महंमद सिराज... प्रतिकाराला पूर्णविराम. अडवूनही चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळलाच. |
....................
सनसनाटी म्हणता येईल असा झाला तिसरा कसोटी सामना. त्यातल्या
प्रत्येक दिवसाचा रंग वेगळा होता. आशा दाखविणारा आणि निराश करणाराही. रवींद्र जाडेजा ह्यानं झुंजार खेळ करूनही भारत विजयापासून लांब राहिला. त्याची कारणं बरीच. पहिल्या डावात आघाडी मिळविण्याची गमावलेली संधी, दुसऱ्या डावात इंग्लंडला दिलेला बाईज धावांचा बोनस आणि आघाडीच्या फळीनं केलेली ढिसाळ फलंदाजी...
....................
लॉर्ड्सच्या मैदानावर विजयी पताका फडकवण्याची संधी गमावली. अँडरसन-तेंडुलकर करंडक कसोटी मालिकेत २-१ आघाडी मिळविण्याचीही संधी निसटली. कसोटी सामन्यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या सामन्यात भारत हरला. पाहता पाहता विजय दूर होत गेला. हळहळ वाटायला लावणारा हा पराभव.
‘सनसनाटी!’ ह्या सामन्याला असं विशेषण लावता येईल. त्याला रंगतदार म्हणता येईलच. पाचही दिवस चुरशीचा खेळ झाला. प्रत्येक दिवसातल्या सत्रागणीक पारडं हलकं नि जड होत राहिलं - कधी पाहुण्यांचं, तर कधी यजमानांचं. पण जखमी असूनही संघाची गरज म्हणून सहा षट्कं टाकणाऱ्या शोएब बशीरचा पस्तिसावा चेंडू महंमद सिराजनं अडवूनही यष्ट्यांवर जाऊन आदळला. त्या क्षणी इंग्लंडचं पारडं कायमस्वरूपी जड झालं! विजयावर शिक्कामोर्तब!!
पराभव स्वीकारणं अवघड असतंच. पण असे हे निसटते वाटणारे पराभव पचवणं फार जड जातं. आता लक्षात येतं की, ह्या पराभवाचं बीज पहिल्या दिवशीच पडलं होतं. पहिल्या डावातील आघाडी घेण्याची संधी घालवून त्या बीजारोपणाला खतपुरवठा केला. चौथ्या दिवशी भरपूर बाईज देऊन आणि शेवटच्या तासाभरात चार गडी गमावत त्याला पुरेसं पाणी दिलं होतं. त्याचीच फळं मिळतील, हे पाचव्या दिवशीच्या पहिल्या दोन तासांत आणखी चार गडी गमावून निश्चित केलं.
नेमक्या मोक्याच्या वेळी भारताची आघाडीची फळी कच का खाते? धावा फक्त २०० करायच्या होत्या आणि त्यासाठी दिवसभराहून अधिक वेळ होता. खेळपट्टीवर टिकून राहिलं असतं तरी त्या निघाल्या असत्या. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेनं ते दाखवून दिलं होतं. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी आवश्यक होतं तेव्हाच हे केलं नाही.
जयस्वाल आणि नायर
यशस्वी जयस्वाल फक्त स्वतःसाठी खेळतो का, असा प्रश्न विचारण्याची आणि त्याचं उत्तर शोधण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ ह्यांच्याच वाटेनं तो चालला आहे, असं म्हणणं घाईचं होईल का? आपल्या तिसऱ्या कसोटीत त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायर ह्याचा अध्याय आता संपल्यात जमा आहे. त्या त्रिशतकानंतरच्या १० डावांत त्याला पन्नाशीही गाठता आलेली नाही. एकच कसोटी खेळल्यानंतर बाहेर बसलेला साई सुदर्शन पुनरागमनासाठी उत्सुक असेल.
शेपटानं प्रतिकार केला नसता, तर भारताचा हा पराभव कदाचित अधिक मोठा असला असता. पाचव्या दिवशी उपाहारानंतरच्या तासाभरात तो झाला असता. अनुभवी रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि महंमद सिराज ह्यांनी तो लांबणीवर टाकला. टिच्चून खेळत त्यांनी पराभवाचं अंतर कमी केलं. दोन्ही डावांमध्ये भारतानं दिलेल्या इतर धावांपेक्षा कमीच!
