Monday 26 February 2018

सरकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखक आणि चिंता (अ. भा. आवृत्ती)


(वडोदरा विशेष - १)
----

उद्घाटनाच्या कार्यक्रमात गायकवाड आणि मंडळींनी रंगविलेली मैफल. सनई आणि जलतरंग यांची जुगलबंदी अफलातूनच!

सयाजीराव महाराजांच्या वडोदऱ्यात गेल्या आठवड्यात झालेलं साहित्य संमेलन अतिशयोक्ती अलंकाराच्या दोन उदाहरणांच्या वापरांपासून लांब राहिलं - साहित्यपंढरीच्या वारकऱ्यांची उच्चांकी गर्दी आणि पुस्तकविक्रीची कोटीची उड्डाणे’! अलीकडच्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्यांना लावण्याची ही हमखास विशेषणं. ती इथे वापरली गेली नाहीत हे खरं; पण या भाषिक अलंकारांचा मोह संबंधितांना टाळता आला नाही तो नाहीच. समारोपाच्या कार्यक्रमात ते दिसलं. अध्यक्षीय भाषणाचं (जोरकस) कौतुक करताना साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी या संमेलनाची (आणि त्याच वेळी संमेलनाध्यक्षांचीही?) तुलना थेट आणीबाणीच्या काळात कऱ्हाडला झालेल्या संमेलनाशी केली. येथून पुढची संमेलने गर्दीची नव्हे, तर अशीच दर्दींची होतील, असंही म्हटलं गेलं. दर्दी-गर्दीबद्दल बोलल्यानंतर पुढे कार्यशाळांना मिळालेला तुडुंब प्रतिसाद संमेलनाचं वैशिष्ट्य असल्याचं नमूद करण्यात आलं.

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीत झालेलं हे संमेलन बऱ्याच अर्थांनी वेगळं ठरलं. मंडप न उभारता, प्रशस्त क्रिकेट मैदानात झालेला उद्घाटनाचा कार्यक्रम आणि बंदिस्त सभागृहात उरकलेला समारोप ही वैशिष्ट्यं सांगतानाच दोन्ही कार्यक्रम किमान तासभर उशिरानं सुरू झाले, याचीही नोंद करायला हवी. दोन्ही कार्यक्रम रेंगाळले आणि अध्यक्षीय भाषण, अध्यक्षांचं समारोपाचं भाषण पूर्ण होण्याच्या किती तरी आधीच श्रोत्यांच्या संख्येला गळती लागल्याचं दिसलं. खुले अधिवेशन संपण्यापूर्वीच महामंडळाशी संलग्न साहित्य संस्थांचे बरेच पदाधिकारी व्यासपीठावरून पायउतार झाले. अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचं भाषण सुरू असताना व्यासपीठावरच्या निम्म्या खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. पदाधिकाऱ्यांचं हे वागणं सभाशास्त्राच्या संकेताला धरून नव्हतं. तुम्ही चुकत आहात, असं त्यांना कोण सांगणार?

संमेलनाच्या सगळ्यांत मोठ्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अध्यक्षीय भाषण, असं साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी समारोपाच्या कार्यक्रमात जोरदारपणे सांगितलं. अध्यक्षांवर कौतुकाचा वर्षाव करताना ते म्हणाले, ‘‘ठाम आणि लक्षणीय भूमिका घेण्याचं मराठी लेखक विसरला होता. ते लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलं. भूमिका न घेणाऱ्या लेखकाच्या संप्रदायाला या भाषणाने बाजूला सारले!’’

