सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

पोरी... खेळणाऱ्या, जिंकणाऱ्या!

 ह्या विजयानं अनेक गोष्टी बदलतील. बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे.
काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल.
मुलींना अंग चोरून मुलांच्या ॲकॅडमीमध्ये सराव करावा लागणार नाही.
मुलींच्या आय. पी. एल. स्पर्धेच्या प्रेक्षकांमध्ये आणि टीव्ही.वर ती पाहणाऱ्यांमध्ये किती तरी पटीने वाढ होईल. ...महत्त्वाचं म्हणजे लक्षावधी क्रिकेटवेड्यांना रणरागिणी, दुर्गा सापडल्या आहेत!
------------------------

नंबर वन ठरलेल्या संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना वेगळी भेट.
संघातील सर्व खेळाडूंच्या सह्या असलेली नमो १ जर्सी सहर्ष, साभिमान सादर.
(छायाचित्र सौजन्य - https://www.pmindia.gov.in/)
..............................
महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने टीव्ही.वर चालू असताना दोन षट्कांमध्ये हमखास एक जाहिरात पाहावी लागे. त्यात दिसायचा गोंधळलेला तरुण – अरे, महिला क्रिकेटपटूंची नावं असलेला तो प्रसिद्ध निळा टी-शर्ट आपण (पुरुष असल्याने!) कसा घालायचा बुवा? काही तरीच हं...
 
मनात अशी शंका असलेल्या त्या तरुणाला पाच-दहा मिनिटांच्या प्रवासात बरंच काही दिसतं. आणि, त्याच्या मनात एक अपराधभाव निर्माण होतो. काही वेळातच तो १८ नंबरचा, पण विराट नव्हे तर स्मृती नाव असलेला टी-शर्ट मोठ्या आनंदानं (अर्थातच अभिमानानेही!) घालतो.
 
पुरुषी मनोवृत्ती वगैरे कंठाळी विशेषणं न वापरता क्रीडा क्षेत्रातील (आणि एकूणच) लैंगिक भेदभावाची वृत्ती दूर करणारी ही जाहिरात. महिला क्रिकेट संघाला आणि त्यातील खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला लावणारी. स्मृती, दीप्ती, हरमन, जेमिमा ह्या नावांच्या जर्सी तेवढ्याच अभिमानानं घातलेले अनेक पुरुष मग आपल्या आसपास पाहायला मिळाले.
 
ती जाहिरात त्याच्या जोडीनेच आणखी एक गोष्ट सांगत होती - जर्सी वही तो जज़्बा वही! हरमनप्रीतकौर आणि तिच्या एकाहून एक सरस १४ सहकाऱ्यांनी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी (दि. २ नोव्हेंबर) हा जज़्बा दाखवून दिला. हुलकावणी देत राहिलेला विश्वचषक त्यांनी जिंकला.
 
विजयानंतर प्रदीर्घ वेळ जल्लोष चालू राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची भेट घेण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी संघाला मिळाली. भविष्यात तुमचं आमंत्रण आम्हाला जास्तीत जास्त वेळा मिळेल, अशी कामगिरी करू, असं हरमन, स्मृती ह्यांनी त्यांना सांगितलं. भारतीयांना क्रिकेटचं वेड किती आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी आवर्जून अधोरेखित केलं.
 
काय काय होईल?
ह्या विजयानं बरंच काही होणार आहे.
अनेक गोष्टी बदलतील. बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे.
क्रिकेट खेळणाऱ्या पोरी तोंडात बोट घालून पाहण्याची गोष्ट फार पूर्वीची. ते चित्र आता अधिक छोट्या गावांमध्ये दिसू लागलं तर नवल नाही.
आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, झारखंड आणि अशाच राज्यांमधून, काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल.
मुलींना अंग चोरून मुलांच्या ॲकॅडमीमध्ये सराव करावा लागणार नाही.
मुलगी आहोत, हे सहजासहजी कळू नये म्हणून खेळण्यासाठी शफाली वर्मा हिच्यासारखे केस कापावे लागणार नाहीत.
यंदाच्या महिलांच्या आय. पी. एल. स्पर्धेच्या प्रेक्षकांमध्ये आणि ती टीव्ही.वर पाहणाऱ्यांमध्ये किती तरी पटीने वाढ होईल.
... असं बरंच काही झालं आहे, होईल. महत्त्वाचं म्हणजे लक्षावधी क्रिकेटवेड्यांना नवीन दैवतं, खरं तर देवी – रणरागिणी, दुर्गा सापडल्या आहेत!
 
भारतात क्रिकेट हा धर्म झाला आणि क्रिकेटपटू देव बनले ते केव्हा? देव, देश अन् धर्मासाठी... भारतीय वेडे कधी झाले ते कधीपासून? कपिलदेवच्या नेतृत्वाखाली १९८३मध्ये विश्वचषक जिंकला, ती त्याची पायाभरणी म्हणता येईल.
 
कोणी फारशी अपेक्षा न ठेवलेल्या ह्या संघानं त्या स्पर्धेत दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला दोनदा पराभूत केलं. तो खरोखर चमत्कार होता.
 
क्रिकेटधर्माचं बीज रोवलं
असं काही स्वप्नवत घडेल, हे कोणालाही न वाटणं स्वाभाविक होतं. कारण त्या स्पर्धेआधी खेळलेल्या एक दिवशीय ११८ सामन्यांपैकी तब्बल ८३ आपण हरलेलो. आधीच्या दोन स्पर्धांमध्ये केवळ एक विजय आणि तोही कच्चं लिंबू असलेल्या पूर्व आफ्रिकेविरुद्ध. पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा न मिळालेल्या श्रीलंकेकडूनही भारताचा पराभव झालेला.

अशा पार्श्वभूमीवर कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, मदनलाल, रॉजर बिन्नी, यशपाल शर्मा, संदीप पाटील, के. श्रीकांत ह्यांच्या संघानं विश्वचषक जिंकून दिला. क्रिकेट धर्माचं बीज बहुदा त्या विजयानं रोवलं गेलं...
 
त्यानंतर सहाच वर्षांनी सचिन तेंडुलकर नावाचं स्वप्न थेट भारतीय संघात पाहायला मिळालं. ह्या तेव्हाच्या बच्चानं कल्पनेच्या पलीकडचं खूप काही दाखवलं.
 
त्याच्या आधी भारतात क्रिकेटपटूंना ग्लॅमर नव्हतं, असं मुळीच नाही. सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी, गुंडप्पा विश्वनाथ, चंद्रशेखर, नबाब पटौदी, सी. के. नायडू, मुश्ताक अली... अशी बरीच दैवतं होती चाहत्यांची. ग्रामदैवतं किंवा पंचक्रोशीत ख्याती असतात, तशी. त्या अर्थानं पहिला देव म्हणजे सचिन. सर्वांनी अपेक्षांचा भार ज्याच्यावर टाकून निवांत व्हावं, असं दैवत. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय भाविकांची गर्दी खेचणाऱ्या देवस्थानाप्रमाणं.
 
विश्वविजेतेपद दुसऱ्यांदा मिळालं ते २००७मध्ये. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ५० षट्कांच्या विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी झालेली. क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा रोष वाढलेला. असं निराशाजनक चित्र असताना दक्षिण आफ्रिकेत पहिली टी20 विश्वचषक स्पर्धा झाली. त्याच्या आधी भारतीय संघ त्या प्रकारात केवळ एक सामना खेळला होता.
 
ह्या नव्या प्रकारापासून सचिन, राहुल द्रविड, सौरभ गांगुली ही प्रस्थापित दैवतं दूर राहिली. परिणामी क्रिकेट धर्माला नवीन देव सापडले – महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग, इरफान पठाण, रोहित शर्मा आदी...
 
