहरू स्टेडियमवर होणारी मोटोक्रॉस. प्रॉमिस सायकल शर्यत रविवारी होई आणि तिच्या बातम्या सोमवारी पुण्यातील दैनिकांच्या पहिल्या पानावर झळकत. क्रिकेटशिवाय (आणि टेनिसही) अन्य खेळांनाही पहिल्या पानावर जागा मिळायचे दिवस होते ते. मोटोक्रॉस नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्यावरून दोन आठवडे वादही रंगत.

सायकल शर्यत, मोटोक्रॉस
सायकल आणि मोटरसायकल ह्या दोन्ही शर्यतींसाठी हक्काचे लेखक होते हेमंत जोगदेव. एकदाच कधी तरी त्यांना अतिशय घाईघाईने लेख लिहायला सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी किंचित कुरकुर केली होती. दुसऱ्या वेळी आठवड्याचा वेळ दिल्यावर लेख हातात देताना म्हणाले होते, ‘हे कसं मस्त झालं. असा वेळ दिला की मनासारखं लिहिता येतं!’ आणि मग प्रसन्न हसले.

जोगदेवांचे लेख मी ‘संपादित’ करायचो. 😇 ते ‘केसरी’च्या व्याकरणानुसार लिहायचे - म्हणजे ‘असेही ते म्हणाले’ असं असेल तर ते ‘असेहि’ लिहीत. क्रीडा-संस्कृती शब्दामधील शेवटची ‘ती’ ऱ्हस्व असे. आश्चर्य वाटायचं, एवढा अनुभवी पत्रकार असं का लिहितो? त्या प्रश्नाचं उत्तर ‘केसरी’मध्ये काम करू लागल्यावर मिळालं.

ढिंगच्याक शर्ट
श्री. जोगदेव ह्यांना पहिल्यांदा तेव्हाच पाहिलं होतं. बुटकेच म्हणता येतील अशी उंची. पँटमध्ये खोचलेला ढिंगच्याक शर्ट. मोठमोठ्या चौकड्यांचे, कॉट्सवूल प्रकारचे आणि भडक रंगांचे शर्ट त्यांच्या अंगावर नेहमी दिसत. नंतर संपादक कुमार केतकर ह्यांना पाहिल्यावर जोगदेवांचीच आठवण झाली. आधुनिक पद्धतीचे, प्रसंगी चित्रविचित्र वाटणाऱ्या रंगाचे-प्रकाराचे शर्ट हे दोघंही घालत. खरं सांगायचं म्हणजे मिरवत! त्यांना ते शोभूनही दिसत.

जोगदेवांच्या चष्म्याला लेस लावलेली असायची. लिहीत नसतील तेव्हा तो कपाळावर तरी असायचा किंवा गळ्यात लोंबत असायचा. 

त्याच काळात पुण्यातील खो-खोपटू हेमंत जोगदेव प्रसिद्ध होते. लिहिणारे आणि खेळणारे जोगदेव एकच, असा समज होता. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा (लिहिणारे) जोगदेव साठीच्या घरात होते. हा माणूस आता आतापर्यंत खो-खोसारखा खेळ खेळायचा, ही चकित करणारीच गोष्ट होती. नंतर कळलं की, ‘हे’ जोगदेव ‘ते’ नव्हेत!

महाराष्ट्र केसरी स्पर्धा
‘क्रीडांगण’च्या मैदानातली खेळी वर्ष-सव्वा वर्षाची. नंतर ‘केसरी’च्या नगर आवृत्तीमध्ये रुजू झालो. कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन - महाराष्ट्र केसरी स्पर्धा नगरमध्ये होती. गदेची अंतिम कुस्ती पहिल्यांदाच गादीवर (मॅट) होणार होती. माती की गादी, हा वाद हिरिरीने चालू होता. नियमांनुसार होणारी कुस्ती पाहण्याची पहिलीच वेळ. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यावर लिहायचं होतं.

त्याच वेळी प्रवरानगरमध्ये आंतरविद्यापीठ स्पर्धा होती. तिचं वृत्तांकन करून जोगदेव गदेच्या कुस्तीसाठी (म्हणजे अंतिम लढतीसाठी) नगरमध्ये येणार होते. स्पर्धेच्या आधी त्यांनी नगर कार्यालयात संपर्क साधला. मी ‘केसरी’मध्ये आहे आणि स्पर्धेच्या बातम्या देणार आहे, हे समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, ‘अरे! तो आहे होय. मग काही प्रश्नच नाही...’ गंमतीची गोष्ट म्हणजे तोवर त्यांनी माझी एकही बातमी वाचलेली नव्हती.

शेवटच्या दिवशी जोगदेव आले. मैदानावर आमची भेट झाली. साडेतीन दिवस भरपूर बातम्या दिल्या होत्या. काही प्राथमिक कुस्त्यांच्या निकालाचा बातम्यांमध्ये ‘अमूक वि. वि. तमूक’ (म्हणजे विजयी विरुद्ध) असा उल्लेख तिन्ही दिवस केला. जोगदेवांनी सांगितलं, ‘हे असं काही द्यायचं नाही.’

