सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

पोरी... खेळणाऱ्या, जिंकणाऱ्या!


ह्या विजयानं अनेक गोष्टी बदलतील. बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे.
काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल.
मुलींना अंग चोरून मुलांच्या ॲकॅडमीमध्ये सराव करावा लागणार नाही.
मुलींच्या आय. पी. एल. स्पर्धेच्या प्रेक्षकांमध्ये आणि टीव्ही.वर ती पाहणाऱ्यांमध्ये किती तरी पटीने वाढ होईल ...महत्त्वाचं म्हणजे लक्षावधी क्रिकेटवेड्यांना रणरागिणी, दुर्गा सापडल्या आहेत!
------------------------

नंबर वन ठरलेल्या संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना वेगळी भेट.
संघातील सर्व खेळाडूंच्या सह्या असलेली नमो १ जर्सी सहर्ष, साभिमान सादर.
(छायाचित्र सौजन्य - https://www.pmindia.gov.in/)
..............................
महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने टीव्ही.वर चालू असताना दोन षट्कांमध्ये हमखास एक जाहिरात पाहावी लागे. त्यात दिसायचा गोंधळलेला तरुण – अरे, महिला क्रिकेटपटूंची नावं असलेला तो प्रसिद्ध निळा टी-शर्ट आपण (पुरुष असल्याने!) कसा घालायचा बुवा? काही तरीच हं...
 
मनात अशी शंका असलेल्या त्या तरुणाला पाच-दहा मिनिटांच्या प्रवासात बरंच काही दिसतं. आणि, त्याच्या मनात एक अपराधभाव निर्माण होतो. काही वेळातच तो १८ नंबरचा, पण विराट नव्हे तर स्मृती नाव असलेला टी-शर्ट मोठ्या आनंदानं (अर्थातच अभिमानानेही!) घालतो.
 
पुरुषी मनोवृत्ती वगैरे कंठाळी विशेषणं न वापरता क्रीडा क्षेत्रातील (आणि एकूणच) लैंगिक भेदभावाची वृत्ती दूर करणारी ही जाहिरात. महिला क्रिकेट संघाला आणि त्यातील खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला लावणारी. स्मृती, दीप्ती, हरमन, जेमिमा ह्या नावांच्या जर्सी तेवढ्याच अभिमानानं घातलेले अनेक पुरुष मग आपल्या आसपास पाहायला मिळाले.
 
ती जाहिरात त्याच्या जोडीनेच आणखी एक गोष्ट सांगत होती - जर्सी वही तो जज़्बा वही! हरमनप्रीतकौर आणि तिच्या एकाहून एक सरस १४ सहकाऱ्यांनी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी (दि. २ नोव्हेंबर) हा जज़्बा दाखवून दिला. हुलकावणी देत राहिलेला विश्वचषक त्यांनी जिंकला.
 
विजयानंतर प्रदीर्घ वेळ जल्लोष चालू राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची भेट घेण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी संघाला मिळाली. भविष्यात तुमचं आमंत्रण आम्हाला जास्तीत जास्त वेळा मिळेल, अशी कामगिरी करू, असं हरमन, स्मृती ह्यांनी त्यांना सांगितलं. भारतीयांना क्रिकेटचं वेड किती आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी आवर्जून अधोरेखित केलं.
 
काय काय होईल?
ह्या विजयानं बरंच काही होणार आहे.
अनेक गोष्टी बदलतील. बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे.
क्रिकेट खेळणाऱ्या पोरी तोंडात बोट घालून पाहण्याची गोष्ट फार पूर्वीची. ते चित्र आता अधिक छोट्या गावांमध्ये दिसू लागलं तर नवल नाही.
आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, झारखंड आणि अशाच राज्यांमधून, काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल.
मुलींना अंग चोरून मुलांच्या ॲकॅडमीमध्ये सराव करावा लागणार नाही.
मुलगी आहोत, हे सहजासहजी कळू नये म्हणून खेळण्यासाठी शफाली वर्मा हिच्यासारखे केस कापावे लागणार नाहीत.
यंदाच्या महिलांच्या आय. पी. एल. स्पर्धेच्या प्रेक्षकांमध्ये आणि ती टीव्ही.वर पाहणाऱ्यांमध्ये किती तरी पटीने वाढ होईल.
... असं बरंच काही झालं आहे, होईल. महत्त्वाचं म्हणजे लक्षावधी क्रिकेटवेड्यांना नवीन दैवतं, खरं तर देवी – रणरागिणी, दुर्गा सापडल्या आहेत!
 
भारतात क्रिकेट हा धर्म झाला आणि क्रिकेटपटू देव बनले ते केव्हा? देव, देश अन् धर्मासाठी... भारतीय वेडे कधी झाले ते कधीपासून? कपिलदेवच्या नेतृत्वाखाली १९८३मध्ये विश्वचषक जिंकला, ती त्याची पायाभरणी म्हणता येईल.
 
कोणी फारशी अपेक्षा न ठेवलेल्या ह्या संघानं त्या स्पर्धेत दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला दोनदा पराभूत केलं. तो खरोखर चमत्कार होता.
 
क्रिकेटधर्माचं बीज रोवलं
असं काही स्वप्नवत घडेल, हे कोणालाही न वाटणं स्वाभाविक होतं. कारण त्या स्पर्धेआधी खेळलेल्या एक दिवशीय ११८ सामन्यांपैकी तब्बल ८३ आपण हरलेलो. आधीच्या दोन स्पर्धांमध्ये केवळ एक विजय आणि तोही कच्चं लिंबू असलेल्या पूर्व आफ्रिकेविरुद्ध. पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा न मिळालेल्या श्रीलंकेकडूनही भारताचा पराभव झालेला.

अशा पार्श्वभूमीवर कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, मदनलाल, रॉजर बिन्नी, यशपाल शर्मा, संदीप पाटील, के. श्रीकांत ह्यांच्या संघानं विश्वचषक जिंकून दिला. क्रिकेट धर्माचं बीज बहुदा त्या विजयानं रोवलं गेलं...
 
त्यानंतर सहाच वर्षांनी सचिन तेंडुलकर नावाचं स्वप्न थेट भारतीय संघात पाहायला मिळालं. ह्या तेव्हाच्या बच्चानं कल्पनेच्या पलीकडचं खूप काही दाखवलं.
 
त्याच्या आधी भारतात क्रिकेटपटूंना ग्लॅमर नव्हतं, असं मुळीच नाही. सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी, गुंडप्पा विश्वनाथ, चंद्रशेखर, नबाब पटौदी, सी. के. नायडू, मुश्ताक अली... अशी बरीच दैवतं होती चाहत्यांची. ग्रामदैवतं किंवा पंचक्रोशीत ख्याती असतात, तशी. त्या अर्थानं पहिला देव म्हणजे सचिन. सर्वांनी अपेक्षांचा भार ज्याच्यावर टाकून निवांत व्हावं, असं दैवत. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय भाविकांची गर्दी खेचणाऱ्या देवस्थानाप्रमाणं.
 
विश्वविजेतेपद दुसऱ्यांदा मिळालं ते २००७मध्ये. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ५० षट्कांच्या विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी झालेली. क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा रोष वाढलेला. असं निराशाजनक चित्र असताना दक्षिण आफ्रिकेत पहिली टी20 विश्वचषक स्पर्धा झाली. त्याच्या आधी भारतीय संघ त्या प्रकारात केवळ एक सामना खेळला होता.
 
ह्या नव्या प्रकारापासून सचिन, राहुल द्रविड, सौरभ गांगुली ही प्रस्थापित दैवतं दूर राहिली. परिणामी क्रिकेट धर्माला नवीन देव सापडले – महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग, इरफान पठाण, रोहित शर्मा आदी...
 
३६० अंशांतला बदल
त्या विजेतेपदामुळे अतिझटपट टी20 प्रकारात इंडियन प्रीमियर लीग चालू झाली आणि त्यानं क्रिकेटची दुनिया ३६० अंशांमध्ये बदलून टाकली. पैसा आला, आडगावीच्या खेळाडूंना संधी मिळाली. नवे तारे, नवे हिरे. त्याच बरोबर मॅच फिक्सिंग आणि अनेक पातळ्यांवरचे हितसंबंधही लख्ख उघड झाले.
 
ह्या पार्श्वभूमीवर महिला संघाच्या पहिल्या विश्वविजेतपदाकडे पाहायला हवं. महिलांची मर्यादित षट्कांच्या सामन्यांची विश्वचषक स्पर्धा काही नवीन नाही. पुरुषांची पहिली स्पर्धा (१९७५) होण्याआधीच इंग्लंडमध्ये (१९७३) सात महिला संघांनी एकमेकांची ताकद जोखली होती.
 
भारतीय महिला पहिल्यांदा उतरल्या त्या १९७८च्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर १९८८च्या एका स्पर्धेत आपला सहभाग नव्हता. संघाची कामगिरी फार लक्षवेधक नसली, तरी दखलपात्र नक्कीच होती. तीन स्पर्धांमध्ये चौथा क्रमांक, एकदा तिसरा क्रमांक. आपल्या मुलींनी १९९७ आणि २००० ह्या वर्षी उपान्त्य फेरी गाठून चमक दाखविली.
 
पहिलं उपविजेतेपद
कर्णधार मिताली राज, अंजूम चोप्रा, झुलन गोस्वामी ह्यांच्या संघानं २००५मध्ये पहिल्यांदा चषकासाठी लढत दिली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ह्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बलाढ्य कांगारूंपुढे भारताचा पाडाव लागला नाही. ह्याच देशात दीड वर्षापूर्वी झालेल्या पुरुषांच्या विश्वचषकाची अंतिम लढत त्याच दोन देशांमध्ये झालेली होती. आणि तिचाही निकाल असाच एकतर्फी होता.
 