शेवटचे चार नि आघाडीचे पाच
![]() |
एक अपयशी झुंज... जाडेजा दुसऱ्या डावात संघाच्या वाट्याला आलेले ४० टक्के चेंडू खेळला नि धावा केल्या ३५ टक्के! ............... |
कर्णधारपदाचा फारसा अनुभव नसलेल्या शुभमन गिल ह्याला प्रतिस्पर्धी कर्णधाराकडून बरंच काही शिकता आलं असेल, असं म्हणता येईल. सामन्याचा मानकरी ठरलेल्या बेन स्टोक्स ह्यानं दोन्ही डावांत किल्ला लढविला. पहिल्या डावात शतकवीर जो रूटबरोबर महत्त्वाची भागीदारी केली. मग नेहमीप्रमाणे चेंडू हातात घेतल्यावर लगेच संघाला यश मिळवून दिलं. एखाद्या ॲथलीटसारखी चपळाई दाखवत तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत ह्याला धावचित केलं. पहिल्या डावात आघाडी मिळवण्याचं भारताचं स्वप्न तिथंच भंगलं. दुसऱ्या डावातही त्यानं ३३ धावा केल्या आणि तीन बळी मिळवले. निकाल लागेपर्यंत त्यानं प्रयत्नात कोणतीही कुचराई ठेवली नाही.
लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर यजमान संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक ह्यांना हवी तशी खेळपट्टी मिळाली नाही, असं ‘द गार्डियन’च्या बातमीत म्हटलं होतं. त्यामुळे यजमानांचं फार काही बिघडलं नाही, हे पहिल्याच दिवशी दिसून आलं. पहिल्या दिवसाअखेर त्यांनी चार गडी गमावून अडीचशेचा टप्पा पार केला. दुसऱ्या कसोटीतील हीरो आकाशदीप इथं झीरो ठरलेला दिसला. विश्रांती घेऊन संघात परतलेल्या जसप्रीत बुमराहच्या बरोबर नवा चेंडू महंमद सिराजऐवजी त्याच्या हातात आला. पण भारताचा सर्वांत महागडा गोलंदाज तोच ठरला.
![]() |
तिसऱ्या कसोटीतील एकमेव शतकवीर जो रूट ह्याच स्वीपचा हुकुमी फटका. ............................. |
रूट-स्टोक्सची भागीदारी
चौथा गोलंदाज म्हणून नितिशकुमार रेड्डी आला आणि त्यानं पहिल्याच षट्कात दोन झटके दिले. दोन्ही सलामीवीरांना त्यानं यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. त्यानंतर पोप-रूट जोडीनं पडझड होऊ न देता शतकी भागीदारी केली. त्यांनी फटक्यांची आतषबाजी केली नाही. कसोटीला साजेसा खेळ केला. तो बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला. स्टोक्सनं मग रूटला चांगली साथ देत, ७९ धावांची भागीदारी केली. खुद्द कर्णधार मैदानात असतानाही त्याच्या संघानं बॅझबॉल शैलीचा खेळ आज केला नाही, ही सलामीच्या दिवशीची गंमत.
बुमराहनं दुसऱ्या नव्या चेंडूवर दुसऱ्या दिवशी सकाळीच करामत केली. आधी त्यानं बेन स्टोक्सची ऑफची यष्टी वाकविली. पुढच्या षट्कात शतकवीर रूटची मधली यष्टी गुल झाली. पुढच्याच चेंडूवर ध्रुव जुरेलकडे झेल देऊन ख्रिस वोक्स परतला. पहिल्या दिवसाच्या धावांमध्ये जेमतेम २० धावांची भर पडली असताना यजमान संघाने तीन गडी गमावले होते.
तीन त्रिफळे
हा दिवस बुमराहचा होता. त्यानं पुन्हा एकदा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. आपण पहिल्या नंबरचेच आहोत, हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्याच्या पाच बळींपैकी तीन वरच्या फळीतले आहेत - ब्रूक, स्टोक्स आणि रूट; तिघांचाही त्रिफळा उडालेला.
