डॉ. कुमार सप्तर्षी : सदर लेखन ते निवडणूक - पाहिलेला प्रवास
'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडवून दिला.त्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉक्टरांचं नगरी भाषेतलंसाप्ताहिक सदर - 'राम राम पावनं'. ह्याच सदराच्यालोकप्रियतेचा आपल्याला निवडणुकीत फायदा होणारच,असं सांगत ते १९९६मध्ये नगरमधूनलोकसभेच्या निवडणूक मैदानात उतरले.
![]() |
हातात माईक म्हणजे समोरच्यांचं संमोहन निश्चित! - डॉ. कुमार सप्तर्षी ......................... |
डॉ. कुमार सप्तर्षी ह्यांचे नाव पहिल्यांदा ऐकले ते सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाच्या वेळी. त्या वेळी करमाळ्यात प्राथमिक शाळेत होतो. महात्मा गांधी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इथे गडबड झाल्याचं ऐकायला मिळालं. त्या आंदोलनाचं नेतृत्व डॉ. सप्तर्षी करीत होते, असं समजलं नंतर. हा एवढा मोठा माणूस आपल्या जवळच्या राशीनचा, हे ऐकल्यावर तर आश्चर्यच वाटलं. सगळी मोठी माणसे शहरातलीच असतात, असा तेव्हाचा समज. 
पुढे विशीत असताना डॉक्टरांनी करमाळ्यातून विधानसभेची निवडणूक लढविली. मतदानाचा अधिकार अजून मिळायचा होता. त्या निवडणुकीत त्यांची भाषणे दोन वेळा ऐकायला मिळाली. श्रोत्यांना जिंकणारं त्यांच्या भाषेतलं वक्तृत्व होतं ते. त्यांच्या प्रचारासाठी नामवंत अभिनेते निळू फुले आले होते. त्यांचा संवाद तर एकदम मनमोकळा. त्या सभेत डॉ. सप्तर्षी ह्यांनी करमाळ्याचे तेव्हाचे नगराध्यक्ष गिरधरदास देवी ह्यांच्यावर जोरदार टीका केल्याचे आठवते. ह्या टीकेला करमाळकर कसा प्रतिसाद देतात म्हणून पाहिलं, तर गंमत म्हणजे हे ऐकायला गिरधरदास ह्यांची पुतणी व आमची वर्गमैत्रीण संगीता देवी नागर तिथे होती!
तिलाही ते कदाचीत आठवणार नाही आता. मतदानाच्या आदल्या दिवशी गल्लीत काही महिला हळदी-कुंकू देण्यासाठी आल्या होत्या. चौकशी केल्यावर त्या डॉक्टरांच्या कार्यकर्त्र्या असल्याचं समजलं. 
राम राम पावनं...
'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडविला. त्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉक्टरांचं साप्ताहिक सदर - 'राम राम पावनं' खास नगरी भाषेत लिहिलेलं आणि आरंभीचा काही महिने झकास चाललेलं. काही काळानंतर त्यांनी आपल्या पद्धतीनं त्याला वळण दिलं. नगरपालिकेच्या एका सभेत बाकावर उभे राहून गोंधळ घालणाऱ्या सदस्याचे छायाचित्र आम्ही प्रसिद्ध केले. त्याच्या वर्तणुकीचा उपहास करणाऱ्या ओळी मी दिल्या होत्या. पण पुढच्या आठवड्यात डॉक्टरांनी त्या नगरसेवकाचं कौतुक करण्यात अख्खं सदर खर्ची केलं!
त्याच दरम्यान कधी तरी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे डॉक्टरांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एन्रॉन प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात कोल्हेसाहेब सहभागी झाले. त्या काळात कोल्हेसाहेबांच्या तोंडून डॉक्टरांचंच कौतुक ऐकायला मिळे. म्हणजे संमोहन किती तगडे असेल बघा. ह्या आंदोलनात भाग घेतल्याची काही ना काही राजकीय किंमत त्यांना बहुदा चुकवावी लागली असणार.
हे सदर फार लोकप्रिय झाल्याचा फायदा आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात होणार, असं गृहित धरून डॉ. सप्तर्षी ह्यांनी लोकसभेच्या १९९६च्या निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्या वेळी प्रचार चांगला महिना-दीड महिना चालायचा. त्यामुळे जवळपास रोजच ते 'लोकसत्ता'च्या कार्यालयात येत. खास निवडणुकीच्या बातम्यांसाठी केलेल्या पानावर पट्टी होती. त्यात सर्व प्रमुख राष्ट्रीय पक्षांची निवडणूक चिन्हं दिलेली. फक्त त्यांच्या समता पक्षाची 'मशाल' नव्हती. 'त्या पट्टीत आमची 'मशाल' घ्या, नाही तर तुमच्याविरुद्ध मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे,' असं ते दर दोन दिवसांनी बजावत. अतिशय गंभीरपणे ते बोलत आहेत, असं तेव्हा वाटे. पण तशी काही तक्रार त्यांनी शेवटपर्यंत केली नाही.
ह्या निवडणुकीच्या काळातच बिंदुमाधव ठाकरे ह्यांचे अपघातात निधन झाले. रात्रीचे ११ वाजले होते. संपादकीय विभागात मी एकटाच होतो.काम पूर्ण झालेले, निघायची तयारी आणि फोन वाजला. डॉक्टर बोलत होते. 'बिंदुमाधव ह्यांना मी वाहिलेली श्रद्धांजली उद्या मुंबईच्या अंकात पहिल्या पानावर आली पाहिजे. मी सांगतो ते लिहून घे,' असं त्यांनी सांगितलं. अंकाचं सगळं काम संपलं आहे, कम्प्युटर ऑपरेटरही गेले, असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. बाळासाहेबांचे आणि माझे, मीनाताईंचे आणि माझे किती जवळचे संबंध आहेत, हेच सांगत राहिले - 'माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हव्यात.' त्यांची श्रद्धांजली लिहून घेतली, पुन्हा वाचून दाखविली आणि फोन ठेवला. ती बातमी मुंबईला जाण्याचा प्रश्नच नव्हता!
घाईत असूनही अर्धा तास बसले
असेच एका रात्री ते आले. दिवसभराच्या दौऱ्यात कोठे कोठे सभा घेतल्या, ह्याची पत्रके दिली. 'राम राम पावनं'मुळं वातावरण कसं चांगलं आहे आणि निवडून कसा येणार, हे त्यांनी (कितव्यांदा तरी) सांगितलं. त्यांना म्हणालो, 'बसा थोडा वेळ.'त्यावर त्यांचं उत्तर होतं - 'घाईत आहे आता.' सहज म्हणून विचारलं, 'तुम्ही एवढं छान मासिक ('सत्याग्रही विचारधारा') काढता, त्यात तुमचे मित्र डॉ. अनिल अवचट ह्यांना का लिहायला सांगत नाही?' हे विचारलं आणि 'फार घाई असलेले' डॉक्टर शेजारच्या खुर्चीत ठाण मांडून बसले. 'अनिलला मीच कसं लिहायला लावलं' येथून त्यांनी सुरुवात केली आणि पुढे अर्धा तास ते बोलत राहिले. आपलं लेखन बाळासाहेब ठाकरे ह्यांना कसं आवडतं, हे ते पुनःपुन्हा सांगत होते.
त्या वेळी (आणि आधीही काही भाषणं ऐकली होती, तेव्हा) एक लक्षात आलं की, त्यांच्या बोलण्यात विलक्षण ताकद आहे. मुद्दे पटवून देण्याची हातोटी जबरदस्त आहे. ऐकताना समोरचा संमोहित होतो. निवडणूक काळातील त्यांच्या त्या बोलण्यानंतर मलाही काही दिवस वाटत होतं की, डॉक्टर निवडून येणार नाहीत; पण शर्यतीत असतील. दुसरा नाही तरी तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर राहतील. पण मतदारांनी त्यांना लांबूनच 'राम राम' ठोकला. डॉक्टरांना अडतीसशे (०.७ टक्के) मतं मिळाली. निकालानंतर ते पुन्हा कधीच 'लोकसत्ता' कार्यालयात आले नाहीत.
त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि ह्यासह बरंच काही आठवलं.
...
(छायाचित्रं 'सत्याग्रही विचारधारा'च्या सौजन्याने)
....
#Dr_Kumar_Saptarshi #Kumar_Saptarshi_Death #ram_ram_pawane #Satyagrahi_Vichardhara, #Loksabha_1996 #Loksatta #Ahmednagar #Karmala

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा