Saturday 24 April 2021

अशोकला आठवताना...


अशोक...

'फोन वाजला की भीतीच वाटते. सध्या जगणं म्हणजे अगतिकता, अस्थिरता, अस्वस्थता एवढंच आहे.' व्हॉट्सॲप मेसेजमध्ये स्वातीताईंनी लिहिलं होतं. स्वातीताई म्हणजे दिवंगत लेखक लक्ष्मण लोंढे ह्यांच्या पत्नी. त्यांच्याशी शुक्रवारी सकाळी झालेला संवाद.

हा भीतिदायक फोन वाजायचंच बंद केलं तर? म्हणजे गुरुवारी दुपारनंतर मला ते जमलं असतं तर? तू व्हेंटिलेटरवर असल्याचा अभिजितचा निरोप वाचून फोन बंदच करून ठेवायला पाहिजे होता. कारण मग एकामागून एक वाजत गेलेले फोन मला ऐकू आलेच नसते. अर्थातच् ती बातमीही कळली नसती. अज्ञानातील काही तास समाधानाचे गेले असते.

'ह्यातून बरा होणार तो. माझा त्याच्यावर विश्वास आहे,' असा दिलासा मी अभिजितला, तुझ्या लाडक्या लेकाला कोणाच्या जिवावर दिला होता? तुझ्याच ना! कोण कुणाला दिलासा देत होतं? मी त्याला की मी मला?

साधारण वर्ष-दीड वर्षापूर्वी लेखक पुरुषोत्तम बोरकर गेले. त्यांच्या आठवणी लिहिल्या. त्या लेखावर डॉ. हेली दळवी ह्यांनी प्रतिक्रिया दिली होतं की, 'असंच लिहीत चला. पण शक्यतो असल्या माणसांच्या हयातीत. म्हणजे त्यांना भेटण्याची संधी हुकल्याची चुटपुट कमी होईल.'

डॉ. दळवी ह्यांची प्रतिक्रिया आज पुन्हा आठवतेय. तुझ्याबद्दल लिहिताना. तुला भेटता आलं नाही, ह्याची चुटपूट त्यांना नक्की वाटत राहील.

पण मग कधी लिहायला हवं होतं तुझ्याबद्दल? पंधरवड्यापूर्वी मनाशी ठरवलं होतं की, तुझ्या एकसष्टीला लिहायचं. म्हणजे अजून जवळपास चार वर्षं आणि पाच महिन्यांनंतर. तेव्हा तू असशील (आणि मीही असेन) असं किती सहजपणे गृहीत धरलं होतं मनाशी. आणि हो, लिहिण्यासाठी निमित्त वगैरे पाहिजे असतं ना. ते पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात आम्हाला शिकवलं होतं, 'रिलेव्हन्स' पाहिजे.

कधी लिहिता आलं असतं तुझ्याबद्दल कौतुकानं? तुला तो राज्य सरकारचा वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कार मिळाला तेव्हाच्या मुहूर्तावर? वरुणराज भिडे पुरस्कार तुला जाहीर झाला तेव्हा तर आनंदानं खूप जणांना एस. एम. एस. पाठवून कळवलं होतं. लिहिण्यासाठी तीही वेळ चांगली होती.

आपल्या क्षेत्रात अलीकडे असं एकमेकांबद्दल चांगलं लिहायची पद्धत नाही. स्पर्धक वृत्तपत्रांच्या पत्रकारांची नावं शक्यतो छापायची नाहीत. अगदीच टाळता येत नसलं, तर वृत्तपत्राचं नाव आणि त्याचं पद द्यायचं नाही. 'ज्येष्ठ पत्रकार' म्हणायचं फक्त. अशा वातावरणात लिहिलं असतं जरी, तर ते कुठे छापलं असतं? ब्लॉग नव्हतो लिहीत तेव्हा. असंच लिहून इ-मेलवरून पाठवता आलं असतं सगळ्यांना. ते वाचल्यावर तुझी प्रतिक्रिया काय झाली असती? कोणी भरभरून स्तुती करायला लागलं की, तू लगेच संकोचून जायचास. तुझा एरवीचा मोठा आवाज लहान व्हायचा. आक्रसून घ्यायचास तू स्वतःला.

तू रुग्णालयात दाखल झालास. पहिल्या आठवडाभरात तुझ्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नव्हती. एकदा बोललो, तर तुझा आवाज फार खोल गेलेला होता. लगेच थांबलो. मग गंमत म्हणून, तुला बरं वाटावं म्हणून एक चारोळी केली -

वाघ पिंजऱ्यात अडकलाय 
तब्येतीनं थोडा हडकलाय 
दोन-चार दिवसांत बाहेर पडणार 
डरकाळ्यांना पुन्हा सुरुवात होणार! 

ह्या ओळी अभिजितला पाठवल्या. त्या तुला वाचून दाखवल्याचं आणि ऐकून तू हसल्याचं त्यानं सांगितलं. तुलाही त्या व्हॉट्सॲपवर पाठविल्या होत्या. तू पाहिल्याच्या दोन निळ्या टिक दिसतात अजून मला. त्यानंतर पाठविलेले तीन मस्त व्हिडिओ मात्र तू काही पाहिले नाहीस अजून. त्यातला एक तर तुझ्या खास विषयाचा होता - पाच-पन्नास जातीच्या आंब्याचं प्रदर्शन. त्याच्यावर काही त्या दोन निळ्या खुणा उमटल्याच नाहीत.

अभिजितचा सोमवारी संध्याकाळी फोन आला. तू खूश आहेस, असं सांगून तो म्हणाला, 'घरी येतो उद्या सकाळी काका. अण्णा म्हणाले, सतीशकाकाकडून भरपूर पुस्तकं घेऊन ये वाचायला. अंतोन चेकाव्हच्या कथा आण.'

चेकाव्हच्या अनुवादित कथांचा संग्रह आहे माझ्याकडे. पण तो असा लगेच सापडणार नाही. अभिजितला सांगितलं की, चेकाव्ह-बिकाव्ह काही नाही. चांगली पुस्तकं देतो तुला.

कम्प्युटरसमोरच्या खुर्चीवर पाच-सहा पुस्तकं गेल्या मंगळवारपासून पडली आहेत. त्यात मोहन पाटील ह्यांच्या दोन ग्रामीण दीर्घकथांचा संग्रह आहे. त्यातली 'खांदेपालट' तुला आवडली असती. किंवा कदाचित आवडलीही नसती. 'राजकारण असं नाही खेळत', असं म्हणत तू मग गावपातळीवरच्या राजकारणाचे काही पदर उलगडून दाखविले असते. 'थांब' म्हणेपर्यंत फोनवर बोलत राहिला असतास.

'शापित यक्ष' तुला नक्की आवडलं असतं, अशोक. अवलिया रिचर्ड बर्टनचं हे चरित्र वाचून तू 'लय भारी' अशी दाद दिली असतीस. थोडासा त्याच्याच जातकुळीतला आहेस तू, असं वाटतं. अतिदक्षता विभागात तीन आठवडे राहून त्रासलेल्या तुला गडगडाटी हसता यावं, म्हणून शरद वर्दे ह्यांची दोन पुस्तकं काढून ठेवली होती. नवी कोरी.

आणखी एक पुस्तक आहे सई परांजप्यांचं 'सय'. 'लोकरंग'मधलं त्यांचं सदर तू नियमित वाचलं असणारच. आपलंच वर्तमानपत्र न वाचण्याएवढा बनचुका पत्रकार झाला नव्हतास तू. 'लोकसत्ता'मध्ये येणारी सगळी सदरं नियमित वाचायचास. मग कोणी काय लिहिलंय, हे कधी तरी फोनवर सांगायचास. आपला अंक आपण सोडून इतर सगळ्यांनी वाचावा, अशी नव्या युगातील पत्रकारांची धारणा आहे. त्याला तू अपवाद.

... तर ही काढून ठेवलेली पुस्तकं अजून पडून आहेत. आता ती परत जागेवर हलवावी लागतील. परत कधी ती निघतील तेव्हा त्यांना चिकटलेली तुझी आठवण असेलच.

अशोक, आपली ओळख नेमकी कधी झाली? निमित्त ‘लोकसत्ता’चं हे नक्की. नगर आवृत्ती सुरू करण्याचा निर्णय अचानक झाला. टिळक रस्त्यावरच्या ‘हॉटेल संकेत’मध्ये आपल्या मुलाखती झाल्या. अरुण टिकेकर संपादक होते. जॉर्ज वर्गिस, संजय पवार होते मुलाखतीला. तेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो. ओळख झाली. मार्चचा पहिला आठवडा होता - १९९४. 

तू तेव्हा ‘सार्वमत’मध्ये काम करत होतास. मी ‘केसरी’मध्ये. तुझं ‘सार्वमत’साठी वसंतराव देशमुखांनी 'इन्व्हेन्शन' केलं आणि महादेव कुलकर्णी ह्यांनी 'लोकसत्ता'साठी 'डिस्कव्हरी'! ‘लोकसत्ता’च्या त्या आवृत्तीनं नगर जिल्हा ढवळून टाकला. अनेक नव्या गोष्टींची सुरुवात झाली. तू बहुतेक लगेच रुजू झालास. आवृत्तीचं मुख्यालय सोडून बाहेरच्या ठिकाणी ‘लोकसत्ता’नं नेमलेला तू पहिला ‘स्टाफर’ असशील बहुदा. आणि करार करून नेमणूक झालेला संपादकीय विभागातलाही तू पहिलाच असावास. नंतरच्या काळात अशा अनेक पहिल्यावहिल्या गोष्टींचा तू मानकरी होतास. त्याची सुरुवात तिथनं झाली.

