सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

शबरीमला ते शिंगणापूर...

देव शुद्ध झाला!! आणि हो, (पुन्हा) पवित्रही झाला!!

नेहमी स्वतःपुढे पुरोगामी असं विशेषण आग्रहानं लावून घेणाऱ्या, डाव्या विचारांचा (एके काळचा) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातली गोष्ट आहे ही.

जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात॥ असे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूरची चित्तचक्षुचमत्कारिक गोष्ट सांगतोय ही.

देवाचं पावित्र्य शनिवारी (२८ नोव्हेंबर) भंग पावलं होतं. समस्त गावकऱ्यांनी रविवारी (२९ नोव्हेंबर) देवाला पुन्हा ते पावित्र्य मिळवून दिलं.

या दोन्हींचंही कारण ती होती.

शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एक मुलगी किंवा तरुणी शनिशिंगणापुरातील मंदिरात होती. अंगात पँट आणि शर्ट. केसाचा एक शेपटा. गळ्यात उपरण्यासारखी घेतलेली ओढणी. तिने पादत्राणे चौथऱ्याखाली सोडली. पायात मोजे तसेच ठेवत चौथऱ्यावर चढली. तेलाने अभिषेक केला आणि लगेच खाली परतली. हा सारा प्रसंग अवघ्या - सेकंदांचा. (पाहा : शनिशिंगणापूर देवस्थानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील ही चित्रफीत.

या अवघ्या अर्ध्या मिनिटाच्या खेळामुळं सगळंच बिघडलं. वर्षानुवर्षं पाळलेल्या रुढीची गढी ढासळली. जाणीवपूर्वक पाळलेल्या परंपरेचे चिरे निखळून पडले.

त्या मुलीनं हे कृत्य हेतुतः केलं की, तिच्याकडून नकळत हे घडलं, याचा उलगडा अजून झालेला नाही. येत्या एक-दोन दिवसांमध्ये तो होईल किंवा होणारही नाही. असं काही करण्यामागं तिचा काही उद्देश होता की, केवळ श्रद्धेपोटी तैलाभिषेक करण्यासाठी आणि रुढींची माहिती नसल्यानं ती चौथऱ्यावर चढली, हेही स्पष्ट व्हायचं आहे. तसं ते होईलच याचीही खात्री नाही.

आपण काय पराक्रम केला आहे, हे त्या मुलीला रविवारची वृत्तपत्रं वाचून कळलं असेल. आणि आता सोमवारच्या अंकात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांनी तिला कदाचित घाबरायलाही होईल.

पण तिच्या हातून ते घडून गेलंय. वर्षानुवर्षांची एक परंपरा तिनं त्या  सेकंदांमध्येच मोडीत काढलीय.

ही मुलगी चौथऱ्यावर गेल्यामुळे सारं कसं अपवित्र आणि अशुद्ध झालं होतं. रुढी-परंपरा मोडल्यानं आलेला राग गावकऱ्यांनी रविवारी तीन तास बंद पाळून व्यक्तही केला. शुद्धिकरण म्हणून लोकप्रतिनिधी व गावकरी यांनी देवाला पाणी, तेल व दूध याने अभिषेकही केला.

आपल्याला अभिषेकाबद्दल काही म्हणायचं नाही. कारण तो श्रद्धेचा प्रश्न आहे. आपल्या घटनेनेच प्रत्येकाला उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे. घटनेनं समतेचं तत्त्वही सांगितलेलं आहे.

पण आपण त्याबद्दलही काही बोलणार नाही. कारण समतेवर विश्वास ठेवायचा नाही, असं त्यांच्या उपासनेच्या पद्धतीत म्हटलेलं असेल, तर त्यांचं तेही घटनादत्त स्वातंत्र्य आपण मान्य करायलाच हवं.

पाण्यानं आणि परंपरा मोडल्यामुळं झालेला दाह शांत करण्यासाठी तेलानं अभिषेक करणंही आपल्याला पटतंय.

पण दुधानं अभिषेक कसा काय केला बुवा?

हे दूध गाय, म्हैस, शेळी, मेंढी... यांपैकीच एकीचं कुणाचं तरी असणार ना? कारण बैल, बोकड, रेडा दूध देतो, हे अधूनमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रीय चौकटींना मान्य असलं, तरी वस्तुस्थिती तशी नाहीच. दूध फक्त मादी देते ना?

चौथऱ्यावर चढून गेलेली ती मुलगी म्हणजे मादी होती ना?

एका मादीमुळं अपवित्र झालेल्या स्थानाचं शुद्धिकरण दुसऱ्या मादीच्या स्तन्यामुळं होतं तर?
म्हणजे सगळ्याच माद्या तेवढ्या अपवित्र नसतात तर?

गावकरी फक्त शुद्धिकरण करूनच बसलेले नाहीत. काहींनी गावातल्या महिलांनाही बोलतं केलंय. रुढी-परंपरेच्या बाजूनंच.

तिथल्या एका बाईंनी सांगितलंय म्हणे की, महिलांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याची पद्धत इथे नाही. ती रुढी आजपर्यंत पाळली गेलीय. तो नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात परिसरातल्या महिला एकवटतील!’

काट्याने काटा काढावा, असा तर काही हा प्रकार नाही ना? बाईच्या विरोधात बाईलाच उभं करण्याची इथली सनातन परंपरा आहे. बाईच बाईचा शत्रू असते, हे पुरुषी मनोवृत्तीनं सतत सांगून मनीमानसी रुजवलेलं आहे. तेच पुन्हा सिद्ध करण्याचा हा खटाटोप.

पण असं काही पहिल्यांदाच घडतंय, असं मुळीच नाही. http://www.shanidev.com या संकेतस्थळाला भेट द्या. त्या संकेतस्थळावर ‘Was injustice done to women?’ या शीर्षकाचं एक पान आहे. त्याचं लेखन प्रथमपुरुषी एकवचनी असलं, तरी लेखकाचं नाव दिलं नाही. हेच पान मराठीतही आहे. त्याचं शीर्षक मात्र श्री शनिदेवा संदर्भात महिलांचे आभिमत असं आहे. त्यात दिलेलं महिलांचं म्हणणं मुळातून वाचण्यासारखं आहे.

xxxxx

आता या प्रकाराबद्दल परिसरातील पुरोगामी आणि पत्रकारप्रिय पुढारी काही बोलतील, असं मुळीच नाही. ते नेहमीप्रमाणे पानाची गुळणी धरून बसतील. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आंदोलनाच्या वेळी तसा अनुभव आलेलाच आहे.

बरोबर १७ वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं शिंगणापुरातील अंधश्रद्धेविरुद्ध मोहीम सुरू केली होती. काही वृत्तपत्रांनी तिचं नामकरण शिंगणापूरला चला, चोरी करायला असं करून काडी टाकण्याचं काम केलं होतं.

त्याच वेळी म्हणजे  व  डिसेंबर ९९ रोजी सोनईमध्ये सत्यशोधक समाजाचं अधिवेशन होणार होतं. (ते पार पडलं की नाही, हे आता आठवत नाही.) त्या अधिवेशनात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रियांच्या गुलामगिरीस धर्म व अंधश्रद्धा कारणीभूत आहे या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. (नंतर संयोजकांनी त्यांना दिलेलं निमंत्रणच रद्द करून आपली जबाबदारी पार पाडली!)

एकविसाव्या शतकातलं पहिलं दीड दशक संपल्यानंतरही त्याच विषयावर पुन्हा चर्चासत्र घेतलं तरी चालेल, असंच आपला भवताल सांगतोय. पुरोगामित्व मिरवणाऱ्या पुढाऱ्यांनी त्याही वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तोंडदेखलाही पाठिंबा दिला नव्हता. लट राज्यमंत्री दिलीप सोपल, आमदार शिवाजी कर्डिले यांनी निरर्गल शब्दांत डॉ. दाभोलकर, समिती यांच्यावर टीका केली होती.

डॉ. दाभोलकर यांच्या प्रतिमेचं सोनईत दहन करून दहावा घालण्यात आला; त्यांना काळं फासण्याचा प्रयत्नही नगरमध्ये झाला.

म्हणूनच शंका येते; जे डॉ. दाभोलकर यांच्या पाठीशी उघडपणे उभे राहिले नाहीत, ते आता या अनोळखी मुलीला काय पाठिंबा देणार?

xxxxx

विशेष बातमी करण्यासाठी म्हणून मी एका शनिअमावस्येला ( ऑगस्ट ९९) जवळपास १ तास शनिशिंगणापूर येथे घालवले आहेत. त्याची बातमी दैनिक लोकसत्तामध्ये ८ ऑगस्ट ९९७ रोजी शनिशिंगणापूरचा प्रवास आता मोठ्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने या शीर्षकाने प्रसिद्ध झाली.

तिथे असतानाच चोरी झाल्याची तक्रार करणारा एक भाविक भेटला. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या संजय दिगंबर लोहारकर (देवगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक) ह्यांच्या खिशातील ५ हजार रुपये चोरीस गेले. पोलिसांनी त्यांची तक्रार अर्थातच घेतली नाही. त्याचाही या बातमीत उल्लेख आहे.

शेवगाव परिसरात मुख्याध्यापक असलेल्या किसन चव्हाण यांचं आंदकोळ आत्मकथन अलीकडेच ग्रंथालीनं प्रकाशित केलंय. ते पारधी जमातीचे. लेखकाला लहानपणी चोरी न होणाऱ्या शिंगणापूरचं फार आकर्षण होतं. तोच पिढीजात व्यवसाय करणाऱ्या त्यांच्या वडिलांना मुलाला वाटणारं हे आकर्षण ऐकल्यावर हसू आलं. त्यांनी म्हणे सांगितलं, मी सगळ्यात जास्त चोऱ्या तर तिथंच केल्या आहेत!’

त्या दिवशीच्या त्या  तासांमध्ये बरंच काही पाहिलं, ऐकलं. त्यानंतर पुन्हा शनिशिंगणापूरचं दर्शन घडलं ते क्रिकेटपटू राजेश चौहान ह्याच्याबरोबर.

भारतीय संघात पुनरागमन करण्याचं स्वप्न पाहणारा हा उमदा क्रिकेटपटू ज्या श्रद्धेनं साईबाबांपुढे नतमस्तक झाला, त्याच श्रद्धेनं त्यानं शिंगणापूरला सोवळं नेसून अभिषेकही केला. पुरोहितानं गोत्र विचारल्यावर त्यानं ते क्षणात कश्यप असं सांगितल्याचं आजही आठवतंय.

xxxxx

गुलशनकुमारचा सूर्यपुत्र शनिदेव चित्रपट आणि अनुराधा पौडवाल यांच्या ध्वनिफिती या समसमा संयोगामुळे शिंगणापूरची ख्याती वाढत गेली. शनिअमावस्येला तिथं चार-पाच लाख भाविकांची गर्दी झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून नेहमीच झळकतात. जवळच शिर्डी असल्यानं त्याचा फायदा शनिशिंगणापूरला होतो आहे.

त्या बातमीचा शेवट करताना लिहिलं होतं...

शिंगणापूर! भक्तांच्या कपाळी गंध लावून पैसे कमावणारा चार वर्षांचा गुलाब फुलमाळी. प्रसाद विकत घ्या म्हणून विनवणी करणारी ६ वर्षांची छाया आढाव. ऐशी तैशी बत्तीशी असा फलक लावून आयुर्वेदिक औषधं विकणारा वैदू. माळा, झळाळते खोटे दागिने विकणारे भटके लोक. दया करा म्हणून भीक मागणारे भिकारी.


...शिंगणापूरची, शनिशिंगणापूरची वाटचाल निर्विवादपणे एका मोठ्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने चालू आहे!

xxxxx

शिंगणापूर याहूनही मोठं तीर्थक्षेत्रं अवश्य बनावं. फक्त अमावस्येलाच नाही, तर रोज तिथं भाविक यावेत. त्यानिमित्तानं तिथल्या सामान्य माणसाला रोजगारही मिळावा.

अपेक्षा एवढीच, तुमच्या श्रद्धेच्या डोलाऱ्याला थोडा समतेचाही टेकू असावा!
.......

#शनिशिंगणापूर #शनिदेव #शनिअमावस्या #चौथरा #अंधश्रद्धा_निर्मूलन_समिती #अपवित्र #अशुद्ध
#अभिषेक #महिला #परंपरा #दुधाचा_अभिषेक #शुद्धिकरण

बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

भूषण, दूषण आणि प्रदूषण

गंजल्या जरी । काढा तलवारी ।
आम्ही वारकरी । आठवा थोडे ।।

 
करा आता जोर । लावा तयां धार ।
कशाचा विसर । पडलासे तुम्हा ।।

 
जातीची ढाल । द्वेषाची मशाल ।
पेटवा खुशाल । लागो द्यात आग ।।

थोडी फुंक मारा । फुलेल निखारा ।
आगडोंब सारा । मग उसळेल ।।

करू या कहर । कालवू जहर ।
हाच तो प्रहर । साधण्या संधी ।।

चंदनगंधाची सोड । जुनी ती खोड ।
उगाळ खोड । आता घाणेरीचे ।।

तयांचा उद्धार । करू या चित्कार ।
विषाचे फुत्कार । वळवळीत ।।

शेलके वेचावे । हवे ते बोलावे ।
घ्या हे पुरावे । करावे जाहीर ।।

तो(ह)फा जितेंद्रीय । प्रेक्षक देवेंद्रीय ।
निर्माता राजकीय । दिलीपकुमार।।

इतिहासे कोंदणे । हवे ते गोंदणे ।
शरदाचे चांदणे । दाविते मार्ग ।।
.
.
.
खेळ प्रचलित । मने कलुषित ।
हवा प्रदूषित । होऊ दे की ।।

असे असे घडे । कोण कुठे पडे ।
पापाचिये घडे । ओसंडिले ।।

देण्यात दूषण । कोणाला भूषण ।
वास्तव हे भीषण । आज-कालचे ।।
-------------------------------------
© आम आदमी
-------------------------------------
#Maharashtra_Bhooshan #award #ShivShahir #cast_politics #history

शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

शुध्द साहीत्य वैगेरे वैगेरे...

फार्फार वर्षांपूर्वी, म्हणजे वीस-एक वर्षांपूर्वी `रुची` मासिकानं (आता त्याचं नाव `शब्द रुची` असं झालंय का? की तेव्हाही ते असंच होतं?) मुखपृष्ठावर एक धम्माल केली होती. म्हणजे मुखपृष्ठावर एक पत्रच छापलं होतं. आणि त्या पत्रातल्या शुद्धलेखनाच्या चुका दाखवून दिल्या होत्या. सध्या साहित्यक्षेत्रामध्ये अनेकांसाठी `नायक` आणि तेवढ्याच जणांसाठी `खलनायक` असलेल्या प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांनी त्या चुका दाखवून दिल्या होत्या. हे म्हणजे अगदीच सौम्य भाषेत झालं. खरं सांगायचं तर ठाले पाटलांनी ते पत्र लिहिणाऱ्याची अगदी `बिनपाण्यानं तासली` होती.

साहित्य क्षेत्रातील एका (आता) मानाच्या (झालेल्या) पुरस्कारासंबंधी काही आवाहन करणारं ते पत्र होतं. ते लिहिणारा एक प्राध्यापक (आणि नंतर कवीही!) होता. त्या पुरस्कारासंबंधीच्या निवडसमितीत तो महत्त्वाची भूमिका बजावत असे. लेखक-अनुवादक विलास गिते यांनी तो अंक दाखविल्यानंतर या पामराने त्या वेळी `लोकसत्ता`च्या नगर आवृत्तीतील `नगरी-नगरी` सदरामध्ये `शुद्धलेखनाचं कवतिक` या शीर्षकाखाली काही मजकूर खरडला होता.

साधुन
साहीत्य
जेष्ठ
साहीत्यीक
जेष्ठ साहीत्यीक
उत्कृष्ठसाहीत्य
रविंद्र
बद्रीनाथ
समाज प्रबोधन
नाट्य सेवा
दरवर्षी
महत्व
25 वे
असुन
रौप्य महोत्सवी वर्षांच्या
दिनांक 29 ऑगस्ट रोजी
साहीत्य सेवा
डॉ. सुधिर
विश्‍लेशक
संवेदनशिल
शिस्तप्रीय
प्रतिकुल
अराधना
राहीला
श्रध्दा
रुपये 1 लाख
स्मृतीचिन्ह
स्वरुप
रविंद्र शोभेणे (नागपुर)
लोकहीतवादींची शतपत्रे
लोकहीतवादी
उर्फ
अनिष्ठरुढी
विरुध्द
लिहीली
विश्‍लेशन
आधोरेखीत
देवून
पंढरपुर
सांप्रदायाच्या
विनामुल्य
कूष्ठरोगी
दिनदुबळे
वर्षांपासुन
रंगभूमिची
एकांकीका
व्यवसायीक
दिगदर्शक
पाहीले
सहाय्यक
रसीक
आधिराज्य
नवोदीत

... आता वाचणाऱ्यांना (ते इथपर्यंत आलेच असतील, तर) कदाचित वाटेल की, कौतिकराव ठाले पाटील, `रुची` इत्यादी रुळांवरून गाडी अशी कशी घसरली? तर ते सांधे जोडून घेतो. (नाही तरी आम्ही हाडाचे `जुळारी` आहोतच. इकडचे शब्द तिकडे जुळवून रोजच्या रोज अंक काढण्यात आमची हयात गेली.) तर वर काही दिलेले शब्द वाचल्यावर लगेच नेमके काय झाले, हे (हुशार!) वाचकांना समजून येईल. हे सारे शब्द एकसमयावच्छेदे करून एकाच ठिकाणी (आणि दोन कागदांवर) अवतीर्ण झाले आहेत.

नगरमध्ये गेल्या आठवड्यात वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी जी मुद्रित दोन पानी टिपणी देण्यात आली, त्यामध्ये हे सारे शब्द दर्शन देतात. आमच्या अधू दृष्टीला जेवढे नजरेस पडले, ते आम्ही येथे दिले. त्याहून अधिक (अशुद्ध) शब्द त्यामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाचे म्हणजे ज्या पत्रकार बैठकीत ही टिपणी बोरूबहाद्दरांच्या हाती देण्यात आली, त्या बैठकीस एक ख्यातकीर्त समीक्षक, माजी संमेलनाध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी त्याबद्दल काही अस्वस्थता व्यक्त केली किंवा कसे, याचा तपशील मिळाला नाही.