प्रतिस्पर्ध्यांहून एक पाऊल पुढे
मॅटवरची पहिली अंतिम लढत झाली. वाडिया पार्कजवळचा जवाहर आखाडा फुलून गेला होता. माळशिरसच्या रावसाहेब मगर ह्यानं बाजी मारत ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा पटकावली. जोगदेवांना घेऊन कार्यालयात गेलो. तिथं बातमी लिहायला सुरुवात केल्यावर म्हणाले, ‘‘आपल्याला तेवढी मुलाखत मिळाली असती तर बरं झालं असतं...’’ अंतिम लढतीतील दोन्ही मल्लांच्या मुलाखती मी सकाळीच घेतल्या होत्या. तसं सांगितल्यावर ते भलतेच खूश झाले! प्रतिस्पर्धी दैनिकांच्या आम्ही एक पाऊल पुढे होतो!!

त्या वेळी भारतीय कुस्ती संघटना ऑलिम्पिकसाठी मल्ल घडविण्याचे स्वप्न पाहत होती. त्यासाठी दिल्लीत खास केंद्र सुरू करण्यात आलेले. काही रशियाई प्रशिक्षकही स्पर्धा पाहण्यासाठी खास आले होते. ते गुणी पेहलवान हेरणार होते. रावसाहेब मगरची दिल्लीतील प्रशिक्षणासाठी निवड झाली.

सहाच महिन्यांनंतर, नगरमध्ये आयोजित एक मेच्या आखाड्यात रावसाहेब मगर दिसला. तो दिल्लीहून परत का आला? त्याची मुलाखत घेतली. तीच नेहमीची कारणं - जेवायला चांगलं मिळत नाही, पोट भरत नाही, दिल्लीत करमत नाही...

सणसणीत मुलाखत मिळाली. पण ती ‘केसरी’च्या फक्त नगर आवृत्तीत प्रसिद्ध झाली. माध्यमांना असलेला शाप! कम्युनिकेशन गॅप!! पुढे दोन महिन्यांनंतर हे सांगितल्यावर जोगदेव फार हळहळले.

कोणाचं तरी अनुकरण करीत ‘ॲथलेटिक्स’साठी ‘मैदानी स्पर्धा’ असा शब्दप्रयोग करीत होतो. जोगदेवांनी एकदा बजावलं, ‘‘ॲथलेटिक्स’ असंच लिहायचं. क्रिकेट, फुटबॉल, खो-खो हे काय मैदानी खेळ नाहीत की काय!’

मराठी क्रीडा पत्रकार संघटना
साधारण तीन दशकांपूर्वी मराठी क्रीडा पत्रकार संघटनेची स्थापना झाली. अखिल भारतीय मराठी क्रीडा पत्रकार संघटना. तिच्या स्थापनेनिमित्त पुण्यात तीन दिवसांचं अधिवेशन भरलं. बालेवाडी संकुलाचं मोठ्या घाईने चालू असलेलं काम आम्हा सगळ्यांना पाहायला मिळालं. संघटनेच्या स्थापनेसाठी धडपडणारे जोगदेव कार्यकारिणीत कोठे नव्हते. ‘केसरी’चा प्रतिनिधी म्हणून त्यांनी माझं नाव पुढे केलं.

संघटनेच्या कार्यकारिणीच्या तीन-चार बैठकांना हजर राहिलो. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, असं वाटत होतं. एक मोठं पत्र श्री. जोगदेव ह्यांना लिहिलं. त्याची एक प्रत वि. वि. करमरकर ह्यांना आवर्जून पाठवायला त्यांनी सांगितलं. करमरकर त्या संघटनेत सहभागी नव्हते. ‘महाराष्ट्र टाइम्स’चं प्रतिनिधित्व संजय परब करीत होते. तेही कधी कार्यकारिणीच्या बैठकीला आले नाहीत.

नगरमध्ये त्या काळात क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धा जोरात होती. नियमित होणारी एकमेव स्पर्धा. तिला फार वलय होतं. त्या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी एका वर्षी श्री. जोगदेव ह्यांना बोलावलं. ते आदल्या दिवशीच मुक्कामी आले. एवढ्या वेळा परदेशी, तीन-चार ऑलिम्पिकना जाऊन आले असल्यामुळे त्यांना मांसाहार चालत असेल, असा सगळ्यांचाच समज.

जोगदेवांनी सांगितलं, ‘‘मी शाकाहारी.’’

मला राहावलं नाही. हळूच त्यांना विचारलं, ‘‘मग परदेशांमध्ये कसं मिळतं तुम्हाला जेवण?’’

पाठीवर थाप मारत नि मिश्कील हसत ते म्हणाले, ‘‘तिथं काय खातो ते इथं सांगायचं नाही आणि खायचंही नाही!’’