दि. ३० एप्रिल १९९४. आवृत्तीच्या कामाचा पहिला दिवस. त्या आधी आपली जोरदार बैठक झालेली. जिल्हाभरात, छोट्या-मोठ्या गावांमध्ये मिळून पाऊणशे अर्धवेळ वार्ताहर नेमलेले. दुपारी कधी तरी तुझी बातमी हातात पडली. श्रीरामपुरात वर्षभरात एड्सने किती जणांचा मृत्यू झाला, हे सांगणारी बातमी होती ती. एड्स हा तेव्हा फार चर्चेचा विषय होता. ती बातमी वाचेपर्यंत तुझं काही कार्यकर्तृत्व माहीत नव्हतं मला. बातमीचं संपादन केलं खरं; पण एका सहकाऱ्याला म्हटलं, ‘हा बहुतेक आपल्याला पहिल्याच महिन्यात नोटीस मिळवून देणार.’ त्यानंही बातमी पाहून त्या भीतीला दुजोरा दिला.

आम्ही तुला ओळखत नव्हतो, एवढंच त्या शेरेबाजीनं यथावकाश स्पष्ट झालं. तुझी ती पहिली बातमीही खणखणीत होती. त्याच काय, पण नंतरच्या तुझ्या कुठल्याच बातमीनं कोर्टाची नोटीस आल्याचं मला तरी आठवत नाही. हळुहळू अशोक तुपे हे नाव गाजू लागलं. श्रीरामपुरात राहून तू पुण्यात काय, मुंबईतही पोहोचलास. आवृत्ती सुरू होण्याच्या आधी तू वितरण विभागाबरोबर जीव तोडून पळत होता. त्यामुळे तू म्हणजे त्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत! वितरण, जाहिरात आणि अर्थातच बातमी...नगर जिल्ह्याच्या उत्तर भागातल्या कोणत्याही प्रश्नावर रामबाण उत्तर शोधण्यासाठी एकच पर्याय - ‘राजे’.

अशोक तुपे वेगळ्या बातम्या देतो, वेगळ्या पद्धतीनं विचार करतो, हे एव्हाना स्पष्ट झालं होतं. वार्ताहरांच्या बैठका तू गाजवायचास. बोलायला उभा राहिलास की, पहिल्या काही मिनिटांतच बैठकीचा नूर बदलून जायचा. नवनवीन कल्पना, विषय मांडायचास. आधी झालेल्या चर्चेला वेगळा दृष्टिकोण द्यायचास. अशा बैठका संपल्यावर मग ‘अशोक एकटाच फार बोलतो’ अशी तक्रार काही वार्ताहर करायचे. ‘खरं तर अशोकचं ऐकून घेण्यासाठी वेगळी बैठक घ्यायला हवी,’ असंही आम्ही विनोदानं म्हणत असू.

श्रीरामपूरच्या बातम्या ‘लोकसत्ता’मध्ये वरच्या पातळीवर विशेष गांभीर्यानं घेतल्या जाऊ लागल्या. त्यातलं एक निमित्त मला आठवतं. सोनिया गांधी ह्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनण्यावर आक्षेप घेत आणि त्यांच्या विदेशी असण्याकडं बोट दाखवित शरद पवार ह्यांनी काँग्रेस सोडली. हे कसं झालं, हे सांगणारी बातमी तू रात्री साडेआठच्या सुमारास फॅक्सनं पाठविली. तुझी राजकीय बातमी म्हणजे खणखणीतच. ती लगेच पुण्याला पाठविली. तेव्हा आपले निवासी संपादक आनंद आगाशे होते. त्यांना तुझी बातमी सांगितली. चकितच झालेले, पण तसं बोलण्यातून जाणवू न देता, ते मला म्हणाले, ‘अरे तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. तुम्ही कसली बातमी देता!’ त्यांचं म्हणणं गैर नव्हतं. पण एवढंच सांगितलं की, अशोकनं बातमी दिलीय म्हटल्यावर त्यात दम आहे. त्याच्याशी तुम्हीच एकदा बोला. त्या दिवशी नाही, पण दुसऱ्या दिवशी तू आगाशेसाहेबांना फोन केला. तुझी माहिती खरी होती, हे त्यांच्या लक्षात आलं होतंं आणि त्यानंतर तू त्यांचा लाडका झाला. एवढा की, ‘लोकसत्ता’ सोडल्यानंतर त्यांनी मला एकदा बजावलं होतं, ‘तू आणि अशोक वेड्यासारखा काही निर्णय घेऊ नका. आहात तिथंच थांबा. निरोप दे माझा अशोकला.'

आगाशेसाहेबांची मुंबईला बदली झाली आणि त्यांनी सर्व आवृत्त्यांच्या पहिल्या पानासाठी एकच अँकर द्यायचा, असं नियोजन केलं. नगरमधून अँकरसाठीची पहिली बातमी स्वाभाविकच तुझी होती, अशोक. एका कार्यशाळेच्या निमित्तानं ते नगरला आले होते. गप्पांच्या ओघात मी तुला हसत हसत सहज काही म्हणालो. आगाशेसाहेबांना वाटलं की, मी तुझी टिंगल करतोय. त्यामुळे थोडं रागावूनच ते म्हणाले होते, ‘अशोकचा ऑल एडिशन अँकर असतो बरं!’ ते आणखी काही वर्षं ‘लोकसत्ता’मध्ये राहिले असते, तर  तुझ्या कारकीर्दीला वेगळं वळण मिळालं असतं. तू आताच्या चार-पाच वर्षं आधीच राज्य पातळीवर गाजू लागला असता. तुला ह्याची काही कल्पना होती?

तुझ्याबरोबर काम करताना मजा यायची, अशोक. एकदा बातमी दिली की, मग त्याबद्दल कसलाच आग्रह नसायचा तुझा. कोणत्या बातमीला तू स्वतःच ‘बाय-लाईन’ दिल्याचं मला कधीच आठवत नाही. बातमी कापली, नावं गाळली, आतल्याच पानात लागली, खालीच लागली, हेडिंगच चागंलं दिलं नाही, बातमी उशिराच लागली... सर्वसामान्यपणे वार्ताहरांच्या ज्या नित्यनेमाच्या तक्रारी असतात, त्या तुझ्याकडून कधीच ऐकायला मिळाल्या नाहीत. तो तुझा कर्मयोग असावा बहुतेक.

एवढ्या वर्षांमध्ये इतक्या वेळी आपण बोलल्यावर जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट - पगारवाढ, बढती, रजा, नोकरीत मिळणारा न्याय... ह्याबद्दल निर्विकार होतास तू. आपल्या बोलण्यात हा विषय अपवादानेच कधी आला असेल. मिळत होतं, त्यावर खूश असावास तू. म्हणजे कुठं तरी आत थोडी खंत असली, तरी त्याबद्दल कधी जाहीर वाच्यता केली नाहीस. तू तक्रार केली नाही किंवा ‘मला अमूक तमूक पद द्या’ असं कधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्याही सुचवलं नाही. परिणामी आहे त्यावर तू खूश आहेस, असं वरिष्ठांना वाटलं असणार. मध्यंतरी तुझ्या ‘वार्ताहर’ ह्या पदामागे ‘वरिष्ठ’ एवढाच शब्द चिकटला. तुझ्या नावामागे सहसंपादक, सहायक संपादक; किमान विशेष वार्ताहर ह्यापैकी काही असणं मला तरी आवडलं असतं. सुमारांच्या सद्दीतल्या अनेक सन्मानीयांना संपादकपदाची सुगी साधत असताना, तुला ते मिळू नये, ह्याची खंत वाटतेच राहून राहून.

‘सार्वमत’चे आद्य संपादक वसंतराव देशमुख तुझे पत्रकारिततले गुरू. त्यांच्याबद्दल तुझ्या मनात कायम आदर होता. त्यांचं निधन झाल्यानंतर संपादकपदासाठी तुझंच नाव चर्चेत होतं. तू नेमका काय निर्णय घेशील, ह्याची चाचपणी वरिष्ठांनी माझ्याकडे केली होती. तू वेगळं काही करावंस असं मनातून वाटत असतानाही मी सांगितलं होतं की, अशोक काही असा वेगळा निर्णय घेणार नाही. मला माहीत होतं ते.

‘ॲग्रोवन’ सुरू होण्याच्या वेळी मी मुलाखतीसाठी जाऊन आलो. मग संपादक निशिकांत भालेराव ह्यांनी पुन्हा चर्चेला बोलावलं. तुला घ्यावं, असं मी त्यांना आग्रहानं सांगत होतो. तेही सहमत होते. मग माझ्या भवितव्याचा वगैरे निर्णय बाजूला ठेवून आमच्या दहा-पंधरा मिनिटं गप्पा झाल्या त्या तुझ्याचबद्दल. मधल्या काळात, साधारण दहा वर्षांपूर्वी तू मला ऑफर दिलीस - ‘पुण्यनगरीला’ निवासी संपादक म्हणून जातोस का? पण बाबा शिंगोटे ह्यांनी तुलाच ह्यापेक्षा मोठं पद आणि केवळ संयोजनाची जबाबदारी देऊ केलीस, तेव्हा तू निर्णय घ्यायला कचरलास. त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचं ओझं नको होतं, तुला बहुतेक.

