Wednesday 30 December 2015

‘मी बोललंच पाहिजे असं नाही’

 (सौजन्य : https://en.wikipedia.org)
घरात रेडिओ सुरूच असायचा. करमणुकीचं तेव्हाचं ते एकमेव साधन होतं. पुणे, मुंबई ब आणि सिलोन ही केंद्रं त्यावर आलटून-पालटून चालू असत. पुणे-मुंबई केंद्रांवरची गाणी कानावर पडत राहिली. खूप खूप वेळा ऐकून ऐकून त्यातली काही आवडायला लागली. आधी संगीत, मग स्वर आणि शेवटी शब्द, असा तो कळण्याचा जमाना होता. लिहायला-वाचायला शिकल्यावर ही गाणी मंगेश पाडगावकरांची आहेत, हे समजलं. त्यातल्या काहींनी आनंदाच्या क्षणी साथ दिली, काहींनी रिकाम्या वेळेत गुणगुणायला मदत केली आणि काहींनी एकटेपणी अधिक हळवं केलं!

कविता फारशी कळत नाही; पण तरीही छोटा-मोठा, लोकप्रिय, एकांतप्रिय, शब्दप्रिय, शब्दबंबाळ... असे कवी आणि कविता अनुभवानंतर जाणवायला लागल्या. मंगेश पाडगावकर गीतकार म्हणून अधिक आवडीचे.

या महान कवीशी थेट बोलण्याची संधी एकदाच मिळाली. अगदी समोरासमोर. एक-दीड मिनिटाचाच तो संवाद होता. माझा थेट प्रश्न आणि त्यांचे नेमकं, मोजक्या शब्दांतलं उत्तर.

एकवीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. 14 फेब्रुवारी 1995. महाराष्ट्रप्रांती तेव्हा व्हॅलेंटाईन डे अजून बोकाळला नव्हता. प्रेमदिन असं त्याचं वृत्तपत्रीय अभिजात मराठीकरणही तेव्हा झालं नव्हतं. त्या दिवशी नगरच्या नगर महाविद्यालयात स्वर-संवाद असा कार्यक्रम होता. मंगेश पाडगावकर यांची मुलाखत आणि दोन प्रश्नांच्या दरम्यान स्थानिक महाविद्यालयीन कलाकारांनी सादर केलेली त्यांची गाणी, असं त्याचं स्वरूप होतं.

परभणीचं गाजलेलं साहित्य संमेलन नुकतंच झालं होतं. (साहित्य संमेलनाचं यश जमलेल्या गर्दीवरून मापण्याची सवय परभणीनं लावली आणि दोन वर्षांनी नगरच्या संमेलनात त्याचा अतिरेक झाला!) तर त्या परभणीच्या संमेलनात निसर्गकवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. धों. महानोर यांच्या मुलाखतीनं खळबळ उडवून दिली होती. करंदीकर, बापट, पाडगावकर यांनी काव्यवाचनाची गोडी घालवली असा बॉम्बगोळाच त्यांनी टाकला होता. त्याच सुमारास त्यांनी एका लेखात ‘‘बिजली, धारानृत्य हे खऱ्या अर्थाने पाडगावकरांचे प्रातिनिधिक संग्रह नाहीत, अभिव्यक्तीच्या अप्रामाणिकपणाचा त्यांनी अतिरेक केला, अशी स्फोटक विधानं केली होती. पाडगावकर आणि महानोर यांच्यात नेमकं काय बिनसलंय ते ठाऊक नव्हतं. मंचीय कवींबद्दल महानोरांनी एकदम शस्त्र का परजलं, हेही माहीत नव्हतं. (याच महानोरांनी पुण्यातल्या साहित्य संमेलनात विंदा करंदीकर यांचं आपल्यावर किती प्रेम होतं, हे सांगणारं पाल्हाळिक आख्यान लावलं होतं. तर ते असो!)

तेव्हा मी लोकसत्तामध्ये काम करीत होतो. नगर महाविद्यालयात शिकणारा अभय जोशी तिथंच मुद्रितशोधक होता. स्वर-संवादचा सूत्रधार तोच होता. माझं वाचन आणि गाण्यातला माझा कान, याबद्दल मनात असलेल्या गैरसमजातूनच त्यानं मला या कार्यक्रमाला येण्याचं खास आमंत्रण दिलं. (कार्यक्रमाची बातमी यावी, हा त्यामागचा खरा हेतू होता, हे मला नंतर खूप वर्षांनी उमगलं. म्हणजे अभयचा गैरसमज असल्याचा गैरसमज माझाच होता तर!)