‘केसरी’तील ‘आजोबा’
जोगदेवांच्या पोतडीत अनेक किस्से होते. मी अधूनमधून प्रतिनियुक्तीवर पुण्यात असायचो. तेव्हा हे किस्से ऐकायला मिळायचे. ‘संपादक असावा तर (चंद्रकांत) घोरपड्यांसारखा!’, हे त्यांचं लाडकं मत होतं. पुढे समजलं की, घोरपडे, ते आणि प्रमोद जोग, अशी ‘केसरी’तील खास गँग होती. पुणे कार्यालयात जोगदेव ‘आजोबा’ म्हणूनच ओळखले जायचे. खेळकर, खट्याळ आजोबा होते ते  - चेष्टामस्करीत रमणारे, ‘आमच्या काळी’चे किस्से सांगणारे, दोन-चार जणांना घेऊन ‘प्रभा’मध्ये वडा खायला जाणारे.

पुण्याच्या राजकारणात त्या वेळी टिळक आणि गाडगीळ असे गट काँग्रेसमध्ये होते. जोगदेव स्वाभाविकपणे टिळक गटात. विठ्ठलराव गाडगीळ त्या वेळी अखिल भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांचे एक-दोन किस्से जोगदेव रंगवून सांगत.

कार्यालयातील फोन किती गांभीर्याने घेतले जातात, ह्याचा जोगदेवांनी एक किस्सा भन्नाटच होता. त्यांच्याच शब्दांत - ‘अरे, मी नॅशनल गेम्ससाठी केरळला गेलो होतो. फोन मिळायची मारामार. काय सांगू, त्या दिवशी तासाभराने फोन लागला. आता झटपट बातमी द्यावी म्हणून म्हणालो, ‘जोगदेव...’ काय गंमत रे... मी बोलतोय म्हणायच्या आधीच पलीकडून उत्तर आलं, ‘ते केरळला गेलेत’ आणि फोन ठेवून दिला खाडकन्!’

असंच एकदा पुणे कार्यालयात असताना दुपारच्या वेळी जोगदेवांकडे कोणी आलं होतं. ते (कबड्डी महर्षी) बुवा साळवी असावेत, असं वाटलं. ते बाहेर गेले आणि जोगदेवांना विचारलं की, ते बुवा होते का? मला ओळख करून घ्यायची होती. त्यांनी लगेच जिन्यात जाऊन बुवांना हाक मारली आणि माझी ओळख करून दिली. नगर जिल्हा कबड्डी संघटनेची धुरा बदलत असल्याची बातमी मला तिथेच बुवा साळवींकडून मिळाली.

क्रीडा आणि युवक कल्याण संचालनालयाचे संचालक कॅप्टन देशपांडे होते. एका अभ्यासासाठी ते तज्ज्ञ परीक्षक म्हणून हवे होते. जोगदेवांना सहज म्हटलं, त्यांच्या भेटीची वेळ मिळवून द्या ना हो. त्या वेळी मी ‘केसरी’त नसतानाही जोगदेवांनी लगेच त्यांच्यासाठी पत्र लिहून दिलं. नव्या, तरुण मुलांशी ते आपुलकीने वागत. शक्य ती मदत करीत.

पुण्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होती. हेमंत जोगदेवांनी मला नगरहून खास बोलावून घेतलं. त्यांचा आवडता खेळ कबड्डी. त्याच्या वृत्तांकनाची जबाबदारी दिली. त्या स्पर्धेसाठी फिदा कुरेशी तज्ज्ञ समालोचक म्हणून लिहिणार होते. त्यांचं ऐकून शब्दांकन करण्याची जबाबदारी माझ्यावर. त्यामुळे फिदाभाईंशी जवळची ओळख झाली.

ऑनलाईन ऑलिम्पिक ज्ञानकोश
मध्यंतरी ‘लोकसत्ता’मध्ये पुण्यात काम करीत असताना पुन्हा संबंध आला. ते एका पाक्षिकाचं काम पाहत होते. त्यासाठी लिहिलं. अगदी अलीकडे ऑनलाईन ऑलिम्पिक ज्ञानकोशाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यात हॉकीचा त्यांनी माझ्यावर सोपवलं. दुर्दैवाने ते काम रखडलं. ते सांगताना ते हताश, निराश झाले होते.

हौशी क्रीडा पत्रकार असताना मला ‘पूर्ण वेळ क्रीडा पत्रकार’ समजणाऱ्या आणि त्याच नात्यातून संवाद साधणाऱ्या व्यक्ती दोन. वि. वि. करमरकर आणि दुसरे हेमंत जोगदेव! बऱ्याच वेळा मला त्यांना सांगावं लागलं की, माझं मुख्य काम हे नव्हतं हो.