दोन-एक वर्षांपूर्वी एका नव्या सायंदैनिकाचा प्रस्ताव माझ्याकडे आला. संपादकपदासाठी तूच कसा योग्य, हे मी संबंधिताला समजावलं. आम्ही दोघं तुला भेटायला आलो होतो श्रीरामपुरात. होय-नाही, असं नेमकं काहीच सांगितलं नाहीस तू. उलट दैनिकाऐवजी ‘ॲप’ कसं फायद्याचं राहील आणि तेच नव्या जमान्याचं माध्यम कसं आहे, हे सांगत राहिलास. पुढे त्या दैनिकाचं काही झालंच नाही. तू होय म्हणाला असता, तर हलचाल झाली असती कदाचित. मस्त फोनवर बोलावं, वेगवेगळे विषय अभ्यासावेत आणि दणकून लेख-बातम्या लिहाव्यात, हेच बरं, असं तू ठरवून टाकलं होतंस मनाशी.

तुझ्याकडे अफाट किस्से होते अशोक. तुझं आयुष्यच तसं होतं. पुणे जिल्ह्यातून वडील कसे आले नि तुपे कुटुंब कान्हेगावला कसं स्थिरावलं, ह्याचा इतिहास तू सांगितलास. अण्णासाहेब शिंदे ह्यांना तू मनापासून मानायचास. तसंच गोविंदराव आदिकांबद्दल. त्यांचा तर तू एके काळचा कार्यकर्ता. जोशभरल्या जवानीत पतित पावन, हिंदू एकता, स्टुडंट्स फेडरेशन अशा उजव्या ते डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये आंदोळलेला. ह्याच डाव्या, तेजतर्रार बाण्यातून तू वसंतराव देशमुख ह्यांना ‘तुमची माध्यमं म्हणजे भांडवलदारांची हस्तक’ असं सुनावलं होतंस. तुझ्या तारुण्यसुलभ असंतोषाला त्यांनी बरोबर वाट काढून दिली आणि आपल्या दैनिकाचा बातमीदार नेमलं. त्यांच्याबद्दलची ही कृतज्ञता तू अखेरपर्यंत जपलीस. वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार वितरणाला दिग्गज पत्रकार पाहुणे म्हणून लाभले, ह्याचं बहुतांशी श्रेय तुलाच. पहिल्याच वर्षी जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली ती पाथर्डीच्या श्यामसुंदर शर्मा ह्यांची. त्यांच्या नावाबद्दल मी आग्रह धरला, तो ‘केसरी’साठी त्यांनी केलेल्या बातमीदारीचा अनुभव लक्षात ठेवून. हा आग्रह तुला मान्य झाला. वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी योग्य माणसं निवडणं, सगळ्यांचा कल पाहून पुरस्कारासाठी निवड करणं, हे अवघड काम तू बरीच वर्षं शांतपणे करीत राहिलास.

कसं कुणास ठाऊक, पण आपले संबंध पहिल्या दिवसापासून ‘अरे-तुरे’चेच राहिले. आधी आपण सहकारी होतो. लवकरच मित्र बनलो. मला नगर सोडून पुण्याला जावं लागल्यानंतर आपलं औपचारिक नातं संपलं. उपसंपादक-वार्ताहर संबंध संपुष्टात आले आणि मग आपण केवळ मित्र राहिलो. कधी तरी भेटणारे, पण काळाच्या त्या अंतरानं दुरावा न पडणारे घट्ट मित्र.

इतक्या वर्षांनंतर हे आवर्जून सांगावं वाटतं की, तुला कुठलाच गंड नव्हता अशोक. कोणत्याही समूहात सहज मिसळून जाणं तुला जमायचं. तसा विश्वास तुझ्यात होता आणि समोरच्यालाही द्यायचास. अभिजितनं परवा सांगितलं की, तो एकदा घरी आलेला आहे माझ्या. आधी आठवलं नाही. मग लक्षात आलं. तेव्हा तो खूप गप्प गप्प होता. त्याला तू म्हणालास, अरे, काही नाही आपलंच घर आहे हे. असंच एकदा वहिनींना दवाखान्यात घेऊन आला होतास तू. कधी न पाहिलेल्या माणसांच्या घरी आल्यानं त्या स्वाभाविकच संकोचल्या होत्या. तू म्हणालास, ‘आपला मित्रय सतीश. घरच्यासारखं वागायचं इथं.’

आणखी एक - कार्यालयीन राजकारण, असूया, हेवा ह्या सगळ्यांपासून तू दूर राहिलास नेहमी. कुणाचा दुस्वास केला नाहीस की कुणाबद्दल कंड्या पिकवल्या नाहीत.

ग्रामीण भागातून आल्याचा न्यूनगंड टाळणं आणि ताकदवान पत्रकार असल्याचा अहंगंड न बाळगणं, ह्या गोष्टी सोप्या नव्हेत. त्या दोन्ही तुला साधल्या. म्हणजे तसं काही तू जाणूनबुजून ठरवलं नव्हतंस. उपजत होतं ते. अनेक मोठमोठ्या माणसांचा उल्लेख झाल्याावर तू सहज म्हणायचास, ‘आपला मित्र आहे तो. परवाच तासभर फोन झाला.’ हे सांगण्यामागे मिरवण्याचा हेतू काही नसायचा. जाता जाता समोरच्याला माहितीसंपृक्त करून सोडणे, एवढंच! संवाद साधण्याची कला तुला वश होती. दोन महिन्यांपू्र्वी आपण एकत्र पुण्याला गेलो. शेजारी बसलेल्या तरुणाला तू इतक्या सहजपणे बोलतं केलंस की, त्यानं त्याच्या पॅकेजचीही माहिती सहज  दिली. त्यानंतरच्या अर्ध्या तासात तू पुढं बसलेल्या सिंधी व्यापाऱ्याला खुलवलं.

प्रसिद्ध लेखिका शान्ता ज. शेळके ह्यांनी आपले गुरू श्री. म. माटे ह्यांच्याबद्दल लिहिलंय की, ’जातीयतेकडे पाहण्याचा निर्मळ दृष्टिकोण त्यांनी मला दिला.’ हे वाक्य तुला तंतोतंत लागू होतं. तू जाती-जमातींची वैशिष्ट्यं, गुणावगुण सांगायचास. पण त्यामागे कोणताही ग्रह नव्हता. त्यामुळेच रामदास आठवले पक्षाच्या कार्यक्रमात बोलावून तुझा खास सत्कार करायचे आणि ते तू कौतुकाने सांगायचास.

अनावर बालसुलभ कुतुहल असलेला माणूस म्हणून तू कायम लक्षात राहशील. पाहायला मिळणाऱ्या प्रत्येक नव्या गोष्टीबद्दल तुला विलक्षण रस असे. आधी ते सगळं तू समजून घ्यायचास आणि मग इतरांना समजून सांगायला मोकळा! तुझी आकलनशक्ती टिपकागदासारखी. पटकन सारं शोषून घेणारी. तुझ्या आवडीच्या विषयांचा एक एक हंगाम असे. त्यात ती एकच लाट असायची. म्हणजे तो ठरावीक काळ तू त्याच विषयावर बोलत राहायचास. त्यातलं नवीन काय ते सांगायचास. अभिजित मध्यंतरी कोटा (राजस्तान) इथं होता, त्या काळात वेळोवेळी झालेल्या फोनमध्ये कोट्याबद्दल मला खूप काही ऐकायला मिळालं. असंच दीक्षित डाएटबद्दल. ते किती फायद्याचं हे तू माझ्या घरी बसून चहा प्यायला नकार देताना समजावून सांगितलं.

खर्चात कपात म्हणून श्रीरामपूरचं कार्यालय बंद करण्यात आलं; तुला असलेल्या सहकारी वार्ताहराची जागाही माणूस मिळत नाही म्हणून रद्दच झाली. हा मधला काळ तुला फार अवघड गेला, हे खरंय ना अशोक? ती दीड-दोन वर्षं तू अस्वस्थ होता. आपली उपेक्षा होतेय, अशी नकळती चुटपूट लागली होती. पण ह्याही परिस्थितीवर तू मात केली. तुला काही कम्प्युटरशी फारशी मैत्री करता आली नाही. पण त्यानंतर सुरुवातीला मोबाईल आणि मग स्मार्ट फोन ह्यांना जिगरी दोस्त बनवलं तू. मोबाईलमुळं तुला राज्यभर, राज्याबाहेर कुणाशीही सहज संपर्क साधता येऊ लागला. स्मार्टफोनवरील इंटरनेटमुळे  जगाशी जोडून घेतलंस तू स्वतःला. तू गेल्या दशकभरात जी जोरदार कामगिरी केलीस ना, त्याचं रहस्य ह्यातच आहे. तू देशभरातली विविध वृत्तपत्रं पहाटेच स्मार्टफोनवर पाहायचास. अनेक तांत्रिक बाबींची माहिती तू ह्या माध्यमातून सहजपणे मिळविली. तुझ्यामधला मूळचा चाणाक्ष वार्ताहर-पत्रकार ह्या सोयीमुळं अधिक स्मार्ट बनला.

तुझी कॉपी भारी असायची. अक्षर सुवाच्य वगैरे नाही. घाईघाईत, उडतं लिहिलेलं; पण उपसंपादकाला वाचता येणारं. लिहिण्यात वेलांट्या-उकाराच्या चुका भरपूर असत. दीर्घ लिहिण्याकडे तुझा कल. ह्याबाबत तुला रागवून काही उपयोग नसायचा. कारण ‘आहे हे असं आहे बुवा’ असं म्हणत तुझे दोन्ही हात वर! प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या कार्यशाळेत प्रा. लीला गोविलकर ह्यांचं भाषेविषयी सत्र होतं. ग्रामीण भागातील रहिवासी सहसा दीर्घ स्वरात बोलतात, असं त्यांनी ओघात सांगितल्यावर तू पटकन मला म्हणाला, ‘माझ्या सगळ्या वेलांट्या आणि उकार दुसरे का असतात, हे कळलं ना आता!’

‘लोकसत्ता’च्या नगरच्या अंकात सहा वर्षं ‘नगरी-नगरी’ सदर लिहिलं. त्याचा तू एक महत्त्वाचा चाहता. त्यासाठी अनेकदा विषय दिले, फोटो दिले. पण सदराचा उल्लेख तू कायम ‘नगरनगरी’ असा तरी करायचास किंवा ‘रसिकवाला’ असा. मध्यंतरी तू म्हणालास, ‘मला ना कादंबरी लिहायचीय. पण तुझ्यासारखी शैली नाही ना, सतीश.’

हे ऐकून हसू आलं - कादंबरीचं नाही, तर शैलीचं. एवढ्या विविध विषयांवर इतकं लिहिलेल्या तुझ्या नावावर आतापर्यंत किमान दोन पुस्तकं असायला हवी होती, अशोक. बातम्यांच्या फार मागं लागण्यापेक्षा आता पुस्तकाच्या मागं लाग, असं तुला पाच वर्षांपूर्वीच ऐकवून झालं होतं. आता तू एकदम कादंबरीच लिहायची ठरवलेली. म्हणालो, ‘तू लिहायला तर सुरुवात कर. बाकीचं मी बघतो.’ अस्सलपणात थोडी कमतरता राहते, तेव्हा शैलीचा मेक-अप जरुरीचा असतो. माहितीच्या उणिवेचं नकटेपण शैलीच्या रंगरंगोटीत लपवावं लागतं. माहितीचा खजिना असलेल्या तुझ्या लिखाणाला, ह्या मेक-अपची गरज नव्हती. पण तेच तुला समजावून सांगणं अवघड होतं.

अकाली जाणं, हा शब्दप्रयोग खूप वेळा वाचला, वापरला. त्याचा अर्थ तू सांगितलास, अशोक. गेल्या दीड दशकात ग्रामीण भागातील खूप तरुण उच्चशिक्षण, विशेष शिक्षण घेऊन माध्यमांमध्ये आले. त्यांच्यासाठी तू ‘आयडॉल’ असणं अगदीच स्वाभाविक. ग्रामीण पत्रकारितेची माध्यमातील मुख्य प्रवाहाला दखल घ्यायला लावण्याचं काम कळत-नकळत तू केलंस. तुझ्या जाण्यामुळं कुटुंबाचं, अनेक मित्रांचं, तू काम करीत असलेल्या वृत्तपत्राचं मोठं नुकसान झालंच आहे. पण त्याहून मोठी हानी झाली आहे ती ओरडण्याची ताकद नसलेल्या एका मोठ्या समाजघटकाची. त्यांचा आवाज बनण्याचं काम तू साडेतीन दशकांच्या विलक्षण पत्रकारितेत केलं.

१ मे ही तारीख जवळ आलीच आहे. ही तारीख आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, हे तुला सांगायला नकोच. 'नगरच्या मातीचा, महानगरांच्या धर्तीचा' असं बिरूद लावत 'लोकसत्ता'ची नगरची आवृत्ती १९९४मध्ये ह्याच दिवशी सुरू झाली. त्याला यंदा २७ वर्षं पूर्ण होतील.

वर्धापनदिन. त्याच दिवशी तुझा दशक्रियाविधी आहे. तुला माहितीय का, 'लोकसत्ता-नगर'च्या त्या आपल्या पहिल्या संघातला तूच एकमेव खेळाडू उरला होतास. बाकी सगळे पांगले. कोणी निवृत्त झालं, कोणी बाहेर पडलं, कोणाला निरोपाचा नारळ दिला.

संपादकीय, जाहिरात, वितरण... कोणत्याच विभागात त्या वेळचा एकही माणूस आता तिथे नाही. तूच होतास फक्त. ह्या आवृत्तीच्या पहिल्या दिवसापासून सलग २७ वर्षं काम करणारा तू एकटाच. आपल्या त्या संघातल्या साखळीतला शेवटचा दुवा तुझ्या रूपाने होता. तोच तुटला!

हे सगळं लिखाण म्हणजे तुझ्या कामाचा आढावा नाही, अशोक. किंवा ही तुझी कार्यमीमांसाही नाही. ह्या आहेत फक्त आठवणी. अस्वस्थ होऊन वर आलेल्या. तुझ्याबद्दलच्या, तुझ्या बातम्यांबद्दलच्या, तुझ्या गप्पांबद्दलच्या. तुझ्याबरोबर रंगलेल्या मैफलींच्या. तास तास चालणाऱ्या तुझ्या फोनच्या.

ह्या सगळ्यांत आता भर पडणार नाही.
पण ह्या आठवणी बुजणारही नाहीत.
कारणपरत्वे किंवा अकारणही त्या येतच राहतील.
किमान मी असेपर्यंत तरी...

#Journalism #RuralJournalism #AgriJournalism #Journalist #media #Maharashtra  #AshokTupe #Loksatta #Ahmednagar #Shrirampur #News

Friday 23 April 2021

पुस्तकवाटेवरचा प्रवास

 

एखादी कविता आपल्या वाचण्यात खूप उशिरा येते. कवीला त्यातनं जे सांगायचं आहे, ते मात्र आधीच कधी तरी माहीत होऊन गेलेलं असतं; नकळतपणे जाणवतं. ती कविता अशीच कधी तरी 'भेटते', तेव्हा आनंद होतो खरा; पण तो नवं काही गवसल्याचा नसतो. समानधर्मा सापडल्याची खुशी असते ती. किंवा ह्यानं अगदी आपल्या मनातलंच कसं मांडलंय, असं वाटतं. अरेच्चा, आपल्याही खूप आधी कुणाला तरी हे सुचलेलं होतं, असं मनाशी म्हणतो.

सफदर हाशमी ह्यांच्या 'किताबें' कवितेची गोष्ट अशीच. लेखक-कवी दासू वैद्य ह्यांनी केलेला 'किताबें'चा अनुवाद पंचवीस-एक वर्षांपूर्वी दैनिक लोकमतनं मोठ्या देखण्या पद्धतीनं छापला. डाव्या बाजूला चार-पाच-सहा शब्दांच्या ओळींमागून ओळी, पुस्तकाची महती सांगणाऱ्या. आणि उजवीकडे पुस्तकांचा ढीग रेखाटलेला. त्यावर ज्ञानेश्वरी, तुकारामबुवांची गाथा, विश्वकोश असं लिहिलेलं. पुस्तकांचं मोठेपण सांगणाऱ्या ह्या कवितेचा अनुवाद वाचताना खूप आनंद झाला. त्याचं कात्रण आहे अजून कपाटावर चिटकवलेलं.

'पुस्तकं काही सांगू इच्छितात

तुमच्या सावलीत रांगू इच्छितात'

- हाशमीसाहेबांच्या ह्या ओळी वाचण्याच्या आधीच पटलेल्या होत्या. पुस्तकांचं 'ऐकायला' कधीची सुरुवात झाली होती!

'पुस्तकांमध्ये रमणारा', 'चांगलं वाचन असणारा' अशी माझी (प्रत्यक्षाहून उत्कट अशी!) प्रतिमा बनलेली आहे. स्वतःबद्दल असं ऐकायला मिळतं तेव्हा सुखावतो. पण ते तेवढं खरं नाही, ही जाणीव असतेच की आपली आपल्याला. स्वतःशी फार खोटं नाही बोलता येत. '...मनसे भाग ना जाए' असं साहिर लुधियानवी ह्यांनी लिहून ठेवलेलं आहे. ते नेमकं आठवतं.

आपल्याकडं स्वतःची पुस्तकं असावीत, त्याच्या पहिल्या पानावर मालकी सांगणारी आपली सही असावी, अमूक एक पुस्तक संग्रहात आहे, हे अभिमानानं सांगता यावं, असं नेमकं कधीपासून वाटायला लागलं? आठवणं अवघडच. पण लहानपणी घरीच पुस्तकांची ओळख झाली, एवढं खरं. गोष्टींची छोटी-छोटी, मोठ्या टंकातली पुस्तकं अधूनमधून आणली जात. सोलापूरला एस. टी. महामंडळात काम करणारे प्रभूमामा भाऊबीजेला हमखास येत. त्यांची फिरायला जायची जागा म्हणजे स्टँड. बरोबर गेलं की, तिथल्या वृत्तपत्राच्या स्टॉलमध्ये मिळणारी पन्नास पैसे, रुपया किमतीची छोटी गोष्टींची पुस्तकं ते घ्यायचेच. अशा पन्नास-साठ पुस्तकांची आम्ही भावंडांनी तेव्हा 'लायब्ररी' चालू केली. म्हणजे त्यांना कव्हर घालून, कॅलेंडरच्या पानांवरचे मोठे आकडे कापून चिकटवून त्यांना क्रमांक देऊन वगैरे. पुस्तकांची यादी केलेली. पण ती वाचण्यासाठी कोणी सभासदच नव्हते. साधारण चार दशकांपूर्वीच्या त्या घरगुती 'लायब्ररी'तलं एक छोटं ४८ पानांचं पुस्तक माझ्या देवघरात आहे - लहान मुलांसाठी असलेला नित्यपाठ. त्यात काही श्लोक, मारुतीस्तोत्र, गणपतिस्तोत्र, आरत्या असं बरंच आहे.

