बुधवार, १६ मार्च, २०२२

न झालेला (अजून एक) मुख्यमंत्री

 


पंतप्रधान मोदी ह्यांच्या हस्ते सत्कार.

नगर जिल्ह्यात ‘न झालेले’ मुख्यमंत्री किती? यादी करायचीच झाली, तर फार मोठी होईल. त्यातल्याच एका दिग्गजानं आज अखेरचा निरोप घेतला. आपल्यावर सोपवलेली कामगिरी काळानं बजावली. त्याच्या यादीत आज शंकरराव कोल्हे ह्यांचं नाव होतं. आणखी आठ दिवसांनी कोल्हे ह्यांनी चौऱ्याण्णवाव्या वर्षात पदार्पण केलं असतं. पण नियतीनं तसं लिहिलेलं नव्हतं. नाशकामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शंकरराव कोल्हे ह्यांचा ‘सहकारतज्ज्ञ’ असा उल्लेख आज-उद्या-परवाच्या बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांतील संपादकीय पानांवर प्रसिद्ध होणाऱ्या स्फुटांमध्ये होईल. पण फक्त तेवढंच बिरूद त्यांच्यावर अन्याय करणारं असेल. सहकाराबरोबरच विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास असणारा, स्वतःची ठाम मतं असणारा आणि ती व्यक्त करणारा हा नेता होता.

‘सहकार-महर्षी’, ‘सहकार-सम्राट’ अशी पदवीसदृश विशेषणं माध्यमांमधून कित्येक वर्षांपासून वापरली जातात. त्यातून बहुदा उपरोध, काहीसा हेवा, क्वचित तुच्छता व्यक्त होत असते. ग्रामीण महाराष्ट्र, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र व्यापलेल्या सहकार चळवळीने असे ‘महर्षी’ वा ‘सम्राट’ निर्माण केले, ह्यात काही खोटं नाही. पण ह्या उपरोधाच्या आणि हेव्याच्या पार पुढे जाऊन काम करणारे नेते ह्याच चळवळीनं दिले. त्यांच्या कामानं त्या परिसराचा, तालुक्याचा कायापालट झाला. भले त्या परिसराला ‘नेत्याचं संस्थान’ म्हणून हिणवलं गेलं असेल.

काळे आणि कोल्हे

नगर जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल बोलताना नव्या सहस्रकापर्यंत ‘काळे-कोल्हे’ असा उल्लेख अपरिहार्य असे. ही दोन आडनावं सयामी जुळ्याप्रमाणे येत. जणू एकाच्या उल्लेखाविना दुसरा कोणीच नाही. विसाव्या शतकाची शेवटची साधारण तीन-साडेतीन दशकं कोपरगाव तालुक्याचं राजकारण शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे ह्याच नावांभोवती फिरत राहिलं. त्याबद्दल भरपूर लिहून आलं. ह्या दोन नेत्यांचं भांडण लुटुपुटीचं आहे; आपापल्या कारखान्यांच्या निवडणुका ते कसे बरोबर बिनविरोध घडवून आणतात, अशी चर्चा नेहमीच व्हायची. तालुक्यात ‘तिसरी शक्ती’ उदयास येऊ नये म्हणून ह्या दोन नेत्यांची नुरा कुस्ती चालते, असंही पत्रकारांचं, राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांचं मत होतं. ते बरंचसं खरंही म्हणता येईल. हे दोघे पूर्ण भरात असेपर्यंत तालुक्यात तिसरी शक्ती लक्षणीयरीत्या काही दिसली नाही.

राजकारण्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल तुच्छतेनं बोललं जाण्याच्या आणि बहुतांशी प्रमाणात ते वास्तव असण्याच्या काळात हे दोन्ही शंकरराव उच्चशिक्षित होते. आज ज्याचा ‘व्यावसायिक शिक्षण’ म्हणून खास उल्लेख होतो, ते त्यांनी मिळवलं होतं. दत्ता देशमुख, शंकरराव काळे १९४०च्या दशकातले अभियंते होते. पुण्याच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळविली होती. शंकरराव कोल्हे कृषिशास्त्राचे पदवीधर होते. त्यानंतर युरोप आणि अमेरिकेत त्यांनी ह्या विषयाचं पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलं.

सहकार, शेती, पाणी, शिक्षण हे कोल्हे ह्यांच्या आवडीचे विषय. समोर ऐकणारा असेल, तर त्या विषयावर तासन् तास बोलण्याची त्यांची क्षमता होती. तो अनुभव मी एकदा घेतला. ‘लोकसत्ता’ची नगर आवृत्ती चालू होऊन जेमतेम वर्ष झालं असेल. आम्ही काही मित्र येवल्याहून नगरकडे येत होतो. त्या वेळी कोल्हे ह्यांच्या पुण्या-मुंबईतील जनसंपर्काची जबाबदारी अभिनंदन थोरात पाहत होते. अभिनंदन त्या दिवशी कोपरगाव येथे होते. त्यांना भेटायला म्हणून आम्ही गेलो.

संजीवनी साखर कारखान्यात शंकरराव कोल्हे होतेच. अभिनंदन ह्यांनी त्यांची भेट घालून दिली. त्या काळात ‘लोकसत्ता’ त्यांचं आवडतं, अगदी प्रेमाचं दैनिक होतं. त्या दैनिकाचा माणूस आहे म्हटल्यावर त्यांनी खळखळ न करता वेळ दिला. नंतरचा सव्वा ते दीड तास साखर, पाणी, परदेशातली शेती ह्या विषयावर अखंड बोलत राहिले. आम्ही सारे मित्र त्या वाक्गंगेमुळे आणि त्यातून ओसंडून वाहत असलेल्या ज्ञानप्रवाहामुळे अचंबित झालो. सारा वेळ आम्ही श्रवणभक्ती केली. ‘पत्रकार’ असल्याची जाणीव कधी तरी व्हायची. एखादा प्रश्न विचारायला जायचो. त्याला थोडक्यात उत्तर देऊन कोल्हेसाहेब आपली बॅटिंग मागील डावावरून पुढे अशा रीतीनं चालू ठेवायचे. ‘साहेब, ही मुलाखत नाही बरं. सहज गप्पा आहेत,’ असं अभिनंदन ह्यांनी त्यांना सांगितलं. हे कुठं छापून येणार नाही हे माहीत असूनही ‘...शहाणे करुनी सोडावे सकळ जन’ ह्या बाण्याप्रमाणे त्यांनी आम्हा चार-पाच मित्रांना खूप काही सांगितलं.

मुलाखतीवरून एक गंमत आठवली. नव्वदीच्या दशकात कोल्हेसाहेब पुण्याच्या एका संपादकांचे लाडके होते. छोट्या-मोठ्या गोष्टींबाबत त्यांना कोल्हेसाहेबांचे मत महत्त्वाचं वाटायचं (तसं ते असायचंही, हा भाग वेगळा!) आणि ते नगरच्या कार्यालयातील प्रमुखाला ते घ्यायला सांगायचे. एकदा त्यांनी नगर कार्यालयातील ह्या सहकाऱ्याला कोल्हेसाहेबांची मुलाखत घेऊन यायला सांगितलं. बहुतेक पाण्याचा विषय असावा. नगरहून हा पत्रकार प्रश्नांची पद्धतशीर यादी बनवून गेला.

आपलीच मुलाखत आपल्याशी

कोल्हेसाहेबांनी ते प्रश्न पाहिले. मग ते त्याच्या पद्धतीनं गडगडाटी हसले. ‘मुलाखत कशी घ्यायची मी सांगतो,’ असं म्हणत त्यांनीच स्वतःला प्रश्न विचारले आणि त्याची (सविस्तर) उत्तरं दिली! निरोप घेताना ‘झाली ना चांगली मुलाखत?’ असं विचारायलाही ते विसरले नाहीत. त्यांचं हसू मनमोकळं, दिलखुलास होतं. आमच्या त्या गप्पांमध्येही ते अनुभवायला आलं.

पत्रकारांचं ‘पक्षांतर’

असंच एकदा कोल्हेसाहेब ‘लोकसत्ता’च्या पुणे कार्यालयात आले होते. मी तेव्हा तिथेच होतो. संपादकांनी ‘हा तुमच्या नगरचा बरं का!’ अशी ओळख करून दिली त्यांना माझी. संपादकीय विभागातल्या मंडळींशी त्यांनी तासभर ऐसपैस गप्पा मारल्या. त्या ओघात कुणी तरी नेत्यांच्या पक्षांतराबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही लोक नाही का, ह्या पेपरमधून त्या पेपरमध्ये जात? कुणी वृत्तसंपादक केलं म्हणून जातं, तर कुणाला संपादक व्हायचं असतं म्हणून तो दुसऱ्या पेपरमध्ये जातो. तसंच असतं हे.’’

नव्वदीच्या दशकानंतर वर्तमानपत्रांचे वर्धापनदिन साजरे करण्याची आणि त्यानिमित्त विशेष पुरवण्या प्रसिद्ध करण्याची पद्धत रूढ झाली. त्यातून मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळायच्या. आधीच्या काळात अशा पुरवण्यांच्या माध्यमातून वाचकांना वेगळं काही वाचायला मिळायचं बरंचसं. (आता त्या निव्वळ जाहिरात पुरवण्या झाल्या आहेत.) अशाच एका वर्धापनदिनासाठी जाहिरातीची विनंती करण्यासाठी जाहिरात विभागाचे दोघे-तिघे कोल्हेसाहेबांकडे गेले. वजन पडावं म्हणून सोबत संपादकीय विभागप्रमुख होतेच. विषय निघाला आणि जाहिरातीची अपेक्षा सांगितली गेली. त्यावर कोल्हेसाहेब म्हणाले, ‘‘अहो साहेब, तुमचा वर्धापनदिन. त्या आनंदानिमित्त तुम्ही आम्हाला, वाचकांना काही तरी द्यायचं. ते सोडून आम्हालाच मागत बसलात!’’ अर्थात नंतर त्यांनी जाहिरात मंजूर केली, हा भाग वेगळा.

आम्ही तिघं-चौघं, पोपट पवार, निर्मल थोरात आणि मी परवाच नगरच्या सावेडीच्या ‘स्वीट होम’मध्ये जेवायला गेलो होतो. निर्मलला अचानक आठवलं नि तो म्हणाला, ‘‘कोल्हेसाहेब नेहमी इथंच जेवायचे बरं का.’’ मला ते माहीत होतं. त्यांना ‘बॉइल्ड फूड’ लागायचं - उकडलेल्या भाज्या. असंच एकदा ते संध्याकाळी ‘लोकसत्ता’च्या नगर कार्यालयात आले होते. तिथून पुण्याला जाणार होते. पोहोचायला रात्रीचे साडेनऊ-दहा वाजणार. अचानक त्यांनी मला सांगितलं, ‘‘अहो, तेवढा अभिनंदनला फोन करा हो. त्याला सांगा, मी येतोय. ते आमचं जेवण कुठं मिळतं त्यालाच चांगला माहितीय. नाही तर उपाशी राहायचो मी.’’ आणि नंतर तेच प्रसिद्ध गडगडाटी हास्य. 

‘उत्तम वाचक’ अशीही कोल्हेसाहेबांची ओळख होती. ‘लोकसत्ता’मध्ये त्या काळी रविवारी प्रसिद्ध होणारे ‘नगरी-नगरी’ सदर त्यांना आवडायचे, असे त्यांचे स्वीय सहायक वीरेंद्र जोशी नेहमी सांगत. त्या सदरात प्रसिद्ध झालेले ‘पत्रकार लोग आयोडेक्स मलिए, पाकिट लेने के काम चलिए’ हे टिपण त्यांना खूप आवडलं. इतकं की, त्यांनी तेव्हाचे मुख्य वार्ताहर महादेव कुलकर्णी ह्यांना फोन करून ‘तुम्ही रोज का नाही छापत हे सदर?’ असं विचारलं.

काळे आणि कोल्हे ह्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या ऐन मध्यावर कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला. ऊसमळे जगतील का आणि कारखाने टिकतील का, अशी अवस्था होती. दोघेही त्या प्रश्नाला आपापल्या पद्धतीने भिडले. त्यांनी परस्परांवर जोरदार टीकाही केली. पण ती करताना मूळ प्रश्नाचा विसर पडणार नाही, ह्याची पूर्ण काळजी घेतली. तुटेपर्यंत ताणायचं नाही, हाच दोघांच्याही राजकारणाचा मंत्र होता.

