मत्प्रिय भक्तांनो...
नमस्कार, प्रणाम, नमस्ते.
वणक्कम.
सलाम वालेकुम.
सत् श्री अकाल.
आणि, हाय..!
हे म्हणजे अगदी रेडिओवरच्या निवेदकांसारखं झालं ना? त्या 'एफ. एम.'वरच्या चिवचिव चिमण्या नि मिठूमिठू पोपट करतात तसं. एका दमात सगळ्यांना साद घालायची! अभिवादन करतानाच सगळ्यांना आपलंसं करायचं.
... तर सांगायचा मुद्दा तुम्ही सगळेच माझे आहात की. मांडवात आरती म्हणताना काय, विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचताना काय... तिथं कुणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन नसतो. तिथं दिसतो तो माझा भक्तच. म्हणून मग मी पण थोड्या वेळासाठी 'आर. जे.' झालो. कसं वाटतंय 'आरजे गणेशा' किंवा 'आरजे विनायका' ऐकायला? की 'आरजे विघ्नहर्ता' अधिक योग्य राहील?
रेडिओवरनं आठवलं, खरं तर ठरवलं होतं की, तुम्हाला 'मित्रों...' अशी साद घालायची. नंतर विचार केला नको बुवा. तशी हाक मारली की, सावरून बसता तुम्ही. हातातलं सगळं काम सोडून रेडिओ, टीव्ही.पुढं ठाण मांडता. मग त्याच्यावरून पुढचे काही दिवस फेसबुक, ट्विटर इत्यादी माध्यमांतून एकमेकांवर तुटून पडता. 'भक्त'-'अंधभक्त'-'गुलाम' ही आणि अशी शेलकी विशेषणं वापरता. नको म्हटलं. तुम्ही सगळेच्या सगळे माझे लाडके भक्त. माझ्या 'मन की बात'वरून तुमच्यात लठ्ठालठ्ठी नको. ह्या उत्सवाच्या काळात तर नकोच.
![]() |
छायाचित्र सौजन्य - www.devillierart.com |
निघण्याची सगळी तयारी करून, आवरून बसलो होतो. अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी नवी पितांबरं, उपरणी भरून झाली. ह्या उत्सवाच्या दिवसात खिरापत, पंचखाद्य, फळं, पेढे, मोदक ह्याचा मारा होणार हे माहिती असल्यानं श्रावणात एकभुक्तच राहिलो होतो. मोदकांच्या कल्पनेनंच तोंडाला पाणी सुटलं होतं. पार्वतीआईनं नेहमीप्रमाणं मायेनं नि काळजीनं सल्ला दिलाच निघताना, 'थोडं जपून खा रे बाळा! तळलेलं कमी खा.' 'मोदक श्रेष्ठ कोणते? तळणीचे की उकडीचे?' तुमचा हा फेसबुकीय वाद आमच्या मातुःश्रींपर्यंत पोहोचलेला आहे बरं! आपला मतलब त्या तसल्या कळकट, शिळ्या वादाशी नाही; ताटभरून मोदक असल्याशी!!
मेघराजाच्या रूपात तांडव करून बाबा दमले होते. त्यामुळे लांबूनच त्यांचा निरोप घेतला. तेवढ्यात आमचे मूषकमहाराज आले नि म्हणाले, ''देवाधिदेवा, अहो काय चाललंय पृथ्वीवर, तुमच्या प्रिय भारतवर्षात! केवढी गर्दी बघा ती. तुमची मूर्ती, नारळ, फुलं-दूर्वा, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी रस्ते कसे वाहताहेत बघा. अहो, जिकडं बघावं तिकडं 'ट्राफीक ज्याम' दिसतंय. कसं काय होणार हो!''
मी म्हणालो त्याला, ''बा मूषका, इतकी वर्षं मला घेऊन जातोस आणि ही गर्दी, हा उत्साह पहिल्यांदाच पाहिल्यासारखं काय सांगतोस. नवं काही बोल.. ट्विटरवरचा नवा ट्रेंड सांग, फेसबुकवरचा खमंग रंगलेला वाद सांग...''
हा थट्टेचा सूर मूषकराजांना पटलेला नाही, हे त्यांच्या इवल्याशा चेहऱ्यावर लगेच दिसलं. ''गणराया, गांभीर्यानं घ्या मला कधी तरी. नेहमीसारखी परिस्थिती राहिलेली नाही सध्या. ती कोरोना महामारी आलेली लक्षात आहे ना तुमच्या. यंदा मार्च, एप्रिल, मे महिने कसे गेले आठवतंय ना?''
मूषकराजांचं ऐकावं म्हणून मग मीही एक नजर टाकली, तर काय. सांगत होता ते खरंच होतं की. केवढी गर्दी! नजर टाकावी तिकडं माणसंच माणसं दिसत होती. हातात पिशव्या, एकमेकांना धक्का देत, वाहनांची दाटी चुकवत वाट काढणारी. रस्त्याच्या कडेला बसलेले विक्रेते. कुणाच्या नाकावर मास्कच नाही, तर कुणी तो हनुवटीवर अडकवलेला. कुणी खोकतोय, तर कुणी थुंकतोय. अरे! एवढ्यात सगळं विसरलात की काय, सोळा-सतरा महिने अनुभवलेलं. तो कोरोनानामक राक्षस अर्धमेला झाल्यासारखा वाटत असला, तरी अजून पूर्णपणे खतम नाही झालेला. लस घेतली असेल तुम्ही. पण म्हणून काय झालं! कोरोनाला आव्हान न देता 'तू परत ये, तू परत ये...' असं आवाहन करत असल्यासारखंच वाटलं मला ते सगळं चित्र पाहून.
नाही म्हटलं तरी हे उघड्या डोळ्यांनी बघितल्यावर हादरलोच थोडा मी. म्हणूनच पत्र लिहायला बसलो लगेच. निघण्याची घाई-गडबड सुरू असताना, वेळ काढून लिहितोय. प्रत्येक मंगल कार्याची पहिली अक्षता देऊन तुम्ही मला मनोभावे आमंत्रण देता. उत्सवाचं तुमचं आमंत्रण मिळालंय. 'पुढच्या वर्षी लवकर या' असं तुम्ही मागच्या वर्षी बऱ्यापैकी शांतपणे सांगितलं होतं. म्हणून यंदा थोडं निवांत जावं असं ठरवलं होतं. यायचं तर असतंच की दर वर्षी.
कोरोनामुळं गेल्या वर्षी परिस्थिती नाजूकच होती. म्हणून उत्सव जपूनच साजरा केला ना तुम्ही. विनाकारण बाहेर पडायचं नाही, मोठ्या संख्येनं सगळ्यांनी जमायचं नाही. सूर्य मावळला की, आपापल्या घरात बसायचं... हे सगळे नियम तुम्ही पाळले ना गेल्या वर्षी पाच-सहा महिने? त्याचे चांगले परिणामही दिसले. हो ना? पण काय सांगावं, यंदाही परिस्थिती फार काही बदललेली नाही बुवा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण सगळे चांगलेच पोळून निघालो, आठवतंय ना? आत्ता आत्ताची तर गोष्टंय ती. तिसऱ्या लाटेचा इशारा सगळे तज्ज्ञ देत असताना एवढे कसे बेफिकीर! डॉक्टरचं, कंपौंडरचं कुणाचंही ऐका... पण भल्याचं असेल ते ऐकाच बुवा.
![]() |
छायाचित्र सौजन्य - www.peepsburgh.com |
दर वर्षी एक तरी गाणं हिट होतच असतं उत्सवाच्या निमित्तानं. ते 'ज्वेल थीफ'मधलं गाणं तुम्हाला सांगितलंच. पुढं कधी तरी 'गाओ ओम शांति ओम...' आलं. शांतता पाळायला एवढं ओरडून, ढणढण वाजवतं सांगावं लागतं होय. त्या वर्षी हा शांतिजप ऐकताना कान किटून गेले माझे. परत काय आहे की, मला एकाच वेळी अनेक गाणी ऐकणं भाग असतं. एका मंडपाचा ध्वनिवर्धक माझ्या समोर लताबाईंनी गायिलेली आरती ऐकवत असतो, तर दुसऱ्या मंडपाचा कर्णा 'चल छय्या, छय्या' म्हणत माझ्या कर्णाकडेच रोखलेला असतो. 'शांताबाई, शांताबाई...' असं कोण कुणाला पुकारतंय हे ऐकावं म्हटलं तर तिसरीकडून 'पार्वतीच्या बाळा...' अशी लडिवाळ हाक कानी पडते. 'देवा श्री गणेशा' एका बाजूला चालू असतं, तर लांबून कुठून तरी 'देवा हो देवा गणपति देवा...' असं मला आळवत कुणी 'हमसे बढकर कौन?' अशी प्रौढी मिरवत असतं.
हे उत्साहभारित वातावरण मलाही फार सुखद वाटत असतं. कधीच कंटाळा येत नाही. वर्तमानपत्रांत देखाव्याची पान भरून छायाचित्रं येतात. 'देखावे पाहता पाय थकले, पण डोळे नाही निवले' हे नेहमीचंच यशस्वी वाक्य कुणा बातमीदार-उपसंपादकाला द्यायचं असतं. एखादा उत्साही उपसंपादक 'रंग गुलाली ढोल वाजती, आले आले गणपती' असं उत्सवी शीर्षक देऊन बहार आणत असतो.
![]() |
छायाचित्र सौजन्य - www.subpng.com |
पण यंदाही, सलग दुसऱ्या वर्षी ह्या सगळ्यावर नाही, पण बऱ्याचशा कार्यक्रमांपुढं फुली मारायचीच. नियम पाळू. मला छान मखरात बसवा, गौरींची मस्त सजावट करा...पण हे सगळं आपल्यापुरतं; त्याला सार्वजनिक स्वरूप नको. यंदाही सजावटीचा भव्य मांडव नको. दर्शनाला आणि आरतीला गर्दी नकोच. तुम्ही मनोमन केलेला नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचणारच. आशीर्वादासाठी माझा हात उंचावलेलाच आहे. गाणी नको, ढोल-ताशे नको, पाय थिरकावणारा नाच नको आणि गर्दीचा उत्सवी उत्साह नकोच नको.
हे सगळं मलाही थोडंच गोड वाटतं? खंत आहेच की. चुकल्यासारखं वाटतंय. लागोपाठ दुसऱ्या वर्षी भक्तांपासून थोडं लांबच राहायचं? पण इलाज नाही. मला सांगा, मास्क लावलेल्या रूपात माझं दर्शन तुम्हाला आवडेल का? तुमचे फुललेले चेहरे बघताना माझी अवस्था 'रूप पाहता लोचनी, सुख जालें वो साजणी' अशी होते. तुम्ही मास्क बांधूनच येणार. मग मला तुमचा फुललेला चेहरा कसा दिसणार? आणि मास्क न लावताच आलात, तर मला नाही हं आवडणार. नकोच ते!
फ़िराक़ गोरखपुरीसाहेबांचा शेर आहे -
तुमको देखें कि तुम से बात करें
माझी अवस्था अगदी तशीच आहे मित्रांनो. पण सध्याचा काळ लक्षात घेऊन तुम्हाला जवळून पाहण्यापेक्षा हा दुरून संवाद साधणंच योग्य आहे, असं मला वाटतं. ती म्हण आहे ना, एका जत्रेनं देव काही म्हातारा होत नाही. एकच्या ऐवजी आपण दोन उत्सव म्हणू.
मला बोलावलंत, मी आलोय. दर वर्षीच्या उत्साहानंच तुम्ही 'आधी वंदू तुज मोरया' असं म्हणाच. ऐकताना छान वाटतं. पण तसं म्हणताना मी वर जे काही लिहिलंय ते ध्यानात घेऊन 'सगळं ऐकू तुझे मोरया' असंही वचन मला द्या. पुढच्या वर्षी धमाल करू. दोन वर्षांची कसर पुरेपूर भरून काढू. हो ना?
तस्मादैक्यं प्रशंसन्ति दृढं राष्ट्रहितैषिण:||
... ह्या श्लोकाचा भावार्थ असा की, ऐक्य हीच समाजाची ताकद आहे. ऐक्य नसलेला समाज आणि पर्यायाने तो देश दुबळा ठरतो. म्हणूनच राष्ट्रहिताचा विचार करणारे ऐक्याला प्रोत्साहन देतात. ह्या महामारीला पिटाळून लावण्यासाठी आपल्याला असंच ऐक्य दाखवावं लागेल.
यंदा निश्चयच करू. दीड वर्ष ठाण मांडून बसलेल्या ह्या कोरोना-विघ्नाला हरवू या, पुढच्या वर्षी दुपटीनं आनंद साजरा करू या. तुम्ही म्हणता ना मला, 'पुन्हा पुन्हा तुम्ही यावे, विद्या ज्ञान आम्हा द्यावे'. आतापुरतं एवढं ज्ञान बास झालं की.
काळजी करू नका, आवश्यक ती काळजी मात्र घ्या. बाकीचं पाहायला मी आहे ना समर्थ!
तुमचा सगळ्यांचा,
बाप्पा
.....
#Ganesh #GaneshFestival #Covid19 #socialmedia #facebook #twitter #bhakt #LordGanesh #mankibaat #गणेशोत्सव #होठों_में_ऐसी_बात
#भक्तांशी संवाद
खूपच सुंदर लिहलय..
उत्तर द्याहटवाअगदी जणू बाप्पाचं बोलतोय असच वाटलं क्षणभर..
वा ! मामाश्री!! दिलीप वेंगसरकरच्या सहजसुंदर फलंदाजीसारखा सहज सुंदर लेख! आनंदी वातावरणाचा वेध घेत,खंत व्यक्त करता करता , समाजाला जागृत करणारा लेख! आपली खिडकी वरचेवर उघडावी!!! खिडकी उघडल्यावर येणारी झुळूक सुखावून जाते!!! श्रीकांत जोशी
उत्तर द्याहटवागणपती बाप्पा भक्तांना सुबुद्धी देवो!!
उत्तर द्याहटवा💐💐🙏🙏
फारच सुंदर....
उत्तर द्याहटवासुंदर
हटवाfar chhan
उत्तर द्याहटवाउत्साही भक्तांना कोपरखळ्या मारत, योग्य अयोग्य प्रथांचा निर्देश मार्मिकपणे करत, सध्याच्या स्थितीत औचित्य साधून उचित इशारा दिला आहे.खुसखुशीत वर्णनशैली आवडली.
उत्तर द्याहटवा