पुस्तकांचं असं 'घर' असतं, त्याला वाचनालय म्हणतात, हे आठव्या वर्षी कळलं. वाशिंबे ह्या खेड्यातून आम्ही तालुक्याच्या गावी - करमाळ्याला राहायला आलो तेव्हा. तालुक्याचं गाव, भुसार मालाची मोठी बाजारपेठ असलेल्या करमाळ्यातलं हे नगरपालिकेचं सार्वजनिक वाचनालय. शहराची लोकसंख्या असेल तेव्हा पंधरा ते वीस हजारांच्या घरात. गावातील नळांना २४ तास पाणी. 'करमाळा...पाण्यावाचून तरमाळा' ही जुनी ओळख विसरली होती. (पुढं ऐंशीच्या दशकात ती नव्याने निर्माण झाली, हा भाग वेगळा.) सोलापूर-नगर हा दक्षिणोत्तर रस्ता (तोच 'मेन रोड') शहरातून जायचा. त्याला काटकोनात ओलांडणारे गावाच्या वेगवेगळ्या पेठांना जोडणारे चार-पाच रस्ते. अगदी व्यवस्थित आखलेले. नियोजनबद्ध रचना. शहरात चांगली बांधलेली भाजी मंडई होती. तिला भिंत, विक्रेत्यांसाठी प्रशस्त ओटे. ह्याच मंडईत षट्कोनी दुमजली इमारत होती. दगडात बांधलेली. त्या भक्कम इमारतीत हे वाचनालय. खालच्या मजल्यावर पुस्तकांची देवघेव आणि टेबलांवर वृत्तपत्रं ठेवलेली. वरच्या मजल्यावर साप्ताहिकं. मुक्तद्वार वाचनालय. वाचण्यासाठी सर्वांना खुलं.

करमाळ्यात गेल्यावर लगेच आम्ही वाचनालयाचे सभासद झालो. इंग्रजी शब्द वापरण्याच्या सोसापायी 'लायब्री' म्हणत असू तेव्हा. एका वेळी प्रत्येकी एक पुस्तक नि मासिक घ्यायचं. अनामत दोन रुपये; पुस्तकाची वर्गणी महिन्याला एक रुपया आणि मासिकाची आठ आणे. आमचा सभासद क्रमांक होता ३२. तो सांगण्याची वेळ कधीच आली नाही. ग्रंथपाल चेहरे पाहूनच सभासदाचं कार्ड काढायचा.

भाजीबाजारातल्या टुमदार दगडी इमारतीत ते वाचनालय फार काळ राहिलं नाही. नगरपालिकेनं किल्ल्याच्या आत तटाला लागून कार्यालयासमोरच एक भव्य दुमजली इमारत बांधली वाचनालयासाठी. 'श्री संत ज्ञानेश्वर वाचनमंदिर' असं त्याचं नामकरण झालं. बी. जे. खताळ-पाटील, शंकरराव मोहिते-पाटील, शरद पवार, तेव्हा करमाळ्यातूनच विधानसभेवर पोटनिवडणुकीत निवडून गेलेले सुशीलकुमार शिंदे अशा मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत मोठ्ठा कार्यक्रम झाला. त्याच वेळी नगरपालिकेनं बांधलेल्या टाऊन हॉलचं आणि ह्या भव्य वाचनालयाचं उद्घाटन झालं. ही गोष्ट साधारण १९७४-७५ची असावी. वाचनालयाच्या भव्य, सुंदर इमारतीच्या मागेच कोंडवाडा होता. वाचनालयाचं मागचं दार कोंडवाड्यातच उघडायचं. तिथं नगरपालिकेचे तगडे बैल बांधलेले असायचे. वाचनालय मात्र कोंडवाड्यासारखं नव्हतं. अगदी प्रशस्त, हवेशीर.

प्रचंड मोठ्या दालनात वृत्तपत्रं वाचण्यासाठी सात लाकडी स्टँड. अलीकडच्या स्टँडवर मुंबईची डाक आवृत्तीची वृत्तपत्रं. पलीकडच्या चार स्टँडवर पुण्याची ताजी वृत्तपत्रं. सोलापूरची वृत्तपत्रं सकाळी अकराच्या सुमारास येत. ती संध्याकाळी मुंबईच्या वृत्तपत्रांची जागा घेत. मग 'टाइम्स ऑफ इंडिया', 'फ्री प्रेस जर्नल', 'नवभारत टाइम्स', अधूनमधून येणारा 'लोकसत्ता' मधल्या टेबलावर जाऊन पडे. टेबलाच्या चारही बाजूंना वाचकांना बसण्यासाठी बाक होते.

वृत्तपत्रांच्या स्टँडच्या थोडं पलीकडं एका मोठ्या टेबलावर सगळी साप्ताहिकं असत. त्याच्याच अगदी वर एक अर्धमजला होता. तिथं महिलांसाठी स्वतंत्र विभाग. महिला वाचकांसाठी एका नगरपालिकेनं चार-साडेचार दशकांपूर्वी केलेली स्वतंत्र सोय. दुर्दैवानं त्याचा लाभ घेण्याएवढं वाचनाचं वेड तेव्हा करमाळ्यातील महिलावर्गाला नव्हतं किंवा तसं स्वातंत्र्य त्यांना नसावं. मुलांसाठीही तिथंच विभाग होता. त्याचंही कुणाला फारसं अप्रूप नव्हतं.

आपल्या गावात एवढं मोठ्ठं वाचना-लय असल्याचा त्या वेळी अभिमान वाटायचा. पण त्या छोट्या शहरात, त्या काळात झालेल्या ह्या वास्तूचं आणि तिथं सहज उपलब्ध असलेल्या वाचन-साहित्याचं महत्त्व किती होतं, हे आता लक्षात येतं. नगराध्यक्ष होते गिरिधरदास देवी आणि उपनगराध्यक्ष बहुतेक डॉ. पानाचंद गांधी. त्यांनी आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी करमाळकरांसाठी ज्ञानेश्वर वाचनमंदिराच्या रूपानं फार मोठा ठेवा ठेवला, असं मनापासून वाटतं. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी.

करमाळ्यात येणारी सर्व वृत्तपत्रं, साप्ताहिकं वाचनालयात येत. नव्या पुस्तकांची दर वर्षी खरेदी होई. मासिकं, अनेक दिवाळी अंक येत. दिवाळी अंकासाठी वेगळं शुल्क नसे. फक्त पुस्तकाचे सभासद असलेल्यांना तेवढे दोन-तीन महिने मासिकासाठी असलेलं शुल्क भरून दिवाळी अंक वाचायला मिळत.

ज्ञानेश्वर वाचनमंदिरामुळेच भेटले भणगेकाका. माझ्यासारख्या अनेक वाचकांच्या ते आजही नक्की लक्षात असतील. तिथं येणाऱ्या सगळ्यांचे ते 'काका' होते. त्यांचं पहिलं नाव लक्षातच राहिलं नाही कधी. करमाळ्याचा पत्रकार सुनील सूर्यपुजारीला विचारल्यावर त्यानं नाव सांगितलं - हरिभाऊ. हो, हरिभाऊ भणगे! ह्या वाचनमंदिराचे ते सर्वेसर्वा. मुख्य ग्रंथपालासह सगळं काही तेच होते. मध्यम उंचीच्या काकांचा वेष साधा असे. तीन गुंड्यांचा सदरा (तोही बहुतेक रेघांचा), पांढरा घोळदार पायजमा, पायात गावठी वाटाव्यात अशा वहाणा. नवरात्राच्या काळात त्या बहुतेक नसत. डोळ्यांवर जाड चष्मा, कपाळावर जाणवण्याएवढ्या तीन-चार अठ्या, त्यावर उठून दिसणारं कुंकू-गंध. दत्तपेठेत राहणारे भणगेकाका सकाळी कमलादेवीचं दर्शन घेऊनच वाचनालयात येत. देवीच्या पायाचं कुंकू त्यांच्या माथी असे. त्यांच्या घरापासून देवीचा माळ साधारण सव्वा किलोमीटर आणि वाचनालय पाऊण ते एक किलोमीटर.

सकाळी आठच्या ठोक्याला वाचनालयाचं जाळीचं सरकतं दार उघडलं जाई. पालिकेतून सगळी वृत्तपत्रं घेऊन काका येत. ते किंवा त्यांचा मदतनीस आधी सगळ्या खिडक्या उघडत. मग सगळ्या वृत्तपत्रांवर काका 'श्री ज्ञानेश्वर वाचनमंदिर' असा शिक्का मारत. पहिल्या पानावर मास्टहेडच्या डाव्या-उजव्या कोपऱ्यात तिरपे दोन शिक्के; मग आतल्या पानात जमतील तसे. दोन-चार ठसे पेपरच्या पानांवर उमटवले की, शिक्का पुन्हा शाईच्या पॅडमधून येई. ठप्प, ठप्प असा लयबद्ध आवाज पाच-दहा मिनिटं त्या मोकळ्या जागेत घुमत राही.

