Wednesday 22 December 2021

हसायला बंदी नि रडायची चोरी

 

मनुष्यप्राण्याला हसण्याची अद्भुत देणगी मिळालेली आहे म्हणतात. ह्या देणगीचं रहस्य शोधण्यासाठी खूप संशोधन झालं, चालू आहे. त्यातून काही निष्कर्ष संशोधकांनी काढले आहेत. हसण्याचे खूप फायदे सांगितले जातात नि कारणंही. का हसतो माणूस - एखादा विनोद झाला म्हणून? कुणाची फजिती झाल्यामुळं? ही दोन्ही कारणं खरी असली, तरी ती तेवढीच नाहीत. हसणं संवादाचं एक साधन आहे. चेहऱ्यावर फुलणारं हसू समाजातील नातेसंबंध वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं, असं संशोधक-अभ्यासकांचं मत आहे.

हसू बऱ्याच वेळा भावनांचं दर्शन घडवतं, असं म्हणतात. हसण्याने ताण हलका होतो, मन मोकळं होतं. सिग्मंड फ्रॉईड ह्यांनी म्हटलंय की, 'हसण्यामुळे मानसिक कोंडी दूर होते. मनावरचं दडपण आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते.' हसणं आरोग्यासाठी चांगलं आहे, असं मानलं जातं. 

...तर ह्या हसण्यावर अचानक कुणी बंदी आणली तर? अमूक इतके दिवस अजिबात हसायचं नाही! एखादी तरी स्मितरेषा... नाव नको. कठोरपणे पालन झालंच पाहिजे निर्बंधाचं. तो मोडला तर शिक्षा. ही शिक्षा काय असेल, ह्याचा अंदाज करणं कठीण. संबंधित व्यक्ती कुटुंबीयांना, आप्तांना, मित्र-स्नेहीजनांना भविष्यात कधीही न दिसण्याची दाट भीती.

'शोकमग्न' उत्तर कोरियात ही बंदी आलेली आहे. देशाचा कारभार ज्याच्या लहरीवर चालतो, तो हुकुमशहा किम जोंग-उन शुक्रवारपासून (दि. १७ डिसेंबर)  सुतकात आहे. त्याचे वडील आणि आधीचे अध्यक्ष किम जोंग-इल ह्यांच्या निधनाला शुक्रवारी १० वर्षं झाली. मरणाचा दशकपूर्ती सोहळा करताना ११ दिवसांचा सार्वत्रिक शोक व्यक्त केला जात आहे. ह्या काळात कुणी हसायचं नाही, कसली खरेदी करायची नाही आणि मद्यपान करायचं नाही, असा सक्त आदेश आहे. तसं करताना कुणी आढळलंच तर कठोर शिक्षा. आदेशाचं कुणी उल्लंघन करीत नाही ना, हे पाहण्यासाठी पोलीस खातं दिवस-रात्र लक्ष ठेवून आहे.

बंधनं एवढ्यावरच संपत नाहीत. अजूनही आहेत. स्मृतिदिनी साधं किराणा सामान आणण्याचीही परवानगी नव्हती. ह्या शोकपर्वाच्या दरम्यान कुणाचा वाढदिवस येत असल्यास, त्यानं तो मुळीच साजरा करायचा नाही. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, तर त्याचं दुःखही मर्यादेत व्यक्त करायचं. रडण्याचा आवाज घराबाहेर मुळीच येता कामा नये. मृताला शेवटचा निरोप देण्यासाठीही वाट बघायची. हा अकरा दिवसांचा शोककाल संपल्यावरच 'राम नाम सत्य है' म्हणायचं! हसायला बंदी आणि रडायची चोरी.

उत्तर कोरियातील ह्या तुघलकी फर्मानाच्या बातमीने आंतरराष्ट्रीय पातळीवर माध्यमांचं स्वाभाविकच लक्ष वेधून घेतलं. 'द गार्डियन', 'न्यूजवीक', ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतील पोर्टल ह्यांनी बंदीची बातमी ठळकपणे प्रसिद्ध केली. भारतातील वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरचित्रवाणी वाहिन्या ह्यांच्या संकेतस्थळावर तर ही बातमी शुक्रवारीच झळकली. ह्या सर्वांच्या बातमीचा स्रोत एकच आहे - 'रेडिओ फ्री एशिया'. 'द गार्डियन'नं ह्या बातमीचा व्हिडिओ संकेतस्थळावर दिला आहे. त्यात म्हटलंय की, (ह्या शोककाळात) कुठल्याही प्रकारे आनंदाची भावना व्यक्त करण्यासच सक्त मनाई आहे.