ग्रंथदिंडीत सहभागी झालेले संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख.
डॉ. जोशी यांनी ज्याचं भरभरून कौतुक केलं, त्या अध्यक्षीय भाषणानं माध्यमांना पुरेपूर खाद्य दिलं, हे नक्की. संमेलनाला आलेल्या सर्वसामान्य प्रतिनिधींमध्ये आणि मोजक्या लेखकांमध्ये नंतर या भाषणाची किती चर्चा झाली, हे सांगणं कठीण आहे; पण माध्यमांना त्यानं अजून काही काळ पुरणारं भांडवल निश्चितपणे दिलं. देशमुख यांनी राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजेस., असं म्हणण्याचं धाडस (हा शब्द त्यांचाच) केलं. गुजरातच्या भूमीवर हे धाडस केलं, याकडे विशेषत्वाने लक्ष वेधण्यात आलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी हे ऐकवलं, असंही प्रसिद्ध झालं. पंतप्रधानांच्या गुजरातेत झालेल्या मराठी संमेलनातल्या या भाषणानं सत्ताधारी पक्षाचे कान (परस्पर) टोचले गेले, याचा भलताच आनंद अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कडव्या पाठीराख्यांना झाला. तथापि, हा चुकणारा राजा विद्यमान नसून सार्वकालिक असल्याचं संमेलनाध्यक्षांनीच म्हटल्याची बातमी नंतर प्रसिद्ध झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भक्तांचं त्याबद्दलचं मत काही वाचण्यात आलं नाही.

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर येण्याची चिन्हं दिसू लागताच (याला भीती वाटू लागताच असंही म्हणता येईल!) या ना त्या प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा चर्चेत येऊ लागला, आणला जाऊ लागला. सरकार सत्तेवर येऊन पावणेचार वर्षं झाल्यानंतरही त्यात फरक पडलेला नाही. त्याचंच दर्शन वडोदऱ्याच्या साहित्य संमेलनात घडलं. अध्यक्षीय भाषणामुळे देशमुख हीरो ठरले. त्यांचं हे छापील भाषण (त्या पुस्तिकेचा आकार भाषा आणि जीवन नियतकालिकाचा) ५२ पानांचं. त्यात प्रास्ताविक, माझी साहित्याची भूमिका व माझे साहित्य चिंतन, आजचे आपले अस्वस्थ वर्तमान, कलावंताची अभिव्यक्ती व व्यापक सांस्कृतिक स्वातंत्र्य, मराठी भाषेच्या विकासाची भावी दिशा, वाचन संस्कृती वाढविण्यासाठीची नीलप्रत, बृहन्महाराष्ट्राचे प्रश्न व उपाय योजना आणि समारोपाचे विवेचन अशी आठ प्रकरणे आहेत. त्यापैकी अस्वस्थ वर्तमान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन प्रकरणांवरच (साधारण साडेचौदा पानं) प्रकाशझोत पडला. उर्वरित साडेसदतीस पानांमध्ये त्यांनी जे मांडलं, ते फारसं उपयोगी नव्हतं किंवा तेवढी दखल घेण्याजोगं नव्हतं? काय अर्थ लावायचा? त्यांची साहित्यविषयक, वाचन-संस्कृतीविषयक भूमिका एवढी अदखलपात्र का ठरावी?

राजा कुठे, कसा चुकतो आहे, त्या चुका कशा सुधारता येतील, याबद्दल देशमुख यांनी केलेल्या विवेचनाबद्दल बरंच काही लिहून आलं, येत राहील. वर्तमानामुळे ह. ना. आपटे यांच्या काळ तर मोठा कठीण आला.. या दीर्घकथेची आठवण आल्याचं त्यांनी नमूद केलं. व्यवस्था माणसाचा आवाज दाबू पाहते, तेव्हा तो आवाज बनणं लेखकाचं काम असतं, असंही त्यांनी सांगितलं. सर्वच काळातील राजांबद्दल बोललो असं नंतर सांगणाऱ्या देशमुख यांनी आजचं अस्वस्थ वर्तमान असा वर्तमानकालीन उल्लेख करणं सूचक आहे. काही निवडक घटना (ठळकपणे) मांडून त्यावरून निष्कर्ष काढणं, हे काही नवं नाही. अध्यक्षीय भाषण त्याचंच निदर्शक आहे. गो-हत्याबंदीचा उल्लेख करताना त्यांनी (स्वातंत्र्यवीर) सावरकरांच्या गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे या विधानाचा दाखला दिला. गुजरातच्या भूमीत बोलताना महात्मा गांधी यांच्या विविध विधानांची उदाहरणं देताना त्यांची गायीबद्दल काय भूमिका होती, याकडे देशमुख यांचं लक्ष गेल्याचं दिसत नाही. महात्मा गांधी लिहितात - THE COW is a poem of pity. One reads pity in the gentle animal. She is the mother to millions of Indian mankind. Protection of the cow means protection of the whole dumb creation of God. The ancient seer, whoever he was, began with the cow. The appeal of the lower order of creation is all the more forcible because it is speechless. (YI, 6-10-1921, p. 36)  (संदर्भ : http://www.mkgandhi.org (Comprehensive Website by Gandhian Institutions-Bombay Sarvodaya Mandal & Gandhi Research Foundation)). अर्थात महात्मा गांधी यांनी असंही लिहिलं आहे की, I would not a kill a human being for protection a cow, as I will not kill a cow for saving a human life, be it ever so precious. असो! प्रश्न निवडक व सोयीच्या विधानांचा आहे.

