सोमवार, ७ जुलै, २०२५

नवा नेता, नवा इतिहास

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट
बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं.
पावसानं हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही.
दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून भारतीय संघानं
एजबॅस्टनवर नवीन इतिहास लिहिला.
कर्णधार शुभमन गिल, आकाशदीप, सिराज, जाडेजा,
सुंदर हे त्याचे शिल्पकार होत!
......................................


सामन्याचा मानकरी तो ठरला असला, तरी त्या पदकावर आणि शाम्पेनच्या
बाटलीवर ह्यानंही अधिकार सांगितला होताच की!

------------------------------
सामना जवळपास पाच दिवस चालला. धावा निघाल्या सतराशेच्या आसपास. दोन्ही संघांचे मिळून ३६ गडी बाद झाले. म्हणजे रोज सरासरी तीनशेहून अधिक धावा आणि पाच गडीही बाद. एकूण शतकं चार आणि अर्धशतकं सहा. सामन्यात १० बळी घेणारा एक गोलंदाज आणि डावात पाच वा अधिक गडी बाद करणारे त्याच्यासह दोघं. आणि सामन्याचा निकाल लागलेला. दणदणीत म्हणावा असा विजय पाहुण्या संघानं यजमानांवर मिळवला. आठवड्यापूर्वीच्या पराभवाची साभार नि सहर्ष परतफेड!

एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इथे झालेल्या भारत व इंग्लंड संघांमधील दुसऱ्या कसोटी सामन्याची ही रंगलेली कहाणी. सामन्याचा निकाल एकतर्फी लागेल, हे चौथ्या दिवशी आणि त्यातही शेवटच्या सत्रात स्पष्ट झालं. इंग्लंडपुढे एव्हरेस्ट सर करण्यासारखं आव्हान होतं आणि दुसऱ्या डावातले तीन गडी त्यांनी गमावलेले.

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं. ते अवघड होतंच आणि पावसानं दिवसाच्या सुरुवातीलाच हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही. ह्या पावसामुळे भारतीय चाहत्यांची धडधड सकाळी वाढली होती. पण निसर्गानंही साथ दिली. बर्मिंगहॅममध्ये आठपैकी सात कसोटी सामन्यांत पराभूत झालेल्या भारतानं नवव्या सामन्यात नव्या दमाच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास लिहिला.

एकटा गिलच भारी
आकड्यांचाच आधार घेऊन बोलायचं तर ह्या सामन्याची किती तरी वैशिष्ट्यं सांगता येतील. भारताचा कर्णधार शुभमन गिल ह्यानं सामन्यात एकूण ४३० धावा केल्या. इंग्लंडला एकाही डावात तेवढ्या करता आल्या नाहीत. त्यानं पहिल्या डावात केल्या, त्याहून फक्त दोन अधिक धावा इंग्लंडला दुसऱ्या डावात करता आल्या. (शेवटच्या दोन जोड्यांनी टोलवाटोलवी करीत ४५ धावांची भर घातलेली, इथे लक्षात घेतली पाहिजे.)

शुभमनचं पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात आक्रमक दीडशतक. इंग्लंडकडून पहिल्या डावात तुफानी खेळ करणाऱ्या यष्टिरक्षक जेमी स्मिथच्या नाबाद १८४ धावा. दुसऱ्या डावातही त्याच्याच धावा सर्वाधिक - ८८. पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर इंग्लंडच्या फलंदाजांनी चार षट्कार ठोकले. त्यातले दोन नवव्या व अकराव्या क्रमांकावरच्या गोलंदाजांचे. भारताने चौथ्या दिवशी, दुसऱ्या डावात एक दिवशीय सामना खेळत असावा, त्या गतीने धावा केल्या. त्यात एकूण १३ षट्कार आणि पैकी आठ गिलचे. इंग्लंडच्या दोन्ही डावांतील षट्कारांची संख्या ११ आणि दोन्ही डावांमध्ये स्मिथने षट्कारांचा चौकार मारलेला.