प्योंगयांगमध्ये उभे असलेले किम-संग आणि किम जोंग ह्यांचे पुतळे.
शोकपर्वाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. 
(छायाचित्र सौजन्य - किम वोन जिन)

मग औत्सुक्य वाटलं की, खुद्द उत्तर कोरियातील दैनिकांनी ही बातमी कशा पद्धतीनं प्रसिद्ध केली असेल? तिथल्या पाच-सहा दैनिकांची संकेतस्थळं पाहिली. बहुतेक सारी दैनिकं सरकारी मालकीची किंवा सरकारच्या वर्चस्वाखालची आहेत. कोणत्याही संकेतस्थळावर अशा प्रकारच्या बंदीची बातमी दिसली नाही. ती खोडून काढणारीही बातमी कुठं आढळली नाही. 'किम जोंग-उनच्या नेतृत्वावर देशाचा अढळ विश्वास आहे,' अशा आशयाचे लेख, संपादकीय मात्र त्या दिवशी प्रसिद्ध झाल्याचं 'कोरिया टाइम्स'च्या वृत्तान्तामध्ये म्हटलं आहे. 

देशाचा सर्वेसर्वा असलेल्या किम जोंग-उन ह्यानं काढलेलं फर्मान मोडण्याचा परिणाम काय होतो, ह्याची उत्तर कोरियाई जनतेला पूर्ण जाणीव आहे. त्याच्या एक दशकाच्या राजवटीत आतापर्यंत २७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा जाहीरपणे देण्यात आलेली आहे.

योगायोगाची गोष्ट अशी की, ज्या दिवशी उत्तर कोरियात ह्या 'राष्ट्रीय शोका'ची आणि त्यानिमित्तच्या निर्बंधांची घोषणा झाली, त्याच दिवशी दक्षिण कोरियातील 'कोरिया जूंगअँग' दैनिकानं एक बातमी ठळकपणे प्रसिद्ध केली. ती बातमी आहे संयुक्त राष्ट्रांत मंजूर झालेल्या निषेध ठरावाची. उत्तर कोरियात सलग १७ वर्षांपासून मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे आणि त्याचा संयुक्त राष्ट्र महासभेने निषेध केला. महासभेनं एक दिवस आधीच (गुरुवार, १६ डिसेंबर) हा ठराव एकमतानं मंजूर केला. नागरिकांचा अनन्वित छळ, अमानवी पद्धतीच्या शिक्षा, राजकीय कैद्यांच्या छावण्या, लैंगिक अत्याचार, स्वदेशी आणि परदेशी नागरिकांचं अपहरण, आचार-विचार स्वातंत्र्यावर बंदी, परदेशात गेलेल्या कामगारांचे शोषण अशा अनेक प्रकारे मानवी हक्क पायदळी तुडविले जात असल्याचं निषेधाच्या ठरावात म्हटलं आहे.

दक्षिण कोरियातील 'द डोंग-ए' दैनिकानंही (त्याचा अर्थ 'मूळ' किंवा 'अस्सल' असा आहे.) ह्या निषेध ठरावाच्या निमित्तानं संपादकीय लिहिलं आहे. त्याचं शीर्षक आहे - North Korea is like a time-bomb set into motion. त्यात म्हटलं आहे की, किम जोंग कुटुंब तीन पिढ्यांपासून सत्तेवर आहे. किम जोंग-इल ह्यांच्या मृत्यूला एक दशक होत असताना उत्तर कोरिया अजिबात बदललेला नाही. किम कुटुंबाबद्दल निष्ठा व्यक्त करण्याची शपथ घेण्यासाठी जनतेवर जुलूम-जबरदस्ती केली जाते. मानवी हक्कांचं उल्लंघन हे तिथलं अतिकटू वास्तव आहे.

कोरोनाच्या अर्थात कोविड-१९च्या महामारीनं अवघं जग त्रस्त असताना उत्तर कोरियामध्ये नेमकी काय परिस्थिती होती, हे काही फारसं स्पष्ट झालेलं नाही. जगभरात कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या येऊ लागताच ह्या देशानं जानेवारी २०२०मध्ये आपल्या सर्व सीमा कडेकोट बंद केल्या. कोरोनावर लसीकरणाचा उपाय जगानं स्वीकारला असताना, उत्तर कोरियानं मात्र त्याकडे पाठ फिरविली. विविध देशांनी लस देण्याची तयारी दाखवली असताना उत्तर कोरिया सरकारनं त्याबद्दल थोडंही औत्सुक्य दाखवलं नाही. 'कोव्हॅक्स'नं चीनमध्ये विकसित केलेल्या 'साइनोव्हॅक' लशीचे तब्बल ३० लाख डोस देऊ केले होते. तेही स्वीकारले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियात कोरोनावरचं लसीकरण झालेलंच नाही.

किम जोंग-उन तुघलकी वागण्याबद्दल (कु)प्रसिद्ध आहेच. त्यामुळे त्याच्या ह्या नव्या फर्मानाबद्दल फारसं आश्चर्य वाटलेलं नाही जगभरात. कोरियातील रहिवाशांना दोन वर्षांपूर्वी लांबलचक कातडी कोटात आपल्या अध्यक्षाचं दर्शन झालं. तो कोट लोकप्रिय झाला. पण आपल्या पोषाखाची कुणी नक्कल करू नये म्हणून त्यानं जनतेला तसा कोट वापरण्यावर बंदी आणली. 'राजा प्रजेसारखा नव्हे, तर तिच्याहून वेगळाच दिसला पाहिजे. तेच त्याचं वैशिष्ट्य असावं,' अशी काहीशी किम जोंगची भावना असावी.