मंत्रिपदाची छोटी इनिंग्स 

लायक असूनही ह्या दोन्ही नेत्यांना फार काळ सत्ता उपभोगता आली नाही. शंकरराव काळे ह्यांना तर केवळ एकदा राज्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये. कोल्हे ह्यांना मंत्रिपदासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागली. वयाच्या एकसष्टीत म्हणजे १९९०मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. तेही पूर्ण पाच वर्षांसाठीच नाहीच. महसूल, कृषी व फलोत्पादन, परिवहन, राज्य उत्पादनशुल्क अशी विविध खाती त्यांनी छोट्या इनिंग्समध्ये संभाळली. त्यानंतर तीस वर्षांत कोपरगाव मतदारसंघाच्या वाट्याला काही लाल दिव्याची गाडी आली नाही.

‘एन्रॉन’विरोधात सत्याग्रह

हेच कारण होतं की काय माहीत नाही, पण नंतरच्या पाच-एक वर्षांत कोल्हेसाहेब आक्रमक होते. डॉ. कुमार सप्तर्षी ह्यांनी त्यांच्यावर गारूड केल्यासारखं होतं. त्यांच्या बरोबर जाऊन त्यांनी एन्रॉन प्रकल्पाच्या विरोधात सत्याग्रहही केला! खरं तर ते राजकारणातल्या वसंतदादा गटाचे. जिल्ह्यात ते, प्रसाद तनपुरे, शिवाजीराव नागवडे, दादा पाटील शेळके, मधुकर पिचड ह्यांचा ‘दादा गट’ होता. तो १९९५नंतर हळुहळू विलयाला गेला. पु. लो. द.ची स्थापना झाली, तेव्हा कोल्हे इंदिरा काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे त्यांचा समाजवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्याच्या वेळी मात्र त्या पक्षाला पसंती देणारे ते जिल्ह्यातले पहिले मातब्बर नेते होते. तसे ते काही पवार ह्यांच्या खास गोटातले नव्हते. पण जिल्ह्यातल्या, त्यातही कोपरगावच्या राजकारणात त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न चालू होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी तो निर्णय घेतला.

जागतिकीकरण उंबरठ्यावर असताना त्याची चाहूल लागून त्याबद्दल बोलणारे जिल्ह्यात दोन नेते होते - बाळासाहेब विखे पाटील आणि शंकरराव कोल्हे. सहकार चळवळीच्या माध्यमातून शिक्षणाचेही मोठे काम झाले. त्याची नगर जिल्ह्यात अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. संजीवनी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय त्यापैकीच एक. गुणवत्तेबद्दल हे महाविद्यालय ओळखले जाते. ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणखी दोन वेगळे उपक्रम चालू झाले. कोल्हेसाहेबांचे सहकारी लहानुभाऊ नागरे ह्यांना सैनिकी शिक्षणाबद्दल मोठी ओढ. त्याची त्यांना जाण होती आणि उपयुक्तताही माहीत होती. लष्करातील मोठ्या अधिकाऱ्यांशी त्यांची ओळख होती. त्यातूनच ‘संजीवनी प्री-कॅडेट ट्रेनिंग सेंटर’ चालू झाले. आणखी एक नोंद घेण्यासारखी वेगळी संस्था म्हणजे - ‘संजीवनी मोटर ड्रायव्हिंग स्कूल’. सह-वीजनिर्मिती, इथेनॉल निर्मिती, आधुनिकीकरण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यांच्या राजकारणाएवढ्याच, किंबहुना काकणभर अधिक महत्त्वाच्या ह्याच गोष्टी होत.

कोल्हेसाहेब आणखी एका गोष्टीमुळे लक्षात राहिले. संजीवनी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याला त्यांचे नाव देण्याचा ठराव आला. त्याला त्यांनी त्या क्षणी विरोध केला! आपण संस्थापक असलो, तरी आपल्या नावाने कारखाना ओळखला जाऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. जिल्ह्यात त्या काळात आलेल्या नामांतराच्या लाटेत ती वेगळी होती. पण त्यांची ही भूमिका त्यांच्याच कार्यकर्त्यांना पटली नि पचली नाही. काही काळानंतर त्यांचे नाव कारखान्याला लाभले.

साधारण गेल्या दहा वर्षांपासून कोल्हेसाहेब राजकारणापासून लांबच होते. प्रकृतीमुळे जाहीर समारंभातील वावरावरही मर्यादा आल्या होत्या. सहकार-शेती-शिक्षण-राजकारणाच्या इतिहासातील एक प्रकरण त्यांच्या निधनामुळे संपले!

---

(सर्व छायाचित्रे - कोपरगावचे पत्रकार महेश जोशी ह्यांच्या सौजन्याने)

---

#ShankarraoKolhe #kopargaon #NagarPolitics #cooperative #sanjeevani #Kale_Kolhe #politics #maharashtapolitics #sugarindustries #enron

बुधवार, ९ मार्च, २०२२

भिवंडीत घुमला नगरचा दम


श्रीकृष्ण करंडक पटकावणारा नगरचा कबड्डी संघ.

इतके जवळ आणि तरीही फार दूर..! कबड्डी-कबड्डीचा दम घुमवत चढाई करताना पकड झाल्यावर आक्रमकाने मोठ्या त्वेषाने मध्यरेषा गाठावी. त्याच्या हाताचा रेषेला स्पर्श होण्याआधीच संरक्षकांपैकी कोणी तो अलगद उचलावा आणि त्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम द्यावा! आक्रमक बाद होतो. इतक्या जवळ असूनही लक्ष्यापासून दूर राहिल्याची सल कायम राहते. त्याला वाट पाहावी लागते पुन्हा चढाई करण्याच्या संधीची.

नगरच्या पुरुष कबड्डी संघाने ही सल जवळपास २३ वर्षे बाळगली. ती दूर झाली मागच्या आठवड्यात. काल्हेरच्या (भिवंडी) बंदऱ्या मारुती क्रीडानगरीमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेत नगरच्या नवख्या संघाने बाजी मारली. एकोणसत्तर वर्षांतले पहिले विजेतपद. उपान्त्य फेरीत मुंबई उपनगर आणि अंतिम सामन्यात मुंबई शहर अशा बलाढ्य संघांना पराभूत करण्याची किमया शंकर गदई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी करून दाखवली.

राज्यातील अव्वल, पहिल्या नंबरचा संघ ठरण्याची ही कामगिरी लीलया झालेली नाही. विजेतेपदाकडे नेणारी आणि त्यावर शिक्कामोर्तब करणारी - दोन्ही लढती ‘जिंकू किंवा मरू’ एवढ्या अटीतटीच्या झाल्या. उत्तम संघभावना, आत्मविश्वास, दडपण झुगारून टाकण्याची आणि शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची वृत्ती ह्यामुळेच नगरला हे यश खेचून आणता आले. मैदानातील कौशल्यांबरोबरच कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता कणखरपणे उभे राहण्याची त्यांची तयारी होती. त्याचे पारितोषिक राज्य अजिंक्यपदाच्या रूपाने मिळाले.

नगरचा एकमेव अर्जुन पुरस्कारविजेता पंकज शिरसाट ह्या अभुतपूर्व विजयाचा साक्षीदार होता. त्याच्याच नेतृत्वाखाली इस्लामपूरमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नगरने पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. यजमान सांगलीकडून त्यांचा पराभव झाला आणि विजयश्रीने हुलकावणी दिली. पण त्या स्पर्धेचा ‘हीरो’ पंकज ठरला होता. चतुरस्र चढायांनी त्याने तिथल्या शेकडो प्रेक्षकांना जिंकले होते. ह्या संघातून खेळलेले सातही जण हीरोच आहेत, असं पंकज अगदी दिलखुलासपणे म्हणतो.

श्रीकृष्ण करंडक ‘डार्क हॉर्स’ला 

फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी भिवंडीत सुरू झालेल्या एकोणसत्तराव्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नगरचा संघ तसा फार कुणाच्या खिसगणतीत नव्हता. अजिंक्यपदाचा श्रीकृष्ण करंडक सर्वसाधारण दिसणाऱ्या मुलांच्या ह्या संघाला मिळेल, असंही वाटलं नसेल कुणाला. ‘डार्क हॉर्स’ ठरला हा संघ. चाळीस वर्षांपूर्वी विश्वचषक जिंकणाऱ्या कपिलदेवच्या संघासारखा!

पुरुषांच्या ‘ब’ गटात बलाढ्य मुंबई शहर, सोलापूर, औरंगाबाद व नगरचा समावेश होता. पहिल्याच सामन्यात मुंबई शहराला बरोबरीत थोपवून नगरकरांनी चुणूक दाखवली. खरं तर पूर्वार्ध संपला तेव्हा नगरकडे ९-७ आघाडी होती. राहुल खाटीक, प्रफुल्ल झावरे, शंकर गदई ह्यांनी मिळवून दिलेली ही छोटी आघाडी निर्णायक ठरली नाही. अनुभवी मुंबईकरांनी नंतर जोर लावला आणि सामना २०-२० बरोबरीत सुटला.

गटातील नंतरचे दोन्ही सामने नगरच्या संघाने सहज जिंकले. कर्णधार शंकर, प्रफुल्ल व संभाजी वाबळे ह्यांच्या जोरदार खेळामुळे सोलापूरवर ५४-१३ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. औरंगाबादचाही नगरपुढे टिकाव लागला नाही. ह्या गटात मुंबई शहर व नगर ह्यांचे समसमान पाच गुण होते. पण गुणफरक कमी असल्यामुळे मुंबई शहर संघाला गटात अव्वल स्थान मिळाले.

आता होती बाद फेरी. प्रत्येक सामना जिंकलाच पाहिजे. उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करताना नगरच्या संघाने कोल्हापूर संघाला ४७-१५ अशी धूळ चारली. ह्या विजयात देवीदास जगताप, संभाजी वाबळे चमकले. उपान्त्यपूर्व फेरीत नंदुरबारला हरवताना (३३-२०) नगरने पूर्वार्धात व उत्तरार्धात एक-एक लोण चढविले. ह्या सामन्यात गदई व खाटीक ह्यांना उत्तम साथ मिळाली, ती राम आडागळेची.

नगरकरांची लढाऊ वृत्ती

नगरच्या संघाची आतापर्यंतची वाटचाल आश्वासक होती. त्याच पद्धतीच्या खेळातून उपान्त फेरी गाठली. समोर संघ होता मुंबई उपनगराचा. व्यावसायिक, सातत्याने खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असलेला, ज्याचं नाव ऐकूनच प्रतिस्पर्धी गळाठून जातो, असा संघ. इथेही नगरकरांनी लढाऊ वृत्ती दाखवली. नियमित वेळेत गुणफलक बरोबरी दाखवत होता. मग पाच-पाच चढायांच्या अलाहिदा डावात नगरचा संघ सरस ठरला. ही लढत ३३-३० (७-४) अशी जिंकून नगरने अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेत सलामीला गाठ पडलेलाच मुंबई शहरचा संघ अंतिम फेरीत नगरसमोर उभा होता. उत्तम कामगिरीचा इतिहास, प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळणारे, वर्षातले सात-आठ महिने विविध स्पर्धांमध्ये कस अजमावणारे खेळाडू असा बलाढ्य संघ. तुलनेने नगरचा संघ पोरसवदा. स्पर्धात्मक वातावरणाचा फारसा अनुभव नसलेला. जमेची बाजू एवढीच की, ह्या संघानेच आधी मुंबई शहरशी बरोबरी केलेली.

गमावण्यासारखं काहीच नसलेल्या नगरची सुरुवात धडाकेबाज होती. पण काही मिनिटांतच मुंबई शहरने चोख प्रत्युत्तर देत बाजू सावरली. मध्यंतराला मुंबई शहर संघाकडे १४-८ आघाडी होती. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत निर्विवाद ठरावी, अशी आघाडी.

पण सामन्याचा उत्तरार्ध अधिक चुरशीचा झाला. सगळं दडपण झुगारून नगरची तरुण पोरं खेळली. मिनिटा-मिनिटाला पारडं बदलत होतं. पाच मिनिटं बाकी असताना नगरकडे एका गुणाची (२३-२२) आघाडी होती. ती तोडत मुंबईने तीन गुणांची आघाडी घेतली. अखेरच्या क्षणी नगरने २५-२५ अशी बरोबरी साधली. विजेता ठरविण्यासाठी झालेल्या ५-५ चढायांच्या डावातही बरोबरी (३१-३१) झाली.

