सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

पासवर्डपायी परवड!


गोष्ट आठ-दहा महिन्यांपूर्वीची आहे. कदाचित वर्षभरापूर्वीची. अजूनही ती आठवण झाली की, अस्वस्थ व्हायला होतं. अस्मादिकांचा कासिम झाला होता तेव्हा! जीव तडफडत होता नुसता. घुसमट सुरू होती. एवढ्या कष्टानं जमवलेला खजिना डोळ्यांदेखत गुडूप होणार असं दिसत होत. गुप्तधन होणार त्याचं! या खजिन्याची कधीही आठवण झाली की, तडफड वाढायचीच. त्याचा लोभ काही सुटणारा नव्हता. त्यासाठी किती कष्ट केले, किती वेळ घालवला, हे माझं मलाच माहीत. खजिन्यापायी कासिमचा तर जीवच गेला होता. माझी फक्त अस्वस्थता वाढणार होती, वाढत होती.

हा कासिम कोण? फाssर पुरातन इसम आहे तो. आखातातला. अलिबाबा आणि चाळीस चोर गोष्टीतला कासिम. अरेबियन नाइट्समधल्या एक हजार एक रात्रींतली किंवा अलिफ़ लैलामधली प्रसिद्ध गोष्ट. तिचा नायक अलिबाबा. कासिम त्याचा भाऊ. अलिबाबाला धमकावून डाकूंच्या खजिन्यावर हात मारायला गेला आणि परतीच्या वेळी घोळ झाला. तिथल्या रत्ना-माणकांनी डोळे दिपले आणि गुप्त खजिन्याचं बंद झालेलं दार उघडायचा पत्ता विसरला. परवलीचा शब्द. गव्हा उघड’, जवसा उघड’, सातू उघड... असं बरंच काही. पण तिळा उघड काही आठवलं नाही. पुढची कथा सगळ्यांनाच माहिती आहे...

कासिम आणि माझ्या गोष्टीतलं साम्य हा परवलीचा शब्दच आहे. फक्त हल्ली तो जरा आधुनिक झाला आहे. पासवर्ड म्हणतात त्याला. तोच विसरून गेलो होतो. दोन गोष्टींमधला फरक एवढाच की, पासवर्ड आठवत नसल्यानं कासिम आत अडकून पडला आणि परवलीचा शब्द विसरून गेल्यानं मी बाहेरच थांबलो. खजिन्यात भर टाकायची होती; पण प्रवेश निषिद्ध अशी सूचना सारखी मिळत होती.

आधुनिक माध्यमांबरोबर असावं म्हणून अडीच-तीन वर्षांपूर्वी हौसेनं अनुदिनी (म्हणजे ब्लॉग हो!) सुरू केली. सुरुवातीच्या उत्साहात त्यावर बरंच काही लिहिलं. प्रतिक्रियाही चांगल्या येत होत्या. नंतर अधूनमधून लिहिलेलं त्यावर टाकत राहिलो. काही लिहिणं जमलं नाही, तरी ब्लॉगवर जाऊन फेरफटका मारणं ठरलेलं. कोण येऊन काय वाचून गेलं याचा आढावा घेत होतो. त्याचा पासवर्ड तोंडपाठ झालेला. कुणी ऐन सकाळी उठवून विचारलं तरी क्षणात तो सांगितला असता. ऐन सकाळी हा शब्दप्रयोग खटकतो ना? बाकीचे ऐन मध्यरात्री म्हणतात. ते त्या वेळी गाढ झोपेत असतात म्हणून. आपलं तसं नाही बुवा. आपण मध्यरात्री छान टळटळीत जागे असतो आणि सकाळी घोरत असतो. त्यामुळं योग्य तोच शब्दप्रयोग केलाय!

ते असो. मुद्द्यावर आलेलं चांगलं. ब्लॉगचं तसं बरं चाललं होतं. अधूनमधून लिहीत होतो आणि वाचकही मधूनमधून वाचत होते. पण दीड वर्षापूर्वी काही तरी झालं आणि रागाच्या भरात ब्लॉगची सगळी कवाडं बंद करून टाकली. कुणालाही तिथं जाता येणार नाही, असा पक्कं सेटिंग (ब्लॉगच्या वापरकर्त्यानं वापरायची सेटिंग्ज!) करून टाकलं. गुहेच्या तोंडावर अगदी पक्की शिळा बसवून टाकली! एवढा बंदोबस्त केल्यानंतर कुणालाच तिथं जाणं शक्य नव्हतं. असे चार-पाच महिने सहज गेले. मध्येच एखाद्या दिवशी लिहिण्याची उबळ यायची. ब्लॉगवर टाकावं, खूप जणांनी वाचावं आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडावा, असं वाटायचं. कम्प्युटर सुरू करीपर्यंत सगळा उत्साह मावळलेला. आतून आलेलं खूप काही संगणकाच्या पडद्यावर उमटायचंच नाही. स्वप्नाचे रंग फिकटून जात.