पुढचा अंतिम सामना खेळण्यासाठी तब्बल एक तप वाट पाहावी लागली. अभेद्य मानल्या जाणाऱ्या कांगारूंच्या गडाला पहिला सुरुंग लावला भारतीय संघानंच – २०१७मध्ये डर्बी येथे झालेल्या उपान्त्य सामन्यात. हरमनप्रीतचं अविस्मरणीय आणि तुफानी शतक. कपिलदेवच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या खेळीची आठवण करून देणारा डाव. दीप्ती शर्माचे पाच बळी. कांगारू पराभूत!
 
अंतिम सामना लॉर्ड्सवर. सगळ्यांना आठवण झाली १९८३ची. पण यजमान महिलांचा संघ किंचित सरस ठरला. त्यांनी नऊ धावांनी बाजी मारली. निसटता, चुटपूट आणि हुरहूर लावणारा पराभव.
 
विजय अनपेक्षित नव्हे
हा इतिहास पाहिला, तर महिलांचा विश्वचषक विजय कपिलदेवच्या संघाएवढा अनपेक्षित नक्कीच नाही. पहिल्या चार क्रमांकात चार वेळा आलेल्या, दोन वेळा उपान्त्य सामन्यांत खेळलेल्या आणि दोन वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या संघाला हा उशिरा मिळालेला हक्काचा चषक म्हणता येईल.
 
स्वदेशात झालेल्या ह्या स्पर्धेतील प्रवास वाटला तेवढा काही सोपा झाला नाही. खरं तर भारतीय संघानं उपान्त्य फेरी गाठली, ती काहीशी रडतखडतच. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्यांच्याविरुद्धचे साखळीतील सामने आपण गमावले. विजय हाताशी असताना निसटलेला.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर ३३० धावा करूनही आपण हरलो. सर्वांत मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या नावापुढे लागला.
 
गंमतीची गोष्ट म्हणजे हा विक्रम अवघे १९ दिवस टिकला. त्याच कांगारू संघाने ठेवलेले अधिक मोठे लक्ष्य भारताने ओलांडले आणि तेही निर्णायक उपान्त्य सामन्यात. कांगारूंना विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य सामन्यात दोन वेळा पराभवाची धूळ चाखायला लावणारी कामगिरी भारतानेच केली आहे.
 
चुटपुटत्या पराभवांच्या तीन चटक्यांमुळे भारतीय संघासाठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मोक्याच्या क्षणी ढिसाळ खेळल्यामुळे ही वेळ आली. न्यू झीलँड आणि बांग्लादेश ह्यांच्याविरुद्धचे सामने जिंकायलाच पाहिजेत. बांग्लादेशविरुद्धचा सामना पावसानं धुतला; पण तोवर आपण कसाबसा हातरुमाल टाकून चौथी जागा मिळवली होती. ते करताना न्यू झीलँडला नमविण्याची कामगिरी चोख बजावली होती.
 
अ(न)मोल कानमंत्र
उपान्त्य सामन्यात सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी गाठ होती. जेमिमा रॉड्रिग्ज हिचं शतक, कप्तानसाब हरमनच्या ८९ धावा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष व अमनज्योत कौर ह्यांच्या छोट्या, पण फार महत्त्वाच्या खेळ्या. आपल्याला त्यांच्यापेक्षा फक्त एकच धाव जास्त करायची आहे, हा प्रशिक्षक अमोल मुजुमदार ह्यांचा कानमंत्र भलताच फायद्याचा ठरला.
 
ह्या स्पर्धेतली गमतीची गोष्ट म्हणजे साखळी सामन्यांनंतर पहिल्या दोन क्रमांकांवर असलेल्या संघांना उपान्त्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यांचे पराभव निर्विवाद होते. साखळीतील दोन सामन्यांमध्ये शतकाचा उंबरठा ओलांडण्यातही अपयशी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेने कमालच केलेली. चषकासाठी गाठ त्यांच्याशी होती.
 
मोक्याच्या क्षणी गळपटणारा संघ, अर्थात चोकर्स’! हे विशेषण आपल्या संघाला अगदी बरोबर लागू पडतं, हे दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघानं वेळोवेळी दाखविलेलं. त्याचं नकोसं अनुकरण त्यांच्या महिला संघानंही केलं. शफाली, स्मृती, दीप्ती आणि ऋचा घोष ह्यांच्यामुळं भारताचा डाव तीनशेच्या उंबरठ्यापर्यंत गेला. ह्या धावा पुरेशा ठरणार की अपुऱ्याच पडणार, हे द. आफ्रिकेची कर्णधार लोरा व्होलवार्ट आणि ॲनरी डर्कसन ठरविणार होत्या.
 

आधी बॅट चालली आणि नंतर चेंडू हाती घेऊन
शफाली वर्माची करामत.
(छायाचित्र सौजन्य - 'द गार्डियन')
...........................
कप्तानसाबचा आतला आवाज
अर्धशतकी सलामीनंतर भारतीय गोटात काळजी वाटत असतानाच अमनज्योत कौरच्या फेकीनं तझमिन ब्रिट्स धावबाद झाली. श्री चरणी हिच्या फिरकीनं दुसरा बळी मिळवून दिला. सून्ये लूस आणि लोरा ह्यांची जमलेली जोडी त्रासदायक ठरण्याची चिन्हं दिसत होती. आतल्या आवाजानं हरमनप्रीतला सांगितलं की, चेंडू शफाली वर्माकडे सोपव. दोन गडी झटपट बाद करीत शफालीनं हा विश्वास सार्थ ठरवला. लूसचा फटका झेलताना शफालीच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आता इतिहासात कायमस्वरूपी राहणार आहे.
 
लोरा व डर्कसन ह्यांचे इरादे स्पष्ट दिसत होते. त्यांनी ६१ धावांची भागीदारी केली. दीप्ती शर्मानं डर्कसनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर शतकवीर लोरा बाद झाली. तो झेल घेताना अमनज्योतला करावी लागणारी कसरत आणि तिनं दाखवलेलं प्रसंगावधान विश्वचषक जवळ आणणारं होतं.
 
लोराचं शतक फार सुंदर होतं. तिच्या नितांत देखण्या फटक्यांना नवी मुंबईकर प्रेक्षकांची दाद अभावानेच मिळाली. दक्षिण आफ्रिकेनं सामना गमावला तो २१ ते ३० ह्या षट्कांमध्ये संथ खेळून. भारतीय फिरकीचा वरचष्मा त्यांना झुगारता आला नाही.
 

केवळ कॅच आणि मॅच नाही, तर विश्वचषक हाती आला!
कप्तानसाबची खुशी गगनात न मावणारी...
(छायाचित्र सौजन्य - बी. बी. सी.)
...................................
जमलेल्या जोडीतल्या दोघी परतल्या आणि मग पुढचं सगळं सोपं होत गेलं. नदीन डी क्लर्क हिचा झेल आणि विश्वचषक हरमीनप्रीतनं एकाच क्षणी हस्तगत केला. कपिलदेवच्या त्या झेलाची आठवण करून देणारा झेल. चषक जिंकायचं स्वप्न स्पर्धेत सहभागी होऊ लागल्यानंतर ४७ वर्षांनी प्रत्यक्षात उतरलं.
 
पांढऱ्या केसांमागचं गुपित
ह्या यशाचे धनी बरेच आहेत. त्यात अग्रस्थानी येतात संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार. उगाच नाही हरमनप्रीतला त्यांच्या पाया पडावं वाटलं! ह्या विजयाची तयारी दोन वर्षांपासून चालू होती. म्हणून तर पंतप्रधान मोदी ह्यांच्याशी बोलताना मुजुमदार गंमतीनं म्हणाले, सर, काय सांगू. ह्या दोन वर्षांत माझे केस पांढरे झाले!’
 
हरमनप्रीत फलंदाज म्हणून फार यशस्वी ठरली नसली, तरी कप्तानसाब म्हणून तिची कामगिरी  वरच्या दर्जाची होती. शफालीच्या हाती चेंडू देण्याची तिची चाल निर्णायक ठरली. सगळ्याच खेळाडूंना सर्वोत्तम खेळ करण्यासाठी ती प्रोत्साहित करताना दिसली.
 

घेतला, सुटला, निसटला आणि पुन्हा झेलला.
अमनज्योत कौर हिचा तो अविस्मरणीय झेल.
(छायाचित्र सौजन्य - बी. बी. सी.)
...................................

गरज पडेल तेव्हा संघाच्या उपयोगी पडण्याची सर्वच खेळाडूंची धडपड होती. ती सामन्यागणिक दिसून आली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक बळी मिळविणाऱ्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये दोन दोन भारतीय खेळाडू आहेत.
 
महिला क्रिकेटला आपल्यात सामावून घेण्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ठरवलं. सदस्य देशांना तसा आदेश दिला. त्यानंतर वर्ष-दीड वर्षानं आणि काहीशा नाखुशीनंच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं हे पाऊल उचललं. पण त्याचा महिला खेळाडूंना फार उपयोग झाला. रेल्वेगाडीनं रखडत जाणं, डॉर्मेटरीत किंवा बॅडमिंटन हॉलमध्ये मुक्काम ठोकणं, हे सगळं संपलं. त्यांना विमानानं जाता येऊ लागलं, निवासासाठी उत्तम दर्जाच्या हॉटेलांची सोय होऊ लागली. व्हिडिओ ॲनालिसिस आणि त्यासारख्या अनेक तांत्रिक सोयी सहज उपलब्ध होऊ लागल्या.
 
क्रिकेट नियामक मंडळाची धुरा सौरभ गांगुली आणि जय शहा ह्यांच्या हातात असताना महिला क्रिकेटला चालना देणारे अनेक निर्णय धडाडीने घेतले गेले. त्यात त्यांच्या मानधनात वाढ, महिला आय. पी. एल. सुरू करणं ह्या दोन महत्त्वाच्या पायऱ्या होत्या. त्यामुळे महिला क्रिकेट अधिक गतीनं पुढे सरकलं. महिला क्रिकेटपटूंना नाव मिळालं, प्रसिद्धी मिळू लागली आणि पैसेही.
 
दीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर विश्वचषक जिंकला. पुढे काय?
विजयी संघातील खेळाडूंशी अनौपचारिक गप्पा मारताना पंतप्रधान मोदी ह्यांनी सुचवलं की, तुम्ही एक दिवस तुमच्या शाळेत घालवा. त्यातून तिथल्या विद्यार्थांना स्फूर्ती मिळेलच; पण तुम्हालाही त्यांच्याकडून खूप काही मिळेल.
 
एक गमतीची गोष्ट – १९८३ आणि २००७ ह्या वर्षी विश्वचषक जिंकणाऱ्या पुरुषांच्या संघातील दोन खेळाडूंना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. सुनील वॉल्सन आणि पियूष चावला, हे ते दोन गोलंदाज. महिलांनी पहिलं विजेतेपद मिळवताना, सगळ्या खेळाडूंना किमान एक तरी सामना खेळवलंच!
 
सचिन, विराट आणि रोहित ह्यांची अलीकडच्या तीन दशकांतील क्रिकेटवर मोठी छाप आहे. मिताली राज, हरमनप्रीत, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा ह्या नावांनी तेच केलेलं आहे. त्यांनी मुलींमध्ये आणि त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पालकांमध्ये हा आपला(च) खेळ आहे ही भावना रुजविली. ह्या संघातील विशी-बाविशीतील खेळाडूंना तोच वारसा पुढे न्यायचा आहे.
 
ह्या विजेतेपदानंतर चित्र बदलणार आहे, ह्यात शंकाच नाही. मुलींचं क्रिकेट आता आडवळणी गावातही पोहोचेल. देशातील महिलांच्या स्पर्धा वाढतील. मुलींच्या क्रिकेटकडे दुय्यम नजरेनं पाहणं कालविसंगत ठरेल.
 
... आणि कोणी सांगावं, विराट आणि रोहित २०२७च्या विश्वचषकात खेळत असताना स्मृती, दीप्ती, जेमिमा,  श्री चरणी ह्यांच्या जर्सी अभिमानाने घातलेली मंडळी जाहिरातींमध्ये चमकतील
!
----------------------------------
(दैनिक प्रहारच्या कोलाज पुरवणीमध्ये रविवारी प्रसिद्ध झालेला लेख विस्ताराने.)
----------------------------------
#भारतीय_महिला_क्रिकेट #विश्वचषक2025 #विश्वविजेतेपद #हरमनप्रीत_कौर #स्मृती_मानधना #दीप्ती_शर्मा #शफाली_वर्मा #जेमिमा_रॉड्रिग्ज #अमोल_मुजुमदार #नरेंद्र_मोदी #ऑस्ट्रेलिया #दक्षिण_आफ्रिका #कपिलदेव

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

डायरीची चाळता पाने...


थोडी
आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी नाही. बरंच काही निकाली निघत आहे, ह्या स्वच्छता मोहिमेत. ‘मोह मोह के पन्ने...’ एक तर रद्दीत जात आहेत किंवा फाडून कचऱ्याच्या डब्यात.

बरेच अंक, वर्तमानपत्रांची पानं, कातरणं जपून ठेवलेली. काही नियतकालिकांचे पहिले अंक. काहींचे शेवटचे अंक. त्याच बरोबर काही डायऱ्या आणि कार्यक्रमांच्या नोंदवह्या. ह्या नोंदवह्या फेकून देण्याचं धाडस ह्या वेळीही झालं नाही. त्यात बरंच काही काही आढळतंय. त्यातून नव्याने लिहिण्यासारखंही बरंच सापडलं. पण ते नंतर...

ह्या सगळ्या आवराआवरीत मदत करायला एकाला बोलावलेलं. त्याच्या मुली शाळेत शिकतात. कोऱ्या डायऱ्या, एखाद-दुसरंच पान खरडलेल्या वह्या त्या मुलींसाठी आवर्जून देतोय. पुस्तकं झटकून परत ठेवली जात आहेत. पुन्हा कधी तरी उघडली जातील, ह्या आशेनं.

पुस्तकांचा एक भला मोठा गठ्ठा समोर आला. त्यात ‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ - १० पुस्तकं. ‘त्याच्या मुलींना देऊन टाका वाचायला...’ असं बायको म्हणाली. आणि एका तिरप्या (पण भोळ्या नव्हे!) कटाक्षाची मानकरी ठरली.

जुनी डायरी सापडली
पुस्तकांवरची धूळ झटकून ठेवताना एक डायरी हातात आली. खूप जुनी. पण अगदी नव्यासारखी. कारण ती फारशी वापरलेलीच नाही. जाड आवरण. आतला कागद स्वच्छ पांढरा. ती रद्दीत कशाला द्यायची?

त्या मुलींसाठी म्हणून डायरी देत होतो. पुन्हा एकदा चाळताना दोन-चार पानांवर काही तरी लिहिलेलं दिसलं. म्हणून आवर्जून परत पाहिली.

दोन पानांवर इंग्रजीत तीन पत्ते लिहिलेले दिसले. प्रत्येक पत्ता वेगळ्या अक्षरात लिहिलेला. ही धावती लिपी माझी नक्कीच नाही. पाहिलं, लक्षात आलं आणि साडेतीन दशकं मागे गेलो.

क्रिकेटपटूंनी लिहून दिलेले पत्ते
त्यातले दोन पत्ते पंजाबातील आहेत आणि एक दिल्लीचा. पंजाबमधील पत्तेही दोन वेगळ्या शहरांचे - जालंदर आणि पतियाळा (पटियाला). हे त्या काळातील बऱ्यापैकी प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी लिहून दिलेले पत्ते आहेत. त्यातले दोघे भारताकडून खेळलेले.

आपापल्या घरचा व्यवस्थित पत्ता लिहून देणारे हे क्रिकेटपटू म्हणजे गुरुशरण सिंग, राजिंदरसिंग घई आणि महेशइंदरसिंग (सोढी). त्यांनी त्या डायरीत लिहून दिल्यानंतर बहुदा काल-परवा पहिल्यांदाच ती पानं पाहिली गेली असावीत. त्यांच्याशी कधी पत्रव्यवहार केला नाही. त्यांच्या शहरातही जाणं झालं नाही.

ते अक्षर, ते पत्ते पाहताच सगळं काही लख्ख आठवलं. सन १९८७च्या डिसेंबरमधील ते लेखन आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. कर्णधार विव्हियन रिचर्ड्स. त्या काळात पाहुण्या संघाला सरावासाठी सामने खेळायला मिळायचे. एखादा सामना रणजी विजेत्या संघाबरोबर असे. काही सामने पूर्व, पश्चिम, मध्य, उत्तर, दक्षिण विभागाच्या संघाशी असत.

पाहुण्यांचा उत्तर विभागाविरुद्धचा तीन दिवसांचा सामना पुण्यात होता. नेहरू स्टेडियममध्ये. त्या वेळी मी ‘क्रीडांगण’मध्ये काम करत होतो. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना साक्षात खेळताना पाहायला मिळणार होतं.

क्रिकेटचं वेड आणि अफाट माहिती असलेला गंगाप्रसाद सोवनी हौस म्हणून कार्यालयात नेहमी यायचा. अंकाचं काम थोडं अगोदर आटोपून मी आणि गंगाप्रसाद तिन्ही दिवस सामना पाहायला गेलो.

उत्तर विभागाचं नेतृत्व मोहिंदर अमरनाथ करीत होता. काही करून त्याला भेटायचं आम्ही ठरवलं. सेलिब्रिटी म्हणावा असा एकटाच तो. पाहुण्यांचा संघ तेव्हा पुण्यातल्या एकमेव तारांकित ‘ब्लू डायमंड’मध्ये उतरलेला. उत्तर विभागाची सोय ‘हॉटेल अजित’मध्ये केलेली.

मोहिंदरचा स्वच्छ नकार
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर मी आणि गंगाप्रसाद ‘अजित’वर धडकलो. खालीच मोहिंदर अमरनाथ दिसला. आम्ही दोघांनी गप्पा मारण्यासाठी वेळ द्यायची विनंती केली. मी जेमतेम तेविशीचा आणि गंगाप्रसाद विशीतलाच. एकूण अवतार बघून आमच्यावर वेळ खर्च करणं मोहिंदरला मान्य नसावं. त्यानं अगदी थोडक्यात आणि सौम्यपणे नकार दिला.

शिकाऊ होतो तरी ‘पत्रकार’ असल्याची नशा दोघांनाही होती. अल्पपगारी मी आणि बिनपगारी तो. पण पूर्ण अधिकारी! सरळ मोहिंदरच्या खोलीचं दार वाजवलं. पुन्हा आमचे चेहरे बघून तो चिडला. अधिकच लालबुंद झाला. ‘एकदा नाही म्हणून सांगितलं ना...’ असं काही तरी इंग्रजीत बोलत त्यानं दार धाडकन बंद केलं.

हिरमसून खाली आलो. पाहिलं तर उत्तर विभागाचे तीन खेळाडू निवांत गप्पा मारत बसले होते. मोहिंदरकडून अपमान(!) होऊनही आम्ही निगरगट्टपणे त्यांच्याशी बोलायला गेलो. ते होते मधल्या फळीतला शैलीदार फलंदाज गुरुशरण (पंजाबीत गुरशरण) सिंग, मध्यमगती गोलंदाज राजिंदरसिंग घई आणि फिरकी गोलंदाज महेशइंदरसिंग.