त्याहून अधिक महत्त्वाचे (आणि अर्थातच गमतीचे) म्हणजे, ठाले पाटलांनी अशुद्ध लेखनामुळे ज्या पत्राबद्दल संताप व्यक्त केला होता, त्यात उल्लेखिलेल्या मानाच्या, प्रसिद्ध वगैरे पुरस्काराची ही वृत्तपत्रीय टिपणी आहे.

हे एवढे साधे शब्द अगदी ठरवून अशुद्ध वापरल्यावर संबंधितांना `पद्मश्री`, `पद्मभूषण` आदी किताब पदवीसारखे नावामागे (किंवा नावाआधी) लावायचे नसतात; मानद डॉक्टरेटबद्दल `डॉ.` वापरायचे नसते; `नामदार` हे नावामागे वापरण्यासाठी नसून, त्या पदाबद्दल वापरायचे असते, इत्यादी तपशील माहीत असण्याचे कारणच नाही.

या दीर्घ (आणि बहुअशुद्ध) वृत्तपत्र टिपणीत आणखी काही विनोद आहेत. ते तपशिलाचे आहेत आणि वाक्यरचनेचेही आहेत. उदाहरणार्थ...

1) `अश्‍वमेध` या कांदबरीच्या माध्यमातून गेल्या अर्धशतकामधील समाजाच्या ऱ्हासाचे चित्रण शब्दबध्द करतांनाच राजकारण, सत्ताकारण, शिक्षण, कला, पत्रकारीता, कौटुंबिक व सार्वजनिक जीवन आणि मानवी नातेसंबध अशा सर्वच स्तरावर सुरु असलेल्या अधःपतनावर जळजळीत वास्तवाचे अंजन घालून समाजाला खडबडून जागे करण्याचा यशस्वी प्रयत्न डॉ. शोभणे यांनी केला.

(वास्तविक `अश्‍वमेध` म्हणजे तीन कादंबऱ्यांच्या मालिकेतील दुसरा खंड आहे. या तीन कादंबऱ्यांचा एकूण कालावधीच 25 वर्षांचा (आणीबाणी-1975 ते 2000) आहे. आणि त्यातही `अश्‍वमेध`मध्ये येणारा कालखंड जेमतेम सात वर्षांचा आहे. मग हे अर्धशतक कुठून आले? आणि `यशस्वी प्रयत्न` असेल, तर `अयशस्वी प्रयत्न` म्हणजे काय असतो बुवा?)


2) ...त्याचे विश्‍लेशन करुन आजचे सामाजिक संदर्भ एकनाथ ढोणे यांनी आधोरेखीत केली.

3) वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून कीर्तन परंपरा जोपासतांनाच पंढरपुर येथे निराधारांसाठी उभारलेल्या सेवाव्रती कार्य करतांनाच...

(आता वरील दोन्ही उदाहरणांबद्दल अधिक काही लिहावे का?)

4) श्रीनिवास भणगे - उत्तम अभिनयाव्दारे रसीक मनावर आधिराज्य गाजविणाऱ्या या कलाकाराने केलेल्या नाट्य सेवेचा विचार करुन...

(भणगे अभिनयाबद्दलही पुरस्कार देण्याएवढे प्रसिद्ध आहेत, ही माहिती आम्हाला या `विखिपीडिया`मधूनच समजली!)

आता साहित्याचा आणि शुद्धलेखनाचा काय संबंध आहे, (किंवा `संबंधच काय!`) असे कोणी म्हटले म्हणजे बोलणेच खुंटले! (आधी असे ठरविले होते की, या मजकुरातील अशुद्ध शब्द ठळक करावेत. तसे करून पाहिल्यावर (ठळकपणे) असे लक्षात आले की, त्यामुळे जवळपास साडेशहाण्णव टक्के शब्द ठळकच होत आहेत. आपली गणना उगीच कोणी साडेतीन टक्क्यांमध्ये करायला नको म्हणून ते टाळले, एवढेच.)

रविवार, १९ जुलै, २०१५

सत्संग!


गोष्ट तशी फार जुनी नाही. नेमकं सांगायचं तर दोन वर्षं नि एक महिन्यापूर्वीची आहे आणि तीन दिवसांपूर्वीची आहे. म्हणजे 13 जून 2013 रोजीची आणि 15 जुलै 2015 रोजीची. गोष्ट एका पुस्तकाची आहे आणि त्यामुळे भेटलेल्या एका वेगळ्या माणसाची आहे.

माझ्या मुलाचे मामा श्री. अशोक कानडे यांनी 13 जून 2013 रोजी माझ्या वडिलांना एक पुस्तक भेट दिलं. पुस्तकाचं नाव - "हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन'. लेखक - श्री. एम्.. अनुवादक - श्री. वि. पटवर्धन. आवृत्ती तिसरी. पाने - 362. किंमत 295 रुपये.

या पुस्तकाचा विषय पूर्णपणे अध्यात्माचा. अर्थातच तो आपला नाही, असं समजून पुस्तक हातात घेतलं आणि ठेवून दिलं. अध्यात्म, योग, साधू, चमत्कार या विषयाची आवडच असावी लागती. वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी. मुलगा मला परवा परवापर्यंत "नास्तिक' म्हणत होता. आस्तिक आहोत की अज्ञेयवादी, याच्या उत्तराचा शोध माझ्यापुरता चालू आहे. "नास्तिक' म्हणवून घ्यायला आवडलं असतं; पण तेवढा मनाचा खंबीरपणा नाही अजून. तो येईल की नाही, हे सांगणं कठीण आहे. असो!

वडिलांनी श्री. एम. यांचं आत्मकथन वाचून पूर्ण केलं. एकदा असंच कधी तरी वाचायला नवं काहीच नव्हतं आणि तेव्हाच श्री. एम. यांचं आत्मकथन हाती लागलं. त्यातली काही पानं वाचली. जरा वेगळी वाटली. श्री. एम. नावाच्या माणसाचा प्रवास, त्याला आलेले थरारक अनुभव - काही अद््भुत आणि अविश्वसनीय वाटण्याच्या कोटीतील, एका वेगळ्या जगाच्या प्रवासाचं आपल्या नेहमीच्या भाषेत वर्णन... नक्कीच वाचनीय आहे हे सारं, असं वाटलं. तरीही ते पुस्तक एका बैठकीत हातावेगळं करावं असं नाही वाटलं.

आमचा एक साधा-सरळ-सज्जन मित्र लक्ष्मीकांत दिवाणी ऊर्फ लखू पटेल अलीकडच्या सात-आठ वर्षांत याच अध्यात्माच्या रस्त्याकडं वळला आहे. वडिलांनी ते पुस्तक त्याला वाचायला दिलं.

साधारण सहा-सात महिन्यांपूर्वी कधी तरी "श्री. एम.' नगरमध्ये येऊन गेल्याचं कळलं-वाचलं आणि पुस्तक आठवलं. त्यांना भेटायला हवं होतं, असं वाटलं. लखू पटेलनंच महिनाभरापूर्वी बोलता बोलता श्री. एम. पुन्हा नगरला येणार असल्याचं सांगितलं. त्यांचं आत्मकथन वाचून पूर्ण झाल्याचंही त्यानं सांगितलं आणि आठवड्याभरात ते पुस्तक परत दिलं.

पुस्तक परत आलं आणि ते वाचायला घेतलं. माझ्या पद्धतीनं अधली-मधली पानं वाचत राहिलो. थोडा अधिक रस निर्माण झाला. श्री. एम. नगरमध्ये तीन दिवस थांबणार आहेत, तेव्हा त्यांच्याशी बोलता येईल का, त्यांची मुलाखत घेता येईल का, असं वाटलं. म्हटलं बघू या. आणि मग मंगळवारी (१४ जुलै) बातमी आली, त्यांच्या पदयात्रेचं राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि हिवरेबाजारच्या पोपट पवार यांनी स्वागत केल्याची. अरेच्चा! आले की ते. नगरमध्ये काय कार्यक्रम आहे, किती दिवस आहेत, हे पाहायला पाहिजे, असं मनात आलं. पण ते तेवढ्यापुरतंच.

दुसऱ्या दिवशी, बुधवारी (१5 जुलै) कार्यालयात गेल्यावर लगेच समजलं की, श्री. एम. हिवरेबाजारमध्ये आहेत. तिथं संध्याकाळी ते गावकऱ्यांशी बोलणार आहेत. छायाचित्रकार दत्ता इंगळेनं हे सांगितलं. त्यांच्या पदयात्रेचं - कन्याकुमारी ते काश्मीर आशा-यात्रेचं माहितीपत्रक दिलं आणि विचारलं, ""येता का? जाऊ आपण.''  ते शक्य वाटत नव्हतं. मग पोपट पवारांशी संपर्क साधून तक्रार केली - काय हे? एवढी मोठी माणसं येतात आणि तुम्ही साधं सांगतही नाही. पोपट जुना मित्र. त्यानं लगेच यायचं आमंत्रण दिलं. "आता जमणं अवघडच,' असं सांगून गप्प बसलो.

पण राहवत नव्हतं. चमत्कार वगैरे सोडून द्या; पण त्या अफाट आत्मकथनातले काही प्रसंग आठवत राहिले. श्री. एम. यांना भेटावं आणि बोलावं, असं वाटत राहिलं. जाऊ की नको? उलघाल. अस्वस्थता. सहकारी दीपक रोकडे यानं जोर लावला. हिवरेबाजारला निघालो. साथीला दत्ता. तोच सारथी. नंतर छायाचित्रकाराच्या भूमिकेत.

आत्मकथन पूर्ण वाचून झालेलं नाही. त्यांच्या पदयात्रेच्या माहितीपत्रकावरून फार काही माहिती मिळत नाही. अध्यात्म, योगशास्त्र याबद्दल काहीच माहिती नाही. श्री. एम. यांना काय विचारायचं? कसं विचारायचं? त्यांच्याकडून काय जाणून घ्यायचं आणि नंतर ते कसं मांडायचं? अस्वस्थ वाटू लागलं. मनात आलं, निघालो नसतो तर बरं झालं असतं.

हिवरेबाजारमध्ये साडेपाचच्या सुमारास पोहोचलो आणि अर्ध्या तासात ग्रामसंसदेच्या पटांगणात श्री. एम. आले. सोबतीला पोपट पवार होतेच. त्यांनी लगेच ओळख करून दिली. प्रेमानं हसले ते. माझ्याजवळ असलेलं त्यांच पुस्तक त्यांनी दुरूनच ओळखलं होतं. दाक्षिणात्य पद्धतीने गुंडाळलेली पांढरी लुंगी, पांढरा सदरा, गळ्यात उपरणं, उलटे वळविलेले केस, पांढरी दाढी, कपाळी बहुतेक पिवळं गंध आणि पायात निळे बूट. नाक एकदम धारदार. इंदिरा गांधी यांच्या नाकाची आठवण करून देणारं.

पण एकूण व्यक्तिमत्त्व काही साधू-संत-योगी यांच्यासारखं वाटत नव्हतं. आपल्या घरातला माणूस वाटत होता तो.

साधा, सज्जन, सात्त्विक. परका न वाटणारा.

श्री. एम. व्यासपीठावर बसले. पुस्तकावर त्यांची सही घेतली. आशीर्वादांसह सही.

कार्यक्रम सुरू झाला. पोपट पवार बोलले. मग गावकऱ्यांतर्फे श्री. एम. यांचा सत्कार. फेटा बांधून. गळ्यात हार घालून घेतला. मानपत्र स्वीकारलं. मग बोलायला उभे राहिले, तेव्हा हार काढून ठेवला. सत्संग. म्हटलं हे अध्यात्माविषयी बोलतील. आपल्याला पचायला जडच जाणार.

श्री. एम. यांनी मृदू, हळुवार आवाजात बोलायला सुरुवात केली. पंधरा-एक मिनिटं बोलले. त्याच संथ लयीत. कुठे चढ-उतार नाही. आवेश नाही. भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवण्याची वक्तृत्वकला नाही. पण ठामपणे. "भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी...आज चालू या सोबतीनं' असं ब्रीद असलेल्या पदयात्रेची माहिती दिली. बोलण्यात महात्मा गांधी, वेद, उपनिषदे, गावे, गावांचा विकास, तरुण असे सगळे मुद्दे येऊन गेले. कार्यक्रम संपला.

श्री. एम. यांनी पत्रकारांसाठी थोडा वेळ द्यावा, अशी विनंती पोपट पवारांनी केली. त्यांनी ती मान्य केली. त्यांच्याशी बोलू इच्छिणारा, काही जाणून घेऊ पाहणारा तसा मी एकटाच होतो. हिवरेबाजारच्या ग्रामसंसदेच्या सभागृहात आमची बैठक जमली.

आध्यात्मिक गुरू असलेले श्री. एम. मूळचे मुमताजअली. तारुण्यातच अध्यात्माकडे ओढले जाऊन ते नाथपंथीय बनले.  गुरूंनी त्यांचं नामकरण "मधुकरनाथ' केलं. पण "श्री. एम.' हे प्रचलित नाव. संन्यासी नव्हे, संसारी. त्यांच्याशी संवाद सुरू होण्यापूर्वी या साऱ्याची उजळणी केली. पुस्तकात वाचलेले काही प्रसंग लक्षात आहेत ना, हे आठवून पाहिलं.

महत्त्वाचं एक कुतुहल होतंच. श्री. एम. जन्माने मुस्लिम. आजही ते मुस्लिम असल्याचं नाकारत नाहीत. रमजानचा महिना सुरू. आणि हा माणूस हिंदू अध्यात्मावर अधिकारानं बोलतो. तेच जाणून घ्यायचं होतं.

तरीही पहिला प्रश्न स्वाभाविकपणे पदयात्रेबद्दलचा. शांतता आणि एकात्मता या उद्देशानं काढलेली ही "आशा-यात्रा.' त्यात तीन हजार किलोमीटर अंतर कापल्यानंतर काय वाटतं, अनुभव काय आहे? श्री. एम. म्हणाले, ""अनुभव चांगलाच आहे. लोक प्रेम करतात, हेच कुठेही गेलो तरी पाहायला मिळाले. जिथं जिथं चांगलं काम सुरू आहे, तिथं तिथं आजपर्यंतच्या प्रवासात जात आलो. समाजातील ऐक्‍य आणि गावांचा विकास यांचा फार जवळचा संबंध आहे. महात्मा गांधी यांनी तेच सांगितलंय. त्याचा विसर पडल्यामुळेच आज परिस्थिती काहीशी वाईट झाल्याचे दिसते. पण तरीही मला चित्र आशादायीच दिसतंय. पुण्यात आम्ही उपवास केला. शनिवारवाड्यासमोर बसलो होतो. किती वेगवेगळे लोक आले होते तिथं.''

समोरच्याचा प्रश्न ऐकून घेण्यास श्री. एम. उत्सुक. पदयात्रेच्या कल्पनेविषयी विचारल्यावर ते उत्साहानं सांगू लागले. "माणसानं चाललंच पाहिजे. मी ज्या घरात जन्मलो, तिथे तेव्हापासूनच गाड्यांचा वापर पाहत आलो. चालायला हवं, हे मला लहानपणीच समजलं. हिमालयात असताना गुरू महेश्‍वरनाथ यांनी मला तसाच संदेश दिला होता. ते म्हणाले होते, "परिस्थिती अशी येईल, की धर्माचा झेंडा घेऊन लोक रस्त्यावर येतील. त्यामुळे तुला एक दिवस कन्याकुमारीपासून काश्‍मीरपर्यंत चालत जावंच लागेल.' खरं तर दोन्ही धर्मांचा आत्मा एकच आहे. कबिरांनीही ते सांगितलं आहे. पण गुरूंनी सांगितलेले खूप वर्षांपासून मनात होते. पण अनामिक भीतीमुळे ही कल्पना कागदावर उतरवत नव्हतो. माझं वय आता 66 आहे. असंच तीन-एक वर्षांपूर्वी कधी तरी विचार करत होतो. लक्षात आलं की, वय वाढतंय. पदयात्रा आता नाही काढायची तर कधी? आधी ठरवलं की, एकटंच चालत राहायचं. मग एके दिवशी सहज कर्नाटकाच्या माजी पोलिस महासंचालकांना मनातलं बोलून दाखवलं. ते म्हणाले, "मीही येणार.' त्यांची पत्नी म्हणाली, "मी का नाही? मीही येते की!' झालं. असं करत करत माणसं वाढत गेली. और फिर कारवाँ बनता गया... यात्रेत आमचा 60-70 माणसांचा गट आहे. कधी कधी दीड-दोनशे मंडळी होतात. जेवण्याची-राहण्याची सोय स्थानिक मंडळी करतात. कसली अडचण येऊ देत नाहीत.''

जन्माने मुस्लिम असलेल्या या योगीयाच्या तोंडी सतत दाखले असतात उपनिषदे, वेद यांचे. हे सारं अडचणीचंच. त्याबद्दल विचारल्यावर श्री. एम. हळुवार हसले. म्हणाले, ""होय! ही तारेवरची कसरतच आहे. पण मी द्विधा नव्हतोच कधी. ना मैं इस्लाम की सोचता हूँ; ना हिंदू की। मैं सिर्फ आदमी के बारे में सोचता हूँ। या साऱ्या प्रवासात वेगवेगळे छोटे-मोठे गुरू लाभले. त्यातील एका स्वामींनी एकदा विचारले होते, "तुम्ही रोज पाच वेळा नमाज पढता का?' त्यांना मी म्हणालो, "माझा नमाज 24 तास सुरूच असतो. कारण मी सर्वांना नमस्कार करीत असतो.' "नमाज' अरबी नव्हे, तर पर्शियन शब्द आहे. संस्कृत "नमः' म्हणजे नमस्कार. त्यापासूनच "नमाज' बनला आहे.'' बोलता बोलता त्यांनी भाषेचा अभ्यास सहज दाखवून दिला. संस्कृत का महत्त्वाची भाषा आहे, हेही सांगून टाकलं.
जरा भीत भीतच विचारलं - तुम्हाला कधी कुणी "काफीर' म्हणून हिणवलं नाही का? खळखळून हसले ते.

मोक्षाची गोष्ट सांगणाऱ्या अध्यात्मातील मंडळींना गेल्या काही वर्षांपासून राजकारणात "अच्छे दिन' आले आहेत. मनात शंका होतीच की, श्री. एम. त्यापासून दूर कसे? की त्यांचीही विशिष्ट कोणत्या पक्षाशी-विचारसरणीशी जवळिक आहे? धाडस करून विचारलंच त्यांना - अध्यात्मातील "गुरू' बनल्यावर राजकारणात येण्याची आमंत्रणं नाही का आली?

