Friday 22 March 2024

अरविंदा? ...गोविंदा!

 

(दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांना अटक झाल्याची बातमी वाचली आणि बरोबर दहा वर्षं आणि एक महिन्यापूर्वी लिहिलेली ही रचना आठवली. प्रस्थापित लोकशाहीतील बड्या खेळाडूंविरुद्ध ते लढतील, त्यांना नडतील आणि  अंतिमतः जिंकतील, असा (भाबडा) विश्वास वाटत होता. त्याच अपेक्षेतूनच हे लिहिलं होतं. नंतर जे काही घडत गेलं, त्यातून राजकारण आपल्याला कळत नाही,
हा समज दृढ झाला.)


आलाय खेळात
घेऊ या घोळात
देऊ या दणका
दिल्लीच्या बोळात

पाठिंब्याचा झोका
दिला एक मोका
सापडल्या क्षणी
मारू मस्त ठोका

आपलाच खेळ
आपलाच मेळ
घुसला हा कसा
घातलान् घोळ

खुर्चीवर बसतो
रस्त्यावर येतो
लाल दिवा फुंकून
धरणे कसा धरतो

विनाशर्त खास
समर्थनाचा गॅस
परि सोडेचिना
लोकपालाचा ध्यास

आधी धरली गल्ली
आता लक्ष्य दिल्ली
हमसे ही म्यांव
अरे! अपनीच बिल्ली

वाटले होते कोंडू
खोड याची मोडू
कचऱ्यातच काढतोय
हाती घेऊन झाडू

त्यांची मेणबत्ती
ह्यांची उदबत्ती
म्हणाला, खाली
लगाव बत्ती!

अण्णांचा चेला
सवाई निघाला
रामलीला करून
लईच पुढे गेला

कुणी जुने तपस्वी
काही नवे तेजस्वी
विरोधाला पुरून उरे
केवढा हा मनस्वी

वाटले होते गोड
लागेल त्याला खुर्ची
भलतीच की तिखट
निघाली ही मिर्ची

कुछ पाने के लिए
पडता है कुछ खोना
मुख्यमंत्रिपद त्यजून
प्रधानमंत्री है बनना?

सत्तेचे लोणी
सोडतोय कोणी
झालाय गोविंदा...
अरे, हा तर अरविंदा!

उद्याचे कोणी
सांगावे काय
प्रस्थापितांना होईल
दे माय धरणी ठाय

बाप रे बाप
आप रे आप
`व्यवस्थे`च्या
डोक्याला ताप!
.
.
.
परिवर्तनाची चाहूल?
की पुन्हा एक हूल?
होणारेय ऑपरेशन?
की नुसतीच भूल?
.....................

© - अचंबित नि स्तंभित आम आदमी
पंधरा/फेब्रुवारी/चौदा
................................................

(काही सोप्या शब्दांची कठीण स्पष्टीकरणे देणारा एफआरआय -
तपस्वी - यांनी सव्वाशे वर्षे तप केल्याचे तेच सांगतात. त्यामुळे तपोभंग न करता सत्तासुंदरीरूपी मेनका साठ वर्षं यांच्या अंगाखांद्यावर खेळत जनतेला डोळा मारते आहे.
तेजस्वी - अशाच एका (पण तेवढ्या नव्हे) जुन्या `राष्ट्रीय` संघटनेची ही नव्याने स्थापन झालेली `शाखा` आहे म्हणतात.
मेणबत्ती आणि उदबत्ती - खरे तर शेवटच्या ओळीतील `बत्ती` शब्दाशी यमक जुळवण्यासाठी या दोन अनुक्रमे प्रकाशमान करणाऱ्या व सुगंधित करणाऱ्या वस्तू आणल्या आहेत. त्यांचा गिरिजाघरे किंवा मंदिरे याच्याशी नाहक संबंध जोडू नये. आणि गिरिजाघरे वा मंदिरे यांचा संबंध त्या एकाच (बद्द) नाण्याच्या दोन बाजू असलेल्या पक्षांच्या माणसाशी जोडू नये.
गोविंदा होणे - लोचा होणे. आणि लोचा होणे? अर्थातच गोविंदा होणे!!)
....

#अरविंद_केजरीवाल #दिल्ली #मुख्यमंत्री #आप #आम_आदमी

No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...