उत्तर कोरियाचा हुकtमशहा किम जोंग-उन याने प्योंगयांगमधील कुमसुसान राजवाड्यात
आपल्या पित्याला दहाव्या स्मृतिदिनी आदरांजली वाहिली.
(छायाचित्र सौजन्य - योनहॅप)

चमचमीत खाणे, बेहोश होण्याएवढे पिणे, बेभान जल्लोष करणे ह्यावर सुतकाच्या काळातली बंदी समजून घेता येईल कदाचित. पण हसण्यावर बंदी? उत्तर कोरियात एकूणच राज्यकर्त्यांना हसण्याचा तिटकारा आहे का? किम जोंग-उनची अनेक छायाचित्रं उत्तर कोरियातील दैनिकांच्या संकेतस्थळावर पाहायला मिळतात. त्यातली दोन लक्षणीय वाटतात. एका छायाचित्रात सैन्यदलातील महिला जवान-अधिकाऱ्यांच्या घोळक्यात किम आहे. त्याच्या जवळच्या सर्व महिला रडताना दिसतात. दुसरं छायाचित्र शाळेतलं आहे. त्यात दिसतात किमच्या मागे धावणारी, आसपास घोटाळणारी चिमुकली मुले. त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहताना पाहायला मिळतात.

हसण्याचं एवढं वावडं का असावं बरं? हसणं म्हणजे नेहमीच विनोदावर किंवा कुणाची फजिती झाली म्हणून नसतं. बी. बी. सी. इंग्रजी संकेतस्थळावर आरोग्य विभागात हसण्याची कारणमीमांसा करणारा लेख आहे. त्यात लिहिलं आहे की,  माणसे का हसतात? आपण समाधानी, आनंदी आहोत, हे ते त्यातून दाखवून देऊ इच्छित असतात. परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते हसताना दिसतात.

मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट प्रोव्हिन ह्यांना अभ्यासात असं आढळलं की, माणसं विनोदापेक्षा मित्रांशी बोलताना अधिक वेळा हसतात. आपण इतर कुणाबरोबर असलो की, तीसपटीनं जास्त हसतो. आपण हसतो ते प्रतिक्रियांवर, विधानांवर - अनेक वेळा त्यात विनोदाचा दूरवर संबंध नसतो.

हसणं म्हणजे संवादाचं एक साधन आहे. ते नेहमीच काही प्रतिक्रियेदाखल नसतं. लोक आपल्याला आवडतात आणि आपण त्यांना समजून घेतो, हे दाखवून देण्याचं हास्य एक साधन आहे, असंही ह्या लेखात म्हटलं आहे.

हसण्यावरची मराठी विश्वकोशातली नोंद आहे - हसण्याची शारीरिक प्रतिक्रिया सर्व माणसांत सारखी असली, तरी या प्रतिक्रियेला जन्म देणाऱ्या मानसिक कारणांत मात्र विविधता आहे. बालकांमध्ये हास्य केवळ आनंदाचे निदर्शक असते. परंतु प्रौढांमध्ये मात्र हास्यामागची मानसिक भूमिका विविध प्रकारची असू शकते. ही विविधता हास्याचे वर्णन करणाऱ्या विविध शब्दयोजनांनी स्पष्ट होते. उदाहरणार्थ, निरागस हास्य, तिरस्कारयुक्त हास्य, तुच्छतादर्शक हास्य, उपहासात्मक हास्य, निंदाव्यंजक हास्य, छद्मी हास्य वगैरे. हास्य हे शरीर व मन दोन्हींचे टॉनिक आहे, उपकारक आहे, आरोग्यकारक आहे. हास्याची खरी उपयुक्तता त्याच्या सामाजिकतेत आहे.

असं असताना हसण्याबाबत एवढी टोकाची भूमिका का? एकट्या किम जोंगलाच हसण्यावर बंदी आणावी वाटते की जगभरातील सगळ्याच हुकूमशहांना हसण्याबद्दल भीती वाटते? 'हुकूमशहा हसत नसतात,' असं मुसोलिनीनं म्हटल्याची आठवण लिंकन मेमोरियल विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. स्टुअर्ट डब्ल्यू. मॅकक्लेलंड ह्यांनी लॉस एंजेलेस इथल्या व्याख्यानात (१९४२) सांगितली आहे.

बी. बी. सी.च्या लेखात म्हटलेलं आहे की, उंदीर हसतात, चिंपांझी हसतात आणि कुत्रीही. उंदीर विनोदावर हसत नाहीत, तर खेळताना हसतात. प्रसिद्ध लेखक राल्फ वाल्डो इमर्सन ह्यांनी लिहिलंय - पृथ्वी फुलांच्या रूपात हसते. एका वचनानुसार आशावादी सगळं विसरण्यासाठी हसतो आणि निराशावादी हसायचंच विसरतो.