एवढा मोठा कवी थेट पाहायला मिळणार, त्याचे शब्द ऐकायला मिळणार म्हणून कार्यक्रमाला मुद्दाम गेलो. महानोरांनी नुकत्याच तोफा डागल्या होत्या. त्याबद्दल थेट मंगेश पाडगावकर यांची प्रतिक्रिया मिळाली, तर मोठी बातमी आपल्याला मिळेल, असाही उद्देश होताच. प्रश्न होता, त्यांना भेटायला कसं मिळणार? मी काही कुणी नाव असलेला पत्रकार नव्हतो. (आणि नाहीही!) त्यांना गाठायचं कसं आणि विचारायचं कसं?

सुदैवाने कार्यक्रमस्थळी जातानाच पाडगावकर भेटले. आम्ही दोघेही समोरासमोर. पहिल्याच क्षणी लक्षात आले ते त्यांचे प्रसिद्ध डोळे आणि दाढी. जाड भिंगाच्या चष्म्यातून समोरच्याचा आरपार वेध घेताहेत, असं वाटणारी त्यांची नजर. ओळख दिली आणि महानोरांच्या मुलाखतीचा, लेखाचा संदर्भ देत पाडगावकर यांना प्रश्न विचारला.

चेहरा आहे तसाच निर्विकार ठेवून पाडगावकर म्हणाले, ‘‘अनेक माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करतात, बोलतात आणि लिहितात. त्याबद्दल मी बोललेच पाहिजे असे नाही. कविता करणे आणि तुम्ही म्हटलात, तर त्या ऐकविणे माझे काम आहे. या विषयावर मी काही बोलणार नाही.’’

स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका. प्रश्नाला आवश्यक तेवढं उत्तर पाडगावकर यांनी दिलं. पुढचा प्रश्न विचारायच्या आधीच त्यांच्या सोबत असलेले त्यांचे नातेवाईक आणि नगर महाविद्यालयातील प्राध्यापक सुधीर शर्मा यांनी घाई केली. चला लवकर, कार्यक्रमाला उशीर होतोय... असं म्हणत त्यांनी पाडगावकर यांना हाताला धरूनच नेलं.

नंतर मग मुख्य कार्यक्रम रंगला. अभय जोशी आणि प्रज्ञा चासकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते मोकळेपणाने बोलले. कलावंत, त्यांची सामाजिक बांधिलकी, कवी म्हणून प्रेरणास्थान, काव्यप्रेरणा कोणती अशा वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी हसत-खेळत उत्तरं दिली.

कलावंताचं स्वातंत्र्य महत्त्वाचं की, सामाजिक बांधिलकी महत्त्वाची?’, असं त्यांना अभय-प्रज्ञा यांनी विचारलं. त्यावर पाडगावकर म्हणाले होते, ज्याचा झेंडा जास्त फडकत असतो, तो विचार मानणे म्हणजे त्या काळाची बांधिलकी. पण तुमचे झेंडे मी कोण उचलणार? माणसाच्या जाणिवेचे, त्याच्या सुख-दुःखाचे रंग मानणारा मी, म्हणजे माझ्यातील कलावंत त्या रंगाचा झेंडा उचलतो. व्यक्ती म्हणून मी मला भावणाऱ्या कोणाही आदरणीय व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवीन. पण कलावंत म्हणून कोणत्याही तत्त्वज्ञानाचा झेंडा खांद्यावर घेणार नाही. कलावंत म्हणून माझी जाणीव जीवनाला सामोरी जाणारी आहे. मी माणुसकीला बांधिल आहे...

कलेमध्ये निमित्ताला महत्त्व नाही. पुष्कळ वेळा सहज काही सुचून जातं. निर्मितीच्या प्रक्रियेला गूढरम्य आणि भावरम्य महत्त्व देण्याची गरज नाही, असं सांगताना पाडगावकर यांनी तिथं जमलेल्या अनेक भावी कवी-लेखकांच्या मनातील अद्भुतरम्य फेसाळ फुगे सहजपणे फोडून टाकले होते.

पाडगावकर तेव्हा न-गज़ल नावाचा प्रकार हाताळत होते. त्याच्या आगेमागेच चोली के पीछे क्या है...नं आजच्या शांताबाई किंवा पिंगासारखा धुमाकूळ घातला होता. त्याचं उदाहरण देताना त्यांनी चोलीचा संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते, एका तरुणानं एका वेश्येला उद्देशून हे गाणं म्हटलं. त्यावर त्या वेश्येनं दिलेलं उत्तर म्हणजेच न-गज़ल.

चोली के पीछे कहूँ मी काय आहे?
ऐक रे भडव्या तुझी मी माय आहे!
हातभट्टी झोकल्या बारा जणांनी
रात्रभर तुडविलेली मी गाय आहे!

सुमा करंदीकर यांचं रास वाचलं. त्याच्या आगेमागेच कधी तरी यशोदा पाडगावकर यांचं कुणास्तव कुणी तरी... वाचलं. आपल्याला दिसणाऱ्या मनमोहक शब्दगुलाबाचे काटे कुणाला तरी बोचले आहेत, हे तेव्हा कळलं. मोठ्या वृत्तपत्रांमध्ये दर वर्षी जूनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या पाडगावकरांच्या लिज्जतदार कवितांची आठवणीनं वाट पाहत होतो. कुणी तरी त्यांची त्यावरून पापडगावकर अशी उडवलेली खिल्लीही मनापासून आवडली होती.

त्या मिनिटभराच्या मुलाखतीत पाडगावकर जे म्हणाले होते, त्यातलं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं - तुम्ही म्हटलात तर कविता ऐकविणे माझे काम आहे. म्हणजे महानोरांना त्यांनी थेट उत्तर दिलंच होतं त्यातून. बापट गेले, नंतर विंदा करंदीकरांनी अलविदा केलं. आज पाडगावकर. कवितांचा मंचीय आविष्कार साजरा करणाऱ्या त्रिमूर्तीतील शेवटचा तारा आज निखळला. खऱ्या अर्थानं आज पडदा पडला आहे!

Friday 18 December 2015

एका लढ्याचं चलच्चित्रण

(शरद जोशी यांच्या निधनाच्या बातमीनं गेल्या आठवड्यात अस्वस्थ व्हायला झालं. त्यांच्याबद्दल लिहावं, असं वाटत होतं. पण हवं तसं नाही जमलं ते. म्हणून तूर्त, ज्यांच्या लिखाणातून तरुणपणी शरद जोशी समजत गेले, त्या विजय परुळकर यांच्या योद्धा शेतकरी पुस्तकाबद्दल पाच वर्षांपूर्वी लिहिलेलंच इथं पुन्हा प्रसिद्ध करतो आहे.)

मागच्या गळीत हंगामात उसाची टंचाई भासेल, असा साखर कारखानदारांचा अंदाज होता. हंगामाच्या सुरुवातीलाच कारखानदारांनी घोषणांचा दणका उडवून दिला. शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवलं पाहिजे; त्यांचा ऊस आपल्याच कारखान्याला आला पाहिजे. म्हणून मग त्यांनी पहिलाच हप्ता एकवीसशे-बावीसशे रुपये टनाप्रमाणं जाहीर केला.

मागच्याच वर्षी साखरेचे दर वाढले होतो. कारखानदार खुशीत होते. नंतर दर घसरले. कारखानदार नाराज झाले. त्यांनी बैठक घेतली. किमान अमूक-तमूक भावापेक्षा कमी दरानं साखर विकायचीच नाही, असा निर्णय घेतला. संघशक्ती.

उद्याच्या हंगामात उसाचा पहिला हप्ता किमान अडीच हजारांचा मिळावा, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला तर? बहुतेकांचा ऊस शेतातच वाळेल. तो पेटवून द्यायची वेळ येईल.

तीस वर्षांपूर्वी उसाला 300 रुपये टन भाव मिळावा, म्हणून आंदोलन  झालं. तो भाव कसा परवडणारा नाही, हे सरकार, कारखानदार सांगत होते. त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठ्या चालवल्या गेल्या. डोकी फोडण्यात आली त्यांची.

उद्याही आंदोलन झालं, तर व्यवस्था आणि यंत्रणा लाठ्या-काठ्या-बंदुकीनिशीच शेतकऱ्यांशी लढाई करील. तीस वर्षांपूर्वी लढणारा त्यांचा नेता आता पंचाहत्तरीत आला आहे. त्याचे सहकारीही पांगले आहेत.

या वेळचं पुस्तक त्या नेत्याचं, त्याच्या 30 वर्षांपूर्वीच्या अनोख्या लढ्याचं. शरद जोशी नाव त्या नेत्याचं. पुस्तक योद्धा शेतकरी. विजय परुळकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक पुण्याच्या राजहंसनं प्रकाशित केलं आहे. पहिली आवृत्ती कधीची याचा उल्लेख नाही त्यावर. अडीचशे पानांचा हा ऐवज अवघ्या 36 रुपयांना मिळत होता. हे पुस्तक मी जुना सहकारी मनोज पलसे याच्या माध्यमातून लेखकाची पत्नी सरोज परुळकर यांच्याकडून मिळवलं.

