शनिवार, १८ जुलै, २०२६

अखेरचा राम राम, पावनं!

  डॉ. कुमार सप्तर्षी : सदर लेखन ते निवडणूक - पाहिलेला प्रवास 

'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडवून दिला.
त्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉक्टरांचं नगरी भाषेतलं
साप्ताहिक सदर - 'राम राम पावनं'. ह्याच सदराच्या
लोकप्रियतेचा आपल्याला निवडणुकीत फायदा होणारच,
असं सांगत ते १९९६मध्ये नगरमधून
लोकसभेच्या निवडणूक मैदानात उतरले.


हातात माईक म्हणजे समोरच्यांचं संमोहन निश्चित! - डॉ. कुमार सप्तर्षी

.........................

डॉ. कुमार सप्तर्षी ह्यांचे नाव पहिल्यांदा ऐकले ते सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाच्या वेळी. त्या वेळी करमाळ्यात प्राथमिक शाळेत होतो. महात्मा गांधी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इथे गडबड झाल्याचं ऐकायला मिळालं. त्या आंदोलनाचं नेतृत्व डॉ. सप्तर्षी करीत होते, असं समजलं नंतर. हा एवढा मोठा माणूस आपल्या जवळच्या राशीनचा, हे ऐकल्यावर तर आश्चर्यच वाटलं. सगळी मोठी माणसे शहरातलीच असतात, असा तेव्हाचा समज. 😀
पुढे विशीत असताना डॉक्टरांनी करमाळ्यातून विधानसभेची निवडणूक लढविली. मतदानाचा अधिकार अजून मिळायचा होता. त्या निवडणुकीत त्यांची भाषणे दोन वेळा ऐकायला मिळाली. श्रोत्यांना जिंकणारं त्यांच्या भाषेतलं वक्तृत्व होतं ते. त्यांच्या प्रचारासाठी नामवंत अभिनेते निळू फुले आले होते. त्यांचा संवाद तर एकदम मनमोकळा. त्या सभेत डॉ. सप्तर्षी ह्यांनी करमाळ्याचे तेव्हाचे नगराध्यक्ष गिरधरदास देवी ह्यांच्यावर जोरदार टीका केल्याचे आठवते. ह्या टीकेला करमाळकर कसा प्रतिसाद देतात म्हणून पाहिलं, तर गंमत म्हणजे हे ऐकायला गिरधरदास ह्यांची पुतणी व आमची वर्गमैत्रीण संगीता देवी नागर तिथे होती!😀 तिलाही ते कदाचीत आठवणार नाही आता. मतदानाच्या आदल्या दिवशी गल्लीत काही महिला हळदी-कुंकू देण्यासाठी आल्या होत्या. चौकशी केल्यावर त्या डॉक्टरांच्या कार्यकर्त्र्या असल्याचं समजलं. 🤔
राम राम पावनं...
'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडविला. त्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉक्टरांचं साप्ताहिक सदर - 'राम राम पावनं' खास नगरी भाषेत लिहिलेलं आणि आरंभीचा काही महिने झकास चाललेलं. काही काळानंतर त्यांनी आपल्या पद्धतीनं त्याला वळण दिलं. नगरपालिकेच्या एका सभेत बाकावर उभे राहून गोंधळ घालणाऱ्या सदस्याचे छायाचित्र आम्ही प्रसिद्ध केले. त्याच्या वर्तणुकीचा उपहास करणाऱ्या ओळी मी दिल्या होत्या. पण पुढच्या आठवड्यात डॉक्टरांनी त्या नगरसेवकाचं कौतुक करण्यात अख्खं सदर खर्ची केलं!
त्याच दरम्यान कधी तरी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे डॉक्टरांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एन्रॉन प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात कोल्हेसाहेब सहभागी झाले. त्या काळात कोल्हेसाहेबांच्या तोंडून डॉक्टरांचंच कौतुक ऐकायला मिळे. म्हणजे संमोहन किती तगडे असेल बघा. ह्या आंदोलनात भाग घेतल्याची काही ना काही राजकीय किंमत त्यांना बहुदा चुकवावी लागली असणार.

तरुणपणीचे डॉ.सप्तर्षी
................
निवडणुकीत फायदा होणारच
हे सदर फार लोकप्रिय झाल्याचा फायदा आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात होणार, असं गृहित धरून डॉ. सप्तर्षी ह्यांनी लोकसभेच्या १९९६च्या निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्या वेळी प्रचार चांगला महिना-दीड महिना चालायचा. त्यामुळे जवळपास रोजच ते 'लोकसत्ता'च्या कार्यालयात येत. खास निवडणुकीच्या बातम्यांसाठी केलेल्या पानावर पट्टी होती. त्यात सर्व प्रमुख राष्ट्रीय पक्षांची निवडणूक चिन्हं दिलेली. फक्त त्यांच्या समता पक्षाची 'मशाल' नव्हती. 'त्या पट्टीत आमची 'मशाल' घ्या, नाही तर तुमच्याविरुद्ध मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे,' असं ते दर दोन दिवसांनी बजावत. अतिशय गंभीरपणे ते बोलत आहेत, असं तेव्हा वाटे. पण तशी काही तक्रार त्यांनी शेवटपर्यंत केली नाही.
ह्या निवडणुकीच्या काळातच बिंदुमाधव ठाकरे ह्यांचे अपघातात निधन झाले. रात्रीचे ११ वाजले होते. संपादकीय विभागात मी एकटाच होतो.काम पूर्ण झालेले, निघायची तयारी आणि फोन वाजला. डॉक्टर बोलत होते. 'बिंदुमाधव ह्यांना मी वाहिलेली श्रद्धांजली उद्या मुंबईच्या अंकात पहिल्या पानावर आली पाहिजे. मी सांगतो ते लिहून घे,' असं त्यांनी सांगितलं. अंकाचं सगळं काम संपलं आहे, कम्प्युटर ऑपरेटरही गेले, असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. बाळासाहेबांचे आणि माझे, मीनाताईंचे आणि माझे किती जवळचे संबंध आहेत, हेच सांगत राहिले - 'माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हव्यात.' त्यांची श्रद्धांजली लिहून घेतली, पुन्हा वाचून दाखविली आणि फोन ठेवला. ती बातमी मुंबईला जाण्याचा प्रश्नच नव्हता!
घाईत असूनही अर्धा तास बसले
असेच एका रात्री ते आले. दिवसभराच्या दौऱ्यात कोठे कोठे सभा घेतल्या, ह्याची पत्रके दिली. 'राम राम पावनं'मुळं वातावरण कसं चांगलं आहे आणि निवडून कसा येणार, हे त्यांनी (कितव्यांदा तरी) सांगितलं. त्यांना म्हणालो, 'बसा थोडा वेळ.'त्यावर त्यांचं उत्तर होतं - 'घाईत आहे आता.' सहज म्हणून विचारलं, 'तुम्ही एवढं छान मासिक ('सत्याग्रही विचारधारा') काढता, त्यात तुमचे मित्र डॉ. अनिल अवचट ह्यांना का लिहायला सांगत नाही?' हे विचारलं आणि 'फार घाई असलेले' डॉक्टर शेजारच्या खुर्चीत ठाण मांडून बसले. 'अनिलला मीच कसं लिहायला लावलं' येथून त्यांनी सुरुवात केली आणि पुढे अर्धा तास ते बोलत राहिले. आपलं लेखन बाळासाहेब ठाकरे ह्यांना कसं आवडतं, हे ते पुनःपुन्हा सांगत होते.
त्या वेळी (आणि आधीही काही भाषणं ऐकली होती, तेव्हा) एक लक्षात आलं की, त्यांच्या बोलण्यात विलक्षण ताकद आहे. मुद्दे पटवून देण्याची हातोटी जबरदस्त आहे. ऐकताना समोरचा संमोहित होतो. निवडणूक काळातील त्यांच्या त्या बोलण्यानंतर मलाही काही दिवस वाटत होतं की, डॉक्टर निवडून येणार नाहीत; पण शर्यतीत असतील. दुसरा नाही तरी तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर राहतील. पण मतदारांनी त्यांना लांबूनच 'राम राम' ठोकला. डॉक्टरांना अडतीसशे (०.७ टक्के) मतं मिळाली. निकालानंतर ते पुन्हा कधीच 'लोकसत्ता' कार्यालयात आले नाहीत.
त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि ह्यासह बरंच काही आठवलं.
...
(छायाचित्रं 'सत्याग्रही विचारधारा'च्या सौजन्याने)
....
#Dr_Kumar_Saptarshi #Kumar_Saptarshi_Death #ram_ram_pawane #Satyagrahi_Vichardhara, #Loksabha_1996 #Loksatta #Ahmednagar #Karmala

सोमवार, ९ मार्च, २०२६

आगीत वितळला बर्फ

 
.......................................
इंग्लंडमधल्या उपान्त्य सामन्यासारखं अहमदाबादेत झालं नाही.
इथे आगीची आच लागताच बर्फाचं पाणी पाणी झालं.
सँटनर सामन्याआधी जे काही म्हणाला, ते फुकाचे बोल ठरले. पहिल्या सहा षट्कांमध्ये भारतीय सलामीवीरांनी पॉवर दाखवून दिली.
मग गोलंदाजांनी किवी फलंदाजांना लगाम घातला.
पाहुण्यांच्या गोलंदाजांची शरणागती आणि फलंदाजांचे साफ लोटांगण!
-------------------------------------

एक दिवशीय विश्वचषक स्पर्धेत २०१९मध्ये उपान्त्य फेरीत भारताची गाठ न्यू झीलँडशी पडली होती. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचं वर्णन तेव्हा आगीचा लोळ केलं गेलं. आणि केन विल्यम्सन ह्याचा संघ बर्फासारखा. त्या लढतीत भलतंच झालं. थंडगार बर्फानं आगीचा लोळ गिळून टाकला.

अहमदाबादेत मात्र फार वेगळं झालं. आगीची नुसती आच लागताच बर्फ वितळणं सुरू झालं. यजमानांनी टी20 विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावणारा हा पहिलाच संघ. विश्वचषक यजमानांन धार्जिणा नाही, हा एक दिवशीय क्रिकेटमधला समज भारतानंच २०११मध्ये मोडून काढला.

पॅट कमिन्स आणि मिचेल सँटनर. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोघेही विश्वचषक पटकावण्यासाठी आले होते. प्रतिस्पर्धी अर्थातच तगडा, यजमान भारतीय संघ.

एक दिवशीय विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर २३ रोजी झाला. आधीचे सर्व सामने दिमाखात जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत आलेला. सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार बैठकीत कमिन्स म्हणाला होता, स्टेडियममधील प्रेक्षकांची बोलती आम्ही बंद करू!’

टी20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीपूर्वी रविवारी पत्रकारांशी बोलताना सँटनर हेच म्हणाला. तीच भाषा. किवी कर्णधाराच्या नव्हे, तर ऑस्ट्रेलियाई कप्तानाच्या तोंडी शोभणारी.

नाणेफेक जिंकल्यावर कमिन्सने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सँटनरने आज तेच केलं. पण तो निर्णय त्याच्या सपशेल अंगलट आला.

खरे झाले होते कमिन्सचे बोल. सँटनरचं वक्तव्य फोल. नरेंद्र मोदी स्टेडियममधील अदमासे लाखभर प्रेक्षक पहिल्या षट्कापासून कल्ला करीत होते. आणि सामन्याचा शेवटचा चेंडू पडला, तेव्हा तो आवाज टिपेला गेला होता. किवीजचा आवाज बंद!

बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाचा उपान्त्य फेरीत लीलया पाडाव करणाऱ्या सँटनरच्या संघाला अंतिम लढतीत सूर सापडलाच नाही. आधी त्यांच्या गोलंदाजांनी शरणागती पत्करली. नंतर त्यांच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. अपवाद एखाद-दोन. सामन्याच्या एकतर्फी निकालात बदल घडविण्याची ताकद ह्या अपवादांमध्ये नव्हती.

उपान्त्य सामन्यात अडीचशेचा उंबरठा ओलांडल्यानंतरही भारताला विजयासाठी झुंजावं लागलं. सलग दुसऱ्या सामन्यात त्यांनी ही धावसंख्या ओलांडली. गोलंदाजीची वेळ आली तेव्हा प्रतिस्पर्ध्यांना वरचढ होऊ देण्याची चूक ह्या वेळी घडली नाही.

कोणत्याही षट्कात भारतीय संघाच्या धावसंख्येची बरोबरी साधणं पाहुण्यांना जमलं नाही. भारतीय डावात सात षट्कं अशी होती की, ज्यात दहापेक्षा कमी धावा निघाल्या. त्याच्या उलट भारतीय गोलंदाजांनी असा लगाम घातला की, ब्लॅक कॅप्स संघाला केवळ सहा षट्कांमध्ये दहापेक्षा अधिक धावा करता आल्या.

अंतिम सामन्यापूर्वी अनेक प्रश्नांची चर्चा माध्यमात, सामाजिक माध्यमावर चालू होती. सतत अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला वगळणार का? त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणार का?


वादळी सलामी... पॉवर-प्लेमध्ये विक्रमी धावसंख्या.
...........
ह्या सगळ्या चर्चा फोल ठरल्या. अभिषेक आणि संजू सॅमसन हीच जोडी सलामीला आल्या. मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्स ह्यांच्या पहिल्या दोन षट्कांत डझनभरच धावा निघाल्या. त्यातही फिलिप्सनं फक्त पाच धावा दिल्या.

वादळापूर्वीची शांतता म्हणतात तशी ती होती, हे नंतरच्या चार षट्कांमध्ये दिसलं. ह्या जोडीनं समोर कोण आहे, तो काय टाकतो आहे, ह्याची पर्वा न करता ८० धावा कुटल्या. पॉवर प्लेमध्ये ९२. जलदगती गोलंदाजांना घेऊन खेळण्याची चूक किवीजना भोवली.

धावांची बरसात करणारा अभिषेक पुन्हा दिसला. त्याचं अर्धशतक १८ चेंडूंमध्येच. रचिन रवींद्रचा पहिलाच चेंडू वाईड होता. त्याची छेड काढली नसती तर... पण तसा विचार करण्याची वेळ ईशान किशननं येऊ दिली नाही. पहिल्या तिन्ही फलंदाजांनी एवढी अफाट फटकेबाजी केली की, तीनशे धावाही शक्य वाटू लागल्या होत्या.

पण १५ ते १९ ह्या पाच षट्कांमध्ये फक्त दोन चौकार आणि चार जण बाद झालेले. ही कसर शिवम दुबे ह्यानं अखेरच्या षट्कात भरून काढली. सूर्यकुमारच्या जागी त्याला बढती दिली असती तर? आधीच्या तीन षट्कांमध्ये फक्त २२ धावा देऊन तीन बळी मिळविणाऱ्या जिमी नीशम ह्याचं पृथक्करण दुबेने पार बिघडवून टाकलं.

डावातील आणि अर्षदीपसिंगच्या पहिल्या षट्कातील पाचव्याच चेंडूवर फिन ॲलन सुदैवी ठरला. शिवम दुबेच्या हातून सीमारेषेवर चेंडू सुटला. मग टिम सैफर्ट ह्यानं हार्दिक पंड्याला दोन दोन षट्कार आणि चौकार खेचले, तेव्हा जेकब बेथल ह्याचीच आठवण झाली.

किवी संघाचं हे अवसान उसनं ठरलं. सुरुवात अक्षर पटेलने केली. ॲलनचा फटका लाँग ऑनवरच्या तिलक वर्माच्या हाती जाऊन स्थिरावला. मग बुमराहला पहिल्याच चेंडूवर बळी मिळवून दिला किशनने. काय अफलातून झेल होता तो.


आणखी एक अडथळा दूर... विजयाकडे पुढचे पाऊल.
...................................
वरुण चक्रवर्ती ह्यानं अर्धशतकवीर सैफर्टचा अडथळा दूर केला, तेव्हा न्यू झीलँड संघ विजयापासून अधिक दूर गेला. सोळाव्या षट्कात बुमराहनं लागोपाठ दोन ठेवणीतले चेंडू टाकले – हळुवार यॉर्कर. परिणाम? जिमी निशम आणि मॅट हेन्री ह्यांचा त्रिफळा उडालेला! काय षट्क होतं ते...

त्याच्या आधी डॅरील मिचेल आणि सँटनर ह्यांची जोडी थोडी जमल्यासारखी वाटत होती. अकराव्या षट्कात अर्षदीपने केलेला प्रकार थोडा अतीच होता. आवेशात फेकलेला चेंडू हातावर लागल्यानं मिचेल संतापला होता. खरं तर अर्षदीपनं त्याच वेळी जाऊन मिचेलची माफी मागायला हवी होती.


चेंडू उंच उडाला;
ईशानच्या हाती स्थिरावला!
....................
अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह ह्यांनी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, त्याला तोडच नाही. त्यांना आज साथ लाभली ईशानच्या चपळ क्षेत्ररक्षणाची. त्यानं तीन झेल घेत मागच्या सामन्यातील अक्षरच्या कामगिरीची आठवण करून दिली. त्यामुळंच सामन्याचा मानकरी ठरण्याच्या शर्यतीत तोही आला होता.

सूर्यकुमार यादवच्या संघानं विजेत्याच्या थाटात खेळ केला – पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत. उपान्त्य सामना रडतखडत जिंकणारा हाच का तो संघ, अशी शंका वाटावी, एवढी सफाईदार कामगिरी.

न्यू झीलँडबाबत नेमकं उलटं घडलं. एक गड्याच्या मोबदल्यात पावणेदोनशे धावा करणारा संघ १६० धावांतच ढेपाळला कसा? ह्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये न्यू झीलँडचे दोन्ही सलामीवीर आहेत. आणि गोलंदाजीत रचिन रवींद्र सातव्या क्रमांकावर. पहिल्या पाचात भारताच्या प्रत्येकी दोघांनी जागा पटकावली आहे.

ह्या विजयानं अहमदाबादेतील सव्वादोन वर्षांपूर्वीची जखम बुजवली आहे. गौतम गंभीरच्या कर्तृत्वाबद्दल उपस्थित केलेल्या सगळ्या शंका विरल्या नाहीत. पण त्यातला चेव नक्कीच कमी होईल. कर्णधार सूर्याची कामगिरी काही काळ तरी फलंदाज सूर्याचं अपयश नजरेआड करील. स्पर्धेत सर्वाधिक झेल सोडणारा संघ आपला होता. तेही आपण तूर्त विसरून जाऊ.

युद्ध हिंद महासागराच्या दाराशी आल्याच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बातम्या ऐकायला-पाहायला मिळत आहेत. ते मळभ दूर करणारं, ती चिंता आज-उद्यापर्यंत तरी विसरायला लावणारं हे विश्वविजेतपद आहे.

.....
(छायाचित्र सौजन्य भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व दैनिक गार्डियन)
......
#टी20_विश्वचषक #भारत_विश्वविजेता #भारत_न्यूझीलँड #संजू_सॅमसन #बुमराह #अक्षर_पटेल_बापू #मिचेल_सँटनर #ईशान_किशन #सूर्यकुमार_यादव
......


शुक्रवार, ६ मार्च, २०२६

रडतखडत आणि कण्हत-कुथत!

 


अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न आणि बेथल धावबाद.
मोठा अडथळा दूर झाल्याचा आनंद भारतीय खेळाडूंना आवरता न येणाराच...
...........
भारतीय संघ जिंकला! धापा टाकत, दमत, कण्हत आणि कुथत!!
संजू सॅमसन ह्याची सामन्याचा मानकरी म्हणून भले निवड झाली असो.
सामन्याचा हीरो होता जेकब बेथल
!
ह्या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत गेला आहे,
 तो अनेक अनुत्तरित प्रश्न आणि डोक्याला खुराक देणाऱ्या
अडचणींचे ओझे बरोबर घेऊनच
!
--------------------------

सांगा कसं जिंकायचं?

अडीचशे धावा केल्यानंतर अगदी हसत-खेळत, प्रतिस्पर्ध्याला दमवत, आक्रमक खेळत?

वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ जिंकला! कसा? तर धापा टाकत, दमत, कण्हत आणि कुथत!!

टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपान्त्य एकतर्फी झाला आणि दुसरा त्याच्या अगदी टोकाचा. क्रिकेट संकेतस्थळांचे मॅच प्रेडिक्टर भारताच्या विजयाची हमी देणारी कोणतीही टक्केवारी दाखवत असोत; ही लढत शेवटच्या दोन षट्कांपर्यंत अतिशय चुरशीची झाली.

हा सामना मुंबईऐवजी पर्थ किंवा अ‍ॅडलेड येथील मैदानांवर, द लॉर्ड्स किंवा ओव्हलच्या स्टेडियमवर, कोलंबो किंवा कँडी... असा अन्य कोठे खेळला गेला असता, तर हाच निकाल लागला असता का? ह्याचं उत्तर देणं मोठं कठीण आहे. घरच्या मैदानावर, नेहमीच्या वातावरणात खेळताना सूर्यकुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांची मोठी दमछाक झाली. कशीबशी अंतिम फेरी गाठली ह्या संघाने. हा निकाल दिलासा देणारा नक्कीच नाही. उलट अंतिम सामन्यासाठी इशारे देणारा असा हा विजय आहे.

ह्या तीनच दिवसांत सर्वांचा लाडका ठरलेला संजू सॅमसन ह्याची सामन्याचा मानकरी म्हणून भले निवड झाली असो. सामन्याचा हीरो होता जेकब बेथल!

संजू सॅमसन चांगलाच खेळला. सलग दुसऱ्या सामन्यातील त्याच्या अर्धशतकामुळे (आणि हुकलेल्या दुसऱ्या शतकाची चुटपुट लावणाऱ्या खेळीमुळे) भारताला इंग्लंडविरुद्ध धावांचा डोंगर उभा करता आला.

निर्णायक लढतीत भारताने मिळविलेल्या विजयात संजूचा वाटा मोठाच. पण ह्या उत्तुंग धावसंख्येचा पाठलाग निडरपणे करणारी जेकबची खेळीही तेवढीच महत्त्वाची.

संजू सलामीला आलेला. जेकब चौथ्या क्रमांकावर. दोन गडी झटपट बाद झाल्यावर. दडपणाखाली. संजूच्या ८९ धावा ४२ चेंडूंमध्ये. जेकबने ४८ चेंडूंमध्ये १०५ धावा केलेल्या. त्या करताना आपण लढतीतून अजून बाहेर पडलो नाही असा समोरच्या सहकाऱ्याला दिलासा देणाऱ्या. योगायोग असा की, ह्या दोघांचेही चौकार व षट्कार समान – आठ आणि सात. ह्याचा दुसरा अर्थ असा की, संजूपेक्षा जेकब एकेरी-दुहेरी धावा अधिक पळाला. तेही धावांचा पाठलाग करताना.

पहिल्या काही मिनिटांतच पाहुण्यांचा कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं संजूवर कृपा केली होती. डावातलं तिसरं षट्क टाकणाऱ्या जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर हॅरीनं संजूचा झेल सोडलेला. त्या जीवदानाचा त्यानं पुरेपूर फायदा उठवला.

षट्कार मारण्याच्या प्रयत्नात संजू बाद झाला, तेव्हा संघाच्या दीडशेहून अधिक धावा झालेल्या. तेव्हा जवळपास सहा षट्कांचा डाव बाकी होता. अब तुम्हारे हवाले वतन साथीयों... असं म्हणण्याचं स्वातंत्र्य त्याला होतं.


आपल्या आधी दोन आणि समोर चार गडी बाद होत असल्याचे पाहणाऱ्या जेकबला ही मुभा नव्हती. संघ जिंकायचा असेल तर आपल्यालाच खेळावं लागेल, ह्याची जाणीव असल्यामुळं दुसरी धाव घेताना तो बाद झाला. त्या वेळी संघाला विजयासाठी २९ धावा आवश्यक होत्या. तो धावचित झाला आणि भारतीय संघानं खऱ्या अर्थानं निःश्वास टाकला.

बेथल सुदैवी नव्हता, असं नाही. त्याचं शतक साजरं झालं ते सुटलेल्या झेलाच्या षट्कारावर. पण अक्षर पटेल ह्यानं प्रयत्न करूनही न झालेला तो झेल अवघड होता. त्यात यश मिळतं तर अक्षरच्या नावावर आणखी एका अफ्लातून झेलाची नोंद झाली असती. त्याच्या अफाट क्षेत्ररक्षणाचा आजच्या विजयातील मोठा वाटा विसरता येणार नाही.