सर्वांत मोठी भागीदारी पराभूत संघाची
सामन्यातली सर्वांत मोठी भागीदारी विजयी संघाची नव्हती, तर पराभूत संघाकडून झालेली. निम्मा संघ शंभराच्या आत गारद झालेला. समोर आव्हानं ६०० धावांच्या जवळचं. त्याचं अजिबात दडपण न घेता, किंबहुना ते झुगारून हॅरी ब्रूक व स्मिथ ह्यांनी सहाव्या जोडीसाठी त्रिशतकी भागीदारी केली. त्या डावातली त्यांच्याकडून तेवढीच एक शतकी भागी. संपूर्ण सामन्यातील चौदापैकी दोनच सत्रांवर इंग्लंडचं वर्चस्व होतं आणि त्याचं कारण ही भागीदारी आकार घेत होती.

गंमत अशी की, दुसऱ्या डावातही सर्वांत मोठी भागीदारी सहाव्या जोडीसाठीच झाली. त्यातला एक भागीदार पुन्हा स्मिथच होता आणि त्याचा जोडीदार कर्णधार बेन स्टोक्स. पहिल्या डावात ५ बाद ८४ आणि दुसऱ्या डावात ८३. ह्या वेळची भागीदारी डावातली सर्वाधिक असली तरी फक्त ७० धावांची. पराभवाची नामुष्की थांबविण्याची ताकद तीत नव्हती.


जाडेजा आणि गिल. पहिल्या डावातील ह्यांच्या भागीदारीनं
विजयाचा पाया रचला.
------------------------------
भारतीय संघाची सामन्यातील सर्वांत मोठी द्विशतकी भागीदारी पहिल्याच डावातली आणि सहाव्या जोडीसाठी. ती गिल आणि रवींद्र जाडेजा ह्यांची. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या रूपाने पुन्हा एका फिरकी गोलंदाजाला साथीला घेऊनच गिलने सातव्या जोडीसाठी दीडशतकी भागीदारी केली. गिल व जाडेजा ह्यांनी दुसऱ्या डावातही पावणेदोनशे धावांची भागीदारी केली. सातव्या आणि सहाव्या क्रमांकावर येऊन अर्धशतकं झळकावण्याची कामगिरी एकट्या जाडेजालाच साधली!

सहा जणांचा भोपळा
ब्रूक आणि स्मिथ ह्यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं फॉलो-ऑन वाचविला. पण संघाच्या फलंदाजीची वैगुण्यं त्याच डावात दिसून आली. संघाच्या धावा चारशे पार आणि तरीही सहा फलंदाजांना भोपळा फोडण्यात अपयश! दोघे शतकवीर सोडले, तर इतर दोघांनाच दुहेरी धावा करता आलेल्या.

दुसऱ्या डावात मात्र सलामीवीर झॅक क्रॉली हा एकटाच भोपळ्याचा मानकरी. तळाच्या दोघांसह आठ फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठलेली. पण खेळपट्टीवर टिकाव कोणी धरला नाही. अपवाद स्मिथ आणि काही काळ स्टोक्स ह्यांचा. परिणामी पावणेतीनशे धावा करताना संघाची दमछाक झाली.

पहिल्या कसोटीत भारताच्या तळाच्या फलंदाजांनी दोन्ही डावांची माती केली. ते चित्र एजबॅस्टनला दिसलं नाही आणि त्याहून ते फार जाणवलं नाही. पहिल्या डावात सहाशेचा उंबरठ्यावर आणि दुसऱ्या डावात सव्वाचारशेच्या वर एवढ्या धावा निघाल्या. धावांची गंगा वाहत असताना कोरडा राहिला तो एकटा नितिशकुमार आणि काही प्रमाणात करुण नायर. ब्रिडन कार्स ह्यानं तर पहिल्या डावासारखंच दुसऱ्या डावातही नायरला मामा बनवलं.

तिघांहून आकाशदीप फार सरस!
आकाशदीपनं सामन्यात १० बळी घेतले - पहिल्या डावात चार नि दुसऱ्या डावात सहा. यजमानांचे आघाडीचे तीन गोलंदाज - ख्रिस वोक्स, ब्रिडन कार्स आणि जॉश टंग ह्यांनी मिळून भारताचे सोळापैकी आठ गडी बाद केले. त्यासाठी त्यांनी दोन्ही डावांत मिळून ११८ षट्कं टाकली. आकाशदीपपेक्षा ७७ षट्कं अधिक!

फलंदाजीप्रमाणंच आघाडीच्या गोलंदाजांचं अपयश स्टोक्सला सतावत असणार. जेमतेम बाविशीच्या घरात असलेल्या शोएब बशीर ह्यानं पहिल्या डावात ४५ षट्कं टाकत इंग्लिश गोलंदाजीचा भार वाहिला. त्याला तीन बळी मिळाले, ते दीडशेहून अधिक धावा देऊन. पहिल्या डावात पाच षट्कं टाकणारा हॅरी ब्रूक आणि नितिशकुमार रेड्डी, हे दोघेच बळी न मिळालेले गोलंदाज.

नव्या चेंडूवर भारतीय जलदगती गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांपेक्षा किती तरी अधिक सरस ठरले. विजय आणि पराभवातलं हेच अंतर होतं. जगातला पहिल्या क्रमांकाच्या गोलंदाजाला विश्रांती देण्याच्या भारतीय व्यवस्थापनाच्या निर्णयावर सामना सुरू झाला तेव्हा बरीच टीका झाली. तथापि महंमद सिराज आणि आकाशदीप ह्यांनी जसप्रीत बुमराह ह्याची उणीव भासू दिली नाही. ही जमेची फार मोठी बाजू म्हणावी लागेल.

अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी चाललेल्या ह्या मालिकेतील पहिलाच सामना गमावल्यानंतर लगेच भारतीय संघ एवढ्या ताकदीनं उसळून आला. अशी उदाहरणं पाहायची झाल्यास ऑस्ट्रेलियाचा २०२०-२१चा दौरा आठवतो. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावांत नीचांकी ३६ धावांमध्ये गुंडाळला गेलल्या भारतीय संघाने नंतरच्या तीनपैकी दोन सामन्यांत कागांरूंना नमवलं. त्या आधी २००१च्या ऑस्ट्रेलियानं केलेल्या दौऱ्यात पहिली कसोटी हरल्यावर खचून न जाता भारतानं मालिका जिंकली होती. शुभमन गिलचा संघ तोच कित्ता गिरवणार काय, हे पाहायला हवं.

पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारणाऱ्या बेन स्टोक्सवर मोठी टीका झाली. पण 'बेझबॉल' शैलीनं विजय मिळवून स्टोक्सनं टीकाकारांना उत्तर दिलं. त्यामुळेच ह्या कसोटीतही त्यानं तसाच निर्णय घेतला. तो मात्र पूर्ण अंगलट आला. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोनशेच्या आसपास धावा आणि पाच गडी बाद, ही परिस्थिती म्हटलं तर दोन्ही संघांसाठी सारखीच होती. आधीच्या सामन्यातील दोन्ही डावांत भारतीय संघ कोलमडून पडलेला. त्यामुळे स्टोक्सला फार काही वाईट वाटलं नसावं.

लाजवाब द्विशतक
गिल, जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर ह्यांच्या मनात मात्र वेगळं काही होतं. ते दुसऱ्या दिवशी दिसून आलं. गिलनं खणखणीत द्विशतक झळकावलं. त्याचा स्ट्राईक रेट दीड शतकानंतर कमालीचा वाढलेला दिसला. प्रतिस्पर्ध्याला एकही संधी न देता त्यानं केलेला खेळ लाजवबाच! पहिल्या दिवशीच्या ३१० धावांत गिलचा वाटा होता ११४ धावांचा आणि  दुसऱ्या दिवशी केलेल्या २७७ धावांमध्ये १५५. सुंदरने आधी खेळपट्टीवर ठिय्या मांडून नंतर केलेली फटकेबाजी महत्त्वाची ठरली.

भारतानं दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात तीन गडी बाद करीत इंग्लंडला झटका दिला. पहिल्याच षट्कात १२ धावांची खिरापत वाटणाऱ्या आकाशदीपनं दुसऱ्या षट्कात कमाल केली. बेन डकेट ह्याचा गिलनं सुंदर झेल घेतला. त्याच्या पाठोपाठच्या चेंडूवर ओली पोप के. एल. राहुलकडे झेल देऊन परतला. महंमद सिराज ह्यानं क्रॉलीला बाद केलं.

सामना रंगतदार ठरणार, असं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर स्पष्ट झालं होतं. तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर पहिल्या तासातच सिराजनं लागोपाठच्या चेंडूंवर रूट आणि स्टोक्स ह्यांचा अडथळा दूर केला. निम्मा संघ गारद! आणखी ५०० आणि फॉलो-ऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान ३०० तरी धावा करायला हव्या. मोठंच आव्हान होतं हे.

धडाकेबाज ब्रूक-स्मिथ
हे दडपण ब्रूक आणि स्मिथ ह्यांनी झुगारून दिलं. उपाहारपर्यंतच्या २७ षट्कांमध्ये १७२ धावांची भर पडलेली. म्हणजे षट्कामागे जवळपास साडेसहा धावांची गती. वरची फळी कापलेली आणि सहा शतकी लक्ष्य असताना ह्या दोघांनी केलेला खेळ धडाकेबाज म्हणावा असाच होता. त्यातही स्मिथचा तडाखा औरच होता. त्याचं अर्धशतक ४३ चेंडूंमध्ये आणि शतकासाठी लागले ८० चेंडू.


ब्रूक-स्मिथ ह्यांची त्रिशतकी भागीदारी.
------------------------------
उपाहार ते चहापान ह्या दोन तासांमध्ये ह्या जोडीनं भारतीय गोलंदाजांची अजिबात डाळ शिजू दिली नाही. त्यात त्यांनी १०६ धावांची भर घातली. कारकिर्दीतलं दुसरं शतक करणाऱ्या स्मिथची गती दीडशे धावा करेपर्यंत चेंडूमागे धाव अशीच होती. त्यानंतर मात्र तो काहीसा संथ झाला. तरीही त्याची नाबाद १८४ धावांची खेळी फक्त २०७ चेंडूंमधली. त्यात २१ चौकार आणि ४ खणखणीत षट्कार.
 
चहापानानंतर पाच षट्कं झाली आणि भारताला नवा चेंडू उपलब्ध झाला. ब्रूक-स्मिथ जोडीनं फॉलो-ऑन टाळला आणि लगेचच आकाशदीप ह्यानं कमाल केली. त्यानं आधी ब्रूकचा त्रिफळा उडवला. त्या पाठोपाठ ख्रिस वोक्स बाद झाला. पुढे धमाल केली महंमद सिराज ह्यानं. त्यानं इंग्लंडचं शेपूट झटपट गुंडाळत खात्यात अर्धा डझन बळींची नोंद केली. सकाळच्या पहिल्या तासात आणि इंग्लंडचा डाव गुंडाळताना त्यानं केलेला मारा बुमराहची उणीव जाणवू न देणारा ठरला.

इंग्लंडचे शेवटचे पाच गडी फक्त २० धावांमध्ये बाद झाले. पाहुण्यांचं यजमानांनी केलेलं नकोसं अनुकरण!
 
पहिल्या डावातली १८० धावांची आघाडी फारशी नाही, असं समजूनच भारतानं चौथ्या दिवशी खेळ केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताच्या चाहत्यांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तीनपैकी अडीच सत्रांमध्ये गिल, ऋषभ पंत, जाडेजा ह्यांनी दिली. ‘एकही गिल, सबका दिल’ असंच कर्णधाराच्या दणकेबाज दीड शतकाचं वर्णन करताना लिहावं लागेल.

ह्याची सुरुवात पंतनं केली. त्यानं एक दिवशीय सामन्याला साजेशी फलंदाजी केली. तो सुटला होता, तेव्हा समोर कर्णधारानं दुय्यम भूमिका स्वीकारलेली. पंत एवढ्या सैल हाताने खेळतो की, त्याची बॅट दोन वेळा लांबपर्यंत उडून गेली. परिस्थिती अशीच राहिली तर ह्यानंतर पंत खेळत असताना ३० यार्ड वर्तुळाच्या आतल्या सगळ्याच क्षेत्ररक्षकांना हेल्मेट घालणं अनिवार्य होईल!

अवघ्या एका धावेवर असताना पंतला दोन जीवदानं मिळाली - एक कठीण आणि दुसरं सोप्पं! त्याची पुरेपूर किंमत इंग्लंडनं मोजली. पंत बाद झाला, तेव्हा गिल ५८ धावांवर (७० चेंडू) खेळत होता. पुढच्या १०३ धावा त्यानं ९२ चेंडूंमध्ये करीत धावफलक हलता नव्हे तर पळता ठेवला. ख्रिस वोक्स, जो रूट ह्यांच्या गोलंदाजीच्या त्यानं निर्दयीपणे चिंधड्या केल्या.

महंमद सिराजनं झॅक क्रॉली ह्याला बाद करून सुरुवात करून दिली. मग आकाशदीपनं बेन डकेटची दांडी उडवली. त्यानं क्रीजचा सुंदर वापर केला. रूट ज्या चेंडूवर बाद झाला, त्याची तर फारच चर्चा झाली. त्या बळीचं वर्णनं ‘द गार्डियन’ दैनिकाने ‘द शाम्पेन मूमेंट ऑफ द एंटायर मॅच’ असं केलं!

पावसानं व्यत्यय आणल्यावरही पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा एजबॅस्टनचं स्टेडियम भारतीय प्रेक्षकांनी भरलेलं. ‘आपण जिंकलंच पाहिजे’ एवढीच त्यांची अपेक्षा. आकाशदीपनं आली ओले पोपचा त्रिफळा उडवला आणि नंतर लगेच ब्रूकला पायचित पकडलं. भारतीय संघाला विजयाचा वास तेव्हाच आला. सावध खेळणारा स्टोक्स डावाला आकार देऊ पाहत होता ते स्मिथच्या साथीने. स्मिथचा धावा काढण्याचा वेग ह्या डावातही सुरुवातीला तसाच होता - जवळपास चेंडूमागे धाव. कर्णधारपदाचं ओझं असलेला स्टोक्स तुलनेनं संथ.

वॉशिंग्टनच्या फिरकीनं स्टोक्सला परत धाडलं. त्यानंतर यजमानांनी शंभर धावांची भर घातली, तरी पराभव टळेल, असं क्वचितच कधी वाटलं. स्मिथला ख्रिस वोक्स साथ देत होता, तेव्हा काहीशी काळजी वाटत होतीच. नाही असं नाही. पण महंमद सिराजनं त्याचा फार अफलातून झेल घेतला. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात एक बळी जमा झाला.

आकाशदीपला स्मिथनं सलग दोन षट्कार खेचले, तेव्हा निकाल लांबणार असं वाटत होतं. पण पुढचा चेंडू हळुवार बाउन्सर टाकून आकाशदीपनं त्याला बरोबर जाळ्यात अडकवलं. आकाशदीपच्या रूपानं भारतीय भात्यात चांगलं अस्त्र असल्याचं, त्याच्या ह्या सामन्यातील गोलंदाजीवरून वाटतं.

काही न सुटलेले प्रश्न
विजय मिळविला असला, तरी भारतीय संघापुढचे काही प्रश्न सुटलेले नाहीतच. क्षेत्ररक्षण हा त्यातला महत्त्वाचा. के. एल. राहुलच्या हातून आज एक सोपा झेल सुटला. चेंडू अडवतानाही गोंधळ होताना दिसला. पुढच्या कसोटीत करुण नायर, प्रसिद्ध कृष्णा, रेड्डी ह्यांना सक्तीची विश्रांती मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. साई सुदर्शन, कुलदीप, अर्षदीपसिंग देवाची प्रार्थना करीत असतीलच असं नाही. पण त्यांनाही ‘संधी’ हवी आहे. बुमराहचंही पुनरागमन होईल.

ह्या विजयानं एजबॅस्टनवरचा नवा इतिहास लिहिला आहेच. ह्याच इतिहासातली पुढची पानं अधिक दमदारपणे उरलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये लिहिल्या जातील, अशा अपेक्षा उंचावलेल्या असणं स्वाभाविकच.

(छायाचित्रं ‘आय. सी. सी.’,  ‘द गार्डियन’ व ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’  संकेतस्थळांवरून साभार.)
--------------------------
#भारत_इंग्लंड #कसोटी_मालिका #अँडरसन_तेंडुलकर_करंडक #एजबॅस्टन_कसोटी #शुभमन_गिल #आकाशदीप #जेमी_स्मिथ #बेन_स्टोक्स #महंमद_सिराज #नवा_इतिहास
......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवा नेता, नवा इतिहास

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं. पावसानं हजेरी लावल्यानंतरही इंग...