ऐंशीच्या सुरुवातीला नाशिक भागात उसाचं हे आंदोलन झालं. त्याचा हा आँखो देखा हाल... शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा होते शरद जोशी. संयुक्त राष्ट्रातली, स्वित्झर्लंडमधली नोकरी सोडून ते मायदेशी परतले. दारिद्र्याच्या प्रश्नावर खराखुरा उपाय शोधण्याचा प्रयत्न कुणी करीत नाही म्हणून अस्वस्थ होऊन.

ज्या काळात आपल्या बहुसंख्यांना टीव्ही. माहीत नव्हता, त्या काळात पाच वर्षं जर्मन टेलीव्हिजनचा वार्ताहर-कॅमेरामन म्हणून परुळकर यांनी काम केलं. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम संस्थेत त्यांनी दहा वर्षं काम केलं. सुखाची नोकरी सोडून, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून भटकंती करणाऱ्या या दोघांचा हा प्रवास.

शरद जोशी भेटल्यापासून माझे डोळे स्वच्छ उघडले आहेत.... हे असंच चाललं तर आपण मरणार आहोत, ह्याची खात्री पटली आहे... माधवराव खंडेराव मोरे सांगत असतात. शेतकरी जमातीच्या झालेल्या तीन तपांच्या फसवणुकीचा स्फोट त्यांच्या शब्दाशब्दांच्या बॉम्बमधून होत असतो.

भरघोस पीक येऊन शेतकऱ्याचा चेहरा काळवंडलेला का? मग शरद जोशी भारत आणि इंडिया यातला फरक समजावून सांगतात. तुटीत लेव्हीची सक्ती आणि मुबलकतेमध्ये वाऱ्यावर सोडणं, हे सरकारचं शेतकऱ्याबद्दलचं धोरण समजावतात.

उसाला 300 रुपये टन भाव मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा निश्चय करून सुरू झालेलं हे आंदोलन. काय काय होतं त्यात? श्रीगोंद्यात गोळीबार होऊन त्यात नाना चौधरी हुतात्मा होतात. आताचे सत्ताधारी मंत्री तेव्हा त्या लढ्यात होते. पिंपळगाव बसवंतमध्ये आधी दोन हुतात्मा झालेले असतात. नंतर खेरवाडीमध्ये गोळीबारात दोघांना जीव गमवावा लागतो.

शेतकऱ्यांच्या या मागणीबद्दल तेव्हाच्या नेतेमंडळींच काय मत होतं? शेतकऱ्यांना भडकावलं तर गय करणार नाही!’ - मुख्यमंत्री जनाब अब्दुल रहमान अंतुले. ऊसआंदोलन करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे हित कळत नाही. - महसूलमंत्री शालिनीताई. ऊसकरी शेतकऱ्याच्या हाती पैसा आला तर तो चैनी आणि व्यसनी बनेल. - प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष विखे. ऊस न देऊन साखर कारखान्यांची कोंडी करणं उचित नाही. - विरोधी पक्षनेते शरद पवार. अहो, तुमच्या या आंदोलनामुळं सगळे शेतकरी शहाणे होतील!’ - मंत्री तिडके.

निफाड, खेरवाडी, लासलगाव इथं रेल रोको-रास्ता रोको आंदोलन सुरू झालं. मुंबई-आग्रा महामार्ग चार दिवस अडवण्यात आला. राखीव पोलिसांनी लाठ्या चालवल्या, गोळ्या झाडल्या. माध्यमांनी विरोधकाची भूमिका बजावली. अडलेल्या वाहनांच्या चालकांना गावकऱ्यांनी चटणी-भाकर खाऊ घातली, चहा पाजला.

हे पुस्तक नव्हे; एक दस्तऐवज आहे. परवा परवा घडलेल्या इतिहासाचं हे सारं जिवंत चित्रण आहे. इंडियात राहूनही भारताच्या प्रश्नांची जाण करून देणारं. डोळ्यांत अंजन घालणारं. शरद जोशी, मोरे, माधवराव बोरस्ते, शंकर वाघ आणि या साऱ्यांचं नेमकं चित्र उभं करणारं. एका आगळ्या लढ्याची ही धारदार कहाणी. डोळ्यांत पाणी आणणारी. त्यांच्या आजन्म व्यथेची जाणीव देणारी. दुःख एवढंच की, लढाईचा मूळ मुद्दा तीन दशकांनंतरही कायम आहे!

(पूर्वप्रसिद्धी : 22 ऑगस्ट 2010)

Saturday 5 December 2015

नगरचा झालाय 'खाया'पालट!



(नगरच्या खाद्यजीवनावर लिहिलेला हा लेख दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत खाद्ययात्रा सदरामध्ये साधारण सव्वातीन वर्षांपूर्वी, म्हणजे १२ ऑगस्ट १२ रोजी प्रसिद्ध झाला. तो गेल्या महिन्यात व्हॉट्सवर कसा कोण जाणे व्हायरल झाला.­ नगरमधल्या अनेक ग्रूपवर तो आला. मला स्वतःला सहा जणांनी पाठवला. म्हणूनच मग ठरवलं त्याला आपल्या खिडकीतही जागा देऊ. ते इंग्रजीत म्हणतात ना ओल्ड वाईन इन न्यू बॉटल.. अगदी तसंच!)


उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध नगरचा कापडबाजार दिवसा गजबजलेला असतो. इथंच रात्रीही गर्दी दिसते. दिवसाची गर्दी खिसा हलका करवून घेऊन खरेदीच्या भारानं तृप्त झालेली असती. रात्रीची गर्दीही तृप्त; पोटावरून हात फिरवत ढेकर देत असते. खिसा फारसा हलका न होताच तिला हे समाधान लाभतं. 'स्नॅक', पाव-भाजी, सँडविच, 'कच्ची दाभेली', 'फ्रूटस्लार्ड', लस्सी, 'डबल मलई मार के' गरमागरम दूध, सोबत डिंकाचा लाडू असं बरंच काही काही त्यांनी कापडबाजारातल्या 'चौपाटी'वर 'उदरस्थ' केलेलं असतं.

नगर. सात जिल्ह्यांचा शेजार लाभलेला जिल्हा. या जिल्ह्याचं मुख्यालय म्हणजे अल्पसंख्याक बहुसंख्य असलेलं शहर! जिल्ह्याच्या या टोकात आणि त्या टोकात फार फरक. 'महाराष्ट्राची चेरापुंजी' अशी ख्याती असलेलं घाटघर या जिल्ह्यात आणि नेहमी पाणी विकत घ्यावं लागणारं दुष्काळी कर्जतही याच जिल्ह्यातलं! तिकडं अकोल्यात नाचणी-तांदळाची भाकरी, संगमनेर-पारनेरमध्ये बाजरीची आणि कर्जत-जामखेडमध्ये ज्वारीची भाकरी. अशी 'एकतेतील विविधता' इथं अगदी आवर्जून पाहायला मिळते. विस्तारलेल्या या जिल्ह्यातील बोलीत, कपड्यांत आणि खाण्यातही स्वाभाविकच वेगळेपण दिसतं. असं असल्यामुळेच की काय, इथली अशी खास "खाद्यसंस्कृती' प्रसिद्ध वगैरे नाही; पण म्हणून इथं आलेला पाहुणा उपाशी जातो, असं मुळीच नाही. तो इथली मिसळ, भेळ, वडे खाऊन, लस्सी पिऊन तृप्त होतो. ओळखीचा कुणी नगरला जाणार असेल, तर तिथनं खवा आणायला आवर्जून सांगतो. 

पुण्याचा शेजार लाभलेलं नगर आता बदलतंय, असं गेल्या पाव शकापासून सांगितलं जातं. इथले रस्ते तसेच असले, तरी बाकी बदल नक्कीच होतोय. खाण्या-पिण्यात तर तो नक्कीच दिसतो. ऐंशी-नव्वदीच्या दशकात 'मिठ्ठा वडा' आणि फरसाण किंवा गरम 'भजे' आणि 'जिलेबी'चा नाष्टा करणाऱ्या नगरकरांपुढं आता अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. चौकाचौकात सकाळी पोहे-उप्पीट-इडली विकणारे उभे असतात. कुणी दाक्षिणात्य किडमिडीत छोकरा 'पोंगा' वाजवत सकाळी-सकाळी सायकलवरून इडल्या आणि मेदूवडे विकत गल्ल्या पालथ्या घालतो. काही चौकांत सकाळपासूनच वडे-भजी-पापडीचे घाणे खमंग वासानं खुणावत असतात. रात्रीच्या जेवणासाठीही नवनवी हॉटेलं सुरू होत आहेत. पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरच्या हॉटेलांतील मेन्यूकार्डाच्या तोडीस तोड मेन्यू आणि तेवढाच दर असलेली हॉटेलंही आहेत. सावेडीसारख्या उच्चभ्रूंच्या उपनगरात 'डॉमिनोज्‌'सारखी 'फूड जॉइंट' उभी राहिली आहेत.