३६० अंशांतला बदल
त्या विजेतेपदामुळे अतिझटपट टी20 प्रकारात इंडियन प्रीमियर लीग चालू झाली आणि त्यानं क्रिकेटची दुनिया ३६० अंशांमध्ये बदलून टाकली. पैसा आला, आडगावीच्या खेळाडूंना संधी मिळाली. नवे तारे, नवे हिरे. त्याच बरोबर मॅच फिक्सिंग आणि अनेक पातळ्यांवरचे हितसंबंधही लख्ख उघड झाले.
 
ह्या पार्श्वभूमीवर महिला संघाच्या पहिल्या विश्वविजेतपदाकडे पाहायला हवं. महिलांची मर्यादित षट्कांच्या सामन्यांची विश्वचषक स्पर्धा काही नवीन नाही. पुरुषांची पहिली स्पर्धा (१९७५) होण्याआधीच इंग्लंडमध्ये (१९७३) सात महिला संघांनी एकमेकांची ताकद जोखली होती.
 
भारतीय महिला पहिल्यांदा उतरल्या त्या १९७८च्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर १९८८च्या एका स्पर्धेत आपला सहभाग नव्हता. संघाची कामगिरी फार लक्षवेधक नसली, तरी दखलपात्र नक्कीच होती. तीन स्पर्धांमध्ये चौथा क्रमांक, एकदा तिसरा क्रमांक. आपल्या मुलींनी १९९७ आणि २००० ह्या वर्षी उपान्त्य फेरी गाठून चमक दाखविली.
 
पहिलं उपविजेतेपद
कर्णधार मिताली राज, अंजूम चोप्रा, झुलन गोस्वामी ह्यांच्या संघानं २००५मध्ये पहिल्यांदा चषकासाठी लढत दिली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ह्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बलाढ्य कांगारूंपुढे भारताचा पाडाव लागला नाही. ह्याच देशात दीड वर्षापूर्वी झालेल्या पुरुषांच्या विश्वचषकाची अंतिम लढत त्याच दोन देशांमध्ये झालेली होती. आणि तिचाही निकाल असाच एकतर्फी होता.
 
पुढचा अंतिम सामना खेळण्यासाठी तब्बल एक तप वाट पाहावी लागली. अभेद्य मानल्या जाणाऱ्या कांगारूंच्या गडाला पहिला सुरुंग लावला भारतीय संघानंच – २०१७मध्ये डर्बी येथे झालेल्या उपान्त्य सामन्यात. हरमनप्रीतचं अविस्मरणीय आणि तुफानी शतक. कपिलदेवच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या खेळीची आठवण करून देणारा डाव. दीप्ती शर्माचे पाच बळी. कांगारू पराभूत!
 
अंतिम सामना लॉर्ड्सवर. सगळ्यांना आठवण झाली १९८३ची. पण यजमान महिलांचा संघ किंचित सरस ठरला. त्यांनी नऊ धावांनी बाजी मारली. निसटता, चुटपूट आणि हुरहूर लावणारा पराभव.
 
विजय अनपेक्षित नव्हे
हा इतिहास पाहिला, तर महिलांचा विश्वचषक विजय कपिलदेवच्या संघाएवढा अनपेक्षित नक्कीच नाही. पहिल्या चार क्रमांकात चार वेळा आलेल्या, दोन वेळा उपान्त्य सामन्यांत खेळलेल्या आणि दोन वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या संघाला हा उशिरा मिळालेला हक्काचा चषक म्हणता येईल.
 
स्वदेशात झालेल्या ह्या स्पर्धेतील प्रवास वाटला तेवढा काही सोपा झाला नाही. खरं तर भारतीय संघानं उपान्त्य फेरी गाठली, ती काहीशी रडतखडतच. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्यांच्याविरुद्धचे साखळीतील सामने आपण गमावले. विजय हाताशी असताना निसटलेला.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर ३३० धावा करूनही आपण हरलो. सर्वांत मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या नावापुढे लागला.
 