उत्तर कोरियातील लोकप्रिय विनोद

उत्तर कोरियातील जनतेला हसण्याचं वावडं आहे का? काहींच्या म्हणण्यानुसार त्या माणसांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलत नाही. पण ही माणसंही हसतात, त्यांना विनोद प्रिय आहे, ह्याचे दाखले देणारेही आहेत. उत्तर कोरियामध्ये लोकप्रिय असलेले काही विनोद संकेतस्थळांवर सहज सापडतात. त्यात खूप नवीन किंवा वेगळे विनोद आहेत असं नाही. बरेच विनोद असे असतात की, ते फिरत जातील तिथली वेषभूषा स्वीकारतात, त्या मातीचे संदर्भ अंगीकारतात. उत्तर कोरियातील विनोदांचंही तसंच आहे. त्याचा थोडा मासला -

हा पहिला...

सामाजिक माध्यमावर कुणी तरी प्रश्न विचारलेला असतो - 'डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया' ह्या देशात खटकण्यासारखं काय आहे?

...काही क्षणांत उत्तर मिळतं - पहिलाच शब्द, डेमोक्रॅटिक!


कोरोनाबद्दलचे दोन विनोद...

उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण कसा नाही आढळला बुवा?

त्यात काय. तिथं नेहमीच 'लॉकडाऊन' चालू असतं!

आणि हा दुसरा...

देशातील कोरोनाच्या रुग्णांची दर अर्ध्या तासाने दिली जाणारी ताजी माहिती -

सकाळी ८.०० -

८.३० -

९.०० -

९.३० -

१०.०० -

१०.३० -


हा थोडासा राजकीय विनोद -

उत्तर कोरियातील एका तुरुंगातील कैदी तिथल्या ग्रंथालयात पुस्तक आणायला जातो. एका चळवळ्या कार्यकर्त्याचं गाजलेलं पुस्तक त्याला वाचायचं असतं.

ग्रंथपाल म्हणतो, ''पुस्तक काही नाही गड्या. पण तो लेखक इथंच आहे!''

आणि हा समारोपादाखल...

कलादालनात चित्रप्रदर्शन चालू असतं. हातात सफरचंद घेऊन असलेल्या ॲडम आणि इव्ह ह्यांचं चित्र अगदी मन लावून पाहताना इंग्रज नागरिक म्हणतो, 'हे अगदी शंभर टक्के इंग्लिश नागरिक आहेत. कारण त्यातला पुरुष सर्वोत्तम खाणं एका स्त्रीबरोबर वाटून घेतोय.'

त्याला अडवत फ्रेंच नागरिक म्हणतो, 'काही तरीच काय! निर्वस्त्र असूनही किती मोकळेपणाने, विनासंकोच वावरताना दिसतात ते. फ्रेंचच आहेत ते मुळी.'

त्या दोघांनाही झिडकारत उत्तर कोरियाचा नागरिक म्हणतो, 'हे दोघं उत्तर कोरियाचेच. शंकाच नाही. त्यांच्याकडे कपडे नाहीत, जवळ पुरेसं खायला नाही आणि तरी त्यांचा आविर्भाव आपण स्वर्गात बागडत असल्यासारखा आहे बघा!'

------------------------------

(संदर्भ - koreatimes.co.kr, donga.com, rfa.org, hankookilbo.com, mirror.co.uk koreajoongangdaily.joins.com, koryogroup.com/jokes, upjoke.com/north-korea-jokes, mirror.co.uk)

------------------------------

#northkorea #nolaughing #kim_jong_un #mourning #corona #covid19 #vaccination #UN #dictator #koreanjokes #smile #southkorea #humanrights


Thursday 16 December 2021

कार्यकर्ताही नि पत्रकारही!


सुधीर मेहता. नगरमध्ये पत्रकारिता आणि राजकारण करणाऱ्या (आणि एकाच वेळी ह्या दोन्ही गोष्टी करणाऱ्या) माणसांना हे नाव माहीत नाही, असं होणारच नाही. साधारण दोन हजारच्या आधी पत्रकारितेत आलेल्या, सत्तरनंतर राजकारणात आलेल्या बहुतेक सगळ्यांची सुधीरशी ओळख होती. काही अपवाद वगळले तर त्यांचे सुधीरशी अरे-तुरेचे संबंध होते. पत्रकार त्याला पत्रकार कमी नि राजकीय कार्यकर्ता अधिक मानत आणि राजकारणी त्याला पत्रकार म्हणत. थट्टा, क्वचित टवाळी केली जात असली, तरी ह्या दोन्ही क्षेत्रांतल्या अनेकांना तो आपला वाटत राहिला. त्यांचे त्याच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते.

नगरमध्ये ३३ वर्षांपूर्वी आलो मी. 'केसरी'मध्ये रुजू झालो. सर्जेपुऱ्यातल्या प्रियदर्शनी संकुलातील कार्यालयात सुधीरला पहिल्यांदा पाहिलं. तेव्हा तो 'एन. एस. यू. आय.'चं आणि युवक काँग्रेसचं काम करीत होता. प्रसिद्धिपत्रकं घेऊन तो येत असे. त्याची ओळख 'पत्रकार' अशीही होती. कोणत्याच वर्तमानपत्रात काम न करणारा हा माणूस पत्रकार कसा, असा (भाबडा) प्रश्न तेव्हा पडला होता. त्यानं आधी कोणकोणत्या वर्तमानपत्रात ('गावकरी', 'नवा मराठा', 'लोकयुग' आदी) काम केलं होतं, हे माहीत असण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळंच ते आश्चर्य वाटायचं. तेव्हा तो साप्ताहिक चालवत होता - 'बिरादर' नाव असावं त्याचं. युवक बिरादरीशी संबंधित. ते क्वचित कधी पाहायला मिळे.