पुस्तकांची देवघेव सकाळी साडेआठ ते साडेदहा आणि संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळेत होई. नंतरचा अर्धा तास काकांना आवराआवरीसाठी असे. त्यात सगळी वृत्तपत्रं गोळा करून व्यवस्थित लावणं, साप्ताहिकं त्याच टेबलावर नीट ठेवणं, खिडक्या बंद करणं अशी बरीच कामं असत. वाचनालय बंद होण्याच्या दहा मिनिटं आधीपासून त्यांना वाचकांना सांगावं लागे - चला आता, बंद करायची वेळ झाली.

भरपूर पुस्तकं असलेलं हे वाचनालय म्हणजे सहजगत्या उघडलेला खजिनाच. तिथं जायला नेहमीच आवडायचं. एका संध्याकाळी बहिणीसह पुस्तक-मासिक बदलायला गेलो. पावणेआठ वाजले असावेत. देवघेवीची वेळ संपत आली होती. बहिणीला तिच्यासाठी व आईसाठी 'वसुधा', 'ललना', 'गृहिणी', 'स्त्री' असं मासिक घ्यायचं होतं. मला खुणावत होती तिथं दिसणारी 'कुमार', 'टारझन' आणि 'बिरबल'. आमचा हळू आवाजातच वाद झाला. काकांना तो ऐकायला आलाच. त्यांनी घड्याळाकडं पाहिलं आणि म्हणाले, ''ए पिंट्या, तिला घेऊ दे काय पाहिजे ते. तुला हे 'बिरबल' ने आणि उद्या आणून दे बरं.''

अरे वा! एकाऐवजी दोन मासिकं. वाचणाऱ्या शाळकरी मुलाला नाराज करायचं नाही म्हणून काकांनी नियम थोडा वाकवला होता. वाचणाऱ्यांबद्दल काकांना आपुलकी आहे, हे त्या निमित्तानं लक्षात आल्यावर हीच युक्ती आम्ही पुढे तीन-चार वेळा केली. प्रत्येक वेळी जादा मासिक मिळालं.

वाचायला आवडतं, वेगवेगळी पुस्तकं नेली जातात, हे लक्षात आल्यावर भणगेकाकांनी एका उन्हाळ्याच्या सुटीत माझ्यावर कृपावर्षाव केला! पूर्ण सुटीचा महिना-दीड महिना त्यांनी एक जादा पुस्तक नेण्याची सवलत मला दिली. त्यांच्या ह्या कृपेमुळे कुमारांसाठी असलेली फास्टर फेणेसह अनेक पुस्तके वाचता आली. एके दिवशी सकाळी नेलेलं पुस्तक दुपारीच वाचून झालं आणि संध्याकाळी ते बदलायला गेलो. काका म्हणाले, ''अरे बाबा, दिवसात एकदाच पुस्तक न्यायचं.'' दिवसातून एकदाच पुस्तक-मासिक बदलता येईल, असा नियम होता. अधिकचे एक पुस्तक देत मोठा नियम वाकविणाऱ्या काकांनी तो छोटा नियम काही माझ्यासाठी शिथिल केला नाही!

ह्या सुटीत बरीच पुस्तकं वाचायला मिळाली. नवे लेखक भेटले. वाचनालयात कथा, कादंबरी, नाटक, कवितासंग्रह, हिंदी अशा विषयानुसार याद्या होत्या. विज्ञान, इतिहास, निबंध, कला अशा काही विषयांची पुस्तकांची सरसकट 'इतर' अशी यादी होती. त्यातली बरीच पुस्तकं सवलतीच्या निमित्तानं वाचायला मिळाली. इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरविणाऱ्या अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखालील संघाचा 'पराक्रमी दौरा' इथंच सापडलं. क्रिकेटची आणखी काही पुस्तकंही वाचता आली. त्यातूनच खेळाची आवड वाढली.

भणगेकाकांचं ग्रंथपालनाचं काही औपचारिक शिक्षण झालं होतं का, ह्याची कल्पना नाही. नसावंच. तसंही त्यांचं एकूण शिक्षण फार झालं नसावं. त्या काळाला पुरे वाटावं एवढं. ते काय वाचत? तसं कधी दिसलं नाही. वाचनालय बंद करून घरी जाताना त्यांच्या हातात किंवा काखोटीला एखादं पुस्तक आहे, असं पाहिल्याचं लक्षात नाही. कधी तरी ते त्यांच्या पिंजऱ्यात वाचताना दिसत. एवढी वर्षं इतक्या छान पद्धतीने वाचनालय चालविल्याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार मिळाला किंवा कसे, हेही माहीत नाही.

पुरस्काराची मुद्रा उमटलेली असो किंवा नसो, गुणवत्तेचं एखादं प्रमाणपत्र पदरी पडलेलं असेल-नसेल; एक गोष्ट नक्की की, भणगेकाका नावाचा माणूस अगदी अस्सल ग्रंथमित्र, ग्रंथसखा होता. हजारो पुस्तकांचं ते घर त्यानं कोणत्याही आदर्श कुटुंबप्रमुखासारखं संभाळलं. बहुसंख्य वाचकांची आवड जपली. वाचणाऱ्याची आवड वाढेल, असंच त्यांचं ग्रंथपाल ह्या नात्यानं वर्तन होतं.

पुस्तक-मासिकांच्या देवघेवीसाठी वाचनालयाच्या एका बाजूला काउंटर होतं. त्याला जाळी ठोकलेली. एका बाजूला पुस्तकांच्या याद्या. दुसऱ्या कोपऱ्यात नाव दिसेल, अशा पद्धतीनं मासिकं मांडलेली. काका सारखे उभे. सभासदांच्या मागणीला प्रतिसाद देत, पुस्तक-मासिकांची देवघेव करीत. खालच्या बाजूला सभासदांच्या कार्डांचा गठ्ठा. मागे पुस्तकांची एक मोठ्ठी खोली. त्यात बरीच कपाटं. त्यात गठ्ठ्यानं लावलेली पुस्तक. अलिबाबाच्या त्या गुहेत एकदा का दोनदाच प्रवेश करता आला.

मागणी असलेल्या, सभासदांना आवडणाऱ्या, लोकप्रिय लेखकांच्या पुस्तकांची नावं आणि त्यांचे क्रमांक भणगेकाकांना जवळपास तोंडपाठ होते. यादीत पाहून विचारायचं, 'काका, १८२९ आहे का?' पुढच्या क्षणी उत्तर मिळायचं, 'बाहेर गेलंय.' मग पुढच्या अशाच कुठल्या तरी क्रमांकाला ते सांगत, 'फाटलेलं आहे थोडं. बायंडिंगला गेलंय.' एखाद्या पुस्तकाचा क्रमांक आणि नाव ह्याची सांगड घालताना क्वचित त्यांचा गोंधळ उडत असे.

शेकडो पुस्तकं, त्यांचे क्रमांक आणि ते कुणी वाचायला नेलंय किंवा नाही, हे एवढं काकांना कसं काय आठवतं लगेच? नेहमी प्रश्न पडायचा. त्याचं उत्तर आपल्या परीनं शोधलं - त्यांना काय तेवढंच काम असतं. रोज रोज ती पुस्तकं बघून पाठ होणारच की. त्यात विशेष काय एवढं?

हे उत्तर चुकीचं आहे, हे थोड्या दिवसांनी समजून आलं. मार्चअखेरीस वाचनालयात नव्यात काही शे पुस्तकं आली. ह्यातल्या पुस्तकाचा क्रमांक सांगितल्यावर काकांना लगेच नाव आणि पुस्तक आहे-नाही हे काय सांगता येणार लगेच, असं वाटलं. पण मेच्या मध्यापासूनच बहुतेक सगळ्या (नव्या) पुस्तकांचे क्रमांक त्यांच्या 'मेमरी कार्ड'मध्ये 'फीड' झालेले होते! आता कळतं की, त्यांना स्वतःच्या कामाबद्दल विलक्षण आस्था होती. त्यामुळेच लेखक-पुस्तकं-क्रमांक हा सगळा तपशील त्यांच्या लक्षात राहत असणार.

छोटं शहर, शंभरच्या आत-बाहेर सभासदसंख्या. त्यामुळे पुस्तक-मासिक बदलायला आलेल्या कुणाचा सभासद क्रमांक विचारण्याची वेळ कधी काकांवर आली नाही. कितीही गर्दी असली, तरी ह्याचं कार्ड त्याला नि त्याचं ह्याला असं कधी झालं नाही. दिवाळी अंकांचं वाटप सुरू होई, तेव्हा पहिल्या एक-दोन दिवशी महत्त्वाचे अंक मिळविण्यासाठी गर्दी होई. तिथंही काका फार कधी चिडल्याचं दिसलं नाही. वाचकाची आवड लक्षात ठेवून प्रत्येकाला हवं ते मिळेल, ह्याची काळजी ते घेत.