तीन सरदारजी
त्या तीन सरदारजींना काय वाटलं कोणास ठाऊक, पण त्यांनी आम्हाला पत्रकाराचा मान दिला. अर्धा तास आम्ही गप्पा मारत बसलो. इकडच्या तिकडच्या. खरं तर पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजच्या पहिल्या तीन फलंदाजांनी - गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स आणि रिची रिचर्ड्सन - उत्तर विभागाच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली होती. ‘नेहरू स्टेडियमची खेळपट्टी अशीच पाटा आहे,’ असं (ऐकीव) सांगून आम्ही घई आणि महेशइंदर ह्यांची समजूत घातली. 😀

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा हॉटेलात. त्या तिघांनी आम्ही मित्र असल्यासारखंच स्वागत केलं. आठवतंय की, घईनं खायला ‘पनीर पकौडे’ मागवले होते. पुण्यातही पंजाबी आतिथ्याला जागत त्यानं आम्हाला खायचा आग्रह केला. तेव्हा पनीर वगैरे काही माहीत नव्हतं. ‘हे शाकाहारी आहे ना?’, असं विचारून त्यातल्या एका पकौड्याची चव घेतली.


घई तोपर्यंत भारताकडून सहा एक दिवशीय सामने खेळला होता. कारकिर्दीतला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना तो खेळून चुकला होता. पण तेव्हा ते त्यालाही माहीत नव्हतं आणि आम्हालाही. पुन्हा संघात येण्याचं स्वप्न तो पाहत होता.

पहिल्या डावात सव्वाशेहून अधिक धावा मोजून एकही बळी न मिळालेला घई पाहुण्या संघाच्या दुसऱ्या डावाचा विचार करीत होता. कोणत्या बाजूने गोलंदाजी केली तर फायदेशीर ठरेल, खेळपट्टी तिसऱ्या दिवशी कशी राहील, असे प्रश्न तो आम्हाला विचारत होता. आम्ही त्याबाबत ठार अज्ञ! तरी गंगाप्रसाद काही काही सांगत राहिला. दुसऱ्या डावात त्याला नक्की यश मिळेल, असा दिलासा आम्ही दिला.

त्या तीन दिवसांच्या सामन्यात दुसऱ्यांदा गोलंदाजी करण्याची संधी काही घईला मिळाली नाही. तीन दिवसांत मिळून फक्त १३ फलंदाज बाद झाले. हा मध्यम उंचीचा आणि सडपातळ चणीचा मध्यमगती गोलंदाज कसा काय, हा प्रश्न तेव्हा पडला. माझ्याहून जेमतेम एखादा-दीड इंच उंच असावा तो.

कुलकर्णी आणि राजू!
राजू कुलकर्णी की राजू घई, अशी स्पर्धा तेव्हा होती. आडनाव ऐकून राजूशी माझं काही नातं आहे का, माझी नि त्याची ओळख आहे का, असंही घईनं विचारलं होतं.

‘कपिलदेव आणि श्रीनाथ ह्यांच्यापेक्षा घई वेगवान होता,’ असं काही तरी विधान मध्यंतरी नवज्योतसिंग सिद्धू ह्यानं केलं होतं. स्वाभाविकच तो ट्रोल झाला! घईलाही ते काही पटलं नसणार.


गुरुशरण बहुतेक फलंदाजीला यायचा होता. तिसऱ्या दिवशी किती वेळ खेळायला मिळेल, ह्याची चिंता त्याला होती. तोही तसाच दिसणारा. फारसा उंच नाही आणि धिप्पाडही नाही. मधल्या फळीतला फलंदाज म्हणून त्यानं ठसा उमटवलेला. भारतीय संघातून खेळण्याचं स्वप्न पाहत होता तो. ते पुढे चार वर्षांनी साकार झालं.

एक कसोटी आणि एक दिवसाचा एकच सामना गुरुशरणच्या वाट्याला आला. उत्तर विभाग, दिल्ली आणि नंतर पंजाबकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळलेल्या त्याच्या वाट्याला तेवढंच आलं. पुढे दिल्लीऐवजी पंजाबकडून खेळताना त्यानं संघाला रणजी करडंक विजेतेपद मिळवून दिलं.

धिप्पाड आणि रुबाबदार
ह्या तिघांमध्ये ‘सरदार’ वाटावा असा महेशइंदरसिंग एकटाच. धिप्पाड, रुबाबदार आणि हसतमुख. त्यानं दिलखुलासपणे हातात हात मिळवला, तेव्हा जाणवला त्याचा पंजा. भला मोठा. माझे दोन्ही हात मावतील एवढा रुंद, दांडगा. चेंडू वळवून बोटांना घट्टे पडलेले.


हा ऑफ स्पिनर काही भारताकडून खेळायचं स्वप्न पाहत नसावा. त्या सामन्यात पावणेदोनशे धावांचं मोल मोजून त्यानं ग्रीनिज आणि फिल सिमन्स हे बळी मिळवले होते. त्याच्या एकट्याच्याच बोलण्यात क्रिकेट सोडून इतर सटरफटर विषय होते. महेशइंदर ह्यानं न पाहिलेलं स्वप्न त्याचा मुलगा रीतिंदरसिंग सोढी ह्यानं पूर्ण केलं.

दुसऱ्या दिवशी गप्पा संपवून निघताना कसं कोणास ठाऊक पण त्या तिघांनीही माझ्या डायरीत आपापल्या घरचे पत्ते लिहून दिले. बहुतेक आगावूपणे मीच मागितले असावेत. त्या सामन्याचा वृत्तान्त असलेला अंक पाठवून देण्याचं आश्वासनही दिलं असेल कदाचित.

हे लिहिण्यासाठी म्हणून ह्या तिन्ही सरदार खेळाडूंची माहिती इंटरनेटवर शोधली. त्यांची चांगली छायाचित्रंही मिळत नाहीत. महेशइंदरसिंगचं तर छायाचित्र नावालाही दिसत नाही.

ह्या सामन्याच्या निमित्तानं बऱ्याच गमतीजमती आम्ही अनुभवल्या. तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू असताना उपाहाराच्या थोडं आधी विव्ह रिचर्ड्स थेट पत्रकार कक्षात आला. तो त्या सामन्यात खेळत नव्हता. रॉजर हार्पर संघाचं नेतृत्व करीत होता.

साक्षात रिचर्ड्सला पाहून सगळेच पत्रकार धास्तावले. तो आला आणि थेट आमच्या जवळ बसला. ‘स्पोर्ट्सस्टार’चे आर. मोहनही त्याच्यापासून चार हात लांबच राहिले. एका कोणी तरी ज्येष्ठ पत्रकारानं ‘त्याच्याशी उगीच बोलायला जाऊ नका हं’ असं कानात कुजबुजत सावधही केलं होतं.

रिचर्ड्सशी संवाद
गंगाप्रसाद फार धीट. त्यानं रिचर्ड्सशी संवाद साधायला सुरुवात केली. मग मीही. आम्ही अंकात वाचकांसाठी स्पर्धा आयोजित करीत होतो. त्यात १९७८-७९मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील चार खेळाडूंचे फोटो होते. प्रश्न अर्थातच होता - ‘ओळखा पाहू हे कोण?’ रिचर्ड्सच्या हाती अंक दिल्यावर त्यानं तो चाळला. ते खेळाडू कोण, हेही सांगितलं. त्याचे ते कॅरेबियन शैलीतले उच्चार कळायला अवघडच होतं. सुपाएवढे कान करून आम्ही त्याला ऐकत राहिलो.

एखाद्या वाघानं रुबाबात गुहेतून बाहेर यावं, त्याच्या नुसत्या दर्शनानंच जंगल चिडीचूप व्हावं. काही न करता त्यानं इकडे तिकडे रेंगाळावं आणि डरकाळीही न फोडता गुहेत परत जावं... अगदी तसंच. पाच-सात मिनिटं बसून रिचर्ड्स पुन्हा पॅव्हिलियनकडं परतला. तो दृष्टीआड होताच ‘काय म्हणत होता, काय म्हणत होता?’ असं विचारत बऱ्याच पत्रकारांनी आम्हा दोघांभोवती कोंडाळं केलं!

त्या वेळी पत्रकार कक्षात कोणीही छायाचित्रकार नव्हता. तसं कोणी असणंही अपेक्षित नव्हतं. त्यामुळे रिचर्ड्स आणि आम्ही दोघं, असा काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाला नाही. आठवण मात्र तेव्हाच जेरबंद झालेली.

पिल्लेचा रडका चाहता
दिल्लीकडून खेळणारा के. भास्कर पिल्लाई (किंवा पिल्ले) त्या वेळी भलत्याच फॉर्मात होता. रणजी स्पर्धेत धावांचा रतीब घालूनही भारतीय संघाचं दार काही त्याच्यासाठी उघडलं नाही. त्याचा एक चाहता दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हॉटेलवर आला होता. पिल्ले त्या सामन्यात १२ धावा करूनच बाद झाला.

मोक्याच्या सामन्यात आपला लाडका पिल्ले अपयशी ठरल्याचं अनावर दुःख चाहत्याला झालं. ‘तुम्हे कब चान्स मिलेगा?’, असं विचारत तो रडायलाच लागला. त्यामुळं पिल्लेच बिचारा कानकोंडा झाला. ह्या चाहत्याची समजूत काढता काढता त्याची पुरेवाट झाली.

नेहरू स्टेडियमवरच्या त्या सामन्यात काही शिकावू पंच व्यवस्था पाहायला होते. त्यातल्याच कोणी तरी डेसमंड हेन्स ह्याला भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा खाऊ घातल्या. त्याला त्या इतक्या आवडल्या की, दुसऱ्या दिवशी खेळ संपल्यावर त्यानं थेट पाच किलो शेंगा मागवल्या. त्या घेऊन तो ‘ब्लू डायमंड’कडे रवाना झाला.