सोनईच्या प्रवीणसिंह परदेशी ह्यांचं पत्र 'केसरी'मध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यात राजीव गांधी ह्यांच्यावर जोरदार टीका केलेली. त्याला सुधीरनं उत्तर दिलं, ते पत्रक काढून नव्हे, तर पत्रच लिहून. राजीव गांधी ह्यांच्या करिष्म्यावर लुब्ध असलेल्या तरुण-तडफदार काँग्रेसजनांपैकी तो होता. त्या पत्रात त्यानं सणसणीत उपहासाचा आधार घेतला होता. त्याचं तसं लिखाण नंतर पाहायला मिळालं नाही. दोन-चार भेटीनंतर सुधीरची ओळख झाली. ती पुढे वाढणार होती. तो नेमकं करतो काय, ह्या प्रश्नाचं उत्तर तेव्हा मिळालं नव्हतं. पण पत्रकारांचा तो मित्र आहे, एवढं नक्की कळलं होतं.

विधानसभेची १९९०ची निवडणूक नगरसाठी वेगळी ठरली. अनिल राठोड ह्यांनी बाजी मारत शिवसेनेचा भगवा फडकावला. सुधीर त्यांचा 'भय्या, भय्या' असा एकेरी उल्लेखानं कौतुक करत होता. वाटलं की, नव्या सत्तास्थानाजवळ जाण्याची त्याची ही धडपड आहे. हा काँग्रेसचा कार्यकर्ता लगेच संधी साधून शिवसेनेचा झाला काय, असा प्रश्न पडला. सहकारी वार्ताहरानं माझा संभ्रम दूर केला. हे दोघं चांगले मित्र आहेत, त्याचा शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ता असण्याशी काही संबंध नाही, हे त्यानं सांगितलं. भय्या आणि सुधीर ह्यांचे संबंध कशा पद्धतीचे आहेत, ह्याचा उलगडा यथावकाश झाला. अर्थात सुधीरने ऐकवलेल्या किश्शांमधूनच.

त्यानंतर काही दिवसांतच सुधीर आमचा सहकारी बनला. तो 'केसरी'मध्ये वार्ताहर म्हणून रुजू झाला. हा कार्यकर्ता माणूस एकदम श्रमिक पत्रकार कसा झाला, हे तेव्हा पडलेलं कोडंच होतं. 'केसरी'मध्ये तसा तो 'पर्सोना नॉन ग्राटा' असल्यासारखा होता. माझे आणि त्याचे सूर मात्र जुळून आले. आमचे संबंध एकेरीचे झाले, मैत्रीचे झाले. तेव्हाच्या 'केसरी'मध्ये बातमी लिहिण्याचे, संपादित करण्याचे व प्रसिद्ध करण्याचे अनेक यम-नियम होते. ते सारे नियम सुधीरसारख्या 'फ्री बर्ड'ला जाचकच होते. तो बातमी लिहून टाकायचा. संपादनाचे सारे सोपस्कार करून मी ती छापण्यायोग्य बनवायचो. त्यातूनच त्याचं माझ्याबद्दलचं, माझ्या लिखाणाबद्दलचं कौतुक वाढत गेलं.

फोटोत आपण दिसलो पाहिजे, बातमीत आपलं नाव आलं पाहिजे, ही सुधीरची मूळची कार्यकर्ता वृत्ती. पत्रकारानं असं बातमीत झळकायचं आणि दिसायचं नसतं, हे काही त्याच्या पचनी पडत नव्हतं. एका गणेशोत्सवात त्याच्याकडं देखाव्यांची बातमी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. तो रोज एका मंडळाच्या देखाव्याचं उद्घाटन करायचा आणि रंगवून बातमी लिहायचा. बातमीचा लीड त्यालाच असे. छायाचित्रातही अपरिहार्यपणे तो असायचा. ती बातमी उपसंपादक म्हणून माझ्याकडे आली की, त्याला सांगून त्याचं नाव उडवून टाकायचो. कात्री घेऊन फोटोतून त्याला अलगद कापायचो. हे करताना 'फोटो असा कापायचा असतो बरं का...' असं शिकवण्याचा आव आणत त्याला सांगायचो. खोट्या रागानं तो पाठीत धपाटा मारायचा. कधी गाल ओढायचा. कधी तरी त्याची पूर्ण बातमीच नाकारायचो. उपसंपादकाला असलेला तो अधिकार त्यानं मान्य केला होता. 'सतीश मुद्दाम माझ्या बातम्या कापतो,' अशी तक्रार त्यानं वरिष्ठांकडे कधीच केली नाही किंवा माझा रागराग केला नाही.

'केसरी'तलीच ही गंमत. एका बंडखोर, तरुण तुर्क नेत्याच्या वैयक्तिक आयुष्यातली मोठी घडामोड होती. त्यानं ज्या तरुणीला आधी वचन दिलं होतं; तिच्याशी लग्न करण्याचं नंतर नाकारलं. पुण्याच्या कार्यालयातून ही माहिती आली. बातमीचा स्रोत राशीनमध्ये होता. अन्य कुणी तिथं जाण्यास तयार नसल्यानं सुधीरला पाठवण्यात आलं. त्याच्यातील कार्यकर्त्यासाठी ही मोठीच संधी होती. राशीन-कर्जतमध्ये त्याचे जवळचे नातेवाईक होते, कार्यकर्ता म्हणून ओळखी होत्या. त्यामुळं बारीकसारीक माहिती काढण्यात त्याला काहीच अडचण आली नाही. संध्याकाळी सातच्या सुमारास फोनवरून त्यानं बातमी दिली. माहिती भरपूर असल्यामुळं ती अतिशय छान रंगवली आणि 'सुधीर मेहता यांजकडून' अशा नामोल्लेखासह पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली. पुण्याच्या अंकातही ती लागली. पुणे कार्यालयातील वरिष्ठ त्या बातमीवर खूश झाले. त्यामुळे स्वाभाविकच सुधीरही माझ्यावर खूश झाला. 'मला बातमी अशी रंगवता आलीच नसती,' असं नंतर त्यानं मला प्रांजळपणानं सांगितलं.

राजीव गांधी ह्यांची हत्या झाल्याची बातमी मी रात्री साडेअकराच्या सुमारास बी. बी. सी.वर ऐकली. तिथून तडक सुधीरच्या घरी गेलो. त्याच्या घरून राजीव गांधी ह्यांची छायाचित्रं असलेले विविध मासिकं घेऊन आम्ही केडगावला 'केसरी'च्या कार्यालयात गेलो. ती रात्र आम्ही कार्यालयात काढली. सोबतीला होते सुधीर सांगत असलेले राजीव ह्यांचे ऐकीव किस्से. ती आठवण तो नंतर नेहमी सांगत असे. राजीव हत्येनंतर दुसऱ्या दिवशी आमची जेवणाची मोठीच अडचण झाली. खानावळ, हॉटेलं, टपऱ्या बंद. तेव्हा सुधीरच्या घरी जायचं सुचलं नाही. हे नंतर सांगितल्यावर तो बराच हळहळला.

काही काळानंतर सुधीर 'केसरी'तून बाहेर पडला. पण त्यामुळे आमचे संबंध कमी झाले नाहीत. आदेश्वर कॉलनीतील त्याचं घर आमचं हक्काचं झालं. दुपारी कधी गेलो, तर त्याचं जेवण तीन-साडेतीन वाजता असायचं. त्याच्या बरोबर जेवायचा हमखास आग्रह व्हायचा. 'लोकसत्ता'मध्ये 'नगरी नगरी' सदर दीर्घ काळ लिहिलं. सुधीर त्याचा हक्काचा वाचक. त्याला मनापासून आवडत होतं ते. त्या विनोदी, टवाळी-उपहास करणाऱ्या सदरातून दोन-चार वेळा त्यालाच लक्ष्य केलं. त्यानं 'नगर फेस्टिव्हल' सुरू केला, तेव्हा त्याबद्दल मोठ्ठं लिहिलं होतं. म्हटलं तर ती टिंगल होती आणि मानलं तर त्याचं कौतुक होतं. भपकेदार 'पुणे फेस्टिव्हल' आयोजित करणाऱ्या सुरेश कलमाडी ह्यांच्याशी थेट तुलना केल्यामुळं सुधीर मनोमन सुखावला होता. तसाही तो काही हळवा नव्हता. त्यामुळं त्याच्यावर टीका करायला सोपं जायचं. तो हे सारं मोकळ्या मनाने घेई.

खरं सांगायचं झालं, तर सुधीर पत्रकारापेक्षा चळवळ्या कार्यकर्ता अधिक होता. कल्पकता हा त्याचा मोठाच गुण. वेगवेगळ्या प्रश्नांवर त्याला आंदोलनं सुचत. ती तापवत कशी ठेवायची, हेही त्याला माहीत होतं. त्यात पुन्हा हे प्रश्न कोणत्या तरी समाजघटकाच्या अगदी जिव्हाळ्याचे असायचे. औद्योगिक वसाहतीच्या 'डी झोन'चा मुद्दा त्यानं दीर्घ काळ तापवत ठेवला होता. त्यामुळं उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाला 'सुधीर मेहतांकडूनच तुमचे प्रश्न सोडवून घ्या ना...' असं शरद पवार ह्यांनी तेव्हा सुनावलं होतं. सुधीर ते नेहमी कौतुकानं सांगायचा. महाविद्यालयीन जीवनात केलेल्या गमती, आंदोलनं ह्याबद्दल अलीकडे तो भरभरून सांगे. गोविंदराव आदिक, मग यशवंतराव गडाख आणि नंतर बाळासाहेब विखे ह्यांचा तो काही काही काळ आवडता होता. त्यांच्याबद्दल सुधीरला फार बारकाईनं माहिती होती. त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्यं, आवडीनिवडी तो अलगद टिपून घेई.