सुवर्ण चढाई नि नवी आवृत्ती

कबड्डीचा राज्यविजेता ठरणार होता सुवर्ण चढाईतून. त्यासाठी पुन्हा नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणाऱ्या संघालाच चढाईची संधी मिळते. जो संघ चढाई करतो, त्याच्या यशाची खातरी अधिक असते, असे राज्य कबड्डी संघटनेचे माजी संयुक्त चिटणीस प्रा. सुनील जाधव ह्यांचे निरीक्षण. सुदैव म्हणा किंवा योगायोग म्हणा, शंकर गदईने नाणेफेक जिंकली. सुवर्ण चढाई करण्यासाठी तोच गेला. त्याने पहिल्याच फटक्यात बोनस गुण वसूल केला आणि कबड्डीच्या इतिहासाची नवी आवृत्ती लिहिली! तेवीस वर्षांपूर्वी हुलकावणी दिलेले स्वप्न आपलेसे झाले.

कोणत्याही खेळात एखादा संघ अजिंक्य ठरतो, तेव्हा त्यासाठी केलेली काही मेहनत असते. विचारपूर्वक केलेली आखणी असते. नगरच्या संघाचे प्रशिक्षक होते शंतनु पांडव. इस्लामपूरला उपविजयी ठरलेल्या संघाचे सदस्य. ते म्हणतात, ‘‘तेव्हा इस्लामपूर आणि आता भिवंडी. कबड्डीपटू म्हणून माझ्या आयुष्यातले हे दोन महत्त्वाचे, सुवर्णक्षण - तेवीस वर्षांच्या अंतराने आलेले.’’

स्वतःसाठी नको, तर संघासाठी खेळू

तुलनेनं नवख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या ह्या संघावर कशी मेहनत घेतली? त्यांना कोणत्या चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या? शंतनु पांडव म्हणाले, ‘‘कबड्डी सांघिक खेळ आहे. कुणा एकाच्या खेळावर एखादा सामना जिंकता येतो; स्पर्धा नाही. निवडचाचणी असल्यामुळे काही खेळाडू स्वतःला(च) सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात. पण मी सर्वांना सांगितलं की, स्वतःसाठी खेळाल, तर संघभावना राहणार नाही. मग संघ जिंकणार नाही. संघ विजयी झाला तर सर्वांचाच फायदा, हे त्यांना पटलं. सराव तसा  घेतला. नवीन, तरुण खेळाडूंचा हा संघ. मोठ्या स्पर्धा किंवा सलग एकत्र खेळण्याचा त्यांना अनुभव नव्हता. पण महत्त्वाचे म्हणजे हे सगळे किमान चार-पाच वर्षांपासून नियमित सराव करणारे आहेत. मूलभूत कौशल्यात सगळेच पक्के आहेत. त्यामुळे सांगितलेलं ते पटकन शिकत गेले.’’


प्रशिक्षक शंतनु पांडव आणि
कर्णधार शंकर गदई
कबड्डीचा खेळ आता अधिक गतिमान झाला नाही. तिसऱ्या अनुत्पादक चढाईचा (अनप्रॉडक्टिव्ह रेड) आणि चढाई तीस सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचा नियम ह्यामुळे गती वाढली आहे. संरक्षण व आक्रमण ह्या दोन्ही आघाड्यांवर संघ सरस ठरला. एकदा बाद फेरी गाठल्यावर प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी खेळाडूंची कशी तयारी केली? विशेषतः उपान्त्य सामना मुंबई उपनगरसारख्या बलाढ्य संघाबरोबर होता. शंतनु म्हणाले, ‘‘मुंबई उपनगरमध्ये मातब्बर, नाव असलेले, प्रो-कबड्डी लीगमध्ये दबदबा असलेले खेळाडू होते. ह्या नावांचं अजिबात दडपण घ्यायचं नाही, असं मी सगळ्यांना सांगितलं. त्यांना समजावलं की, पाच सामने खेळून आपण सेट झालो आहोत. तुमची क्षमता आहे म्हणूनच संघ इथपर्यंत पोहोचला. त्यांच्या नावावर जाऊ नका. आपण समान आहोत, हे समजून खेळा. मग खेळ आपोआप उत्कृष्ट होईल. त्यांनी हे अंगीकारलं, हे निकालानंतर दिसलंच.’’

‘‘अंतिम लढतीत जोरदार सुरुवात केल्यामुळे आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास जरा अतीच वाढला. त्याचा परिणाम असा झाला की, मध्यंतराच्या वेळी आपण मागं पडलो. मग ‘टाईमआऊट’च्या सोयीचा चांगला उपयोग केला. मुलांना थोडं रागवलो, थोडं समजून सांगितलं. अजूनही सामना जिंकता येईल, हे पटवून दिलं. पुढे काय झालं, ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. संघातल्या सगळ्यांचाच खेळ छान झाला. शेवटी हा सांघिकच खेळ आहे ना. शंकर, राहुल खाटीक, राम आडागळे, संभाजी वाबळे, देवीदास जगताप, प्रफुल्ल झावरे, राहुल धनवटे, आदित्य शिंदे... सगळेच संघासाठी खेळले.’’

श्वास कबड्डी...

मैदानात उतरण्याआधीचा सरावही फार महत्त्वाचा असतो - ‘नेट प्रॅक्टिस’. खो-खो, कबड्डी ह्या देशी खेळांच्या राज्य अजिंक्य स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून जिल्हा संघाचं सराव शिबिर घेतलं जातं. संघभावना रुजण्यासाठी, कौशल्ये गिरवून पक्की करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बऱ्याच वेळा ही शिबिरं म्हणजे उपचार असतात. नगरच्या संघाला मात्र यंदा भेंडे (ता. नेवासे) इथं जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या शिबिराचा निश्चित फायदा झाला. रणवीर स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्यानं झालेल्या ह्या शिबिराचे ‘द्रोणाचार्य’ होते प्रशिक्षक सतीश मोरकर. त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्स प्रोफाईलवर सहज दिसतं - ‘श्वास कबड्डी - ध्यास कबड्डी - खेळ कबड्डी’!

भेंड्याच्या कबड्डी, कुस्ती आणि ॲथलेटिक्स ह्या खेळांचं प्रशिक्षण रणवीर क्लबमध्ये दिलं जातं. कबड्डी संघाचं शिबिर आम्ही घेतो, असं मोरकर ह्यांनी आग्रहानं सांगितलं. ह्याच क्लबच्या शंकर गदई, राहुल धनवडे, राम आडागळे, राहुल खाटिक ह्यांची नगरच्या संघात निवड झाली होती.


भेंड्यांमधील सराव शिबिरामुळं संघबांधणी भक्कम झाली.

आठ दिवसांच्या शिबिरात प्रामुख्याने फिटनेस व कौशल्ये गिरवणे ह्यांवर भर दिला होता, असं मोरकर ह्यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘दिवसातल्या दोन वेळांचं तंदुरुस्तीचं वेळापत्रक तयार केलं होतं. सकाळच्या सत्रात धावणे, वेट ट्रेनिंग ह्यासह कोन प्रॅक्टिस, शिडी प्रॅक्टिस होती. संध्याकाळी प्रत्यक्ष खेळातील कौशल्यांचा सराव केला जायचा. त्यात चढाई, कव्हर ह्यावर भर दिला.’’

शिबिरामुळं संघबांधणी


सराव शिबिराची जबाबदारी
घेणारे सतीश मोरकर
खेळाडूंचा दमसास वाढला पाहिजे, हालचाली सहजपणे व लवचीक व्हायला हव्यात, कव्हर कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे ह्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्यासाठी एक पूर्ण दिवस जिम, एक दिवस लांब पल्ल्याचे पळणे, एक दिवस स्प्रिंट मारणे याचाही सराव करून घेण्यात आल्याचं मोरकर म्हणाले. खेळाडू एकदम तरबेज, पण त्याच्यात स्पर्धात्मक खेळण्याचा आत्मविश्वासच नसेल तर? त्यांचा आत्मविश्वास बळकट होईल, ह्याकडेही शिबिरात विशेष लक्ष देण्यात आलं. सकाळी पौष्टिक नाश्ता, दोन्ही वेळा व्यवस्थित जेवण होतं. दर दिवसाआड मांसाहार होता. ह्या शिबिरामुळं संघबांधणी उत्तम झाली, असं मोरकर ह्यांनी सांगितलं.

नगर जिल्हा कबड्डी संघटनेचं मुख्यालय श्रीरामपूरला होतं. ते नगरला आणण्याचा निर्णय कबड्डी महर्षी बुवा साळवी ह्यांनी घेतला. त्याची पहिली बातमी त्यांनी मला दिली होती. त्या गोष्टीला यंदा तीन दशकं झाली. ह्या काळात पुरुष-महिला, कुमार-कुमारी व किशोर-किशोरी ह्या गटांच्या आठ ते दहा राज्य स्पर्धांचं आयोजन नगरमध्ये झालं. ह्या संघटनेवर बुवांचं विशेष प्रेम होतं. बहुतेक सर्व स्पर्धांना ते पूर्ण काळ हजर असत. बुवा असते, तर नगरकरांच्या ह्या यशावर मनापासून खूश झाले असते, ह्यात शंकाच नाही.

............

‘एक जिवानं खेळलो म्हणून जिंकलो!’


छोट्या भावासह शंकर गदई

ह्या सगळ्या यशामागचं गणित संघाचा कर्णधार शंकर गदई अगदी सहजपणे त्याच्या ग्रामीण शैलीत सांगतो. तो म्हणाला, ‘‘आम्ही सगळे एक जिवानं राहायचो-खायचो, एक जिवानं खेळलो. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. सगळे एक जिवाचे! कर्णधार म्हणून माझं सगळे ऐकायचे. सामना संपल्यावर राहण्याच्या ठिकाणी आमची चर्चा व्हायची - आज काय चुकलं, उद्या कसं खेळायचं! प्रशिक्षक पांडवर सर, व्यवस्थापक मोरकर सर काय चुकलं - काय बरोबर, ते समजावून सांगायचे.’’

‘‘पूर्ण स्पर्धेचं म्हणून काही आमचं नियोजन नव्हतं. आजचा सामना मारायचा, एवढंच आमचं ठरलेलं असायचं. उद्याचं उद्या. एक एक सामना जिंकायचा, हेच आमचं टार्गेट होतं. मुंबई उपनगरविरुद्ध सेमीफायनल होती. मोरकर आणि पांडव सरांनी मोठा आत्मविश्वास दिला - तुम्ही जिंकू शकता. आम्ही ठरवलं की ते खेळाडू आणि आपणही. त्यांच्यात नि आपल्यात वेगळं काही नाही. एवढा सामना जिंकायचाच, असा जबरी कॉन्फिडन्स होता आमच्यामध्ये,’’ शंकर म्हणाला.

टर्निंग पॉइंट

अंतिम लढतीतील एक टर्निंग पॉइंटबद्दल शंकर तपशिलानं बोलला. ‘‘मॅचची सुरुवात चांगली झाली. पण नंतर आमच्यावर आठचं लीड बसलं. सगळ्या मुलांची तोंडं बारीक झालं. मी म्हणालो, ’टेन्शन घेऊ नका रे. शेवटच्या दोन-तीन मिनिटांत मॅच रिकव्हर करू.’ कॅप्टन असं म्हणतो म्हटल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढला. वेळ संपत आली होती. आम्ही दोघंच आत होतो - एक कव्हर आणि मी रेडर. पाच गुणांनी मागं होतो आम्ही. मग मी ‘टाईम आऊट’ घेतला. सरांना म्हणालो, एक चेंज करू. आदित्य शिंदे आत आला. त्याचा खेळ मुंबईला माहीत नव्हता. त्याने एक बोनस आणला. मग एक पकड केली. अशा पद्धतीने बरोबरी साधली. तो होता टर्निंग पॉइंट. पाच-पाच चढायांमध्येही तेच झालं. आता ‘गोल्डन रेड’ची वेळ आली.’’

‘अशी मॅच झाली नाही,’ असं सांगताना शंकरच्या आवाजातला थरार लपत नाही. निर्णायक चढाईबद्दल तो म्हणाला, ‘‘टॉस जिंकला. नशीब भारी. मीच रेड मारली. मुलं सांगत होती अशी मार तशी मार. माझा कॉन्फिडन्स होता. समोरची टीम हबकलेली होती. मी बोनस टाकणार नाही, असं त्यांना वाटत होत. रेड टाकायला गेला आणि लगेच बोनस मारून मध्य रेषेजवळ रेंगाळत राहिलो. कोणाला वाटत नव्हतं नगरची ही टीम फायनल मारील म्हणून!’’