या भाबड्या प्रश्‍नावर श्री. एम. यांचं आधी उत्तर एका स्मितहास्याचं. मग म्हणाले, ""तो माझा मार्ग नव्हे. मी सगळ्यांना भेटतो. सगळ्यांशी चर्चा करतो. पण राजकारणात उतरायला माझा नकारच.''

एकदा भूमिका कळली. मग पुढचा प्रश्न विचारायला फारसं धाडस बांधावं लागलं नाही. सध्याच्या राजकारणातील साधू-संत-महंत यांच्या गर्दीविषयी विचारलं. त्याबद्दल त्यांची मतं पक्की आहेत. सूचकपणे ते म्हणाले, ""कपड्यांवरून कोणी साधू नाही होत. साधुत्वाचे गुण महत्त्वाचे. ते एक दिवसात किंवा एक तासात कळणार नाही. साधू म्हणवून घेणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे.''

राजकारण, क्रिकेट, सिनेमा, गुन्हेगारी आणि अध्यात्म हे सध्याचे चलतीचे विषय आहेत. या सगळ्याच गोष्टी विकल्या जातात. अध्यात्माचा बाजार मांडलेला पाहायला दिसतो. हे दुकान, तो मॉल... श्री. एम. यांना विचारलं, अध्यात्माचं बाजारीकरण झालं आहे का हो? उत्तर दिलं त्यांनी. पण तेव्हा बोलताना खंत जाणवत होती त्यांच्या आवाजात. म्हणाले, ""खरं आहे हे. पण कोण कुणाला सांगणार? ध्यान पैसे देऊन विकतात. असं असतं का कधी?''

कुंभमेळा हौशा-नवशांची फार गर्दी वाटते नाही का, असं एक सरसकट विधानही मी बोलता बोलता करून टाकलं होतं. त्यालाही श्री. एम. यांनी हात घातला. ""तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. कुंभमेळ्याचा मूळ उद्देश फार वेगळा होता. ठरावीक वर्षांनी साधू-संतांनी एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करावी यासाठी कुंभ सुरू झाला. आताचं...जाऊ द्या झालं.''

फेटा बांधल्यामुळं श्री. एम. काहीसे अवघडलेले होते. बोलता बोलता त्यांनी दोनदा विचारलं, ""हे आता काढून ठेवलं तर चालेल का?'' काही संबंध नसताना मीही त्यांना मोठ्या औदार्याने तशी "परवानगी' देऊन टाकली. वेळ संपत होती. विचारण्यासारखं माझ्याकडेही फार काही राहिलं नव्हतं. कोणताही अभ्यास नसलेल्या, त्यांच्या विषयाची जाण नसलेल्या एका पत्रकाराला श्री. एम. यांनी भरपूर वेळ दिला होता. सगळ्या प्रश्नांना त्यांनी शांतपणे उत्तरं दिली.

या देशाच्या, या समाजाच्या भवितव्याविषयी फार आशावादी आहेत ते. माणसं माणसांशी माणसासारखंच वागतील, अशी आशा आहे त्यांच्या मनात. एवढा वेळ बरोबर घालवल्यानंतर काही गोष्टी लक्षात राहिल्या - या माणसाला अध्यात्माबद्दलचा अभ्यास आणि अधिकार दाखवण्याची हौस नाही. अतिशय मृदू स्वरातलं त्यांचं बोलणं. आणि अर्थात त्यांचं साधेपण, सच्चेपण!

--------
योग आणि इस्लाम
अलीकडेच जागतिक योग दिन साजरा झाला. त्यावरून दोन-तीन आठवडे जोरदार वादही रंगला. योग इस्लामविरोधी आहे, असा गवगवा करण्यात आला. याबद्दल श्री. एम. यांना विचारावं असं ठरवलंच होतं. तसं ते भीत भीत विचारलंही. त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं. योगशास्त्र इस्लामच्या विरोधात आहे, हे त्यांना मुळीच मान्य नाही. ते म्हणाले, ""योग भारतात हजारो वर्षांपूर्वी जन्मलेलं, सगळ्यात मोठं शास्त्र आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून मी रोज अर्धा ते पाऊण तास योगासने आणि प्राणायम करतो. योग आणि शाकाहार, हेच माझ्या प्रकृतीचं रहस्य. या भारतीय संस्कृतीला "हिंदू संस्कृती' असं लेबल लावणं गैर आहे. योगासनात कुठे आहे धर्म आणि देव? चित्तवृत्तीचा निरोध हेच "योगसूत्र' आहे, असे पातंजली ऋषी यांनीच लिहून ठेवले आहे. तुम्हाला सूर्यनमस्कार मान्य नाही. ठीक आहे; अन्य आसनं करा ना मग. आणि नाही तरी सूर्याकडे पाहून नमस्कार घालायला आजच्या फ्लॅटसंस्कृतीत कुणाच्या घरातून सूर्य दिसतो? नमाजात योगासनं आहेतच आहे. समजा प्रकृतीसाठी डॉक्‍टरने योगासनं करण्याचा सल्ला दिला, तर तो तुम्ही ऐकणार नाही? जगण्यासाठी आवश्यक ते करण्याचं नाकारणं हेच मुळी इस्लामला मान्य नाही. आता कम्युनिस्टांसाठी योगशास्त्रावर एक पुस्तक लिहिण्याचा मी विचार करतो आहे.''

ग्रामविकासातील कर्मयोग
ग्रामविकासाचं आधुनिक तीर्थक्षेत्र झालेल्या हिवरेबाजारमध्ये आशा-यात्रा दिवसभर होती. श्री. एम. आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसभर गावात सगळीकडे फिरून झालेलं काम पाहिलं. त्यांना ते आवडलंही फार. एकात्मता आणि गावचा विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असंच त्यांचं मत आहे. ते म्हणाले, ""महात्मा गांधींनी सांगितलेलं काम पोपटराव पवार इथं करीत आहेत. असं काम करणारेच साधू-कर्मयोगी असतात. तमाशा करनेवाले साधू कम होने चाहिए। गावे विकसित झाली, तर शहरात कोण कशाला जाईल? नेमकं हेच काम इथं होतंय. ते पाहून खरोखर समाधान वाटतं. आणि म्हणून तर देशाच्या भविष्याविषयी आशा वाटते. पूर्वी ज्ञानसंपादनासाठी जगातून मंडळी भारतात येत. ती परिस्थिती पुन्हा येईल, ज्ञान मिळविण्यासाठी परदेशातील लोक या देशात येत राहतील, असंच स्वप्न मी पाहतो आहे.''