क्रीडा पत्रकारितेतील दोन पीठाधीश 
त्या काळातील क्रीडा पत्रकारितेतील ही दोन स्वतंत्र पीठंच जणू. त्यातलं एक पीठ मुंबईचं आणि दुसरं पुण्याचं! स्वाभाविकच ती स्पर्धा होती. हे दोन्ही ‘पीठाधीश’ अनेक स्पर्धांच्या निमित्तानं एकत्र असत. त्या दोघांशीही जवळचे संबंध आले, हे भाग्यचं.

एकाशी गप्पा मारताना दुसऱ्याचा विषय आला नाही, असं क्वचितच होई. त्या गप्पांमधून क्वचित कधी स्पष्ट-अस्पष्ट अशी स्पर्धा जाणवे. पण ती तेवढ्याचपुरती. क्वचित चेष्टाही. पण हेटाळणी, तिरस्कार, द्वेष... अशा भावना त्यात कधी दिसल्या नाहीत.

जोगदेव आणि वि. वि. क., दोघंही एकमेकांचा उल्लेख एकेरी करीत. हे त्यांना ‘करमरकर’, किंवा क्वचित ‘बाळ’ म्हणत. ते मात्र सहसा ‘हेमंत’ असाच उल्लेख करीत. तसं त्यांच्या वयात साधारण एका पिढीचं अंतर. वि. वि. क. पूर्ण वेळ व्यावसायिक पत्रकार. जोगदेव खऱ्या अर्थाने पूर्ण वेळ पत्रकार नसले, तरी त्यांनी काम तसंच केलं.

हे दोन्ही ‘पीठाधीश’ आयुष्याच्या शेवटपर्यंत कार्यरत राहिले, हे समान वैशिष्ट्य. दोघांनाही अजून बरंच काही करायचं होतं. दोघांची लिहिण्याची धाटणी वेगळी. वि. वि. क. शैलीदार. जोगदेव खेळातले बारकावे अधिक टिपणारे. कबड्डी, कुस्ती, फुटबॉल आणि ऑलिम्पिक हे जोगदेवांना सर्वाधिक प्रिय. तुलनेने क्रिकेट त्यांना फारसं आवडायचं नाही. वि. वि. क. क्रिकेटबद्दल लिहीतच.

कबड्डी आणि खो-खो ह्या देशी खेळांसाठी दोघांनी भरपूर काही केलं. त्याबद्दल दोन्ही संघटनांनी, खेळाडूंनी त्यांचं ऋण मानायलाच हवं.

नव्या तंत्रज्ञानाशी, विशेषतः इ-मेल आणि इंटरनेटशी दोघांनाही मैत्री करता आली नाही. वय हेच त्याचं कारण असावं. दोघांनाही व्हॉट्सॲपवरून काही पाठवलेलं चालत नसे. किंबहुना ते ॲप त्यांच्याकडे नव्हतंच.

वि. वि. क. ह्यांना एकदा महत्त्वाचा काही मजकूर इ-मेलने पाठवणं आवश्यक होतं. त्या वेळी त्यांनी एका परिचिताचा इ-मेल दिला. हॉकीचा मजकूर पाठवायचा होतो, तेव्हा जोगदेवांनाही असंच केलं. बहुदा त्यांनी नातीचा इ-मेल कळवला.

आयुष्यभर खेळावर भरभरून लिहूनही ‘डिजिटल’ जगात ह्या दोघांच्या पाऊलखुणा फारशा आढळत नाहीत. वि. वि. क. ह्यांचं वर्षभरापूर्वी निधन झालं, तेव्हा त्यांचं छायाचित्र शोधलं. फक्त ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर एक बरं छायाचित्र सापडलं.

जोगदेव ह्यांचं एकच छायाचित्र आज माहितीच्या महाजालात सापडलं. तेही  ‘ऑन ड्यूटी’ असल्याचं. ‘खेलो इंडिया’च्या २०१९च्या स्पर्धेच्या वृत्तांकनासाठी ते गेले होते, तेव्हाचं त्यांचं अधिस्वीकृतीसह असलेलं हे छायाचित्र आहे. त्या वेळी ते नव्वदीपार होते, हे विशेष!

‘खेलो इंडिया’च्या फेसबुक पानावर श्री. जोगदेव ह्यांचं हे छायाचित्र टिप्पणीसह पाहायला मिळतं. ती इंग्रजी टिप्पणी १३ जानेवारी २०१९ रोजी मोठ्या कौतुकानं लिहिलेली आहे - 
91 yr-old journalist Hemant Jogdeo has an unmatchable passion for sport. In 1976 he became 1st Marathi journalist to cover Olympics. Jogdeo a resident of Pune is proud that #KIYG2019 is being hosted here & praises the event for being a great platform for youngsters.
.............

#क्रीडा #क्रीडा_पत्रकारिता #हेमंत_जोगदेव #केसरी #महाराष्ट्र_केसरी #ऑलिम्पिक #विविक #मराठी_क्रीडा_पत्रकार_संघटना #आजोबा #कबड्डी #कुस्ती

.............