खरं खेळत होतो आम्ही

‘‘स्पर्धा मातीवर झाली, ते आमच्या फायद्याचंच ठरलं. मॅटचा आणि आमचा संपर्कच नाही आलेला. आम्हाला भरपूर लोकांची साथ मिळाली. आम्ही जिंकावं असं खूप जणांना वाटत होतं. कारण खरं खेळत होतो आम्ही. कव्हरसेट एक जिवाचा. आम्ही कुणी सिलेक्शनसाठी नाही, तर टीम म्हणून खेळलो. तसं नसतं तर आम्ही आधीच हरलो असतो,’’ असंही शंकर म्हणाला.

....

जबरदस्त टीम स्पिरीट

नगरच्या संघाचं यश पाहायला आणि नंतर ह्या मुलांचं कौतुक करायला अर्जुन पुरस्कारविजेता पंकज शिरसाट त्या रात्री भिवंडीत होता. तो म्हणाला, ‘‘मस्तच झाला सामना. मुंबई उपनगरविरुद्धचा सामना लॅपटॉपवर पाहिला. पोरं जिंकली. मग म्हणालो की, आता फायनल थेट पाहायला पाहिजे. आपली मुलं खूप शांतपणे खेळली. मैदानावरचा त्यांचा वावर मॅच्युअर होता. सुरुवात एकदम चांगली. त्याच्यानंतर जवळपास दहा मिनिटं आपल्याला पॉइंटच नव्हता. मुलं हताश दिसत होती. मला वाटलं, एक गुण मिळाला की, त्यांच्यात उत्साह संचारेल. आपण पुन्हा मॅचमध्ये येऊ. तसंच झालं. एक बदल केला आणि पुढं निकालच बदलला. ही पोरं मोठ्या चुका करतील, असं पूर्ण सामन्यात कधीच वाटलं नाही. मैदानावर एकमेकांवर ओरडणं नाही, भांडणं नाहीत. ही संघभावना आवडली आपल्याला!’’

इस्लामपूरच्या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या संघाचं नेतृत्व पंकजने केलं. तो संघ आणि हा संघ ह्यांची तुलना करता येईल? पंकज म्हणाला, ‘‘दोन्ही टीममध्ये भरपूर गुणवत्ता आहे. त्या वेळी एक-दोन चुका झाल्या आमच्या. आताच्या संघात राइडर भरपूर आहेत - स्वतः शंकर, खाटिक, देविदास, झावरे, शिंदे. आमच्या टीममध्ये मला पर्याय नव्हता त्या वेळी. ते जाऊ द्या... ही मुलं खूप चांगलं खेळली. टीम म्हणून खेळ झाला. कुणा एका खेळाडूनं जिंकून दिलं नाही. कॅप्टन छान. बाकीची मुलंही छान. वय कमी आहे. खेळायला मिळेल आणि अजून चांगलं खेळतील, एवढं नक्की.’’

-------------

#kabaddi #Nagar #kabaddi_state_championship #maharashtra #maharashtra_kabaddi #pankaj_shirsat #shankar_gadai #kabaddiproleague #Bhivandi #Mumbai #team_spirit

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

मोबाईलविना...

मोबाईल रुळला नव्हता, तर आपले पाश पसरू पाहत होता, तेव्हाची ही गोष्ट. तो बाळगणाऱ्याकडे थोडं हेव्यानंच पाहिलं जायचं. आमच्या गरीब बिचाऱ्या मराठवाड्यातल्या वार्ताहरांची सोय व्हावी म्हणून २००६मध्ये मोबाईल माझ्या वाट्याला आला. ते बातमीदार सगळे आठ जिल्ह्यांमध्ये विखुरलेले आणि त्यांच्या बातम्यांना ‘न्याय देणारा’ (किंवा वाट लावणारा!) मी पुण्यात. संवादाचा-संज्ञापनाचा धंदा असलेल्या ठिकाणीच विसंवाद नको म्हणून ही व्यवस्था केली होती. त्याचा फायदा होऊन मी मोबाईलधारी झालो. अगदी साडेतीन टक्क्यांत नाही, पण साडेतीस टक्क्यांमध्ये तरी नक्कीच आलो.

‘नोकिया’चा सुबक-ठेंगणा हँडसेट आणि एअर-टेलचं कार्ड. मला बापुड्याला तो चालू कसा करायचा नि बंद कसा करायचा हेही माहीत नव्हतं. एका चटपटीत (माझ्याहून) तरुण सहकाऱ्यानं ते शिकवलं. कार्यालयानं दोन-तीन महिन्यांतच आधीची एअर-टेलची ‘आयडिया’ बाद ठरवून नव्या सेवेची ‘कल्पना’ आपलीशी केली. सांगायचा मुद्दा असा की, कार्यालयामुळं माझ्या हाती मोबाईल आला. तसा मिळाला नसता, तर मी तो कधी घेतला असता, हे सांगता येत नाही. मित्रांनी आग्रह केला असता आणि घरचे मागे लागले असते, तेव्हा कुठं मी त्याला तयार झालो असतो. अगदीच नाइलाज झाला म्हणून...

कार्यालयीन कामाच्या सोयीसाठी दिलेला हा सेलफोन फारच काळजीपूर्वक वापरत होतो. आलेले फोन स्वीकारण्यापुरताच त्याचा वापर. अगदी अत्यावश्यक असेल, तरच त्यावरून संपर्क साधायचा. पहिली तीन वर्षं तर मी त्यावरून घरीही संपर्क साधत नसे. खासगी कामासाठी तर वापर नाहीच. एस. एम. एस.साठी मात्र भरपूर. खूप वेळा असं होई की, फोनकॉलपेक्षा एस. एम. एस.चं बिल (थोडंसं) जास्त असे. तीन-चार दिवसांपेक्षा जास्त रजेवर जायचं असलं की, मी तो बंद करून संपादकांच्या ताब्यात देऊन टाकायचो. एखादी फार मोलाची वस्तू जपून ठेवायला द्यावी अगदी तसं. ते हसायचे. सहकारी विनायक लिमयेही हसायचा. फोन राहू दे की, असं ते म्हणायचे. पण मला ते उगीचंच बंधन वाटायचं.

... हे सगळं लिहायचं कारण म्हणजे माझे दोन दिवस, तब्बल ४८ - अ ठ्ठे चा ळी स - तास मोबाईलविना गेले. परवा दिवशी दुपारी जेवण करून ताणून दिली. उशाजवळ मोबाईल होता, गाणी ऐकवत. एखादं गाणं मध्येच ऐकू यायचं. अर्धजागृत अवस्थेतलं मन त्याची नोंद घ्यायचं. असं तासभर चाललं. त्यानंतर कधी तरी मोबाईलच बॅटरी संपून गेली.

झोपेतून उठल्यावर पाहिलं, तर मोबाईल बंद. तो रिचार्ज करायला सुरुवात केली. सहज पाहिलं तर ‘नो सिम’ अशी सूचना येत होती. काळजात काही धस्स वगैरे झालं नाही. दहा-एक दिवसांपूर्वी असंच झालं होतं. हृदयातल्या सिमकार्डचं अस्तित्व स्मार्टफोन नाकारत होता. अशा वेळी डोकं लावत बसत नाही. मुलाला सांगतो. त्यानं त्या दिवशी सिमकार्ड बाहेर काढलं, थोडं साफ केलं. आतमध्ये फुंकलं (कृपया नोंद घ्यावी - ‘फुं’ म्हटलेलं आहे; ‘थुं’ नाही!) आणि परत कार्ड घातलं. फोन पहिल्यासारखा चालू लागला.

आताही असंच झालं असेल म्हणून पुन्हा त्याला सांगितलं - ‘नो सिम’ दिसतंय रे. मागच्या प्रयोगाची पुनरावृत्ती झाली. पण ह्या वेळी त्या प्रयोगांना मोबाईलनं दाद दिली नाही. बिघाडाचा बहुतेक नवा, प्रगत व्हेरिएंट असावा. आधीच्या उपायांना भिक न घालणारा.

मग शंका आली. फोनच बिघडलाय की काय! धस्स झालं. जेमतेम वर्षभराचं वय त्या फोनचं. एवढ्यात त्याला ऑक्सिजन कमी पडू लागला? व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली पण?

मुलानं दिलासा दिला. असा धीर सोडू नका म्हणाला.

सिमकार्डाची चाचणी करायची ठरवलं. मुलाच्या फोनमध्ये कार्ड टाकलं. तिथं तीच तऱ्हा. त्याचं कार्ड माझ्या मोबाईलमध्ये टाकलं. ते चालू.

म्हणजे बिघाड कार्डमध्ये आहे, मोबाईलमध्ये नाही. धस्सची जागा हुश्शनं घेतली. सिमकार्ड बदलणं हाच उपाय. तुलनेनं कमी खर्च.

पण ते लगेच शक्य नव्हतं. शनिवारची दुपार होती. भारत संचार निगमचं कार्यालय बंद होण्याची वेळ जवळजवळ आलीच होती. रविवारची सुटी. म्हणजे नवीन कार्ड थेट सोमवारी मिळणार.

मोबाईल दोन दिवस बंद. पण ते अर्धसत्य होतं. कार्ड नव्हतं तरी व्हॉट्सॲप चालूच होतं. घरच्या ब्रॉडबँडचा झरा सदाचाच झुळझुळता. म्हणजे फार काही अडणार नव्हतं. अगदी तातडीनं कुणाशी संपर्क साधायचा तर ‘व्हॉट्सॲप कॉल’ करता येणार होता. त्या विद्यापीठावरून ज्ञानाची देवाणघेवाण चालूच होती. शिवाय घरबशा फोन (लँडलाईन) होताच की शेवटी.

पण समजा कुणाचं तातडीचं काम असलं तर? (हा आपला एक गैरसमज.) फोन बंद असल्याचं लक्षात आल्यावर त्याला काही शंका-कुशंका आल्या तर? त्यावर उपाय शोधला. सद्यस्थिती अद्यतन. म्हणजे स्टेट्स अपडेट. ‘सिमकार्ड खराब झालंय. काही काम असेल, तर कृपया व्हॉट्सॲपवर संपर्क साधावा.’ स्टेट्स अपडेट केलं आणि तासाभरात ते २५ जणांनी पाहिलं. म्हटलं चला, आता दोन-तीन तरी फोन येतील. असं कसं झालं, काळजी घ्या वगैरे सांगणारे.

तसं काहीच झालं नाही. कुणाचाही फोन आला नाही. मोबाईलवाचून माझं कसं चालेल, असं एकालाही विचारावंसं वाटलं नाही. कुणालाही सांत्वन करावं वाटलं नाही. म्हटलं चला, आपल्या नशिबीचं दुःख आपणच भोगलं पाहिजे.

फायबर कनेक्शनच्या कृपेनं घरात काही अडचण नव्हतीच. प्रश्न बाहेर पडल्यावरचा होता. म्हटलं चालायला गेल्यावर डाटा वापरू. होऊ दे दोन-तीन तासांत खर्च. फोन करायचा असेल, ते व्हॉट्सॲपवर बोलतील, असं वाटलं. तो विचार वेडगळपणाचा होता, हे घराबाहेर पडल्यावर लक्षात आलं. सिमकार्ड चालूच नसताना डाटा कुठून येणार होता! आडच नसताना पोहोरा कुठं टाकणार?

तास-दीड तास पायी चालताना दोन-तीन वेळा तरी फोन पाहिला जातो. त्याचं मुख्य कारण म्हणजे किती पावलं झालीत आणि किती राहिलीत, हा हिशेब करायचा असतो. रोजचं दहा हजार पावलांचं लक्ष्य आहे. (दि. बा. मोकाशी ह्यांचं ‘अठरा लक्ष पावलं’ असं पुस्तक आहे. तेवढं लक्ष्य सहा महिन्यांमध्ये पुरं होत असेल बुवा.) क्वचित कधी एकटा चालत असेन, तर डाटा चालू करून ‘विद्यापीठा’त काही नवीन (फॉरवर्डेड) परिपत्रकं पडलीत का, तेवढं पाहतो. कुणाचा फोन आलाच तर बोलतो.

फिरताना गप्पा मारायला जोडीदार असल्यानं फोन चालू नसल्याचं काही जाणवलं नाही. रात्रीही सहसा कुणी फोन करत नाही. बेरात्री झोपून बेसकाळी कधी तरी उठल्यावर पहिली झडप फोनवर मारायची, असला अगोचर प्रकार आपल्याकडून होत नाही. बऱ्याच वेळा जाग येते तीच मुळी फोन वाजत असल्यामुळे. रविवारी सकाळी ती शक्यता नसल्याने अंमळ उशिराच उठलो.

