Friday 28 January 2022

ए. आय. आणि आय. आय. : पेन ते वांगे

 


फेसबुकवर बऱ्यापैकी नियमित छोटं-मोठं लिहितोय सध्या. आता अगदी दोन दिवसांपूर्वी हस्ताक्षरदिनाचं निमित्त साधून लिहिलं. त्यात पेनाचा (म्हणजे तो नसल्याचा) उल्लेख केला. ह्या पोस्टनंतर एका दिवसांतच मला पेनांच्या जाहिराती दिसू लागल्या. त्याच्या किमतीही हजारांपासून लाखापर्यंत. 'लाखाची ऐपत असती, तर फुकाची पोस्ट कशाला टाकली असती?', असं त्यावर लिहिलं. त्यावर (फेसबुक) मित्रांनी हसून घेतलं. (गरिबावर काय कुणी हसतं... आणि त्यातही पेन नसल्यानं लिहू न शकणाऱ्यावर तर खदाखदा!)

त्याच्या आधी मंडईबद्दल लिहिलं होतं. त्याचा विषय खरं तर वेगळाच होतो. नेहमीप्रमाणेच भरकटायला झालं. नमनाला धडाभर तेल नेहमीच जातं आपलं. (त्याचं ताजं उदाहरण म्हणजे हेच की!) चिकू घ्यायला लावणाऱ्या आणि तलाठी असूनही पैसे न खाणाऱ्या मुलाचा अभिमान बाळगणाऱ्या मावशी. त्यानंतर 'तलाठी परीक्षेत हमखास यश', 'घोलवडचे चिकू' किंवा 'घरपोहोच भाजी' अशी काही जाहिरात दिसली नाही. का बुवा दिसली नसावी? फेसबुकच्या 'अल्गोरिदम'मध्ये ते नसणार बहुतेक.

मंडईचा विषय निघाला आणि वांग्याला टाळून गेलो, असं कधी होणारच नाही. 'भाजीत भाजी वांग्याची...' असा उखाणा घेतल्याचं आठवत नाही बुवा. पण वांगी फाssर प्रिय आहेत! त्याच्यावर लिहिलेला मोठ्ठा लेख ह. मो. मराठे ह्यांनाही आवडला होता. ('वांग्यावर कधी एवढा मोठा खुसखुशीत लेख लिहिता येईल, ह्याची कल्पनाही केली नव्हती,' असं काहीसं त्यांनी 'शब्दसंवाद'चा परिचय करून देताना लिहिलं होतं. त्या पुस्तकाबद्दल लिहिलेल्या लेखाचा दुवा शेवटी दिला आहे.) विषय वांग्याचा आहे. चतुर्मासात वर्ज्य मानली गेलेली वांगी आता बारोमास मिळतात. पण त्यांचा खरा हंगाम दिवाळीनंतर मार्च उजाडेपर्यंत. पूर्वीएवढ्या कडकपणे चतुर्मास पाळला जात नसला आणि वांगी सरसकट श्रावण-भाद्रपदात खाल्ली जात असली, तरी एरवी मिळणारी वांगी आणि ह्या हंगामातली वांगी ह्यात फरक असतोच. भावात, दिसण्यात आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चवीत.

यंदा हवामान विचित्रच आहे. थंडी, पाऊस, ढगाळ, वारं, उन्ह... सारखा बदल.  ह्याचा फटका (नेहमीप्रमाणेच) शेतकऱ्यांना बसला. भाजीपाल्याचं पीक त्यात होरपळलं. चार वर्षांत कधी नव्हत्या एवढ्या भाज्या महाग झाल्या. तेही ऐन हिवाळ्यात - त्या मुबलक, ताज्या टवटवीत आणि स्वस्त असण्याच्या काळात.

चंपाषष्ठीला वांगी महाग असणं गृहीत होतं. खंडोबाला बाजरीच्या रोडग्याचा-भरताचा नैवेद्य दाखवल्यावर वांगी स्वस्त होतात. नेहमीप्रमाणेच यंदाही तेच होईल, असं वाटलं. नाही झालं ना. भोगीपर्यंत वांगी चढीच राहिली. भोगीच्या आदल्या दिवशी तर दीडशे रुपये किलो! (खेंगट ही यंदाची सर्वांत महागडी घरगुती डिश असणार.)

