Monday 24 January 2022

निमित्त एका गाण्याचं...


'जल बिन मछली...'मधल्या
एका गाण्यामुळं हे सगळं लिहिलं!

हजारो नव्हे, लाखो गाण्यांचं भांडार असलेली संकेतस्थळे उपलब्ध आहेत. वेळ कसा घालवायचा, असं कुणी विचारलं तर सांगतो, 'ह्या संकेतस्थळांना भेट द्या. शंभर वर्षांचं आयुष्य लाभलं आणि दिवसातले बारा तास निव्वळ गाणी ऐकवण्यात घालवले तरी एक संकेतस्थळही संपणार नाही. आता एवढं ऐकायला उपलब्ध आहे.'

'रोज एवढा वेळ गाणी ऐकून बहिरेपण तेवढं येईल!' जन्मजात औरंगजेब असलेला मित्र त्यावर म्हणाला.

सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. अर्थात गाण्याचाच आहे. एखादं गाणं अचानक मनात आलं, तर ते ऐकण्यासाठी आता वाट पाहावी लागत नाही. चुटकीसरशी शोधून ऐकता येतं. मध्यंतरी अशी आवडती गाणी शोधून ऐकत होतो. काही वेळा तर एकच गाणं सलग पाच-सहा वेळा ऐकत होतो. उदाहरणार्थ - कारवाँ गुज़र गया... (आता हे लिहिल्यावर ऐकावंच लागेल.), ना. घ. देशपांडे ह्यांच्या कविता, तलत महमूद, मन्ना डे, महंमद रफी, मीना कपूर. त्या बाईंची 'कच्ची है उमरिया...' आणि 'रिमझिमी बरसे पानी...' कमीत कमी तीन वेळा ऐकल्याशिवाय पुढं जातंच नाही.

तरीही सांगायचा मुद्दा आणखीनच वेगळा आहे. आणि अर्थात तोही गाण्यांचाच आहे, हे उघडच.

ही झाली माहीत असलेली गाणी. आठवण झाली की, शोधून मुद्दाम ऐकलेली. पण अत्यंत  आवडतं गाणं अनपेक्षितरीत्या ऐकायला मिळण्यात वेगळी मजा असते. त्यानं तृप्त व्हायला होतं. दिवसभर ते गुणगुणलं जातं. कधी कधी ते गाणं मनाच्या सांदीत कुठं तरी दडलेलं असतं. रेडिओवर ऐकायला मिळतं नि लक्षात येतं की, हेही आपलं आवडतं गाणं आहे की. अशीही काही गाणी असतात की, ती आपण पहिल्यांदाच ऐकत असतो आणि तरीही आवडून जातात.

हे सगळं घडतं रेडिओ-कृपेने. स्मरणरंजन किंवा (वय झाल्यावर येणारे) आठवणींचे कढ म्हणून नाही, पण पस्तीस-एक वर्षांपूर्वी रेडिओ सच्चा साथी होता. सी. रामचंद्र ह्यांचं निधन झाल्यानंतर त्यांची बहुतेक गाणी आकाशवाणीच्या इंदूर केंद्रावरच्या 'आपली आवड'सारख्या 'मनभावन' कार्यक्रमात ऐकली. उरलेली गाणी ऑल इंडिया रेडिओवरच्या उर्दू सर्व्हिसवर. मग सी. रामचंद्र लाडके बनले. 'कितना हंसी है मौसम...' पहिल्यांदा ऐकताना तलतच वाटतो.

तेव्हा घरी रेडिओ होता. मध्यम लहरी व लघु लहरींवरची केंद्र ऐकवणारा. रात्री साडेदहा ते साडेअकराला पाच मिनिटे बाकी असेपर्यंत उर्दू सर्व्हिसवर 'तामील ई इरशाद', मग बारा ते साडेबारा कव्वाल्या आणि साडेबारा ते एक कर्णमधुर जुनी गाणी ऐकायला मिळत. नव्वदीच्या (माझ्या वयाच्या नव्हे तर सनाच्या! 😂) आसपास रेडिओची संगीत सुटली.

नोकरीत थोडं रुळल्यानंतर मोठ्या हौसेनं चार बँडचा मोठ्ठा रेडिओ घेतला. तोवर लघु लहरींवरची केंद्र ऐकायला त्रास होऊ लागला होता. मध्यम लहरीवरचं पुणे केंद्रच नीट ऐकायला मिळत नव्हतं; मग मुंबई, नागपूर, जळगाव, इंदूर केंद्रं तर लांबच. रेडिओ सिलोन, उर्दू सर्व्हिसही कानांच्या टप्प्यांच्या पार पल्याड गेली.

मित्रानं सहा महिन्यांपूर्वी भेट दिली एक. 'हे अलेक्सा...' म्हटलं की, हवं ते ऐकवणारी भेट. रात्रीच्या वेळी मी अलेक्साला विविध भारती ऐकवण्याची विनंती करू लागलो. अगदी परवा परवा शोध लागला की, अलेक्सा उर्दू सर्व्हिसही ऐकवते. आज तेच ऐकत बसलो होतो. अचानक एक गाणं लागलं. चाल ओळखीची वाटत होती. शब्द मात्र नव्हते. एकाच चालीत बांधलेली वेगवेगळी गाणी असावीत. ते ओळखीचं अन् हे अनोळखी, असं मनाला समजावलं.



गाणं होतं 'जल बिन मछली नृत्य बिन बिजली'मधलं. मजरूह ह्यांच्या शब्दांना लक्ष्मी-प्यारे ह्यांनी चाल लावलेली. आवाज आहे माझा लाडका मुकेश आणि लता ह्यांचा. अतिशय साधा संगीत साज असलेलं गोssड गाणं - 

बात है एक बून्द सी दिल के प्याले में
बात है
बात है एक बून्द सी दिल के प्याले में
आते आते होठो तक तूफान
न बन जाये न बन जाये
बात क्या तूफा में जो जीने का सामान
न बन जाये न बन जाये बात क्या
अरमा वो क्या दिल के लिए बात क्या...

ही एवढी लांबड वाचल्यावर त्यावरचा उतारा म्हणून ते गाणं ऐकण्याचा मोह तुम्हालाही झालाच तर...
https://www.youtube.com/watch?v=NWenI5FYqag
------

(लता व मुकेश ह्यांचे छायाचित्र सौजन्य - myviewsonbollywood.wordpress.com)

#गाणी #आठवणी #रेडिओ #आकाशवाणी #मनभावन #रेडिओ #जल_बिन_मछली_नृत्य_बिन_बिजली #AIR #IndoreAIR #HindiSongs
---


No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...