भेळ, भजी आणि मिसळ या 'तामसी' त्रयीवर नगरकर मनापासून प्रेम करतो. एसटी स्टँ, तिथली गर्दी, बाजूलाच एक छोटं दुकान. तिथं 'बडा ख्याल'चे सूर रेंगाळत आहेत आणि घाईतले प्रवासी चटकदार भेळेचा छोटा ख्याल संपवताहेत. जुन्या बसस्थानकावरच्या 'बाबासाहेब भेळ'चं हे चित्र अनेक वर्षांपासूनचं. तिथंच रियाज सफाईदारपणे कांदा कापत, शास्त्रीय संगीताच्या तालावर पातेल्यात डाव फिरवत 'ओली का सुकी?' विचारत असतो. त्यांचंच आता सावेडीत चकचकीत दुकान उभं आहे. औरंगाबाद रस्त्यावरच्या पांढरी पुलाचीही भेळ प्रसिद्ध. येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या थांबून तिथं हमखास भेळ खातात. तीच 'आशा भेळ' गेल्या काही वर्षांपासून नगर शहरातही मिळते. 'सौ नगरी, एक संगमनेरी' असं बिरुद मिरवणाऱ्या संगमनेरमध्येही प्रसिद्ध आहे ती भेळच. नडे यांची भेळ! नगर-मनमाड रस्त्यावरील कोल्हारमध्येही चटकदार भेळ मिळते. वाढत्या महागाईमुळं ती आता खिसा थोडा अधिकच हलका करू पाहते आहे.


बाळासाहेब चंगेडेची मिसळ
म्हणजे परम 'संतोष'!

चटकदार मिसळ
नगरमध्ये मिसळ काही नव्यानं मिळते, अशातला भाग नाही; पण पूर्वीची 'हिंदू हॉटेलां'मधली शिळी भजी आणि त्यांचा चुरा, फरसाण आणि 'शँपल' ही असली मिसळ आता कालबाह्य झाली. आता इथं मिसळ प्रसिद्ध आहे ती खिस्तगल्लीतल्या बाळासाहेब चंगेडे यांच्या 'संतोष'मधील, नव्या पेठेतील 'गुंजन'ची आणि 'रसरंग'ची. पन्नास रुपयांत पोटभर गुजराती जेवण देणाऱ्या खानावळींच्या गल्लीतल्या कोपऱ्यात चंगेडे यांचं हॉटेल आहे. तिथं अगदी सोलापुरातल्या इडलीगृहांसारखा आग्रह होतो. मटकी, पोहे, वर चिवडा-फरसाण, कांदा-लिंबू आणि हवे असतील तर तळलेले शेंगदाणे. रस्सा हवा तो उपलब्ध. 'फिक्का', 'मेडियम' आणि 'तेज'! दुधाचे रतीब घालणारे तिथं मस्तपैकी तेज रश्‍शाच्या जोडीला मिरचीच्या ठेच्याचा गोळा घेऊन भाकरी मुरगाळताना दिसतात. जोडीला बाळासाहेबचा चिवडा, पाव आणि रश्‍शाचा आग्रह असतोच. इथंच शेव टाकलेले पोहे, उपवासाची आणि बिनउपवासाची (म्हणजे शेव भुरभुरलेली) साबूदाण्याची खिचडी, शेंगदाण्याचा लाडूही मिळतो. 'गुंजन'ची मिसळ अशाच थाटाची; पण थोडी सौम्य प्रकृतीची असते. तिथली खिचडी आणि त्यानंतर मिळणारा चहाही छान.

'स्नॅक' नावाचा प्रकार ह्या नावानं फक्त नगरमध्येच मिळतो. पावांच्या दोन स्लाईसमध्ये बटाट्याची भाजी टाकून 'टोस्ट' केलेला हा पदार्थ नगरकर मनापासून खातात. गरमागरम 'स्नॅक'सोबत टोमॅटोचा सॉस किंवा हिरवी चटणी असली की बास. त्यानंतर ग्लासभर दूध घशात ओतलं की, तृप्ती कशी ओसंडून वाहते. जेवण करून शतपावलीसाठी बाहेर पडणारे कापडबाजारात जाऊन असं एखादं 'स्नॅक' किंवा 'सँडविच' सहज आपलंसं करतात. कापडबाजारातच पाव-भाजीच्या, सँडविचच्या, च्छी दाबेलीच्या गाड्याच गाड्या असतात. खाणं झालं, की 'पिणं' आलंच; मग खवय्ये लस्सी, 'फ्रूटस्लार्ड' आदींना न्याय देतात. 'फ्रूट स्लार्ड' हे फ्रूट सॅलॅडचं नगरी नामकरण! ते चमच्यानं खायचं आणि मधूनच प्यायचं अशा घन-द्रव रूपात असतं.

एरवीही नगरकरांना आपल्या गावच्या लस्सीचा फार अभिमान आहे. 'द्वारकासिंग' आणि तत्सम मंडळी मोठ्या ग्लासात आइस्क्रीमचा (बहुदा पिस्ता) गोळा टाकून ते पेश करतात. आधी चमच्यानं आइस्क्रीम आणि मग लस्सीचे घुटके. गारेगार होतात मंडळी! हाच वसा 'स्वीट होम'नं आइस्क्रीमच्या रूपानं जपला आहे. त्यांच्या सावेडी, कापडबाजारातील हॉटेलांमध्ये मिळणारी सीताफळ, शहाळ्यासह विविध फळांची आइस्क्रीम आत्माराम 'ठंडा ठंडा कूल कूल' करणारी असतात. 'स्वीट होम'च्या धनेश बोगावत ह्यांनी आता हॉटेलांची जणू 'चेन' सुरू करून खाणाऱ्यांची 'चैन' केली आहे!



नगरच्या कापडबाजारात रात्रीच्या वेळी गर्दी असते ती खवय्यांची.

कापड बाजारात 'पापड-भाजी' नावाचा एक अद्‌भुत प्रकार मिळतो. सामोशाच्या पारीची पुरी लाटून तिचा तळलेला 'पापड', चटणीएवढी बटाट्याची भाजी आणि जोडीला 'स्सss हाय!' करायला लावणारा ठेचा. एकदम हट के. वडा-पाव हे 'राष्ट्रीय खाद्य' इथंही मिळतं. माणिक चौकातल्या दत्ताच्या देवळाच्या दाराशीच 'सोपानराव वडेवाले' अनेक वर्षं खाणाऱ्यां तृप्त करीत आहेत. तिथं दुपारी गाडी लागली, की गर्दी जमू लागते. वेगवेगळ्या गल्ल्यांतले 'महाराज'ही वड्यांचे आणि पाठोपाठ भज्यांचे घाणे तळत असतात.

खारी आणि पॅटिस
'पॅटिस', अर्थात 'व्हेज पफ'ही इथला लोकप्रिय पदार्थ. बेकऱ्या-बेकऱ्यांमध्ये तो खाण्यासाठी गर्दी असते; पण त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली, दिलीप चंदे यांच्या 'जय जलाराम बेकरी'नं. 'शुद्ध शाकाहारी' बेकरी पदार्थ या शहरात खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आणले 'जलाराम'नं. त्यांची खारी, टोस्ट आणि वेगवेगळी बिस्किटं खाण्याच्या मोहात पाडून वजन वाढवणारीच. केक आणि पॅटिससाठी 'दत्त'च्या दारातही गर्दी असते.

इथं खवा बऱ्यापैकी उपलब्ध असल्यानं मिठायाही छान मिळतात. 'महेंद्र', 'बंबईवाला', 'मुंजोबा', 'बन्सीमहाराज' आदी मंडळींनी नगरकरांना गोड बोलायची नसली, तरी गोड खायची सवय मात्र नक्कीच लावली. राजकुमार धूत पहिल्यांदा राज्यसभेवर गेले, तेव्हा वाटण्यात आलेल्या पेढ्यांची चव विसरणं कठीणच. हा पेढा 'बंबईवाला'च्या खास मेहनतीनं आकाराला आला होता. 'कैलास उडपी'चा काला जामून, कापडबाजारातील गाड्यांवर मिळणारा डिंकपाक आवर्जून खाण्यासारखा.

ह्या शहरात एके काळी 'ढाबा संस्कृती' फार प्रसिद्ध होती. मित्रमंडळी रात्रीची जेवायला जायची म्हटलं, की गाड्या आपसूक सोलापूर, पुणे, औरंगाबाद रस्त्यांवरील ढाब्यांकडे वळत. तिथं हॉटेलांच्या तुलनेत थोडं स्वस्त मिळे. मेन्यू मात्र सगळीकडे तोच पंजाबी थाटाचा, आलू-मटर, चिकन चिली, तंदूर असा. अलीकडं ती संस्कृती मावळली; पण आता शहरात आणि बाहेरच्या रस्त्यांवरही शाकाहारी-मांसाहारी नानाविध पदार्थ देणारी उपाहारगृहं आहेत. त्यावर पंजाबी खाद्यसंस्कृतीचा वरचष्मा आहेच; जोडीला काळ्या मसाल्यातली मटन हंडी किंवा काळ्या मसाल्यातली भाजी, पिठलं-भाकरी-ठेचा असं आवर्जून देणारी उपाहारगृहंही आहेत. 'काँटिनेंटनल फूड'चा शिरकाव झाला आहे; पण स्वस्त आणि मस्त 'सीझलर' खावं ते जुन्या स्टँडसमोरच्या 'सारंग'मध्येच.