ब्लॉगला नियमित भेट देणाऱ्या वाचक-स्नेह्यानं एके दिवशी सहज विचारलं, तुम्ही ब्लॉग लिहिणं बंदच करून टाकलं की काय? आम्हालाही तिथं जाता येत नाही. एकदम कुलूपबंद! कारण तरी सांगा...

आपणही ब्लॉग सुरू केला होता, हे तेव्हा एकदम आठवलं. आपल्याला लिहिताही येतं, याची आठवण झाली. बऱ्याच महिन्यांत पांढऱ्यावर काही काळं केलं नाही, याची लाज वाटू लागली. (एव्हाना ब्लॉगला मिळालेल्या थोड्या-फार वाचकांचा समज ब्लॉगवाल्यानं कंटाळून तोंड काळं केलं असा झाला नसता तरच नवल!) तो फोन येऊन गेला आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांतच कमालीच्या प्रसववेदना सुरू झाल्या. मनातलं हे लिहिलंच पाहिजे, असं वाटत होतं. संगणक सुरू केल्यानंतरही या वेदना थांबल्या नाहीत. दोन-तीन तासांच्या खटपटीनंतर चौदाशे शब्दांचा लेख तयार झाला. एव्हाना उत्तररात्रीचे तीन वाजले होते. मनाशी म्हटलं की, आता एवढा उशीर झालाच आहे, तर लेख ब्लॉगवर टाकूनच आडवे होऊ.

नव्यानं उत्साह शिरला. कष्टसाध्य लेख पुन्हा दोन-तीन वेळा वाचून काढला आणि त्यातल्या शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या. आता पाच-दहा मिनिटांचंच काय ते काम.
इ-मेल सुरू करायचा. ब्लॉगरवर जायचं. तिथं न्यू पोस्टवर क्लिकून त्या चौकटीत लेख चिकटवून टाकायचा. पब्लिश अशी आज्ञा दिली की, झाला लेख प्रसिद्ध! मग सगळ्या ओळखीच्यांना इ-मेल पाठवून द्यायची. ब्लॉगवर नवीन लेख. सवड मिळाली की अवश्य वाचा... अशी विनंती. सात-आठ महिन्यांनी ब्लॉगला भेट देत होतो. त्यामुळं नवथर धडधड पुन्हा एकदा जाणवली.

इ-मेल सुरू केला. पत्ता टाकला. पुढची चौकशी झाली पासवर्डची. आपण परवलीचा शब्द एवढ्या दिवसांनंतरही विसरलो नाही, याची खात्री होती. त्यानुसार तो टंकलाही तिथल्या चौकटीत.

पुढच्याच क्षणी आत्मविश्वासाच्या प्रचंड फुगलेल्या फुग्याला टाचणी! ‘तुमचा पासवर्ड चुकीचा आहे, पुन्हा प्रयत्न करा,’ अशी सूचना झळकली. उत्तेजित झाल्यामुळं एखादं अक्षर मागं-पुढं झालं असावं, असं वाटलं. परवलीचा शब्द पुन्हा टंकित केला. पुन्हा तीच सूचना आली.

मग कळफलकाकडं ध्यान दिलं. कॅप्स लॉक चुकून सुरू नाही राहिलं ना, ते पाहिलं. तसं काही नव्हतं. पुन्हा परवलीचा शब्द, आणि पुन्हा तीच सूचना! सलग तिसऱ्या वेळी चूक. आता म्हटलं कंट्रोल-अल्टनं आपण चुकून इंग्रजीचं देवनागरी तर केलेलं नाही ना? तेही तपासून पाहिलं.

चौथ्या वेळी सगळं नीट तपासलं. कळफलक इंग्रजीच बडवतोय, कॅप्स लॉक जागच्या जागी. अप्पर केस, स्पेशल कॅरॅक्टर, अंक असं सगळं मनाशी घोकत एक-एक अक्षर डोळे फाडून टंकित करत राहिलो. या वेळी चूक होणारच नाही! सहा महिने झाले असले, तरी ब्लॉगचा पासवर्ड विसरणं शक्यच नाही, असं मनानं मनालाच तोऱ्यानं सांगितलं.

अरे बापरे! चुकीच्या परवलीच्या शब्दामुळं इ-मेलचा दरवाजा काही उघडतच नव्हता. पासवर्ड आपल्या खरंच लक्षात आहे ना?’, अशी शंका आली. तिळा उघडऐवजी मी  ज्वारी उघड’, मका उघड’, बाजरी तर बाजरी उघड असं काही वापरत नव्हतो ना? त्याची अकरा अक्षरं तर नक्की होती. बारावं अक्षर बहुतेक चुकत होतं असं वाटलं. ते कोणतं असावं, हे काही आठवत नव्हतं. की शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती होती? अंकाच्या जागी विशेष चिन्ह नि चिन्हाच्या जागी अंक असा तर काही गोंधळ होत नव्हता ना?