ह्याच दरम्यान कधी तरी एका मित्राशी जिव्हाळ्याच्या, म्हणजेच जिव्हालौल्याच्या विषयावर बोलत होतो. भाज्या, त्यांचे वाढते भाव ह्या मुद्द्यावर गाडी आली. भाव चढे असू द्यात हो; पण तेवढे दाम मोजूनही काटेरी, छोटी, तेल ओतल्यासारखी वांगी मिळतच नाही, असं मी तक्रारीच्या सुरात सांगत होतो.

माझ्या म्हणण्याला सहमती दर्शवत मित्र म्हणाला, ''खरंय. मला मात्र एक वांगेवाला भेटला. तो एकदम मस्त वांगी देतो. भाव तुमच्या नगरएवढाच. पण एक वांगं किडकं निघणार नाही.'' त्याच्या ह्या वांगे-भाग्याबद्दल स्वाभाविकच थोडी असूया वाटली. त्याला हवी तशी वांगी सहज देणारा हा शेतकरी ऐन कोविडच्या काळात औषधाचं दुकान सोडून शेतीकडे वळलेला. दुकान मुलाकडे सोपवलं आणि त्यानं आपल्या छंदाकडं लक्ष द्यायला सुरुवात केली.

आमच्या बोलण्याला बरेच दिवस होऊन गेले. चंपाषष्ठीनंतरचं बोलणं ते. त्या मित्राचा आज भल्या सकाळी फोन आला. नव्या दिवसाला सामोरं जाण्यासाठी मी काही सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत तयार झालेलो नसतो. नुकताच उठून आज काय करायचं (आणि त्यातलं काय टाळायचं.), ह्याची आखणी करण्याचा विचार करत असतो. एवढ्या सकाळी गप्पा मारण्याची मनाची तयारी नसती. ह्या मित्राला काही तरी राजकीय विषय सांगायचा असेल, काही तरी गंमत सांगायची असेल, अमूक एक बातमी वाचली का असं विचारायचं असेल... अशा वेगवेगळ्या शक्यतांपैकी एखादी किंवा आणखी भलतंच काही असेल, असं समजून फोन वाजू दिला.

सगळं आवरून झाल्यावर त्याला फोन लावला. पलीकडून तो म्हणाला, ''इथून वांगी नगरपर्यंत पाठवली, तर घेऊन जाण्याची सोय कराल का?'' नगरपासून त्याचं गाव साधारण साठ-पासष्ट किलोमीटर. त्याच्या गावचा आज आठवडे बाजार. सकाळी सकाळी बाजारात गेल्यावर त्याला माझ्या मनातली वांगी दिसली. तिथंच थांबून त्यानं फोन लावला. एक-दीड किलो वांगी घेऊन कुणाबरोबर तरी पाठवून देतो. तुम्ही फक्त बसस्थानकावर किंवा एखाद्या महत्त्वाच्या जागी या आणि त्या माणसाकडून ती घेऊन जा, असा त्याचा आग्रह होता.


छायाचित्र सौजन्य : शटरस्टॉक

मला भरूनच आलं हो! उत्तम दर्जाची वांगी एका खवय्याला पाठविण्याची बुद्धी त्याला कोण देत होतं कुणास ठाऊक!! त्याच्या उत्साहाला आवर आणि आपलेपणाच्या खळाळत्या झऱ्याला बांध घालत मी नकार दिला. कारण ह्याच आठवड्यात दोन वेळा आवडतात तशी मस्त वांगी मला मिळालेली आहेत.

पेनाच्या जाहिराती दिसतात, असं फेसबुकवर लिहिल्यानंतर एक मित्रानं प्रतिक्रियेत म्हटलं - ही ए. आय.ची (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कमाल.

मनातली वांगी अशी साठ किलोमीटरवरून घरपोहोच येत होती. ही कसली किमया? ही तर आय. आय. ची (इंट्युटिव्ह इंटेलिजन्स) कमाल!!

---------

'शब्दसंवाद'बद्दल लिहिलेला लेख - 'पहिल्यावहिल्याची पहिली गोष्ट'

https://khidaki.blogspot.com/2015/06/blog-post.html

.....

#AI #I_I #intution #vegetables #facebook #brinjal #vegetable_market #facebook_friends #मंडई #भाजी #वांगी

Monday 24 January 2022

निमित्त एका गाण्याचं...


'जल बिन मछली...'मधल्या
एका गाण्यामुळं हे सगळं लिहिलं!

हजारो नव्हे, लाखो गाण्यांचं भांडार असलेली संकेतस्थळे उपलब्ध आहेत. वेळ कसा घालवायचा, असं कुणी विचारलं तर सांगतो, 'ह्या संकेतस्थळांना भेट द्या. शंभर वर्षांचं आयुष्य लाभलं आणि दिवसातले बारा तास निव्वळ गाणी ऐकवण्यात घालवले तरी एक संकेतस्थळही संपणार नाही. आता एवढं ऐकायला उपलब्ध आहे.'