तो सामना संपला. रटाळ झाला. त्यानंतर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात नरेंद्र हिरवाणी ह्यानं कमाल केली. दोन्ही डावांत मिळून त्यानं १६ गडी बाद केले. स्वाभाविकच ‘क्रीडांगण’च्या मुखपृष्ठावर तो झळकला. मी तयार केलेला तो शेवटचा अंक. आणि बहुतेक ‘क्रीडांगण’चाही!

...किती तरी वर्षं न उघडलेली, पुस्तकांच्या ढिगाऱ्यात लपून राहिलेली डायरी अशी अचानक हाती आली. बऱ्याच आठवणींचा खजिनाच तिनं उघडून दिला.
....
#डायरीतील_पाने #क्रिकेट #गुरुशरणसिंग #राजिंदर_घई #महेशइंदर_सिंग #विव्हियन_रिचर्ड्स #वेस्ट_इंडिज #नेहरू_स्टेडियम #गॉर्डन_ग्रीनिज #डेसमंड_हेन्स #पत्ता #मोहिंदर_अमरनाथ

मंगळवार, १५ जुलै, २०२५

ओह! लॉर्ड्स... 😭😭

 



महंमद सिराज... प्रतिकाराला पूर्णविराम.
अडवूनही चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळलाच.
....................
सनसनाटी म्हणता येईल असा झाला तिसरा कसोटी सामना. त्यातल्या
प्रत्येक दिवसाचा रंग वेगळा होता. आशा दाखविणारा आणि निराश करणाराही. रवींद्र जाडेजा ह्यानं झुंजार खेळ करूनही भारत विजयापासून लांब राहिला. त्याची कारणं बरीच. पहिल्या डावात आघाडी मिळविण्याची गमावलेली संधी, दुसऱ्या डावात इंग्लंडला दिलेला बाईज धावांचा बोनस आणि आघाडीच्या फळीनं केलेली ढिसाळ फलंदाजी...
....................

लॉर्ड्सच्या मैदानावर विजयी पताका फडकवण्याची संधी गमावली. अँडरसन-तेंडुलकर करंडक कसोटी मालिकेत २-१ आघाडी मिळविण्याचीही संधी निसटली. कसोटी सामन्यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या सामन्यात भारत हरला. पाहता पाहता विजय दूर होत गेला. हळहळ वाटायला लावणारा हा पराभव.

‘सनसनाटी!’ ह्या सामन्याला असं विशेषण लावता येईल. त्याला रंगतदार म्हणता येईलच. पाचही दिवस चुरशीचा खेळ झाला. प्रत्येक दिवसातल्या सत्रागणीक पारडं हलकं नि जड होत राहिलं - कधी पाहुण्यांचं, तर कधी यजमानांचं. पण जखमी असूनही संघाची गरज म्हणून सहा षट्कं टाकणाऱ्या शोएब बशीरचा पस्तिसावा चेंडू महंमद सिराजनं अडवूनही यष्ट्यांवर जाऊन आदळला. त्या क्षणी इंग्लंडचं पारडं कायमस्वरूपी जड झालं! विजयावर शिक्कामोर्तब!!

पराभव स्वीकारणं अवघड असतंच. पण असे हे निसटते वाटणारे पराभव पचवणं फार जड जातं. आता लक्षात येतं की, ह्या पराभवाचं बीज पहिल्या दिवशीच पडलं होतं. पहिल्या डावातील आघाडी घेण्याची संधी घालवून त्या बीजारोपणाला खतपुरवठा केला. चौथ्या दिवशी भरपूर बाईज देऊन आणि शेवटच्या तासाभरात चार गडी गमावत त्याला पुरेसं पाणी दिलं होतं. त्याचीच फळं मिळतील, हे पाचव्या दिवशीच्या पहिल्या दोन तासांत आणखी चार गडी गमावून निश्चित केलं.

नेमक्या मोक्याच्या वेळी भारताची आघाडीची फळी कच का खाते? धावा फक्त २०० करायच्या होत्या आणि त्यासाठी दिवसभराहून अधिक वेळ होता. खेळपट्टीवर टिकून राहिलं असतं तरी त्या निघाल्या असत्या. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेनं ते दाखवून दिलं होतं. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी आवश्यक होतं तेव्हाच हे केलं नाही.

जयस्वाल आणि नायर
यशस्वी जयस्वाल फक्त स्वतःसाठी खेळतो का, असा प्रश्न विचारण्याची आणि त्याचं उत्तर शोधण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ ह्यांच्याच वाटेनं तो चालला आहे, असं म्हणणं घाईचं होईल का? आपल्या तिसऱ्या कसोटीत त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायर ह्याचा अध्याय आता संपल्यात जमा आहे. त्या त्रिशतकानंतरच्या १० डावांत त्याला पन्नाशीही गाठता आलेली नाही. एकच कसोटी खेळल्यानंतर बाहेर बसलेला साई सुदर्शन पुनरागमनासाठी उत्सुक असेल.

शेपटानं प्रतिकार केला नसता, तर भारताचा हा पराभव कदाचित अधिक मोठा असला असता. पाचव्या दिवशी उपाहारानंतरच्या तासाभरात तो झाला असता. अनुभवी रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि महंमद सिराज ह्यांनी तो लांबणीवर टाकला. टिच्चून खेळत त्यांनी पराभवाचं अंतर कमी केलं. दोन्ही डावांमध्ये भारतानं दिलेल्या इतर धावांपेक्षा कमीच!

शेवटचे चार नि आघाडीचे पाच

एक अपयशी झुंज...
जाडेजा दुसऱ्या डावात संघाच्या वाट्याला आलेले ४० टक्के
चेंडू खेळला नि धावा केल्या 
३५ टक्के!
...............
भारताचा दुसरा डाव ७४.५ षट्कं म्हणजे ४४९ चेंडू चालला. त्यातले १८१ चेंडू सातव्या क्रमांकावर आलेला रवींद्र जाडेजा खेळला. म्हणजे ४० टक्क्यांहून थोडे जास्त. (आणि त्याच्या धावा ३५ टक्के!) पहिल्या सहा फलंदाजांनी मिळून खेळलेल्या चेंडूंपेक्षा ५१ जास्त. शेवटचे तिघे - नितीशकुमार रेड्डी, बुमराह व सिराज मिळून १३७ चेंडू खेळले. फलंदाज म्हणून घेतलेल्या पाच जणांपेक्षा १८ जास्त. ह्या चौघांनी डावातल्या ८१ टक्के चेंडूंचा सामना केला. डावातील ४८ टक्के धावा त्यांनी केल्या. जाडेजा आणि राहुल ह्या दोघांच्या धावांची बेरीज १०० होते. थोडक्यात हिशेब मांडायचा तर गोलंदाजांनी कमावलेलं फलंदाजांनी बेफिकिरीने घालवलं.

कर्णधारपदाचा फारसा अनुभव नसलेल्या शुभमन गिल ह्याला प्रतिस्पर्धी कर्णधाराकडून बरंच काही शिकता आलं असेल, असं म्हणता येईल. सामन्याचा मानकरी ठरलेल्या बेन स्टोक्स ह्यानं दोन्ही डावांत किल्ला लढविला. पहिल्या डावात शतकवीर जो रूटबरोबर महत्त्वाची भागीदारी केली. मग नेहमीप्रमाणे चेंडू हातात घेतल्यावर लगेच संघाला यश मिळवून दिलं. एखाद्या ॲथलीटसारखी चपळाई दाखवत तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत ह्याला धावचित केलं. पहिल्या डावात आघाडी मिळवण्याचं भारताचं स्वप्न तिथंच भंगलं. दुसऱ्या डावातही त्यानं ३३ धावा केल्या आणि तीन बळी मिळवले. निकाल लागेपर्यंत त्यानं प्रयत्नात कोणतीही कुचराई ठेवली नाही.

लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर यजमान संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक ह्यांना हवी तशी खेळपट्टी मिळाली नाही, असं ‘द गार्डियन’च्या बातमीत म्हटलं होतं. त्यामुळे यजमानांचं फार काही बिघडलं नाही, हे पहिल्याच दिवशी दिसून आलं. पहिल्या दिवसाअखेर त्यांनी चार गडी गमावून अडीचशेचा टप्पा पार केला. दुसऱ्या कसोटीतील हीरो आकाशदीप इथं झीरो ठरलेला दिसला. विश्रांती घेऊन संघात परतलेल्या जसप्रीत बुमराहच्या बरोबर नवा चेंडू महंमद सिराजऐवजी त्याच्या हातात आला. पण भारताचा सर्वांत महागडा गोलंदाज तोच ठरला.


तिसऱ्या कसोटीतील एकमेव शतकवीर
जो रूट ह्याच स्वीपचा हुकुमी फटका.
.............................
रूट-स्टोक्सची भागीदारी
चौथा गोलंदाज म्हणून नितिशकुमार रेड्डी आला आणि त्यानं पहिल्याच षट्कात दोन झटके दिले. दोन्ही सलामीवीरांना त्यानं यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. त्यानंतर पोप-रूट जोडीनं पडझड होऊ न देता शतकी भागीदारी केली. त्यांनी फटक्यांची आतषबाजी केली नाही. कसोटीला साजेसा खेळ केला. तो बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला. स्टोक्सनं मग रूटला चांगली साथ देत, ७९ धावांची भागीदारी केली. खुद्द कर्णधार मैदानात असतानाही त्याच्या संघानं बॅझबॉल शैलीचा खेळ आज केला नाही, ही सलामीच्या दिवशीची गंमत.

बुमराहनं दुसऱ्या नव्या चेंडूवर दुसऱ्या दिवशी सकाळीच करामत केली. आधी त्यानं बेन स्टोक्सची ऑफची यष्टी वाकविली. पुढच्या षट्कात शतकवीर रूटची मधली यष्टी गुल झाली. पुढच्याच चेंडूवर ध्रुव जुरेलकडे झेल देऊन ख्रिस वोक्स परतला. पहिल्या दिवसाच्या धावांमध्ये जेमतेम २० धावांची भर पडली असताना यजमान संघाने तीन गडी गमावले होते.

