शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

जिंकता जिंकता...हरता हरता


भारतीय क्रिकेट संघाबद्दल २५-३० वर्षांपूर्वी असं म्हटलं जायचं की, जिंकता जिंकता हरावं कसं, हे आपल्या संघाकडून शिकावं. ते अर्थातच कसोटी सामने नव्हते, तर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले मर्यादित षट्कांचे, एक दिवसाचे सामने होते. त्याची आठवण यायचं कारण म्हणजे इंडियन प्रीमियर लीग, अर्थात आयपीएलमध्ये बुधवारी (दि. २५) आणि गुरुवारी (दि. २६) झालेले दोन सामने. जिंकण्याची आशा असलेली लढत पाहता पाहता कशी हातातून निसटू द्यायची आणि उघड्या डोळ्यांनी पराभव स्वीकारायचा, याची ठळक उदाहरणं म्हणजे हे दोन सामने. किंवा त्याच्या उलटही म्हणता येईल - हरणारे सामने कसे खेचून आणायचे नि त्याचं दिमाखदार विजयात रूपांतर कसं करायचं, हेही या सामन्यांच्या जेत्यांनी  दाखवून दिलं.

या दोन्ही सामन्यांमध्ये भरपूर विरोधाभास; साम्य होतं ते अटीतटीचं.  बुधवारच्या सामन्यात धावांचा पाऊस पडला आणि गुरुवारच्या सामन्यात त्याचा दुष्काळ पाहायला मिळाला. बुधवारचा सामना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करीत चेन्नई सुपर किंग्जनं जिंकला आणि पंजाबी किंग्जची छोट्या धावसंख्येचा पाठलाग करतानाच दमछाक झाली. चेन्नई-बंगलोर लढतीमध्ये ३३ षट्कारांचा पाऊस पडला. हैदराबाद आणि पंजाब किंग्ज एलेव्हन यांच्या फलंदाजांना मिळून जेमतेम ६ षट्कार मारता आले - ते एबी डीव्हिलियर्स किंवा अंबाटी रायुडू किंवा महेंद्रसिंग धोनी यांच्यापेक्षा कमीच ठरले. आधीच्या सामन्यात गोलंदाजांची पिटाई होत असताना, कालच्या सामन्यात मात्र तेच वरचढ ठरले. एवढे की, पंजाबच्या अंकित रजपूतनं पाच बळी मिळविले.

सनरायझर्स हैदराबादनं सलग दुसऱ्या सामन्यात कमाल केली. आणखी किती कमी धावसंख्या असली, तरी त्यांचे गोलंदाज ते आव्हान सहज पेलतील हे पाहणंच यंदाच्या आयपीएलचं वैशिष्ट्य ठरेल, असं आता वाटू लागलं आहे. आणि ही किमया संघाला साधली, ती अनुभवी भुवनेश्वरकुमारच्या गैरहजेरीत. मागच्याच आठवड्यात त्यांनी अवघ्या ११८ धावांचं पाठबळ असतानाही मुंबई इंडियन्स संघाला ३१ धावांनी धूळ चारली आणि काल १३३ धावांचं आव्हान देऊन पंजाब किंग्ज एलेव्हनला ११८ धावांत गुंडाळलं. या दोन्ही संघांची फलंदाजीची ताकद कागदावर मजबूत दिसणारी. पण हैदराबादच्या खेळाडूंनी या कागदाचा पार चोळामोळा केला! पहिल्याच षट्कात कर्णधाराला गमावल्यानंतर हैदराबादला फार मोठी मजल मारताच आली नाही. मनीष पांडेचं कष्टसाध्य अर्धशतक हीच काय ती त्यांची जमेची बाजू. शकीब अल हसन (२९ चेंडूंमध्ये २८) आणि युसूफ पठाण (१९ चेंडूंमध्ये नाबाद २१) यांनीच त्याला थोडी साथ दिली. एरवी अंकित रजपूतच्या तेज माऱ्यापुढे त्यांची अवस्था बिकटच होती. हैदराबादचे सहापैकी पाच बळी त्यानंच मिळवले. पंजाबनं चार झेल सोडण्याची कृपादृष्टी दाखविली नसती, तर हैदराबादची परिस्थिती अधिकच दयनीय झाली असती.
राहुलचा त्रिफळा नि सामन्याला कलाटणी.

मागच्या वर्षीचा धावांचा दुष्काळ संपवून ख्रिस गेलची सुगी सुरू झाली आहे. तो आणि के. एल. राहुल यांची दुसऱ्या ते सातव्या षट्कांतली टोलेबाजी पाहताना पंजाब एकही गडी न गमावताच सामना जिंकणार की काय, असं वाटू लागलं होतं. पण नंतर सगळंच बदललं. पाहता पाहता सामना पंजाबच्या हातून निसटला. त्याचं श्रेय जेवढं हैदराबादच्या गोलंदाजांना तेवढंच ते पंजाबच्या फलंदाजांनाही. विशेषतः गेल, फिंच आणि कर्णधार अश्विन अतिशय बेजबाबदार फटके मारताना बाद झाले. पडझडीची सुरुवात झाली, ती आठव्या षट्कात. रशीद खानचा पाचवा चेंडू खेळणाऱ्या राहुलची यष्टी वाकली आणि चालत्या गाड्याला खीळ बसली. एरवी एकेरी-दुहेरी धावांसाठी पळण्यात आळस दाखवणारा गेल या डावात मात्र पळत होता. कदाचित त्यामुळेच तो दमला असावा आणि बेसिल तंपीच्या उसळलेल्या चेंडूवरचा त्याचा पुलचा फटका पार फसला.

नाबाद ५५ अशी जोरदार सुरुवात असलेल्या पंजाबनं दोन गडी झटपट गमावले, तरी सगळंच काही बिघडलं नव्हतं. शेवटच्या सहा षट्कांमध्ये त्यांना ५१ धावा करायच्या होत्या आणि सहा गडी बाकी होते. शकीब अल-हसनला षट्कार खेचणाऱ्या फिंचनं पुढच्या चेंडूवर तसाच प्रयत्न केला. मनीष पांडेनं हा सुरेख झेल पकडला आणि पंजाबची वाटचाल पराभवाकडे सुरू झाली. रशीद खान, शकीब आणि संदीप यांच्यापुढे किंग्ज एलेव्हनने नांगीच टाकली. रशीद खानच्या लेगस्पिनला कसं खेळायचं हे त्याचाच देशबंधू मुजीबूर रहमाननं रिव्हर्स स्वीपचे दोन चौकार ठोकून दाखवलं. रजपूतचा नबीनं सोडलेला झेल महाग पडणार, अशी भीतीही त्यामुळं वाटली. पण तसं काही झालं नाही. सामन्यानंतर कुमार संगकारानं व्यक्त केलेली प्रतिक्रिया नेमकी होती - हैदराबाद जिंकलं नाही, तर पंजाब हरलं! कागदावर नोंद हैदराबादच्या विजयाचीच होणार, हे खरं. पण अशा पराभवातून मिळालेल्या धड्यापासून काही शिकल्यावरच संघाची पुढची वाटचाल होत असते, हेही खरं. पंजाबची सारी मदार राहुल आणि गेल यांच्यावरच असल्याचं दिसून आलं. या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे – रशीद, शकीब आणि मुजीब यांची फिरकी चालत असताना; धावा देण्यात ते कंजुषी दाखवित असताना, अपयशी ठरला तो या तिघांहून अनुभवी अश्विन!

द ग्रेट फिनिशर
जेमतेम १३० धावांचा पाठलाग करताना पंजाबची फ्या फ्या उडाली असताना, आदल्या सामन्यात चेन्नईनं २०५ धावांचा जिद्दीनं पाठलाग केला. द ग्रेट फिनिशर या आपल्या लौकिकाला धोनी बुधवारी पुन्हा एकदा जागला. त्यानं नेहमीच्या थाटात षट्कार ठोकत लक्ष्य गाठलं. अखेरच्या दोन षट्कांमध्ये ३० धावा हव्या असताना धोनी आणि ब्राव्हो यांनी त्यासाठी दोन चेंडू कमीच घेतले.

पुन्हा पाठलाग, पुन्हा षट्कार आणि पुन्हा विजय!
धोनी सहाव्या क्रमांकावर खेळायला आला, तेव्हा संघाची अवस्था चांगली म्हणण्याजोगी नव्हती. चार फलंदाज बाद आणि ११ षट्कांमध्ये १३२ धावा करायच्या होत्या - प्रत्येक चेंडूला दोन या गतीनं. आशादायक गोष्टी दोन होत्या - समोर अंबाटी रायुडू सुटलेला होता आणि पहिल्या सामन्यात विजय मिळवून देणारा ब्राव्हो बाकी होता. या दोघांच्या साथीनंच धोनीनं विजयश्री खेचून आणली. संघाची सर्वांत मोठी भागीदारी झाली ती पाचव्या जोडीसाठी - रायुडू आणि धोनी यांनी ५४ चेंडूंमध्ये १०१ धावांची भर घातली. नंतर ब्राव्होच्या साथीनं धोनीनं ३२ धावा जोडल्या त्या अवघ्या ११ चेंडूंमध्ये. फक्त ३४ चेंडूंमध्ये ७० धावा काढणाऱ्या धोनीचा स्ट्राईक रेट २०५.,८८ होता. अंबाटीनं ५३ चेंडूंमध्ये ८२ धावा केल्या आणि ब्राव्होनं मोक्याच्या क्षणी आतषबाजी केली. सतरा-अठराव्या षट्कांमध्ये मार खाणाऱ्या महंमद सिराज आणि अँडरसन यांनाच पुढची दोन षट्कं नाइलाजानं देण्याची वेळ बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीवर का आली असावी? या दोघांच्या ७.४ षट्कांतच तब्बल १०६ धावा कुटण्यात आल्या. एकाच षट्कात १४ धावा देणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला नंतर एखादं षट्क द्यावं असं कोहलीला का वाटलं नसेल?

बंगलोर जिथं फसलं, नेमकं तिथंच चेन्नईनं सावरलं आणि विजय मिळवला. चौदाव्या षट्काअखेर रॉयल चॅलेंजर्सनं १३८ धावांची मजल मारली होती आणि त्यांचे दोनच गडी बाद झाले होते. एबीडी जोरात होता. पण पंधराव्या षट्कात दोन गडी गमावल्यानंतर बंगलोरची मधली फळी कोसळली. धावांचा वेग कायम राखण्याच्या नादात त्यांचे फलंदाज बाद होत गेले. ही घाई एवढी होती की, एकोणिसाव्या षट्काच्या शेवटच्या चेंडूवर आणि त्याच्या पुढच्या षट्कातल्या पहिल्या दोन चेंडूंवर, असे सलग तीन फलंदाज बाद झाले. प्रश्न गडी बाद होण्याचा नसून ते तीन चेंडू वाया जाण्याचा आहे. त्या चेंडूंवर किमान १० ते कमाल १८ धावा निघणं शक्य होतं. चेन्नईनं नेमका त्याच महत्त्वाच्या षट्कांमध्ये आपला खेळ उंचावला आणि मोठ्या धावसंख्येचा सलग दुसऱ्यांदा पाठलाग केला. पंजाबविरुद्ध त्यांचा प्रयत्न थोडक्यात फसला होता. बुधवारी मात्र दिमाखदार यश मिळालं.

दोन टोकांच्या या दोन लढती. एकीत गोलंदाजांची कत्तल आणि दुसरीत फलंदाजांची उडालेली भंबेरी. एका सामन्यात धावांचा थरारक पाठलाग आणि दुसऱ्यामध्ये छोट्या अंतराचा पल्ला गाठताना उडालेली दमछाक. क्रिकेटमधल्या अद्भुत अनिश्चिततेची ही दोन अप्रतिम उदाहरणं. डागाळलेल्या आयपीएलकडं प्रेक्षकांना खेचणारी, स्पर्धेचं आकर्षण वाढविणारी.

(सांख्यिकी तपशील व छायाचित्रं ईएसपीएनक्रिकइन्फो आणि आयपीएलटी-ट्वेन्टी संकेतस्थळांच्या सौजन्यानं.)

रविवार, ८ एप्रिल, २०१८

ब्राव्हो, याsssर!


इंडियन प्रीमियर लीगच्या अकराव्या अध्यायाच्या पहिल्या प्रकरणातली सर्वात मनोवेधक गोष्ट कोणती?

... तर लंगडणाऱ्या केदार जाधवनं विसाव्या षट्कातल्या पाचव्या चेंडूवर कव्हरमधून बेधडक चौकार मारला, तेव्हा मनापासून खूश झालेल्या ड्वेन ब्राव्होचं प्रसन्न हास्य!

त्या आधीच्या चेंडूवर केदारनं एका पायावर बसून फाईन लेगला मारलेल्या षट्कारानं समोरच्या इम्रान ताहीरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सामना खिशात घातल्याची त्याची खात्री झाली होती. तेव्हा ब्राव्होच्या चेहऱ्यावर काय भावना होती, हे नाही दिसलं. कदाचित तोही कर्णधार धोनीप्रमाणं 'सुपर ओव्हर'चा विचार करीत असेल. दोन चेंडू होते, एक धाव होती आणि गडी एकच बाकी होता. षट्कातले पहिले तीन चेंडू निर्धाव ठरले होते.

पण विजयी चौकारानंतर ब्राव्होचं हास्य इतकं दिलखुलास होतं की, तोड नाही. आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशाहून किती तरी अधिक आनंद त्याला झाला असेल, त्या चौकारानं. कुणास ठाऊक!

पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या चेन्नई सुपर किंग्जला विजयाच्या शिखरावर घेऊन जाण्याचं श्रेय निःसंशय या वेस्ट इंडियन खेळाडूला. चेन्नईची परिस्थिती बिकट होती. पंधराव्या षट्कानंतर सात बाद १०६. हव्या होत्या पाच षट्कांमध्ये ६० धावा; म्हणजे चेंडूमागे दोन. साथीला इंग्लिश मार्क वूड. अवघे चार सामने खेळलेला आणि खात्यात एकूण १० धावा असलेला. त्याच्यानंतर इम्रान ताहीर आणि दुखापत सोस येणारा केदार जाधव. परिस्थिती खरंच वाईट होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा खुशीत होता.
 

ब्राव्होने फार वेगळा विचार केल्याचं सोळाव्या नि सतराव्या षट्कांमध्ये दिसलं नाही. दोन षटकांमध्ये १३ धावा निघाल्या; वूड बाद झालेला. आता राहिल्या ४७ धावा आणि १८ चेंडू. मिशेल मॅकलेनघन गोलंदाजीला आणि समोर पहिलाच चेंडू खेळणारा ताहीर. त्यानं पहिल्याच चेंडूवर बॅट फिरवली, धाव काढली, स्ट्राईक फिरवला आणि सामनाही फिरला! त्यानंतर वादळ सुरू झालं. १० चेंडूंमध्ये ३७ धावांची बरसात झाली. मुंबईच्या मुसळधार पावसाची आठवण करून देणारी. पाच षट्कार आणि एक चौकार. शिखरावर विजयपताका फडकावण्याचं काम केदारकडे सोपवून ब्राव्हो एक अफाट खेळी पूर्ण करून तंबूत परतला होता.

मुस्तफिजूरच्या शेवटच्या षट्कातल्या पहिल्या तीन चेंडूंवर एकही धाव न निघाल्यावर हेचि फल काय मम तपाला... असा विचार ब्राव्होच्या मनात आला असेल? शक्यता नाकारता येत नाही. पण त्याची खेळी मातीमोल होणार नाही, याची पुरेपूर दक्षता केदारनं घेतली. या तिन्ही षट्कांमध्ये आणखी एक दृश्य दिसलं - ब्राव्होला आणि केदारला धीर देणारा इम्रान ताहीर. धीर नाही, तो त्यांच्यातली ठिणगी प्रज्वलित करीत असणार! दोन चेंडूंमध्ये दोन धावा करणाऱ्या इम्रानचाही या विजयात वाटा आहेच की.

ब्राव्होचा हा डाव अस्सल वेस्ट इंडियन होता. घणाघात, पण नजाकतदार. गोलंदाजीच्या चिंधड्या उडवतानाही त्यातली कलाकारी दिसणारी. पोलार्ड हल्ला चढवितो तो निर्दयीपणे, तेव्हा त्याच्या देहबोलीत क्रौर्य जाणवतं - समोरच्याला चिरडून टाकण्याचं. ब्राव्होनं एखाद्या शल्यविशारदाच्या कौशल्यानं हे काम लीलया केलं.

एक नक्की या सामन्याच्या दोन्ही डावांतल्या अठराव्या षट्कांवर ब्राव्होचं नाव कोरलं गेलेलं आहे. गोलंदाजी करताना त्यानं त्या षट्कात फक्त ३ धावा दिल्या आणि फलंदाजी करताना २० धावा कुटल्या. दोन्ही डावांतल्या शेवटच्या पाच षट्कांमध्ये एकच माणूस छाप टाकून गेला - ब्राव्हो, याsssर!

जाता जाता - मुंबई इंडियन्सकडून दोन खणखणीत भागीदाऱ्या झाल्या. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांची तिसऱ्या जोडीसाठी 78 धावांची आणि पाचव्या जोडीसाठी पंड्या बंधूंची नाबाद ५२ धावांची. सामना जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची सर्वांत मोठी भागीदार नवव्या जोडीसाठी - ४१ धावांची आणि त्यात ब्राव्होचा वाटा ३९. चेन्नईनं सात गोलंदाजांचा वापर केला. मुंबईनं पाचच गोलंदाज वापरले. आणखी पर्याय असतीलही, पण ते वादळात भिरकावले गेले.

(छायाचित्र सौजन्य : espncricinfo.com)

बुधवार, ४ एप्रिल, २०१८

पुन्हा वडोदऱ्याला बोलावणारी माणसं

(वडोदरा विशेष - ४)
----
निवडणुकीच्या कामासाठी परराज्यात गेलेल्या पत्रकारांच्या पहिल्या वृत्तान्तामध्ये रिक्षावाला हटकून आढळे. हा प्रतिनिधी मोठ्या वृत्तपत्राचा (म्हणजे व्हर्नाक्यूलर नव्हे, इंग्रजी!) असलाच, तर तो रिक्षावाल्याऐवजी टॅक्सीवाल्याचा हवाला देतो. वडोदऱ्याच्या स्वच्छ व भव्य बसस्थानकातून बाहेर पडल्यावर सकाळी सकाळी रिक्षाचालकाची भेट घेणं अपरिहार्यच होतं; कुठल्याही बातमीत त्याचा हवाला द्यायचा नसताना आणि क्या माहोल है यहाँ?’ असं विचारायचं नसतानाही.

स्थानिक माणसं सांगतात ते भाडं आणि रिक्षाचालक सांगतात ते, यात नेहमीच मोठा फरक असतो. माझे स्थानिक पालक केशव कुलकर्णी यांनी सांगितलं होतं, पाच रुपयांत पोहोचाल तुम्ही. रिक्षावाले ४० रुपयांपेक्षा कमी काही सांगतच नव्हते. लक्षात आलं की, त्यांनी सिटावर जाणाऱ्या रिक्षाचं भाडं सांगितलं होतं नि मी स्वतंत्र रिक्षा करू पाहत होतो. (अर्थात तेही भाडं किमान १० रुपयेच होतं.) अखेर एक मध्यमवयीन रिक्षावाला ३० रुपयांमध्ये यायला तयार झाला.

रिक्षाचालक मुस्लिम. दाढीदीक्षित (माझ्यासारखाच!), दाढी पांढरी (पुन्हा तेच!!), पण वयाचा अंदाज लावता न येण्यासारखा चेहरा. त्यांनीच बोलणं सुरू केलं. वडोदऱ्यातल्या रिक्षामध्ये चालकासमोरच्या काचेवर एक क्रमांक दिसतो. उदाहरणार्थ P 187. हे पोलिसांनी दिलेले क्रमांक. प्रवाशाच्या सोयीसाठी. एखादा चालक आडदांडपणे वागला किंवा रिक्षात काही सामान वगैरे विसरलं, तर तो क्रमांक सांगितल्यावर पोलिसांना रिक्षा शोधणं सहज शक्य होतं. एरवी वाहनाचा क्रमांक कोणी आठवणीनं पाहतंच, असं नाही. ही सगळी माहिती या चालकानंच आपणहून दिली.

भाडं नाकारणं, अवाजवी पैसे सांगणं ही गावोगावची दुखणी. तो विषयही याच चालकानं काढला. ‘‘आमच्यातले तरुण रिक्षावाले फार विचित्र वागतात. भाडं घेतात, प्रवाशाला सोडलं की, लगेच आपल्या ठेप्यावर. मी त्यांना म्हणतो, तुम्ही प्रवाशांना लुटता. त्याच्याकडून जायचं-यायचं भाडं काढता. पण कुणी ऐकत नाही.’’ त्यांनी सांगितलेला हा अनुभव मध्यम शहरात नेहमीच येतो. इतर रिक्षाचालक ४०-५० रुपये सांगत असताना, या गृहस्थांनी मला ३० रुपयांत सोडलं. त्यांना पैसे देताना चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या एकानं पाहिलं आणि म्हणाला, ‘‘तीस रुपये? काका, फार घेतले हो पैसे!’’
-x-x-x-x-x-x
सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना येणाऱ्या अनुभवावरून साधारण तिथल्या वागणुकीची कल्पना येते. अगदी शितावरून भाताची परीक्षा... करण्याजोगे नसतात हे अनुभव. पण गुजरात एसटी महामंडळाच्या बसमधून तीन वेळा प्रवास केला. त्या तिन्ही चालकांचा अनुभव चांगलाच होता. (असे चांगले अनुभव महाराष्ट्रातही मिळतातच!) नारेश्वरला जाणारी बस सकाळची होती. तिचा वाहक तरुण, तरतरीत. मुख्य स्थानकावरून सुटलेली बस रिकामीच होती. पण साधू वासवानी चौकातील थांब्यावर ती तोबा भरली. त्याची कल्पना वाहकाला असावी. त्यानं तिथं उतरताना माझ्याशेजारची जागा राखून ठेवायला सांगितली. बरेच नोकरदार त्या बसनं नोकरीच्या गावी जात असावेत. गर्दीचा लोंढा थोडा कमी झाल्यावर त्यातल्या एका मध्यमवयीन नोकरदाराला त्यानं हक्कानं माझ्या शेजारी बसायला सांगितलं. आणखी दोन महिला कर्मचाऱ्यांना त्यानं अशाच पद्धतीनं जागा मिळवून दिली आणि एकीला आपली जागा दिली. तिथल्या बसमध्ये वाहक एकटाच बसेल, असं आसन दाराशेजारीच असतं.

वासवानी चौकातला हा थांबा बहुतेक पाकीटमारांचा अड्डा असावा. कारण तिथनं बस सुटल्यावर एक महिला पैशाची पर्स चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानं ओरडू लागली. काय करणार बुवा! इथं हे नेहमीचंच आहे. पोलिस काही लक्ष देत नाहीत... अशीच काही तरी चर्चा मग सुरू झाली. त्याच वेळी वाहकानं त्या महिलेला काकू, काही टेन्शन घेऊ नका असा गुजरातीतून वारंवार दिलासा दिला. थोड्या वेळानं पाकीट मारल्याची आणखी एक तक्रार आली. त्या प्रवाशालाही वाहकानं त्याच्या पद्धतीनं दिलासा दिला.

शहरातले सगळे विनंती थांबे घेत, बस महामार्गाला लागली. पोर गावानंतर शाळकरी मुलांची वर्दळ सुरू झाली. हे सगळेच पासधारक. पण त्यातल्या कुणावरच वाहक ओरडताना दिसला नाही. सोमवार असल्यानं बसमध्ये रोजच्या पेक्षा थोडी जास्तच गर्दी असावी बहुतेक. दर पाच-दहा मिनिटांनी कुठल्या तरी छोट्या गावात बस थांबे. प्रवासी विद्यार्थीच होते. त्यातल्या बहुतेकांशी वाहकाची ओळख होती. गर्दी फारच झाल्याने नंतरच्या थांब्यावरच्या विद्यार्थ्यांना (त्यात मुली बहुसंख्येनं होत्या.) हा कंडक्टरकाका सांगू लागला, ‘‘मागच्या बसनं ये. महेशकाकाची बस पाचच मिनिटांत येत आहे.’’ दोन तासांच्या प्रवासात पाहायला मिळालेलं त्याचं हे काम सुखावणारं होतं. त्याच्या वागण्यात चिडचिड दिसली नाही; सुट्या पैशांसाठी तो कोणावर खेकसताना दिसला नाही. एवढ्या गर्दीत त्याला कॅमेऱ्यात टिपणं शक्य नव्हते. त्याचं नाव तरी किमान विचारायला हवं होतं.
-x-x-x-x-x-x
संमेलनाच्या आदल्या दिवशीच ग्रंथदिंडी निघाली. पॅलेसपासून निघालेली ही दिंडी तीन-साडेतीन किलोमीटरची प्रदक्षिणा करून पुन्हा तिथंच विसर्जित झाली. उत्साही सुरुवातीनंतर मार्गी लागलेल्या दिंडीच्या बाजूनं जात असतानाच एका गृहस्थांनी कुतुहलानं विचारलं, ‘‘कुठून आलात तुम्ही?’’ वडोदऱ्यात मराठी ऐकायला आल्यावर भारावून वगैरे जाण्याची गरज नसते. त्यात पुन्हा हे मराठी साहित्य संमेलन.

सत्तरीच्या आसपास असलेल्या या गृहस्थांशी जुजबी गप्पा झाल्या आणि ते माझ्या बरोबरच निघाले. पुढचा तासभर तरी त्यांच्या सोबतीनं चाललो. वडोदऱ्यात पाहायला काय काय आहे, काय काय पाहा, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. अतिशय मृदुभाषी, आपुलकीनं वागणारे हे होते श्री. मधुसूदन आदवानीकर. टाइम्स-एक्सप्रेसमध्ये काम केल्याचं त्यांनी सांगितल्यावर स्वाभाविकच अधिक आपुलकी वाटू लागली. निवृत्तीनंतर १०-१५ वर्षांपूर्वी ते वडोदऱ्यात स्थायिक झाले. संपादकीय विभागात काम केलं नसलं, तरी लिहिण्या-वाचण्याची त्यांना चांगली आवड. दिनकर गांगल, अरुण टिकेकर, कुमार केतकर यांच्याशी त्यांची ओळख. या तिघांच्या सांगण्यावरून त्यांनी अधूनमधून लिहिलेलं; ग्रंथालीशीही संबंध आलेला. त्यामुळं आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या. न थकता आणि न कंटाळता त्यांनी बराच वेळ सोबत केली.

वडोदऱ्यात फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाळा जाणवू लागला होता. त्यामुळं तासभर चालल्यानंतर तहान लागली. उसाच्या रसाची एक गाडी पाहून आम्ही थांबलो. बर्फ न घालता तो गोड रस प्यायलो. मला न जुमानता अहो, तुम्ही आमचे पाहुणे!’ असं बजावत श्री. आदवानीकर यांनी रसाचे पैसे देत तासाभरापूर्वी ओळख झालेल्याचा पाहुणचार केला!
-x-x-x-x-x-x
संमेलन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी नारेश्वरला गेलो. दर्शन झालं, नर्मदामाईची भेट घेतली, महाप्रसाद झाला आणि आता परतीच्या बसची वाट पाहायची एवढंच. त्यालाही किमान दीड तास होतो. झाडाच्या सावलीखाली उभं असताना समोरून डुलत डुलत येणारा एक जण दिसला. सदरा, पायजमा आणि गांधी टोपी. हातात पिशवी. नक्की मराठी माणूस! समोरून जाताना पाहिलं, तर पिशवीत हिर्व्यागार मिरच्या. थांबवलं आणि विचारलं, ‘‘माउली, नमस्कार. कुठून आलात?’’

सुधाकरतात्या आणि संजयभौ... बेलदारवाडी.
अंदाज एकदम बरोबर. माउली बेलदारवाडीच्या (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) होत्या. संजय धर्मा शिर्के. तिथल्या सिद्धेश्वर आश्रमाची नर्मदा परिक्रमा चालू होती. त्या दिवशी सोमवार - उपवास. साबूदाण्याच्या खिचडीसाठी मिरच्या आणायला संजयभाऊ गेले होते. नंतर या परिक्रमेचे प्रमुख सुधाककरतात्या म्हणालेच की, संजयभौंनी एकदा जबाबदारी घेतली की, पूर्ण करणारच! संजयभाऊंशी थोड्या गप्पा झाल्या. त्यांची छायाचित्रं काढली. मग ते म्हणाले, ‘‘चला, तुमची ओळख करून देतो. थोडा साबूदाणा खा, आमच्याबरोबर.’’

तिथनं दोनच मिनिटांवरच्या मैदानात परिक्रमेला आलेल्या भाविकांच्या दोन बस, तीन जीप थांबल्या होत्या. स्टोव्हवर मोठ्या कढईत चार-पाच जण खिचडी तयार करीत होते. संजयभाऊ, सुधाकरतात्या यांच्या बरोबर
परिक्रमावासीयांचा उपवास. खिचडी पाहिजेच ना.
बसमध्ये गप्पा मारत बसलो. दोघांनी आग्रह केला, चला इथनंच आमच्या बरोबर परिक्रमेला. ‘‘नोकरीबिकरीचा ताप नाही ना आता डोक्याला. चला मग परिक्रमेला. गाडीत जागा आहे,’’ असं पुनःपुन्हा म्हणत राहिले. नको नको म्हटल्यानंतरही एका पत्रावळीवर गरमागरम खिचडी आली. हे दोघं आश्रमाची, गुरू ज्ञानेश्वर माउलींची, आश्रमातल्या गोशाळेची, दर वर्षीच्या परिक्रमेची माहिती देत होते. ‘‘आमच्या आश्रमाबद्दलही ब्लॉगवर लिहायला पाहिजे हो,’’ असं सुधाकरतात्या म्हणाले. उन्हाळा संपल्यानंतर अंमळनेरला येण्याचं आश्वासन जळगावच्या प्रदीप रस्से यांचा (परस्पर) हवाला देत निरोप घेतला या दोघांचा.

-x-x-x-x-x-x
ज्येष्ठ खो-खोपटू सुधीर परब यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल लिहिलं आहेच. त्यात त्यांच्यातल्या (साध्या आणि पाय जमिनीवर असलेल्या) माणसाविषयी अधिक लिहायला हवं होतं. दुपारी मुलाखत संपल्यावर त्यांना म्हटलं, ‘‘मला रस्ता दाखवायला याल का? म्हणजे कुठून रिक्षा मिळेल ते समजेल....’’ सुधीर सरांनीच जोरदार शिफारस केल्यामुळं लक्ष्मीविलास पॅलेसच्या परिसरातील महाराज फत्तेसिंह संग्रहालय पाहायचं होतं. ते सांगितल्यावर ते मोटर काढून थेट तिथंच सोडायला आले. तिथून कुठं जाणार या प्रश्नाला ‘‘महाकालीमध्ये उसळ-शेव खायला असं उत्तर दिल्यावर त्यांनी गाडी पुन्हा उलटी घेऊन बाहेर पडण्याचा जवळचा रस्ताही दाखवला.

संग्रहालय पाहायला फार कोणी नव्हतं. तिथं फिरताना छान वाटलं. एका तरुण कर्मचाऱ्यानं दोन-तीन चित्रांची मजा कशी घ्यायची हे मुद्दाम सांगितलं. तो म्हणाला, कुणी निवांत रस घेऊन बघत असलेलं दिसलं, तरच मी सांगतो. संग्रहालयातून बाहेर पडलो, तेव्हा चांगलीच भूक लागली होती. योग्य रस्त्यानंच बाहेर पडत असताना शंका आली, आपण चुकत तर नाही ना? तेवढ्यात समोरून एक दुचाकी येताना दिसली. दुचाकीस्वाराला थांबवलं. वृद्ध गोरेपान गृहस्थ होते. त्यांना बहुतेक चालण्याचा त्रास असावा. कारण जवळच एक काठी होती.

महाराष्ट्राच्या प्रेमात असलेले रॉनी अंकल.
बाहेर पडण्याचा रस्ता हाच ना, असं विचारल्यावर आजोबांनी होकारार्थी मान डोलावली आणि कुठं जायचंय, कुठून आला?’ अशी प्राथमिक चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहे. संग्रहालय पाहिलं, आता पोटात कावळे ओरडताहेत आणि म्हणून पोटपूजा करायला निघालो, असं उत्तर दिलं. आणि त्याबरोबर चमत्कार झाला. मुंबई?’ असं विचारत आजोबांनी यू टर्न घेतला. गाडी वळविली आणि बसायची आज्ञा केली. गुरुप्रसादमध्ये बेस्ट जेवण मिळतं; तिथं जेव' असं त्यांनी सांगितलं. माझा बेत वेगळा होतो. सान्यांच्या जय महाकालीमध्ये प्रसिद्ध शेव-उसळ खायची होती. ते कीर्ती स्तंभाजवळ आहे, असं ऐकून होतो. तेवढाच पत्ता आजोबांना सांगितला.

आजोबांनी गाडी सुरू केली. जाता जाता बरंच बोलत होते. तमाम राजकारण्यांना फर्ड्या इंग्रजीत शिव्या देत होते. गुरुप्रसादच्या बाहेरच दुचाकी लावत त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्याला जय महाकालीमध्ये मला सोडण्याचा आदेश दिला. ते तिथनं एका मिनिटाच्याच अंतरावर होतं. बाहेरच आम्ही बोलत असताना त्यांनी वेटरला विचारलं, ‘‘पाहुण्याला ग्लासभर लस्सी पाजतोस का?’’ मग आम्ही आत गेलो. गप्पा सुरू झाल्या. ते होते रॉनी एस. बेअशेर. निवृत्त पोलिस अधिकारी. वय वर्षं ८४. मूळचे हुबळीचे. अँग्लो-इंडियन. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात त्यांनी पालथा घातलेला. मुंबईवर त्यांचं विलक्षण प्रेम. भरभरून बोलत होते. चीनच्या आक्रमणामुळे त्या वेळी मनात निर्माण झालेल्या त्वेषातून त्यांनी पोलिसाची नोकरी स्वीकारली. गुजरात पोलिस दलात त्यांनी मोटर व्हेईकल फिटर म्हणून काम सुरू केलं आणि अहमदाबादच्या पोलिस अधीक्षकपदापर्यंत मजल मारली. निवृत्त होऊन २६ वर्षं झाली त्यांना.

उपाहारगृहात बसल्या बसल्या रॉनी आजोबांनी माझ्याकडचा कॅमेरा पाहिला. त्यांना त्यातली बरीच माहिती होती. महाराष्ट्राबद्दल... नव्हे मुंबईबद्दल किती बोलू नि किती नको, असं त्यांना झालं होतं. गुरुप्रसादमधून उठताना त्यांना म्हणालो, ‘‘सर, तुम्हीही चला शेव उसळ खायला.’’ ‘‘नको! घरी बायको जेवायची वाट पाहत असेल. ती आजारी असते ना,’’ असं सांगताना गोऱ्यापान लालबुंद रॉनी आजोबांचे डोळे किंचित पाणावले होते, असा भास झाला!
-x-x-x-x-x-x
सुधीर परब सरांच्या घरी नेण्याची जबाबदारी त्यांनी वसंतराव घाग यांच्यावर सोपवली होती. परब सरांच्या बरोबर खेळलेले वसंतराव, समवयस्क किंवा दोन-तीन वर्षांनी लहान. वसंतरावांना त्या रात्री सकाळची वेळ सांगण्यासाठी फोन केला. ते सांगू लागले, ‘‘सुधीर सरांचा फोन आला होता मघाशीच. आता माझ्या घरी काय नेमके पाहुणे आले आहेत...’’ समज झाला की, त्यांना उद्या येणं शक्य नाही. तेवढ्यात ते म्हणाले, ‘‘सरांकडे सोडायचंय ना? किती वाजता - साडेनऊ? मी बरोबर सव्वानऊ वाजता तुमच्याकडे येतो.’’

घाग सरांची वाट पाहत सकाळी चहाच्या गाडीजवळ थांबलो होतो. मोटरसायकलवरून टी-शर्ट घातलेलं कोणी गेलेलं दिसलं नि वाटलं की, हेच वसंतराव. तेवढ्यात त्यांचा फोन - मी आलो आहे. तेच होते ते. वय झालं, तरी खेळाडू ओळखू येतोच. मोटरसायकलवर बसून परब सरांच्या घरी. मला सोडलं नि सरांना सांगून एका मिनिटाच्या आत वसंतराव तेथून परत! मला घेऊन येताना ते परब सर किती मोठा माणूस आहे हेच सांगत होते. इकडे परब सरही आपल्या सहकाऱ्यांबद्दल तेवढ्याच आत्मीयतेने बोलत होते.

वडोदऱ्याचा मुक्काम सहाव्या दिवशी आवरता घ्यायचा ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळी घाग सरांना भेटायला बोलावलं. छोटी भेट द्यायची होती त्यांना. कामासाठी बाहेर गेलेले वसंतराव सातपर्यंत परत येतील की नाही, हे सांगता येत नव्हतं. बॅगा घेऊन, लॉजचा हिशेब पूर्ण करून मी बाहेर थांबलो होतो. तेवढ्यात ते आलेच. बॅगा पाहून त्यांनी थेट बसस्थानकावर सोडण्याची तयारी केली. बसा तुम्ही. रिक्षावाले काहीही पैसे मागतात हो, असं म्हणत त्यांनी मला बसवलंच मोटरसायकलवर.

निरोप घेताना घाग सरांनी दोन दोन वेळा सांगितलं, ‘‘तुमच्या ओळखीचं कुणी बडोद्याला येणार असेल, तर माझा नंबर द्या. अगदी मध्यरात्र झाली असली, तरी मी घ्यायला येईन. रिक्षावाले काहीही पैसे मागतात हो! खो-खो खेळणारी मुलं असतील, तर मला सांगा. त्यांची राहण्याची सगळी सोय मी करीन.’’

वडोदऱ्याच्या प्रशस्त स्थानकावर बसची वाट पाहत मी थांबलो असताना तासाभरानंतर घाग सरांचा फोन आला - बस मिळाली की नाही, याची चौकशी करायला. त्यांचा फोटो काढायला जमलंच नाही... (आता नंतर त्यांचं छायाचित्र इथं आलं, ते श्री. सुधीर परब यांच्यामुळे. त्यांनी व्हॉट्सअॅपवरून हे छायाचित्र पाठविलं.)
-x-x-x-x-x-x
चहा पितानाच लस्सीचा आग्रह करणारे केशव कुलकर्णी.
वडोदऱ्याला माझा मुक्काम सुखाचा होईल, हे पाहण्याची जबाबदारी स्वीकारली होती केशव कुलकर्णी यांनी. केसरी-लोकसत्तामधले माझे वरिष्ठ सहकारी महादेव कुलकर्णी त्यांचे चुलते. महादेवरावांनी सांगितल्यामुळं केशव कुलकर्णींनी स्वस्तात मस्त मुक्कामाची सोय केली. तुम्ही आमच्या काकांचे मित्र म्हणजे मला वडलांसारखेच, असं म्हणत सगळी सोय पाहिली. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला जाऊ म्हटल्यावर त्यांनी खास एका जागी नेलं. पुण्याहून पाहुणे आलेत हो... असं सांगत गाडीवाल्याला द बेस्ट देण्याची ऑर्डर सोडली. पोहे, उसळ शेव, भजी, फाफडा... असे एकाहून एक फर्मास पदार्थ खाऊ घातले. गरमागरम चहा पित असतानाच केशवराव म्हणाले, ‘‘इथली लस्सी फस्सक्लास असते. चहानंतर पिऊ!’’ मनातल्या मनात त्यांना दंडवत घालत लस्सीचा आग्रह मोडून काढला. परत निघालो, असं सांगण्यासाठी फोन केल्यावर हा पठ्ठ्या म्हणालाच, ‘‘माझ्या गरिबाघरचा पाहुणचार घ्यायचा राहिलाच बरं का तुमचा.’’ पुढच्या वेळी... असं आश्वासन दिलं.

... ही अशी माणसं भेटली बडोद्यात. फार संख्येनं नाही. पण भेटली तेवढी लक्षात राहणारी. वडोदऱ्याच्या पुढच्या दौऱ्यासाठी आमंत्रित करणारी!

सोमवार, १२ मार्च, २०१८

एकलव्य, अर्जुन आणि द्रोणाचार्यही

(वडोदरा विशेष - ३)
----
खो-खो जगावा लागतो, पचवावा लागतो - सुधीर परब!

· केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराचा भारतीय खेळांमधला पहिला मानकरी...
· याच पुरस्काराचा गुजरातेतील आद्य विजेता...
· देशी खेळाला अर्जुन पुरस्कार देण्याची सुरुवात माझ्यापासून होईल, असं वडिलांना सांगणारा...
· राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी असलेला एकलव्य पुरस्कार देण्याचा निकष बदलण्यासाठी निमित्त ठरलेला अष्टपैलू...
· खो-खोचा डाव सुरू होताच पहिल्या२० सेकंदांतच ३ गडी टिपण्याचा पराक्रम...
· वयाच्या पंचाहत्तरीतही रोज नियमाने मैदानावर उपस्थित राहून खेळाडू घडविणारा मार्गदर्शक-संघटक...


या माणसाची ओळख पटविण्यासाठी तीन शब्द पुरेसे, नऊ अक्षरं - सुधीर भास्कर परब!

साहित्य संमेलनासाठी वडोदऱ्यात पोहोचलो, त्याच दिवशी सकाळी जुना खो-खोपटू निर्मलचंद्र थोरात यानं फोन करून सांगितलं की, सुधीर परब यांना भेट. मध्यस्थ रमतचे जुने खो-खो खेळाडू आहेत. एकलव्य पारितोषिक त्यांना दोनदा मिळालंय.’ (ते गुजरात क्रीडा मंडळाचे हे नंतर स्पष्ट झालं.)


शाळकरी वयात मध्यस्थ रमत, हॅपी वाँडरर्स या महाराष्ट्राबाहेरच्या क्रीडा मंडळांची नावं ऐकली होती. तिथल्या बऱ्याच खेळाडूंचीही नावं वाचून माहीत होती. पण आता हे दोन्ही संघ बातम्यांमध्ये येत नसल्याने ही नावं आठवणींच्या कोपऱ्यात दडलेली. त्यातलंच हे एक. निर्मलनं सुचवलं खरं, पण त्यांचा संपर्क क्रमांक कुठून मिळवायचा. मग नाशिकच्या मंदार देशमुखला साकडं घातलं. मंदार महाराष्ट्र खो-खो संघटनेचा कार्याध्यक्ष; त्याहून महत्त्वाचं म्हणजे चांगला संघटक. त्याचा सुरतेच्या खो-खो क्लबशी संपर्क. तिथून तो सुधीर परब यांचा क्रमांक मिळवून देईल, असं वाटलं होतं नि तसंच झालं.

संपर्काचा क्रमांक मिळताच परब यांना सविस्तर निरोप पाठविला व्हॉट्सअॅपवरून. कोण, काय, कशासाठी भेटू इच्छितो इत्यादी. त्यानंतर उत्तराची पाऊण तास वाट पाहिली नि लक्षात आलं की, त्यांनी निरोप अजून वाचलेलाच नाही! थेट फोन लावला. अनोळखी नंबर. ते फोन उचलतात की नाही, अशी भीती. पण तसं काहीच झालं नाही. पहिल्या मिनिटात ओळख सांगितली नि परब सरांनी लगेच सांगितलं, ‘‘पोलो मैदानाजवळच्या यूथ सर्व्हिस सेंटरवर या.’’ सविस्तर पत्ता, रिक्षावाल्याला सांगायच्या खुणा याचीही माहिती दिली.

पोलो मैदान माहीत होतं. पायी चाललं की शहराची माहिती होते, असा समज आणि स्वतःच्या पायांवर दांडगा विश्वास. त्यामुळे रिक्षा टाळून कूच केली. तीन जणांना विचारत, खात्री करत नेमकं एक चौक अलीकडंच वळलो. तासाभरानं परब सरांचा फोन. च् च् करीत ते म्हणाले, ‘‘आहात तिथंच थांबा. मुलगा पाठवतो घ्यायला.’’ 

यूथ सर्व्हिस सेंटरवर पोहोचलो आणि गप्पा सुरू झाल्या. जवळचं पुस्तक परब सरांना भेट देताना आगाऊपणा केला. विचारलं, पुस्तकं वाचायला आवडतात का?’ (खेळाडूचा आणि वाचनाचा काय संबंध, असा आपला रुजलेला गैरसमज.) हो असं सरळ उत्तर देताना सरांनी सुरुवात केली ती जागतिक साहित्यात अभिजात म्हणून गणना होणाऱ्या थ्री मस्केटीअर्सवर बोलायला. अलेक्झांडर ड्युमाच्या त्या तीन शिलेदारांचं महत्त्व रसाळपणे सांगू लागले. त्यांची निष्ठा आणि खेळ याचा संबंध जोडून ते भरभरून बोलू लागले. सरांनी त्यांना शाळकरी वयात वाचायला सुचविलेलं ते पुस्तक. त्यांनी ते पचवलं होतं...


अर्जुन पुरस्कार आणि डावीकडे
अमृतमहोत्सवानिमित्तचं गौरवचिन्ह

परब सरांचं लक्ष पुस्तकावरून मैदानाकडं वळवणं मला आवश्यक होतं. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला एकलव्य पुरस्कार दिला जातो. कोणत्याही खेळाडूला हा पुरस्कार एकदाच देण्यात यावा, असा त्याचा निकष बदलण्याचं कारण ठरलेल्या सुधीर परब यांच्याकडून अंदर की बात जाणून घ्यायची होती. हा पुरस्कार दोन वेळा मिळविणारे ते एकमेवाद्वितीय. गुजरातेतली खो-खोची लोकप्रियता आणि त्यात आघाडीवर असलेली मराठमोळी नावं, याचंही रहस्य माहीत करून घ्यायचं होतं. सरांचा क्रीडाप्रवास त्यांच्याच तोंडून ऐकायचा होता. त्यामुळेच ड्युमाच्या संमोहनातून सर बाहेर निघणं आवश्यक होतं.

अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेचा सुवर्णमहोत्सव १९५४मध्ये झाला. त्यानिमित्त अखिल भारतीय खो-खो स्पर्धा आयोजित केली होती.  गुजरात क्रीडा मंडळाकडून सुधीर परब यांनी पदार्पण केलं. त्यांचं वय होतं ११. त्यांच्या संघाचं नेतृत्व होतं जयवंत लेले यांच्याकडे. (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्वाधिक गाजलेले सरचिटणीस म्हणून लेले यांचा नक्कीच उल्लेख करता येईल. एवढे गाजलेले लेले किती साधे होते आणि शेवटपर्यंत कसे साध्या घरात राहत होते, हे परब सरांनी बोलता बोलता सांगून टाकलं.) या स्पर्धेचा अंतिम सामना पुणे आणि बडोदे संघांमध्ये झाला. श्रीकांत टिळक, नंदू घाटे, अविनाश भावे आदी जुन्या खेळाडूंच्या आठवणी मग ओघानेच आल्या. श्रीकांत टिळक हातात घड्याळ बांधून खेळत आणि राउंड गेम त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य, हेही त्यांनी बोलता बोलता सांगून टाकलं. तब्बल सहा दशकांनंतरही त्यांना प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू आणि त्यांची वैशिष्ट्यं आठवत होती.

आठवणींचा ओघ सुरू होता. त्या गप्पांमध्ये एक गोष्ट लक्षात आली - काही अडलं, तर ती साखळी जुळल्याशिवाय परब सर पुढे सरकतच नव्हते. आजूबाजूला बसलेल्या मित्रांना विचारत, नकाशा काढायला लावत. असंच काही तरी होतं... म्हणत ते पुढची पायरी गाठत नसत. परिपूर्णतेचा ध्यास! त्या काळात एक खेळ-एक संघटना असं काही रुजलं नव्हतं. अखिल भारतीय स्पर्धा होत त्या विविध मंडळांच्या संघांच्या. धारवाडपासून गुजरातपर्यंत एकच राज्य असलेल्या बृहन्मुंबई राज्याचा क्रीडा महोत्सव ५४-५५मध्ये सुरू झाला. द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यासाठी पैसा कसा उभा केला? तर रेसच्या बक्षिसांमधील काही ठरावीक निधी या महोत्सवासाठी वळवला, अशी गमतीदार आठवण परब सरांनी सांगितली. म्हणजे घोडे जिंकत आणि खो-खोपटू पळत!

मुद्दा असा बारकाईनं स्पष्ट केला जातो
डभोईत राहणाऱ्या सुधीर परब यांचं खेळाशी नातं तिथल्या शाळेत १९४७मध्येच जुळलं. सर्व इयत्तांना शिकविणाऱ्या राऊबाई सपकाळ आणि व्यायाम शिक्षक बाबूराव सोंडकर यांची नावं आजही त्यांच्या ओठावर आहेत. लंगडीपासून सुरुवात झाली. (त्यांचं लंगडी प्रेम आणि ते लंगडीचं माहात्म्य ज्या पद्धतीनं सांगतात, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) तिसरीनंतर पुढच्या शिक्षणासाठी ते बडोद्यात आजीकडं आले. सोबत बहीण लता परब होतीच. पहिल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेली खो-खोपटू, अशी त्यांची ओळख. गुजरात क्रीडा मंडळाच्या मैदानावर १९५०मध्ये निकुंज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर परब यांचा लंगडीचा सराव सुरू झाला. तेव्हाच्या बडोद्याचं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले, ‘‘सर्व महाराष्ट्रीय मंडळी मुलांना तालमीत नाही तर गुरुवर्य वसंतराव कप्तान यांच्या गुजरात क्रीडा मंडळात पाठवत. लंगडी सहसा एका पायानं शिकतात. पण आम्हाला दोन्ही पायांनी लंगडी घालायला शिकवलं. त्याचा पदन्यासासाठी फार मोठा फायदा झाला.’’ आधी लंगडी, त्यात प्रावीण्य मिळाल्यावर दमसास वाढविण्यासाठी कबड्डी आणि मग बुद्धिचापल्यासाठी आट्यापाट्या असा खेळाडूंचा प्रवास असे.

गप्पा रंगत होत्या आणि संध्याकाळ संपून घड्याळाचे काटे रात्रीची वेळ दाखवत होते. आता हे सारं अर्ध्यावरच सोडावं लागणार, अशी चुटपूट लागली होती. तेवढ्यात सुधीर सरांनी विचारलं, ‘‘उद्या काय करताय?’’ दुसऱ्या दिवशी डाकोरनाथजींच्या दर्शनासाठी जाण्याचं ठरवलं होतं. पण सरांनी सांगितलं, ‘‘घरी या सकाळी साडेनऊ वाजता.’’ न जाताच डाकोरजी प्रसन्न झाले होते! मी कुठं राहतो, तिथून मला कोण न्यायला येईल आणि घरी सोडेल, याचा तपशील सरांनी तिथंच ठरवून टाकला. त्यांचे जुने सहकारी वसंतराव घाग यांना फोन करून माझा क्रमांकही दिला.

डाव अर्ध्यावर मोडला नव्हता; मैफल रंगायची होती. मंजलपूर भागातील सुधीर परब यांच्या टुमदार बंगल्यात (बंगला नाही हो, साधं घर म्हणा!’... इति सर) बरोबर साडेनऊ वाजता पोहोचलो. स्वहस्ते चहा बनवून सरांनी आणून ठेवला आणि गप्पाष्टकाचा पुढचा अध्याय सुरू. पुढे अडीच-तीन तास रंगलेला. गुरू बाबूराव सुर्वे यांचं नाव सर वारंवार आपुलकीनं घेत होते. गुजरात क्रीडा मंडळाच्या असंख्य खेळाडूंची नावं त्यांच्या स्मृतिकोशातून लगेच ओठांवर येत होती. योगेश यादव, निशिगंध देशपांडे, प्रवीण हरपळे, वसंतराव घाग, योगेंद्र देसाई, मराठीतला पहिला व्यायामकोश तयार करणारे आबासाहेब मुजुमदार, त्र्यंबकराव लेले, मधू मोरे, भाऊ तांबे... वर्ष, स्पर्धा स्थळ, असा अगदी बारीकसारीक तपशील अगदी अचूकपणे सांगितला जात होता. मधली १० मिनिटं खो-खो समजावून सांगताना सरांनी त्यांच्या दिवाणखान्याचं मैदान बनवलं. लंगडी पुन्हा आलीच. लंगडी खेळण्याचा फायदा काय? आमच्याकडे रिंगणात (तुम्ही महाराष्ट्रात त्याला चौकोनात म्हणता.) आक्रमकाला तोंडावर घेताना हुलकावण्या देण्याचं कौशल्य येतं, असं सरांनी सांगितलं. आता इथं त्यांच्या भाषिक अभ्यासाचंही दर्शन घडलं. हुलकावण्यांना गुजरातीतील रूढ शब्द पलट्या आहे. पतंगबाजीतून हे शब्द आले; ‘भपकी म्हणजे समोर पटकन हूल देणे. कत्तर म्हणजे कातरी जशी सर्रकन फिरते, तसं. एकाच वेळी दोन्ही हातांनी एक-एक गडी मारल्याची आठवणही मग निघते.

आठवणी एकामागून एक निघत राहतात. खुंटाला हाताने न शिवताच पायाने स्पर्श करून परत फिरण्याचा शोध परब सरांनी जोधपूरच्या १९५९-६०च्या स्पर्धेत लावला. प्रतिस्पर्धी मोहन आजगावकर ते कौशल्य पाहून त्यावर तोड काढू पाहत होता. पण इकडे बिनतोड उपाय होता. सरांनी खो न देताच मोहनरावांना मिठीत घेऊन मामा बनवलं. तेव्हाचे नियम वेगळे होते. आक्रमण करणाऱ्या संघाकडून फाऊल झाल्यास त्यांचा अर्धा गुण कापला जाई. दोषांक पद्धतीसारखा. त्याचा १९५०च्या स्पर्धेतील अफाट किस्सा सरांच्या पोतडीत आहे. गुजरात क्रीडा मंडळाचा कर्णधार अनिल डेरे तीन मिनिटे खेळला. नंतर जुम्मादादा व्यायाम मंदिराच्या संघानं तुफानी आक्रमण केलं. ‘‘या तुफानी आक्रमणाच्या नादात त्यांच्याकडून फाऊल होऊ लागले. एवढे की, एरवी आम्ही डावाने हरलो असतो तो सामना जिंकलो!’’, हे सांगताना सरांना आताही हसू आवरत नसतं.

आधी आक्रमक असलेले सुधीर परब तेच आपलं काम मानत. पण आंतरविद्यापीठ स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळताना बाबूराव सुर्वे यांनी त्यांना सांगितलं, तू चांगला संरक्षकही आहेस. तिथून पुढे तो प्रवास सुरू झाला नामवंत अष्टपैलू खो-खोपटू घडविणारा. इथं मग त्यांनी खेळाचं तत्त्वज्ञान सांगितलं, ‘‘खो-खो पायाऐवजी डोक्याने खेळायचा खेळ आहे. मी आक्रमक म्हणून संरक्षकाच्या फक्त पायाकडे लक्ष ठेवून असे. संरक्षण करताना आक्रमक खेळाडूच्या पायांची दिशा पाहत असे.’’ ‘‘तसा मी आधी गॅलरी-शो करणारा होतो. बहिणीनं मला बदलवून टाकलं,’’ असंही ते प्रांजळपणे सांगतात.

यथावकाश भारतीय ऑलिम्पिक संघटनेत खो-खो संघटनेचा समावेश झाला. राष्ट्रीय स्पर्धा सुरू लागली. हैदराबादला १९६५मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुधीर सर पहिल्यांदा एकलव्य पुरस्काराचे मानकरी ठरले. गुरू वसंतराव कप्तान यांना एकसष्टीनिमित्त त्यांनी दिलेली ती अपूर्व भेट होती! बडोद्यात १९६७-६८मध्ये राष्ट्रीय स्पर्धा झाली. याच स्पर्धेत सुधीर परब यांनी नवनवीन विक्रमांना गवसणी घातली. संपूर्ण स्पर्धेत ते दोनदा किंवा तीनदाच बाद झाले. बरोबरीमुळे जादा डावापर्यंत गेलेल्या अंतिम सामन्यात त्यांची वेळ होती -  ५:२९ मिनिटे, ६:२५ आणि ६:४५. एकलव्य पुरस्कारासाठी त्यांच्या नावाशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्याच स्पर्धेनंतर नियम बदलला - एका खेळाडूला एकदाच हे पारितोषिक दिले जाईल!

वि. वि. क. यांच्याशी सुखसंवाद.
खजिन्यातून माहिती बाहेर पडत होती. टिपण काढताना माझी दमछाक सुरू होती. अलीकडंच म्हणजे ६ जानेवारी २०१८ रोजी सुधीर परब यांचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा झाला. त्या वेळी त्यांनी सर्व सहकाऱ्यांची आठवण काढली, त्यांचाही सत्कार करायला लावला. ते होते म्हणून मी इथपर्यंत आलो, असं सांगताना हळवा होतो स्वर त्यांचा. मग खूप जुनी जुनी नावं निघतात. त्यांना सहज विचारलं, ‘‘वि. वि. करमकर सरांशी बोलायचं का? फोन लावतो...’’ आपण आता कदाचित त्यांच्या लक्षात नसू, या भावनेनं सुधीर परब थोडं थबकतात. फोन लागतो आणि मग सुरू होतो दोन दिग्गजांचा संवाद. दहा मिनिटांच्या गप्पांनंतर सुधीर सर (पुन्हा हळवं होऊन) म्हणतात, ‘‘बरं झालं तुम्ही फोन लावला ते. त्यांच ऋण मान्य करायचं राहून गेलं होतं...’’ अशाच आठवणी मग ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या आपुलकीच्या, मोरारजीभाईंच्या, खो-खोमुळे उत्तम यष्टिरक्षक बनलेल्या किरण मोरेच्या. खूप!

बडोद्याच्या खो-खोची आज दयनीय अवस्था झाली आहे. त्याबद्दलची खंत बोलून दाखवताना सुधीर परब म्हणाले, ‘‘शिक्षणाचा पर्याय निवडावा लागतो. खो-खो खेळून कोणी नोकरी देत नाही. नोकरी नसली तर जगायचं कसं? क्लब जिवंत राहिले, तर खेळ जगेल. त्यासाठी क्लब पातळीवर आणि व्यावसायिक पातळीवर, अशा दोन स्पर्धा व्हायला हव्यात.’’

खो-खो म्हणजे ‘Relay played by 9 players’, असं सांगून सर म्हणाले, ‘‘रीलेमध्ये बॅटन द्यायचं असतं, इथं खो म्हणजे ते बॅटन देणंच. इथं क्षणात गती घ्यावी लागते नि पुढच्या क्षणी गतिहीन व्हावं लागतं. सगळ्या खेळांचा पाया खो-खो आहे. खो-खो जगावा लागतो, पचवावा लागतो!’’

सुधीर परब. मोठा खेळाडू. अजूनही मैदानाच्या बाहेर न पडलेला. खेळावरंच प्रेम किंचितही कमी न झालेला. बडोद्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी अभिमानानं सांगणारा माणूस. साहित्य, कला, संगीत, माणसं या साऱ्यांबद्दल मनस्वी आपुलकी असलेला माणूस. पुढच्या भेटीत त्यांनी मला बडोद्यातलं बरंच काही दाखवायचं आश्वासन दिलं आहे. बऱ्याच मोठमोठ्या माणसांशी ते माझी भेट घालून देणार आहेत. तसं निमंत्रण स्वीकारून तर मी त्यांचं घर सोडलं... पुन्हा येण्याच्या बोलीवरच!

मंगळवार, ६ मार्च, २०१८

नर्मदातटीचे नारेश्वर

(वडोदरा विशेष - २)
----
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं सूप वाजल्यानंतर वडोदरा आणि परिसर पाहण्यासाठी दोन-तीन दिवस मुक्काम करायचं ठरवलं होतं. (संमेलनाला गेल्यावर सूप वाजलं अशाच भारदस्त साहित्यिक भाषेत लिहायचं असतं ना!) वडोदऱ्याहून एका दिवसात जाऊन परत येता येईल, अशी ठिकाणं शोधत होतो. संमेलनस्थळी गुजरात पर्यटन महामंडळाच्या दालनातून बऱ्यापैकी माहिती मिळाली. ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांचा पुतण्या भागवत यांनी सुचविल्यानुसार नारेश्वरला जायचं ठरवलं. ते दत्त देवस्थानांपैकी एक, असं त्यांनी सांगितलं.

वडोदऱ्याच्या प्रशस्त बसस्थानकावरून सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास नारेश्वर धामसाठी बस असते आणि तिथून परतायला दीड वाजता. बस कुठल्या फलाटावर, किती वाजता लागते याची चौकशी करून फलाटावर उभं राहिलो, तोच एक रिकामी बस आली. तिचा वाहक नारेसर-नारेसरच ओरडत होता. (नारेसर किंवा नारेस्वर, अंकलेसर किंवा अंकलेस्वर... हे तिथले आपल्याला ऐकू येणारे उच्चार.) त्या तरुण वाहकाला (उगीचंच) मस्का लावत विचारलं, आप हमे नारेश्वर ले जायेंगे ना?’ त्यानं आश्वासक हास्यानंच उत्तर दिलं. घाई करीत बसमध्ये शिरलो. पण त्याची गरजच नव्हती. माझ्यानंतर अजून सात-आठच प्रवासी चढले आणि गाडी सुटली. नारेश्वर फारसं लोकप्रिय नसावं किंवा ही अगदीच डब्बा गाडी आहे, असं प्रवाशाच्या संख्येवरून वाटलं. आणखी दोन-तीन जणांनी नारेश्वरचं तिकीट घेतल्यावर योग्य गाडीत बसल्याचा दिलासा मिळाला.

ही रिकामी बस साधू वासवानी चौकातल्या थांब्यावरच ओसंडून भरू लागली. तिथनं पुढं हात दाखवा, गाडी थांबवा, थोडे प्रवासी उतरवा नि भरपूर प्रवासी चढवा असा प्रकार सुरू होता. या ७२ किलोमीटरच्या प्रवासाला साधारण दोन तास लागले आणि तिकीट फक्त ३७ रुपये. रस्ता चांगलाच होता.

श्रीरंगावधूत महाराज मंदिराचं प्रवेशद्वार बाहेरून आणि आतून असं दिसतं.
नारेश्वर दत्तसंप्रदायातलं महत्त्वाचं ठिकाण आहे. श्रीरंग अवधूत (तिथं उच्चार श्रीरंगावधूत असाच करतात.) दत्तसंप्रदायातले महत्त्वाचे संत-कवी. अनुयायी-भाविक त्यांना दत्तात्रेयाचा अवतार मानतात. गुजरातमध्ये दत्तसंप्रदायाच्या प्रसाराचं मोठं काम त्यांनी केलं. (अधिक तपशील - https://en.wikipedia.org/wiki/Rang_Avadhoot). मंदिराच्या अगदी जवळच बसथांबा आहे. मंदिर प्रशस्त आणि शांत. आवारात आपल्या पद्धतीप्रमाणे अन्य छोटी-मोठी मंदिरे. रंगावधूत स्वामींची मोठी मूर्ती आहे. मुक्कामाची आणि दोन्ही वेळच्या प्रसादाची सोय आहे. मंदिरात छायाचित्रं काढायला मनाई असल्याचा फलक होता. पण नेमकी कुठली छायाचित्र काढायला मनाई आणि कुठली काढता येतील, हे न कळल्यानं प्रवेशद्वाराची आणि भोजनगृहाची छायाचित्रं घेतली.


इथं येण्याचं मुख्य आकर्षण होतं नर्मदामैया. परिक्रमेची चार-पाच पुस्तकं वाचली आतापर्यंत. तेव्हापासून नर्मदेविषयीची उत्कंठा वाढलेली. तिचं दर्शन घ्यायचं होतं. मंदिरात दर्शन घेऊन विचारत नर्मदामैयाकडं गेलो. श्रीरंग सेवा घाट - नऊ वर्षांपूर्वी तयार झालेला हा घाट भक्कम आणि चांगला आहे. पण तरीही त्याला थोडी कळा आलेली वाटली. घाट उतरतानाच नर्मदेचं घडलेलं दर्शन तेवढं विलोभनीय नव्हतं. पात्रात पाणी होतं, पण नदी दुथडी भरून वाहताना दिसली नाही. एका छोट्या शाळेची सहल होती तिथं. त्यातल्या विद्यार्थ्यांना पाहून आलेले उंटवाले. विस्तीर्ण वाळवंटात चौपाटी. सकाळ जेमतेम संपून दुपार होत असल्याने त्या चौपाटीवर आळसावलेली शांतता. लोकांना पलीकडच्या गावात ने-आण करणारी एक बोट. स्वतःचं काही तरी हरवल्यासारखं पाण्यात ऐवज शोधणारा तरुण. बहुदा परिक्रमावासीयांनी पूजेसाठी केलेल्या पात्रातील महादेवाच्या पिंडी. डुंबणाऱ्या म्हशी. थोड्या दूरवर सुरू असलेला वाळूचा जोरदार उपसा. त्याच्या यंत्रांची घरघर आणि मालमोटारींची थरथर. चौपाटी म्हटल्यावर अपरिहार्य असलेला कचरा. हे दृश्य काही फार मनोहर नाही वाटलं. तसं ते नव्हतंच.
नारेश्वरच्या श्रीरंग सेवा घाटावरून घडलेलं नर्मदामातेचं पहिलं दर्शन.
नर्मदामैयाला पुन्हा भेटायला यायचं कबूल करून देवस्थानातल्या भोजनगृहाकडं वळलो. मोठी रांग असूनही शांततेत प्रसाद वाढणं-घेणं सुरू होतं. भात-आमटी, मसालेदार दिसणारी पण तिखट नसणारी वांगी-वाटाण्याची भाजी आणि बर्फी. वडोदऱ्याच्या परतीच्या प्रवासासाठी थांब्यावर येऊन थांबलो आणि अचानक नर्मदा परिक्रमेला निघालेले भाविक भेटले. त्यांच्याबरोबर परिक्रमेला निघण्याचा आग्रह कसाबसा नाकारून निघालो. त्या विषयी नंतर. तूर्तास नर्मदेच्या पहिल्यावहिल्या भेटीची ही काही छायाचित्रं...


नर्मदेच्या वाळवंटात थाटलेली ही चौपाटी. गेला तेव्हा दुपार असल्याने तिथं सारी सामसूम होती.
(खालचं छायाचित्र) या बाई मात्र उकडलेली मक्याची कणसं घेऊन होत्या तिथं. 












कंबरभर पाण्यात उभं राहून चाललेली ही साधना नव्हे,
तर मोलाचं काही गवसावं यासाठीचे श्रम आहेत!


नर्मदेच्या पात्रात झालेली शिवलिंगांची पूजा.


सहलीला आलेल्या मुलांची घोडेस्वारी.
उंटावरचे शहाणे होण्यास मात्र कुणी तयार नव्हतं.


संध्याकाळपर्यंत काहीच काम नसल्यानं वाळूत तोंड खुपसण्याच्या बेतात असलेला रईस.


नदीकाठी वाळूची चलती. महाराष्ट्राप्रमाणंच
इथंही वाळूचा उपसा असा जोरात सुरू असलेला दिसला.














तुरीच्या ओल्या शेंगा घ्यायच्या की सोललेले दाणे?


सहलीसाठी आल्यावर सहभोजनाचा आनंद
आणि तोही प्रसादालयात.


नारेश्वरहून पलीकडच्या तिरावरच्या गावात ने-आण करणारी नाव. यंत्रावर चालते ती.
माणसांसह वाहनांना ले चल पारचं काम दिवसभर सुरू असतं. एका फेरीचं भाडं १० रुपये.


डायरीची चाळता पाने...

थोडी आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी ना...