ज्ञानेश्वर वाचनमंदिरात आणखी एक सोय असायची. मासिकं जुनी झाली की, त्यांचे गठ्ठे एकत्र करून पुठ्ठ्याच्या वेष्टणात बांधले जात. मासिकाऐवजी किंवा पुस्तकाऐवजी असा एक गठ्ठा नेला की, बऱ्याच दिवसांची बेगमी होई.

लेखकाला-संपादकाला आपल्या वाचकाला काय हवं, हे माहीत असतं. अगदी त्याच प्रमाणं भणगेकाकांनाही वाचक माहीत होते. वर्गमित्र अनिल कोकीळ ह्याला महाविद्यालयीन शिक्षण घेताना वाचण्याची गोडी लागली. तोही ज्ञानेश्वर वाचनमंदिराचा 'भक्त' झाला. व. पु. काळे ह्यांच्या प्रेमातच पडला होता. सलग सातव्या-आठव्या वेळी त्यांचंच पुस्तक मागितल्यावर काका म्हणाले, ''अनिल, अरे एखाद्या लेखकाची पाच-सहा पुस्तकं वाचली की, कळतो तो. सारखं काय व. पु. - व. पु. नेतोस! आता दुसरे लेखक वाचून बघ जरा.''

एक अनुभव मलाही आला. शिक्षणासाठी पुण्यात होतो. विश्रामबागेजवळच्या सरकारी ग्रंथालयात पुस्तकं वाचायला मिळत. तिथं कधी तरी जात होतो. 'सोबत' वाचत असल्यामुळे भाऊ पाध्ये ह्यांचं नाव माहीत झालं. त्यांचं गाजलेलं 'वासूनाका' तिथं मिळालं. पण ते पूर्ण वाचून झालं नव्हतं. सुटीत करमाळ्याला आल्यावर एक दिवस पुस्तक बदलायला गेल्यावर काकांना विचारलं, ''आपल्याकडं 'वासूनाका' आहे का हो?''

काहीच बोलायला सुचत नसल्यासारखे काका क्षणभर पाहत राहिले. मी काही तेव्हा शाळकरी वयाचा नव्हतो. त्यांच्या चेहऱ्यावर थोडे उग्र भाव आले. त्यांनी विचारलं, ''तुला कुणी सांगितलं हे पुस्तक (वाचायला)?''

नाही. मोठा लेखक आहे. म्हणून विचारलं, मी गुळमुळीत उत्तर दिलं.

''मिळणार नाही. वाचू नको असलं काही,'' काकांनी तिथल्या तिथे निर्णय दिला.

माझ्यासारख्या 'लाडक्या' वाचकाला ते असं काही सांगतील, असं कधीच वाटलं नव्हतं.

नंतर कधीच काकांकडे भाऊ पाध्येंची पुस्तकं मागण्याचं धाडस झालं नाही. 'राडा', 'बॅरिस्ट अनिरुद्ध धोपेश्वरकर', 'डोंबाऱ्याचा खेळ' ही त्यांची काही पुस्तकं विकत घेऊनच वाचली. तसं पाहिलं तर सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात बाबा कदम फार लोकप्रिय लेखक होते. त्यांची नवी कादंबरी आली की, तिच्यावर उड्या पडायच्या. त्या खानदानी बाजाच्या, शिकार, तमाशा असलेल्या कादंबऱ्या आम्हीही आवडीने वाचल्या. त्यांच्या कादंबरीवर आधारित 'ज्योतिबाचा नवस' सिनेमाही आवर्जून पाहिला. त्यांची पुस्तकं नेण्याबद्दल काकांनी कधी हटकलं नव्हतं. पण 'वासूनाका' म्हटल्यावर त्यांनी जी काही प्रतिक्रिया व्यक्त केली, ती विसरता येणार नाही.

काकांना त्रास द्यायला म्हणून काही जण खोड्या काढायचे. संसार कसा करावा, ह्याबद्दल भागवत ह्यांचं एक पुस्तक होतं. ते अर्थात संसारी माणसांसाठी, प्रौढांसाठी होतं. काकांनी चिडावं म्हणून काही तरुण ते पुस्तक मागायचे. परिणाम स्वाभाविकपणे अपेक्षित तोच व्हायचा.

क्रिकेटचं वेड करमाळ्यात तेव्हा पसरू लागलं होतं. क्रिकेटपटूंची छायाचित्रं जमवून संग्रह बनवणं, हा छंद झाला होता. पण ती मिळणार कुठून? अनेकांच्या घरी तर वृत्तपत्रही येत नसे. 'धर्मयुग'चे क्रिकेट विशेषांक प्रसिद्ध होत. छान कागदावर रंगीत छायाचित्रं छापलेली असायची. वृत्तपत्रांत क्रिकेटपटूंच्या चेहऱ्याचे फोटो येत. काही शाळकरी मुलं हे फोटो फाडून नेत. संध्याकाळच्या वेळी सभासदांची गर्दी असली की, ही मुलं टाचणीने किंवा करकटने वृत्तपत्राचं पान कुरतडून फोटो फाडून नेत. (त्यातली काही नावं आजही लक्षात आहेत.) अशा मुलांवर लक्ष ठेवणं, हे एक वाढीव काम काकांच्या मागे लागलं. नंतर वाचनालयात पालिकेचा टीव्ही. बसला. त्यानं वाचण्याचं वेळापत्रक बिघडवून टाकलं.

वाचनालयात येणाऱ्या वृत्तपत्रांच्या वेळेचं गणित काही वेळा बिघडे. मुंबईहून येणाऱ्या रेल्वेगाडीला उशीर झाला की, जेऊरला उतरविले जाणारे गठ्ठे साडेआठ-नऊनंतर यायचे. एका आठवड्यात सलग दोन-तीन वेळा अशी अडचण आली. एका तरुण, नवथर वार्ताहराने लगेच टीकात्मक बातमी केली. नगरच्या सायंदैनिकात ती प्रसिद्ध झाली.

बातमी वाचून भणगेकाका अस्वस्थ झाले. आपल्या कष्टाची किंमत नाही, असं त्यांना वाटलं. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी एक घटना घडली. सभासदाने परत केलेल्या पुस्तकात १० रुपयांची नोट आढळली. आलेलं पुस्तक व्यवस्थित पाहून घेण्याची सवय काकांना होती. तसं करताना त्यांना नोट दिसली. लगेच सभासदाला हाक मारून त्यांनी पैसे परत केले. चाळीस वर्षांपूर्वी ही मोठी रक्कम होती.

हे कळल्यावर त्यांना भेटून म्हणालो, ''वा काका. फार चांगलं काम केलं तुम्ही.''

''बातम्या देणाऱ्यांना कुठं दिसतं आमचं हे काम?'', असं ते म्हणाले, तेव्हा त्यांच्या बोलण्यातला विशाद लपत नव्हता.

प्रामाणिकपणाच्या गुणाला वर्तमानपत्रात चौकट ठरलेलीच असते. भणगेकाकांच्या ह्या गुणाचं रास्त कौतुक व्हायलाच पाहिजे आणि वर्तमानपत्रांबद्दल त्यांना आलेला राग जावा, अशा हेतूने मी 'वाचकांची पत्रे' सदरासाठी म्हणून हा सगळा तपशील पत्रानं सोलापूरच्या एका दैनिकाला पाठवला. त्यांच्या अग्रलेखावर मी एका पत्रातून जोरदार टीका केल्यामुळे संपादकमहोदयांनी मला 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकलं होतं. त्यांनी पत्राला सरळ कचऱ्याची पेटी दाखवली. वर त्या सदरात एक चौकट प्रसिद्ध केली - काही लोक उगीच कुणाचं तरी अभिनंदन करण्याच्या नावाखाली स्वतःची टिमकी वाजवत राहतात!

त्या वेळी माझी पत्रं बऱ्यापैकी संख्येनं वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असत. काकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो मला एक सहज सोपा मार्ग वाटला होता. पण तेवढीही प्रसिद्धी त्यांच्या नशिबात नव्हती.

दरम्यानच्या काळात नोकरी लागली. करमाळ्याला येणं-जाणं कमी झालं. नव्वदीच्या दशकात कधी तरी वडिलांनी ज्ञानेश्वर वाचनमंदिराचं सभासदत्व रद्द करून टाकलं. त्यांनी ते सांगितल्यावर वाईट वाटलं. पुस्तकवाटेवरचा मोठा टप्पा मागं पडला होता.

करमाळ्याला कधी तरी जाणं होई. बसस्थानकावर सूर्यपुजारींचा वृत्तपत्रांचा स्टॉल आहे. सकाळी दहाच्या सुमारास किंवा संध्याकाळी भणगेकाका तिथे बसलेले दिसायचे. मांडी ठोकून कुठलं तरी वृत्तपत्र ते चाळत असल्याचं पाहायला मिळे. मला पाहिल्यावर त्यांचा चेहरा थोडा चमके. ख्यालीखुशाली विचारत. आपण ज्याला वाचायला दिलं, तो पेपरमध्ये लिहू लागला, ह्याचा थोडासा आनंद त्यांना होत असावा. हा आपला माझा समज.