तीन त्रिफळे
हा दिवस बुमराहचा होता. त्यानं पुन्हा एकदा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. आपण पहिल्या नंबरचेच आहोत, हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्याच्या पाच बळींपैकी तीन वरच्या फळीतले आहेत - ब्रूक, स्टोक्स आणि रूट; तिघांचाही त्रिफळा उडालेला.

‘लक्ष दे रे. नाही तर पुन्हा म्हणशील मी तयार नव्हतो..!’ लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात महंमद सिराज ह्यानं पहिल्या स्लिपमध्ये उभ्या राहिलेल्या के. एल. राहुल ह्याला सुनावलं होतं म्हणे. राहुलनं ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळीही लक्षात ठेवायला हवं होतं. सिराजच्या सोळाव्या आणि डावातल्या ८७व्या षट्कातल्या तिसऱ्या चेंडूवर त्यानं जेमी स्मिथ ह्याचा झेल सोडला. ह्या झेलाबरोबर भारतानं इंग्लंडला तीनशेच्या आत-बाहेर, फार तर सव्वातीनशेच्या आत गुंडाळण्याची संधी सोडली.

नेहमीप्रमाणंच जेमी स्मिथनं परिस्थितीचं दडपण घेतलं नाही. ब्रिडन कार्स ह्याला जोडीला घेऊन त्यानं ७४ धावांची अतिशय महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ती बऱ्यापैकी निर्णायक ठरली, असं आता म्हणता येईल. स्मिथनं सलग तिसऱ्यांदा पन्नाशीपुढे मजल मारली आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या कार्स ह्यानंही तुलनेनं आक्रमक अर्धशतक झळकावलं. डावातला एकमेव षट्कार त्याच्याच नावावर होता.
भारतीय क्षेत्ररक्षकांच्या रूपाने दुर्दैवानं सिराजची पाठ सोडली नाही. त्याच्या गोलंदाजीवर कार्सला आकाशदीप आणि जुरेल ह्यांनी जीवदान दिलं. शेवटच्या तीन जोड्यांसाठी इंग्लंडला शंभराहून अधिक धावा  करू देण्याची चूक भारताला महाग पडलं.

स्टोक्स मदतीला धावलाच
यशस्वी जयस्वाल ह्यानं पहिल्याच षट्कात वोक्सला तीन चौकार मारत आतषबाजीची झलक दाखविली. पण पुनरागमन करणाऱ्या जोफ्रा आर्चर ह्यानं तिसऱ्याच चेंडूवर त्याला परतवलं. संघ व्यवस्थापनानं पुन्हा एकदा विश्वास टाकलेल्या करुण नायरनं आर्चरलाच नंतर दोन चौकार लगावले. राहुल - नायर जोडी जमते आहे, असं वाटत असतानाच इंग्लंडच्या मदतीला स्टोक्स आला. प्रत्येक वेळी त्यानं गोलंदाजीला आल्यावर संघाला यश मिळवून दिलेलं आहे. ह्या डावात चाळिशीपर्यंत गेलेल्या नायरचा रूटने स्लिपमध्ये सुंदर झेल घेतला.

कर्णधार शुभमन गिल ह्याला वोक्सनं स्मिथकडे झेल द्यायला लावला, तेव्हा संघाचं शतक नुकतंच झालं होतं. जखमी ऋषभ पंत कधी खेळायला येणार, ह्याबाबत संभ्रम असताना तो पाचव्या क्रमांकावरच आला. त्यानं आणि राहुलनं शेवटची तीन षट्कं अतिशय संयमानं खेळून काढली. तिसऱ्या दिवशी भारतानं आघाडी मिळविण्याच्याच उद्दिष्टानं खेळायला हवं होतं. पण शेवटचे चार खेळाडू अवघ्या बारा धावांची भर घालून बाद झाले.

राहुलचं शतक लवकर पूर्ण व्हावं, ही पंतची इच्छा त्याच्या अंगलट आली. त्यानंतर लगेच राहुलही परतला. जाडेजा, सुंदर आणि रेड्डी ह्यांच्यामुळे भारताला किमान बरोबरी तरी साधता आली. चौथ्या डावात आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे, ह्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही. त्याची किंमत २२ धावांच्या पराभवाच्या रूपाने चुकवावी लागली. कारण फलंदाज उभं राहतो, त्या भागातील धूळ उडत असल्याचं दुसऱ्या दिवशीच दिसलं होतं.

ह्या सामन्याच्या चार दिवसांनी वेगवेगळे रंग दाखवले. पहिल्या दिवशी कसोटीला साजेसा संथ खेळ झाला. गडी फक्त चार बाद झाले. दुसऱ्या दिवशी धावांची गती वाढली आणि बळींची संख्याही. तीस धावा आणि पाच गडी अधिक. तिसऱ्या दिवशी सर्वांत कमी धावा झाल्या - २४४ आणि गडी बाद झाले सात. चौथ्या दिवशी १४ फलंदाज बाद झाले आणि धावा निघाल्या २४८. शतक सोडा, कोणाचं साधं अर्धशतकही झालं नाही, असा हा एकमेव दिवस.

चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात हुकमी एक्का जसप्रीत बुमराह चालत नसताना महंमद सिराज ह्यानं दोन बळी घेतले - त्याला नितिशकुमार रेड्डी आणि आकाशदीप ह्यांनी साथ दिली. जो रूट आणि बेन स्टोक्स ह्यांची जोडी जमली होतीच. त्यांनी पाचव्या जोडीसाठी ६७ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावाप्रमाणेच ही जोडी त्रास देणार असं दिसत होतं.

वॉशिंग्टनच्या फिरकीचं जाळं
चहापानाच्या थोडं आधी वॉशिंग्टन सुंदर ह्यानं ही जोडी फोडली. आपल्या तिसऱ्या षट्कात त्यानं रूटचा लेग स्टंप वाकवला. आकार घेत असलेल्या भागीदारी संपली. त्यानंतर आला होता आतापर्यंत धोकादायक ठरलेला जिमी स्मिथ. पण त्यालाही वॉशिंग्टननं टिकू दिलं नाही. त्याची ऑफची यष्टी त्यानं उखडली! वॉशिंग्टनच्या फिरकीचं जाळं आणि बुमराहचा धारदार मारा ह्यामुळे इंग्लंडची कोंडी झाली होती. त्यांनी शेवटचे सहा गडी ३८ धावांत गमावले. गमतीची गोष्ट म्हणजे ह्या मालिकेतली सर्वांत कमी धावसंख्या करणाऱ्या इंग्लंडचा एकही फलंदाज शून्यावर बाद झाला नाही. त्यांच्या सात फलंदाजांचा त्रिफळा उडाला, तर एक पायचित झाला.

दुसऱ्या डावात भारतानं चार गडी गमावल्यानंतरही चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यावर वॉशिंग्टन सुंदर ‘आम्हीच जिंकणार’ असं आत्मविश्वासानं सांगत होता. त्या आत्मविश्वासाला साजेसा खेळ करणं त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाचव्या दिवशी जमलं नाही. जोफ्रा आर्चर, स्टोक्स आणि वोक्स ह्यांच्यापुढे भारतीयांनी नांगी टाकली. अपवाद जाडेजा ह्याचा. दोन्ही संघांच्या दुसऱ्या डावातलं एकमेव अर्धशतक त्याचं. इंग्लंडला दुसऱ्या डावात बाईजच्या रूपात २५ धावांचा बोनस मिळाला होता. तो फार महागात गेला.

मालिका संपली नाही. दोन कसोटी बाकी आहेत. त्यात भारत दुसऱ्या सामन्याप्रमाणे उसळी मारून वर येईल का? त्यासाठी संघात काही बदल करावे लागतील. मैदानावर आक्रमक वागण्यापेक्षा खेळातली आक्रमकता वाढवावी लागेल. असं झालं तर इंग्लंडला नमवणं फार अवघड नाही.
.........
(छायाचित्रं सौजन्य - ‘आय. सी. सी.’,  ‘द गार्डियन’ व बी. सी. सी. आय.)
.........

#भारत_इंग्लंड
 #कसोटी_मालिका #अँडरसन_तेंडुलकर_करंडक #तिसरी_कसोटी #लॉर्ड्स #बेन_स्टोक्स #बुमराह #जेमी_स्मिथ #वॉशिंग्टन_सुंदर #जो_रूट #जोफ्रा_आर्चर
.........

सोमवार, ७ जुलै, २०२५

नवा नेता, नवा इतिहास

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट
बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं.
पावसानं हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही.
दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून भारतीय संघानं
एजबॅस्टनवर नवीन इतिहास लिहिला.
कर्णधार शुभमन गिल, आकाशदीप, सिराज, जाडेजा,
सुंदर हे त्याचे शिल्पकार होत!
......................................


सामन्याचा मानकरी तो ठरला असला, तरी त्या पदकावर आणि शाम्पेनच्या
बाटलीवर ह्यानंही अधिकार सांगितला होताच की!

------------------------------
सामना जवळपास पाच दिवस चालला. धावा निघाल्या सतराशेच्या आसपास. दोन्ही संघांचे मिळून ३६ गडी बाद झाले. म्हणजे रोज सरासरी तीनशेहून अधिक धावा आणि पाच गडीही बाद. एकूण शतकं चार आणि अर्धशतकं सहा. सामन्यात १० बळी घेणारा एक गोलंदाज आणि डावात पाच वा अधिक गडी बाद करणारे त्याच्यासह दोघं. आणि सामन्याचा निकाल लागलेला. दणदणीत म्हणावा असा विजय पाहुण्या संघानं यजमानांवर मिळवला. आठवड्यापूर्वीच्या पराभवाची साभार नि सहर्ष परतफेड!

एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इथे झालेल्या भारत व इंग्लंड संघांमधील दुसऱ्या कसोटी सामन्याची ही रंगलेली कहाणी. सामन्याचा निकाल एकतर्फी लागेल, हे चौथ्या दिवशी आणि त्यातही शेवटच्या सत्रात स्पष्ट झालं. इंग्लंडपुढे एव्हरेस्ट सर करण्यासारखं आव्हान होतं आणि दुसऱ्या डावातले तीन गडी त्यांनी गमावलेले.

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं. ते अवघड होतंच आणि पावसानं दिवसाच्या सुरुवातीलाच हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही. ह्या पावसामुळे भारतीय चाहत्यांची धडधड सकाळी वाढली होती. पण निसर्गानंही साथ दिली. बर्मिंगहॅममध्ये आठपैकी सात कसोटी सामन्यांत पराभूत झालेल्या भारतानं नवव्या सामन्यात नव्या दमाच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास लिहिला.

एकटा गिलच भारी
आकड्यांचाच आधार घेऊन बोलायचं तर ह्या सामन्याची किती तरी वैशिष्ट्यं सांगता येतील. भारताचा कर्णधार शुभमन गिल ह्यानं सामन्यात एकूण ४३० धावा केल्या. इंग्लंडला एकाही डावात तेवढ्या करता आल्या नाहीत. त्यानं पहिल्या डावात केल्या, त्याहून फक्त दोन अधिक धावा इंग्लंडला दुसऱ्या डावात करता आल्या. (शेवटच्या दोन जोड्यांनी टोलवाटोलवी करीत ४५ धावांची भर घातलेली, इथे लक्षात घेतली पाहिजे.)

शुभमनचं पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात आक्रमक दीडशतक. इंग्लंडकडून पहिल्या डावात तुफानी खेळ करणाऱ्या यष्टिरक्षक जेमी स्मिथच्या नाबाद १८४ धावा. दुसऱ्या डावातही त्याच्याच धावा सर्वाधिक - ८८. पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर इंग्लंडच्या फलंदाजांनी चार षट्कार ठोकले. त्यातले दोन नवव्या व अकराव्या क्रमांकावरच्या गोलंदाजांचे. भारताने चौथ्या दिवशी, दुसऱ्या डावात एक दिवशीय सामना खेळत असावा, त्या गतीने धावा केल्या. त्यात एकूण १३ षट्कार आणि पैकी आठ गिलचे. इंग्लंडच्या दोन्ही डावांतील षट्कारांची संख्या ११ आणि दोन्ही डावांमध्ये स्मिथने षट्कारांचा चौकार मारलेला.

सर्वांत मोठी भागीदारी पराभूत संघाची
सामन्यातली सर्वांत मोठी भागीदारी विजयी संघाची नव्हती, तर पराभूत संघाकडून झालेली. निम्मा संघ शंभराच्या आत गारद झालेला. समोर आव्हानं ६०० धावांच्या जवळचं. त्याचं अजिबात दडपण न घेता, किंबहुना ते झुगारून हॅरी ब्रूक व स्मिथ ह्यांनी सहाव्या जोडीसाठी त्रिशतकी भागीदारी केली. त्या डावातली त्यांच्याकडून तेवढीच एक शतकी भागी. संपूर्ण सामन्यातील चौदापैकी दोनच सत्रांवर इंग्लंडचं वर्चस्व होतं आणि त्याचं कारण ही भागीदारी आकार घेत होती.

गंमत अशी की, दुसऱ्या डावातही सर्वांत मोठी भागीदारी सहाव्या जोडीसाठीच झाली. त्यातला एक भागीदार पुन्हा स्मिथच होता आणि त्याचा जोडीदार कर्णधार बेन स्टोक्स. पहिल्या डावात ५ बाद ८४ आणि दुसऱ्या डावात ८३. ह्या वेळची भागीदारी डावातली सर्वाधिक असली तरी फक्त ७० धावांची. पराभवाची नामुष्की थांबविण्याची ताकद तीत नव्हती.


जाडेजा आणि गिल. पहिल्या डावातील ह्यांच्या भागीदारीनं
विजयाचा पाया रचला.
------------------------------
भारतीय संघाची सामन्यातील सर्वांत मोठी द्विशतकी भागीदारी पहिल्याच डावातली आणि सहाव्या जोडीसाठी. ती गिल आणि रवींद्र जाडेजा ह्यांची. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या रूपाने पुन्हा एका फिरकी गोलंदाजाला साथीला घेऊनच गिलने सातव्या जोडीसाठी दीडशतकी भागीदारी केली. गिल व जाडेजा ह्यांनी दुसऱ्या डावातही पावणेदोनशे धावांची भागीदारी केली. सातव्या आणि सहाव्या क्रमांकावर येऊन अर्धशतकं झळकावण्याची कामगिरी एकट्या जाडेजालाच साधली!

सहा जणांचा भोपळा
ब्रूक आणि स्मिथ ह्यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं फॉलो-ऑन वाचविला. पण संघाच्या फलंदाजीची वैगुण्यं त्याच डावात दिसून आली. संघाच्या धावा चारशे पार आणि तरीही सहा फलंदाजांना भोपळा फोडण्यात अपयश! दोघे शतकवीर सोडले, तर इतर दोघांनाच दुहेरी धावा करता आलेल्या.

दुसऱ्या डावात मात्र सलामीवीर झॅक क्रॉली हा एकटाच भोपळ्याचा मानकरी. तळाच्या दोघांसह आठ फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठलेली. पण खेळपट्टीवर टिकाव कोणी धरला नाही. अपवाद स्मिथ आणि काही काळ स्टोक्स ह्यांचा. परिणामी पावणेतीनशे धावा करताना संघाची दमछाक झाली.

पहिल्या कसोटीत भारताच्या तळाच्या फलंदाजांनी दोन्ही डावांची माती केली. ते चित्र एजबॅस्टनला दिसलं नाही आणि त्याहून ते फार जाणवलं नाही. पहिल्या डावात सहाशेचा उंबरठ्यावर आणि दुसऱ्या डावात सव्वाचारशेच्या वर एवढ्या धावा निघाल्या. धावांची गंगा वाहत असताना कोरडा राहिला तो एकटा नितिशकुमार आणि काही प्रमाणात करुण नायर. ब्रिडन कार्स ह्यानं तर पहिल्या डावासारखंच दुसऱ्या डावातही नायरला मामा बनवलं.

तिघांहून आकाशदीप फार सरस!
आकाशदीपनं सामन्यात १० बळी घेतले - पहिल्या डावात चार नि दुसऱ्या डावात सहा. यजमानांचे आघाडीचे तीन गोलंदाज - ख्रिस वोक्स, ब्रिडन कार्स आणि जॉश टंग ह्यांनी मिळून भारताचे सोळापैकी आठ गडी बाद केले. त्यासाठी त्यांनी दोन्ही डावांत मिळून ११८ षट्कं टाकली. आकाशदीपपेक्षा ७७ षट्कं अधिक!

फलंदाजीप्रमाणंच आघाडीच्या गोलंदाजांचं अपयश स्टोक्सला सतावत असणार. जेमतेम बाविशीच्या घरात असलेल्या शोएब बशीर ह्यानं पहिल्या डावात ४५ षट्कं टाकत इंग्लिश गोलंदाजीचा भार वाहिला. त्याला तीन बळी मिळाले, ते दीडशेहून अधिक धावा देऊन. पहिल्या डावात पाच षट्कं टाकणारा हॅरी ब्रूक आणि नितिशकुमार रेड्डी, हे दोघेच बळी न मिळालेले गोलंदाज.

नव्या चेंडूवर भारतीय जलदगती गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांपेक्षा किती तरी अधिक सरस ठरले. विजय आणि पराभवातलं हेच अंतर होतं. जगातला पहिल्या क्रमांकाच्या गोलंदाजाला विश्रांती देण्याच्या भारतीय व्यवस्थापनाच्या निर्णयावर सामना सुरू झाला तेव्हा बरीच टीका झाली. तथापि महंमद सिराज आणि आकाशदीप ह्यांनी जसप्रीत बुमराह ह्याची उणीव भासू दिली नाही. ही जमेची फार मोठी बाजू म्हणावी लागेल.

अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी चाललेल्या ह्या मालिकेतील पहिलाच सामना गमावल्यानंतर लगेच भारतीय संघ एवढ्या ताकदीनं उसळून आला. अशी उदाहरणं पाहायची झाल्यास ऑस्ट्रेलियाचा २०२०-२१चा दौरा आठवतो. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावांत नीचांकी ३६ धावांमध्ये गुंडाळला गेलल्या भारतीय संघाने नंतरच्या तीनपैकी दोन सामन्यांत कागांरूंना नमवलं. त्या आधी २००१च्या ऑस्ट्रेलियानं केलेल्या दौऱ्यात पहिली कसोटी हरल्यावर खचून न जाता भारतानं मालिका जिंकली होती. शुभमन गिलचा संघ तोच कित्ता गिरवणार काय, हे पाहायला हवं.

पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारणाऱ्या बेन स्टोक्सवर मोठी टीका झाली. पण 'बेझबॉल' शैलीनं विजय मिळवून स्टोक्सनं टीकाकारांना उत्तर दिलं. त्यामुळेच ह्या कसोटीतही त्यानं तसाच निर्णय घेतला. तो मात्र पूर्ण अंगलट आला. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोनशेच्या आसपास धावा आणि पाच गडी बाद, ही परिस्थिती म्हटलं तर दोन्ही संघांसाठी सारखीच होती. आधीच्या सामन्यातील दोन्ही डावांत भारतीय संघ कोलमडून पडलेला. त्यामुळे स्टोक्सला फार काही वाईट वाटलं नसावं.