'युवक बिरादरी' म्हणजे सुधीरची घरची चळवळ. एकविसाव्या शतकात संघटनेचं मोठं पद त्यानं भूषवलं. राज्याच्या राजकारणात मोठं झालेल्या अनेकांशी त्याचा परिचय झाला तो बिरादरीच्या माध्यमातून. 'बिरादरी'ला विलासराव गमतीनं 'युवक धराधरी' म्हणायचे, हे तो कौतुकानं सांगायचा. मुख्यमंत्री झाल्यावर विलासरावांनी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नगरला झालेल्या अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी भरपूर वेळ दिला. सुधीर त्या अधिवेशनाचा संयोजक होता. 'बिरादरी'च्या क्रांती शाह ह्यांच्याशी सुधीरचं फार जवळचं नातं होतं. संघटनेची बातमी सुधीरनं दिलेली असली की, त्यात क्रांती शाह नाव असायचंच. बिचाऱ्या पत्रकारांना 'त्या' क्रांती शाह वाटत. त्यांच्या नावामागे हमखास 'श्रीमती' लिहिलं जाई. 'श्रीमती'चं 'श्रीयुत' करण्याचं काम मी खूप वेळा केलं. सुधीरला म्हणालोही बऱ्याच वेळा की, 'माझी एकदा क्रांती शाह ह्यांच्याशी ओळख करून दे. 'लिंगबदल' होण्यापासून मी त्यांना अनेक वेळा वाचवलं, हे सांगायचं आहे!'

पत्रकारांच्या असो की अन्य कुठल्या, सुधीरला संघटनेत राहणं फार आवडे. 'नगर फेस्टिव्हल' त्यानं उत्साहानं सुरू केला. पण त्याला वाटलं तशी पुण्याची रंगत आली नाही. तरीही तो अनेक वर्षं नेटानं चालवत राहिला. माझ्यासह बरेच पत्रकार त्या नगर व्यासपीठाचे 'विश्वस्त', पदाधिकारी होते. अंध-अपंगांसाठीही सुधीरनं नव्वदीच्या काळात संघटना चालवली होती. अलीकडे तो नवनीत विचार मंचाच्या माध्यमातून सक्रिय राहण्याचा प्रयत्न करीत होता. नगर पर्यटनही त्याच्या डोक्यात होतं. हे सगळं तब्येत साथ देत नसताना.

मूळचा करमाळ्याचा हे कळाल्यावर त्याला माझ्याबद्दल थोडी जास्त आपुलकी वाटू लागली. 'तुमचं कर्जत-करमाळा' असा उल्लेख तो त्याच्या आईच्या संदर्भात नेहमी करायचा. पत्रकार म्हणून किंवा सक्रिय राजकीय कार्यकर्ता म्हणून सुधीरला त्याच्या काही मर्यादा होत्या. राजकीय क्षेत्रामध्ये मुंबईत काम करण्याची संधी त्याला तरुण वयात मिळाली होती. पण घरगुती अडचणींमुळे जाता आलं नाही. तरुण वयात गमावलेल्या अशा अनेक संधी त्याला अलीकडच्या काही वर्षांत व्यथित करत होत्या. अर्थात त्या तो जाहीरपणे सांगत नसे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ह्यांचं पहिलं आंदोलन झालं, ते सुधीरनं बाहेर काढलेल्या सामाजिक वनीकरणमधील प्रकरणाचा पाठपुरावा करण्याच्या निमित्तानं. कालानंतरानं तो त्यापासून लांब गेला.

दीर्घ काळ राजकारण-समाजकारण-पत्रकारिता ह्यामध्ये वावर असल्याने सुधीरकडे असंख्य अफाट आठवणी होत्या. एकदा शरद पवार कुठल्या कार्यक्रमासाठी नगरला येणार होते. त्यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणजे सुधीरचे विरोधक. ते आपल्याला पवारसाहेबांना भेटू देणार नाही, हे ओळखून ह्या गड्याने वेगळीच चाल खेळली. नगरच्या आधी काही किलोमीटर हार-गुच्छ घेऊन तो थांबला. गाडी दिसताच ती थांबवून त्यानं पवारसाहेबांचा सत्कार केला आणि त्यातच बसून तो नगरकडे निघाला. डाक बंगल्यावर मोटर येताच कार्यकर्ते अदबीने पुढं आले. त्यांनी मोटारीचं दार उघडून विनम्रपणे नमस्कार केला, तो स्वीकारायला त्यांच्या समोर होता सुधीर! हा किस्सा तो रंगवून सांगायचा. बिरादरीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिनेजगतातील तनुजा, जया भादुडी अशी मोठी व्यक्तिमत्त्वं त्याला जवळून अनुभवायला मिळाली. बिरादरीच्या एका शिबिराच्या निमित्ताने अभिनेत्री तनुजा काही दिवस नगर मुक्कामी होती. त्या काळात आपण छोट्या काजोलला कसं खेळवलं, हेही सुधीर रंगवून रंगवून सांगायचा. एखाद्याला वश कसं करायचं, ह्याची खुबी त्याला चांगलीच माहीत होती. (त्याच्या भाषेत 'नॅक'!) स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारलेल्या शैलेंद्र गौड ह्यांना त्यानं इतकं आपलंसं केलं की, ते दोघे जणू शाळासोबती आहेत, असं कुणा त्रयस्थाला वाटावं.