एव्हाना उत्तररात्र संपून पहाटेची चाहूल लागली होती. परवलीचा शब्द उद्या शोधू म्हणत झोपायची तयारी केली. झोपेत हेच मनात घोळवत ठेवायचं, असं ठरवलं. म्हणजे मग झालेली छोटी चूक कधी तरी साखरझोपेत लक्षात येईल. लेख तर तयारच आहे. तांत्रिक बाबी राहिल्यात फक्त.

दुसरा दिवस. परत एकदा इ-मेलची कवाडं उघडण्याचा प्रयत्न. परवलीच्या शब्दाचे वेगवेगळे प्रयोग करूनही दाद मिळाली नाही. सगळं काम संपल्यावर, कार्यालयातून रात्री घरी आल्यावर बघू म्हटलं.

त्या रात्री नेट लावून बसायचं ठरवलं. कुठल्याही परिस्थितीत आज ब्लॉगची खिडकी उघडायचीच आणि नवा लेख तिथं डकवायचाच. ठरवलंच होतं तसं. तांत्रिक मजबुरी आडवी आली! स्थिती जैसे थे होती. आपण पासवर्ड विसरलो आहोत, असं एका पराभूत क्षणी मनाला मान्य करायला लावलं. वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती नव्हे, तर विस्मरणशक्ती तल्लख होत आहे, असंही टोचून बोलून घेतलं स्वतःला.

चूक झाली खरी; ती दुरुस्त केल्याशिवाय स्वस्थ बसवणार नव्हतं. पुढची पायरी. नवीन पासवर्ड मागवणं. त्या सगळ्या तांत्रिक पायऱ्या ओलांडून गेल्यावर इ-मेल सेवा पुरवणाऱ्याकडून पर्याय आले दोन - एक तर या इ-मेल अकाउंटशी जोडलेल्या इ-मेलला दुवा येणार किंवा मोबाईलवर कोड. इ-मेलला मोबाईल क्रमांक जोडलेला नव्हता. खात्रीच होती. म्हणून जोडलेल्या इ-मेलवर क्लिक केलं.

पण चुकून मोबाईलही जोडला असेल तर? आणि बायकोचा नंबर तिथं दिला असेल तर? अतिआत्मविश्वास नको म्हणून तिचा मोबाईल तपासला. तिथं काही एसएमएस आलेला नव्हता.

दुसरं इ-मेल खातं तपासणं आलं. ते सुरू केलं. अकाउंट आयडी व्यवस्थित टाकला. दोन-दोनदा तपासला. मग परवलीचा शब्द. हे इ-मेल अकाउंट दीड-दोन वर्षांत कधी उघडलेलंच नव्हतं. जुना पासवर्ड लक्षात होता. (असा आपला एक समज.) तो अगदी काळजीपूर्वक टंकित केला. ताकही फुंकून फुंकून प्यावं लागत होतं.

दगा, पुन्हा एकदा दगा! याही इ-मेल आयडीचा पासवर्ड पूर्णपणे विस्मरणात गेलेला. भरपूर कामाच्या वेळी तो बदलला होता, एवढं लगेच आठवलं. आठवला नाही तो बदललेला पासवर्ड.

डेड एंडला येऊन पोहोचलो होतो. पुढं रस्ताच नव्हता. दोन इ-मेल आयडी. आणीबाणीच्या प्रसंगासाठी दोन्ही एकमेकांना जोडलेले आणि दोन्हींचे पासवर्ड हरवून गेलेले. स्मृतिकोशाच्या एखाद्या भिंतीला जळमटासारखे लटकलेले असावेत. सापडत मात्र नव्हते ते. एकदम हताश व्हायला झालं. एवढ्या हौसेनं ब्लॉग चालू केला आणि एका क्षणी त्याला मूर्खासारखं कुलूप ठोकलं. आता त्या कुलपाची किल्लीच हरवली होती. चावी बनवून देणाऱ्या दुकानालाही कुलूप! त्या आठ-दहा दिवसांत बरेच प्रयत्न केले. पण हाती आलं शून्य.

ब्लॉगमध्ये खजिना होता खजिना. साधारण ३०-३५ लेख, १०-१२ कविता आणि थोडं किरकोळ. प्रत्येक लेखाची प्रत संगणकाच्या स्मृतीत होतीच. पण ऐन वेळी तिथं पानावर दुरुस्त्या करून वाढवलेली मजा त्यात साठवलेली नव्हती. आणि प्रतिक्रियांचं काय? काही काही लेखांवर २०-२ प्रतिक्रियांचा पाऊस. त्यातल्या बऱ्याच मोठ्या माणसांच्या. कौतुकाच्या, शाबासकीच्या. काही तर प्रमाणपत्र म्हणून आयुष्यभर अभिमानानं मिरवण्यासारख्या. त्या कुठून परत मिळतील? खजिना आहे तिथंच होता. सुरक्षित. फक्त त्याच्यापर्यंत आता पोहोचता येणार नव्हतं. आपल्याच हातानं मी तिथं जाण्याची वाट बंद करून टाकली होती. कायमची?

