Monday 29 June 2015

दोनच ओळी

मला कविता कळत नाही! ती समजून घेण्याचा पद्धतशीर प्रयत्नही कधी केला नाही. तरीही अधूनमधून कविता पाहत असतो, पुढे जावं वाटलं तर वाचतही असतो. त्यातल्या काही कधी आवडून जातात. `समकालीन भारतीय साहित्य` द्वैमासिकाचा मार्च-एप्रिलचा अंक आता दोन दिवसांपूर्वी मिळाला. हे द्वैमासिक एखाद्या पुस्तकासारखंच असतं. दहा-बारा कथा, तेवढ्याच कवींच्या कविता, एखादं नाटक, समीक्षा आणि एखाद्या लेखक-कवीवर विशेष विभाग. या अंकामधील विशेष विभागाचे नायक आहेत, गजानन माधव मुक्तिबोध. हे नाव ऐकलेलं; पण तरीही फारसं माहीत नाही.
या अंकाचं संपादकीय स्वाभाविकपणे मुक्तिबोधांवरच आहे. त्यात पहिल्याच दहा-पंधरा ओळींमध्ये त्यांच्या कवितेतील दोन ओळी दिल्या आहेत.

तुम छिपा चलो जो कुछ तुम हो
यह काल तुम्हारा नहीं।

फक्त दोन ओळी. त्यांनी पिच्छा पुरविला. काय आहे त्यात? आजचं निखळ वास्तव? की निव्वळ उपहास? आजूबाजूला दिसणाऱ्या उदासवाण्या परिस्थितीवरचं भाष्य? की आहे त्यात थोडा दिलासा? हा काळ, हे सध्याचं जग तुझ्यासाठी नाही, हे कवी सामान्य माणसाला सांगतो आहे की, तो तीव्रपणे टिप्पणी करतो आहे? काय लपवायला सांगतोय कवी? अंगभूत चांगुलपणा? उपजत स्वार्थ? मुखवटा घालून वावरू नकोस असं? की तुझा खरा चेहरा इथं दाखवायला उपयोगी नाही, असं?
पूर्ण कविता वाचल्यावर या दोन ओळींचा अर्थ लागेल कदाचित. पण तशी ती वाचूनही अर्थ लागेलच याची खात्री नाही. कारण कविता शब्दाशब्दांनी पचवावी लागते. दिसणारा अर्थ आणि असणारा अर्थ यात महद्अंतरही असतं कैकदा. ते काहीही असो. या दोन ओळींनी अस्वस्थ करून टाकलं...कदाचित माझ्यासाठीच असाव्यात त्या, असा दिलासाही देऊन गेल्या एका सामान्य माणसाला!
-----
अस्वस्थ आम आदमी
या आठवड्यात बहुतेक सगळ्या मराठी वृत्तपत्रांना, तिथं काम करणाऱ्या बोरूबहाद्दरांना `छान किती दिसते फुलपाखरू...` या कवितेची आठवण झाली. याचं कारण अर्थात `ब्लू मॉरमॉन` प्रजातीला राज्य सरकारने दिलेला राज्य फुलपाखराचा दर्जा. त्याची बातमी देताना शीर्षक म्हणून सरसकट ही कवितेची ओळ वापरलेली दिसली. फुलपाखराच्या छान दिसण्याचं हे कौतुक गेले तीन-चार दिवस चालल्यानंतर रविवारी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखाचं शीर्षक पुन्हा तेच आहे.

ही कविता कोणाची, हे त्यातल्या किती जणांना सांगता येईल? माहीत नाही. ग. ह. पाटील या नावाचे कवी होते, हेही खूप जणांना माहीत नसणार. शीर्षकासाठी वापरलेली ती ओळ सोडून त्या कवितेतल्या अन्य ओळी कुणाला सांगता येतील का, हे सांगणंही कठीणच. `तेच ते आणि तेच ते` यानुसार सर्वांनी या छान कवितेतल्या ओळीला कंठाळी शीर्षकाचं स्वरूप देऊन टाकलं. यानिमित्तानं आपणंही एखादं काव्यमय शीर्षक द्यावं, असं कुणाला वाटलं नाही. कुणाला एका ओळीची कविता शीर्षकाच्या रूपात प्रसवता आली नाही. याला कल्पनादारिद्र्य एवढंच म्हणता येईल!

मराठी पत्रकारितेला अलीकडं भाषादारिद्र्य, अभ्यासदारिद्र्य, कल्पनादारिद्र्य, माहितीदारिद्र्य, संदर्भदारिद्र्य, ज्ञानदारिद्र्य आदींचा शाप लागला आहे. अठराविश्वे दारिद्र्य यालाच म्हणत असावेत बहुतेक!
----
`दरिद्री` आम आदमी

Thursday 25 June 2015

पत्रिका पाहून, कुंडली मांडून
पुढे छत्तीसच्या आकड्यासाठी
36 गुण `जुळवून`
कांदेपोहे खाऊन,
`बीएस्सी झालीस मुली,
पण मॅट्रिक पास आहेस ना?`
असे प्रश्न विचारून, चालायला लावून,
हुंडा उकळून, पाय धुवून घेऊन,
वाजतगाजत लग्न करून
बायको घरी आणा
किंवा
`लिव्ह-इन रीलेशनशिप`मध्ये
मनासारखी जोडीदारीण मिळवा
.
.
.
मुलाच्या वडिलांचा
बिनसाखरेचा आणि
मुलाच्या आईचा
दोन चमचे साखरेचा
चहा मुलीनंच करायचा असतो.
तो आदरानं त्यांना द्यायचा असतो.
आणि हो कप-बशा व्यवस्थित नेताना
ओढणी वगैरे व्यवस्थित घेऊन
आपला सुशीलपणा, सौजन्य, नम्रपणा
सिद्ध करायचा असतोच असतो!


त्याच्याकडच्यांना जिंकायचं असतं ना...

पटत नाही का? मग ही जाहिरात पाहा

https://www.youtube.com/watch?v=7pOFqpZAKds

Thursday 18 June 2015

कधी रे (धो धो) येशील तू...



(प्रसन्न ढगोबाचं चित्र ह्यांच्या सौजन्याने -
linsdevasconcellos.org.br)
----------------
वाट तरी किती बघायची? बास की आता. नजरा तुझ्याकडेच लागल्यात सगळ्यांच्या. ये आता. लवकर ये. तूच आहेस आमच्या या वर्षाच्या भविष्याचा शिल्पकार. अगदीच नाही असं नाही; आलास तू. काही ठिकाणी वर्दी लावून गेलास. काही ठिकाणी थोडा अधिक वेळ थांबलास. पण स्वागताची द्वाही मिरवावी, असं आणि एवढं जोरकस आगमन नाही झालेलं तुझं अजून. म्हणूनच तुला हे आवाहन. (सभ्य, सौम्य भाषेत लिहिलेल्या या मजकुराला 'आव्हान' समजून आलास तरी चालेल. वाजत-गाजत-उधळत आलास तरी चालेल. हसवलंस तर चालेल आणि रडवलंस तरी चालेल रे. पण तू ये!)