माझ्यासारख्या बऱ्याच समकालीन पत्रकारांना सुधीरचं घर आपलं वाटे. त्याच्या आतिथ्यप्रियतेचा अनेकदा अतिरेक होई. त्याचा त्रास घरच्या मंडळींना व्हायचा. त्यामुळेच प्रसंगी आम्ही कल्पनाभाभींची बाजू घेऊन त्याच्याशी वादही घालत असू. कोणत्याही माणसाप्रमाणे सुधीरमध्येही गुण-दोष होतेच. पण मैत्री जोडण्याचा आणि निभावण्याचा त्याचा गुण अफलातून होता. 'पत्रकार' म्हटल्यावर तो कधीही, कसल्याही मदतीसाठी तयार असायचा. एरवी त्याच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांनाही तो अडचणीच्या काळात मित्र म्हणूनच वागवी. '...प्रसंगानुसार आम्ही १०५' अशी त्याची तेव्हाची वागणूक असायची. आधीच्या काळात ज्यांच्याशी जमत नव्हतं, अशा अनेक व्यक्ती नंतर त्यांच्या मित्रयादीत समाविष्ट झाल्या. तेव्हा जुनं सगळं विसरण्याची कला त्याला अवगत होती.

अलीकडच्या पाच वर्षांत वेगवेगळ्या व्याधींनी सुधीरला त्रस्त केलं होतं. मधुमेहानं उचल खाल्ली. त्यामुळे दोन-तीन वेळा त्यांना दीर्घ काळ रुग्णालयात राहावं लागलं. त्या काळात माझी आणि त्याची अगदी नित्यनेमानं भेट होई. गप्पा रंगत. 'केसरी'तले काही किस्से तो अशा थाटात सांगायचा की, वाटे मी तिथे नव्हतोच कधी. नवनव्या नि मोठमोठ्या उपक्रमांची स्वप्नं तो रंगवी. त्यासाठी माझी कशी मदत लागेल, हेही पटवून देई. 'नगर व्यासपीठ'तर्फे गुणिजनांना 'नगरभूषण' पुरस्कारानं गौरवायचं त्याच्या मनात होई. पाच वर्षांपूर्वी त्यानं अशी पाच नावं काढली. त्यांची मानपत्रं लिहिण्याचं काम माझ्यावर सोपवलं. त्यातलं एक नाव होतं अभिनंदन थोरात ह्यांचं. 'कार्यक्रम कधी करायचा, पाहुणा कोण बोलवायचा, हे अभिनंदनला विचारून तू ठरव,' असं त्याचं म्हणणं होतं. काही ना काही अडचणी येत राहिल्या आणि तो कार्यक्रम काही झालाच नाही. तो सरचिटणीस असलेल्या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचं अधिवेशन त्याला शिर्डीत घ्यायचं होतं. कोरोनामुळं तेही शक्य झालं नाही.

मध्यंतरीच्या काळात सुधीरनं वेगवेगळ्या दैनिकांमध्ये काम केलं. पण मूळ चळवळ्या वृत्तीचा असल्यानं तो कुठंच फार काळ स्थिरावला नाही. ह्या काळात त्यानं जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांतली माणसं मात्र मोठ्या प्रमाणात जोडली.

पत्रकारितेचं स्वरूप फार बदललं. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र ह्यातही नवीनं माणसं आली. स्वाभाविकच सुधीर त्यापासून थोडा लांब गेला. पण समकालीन राहण्याची त्याची धडपड कायम होती. त्याच्याकडे असंख्य आठवणी होत्या. अनेक किस्से होते. ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न त्यानं कधी केला नाही. 'आपण ब्लॉग चालू करू. तू सांगत जा, मी लिहीत जाईन,' ह्या माझ्या ऑफरला त्यानं मनापासून कधीच देकार दिला नाही. 'डॉक्युमेंटेशन'च्या बाबत त्याच्यातला पत्रकार निरुत्साही राहिला. लिहिण्यापेक्षा बोलणं त्याला आवडे. त्याच्या उमेदीच्या काळात आजच्या एवढ्या दूरचित्रवाणी वाहिन्या असत्या, तर पक्षप्रवक्ता म्हणून त्यानं जोरदार कामगिरी केली असती. तेवढा बहुश्रुत होता तो.

अलीकडच्या पाच वर्षांत सुधीर थकला होता. तरुणपणी केलेली धावपळ आता शरीर कुरकुरून बोलून दाखवत होतं. त्याच्या शारीरिक हलचालींवर मर्यादा आली होती. पण त्याच्यामधला उत्साहाचा झरा कायम होता. त्याचं दर्शन तो ॲडमिन असलेल्या व्हॉट्सॲप ग्रूपवरून व्हायचं.

उत्साहाचा हा खळाळता झरा काल रात्री शांत झाला. कायमसाठी. काहीसा अकालीच!

-----------------

#journalism #Ahmednagar #MarathiJournalism #journalist #politics #activist #sudheer_mehata

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...