‘लक्ष दे रे. नाही तर पुन्हा म्हणशील मी तयार नव्हतो..!’ लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात महंमद सिराज ह्यानं पहिल्या स्लिपमध्ये उभ्या राहिलेल्या के. एल. राहुल ह्याला सुनावलं होतं म्हणे. राहुलनं ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळीही लक्षात ठेवायला हवं होतं. सिराजच्या सोळाव्या आणि डावातल्या ८७व्या षट्कातल्या तिसऱ्या चेंडूवर त्यानं जेमी स्मिथ ह्याचा झेल सोडला. ह्या झेलाबरोबर भारतानं इंग्लंडला तीनशेच्या आत-बाहेर, फार तर सव्वातीनशेच्या आत गुंडाळण्याची संधी सोडली.
नेहमीप्रमाणंच जेमी स्मिथनं परिस्थितीचं दडपण घेतलं नाही. ब्रिडन कार्स ह्याला जोडीला घेऊन त्यानं ७४ धावांची अतिशय महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ती बऱ्यापैकी निर्णायक ठरली, असं आता म्हणता येईल. स्मिथनं सलग तिसऱ्यांदा पन्नाशीपुढे मजल मारली आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या कार्स ह्यानंही तुलनेनं आक्रमक अर्धशतक झळकावलं. डावातला एकमेव षट्कार त्याच्याच नावावर होता.
भारतीय क्षेत्ररक्षकांच्या रूपाने दुर्दैवानं सिराजची पाठ सोडली नाही. त्याच्या गोलंदाजीवर कार्सला आकाशदीप आणि जुरेल ह्यांनी जीवदान दिलं. शेवटच्या तीन जोड्यांसाठी इंग्लंडला शंभराहून अधिक धावा करू देण्याची चूक भारताला महाग पडलं.
स्टोक्स मदतीला धावलाच
यशस्वी जयस्वाल ह्यानं पहिल्याच षट्कात वोक्सला तीन चौकार मारत आतषबाजीची झलक दाखविली. पण पुनरागमन करणाऱ्या जोफ्रा आर्चर ह्यानं तिसऱ्याच चेंडूवर त्याला परतवलं. संघ व्यवस्थापनानं पुन्हा एकदा विश्वास टाकलेल्या करुण नायरनं आर्चरलाच नंतर दोन चौकार लगावले. राहुल - नायर जोडी जमते आहे, असं वाटत असतानाच इंग्लंडच्या मदतीला स्टोक्स आला. प्रत्येक वेळी त्यानं गोलंदाजीला आल्यावर संघाला यश मिळवून दिलेलं आहे. ह्या डावात चाळिशीपर्यंत गेलेल्या नायरचा रूटने स्लिपमध्ये सुंदर झेल घेतला.
कर्णधार शुभमन गिल ह्याला वोक्सनं स्मिथकडे झेल द्यायला लावला, तेव्हा संघाचं शतक नुकतंच झालं होतं. जखमी ऋषभ पंत कधी खेळायला येणार, ह्याबाबत संभ्रम असताना तो पाचव्या क्रमांकावरच आला. त्यानं आणि राहुलनं शेवटची तीन षट्कं अतिशय संयमानं खेळून काढली. तिसऱ्या दिवशी भारतानं आघाडी मिळविण्याच्याच उद्दिष्टानं खेळायला हवं होतं. पण शेवटचे चार खेळाडू अवघ्या बारा धावांची भर घालून बाद झाले.
राहुलचं शतक लवकर पूर्ण व्हावं, ही पंतची इच्छा त्याच्या अंगलट आली. त्यानंतर लगेच राहुलही परतला. जाडेजा, सुंदर आणि रेड्डी ह्यांच्यामुळे भारताला किमान बरोबरी तरी साधता आली. चौथ्या डावात आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे, ह्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही. त्याची किंमत २२ धावांच्या पराभवाच्या रूपाने चुकवावी लागली. कारण फलंदाज उभं राहतो, त्या भागातील धूळ उडत असल्याचं दुसऱ्या दिवशीच दिसलं होतं.