हल्ली आम्ही 'सुशिक्षित' झालो आहोत. त्यामुळे मान्सून, एल-निनो, जागतिक तापमान वाढ, पर्यावरण वगैरे शब्द वाचून-ऐकून पाठ झाले आहेत. कमी दाबाचा पट्टा, कुठल्या तरी महासागरात झालेल्या वादळाचे तुझ्यावर होणारे परिणाम अशी काही माहिती आम्ही येता-जाता वाचतो आणि मग त्यावर पांडित्यपूर्ण पद्धतीने बौद्धिक ठोकत राहतो. "जीवन आम्हालाच कळले हो..!' शिकून शहाणे झाल्याचा गैरसमज एवढा की, सात जूनला तू आलाच पाहिजेस, असा आमचा आग्रह! आता दर वर्षी असं ठरल्या दिवशी न चुकता यायला तू काय ७.५७, ८.१३ची 'फास्ट' किंवा 'स्लो' लोकल आहेस होय? इकडे आम्ही वक्तशीरपणा दाखवणार नाही, वेळेवर काही करणार नाही. ठरलेल्या आणि दिलेल्या वेळी कधी, कुठे पोचणार नाही. (आता बघ ना, हा लेखही सात जूनलाच लिहायचा ठरवलं होतं. पण आज-उद्या करत करत झाला उशीर.) कुणी काही म्हटलंच तर दात काढत "इंडियन स्टॅंडर्ड टाईम' असं समर्थन करणार! तू मात्र वेळेवर आलंच पाहिजेस, असा आग्रह. दोन-चार दिवस इकडे-तिकडे झाले की, आम्ही काळजीत पडल्याचं दाखवणार. 'हल्ली तुझं काही खरं नसतं,; असं कण्हणार. जुने दाखले देत राहणार.

तू 'फेसबुक'वर आहेस का रे? म्हणजे गेल्या पाच वर्षांत सुशिक्षित-अशिक्षित-नुसतेच शिक्षित-मध्यमवर्गीय-गरीब-श्रीमंत-नवकोट नारायण आदी सर्व स्तरांत आणि थरांमध्ये लोकप्रिय झालेल्या या 'सोशल मीडिया'च्या साईटवर तुझं अकाउंट आहे की नाही? तिथं तू नित्यनेमानं 'स्टेट्‌स अपडेट' करतोस की नाही? नसावास बहुतेक. त्यामुळं तुला इतरांच्या भिंतीवरही जाता येत नसावं. त्या कधीच्या ओल्याकच्च झाल्या आहेत. तुझ्या स्वागताच्या कविता, चारोळ्या, किरकोळ्या, आठवणी, कढ... असं किती तरी झरतंय त्या भिंतींवरनं. हा मोसम कवितांचा आहे, वठलेल्यांनाही मोसमात पालवी फुटते, त्यांना 'शब्दकळा' सुरू होतात. नेहमीचीच ही परिस्थिती जाणून काही जणांनी आधीच वैधानिक इशारे टांगून ठेवलेत भिंतीवर. पण असल्या इशाऱ्यांना जुमानतो कोण? तुझी चाहूल लागताच कवितांचा महापूर वाहू लागलाय.

तर अशा या मोसमी कवींना तू यायलाच हवा आहेस. त्यांच्या प्रतिमेला अंकुर फुटायचे असतील, तर तू पाझरलंच पाहिजे. आणखी काही रसिकराज असतात. त्यांना कविता नाहीत स्फुरत. जुन्या जमान्याच्या आठवणी काढून राहतात ते झुरत. मग त्यांना आठवत राहतात सिनेमातली गाणी. विरहाची गीतं, चिंब भिजवणारी, व्याकूळ करणारी, हुरहूर लावणारी. मग त्या गाण्याच्या मुखड्यांनी सजते त्यांची भिंत. उमटतात त्यावर लाईकचे उद्‌गार आणि कमेंटांचे चित्कार. अधिक रसिक असतात, ते काही 'ओलेचिंब' फोटो टाकतात. त्यावरही बरसतात उसासे...अधिक चिंब करणारे, कुडकुडायला लावणारे.

दिवस थोडे पुढे सरकतात, तशी काहींना आठवण होते सहलींची. तुझ्या सहली. तुझ्यासाठी आणि तुझ्यासह. ठरावीक लोकप्रिय ठिकाणी शनिवार-रविवार गर्दी होते. तुझ्या आनंदाचं स्वागत म्हणायचं, पण ते तुला विसरूनच करायचं. आनंद साजरा करण्यासाठी लागतो दणकेबाज आवाज. विचित्र बोल आणि तेवढाच विचित्र ठेका असलेली फिल्मी गाणी. हातात ग्लास आणि 'थिरकणे' या नावाखाली अंगविक्षेप. संध्याकाळ झाली की, तिथे उरतात रिकाम्या-फुटलेल्या बाटल्यांच्या काचा, पोटात ढकललेल्या पदार्थांच्या प्लास्टिकच्या पिशव्या. कचराकुंडी झालेली असते त्या जागेची. सहल म्हणायची नि सहन करायचं सारं.

आलं घातलेला मसालेदार चहा, वाफाळलेली किंचित कडवट फिल्टर कॉफी, खेकडा भजी किंवा खमंग बटाटवडा, भाजणीची थालिपीठं, भाजलेलं मक्‍याचं कणीस, कोळशावर भाजलेले कबाब... अशा अनंत आठवणींचं रवंथ करीत मंडळी आणत बसतात तोंडाला पाणी. त्याचंही निमित्त तूच असतोस, हे काय वेगळं सांगायला हवं! बाल्कनीत बसून तुला न्याहाळण्याचं, चहाचा कप ओठांना लावण्याचं आणि संगीत कानामध्ये साठवून घेण्याचं सुखही अनुभवतात काही. 'तेचि पुरुष भाग्याचे...' असं बहुतेक त्याच पुरुषांना (आणि क्वचित स्त्रियांनाही) उद्देशून लिहिलं गेलं असावं.

ह्या काळात तुझ्याचसाठी असतात वृत्तपत्रांचे मथळे. छायाचित्रेही हवी असतात तुझी आणि तुझीच. तू आलास तीही बातमी आणि रुसलास तीही बातमीच. 'चातक', 'पावशा', 'बळिराजा', 'झिम्माड', 'मुसळधार', 'संततधार', 'बुरबूर', 'सरीवर सरी' असे काही शब्द याच दिवसांसाठी राखीव असतात. (महानोर वाचला असेल, तर या दिवसांत हमखास उपयोगी पडतो म्हणतात.) शेती, बियाणे, पेरणे, धरणे अशा शब्दांची खूप दिवसांनी गाठभेट होते उपसंपादकांची आणि बातमीदारांची. हेच दिवस असतात भावनांनी भिजलेल्या शीर्षकांचे आणि साहित्यरसात मुरलेल्या फोटो-ओळींचे. कविमनाचा एखादा उपसंपादक होड्या सोडणाऱ्या पोरींच्या छायाचित्राला 'आला, आला तो आला...नाव सोडते बाला' अशी ओळ देऊन फोटोग्राफरला धन्य करतो आणि स्वतः धन्यधन्य होतो. अवचित कधी तरी इंद्रधनुष्य दिसते आणि कुणाच्या तरी मनात रुतलेल्या शान्ता ज. शेळके यांच्या 'नभी घुमते इंद्रधनू, मदनाचे चाप जणू...' ओळी फोटोखाली दिसतात. आणि मग 'एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहें थे; अशाही ओळींतून कुणी कधीच साकार न झालेलं चिंब स्वप्न पाहत असतो.

खरं तर हे दिवस पेरणीचे. पण 'दिवस सुगीचे सुरू जाहले...' असं डॉक्‍टरमंडळींना वाटत राहतं. खरंही असतं ते. तू 'व्हायरल' झालास की, सर्दी-पडसं-ताप-अपचन आदी रोगही 'व्हायरल' होतात. दवाखाने भरभरून वाहतात. डॉक्टरांची सुगीच की. 'धन्य ती लेखनी कळा' अवगत असणारे डॉक्टर तयारच असतात. वृत्तपत्रांच्या कार्यालयातून फोन आला की, त्यांचा '...तब्येत सांभाळा' अशा शीर्षकाचा लेख तयार होतो.

रस्तेही वाट पाहत असतात तुझी. एरवीही त्यांची तब्येत नाजूकच असते तशी. पण तुझ्या येण्यानं निमित्त मिळतं. डांबराचं तुझं नातं विळ्या-भोपळ्याचं. तू आलास म्हणजे, त्याला रुसाय-फुगायची संधीच. मग 'इक दिल के टुकडे हजार हुए'च्या धर्तीवर त्यानं झाकून ठेवलेली खडी इकडं-तिकडं विखुरते. खड्डे पडतात रस्त्यांवर. मग 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते' असा कृष्णविनोद करून नागरिक त्यांना चुकवत हाकत राहतात वाहने. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना होणाऱ्या पाठदुखीच्या बातम्याही प्रसिद्ध होतात मग पेप्रांमधून.

तशी तर खूप मंडळी वाट बघत आहेत तुझी. महागडे ब्रँडेड रेनकोट विकणारे दुकानदार, खत-बियाण्याच्या पिशव्या दाबून ठेवलेले आणि त्या चढ्या भावानं विकण्याचं स्वप्न बघणारे व्यापारी, रंगबिरंगी छत्र्या तशाच रंगबिरंगी नोटांच्या मोबदल्यात विकणारे, जुन्या छत्र्यांची डागडुजी करून पोट भरणारे, प्लास्टिकच्या चपला रस्त्यावर विकणारे, कौलांची दुरुस्ती करणारे, यंदाही घराचं जुनाट छत किंवा भिंत तग धरून राहील अशी आशा बाळगणारे, पाण्यासाठी आता पायपीट थांबेल अशी आशा बाळगणारे... खूप जण आहेत रे.

आणि तो बळिराजा म्हणविला जाणारा शेतकरीही आहेच. कसं चालेल त्याला विसरून? त्याच्या तर साऱ्या आशा तुझ्यावरच. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या त्याचा 'स्टॉक फोटो' बघतोस ना तू दर वर्षी? तू कधी येतोस, कसा येतोस, किती येतोस, किती काळ थांबतोस, कधी थोडी विश्रांती घेतोस...या सगळ्याचंच त्याला महत्त्व असतं. गोठ्यातली दोन-चार जनावरं कडबा चघळून दाभाड दुखवून घेतलेली असतात. मालकाच्या जोडीनं तीही हिरव्या दुनियेची स्वप्नं बघत असतात. जगाचा पोशिंदा असलेला तो तुझ्यापुढे लाचार असतो.

चर्चा तर होणारच. तू आल्यावरही, आणि तुझं आगमन लांबल्यावरही. '...हे सृष्टीचे कौतुक तू जाण बाळा' असं अनेकांनी लहानपणी कुठल्या तरी धड्यात वाचलेलं असतं. अनेकांना हे कौतुक माहीत होतं, ते अनेक लेखकांनी वेगवेगळ्या वेळी लेखामध्ये ही ओळ वापरल्यामुळं. 'झाडं तोडल्यामुळे तू येत नाहीस, तुझं प्रमाण कमी झालंय' वगैरे शास्त्रीय अंधश्रद्धा वापरतात मंडळी. पण ज्या अंधश्रद्धा जोपासल्यामुळं समाजाचं भलं होतं, त्या अवश्य पाळाव्यात असं आमचा नेमस्त पंथ सांगतो.

खरोखर सांगतो. आमच्यासाठी तू जगावेगळाच आहेस. अख्ख्या जगात केव्हाही, कुठेही तू जात राहतोस. अपवाद फक्त भारतीय उपखंडाचा. इथं मात्र तुझं वेळापत्रक ठरलेलंय. म्हणून तर तुझं कौतुक आणि डोळ्यांत आस.

सांगायचं तात्पर्य एवढंच - वाट पाहतोय तुझी. कधी रे धो धो येशील तू, पावसा...

----
(टीप : दैनिक लोकसत्ताच्या नगर आवृत्तीमध्ये 'नगरी-नगरी' सदरामध्ये याच शीर्षकानं असाच लेख १७-१८ वर्षांपूर्वी लिहिला होता. त्याचं कात्रण काही शोधूनही सापडलं नाही. पण मनामध्ये असणारच तो कुठं तरी. सबब या आणि त्या लेखामध्ये काही साम्यं आढळल्यास तो योगायोग नक्कीच नाही! कारण लेखक एक, भावना एक आणि पाऊसही तो एकच एक!!)
----
#पाऊस #सात_जून #कवी_कविता #उपसंपादक_बातमीदार #शेतकरी #मान्सून 

Wednesday 17 June 2015

सरता गोडी, उरे लबाडी!

भाषण असो वा प्रवचन; वाद असो की संवाद... हे सगळं थोडक्यात आवरलं पाहिजे. थोड्यात गोडी नि फारात लबाडी! नरेशला हा धडा आवडला नि पचनी पडला, त्याचीही एक मोठी गोष्ट आहे.

कधी नाही ते त्या दिवशी नरेशला सगळ्या भौतिक सुखांचा कंटाळा आला. फेसबुकवर बसायला नकोसं वाटू लागलं. न्यूझीलंडविरुद्ध हरणाऱ्या टीम इंडियाचा खेळ पाहताना त्याला जांभया येऊ लागल्या. महिलांचे टेनिस सामने किंवा `रावडी` युरोपीय वा दक्षिण अमेरिकी फुटबॉलचे सामनेही त्याला पाहावेसे वाटेनात. जुन्या गाण्यांचा ठेका त्याला जुनाट वाटू लागला आणि नवी गाणी कर्णकटू. वृत्तपत्र हातात धरवेना नि मासिकाचं पान उलटावं वाटेना... सगळं कसं नको, नकोसं झालेलं. त्यातच बायको समोर येऊन गप्पा मारायच्या मूडमध्ये बसली.