देशमुख यांनी मराठवाड्यातल्या गंगा-जमनी संस्कृतीचा उल्लेख केला. नगरला नोव्हेंबरमध्ये झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनीही या संस्कृतीचं मोठेपण व गरज ठाशीवपणे मांडली होती. वडोदऱ्याच्या संमेलनात निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचा सविस्तर परिचय करून देताना ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ काय म्हणाले, याकडेही लक्ष वेधलं पाहिजे. ते म्हणाले, हैदराबादचा निजाम मराठवाड्याचे इस्लामीकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. (मराठी) भाषेची गळचेपी सुरू होती. हा मुस्लिमबहुल प्रांत असल्याचे निजामाला सिद्ध करायचे होते. चपळगावकरही म्हणाले, ‘‘मराठी वाङ्मयाची जी आवड निर्माण झाली, त्याचं खरं श्रेय मी निजामाला देतो. निजामाने मला पाचवीच्या वर्गातही मराठी शिकू दिलं नाही. या घुसमटलेल्या वातावरणामुळे मराठी वाङ्मयाचे विशेष प्रेम उफाळून आले.’’ कोणत्या संस्कृतीबद्दल देशमुख बोलत होते, की नरहर कुरुंदकर यांनी म्हटल्याप्रमाणे प्रश्न असल्याचंच नाकारत होते? त्यामुळेच त्यांचं हे (गाजलेलं) भाषण पॉलिटीकली करेक्ट भूमिकेचं आहे, असंच म्हणावं वाटतं.

लोकशाही स्वीकारून आता ७० वर्षं झाली. पण राजा आणि प्रजा या भूमिकेतून आपण अजूनही बाहेर पडत नाही, हेही या भाषणावरून दिसतं. सरकार म्हणजे राजा आणि आपण त्यावर अवलंबून असलेली सर्वसामान्य प्रजा; राजारूपी सरकारने स्वातंत्र्य द्यावे आणि आम्ही ते उपभोगावे अशीच आपली मनोभूमिका रूपकाच्या स्वरूपातही का असावी? अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतानाच अध्यक्षांचे हे भाषण महामंडळाने सेन्सॉर न करता प्रसिद्ध केल्याचा उल्लेख झाला, हे लक्षणीय आहे. म्हणजे सेन्सॉरशिप फक्त राजकीय सत्ताधाऱ्यांची असते असं नाही, तर साहित्य संस्थेची सत्ता भोगणाऱ्यांचीही असते. त्याबद्दलही कान टोचले जावेत.

आणखी दोन भाषणं
उद्घाघटनाच्या कार्यक्रमास दोन ज्येष्ठ गुजराती साहित्यिक उपस्थित होते. उद्घाटक या नात्याने ज्ञानपीठचे मानकरी डॉ. रघुवीर चौधरी व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सीतांशु यशश्चंद्र. त्यांची भाषणेही महत्त्वाची होती. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हापासून मराठीचा सतत विकास सुरू आहे, असं सांगताना डॉ. चौधरी यांनी सयाजीराव महाराज, आचार्य विनोबा भावे, दिलीप चित्रे, विश्वनाथ नरवणे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रकाश भातंब्रेकर आदींच्या कामाचं महत्त्व आवर्जून नोंदविलं. शंकराचार्यानंतर देशभर फिरले ते आचार्य विनोबा भावेच, असंही त्यांनी सांगितलं. भारतीय भाषा अस्मितेच्या रुग्ण आहेत, असं डॉ. यशश्चंद्र म्हणाले. आपल्याला मराठी फार आवडते, याचं कारण म्हणजे ही भाषा बलिष्ठ आहे. मराठी साहित्यात समता आहे, असं त्यांनी कौतुकानं सांगितलं.

संमेलनाचे अध्यक्ष किंवा उद्घाटक यांची भाषणं ऐकण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यबाहुल्यामुळे वेळ नव्हता. संमेलनाचा निधी दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्यांनी टाळ्या मिळविल्या. एरवी त्यांच्या भाषणात दम नव्हता. मराठीतील साहित्य कालसुसंगत आहे, असं विधान त्यांनी कशाच्या जोरावर केलं, कुणास ठाऊक. खरं म्हणजे मराठी अभिजात आहेच!’, कुठल्याही प्रकारचं आव्हान मराठी पेलू शकते, मराठी विद्यापीठाची मागणी रास्त आहे. आम्ही तिचा सकारात्मक विचार करू, भाषा वादाचा नाही, तर संवादाचा विषय असतो आदी विधानं निव्वळ टाळ्याखाऊ होती. तुलनेने मंत्री विनोद तावडे यांचं भाषण चांगलं झालं. मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी माणूस हे वेगळे-स्वतंत्र विषय आहेत. त्या तिन्हींसाठी वेगवेगळ्या प्रयत्नांची गरज असून, तसे ते केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

विसंगतींवर अचूक बोट
सरकारचे कान टोचणारे अध्यक्षीय भाषण आणि खुल्या अधिवेशनातील सारे ठराव या ना त्या सरकारला काही तरी मागणारे, विनंती करणारे असतानाच निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी मुलाखतीत वर्तमानातील विसंगतींवर अचूक बोट ठेवलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य भोगण्यासाठी काही किंमत द्यावी लागते, हेच माणसांना उमगलं नाही, दडपणं वाढतात तेव्हा साहित्यातला उपरोध वाढत जातो, लेखकाच्या मनात कोणतीही वाङ्मयबाह्य अपेक्षा निर्माण झाली की, त्याचं लेखकपण संपतं. त्याचं स्वातंत्र्य टिकायचं असेल, तर राजकीय महत्त्वाकांक्षा नकोत, स्वार्थत्यागी माणसाची कदर केली जाईल, याची आज शाश्वती नाही, आम्ही पुरोगामी इतके ठाम की, दुसऱ्याचे ऐकून घेत नाही हे त्यांचं म्हणणं लख्ख आरसा दाखविणारं होतं.

डॉ. रसाळ व संपादक प्रशांत दीक्षित यांनी घेतलेली ही मुलाखत काहीशी समांतर रुळांवर चालली. मुलाखत घेणाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवला. डॉ. रसाळ यांनी दीक्षित यांना फारसं बोलू दिलं नाही आणि एक-दोन वेळा तर त्यांचे प्रश्नच गैरलागू ठरवले. उदारमतवादाची गरज सांगताना चपळगावकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य राबविण्यासाठी उदारमतवादी लोकशाही प्रवृत्ती लोकांना शिकविली पाहिजे. उदारमतवादी तत्त्वांना आम्ही इतिहासात फारसं महत्त्व दिलं नाही. आम्ही राजा-प्रजा (दाता-याचक) याच भूमिकेत राहिलो.’’ अनुदानावर डोळा ठेवून, किंबहुना तेवढ्याचसाठी उभ्या राहणाऱ्या सार्वजनिक संस्थांकडेही त्यांनी अंगुलीनिर्देश केला. ही मुलाखत अर्ध्याहून अधिक झाल्यावर चं. वि. महेता सभागृहात गर्दी वाढू लागली. ती प्रतिभावंतांचा सहवास मिळविण्यासाठी होती, हे यथावकाश स्पष्ट झाले. एका साहित्य संस्थेच्या पदाधिकाऱ्याने दिलेली माहिती खरी असेल, तर ती धक्कादायक आहे - पुढच्या कार्यक्रमासाठी मुलाखत लवकर आटोपती घ्या, असा निरोप थेट व्यासपीठावरच देण्यात आला! उदारमतवादाच्या अभावाचे थेट प्रत्यंतर!!

मनोहर मेजवानी
संमेलनात दुसऱ्या दिवशी मान्यवरांचा सत्कार होता. सत्काराला उत्तर देताना श्याम मनोहर यांनी केलेले भाषण म्हणजे संमेलनातली आणखी एक मेजवानी. त्यांनी आधी टिपण वाचून दाखविलं. त्याची प्रत खरं म्हणजे उपलब्ध करून द्यायला हवी होती. त्यांच्या मुक्त चिंतनातील काही ठळक मुद्दे -

- शास्त्रांप्रमाणेच साहित्यालाही तत्त्व आहे. ज्ञान म्हणजे काय याची चर्चा समाजात/साहित्यात होते काय? ज्ञान केवळ मिळवायचे नसते, तर निर्माणही करायचे असते. ते सोपे असते, असा भ्रम निर्माण करून कसे चालेल?
- गणिती, लेखक, कवी वगैरे हवेत अशी समाजाची कळकळ आहे काय? शेतकरी व साहित्यिक आपापल्या कामातून जगतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काय?
- राजकारणी भाषणात कधी कविता-कादंबरीचा उल्लेख का करीत नाहीत? याचा अर्थ ते समाजात खोलवर पोहोचले नाही किंवा मराठी साहित्य तेवढ्या दर्जाचे नाही.
- संस्कृतीसभ्यता या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. नीट जगण्याची प्रेरणा, कुतुहल आणि या जीवनाचा अर्थ काय, हे शोधण्याची वृत्ती म्हणजे संस्कृती. नीट जगण्याची व्यवस्था म्हणजे सभ्यता. जगण्यातल्या अडचणी कादंबरी-कवितेतून येतात. सभ्यतेचे विषय Fictionमध्ये का घ्यायचे नाहीत?
- जुनं ३०-४० वर्षांपूर्वीचं वाचूच नये असं आहे का? मराठी किंवा भारतीय भाषांमध्ये कालातीत असं काहीच निर्माण होत नाही का? मराठी (आणि भारतीय) वाङ्मयाला इतिहास आहे; परंपरा नाही.
- आपल्या कुटुंबांमध्ये ज्ञानाला स्थान नाही. संशोधनाचं काम दिवसातल्या २४ तासांचं आहे. आपल्या सभ्यतेतला एक कोपरा ज्ञानासाठी सतत जिवंत ठेवा. महत्त्वाचे गहन प्रश्न सामान्यांपासून सर्वांनी धरून ठेवले पाहिजेत.

कथेची व्याख्या 
कथा, कथाकार, कथानुभव हा कार्यक्रम रंगविण्याचं श्रेय सूत्रसंचालक नीलिमा बोरवणकर यांना! त्यांनी मंगला गोडबोले, गुजराती लेखिका हिमांशी शेलत व मोनिका गजेंद्रगडकर यांना छान बोलतं केलं. कथेची व्याख्या काय, या मूलभूत प्रश्नाला तिन्ही लेखिकांनी सविस्तर उत्तर दिलं. जयवंत दळवी आवडते लेखक असलेल्या हिमांशीदीदी म्हणाल्या, ‘‘जीवनातलं किती तरी वास्तव मराठी कथांतून वाचायला मिळालं. आपली कहाणी सांगता-लिहिता येत नाही, ती सांगायला घाबरतात, अशा व्यक्तींच्या मौनाला वाचा फोडते, ती कथा अशी माझी व्याख्या आहे.’’ छोट्या जागेत, मर्यादित पात्रांमध्ये आयुष्याचा एखादा प्रसंग झळझळीत करणे ही कथेची ताकद असते, असं सांगून गोडबोले म्हणाल्या, ‘‘कथा म्हणजे भिंगाखाली धरलेला आयुष्याचा छोटा तुकडा! हे भिंग म्हणजे लेखकाची नजर असते.’’ दुःखाचा अर्थ शोधणं, ही माझी कथा. आयुष्याचं अर्थसूचन करणारी कलाकृती म्हणजे कथा, असं गजेंद्रगडकर म्हणाल्या.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रसाधनाच्या १२ खंडांचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमासाठी महेता सभागृह ओसंडून वाहत होतं. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या संकल्पनेतून हे मोठं काम साकार झालं. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानताना राजमाता शुभांगिनीराजे म्हणाल्या, ‘‘महाराजांच्या कर्तृत्वाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली नाही, ही आमची खंत होती. या खंडांमुळे त्यांची ओळख देशभर होईल.’’ छत्रपती शिवरायांचे काम सयाजीरावांनी २०० वर्षानंतर पुढं चालवलं, असं सांगताना त्यांनी रामदास स्वामींच्या निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारु।याचा दाखला दिला. भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रबोधिनीत हे खंड पाठविण्याची सूचना तावडे यांनी केली. आदर्श कारभाराचा ध्यास घेतलेल्या महाराजांनी कोल्हापूरला १९३२मध्ये झालेल्या संमेलनात केलेल्या भाषणाची ध्वनिफित ऐकवण्यात आली. महाराजांच्या स्पष्ट शब्दोच्चारातून त्यांचे ठाम विचार ऐकायला मजा आली.

लेझीम खेळणाऱ्या पोरी... ग्रंथदिंडीतला उत्साह
संमेलनाच्या आयोजनाबद्दल फार काही तक्रारी झाल्याचं ऐकायला मिळालं नाही. अदबीनं बोलणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांची फळी मदतीस सदैव सज्ज होती. उद्घाटन-समारोपाचा कार्यक्रम अकारण लांबला. त्यामुळे दोन्ही वेळा संमेलनाध्यक्षांचं भाषण खूप उशिरा झालं. हरिश्चंद्र थोरात यांचा सहभाग असलेला टॉक शो केवळ दुसऱ्या सभागृहात ठेवल्यामुळे काहीसा दुर्लक्षित झाला. मराठीच्या उपयोजित वापराबद्दल संमेलनात कार्यशाळा झाल्या. त्याही छोट्या वर्गखोलीत पार पडल्या. संमेलनस्थळी न आलेली आदल्या दिवशीची ग्रंथदिंडी थाटात पार पडली. त्यातला सहभाग उत्साही होता. आठ दशकांनंतर आपल्या शहरात झालेलं हे संमेलन उत्सवी-उत्साही होतं की, काही देणारं होतं, याचं नेमकं उत्तर बडोदेकरांकडूनच अपेक्षित आहे.
---
(शीर्षकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ४ नोव्हेंबरचा लेख पाहता येईल.)

20 comments:

  1. संपूर्ण साहित्य संमेलन उलगडून दाखवले की. छन
    शेखर जोशी

    ReplyDelete
  2. अप्रतिम धांडोळा.!

    ReplyDelete
  3. चांगला व परिपूर्ण अढावा घेतला आहे. आवडला. न जाता आणि अन्यत्र जे थोडे वाचले होते त्यापेक्षा अधिक व्यवस्थित व विश्वसनीय वाचनात आले. डॉ. रसाळ सर घेत असलेली महत्त्वाची मुलाखत आटोपती घेण्याचा निरिओ देण्याचे औधत्य दाखवले गेले ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आपल्या या लेखामुळे नव्यानेच प्रथम कळली. - प्रभुणे

    ReplyDelete
  4. संपुर्ण संमेलनाचा घेतलेला अभ्यासपुर्ण आढावा उत्तमच.

    ReplyDelete
  5. या साहित्य संमेलनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी वृत्तपत्रांना मथळा देऊन आपली दखल घेण्यास भाग पाडले हे नक्की. आपले विश्लेषण आवडले. बऱ्याच दिवसांनी चांगले लिखाण वाचता आले आणि ते आवर्जून पाठविलेत याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  6. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भावनिक अत्याचार यातली लढाई संपणं अशक्य आहे. हा वाद किती वर्षं ऐकायचा?
    साहित्यिकांवर समाजसुधारणेची जबाबदारी कोणी घातली? आता ती झेपत नाही म्हणून ओरडा कशाला?
    समाजसुधारणा हाच निकष लावला तर कालीदास अतिशय गौण लेखक गणला जाईल.
    भाषणांना श्रोत्यांची गळती लागली यातच श्रोत्यांचा दर्दीपणा दिसून येतो.
    संमेलनाच्या उत्तम आढाव्याबद्दल आभार.

    ReplyDelete
  7. वृत्तपत्रांतून येणाऱ्या ठरीव साच्यातल्या वृत्तान्तांपेक्षा असा 'आँखों देखा हाल' किती तरी अधिक स्पष्टवक्ता असतो हे तीव्रतेने जाणवलं. अभिनंदन सतीश!
    - मृदुला जोशी

    ReplyDelete
  8. साहित्य संमेलनाचे अतिशय छान वर्णन

    ReplyDelete
  9. Nice report Relevant references and studied analysis .

    ReplyDelete
  10. समग्र आढावा वाचता आला. 'संजय ऊवाच'सारखं सारं दिसलं.
    - डॉ. ऊर्मिला चाकूरकर, पैठण

    ReplyDelete
  11. साहित्य संमेलनाबद्दल मोठा लेख लिहिला आहे. आणि त्यात माझं कौतुक पण केलंय. धन्यवाद.
    एकूणच लेख छान. योग्य वाटली मतं.
    - नीलिमा बोरवणकर

    ReplyDelete
  12. लेख मोठा असला, तरी वाचनीय असल्यामुळे एकाच बैठकीत वाचला. ग्वाल्हेरला खूप खूप वर्षांपूर्वी (साल आता आठवत नाही.) झालेल्या संमेलनाची आठवण झाली. आता मात्र कधी तिथे मराठी साहित्य संमेलन होईलसं वाटत नाही.
    लेखात संमेलनाचे धन व ऋण बिंदू दोन्ही छान विशद केले गेले आहेत. कार्यक्रम उशिरा सुरू होणं वैताग आणणारी बाब आहे. अशी अवस्था २ वर्षांपूर्वी मी भोपाळच्या मराठी साहित्य अकादमीमध्ये (मध्य प्रदेश सरकारची बरं का) भोगलेली आहे. ('आपले कथावाचन रद्द केले तर चालेल का?', अशी चिट्ठी मला मिळाली होती तेव्हा.) असो.
    नरेंद्र चपळगावकर व श्याम मनोहर यांच्या भाषणांमुळे संमेलनाला आल्याबद्दल छान वाटले असेल ना? कथा या भागातील तिन्ही स्त्री लेखिकांनीही असाच आनंद दिला ना? राजमातेचे भाषण व सयाजी महाराजांची ध्वनिफीतही आपणास आवडल्याचे दिसते. मला हा लेख पाठवल्याबद्दल धन्यवाद.
    - प्रियंवदा कोल्हटकर

    ReplyDelete
  13. या लेखाबद्दल हार्दिक धन्यवाद.
    आपण या संमेलनाचा सविस्तर आढावा घेतला आहे. अशी संमेलने (नाट्यविषयकही) नेमाने येतात, लोकांची उत्सवप्रियता भागवितात. काही जणांना साहित्यिक जवळून पाहता येतात, त्यांच्याशी चर्चा करता येते. पुस्तकांची विक्री पण होते, अध्यक्षांची विद्वत्तापूर्ण भाषणे होतात... इत्यादी अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे होतात.
    ​परंतु अखेरीस मराठी साहित्य ​वृद्धिंगत होण्यास, त्याचा दर्जा वाढण्यात अशी साहित्य संमेलने कितपत हातभार लावतात? याबद्दल काही विचार वा संशोधन झाले आहे का?
    - अशोक जोशी

    ReplyDelete
  14. लेख वाचल्यावर तारतम्य या सदराची आठवण झाली.खरोखरच चिकित्सक आणि मर्मग्राही

    ReplyDelete
  15. लेख छान झाला आहे. अतिशय नेमकेपणानं रिपोर्टिंग झालं आहेच; पण विश्लेषणही...
    - नीरजा

    ReplyDelete
  16. फारच सुंदर, समयोचित आणि समर्पक लेख! अभिनंदन!!
    - सर्वोत्तम सताळकर, बेळगाव

    ReplyDelete
  17. संमेलनाला उपस्थित राहता आले नाही, याची खंत तुमच्या सविस्तर आणि नेमक्या निवेदनाने नाहीशी झाली.
    - प्रा. डॉ. निशिकांत मिरजकर

    ReplyDelete
  18. सध्या साहित्य संमेलन म्हणजे आमच्या गावच्या छबिना यात्रेसारखे झाले आहे. दोन दिवस मराठीच्या पालख्या नाचवायच्या आणि वर्षभर जो कोणी 'राजा' असेल, त्याच्या नावानं शिमगा करायचा. व्यवस्था बदलासाठी समाजात काही सक्रिय योगदान द्यायचे नाही; फक्त उपदेशाचे डोस पाजायचे.
    अभिजात मराठीसाठी हे फक्त टाहो फोडतात; पण कधी याबाबत सामूहिक प्रयत्न करताना दिसत नाहीत. साहित्यिक म्हणजे अतृप्त आत्मे झाले आहेत. अनुदानावर जगायचं आणि पुरस्कार मिळाला नाही की, शासनावर ताशेरे ओढायचे इतकंच काम. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या!
    - प्रबोधचंद्र सावंत

    ReplyDelete
  19. आपण इतक्या दूरवर जाऊन साहित्य संमेलनाचं केलेलं वार्तांकन म्हणजे आम्हाला घरबसल्या मिळालेला गोड प्रसादचं आहे.
    - श्रीराम वांढरे, भिंगार, नगर

    ReplyDelete
  20. साहित्य संमेलन आणि त्याचे तथाकथित अध्यक्ष याबद्दल व्यक्तिशः मला फार काही आदर वाटत नाही. मुळात ती पारदर्शी(?) निवडणूक, त्या दरम्यान होणारे आरोप/प्रत्यारोप कुठल्याही राजकीय पक्षांच्या रणधुमाळीपेक्षा कमी नसतात. एवढं सगळं करून अध्यक्षपदी विराजमान होणारी व्यक्ती त्या पात्रतेची आहे का, अशी शंका उपस्थित होण्यासारखी एकंदरीत परिस्थिती आहे.

    आता झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष प्रशासकीय सेवेत रूजू होण्यापूर्वी काळ आमच्याप्रमाणेच बँकेत नोकरीस होते; त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडा 'सॉफ्ट कॉर्नर' आहे. पण त्यांनीही सैलच वक्तव्य केले. अर्थात निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांना चिमटे काढले हा भाग वेगळा! अध्यक्ष/माजी अध्यक्ष अशी उपाधी लागली की, आपल्याला काहीही बोलायचा परवाना मिळाला अशा थाटात ही मंडळी वक्तव्य करत सुटतात. श्रीपाल सबनीस हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. कदाचित हे प्रसिद्धीसाठी सुद्धा होत असावं. असो. आपण साहित्य संमेलनाचा घेतलेला धांडोळा उत्तमच.
    - दिलीप वैद्य, पुणे

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...