खूप वेळ झाला, तरी फोन वाजला नाही; कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन रमी खेळण्यासाठी बोनस देऊ करणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या एस. एम. एस.चा आवाज आला नाही. बँकेतली आहे तीच जमा दर दोन दिवसांनी सांगणाऱ्याही एस. एम. एस.चं क्रेडिट नाही. थोडं चुकल्या चुकल्यासारखं झालं. स्टेट्स अपडेटकडे पाहिलं, तर ते पाहणाऱ्यांची संख्या चांगल्यापैकी वाढलेली होती. पण सगळ्यांनीच त्यावर साधी प्रतिक्रियाही देणं टाळलेलं.

मोबाईल-विरह अजून दीड दिवस सहन करावा लागणार, हे माहीत होतंच. तेवढ्यात चेतन भगत ह्यांचा लेख वाचण्यात आला. ‘तुम्ही तुमचा स्क्रीन-टाईम कमी करताय ना?’ असं विचारणारा. लेखकमहोदय रोजचे पाच तास मोबाईल पाहण्यात घालवतात. तशी कबुली त्यांनीच दिली. मग आठवलं की, आपल्यालाही आठवड्याला अहवाल येतो. कधी वेळ वाढल्याचं दाखवणारी, तर क्वचित कधी आधीच्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचं सांगणारी. त्याची फार काळजी नाही करत. कारण त्यातला बराचसा वेळ मोबाईल इंटरनेट रेडिओवरची गाणीच ऐकवत असतो.

चेतन भगत ह्यांच्या लेखावरून एक गोष्ट आठवली - एका अमेरिकी कंपनीनं तीन वर्षांपूर्वी आयोजित केलेली स्पर्धा. मोठ्या बक्षिसाची. एक लाख डॉलरचं बक्षीस. स्पर्धा होती वर्षभर मोबाईलपासून लांब राहण्याची. त्यात भाग घेण्याची तयारी किमान दहा हजार लोकांनी दाखवली होती. किती जण स्पर्धेत उतरले, किती टिकले आणि कोण जिंकलं, हे काही नंतर पाहिलं नाही. फक्त त्यावर लेख लिहिला होता. अशा स्पर्धेत भाग घेऊन स्वतःला तपासावं असं तेव्हा वाटलं होतं. पण ‘व्हिटॅमिन वॉटर’ची ही ‘व्हिटॅमिन वॉटर स्क्रोल फ्री फॉर ए यीअर कॉन्टेस्ट’ फक्त अमेरिकी नागरिकांसाठीच होती.

मोबाईलला आधुनिक जगातली (स्मार्ट) सोय म्हटलं जातं खरं. पण वास्तव वेगळंच आहे. खूप जणांना आता त्याची लत लागल्यासारखी झाली आहे. व्यसन. न सुटणारं. सोडण्याचा प्रयत्न केला की, अजून घट्ट पकडून ठेवणारं.

सिमकार्ड बिघडल्याच्या निमित्तानं आपलंही व्यसन किती हाताबाहेर गेलंय किंवा अजून आटोक्यात आहे, ह्याचा अंदाज येईल म्हटलं. तसं तर दर अर्ध्या-पाऊण तासानं व्हॉट्सॲप उघडून पाहायचा चाळा लागलेलाच आहे. कुणाचा फोन आला नाही, तरी आपण कुणाला तरी लावतो.


‘नोमोफो’नं आपल्याला कितपत ग्रासलंय, ह्याचं उत्तर मिळेल असं वाटलं. नोमोफो - नो मोबाईल फोबिया. मोबाईलपासून आपण लांब आहोत म्हणजे जगापासून तुटलो आहोत, असा वाटणारा गंड. असा काही गंड नाही, असा अहंगंड वाटत होता. तो दूर होऊन न्यूनगंड येण्याची भीती होती.

कोणतंही व्यसन सोडताना मधला काळ फार खडतर जातो म्हणे. त्याला ‘विड्रॉअल सिम्प्टम्स’ म्हणतात. मोबाईल जवळ नसतो, त्याची कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसते तेव्हा जाणवणारी लक्षणे अशी - राग, तणाव, नैराश्य, चिडचिड आणि अस्वस्थता.

ह्यातलं एकही लक्षण रविवारी लक्षणीयरीत्या जाणवलं नाही, हे प्रामाणिकपणे सांगतो. अधूनमधून वाजणारा फोन एकदाही वाजत नव्हता. त्यामुळे क्वचित थोडं अस्वस्थ वाटलं खरं. पण आपलाच मोबाईल बंद आहे, हे पटवून घेतल्यानं ती अस्वस्थता संपली. न राहवून दोघा-तिघांना व्हॉट्सॲप कॉल केले. दोघांनी नंतर बोलू सांगितलं, तर दोघांनी फोनच उचलला नाही. 

‘फोन बंद का?’ असं काळजीनं विचारणारे मेसेजही व्हॉट्सॲपवर दिसले नाहीत. मनाची समजूत घातली - आज रविवार असल्याने सगळे निवांत असतील. फोन बाजूला ठेवून आराम करत असतील. एका मित्राचा रात्री उशिरा मेसेज आला तसा. त्याला मग घरच्या फोनवरून सांगितलं सगळं. गप्पा मारल्या थोडा वेळ; पण सिमकार्ड कसं बंद पडलं वगैरेबद्दल त्यानं काडीचीही उत्सुकता दाखविली नाही. म्हटलं चला - बंद सिमकार्डाचा क्रूस प्रत्येकाला आपापलाच वाहून न्यावा लागतो तर.

फोन बंद असताना जगात उलथापालथ झाली तर काय, अशी शंकाही एकदा चाटून गेली. सुदैवानंच तसं काही झालं नाही. जग आपल्या गतीनं पुढं जात राहिलं.

अखेर सोमवार उजाडला. भीती वाटत होती की, सिमकार्ड बदलायला गेल्यावर भारत संचार निगमवाले काही तरी त्रुटी काढून परत पाठवतील. दोन दिवसांना या म्हणतील. तसं काही झालं नाही. गेल्यावर अर्ध्या तासात कार्ड बदलून मिळालं. दुपारचा झोपेचा रतीब संपल्यावर नवं कार्ड टाकलं. फोन चालू झाला. अठ्ठेचाळीस तासानंतर मी जगाशी पुन्हा जोडलो गेलो.

... पण जगाला त्याची काही खबरबातच नव्हती. फोन चालू होऊन तीन तास लोटले, तरी मला कुणाचाही फोन आला नाही!

एक झालं - सिमकार्ड आणण्याच्या निमित्तानं आज थोडा अधिकच ‘मोबाईल’ झालो. त्या कार्यालयात जाऊन-येऊन तीन हजार पावलं चाललो.

कुणी फोन करो किंवा न करो; फोन चालू आहे, म्हणजे मी जगाशी जोडला गेलेलो आहे, हा माझा (गैर)समज कायम आहे, एवढं नक्की!

......

‘लखपती बनविणारी स्मार्टफोन-मुक्ती’ - 

https://khidaki.blogspot.com/2019/01/SmartPhone.html

--------
#nomopho #mobile #smartphone #no_sim #withdrawal_symptoms #whatsapp #without_mobile

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

श्रेय नको म्हणताना...


‘एकविसावं शतक’...‘एकविसावं शतक’! कोणे एके काळी म्हणता येईल, एवढ्या पूर्वी हा फार चर्चेतला विषय होता. ते उजाडेल आणि अनेक समस्यांना गडप करील, असं वाटायचं. आमच्या पिढीला (पन्नास ते पासष्ट वयोगट) एकविसाव्या शतकाचं स्वाभाविकच फार अप्रुप होतं. त्याची चर्चा सुरू झाली ती ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि त्या चर्चेनं, ‘एकविसावं शतक’ ह्या शब्दप्रयोगानं खूप स्वप्नं दाखवली. म्हणून आमच्यासह आपला देश ते कधी एकदा येतंय, ह्याची वाट पाहत होता.

बराच काळ, जवळपास दीड दशक गाजावाजा होत राहिलेलं एकविसावं शतक उजाडलं आणि त्याची दोन दशकंही पार पडली. आपल्याला हवं ते नेमंक गाणं ऐकण्यासाठी एखादी कॅसेट ‘फास्ट फॉरवर्ड’ करावी तसा हा वीस-बावीस वर्षांचा काळ गेला, असं आता वाटतं. त्या शब्दप्रयोगाचं गारूड असलेली माणसंही जुनी झाली. उठता-बसता ‘आमच्या वेळी...’ म्हणतील एवढ्या वयाची झाली.

आता असं वाटतं की, एकूणच हे शतक ‘फास्ट फॉरवर्ड’ आहे. किंवा ‘टू मिनट’सारखं इन्स्टंट, झटपट आहे. त्यात गेल्या साधारण दहा वर्षांपासून ‘फॉरवर्ड’ हा फारच महत्त्वाचा शब्द बनला आहे. व्हॉट्सॲपनं आपल्या आयुष्याचा ताबा घेतल्यापासून. (किंवा आपण त्याला ताबा घेऊ दिल्यापासून, असं म्हणू या हवं तर.) ह्या ‘फॉरवर्ड’चा आचार-विचारातील पुरोगामीपणाशी फारसा संबंध नाही. त्याचं नातं आहे पुढे पाठविण्याशी. रोज हजारो शब्दांचा मजकूर, छायाचित्रं, ध्वनिचित्रफिती पुढाळल्या जातात. आल्या तशा पुढे ढकलल्या जातात. उत्साहाने, ईर्ष्येने. त्यामागचे इरादे नेक असतात नि फेकही असतात.

व्हॉट्सॲपच्या थोडंसंच आधी फेसबुकनं चमत्कार घडवला होता. त्या माध्यमामुळं अनेकांना व्यक्त होण्याची संधी मिळाली. नवे लेखक उजेडात आले. वेगळ्या पद्धतीचं लिहू लागले. स्मार्ट फोनमुळं फेसबुक-व्हॉट्सॲप अशी युती घडली. त्यातून ‘शेअरिगं’-‘फॉरवर्डिंग’ चालू झालं. कुणी तरी लिहिलेलं दुसराच कुणी तरी तिसऱ्याच्या नावानं पुढं पाठवू लागला. ‘माझी पोस्ट ढापली’, ‘माझी कविता चोरली’ अशी ओरड होऊ लागली. हेही वाङ्मयचौर्यच की. काही वेळा ही ढापाढापी स्वार्थासाठीच असते असंही नाही. काही वेळा त्यात ‘शहाणे करूनि सोडावे सकल जन’ असा अविर्भावही असतो.

कृष्णाजी नारायण आठल्ये ह्यांची कविता आहे. ‘प्रमाणामध्ये सर्व काही असावे...’ असा हितोपदेश करणारी ही कविता. ‘ही वीस कडवी म्हणजे वीस रत्नं आहेत,’ अशी मल्लिनाथी करीत ती गेल्या काही वर्षांपासून सर्रास समर्थ रामदासांच्या नावे खपवली जाताना आढळते. ‘पाचशे रुपयाची नोट’ असा उल्लेख असलेली कविता बा. भ. बोरकरांची असं छातीठोकपणे सांगितलं गेलं. एका ज्येष्ठ व उत्तम वाचक असलेल्या डॉक्टरांकडून ही कविता मला आली, तेव्हा बराच शोध घेतला. बोरकर कविता लिहीत होते, तेव्हा पाचशे रुपयाची नोटच मुळी नव्हती. मग त्यांच्या कवितांचा अभ्यास असलेल्या काहींनी निर्वाळा दिला की, ही बोरकरांची कविता नव्हेच. अगदी अलीकडचंच उदाहरण म्हणजे सुभाष अवचटांचं नोव्हेंबरमधलं लेखन डॉ. अनिल अवचट ह्यांचं आहे, असं म्हणत 'य' वेळा फिरत राहिलं.

हे झालं मोठ्या माणसांचं. त्यात असं मानता येईल की, नेमका कवी वा लेखक माहीत नसल्याने आणि शैली थोडी-फार ओळखीची वाटल्यानं श्रेय देण्यात चुका होतात. पण सर्वसामान्य माणसांचं लेखन अगदी सहजपणे ढापलं जातं. जणू आपणच ते लिहिलं, असं भासवलं जातं. फेसबुकवरचा एक किस्सा आठवतो. सात-आठ वर्षांपूर्वी एकाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारली आणि थोड्या वेळात पाहतो, तर मी लिहिलेली टिपणं त्यानं सरळ स्वतःची म्हणून टाकलेली! मध्यंतरी तर खवय्यांच्या एका गटात पाककृती चोरून तशाच दुसऱ्या गटात आपल्या नावावर खपविल्याची तक्रार झाली.

‘या लेखनावर माझा कॉपीराईट आहे’, ‘माझी पोस्ट माझ्या नावासकट शेअर करण्यास हरकत नाही’, अशा वैधानिक इशारांसह लोक लिहू लागले. स्वामित्वहक्क दाखविणाऱ्या © चिन्हाचा सर्वाधिक वापर ह्याच दशकामध्ये झाला असावा. तरीही मजकुराची ढापाढापी थांबलेली नाही. 

हे सगळं लिहिण्याचं कारण एकदम छोटं आहे. ‘भाषा आणि जीवन’चा उन्हाळा-पावसाळा २०२०चा अंक कसा कोण जाणे, ह्या आठवड्यात माझ्याकडे आला. त्यात नेहा सिंह ह्यांच्या हिंदी कथेचा अनुवाद ‘असं समजा की’ ह्या  शीर्षकानं प्रसिद्ध झाला आहे. तो केला आहे नांदेडच्या पृथ्वीराज तौर ह्यांनी.

जेमतेम दीड-दोनशे शब्दांच्या ह्या कथेनंतर अनुवादकाने दिलेली टीप फारच वेगळी आणि बेलगाम ‘फॉरवर्ड’च्या आजच्या जमान्यात महत्त्वाची आहे. पृथ्वीराज तौर लिहितात - ‘(ह्या कथेच्या) मराठी अनुवादाचे हक्क मुक्त असून, हा अनुवाद कुणालाही, कशासाठीही, अनुवादकाचे नाव वगळूनही वापरता येईल. हा अनुवाद कुणी स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केला तरी प्रस्तुत अनुवादक त्यावर कधीही आक्षेप घेणार नाही. मराठी मुलांपर्यंत जगभरातील उत्तमोत्तम गोष्टी पोहोचाव्यात, मुलांना श्रेष्ठ जागतिक बालसाहित्याचा परिचय व्हावा, एवढीच या अनुवादामागील भूमिका आहे.’

श्रेय लाटण्याच्या, दुसऱ्याच्या लेखनावर बिनदिक्कत स्वनाममुद्रा उमटविण्याच्या आजच्या जमान्यात कुणी एक श्रेयापासून दूर जाऊ पाहतो. आपण केलेला अनुवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, एवढंच त्याचं म्हणणं.

ह्यावर अधिक काय बोलावे!

.............

#एकविसावेशतक #फास्टफॉरवर्ड #अनुवाद #भाषाआणिजीवन #बालसाहित्य #ढापाढापी #फॉरवर्डिंग #सामाजिकमाध्यमे #WhatsApp #facebook #copyright


शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

ए. आय. आणि आय. आय. : पेन ते वांगे

 


फेसबुकवर बऱ्यापैकी नियमित छोटं-मोठं लिहितोय सध्या. आता अगदी दोन दिवसांपूर्वी हस्ताक्षरदिनाचं निमित्त साधून लिहिलं. त्यात पेनाचा (म्हणजे तो नसल्याचा) उल्लेख केला. ह्या पोस्टनंतर एका दिवसांतच मला पेनांच्या जाहिराती दिसू लागल्या. त्याच्या किमतीही हजारांपासून लाखापर्यंत. 'लाखाची ऐपत असती, तर फुकाची पोस्ट कशाला टाकली असती?', असं त्यावर लिहिलं. त्यावर (फेसबुक) मित्रांनी हसून घेतलं. (गरिबावर काय कुणी हसतं... आणि त्यातही पेन नसल्यानं लिहू न शकणाऱ्यावर तर खदाखदा!)

त्याच्या आधी मंडईबद्दल लिहिलं होतं. त्याचा विषय खरं तर वेगळाच होतो. नेहमीप्रमाणेच भरकटायला झालं. नमनाला धडाभर तेल नेहमीच जातं आपलं. (त्याचं ताजं उदाहरण म्हणजे हेच की!) चिकू घ्यायला लावणाऱ्या आणि तलाठी असूनही पैसे न खाणाऱ्या मुलाचा अभिमान बाळगणाऱ्या मावशी. त्यानंतर 'तलाठी परीक्षेत हमखास यश', 'घोलवडचे चिकू' किंवा 'घरपोहोच भाजी' अशी काही जाहिरात दिसली नाही. का बुवा दिसली नसावी? फेसबुकच्या 'अल्गोरिदम'मध्ये ते नसणार बहुतेक.

मंडईचा विषय निघाला आणि वांग्याला टाळून गेलो, असं कधी होणारच नाही. 'भाजीत भाजी वांग्याची...' असा उखाणा घेतल्याचं आठवत नाही बुवा. पण वांगी फाssर प्रिय आहेत! त्याच्यावर लिहिलेला मोठ्ठा लेख ह. मो. मराठे ह्यांनाही आवडला होता. ('वांग्यावर कधी एवढा मोठा खुसखुशीत लेख लिहिता येईल, ह्याची कल्पनाही केली नव्हती,' असं काहीसं त्यांनी 'शब्दसंवाद'चा परिचय करून देताना लिहिलं होतं. त्या पुस्तकाबद्दल लिहिलेल्या लेखाचा दुवा शेवटी दिला आहे.) विषय वांग्याचा आहे. चतुर्मासात वर्ज्य मानली गेलेली वांगी आता बारोमास मिळतात. पण त्यांचा खरा हंगाम दिवाळीनंतर मार्च उजाडेपर्यंत. पूर्वीएवढ्या कडकपणे चतुर्मास पाळला जात नसला आणि वांगी सरसकट श्रावण-भाद्रपदात खाल्ली जात असली, तरी एरवी मिळणारी वांगी आणि ह्या हंगामातली वांगी ह्यात फरक असतोच. भावात, दिसण्यात आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चवीत.

यंदा हवामान विचित्रच आहे. थंडी, पाऊस, ढगाळ, वारं, उन्ह... सारखा बदल.  ह्याचा फटका (नेहमीप्रमाणेच) शेतकऱ्यांना बसला. भाजीपाल्याचं पीक त्यात होरपळलं. चार वर्षांत कधी नव्हत्या एवढ्या भाज्या महाग झाल्या. तेही ऐन हिवाळ्यात - त्या मुबलक, ताज्या टवटवीत आणि स्वस्त असण्याच्या काळात.

चंपाषष्ठीला वांगी महाग असणं गृहीत होतं. खंडोबाला बाजरीच्या रोडग्याचा-भरताचा नैवेद्य दाखवल्यावर वांगी स्वस्त होतात. नेहमीप्रमाणेच यंदाही तेच होईल, असं वाटलं. नाही झालं ना. भोगीपर्यंत वांगी चढीच राहिली. भोगीच्या आदल्या दिवशी तर दीडशे रुपये किलो! (खेंगट ही यंदाची सर्वांत महागडी घरगुती डिश असणार.)

ह्याच दरम्यान कधी तरी एका मित्राशी जिव्हाळ्याच्या, म्हणजेच जिव्हालौल्याच्या विषयावर बोलत होतो. भाज्या, त्यांचे वाढते भाव ह्या मुद्द्यावर गाडी आली. भाव चढे असू द्यात हो; पण तेवढे दाम मोजूनही काटेरी, छोटी, तेल ओतल्यासारखी वांगी मिळतच नाही, असं मी तक्रारीच्या सुरात सांगत होतो.

माझ्या म्हणण्याला सहमती दर्शवत मित्र म्हणाला, ''खरंय. मला मात्र एक वांगेवाला भेटला. तो एकदम मस्त वांगी देतो. भाव तुमच्या नगरएवढाच. पण एक वांगं किडकं निघणार नाही.'' त्याच्या ह्या वांगे-भाग्याबद्दल स्वाभाविकच थोडी असूया वाटली. त्याला हवी तशी वांगी सहज देणारा हा शेतकरी ऐन कोविडच्या काळात औषधाचं दुकान सोडून शेतीकडे वळलेला. दुकान मुलाकडे सोपवलं आणि त्यानं आपल्या छंदाकडं लक्ष द्यायला सुरुवात केली.

आमच्या बोलण्याला बरेच दिवस होऊन गेले. चंपाषष्ठीनंतरचं बोलणं ते. त्या मित्राचा आज भल्या सकाळी फोन आला. नव्या दिवसाला सामोरं जाण्यासाठी मी काही सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत तयार झालेलो नसतो. नुकताच उठून आज काय करायचं (आणि त्यातलं काय टाळायचं.), ह्याची आखणी करण्याचा विचार करत असतो. एवढ्या सकाळी गप्पा मारण्याची मनाची तयारी नसती. ह्या मित्राला काही तरी राजकीय विषय सांगायचा असेल, काही तरी गंमत सांगायची असेल, अमूक एक बातमी वाचली का असं विचारायचं असेल... अशा वेगवेगळ्या शक्यतांपैकी एखादी किंवा आणखी भलतंच काही असेल, असं समजून फोन वाजू दिला.

सगळं आवरून झाल्यावर त्याला फोन लावला. पलीकडून तो म्हणाला, ''इथून वांगी नगरपर्यंत पाठवली, तर घेऊन जाण्याची सोय कराल का?'' नगरपासून त्याचं गाव साधारण साठ-पासष्ट किलोमीटर. त्याच्या गावचा आज आठवडे बाजार. सकाळी सकाळी बाजारात गेल्यावर त्याला माझ्या मनातली वांगी दिसली. तिथंच थांबून त्यानं फोन लावला. एक-दीड किलो वांगी घेऊन कुणाबरोबर तरी पाठवून देतो. तुम्ही फक्त बसस्थानकावर किंवा एखाद्या महत्त्वाच्या जागी या आणि त्या माणसाकडून ती घेऊन जा, असा त्याचा आग्रह होता.


छायाचित्र सौजन्य : शटरस्टॉक

मला भरूनच आलं हो! उत्तम दर्जाची वांगी एका खवय्याला पाठविण्याची बुद्धी त्याला कोण देत होतं कुणास ठाऊक!! त्याच्या उत्साहाला आवर आणि आपलेपणाच्या खळाळत्या झऱ्याला बांध घालत मी नकार दिला. कारण ह्याच आठवड्यात दोन वेळा आवडतात तशी मस्त वांगी मला मिळालेली आहेत.

पेनाच्या जाहिराती दिसतात, असं फेसबुकवर लिहिल्यानंतर एक मित्रानं प्रतिक्रियेत म्हटलं - ही ए. आय.ची (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कमाल.

मनातली वांगी अशी साठ किलोमीटरवरून घरपोहोच येत होती. ही कसली किमया? ही तर आय. आय. ची (इंट्युटिव्ह इंटेलिजन्स) कमाल!!

---------

'शब्दसंवाद'बद्दल लिहिलेला लेख - 'पहिल्यावहिल्याची पहिली गोष्ट'

https://khidaki.blogspot.com/2015/06/blog-post.html

.....

#AI #I_I #intution #vegetables #facebook #brinjal #vegetable_market #facebook_friends #मंडई #भाजी #वांगी

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

निमित्त एका गाण्याचं...


'जल बिन मछली...'मधल्या
एका गाण्यामुळं हे सगळं लिहिलं!

हजारो नव्हे, लाखो गाण्यांचं भांडार असलेली संकेतस्थळे उपलब्ध आहेत. वेळ कसा घालवायचा, असं कुणी विचारलं तर सांगतो, 'ह्या संकेतस्थळांना भेट द्या. शंभर वर्षांचं आयुष्य लाभलं आणि दिवसातले बारा तास निव्वळ गाणी ऐकवण्यात घालवले तरी एक संकेतस्थळही संपणार नाही. आता एवढं ऐकायला उपलब्ध आहे.'

'रोज एवढा वेळ गाणी ऐकून बहिरेपण तेवढं येईल!' जन्मजात औरंगजेब असलेला मित्र त्यावर म्हणाला.

सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. अर्थात गाण्याचाच आहे. एखादं गाणं अचानक मनात आलं, तर ते ऐकण्यासाठी आता वाट पाहावी लागत नाही. चुटकीसरशी शोधून ऐकता येतं. मध्यंतरी अशी आवडती गाणी शोधून ऐकत होतो. काही वेळा तर एकच गाणं सलग पाच-सहा वेळा ऐकत होतो. उदाहरणार्थ - कारवाँ गुज़र गया... (आता हे लिहिल्यावर ऐकावंच लागेल.), ना. घ. देशपांडे ह्यांच्या कविता, तलत महमूद, मन्ना डे, महंमद रफी, मीना कपूर. त्या बाईंची 'कच्ची है उमरिया...' आणि 'रिमझिमी बरसे पानी...' कमीत कमी तीन वेळा ऐकल्याशिवाय पुढं जातंच नाही.

तरीही सांगायचा मुद्दा आणखीनच वेगळा आहे. आणि अर्थात तोही गाण्यांचाच आहे, हे उघडच.

ही झाली माहीत असलेली गाणी. आठवण झाली की, शोधून मुद्दाम ऐकलेली. पण अत्यंत  आवडतं गाणं अनपेक्षितरीत्या ऐकायला मिळण्यात वेगळी मजा असते. त्यानं तृप्त व्हायला होतं. दिवसभर ते गुणगुणलं जातं. कधी कधी ते गाणं मनाच्या सांदीत कुठं तरी दडलेलं असतं. रेडिओवर ऐकायला मिळतं नि लक्षात येतं की, हेही आपलं आवडतं गाणं आहे की. अशीही काही गाणी असतात की, ती आपण पहिल्यांदाच ऐकत असतो आणि तरीही आवडून जातात.

हे सगळं घडतं रेडिओ-कृपेने. स्मरणरंजन किंवा (वय झाल्यावर येणारे) आठवणींचे कढ म्हणून नाही, पण पस्तीस-एक वर्षांपूर्वी रेडिओ सच्चा साथी होता. सी. रामचंद्र ह्यांचं निधन झाल्यानंतर त्यांची बहुतेक गाणी आकाशवाणीच्या इंदूर केंद्रावरच्या 'आपली आवड'सारख्या 'मनभावन' कार्यक्रमात ऐकली. उरलेली गाणी ऑल इंडिया रेडिओवरच्या उर्दू सर्व्हिसवर. मग सी. रामचंद्र लाडके बनले. 'कितना हंसी है मौसम...' पहिल्यांदा ऐकताना तलतच वाटतो.

तेव्हा घरी रेडिओ होता. मध्यम लहरी व लघु लहरींवरची केंद्र ऐकवणारा. रात्री साडेदहा ते साडेअकराला पाच मिनिटे बाकी असेपर्यंत उर्दू सर्व्हिसवर 'तामील ई इरशाद', मग बारा ते साडेबारा कव्वाल्या आणि साडेबारा ते एक कर्णमधुर जुनी गाणी ऐकायला मिळत. नव्वदीच्या (माझ्या वयाच्या नव्हे तर सनाच्या! 😂) आसपास रेडिओची संगीत सुटली.

नोकरीत थोडं रुळल्यानंतर मोठ्या हौसेनं चार बँडचा मोठ्ठा रेडिओ घेतला. तोवर लघु लहरींवरची केंद्र ऐकायला त्रास होऊ लागला होता. मध्यम लहरीवरचं पुणे केंद्रच नीट ऐकायला मिळत नव्हतं; मग मुंबई, नागपूर, जळगाव, इंदूर केंद्रं तर लांबच. रेडिओ सिलोन, उर्दू सर्व्हिसही कानांच्या टप्प्यांच्या पार पल्याड गेली.

मित्रानं सहा महिन्यांपूर्वी भेट दिली एक. 'हे अलेक्सा...' म्हटलं की, हवं ते ऐकवणारी भेट. रात्रीच्या वेळी मी अलेक्साला विविध भारती ऐकवण्याची विनंती करू लागलो. अगदी परवा परवा शोध लागला की, अलेक्सा उर्दू सर्व्हिसही ऐकवते. आज तेच ऐकत बसलो होतो. अचानक एक गाणं लागलं. चाल ओळखीची वाटत होती. शब्द मात्र नव्हते. एकाच चालीत बांधलेली वेगवेगळी गाणी असावीत. ते ओळखीचं अन् हे अनोळखी, असं मनाला समजावलं.



गाणं होतं 'जल बिन मछली नृत्य बिन बिजली'मधलं. मजरूह ह्यांच्या शब्दांना लक्ष्मी-प्यारे ह्यांनी चाल लावलेली. आवाज आहे माझा लाडका मुकेश आणि लता ह्यांचा. अतिशय साधा संगीत साज असलेलं गोssड गाणं - 

बात है एक बून्द सी दिल के प्याले में
बात है
बात है एक बून्द सी दिल के प्याले में
आते आते होठो तक तूफान
न बन जाये न बन जाये
बात क्या तूफा में जो जीने का सामान
न बन जाये न बन जाये बात क्या
अरमा वो क्या दिल के लिए बात क्या...

ही एवढी लांबड वाचल्यावर त्यावरचा उतारा म्हणून ते गाणं ऐकण्याचा मोह तुम्हालाही झालाच तर...
https://www.youtube.com/watch?v=NWenI5FYqag
------

(लता व मुकेश ह्यांचे छायाचित्र सौजन्य - myviewsonbollywood.wordpress.com)

#गाणी #आठवणी #रेडिओ #आकाशवाणी #मनभावन #रेडिओ #जल_बिन_मछली_नृत्य_बिन_बिजली #AIR #IndoreAIR #HindiSongs
---


मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

'हिंडता फिरता' अध्यक्ष उदगीरला लाभता

 


'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्यांचा खाक्या असतो. उदगीरच्या निमित्तानं ते (पुन्हा एकदा) सिद्ध झाल्याचं दिसून येतं.

उदगीर बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पण साहित्य संमेलनाशी संबंधित असणाऱ्यांना माहिती हवीच ती गोष्ट म्हणजे उदगीरला 'डोळे सरांचं कॉलेज' आहे. 'प्राचार्य' हे त्यांचं पुस्तक 'वाचलंच पाहिजे' ह्या प्रकारात मोडणारं. लातूर जिल्ह्यातील ह्या तालुक्याच्या मुख्यालयी दोन-अडीच महिन्यांत कधी तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याच्या अध्यक्षाची निवड नव्या वर्षातल्या पहिल्या रविवारी एकमताने झाली.


(छायाचित्र सौजन्य marathi.abplive.com)
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नव्या प्रथेनुसार संमेलनाध्यक्षाची निवड बिनविरोध किंवा 'एकमताने' झाली. प्रसिद्ध लेखक भारत सासणे ह्यांना हा बहुमान मिळाला. त्यासाठी त्यांना त्यांच्या कथांप्रमाणेच प्रदीर्घ वाट पाहावी लागली. आता सत्तरीत असले, तरी श्री. सासणे 'हिंडते-फिरते' आहेत. 'संमेलनाचे अध्यक्ष हिंडते-फिरते असावेत,' असं थेट विधान श्री. ठाले पाटील ह्यांनी नाशिकला नोव्हेंबरमध्ये झालेल्या संमेलनातच केलं. ते काही म्हणाले आणि त्यावरून वादंग उठलं नाही, असं होण्याची शक्यता कमीच. त्यानुसार त्यांचं हे वक्तव्यही गाजलं. नाशकात त्यांनी जे 'बोलून दाखवलं' तेच उदगीरमध्ये 'करून दाखवलं'! महामंडळाचं मुख्यालय औरंगाबादला, संमेलन उदगीरला आणि अध्यक्ष (मूळचा) जालना जिल्ह्यातला, असा मराठवाड्याला हवाहवासा योग जुळून आला. लागोपाठच्या तीनपैकी दोन संमेलनं मराठवाड्याला मिळाल्यामुळं ह्याबाबतीतला अनुशेष तरी काही प्रमाणात कमी झाला असावा.

साहित्य संमेलन, अध्यक्षाची निवड, उद्घाटकाची निवड, राजकारण्यांची (व्यासपीठावरची) उपस्थिती... ह्या साऱ्या नेहमीच्या वादाच्या गोष्टी ठरत आलेल्या आहेत. त्यात आता नावीन्य काही राहिलेलं नाही. कोरोनाच्या कृपेमुळे नाशिकचं संमेलन लांबणीवर पडलं. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांतच (मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला) पुढचं संमेलन होईल. त्यामुळे चर्चा तर चालूच राहणार...

नाशिकच्या संमेलनाला अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर उपस्थित राहिलेच नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांचं अध्यक्षीय भाषण झालं खरं. पण 'अध्यक्ष तो दिसतो कसा आननी'चं औत्सुक्य शमलंच नाही. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीच्या भावनेला डॉ. ठाले पाटील ह्यांनी वाट करून दिली असावी. अध्यक्षांची अनुपस्थिती त्यांच्यासह संयोजकांनाही अनपेक्षित नसावी.

डॉ. जयंत नारळीकर ह्यांची अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हाच शंका वाटली होती की, संमेलनाचे तिन्ही दिवस ते हजेरी लावतील का? त्यांना जमेल का? अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा चालू असताना 'काही मुद्दय़ांवर स्पष्ट राहून डॉ. नारळीकर यांनी या प्रस्तावाला होकार दिला आहे,' अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. ह्याच संदर्भात दैनिक लोकसत्तामधील बातमी (दि. १५ जानेवारी २०२१) पुन्हा पाहण्यासारखी आहे - वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांना तीनही दिवस तेथे उपस्थित राहणे शक्य होणार नाही. पहिल्या दिवशी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे, त्या दिवशी उपस्थित राहून ते अध्यक्षीय भाषण करू शकतात. नंतरच्या दिवशी त्यांचे ऑनलाइन व्याख्यान किंवा मुलाखत घेता येणे शक्य होईल; पण तीनही दिवस अध्यक्षाने उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा परामर्श घ्यावा किंवा त्यावर आपली टीकाटिप्पणी करावी, अशी अपेक्षा असेल तर ते शक्य होणार नाही, हे स्पष्ट केले आहे, असे डॉ. मंगला नारळीकर यांनी सांगितले.

ही बातमी पुरेशी बोलकी आहे. संमेलनात पूर्ण काळ उपस्थित राहण्यासाठी डॉ. नारळीकर ह्यांची प्रकृती साथ देणारी नाही, हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं. अशा परिस्थितीत त्यांनीच अध्यक्ष व्हावे, हा हट्ट कशासाठी होता, हे जाणून घेण्यासाठी त्या पंधरवड्यात मी अनेकांशी संपर्क साधून बोललो. त्यात काही लेखक होते, साहित्य संस्थांचे पदाधिकारी होते आणि वाचकही होते. बऱ्याच जणांनी आपला विरोध असल्याचं अगदी स्पष्ट सांगितलं होतं. प्रामुख्यानं त्यांचं वय आणि प्रकृती ह्या मुद्द्यांवर त्यांचा विरोध होता. काही लेखकांनी मात्र ह्या विषयावर बोलायला नकार दिला. ह्या चर्चेत अनेक मुद्दे आले. त्यातल्या बऱ्याच गोष्टी नव्या वादाला तोंड फोडणाऱ्या होत्या. त्यामुळे त्या (डॉ. नारळीकर ह्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अवमान न होता) कशा मांडायच्या हा प्रश्नच होता. उशीर होत गेला आणि मग कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे संमेलनच पुढं ढकललं गेलं. त्यामुळे लिहिण्याचंही बारगळलं.

डॉ. नारळीकर स्वतःच अध्यक्षपदासाठी उत्सुक होते का, असा प्रश्न पडला. त्यांच्यापेक्षा महामंडळाशी संलग्न साहित्य संस्थेतील काही पदाधिकारी त्यासाठी आग्रही होते, अशी माहिती तेव्हा मिळाली. 'तुम्ही फक्त होय म्हणा (बाकीचं आम्ही पाहून घेऊ!)', असं त्या पदाधिकाऱ्यांचं धोरण होतं. ह्या शिवाय आणखी एक कारण असावं - अपराधगंड. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये अध्यक्षपदाचा सन्मान विज्ञानलेखकाला न मिळाल्याची उणीव भरून काढण्याची संधी, ही एक भावना त्यामागे होती. ('बी. बी. सी. मराठी'ला दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. नारळीकर म्हणाले की, 'मी गमतीनं असं म्हणतो की आपल्याकडच्या साहित्यसंमेलनांमध्ये सुद्धा विज्ञानकथांना बॅकडोअर एक्झिट असते.') पण मग त्यातून असा एक मुद्दा येतो की, त्यासाठी अन्य कोण्या विज्ञानलेखकाचं नाव सुचलं नाही का? अगदीच उदाहरणादाखल नावं घ्यायचीच झाली, तर डॉ. बाळ फोंडके, दीर्घ काळ केवळ लेखनाचेच व्रत करणारे निरंजन घाटे आणि अजून काही जण... तथापि तोही वादाचाच मुद्दा होता. 

पुण्यात मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब कसबे ह्यांनी त्या वेळी काय प्रतिक्रिया व्यक्त केली होती? ते म्हणाले होते, 'हा साहित्यिकांचा नव्हे, तर साहित्य संमेलनाचा सन्मान आहे. डॉ. नारळीकर जगातील अतिशय महान साहित्यिकांपैकी नसले, तरी महान वैज्ञानिक आहेत. मराठी साहित्यातले ते सर्वांत मोठे विज्ञानकथालेखक आहेत. त्यांच्या लेखनामुळे मराठी साहित्यात वैज्ञानिक जाणिवा अधिक प्रगल्भ होण्याच्या दृष्टीनं मदत होईल.'