पहिल्या सहा षट्कांमध्ये बिनीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतरही इंग्लंड संघानं प्रयत्न सोडले नाहीत. ह्या झुंजारपणाला दाद द्यायलाच हवी. आणि ही कडवी झुंज दिली बेथलं ह्यानं.

विजयासाठी १८ चेंडूंमध्ये ४५ धावांची गरज असताना जसप्रीत बुमराह ह्यानं टाकलेलं अठरावं षट्क कमाल होतं. त्यात त्यानं फक्त सहा धावा दिल्या. नंतरच्या षट्कात पहिल्याच चेंडूवर बेथल ह्यानं षट्कार ठोकल्यानंतरही हार्दिकनं नऊच धावा दिल्या. शिवाय त्यानं सॅम करन ह्याला तिलक वर्माच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं होतं. भारताचा विजय तिथे नक्की झाला होता. किती धावांनी?’, एवढाच प्रश्न होता.

अखेरच्या षट्कात हे अंतरही झपाट्यानं कमी झालं. आता सामना आपलाच ह्या समजुतीनं कर्णधारानं चेंडू शिवम दुबे ह्याच्या हाती सोपवला. वेस्ट इंडिजविरुद्ध दोनच षट्कांत ४६ धावांची खिरापत वाटणाऱ्या दुबेवर हा मोठाच विश्वास दाखवलेला. जोफ्रा आर्चर ह्यानं त्याला तीन षट्कार मारले. दुबेनं २२ धावा दिल्या. अर्थात त्यानं फलंदाजीत बढती मिळाल्यावर २५ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या, हे विसरता येणार नाही. पण षट्कामागे पावणेबारा धावा मोजणारा अक्षरही तेथे चालला असता.

ह्या सामन्यात ४० षट्कांत ४९९ धावा झाल्या. अनेक विक्रम रचले गेले. दोन्ही संघांकडून ३९ चौकार आणि ३४ षट्कारांची आतषबाजी झाली. मग गोलंदाजांचं काय? सामन्यात एकूण १२ खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यापैकी बुमराह व हार्दिक पंड्या ह्या दोघांनीच षट्कामागे दहापेक्षा कमी धावा दिल्या. फलंदाजांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून गोलंदाजांनी शिमगा करावा, हे काही योग्य नाही.

अहमदाबादेत विजेतेपदासाठी भारतीय संघाला चिवट न्यू झीलँडशी लढावे लागणार आहे. वरुण चक्रवर्तीनामक शस्त्र धार पूर्णपणे गमावून बसल्याचे दिसते. एक एकच सामना वाट्याला आलेले कुलदीप यादव व महंमद सिराज आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे मैदानात उठून दिसणारा रिंकू ह्यांचा संघात समावेश होईल का? काही दिवसांपूर्वी संजू सॅमसन ट्रोलरचे आवडते गिऱ्हाईक होते. त्याची जागा आता अभिषेक शर्मा ह्यानं घेतली आहे. अभिषेकला संघाबाहेर ठेवण्याचं धाडस कोणी करील? की एका स्फोटक खेळीच्या अपेक्षेवर त्याला पुन्हा संधी दिली जाईल?

इंग्लंडवर फक्त सात धावांनी विजय मिळविलेला भारतीय संघ अंतिम फेरीत गेला तो अनेक अनुत्तरित प्रश्न आणि डोक्याला खुराक देणाऱ्या अडचणी घेऊनच!

….

(छायाचित्रे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद व भारतीय क्रिकेट मंडळ ह्यांच्या संकेतस्थळांवरून साभार.)

….

#टी20_विश्वचषक #उपान्त्य_सामना #भारत_इंग्लंड #संजू_सॅमसन #जेकब_बेथल #अक्षर_पटेल





अखेरचा राम राम, पावनं!

   डॉ. कुमार सप्तर्षी : सदर लेखन ते निवडणूक - पाहिलेला प्रवास  'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडवून दिला. त्याचं ...