'रोज एवढा वेळ गाणी ऐकून बहिरेपण तेवढं येईल!' जन्मजात औरंगजेब असलेला मित्र त्यावर म्हणाला.

सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. अर्थात गाण्याचाच आहे. एखादं गाणं अचानक मनात आलं, तर ते ऐकण्यासाठी आता वाट पाहावी लागत नाही. चुटकीसरशी शोधून ऐकता येतं. मध्यंतरी अशी आवडती गाणी शोधून ऐकत होतो. काही वेळा तर एकच गाणं सलग पाच-सहा वेळा ऐकत होतो. उदाहरणार्थ - कारवाँ गुज़र गया... (आता हे लिहिल्यावर ऐकावंच लागेल.), ना. घ. देशपांडे ह्यांच्या कविता, तलत महमूद, मन्ना डे, महंमद रफी, मीना कपूर. त्या बाईंची 'कच्ची है उमरिया...' आणि 'रिमझिमी बरसे पानी...' कमीत कमी तीन वेळा ऐकल्याशिवाय पुढं जातंच नाही.

तरीही सांगायचा मुद्दा आणखीनच वेगळा आहे. आणि अर्थात तोही गाण्यांचाच आहे, हे उघडच.

ही झाली माहीत असलेली गाणी. आठवण झाली की, शोधून मुद्दाम ऐकलेली. पण अत्यंत  आवडतं गाणं अनपेक्षितरीत्या ऐकायला मिळण्यात वेगळी मजा असते. त्यानं तृप्त व्हायला होतं. दिवसभर ते गुणगुणलं जातं. कधी कधी ते गाणं मनाच्या सांदीत कुठं तरी दडलेलं असतं. रेडिओवर ऐकायला मिळतं नि लक्षात येतं की, हेही आपलं आवडतं गाणं आहे की. अशीही काही गाणी असतात की, ती आपण पहिल्यांदाच ऐकत असतो आणि तरीही आवडून जातात.

हे सगळं घडतं रेडिओ-कृपेने. स्मरणरंजन किंवा (वय झाल्यावर येणारे) आठवणींचे कढ म्हणून नाही, पण पस्तीस-एक वर्षांपूर्वी रेडिओ सच्चा साथी होता. सी. रामचंद्र ह्यांचं निधन झाल्यानंतर त्यांची बहुतेक गाणी आकाशवाणीच्या इंदूर केंद्रावरच्या 'आपली आवड'सारख्या 'मनभावन' कार्यक्रमात ऐकली. उरलेली गाणी ऑल इंडिया रेडिओवरच्या उर्दू सर्व्हिसवर. मग सी. रामचंद्र लाडके बनले. 'कितना हंसी है मौसम...' पहिल्यांदा ऐकताना तलतच वाटतो.

तेव्हा घरी रेडिओ होता. मध्यम लहरी व लघु लहरींवरची केंद्र ऐकवणारा. रात्री साडेदहा ते साडेअकराला पाच मिनिटे बाकी असेपर्यंत उर्दू सर्व्हिसवर 'तामील ई इरशाद', मग बारा ते साडेबारा कव्वाल्या आणि साडेबारा ते एक कर्णमधुर जुनी गाणी ऐकायला मिळत. नव्वदीच्या (माझ्या वयाच्या नव्हे तर सनाच्या! 😂) आसपास रेडिओची संगीत सुटली.

नोकरीत थोडं रुळल्यानंतर मोठ्या हौसेनं चार बँडचा मोठ्ठा रेडिओ घेतला. तोवर लघु लहरींवरची केंद्र ऐकायला त्रास होऊ लागला होता. मध्यम लहरीवरचं पुणे केंद्रच नीट ऐकायला मिळत नव्हतं; मग मुंबई, नागपूर, जळगाव, इंदूर केंद्रं तर लांबच. रेडिओ सिलोन, उर्दू सर्व्हिसही कानांच्या टप्प्यांच्या पार पल्याड गेली.

मित्रानं सहा महिन्यांपूर्वी भेट दिली एक. 'हे अलेक्सा...' म्हटलं की, हवं ते ऐकवणारी भेट. रात्रीच्या वेळी मी अलेक्साला विविध भारती ऐकवण्याची विनंती करू लागलो. अगदी परवा परवा शोध लागला की, अलेक्सा उर्दू सर्व्हिसही ऐकवते. आज तेच ऐकत बसलो होतो. अचानक एक गाणं लागलं. चाल ओळखीची वाटत होती. शब्द मात्र नव्हते. एकाच चालीत बांधलेली वेगवेगळी गाणी असावीत. ते ओळखीचं अन् हे अनोळखी, असं मनाला समजावलं.



गाणं होतं 'जल बिन मछली नृत्य बिन बिजली'मधलं. मजरूह ह्यांच्या शब्दांना लक्ष्मी-प्यारे ह्यांनी चाल लावलेली. आवाज आहे माझा लाडका मुकेश आणि लता ह्यांचा. अतिशय साधा संगीत साज असलेलं गोssड गाणं - 

बात है एक बून्द सी दिल के प्याले में
बात है
बात है एक बून्द सी दिल के प्याले में
आते आते होठो तक तूफान
न बन जाये न बन जाये
बात क्या तूफा में जो जीने का सामान
न बन जाये न बन जाये बात क्या
अरमा वो क्या दिल के लिए बात क्या...

ही एवढी लांबड वाचल्यावर त्यावरचा उतारा म्हणून ते गाणं ऐकण्याचा मोह तुम्हालाही झालाच तर...
https://www.youtube.com/watch?v=NWenI5FYqag
------

(लता व मुकेश ह्यांचे छायाचित्र सौजन्य - myviewsonbollywood.wordpress.com)

#गाणी #आठवणी #रेडिओ #आकाशवाणी #मनभावन #रेडिओ #जल_बिन_मछली_नृत्य_बिन_बिजली #AIR #IndoreAIR #HindiSongs
---


Tuesday 4 January 2022

'हिंडता फिरता' अध्यक्ष उदगीरला लाभता

 


'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्यांचा खाक्या असतो. उदगीरच्या निमित्तानं ते (पुन्हा एकदा) सिद्ध झाल्याचं दिसून येतं.

उदगीर बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पण साहित्य संमेलनाशी संबंधित असणाऱ्यांना माहिती हवीच ती गोष्ट म्हणजे उदगीरला 'डोळे सरांचं कॉलेज' आहे. 'प्राचार्य' हे त्यांचं पुस्तक 'वाचलंच पाहिजे' ह्या प्रकारात मोडणारं. लातूर जिल्ह्यातील ह्या तालुक्याच्या मुख्यालयी दोन-अडीच महिन्यांत कधी तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याच्या अध्यक्षाची निवड नव्या वर्षातल्या पहिल्या रविवारी एकमताने झाली.


(छायाचित्र सौजन्य marathi.abplive.com)
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नव्या प्रथेनुसार संमेलनाध्यक्षाची निवड बिनविरोध किंवा 'एकमताने' झाली. प्रसिद्ध लेखक भारत सासणे ह्यांना हा बहुमान मिळाला. त्यासाठी त्यांना त्यांच्या कथांप्रमाणेच प्रदीर्घ वाट पाहावी लागली. आता सत्तरीत असले, तरी श्री. सासणे 'हिंडते-फिरते' आहेत. 'संमेलनाचे अध्यक्ष हिंडते-फिरते असावेत,' असं थेट विधान श्री. ठाले पाटील ह्यांनी नाशिकला नोव्हेंबरमध्ये झालेल्या संमेलनातच केलं. ते काही म्हणाले आणि त्यावरून वादंग उठलं नाही, असं होण्याची शक्यता कमीच. त्यानुसार त्यांचं हे वक्तव्यही गाजलं. नाशकात त्यांनी जे 'बोलून दाखवलं' तेच उदगीरमध्ये 'करून दाखवलं'! महामंडळाचं मुख्यालय औरंगाबादला, संमेलन उदगीरला आणि अध्यक्ष (मूळचा) जालना जिल्ह्यातला, असा मराठवाड्याला हवाहवासा योग जुळून आला. लागोपाठच्या तीनपैकी दोन संमेलनं मराठवाड्याला मिळाल्यामुळं ह्याबाबतीतला अनुशेष तरी काही प्रमाणात कमी झाला असावा.

साहित्य संमेलन, अध्यक्षाची निवड, उद्घाटकाची निवड, राजकारण्यांची (व्यासपीठावरची) उपस्थिती... ह्या साऱ्या नेहमीच्या वादाच्या गोष्टी ठरत आलेल्या आहेत. त्यात आता नावीन्य काही राहिलेलं नाही. कोरोनाच्या कृपेमुळे नाशिकचं संमेलन लांबणीवर पडलं. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांतच (मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला) पुढचं संमेलन होईल. त्यामुळे चर्चा तर चालूच राहणार...

नाशिकच्या संमेलनाला अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर उपस्थित राहिलेच नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांचं अध्यक्षीय भाषण झालं खरं. पण 'अध्यक्ष तो दिसतो कसा आननी'चं औत्सुक्य शमलंच नाही. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीच्या भावनेला डॉ. ठाले पाटील ह्यांनी वाट करून दिली असावी. अध्यक्षांची अनुपस्थिती त्यांच्यासह संयोजकांनाही अनपेक्षित नसावी.

डॉ. जयंत नारळीकर ह्यांची अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हाच शंका वाटली होती की, संमेलनाचे तिन्ही दिवस ते हजेरी लावतील का? त्यांना जमेल का? अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा चालू असताना 'काही मुद्दय़ांवर स्पष्ट राहून डॉ. नारळीकर यांनी या प्रस्तावाला होकार दिला आहे,' अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. ह्याच संदर्भात दैनिक लोकसत्तामधील बातमी (दि. १५ जानेवारी २०२१) पुन्हा पाहण्यासारखी आहे - वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांना तीनही दिवस तेथे उपस्थित राहणे शक्य होणार नाही. पहिल्या दिवशी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे, त्या दिवशी उपस्थित राहून ते अध्यक्षीय भाषण करू शकतात. नंतरच्या दिवशी त्यांचे ऑनलाइन व्याख्यान किंवा मुलाखत घेता येणे शक्य होईल; पण तीनही दिवस अध्यक्षाने उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा परामर्श घ्यावा किंवा त्यावर आपली टीकाटिप्पणी करावी, अशी अपेक्षा असेल तर ते शक्य होणार नाही, हे स्पष्ट केले आहे, असे डॉ. मंगला नारळीकर यांनी सांगितले.

ही बातमी पुरेशी बोलकी आहे. संमेलनात पूर्ण काळ उपस्थित राहण्यासाठी डॉ. नारळीकर ह्यांची प्रकृती साथ देणारी नाही, हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं. अशा परिस्थितीत त्यांनीच अध्यक्ष व्हावे, हा हट्ट कशासाठी होता, हे जाणून घेण्यासाठी त्या पंधरवड्यात मी अनेकांशी संपर्क साधून बोललो. त्यात काही लेखक होते, साहित्य संस्थांचे पदाधिकारी होते आणि वाचकही होते. बऱ्याच जणांनी आपला विरोध असल्याचं अगदी स्पष्ट सांगितलं होतं. प्रामुख्यानं त्यांचं वय आणि प्रकृती ह्या मुद्द्यांवर त्यांचा विरोध होता. काही लेखकांनी मात्र ह्या विषयावर बोलायला नकार दिला. ह्या चर्चेत अनेक मुद्दे आले. त्यातल्या बऱ्याच गोष्टी नव्या वादाला तोंड फोडणाऱ्या होत्या. त्यामुळे त्या (डॉ. नारळीकर ह्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अवमान न होता) कशा मांडायच्या हा प्रश्नच होता. उशीर होत गेला आणि मग कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे संमेलनच पुढं ढकललं गेलं. त्यामुळे लिहिण्याचंही बारगळलं.

डॉ. नारळीकर स्वतःच अध्यक्षपदासाठी उत्सुक होते का, असा प्रश्न पडला. त्यांच्यापेक्षा महामंडळाशी संलग्न साहित्य संस्थेतील काही पदाधिकारी त्यासाठी आग्रही होते, अशी माहिती तेव्हा मिळाली. 'तुम्ही फक्त होय म्हणा (बाकीचं आम्ही पाहून घेऊ!)', असं त्या पदाधिकाऱ्यांचं धोरण होतं. ह्या शिवाय आणखी एक कारण असावं - अपराधगंड. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये अध्यक्षपदाचा सन्मान विज्ञानलेखकाला न मिळाल्याची उणीव भरून काढण्याची संधी, ही एक भावना त्यामागे होती. ('बी. बी. सी. मराठी'ला दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. नारळीकर म्हणाले की, 'मी गमतीनं असं म्हणतो की आपल्याकडच्या साहित्यसंमेलनांमध्ये सुद्धा विज्ञानकथांना बॅकडोअर एक्झिट असते.') पण मग त्यातून असा एक मुद्दा येतो की, त्यासाठी अन्य कोण्या विज्ञानलेखकाचं नाव सुचलं नाही का? अगदीच उदाहरणादाखल नावं घ्यायचीच झाली, तर डॉ. बाळ फोंडके, दीर्घ काळ केवळ लेखनाचेच व्रत करणारे निरंजन घाटे आणि अजून काही जण... तथापि तोही वादाचाच मुद्दा होता. 