लाजवाब द्विशतक
गिल, जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर ह्यांच्या मनात मात्र वेगळं काही होतं. ते दुसऱ्या दिवशी दिसून आलं. गिलनं खणखणीत द्विशतक झळकावलं. त्याचा स्ट्राईक रेट दीड शतकानंतर कमालीचा वाढलेला दिसला. प्रतिस्पर्ध्याला एकही संधी न देता त्यानं केलेला खेळ लाजवबाच! पहिल्या दिवशीच्या ३१० धावांत गिलचा वाटा होता ११४ धावांचा आणि  दुसऱ्या दिवशी केलेल्या २७७ धावांमध्ये १५५. सुंदरने आधी खेळपट्टीवर ठिय्या मांडून नंतर केलेली फटकेबाजी महत्त्वाची ठरली.

भारतानं दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात तीन गडी बाद करीत इंग्लंडला झटका दिला. पहिल्याच षट्कात १२ धावांची खिरापत वाटणाऱ्या आकाशदीपनं दुसऱ्या षट्कात कमाल केली. बेन डकेट ह्याचा गिलनं सुंदर झेल घेतला. त्याच्या पाठोपाठच्या चेंडूवर ओली पोप के. एल. राहुलकडे झेल देऊन परतला. महंमद सिराज ह्यानं क्रॉलीला बाद केलं.

सामना रंगतदार ठरणार, असं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर स्पष्ट झालं होतं. तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर पहिल्या तासातच सिराजनं लागोपाठच्या चेंडूंवर रूट आणि स्टोक्स ह्यांचा अडथळा दूर केला. निम्मा संघ गारद! आणखी ५०० आणि फॉलो-ऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान ३०० तरी धावा करायला हव्या. मोठंच आव्हान होतं हे.

धडाकेबाज ब्रूक-स्मिथ
हे दडपण ब्रूक आणि स्मिथ ह्यांनी झुगारून दिलं. उपाहारपर्यंतच्या २७ षट्कांमध्ये १७२ धावांची भर पडलेली. म्हणजे षट्कामागे जवळपास साडेसहा धावांची गती. वरची फळी कापलेली आणि सहा शतकी लक्ष्य असताना ह्या दोघांनी केलेला खेळ धडाकेबाज म्हणावा असाच होता. त्यातही स्मिथचा तडाखा औरच होता. त्याचं अर्धशतक ४३ चेंडूंमध्ये आणि शतकासाठी लागले ८० चेंडू.


ब्रूक-स्मिथ ह्यांची त्रिशतकी भागीदारी.
------------------------------
उपाहार ते चहापान ह्या दोन तासांमध्ये ह्या जोडीनं भारतीय गोलंदाजांची अजिबात डाळ शिजू दिली नाही. त्यात त्यांनी १०६ धावांची भर घातली. कारकिर्दीतलं दुसरं शतक करणाऱ्या स्मिथची गती दीडशे धावा करेपर्यंत चेंडूमागे धाव अशीच होती. त्यानंतर मात्र तो काहीसा संथ झाला. तरीही त्याची नाबाद १८४ धावांची खेळी फक्त २०७ चेंडूंमधली. त्यात २१ चौकार आणि ४ खणखणीत षट्कार.
 
चहापानानंतर पाच षट्कं झाली आणि भारताला नवा चेंडू उपलब्ध झाला. ब्रूक-स्मिथ जोडीनं फॉलो-ऑन टाळला आणि लगेचच आकाशदीप ह्यानं कमाल केली. त्यानं आधी ब्रूकचा त्रिफळा उडवला. त्या पाठोपाठ ख्रिस वोक्स बाद झाला. पुढे धमाल केली महंमद सिराज ह्यानं. त्यानं इंग्लंडचं शेपूट झटपट गुंडाळत खात्यात अर्धा डझन बळींची नोंद केली. सकाळच्या पहिल्या तासात आणि इंग्लंडचा डाव गुंडाळताना त्यानं केलेला मारा बुमराहची उणीव जाणवू न देणारा ठरला.

इंग्लंडचे शेवटचे पाच गडी फक्त २० धावांमध्ये बाद झाले. पाहुण्यांचं यजमानांनी केलेलं नकोसं अनुकरण!
 
पहिल्या डावातली १८० धावांची आघाडी फारशी नाही, असं समजूनच भारतानं चौथ्या दिवशी खेळ केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताच्या चाहत्यांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तीनपैकी अडीच सत्रांमध्ये गिल, ऋषभ पंत, जाडेजा ह्यांनी दिली. ‘एकही गिल, सबका दिल’ असंच कर्णधाराच्या दणकेबाज दीड शतकाचं वर्णन करताना लिहावं लागेल.

ह्याची सुरुवात पंतनं केली. त्यानं एक दिवशीय सामन्याला साजेशी फलंदाजी केली. तो सुटला होता, तेव्हा समोर कर्णधारानं दुय्यम भूमिका स्वीकारलेली. पंत एवढ्या सैल हाताने खेळतो की, त्याची बॅट दोन वेळा लांबपर्यंत उडून गेली. परिस्थिती अशीच राहिली तर ह्यानंतर पंत खेळत असताना ३० यार्ड वर्तुळाच्या आतल्या सगळ्याच क्षेत्ररक्षकांना हेल्मेट घालणं अनिवार्य होईल! 😂😃

अवघ्या एका धावेवर असताना पंतला दोन जीवदानं मिळाली - एक कठीण आणि दुसरं सोप्पं! त्याची पुरेपूर किंमत इंग्लंडनं मोजली. पंत बाद झाला, तेव्हा गिल ५८ धावांवर (७० चेंडू) खेळत होता. पुढच्या १०३ धावा त्यानं ९२ चेंडूंमध्ये करीत धावफलक हलता नव्हे तर पळता ठेवला. ख्रिस वोक्स, जो रूट ह्यांच्या गोलंदाजीच्या त्यानं निर्दयीपणे चिंधड्या केल्या.

महंमद सिराजनं झॅक क्रॉली ह्याला बाद करून सुरुवात करून दिली. मग आकाशदीपनं बेन डकेटची दांडी उडवली. त्यानं क्रीजचा सुंदर वापर केला. रूट ज्या चेंडूवर बाद झाला, त्याची तर फारच चर्चा झाली. त्या बळीचं वर्णनं ‘द गार्डियन’ दैनिकाने ‘द शाम्पेन मूमेंट ऑफ द एंटायर मॅच’ असं केलं!

पावसानं व्यत्यय आणल्यावरही पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा एजबॅस्टनचं स्टेडियम भारतीय प्रेक्षकांनी भरलेलं. ‘आपण जिंकलंच पाहिजे’ एवढीच त्यांची अपेक्षा. आकाशदीपनं आली ओले पोपचा त्रिफळा उडवला आणि नंतर लगेच ब्रूकला पायचित पकडलं. भारतीय संघाला विजयाचा वास तेव्हाच आला. सावध खेळणारा स्टोक्स डावाला आकार देऊ पाहत होता ते स्मिथच्या साथीने. स्मिथचा धावा काढण्याचा वेग ह्या डावातही सुरुवातीला तसाच होता - जवळपास चेंडूमागे धाव. कर्णधारपदाचं ओझं असलेला स्टोक्स तुलनेनं संथ.

वॉशिंग्टनच्या फिरकीनं स्टोक्सला परत धाडलं. त्यानंतर यजमानांनी शंभर धावांची भर घातली, तरी पराभव टळेल, असं क्वचितच कधी वाटलं. स्मिथला ख्रिस वोक्स साथ देत होता, तेव्हा काहीशी काळजी वाटत होतीच. नाही असं नाही. पण महंमद सिराजनं त्याचा फार अफलातून झेल घेतला. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात एक बळी जमा झाला.

आकाशदीपला स्मिथनं सलग दोन षट्कार खेचले, तेव्हा निकाल लांबणार असं वाटत होतं. पण पुढचा चेंडू हळुवार बाउन्सर टाकून आकाशदीपनं त्याला बरोबर जाळ्यात अडकवलं. आकाशदीपच्या रूपानं भारतीय भात्यात चांगलं अस्त्र असल्याचं, त्याच्या ह्या सामन्यातील गोलंदाजीवरून वाटतं.

काही न सुटलेले प्रश्न
विजय मिळविला असला, तरी भारतीय संघापुढचे काही प्रश्न सुटलेले नाहीतच. क्षेत्ररक्षण हा त्यातला महत्त्वाचा. के. एल. राहुलच्या हातून आज एक सोपा झेल सुटला. चेंडू अडवतानाही गोंधळ होताना दिसला. पुढच्या कसोटीत करुण नायर, प्रसिद्ध कृष्णा, रेड्डी ह्यांना सक्तीची विश्रांती मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. साई सुदर्शन, कुलदीप, अर्षदीपसिंग देवाची प्रार्थना करीत असतीलच असं नाही. पण त्यांनाही ‘संधी’ हवी आहे. बुमराहचंही पुनरागमन होईल.

ह्या विजयानं एजबॅस्टनवरचा नवा इतिहास लिहिला आहेच. ह्याच इतिहासातली पुढची पानं अधिक दमदारपणे उरलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये लिहिल्या जातील, अशा अपेक्षा उंचावलेल्या असणं स्वाभाविकच.

(छायाचित्रं ‘आय. सी. सी.’,  ‘द गार्डियन’ व ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’  संकेतस्थळांवरून साभार.)
--------------------------
#भारत_इंग्लंड #कसोटी_मालिका #अँडरसन_तेंडुलकर_करंडक #एजबॅस्टन_कसोटी #शुभमन_गिल #आकाशदीप #जेमी_स्मिथ #बेन_स्टोक्स #महंमद_सिराज #नवा_इतिहास
......

पोरी... खेळणाऱ्या, जिंकणाऱ्या!

ह्या विजयानं अनेक गोष्टी बदलतील.  बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे. काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल. मुलींना अंग चोरून मुलांच्...