सोमवार, १२ मार्च, २०१८

एकलव्य, अर्जुन आणि द्रोणाचार्यही

(वडोदरा विशेष - ३)
----
खो-खो जगावा लागतो, पचवावा लागतो - सुधीर परब!

· केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराचा भारतीय खेळांमधला पहिला मानकरी...
· याच पुरस्काराचा गुजरातेतील आद्य विजेता...
· देशी खेळाला अर्जुन पुरस्कार देण्याची सुरुवात माझ्यापासून होईल, असं वडिलांना सांगणारा...
· राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी असलेला एकलव्य पुरस्कार देण्याचा निकष बदलण्यासाठी निमित्त ठरलेला अष्टपैलू...
· खो-खोचा डाव सुरू होताच पहिल्या२० सेकंदांतच ३ गडी टिपण्याचा पराक्रम...
· वयाच्या पंचाहत्तरीतही रोज नियमाने मैदानावर उपस्थित राहून खेळाडू घडविणारा मार्गदर्शक-संघटक...


या माणसाची ओळख पटविण्यासाठी तीन शब्द पुरेसे, नऊ अक्षरं - सुधीर भास्कर परब!

साहित्य संमेलनासाठी वडोदऱ्यात पोहोचलो, त्याच दिवशी सकाळी जुना खो-खोपटू निर्मलचंद्र थोरात यानं फोन करून सांगितलं की, सुधीर परब यांना भेट. मध्यस्थ रमतचे जुने खो-खो खेळाडू आहेत. एकलव्य पारितोषिक त्यांना दोनदा मिळालंय.’ (ते गुजरात क्रीडा मंडळाचे हे नंतर स्पष्ट झालं.)


शाळकरी वयात मध्यस्थ रमत, हॅपी वाँडरर्स या महाराष्ट्राबाहेरच्या क्रीडा मंडळांची नावं ऐकली होती. तिथल्या बऱ्याच खेळाडूंचीही नावं वाचून माहीत होती. पण आता हे दोन्ही संघ बातम्यांमध्ये येत नसल्याने ही नावं आठवणींच्या कोपऱ्यात दडलेली. त्यातलंच हे एक. निर्मलनं सुचवलं खरं, पण त्यांचा संपर्क क्रमांक कुठून मिळवायचा. मग नाशिकच्या मंदार देशमुखला साकडं घातलं. मंदार महाराष्ट्र खो-खो संघटनेचा कार्याध्यक्ष; त्याहून महत्त्वाचं म्हणजे चांगला संघटक. त्याचा सुरतेच्या खो-खो क्लबशी संपर्क. तिथून तो सुधीर परब यांचा क्रमांक मिळवून देईल, असं वाटलं होतं नि तसंच झालं.

संपर्काचा क्रमांक मिळताच परब यांना सविस्तर निरोप पाठविला व्हॉट्सअॅपवरून. कोण, काय, कशासाठी भेटू इच्छितो इत्यादी. त्यानंतर उत्तराची पाऊण तास वाट पाहिली नि लक्षात आलं की, त्यांनी निरोप अजून वाचलेलाच नाही! थेट फोन लावला. अनोळखी नंबर. ते फोन उचलतात की नाही, अशी भीती. पण तसं काहीच झालं नाही. पहिल्या मिनिटात ओळख सांगितली नि परब सरांनी लगेच सांगितलं, ‘‘पोलो मैदानाजवळच्या यूथ सर्व्हिस सेंटरवर या.’’ सविस्तर पत्ता, रिक्षावाल्याला सांगायच्या खुणा याचीही माहिती दिली.

पोलो मैदान माहीत होतं. पायी चाललं की शहराची माहिती होते, असा समज आणि स्वतःच्या पायांवर दांडगा विश्वास. त्यामुळे रिक्षा टाळून कूच केली. तीन जणांना विचारत, खात्री करत नेमकं एक चौक अलीकडंच वळलो. तासाभरानं परब सरांचा फोन. च् च् करीत ते म्हणाले, ‘‘आहात तिथंच थांबा. मुलगा पाठवतो घ्यायला.’’ 

यूथ सर्व्हिस सेंटरवर पोहोचलो आणि गप्पा सुरू झाल्या. जवळचं पुस्तक परब सरांना भेट देताना आगाऊपणा केला. विचारलं, पुस्तकं वाचायला आवडतात का?’ (खेळाडूचा आणि वाचनाचा काय संबंध, असा आपला रुजलेला गैरसमज.) हो असं सरळ उत्तर देताना सरांनी सुरुवात केली ती जागतिक साहित्यात अभिजात म्हणून गणना होणाऱ्या थ्री मस्केटीअर्सवर बोलायला. अलेक्झांडर ड्युमाच्या त्या तीन शिलेदारांचं महत्त्व रसाळपणे सांगू लागले. त्यांची निष्ठा आणि खेळ याचा संबंध जोडून ते भरभरून बोलू लागले. सरांनी त्यांना शाळकरी वयात वाचायला सुचविलेलं ते पुस्तक. त्यांनी ते पचवलं होतं...


अर्जुन पुरस्कार आणि डावीकडे
अमृतमहोत्सवानिमित्तचं गौरवचिन्ह

परब सरांचं लक्ष पुस्तकावरून मैदानाकडं वळवणं मला आवश्यक होतं. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला एकलव्य पुरस्कार दिला जातो. कोणत्याही खेळाडूला हा पुरस्कार एकदाच देण्यात यावा, असा त्याचा निकष बदलण्याचं कारण ठरलेल्या सुधीर परब यांच्याकडून अंदर की बात जाणून घ्यायची होती. हा पुरस्कार दोन वेळा मिळविणारे ते एकमेवाद्वितीय. गुजरातेतली खो-खोची लोकप्रियता आणि त्यात आघाडीवर असलेली मराठमोळी नावं, याचंही रहस्य माहीत करून घ्यायचं होतं. सरांचा क्रीडाप्रवास त्यांच्याच तोंडून ऐकायचा होता. त्यामुळेच ड्युमाच्या संमोहनातून सर बाहेर निघणं आवश्यक होतं.

अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेचा सुवर्णमहोत्सव १९५४मध्ये झाला. त्यानिमित्त अखिल भारतीय खो-खो स्पर्धा आयोजित केली होती.  गुजरात क्रीडा मंडळाकडून सुधीर परब यांनी पदार्पण केलं. त्यांचं वय होतं ११. त्यांच्या संघाचं नेतृत्व होतं जयवंत लेले यांच्याकडे. (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्वाधिक गाजलेले सरचिटणीस म्हणून लेले यांचा नक्कीच उल्लेख करता येईल. एवढे गाजलेले लेले किती साधे होते आणि शेवटपर्यंत कसे साध्या घरात राहत होते, हे परब सरांनी बोलता बोलता सांगून टाकलं.) या स्पर्धेचा अंतिम सामना पुणे आणि बडोदे संघांमध्ये झाला. श्रीकांत टिळक, नंदू घाटे, अविनाश भावे आदी जुन्या खेळाडूंच्या आठवणी मग ओघानेच आल्या. श्रीकांत टिळक हातात घड्याळ बांधून खेळत आणि राउंड गेम त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य, हेही त्यांनी बोलता बोलता सांगून टाकलं. तब्बल सहा दशकांनंतरही त्यांना प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू आणि त्यांची वैशिष्ट्यं आठवत होती.

आठवणींचा ओघ सुरू होता. त्या गप्पांमध्ये एक गोष्ट लक्षात आली - काही अडलं, तर ती साखळी जुळल्याशिवाय परब सर पुढे सरकतच नव्हते. आजूबाजूला बसलेल्या मित्रांना विचारत, नकाशा काढायला लावत. असंच काही तरी होतं... म्हणत ते पुढची पायरी गाठत नसत. परिपूर्णतेचा ध्यास! त्या काळात एक खेळ-एक संघटना असं काही रुजलं नव्हतं. अखिल भारतीय स्पर्धा होत त्या विविध मंडळांच्या संघांच्या. धारवाडपासून गुजरातपर्यंत एकच राज्य असलेल्या बृहन्मुंबई राज्याचा क्रीडा महोत्सव ५४-५५मध्ये सुरू झाला. द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यासाठी पैसा कसा उभा केला? तर रेसच्या बक्षिसांमधील काही ठरावीक निधी या महोत्सवासाठी वळवला, अशी गमतीदार आठवण परब सरांनी सांगितली. म्हणजे घोडे जिंकत आणि खो-खोपटू पळत!

मुद्दा असा बारकाईनं स्पष्ट केला जातो
डभोईत राहणाऱ्या सुधीर परब यांचं खेळाशी नातं तिथल्या शाळेत १९४७मध्येच जुळलं. सर्व इयत्तांना शिकविणाऱ्या राऊबाई सपकाळ आणि व्यायाम शिक्षक बाबूराव सोंडकर यांची नावं आजही त्यांच्या ओठावर आहेत. लंगडीपासून सुरुवात झाली. (त्यांचं लंगडी प्रेम आणि ते लंगडीचं माहात्म्य ज्या पद्धतीनं सांगतात, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) तिसरीनंतर पुढच्या शिक्षणासाठी ते बडोद्यात आजीकडं आले. सोबत बहीण लता परब होतीच. पहिल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेली खो-खोपटू, अशी त्यांची ओळख. गुजरात क्रीडा मंडळाच्या मैदानावर १९५०मध्ये निकुंज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर परब यांचा लंगडीचा सराव सुरू झाला. तेव्हाच्या बडोद्याचं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले, ‘‘सर्व महाराष्ट्रीय मंडळी मुलांना तालमीत नाही तर गुरुवर्य वसंतराव कप्तान यांच्या गुजरात क्रीडा मंडळात पाठवत. लंगडी सहसा एका पायानं शिकतात. पण आम्हाला दोन्ही पायांनी लंगडी घालायला शिकवलं. त्याचा पदन्यासासाठी फार मोठा फायदा झाला.’’ आधी लंगडी, त्यात प्रावीण्य मिळाल्यावर दमसास वाढविण्यासाठी कबड्डी आणि मग बुद्धिचापल्यासाठी आट्यापाट्या असा खेळाडूंचा प्रवास असे.

गप्पा रंगत होत्या आणि संध्याकाळ संपून घड्याळाचे काटे रात्रीची वेळ दाखवत होते. आता हे सारं अर्ध्यावरच सोडावं लागणार, अशी चुटपूट लागली होती. तेवढ्यात सुधीर सरांनी विचारलं, ‘‘उद्या काय करताय?’’ दुसऱ्या दिवशी डाकोरनाथजींच्या दर्शनासाठी जाण्याचं ठरवलं होतं. पण सरांनी सांगितलं, ‘‘घरी या सकाळी साडेनऊ वाजता.’’ न जाताच डाकोरजी प्रसन्न झाले होते! मी कुठं राहतो, तिथून मला कोण न्यायला येईल आणि घरी सोडेल, याचा तपशील सरांनी तिथंच ठरवून टाकला. त्यांचे जुने सहकारी वसंतराव घाग यांना फोन करून माझा क्रमांकही दिला.

डाव अर्ध्यावर मोडला नव्हता; मैफल रंगायची होती. मंजलपूर भागातील सुधीर परब यांच्या टुमदार बंगल्यात (बंगला नाही हो, साधं घर म्हणा!’... इति सर) बरोबर साडेनऊ वाजता पोहोचलो. स्वहस्ते चहा बनवून सरांनी आणून ठेवला आणि गप्पाष्टकाचा पुढचा अध्याय सुरू. पुढे अडीच-तीन तास रंगलेला. गुरू बाबूराव सुर्वे यांचं नाव सर वारंवार आपुलकीनं घेत होते. गुजरात क्रीडा मंडळाच्या असंख्य खेळाडूंची नावं त्यांच्या स्मृतिकोशातून लगेच ओठांवर येत होती. योगेश यादव, निशिगंध देशपांडे, प्रवीण हरपळे, वसंतराव घाग, योगेंद्र देसाई, मराठीतला पहिला व्यायामकोश तयार करणारे आबासाहेब मुजुमदार, त्र्यंबकराव लेले, मधू मोरे, भाऊ तांबे... वर्ष, स्पर्धा स्थळ, असा अगदी बारीकसारीक तपशील अगदी अचूकपणे सांगितला जात होता. मधली १० मिनिटं खो-खो समजावून सांगताना सरांनी त्यांच्या दिवाणखान्याचं मैदान बनवलं. लंगडी पुन्हा आलीच. लंगडी खेळण्याचा फायदा काय? आमच्याकडे रिंगणात (तुम्ही महाराष्ट्रात त्याला चौकोनात म्हणता.) आक्रमकाला तोंडावर घेताना हुलकावण्या देण्याचं कौशल्य येतं, असं सरांनी सांगितलं. आता इथं त्यांच्या भाषिक अभ्यासाचंही दर्शन घडलं. हुलकावण्यांना गुजरातीतील रूढ शब्द पलट्या आहे. पतंगबाजीतून हे शब्द आले; ‘भपकी म्हणजे समोर पटकन हूल देणे. कत्तर म्हणजे कातरी जशी सर्रकन फिरते, तसं. एकाच वेळी दोन्ही हातांनी एक-एक गडी मारल्याची आठवणही मग निघते.

आठवणी एकामागून एक निघत राहतात. खुंटाला हाताने न शिवताच पायाने स्पर्श करून परत फिरण्याचा शोध परब सरांनी जोधपूरच्या १९५९-६०च्या स्पर्धेत लावला. प्रतिस्पर्धी मोहन आजगावकर ते कौशल्य पाहून त्यावर तोड काढू पाहत होता. पण इकडे बिनतोड उपाय होता. सरांनी खो न देताच मोहनरावांना मिठीत घेऊन मामा बनवलं. तेव्हाचे नियम वेगळे होते. आक्रमण करणाऱ्या संघाकडून फाऊल झाल्यास त्यांचा अर्धा गुण कापला जाई. दोषांक पद्धतीसारखा. त्याचा १९५०च्या स्पर्धेतील अफाट किस्सा सरांच्या पोतडीत आहे. गुजरात क्रीडा मंडळाचा कर्णधार अनिल डेरे तीन मिनिटे खेळला. नंतर जुम्मादादा व्यायाम मंदिराच्या संघानं तुफानी आक्रमण केलं. ‘‘या तुफानी आक्रमणाच्या नादात त्यांच्याकडून फाऊल होऊ लागले. एवढे की, एरवी आम्ही डावाने हरलो असतो तो सामना जिंकलो!’’, हे सांगताना सरांना आताही हसू आवरत नसतं.

आधी आक्रमक असलेले सुधीर परब तेच आपलं काम मानत. पण आंतरविद्यापीठ स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळताना बाबूराव सुर्वे यांनी त्यांना सांगितलं, तू चांगला संरक्षकही आहेस. तिथून पुढे तो प्रवास सुरू झाला नामवंत अष्टपैलू खो-खोपटू घडविणारा. इथं मग त्यांनी खेळाचं तत्त्वज्ञान सांगितलं, ‘‘खो-खो पायाऐवजी डोक्याने खेळायचा खेळ आहे. मी आक्रमक म्हणून संरक्षकाच्या फक्त पायाकडे लक्ष ठेवून असे. संरक्षण करताना आक्रमक खेळाडूच्या पायांची दिशा पाहत असे.’’ ‘‘तसा मी आधी गॅलरी-शो करणारा होतो. बहिणीनं मला बदलवून टाकलं,’’ असंही ते प्रांजळपणे सांगतात.

यथावकाश भारतीय ऑलिम्पिक संघटनेत खो-खो संघटनेचा समावेश झाला. राष्ट्रीय स्पर्धा सुरू लागली. हैदराबादला १९६५मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुधीर सर पहिल्यांदा एकलव्य पुरस्काराचे मानकरी ठरले. गुरू वसंतराव कप्तान यांना एकसष्टीनिमित्त त्यांनी दिलेली ती अपूर्व भेट होती! बडोद्यात १९६७-६८मध्ये राष्ट्रीय स्पर्धा झाली. याच स्पर्धेत सुधीर परब यांनी नवनवीन विक्रमांना गवसणी घातली. संपूर्ण स्पर्धेत ते दोनदा किंवा तीनदाच बाद झाले. बरोबरीमुळे जादा डावापर्यंत गेलेल्या अंतिम सामन्यात त्यांची वेळ होती -  ५:२९ मिनिटे, ६:२५ आणि ६:४५. एकलव्य पुरस्कारासाठी त्यांच्या नावाशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्याच स्पर्धेनंतर नियम बदलला - एका खेळाडूला एकदाच हे पारितोषिक दिले जाईल!

वि. वि. क. यांच्याशी सुखसंवाद.
खजिन्यातून माहिती बाहेर पडत होती. टिपण काढताना माझी दमछाक सुरू होती. अलीकडंच म्हणजे ६ जानेवारी २०१८ रोजी सुधीर परब यांचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा झाला. त्या वेळी त्यांनी सर्व सहकाऱ्यांची आठवण काढली, त्यांचाही सत्कार करायला लावला. ते होते म्हणून मी इथपर्यंत आलो, असं सांगताना हळवा होतो स्वर त्यांचा. मग खूप जुनी जुनी नावं निघतात. त्यांना सहज विचारलं, ‘‘वि. वि. करमकर सरांशी बोलायचं का? फोन लावतो...’’ आपण आता कदाचित त्यांच्या लक्षात नसू, या भावनेनं सुधीर परब थोडं थबकतात. फोन लागतो आणि मग सुरू होतो दोन दिग्गजांचा संवाद. दहा मिनिटांच्या गप्पांनंतर सुधीर सर (पुन्हा हळवं होऊन) म्हणतात, ‘‘बरं झालं तुम्ही फोन लावला ते. त्यांच ऋण मान्य करायचं राहून गेलं होतं...’’ अशाच आठवणी मग ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या आपुलकीच्या, मोरारजीभाईंच्या, खो-खोमुळे उत्तम यष्टिरक्षक बनलेल्या किरण मोरेच्या. खूप!

बडोद्याच्या खो-खोची आज दयनीय अवस्था झाली आहे. त्याबद्दलची खंत बोलून दाखवताना सुधीर परब म्हणाले, ‘‘शिक्षणाचा पर्याय निवडावा लागतो. खो-खो खेळून कोणी नोकरी देत नाही. नोकरी नसली तर जगायचं कसं? क्लब जिवंत राहिले, तर खेळ जगेल. त्यासाठी क्लब पातळीवर आणि व्यावसायिक पातळीवर, अशा दोन स्पर्धा व्हायला हव्यात.’’

खो-खो म्हणजे ‘Relay played by 9 players’, असं सांगून सर म्हणाले, ‘‘रीलेमध्ये बॅटन द्यायचं असतं, इथं खो म्हणजे ते बॅटन देणंच. इथं क्षणात गती घ्यावी लागते नि पुढच्या क्षणी गतिहीन व्हावं लागतं. सगळ्या खेळांचा पाया खो-खो आहे. खो-खो जगावा लागतो, पचवावा लागतो!’’

सुधीर परब. मोठा खेळाडू. अजूनही मैदानाच्या बाहेर न पडलेला. खेळावरंच प्रेम किंचितही कमी न झालेला. बडोद्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी अभिमानानं सांगणारा माणूस. साहित्य, कला, संगीत, माणसं या साऱ्यांबद्दल मनस्वी आपुलकी असलेला माणूस. पुढच्या भेटीत त्यांनी मला बडोद्यातलं बरंच काही दाखवायचं आश्वासन दिलं आहे. बऱ्याच मोठमोठ्या माणसांशी ते माझी भेट घालून देणार आहेत. तसं निमंत्रण स्वीकारून तर मी त्यांचं घर सोडलं... पुन्हा येण्याच्या बोलीवरच!

मंगळवार, ६ मार्च, २०१८

नर्मदातटीचे नारेश्वर

(वडोदरा विशेष - २)
----
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं सूप वाजल्यानंतर वडोदरा आणि परिसर पाहण्यासाठी दोन-तीन दिवस मुक्काम करायचं ठरवलं होतं. (संमेलनाला गेल्यावर सूप वाजलं अशाच भारदस्त साहित्यिक भाषेत लिहायचं असतं ना!) वडोदऱ्याहून एका दिवसात जाऊन परत येता येईल, अशी ठिकाणं शोधत होतो. संमेलनस्थळी गुजरात पर्यटन महामंडळाच्या दालनातून बऱ्यापैकी माहिती मिळाली. ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांचा पुतण्या भागवत यांनी सुचविल्यानुसार नारेश्वरला जायचं ठरवलं. ते दत्त देवस्थानांपैकी एक, असं त्यांनी सांगितलं.

वडोदऱ्याच्या प्रशस्त बसस्थानकावरून सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास नारेश्वर धामसाठी बस असते आणि तिथून परतायला दीड वाजता. बस कुठल्या फलाटावर, किती वाजता लागते याची चौकशी करून फलाटावर उभं राहिलो, तोच एक रिकामी बस आली. तिचा वाहक नारेसर-नारेसरच ओरडत होता. (नारेसर किंवा नारेस्वर, अंकलेसर किंवा अंकलेस्वर... हे तिथले आपल्याला ऐकू येणारे उच्चार.) त्या तरुण वाहकाला (उगीचंच) मस्का लावत विचारलं, आप हमे नारेश्वर ले जायेंगे ना?’ त्यानं आश्वासक हास्यानंच उत्तर दिलं. घाई करीत बसमध्ये शिरलो. पण त्याची गरजच नव्हती. माझ्यानंतर अजून सात-आठच प्रवासी चढले आणि गाडी सुटली. नारेश्वर फारसं लोकप्रिय नसावं किंवा ही अगदीच डब्बा गाडी आहे, असं प्रवाशाच्या संख्येवरून वाटलं. आणखी दोन-तीन जणांनी नारेश्वरचं तिकीट घेतल्यावर योग्य गाडीत बसल्याचा दिलासा मिळाला.

ही रिकामी बस साधू वासवानी चौकातल्या थांब्यावरच ओसंडून भरू लागली. तिथनं पुढं हात दाखवा, गाडी थांबवा, थोडे प्रवासी उतरवा नि भरपूर प्रवासी चढवा असा प्रकार सुरू होता. या ७२ किलोमीटरच्या प्रवासाला साधारण दोन तास लागले आणि तिकीट फक्त ३७ रुपये. रस्ता चांगलाच होता.

श्रीरंगावधूत महाराज मंदिराचं प्रवेशद्वार बाहेरून आणि आतून असं दिसतं.
नारेश्वर दत्तसंप्रदायातलं महत्त्वाचं ठिकाण आहे. श्रीरंग अवधूत (तिथं उच्चार श्रीरंगावधूत असाच करतात.) दत्तसंप्रदायातले महत्त्वाचे संत-कवी. अनुयायी-भाविक त्यांना दत्तात्रेयाचा अवतार मानतात. गुजरातमध्ये दत्तसंप्रदायाच्या प्रसाराचं मोठं काम त्यांनी केलं. (अधिक तपशील - https://en.wikipedia.org/wiki/Rang_Avadhoot). मंदिराच्या अगदी जवळच बसथांबा आहे. मंदिर प्रशस्त आणि शांत. आवारात आपल्या पद्धतीप्रमाणे अन्य छोटी-मोठी मंदिरे. रंगावधूत स्वामींची मोठी मूर्ती आहे. मुक्कामाची आणि दोन्ही वेळच्या प्रसादाची सोय आहे. मंदिरात छायाचित्रं काढायला मनाई असल्याचा फलक होता. पण नेमकी कुठली छायाचित्र काढायला मनाई आणि कुठली काढता येतील, हे न कळल्यानं प्रवेशद्वाराची आणि भोजनगृहाची छायाचित्रं घेतली.


इथं येण्याचं मुख्य आकर्षण होतं नर्मदामैया. परिक्रमेची चार-पाच पुस्तकं वाचली आतापर्यंत. तेव्हापासून नर्मदेविषयीची उत्कंठा वाढलेली. तिचं दर्शन घ्यायचं होतं. मंदिरात दर्शन घेऊन विचारत नर्मदामैयाकडं गेलो. श्रीरंग सेवा घाट - नऊ वर्षांपूर्वी तयार झालेला हा घाट भक्कम आणि चांगला आहे. पण तरीही त्याला थोडी कळा आलेली वाटली. घाट उतरतानाच नर्मदेचं घडलेलं दर्शन तेवढं विलोभनीय नव्हतं. पात्रात पाणी होतं, पण नदी दुथडी भरून वाहताना दिसली नाही. एका छोट्या शाळेची सहल होती तिथं. त्यातल्या विद्यार्थ्यांना पाहून आलेले उंटवाले. विस्तीर्ण वाळवंटात चौपाटी. सकाळ जेमतेम संपून दुपार होत असल्याने त्या चौपाटीवर आळसावलेली शांतता. लोकांना पलीकडच्या गावात ने-आण करणारी एक बोट. स्वतःचं काही तरी हरवल्यासारखं पाण्यात ऐवज शोधणारा तरुण. बहुदा परिक्रमावासीयांनी पूजेसाठी केलेल्या पात्रातील महादेवाच्या पिंडी. डुंबणाऱ्या म्हशी. थोड्या दूरवर सुरू असलेला वाळूचा जोरदार उपसा. त्याच्या यंत्रांची घरघर आणि मालमोटारींची थरथर. चौपाटी म्हटल्यावर अपरिहार्य असलेला कचरा. हे दृश्य काही फार मनोहर नाही वाटलं. तसं ते नव्हतंच.
नारेश्वरच्या श्रीरंग सेवा घाटावरून घडलेलं नर्मदामातेचं पहिलं दर्शन.
नर्मदामैयाला पुन्हा भेटायला यायचं कबूल करून देवस्थानातल्या भोजनगृहाकडं वळलो. मोठी रांग असूनही शांततेत प्रसाद वाढणं-घेणं सुरू होतं. भात-आमटी, मसालेदार दिसणारी पण तिखट नसणारी वांगी-वाटाण्याची भाजी आणि बर्फी. वडोदऱ्याच्या परतीच्या प्रवासासाठी थांब्यावर येऊन थांबलो आणि अचानक नर्मदा परिक्रमेला निघालेले भाविक भेटले. त्यांच्याबरोबर परिक्रमेला निघण्याचा आग्रह कसाबसा नाकारून निघालो. त्या विषयी नंतर. तूर्तास नर्मदेच्या पहिल्यावहिल्या भेटीची ही काही छायाचित्रं...


नर्मदेच्या वाळवंटात थाटलेली ही चौपाटी. गेला तेव्हा दुपार असल्याने तिथं सारी सामसूम होती.
(खालचं छायाचित्र) या बाई मात्र उकडलेली मक्याची कणसं घेऊन होत्या तिथं. 












कंबरभर पाण्यात उभं राहून चाललेली ही साधना नव्हे,
तर मोलाचं काही गवसावं यासाठीचे श्रम आहेत!


नर्मदेच्या पात्रात झालेली शिवलिंगांची पूजा.


सहलीला आलेल्या मुलांची घोडेस्वारी.
उंटावरचे शहाणे होण्यास मात्र कुणी तयार नव्हतं.


संध्याकाळपर्यंत काहीच काम नसल्यानं वाळूत तोंड खुपसण्याच्या बेतात असलेला रईस.


नदीकाठी वाळूची चलती. महाराष्ट्राप्रमाणंच
इथंही वाळूचा उपसा असा जोरात सुरू असलेला दिसला.














तुरीच्या ओल्या शेंगा घ्यायच्या की सोललेले दाणे?


सहलीसाठी आल्यावर सहभोजनाचा आनंद
आणि तोही प्रसादालयात.


नारेश्वरहून पलीकडच्या तिरावरच्या गावात ने-आण करणारी नाव. यंत्रावर चालते ती.
माणसांसह वाहनांना ले चल पारचं काम दिवसभर सुरू असतं. एका फेरीचं भाडं १० रुपये.


सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

सरकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखक आणि चिंता (अ. भा. आवृत्ती)


(वडोदरा विशेष - १)
----

उद्घाटनाच्या कार्यक्रमात गायकवाड आणि मंडळींनी रंगविलेली मैफल.
सनई आणि जलतरंग ही जुगलबंदी अफलातूनच!
..........................................

सयाजीराव महाराजांच्या वडोदऱ्यात गेल्या आठवड्यात झालेलं साहित्य संमेलन अतिशयोक्ती अलंकाराच्या दोन उदाहरणांच्या वापरांपासून लांब राहिलं - साहित्यपंढरीच्या वारकऱ्यांची उच्चांकी गर्दी आणि पुस्तकविक्रीची कोटीची उड्डाणे’!

अलीकडच्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्यांना लावण्याची ही वरची दोन हमखास विशेषणं. ती इथे वापरली गेली नाहीत हे खरं; पण ह्या भाषिक अलंकारांचा मोह संबंधितांना टाळता आला नाही तो नाहीच. समारोपाच्या कार्यक्रमात ते दिसलं.

अध्यक्षीय भाषणाचं (जोरकस) कौतुक करताना साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी ह्या संमेलनाची (आणि त्याच वेळी संमेलनाध्यक्षांचीही?) तुलना थेट आणीबाणीच्या काळात कऱ्हाडला झालेल्या संमेलनाशी केली. येथून पुढची संमेलने गर्दीची नव्हे, तर अशीच दर्दींची होतील, असंही म्हटलं गेलं. दर्दी-गर्दीबद्दल बोलल्यानंतर पुढे कार्यशाळांना मिळालेला तुडुंब प्रतिसाद संमेलनाचं वैशिष्ट्य असल्याचं नमूद करण्यात आलं.

उशिरा सुरू झालेले नि रेंगाळलेले कार्यक्रम
महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीत झालेलं हे संमेलन बऱ्याच अर्थांनी वेगळं ठरलं. मंडप न उभारता, प्रशस्त क्रिकेट मैदानात झालेला उद्घाटनाचा कार्यक्रम आणि बंदिस्त सभागृहात उरकलेला समारोप ही वैशिष्ट्यं सांगतानाच दोन्ही कार्यक्रम किमान तासभर उशिरानं सुरू झाले, ह्याचीही नोंद करायला हवी. दोन्ही कार्यक्रम रेंगाळले आणि अध्यक्षीय भाषण, अध्यक्षांचं समारोपाचं भाषण पूर्ण होण्याच्या किती तरी आधीच श्रोत्यांच्या संख्येला गळती लागल्याचं दिसलं.

खुले अधिवेशन संपण्यापूर्वीच महामंडळाशी संलग्न साहित्य संस्थांचे बरेच पदाधिकारी व्यासपीठावरून पायउतार झाले. अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ह्यांचं भाषण सुरू असताना व्यासपीठावरच्या निम्म्या खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. पदाधिकाऱ्यांचं हे वागणं सभाशास्त्राच्या संकेताला धरून नव्हतं. तुम्ही चुकत आहात, असं त्यांना कोण सांगणार?

संमेलनाच्या सगळ्यांत मोठ्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अध्यक्षीय भाषण, असं साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी ह्यांनी समारोपाच्या कार्यक्रमात जोरदारपणे सांगितलं. अध्यक्षांवर कौतुकाचा वर्षाव करताना ते म्हणाले, ‘‘ठाम आणि लक्षणीय भूमिका घेण्याचं मराठी लेखक विसरला होता. ते लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलं. भूमिका न घेणाऱ्या लेखकाच्या संप्रदायाला ह्या भाषणाने बाजूला सारले!’’


ग्रंथदिंडीत सहभागी झालेले
संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख.
......................
अध्यक्षांचं ‘धाडस’
डॉ. जोशी यांनी ज्याचं भरभरून कौतुक केलं, त्या अध्यक्षीय भाषणानं माध्यमांना पुरेपूर खाद्य दिलं, हे नक्की. संमेलनाला आलेल्या सर्वसामान्य प्रतिनिधींमध्ये आणि मोजक्या लेखकांमध्ये नंतर ह्या भाषणाची किती चर्चा झाली, हे सांगणं कठीण आहे; पण माध्यमांना त्यानं अजून काही काळ पुरणारं भांडवल निश्चितपणे दिलं. देशमुख यांनी राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजेस., असं म्हणण्याचं धाडस (हा शब्द त्यांचाच) केलं. गुजरातच्या भूमीवर हे धाडस केलं, ह्याकडे विशेषत्वाने लक्ष वेधण्यात आलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी हे ऐकवलं, असंही प्रसिद्ध झालं.

पंतप्रधानांच्या गुजरातेत झालेल्या मराठी संमेलनातल्या ह्या भाषणानं सत्ताधारी पक्षाचे कान (परस्पर) टोचले गेले, याचा भलताच आनंद अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कडव्या पाठीराख्यांना झाला. तथापि, हा चुकणारा राजा विद्यमान नसून सार्वकालिक असल्याचं संमेलनाध्यक्षांनीच म्हटल्याची बातमी नंतर प्रसिद्ध झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भक्तांचं त्याबद्दलचं मत काही वाचण्यात आलं नाही.

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर येण्याची चिन्हं दिसू लागताच (ह्याला भीती वाटू लागताच असंही म्हणता येईल!) ह्या ना त्या प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा चर्चेत येऊ लागला, आणला जाऊ लागला. सरकार सत्तेवर येऊन पावणेचार वर्षं झाल्यानंतरही त्यात फरक पडलेला नाही. त्याचंच दर्शन वडोदऱ्याच्या साहित्य संमेलनात घडलं.

ते दखल घेण्याजोगं नव्हतं?
अध्यक्षीय भाषणामुळे देशमुख हीरो ठरले. त्यांचं हे छापील भाषण (त्या पुस्तिकेचा आकार भाषा आणि जीवन नियतकालिकाचा) ५२ पानांचं. त्यात प्रास्ताविक, माझी साहित्याची भूमिका व माझे साहित्य चिंतन, आजचे आपले अस्वस्थ वर्तमान, कलावंताची अभिव्यक्ती व व्यापक सांस्कृतिक स्वातंत्र्य, मराठी भाषेच्या विकासाची भावी दिशा, वाचन संस्कृती वाढविण्यासाठीची नीलप्रत, बृहन्महाराष्ट्राचे प्रश्न व उपाय योजना आणि समारोपाचे विवेचन अशी आठ प्रकरणे आहेत. त्यापैकी अस्वस्थ वर्तमान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन प्रकरणांवरच (साधारण साडेचौदा पानं) प्रकाशझोत पडला. उर्वरित साडेसदतीस पानांमध्ये त्यांनी जे मांडलं, ते फारसं उपयोगी नव्हतं किंवा तेवढी दखल घेण्याजोगं नव्हतं? काय अर्थ लावायचा? त्यांची साहित्यविषयक, वाचन-संस्कृतीविषयक भूमिका एवढी अदखलपात्र का ठरावी?

राजा कुठे, कसा चुकतो आहे, त्या चुका कशा सुधारता येतील, ह्याबद्दल देशमुख ह्यांनी केलेल्या विवेचनाबद्दल बरंच काही लिहून आलं, येत राहील. वर्तमानामुळे ह. ना. आपटे यांच्या काळ तर मोठा कठीण आला.. या दीर्घकथेची आठवण आल्याचं त्यांनी नमूद केलं. व्यवस्था माणसाचा आवाज दाबू पाहते, तेव्हा तो आवाज बनणं लेखकाचं काम असतं, असंही त्यांनी सांगितलं.

सर्वच काळातील राजांबद्दल बोललो असं नंतर सांगणाऱ्या देशमुख यांनी आजचं अस्वस्थ वर्तमान असा वर्तमानकालीन उल्लेख करणं सूचक आहे. काही निवडक घटना (ठळकपणे) मांडून त्यावरून निष्कर्ष काढणं, हे काही नवं नाही. अध्यक्षीय भाषण त्याचंच निदर्शक आहे.

महात्मा गांधींची गायीबद्दलची भूमिका विसरले?
गो-हत्याबंदीचा उल्लेख करताना त्यांनी (स्वातंत्र्यवीर) सावरकरांच्या गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे या विधानाचा दाखला दिला. गुजरातच्या भूमीत बोलताना महात्मा गांधी यांच्या विविध विधानांची उदाहरणं देताना त्यांची गायीबद्दल काय भूमिका होती, याकडे देशमुख यांचं लक्ष गेल्याचं दिसत नाही. 

महात्मा गांधी लिहितात - THE COW is a poem of pity. One reads pity in the gentle animal. She is the mother to millions of Indian mankind. Protection of the cow means protection of the whole dumb creation of God. The ancient seer, whoever he was, began with the cow. The appeal of the lower order of creation is all the more forcible because it is speechless. (YI, 6-10-1921, p. 36)  (संदर्भ : http://www.mkgandhi.org (Comprehensive Website by Gandhian Institutions-Bombay Sarvodaya Mandal & Gandhi Research Foundation)). अर्थात महात्मा गांधी यांनी असंही लिहिलं आहे की, I would not a kill a human being for protection a cow, as I will not kill a cow for saving a human life, be it ever so precious. असो! प्रश्न निवडक व सोयीच्या विधानांचा आहे.

देशमुख ह्यांनी मराठवाड्यातल्या गंगा-जमनी संस्कृतीचा उल्लेख केला. नगरला नोव्हेंबरमध्ये झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे ह्यांनीही या संस्कृतीचं मोठेपण व गरज ठाशीवपणे मांडली होती. वडोदऱ्याच्या संमेलनात निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ह्यांचा सविस्तर परिचय करून देताना ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ काय म्हणाले, ह्याकडेही लक्ष वेधलं पाहिजे. ते म्हणाले, हैदराबादचा निजाम मराठवाड्याचे इस्लामीकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. (मराठी) भाषेची गळचेपी सुरू होती. हा मुस्लिमबहुल प्रांत असल्याचे निजामाला सिद्ध करायचे होते.

चपळगावकरही म्हणाले, ‘‘मराठी वाङ्मयाची जी आवड निर्माण झाली, त्याचं खरं श्रेय मी निजामाला देतो. निजामाने मला पाचवीच्या वर्गातही मराठी शिकू दिलं नाही. ह्या घुसमटलेल्या वातावरणामुळे मराठी वाङ्मयाचे विशेष प्रेम उफाळून आले.’’ कोणत्या संस्कृतीबद्दल देशमुख बोलत होते, की नरहर कुरुंदकर यांनी म्हटल्याप्रमाणे प्रश्न असल्याचंच नाकारत होते? त्यामुळेच त्यांचं हे (गाजलेलं) भाषण पॉलिटीकली करेक्ट भूमिकेचं आहे, असंच म्हणावं वाटतं.

ते राजा आणि आम्ही प्रजा
लोकशाही स्वीकारून आता ७० वर्षं झाली. पण राजा आणि प्रजा या भूमिकेतून आपण अजूनही बाहेर पडत नाही, हेही या भाषणावरून दिसतं. सरकार म्हणजे राजा आणि आपण त्यावर अवलंबून असलेली सर्वसामान्य प्रजा; राजारूपी सरकारने स्वातंत्र्य द्यावे आणि आम्ही ते उपभोगावे अशीच आपली मनोभूमिका रूपकाच्या स्वरूपातही का असावी? अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतानाच अध्यक्षांचे हे भाषण महामंडळाने सेन्सॉर न करता प्रसिद्ध केल्याचा उल्लेख झाला, हे लक्षणीय आहे. म्हणजे सेन्सॉरशिप फक्त राजकीय सत्ताधाऱ्यांची असते असं नाही, तर साहित्य संस्थेची सत्ता भोगणाऱ्यांचीही असते. त्याबद्दलही कान टोचले जावेत.

आणखी दोन भाषणं
उद्घाघटनाच्या कार्यक्रमास दोन ज्येष्ठ गुजराती साहित्यिक उपस्थित होते. उद्घाटक या नात्याने ज्ञानपीठचे मानकरी डॉ. रघुवीर चौधरी व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सीतांशु यशश्चंद्र. त्यांची भाषणेही महत्त्वाची होती. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हापासून मराठीचा सतत विकास सुरू आहे, असं सांगताना डॉ. चौधरी ह्यांनी सयाजीराव महाराज, आचार्य विनोबा भावे, दिलीप चित्रे, विश्वनाथ नरवणे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रकाश भातंब्रेकर आदींच्या कामाचं महत्त्व आवर्जून नोंदविलं. शंकराचार्यानंतर देशभर फिरले ते आचार्य विनोबा भावेच, असंही त्यांनी सांगितलं.

भारतीय भाषा अस्मितेच्या रुग्ण आहेत, असं डॉ. यशश्चंद्र म्हणाले. आपल्याला मराठी फार आवडते, याचं कारण म्हणजे ही भाषा बलिष्ठ आहे. मराठी साहित्यात समता आहे, असं त्यांनी कौतुकानं सांगितलं.

संमेलनाचे अध्यक्ष किंवा उद्घाटक यांची भाषणं ऐकण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यबाहुल्यामुळे वेळ नव्हता. संमेलनाचा निधी दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्यांनी टाळ्या मिळविल्या. एरवी त्यांच्या भाषणात दम नव्हता. मराठीतील साहित्य कालसुसंगत आहे, असं विधान त्यांनी कशाच्या जोरावर केलं, कुणास ठाऊक. खरं म्हणजे मराठी अभिजात आहेच!’, कुठल्याही प्रकारचं आव्हान मराठी पेलू शकते, मराठी विद्यापीठाची मागणी रास्त आहे. आम्ही तिचा सकारात्मक विचार करू, भाषा वादाचा नाही, तर संवादाचा विषय असतो आदी विधानं निव्वळ टाळ्याखाऊ होती.

तुलनेने मंत्री विनोद तावडे ह्यांचं भाषण चांगलं झालं. मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी माणूस हे वेगळे-स्वतंत्र विषय आहेत. त्या तिन्हींसाठी वेगवेगळ्या प्रयत्नांची गरज असून, तसे ते केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

विसंगतीवर अचूक बोट
सरकारचे कान टोचणारे अध्यक्षीय भाषण आणि खुल्या अधिवेशनातील सारे ठराव ह्या ना त्या सरकारला काही तरी मागणारे, विनंती करणारे असतानाच निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ह्यांनी मुलाखतीत वर्तमानातील विसंगतींवर अचूक बोट ठेवलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य भोगण्यासाठी काही किंमत द्यावी लागते, हेच माणसांना उमगलं नाही, दडपणं वाढतात तेव्हा साहित्यातला उपरोध वाढत जातो, लेखकाच्या मनात कोणतीही वाङ्मयबाह्य अपेक्षा निर्माण झाली की, त्याचं लेखकपण संपतं. त्याचं स्वातंत्र्य टिकायचं असेल, तर राजकीय महत्त्वाकांक्षा नकोत, स्वार्थत्यागी माणसाची कदर केली जाईल, याची आज शाश्वती नाही, आम्ही पुरोगामी इतके ठाम की, दुसऱ्याचे ऐकून घेत नाही हे त्यांचं म्हणणं लख्ख आरसा दाखविणारं होतं.

डॉ. रसाळ व संपादक प्रशांत दीक्षित ह्यांनी घेतलेली ही मुलाखत काहीशी समांतर रुळांवर चालली. मुलाखत घेणाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवला. डॉ. रसाळ यांनी दीक्षित ह्यांना फारसं बोलू दिलं नाही आणि एक-दोन वेळा तर त्यांचे प्रश्नच गैरलागू ठरवले.

उदारमतवादाची गरज सांगताना चपळगावकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य राबविण्यासाठी उदारमतवादी लोकशाही प्रवृत्ती लोकांना शिकविली पाहिजे. उदारमतवादी तत्त्वांना आम्ही इतिहासात फारसं महत्त्व दिलं नाही. आम्ही राजा-प्रजा (दाता-याचक) याच भूमिकेत राहिलो.’’ अनुदानावर डोळा ठेवून, किंबहुना तेवढ्याचसाठी उभ्या राहणाऱ्या सार्वजनिक संस्थांकडेही त्यांनी अंगुलीनिर्देश केला. ही मुलाखत अर्ध्याहून अधिक झाल्यावर चं. वि. महेता सभागृहात गर्दी वाढू लागली. ती प्रतिभावंतांचा सहवास मिळविण्यासाठी होती, हे यथावकाश स्पष्ट झाले. एका साहित्य संस्थेच्या पदाधिकाऱ्याने दिलेली माहिती खरी असेल, तर ती धक्कादायक आहे - पुढच्या कार्यक्रमासाठी मुलाखत लवकर आटोपती घ्या, असा निरोप थेट व्यासपीठावरच देण्यात आला! उदारमतवादाच्या अभावाचे थेट प्रत्यंतर!!

मनोहर मेजवानी
संमेलनात दुसऱ्या दिवशी मान्यवरांचा सत्कार होता. सत्काराला उत्तर देताना श्याम मनोहर ह्यांनी केलेले भाषण म्हणजे संमेलनातली आणखी एक मेजवानी. त्यांनी आधी टिपण वाचून दाखविलं. त्याची प्रत खरं म्हणजे उपलब्ध करून द्यायला हवी होती. त्यांच्या मुक्त चिंतनातील काही ठळक मुद्दे -

- शास्त्रांप्रमाणेच साहित्यालाही तत्त्व आहे. ज्ञान म्हणजे काय याची चर्चा समाजात/साहित्यात होते काय? ज्ञान केवळ मिळवायचे नसते, तर निर्माणही करायचे असते. ते सोपे असते, असा भ्रम निर्माण करून कसे चालेल?
- गणिती, लेखक, कवी वगैरे हवेत अशी समाजाची कळकळ आहे काय? शेतकरी व साहित्यिक आपापल्या कामातून जगतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काय?
- राजकारणी भाषणात कधी कविता-कादंबरीचा उल्लेख का करीत नाहीत? ह्याचा अर्थ ते समाजात खोलवर पोहोचले नाही किंवा मराठी साहित्य तेवढ्या दर्जाचे नाही.
- संस्कृतीसभ्यता या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. नीट जगण्याची प्रेरणा, कुतुहल आणि या जीवनाचा अर्थ काय, हे शोधण्याची वृत्ती म्हणजे संस्कृती. नीट जगण्याची व्यवस्था म्हणजे सभ्यता. जगण्यातल्या अडचणी कादंबरी-कवितेतून येतात. सभ्यतेचे विषय Fictionमध्ये का घ्यायचे नाहीत?
- जुनं ३०-४० वर्षांपूर्वीचं वाचूच नये असं आहे का? मराठी किंवा भारतीय भाषांमध्ये कालातीत असं काहीच निर्माण होत नाही का? मराठी (आणि भारतीय) वाङ्मयाला इतिहास आहे; परंपरा नाही.
- आपल्या कुटुंबांमध्ये ज्ञानाला स्थान नाही. संशोधनाचं काम दिवसातल्या २४ तासांचं आहे. आपल्या सभ्यतेतला एक कोपरा ज्ञानासाठी सतत जिवंत ठेवा. महत्त्वाचे गहन प्रश्न सामान्यांपासून सर्वांनी धरून ठेवले पाहिजेत.

कथेची व्याख्या 
कथा, कथाकार, कथानुभव हा कार्यक्रम रंगविण्याचं श्रेय सूत्रसंचालक नीलिमा बोरवणकर यांना! त्यांनी मंगला गोडबोले, गुजराती लेखिका हिमांशी शेलत व मोनिका गजेंद्रगडकर ह्यांना छान बोलतं केलं. कथेची व्याख्या काय, या मूलभूत प्रश्नाला तिन्ही लेखिकांनी सविस्तर उत्तर दिलं.

जयवंत दळवी आवडते लेखक असलेल्या हिमांशीदीदी म्हणाल्या, ‘‘जीवनातलं किती तरी वास्तव मराठी कथांतून वाचायला मिळालं. आपली कहाणी सांगता-लिहिता येत नाही, ती सांगायला घाबरतात, अशा व्यक्तींच्या मौनाला वाचा फोडते, ती कथा अशी माझी व्याख्या आहे.’’ छोट्या जागेत, मर्यादित पात्रांमध्ये आयुष्याचा एखादा प्रसंग झळझळीत करणे ही कथेची ताकद असते, असं सांगून गोडबोले म्हणाल्या, ‘‘कथा म्हणजे भिंगाखाली धरलेला आयुष्याचा छोटा तुकडा! हे भिंग म्हणजे लेखकाची नजर असते.’’ दुःखाचा अर्थ शोधणं, ही माझी कथा. आयुष्याचं अर्थसूचन करणारी कलाकृती म्हणजे कथा, असं गजेंद्रगडकर म्हणाल्या.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रसाधनाच्या १२ खंडांचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमासाठी महेता सभागृह ओसंडून वाहत होतं. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या संकल्पनेतून हे मोठं काम साकार झालं.

खंत दूर झाली
त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानताना राजमाता शुभांगिनीराजे म्हणाल्या, ‘‘महाराजांच्या कर्तृत्वाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली नाही, ही आमची खंत होती. या खंडांमुळे त्यांची ओळख देशभर होईल.’’ छत्रपती शिवरायांचे काम सयाजीरावांनी २०० वर्षानंतर पुढं चालवलं, असं सांगताना त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारु।याचा दाखला दिला.

भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रबोधिनीत हे खंड पाठविण्याची सूचना तावडे यांनी केली. आदर्श कारभाराचा ध्यास घेतलेल्या महाराजांनी कोल्हापूरला १९३२मध्ये झालेल्या संमेलनात केलेल्या भाषणाची ध्वनिफित ऐकवण्यात आली. महाराजांच्या स्पष्ट शब्दोच्चारातून त्यांचे ठाम विचार ऐकायला मजा आली.


लेझिम खेळणाऱ्या पोरी... ग्रंथदिंडीतला उत्साह.
..........................


संमेलनाच्या आयोजनाबद्दल फार काही तक्रारी झाल्याचं ऐकायला मिळालं नाही. अदबीनं बोलणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांची फळी मदतीस सदैव सज्ज होती. उद्घाटन-समारोपाचा कार्यक्रम अकारण लांबला. त्यामुळे दोन्ही वेळा संमेलनाध्यक्षांचं भाषण खूप उशिरा झालं. हरिश्चंद्र थोरात यांचा सहभाग असलेला टॉक शो केवळ दुसऱ्या सभागृहात ठेवल्यामुळे काहीसा दुर्लक्षित झाला.

मराठीच्या उपयोजित वापराबद्दल संमेलनात कार्यशाळा झाल्या. त्याही छोट्या वर्गखोलीत पार पडल्या. संमेलनस्थळी न आलेली आदल्या दिवशीची ग्रंथदिंडी थाटात पार पडली. त्यातला सहभाग उत्साही होता. आठ दशकांनंतर आपल्या शहरात झालेलं हे संमेलन उत्सवी-उत्साही होतं की, काही देणारं होतं, याचं नेमकं उत्तर बडोदेकरांकडूनच अपेक्षित आहे.
---
(शीर्षकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ४ नोव्हेंबरचा लेख पाहता येईल.)
---
#साहित्य_संमेलन #वडोदरा #मराठी #लक्ष्मीकांत_देशमुख #श्रीपाद_भालचंद्र_जोशी 
#सयाजीराव_महाराज #न्यायमूर्ती_चपळगावकर #अध्यक्षीय_भाषण #अभिव्यक्ती_स्वातंत्र्य
#मराठवाडा #निजाम #श्याम_मनोहर #राजा_तू_चुकतो_आहेस





अखेरचा राम राम, पावनं!

   डॉ. कुमार सप्तर्षी : सदर लेखन ते निवडणूक - पाहिलेला प्रवास  'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडवून दिला. त्याचं ...