विरक्तीचा झटका आल्यासारखा नरेश उठला. अंगात त्यानं सध्या फॅशन असलेला अर्ध्या बाह्यांचा झब्बा अडकवला. पँटऐवजी पायजमा चढवला. पाकीट खिशात नि पाय चपलेत सरकवले आणि निघाला... निरुद्देश. जाता जाता त्याला रामाचं देऊळ दिसलं. खरं तर ते कैक वर्षांपासनं त्याच्याच रस्त्यावर होतं. पण रोजच्या घाईत, आलिशान मोटारीतून जाताना त्याचं कधी लक्षच गेलं नव्हतं. त्या दिवशी मात्र नरेश थबकला. आपल्या जवळच एवढं छोटं, टुमदार देऊळ आहे, यावर त्याचा विश्वासच बसेना. चपला बाहेर ठेवून आत शिरला.

मंदिरात त्या दिवशी नेमकं प्रवचन होतं. अगदी तरुण दिसणारे, प्रसन्न चेहऱ्याचे बुवा आले. चेहरा हसरा होता; दाढी वाढवलेली, पण नीटनेटकी होती. त्यांना पाहून नरेशनं सहज आपल्या दाढीतून बोटं फिरवली. `ही तरुण पिढी अध्यात्माबद्दल काय सांगती, ते तरी ऐकू या` असं मनाशीच म्हणत नरेश मागं बसला. कंटाळा आला की, पटकन निघता यावं, या विचारानं.

प्रवचन सुरू झालं. बघता बघता बुवांनी पकड घेतली. नरेश पहिल्या 10 मिनिटांतच त्यात रंगून गेला. बुवांची रसाळ वाणी, त्यांची उदाहरणं, निष्कर्ष त्याला पटू लागले. प्रवचन पूर्ण ऐकायचं आणि निघताना आरतीच्या ताटलीत 100 रुपये अर्पण करायचे असं त्यानं ठरवून टाकलं.

प्रवचन चालूच होतं. आणखी 15 मिनिटं गेली. नरेशला थोडं कंटाळल्यासारखं वाटू लागलं. त्यानं आजूबाजूला पाहिलं. उठावं की काय, असा मनात आलेला विचार दाबून टाकला. आरती होऊ दे, ताटलीत 50 रुपये ठेवू नि जाऊ, असं ठरवलं त्यानं.

आणखी 20 मिनिटं गेली. नरेशला आता पुन्हा घरातल्यासारखं कंटाळवाणं वाटू लागलं. एकदाचं प्रवचन संपू दे, आरतीच्या ताटात 25 रुपये टाकू नि सटकू... त्यानं मनाला बजावलं.

तब्बल सव्वा तासानं प्रवचन संपलं. तोवर नरेशला जांभयावर जांभया येऊ लागल्या होत्या. आरतीचं ताट सगळीकडं फिरू लागलं. ते जवळ आल्यावर नरेशनं पटकन त्यातली दहाची नोट उचलली, खिशात टाकली नि बघता बघता तो बाहरेच्या गर्दीत दिसेनासा झाला!!

(मूळ आहे मार्क ट्वेनचा छोटा विनोद. पण त्यात भरपूर पाणी घातलं नि दिला मऱ्हाटमोळा साज.)
(पूर्वप्रसिद्धी - `फेसबुक`च्या भिंतीवर 29 जानेवारी 2014)

हा तो नव्हेच?

लल्लू. त्याच्या पायावर भोवरा होता बहुतेक. भटकत असायचा नेहमी. ट्रेकिंग, हायकिंग, असं सारं करीत राहायचा. कधी गाडीनं, कधी रेल्वेनं, तर कधी कधी पायी पायीच बराच लांबचा पल्ला मारायचा. एकटाच होता तो. आठ महिने नोकरी करायचा नि चार महिने भटकंती. कॅमेऱ्याचा क्लिकक्लिकाट करायचा नि परतला की फेबुची भिंत त्या फोटोंनी भरून टाकायचा.

असाच भटकत होता एकदा लल्लू. कोल्हापुरातनं गोव्याकडं चाल्ला होता. मध्येच बस सोडली नि निघाला की पायी पायी. दोडामार्गमधनं जाता जाता अचानक थबकला. झुडपामागं दडला. त्याला दिसला होता हत्ती. पेपरातनं वाचलं होतं त्यानं, कर्नाटकातनं इकडे कसे हत्ती येतात नि कोकणवासीय कसे या कर्नाटकी गजराजांना घाबरलेले असतात. लल्लू बघत राहिला. हत्तीनं एक पाय वर उचलून धरलेला. बराच वेळ तसाच होता तो. शंका येऊन लल्लू दबकत दबकत हत्तीच्या दिशेनं निघाला. थोडं जवळ गेल्यावर निरखून पाहिलं, तर गजराजाच्या चेहऱ्यावर त्याला वेदना दिसल्या. त्या पायालाच दुखापत झाली असावी.

धीर चेपून लल्लू रांगत रांगत हत्तीजवळ गेला, नेमका त्या उचलून धरलेल्या पायाच्या खाली. बघतो तर काय, त्या पायात एक भलामोठा काटा घुसलेला. लल्लूमधला प्राणिप्रेमी जागा झाला. खुडबूड करीत बॅगेतनं त्यानं दोन-चार हत्यारं काढली आणि अल्लादपणे हत्तीच्या पायातला काटा काढला. दाभणाएवढा होता तो! हत्तीनं हळूच पाय खाली ठेवला आणि मान वळवून तो लल्लूकडं पाहू लागला. तंतरलीच लल्लूची. श्वास कोंडलेलाच राहिला. वाटलं, आता कुठल्याही क्षणी हा आपल्याला तुडवणार, पायानं चेंदामेंदा करणार, संपलं. घ्या देवाचं नाव!

आणि चमत्कार झाला. हत्तीनं सोंडेतनं दीर्घ आणि कर्णकर्कश्श तुतारी फुंकली. मान वळवली आणि चालू पडला. लल्लू बचावला! बालंबाल!! त्याला वाटलं, आपण केलेले उपकार स्मरूनच या जंगली हत्तीनं आपल्याला सोडून दिलं.

नंतर बरीच वर्षं गेली. रीतीप्रमाणं लल्लूचे दोनाचे चार झाले. मंडई, किराणामालाची दुकानं असं त्याचं ट्रेकिंग सुरू झालं. बायकोच्या शॉपिंगच्या पिशव्या उचलत जिने चढत तो हायकिंग करू लागला.

एके दिवशी लल्लूला थोडा फावला वेळ मिळाला. प्रिय बायकोची किटी पार्टी असल्यामुळं त्याला काही तासांचं स्वातंत्र्य होतं. चार वर्षांच्या बिल्लूला घेऊन तो प्राणिसंग्रहालयात गेला. जुन्या आठवणी जागवत. बिल्लूला सगळे प्राणी दाखवत लल्लू हत्ती होते तिथं आला. जाळीच्या भिंतीला अगदी टेकून उभा राहिला. तेवढ्यात लांबवर उभा असलेला एक हत्ती त्यांच्या जवळ आला. त्यानं लल्लूकडं अगदी निरखून पाहिलं. आणि मग लल्लूला जंगलातला तो काटा काढण्याचा प्रसंग आठवला. त्याला वाटलं, येस, तोच हत्ती आहे हा! तेवढ्यात त्या हत्तीनं चित्कार केला.

लल्लूची खात्रीच पटली, हत्तीनं आपल्याला ओळखलंय. अनावर उत्साहानं तो जाळीची भिंत चढून आत उतरला नि अगदी त्या हत्तीजवळ गेला. आश्चर्यानं त्याच्याकडं पाहत राहिला. त्या हत्तीनं पुन्हा एकदा सोंड उंचावली आणि तुतारी फुंकली.

क्षणार्धात हत्ती वळला. त्यानं सोंडेनं लल्लूचा एक पाय पकडला नि त्याला हवेत उचलला, भिरभिर फिरविला, कुंपणाच्या जाळीवर त्याला आदळत राहिला. दोन-चार मिनिटांमध्ये खेळ खल्लास!

असं कसं झालं?
.
.
.
दुसरं काय? `हा` हत्ती बहुदा `तो` नसावा!!!

(पूर्वप्रसिद्धी - `फेसबुक`च्या भिंतीवर 15 जानेवारी 2014)

Sunday 7 June 2015

दोन मिनिटांचे वादळ

जे जे वाटे रसनेला भले
ते ते नसे प्रकृतीला चांगले
...असा एक साधा नियम आहे. पण तो समजून घेण्यात, त्याचे पालन करण्यात आपण सारे 'सुशिक्षित' कमी पडतो, असे अनेक वर्षापासून दिसते आहे.

आता 'मॅगी'च्या बातम्या येऊ लागल्यावर 'अरे बाप रे!', 'आई शप्पथ', 'भीषण' असे साश्चर्य वैफल्ययुक्त उद्गार काढण्याची स्पर्धा लागली आहे. त्यावरच्या विनोदांची `त्सुनामी` `सोशल मीडिया`तून आली आहे. खाणारेच लिहिणारे बनले आहेत.

एक दशकापूर्वी 'कोक'बाबत असेच घडले होते.

कृत्रिम शीतपेये, उठवळ बाजारू खाद्यपदार्थ याबद्दलचे प्रेम थोडक्यात आवरते घ्या, असे चांगले डॉक्टर, आहारतज्ज्ञ सारखं सांगत आहेत. पण चकचकीत जाहिरातींनी आपलं शिक्षण, समज कुचकामी ठरवली.

दोन मिनिटांत काही तरी वादळी करायचंय ना..?
भोगा फळं, मोजा किंमत!!!

Saturday 6 June 2015

पहिल्यावहिल्याची पहिली गोष्ट

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यानंतर बरोबर 11 दिवसांनी अस्मादिकांनाही स्वप्न पडलं. खरं म्हणजे स्वप्न साकार झालं होतं. आपलेही `अच्छे दिन` आता सुरू झाले, असं वाटलं. गोड-गुलाबी स्वप्न. उन्हाळा अजून संपला नसताना, पावसाळा जवळ आला असताना आणि थंडी फाssर लांब असताना हवीहवीशी शिरशिरी उठवणारं स्वप्न. मनाला गुदगुल्या करणारं स्वप्न.

तो दिवस होता गुरुवारचा. दुपारी कधी तरी दूरध्वनी किणकिणला. (मोबाईल होता ना हो... लँडलाईन असता, तर खणखणला असता!) पलीकडून बोलणाऱ्या सद्गृहस्थांनी सांगितलं, 'तुमचं पार्सल पाठवलंय. एक-दोन दिवसांत मिळून जाईल.' म्हटलं पुण्याहून नगरला यायला एक-दोन दिवस कशाला लागतात? उद्याच मिळून जाईल ते. त्या रात्री झोप नीट अशी लागलीच नाही. स्वप्नपूर्ती झाल्याचंच स्वप्नात येत होतं.

मुलाला त्या दिवशी काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सांगितलं. कल्पना होतीच त्याला तशी. पण 'नेमकं कधी?' हे काही नव्हतं त्याला माहीत. 'आजच!', असं सांगितल्यावर गेला की हुरळून. सांगितल्याबरोबर गाडी काढली. निघालो नगरच्या जुन्या बसस्थानकावर. तिथल्या पार्सल अॉफिसात गेलो. क्रमांक सांगितला आणि पार्सल आलंय का विचारलं. त्यानं कधी टाकलं, कुठनं टाकलंय अशी जुजबी चौकशी केली, टेबलावरची नोंदवही चाळली आणि म्हणाला, ''नाही आलं अजून! या दोन दिवसांनी.''

आणि मग अचानक आली निराशेची लाट. अंगभर दाटून आलेल्या उत्साहावर पाणी पाडणारी. तेवढ्यात मुलाची भिरभिरणारी नजर त्या खोक्यावर गेली. त्यानं क्रमांकाची चिठ्ठी घेतली, एकदा पडताळून पाहिलं आणि म्हणाला, "हे काय आलंय की. हेच आहे ते.'' निराशेचं रूपांतर एकदम उत्तेजनेमध्ये. पार्सलवाला निवांत उठला. त्यानं तपासून पाहिलं. पुन्हा एकदा नाव विचारलं. पुन्हा नोंदवही पाहिली. त्यात होती नोंद. हमालीचे पाच-पंचवीस रुपये मागितले आणि दिलं ते खोकं आमच्या ताब्यात!

मोठं होतं ते पुठ्ठ्याचं खोकं. भरपूर जडही होतं. कसंबसं मांडीवर ठेवून आलो. वडील होतेच घरी. त्यांनी ते पाहू नये, काय आहे असं विचारू नये, याची काळजी घ्यायला मुलाला सांगितलं. खोकं आधी बाहेरच्या खोलीत ठेवलं. मग पडद्याच्या आडून ते आतल्या खोलीत नेण्याची कसरत यशस्वीपणे पार पाडली. या सगळ्या हालचाली वडिलांच्या नजरेपासून दूर ठेवण्यात आम्ही बाप-लेक यशस्वी झालो होतो. कात्री, सुरी घेऊन मुलगा तयारच होता. तो थोडा अधिकच उत्साहित, थोडा अधिकच उत्तेजित. माझ्यापेक्षाही. गाठीबिठी सोडवायचा माझा आग्रहही त्यानं खोक्यावरच्या दोऱ्यांबरोबरच कचाकच कापून टाकला.

खोकं उघडलं. वरती असलेले दोन-तीन रद्दी कागद भरकन काढून चोळामोळा करून टाकले. एक खोल श्वास घेतला. डोळे मोssठ्ठे करून पाहिले.