एक दिवस वाटलं की, हॅकरकडून हे काम करून घ्यावं. कारण नेहमी वापरात असलेला इ-मेल आयडीचा पासवर्ड एकदा-दोनदा चोरीला गेला होता. त्यामुळं हॅकरकडून कुलूप तोडून घेणं सोपं वाटलं. पण तसं ओळखीचं कोणीच नाही. त्याची सॉफ्टवेअर असतात म्हणे. मुलाजवळ ही कल्पना बोलून दाखवली, तर त्यानं उडवूनच लावलं - ते काय एवढं सोप्पंय होय! परवडणारेय का सॉफ्टवेअर ते?’ ब्लॉगकडे जाणारी वाट अधिकाधिक अवघड होत चालली होती. तिच्यावरचे काटेकुटे वाढतच चाललेले. ब्लॉगचा वाचक असलेल्या एका आयटी तज्ज्ञाला ही अडचण सांगितली. इ-मेलचा पासवर्ड अगदी मुलाच्या समोरही कधी टंकित केला नाही. पण त्याला सगळी माहिती व्हॉट्सॲपवरून कळवून टाकली. दोन-तीन दिवसांनी त्याचं उत्तर आलं - काही तरी गडबड आहे. तुमचे दोन्ही मोबाईल पासवर्ड रिकव्हरीसाठी येणाऱ्या नंबरशी जुळत नाहीत. कुठं तरी, काही तरी चुकतंय.

शेवटचाही प्रयत्न फसला. मनात आशा होती, एक ना एक दिवस यश येईलच. खजिन्याचं कुलूप उघडेलच. ते लेख, त्या प्रतिक्रिया पुन्हा वाचायला मिळतील. नक्कीच.

असंच एक दिवस नेहमीच्या वापराच्या अकाउंटमधल्या जुन्या इ-मेल तपासून काढून टाकत होतो. अचानक शोध लागला. चूक लक्षात आली. त्या वेळी कार्यालयात होतो म्हणून आर्किमिडीजसारखं पळत सुटलो नाही. चुकीच्या किल्लीनं नाही, तर चुकीचं कुलूप उघडू पाहत होतो मी. इ-मेल आयडीच चुकीचा टंकित करत होतो. त्यातल्या दोन अक्षरांचा पार विसर पडला होता.

घरी आल्याबरोबर संगणक सुरू केला. इ-मेल आयडी व्यवस्थित भरला. नंतर तोच पासवर्ड टाकला. एंटरचं बटन दाबलं आणि खुल जा सम सम’! त्या पडद्यानं सहा महिन्यांच्या गैरहजेरीतलं सगळं काही भराभर समोर आणून ओतलं. परवलीचा शब्द विसरणार नाही, हा आत्मविश्वास खराच होता तर!

एक मोठाच धडा शिकायला मिळाला या प्रकारातून. पासवर्ड आणि पिन कुठं लिहून ठेवू नका, अशी सूचना तज्ज्ञ नेहमीच देत असले, तरी ती धुडकावून लावायचं ठरवलं. कारण एवढं सगळं काही लक्षात ठेवणं शक्य नाही. प्रत्येक खेपेला नेमक्या वेळी स्मरणशक्ती दगा देणार नाही, याची खातरी उरली नव्हती. तसे अनुभव त्या आधी दोन-तीन वेळा आले होते. पण त्यावाचून काही अडलं नव्हतं. त्यामुळं तिकडं दुर्लक्ष केलं होतं.

पहिलं इ-मेल अकाउंट होतं रीडिफमेलचं. महिन्यातून कधी तरी एकदा तिथं जाऊन इ-मेल तपासत होतो. तिथं फार काही ठेवलंच नव्हतं. शेवटचं उघडलं तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडून आलेली इ-मेल पाहायला मिळाली. त्यात सामान्य मतदाराशी संपर्क साधत पक्षानं आवाहनही केलं होतं - आमच्या चुका सांगा. त्या दुरुस्त करून आपण पुढे जाऊ.’ त्या इ-मेलनं पराभवानंतर काँग्रेसला आठवला आम आदमी’’ अशी छान बातमीही मिळाली. आता तो इ-मेल आयडी इतिहासजमा झाला. त्याचा पासवर्ड विसरला. पासवर्ड परत मिळवण्याच्या बाकीच्या नोंदीही विसरून गेलो.