"एम' म्हणजे मसाला डोसाही!
हिवरेबाजारच्या गावकऱ्यांशी संवाद साधताना "एम.' म्हणजे नेमकं काय, हे श्री. एम. यांनी सांगितलं. "एम.' म्हणजे - मधुकरनाथ, मुमताजअली खान आणि मानवही! अशाच आणखी एका "एम'चा उल्लेख त्यांच्या आत्मकथनात आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. अरुंधती गुहेमध्ये ध्यान करताना एके दिवशी त्यांच्या डोळ्यांसमोर मसाला डोसाच येत होता. ते त्यांच्या गुरूंनी जाणलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषिकेशमधील "मद्रास कॅफे'मध्ये श्री. एम. यांनी पोटभर डोसे खाल्ले आणि त्यानंतर त्यांची त्याबद्दल तीव्र इच्छा उरली नाही! त्यांना डोशाबद्दल विचारायचं मी ठरवलं होतंच. त्याप्रमाणं "अजूनही डोसा खाता का?' असं विचारण्याचं धाडस केलंच. प्रश्न विचारला आणि त्यांना हसू फुटलं. म्हणाले, ""ते पुस्तकात लिहिल्यापासून सगळे जण मला डोसाच खाऊ घालू पाहतात. मी अजूनही डोसा खातोच. पण त्याबद्दलची आसक्ती तेव्हाच संपून गेली.''

----------------------
(टीप  : या विषयावर लिहिणं हे माझं धाडसच! पण ते केलं खरं. श्री. एम. यांच्याशी साधलेल्या संवादाच्या आधारे दैनिक सकाळच्या नगर आवृत्तीमध्ये एक छोटेखानी लेख लिहिला. त्याचंच हे विस्तारित रूप. या लेखाचा उद्देश, नेमकं काय सांगायचंय याबद्दलची अनभिज्ञता, लिहिण्याची शैली... हे सारं जमलंय की नाही, याबद्दल साशंकता आहे. अशा विषयावर लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. त्यामुळं अपुरेपण, काही हून गेल्याची हुरहूर जाणवतेच.)

(छायाचित्रे - दत्ता इंगळे)
----------------------
#श्री_एम #सत्संग #अध्यात्म #अध्यात्म_गुरू #योग_इस्लाम #हिवरेबाजार #वेद_उपनिषदे #आशा_यात्रा #मसाला_डोसा #ग्रामविकास #पोपट_पवार

शनिवार, १८ जुलै, २०१५

मुंबईत घडलेल्या
`नाट्यमय` प्रसंगाने
एक गोष्ट सिद्ध केली...
`शाकाहार` नेहमीच
`सात्त्विक` आहार असतो, असे नाही.
--------
`शुद्ध शाकाहारी` आम आदमी

गुरुवार, १६ जुलै, २०१५

...आधी अकाउंट तरी उघड!

`व्हॉट्सअॅप`वर सध्या फिरणाऱ्या विनोदावरून सुचलेला एक `ई-नोद`

चिंतू कायम चिंतेत असतो. इ-लोकप्रिय झाल्याचं स्वप्न तो दिवसाही पाहत असतो. पण ते पूर्ण कसं नि कधी होणार, हेच त्याला नेमकं कळत नाही. फेसबुकावरच्या आपल्या `पोस्ट` `व्हायरल` झाल्या आहेत, त्या अनेकांनी शेअर केल्या आहेत आणि त्यावरून एखादी बातमी जन्म घेते, तिचा नायक म्हणून आपला फोटो छापून येतोय, एखादं टीव्ही. चॅनेल आपली मुलाखत घेतेय, असं स्वप्न तो पाहत असतो.

पण स्वप्न काही सत्यात उतरत नाही. असं का घडत नाही आणि ते कधी घडणार, हाच प्रश्न चिंतूचं काळीज (हृदय नव्हे, यकृत!) पोखरून टाकतो. आपल्या `पोस्ट`ला पाचशे `लाईक` आणि शंभर-सव्वाशे `कमेंट` कशा मिळणार, याचाच त्याला सततचा ध्यास.

विचार करकरूनही चिंतूला उत्तर काही सापडत नाही. अखेर देवाला शरण जायचं तो ठरवतो. गुरू कुंभेत गेल्याचा मुहूर्त साधून तो जपजाप्य सुरू करतो. नाना देवांचा धावा करतो.

एकूण तेहेतीस कोटी देव असूनही, त्यातला एकही पहिल्या आठवड्यात तरी चिंतूला काही प्रसन्न होत नाही.

अधिकच अस्वस्थ झालेला चिंतू आपल्या भक्तीची तीव्रता वाढवितो. जपाच्या माळेतील मणी अधिक वेगाने फिरू लागतात.

दुसराही आठवडा भाकड जातो. सव्वा अब्जांपैकी कुणाकुणाकडे देव तरी धावणार हो?

आता चिंतू ठरवतो. आर या पार. नाऊ अॉर नेव्हर. तो मग सृष्टीच्या निर्मात्याला, साक्षात ब्रह्मदेवालाच साकडं घालतो - `या आठवड्यात मी इ-पॉप्युलर झालोच पाहिजे. नसेल जमत तर अन्नत्याग करून प्राणत्याग करीन.`

चिंतूच्या उपवासाचा पहिला दिवस जातो आणि तिकडे वर ब्रह्मदेव अस्वस्थ होतो. चिंतूचे प्राण हकनाक जाणार याची काळजी त्याला वाटू लागते. त्याच तिरीमिरीत तो चिंतूकडे जातो आणि चिडून म्हणतो, `अरे माझ्या बाबा. करतो तुझी इच्छा पूर्ण. पण आधी फेसबुकवर अकाउंट तरी उघड!`

डायरीची चाळता पाने...

थोडी आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी ना...