पुण्यात मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब कसबे ह्यांनी त्या वेळी काय प्रतिक्रिया व्यक्त केली होती? ते म्हणाले होते, 'हा साहित्यिकांचा नव्हे, तर साहित्य संमेलनाचा सन्मान आहे. डॉ. नारळीकर जगातील अतिशय महान साहित्यिकांपैकी नसले, तरी महान वैज्ञानिक आहेत. मराठी साहित्यातले ते सर्वांत मोठे विज्ञानकथालेखक आहेत. त्यांच्या लेखनामुळे मराठी साहित्यात वैज्ञानिक जाणिवा अधिक प्रगल्भ होण्याच्या दृष्टीनं मदत होईल.'


(छायाचित्र सौजन्य marathi.abplive.com)
'बी. बी. सी. मराठी'नं साधारण वर्षभरापूर्वी संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर ह्यांची मुलाखत घेतली. त्याच्या सुरुवातीला म्हटलं होतं की, तंत्रज्ञानाचा वापर वाढतो, धर्माचा पगडा वाढताना दिसतो आहे, अशा वेळी डॉ. नारळीकर ह्यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मराठी भाषेमध्ये विज्ञानलेखन जे झालं, ते पुरेसं आहे काय? पुरेसा सन्मान मिळतो का? ह्या प्रश्नाला त्यांचं उत्तर आहे - 'इंग्रजीत जेवढं खोलवर तेवढं मराठी किंवा भारतीय भाषेत नाही. मराठीत वाचन व्हावं असं वाटत असेल, तर तेवढ्या प्रमाणात लेखनही व्हायला हवं.' विज्ञानसाहित्य लिहिण्यामागचं उद्दिष्ट स्पष्ट करताना त्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'ला सांगितलं - I want to spread different forms of science through various tools, and literature is an important one. म्हणजे मूलभूत प्रेरणा विज्ञान आणि साहित्य हे साधन.

मुख्य प्रवाहातील माध्यमांनी डॉ. नारळीकर ह्यांच्या निवडीचं मनापासून स्वागत केलं असलं, तरी सामाजिक माध्यमांमध्ये (विशेषतः फेसबुक) दोन्ही टोकांची मतं हिरीरीनं मांडली गेली. 'पुस्तके' ह्याच विषयावर सातत्याने लिहिणाऱ्या श्री. शशिकांत सावंत ह्यांनी फेसबुकवर 'सज्जन पण निरुपयोगी नारळीकर' शीर्षकाची मोठी टिप्पणी लिहिली. 'विज्ञान कथेतून विज्ञानाचा प्रसार होतो हा अजून एक गैरसमज,' असं थेट सांगून ते डॉ. नारळीकर ह्यांना 'साहित्यिक' म्हणण्यावरच आक्षेप घेतात. ह्या पोस्टवर जोरदार चर्चा झाली. शंभराहून अधिक प्रतिक्रियाही आल्या. स्वाभाविकच तिथे जोरदार वादही झाला.

'विज्ञानलेखकाची निवड' ह्या मुद्द्यावर डॉ. अभिराम दीक्षित ह्यांनी लिहिलंय की, (धर्मगुरू) दिब्रिटो ह्यांना (मागच्या संमेलनाचं) अध्यक्ष केलं होतं; त्याचं परिमार्जन म्हणून यंदा आपण विज्ञाननिष्ठा दाखवली आहे! 'नारळीकर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होऊ शकतात, पण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी त्यांच्याहून किती तरी इतर व्यक्ती पात्र आहेत,' असं संजय रानडे ह्यांनी फेसबुकवरच लिहिलंय.

वाद-विवाद होत राहिला तरी नाशिककरांनी डॉ. नारळीकर ह्यांना आपल्या संमेलनाचं अध्यक्ष म्हणून स्वीकारलं होतं. विज्ञाननिष्ठ लेखक अध्यक्ष म्हणून लाभल्यामुळं संमेलनात पूजन, श्रीफळ वाढविणे आदी कर्मकांड टाळण्याचं ठरविल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. 'डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वयोमानामुळे त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ,' असं संमेलनाचे आधारस्तंभ छगन भुजबळ ह्यांनी आश्वस्त केलं होतं.

...तर असं सगळं असूनही डॉ. नारळीकर नोव्हेंबरमध्ये झालेल्या संमेलनासाठी उपस्थित राहिलेच नाहीत. पूर्ण तीन दिवस जाऊच द्या; उद्घाटनाच्या सत्रालाही त्यांना येणं शक्य झालं नाही. लांबलेलं, स्थळ बदललेलं संमेलन त्यामुळं अधिकच वादात सापडलं. महाबळेश्वरचं अध्यक्षाविना झालेलं संमेलन एकमेव होतं. त्या यादीत आता नाशिकची भर पडली. पण दोन्ही संमेलनातील त्या परिस्थितीमागच्या कारणांत जमीन-अस्मानाचं अंतर आहे. (उस्मानाबाद संमेलनाला अध्यक्ष उद्घाटनाच्या समारंभापुरते हजर राहिले.)

अनंत अडीअडचणी पार करून होणाऱ्या संमेलनाला अध्यक्षच हजर नाही. त्यामुळेच श्री. ठाले पाटील म्हणाले की, नारळीकर ह्यांनी एक किंवा अर्ध्या तासासाठी हजेरी लावली असती तरी साऱ्यांना आनंद झाला असता. यापुढे तरी अध्यक्ष हिंडता-फिरता असावा. त्यासाठी महामंडळाला घटनेत दुरुस्ती करावी लागते की काय, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

अध्यक्ष हिंडता-फिरता का असावा? तो वाचकांना 'दिसलाच' पाहिजे, असा अट्टहास का? खरं तर केशवसुतांनी लिहिलंय 'कोणीहि पुसणार नाहि, 'कवि तो होता कसा आननी?'' पण कवी-लेखक दिसतो कसा, ह्याचं सर्वसामान्य वाचकांना कुतुहल असतंच. साहित्य संमेलनाच्या प्रयोजनाबद्दलही सातत्याने आक्षेप घेतला जातो. त्याला उत्तर देताना प्रसिद्ध कवयित्री-लेखिका शान्ता ज. शेळके यांनी म्हटलं होतं - 'रसिकांना जसे साहित्य आवडते तसे साहित्यिकांना बघायला, त्यांच्याशी संवाद साधायलाही आवडते. या दृष्टीने साहित्य संमेलनांची उपयुक्तता निर्विवाद आहे.'

साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद अधिकारापेक्षा मानाचं आहे. केवळ संमेलनाच्या सुरुवातीच्या दिवशी अध्यक्षीय भाषण आणि अध्यक्षीय समारोप एवढंच त्याचं काम नाही. वर्षभराच्या कारकीर्दीत त्यानं गावोगावी जावं, वाचकांपर्यंत पोहोचावं, त्यांच्याशी संवाद साधावा, असं अपेक्षित आहे. सोलापूर, प्रवरानगर इथल्या साहित्य पुरस्कारांचं वितरण संमेलनाध्यक्षांच्या हस्ते करण्याची प्रथा आता रूढ झाली आहे. अध्यक्षाला सहजपणे फिरता यावं, त्यासाठी त्याच्या खिशाला झळ लागू नये म्हणून काही वर्षांपासून निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ह्या मुद्द्यांवर प्रा. श्रीपाल सबनीस ह्यांची अध्यक्ष म्हणून कारकीर्द उल्लेखनीय ठरावी. अलीकडच्या काळात सर्वाधिक भ्रमंती केलेले, कार्यक्रमांना उपस्थित राहिलेले अध्यक्ष म्हणून त्यांचंच नाव घ्यावं लागेल. गंमतीनं असं म्हणतात की, त्यांना वर्षभरात इतक्या शाली मिळाल्या की, त्या मोजणंही शक्य नाही!

अध्यक्ष हिंडता-फिरता हवा, ह्या मतप्रदर्शनावर टीकाही झाली. प्रसिद्ध नाटककार चं. प्र. देशपांडे ह्यांनी फेसबुकवर त्याबाबत टिप्पणी लिहिली - '...सारांशरूपाने, हिंडताफिरता असणे, भूमिकावाला असणे आणि साहित्याबाबतही, जाता जाता का असे ना, बोलणारा असला पाहिजे -- या तीनही अटी पाळू शकणारे कोण कोण सुचताहेत? की, हिंडताफिरता असणे आणि साहित्याबाबत बोलणारा असणे, या दोनच अटी बास होतील? आपापली मते आणि अपेक्षित अटी पाळून अध्यक्षपद कोण भूषवू शकेल त्यांची नावे सुचवावीत. रागलोभ, चिडचिड न करता, शांतपणे हे काम होऊ शकले तर संभाव्य अध्यक्ष समोर दिसू लागल्याने, लगेचच येणाऱ्या या उत्सवाच्या आनंदाला सुरुवात करता येईल.'