(छायाचित्र सौजन्य marathi.abplive.com)
'बी. बी. सी. मराठी'नं साधारण वर्षभरापूर्वी संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर ह्यांची मुलाखत घेतली. त्याच्या सुरुवातीला म्हटलं होतं की, तंत्रज्ञानाचा वापर वाढतो, धर्माचा पगडा वाढताना दिसतो आहे, अशा वेळी डॉ. नारळीकर ह्यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मराठी भाषेमध्ये विज्ञानलेखन जे झालं, ते पुरेसं आहे काय? पुरेसा सन्मान मिळतो का? ह्या प्रश्नाला त्यांचं उत्तर आहे - 'इंग्रजीत जेवढं खोलवर तेवढं मराठी किंवा भारतीय भाषेत नाही. मराठीत वाचन व्हावं असं वाटत असेल, तर तेवढ्या प्रमाणात लेखनही व्हायला हवं.' विज्ञानसाहित्य लिहिण्यामागचं उद्दिष्ट स्पष्ट करताना त्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'ला सांगितलं - I want to spread different forms of science through various tools, and literature is an important one. म्हणजे मूलभूत प्रेरणा विज्ञान आणि साहित्य हे साधन.

मुख्य प्रवाहातील माध्यमांनी डॉ. नारळीकर ह्यांच्या निवडीचं मनापासून स्वागत केलं असलं, तरी सामाजिक माध्यमांमध्ये (विशेषतः फेसबुक) दोन्ही टोकांची मतं हिरीरीनं मांडली गेली. 'पुस्तके' ह्याच विषयावर सातत्याने लिहिणाऱ्या श्री. शशिकांत सावंत ह्यांनी फेसबुकवर 'सज्जन पण निरुपयोगी नारळीकर' शीर्षकाची मोठी टिप्पणी लिहिली. 'विज्ञान कथेतून विज्ञानाचा प्रसार होतो हा अजून एक गैरसमज,' असं थेट सांगून ते डॉ. नारळीकर ह्यांना 'साहित्यिक' म्हणण्यावरच आक्षेप घेतात. ह्या पोस्टवर जोरदार चर्चा झाली. शंभराहून अधिक प्रतिक्रियाही आल्या. स्वाभाविकच तिथे जोरदार वादही झाला.

'विज्ञानलेखकाची निवड' ह्या मुद्द्यावर डॉ. अभिराम दीक्षित ह्यांनी लिहिलंय की, (धर्मगुरू) दिब्रिटो ह्यांना (मागच्या संमेलनाचं) अध्यक्ष केलं होतं; त्याचं परिमार्जन म्हणून यंदा आपण विज्ञाननिष्ठा दाखवली आहे! 'नारळीकर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होऊ शकतात, पण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी त्यांच्याहून किती तरी इतर व्यक्ती पात्र आहेत,' असं संजय रानडे ह्यांनी फेसबुकवरच लिहिलंय.

वाद-विवाद होत राहिला तरी नाशिककरांनी डॉ. नारळीकर ह्यांना आपल्या संमेलनाचं अध्यक्ष म्हणून स्वीकारलं होतं. विज्ञाननिष्ठ लेखक अध्यक्ष म्हणून लाभल्यामुळं संमेलनात पूजन, श्रीफळ वाढविणे आदी कर्मकांड टाळण्याचं ठरविल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. 'डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वयोमानामुळे त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ,' असं संमेलनाचे आधारस्तंभ छगन भुजबळ ह्यांनी आश्वस्त केलं होतं.

...तर असं सगळं असूनही डॉ. नारळीकर नोव्हेंबरमध्ये झालेल्या संमेलनासाठी उपस्थित राहिलेच नाहीत. पूर्ण तीन दिवस जाऊच द्या; उद्घाटनाच्या सत्रालाही त्यांना येणं शक्य झालं नाही. लांबलेलं, स्थळ बदललेलं संमेलन त्यामुळं अधिकच वादात सापडलं. महाबळेश्वरचं अध्यक्षाविना झालेलं संमेलन एकमेव होतं. त्या यादीत आता नाशिकची भर पडली. पण दोन्ही संमेलनातील त्या परिस्थितीमागच्या कारणांत जमीन-अस्मानाचं अंतर आहे. (उस्मानाबाद संमेलनाला अध्यक्ष उद्घाटनाच्या समारंभापुरते हजर राहिले.)

अनंत अडीअडचणी पार करून होणाऱ्या संमेलनाला अध्यक्षच हजर नाही. त्यामुळेच श्री. ठाले पाटील म्हणाले की, नारळीकर ह्यांनी एक किंवा अर्ध्या तासासाठी हजेरी लावली असती तरी साऱ्यांना आनंद झाला असता. यापुढे तरी अध्यक्ष हिंडता-फिरता असावा. त्यासाठी महामंडळाला घटनेत दुरुस्ती करावी लागते की काय, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

अध्यक्ष हिंडता-फिरता का असावा? तो वाचकांना 'दिसलाच' पाहिजे, असा अट्टहास का? खरं तर केशवसुतांनी लिहिलंय 'कोणीहि पुसणार नाहि, 'कवि तो होता कसा आननी?'' पण कवी-लेखक दिसतो कसा, ह्याचं सर्वसामान्य वाचकांना कुतुहल असतंच. साहित्य संमेलनाच्या प्रयोजनाबद्दलही सातत्याने आक्षेप घेतला जातो. त्याला उत्तर देताना प्रसिद्ध कवयित्री-लेखिका शान्ता ज. शेळके यांनी म्हटलं होतं - 'रसिकांना जसे साहित्य आवडते तसे साहित्यिकांना बघायला, त्यांच्याशी संवाद साधायलाही आवडते. या दृष्टीने साहित्य संमेलनांची उपयुक्तता निर्विवाद आहे.'

साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद अधिकारापेक्षा मानाचं आहे. केवळ संमेलनाच्या सुरुवातीच्या दिवशी अध्यक्षीय भाषण आणि अध्यक्षीय समारोप एवढंच त्याचं काम नाही. वर्षभराच्या कारकीर्दीत त्यानं गावोगावी जावं, वाचकांपर्यंत पोहोचावं, त्यांच्याशी संवाद साधावा, असं अपेक्षित आहे. सोलापूर, प्रवरानगर इथल्या साहित्य पुरस्कारांचं वितरण संमेलनाध्यक्षांच्या हस्ते करण्याची प्रथा आता रूढ झाली आहे. अध्यक्षाला सहजपणे फिरता यावं, त्यासाठी त्याच्या खिशाला झळ लागू नये म्हणून काही वर्षांपासून निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ह्या मुद्द्यांवर प्रा. श्रीपाल सबनीस ह्यांची अध्यक्ष म्हणून कारकीर्द उल्लेखनीय ठरावी. अलीकडच्या काळात सर्वाधिक भ्रमंती केलेले, कार्यक्रमांना उपस्थित राहिलेले अध्यक्ष म्हणून त्यांचंच नाव घ्यावं लागेल. गंमतीनं असं म्हणतात की, त्यांना वर्षभरात इतक्या शाली मिळाल्या की, त्या मोजणंही शक्य नाही!

अध्यक्ष हिंडता-फिरता हवा, ह्या मतप्रदर्शनावर टीकाही झाली. प्रसिद्ध नाटककार चं. प्र. देशपांडे ह्यांनी फेसबुकवर त्याबाबत टिप्पणी लिहिली - '...सारांशरूपाने, हिंडताफिरता असणे, भूमिकावाला असणे आणि साहित्याबाबतही, जाता जाता का असे ना, बोलणारा असला पाहिजे -- या तीनही अटी पाळू शकणारे कोण कोण सुचताहेत? की, हिंडताफिरता असणे आणि साहित्याबाबत बोलणारा असणे, या दोनच अटी बास होतील? आपापली मते आणि अपेक्षित अटी पाळून अध्यक्षपद कोण भूषवू शकेल त्यांची नावे सुचवावीत. रागलोभ, चिडचिड न करता, शांतपणे हे काम होऊ शकले तर संभाव्य अध्यक्ष समोर दिसू लागल्याने, लगेचच येणाऱ्या या उत्सवाच्या आनंदाला सुरुवात करता येईल.'

साधारण पाच वर्षांच्या हुलकावणीनंतर अध्यक्षपदी निवड झालेल्या श्री. सासणे ह्यांचं मत मात्र वेगळं आहे. चालता बोलता म्हणजे लोकांमध्ये मिसळणारा अध्यक्ष, असं त्यांनी निवडीनंतर स्पष्ट केलं.

ह्या निमित्ताने अध्यक्षाची निवड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणुकीचं (घाणेरडं) राजकारण नको, म्हणून काही मातबर मंडळी ह्या प्रक्रियेपासून नेहमीच दूर राहिली. परिणामी पात्र असूनही त्यांना हे मानाचं पद मिळालं नाही, अशी ओरडही फार पूर्वीपासूनची. लक्षावधी मराठी माणसांच्या अखिल भारतीय असलेल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हजार-बाराशे मतदारांनाच का, असा प्रश्नही वर्षानुवर्षे विचारला जात होता. बरीच चर्चा होऊन निवडपद्धतीत बदल झाला. त्यासाठी महामंडळाची घटनादुरुस्ती करण्याचा प्रस्ताव दोन-अडीच वर्षांनंतर मंजूर झाला. निवडणुकीऐवजी संमेलनाध्यक्ष 'सन्मानाने' निवडण्याची पद्धत सुरू झाली.


(छायाचित्र सौजन्य weeklysadhana.in)
घटनादुरुस्तीनंतरही अध्यक्ष एकमताने निवडला जाण्याची अपेक्षा पूर्ण झालेली नाहीच. अकराशे मतदारांऐवजी आता साहित्य महामंडळाच्या घटकसंस्थांचे १९ प्रतिनिधी तो निवडतात. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ही निवड एकमताने झालेली नाही. त्यासाठी मतदान झाले. श्री. ठाले पाटील ह्यांनीही ते मान्य केलं आहे - 'महामंडळाच्या बैठकीत निवडणूक होऊनही तिला निवड म्हणणे आणि निवड भासवण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. या प्रक्रियेत संख्येशिवाय कोणताही फरक नाही. उलट प्रक्रिया संकुचित झाली आहे.' ('महाराष्ट्र टाइम्स' - दि. ७ एप्रिल २०१९)

संमेलनाध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा नवीन पद्धत येण्याची शक्यता आहे की काय? महामंडळाच्या घटनेत दुरुस्ती करण्याच्या श्री. ठाले पाटील ह्यांच्या नाशिकमधलं विधानाकडे त्या दृष्टिकोणातून पाहायला हवं. किंबहुना ती सूचक प्रस्तावना मानावी लागेल. बडोदे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी तीन वर्षांपूर्वीच नव्या पद्धतीला विरोध करताना म्हटलं होतं, 'संमेलनाध्यक्षांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार आल्याने अन्य साहित्यिकांचा सन्मान राखला जाणार नाही. ही प्रक्रिया चुकीची आहे. पाच मान्यवर साहित्यिक व विचारवंतांच्या समितीने एका साहित्यिकाची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करावी.' ('सकाळ' - दि. १२ एप्रिल २०१९)

'कुठलाही वाद होऊ न देता साहित्यिकांनी एखादे तरी संमेलन घेऊन दाखवावे,' असं फार पूर्वी आर. आर. पाटील म्हणाले होते. त्यांचं ते आव्हान (की आवाहन?) स्वीकारणं साहित्यिकांना वा साहित्य महामंडळाला अवघडच आहे. संमेलन, अध्यक्षांची निवडप्रक्रिया कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. त्या परिस्थितीत आमूलाग्र बदल होईल व वाद-चर्चांना कायमचा पूर्णविराम मिळेल, असं काही दिसत नाही. तूर्त एवढं खरं की, नाशकात बोलले ते श्री. ठाले पाटलांनी करून दाखवलं. दीर्घ काळ दर्जेदार लेखन करणाऱ्या श्री. सासणे ह्यांच्या रूपाने उदगीरच्या संमेलनाला हिंडता फिरता अध्यक्ष मिळाला आहे.

------

#MarathiSahityaSammelan #Marathi #Literary_Meet #ThalePatil #Dr.Narlikar #BharatSasane #Nashik #Udgir #SahityaMahamandal #SocialMedia #हिंडता_फिरता


डायरीची चाळता पाने...

थोडी आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी ना...