झणझणीत शिपी आमटी
नगरमध्ये 15 वर्षांपूर्वी झालेल्या साहित्य संमेलनानं एक साहित्यबाह्य प्रकार चर्चेत आणला. त्यामुळे साहित्याच्या आस्वादाऐवजी 'शिपी आमटी'च्याच स्वादाची अधिक चर्चा होऊ लागली. या आमटीनं दुष्काळी कर्जतला 'झणझणीत' प्रसिद्धी मिळवून दिली. मिश्र डाळी भाजून-वाटून केलेली ही आमटी वेगळीच. ताजा वाटलेला मसाला आणि फोडणी देणारे स्पेशालिस्ट, ही तिची वैशिष्ट्यं. भाकरी किंवा चपाती चुरून (कुस्करून नव्हे!) खाण्यानंच या आमटीची लज्जत वाढते. जोडीला भाजलेले शेंगदाणे आणि बुक्कीनं फोडलेला कांदा असला, की ब्रह्मानंदी टाळी लागण्यासाठी आणखी कशाची गरजच नाही. कर्जतची दोन-तीन हॉटेलं याच शिपी आमटीसाठी प्रसिद्ध आहेत. तिथं राजकीय सभा, बैठका, मेळावे यासाठी लोकांना आमंत्रण देताना 'तमूक तमूकची शिपी आमटी आहे' असं (तिखट) मधाचं बोट लावावं लागतं!

जिल्हाविभाजन, पाणीवाटप अशा सगळ्याच प्रश्‍नांवर मतभिन्नता असली, तरी 'चुरून खाणंह्याबाबत मात्र जिल्ह्यात एकमत आहे! म्हणूनच 'कंदुरी'चा बेत कुणी सहसा चुकवत नाही. इथं मटन काळ्या मसाल्यातच पाहिजे. पुणे रस्त्यावर, केडगावजवळच्या 'संदीप'मधली मटनहंडी म्हणून तर गर्दी खेचत असते. 'पांढरा रस्सा', 'तांबडा रस्सा' असं काही रंगांचं फॅड इथं अजून आलेलं नाही. नळी फोडताना आवाज आला पाहिजे आणि कोंबडी गावरानच पाहिजे, रश्‍शात भाकरी-चपाती चुरूनच खाता आली पाहिजे, एवढाच नगरकरांचा आग्रह. भंडारदरा, राहुरी आणि प्रवरासंगम इथं मासे चांगले मिळतात. राजकीय पक्षांच्या गुप्त बैठका 'मुळा डॅम'वरच का होतातह्याचं रहस्य तिथल्या 'फिश'मध्ये आहे. त्यांचा फडशा पाडतच कोणता मासा गळाला लावायचा किंवा कोणता मासा गिळायचाह्याची खलबतं होतात.

वर्षासहल आणि भंडारदरा यांचं नाते अतूट आहे. धरणाजवळच 'कॅफे डॅम कॉर्नर' आहे. नाना प्रकारची भजी संजय महानोर तळत असतो. मिरची आणि चटणीबरोबर प्लेटांमागे प्लेटा भजी खाल्ली की 'डॅम गुड!' असंच म्हणावं वाटतं. याच भंडारदऱ्यात 'काका हॉटेल'मध्ये अगदी शुद्ध शाकाहारी, घरगुती (पण भोपळ्याची किंवा चाकवताची भाजी नसलेलं) गरमागरम चविष्ट जेवण मिळतं. अकोले तालुक्‍यातला राजूरचा पेढा खाणाऱ्याला वेडा बनवील असाच असतो. तिथल्या नवाळी बाबांचा पेढा सकाळी बनतो आणि संध्याकाळी खल्लास! संगमनेरच्या 'स्वल्पविराम'मधील मिसळ-पुरीही 'टेसदार' असते.

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनलेल्या शिर्डीत बहुप्रांतीय खाद्यसंस्कृती गुण्यागोविंद्यानं नांदते. तिथं रस्त्यावरच्या कोपऱ्यावर घरगुती पोहे मिळतात आणि 'फास्ट फूड'चे भलेमोठे 'जॉइंट' पर्यटक भाविकांना खुणावत राहतात; पण प्रसादालयातील जेवणात मिळणाऱ्या खोबऱ्याच्या बर्फीची लज्जत याहून किती तरी न्यारीच! खाण्यासाठी जगणं की जगण्यासाठी खाणं असा काही तात्त्विक वगैरे वाद नगरकर मानत नाही. तो खाता खाता जगतो आणि जगता जगता खातो!

­(दैनिक सकाळमधून साभार)


#food #ahmednagar_food #foodtourism #misal #ShipiAmati #Shirdi #Bhandardara_dam #mula_dam #foodie #Hotels #foodjoints

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...