असंच एकदा डेबिट कार्डाचा पिन विसरला. मित्राला घेऊन जेवायला निघालो होतो. त्या आधी एटीएममधून पैसे काढायला गेलो. मित्र कुरकुरत होता. कार्डनंच पैसे देऊ ना,’ असं म्हणाला. त्याचं ऐकलं नाही. पिन विसरल्याचं लक्षात आल्यावर परत घरी जाऊन पैसे आणले. चार किलोमीटरचा हेलपाटा पडला. जेवण करून बिलाचे पैसे देताना मित्राला म्हणालो, ‘‘कार्डनं बिल देऊ म्हणत होतास. इथं आल्यावर पिन आठवत नाही, हे कळल्यावर काय केलं असतं?’’ काडीनं दात कोरत तो उत्तरला, ‘‘तसं झालं असतं तर मी दिले असते पैसे. तेवढे आहेत माझ्याकडे!’’

एका ज्येष्ठ व्यंग्यचित्रकाराची मध्यंतरी इ-मेल आली. ते कुठं तरी परदेशात आहेत आणि पासपोर्ट, पाकीट हरवल्यानं अडचणीत आहेत, असं त्यात लिहिलं होतं. लक्षात आलं की, गडबड आहे. त्यांच्याशी लगेच मोबाईलवरून संपर्क साधला. तुमचा मेल आयडी हॅक झाला आहे. लगेच पासवर्ड बदलून टाका,’ असं मी सांगत होतो. वयोमानपरत्वे त्यांना ते ऐकू येत नव्हतं. पण ते गावीच आहेत, एवढं त्या संवादावरून निश्चित कळालं. त्यांना एक दीर्घ एसएमएस पाठवला. तो वाचून त्यांनी पासवर्ड बदलला आणि दुसऱ्या दिवशी आभार मानणारा संदेशही पाठवला.

हे असे दोन-तीन अनुभव आल्यानं ठरवलं. सगळी इ-मेल अकाउंट आणि त्यांचे पासवर्ड, पिन, पॅन, आधार इत्यादी नेहमी लागणाऱ्या गोष्टींची नोंद करून ठेवायची. स्मरणशक्तीवर फाजील विश्वास टाकायचा नाही. संगणकात एक फाईल करून ठेवली. खरं तर हा संगणक मी आणि घरी आल्यावर मुलगा यांच्याशिवाय दुसरं कुणीच वापरत नाही. पण जरा काळजी घ्यायची म्हणून मुलानं त्या फाईलला पासवर्ड द्यायला सांगितलं. म्हणाला, सोपा ठेवा एकदम पासवर्ड. तुमच्या लगेच लक्षात येईल असा. नको नको म्हणताना पासवर्ड-पिन नोंदीच्या फाईलला पासवर्ड दिला.

...परवाच लक्षात आलं. एक छोटीशी गडबड झालीय. त्या फाईलचा परवलीचा शब्द सोपा असूनही आठवत नाही. कोणता? तिळा उघड की तांदळा उघड?



(चित्रं संकेतस्थळांच्या सौजन्यानं)

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

मॅक्सिमस...उद्याच्या स्वप्नांना पंख

हॉकीचा जादूगार अशीच ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद सिंह यांची आज (९ ऑगस्ट) जयंती. आणि आज आपला राष्ट्रीय क्रीडा दिनही. अफाट क्रीडाजगतातल्या एका जादूगाराचं कायमस्वरूपीचं स्मरण. अशा जादूगाराची आठवण की, ज्याच्यामुळे ऑलिंपिकमधलं आपलं एक सुवर्णपदक निश्चित असे. योगायोगाने सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा चालू आहे. त्यात आपली कामगिरी अत्युत्कृष्ट होत नसली, तरी भूतकाळाएवढी निराशाजनक नक्कीच नाही. अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत ऑलिंपिक आणि आशियाई स्पर्धा आटोपल्यानंतर आपल्याकडे सामूहिक रडगाण्याचा कार्यक्रम असे. गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत... एवढा आपला १०० कोटींचा देश आणि ऑलिंपिकमध्ये एक पदक नाही! हेच सूत्र पकडून कट्ट्यांवरच्या गप्पांमध्ये तावातावानं मतं मांडली जात आणि संसदेतही अभ्यासपूर्ण चर्चा होई. रडगाण्याचं आणि चर्चेचं निहित कर्तव्य संपल्यानंतर पुढच्या ऑलिंपिक किंवा आशियाई स्पर्धेपर्यंत क्रिकेटच आपला राष्ट्रीय खेळ असे! हे चित्र नव्या सहस्रकात थोडं बदललं. अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकानं येस्स! वी कॅन... असा विश्वास आपल्या क्रीडाक्षेत्रात जागवला.

खेळायचं कशासाठी?’ या सनातन प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण फारशा गांभीर्यानं केला नाही. आपल्या देशात क्रीडा-संस्कृती आहे का आणि असलीच तर ती कशा पद्धतीची आहे, ती बदलली पाहिजे का, तीत काय बदल करावे लागतील, याबद्दल विचार करायचं आपण टाळतो. आंतरराष्ट्रीय पदकविजेते एका रात्रीतून घडत नसतात, हे आपल्याला तत्त्व म्हणून मान्य आहे. पण त्यासाठी किती कठोर मेहनत घ्यावी लागते, पद्धतशीर नियोजन करावं लागतं, शिल्पासारखा खेळाडू घडवावा लागतो, याकडं आतापर्यंत आपलं बरंचसं दुर्लक्ष झालं. देश पातळीवर खेळाडू घडवण्याचं काम काही प्रमाणात भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई-SAI) करीत आहे. पण या प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबद्दलही आजवर बरंच उलट-सुलट बोललं गेलं आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात राज्यात क्रीडापीठाची आणि त्याच्याशी संलग्न क्रीडा प्रबोधिनींची स्थापना झाली. पण दोन दशकांनंतरही प्रबोधिनीचा ठसा ठळकपणे उमटला आहे, असं म्हणता येणार नाही. छोट्या-मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये वर्षानुवर्षे क्रीडा मंडळं, क्लब चालू आहेत. त्यातले काही यथावकाश बंद पडतात, काही नव्याने सुरू होतात. नवे खेळाडू येतात, जुने सगळं पचवून मैदानापासून दूर जातात.


विशिष्ट ध्येय समोर ठेवून आणि त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून (पदकविजेते) खेळाडू घडवणं, हे दीर्घ मुदतीचं काम आहे. तसं ते कालही होतं आणि आजच्या इन्स्टंटच्या जमान्यातही आहे. अशा पद्धतीनं काम करणाऱ्या संस्था तुरळक का होईना आहेत आणि काही नव्यानं उभ्या राहत आहेत. नगरची मॅक्सिमस स्पोर्ट्स अॅकॅडमी त्यापैकीच एक. नगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या फिरोदिया कुटुंबाचा आधार या प्रबोधिनीला आहे. शांतिकुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशननं चार वर्षांपूर्वी, म्हणजे ऑक्टोबर २०१४मध्ये अॅकॅडमीची मुहूर्तमेढ रोवली. बॅडमिंटनपासून सुरुवात झालेल्या प्रबोधनीनं नंतरच्या काळात ज्यूदो आणि तिरंदाजी या दोन खेळांकडेही लक्ष वळवलं. कोणत्याही खेळात सर्वांत मूलभूत गोष्ट म्हणजे तंदुरुस्ती, खेळाडूची टिकून राहण्याची क्षमता (दमसास). त्याची काळजी घेणाराही स्वतंत्र विभाग मॅक्सिमसमध्ये आहे.

ऑलिंपिकमध्ये सहभाग आणि पदक हेच लक्ष्य ठेवून मॅक्सिमसची सुरुवात करण्यात आल्याचं प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जोशी यांनी सांगितलं. क्रीडा-संस्कृतीच्या माध्यमातून शहर बदलण्याच्या, शहरवासीयांची वृत्ती सकारात्मक बनविण्याच्या प्रयत्नांची ही सुरुवात असल्याचं सांगतानाच त्यात आम्हाला नक्की यश येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बॅडमिंटन म्हणजे प्रबोधिनीचा पहिला आणि खास खेळ. प्रबोधिनीचे सर्वेसर्वा, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांना त्यात विशेष रस. (कै.) शांतिकुमार फिरोदिया यांचाही ओढा बॅडमिंटनकडे होता. त्यातूनच साधारण २० वर्षांपूर्वी त्यांनी नगर क्लबवर खास प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. मॅक्सिमसची बीजं आहेत ती आधी सुरू झालेल्या बॅडमिंटन अॅकॅडमीमध्ये. तिचंच हे विस्तारित आणि व्यापक रूप. आपल्याला वेग, शेवटपर्यंत टिकून राहण्याची क्षमता आणि ताकद यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. खेळाडूंना अगदी तरुण वयातच या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, असं मत असणारे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू जे. बी. एस. विद्याधर यांचं मार्गदर्शन नगरच्या खेळाडूंना मिळतं ते मॅक्सिमसमुळंच. प्रकाश पडुकोण यांच्यानंतर ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकलेले पुलेला गोपीचंद अॅकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. त्यांच्या गुरुकुलच्या हातात मॅक्सिमसनं हात मिळवला आहे. नगरच्या खेळाडूंना नवं आणि मूलभूत काही शिकायला मिळावं म्हणूनच ही युती आहे. इथं आपलं नाणं खणखणीत वाजविणाऱ्या खेळाडूंना पुढे विद्याधर, गोपीचंद यांच्या प्रबोधिनीत शिकण्याची संधी मिळणार आहे.

बॅडमिंटन म्हणजे नगरमधली सध्याची इन थिंग आहे. सर्व वयोगटांतली मंडळी रोज आवर्जून कोर्टवर दिसतात. त्यामुळंच की काय, प्रबोधिनीत सर्वाधिक संख्या आहे ती बॅडमिंटनच्या खेळाडूंची. सध्या १०० खेळाडू नियमित प्रशिक्षण घेतात. याशिवाय २० खेळाडू प्रतीक्षायादीवर आहेत. ही संख्या एकदम वाढलेली नाही. पहिल्या वर्षी ती ३०-४० होती; मग दुप्पट झाली आणि यंदा तिनं शतक गाठलं. खेळाडूला प्रवेश मिळाला की, लगेच बॅडमिंटनचे धडे शिकवायला सुरुवात होत नाही. आधीचे तीन महिने प्रत्येकाला फिजिकल फिटनेस अजमावून पाहावा लागतो. त्यानंतर त्याला खेळाच्या अगदी मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. तिथं धडे गिरवल्यानंतर त्याची वरच्या तुकडीत रवानगी होते. सध्या वाडिया पार्क स्टेडियमच्या बॅडमिंटन क्रीडागारात रोज सायंकाळी ते , ते , ते आणि ते या चार तुकड्यांमध्ये बॅडमिंटनपटू शिकताना दिसतात. शेवटच्या तुकडीतले विद्यार्थी म्हणजे जणू हुश्शार मुलांची स्पेशल बॅच. त्यांना स्पर्धात्मक पातळीचं प्रशिक्षण दिलं जातं. या तुकडीतल्या खेळाडूंना पहाटे .३० ते सकाळी .३० या दोन तासांचं प्रशिक्षण सक्तीचं आहे. सर्वोत्तम १० खेळाडूंना विद्याधर यांच्या विजयवाडा येथील अॅकॅडमीत प्रशिक्षणाची संधी मिळेल. त्यासाठी त्यांना येणाऱ्या खर्चातील निम्मा वाटा मॅक्सिमस उचलणार असल्याचं संदीप जोशी यांनी सांगितलं. बॅडमिंटनची दर तीन महिन्यांनी स्पर्धा होते. त्यामुळे स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्यातील प्रशिक्षणार्थींना होतो आणि त्यातून त्यांना स्वतःमधील उणिवा-क्षमतांची जाणीव होते.

मॅक्सिमसच्या बुद्धिबळ शिबिरात चाल शिकवताना शार्दूल गागरे.
मॅक्सिमस स्पोर्ट्स अॅकॅडमीचं काम तंत्रशुद्ध रीतीनं चालतं. एखाद्या खेळाडूला प्रवेश मिळाला की, लगेच दुसऱ्या दिवशी त्याला तो खेळ शिकवायला सुरुवात होते, असं मुळीच नाही. संबंधिताची शारीरिक क्षमता, आवड, कल हे सगळं तपासून खेळाची निवड केली जाते. याचं कारण साधं आहे. कोणत्या वयात खेळायला सुरुवात करावी, कोणता खेळ योग्य आहे, याचं तंत्रशुद्ध ज्ञान फारच कमी मुलांच्या पालकांना असतं. क्रिकेट आणि बॅडमिंटन सध्या गाजणारे खेळ आहेत, म्हणून बहुसंख्यांची ओढ तिकडेच असते. मॅक्सिमसमध्ये दाखल झाल्यानंतर आधीचे तीन महिने फिजिकल फिटनेस विभागात घालवावे लागतात. त्यातून मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होते. ही मुले, त्यांचे पालक यांच्याशी संदीप जोशी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधतात. या गप्पांमधून ते मुलांचं मानस जाणून घेतात. या चर्चेनंतर मुलासाठी कोणता खेळ योग्य हे निश्चित केलं जातं. शारीरिक तंदुरुस्तीबाबत अॅकॅडमीएवढी आग्रही का आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना जोशी म्हणाले की, यातून मुलांची क्षमता किती नि काय आहे, हे समजून येतं. त्यानुसार मुलांसाठी योग्य असलेला खेळ निवडता येतो. दुसरं म्हणजे परीक्षेच्या किंवा सुटीच्या काळात मुलं खेळायला येत नाहीत. त्यामुळं वर्षभर शिकलेलं या गैरहजेरीत विसरायला होतं. तंदुरुस्तीचे व्यायाम घरीही करता येतात. त्यातून खेळाबद्दलची ओढ कायम राहते.

संकल्प थोरातला अत्याधुनिक सायकलची भेट.

गुणी खेळाडूंना मदतीचा हात देण्यातही मॅक्सिमस आघाडीवर आहे. हे खेळाडू ऑलिंपिक मान्यताप्राप्त खेळाचेच हवेत, असा त्यासाठी कटाक्ष आहे. असं पुरस्कृत करण्याआधी खेळाडूची पूर्ण माहिती मिळविली जाते. त्याची कामगिरी काय, त्याचं सातत्य कसं आहे, या खेळाला किती भवितव्य आहे, हे बारकाइनं पाहिलं जातं. त्या त्या खेळातल्या तज्ज्ञाचंही मत घेतलं जातं. वर्षभरात साधारण १०-१५ खेळाडूंना पुरस्कृत केलं जातं. शांतिकुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनतर्फे ही मदत दिली जाते. रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेले बॅडमिंटून खेळाडू मनू अत्री व सुमित रेड्डी, बुद्धिबळ खेळाडू शार्दूल व शाल्मली गागरे यांना आतापर्यंत अशी मदत मिळाली आहे.

खेलो इंडियात चमकलेली भाग्यश्री फंड.
ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदक जिंकावं, हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून अॅकॅडमीचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथलं कामकाजही त्याला अनुसरूनच चालतं. शिस्त आणि नियम  यांच्या पालनावर भर आहे. खेळाचं प्रशिक्षण दिलं जातंच; पण आहाराबाबतही मार्गदर्शन केलं जातं. ज्यातून प्रेरणा मिळते अशा कार्यक्रमांचं आयोजन, क्रीडाविषयक चित्रपट-माहितीपट खेळाडूंना दाखविले जातात. खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या योजना असतात. अॅकॅडमी निःशुल्क नाही. कोणतीही गोष्ट मोफत मिळाली की, तिचं महत्त्व राहत नाही, हे जाणून नाममात्र शुल्क घेतलं जातं. तथापि त्यातून सगळा खर्च भागत नाही. मग तो वाटा नरेंद्र फिरोदिया उचलतात. गुणवान खेळाडूंसाठी वेगळा विचार सुरू आहे. बॅडमिंटनच्या तिमाही स्पर्धेत पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना शुल्क माफ केलं जातं.

श्रेया गहिलेचा अचूक नेम करंडकावर!
बॅडमिंटनप्रमाणंच सध्या तिरंदाजी व ज्यूदो यांचंही प्रशिक्षण इथं सुरू आहे. फुटबॉल आता लवकरच सुरू होईल. सध्या सुरेखा शिरसाट (ज्यूदो), जितेंद्रकुमार, रोहित शर्मा व तेजस पवार (बॅडमिंटन), पल्लवी सैंदाणे (फुटबॉल) असे मार्गदर्शक आहेत. येत्या काही काळातच मॅक्सिमस रायफल शूटिंग, टेबल टेनिस, लॉन टेनिस या खेळांकडं वळणार आहे.  मॅक्सिमस स्टेडियमचं कामही लवकरच सुरू होईल. अॅकॅडमीचे धुरिण सध्या आणखी मोठी स्वप्नं पाहत आहेत. नेमबाजीची स्वतंत्र अॅकॅडमी येत्या दोन वर्षांत सुरू करण्याचं आणि साईच्या धर्तीवर निवासी प्रबोधिनी स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे. अॅकॅडमीचा आजवरचा प्रवास नि त्याची गती पाहिली, तर ही स्वप्नं साकार होण्यात फार काही अडचण येईल, असं मुळीच वाटत नाही.

मॅक्सिमस. हा शब्द आहे मूळचा लॅटिन. म्हणजे Greatest, Largest. मराठीत महत्तम. या शब्दाला जागणारी भव्यदिव्य स्वप्नं मॅक्सिमस अॅकॅडमी पाहत आहे. या स्वप्नांना क्रीडा दिनी नवे पंख फुटावेत...
--------
या खेळाडूंना मिळाली मदत

🏆 बॅडमिंटन - मनू अत्री - रिओ ऑलिंपिक, २०१६
🏆 बॅडमिंटन - सुमित रेड्डी - रिओ ऑलिंपिक, २०१६
🏆 बुद्धिबळ - ग्रँड मास्टर शार्दूल गागरे
🏆 बुद्धिबळ - वूमेन्स इंटरनॅशनल मास्टर शाल्मली गागरे
🏆 क्रिकेटपटू - प्रणव धनवडे – शालेय स्पर्धेत एका डावात १००९ धावा करण्याचा जागतिक विक्रम
🏆 कुस्ती - भाग्यश्री फंड - खेलो इंडियामध्ये सुवर्णपदक आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्णपदके.
🏆 कुस्ती - सोनाली मंडलिक - राष्ट्रीय मानांकित खेळाडू
🏆 सायकलिंग - संकल्प थोरात - गुवाहाटीतील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सांघिक तिसरा क्रमांक.
🏆 मुष्टियुद्ध - आरती भोसले - राष्ट्रीय खेळाडू
🏆 तिरंदाजी - अभिजित रिंढे
🏆 चालण्याची शर्यत - सुवर्णा कापसे - राष्ट्रीय खेळाडू
🏆 चालण्याची शर्यत - पूजा कापसे - राष्ट्रीय खेळाडू
----
(कृपया, लेखी परवानगीशिवाय हा लेख किंवा त्यातील भाग कोणत्याही माध्यमासाठी वापरू नये.)

चंदनापुरीत भेटलेला अजिंक्य रहाणे

  देखणा फटका... ही बॅट आता निवृत्त झाली! (छायाचित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सौजन्याने.) .......................................... ...