साधारण पाच वर्षांच्या हुलकावणीनंतर अध्यक्षपदी निवड झालेल्या श्री. सासणे ह्यांचं मत मात्र वेगळं आहे. चालता बोलता म्हणजे लोकांमध्ये मिसळणारा अध्यक्ष, असं त्यांनी निवडीनंतर स्पष्ट केलं.

ह्या निमित्ताने अध्यक्षाची निवड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणुकीचं (घाणेरडं) राजकारण नको, म्हणून काही मातबर मंडळी ह्या प्रक्रियेपासून नेहमीच दूर राहिली. परिणामी पात्र असूनही त्यांना हे मानाचं पद मिळालं नाही, अशी ओरडही फार पूर्वीपासूनची. लक्षावधी मराठी माणसांच्या अखिल भारतीय असलेल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हजार-बाराशे मतदारांनाच का, असा प्रश्नही वर्षानुवर्षे विचारला जात होता. बरीच चर्चा होऊन निवडपद्धतीत बदल झाला. त्यासाठी महामंडळाची घटनादुरुस्ती करण्याचा प्रस्ताव दोन-अडीच वर्षांनंतर मंजूर झाला. निवडणुकीऐवजी संमेलनाध्यक्ष 'सन्मानाने' निवडण्याची पद्धत सुरू झाली.


(छायाचित्र सौजन्य weeklysadhana.in)
घटनादुरुस्तीनंतरही अध्यक्ष एकमताने निवडला जाण्याची अपेक्षा पूर्ण झालेली नाहीच. अकराशे मतदारांऐवजी आता साहित्य महामंडळाच्या घटकसंस्थांचे १९ प्रतिनिधी तो निवडतात. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ही निवड एकमताने झालेली नाही. त्यासाठी मतदान झाले. श्री. ठाले पाटील ह्यांनीही ते मान्य केलं आहे - 'महामंडळाच्या बैठकीत निवडणूक होऊनही तिला निवड म्हणणे आणि निवड भासवण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. या प्रक्रियेत संख्येशिवाय कोणताही फरक नाही. उलट प्रक्रिया संकुचित झाली आहे.' ('महाराष्ट्र टाइम्स' - दि. ७ एप्रिल २०१९)

संमेलनाध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा नवीन पद्धत येण्याची शक्यता आहे की काय? महामंडळाच्या घटनेत दुरुस्ती करण्याच्या श्री. ठाले पाटील ह्यांच्या नाशिकमधलं विधानाकडे त्या दृष्टिकोणातून पाहायला हवं. किंबहुना ती सूचक प्रस्तावना मानावी लागेल. बडोदे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी तीन वर्षांपूर्वीच नव्या पद्धतीला विरोध करताना म्हटलं होतं, 'संमेलनाध्यक्षांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार आल्याने अन्य साहित्यिकांचा सन्मान राखला जाणार नाही. ही प्रक्रिया चुकीची आहे. पाच मान्यवर साहित्यिक व विचारवंतांच्या समितीने एका साहित्यिकाची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करावी.' ('सकाळ' - दि. १२ एप्रिल २०१९)

'कुठलाही वाद होऊ न देता साहित्यिकांनी एखादे तरी संमेलन घेऊन दाखवावे,' असं फार पूर्वी आर. आर. पाटील म्हणाले होते. त्यांचं ते आव्हान (की आवाहन?) स्वीकारणं साहित्यिकांना वा साहित्य महामंडळाला अवघडच आहे. संमेलन, अध्यक्षांची निवडप्रक्रिया कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. त्या परिस्थितीत आमूलाग्र बदल होईल व वाद-चर्चांना कायमचा पूर्णविराम मिळेल, असं काही दिसत नाही. तूर्त एवढं खरं की, नाशकात बोलले ते श्री. ठाले पाटलांनी करून दाखवलं. दीर्घ काळ दर्जेदार लेखन करणाऱ्या श्री. सासणे ह्यांच्या रूपाने उदगीरच्या संमेलनाला हिंडता फिरता अध्यक्ष मिळाला आहे.

------

#MarathiSahityaSammelan #Marathi #Literary_Meet #ThalePatil #Dr.Narlikar #BharatSasane #Nashik #Udgir #SahityaMahamandal #SocialMedia #हिंडता_फिरता


पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...