Thursday 16 July 2015

...आधी अकाउंट तरी उघड!

`व्हॉट्सअॅप`वर सध्या फिरणाऱ्या विनोदावरून सुचलेला एक `ई-नोद`

चिंतू कायम चिंतेत असतो. इ-लोकप्रिय झाल्याचं स्वप्न तो दिवसाही पाहत असतो. पण ते पूर्ण कसं नि कधी होणार, हेच त्याला नेमकं कळत नाही. फेसबुकावरच्या आपल्या `पोस्ट` `व्हायरल` झाल्या आहेत, त्या अनेकांनी शेअर केल्या आहेत आणि त्यावरून एखादी बातमी जन्म घेते, तिचा नायक म्हणून आपला फोटो छापून येतोय, एखादं टीव्ही. चॅनेल आपली मुलाखत घेतेय, असं स्वप्न तो पाहत असतो.

पण स्वप्न काही सत्यात उतरत नाही. असं का घडत नाही आणि ते कधी घडणार, हाच प्रश्न चिंतूचं काळीज (हृदय नव्हे, यकृत!) पोखरून टाकतो. आपल्या `पोस्ट`ला पाचशे `लाईक` आणि शंभर-सव्वाशे `कमेंट` कशा मिळणार, याचाच त्याला सततचा ध्यास.

विचार करकरूनही चिंतूला उत्तर काही सापडत नाही. अखेर देवाला शरण जायचं तो ठरवतो. गुरू कुंभेत गेल्याचा मुहूर्त साधून तो जपजाप्य सुरू करतो. नाना देवांचा धावा करतो.

एकूण तेहेतीस कोटी देव असूनही, त्यातला एकही पहिल्या आठवड्यात तरी चिंतूला काही प्रसन्न होत नाही.

अधिकच अस्वस्थ झालेला चिंतू आपल्या भक्तीची तीव्रता वाढवितो. जपाच्या माळेतील मणी अधिक वेगाने फिरू लागतात.

दुसराही आठवडा भाकड जातो. सव्वा अब्जांपैकी कुणाकुणाकडे देव तरी धावणार हो?

आता चिंतू ठरवतो. आर या पार. नाऊ अॉर नेव्हर. तो मग सृष्टीच्या निर्मात्याला, साक्षात ब्रह्मदेवालाच साकडं घालतो - `या आठवड्यात मी इ-पॉप्युलर झालोच पाहिजे. नसेल जमत तर अन्नत्याग करून प्राणत्याग करीन.`

चिंतूच्या उपवासाचा पहिला दिवस जातो आणि तिकडे वर ब्रह्मदेव अस्वस्थ होतो. चिंतूचे प्राण हकनाक जाणार याची काळजी त्याला वाटू लागते. त्याच तिरीमिरीत तो चिंतूकडे जातो आणि चिडून म्हणतो, `अरे माझ्या बाबा. करतो तुझी इच्छा पूर्ण. पण आधी फेसबुकवर अकाउंट तरी उघड!`

No comments:

Post a Comment

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...