गंमतीची गोष्ट म्हणजे हा विक्रम अवघे १९ दिवस टिकला. त्याच कांगारू संघाने ठेवलेले अधिक मोठे लक्ष्य भारताने ओलांडले आणि तेही निर्णायक उपान्त्य सामन्यात. कांगारूंना विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य सामन्यात दोन वेळा पराभवाची धूळ चाखायला लावणारी कामगिरी भारतानेच केली आहे.
 
चुटपुटत्या पराभवांच्या तीन चटक्यांमुळे भारतीय संघासाठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मोक्याच्या क्षणी ढिसाळ खेळल्यामुळे ही वेळ आली. न्यू झीलँड आणि बांग्लादेश ह्यांच्याविरुद्धचे सामने जिंकायलाच पाहिजेत. बांग्लादेशविरुद्धचा सामना पावसानं धुतला; पण तोवर आपण कसाबसा हातरुमाल टाकून चौथी जागा मिळवली होती. ते करताना न्यू झीलँडला नमविण्याची कामगिरी चोख बजावली होती.
 
अ(न)मोल कानमंत्र
उपान्त्य सामन्यात सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी गाठ होती. जेमिमा रॉड्रिग्ज हिचं शतक, कप्तानसाब हरमनच्या ८९ धावा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष व अमनज्योत कौर ह्यांच्या छोट्या, पण फार महत्त्वाच्या खेळ्या. आपल्याला त्यांच्यापेक्षा फक्त एकच धाव जास्त करायची आहे, हा प्रशिक्षक अमोल मुजुमदार ह्यांचा कानमंत्र भलताच फायद्याचा ठरला.
 
ह्या स्पर्धेतली गमतीची गोष्ट म्हणजे साखळी सामन्यांनंतर पहिल्या दोन क्रमांकांवर असलेल्या संघांना उपान्त्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यांचे पराभव निर्विवाद होते. साखळीतील दोन सामन्यांमध्ये शतकाचा उंबरठा ओलांडण्यातही अपयशी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेने कमालच केलेली. चषकासाठी गाठ त्यांच्याशी होती.
 
मोक्याच्या क्षणी गळपटणारा संघ, अर्थात चोकर्स’! हे विशेषण आपल्या संघाला अगदी बरोबर लागू पडतं, हे दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघानं वेळोवेळी दाखविलेलं. त्याचं नकोसं अनुकरण त्यांच्या महिला संघानंही केलं. शफाली, स्मृती, दीप्ती आणि ऋचा घोष ह्यांच्यामुळं भारताचा डाव तीनशेच्या उंबरठ्यापर्यंत गेला. ह्या धावा पुरेशा ठरणार की अपुऱ्याच पडणार, हे द. आफ्रिकेची कर्णधार लोरा व्होलवार्ट आणि ॲनरी डर्कसन ठरविणार होत्या.
 

आधी बॅट चालली आणि नंतर चेंडू हाती घेऊन
शफाली वर्माची करामत.
(छायाचित्र सौजन्य - 'द गार्डियन')
...........................
कप्तानसाबचा आतला आवाज
अर्धशतकी सलामीनंतर भारतीय गोटात काळजी वाटत असतानाच अमनज्योत कौरच्या फेकीनं तझमिन ब्रिट्स धावबाद झाली. श्री चरणी हिच्या फिरकीनं दुसरा बळी मिळवून दिला. सून्ये लूस आणि लोरा ह्यांची जमलेली जोडी त्रासदायक ठरण्याची चिन्हं दिसत होती. आतल्या आवाजानं हरमनप्रीतला सांगितलं की, चेंडू शफाली वर्माकडे सोपव. दोन गडी झटपट बाद करीत शफालीनं हा विश्वास सार्थ ठरवला. लूसचा फटका झेलताना शफालीच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आता इतिहासात कायमस्वरूपी राहणार आहे.
 
लोरा व डर्कसन ह्यांचे इरादे स्पष्ट दिसत होते. त्यांनी ६१ धावांची भागीदारी केली. दीप्ती शर्मानं डर्कसनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर शतकवीर लोरा बाद झाली. तो झेल घेताना अमनज्योतला करावी लागणारी कसरत आणि तिनं दाखवलेलं प्रसंगावधान विश्वचषक जवळ आणणारं होतं.
 
लोराचं शतक फार सुंदर होतं. तिच्या नितांत देखण्या फटक्यांना नवी मुंबईकर प्रेक्षकांची दाद अभावानेच मिळाली. दक्षिण आफ्रिकेनं सामना गमावला तो २१ ते ३० ह्या षट्कांमध्ये संथ खेळून. भारतीय फिरकीचा वरचष्मा त्यांना झुगारता आला नाही.
 

केवळ कॅच आणि मॅच नाही, तर विश्वचषक हाती आला!
कप्तानसाबची खुशी गगनात न मावणारी...
(छायाचित्र सौजन्य - बी. बी. सी.)
...................................
जमलेल्या जोडीतल्या दोघी परतल्या आणि मग पुढचं सगळं सोपं होत गेलं. नदीन डी क्लर्क हिचा झेल आणि विश्वचषक हरमीनप्रीतनं एकाच क्षणी हस्तगत केला. कपिलदेवच्या त्या झेलाची आठवण करून देणारा झेल. चषक जिंकायचं स्वप्न स्पर्धेत सहभागी होऊ लागल्यानंतर ४७ वर्षांनी प्रत्यक्षात उतरलं.
 
पांढऱ्या केसांमागचं गुपित
ह्या यशाचे धनी बरेच आहेत. त्यात अग्रस्थानी येतात संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार. उगाच नाही हरमनप्रीतला त्यांच्या पाया पडावं वाटलं! ह्या विजयाची तयारी दोन वर्षांपासून चालू होती. म्हणून तर पंतप्रधान मोदी ह्यांच्याशी बोलताना मुजुमदार गंमतीनं म्हणाले, सर, काय सांगू. ह्या दोन वर्षांत माझे केस पांढरे झाले!’
 
हरमनप्रीत फलंदाज म्हणून फार यशस्वी ठरली नसली, तरी कप्तानसाब म्हणून तिची कामगिरी  वरच्या दर्जाची होती. शफालीच्या हाती चेंडू देण्याची तिची चाल निर्णायक ठरली. सगळ्याच खेळाडूंना सर्वोत्तम खेळ करण्यासाठी ती प्रोत्साहित करताना दिसली.
 

घेतला, सुटला, निसटला आणि पुन्हा झेलला.
अमनज्योत कौर हिचा तो अविस्मरणीय झेल.
(छायाचित्र सौजन्य - बी. बी. सी.)
...................................

गरज पडेल तेव्हा संघाच्या उपयोगी पडण्याची सर्वच खेळाडूंची धडपड होती. ती सामन्यागणिक दिसून आली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक बळी मिळविणाऱ्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये दोन दोन भारतीय खेळाडू आहेत.
 
महिला क्रिकेटला आपल्यात सामावून घेण्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ठरवलं. सदस्य देशांना तसा आदेश दिला. त्यानंतर वर्ष-दीड वर्षानं आणि काहीशा नाखुशीनंच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं हे पाऊल उचललं. पण त्याचा महिला खेळाडूंना फार उपयोग झाला. रेल्वेगाडीनं रखडत जाणं, डॉर्मेटरीत किंवा बॅडमिंटन हॉलमध्ये मुक्काम ठोकणं, हे सगळं संपलं. त्यांना विमानानं जाता येऊ लागलं, निवासासाठी उत्तम दर्जाच्या हॉटेलांची सोय होऊ लागली. व्हिडिओ ॲनालिसिस आणि त्यासारख्या अनेक तांत्रिक सोयी सहज उपलब्ध होऊ लागल्या.
 
क्रिकेट नियामक मंडळाची धुरा सौरभ गांगुली आणि जय शहा ह्यांच्या हातात असताना महिला क्रिकेटला चालना देणारे अनेक निर्णय धडाडीने घेतले गेले. त्यात त्यांच्या मानधनात वाढ, महिला आय. पी. एल. सुरू करणं ह्या दोन महत्त्वाच्या पायऱ्या होत्या. त्यामुळे महिला क्रिकेट अधिक गतीनं पुढे सरकलं. महिला क्रिकेटपटूंना नाव मिळालं, प्रसिद्धी मिळू लागली आणि पैसेही.
 
दीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर विश्वचषक जिंकला. पुढे काय?
विजयी संघातील खेळाडूंशी अनौपचारिक गप्पा मारताना पंतप्रधान मोदी ह्यांनी सुचवलं की, तुम्ही एक दिवस तुमच्या शाळेत घालवा. त्यातून तिथल्या विद्यार्थांना स्फूर्ती मिळेलच; पण तुम्हालाही त्यांच्याकडून खूप काही मिळेल.
 
एक गमतीची गोष्ट – १९८३ आणि २००७ ह्या वर्षी विश्वचषक जिंकणाऱ्या पुरुषांच्या संघातील दोन खेळाडूंना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. सुनील वॉल्सन आणि पियूष चावला, हे ते दोन गोलंदाज. महिलांनी पहिलं विजेतेपद मिळवताना, सगळ्या खेळाडूंना किमान एक तरी सामना खेळवलंच!
 
सचिन, विराट आणि रोहित ह्यांची अलीकडच्या तीन दशकांतील क्रिकेटवर मोठी छाप आहे. मिताली राज, हरमनप्रीत, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा ह्या नावांनी तेच केलेलं आहे. त्यांनी मुलींमध्ये आणि त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पालकांमध्ये हा आपला(च) खेळ आहे ही भावना रुजविली. ह्या संघातील विशी-बाविशीतील खेळाडूंना तोच वारसा पुढे न्यायचा आहे.
 
ह्या विजेतेपदानंतर चित्र बदलणार आहे, ह्यात शंकाच नाही. मुलींचं क्रिकेट आता आडवळणी गावातही पोहोचेल. देशातील महिलांच्या स्पर्धा वाढतील. मुलींच्या क्रिकेटकडे दुय्यम नजरेनं पाहणं कालविसंगत ठरेल.
 
... आणि कोणी सांगावं, विराट आणि रोहित २०२७च्या विश्वचषकात खेळत असताना स्मृती, दीप्ती, जेमिमा,  श्री चरणी ह्यांच्या जर्सी अभिमानाने घातलेली मंडळी जाहिरातींमध्ये चमकतील
!
----------------------------------
(दैनिक प्रहारच्या कोलाज पुरवणीमध्ये रविवारी प्रसिद्ध झालेला लेख विस्ताराने.)
----------------------------------
#भारतीय_महिला_क्रिकेट #विश्वचषक2025 #विश्वविजेतेपद #हरमनप्रीत_कौर #स्मृती_मानधना #दीप्ती_शर्मा #शफाली_वर्मा #जेमिमा_रॉड्रिग्ज #अमोल_मुजुमदार #नरेंद्र_मोदी #ऑस्ट्रेलिया #दक्षिण_आफ्रिका #कपिलदेव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पोरी... खेळणाऱ्या, जिंकणाऱ्या!

  ह्या विजयानं अनेक गोष्टी बदलतील.  बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे. काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल. मुलींना अंग चोरून मुलां...