ह्या सामन्याच्या चार दिवसांनी वेगवेगळे रंग दाखवले. पहिल्या दिवशी कसोटीला साजेसा संथ खेळ झाला. गडी फक्त चार बाद झाले. दुसऱ्या दिवशी धावांची गती वाढली आणि बळींची संख्याही. तीस धावा आणि पाच गडी अधिक. तिसऱ्या दिवशी सर्वांत कमी धावा झाल्या - २४४ आणि गडी बाद झाले सात. चौथ्या दिवशी १४ फलंदाज बाद झाले आणि धावा निघाल्या २४८. शतक सोडा, कोणाचं साधं अर्धशतकही झालं नाही, असा हा एकमेव दिवस.
चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात हुकमी एक्का जसप्रीत बुमराह चालत नसताना महंमद सिराज ह्यानं दोन बळी घेतले - त्याला नितिशकुमार रेड्डी आणि आकाशदीप ह्यांनी साथ दिली. जो रूट आणि बेन स्टोक्स ह्यांची जोडी जमली होतीच. त्यांनी पाचव्या जोडीसाठी ६७ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावाप्रमाणेच ही जोडी त्रास देणार असं दिसत होतं.
वॉशिंग्टनच्या फिरकीचं जाळं
चहापानाच्या थोडं आधी वॉशिंग्टन सुंदर ह्यानं ही जोडी फोडली. आपल्या तिसऱ्या षट्कात त्यानं रूटचा लेग स्टंप वाकवला. आकार घेत असलेल्या भागीदारी संपली. त्यानंतर आला होता आतापर्यंत धोकादायक ठरलेला जिमी स्मिथ. पण त्यालाही वॉशिंग्टननं टिकू दिलं नाही. त्याची ऑफची यष्टी त्यानं उखडली! वॉशिंग्टनच्या फिरकीचं जाळं आणि बुमराहचा धारदार मारा ह्यामुळे इंग्लंडची कोंडी झाली होती. त्यांनी शेवटचे सहा गडी ३८ धावांत गमावले. गमतीची गोष्ट म्हणजे ह्या मालिकेतली सर्वांत कमी धावसंख्या करणाऱ्या इंग्लंडचा एकही फलंदाज शून्यावर बाद झाला नाही. त्यांच्या सात फलंदाजांचा त्रिफळा उडाला, तर एक पायचित झाला.
दुसऱ्या डावात भारतानं चार गडी गमावल्यानंतरही चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यावर वॉशिंग्टन सुंदर ‘आम्हीच जिंकणार’ असं आत्मविश्वासानं सांगत होता. त्या आत्मविश्वासाला साजेसा खेळ करणं त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाचव्या दिवशी जमलं नाही. जोफ्रा आर्चर, स्टोक्स आणि वोक्स ह्यांच्यापुढे भारतीयांनी नांगी टाकली. अपवाद जाडेजा ह्याचा. दोन्ही संघांच्या दुसऱ्या डावातलं एकमेव अर्धशतक त्याचं. इंग्लंडला दुसऱ्या डावात बाईजच्या रूपात २५ धावांचा बोनस मिळाला होता. तो फार महागात गेला.
मालिका संपली नाही. दोन कसोटी बाकी आहेत. त्यात भारत दुसऱ्या सामन्याप्रमाणे उसळी मारून वर येईल का? त्यासाठी संघात काही बदल करावे लागतील. मैदानावर आक्रमक वागण्यापेक्षा खेळातली आक्रमकता वाढवावी लागेल. असं झालं तर इंग्लंडला नमवणं फार अवघड नाही.
.........
(छायाचित्रं सौजन्य - ‘आय. सी. सी.’, ‘द गार्डियन’ व बी. सी. सी. आय.)
.........
#भारत_इंग्लंड #कसोटी_मालिका #अँडरसन_तेंडुलकर_करंडक #तिसरी_कसोटी #लॉर्ड्स #बेन_स्टोक्स #बुमराह #जेमी_स्मिथ #वॉशिंग्टन_सुंदर #जो_रूट #जोफ्रा_आर्चर
.........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा