शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

डायरीची चाळता पाने...

थोडी आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी नाही. बरंच काही निकाली निघत आहे, ह्या स्वच्छता मोहिमेत. ‘मोह मोह के पन्ने...’ एक तर रद्दीत जात आहेत किंवा फाडून कचऱ्याच्या डब्यात.

बरेच अंक, वर्तमानपत्रांची पानं, कातरणं जपून ठेवलेली. काही नियतकालिकांचे पहिले अंक. काहींचे शेवटचे अंक. त्याच बरोबर काही डायऱ्या आणि कार्यक्रमांच्या नोंदवह्या. ह्या नोंदवह्या फेकून देण्याचं धाडस ह्या वेळीही झालं नाही. त्यात बरंच काही काही आढळतंय. त्यातून नव्याने लिहिण्यासारखंही बरंच आढळलं. पण ते नंतर...

ह्या सगळ्या आवराआवरीत मदत करायला एकाला बोलावलेलं. त्याच्या मुली शाळेत शिकतात. कोऱ्या डायऱ्या, एखाद-दुसरंच पान खरडलेल्या वह्या त्याच्या मुलींसाठी आवर्जून देतोय. पुस्तकं झटकून परत ठेवली जात आहेत. पुन्हा कधी तरी उघडली जातील, ह्या आशेनं.

पुस्तकांचा एक भला मोठा गठ्ठा समोर आला. त्यात ‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ - १० पुस्तकं. ‘त्याच्या मुलींना देऊन टाका वाचायला...’ असं बायको म्हणाली. आणि एका तिरप्या (पण भोळ्या नव्हे!) कटाक्षाची मानकरी ठरली.

जुनी डायरी सापडली
पुस्तकांवरची धूळ झटकून ठेवताना एक डायरी हातात आली. खूप जुनी. पण अगदी नव्यासारखी. कारण ती फारशी वापरलेलीच नाही. जाड आवरण. आतला कागद स्वच्छ पांढरा. ती रद्दीत कशाला द्यायची?

त्या मुलींसाठी म्हणून डायरी देत होतो. पुन्हा एकदा चाळताना दोन-चार पानांवर काही तरी लिहिलेलं दिसलं. म्हणून आवर्जून परत पाहिली.

दोन पानांवर इंग्रजीत तीन पत्ते लिहिलेले दिसले. प्रत्येक पत्ता वेगळ्या अक्षरात लिहिलेला. ही धावती लिपी माझी नक्कीच नाही. पाहिलं, लक्षात आलं आणि साडेतीन दशकं मागे गेलो.

क्रिकेटपटूंनी लिहून दिलेले पत्ते
त्यातले दोन पत्ते पंजाबातील आहेत आणि एक दिल्लीचा. पंजाबमधील पत्तेही दोन वेगळ्या शहरांचे - जालंदर आणि पतियाळा (पटियाला). हे त्या काळातील बऱ्यापैकी प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी लिहून दिलेले पत्ते आहेत. त्यातले दोघे भारताकडून खेळलेले.

आपापल्या घरचा व्यवस्थित पत्ता लिहून देणारे हे क्रिकेटपटू म्हणजे गुरुशरण सिंग, राजिंदरसिंग घई आणि महेशइंदरसिंग (सोढी). त्यांनी त्या डायरीत लिहून दिल्यानंतर बहुदा काल-परवा पहिल्यांदाच ती पानं पाहिली गेली असावीत. त्यांच्याशी कधी पत्रव्यवहार केला नाही. त्यांच्या शहरातही जाणं झालं नाही.

ते अक्षर, ते पत्ते पाहताच सगळं काही लख्ख आठवलं. सन १९८७च्या डिसेंबरमधील ते लेखन आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. कर्णधार विव्हियन रिचर्ड्स. त्या काळात पाहुण्या संघाला सरावासाठी सामने खेळायला मिळायचे. एखादा सामना रणजी विजेत्या संघाबरोबर असे. काही सामने पूर्व, पश्चिम, मध्य, उत्तर, दक्षिण विभागाच्या संघाशी असत.

पाहुण्यांचा उत्तर विभागाविरुद्धचा तीन दिवसांचा सामना पुण्यात होता. नेहरू स्टेडियममध्ये. त्या वेळी मी ‘क्रीडांगण’मध्ये काम करत होतो. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना साक्षात खेळताना पाहायला मिळणार होतं. क्रिकेटचं वेड आणि अफाट माहिती असलेला गंगाप्रसाद सोवनी हौस म्हणून कार्यालयात नेहमी यायचा.

अंकाचं काम थोडं अगोदर आटोपून मी आणि गंगाप्रसाद तिन्ही दिवस सामना पाहायला गेलो. उत्तर विभागाचं नेतृत्व मोहिंदर अमरनाथ करीत होता. काही करून त्याला भेटायचं आम्ही ठरवलं. सेलिब्रिटी म्हणावा असा एकटाच तो. पाहुण्यांचा संघ तेव्हा पुण्यातल्या एकमेव तारांकित ‘ब्लू डायमंड’मध्ये उतरलेला. उत्तर विभागाची सोय ‘हॉटेल अजित’मध्ये केलेली.

मोहिंदरचा स्वच्छ नकार
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर आम्ही दोघं ‘अजित’वर धडकलो. खालीच मोहिंदर अमरनाथ दिसला. आम्ही दोघांनी गप्पा मारण्यासाठी वेळ द्यायची विनंती केली. मी जेमतेम तेविशीचा आणि गंगाप्रसाद विशीतलाच. एकूण अवतार बघून आमच्यावर वेळ खर्च करणं मोहिंदरला मान्य नसावं. त्यानं अगदी थोडक्यात आणि सौम्यपणे नकार दिला.

शिकाऊ होतो तरी ‘पत्रकार’ असल्याची नशा दोघांनाही होती. अल्पपगारी मी आणि बिनपगारी तो. पण पूर्ण अधिकारी! सरळ मोहिंदरच्या खोलीचं दार वाजवलं. पुन्हा आमचे चेहरे बघून तो चिडला. अधिकच लालबुंद झाला. ‘एकदा नाही म्हणून सांगितलं ना...’ असं काही तरी इंग्रजीत बोलत त्यानं दार धाडकन बंद केलं.

हिरमसून खाली आलो. पाहिलं तर उत्तर विभागाचे तीन खेळाडू निवांत गप्पा मारत बसले होते. मोहिंदरकडून अपमान(!) होऊनही आम्ही निगरगट्टपणे त्यांच्याशी बोलायला गेलो. ते होते मधल्या फळीतला शैलीदार फलंदाज गुरुशरण (पंजाबीत गुरशरण) सिंग, मध्यमगती गोलंदाज राजिंदरसिंग घई आणि फिरकी गोलंदाज महेशइंदरसिंग.

तीन सरदारजी
त्या तीन सरदारजींना काय वाटलं कोणास ठाऊक, पण त्यांनी आम्हाला पत्रकाराचा मान दिला. अर्धा तास आम्ही गप्पा मारत बसलो. इकडच्या तिकडच्या. खरं तर पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजच्या पहिल्या तीन फलंदाजांनी - गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स आणि रिची रिचर्ड्सन - उत्तर विभागाच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली होती. ‘नेहरू स्टेडियमची खेळपट्टी अशीच पाटा आहे,’ असं (ऐकीव) सांगून आम्ही घई आणि महेशइंदर ह्यांची समजूत घातली. 😀

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा हॉटेलात. त्या तिघांनी आम्ही मित्र असल्यासारखंच स्वागत केलं. आठवतंय की, घईनं खायला ‘पनीर पकौडे’ मागवले होते. पुण्यातही पंजाबी आतिथ्याला जागत त्यानं आम्हाला खायचा आग्रह केला. तेव्हा पनीर वगैरे काही माहीत नव्हतं. ‘हे शाकाहारी आहे ना?’, असं विचारून त्यातल्या एका पकौड्याची चव घेतली.


घई तोपर्यंत भारताकडून सहा एक दिवशीय सामने खेळला होता. कारकिर्दीतला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना तो खेळून चुकला होता. पण तेव्हा ते त्यालाही माहीत नव्हतं आणि आम्हालाही. पुन्हा संघात येण्याचं स्वप्न तो पाहत होता.

पहिल्या डावात सव्वाशेहून अधिक धावा मोजून एकही बळी न मिळालेला घई पाहुण्या संघाच्या दुसऱ्या डावाचा विचार करीत होता. कोणत्या बाजूने गोलंदाजी केली तर फायदेशीर ठरेल, खेळपट्टी तिसऱ्या दिवशी कशी राहील, असे प्रश्न तो आम्हाला विचारत होता. आम्ही त्याबाबत ठार अज्ञ! तरी गंगाप्रसाद काही काही सांगत राहिला. दुसऱ्या डावात त्याला नक्की यश मिळेल, असा दिलासा आम्ही दिला.

त्या तीन दिवसांच्या सामन्यात दुसऱ्यांदा गोलंदाजी करण्याची संधी काही घईला मिळाली नाही. तीन दिवसांत मिळून फक्त १३ फलंदाज बाद झाले. हा मध्यम उंचीचा आणि सडपातळ चणीचा मध्यमगती गोलंदाज कसा काय, हा प्रश्न तेव्हा पडला. माझ्याहून जेमतेम एखादा-दीड इंच उंच असावा तो.

कुलकर्णी आणि राजू!
राजू कुलकर्णी की राजू घई, अशी स्पर्धा तेव्हा होती. आडनाव ऐकून राजूशी माझं काही नातं आहे का, माझी नि त्याची ओळख आहे का, असंही घईनं विचारलं होतं.

‘कपिलदेव आणि श्रीनाथ ह्यांच्यापेक्षा घई वेगवान होता,’ असं काही तरी विधान मध्यंतरी नवज्योतसिंग सिद्धू ह्यानं केलं होतं. स्वाभाविकच तो ट्रोल झाला! घईलाही ते काही पटलं नसणार.


गुरुशरण बहुतेक फलंदाजीला यायचा होता. तिसऱ्या दिवशी किती वेळ खेळायला मिळेल, ह्याची चिंता त्याला होती. तोही तसाच दिसणारा. फारसा उंच नाही आणि धिप्पाडही नाही. मधल्या फळीतला फलंदाज म्हणून त्यानं ठसा उमटवलेला. भारतीय संघातून खेळण्याचं स्वप्न पाहत होता तो. ते पुढे चार वर्षांनी साकार झालं.

एक कसोटी आणि एक दिवसाचा एकच सामना गुरुशरणच्या वाट्याला आला. उत्तर विभाग, दिल्ली आणि नंतर पंजाबकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळलेल्या त्याच्या वाट्याला तेवढंच आलं. पुढे दिल्लीऐवजी पंजाबकडून खेळताना त्यानं संघाला रणजी करडंक विजेतेपद मिळवून दिलं.

धिप्पाड आणि रुबाबदार
ह्या तिघांमध्ये ‘सरदार’ वाटावा असा महेशइंदरसिंग एकटाच. धिप्पाड, रुबाबदार आणि हसतमुख. त्यानं दिलखुलासपणे हातात हात मिळवला, तेव्हा जाणवला त्याचा पंजा. भला मोठा. माझे दोन्ही हात मावतील एवढा रुंद, दांडगा. चेंडू वळवून बोटांना घट्टे पडलेले.


हा ऑफ स्पिनर काही भारताकडून खेळायचं स्वप्न पाहत नसावा. त्या सामन्यात पावणेदोनशे धावांचं मोल मोजून त्यानं ग्रीनिज आणि फिल सिमन्स हे बळी मिळवले होते. त्याच्या एकट्याच्याच बोलण्यात क्रिकेट सोडून इतर सटरफटर विषय होते. महेशइंदर ह्यानं न पाहिलेलं स्वप्न त्याचा मुलगा रीतिंदरसिंग सोढी ह्यानं पूर्ण केलं.

दुसऱ्या दिवशी गप्पा संपवून निघताना कसं कोणास ठाऊक पण त्या तिघांनीही माझ्या डायरीत आपापल्या घरचे पत्ते लिहून दिले. बहुतेक आगावूपणे मीच मागितले असावेत. त्या सामन्याचा वृत्तान्त असलेला अंक पाठवून देण्याचं आश्वासनही दिलं असेल कदाचित.

हे लिहिण्यासाठी म्हणून ह्या तिन्ही सरदार खेळाडूंची माहिती इंटरनेटवर शोधली. त्यांची चांगली छायाचित्रंही मिळत नाहीत. महेशइंदरसिंगचं तर छायाचित्र नावालाही दिसत नाही.

ह्या सामन्याच्या निमित्तानं बऱ्याच गमतीजमती आम्ही अनुभवल्या. तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू असताना उपाहाराच्या थोडं आधी विव्ह रिचर्ड्स थेट पत्रकार कक्षात आला. तो त्या सामन्यात खेळत नव्हता. रॉजर हार्पर संघाचं नेतृत्व करीत होता.

साक्षात रिचर्ड्सला पाहून सगळेच पत्रकार धास्तावले. तो आला आणि थेट आमच्या जवळ बसला. ‘स्पोर्ट्सस्टार’चे आर. मोहनही त्याच्यापासून चार हात लांबच राहिले. एका कोणी तरी ज्येष्ठ पत्रकारानं ‘त्याच्याशी उगीच बोलायला जाऊ नका हं’ असं कानात कुजबुजत सावधही केलं होतं.

रिचर्ड्सशी संवाद
गंगाप्रसाद फार धीट. त्यानं रिचर्ड्सशी संवाद साधायला सुरुवात केली. मग मीही. आम्ही अंकात वाचकांसाठी स्पर्धा आयोजित करीत होतो. त्यात १९७८-७९मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील चार खेळाडूंचे फोटो होते. प्रश्न अर्थातच होता - ‘ओळखा पाहू हे कोण?’ रिचर्ड्सच्या हाती अंक दिल्यावर त्यानं तो चाळला. ते खेळाडू कोण, हेही सांगितलं. त्याचे ते कॅरेबियन शैलीतले उच्चार कळायला अवघडच होतं. सुपाएवढे कान करून आम्ही त्याला ऐकत राहिलो.

एखाद्या वाघानं रुबाबात गुहेतून बाहेर यावं, त्याच्या नुसत्या दर्शनानंच जंगल चिडीचूप व्हावं. काही न करता त्यानं इकडे तिकडे रेंगाळावं आणि डरकाळीही न फोडता गुहेत परत जावं... अगदी तसंच. पाच-सात मिनिटं बसून रिचर्ड्स पुन्हा पॅव्हिलियनकडं परतला. तो दृष्टीआड होताच ‘काय म्हणत होता, काय म्हणत होता?’ असं विचारत बऱ्याच पत्रकारांनी आम्हा दोघांभोवती कोंडाळं केलं!

त्या वेळी पत्रकार कक्षात कोणीही छायाचित्रकार नव्हता. तसं कोणी असणंही अपेक्षित नव्हतं. त्यामुळे रिचर्ड्स आणि आम्ही दोघं, असा काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाला नाही. आठवण मात्र तेव्हाच जेरबंद झालेली.

पिल्लेचा रडका चाहता
दिल्लीकडून खेळणारा के. भास्कर पिल्लाई (किंवा पिल्ले) त्या वेळी भलत्याच फॉर्मात होता. रणजी स्पर्धेत धावांचा रतीब घालूनही भारतीय संघाचं दार काही त्याच्यासाठी उघडलं नाही. त्याचा एक चाहता दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हॉटेलवर आला होता. पिल्ले त्या सामन्यात १२ धावा करूनच बाद झाला.

मोक्याच्या सामन्यात आपला लाडका पिल्ले अपयशी ठरल्याचं अनावर दुःख चाहत्याला झालं. ‘तुम्हे कब चान्स मिलेगा?’, असं विचारत तो रडायलाच लागला. त्यामुळं पिल्लेच बिचारा कानकोंडा झाला. ह्या चाहत्याची समजूत काढता काढता त्याची पुरेवाट झाली.

नेहरू स्टेडियमवरच्या त्या सामन्यात काही शिकावू पंच व्यवस्था पाहायला होते. त्यातल्याच कोणी तरी डेसमंड हेन्स ह्याला भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा खाऊ घातल्या. त्याला त्या इतक्या आवडल्या की, दुसऱ्या दिवशी खेळ संपल्यावर त्यानं थेट पाच किलो शेंगा मागवल्या. त्या घेऊन तो ‘ब्लू डायमंड’कडे रवाना झाला.

तो सामना संपला. रटाळ झाला. त्यानंतर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात नरेंद्र हिरवाणी ह्यानं कमाल केली. दोन्ही डावांत मिळून त्यानं १६ गडी बाद केले. स्वाभाविकच ‘क्रीडांगण’च्या मुखपृष्ठावर तो झळकला. मी तयार केलेला तो शेवटचा अंक. आणि बहुतेक ‘क्रीडांगण’चाही!

...किती तरी वर्षं न उघडलेली, पुस्तकांच्या ढिगाऱ्यात लपून राहिलेली डायरी अशी अचानक हाती आली. बऱ्याच आठवणींचा खजिनाच तिनं उघडून दिला.
....
#डायरीतील_पाने #क्रिकेट #गुरुशरणसिंग #राजिंदर_घई #महेशइंदर_सिंग #विव्हियन_रिचर्ड्स #वेस्ट_इंडिज #नेहरू_स्टेडियम #गॉर्डन_ग्रीनिज #डेसमंड_हेन्स #पत्ता #मोहिंदर_अमरनाथ

मंगळवार, १५ जुलै, २०२५

ओह! लॉर्ड्स... 😭😭

 


महंमद सिराज... प्रतिकाराला पूर्णविराम.
अडवूनही चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळलाच.
....................
सनसनाटी म्हणता येईल असा झाला तिसरा कसोटी सामना. त्यातल्या
प्रत्येक दिवसाचा रंग वेगळा होता. आशा दाखविणारा आणि निराश करणाराही. रवींद्र जाडेजा ह्यानं झुंजार खेळ करूनही भारत विजयापासून लांब राहिला. त्याची कारणं बरीच. पहिल्या डावात आघाडी मिळविण्याची गमावलेली संधी, दुसऱ्या डावात इंग्लंडला दिलेला बाईज धावांचा बोनस आणि आघाडीच्या फळीनं केलेली ढिसाळ फलंदाजी...
....................

लॉर्ड्सच्या मैदानावर विजयी पताका फडकवण्याची संधी गमावली. अँडरसन-तेंडुलकर करंडक कसोटी मालिकेत २-१ आघाडी मिळविण्याचीही संधी निसटली. कसोटी सामन्यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या सामन्यात भारत हरला. पाहता पाहता विजय दूर होत गेला. हळहळ वाटायला लावणारा हा पराभव.

‘सनसनाटी!’ ह्या सामन्याला असं विशेषण लावता येईल. त्याला रंगतदार म्हणता येईलच. पाचही दिवस चुरशीचा खेळ झाला. प्रत्येक दिवसातल्या सत्रागणीक पारडं हलकं नि जड होत राहिलं - कधी पाहुण्यांचं, तर कधी यजमानांचं. पण जखमी असूनही संघाची गरज म्हणून सहा षट्कं टाकणाऱ्या शोएब बशीरचा पस्तिसावा चेंडू महंमद सिराजनं अडवूनही यष्ट्यांवर जाऊन आदळला. त्या क्षणी इंग्लंडचं पारडं कायमस्वरूपी जड झालं! विजयावर शिक्कामोर्तब!!

पराभव स्वीकारणं अवघड असतंच. पण असे हे निसटते वाटणारे पराभव पचवणं फार जड जातं. आता लक्षात येतं की, ह्या पराभवाचं बीज पहिल्या दिवशीच पडलं होतं. पहिल्या डावातील आघाडी घेण्याची संधी घालवून त्या बीजारोपणाला खतपुरवठा केला. चौथ्या दिवशी भरपूर बाईज देऊन आणि शेवटच्या तासाभरात चार गडी गमावत त्याला पुरेसं पाणी दिलं होतं. त्याचीच फळं मिळतील, हे पाचव्या दिवशीच्या पहिल्या दोन तासांत आणखी चार गडी गमावून निश्चित केलं.

नेमक्या मोक्याच्या वेळी भारताची आघाडीची फळी कच का खाते? धावा फक्त २०० करायच्या होत्या आणि त्यासाठी दिवसभराहून अधिक वेळ होता. खेळपट्टीवर टिकून राहिलं असतं तरी त्या निघाल्या असत्या. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेनं ते दाखवून दिलं होतं. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी आवश्यक होतं तेव्हाच हे केलं नाही.

जयस्वाल आणि नायर
यशस्वी जयस्वाल फक्त स्वतःसाठी खेळतो का, असा प्रश्न विचारण्याची आणि त्याचं उत्तर शोधण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ ह्यांच्याच वाटेनं तो चालला आहे, असं म्हणणं घाईचं होईल का? आपल्या तिसऱ्या कसोटीत त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायर ह्याचा अध्याय आता संपल्यात जमा आहे. त्या त्रिशतकानंतरच्या १० डावांत त्याला पन्नाशीही गाठता आलेली नाही. एकच कसोटी खेळल्यानंतर बाहेर बसलेला साई सुदर्शन पुनरागमनासाठी उत्सुक असेल.

शेपटानं प्रतिकार केला नसता, तर भारताचा हा पराभव कदाचित अधिक मोठा असला असता. पाचव्या दिवशी उपाहारानंतरच्या तासाभरात तो झाला असता. अनुभवी रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि महंमद सिराज ह्यांनी तो लांबणीवर टाकला. टिच्चून खेळत त्यांनी पराभवाचं अंतर कमी केलं. दोन्ही डावांमध्ये भारतानं दिलेल्या इतर धावांपेक्षा कमीच!

शेवटचे चार नि आघाडीचे पाच

एक अपयशी झुंज...
जाडेजा दुसऱ्या डावात संघाच्या वाट्याला आलेले ४० टक्के
चेंडू खेळला नि धावा केल्या 
३५ टक्के!
...............
भारताचा दुसरा डाव ७४.५ षट्कं म्हणजे ४४९ चेंडू चालला. त्यातले १८१ चेंडू सातव्या क्रमांकावर आलेला रवींद्र जाडेजा खेळला. म्हणजे ४० टक्क्यांहून थोडे जास्त. (आणि त्याच्या धावा ३५ टक्के!) पहिल्या सहा फलंदाजांनी मिळून खेळलेल्या चेंडूंपेक्षा ५१ जास्त. शेवटचे तिघे - नितीशकुमार रेड्डी, बुमराह व सिराज मिळून १३७ चेंडू खेळले. फलंदाज म्हणून घेतलेल्या पाच जणांपेक्षा १८ जास्त. ह्या चौघांनी डावातल्या ८१ टक्के चेंडूंचा सामना केला. डावातील ४८ टक्के धावा त्यांनी केल्या. जाडेजा आणि राहुल ह्या दोघांच्या धावांची बेरीज १०० होते. थोडक्यात हिशेब मांडायचा तर गोलंदाजांनी कमावलेलं फलंदाजांनी बेफिकिरीने घालवलं.

कर्णधारपदाचा फारसा अनुभव नसलेल्या शुभमन गिल ह्याला प्रतिस्पर्धी कर्णधाराकडून बरंच काही शिकता आलं असेल, असं म्हणता येईल. सामन्याचा मानकरी ठरलेल्या बेन स्टोक्स ह्यानं दोन्ही डावांत किल्ला लढविला. पहिल्या डावात शतकवीर जो रूटबरोबर महत्त्वाची भागीदारी केली. मग नेहमीप्रमाणे चेंडू हातात घेतल्यावर लगेच संघाला यश मिळवून दिलं. एखाद्या ॲथलीटसारखी चपळाई दाखवत तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत ह्याला धावचित केलं. पहिल्या डावात आघाडी मिळवण्याचं भारताचं स्वप्न तिथंच भंगलं. दुसऱ्या डावातही त्यानं ३३ धावा केल्या आणि तीन बळी मिळवले. निकाल लागेपर्यंत त्यानं प्रयत्नात कोणतीही कुचराई ठेवली नाही.

लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर यजमान संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक ह्यांना हवी तशी खेळपट्टी मिळाली नाही, असं ‘द गार्डियन’च्या बातमीत म्हटलं होतं. त्यामुळे यजमानांचं फार काही बिघडलं नाही, हे पहिल्याच दिवशी दिसून आलं. पहिल्या दिवसाअखेर त्यांनी चार गडी गमावून अडीचशेचा टप्पा पार केला. दुसऱ्या कसोटीतील हीरो आकाशदीप इथं झीरो ठरलेला दिसला. विश्रांती घेऊन संघात परतलेल्या जसप्रीत बुमराहच्या बरोबर नवा चेंडू महंमद सिराजऐवजी त्याच्या हातात आला. पण भारताचा सर्वांत महागडा गोलंदाज तोच ठरला.


तिसऱ्या कसोटीतील एकमेव शतकवीर
जो रूट ह्याच स्वीपचा हुकुमी फटका.
.............................
रूट-स्टोक्सची भागीदारी
चौथा गोलंदाज म्हणून नितिशकुमार रेड्डी आला आणि त्यानं पहिल्याच षट्कात दोन झटके दिले. दोन्ही सलामीवीरांना त्यानं यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. त्यानंतर पोप-रूट जोडीनं पडझड होऊ न देता शतकी भागीदारी केली. त्यांनी फटक्यांची आतषबाजी केली नाही. कसोटीला साजेसा खेळ केला. तो बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला. स्टोक्सनं मग रूटला चांगली साथ देत, ७९ धावांची भागीदारी केली. खुद्द कर्णधार मैदानात असतानाही त्याच्या संघानं बॅझबॉल शैलीचा खेळ आज केला नाही, ही सलामीच्या दिवशीची गंमत.

बुमराहनं दुसऱ्या नव्या चेंडूवर दुसऱ्या दिवशी सकाळीच करामत केली. आधी त्यानं बेन स्टोक्सची ऑफची यष्टी वाकविली. पुढच्या षट्कात शतकवीर रूटची मधली यष्टी गुल झाली. पुढच्याच चेंडूवर ध्रुव जुरेलकडे झेल देऊन ख्रिस वोक्स परतला. पहिल्या दिवसाच्या धावांमध्ये जेमतेम २० धावांची भर पडली असताना यजमान संघाने तीन गडी गमावले होते.

तीन त्रिफळे
हा दिवस बुमराहचा होता. त्यानं पुन्हा एकदा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. आपण पहिल्या नंबरचेच आहोत, हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्याच्या पाच बळींपैकी तीन वरच्या फळीतले आहेत - ब्रूक, स्टोक्स आणि रूट; तिघांचाही त्रिफळा उडालेला.

‘लक्ष दे रे. नाही तर पुन्हा म्हणशील मी तयार नव्हतो..!’ लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात महंमद सिराज ह्यानं पहिल्या स्लिपमध्ये उभ्या राहिलेल्या के. एल. राहुल ह्याला सुनावलं होतं म्हणे. राहुलनं ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळीही लक्षात ठेवायला हवं होतं. सिराजच्या सोळाव्या आणि डावातल्या ८७व्या षट्कातल्या तिसऱ्या चेंडूवर त्यानं जेमी स्मिथ ह्याचा झेल सोडला. ह्या झेलाबरोबर भारतानं इंग्लंडला तीनशेच्या आत-बाहेर, फार तर सव्वातीनशेच्या आत गुंडाळण्याची संधी सोडली.

नेहमीप्रमाणंच जेमी स्मिथनं परिस्थितीचं दडपण घेतलं नाही. ब्रिडन कार्स ह्याला जोडीला घेऊन त्यानं ७४ धावांची अतिशय महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ती बऱ्यापैकी निर्णायक ठरली, असं आता म्हणता येईल. स्मिथनं सलग तिसऱ्यांदा पन्नाशीपुढे मजल मारली आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या कार्स ह्यानंही तुलनेनं आक्रमक अर्धशतक झळकावलं. डावातला एकमेव षट्कार त्याच्याच नावावर होता.
भारतीय क्षेत्ररक्षकांच्या रूपाने दुर्दैवानं सिराजची पाठ सोडली नाही. त्याच्या गोलंदाजीवर कार्सला आकाशदीप आणि जुरेल ह्यांनी जीवदान दिलं. शेवटच्या तीन जोड्यांसाठी इंग्लंडला शंभराहून अधिक धावा  करू देण्याची चूक भारताला महाग पडलं.

स्टोक्स मदतीला धावलाच
यशस्वी जयस्वाल ह्यानं पहिल्याच षट्कात वोक्सला तीन चौकार मारत आतषबाजीची झलक दाखविली. पण पुनरागमन करणाऱ्या जोफ्रा आर्चर ह्यानं तिसऱ्याच चेंडूवर त्याला परतवलं. संघ व्यवस्थापनानं पुन्हा एकदा विश्वास टाकलेल्या करुण नायरनं आर्चरलाच नंतर दोन चौकार लगावले. राहुल - नायर जोडी जमते आहे, असं वाटत असतानाच इंग्लंडच्या मदतीला स्टोक्स आला. प्रत्येक वेळी त्यानं गोलंदाजीला आल्यावर संघाला यश मिळवून दिलेलं आहे. ह्या डावात चाळिशीपर्यंत गेलेल्या नायरचा रूटने स्लिपमध्ये सुंदर झेल घेतला.

कर्णधार शुभमन गिल ह्याला वोक्सनं स्मिथकडे झेल द्यायला लावला, तेव्हा संघाचं शतक नुकतंच झालं होतं. जखमी ऋषभ पंत कधी खेळायला येणार, ह्याबाबत संभ्रम असताना तो पाचव्या क्रमांकावरच आला. त्यानं आणि राहुलनं शेवटची तीन षट्कं अतिशय संयमानं खेळून काढली. तिसऱ्या दिवशी भारतानं आघाडी मिळविण्याच्याच उद्दिष्टानं खेळायला हवं होतं. पण शेवटचे चार खेळाडू अवघ्या बारा धावांची भर घालून बाद झाले.

राहुलचं शतक लवकर पूर्ण व्हावं, ही पंतची इच्छा त्याच्या अंगलट आली. त्यानंतर लगेच राहुलही परतला. जाडेजा, सुंदर आणि रेड्डी ह्यांच्यामुळे भारताला किमान बरोबरी तरी साधता आली. चौथ्या डावात आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे, ह्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही. त्याची किंमत २२ धावांच्या पराभवाच्या रूपाने चुकवावी लागली. कारण फलंदाज उभं राहतो, त्या भागातील धूळ उडत असल्याचं दुसऱ्या दिवशीच दिसलं होतं.

ह्या सामन्याच्या चार दिवसांनी वेगवेगळे रंग दाखवले. पहिल्या दिवशी कसोटीला साजेसा संथ खेळ झाला. गडी फक्त चार बाद झाले. दुसऱ्या दिवशी धावांची गती वाढली आणि बळींची संख्याही. तीस धावा आणि पाच गडी अधिक. तिसऱ्या दिवशी सर्वांत कमी धावा झाल्या - २४४ आणि गडी बाद झाले सात. चौथ्या दिवशी १४ फलंदाज बाद झाले आणि धावा निघाल्या २४८. शतक सोडा, कोणाचं साधं अर्धशतकही झालं नाही, असा हा एकमेव दिवस.

चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात हुकमी एक्का जसप्रीत बुमराह चालत नसताना महंमद सिराज ह्यानं दोन बळी घेतले - त्याला नितिशकुमार रेड्डी आणि आकाशदीप ह्यांनी साथ दिली. जो रूट आणि बेन स्टोक्स ह्यांची जोडी जमली होतीच. त्यांनी पाचव्या जोडीसाठी ६७ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावाप्रमाणेच ही जोडी त्रास देणार असं दिसत होतं.

वॉशिंग्टनच्या फिरकीचं जाळं
चहापानाच्या थोडं आधी वॉशिंग्टन सुंदर ह्यानं ही जोडी फोडली. आपल्या तिसऱ्या षट्कात त्यानं रूटचा लेग स्टंप वाकवला. आकार घेत असलेल्या भागीदारी संपली. त्यानंतर आला होता आतापर्यंत धोकादायक ठरलेला जिमी स्मिथ. पण त्यालाही वॉशिंग्टननं टिकू दिलं नाही. त्याची ऑफची यष्टी त्यानं उखडली! वॉशिंग्टनच्या फिरकीचं जाळं आणि बुमराहचा धारदार मारा ह्यामुळे इंग्लंडची कोंडी झाली होती. त्यांनी शेवटचे सहा गडी ३८ धावांत गमावले. गमतीची गोष्ट म्हणजे ह्या मालिकेतली सर्वांत कमी धावसंख्या करणाऱ्या इंग्लंडचा एकही फलंदाज शून्यावर बाद झाला नाही. त्यांच्या सात फलंदाजांचा त्रिफळा उडाला, तर एक पायचित झाला.

दुसऱ्या डावात भारतानं चार गडी गमावल्यानंतरही चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यावर वॉशिंग्टन सुंदर ‘आम्हीच जिंकणार’ असं आत्मविश्वासानं सांगत होता. त्या आत्मविश्वासाला साजेसा खेळ करणं त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाचव्या दिवशी जमलं नाही. जोफ्रा आर्चर, स्टोक्स आणि वोक्स ह्यांच्यापुढे भारतीयांनी नांगी टाकली. अपवाद जाडेजा ह्याचा. दोन्ही संघांच्या दुसऱ्या डावातलं एकमेव अर्धशतक त्याचं. इंग्लंडला दुसऱ्या डावात बाईजच्या रूपात २५ धावांचा बोनस मिळाला होता. तो फार महागात गेला.

मालिका संपली नाही. दोन कसोटी बाकी आहेत. त्यात भारत दुसऱ्या सामन्याप्रमाणे उसळी मारून वर येईल का? त्यासाठी संघात काही बदल करावे लागतील. मैदानावर आक्रमक वागण्यापेक्षा खेळातली आक्रमकता वाढवावी लागेल. असं झालं तर इंग्लंडला नमवणं फार अवघड नाही.
.........
(छायाचित्रं सौजन्य - ‘आय. सी. सी.’,  ‘द गार्डियन’ व बी. सी. सी. आय.)
.........

#भारत_इंग्लंड #कसोटी_मालिका #अँडरसन_तेंडुलकर_करंडक #तिसरी_कसोटी #लॉर्ड्स #बेन_स्टोक्स #बुमराह #जेमी_स्मिथ #वॉशिंग्टन_सुंदर #जो_रूट #जोफ्रा_आर्चर
.........

सोमवार, ७ जुलै, २०२५

नवा नेता, नवा इतिहास

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट
बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं.
पावसानं हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही.
दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून भारतीय संघानं
एजबॅस्टनवर नवीन इतिहास लिहिला.
कर्णधार शुभमन गिल, आकाशदीप, सिराज, जाडेजा,
सुंदर हे त्याचे शिल्पकार होत!
......................................


सामन्याचा मानकरी तो ठरला असला, तरी त्या पदकावर आणि शाम्पेनच्या
बाटलीवर ह्यानंही अधिकार सांगितला होताच की!

------------------------------
सामना जवळपास पाच दिवस चालला. धावा निघाल्या सतराशेच्या आसपास. दोन्ही संघांचे मिळून ३६ गडी बाद झाले. म्हणजे रोज सरासरी तीनशेहून अधिक धावा आणि पाच गडीही बाद. एकूण शतकं चार आणि अर्धशतकं सहा. सामन्यात १० बळी घेणारा एक गोलंदाज आणि डावात पाच वा अधिक गडी बाद करणारे त्याच्यासह दोघं. आणि सामन्याचा निकाल लागलेला. दणदणीत म्हणावा असा विजय पाहुण्या संघानं यजमानांवर मिळवला. आठवड्यापूर्वीच्या पराभवाची साभार नि सहर्ष परतफेड!

एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इथे झालेल्या भारत व इंग्लंड संघांमधील दुसऱ्या कसोटी सामन्याची ही रंगलेली कहाणी. सामन्याचा निकाल एकतर्फी लागेल, हे चौथ्या दिवशी आणि त्यातही शेवटच्या सत्रात स्पष्ट झालं. इंग्लंडपुढे एव्हरेस्ट सर करण्यासारखं आव्हान होतं आणि दुसऱ्या डावातले तीन गडी त्यांनी गमावलेले.

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं. ते अवघड होतंच आणि पावसानं दिवसाच्या सुरुवातीलाच हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही. ह्या पावसामुळे भारतीय चाहत्यांची धडधड सकाळी वाढली होती. पण निसर्गानंही साथ दिली. बर्मिंगहॅममध्ये आठपैकी सात कसोटी सामन्यांत पराभूत झालेल्या भारतानं नवव्या सामन्यात नव्या दमाच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास लिहिला.

एकटा गिलच भारी
आकड्यांचाच आधार घेऊन बोलायचं तर ह्या सामन्याची किती तरी वैशिष्ट्यं सांगता येतील. भारताचा कर्णधार शुभमन गिल ह्यानं सामन्यात एकूण ४३० धावा केल्या. इंग्लंडला एकाही डावात तेवढ्या करता आल्या नाहीत. त्यानं पहिल्या डावात केल्या, त्याहून फक्त दोन अधिक धावा इंग्लंडला दुसऱ्या डावात करता आल्या. (शेवटच्या दोन जोड्यांनी टोलवाटोलवी करीत ४५ धावांची भर घातलेली, इथे लक्षात घेतली पाहिजे.)

शुभमनचं पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात आक्रमक दीडशतक. इंग्लंडकडून पहिल्या डावात तुफानी खेळ करणाऱ्या यष्टिरक्षक जेमी स्मिथच्या नाबाद १८४ धावा. दुसऱ्या डावातही त्याच्याच धावा सर्वाधिक - ८८. पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर इंग्लंडच्या फलंदाजांनी चार षट्कार ठोकले. त्यातले दोन नवव्या व अकराव्या क्रमांकावरच्या गोलंदाजांचे. भारताने चौथ्या दिवशी, दुसऱ्या डावात एक दिवशीय सामना खेळत असावा, त्या गतीने धावा केल्या. त्यात एकूण १३ षट्कार आणि पैकी आठ गिलचे. इंग्लंडच्या दोन्ही डावांतील षट्कारांची संख्या ११ आणि दोन्ही डावांमध्ये स्मिथने षट्कारांचा चौकार मारलेला.

सर्वांत मोठी भागीदारी पराभूत संघाची
सामन्यातली सर्वांत मोठी भागीदारी विजयी संघाची नव्हती, तर पराभूत संघाकडून झालेली. निम्मा संघ शंभराच्या आत गारद झालेला. समोर आव्हानं ६०० धावांच्या जवळचं. त्याचं अजिबात दडपण न घेता, किंबहुना ते झुगारून हॅरी ब्रूक व स्मिथ ह्यांनी सहाव्या जोडीसाठी त्रिशतकी भागीदारी केली. त्या डावातली त्यांच्याकडून तेवढीच एक शतकी भागी. संपूर्ण सामन्यातील चौदापैकी दोनच सत्रांवर इंग्लंडचं वर्चस्व होतं आणि त्याचं कारण ही भागीदारी आकार घेत होती.

गंमत अशी की, दुसऱ्या डावातही सर्वांत मोठी भागीदारी सहाव्या जोडीसाठीच झाली. त्यातला एक भागीदार पुन्हा स्मिथच होता आणि त्याचा जोडीदार कर्णधार बेन स्टोक्स. पहिल्या डावात ५ बाद ८४ आणि दुसऱ्या डावात ८३. ह्या वेळची भागीदारी डावातली सर्वाधिक असली तरी फक्त ७० धावांची. पराभवाची नामुष्की थांबविण्याची ताकद तीत नव्हती.


जाडेजा आणि गिल. पहिल्या डावातील ह्यांच्या भागीदारीनं
विजयाचा पाया रचला.
------------------------------
भारतीय संघाची सामन्यातील सर्वांत मोठी द्विशतकी भागीदारी पहिल्याच डावातली आणि सहाव्या जोडीसाठी. ती गिल आणि रवींद्र जाडेजा ह्यांची. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या रूपाने पुन्हा एका फिरकी गोलंदाजाला साथीला घेऊनच गिलने सातव्या जोडीसाठी दीडशतकी भागीदारी केली. गिल व जाडेजा ह्यांनी दुसऱ्या डावातही पावणेदोनशे धावांची भागीदारी केली. सातव्या आणि सहाव्या क्रमांकावर येऊन अर्धशतकं झळकावण्याची कामगिरी एकट्या जाडेजालाच साधली!

सहा जणांचा भोपळा
ब्रूक आणि स्मिथ ह्यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं फॉलो-ऑन वाचविला. पण संघाच्या फलंदाजीची वैगुण्यं त्याच डावात दिसून आली. संघाच्या धावा चारशे पार आणि तरीही सहा फलंदाजांना भोपळा फोडण्यात अपयश! दोघे शतकवीर सोडले, तर इतर दोघांनाच दुहेरी धावा करता आलेल्या.

दुसऱ्या डावात मात्र सलामीवीर झॅक क्रॉली हा एकटाच भोपळ्याचा मानकरी. तळाच्या दोघांसह आठ फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठलेली. पण खेळपट्टीवर टिकाव कोणी धरला नाही. अपवाद स्मिथ आणि काही काळ स्टोक्स ह्यांचा. परिणामी पावणेतीनशे धावा करताना संघाची दमछाक झाली.

पहिल्या कसोटीत भारताच्या तळाच्या फलंदाजांनी दोन्ही डावांची माती केली. ते चित्र एजबॅस्टनला दिसलं नाही आणि त्याहून ते फार जाणवलं नाही. पहिल्या डावात सहाशेचा उंबरठ्यावर आणि दुसऱ्या डावात सव्वाचारशेच्या वर एवढ्या धावा निघाल्या. धावांची गंगा वाहत असताना कोरडा राहिला तो एकटा नितिशकुमार आणि काही प्रमाणात करुण नायर. ब्रिडन कार्स ह्यानं तर पहिल्या डावासारखंच दुसऱ्या डावातही नायरला मामा बनवलं.

तिघांहून आकाशदीप फार सरस!
आकाशदीपनं सामन्यात १० बळी घेतले - पहिल्या डावात चार नि दुसऱ्या डावात सहा. यजमानांचे आघाडीचे तीन गोलंदाज - ख्रिस वोक्स, ब्रिडन कार्स आणि जॉश टंग ह्यांनी मिळून भारताचे सोळापैकी आठ गडी बाद केले. त्यासाठी त्यांनी दोन्ही डावांत मिळून ११८ षट्कं टाकली. आकाशदीपपेक्षा ७७ षट्कं अधिक!

फलंदाजीप्रमाणंच आघाडीच्या गोलंदाजांचं अपयश स्टोक्सला सतावत असणार. जेमतेम बाविशीच्या घरात असलेल्या शोएब बशीर ह्यानं पहिल्या डावात ४५ षट्कं टाकत इंग्लिश गोलंदाजीचा भार वाहिला. त्याला तीन बळी मिळाले, ते दीडशेहून अधिक धावा देऊन. पहिल्या डावात पाच षट्कं टाकणारा हॅरी ब्रूक आणि नितिशकुमार रेड्डी, हे दोघेच बळी न मिळालेले गोलंदाज.

नव्या चेंडूवर भारतीय जलदगती गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांपेक्षा किती तरी अधिक सरस ठरले. विजय आणि पराभवातलं हेच अंतर होतं. जगातला पहिल्या क्रमांकाच्या गोलंदाजाला विश्रांती देण्याच्या भारतीय व्यवस्थापनाच्या निर्णयावर सामना सुरू झाला तेव्हा बरीच टीका झाली. तथापि महंमद सिराज आणि आकाशदीप ह्यांनी जसप्रीत बुमराह ह्याची उणीव भासू दिली नाही. ही जमेची फार मोठी बाजू म्हणावी लागेल.

अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी चाललेल्या ह्या मालिकेतील पहिलाच सामना गमावल्यानंतर लगेच भारतीय संघ एवढ्या ताकदीनं उसळून आला. अशी उदाहरणं पाहायची झाल्यास ऑस्ट्रेलियाचा २०२०-२१चा दौरा आठवतो. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावांत नीचांकी ३६ धावांमध्ये गुंडाळला गेलल्या भारतीय संघाने नंतरच्या तीनपैकी दोन सामन्यांत कागांरूंना नमवलं. त्या आधी २००१च्या ऑस्ट्रेलियानं केलेल्या दौऱ्यात पहिली कसोटी हरल्यावर खचून न जाता भारतानं मालिका जिंकली होती. शुभमन गिलचा संघ तोच कित्ता गिरवणार काय, हे पाहायला हवं.

पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारणाऱ्या बेन स्टोक्सवर मोठी टीका झाली. पण 'बेझबॉल' शैलीनं विजय मिळवून स्टोक्सनं टीकाकारांना उत्तर दिलं. त्यामुळेच ह्या कसोटीतही त्यानं तसाच निर्णय घेतला. तो मात्र पूर्ण अंगलट आला. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोनशेच्या आसपास धावा आणि पाच गडी बाद, ही परिस्थिती म्हटलं तर दोन्ही संघांसाठी सारखीच होती. आधीच्या सामन्यातील दोन्ही डावांत भारतीय संघ कोलमडून पडलेला. त्यामुळे स्टोक्सला फार काही वाईट वाटलं नसावं.

लाजवाब द्विशतक
गिल, जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर ह्यांच्या मनात मात्र वेगळं काही होतं. ते दुसऱ्या दिवशी दिसून आलं. गिलनं खणखणीत द्विशतक झळकावलं. त्याचा स्ट्राईक रेट दीड शतकानंतर कमालीचा वाढलेला दिसला. प्रतिस्पर्ध्याला एकही संधी न देता त्यानं केलेला खेळ लाजवबाच! पहिल्या दिवशीच्या ३१० धावांत गिलचा वाटा होता ११४ धावांचा आणि  दुसऱ्या दिवशी केलेल्या २७७ धावांमध्ये १५५. सुंदरने आधी खेळपट्टीवर ठिय्या मांडून नंतर केलेली फटकेबाजी महत्त्वाची ठरली.

भारतानं दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात तीन गडी बाद करीत इंग्लंडला झटका दिला. पहिल्याच षट्कात १२ धावांची खिरापत वाटणाऱ्या आकाशदीपनं दुसऱ्या षट्कात कमाल केली. बेन डकेट ह्याचा गिलनं सुंदर झेल घेतला. त्याच्या पाठोपाठच्या चेंडूवर ओली पोप के. एल. राहुलकडे झेल देऊन परतला. महंमद सिराज ह्यानं क्रॉलीला बाद केलं.

सामना रंगतदार ठरणार, असं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर स्पष्ट झालं होतं. तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर पहिल्या तासातच सिराजनं लागोपाठच्या चेंडूंवर रूट आणि स्टोक्स ह्यांचा अडथळा दूर केला. निम्मा संघ गारद! आणखी ५०० आणि फॉलो-ऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान ३०० तरी धावा करायला हव्या. मोठंच आव्हान होतं हे.

धडाकेबाज ब्रूक-स्मिथ
हे दडपण ब्रूक आणि स्मिथ ह्यांनी झुगारून दिलं. उपाहारपर्यंतच्या २७ षट्कांमध्ये १७२ धावांची भर पडलेली. म्हणजे षट्कामागे जवळपास साडेसहा धावांची गती. वरची फळी कापलेली आणि सहा शतकी लक्ष्य असताना ह्या दोघांनी केलेला खेळ धडाकेबाज म्हणावा असाच होता. त्यातही स्मिथचा तडाखा औरच होता. त्याचं अर्धशतक ४३ चेंडूंमध्ये आणि शतकासाठी लागले ८० चेंडू.


ब्रूक-स्मिथ ह्यांची त्रिशतकी भागीदारी.
------------------------------
उपाहार ते चहापान ह्या दोन तासांमध्ये ह्या जोडीनं भारतीय गोलंदाजांची अजिबात डाळ शिजू दिली नाही. त्यात त्यांनी १०६ धावांची भर घातली. कारकिर्दीतलं दुसरं शतक करणाऱ्या स्मिथची गती दीडशे धावा करेपर्यंत चेंडूमागे धाव अशीच होती. त्यानंतर मात्र तो काहीसा संथ झाला. तरीही त्याची नाबाद १८४ धावांची खेळी फक्त २०७ चेंडूंमधली. त्यात २१ चौकार आणि ४ खणखणीत षट्कार.
 
चहापानानंतर पाच षट्कं झाली आणि भारताला नवा चेंडू उपलब्ध झाला. ब्रूक-स्मिथ जोडीनं फॉलो-ऑन टाळला आणि लगेचच आकाशदीप ह्यानं कमाल केली. त्यानं आधी ब्रूकचा त्रिफळा उडवला. त्या पाठोपाठ ख्रिस वोक्स बाद झाला. पुढे धमाल केली महंमद सिराज ह्यानं. त्यानं इंग्लंडचं शेपूट झटपट गुंडाळत खात्यात अर्धा डझन बळींची नोंद केली. सकाळच्या पहिल्या तासात आणि इंग्लंडचा डाव गुंडाळताना त्यानं केलेला मारा बुमराहची उणीव जाणवू न देणारा ठरला.

इंग्लंडचे शेवटचे पाच गडी फक्त २० धावांमध्ये बाद झाले. पाहुण्यांचं यजमानांनी केलेलं नकोसं अनुकरण!
 
पहिल्या डावातली १८० धावांची आघाडी फारशी नाही, असं समजूनच भारतानं चौथ्या दिवशी खेळ केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताच्या चाहत्यांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तीनपैकी अडीच सत्रांमध्ये गिल, ऋषभ पंत, जाडेजा ह्यांनी दिली. ‘एकही गिल, सबका दिल’ असंच कर्णधाराच्या दणकेबाज दीड शतकाचं वर्णन करताना लिहावं लागेल.

ह्याची सुरुवात पंतनं केली. त्यानं एक दिवशीय सामन्याला साजेशी फलंदाजी केली. तो सुटला होता, तेव्हा समोर कर्णधारानं दुय्यम भूमिका स्वीकारलेली. पंत एवढ्या सैल हाताने खेळतो की, त्याची बॅट दोन वेळा लांबपर्यंत उडून गेली. परिस्थिती अशीच राहिली तर ह्यानंतर पंत खेळत असताना ३० यार्ड वर्तुळाच्या आतल्या सगळ्याच क्षेत्ररक्षकांना हेल्मेट घालणं अनिवार्य होईल! 😂😃

अवघ्या एका धावेवर असताना पंतला दोन जीवदानं मिळाली - एक कठीण आणि दुसरं सोप्पं! त्याची पुरेपूर किंमत इंग्लंडनं मोजली. पंत बाद झाला, तेव्हा गिल ५८ धावांवर (७० चेंडू) खेळत होता. पुढच्या १०३ धावा त्यानं ९२ चेंडूंमध्ये करीत धावफलक हलता नव्हे तर पळता ठेवला. ख्रिस वोक्स, जो रूट ह्यांच्या गोलंदाजीच्या त्यानं निर्दयीपणे चिंधड्या केल्या.

महंमद सिराजनं झॅक क्रॉली ह्याला बाद करून सुरुवात करून दिली. मग आकाशदीपनं बेन डकेटची दांडी उडवली. त्यानं क्रीजचा सुंदर वापर केला. रूट ज्या चेंडूवर बाद झाला, त्याची तर फारच चर्चा झाली. त्या बळीचं वर्णनं ‘द गार्डियन’ दैनिकाने ‘द शाम्पेन मूमेंट ऑफ द एंटायर मॅच’ असं केलं!

पावसानं व्यत्यय आणल्यावरही पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा एजबॅस्टनचं स्टेडियम भारतीय प्रेक्षकांनी भरलेलं. ‘आपण जिंकलंच पाहिजे’ एवढीच त्यांची अपेक्षा. आकाशदीपनं आली ओले पोपचा त्रिफळा उडवला आणि नंतर लगेच ब्रूकला पायचित पकडलं. भारतीय संघाला विजयाचा वास तेव्हाच आला. सावध खेळणारा स्टोक्स डावाला आकार देऊ पाहत होता ते स्मिथच्या साथीने. स्मिथचा धावा काढण्याचा वेग ह्या डावातही सुरुवातीला तसाच होता - जवळपास चेंडूमागे धाव. कर्णधारपदाचं ओझं असलेला स्टोक्स तुलनेनं संथ.

वॉशिंग्टनच्या फिरकीनं स्टोक्सला परत धाडलं. त्यानंतर यजमानांनी शंभर धावांची भर घातली, तरी पराभव टळेल, असं क्वचितच कधी वाटलं. स्मिथला ख्रिस वोक्स साथ देत होता, तेव्हा काहीशी काळजी वाटत होतीच. नाही असं नाही. पण महंमद सिराजनं त्याचा फार अफलातून झेल घेतला. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात एक बळी जमा झाला.

आकाशदीपला स्मिथनं सलग दोन षट्कार खेचले, तेव्हा निकाल लांबणार असं वाटत होतं. पण पुढचा चेंडू हळुवार बाउन्सर टाकून आकाशदीपनं त्याला बरोबर जाळ्यात अडकवलं. आकाशदीपच्या रूपानं भारतीय भात्यात चांगलं अस्त्र असल्याचं, त्याच्या ह्या सामन्यातील गोलंदाजीवरून वाटतं.

काही न सुटलेले प्रश्न
विजय मिळविला असला, तरी भारतीय संघापुढचे काही प्रश्न सुटलेले नाहीतच. क्षेत्ररक्षण हा त्यातला महत्त्वाचा. के. एल. राहुलच्या हातून आज एक सोपा झेल सुटला. चेंडू अडवतानाही गोंधळ होताना दिसला. पुढच्या कसोटीत करुण नायर, प्रसिद्ध कृष्णा, रेड्डी ह्यांना सक्तीची विश्रांती मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. साई सुदर्शन, कुलदीप, अर्षदीपसिंग देवाची प्रार्थना करीत असतीलच असं नाही. पण त्यांनाही ‘संधी’ हवी आहे. बुमराहचंही पुनरागमन होईल.

ह्या विजयानं एजबॅस्टनवरचा नवा इतिहास लिहिला आहेच. ह्याच इतिहासातली पुढची पानं अधिक दमदारपणे उरलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये लिहिल्या जातील, अशा अपेक्षा उंचावलेल्या असणं स्वाभाविकच.

(छायाचित्रं ‘आय. सी. सी.’,  ‘द गार्डियन’ व ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’  संकेतस्थळांवरून साभार.)
--------------------------
#भारत_इंग्लंड #कसोटी_मालिका #अँडरसन_तेंडुलकर_करंडक #एजबॅस्टन_कसोटी #शुभमन_गिल #आकाशदीप #जेमी_स्मिथ #बेन_स्टोक्स #महंमद_सिराज #नवा_इतिहास
......

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

...चला पुस्तकांचं सोनं लुटू!

 


‘वाचावं की वाचू नये’, असा ‘हॅम्लेट’ कधीच होत नाही माझा.
‘हे आधी वाचू की ते वाचू?’, असा प्रश्न असतो.
तुम्हाला माहितीये का, पुस्तकं वाचणारा जगातला
पहिल्या क्रमांकावरचा देश आपला आहे.
आमची पिढी वाचत नसती, तर झालो असतो
आपण जगात नंबर वन?
--------------

‘मोरू’ आणि त्याचे बाबा ही मराठी साहित्यातली तशी ऐतिहासिक पात्रं. नवरात्र संपून दसरा उजाडला की, त्या दोघांची कोणाला ना कोणाला आठवण होतेच.

सोनं लुटायचं म्हणून मोरूला दसऱ्याच्या दिवशी बाबा उठवित. काळ बदलला आहे. साडेतीन मुहूर्तांसह आणखी काही मुहूर्त इंटरनेटकृपेने आले आहेत. त्यांना ‘डेज’ म्हणतात. काळाबरोबरच चालत आता काही विशिष्ट दिवशीही त्याला झोपेतून जागं करणं, बाबांना आपलं कर्तव्य वाटते.

काळाप्रमाणे भाषाही बदलली आहे. पूर्वीसारखं ‘मोऱ्या’ असं खेकसत त्याच्या कटिप्रदेशाशी आपल्या चरणकमलानं आघात करणं बाबांनी सोडलं आहे. ते आता ‘मोरूबाळ’ असं संबोधतात. 'खेकसत म्हणणे, आय लव्ह यू' कादंबरी त्यांनी वाचलेली आहे. पण वसकणं सोडून ते 'गुड मॉर्निंग, बेटा' म्हणतात. मोरूही त्यांचा उल्लेख (पाठीमागे) ‘आमचा बाप’ असा थेट न करता, ‘आमचे पिताश्री’ असा करतो. (त्यात आदर असतो की उपहास, हा संशोधनाचा विषय आहे.)

त्या दिवशी असंच झालं. सवयीप्रमाणे बाबा मोरूला उठवायला गेले. त्याच्या प्रायव्हसीचा भंग होऊ नये आणि उपचार म्हणून त्यांनी दारावर दोनदा ‘टक टक’ केलं. प्रतिसादाची वाट न पाहताच घुसले. मोरू आपला पसरलेलाच. डोळ्यांसमोर मोबाईल. परमपूज्य पिताश्रींच्या आगमनाची दखल घेतल्या न घेतल्यासारखं त्यानं केलं. मोबाईलवरची त्याची नजर हटत नाही, हे पाहून पूर्वीच्याच (लाडक्या) भूमिकेत जात बाबा खेकसलेच!

‘‘मोऱ्या, सकाळी उठल्यापासूनच मोबाईल! किमान आजच्या दिवशी तरी पुस्तक हातात धर की रे.’’

‘‘माझी परीक्षा संपून आठवडा झालाय, बाबा. मग आता कसलं पुस्तक हातात घेऊ म्हणताय?’’

बाबांना चिडल्यासारखं वाटू लागलं. म्हणाले, ‘‘अभ्यासाचं पुस्तक म्हणत नाहीये मी. आज जागतिक पुस्तक दिवस आहे. विल्यम शेक्सपीअर माहितीये ना? त्या महान लेखकाचा जन्मदिन आहे आज. चारशे आठवा. आठ वर्षं झालीत चारशे पार होऊन..!’’

‘‘त्या गुगलमध्ये सारखं डोळे खुपसून बसलेला असतो. एवढंही माहीत नाही? त्या ऐवजी पुस्तकात थोडं डोकं खुपसत जा.’’ बाबांचा सात्त्विक वगैरे म्हणणारा संताप शब्दांमधून झिरपत ईअरफोनला भेदत मोरूच्या कानापर्यंत पोहोचला.

‘‘अच्छा, पुस्तक दिनाचं महत्त्व सांगताय तुम्ही बाबा. या मुहूर्तावर सकाळी सकाळी मी एखादं पुस्तक हातात घेऊन बसावं, अशी तुमची अपेक्षा आहे. म्हणजे ‘किमान आजचा दिवस तरी’ मी पुस्तक वाचावं. असंच ना?’’

‘‘आजच्या दिवशी म्हणजे? रोजच वाजत जा असं कित्येक वर्षांपासून सांगतोय मी. रोजचं सोडा, आठवड्यातला एखादा दिवस तरी पु्स्तक धरत जा हातात,’’ बाबा तळमळीने म्हणाले.

‘‘बाबा, वाचून फायदा काय? म्हणजे पुस्तकंच का वाचायची?’’. मोरूनं भाबडेपणानं विचारलेला हा प्रश्न म्हणजे ऑफस्पिनर अश्विननं टाकलेला लेगस्पिन! किंवा हरभजननं टाकलेला ‘दूसरा’!! मोरूला इतकी वर्षं पुरेपूर ओळखून असलेल्या बाबांना हे पुरतं माहीत होतं. त्यांची अवस्था मैं इधर जाऊँ या उधर जाऊँ’ अशी गंडलेल्या फलंदाजासारखी झालेली...

‘‘पुस्तकाच्या वाचनाचे फायदे सांगता येतील का तुम्हाला बाबा? म्हणजे ‘वाचाल तर वाचाल’ अशी वर्षानुवर्षं वाचत आलेली सुभाषितं नका सांगू. ‘ज्याचं मस्तक पुस्तकात, त्याच्या मस्तकात पुस्तक!’, हे सुभाषितही माहिती आहे मला.’’

‘‘...आणि हो, ती खास आजचा दिवस साजरा करण्यासाठी इंटरनेटवरून शोधून काढलेली कोटही ऐकवू नका.’’ मोरून पुढचा गुगली किंवा दूसरा टाकला.

‘‘मोरू, मोरू... पुस्तकवाचनाचे किती म्हणून फायदे सांगू तुला,’’ बाबा म्हणाले. त्यांनी आठवायला सुरुवात केली. मनातल्या मनात यादी सुरू झाली. बाबा सांगू लागले -
  • पुस्तकं वाचल्याने आपल्या जगाबाहेर काय चाललंय, हे कळतं.
  • काय होतं पुस्तकं वाचल्यानं? ज्ञान मिळतं, मनोरंजन होतं, माहितीच्या साठ्यात भर पडते.
  • पुस्तकं वाचायला लागला की, तुमची एकाग्रता आपोआप वाढते. त्याचा फायदा अभ्यास करताना, तुमचा व्यवसाय वा नोकरी करताना होतो.
  • तर्क करण्याची शक्ती वाचनातून विकसित होते.
  • तुमच्या भाषेत सांगायचं तर पुस्तकं वाचण्याएवढं दुसरं चांगलं ‘स्ट्रेस बस्टर’ नाही.
  • समजा तुला फिजिक्सचा पेपर अवघड गेला. तो ताण विसरायला म्हणून तू द. मा. मिरासदार यांचं ‘माझ्या बापाची पेंड’, पु. ल. देशपांडे यांचं ‘खोगीरभरती’, शंकर पाटील यांचं ‘खुळ्याची चावडी’, शरद वर्दे यांचं ‘फिरंगढंग’ किंवा ‘बोलगप्पा’... असं कुठलंही पुस्तक वाचायला घे. हवं तर शिरीष कणेकरांचं निवड. आठ-दहा पानं वाचली की, तू फिजिक्स वगैरे सगळं विसरून जाशील. खरं म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळी तसं ते विसरल्यामुळेच तुला या ‘स्ट्रेस बस्टर’ची गरज पडलीय.
बाबांना नेमक्या वेळी फिजिक्सचा पेपर आठवल्यामुळं मोरूचा स्ट्रेस किंचित वाढलेलाच.

फायद्याची यादी पुढे चालू राहाते -
  • ‘मस्तकात पुस्तक’ वगैरे तुला आवडत नाही. पण वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. कल्पनाशक्ती सुधारते.
  • आपलं जग, आपली (आणि इतरांचीही) संस्कृती, आपला इतिहास याची उमज वाढते ती वेगवेगळी पुस्तकं वाचल्यानेच. विविध दृष्टिकोण वाचल्यामुळं खरं-खोटं कळायला लागतं.
  • वाचनामुळे प्रेरणा मिळते. जग बदलून जातं. मला स्वतःला ‘एक होता कार्व्हर’सारखी अनेक पुस्तकं प्रेरणा देणारी वाटतात.
  • वाचनामुळे संवाद करण्याची क्षमता अधिक चांगली होते.
  • महत्त्वाचं म्हणजे भरपूर वाचलं की (थोडं तरी) चांगलं लिहिता येतं. मी नाही का दोन वर्षांपासून साप्ताहिक सदर लिहितोय...
आता बाबा स्वतःच्या सदराबद्दल आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल भरभरून बोलू लागणार हे मोरूच्या आतल्या आवाजानं सांगितलं. त्यानं ब्रेक लावला.

‘‘आम्ही, म्हणजे हल्लीची मुलं, वाचतच नाही, हे तुम्ही कशावरून ठरवता बाबा? फेसबुक, एक्स, इन्स्टा, चॅट हे सगळं सांभाळत आम्हीही वाचतो. पुस्तक थेट हातात कमी घेत असू. इंटरनेटवरच्या ‘अर्काइव्ह’सारख्या ग्रंथालयातून जुन्या पुस्तकांच्या पीडीएफ वाचत असतो. ‘पब्लिक लायब्ररी ऑफ इंडिया’, प्रोजेक्ट गुटेनबर्गची ‘फ्री इ-बुक्स’, ‘ई-साहित्य’... असं बरंच कुठून कुठून खूप काही वाचत असतो. तुम्हाला वाटतं आम्ही मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये डोळे खुपसून बसलोय. दिसतं तसं नसतं, बाबा...’’

‘‘...आणि खरं सांगू बाबा तुम्हाला, ‘वाचावं की वाचू नये’, असा ‘हॅम्लेट’ कधीच होत नाही माझा. ‘हे आधी वाचू की ते वाचू?’, असा प्रश्न असतो. तुम्हाला माहितीये का, पुस्तकं वाचणारा जगातला पहिल्या क्रमांकावरचा देश आपला आहे. आमची पिढी वाचत नसती, तर झालो असतो आपण जगात नंबर वन?’’ मोरूलाही सात्त्विक संताप आलाय, हे बाबांनी ओळखलं.

मोरू पुढं सांगू लागला, ‘‘पुस्तक दिनानिमित्त तुम्हाला एखादं छान पुस्तक भेट द्यायचंय. त्यासाठीच मी एवढ्या सकाळी सकाळी मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसलोय.’’

आता बाबांचे डोळे किंचित पाणावलेच. पुस्तकांचं सोनं लुटायचंय, या कल्पनेनं त्यांना भरून आलं.
........
जागतिक पुस्तकदिनानिमित्त दैनिक सकाळमध्ये बरोबर वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेला लेख.
धन्यवाद श्री. निरंजन आगाशे.
........
#जागतिक_पुस्तकदिन #मोरू_बाबा #विल्यम_शेक्सपीअर #मस्तक_पुस्तक 
#खिडकी_ब्लॉग
........

सोमवार, १७ मार्च, २०२५

आजोबा सांगतात, ‘ॲक्ट पॉझिटिव्ह’



 डॉक्टर खास कौतुक करतात - ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू होतात. स्पेशल रूम आहे. दुपारपर्यंत चार-पाच सलाईन देतात. मग हे दोघं परत नगरला आणि तिथून मिळेल ती गाडी पकडून गावाकडे परततात. रविवारची दुपार सुरू होताच सुरू झालेली त्यांची ही दगदग सोमवारी रात्री कधी तरी संपते.
-------------
साधारण दहा-अकरा वर्षांचा नातू आणि (कागदोपत्री तरी!) पंचाहत्तरी पार केलेले आजोबा. त्यांचा दर आठवड्याचा प्रवास ठरलेला आहे. दोन टप्प्यांचा प्रवास. आजोबांच्या हातात काठी नाही. उलट त्यांचंच बोट धरून नातू असतो. अनुभवी आणि आश्वासक हातात कवळेपण.

हे असं खूप दिवसांपासून चाललेलं आहे. अंदाजे किती दिवस, आठवडे व महिने असं विचारायला नको. आजोबांकडे हिशेब आहे - आतापर्यंत सलग ११४ आठवडे त्यांनी हा प्रवास केला आहे. आताशी कुठे तो मध्यावर आलेलाय.

‘पॉझिटिव्ह थिंकिंग’चा डोस पाजणाऱ्या कोणत्याही खपावू पुस्तकापेक्षा अगदी थेट व्यावहारिक अनुभव आज मिळाला. कृपा ‘लाल परी’ची! तिच्यामुळे होत असलेल्या आरामदायी प्रवासाची.

नगरहून काल जाताना एस. टी. बस जेवण्यासाठी थांबली नाही. सगळे थांबे व्यवस्थित घेऊनही वेगाने धावली. तो सुखद धक्का जेमतेम पचनी पडत होता. परतताना मात्र बस थांबलीच. नगर २५ किलोमीटर राहिलेलं असताना. घरचं जेवण वाट पाहत असताना. रुई छत्तिशीजवळच्या थोडंस पुढे (चिंचोली कोयाळ फाटा?) असलेला हा ढाबा आता बहुतेक सर्व एस. टी. बससाठी हक्काचा थांबा बनला आहे.

‘जेवणासाठी गाडी १५-२० मिनिटं थांबेल,’ अशी घोषणा करून विसावा घेणारी ही बस तिसाव्या मिनिटाला पुन्हा फुरफुरू लागली. त्याच वेगाने इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी.

बस सुरू होता होता आजोबा आणि नातू प्रवेश करते झाले. बरेच प्रवासी आधीपासून उभे होते. ढाब्यापासून प्रवासी कसे काय घेतले, हा प्रश्न पडला. आजोबा नातवाला सांभाळून, जपून आणत होते. तो आजारी असावा, चालताना त्रास होत असल्याचं दिसलं.

पांडुरंगाचं दर्शनानं खूश होऊन कोल्हारला परत चाललेल्या मावशी शेजारी होत्या. त्यांची परवानगी गृहीत धरून ह्या मुलाला आमच्या मधली जागा देऊ केली. (कारण त्याच्या पाच मिनिटंच आधी त्यांनी आपल्या गाववाल्या शेजारणीला तिच्या आसनावर एका तरुण मुलीची सोय करून द्यायला बजावलं होतं.) ‘ओ पैलवान, ये बस इथं’, असं म्हणाल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर खुशी दिसली.

मुलगा आजारी दिसत असला, तरी त्याचे कपडे एकदम व्यवस्थित होते.  अंगात जीन्ससारखी पँट. पूर्ण बाह्यांचा सदरा. त्या बाह्या छान दुमडून किंचित वर घेतलेल्या. गोबरे गाल, वाटोळा चेहरा; पण त्यावर उदासवाणा भाव. वयाच्या मानाने चेहऱ्यावर असलेल्या पोक्तपणा जाणवणारा. कोवळेपणा कायम ठेवूनही.

आजोबांनी मला उठायला सांगितलं आणि आपल्या नातवाला हळूच तिथं बसवलं. ‘पलीकडं सरकून बस थोडं, बाबांना जागा दे बरं...’, असं मग ते नातवाला म्हणाले. तिकीट काढून झालं आणि आजोबांच्या गप्पा चालू झाल्या. अपंग म्हणून नातवाला ७५ टक्के सवलत आणि आजोबा पंचाहत्तरीपुढचे म्हणून मोफत. हे झालं नगरपर्यंतचं. मग तिथून पुढचा पुण्यापर्यंतचा प्रवास किती रुपयांना पडतो, हे त्यांनी सांगितलं. बस साधी नसेल, तर जास्त पैसे लागतात. पण आम्ही मिळेल त्या बसने जातो, अशी पुष्टी जोडली.

शेजारच्या मावशींनी मुलाद्दल विचारलं आणि जणू त्याचीच वाट पाहत असल्यासारखे आजोबा सांगू लागले, ‘‘पुण्याला चाललोय. दीनानाथ मंगेशकरमध्ये. दर सोमवारी जातोय. ११४ आठवडे झाले. सलाईन द्यावे लागतेत चार-पाच. आज जायचं आणि उद्या परत यायचं.’’

त्या छोट्या मुलाचे कमरेखालचे स्नायू दुबळे होते. काही तरी मोठा आजार होता. त्या साठी दर आठवड्याला ह्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात. दसरा नाही, दिवाळी नाही आणि शिमगा नाही... उपचार सुरू झाले तेव्हापासून आजोबांनी एकदाही खाडा केला नाही त्याला तिथं नेण्यात. ‘फक्त एकदाच त्याला त्याचा बाप घेऊन गेल्ता,’ आजोबांनी प्रांजळपणे सांगितलं.

आमचा प्रवास जेमतेम अर्धा तास बाकी होता. तेवढ्या वेळात हा मुलगा, आजोबा आणि त्यांचं कुटुंब ह्यांची संपूर्ण माहिती मिळाली. ह्या कोवळ्या मुलाच्या आजारावर अजून उपचार सापडलेले नाहीत. एक अमेरिकी संस्था त्याबाबत संशोधन वा अभ्यास (आजोबांच्या भाषेत ‘रीसर्च’!) करीत आहे. त्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मदत घेतली जात असावी. ह्या उपचारांसाठी अशा दहा-बारा रुग्णांची निवड केलेली आहे. ते उपचार मंगेशकर रुग्णालयात होतात.

‘पांडुरंगाची कृपा!’, आजोबा कृतज्ञपणे म्हणाले आणि पुढं सांगू लागले, ‘‘आपल्याला काय परवडतंय हे न्हाई तर. किती खर्च असंल ह्याचा?’’, असा प्रश्न विचारून त्यांनीच पुढच्या क्षणाला उत्तर दिलं - १२ कोटी रुपये!

‘उमेश सरांची कृपा!’ नातवाला मिळत असलेल्या उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आजोबा अजिबात सोडत नव्हते. सर म्हणजे डॉक्टर हे लक्षात आलं. डॉ. उमेश कलाणे. बालकांच्या न्यूरोलॉजीचा विशेष अभ्यास असलेले डॉक्टर.

उपचारांबद्दल आजोबा म्हणाले, ‘‘उमेश सरांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं, एकदा यायला सुरुवात केली की, मधूनच सोडून चालणार नाही. नाही तर आमची सगळी मेहनत गेली बघा वाया. मी म्हणालो, ‘तुम्ही सांगान तवा येईल.’ तेव्हापासून दर आठवड्याला जातोय बघा. एकदा तर लक्ष्मीपूजन करून रात्री निघालो.’’

खंड पडू न देता दोन वर्षांहून अधिक काळ रुग्णाला नियमित आणणाऱ्या आजोबांचं उमेश सरांनी स्वाभाविकच कौतुक केलं. ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ ही माहिती देऊन मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू होतात. स्पेशल रूम आहे. दुपारपर्यंत चार-पाच सलाईन देतात. म्हणजे आपण समजून घ्यायचं की, शिरेतून विशेष औषधे दिली जात असावीत. दुपारपर्यंत औषधयोजना संपते. मग हे दोघं परत नगरला आणि तिथून मिळेल ती गाडी पकडून गावाकडे परततात. हमरस्त्यापासून काही किलोमीटरवर हे गाव. रविवारची दुपार सुरू होताच सुरू झालेली त्यांची ही दगदग सोमवारी रात्री कधी तरी संपते.

आणि ही दगदग, हा प्रवास ११४ आठवड्यांपासून चालू आहे. असं अजून किमान ९४ आठवडे त्यांना करायचं आहे. कारण ह्या उपचाराचा कालावधी चार वर्षांचा आहे.

ह्या दगदगीबद्दल आजोबांच्या बोलण्यात खेद, खंत, त्रास असं काही डोकावत नसतं. अतिशय शांतपणे, हसतमुखाने ते सांगत असतात. ‘बाकी काही नाही हो. ह्यो आपला गडी धडधाकट झाला पाहिजे. बघू त्या पांडुरंगाच्या मनात काय आहे ते,’ असं म्हणत ते पांडुरंगावर भार सोडून देतात.

नातवाचं कौतुक करताना आजोबा रंगतात. ‘‘तिथं हॉस्पिटलात चार-पाच वेळा सुया टोचतात सलाईनसाठी. गडी कधी हं की चूं करत नाही. रडायचं तर सोडाच! नर्सबाई पण लई कौतुक करताते ह्याचं.’’

आजोबांचा नातू चौथीत आहे. इंग्रजी शाळेत घातलाय त्याला. ‘लय हुशार बघा. प्रत्येक विषयात तीसपैकी २८-२९ मार्क मिळवतोय. त्याच्या बाईपण खूशयेत त्याच्यावर.’ मग ते त्याच्या शाळेच्या बसचा खर्च, शाळेची फी सांगतात. चांगल्यापैकी रक्कम आहे ही. गावापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आपला दुबळा नातू तिथंच शिकला पाहिजे आणि उभा राहिला पाहिजे, ही आजोबांची इच्छा. नातू शाळेत अजिबात त्रास देत नाही, असं कौतुकाने सांगतात आणि हळूच म्हणतात, ‘हां, आता घरी आमाला देतो अधनंमधनं तरास. पण चालायचंच...’

एवढी सगळी कहाणी मस्त सांगत असताना आजोबांचा एकदाही कणसूर लागत नाही. परिस्थितीचं रडगाणंही ते गात नाहीत. कारण परिस्थिती तशी नाहीचंय मुळी. ते म्हणाले, ‘‘तसं बरं आहे आपलं. देवानं बरं चालवलंय. शेती आहे. दुधाचा धंदा आहे. सात-आठ गाया आहेत. ह्येचा बाप बघतो दुधाचा धंदा. परवाच त्याला ट्रॅक्टर घेऊन दिला. पांडुरंगाची कृपा...’’

गळ्यात तुळशीमाळ, आणिक कसल्या तरी एक-दोन बारीक मण्यांच्या माळा असणाऱ्या आजोबांचा पांडुरंगावर फार विश्वास. त्याला ते बोलण्यात घेऊन येतातच. पोराची आजी आता चार धाम यात्रेला चाललीये, असं ते शेजारच्या मावशीला सांगतात. ‘‘आलो परवाच १५ हजार रुपये भरून यात्रेचे. चांगले धा-बारा दिवस आहे. तिला म्हणलं, पाय चालतेत तोवर ये फिरून, बघून.’’

मग मावशींच्या कपाळीचा टिळा पाहून ‘कसं झालं पांडुरंगाचं दर्शन?’ विचारून आपल्या पंढरीच्या वारीचं वर्णन सांगतात. पुढे पुस्ती जोडतात, ‘‘आता एवढ्यात न्हाई गेलो. आता बघा ना आमचे दोन दिवस पुण्याला येण्या-जाण्यातच जातात. मग आठवड्याचे राहिले पाच दिवस. त्यात किती तरी कामं करायची असतात बघा...’’

मावशी आणि माझ्यामध्ये बसलेला नातू सगळं ऐकत असतो. पण गप्पगप्प. आजोबा ज्याला त्याला काय हे पुराण सांगतात उगीच, असा काही भाव त्याच्या चेहऱ्यावर नसतो. दहा वाक्यं आपण बोलावीत, पाच प्रश्न विचारावेत तेव्हा तो एखाद्या शब्दाचं उत्तर देतो. आवडीचा विषय इंग्रजी आहे असं सांगतो. त्याच्या सुंदर शर्टचं कौतुक केल्यावरही तो लाजत नाही किंवा चेहऱ्यावर कसलेही भाव उमटू देत नाही. त्यानं शर्टाच्या बाह्या खरंच फार छान दुमडलेल्या असतात. ते ऐकून आजोबांच्या मनात कौतुकाची नवी लाट येते, ‘त्याला हाप शर्ट आजिबात आवडत नाहीत. सगळेच्या सगळे फुल्ल बाह्यांचे आहेत.’

पुण्याच्या एवढ्या आठवड्यांच्या प्रवासात आलेला एक अनुभव आजोबा आवर्जून सांगतात, ‘‘गाडीला कितीबी गर्दी असूं द्या; आमच्या गड्याला कुणी ना कुणी बसायला जागा देतोच. ह्या पठ्ठ्याला एकदाबी उभं राहावं लागलं नाही. पांडुरंगच त्या जागा देणाऱ्याला तशी बुद्धी देत असंल बघा. आज नाही का तुम्ही बोलावलं चटसरशी, तसंच.’’

प्रवास संपतो. उतरणाऱ्यांना घाई असते. आजोबा, त्यांचा नातू ह्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. त्यांना एखादा धक्का बसतोच घाईचा. आजोबाच सांगतात त्याला, ‘बाळा, बाजूला राह्य बरं थोडा. त्यांना उतरूंदे.’

माळीवाड्याच्या स्टँडवर उतरल्यावर आजोबांना लाडक्या नातवाला घेऊन पुण्याची गाडी पकडण्याकरिता पाचशे मीटरवरच्या दुसऱ्या स्टँडकडे जावं लागणार आहे. नातवाला चालता येईल ना? ते म्हणतात, ‘सपाट जागा असली ना, आमचा गडी दोन किलोमीटरबी चालतोय.’

दोघांमध्ये इवलीशी जागा दिल्याबद्दल आजोबा दिलखुलास हसून माझे आभार मानतात. म्हणतात, ‘आपले तर प्रयत्न चालूयेत. यश द्यायचं त्या पांडुरंगाच्या हाती.’