स्वतःवर बेहद्द खूश होत खोक्यातून पुस्तक उचललं. पहिलं पुस्तक. माझं पहिलं पुस्तक! एवढे दिवस वाट पाहायला लावून, अनेक अडथळे ओलांडून अखेर ते माझ्या हाती आलं होतं. सहा जून 2014. त्याच्यावर आवृत्तीची तारीख होती, 29 मे 2014. त्यानंतर नऊ दिवसांनी ते माझ्याकडे आलं होतं. बाळाचं आईला पहिलंच दर्शन!


पहिली प्रत घेतली आणि थेट देवापुढे गेलो. त्याच्यापुढं पुस्तक ठेवलं. क्षणभर डोळे मिटले, हात जोडले.

आणि मग वडिलांना उठवायला मुलाला सांगितलं. ते बाहेर येताच त्यांच्या हाती पुस्तक ठेवलं. हे काय, म्हणून ते पाहू लागले. मुलानं पुस्तकावरंच नाव दाखवलं - सतीश स. कुलकर्णी! त्यांना आश्चर्याचा धक्काच.

मुलानं एका प्रतीचा ताबा घेतला आणि मी दुसऱ्या. पण काय वाचणार त्यात? मीच लिहिलेलं. अनेकदा वाचलेलं. तिन्ही मुद्रितं मीच तर वाचली होती. त्यामुळं लेख उघडला की, पुढची ओळ काय असेल ती लगेच आठवायची. जणू पाठ झाल्यासारखंच. तरीही पानं उलटत उलटत पाहत राहिलो. सगळं व्यवस्थित झालंय का, काही चुकलंय का ते...

एव्हाना संध्याकाळ झाली होती. दोन-चार मित्रांना फोन करून बोलावून घेतलं. तातडीनं या, असं बजावलं. घरी आल्याबरोबर त्यांच्या हाती पुस्तक. लफ्फेदार सही करून. त्यांना आश्चर्याचा धक्का. मग त्यांच्याकडून कौतुक. खऱ्या मित्रांचे मनातून येणारे शब्द. किती सुखावतात ते, हे तेव्हा कळलं. 'प्रकाशन केलं नाही का? का नाही केलं? आपण करू...' असं सुरू त्यांचं...

गावाला गेलेली बायको दुसऱ्या दिवशी परतली. तिलाही असाच धक्का. जबरी. मग मित्रांना पुस्तक दिल्याचं सांगितल्यावर तिची तक्रार. आपण कार्यक्रम केला असता ना... थोड्या वेळानं आलेल्या मित्रासमोर पुन्हा तोच विषय. प्रकाशनाचा समारंभ. त्यांची समजूत काढता काढता पुरेवाट.

प्रकाशकाकडून तब्बल 100 प्रती मागवल्या होत्या. पहिलं पुस्तक. नातेवाईक-मित्र-स्नेही-लिहिण्यामुळे झालेले काही मित्र... या सगळ्यांना आनंदात सहभागी करून घ्यायचं म्हणून, त्यांनी आपलं कौतुक करावं म्हणून आणि थोडी कृतज्ञतेची, बरीचशी कृतकत्यतेची भावना म्हणून पुस्तक पाठवायचं ठरवलंच होतं. त्यासाठीच एवढ्या प्रती. त्याची यादी करायला बसलो. वडिलांनी एक-दोन नावं सांगितली. बायकोनं दहा एक प्रती लगेच नोंदवून टाकल्या. मुलानं हळूच विचारलं... त्याला मित्राला द्यायचं होतं. आनंदाच्या भरात होकार निघाला तोंडून लगेच! यादी सुरू झाली, पत्ते शोधून टिपून ठेवू लागलो.

शंभर जाड पाकिटं, डिंक, चिकटपट्टी, पेस्ट-अप स्लिप याची खरेदी झाली. ज्यांचे पत्ते नव्हते, सापडत नव्हते त्यांना एसएमएस पाठवून पत्ता विचारला. त्या काळात रजाच होती. रविवारचा अख्खा दिवस पुस्तकांवर पेस्ट-अप स्लिप लावून त्यावर मजकूर लिहिण्यात गेला. पेस्ट-अप स्लिप कशासाठी? तर बुवा नाही आवडलं एखाद्याला पुस्तक, तर त्यानं ती स्लिप काढून कुणाला तरी द्यावं. पुस्तकावर आपलं नाव लिहिलेलंय, मग ते दुसऱ्या कुणाला कसं द्यायचं, असा संकोच त्याला वाटू नये म्हणून. पुस्तक न वाचताच राहू नये म्हणून.

मग पाकिटावर पत्ते लिहिणं आलं. पुस्तकावरचं आणि पाकिटावरचं नाव एकच आहे ना, याची दोन-दोन वेळा खात्री करून घेऊन ते पाकिट व्यवस्थित बंद करणं. दोन दिवस चाललं हे काम. बुधवारी (11 जून) सकाळी पहिला गठ्ठा घेऊन टपाल कार्यालयात आणि तिथनं कुरिअरकडं. पहिल्या टप्प्यात चाळीस-एक पुस्तकं रवाना. एक ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. त्याच दिवशी मग इ-मेल पाठविली खूप जणांना. माझं पहिलं पुस्तक आलंय, असं सांगणारी.

दुसऱ्या दिवशी उठलो तेच कुणाचा फोन येतोय का, याचा अंदाज घेत. वाटत होतं, सकाळी सकाळी लोकांच्या हाती पुस्तक पडेल. आणि ते लगेच फोन करतील. जरा जास्तच उत्तेजित झालो होतो. इ-मेलला काही जणांची उत्तरं आली होती. आनंद व्यक्त करणारी, अभिनंदन करणारी, पुस्तक कुठं मिळेल याची चौकशी करणारी. मुखपृष्ठाबद्दल आणि द. भि. कुलकर्णी यांच्यासारख्या महत्त्वाच्या समीक्षकानं मनापासून `ब्लर्ब` लिहिल्याचं कौतुक करणारी.

पहिला फोन दुपारी बाराच्या सुमारास आला. तो होता मुंबईहून वि. वि. करमरकर यांचा. 'अरे! तू हे काय केलंयस...' असं कौतुकानं म्हणणारा. मग पुस्तक वाचून पुन्हा त्यांचा दोन-तीन दिवसांनी फोन आला. त्यातल्या काही लेखांबद्दल सांगणारा. आणि सल्ला देणारा - की बुवा हे ठीकच आहे. पण तू आता एखाद्या विषयाचा सविस्तर, सखोल अभ्यास करून त्यावर पुस्तक लिही.

मग दिवसभर फोन करीत राहिलो. पुस्तक मिळालं का विचारत राहिलो. एका अत्यंत जवळच्या स्नेह्याला संध्याकाळी फोन केला. त्यांना पाकीट मिळालं होतं. मग बायकोच्या आग्रहानं रात्री त्या स्नेह्यांच्या पत्नीला पुन्हा फोन. त्यांनी फोन पतिराजांकडं दिलां. माझं त्यांच्याशी बोलणं झालंय, हे न ऐकताच त्यांनी तो सोपवला त्यांच्या हाती. मग मुलाची समजूत काढावी त्या थाटातलं बोलणं. पुस्तक आल्याचं कौतुक नको होतं मला त्यांच्याकडून. मी काय लिहिलंय ते वाचून त्यावर मत हवं होतं त्यांचं. वाटलं होतं, `माझं पुस्तक` म्हणून ते हाती पडल्या पडल्या एक-दोन तरी लेख वाचून काढतील. त्यावर आपणहून काही तरी बोलतील. पण तसं काहीच घडलं नाही...अजून तरी!

तो सगळा आठवडा त्याच धुंदीचा होता. फोन करणे, इ-मेल तपासणे, आलेल्या उत्तरांना आभार मानणारं काही लिहिणे. जागेपणीचा एक क्षणही त्या पुस्तकावाचून गेला नाही. राहिलेल्या मंडळींना पुस्तक पाठवण्यासाठी पत्ते गोळा करीत राहिलो. यथावकाश पत्ते गोळा झाले. पोस्टातून, कुरिअरने पुस्तकं रवाना झाली.आणि मग वाट पाहणं सुरू झालं. कुणी कुणी वाचलं? त्यांना कसं वाटलं? की कसंसंच वाटलं? आवडलं की नाही? आवडलं असेल तर त्यातलं काय आवडलं? नसेल तर का नाही आवडलं?

मागे `लोकसत्ता`त असताना नगरच्या वर्धापनदिन पुरवणीत एक विषय केला होता. आपल्या पहिल्या पुस्तकावर लेखकांना लिहायला सांगितलं होतं. प्रा. रंगनाथ पठारे यांनी फार छान लिहिलं होतं. पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर लेखकाला (आणि कवीलाही) वाटत असतं की, जिकडेतिकडे आपलीच चर्चा आहे. आपल्याच पुस्तकाबद्दल लोक भरभरून बोलताहेत वगैरे वगैरे... अगदी तस्संच वाटत होतं. वृत्तपत्रांना परीक्षण लिहायला पुस्तकंच नाहीत. आपलं पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचलं की, लगेच त्याच्यावर छापून येणार. सविस्तर, आपल्या दर्जाचं-शैलीचं कौतुक करणारं इत्यादी इत्यादी. ज्यांना ज्यांना पुस्तक मिळालंय, ते हातातलं सगळं काम टाकून देऊन आधी वाचणार. वाचून झाल्या झाल्या लगेच सविस्तर पत्र लिहायला बसणार. लिहून झालं की, तातडीने टपालात टाकणार. आणि माझ्यासारखंच फोन करून विचारणार, पत्र मिळालं की नाही? (प्रसिद्ध लेखक-समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी `ब्लर्ब`मध्ये लिहिलंय - हे काही एका दमात वाचून संपवायचं पुस्तक नाही. आता लक्षात येतंय, हा सल्ला वाचकांपेक्षा त्यांच्या झटपट प्रतिसादाची वाट पाहणाऱ्या माझ्यासारख्या नवख्या लेखकालाच होता!)

हळुहळू काही काही प्रतिक्रिया येत गेल्या. प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम बोरकर यांनी पुस्तक मिळाल्यावर एका बैठकीत वाचलं. त्यांनी मग त्याचं परीक्षण करणारी प्रतिक्रियाच दिली. इ-मेलनी पाठवून दिली ती. आणि मग अनुभवी लेखक या नात्यानं काही युक्तीच्या गोष्टीही सांगितल्या. दौंडच्या डॉ. अमित बिडवे यांची कधी भेट नाही झाली. पण त्यांनी त्यांचं पहिलं पुस्तक ओळख नसतानाही पाठवलं होतं. ते वाचून लिहिलेलं पत्र त्यांना आवडलं होतं. मग त्यांनीही पुस्तक मिळाल्यावर लगेच पत्र लिहिलं. 'आपल्या माणसाची पुस्तकं भेट म्हणून घ्यायला संकोच वाटतो. पण त्याच्या सहीनिशी ती हवीशीही वाटतात. म्हणून मग मी भेट द्यायला म्हणून त्यांची पुस्तकं विकत घेतो,' असं लिहून त्यांनी तीन पुस्तकं पाठवून देण्यासाठी कळवलं. त्याचे पैसे कुठं, कसे पाठवू असंही त्याच पत्रात विचारलं होतं.

विजय सेठी म्हणजे पत्रकारितेमुळं ओळख झालेला माणूस. नंतर आयुष्यभराचा मित्र. पुस्तक आल्याचं सांगितल्यावर त्यानं हक्कानं दोन प्रती मागितल्या. त्यातली एक मित्राला वाचायला दिली. आणि मग एके दिवशी त्यानं अचानक 50 प्रतींची मागणी केली. त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या सगळ्या माणसांना त्यानं हे पुस्तक भेट दिलं!

आनंद आणि धनंजय देशपांडे या मामेभावंडांना पुस्तक आवडलं. त्यांनी परस्परांशी बोलून भेट देण्यासाठी म्हणून 15 प्रती घेतल्या. हाही एक सुखद अनुभव.

मुंबईचा आत्येभाऊ नाना, पुण्याच्या संजीवनीवहिनी, नगरचा भाचा श्रीकांत जोशी यांनी आवर्जून पत्र लिहिलं. हे सगळे माझे जवळचे नातेवाईक. त्यामुळे त्यांच्या पत्रात अर्थातच कौतुक होतं. 'आपल्यातला एक' 'लेखक' झाला, याचा त्यांना मनस्वी आनंद झालेला त्यातून सहज दिसला. स्तुती कुणाला प्रिय नसते? मला तरी आहेच. त्यामुळंच त्यांच्या पत्रांनी सुखावून जायला झालं. श्रीकांतनं हे पुस्तक त्याच्या एका मित्राला भेट दिलं. बँकेतून निवृत्त झालेल्या या सद्गृहस्थांनी त्यांच्या कोरीव अक्षरात अभिप्राय लिहून तो थेट माझ्या हातात दिला. फार छान वाटलं त्या दिवशी.

पण त्याहून दोन विलक्षण अनुभव. पूर्वी नगरमध्ये असलेल्या आणि आता पुण्यात स्थायिक झालेल्या रवींद्र देशपांडे यांना इ-मेल पाठवली. त्यांना पत्ता विचारला. पण आपल्या माणसाचं पुस्तक फुकट घ्यायचं नाही, असं सांगत त्यांनी पुण्यातली दोन-तीन दुकानं हिंडून पुस्तक विकत घेतलं आणि वाचून प्रतिक्रियाही कळवली.

अशीच गंमत केली डॉ. उज्ज्वला दळवी यांनी. त्यांच्याशी ओळख झाली इ-मेलच्या माध्यमातून. त्यांचं 'सोन्याच्या धुराचे ठसके' पुस्तक प्रदर्शनात पाहिलं. आणि एकदा इ-मेलमध्ये तसं सहज लिहिलं. त्याच्या उत्तरादाखल लिहिताना त्यांनी कळवलं, 'आम्ही तुमचं पुस्तक इथं मिळवून वाचलंसुद्धा!' `इथं` म्हणजे सौदी अरेबियात!! त्या क्षणी मला माझ्या करंटेपणाची फार लाज वाटली. त्यांचं पुस्तक समोर असूनही मी 'नंतर घेऊ' म्हणत उद्यावर ढकललं. आणि त्यांनी लांब तिथे कुठे तरी पुस्तक मिळवून वाचलंही. त्यानंतर पुढच्याच वेळी प्रदर्शनात जाऊन ते झकास पुस्तक आणलं. एका बैठकीत संपवलं. आणि मध्यरात्री अडीच-तीन वाजता त्यांना सविस्तर लिहिलं, तेव्हा कुठं थोडं बरं वाटलं.

मग कधी तरी तीन महिन्यांनी ह. मो. मराठे यांनी करून दिलेला परिचय 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर पुन्हा एक कौतुकाचं छोटंसं वादळ. काही इ-मेल, काही फोन, काही प्रत्यक्ष भेटीतलं बोलणं. पण ते तेवढंच. त्यानंतर त्या पुस्तकावर कुठं काही आलं नाही. एक मात्र झालं. आभार मानण्यासाठी मराठे यांना फोन केला. ते मोकळेपणानं बोलले. पुस्तक खरंच आवडलं, असं त्यांनी सांगितलं. दुखरेपणावर तेवढीच एक मलमपट्टी.

दहा-एक मंडळींनी पत्रं लिहिली. वीस-एक जणांनी इ-मेलवरून सविस्तर किंवा थोडक्यात कळवलं. तेवढ्याच मंडळींनी फोनवरून अभिप्राय दिला. बाकी ज्यांना पुस्तक पाठवलं, त्यातल्या 50 ते 60 टक्के मंडळींनी काहीच कळवलं नाही. वाचल्याचं नाही किंवा वाचून राहिल्याचंही नाही. आवडल्याचं नाही किंवा नावडल्याचंही नाही. अगदी जवळच्या मंडळींनीही पुस्तक वाचायची तसदी अजून घेतलेली नाही, हे लक्षात येतं तेव्हा आत कुठं तरी कळ येते.

असाच एक मित्र. पहिल्याच दिवशी त्याला पुस्तक दिलं. अजून वाचलेलंच नाही त्यानं. एके दिवशी त्याला म्हणालो, 'तू वाचत नाहीस, तोवर जेवणाचा खर्च तुझा.' त्यानं तीन जेवणं दिली. मुकाटपणे बिल भरलं. पुस्तक वाचण्याचं धाडस त्याला होत नसावं बहुतेक.

फेसबुकवरून ओळख झालेल्या दोन मित्रांनाही असंच पुस्तक पाठवलं. त्यातल्या एकानं काहीच कळवलं नाही. आणि एका मैत्रिणीनं अर्धवट प्रतिक्रिया दिली. 'सविस्तर लिहायचंय, नंतर लिहिते' असं म्हणत. अशाच एका इ-मेल-ओळखीच्या बाईंनी मेल वाचून विचारलं, 'मला पुस्तक कुठं मिळेल? की आपण एक्सचेंज करायचं? म्हणजे माझं पुस्तक मी पाठवते, तुझं तू पाठव.' नको वाटली ही बार्टर पद्धत. पत्ता विचारून त्यांना पुस्तक पाठवलं. त्यांची साधी पोहोचही नाही आली. एकदा विचारल्यावर दोन ओळीत लिहिलं. नंतर दोन वेळा विचारल्यावर उत्तरही नाही दिलं.

वर्षभरात असे बरेच अनुभव. सुखावणारे, दुखावणारे, विचार करायला लावणारे. 'पुस्तक प्रकाशित झालं' असं सांगितल्यावर एकानं 'किती पैसे दिले प्रकाशकाला?' असं थेट विचारल्यावर माझा अहं दुखावलाच. 'हौस म्हणून खिशातले पैसे खर्चून पुस्तक काढायचं असतं, तर आतापर्यंत 10 पुस्तक आणली असती,' असं सुनावलं त्याला. भेटीच्या यादीतून त्याचं नाव कटाप करून टाकलं. त्यानं दोन-तीन वेळा विचारल्यावर मग विकतच दिलं पुस्तक! पुस्तक समारंभपूर्वक प्रकाशित का केलं नाही, असा 'जाब' विचारणाऱ्या बऱ्याच जणांनी नंतर त्याच्याबद्दल काहीच कळवलं नाही.

पहिला महिनाभर रोज आपण 'लेखक' झालो, याची आठवण यायची. किती तरी वेळा पुस्तक हातात घेऊन पाहिलं.

असंच चाळता चाळता एकदा लक्षात आलं की, एक-दोन चित्रांमध्ये थोडी गडबड झालीय. तीन-तीन वेळा वाचूनही 'आशा भोसले'ऐवजी 'अशा भोसले' अशी चूक राहिलीच आहे. आणखी एकानं शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका आहेत, असं सांगितलं. पण त्यावर माझा विश्वास नाही.

दिवस पुढे पुढे जातच असतात. हळुहळू पुस्तकाची आठवण रोजच्या ऐवजी तीन-चार दिवसांनी येऊ लागली. मग तो कालावधी आठवड्यावर गेला. मग महिन्यावर. आता तर माझ्याकडचीच एक प्रत कपाटात आहे. ती प्रत, काही पत्रं, काही इ-मेल... मी `लेखक` असल्याचे माझ्याकडचे काही पुरावे! गेल्याच महिन्यात बायकोला सहज विचारलं, ''बाई गं तू तरी माझं पुस्तक पूर्ण वाचून काढलंस का नाही?'' तर तिचं उत्तर होतं, ''चार-पाच लेख राहिलेत अजून.'' आता बोला!

परवा असाच विचार करताना लक्षात आलं, आपण तरी किती लोकांना त्यांनी पुस्तक भेट दिल्यावर आवर्जून लेखी कळवलंय? अगदी 100 टक्के नाही; पण बऱ्याच जणांना कळवलंय. पत्रकार या नात्यानं जी मंडळी पुस्तक भेट देतात, ती वाचण्याची आणि त्यावर अभिप्राय देण्याची सक्ती मी स्वतःवर कधीच केली नाही.

'लेखक' बनल्याच्या या वर्षानं काय दिलं? 'अच्छे दिन'चं स्वप्न दाखवलं हे तर खरंच. अपेक्षिले तेवढे ते आलेही नाहीत. पण उद्या कदाचित ते येतीलही. झोपेतून जागा झालो असलो, तरी स्वप्नाचे सारेच रंग अजून फिकुटलेले नाहीत. कुणी सांगावं, उद्या ते इंद्रधनुषीही होतील.

जवळच्या वाटणाऱ्यांनी वाचलं नाही, कठोर परीक्षण केलं नाही, चुका सांगितल्या नाहीत, याची खंत आहेच. पण अनपेक्षितपणे झालेल्या कौतुकाचा भरभरून आनंद आहे. बरोबर आज वर्ष झालं त्या गोष्टीला. पहिल्या (लांबलेल्या) गोष्टीत तूर्त एवढंच!!

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...