वि. वि. क. ह्यांच्याबद्दलचा लेख वाचण्यासाठी -

https://khidaki.blogspot.com/2023/03/Vi.Vi.Ka..html


Tuesday 30 January 2024

काही अधिक-उणे, बाकी सगळं ओक्के!

विश्व मराठी संमेलन – पर्व दुसरे, दिवस दुसरा व तिसरा


कोणत्याही मराठी साहित्य संमेलनाच्या यशाचं मोजमाप अलीकडे दोन निकषांवर केलं जातं – गर्दी किती जमली 
आणि पुस्तकं किती खपली? हे दोन्ही निकष दुसऱ्या मराठी विश्व संमेलनाला लावणं अवघड आहे. आणि तसंही हे काही निव्वळ साहित्य संमेलन नाही. हे विश्व मराठी संमेलन असल्याचा विसर होऊ न देता निकष लावायला हवेत. पुस्तकांची विक्री न झाल्याची रडकथा एका मराठी दैनिकात मंगळवारी (दि. ३०) प्रसिद्ध झालीच आहे. पहिला म्हणजे अर्थात गर्दीचा निकष लावायचा झाला, तर समारोपाच्या दिवशी सभागृहात ती फार दिसली नाही.

भरगच्च कार्यक्रम असलेलं, रेंगाळलेलं, कार्यक्रमपत्रिका फारशी काटेकोरपणाने अमलात न आलेलं, आळसावलेलं असं हे संमेलन होतं. आणि असं असूनही त्यातले काही कार्यक्रम गाजले. त्यातील बातमीमूल्यामुळे माध्यमांना इच्छा असूनही दुर्लक्ष करता आलं नाही.

महत्त्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजे शेवटचे दोन्ही दिवस संमेलनाच्या व्यासपीठावरून सरकारवर टीका झाली. ती कोणी कितपत गांभीर्याने घेतली, हे यथावकाश कळेल.

दोन वक्त्यांचा टीकेचा सूर
मराठीचा जागर आणि गजर असं बिरूद मिरविणाऱ्या ह्या संमेलनात मराठीबद्दल जनतेपासून राज्यकर्त्यांपर्यंत कोणालाच काही पडलेलं नाही, असा थेट आरोप केला श्री. मिलिंद शिंत्रे ह्यांनी. ते अमेरिकेतील शाळा वगैरे ठीक आहे. आधी महाराष्ट्राकडं लक्ष द्या, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी रविवारी सुनावलं. ह्या दोघांनाही टाळ्या पडल्या.
 
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाचे मानकरी होते राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर. डॉ. माशेलकरांनी ४५ मिनिटांचं भाषण संपवलं, तेव्हा अवघ्या सभागृहातील श्रोत्यांनी उभं राहून त्यांच्याबद्दल वाटणारा आदर व्यक्त केला.
 
स्वतःचा कडवट मराठी असा सुरुवातीलाच उल्लेख करीत राज ह्यांनी मराठी तुमची ओळख आहे; तीच पुसून का टाकता?’ असं विचारलं. (कडवट आणि कडवा ह्या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये फरक आहे, हे कोणी तरी कोणाला तरी एकदा गोडीगोडीत समजावून सांगायला हरकत नसावी!😇)
 
संमेलनात सर्वाधिक दाद मिळविली ती राज ह्यांनीच. त्यांना पाहण्यासाठी, त्यांचे फोटो काढण्यासाठी आधी व्यासपीठावर आणि नंतर मार्गिकेत तोबा गर्दी झाली होती. त्यांनी मांडलेले काही मुद्दे –
Ø  हिंदी आपली राष्ट्रभाषा नव्हे. राष्ट्रभाषेचा निवाडा झालेलाच नाही. हे मी १५-२० वर्षांपूर्वी बोललो तेव्हा लोक अंगावर आले माझ्या.
Ø  महाराष्ट्रातील शहरांमध्ये हिंदी कानावर पडते, तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाते. मराठी समृद्ध भाषा आहे आणि ती घालवण्याचा राजकीय प्रयत्न होत आहे.
Ø  पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा. अन्य जर्मन, फ्रेंच अशा कोणत्याही भाषा शिका हवं तर; पण स्थानिक भाषा शिकलीच पाहिजे. (असा निर्णय सरकारनं घेतल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ह्यांनी नंतर सांगितलं. त्याबद्दल त्यांचे राज ह्यांनी आभारही मानले.)
Ø  पंतप्रधानांना स्वतःचं राज्य, स्वतःची भाषा ह्याबद्दल प्रेम आहे. ते लपून राहत नाही. मग आपणच आपल्या राज्याबद्दलचं प्रेम का लपवतो? प्रत्येक राज्य व देश आपली भाषा आणि आपली माणसं जपतात. मग आपणच गोट्यासारखे घरंगळत का जातो? (ही टीका नाही, तर वस्तुस्थिती आहे.)
Ø  आपण मराठीतच बोलू. समोरच्याला मराठीत बोलायची सवय लावू. तो चुकला तर हसू नका आणि टिंगल करू नका. त्यामुळं ते मराठी बोलायचा संकोच करतात.
 
विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची गरुडझेप असा परिसंवाद असल्याचा उल्लेख कार्यक्रमपत्रिकेत होता. वक्ता म्हणून एकट्या डॉ. माशेलकर ह्यांचं नाव होत. त्यांच्यापर्यंत विषय पोहोचविला होता की नाही, ह्याची शंका यावी. कारण ४५ मिनिटांच्या व्याख्यानात त्यांनी वारंवार मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती असाच उल्लेख केला.

तत्त्वाचा प्रश्न आला की भांडायचं
हळदीच्या  (जिंकलेल्या) लढाईचा डॉ. माशेलकर ह्यांनी आवर्जून उल्लेख केला. ती तत्त्वाची लढाई होती आणि तत्त्वाचा प्रश्न आला की भांडायचंच, हा मराठी बाणा ह्या त्यांच्या टिप्पणीला जोरदार दाद मिळाली. ज्ञानोपासना व देशभक्ती ह्यांचा संगम मराठी माणसांमध्ये आढळतो. तो बाहेर जातो, तेव्हा त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र पोहोचत असतो, असं ते म्हणाले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी सहाच्या सुमारास संमेलनस्थळी आले. मी चांद्याचा आणि केसकर बांद्याचे. त्यामुळे हे संमेलन चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या मराठी माणसांचे आहे, अशी कोटी त्यांनी केली. त्यांच्या उपस्थितीत मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळालेल्या सनदी अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर ह्यांना आमच्या विदर्भाचे फडणवीस अशी ओळख सांगण्याचा मोह आवरता आला नाही! ‘सर्व नवीन गोष्टींना फडणवीस ह्यांचा पाठिंबा असतो. महाराष्ट्राला लाभलेल्या व्हीजनरी मुख्यमंत्र्यांपैकी एक, असा गौरव मंत्री व संमेलनाचे यजमान दीपक केसरकर ह्यांनी केला.
 
इंग्रजीच्या विरोधाचा सूर अशा संमेलनांच्या व्यासपीठावर कायमच लागताना दिसतो. त्याला छेद देत श्री. फडणवीस म्हणाले, इंग्रजी व्यवहारभाषा झाली आहे. मुलांना हवं तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाका; पण घरी मराठीतच बोला.
 
मराठी मातीमध्येच वैश्विकता आहे. महाराष्ट्र जगाच्या पाठीवर कोठेही दिसतो. मराठी सनातन आणि शाश्वतही आहे. मराठी भाषा विद्यापीठाने जगभरातील मराठी माणसांशी आणि संस्थांशी जोडून घ्यावे, असं श्री. फडणवीस म्हणाले.
 
मराठी मानकांचं जतन
श्री. फडणवीस ह्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. मराठी माणसाच्या पराक्रमाच्या खुणा आणि मानके देशभर आहेत. ती आपला स्वाभिमान वाढविणारी आहेत. त्या मानकांचं जतन केलं जाईल.

व्यवहारात मराठीचा वापर आणि अर्थार्जनाची भाषा ह्या चांगल्या विषयावरची दोन वक्त्यांची चर्चा श्री. फडणवीस ह्यांचं स्वागत करण्यासाठी गुंडाळली गेली. हे वक्ते होते, भारतीय विदेश सेवेतील निवृत्त अधिकारी व ज्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केलं आहे ते ज्ञानेश्वर मुळे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (पहिल्यांदाच) मराठी माध्यमातून देऊन तिसरा क्रमांक मिळविलेले श्री. भूषण गगराणी. ह्या दोघांचंही मूळ पीठ कोल्हापूर. त्याचा स्वाभाविकच उल्लेख झाला. श्री. गगराणी म्हणाले की, मराठीतून शिकण्याबद्दल न्यूनगंड वगैरे बाळगण्यासारखी स्थिती कोल्हापुरात नाही. तोच राजमार्ग आहे. तिथं कोणतीही भाषा मराठीतूनच बोलली जाते!
 
श्री. मुळे ह्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे –
Ø  जगात इंग्रजी महत्त्वाचं आहे, पण अनिवार्य नाही. आपली भाषा वापरणारे देशच (किंवा प्रदेशही) सर्वांगीण प्रगती करू शकतात. आपली अर्थार्जनाची भाषा मराठीच आहे. भाषेच्या प्रचारावर लक्ष केंद्रित न करता कला-संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न करायला हवेत.
Ø  प्रभावशाली व्यक्ती व संस्था व्यापक प्रमाणात असणं आवश्यक आहे. आपली प्रभावी माणसे जगभर असावीत. दिल्लीत पूर्वी फार कमी मराठी अधिकारी होते. आता ही संख्या साडेतीनशेच्या घरात आहे.
Ø  भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सरकार व नागरिक ह्यांनी एकत्र आलं पाहिजे. देशातील महत्त्वाच्या १० विद्यापीठांमध्ये मराठी अध्यासन तातडीने सुरू करायला हवे. त्यासाठी काटकसरी स्वभाव बदलून पैसे खर्च करायला शिकायला हवं.
Ø  तुमचे राजदूत परदेशात आहेत, त्याही पेक्षा देशाच्या विविध प्रांतांमध्ये आहेत. ह्या जवळपास दोन कोटी मराठी माणसांचा आपण मराठीसाठी उपयोग करीत नाही. त्यामुळे ही माणसे, त्या प्रदेशातील संस्था बदलून अमराठी होत आहेत.
Ø  देशभरातील मराठी संस्थांना, शाळा-महाविद्यालयांना सरकारने (आर्थिक) बळ दिलं पाहिजे.
Ø  मराठी माणसं बहुसंख्येनं असतील, तिथे आपले लोकप्रतिनिधी असावेत.
Ø  मराठी माणूस व्याकरणाची उत्तम जाण असलेला आहे. इतर राज्यांहून आपल्याकडे ज्ञानाच्या अनेक शाखा उपलब्ध आहेत. मराठी माणसाचं पाऊल आत्मविश्वासानं पडलं पाहिजे.
 
श्री. गगराणी ह्यांनी मांडलेल्या ठळक गोष्टी -
Ø  अर्थार्जनाचा आणि भाषेचा काय संबंध? रोजगार, व्यवसाय वा अर्थार्जन केवळ भाषेमुळे करता येत नाही. त्यासाठी विविध क्षमता आवश्यक असतात. त्या वाढवाव्या लागतील.
Ø  केवळ भाषिक जाणीव किंवा अस्मिता वाढल्याने अर्थार्जन वाढणार नाही.
Ø  आघाडीवर असलेल्या देशाची भाषा आर्थिक विश्वाची भाषा असते. ती स्वीकारण्यात कमीपणा वाटू नये.
Ø  मराठी माणूस कमी तडजोड करणारा आणि भूमिका घेणारा.
Ø  भाषेच्या विकासात संस्थात्मक उभारणी महत्त्वाची. विश्वकोश मार्गी लावणं हे महाराष्ट्राचं फार मोठं काम आहे.
Ø  भाषा समाजाचा अंगभूत घटक आहे. तो केवळ सरकारचा विषय नाही. सरकार व्यवस्था करू शकतं, ती पुढे नेणं ही समाजाची जबाबदारी.
 
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मराठी भाषा भवनाचं सादरीकरण झालं. श्री. दीपक केसरकर ह्यांनी तिन्ही दिवस सातत्यानं ह्या भवनाची माहिती दिली. मराठीविषयक सर्व कार्यालये ह्या एकाच इमारतीत असतील. मराठीच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी ह्या भाषा भवनाचा उपयोग होईल, असं त्यांनी आग्रहानं सांगितलं.


ह्याच सत्रात श्राव्य ज्ञानेश्वरीचं प्रकाशन झालं. एकूण ५२ तास ऐकता येईल, अशी ही ९ हजार ३३ ओव्यांची ज्ञानेश्वरी राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकूण २२ गायकांच्या आणि ५० जणांच्या चमूच्या मदतीनं हे श्राव्य पुस्तक साकारणारे संगीतकार राहुल रानडे ह्यांनी त्यासाठी मदत केलेल्या सर्वांचा अतिशय कृतज्ञतेने उल्लेख केला. त्यांचं पुढचं स्वप्न आहे तुकाराममहाराजांची गाथा अशीच उपलब्ध करणं. त्याचा व्याप असेल – ४५ हजार अभंग, १५ संगीतकार आणि १०० गायक!
 
तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा वापरविषयावरचा परिसंवाद तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात झाला. त्यात मिलिंद शिंत्रे, डॉ. आशुतोष जावडेकर व सुयोग रिसबूड सहभागी झाले. तुम्ही मराठी लोक कोणत्या क्षेत्रात पुढं आहात? काही विचारलं की भूतकाळाकडे बोट दाखविता!’, ह्या अन्य भाषकांच्या सततच्या खिजवण्यामुळे आपण जगातलं सर्वांत मोठं शब्दकोडं बनवलं, असं श्री. शिंत्रे म्हणाले.
 
दृश्यात्मकतेचं आव्हान
ह्या व्यासपीठावर सर्व भाषा समभावाची भूमिका मांडताना डॉ. जावडेकर म्हणाले, जो माणूस कोणत्या एका भाषेवर प्रेम करतो, तो अन्य कोणत्या भाषेचा दुःस्वास करूच शकत नाही. कंटेन्टबद्दल मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल ते म्हणाले की, तुमची अभिव्यक्ती मनापासूनची असेल, तर समोरच्याला ती आवडतेच. तुम्ही मांडता, दाखविता ते सजीव आणि सच्चं असेल, तर त्याचा आस्वाद घेणाऱ्याची दाद मिळतेच. दृश्यात्मकतेची व्यापकता सर्वच भाषांसाठी वर्तमानातलं आणि भविष्यातलं मोठं आव्हान आहे.
 