पांडुरंग तुमच्या पदरात यश टाकणारच, असं कितव्या तरी वेळा सांगून निरोप घेतो. हार न मानणाऱ्या आजोबांची एक अतिशय सकारात्मक गोष्ट मनात रुजवून!
.......
(छायाचित्रं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने.)

मंगळवार, ११ मार्च, २०२५

खणखणीत आणि निर्विवाद

चॅम्पियन्स करंडक - 

अहमदाबादेतल्या ठसठसत्या जखमेवर दुबईत पुन्हा एकदा हळुवार
फुंकर मारण्यात आली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं विजेतेपद
पटकावून. उपान्त्य सामन्याचा जणू पुढचा अंक असावा, अशी ही
दुबईतली लढत. आधी फिरकीनं ब्लॅक कॅप्सच्या
नाड्या आवळल्या. मग रोहित-गिल ह्यांची शतकी सलामी.
संयमाच्या परीक्षेत अय्यर आणि राहुल उत्तीर्ण झाले.
ह्या सांघिक परिश्रमाचं फळ म्हणजे
दहा महिन्यांमधलं दुसरं विश्वविजेतेपद!
----------------------
साधारण दहा महिन्यांच्या काळात दुसरं जागतिक विजेतेपद. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील मागच्या चोवीसपैकी २३ सामन्यांमध्ये विजय. पराभव एकमेव; पण त्याचा घाव न पुसला गेलेला. विश्वचषक स्पर्धेतील अहमदाबादच्या अंतिम सामन्यातील हार.

त्या घावावर मलम लागला २९ जून रोजी ब्रिजटाऊनमध्ये. टी-20 विश्वचषक भारतीय संघानं पटकावला. आणि आता पुन्हा एकदा त्या ठसठसत्या जखमेवर हळुवार फुंकर मारली गेली दुबईतल्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये. आठ देशांच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतानं बाजी मारली. स्पर्धेतले पाचही सामने जिंकून कमावलेलं हे विजेतेपद. खणखणीत आणि निर्विवाद.

शेवटच्या सामन्यात न्यू झीलँड संघाचा प्रतिकार पद्धतशीरपणे मोडून काढत भारतानं गटात अव्वल स्थान मिळविलं. उपान्त्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ समोर असल्याचं दडपण झुगारून दिलं. चार गडी राखून विजय.

त्याच उपान्त्य सामन्याची थोडी-फार पुनरावृत्ती अंतिम सामन्यात झाली. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा नाणेफेक हरलेला. धावांचा पाठलाग करण्याची वेळ. पुन्हा एकदा लोकेश राहुल आणि रवींद्र जाडेजा ह्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलेलं.

राहुलचा कबुलीजबाब
अजून काही वर्षांनी निकाल सांगेल - भारत चार गडी राखून विजयी. तेव्हा असंही वाटेल कदाचीत की, सहज सोपा विजय होता. पण सामना किती चुरशीचा झाला, हे राहुलनं रविवारी कॅमेऱ्यासमोर काहीशा असभ्य भाषेत सांगितलेलं आहेच.

इंग्लंडमध्ये सहा वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अतिशय अटीतटीच्या लढतीत न्यू झीलँडला यजमान इंग्लंड संघानं हरवलं. तेव्हा चौकारांची संख्या महत्त्वाची ठरली होती. किवीज त्यातून काही शिकले असावेत बहुदा. ह्या अंतिम सामन्यात त्यांचे चौकार भारताहून दोन अधिकच होते. षट्कारांमध्ये मात्र ते मागे राहिले. पण निकाल ठरविण्यासाठी ते मोजण्याची वेळ आलीच नाही.

कुलदीप, वरुण, अक्षर आणि जाडेजा ह्या फिरकी चौकडीनं मधल्या षट्कांमध्ये न्यू झीलँडला बांधून ठेवलं होतं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकच फलंदाज गमावून संघानं ६९ धावांची मजल मारली होती. फिरकीचं आक्रमण सुरू झालं आणि त्या गतीला खीळ बसली.

चौकारांचा दुष्काळ
न्यू झीलँडच्या डावात चौकारांचा दुष्काळ दिसत होता. तब्बल ८१ चेंडू एकही फटका सीमेच्या पलीकडे गेला नाही. चौदाव्या षट्कातील दुसऱ्या चेंडूला डॅरील मिचेलने अक्षर पटेलला स्लॉग स्वीप मारून स्क्वेअर लेगला चौकार मिळवला. त्यानंतर थेट सत्ताविसाव्या षट्कातल्या कुलदीपच्या अखेरच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने षट्कार मारला. गती किती संथ झाली होती? तर नऊ ते त्रेचाळीस ह्या षट्कांमध्ये चारच चौकार गेले.

फिरकी गोलंदाजांनी किवी फलंदाजांच्या नाकात दम आणला होता खरा. ही पकड अशीच राहती, तर न्यू झीलँडला निर्धारित षट्कांत जेमतेम सव्वादोनशेचा टप्पा गाठता आला असता.

पण मायकेल ब्रेसवेल ह्यानं कमाल केली. शेवटच्या सात षट्कांमध्ये ६७ धावा निघाल्या. त्यातही महंमद शमी आणि हार्दिक पंड्या ह्यांनी अखेरच्या तीन षट्कांमध्ये खैरातच केली. त्यांनी ३५ धावा दिल्या. सत्तेचाळिसावं षट्क संपलं तेव्हा ब्रेसवेलच्या ३५ धावा होत्या ३३ चेंडूंमध्ये. पुढं तो सुटला.

ब्रेसवेलची ही तोफ अखेरच्या षट्कातही धडाडावी म्हणून कर्णधार मिचेल सँटनरनं धावचित होणं पत्करलं. ब्रेसवेलच्या ४० चेंडूंमधील ५३ धावांच्या खेळीनं डॅरील मिचेलच संथ अर्धशतक स्वाभाविकच झाकोळून गेलं.

ढेपाळलेलं क्षेत्ररक्षण
भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण ह्या महत्त्वाच्या सामन्यातही ढेपाळलेलंच दिसलं. चार झेल सुटले. त्याची सुरुवात शमीनं केली आणि शेवट शुभमन गिल ह्यानं. श्रेयस अय्यर, रोहित शर्मा आणि गिल ह्यांच्या हातून सुटलेले झेले मिडविकेट, डीप मिडविकेट ह्याच क्षेत्रातले होते, ही एक गंमतच.


जादूगार...ग्लेन फिलिप्स
.......................

स्पेशल झेलानंतरची स्पेशल पोज...
................
बहुदा श्रेयसला ह्याची भरपाई प्रतिपक्षानं करून दिली. फक्त खातं उघडलेलं असताना काईल जेमिसन ह्यानं त्याचा झेल सोडला. तो कमनशिबी गोलंदाज कोण होता? ग्लेन फिलिप्स! ज्यानं अफलातून झेल घेत गिलचा ऑफ ड्राइव्ह पकडला होता. जादूगार हवेतून कबुतर काढून दाखवतो, त्या लीलया पद्धतीनं फिलिप्सनं चेंडू पकडला होता.

ह्याच जेमिसनच्या गोलंदाजीवर गिलला जीवदान मिळालं तेव्हा तोही एकच धाव काढून खेळत होता. न्यू झीलँडच्या पराभवाला तो झेल कारणीभूत ठरला का? कारण मग रोहित आणि गिल ह्यांनी शतकी भागीदारी केली. पहिल्या दोन षट्कांमध्ये २२ धावा करणारा भारतीय संघ पहिला पॉवर प्ले संपल्यावर धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या मागेच होता.

मधल्या षट्कांमध्ये न्यू झीलँडच्या फिरकी गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजीच्या नाड्या आवळल्या. ते दडपण घेऊनच रोहित पुढे सरसावला आणि रचिन रवींद्रला यष्टिचित झाला.

शतकी सलामी महत्त्वाची का, तर दुबईच्या स्टेडियमवर मधल्या षट्कांमध्ये धावा करणं कठीण होतं. तिथेच पाच सामने खेळलेल्या भारतीय संघाला ह्याची कल्पना असणं स्वाभाविकच. म्हणूनच त्या काळात दाखवावा लागतो संयम. श्रेयस, अक्षर, राहुल आणि पंड्या ह्यांनी तो दाखवला. त्या संयमाचं फळ म्हणून नाव सुखरूप पैलतिरी लागली. मॅट हेन्रीची उणीव ब्लक कॅप्सना नक्कीच जाणवली. त्याचं रडगाणं सँटनरनं काही गायिलं नाही, हे कौतुकास्पदच.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपान्त्य लढतीतील डावच जणू राहुलने पुन्हा सुरू केला होता. विजय मिळविताना आधी पंड्या आणि शेवटी जाडेजा हेच त्याचे पुन्हा सहकारी होते. रोहित सामन्याचा मानकरी ठरणं स्वाभाविक. स्पर्धेत दोन शतकं झळकावणारा रचिन रवींद्र स्पर्धेतील सर्वोत्तम ठरला. अफ्लातून झेल घेणाऱ्या ग्लेन फिलिप्सचा त्या साठी विचार करायला काही हरकत नव्हती.

आयसीसीनं निवडलेला संघ
अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ह्या ‘स्पर्धेचा संघ’ निवडला. विजेता कर्णधार रोहितला त्यात स्थान नाही. एवढंच काय, सहभागी आठपैकी पाच देशांचा एकही खेळाडू नाही. ह्या सर्वोत्तम संघाची धुरा न्यू झीलँडचा कर्णधार मिचेल सँटनर ह्याच्या हाती सोपविण्यात आली आहे. पहिलीच चॅम्पियन्स स्पर्धा खेळणाऱ्या अफगाणिस्तानचे दोन खेळाडू ह्या संघात आहेत.

हा संघ असा -
रचिन रवींद्र (न्यू झीलँड दोन शतकं), इब्राहीम जदरान (अफगाणिस्तान, एक शतक, सरासरी ७२), विराट कोहली (एक शतक, सरासरी ५४.५), श्रेयस अय्यर (दोन अर्धशतकं), के. एल. राहुल (यष्टिरक्षक, सरासरी १४०, तेवढ्याच धावा, तीन वेळा नाबाद. लक्ष्याचा पाठलाग करताना निर्णायक खेळी, यष्टिरक्षणाचंही कौतुक), ग्लेन फिलिप्स (न्यू झीलँड, ५९ सरासरीनं २१७ धावा, दोन बळी आणि पाच अफ्लातून झेल), अजमतुल्ला ओमरजाई (अफगाणिस्तान, १२६ धावा, एकूण सात बळी - एका सामन्यात पाच), मिचेल सँटनर (कर्णधार, न्यू झीलँड २६.६ सरासरीनं नऊ बळी. इकॉनॉमी ४.८०), महंमद शमी (नऊ बळी आणि एका सामन्यात पाच बळी), मॅट हेन्री (दहा बळी १६.७ सरासरीनं. एकदा पाच बळी), वरुण चक्रवर्ती (नऊ बळी, सरासरी १५.१, इकॉनॉमी ४.५३) आणि बारावा खेळाडू - अक्षर पटेल.
....
(सर्व छायाचित्रे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या संकेतस्थळावरून साभार.)
....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #अंतिम_सामना #भारत_न्यूझीलँड #रोहित_शर्मा #श्रेयस_अय्यर #फिरकीचे_जाळे #ग्लेन_फिलिप्स #राहुल #ICC_Champions_Trophy #Champions_Trophy_Final #Ind_NZ #Black_Caps #Rohit_Sharma #Shreyas_Iyer #Glenn_Phillips #Rachin_Ravindra
....

डायरीची चाळता पाने...

थोडी आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी ना...