पुस्तकांच्या दुनियेत थोडं अधिक रमायला लागल्यावर भणगेकाकांच्या कामाचं महत्त्व कळलं. त्यांच्याबद्दल लिहावं असं खूपदा वाटलं. ग्रंथपाल दिन, पुस्तक दिन असे वेगवेगळे मुहूर्त काढत गेलो. त्यांच्याबद्दल खूपदा लिहिलं, पण ते मनातच. माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. असंच कधी तरी वाटलं की, ह्याची एक प्रत भणगेकाकांना भेट दिली तर? पण तो विचार काही कृतीत आला नाही. जे काम सहज करता येण्याजोगं होतं, ज्यातून कृतज्ञता खऱ्या अर्थानं व्यक्त झाली असती, मनापासून आभार मानता आले असते, ते काही जमलं नाही.

श्री ज्ञानेश्वर वाचनमंदिरानं लावलेली पुस्तकांची गोडी पुढंही कायम राहिली. नोकरीला लागल्यावर 'मॅजेस्टिक'च्या योजनेत पैसे भरू लागलो. दरमहा १० रुपये भरायचे आणि वर्षानंतर १४० रुपयांची पुस्तकं न्यायची. महिन्याला २० रुपये योजनेत 'गुंतवायचे' ठरवलं. वर्ष उलटल्यानंतर असंच कधी तरी पुण्यात गेलो. शनिवार पेठेत 'मॅजेस्टिक'चं दुकान होतं तेव्हा. आत शिरल्यावर काय पाहू, किती घेऊ, असं झालं. दोन-तीन तास घालवून मी त्यांच्या कप्प्यातून अगदी जुनी, चांगली आणि स्वस्त पुस्तकं निवडली. तीस-पस्तीस पुस्तकं सहज असतील. त्याची पावती बनवताना दुकानातला जुना कर्मचारी हसून म्हणाला, ''फार निवडून निवडून पुस्तकं मिळवली हं तुम्ही.'' त्याला पाहून, त्याचं वाचकाला दाद देणारं बोलणं ऐकून भणगेकाकांचीच आठवण झाली.

नगरमध्ये राहात असल्यानं रस्त्यावरची जुनी पुस्तकं चाळायची, विकत घ्यायची संधी साधताच आली नाही कधी. मग पुस्तकांचं प्रदर्शन भरलं की, चक्कर ठरलेली. आधीच्या काळात नॅशनल बुक ट्रस्टची बरीच पुस्तकं घेतली. एकदा 'ग्रंथाली'चं प्रदर्शन होतं. नुकतीच ओळख झालेल्या सुदेश हिंगलासपूरकर ह्यांनी आवर्जून काही पुस्तकं घ्यायला लावली. नवीन लेखक कळत होते, आवडत होते.

'अक्षरधारा'चं प्रदर्शन पहिल्यांदा आलं आणि चांगले दोन आठवडे होतं नगरमध्ये. भरपूर पुस्तकं होती त्यात. रोज किंवा दिवसाआड चक्कर मारून वेगवेगळी पुस्तकं घेत होतो. हे प्रदर्शन कसं झालं, नगरकर काय वाचतात, किती विक्री झाली, अशा मुद्द्यांवर बातमी लिहायची ठरवलं. त्यासाठी शेवटच्या दिवशी संयोजकांना भेटलो. राठिवडेकर बंधूंपैकी एक कुणी तरी होतं. त्या दिवशी खरेदी केलेल्या पुस्तकांचे पैसे देताना डिस्काउंटबाबत विचारलं. ते म्हणाले, ''तुमचं चुकलंच. सगळ्या पुस्तकांचं एकत्र बिल केलं असतं, तर पंचवीस टक्के सूट दिली असती.''

पुस्तकांच्या खरेदीत हाही एक महत्त्वाचा भाग असतो, हे तेव्हा कळलं. पुढे पुण्यात काही दिवस कामासाठी असताना अत्रे सभागृहात 'अक्षरधारा'चंच प्रदर्शन चालू असल्याचं कळलं. तिथे हावऱ्यासारखी पुस्तकं घेतली. दोन-तीन पिशव्या हातात वागवणं शक्य नसल्यामुळं रिक्षानं जावं लागलं. त्या पैशात अजून दोन पुस्तकं आली असती, असं वाटत राहिलं.

सर रिचर्ड बर्टन ह्यांनी इंग्रजीत आणलेल्या 'अरेबियन नाईट्स'चं गौरी देशपांडे ह्यांनी भाषांतर केल्याचं वाचण्यात आलं. हे १६ खंड मिळविण्यासाठी पुण्यातल्या राजेंद्र ओंबासे ह्यांच्या मागं लागलो. सगळे खंड हवे होते आणि घसघशीत सवलतही. दहा-बारा वर्षांपूर्वी ओंबासे प्रसन्न झाले आणि तो ठेवा माझा झाला.

मोल्सवर्थचा शब्दकोश पुनःमुद्रित होणार अशी बातमी २५ वर्षांपूर्वी वाचली. तो आणि सोबतचे एन. बी. रानडे ह्यांच्या इंग्लिश-मराठी कोशाचे दोन खंड घ्यायचेच असं ठरवलं. त्याची किंमत तेव्हा एक महिन्याच्या पगाराएवढी होती. घेतलेले कोश कपाटात पडून होते. गेल्या वर्षी चार-पाच लेखांचा अनुवाद करताना तिन्ही कोशांचा पुरेपूर उपयोग झाला. ते पैसे वसूल झाले!

कितीही पुस्तकं विकत घेतली, तरी ताज्या, नव्या आणि अनपेक्षितपणे भेटणाऱ्या चांगल्या पुस्तकांसाठी वाचनालय हवंच असतं. वाचकाला फिरून, पुस्तकं चाळू देणारी वाचनालयं मला फार आवडतात. त्यातून वेगळे लेखक आणि वेगळी पुस्तकं हाती लागतात. सोलापूरचं हिराचंद नेमचंद वाचनालय त्यासाठीच लक्षात राहिलं. 

पुण्याचं ब्रिटिश ग्रंथालय असंच एखाद्या प्रसन्न मंदिरासारखं वाटत आलेलं. तिथं बसून पुस्तकं चाळण्याची, वाचण्याची सोय होती. त्या ग्रंथालयाचं सभासदत्व मिळावं, असं फार वाटायचं. आता ते शक्य नाही. महाराष्ट्र बँकेचं मुख्यालय असलेल्या 'लोकमङ्गल'च्या कार्यालयात बहुतेक तळमजल्यावर असंच एक प्रशस्त ग्रंथालय होतं. तिथंही तीन-चार वेळा जाण्याचा आणि आरामात बसून काही नियतकालिकं, संदर्भ पुस्तिका चाळण्याची संधी मिळाली.

पुस्तकांची आणि वाचकांची थेट भेट व्हायलाच हवी. ठरावीक लेखक, लोकप्रिय पुस्तकं ह्यांचा कालांतराने कंटाळा येऊ लागतो. त्याचा परिणाम वाचनापासून फारकत घेण्यापर्यंत होण्याची भीती असते. करमाळ्याच्या वाचनालयात ही सोय नव्हती. पण भणगेकाकांसारखा ग्रंथमित्र असल्यामुळे तिथं ती अडचण नव्हती. आमच्या नगरच्या वाचनालयात पुस्तकं चाळण्याची सोय नाही. पावणेदोनशे वर्षांची परंपरा आणि लाखांहून अधिक पुस्तकं असलेल्या ह्या वाचनालयाची ही मोठीच त्रुटी.

'कोट जुना वापरा आणि पुस्तक मात्र नवीनच घ्या,' असं ऑस्टिन फेल्प्स ह्यांनी सांगून ठेवलंय. कोट जुना काय नि नवा, वापरलाच नाही कधी. पुस्तकं मात्र शक्यतो नवीच विकत घेत आलो.

'पुस्तकप्रेमी' अशा बन(व)लेल्या प्रतिमेबद्दल वर सांगितलंच आहे. पण हौसेनं घेतलेली सगळीच्या सगळी पुस्तकं वाचणं अजून तरी जमलेलं नाही.

स्वस्तात आहे, पुन्हा मिळणार नाही, दुर्मिळ होईल, चांगला लेखक आहे, संदर्भासाठी उपयोगी पडेल... अशा अनेक कारणांमुळं हावरेपणानं, असोशीनं, लोभानं घेतलेली खूप पुस्तकं आहेत घरात. आवरायला घेतल्यावर वाटतं, कधी वाचणार ही एवढी सगळी आपण?

पण हा 'आपला संग्रह' आहे, ह्याचं एक वेगळं समाधान असतंच. कधीही वाचायला आवडेल, असं वाटणारं पुस्तक हाताशी असणं ह्यासारखं सुख नाही. अशी पुस्तकं हाताशी असल्यामुळेच 'पुस्तकवाटा'सारखं सदर वर्षभर लिहिता आलं आणि त्यात फारशा लोकप्रिय नसलेल्या, कमी माहीत झालेल्या ५१ पुस्तकांची ओळख करून देता आली. पुस्तकवाटेवरचा तोही एक सुखद टप्पा होता.

ह्या न संपलेल्या प्रवासाबद्दल तूर्त एवढंच!

….

(जागतिक पुस्तक दिनानिमित्त हा लेख. तो पहिल्यांदा प्रकाशित झाला 'शब्ददीप'च्या यंदाच्या दिवाळी अंकात. श्री. प्रदीप कुलकर्णी व श्री. विनायक लिमये ह्यांच्यामुळे लिहिलेला हा लेख इथे 'शब्ददीप'च्या सौजन्याने.)

(वाचनालयाची छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...