मराठी भाषेपेक्षा मराठी जनांची भावना खूप महत्त्वाची वाटते, असं श्री. रिसबूड म्हणाले. स्मृतिरंजनाची भावना सर्व पिढ्यांतील लोकांना खेचून घेते. ह्या प्रवासात विविध प्रयोग केल्याचं त्यांनी सांगितलं.

कंटेन्ट तयार करताना प्रेक्षकवर्गाची गणितं कशी संभाळता, ह्याला उत्तर देताना श्री. शिंत्रे ह्यांनी षट्कारामागून षट्कार लगावले. त्यांनी व्यक्त केलेला संताप प्रामाणिक होता; त्या मागची चीड स्पष्टपणे दिसत होती. ते काय म्हणाले?
Ø  मराठी माणसांना भाषेबद्दल काही सांगणारे, प्रामाणिक प्रयत्न आवडत नाहीत. त्यांना सवंग मनोरंजन, अरबट-चरबट व्हिडिओ आवडतात.
Ø  प्रत्येक मराठी वृत्तपत्राला आणि वृत्तवाहिनीला आपल्या भाषेविषयी अनास्थाच आहे. ते फक्त धंदा करायला बसले आहेत. कोणत्याही वृत्तपत्राच्या कोणत्याही पानात भाषेविषयीच्या किमान पंचवीस चुका आढळतील. हे वर्षानुवर्षं चालू आहे. वृत्तपत्रे, वाहिन्या ह्यांना भाषेबद्दल अजिबात कळवळा नाही.
Ø  राजकीय पातळीवरही कोणाला भाषेचं काही पडलं नाही. मराठी दिनाच्या कार्यक्रमात मी मंत्रालयचा अर्थ विचारला. तो कोणालाच सांगता आला नाही. मंत्र्यांचं आलय असाच व्याकरणदृष्ट्या चुकीचा अर्थ त्यांनी सांगितला. मंत्र म्हणजे विचारविनिमय जिथे होतो ते मंत्रालय’!
Ø  शालेय पुस्तकांमध्येही चुकीचंच मराठी दिसतं.
 
ह्या संमेलनासाठी विविध देशांमधून आलेल्या मराठी माणसांनी तिन्ही दिवस आपले अनुभव सांगितले. त्यात मराठी शाळा आणि शिवछत्रपतींच्या विचाराचा गजर, हे दोन मुद्दे ठळकपण जाणवले. उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे, अर्थात बीबीएमचे उपक्रम अधिक व्यापक असल्याचं दिसलं. मराठी उद्यमशीलतेला गती देण्याचं उद्दिष्ट असलेल्या गर्जे मराठी ग्लोबलच्या कामाचं स्वरूपही सांगण्यात आलं. सध्या सर्वांमध्येच ज्याची चर्चा जोरात चालते, त्या कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) विषयाचं स्पष्टीकरण करणारं पुस्तक मराठीतून प्रकाशित होणार आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवे कल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं, श्री. माधव दाबके ह्यांनी सांगितलं.
 
सरकारी खाक्याची चुणूक
संमेलन सरकारी असल्याची जाणीव अवचितपणे होत होतीच. संमेलनास रोज येणाऱ्यांनी भ्रमणभाष क्रमांक लिहून स्वाक्षरीसह वहीत नोंद करणं आवश्यक होतं. संजय भास्कर जोशी व मंगला गोडबोले कार्यक्रमासाठी वाट पाहत प्रेक्षकांमध्ये बसल्या होत्या. त्यांच्यापुढेही ती नोंदवही सरकावण्यात आली. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे पहिल्याच सत्रातील परिसंवाद सहभागी होऊन परत निघाले होते. कोणी तरी त्यांना वाटेतच थांबवून ती वही पुढे केली आणि त्यांच्या उपस्थितीची कागदोपत्री अधिकृत नोंद केली! मराठी मराठी असा जयघोष चाललेल्या संमेलनासाठी आलेल्या अनेकांच्या ह्या नोंदवहीतील स्वाक्षऱ्या इंग्रजीत आणि भ्रमणभाष क्रमांक त्याच इंग्रजी आकड्यांत होते.

बाकी मग एवढं नक्की म्हणता येईल, काय संमेलन, काय जेवण, काय थाट... सगळं कसं एकदम ओक्के!’
…..
#मराठी #विश्व_मराठी_संमेलन #मराठी_माणूस #ज्ञानेश्वरी #डॉ._माशेलकर #देवेंद्र_फडणवीस #दीपक_केसरकर #राज_ठाकरे #ज्ञान_तंत्रज्ञान #मराठी_भाषा #अर्थार्जन
....
पहिला भाग इथे वाचता येईल -
https://khidaki.blogspot.com/2024/01/Vishwa-Marathi.html

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...