सोमवार, ८ मार्च, २०२१

कामावर न जाणाऱ्या बाया

 

(चित्र https://www.istockphoto.com संकेतस्थळाच्या सौजन्यानं)

खूप जुनी गोष्ट आहे. अकरा वर्षांपूर्वीची. गावाहून रात्री उशिरा घरी आलो. 'समकालीन भारतीय साहित्य'चा ताजा अंक आला होता. चाळताना एक कविता दिसली. वाचली. आवडली. कवितेचं नाव होतं 'उम्मीद' आणि कवी सुरेश नारायण कुसूंबीवाल. पत्ता भुसावळचा दिला होता.

कवितेचा नायक आशा करतोय की, यंदा पाऊस चांगला पडेल नि शेती पिकेल, पिकलेल्या मालाला भाव मिळेल आणि त्यातून कर्जाचा हप्ता जाऊनही हाती काही उरेल बुवा. मुलाला यंदा नोकरी लागेल आणि त्याच्या डोळ्यांतली निराशा मावळेल, यंदाच्या वर्षी कुठे दंगली होणार नाहीत, निवडणुकीत कुणाचे मुडदे पडणार नाहीत, अशीही आशा व्यक्त करतो तो. आशावाद व्यक्त करणारी कविता.

तिचा शेवट फारच सुंदर आहे. कवी लिहितो,

'उम्मीद है कि

कुछ भी हो जाए

न छूटे उम्मीद का दामन

हमारे हाथ से क्योंकि

उम्मीद पर ही टिकी है दुनिया'

... ह्या शेवटच्या ओळी इतक्या आवडल्या की, मध्यरात्र उलटून गेलेली असतानाही लगेच श्री. कुसूंबीवाल ह्यांनी 'एस. एम. एस.' पाठवला. दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला. आम्ही गप्पा मारल्या. ह्याच कवितेच्या रूपात त्या वर्षी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर काही महिन्यांनी श्री. कुसूंबीवाल ह्यांनी फोन करून घरचा पत्ता विचारला. काही दिवसांतच त्यांचा नवाकोरा कवितासंग्रह घरी पोहोचला. दिल्लीच्या 'शिल्पायन'नं प्रकाशित केलेला हा संग्रह म्हणजे 'बीच बाजार सच'. खरं तर हिंदी फारसं कळत नाही. त्यात पुन्हा ह्या कविता. पण कवीनं एवढ्या प्रेमानं पुस्तक पाठवलं आहे म्हटल्यावर वाचू लागलो. सोप्या भाषेतल्या कविता. त्यातल्या बऱ्याचशा बाईवर - काम करणारी, कामावर न जाणारी, संसाराचा गाडा चालवणारी, पोळ्या लाटणारी बाई. आवडलेल्या एका कवितेचा अनुवाद तेव्हा काम करीत असलेल्या दैनिकाच्या महिला दिनाच्या अंकासाठी केला. तोच इथं देतोय...

औरतें जो काम पर नहीं जातीं

औरतें जो काम पर नहीं जातीं

असल मे वही काम करती हैं

पूरे समय

जंगली फूल की तरह

करती हैं सुगंधित पवन

अज्ञात रहकर


औरतें जो काम पर नहीं जातीं

धरे रहती हैं

गृहस्थी-रथ का चक्र

कैकेयी की तरह, और

जीतता है दशरथ


वे खुश होती हैं

पिंजरे की चिड़िया की तरह


उनकी चहक से

चमचमाती है दीवारें, फर्श

नाचते हैं परदे खिड़कियों के, और

मुस्कराता है घर

पूरे दिन और सारी रात


औरतें जो काम पर नहीं जातीं

उन पर कभी हावी नहीं होती थकान

एक के बाद एक खेल को बदल लेती हैं वे

और, आखइर थक जाते हैं काम उनके आगे

---------------------------------------------

कामावर न जाणाऱ्या बाया

कामावर न जाणाऱ्या बाया

खरं तर अगदी अविरत

त्याच काम करत राहतात

एखाद्या रानफुलासारखं

वाऱ्याला परमाळून टाकण्याचं

अनाम राहून


कामावर न जाणाऱ्या बाया

कसून धरून ठेवतात

संसाराच्या गाड्याचं चाक

अगदी कैकेयीसारखं, आणि

जिंकत असतो दशरथ


खुशीत असतात त्या

पिंजऱ्यातल्या मैनेप्रमाणं


त्यांच्याच किलबिलीनं

चकाकतात भिंती, फरशा

पडदे खिडक्यांवरले नाचतात, आणि

हसतं-खेळतं राहतं घर

दिवसभर आणि सारी रात

 

कामावर न जाणाऱ्या बाया

दमत नाहीत, कधी थकत नाहीत

बदलत राहतात त्या एकामागून एक खेळ

आणि, मग कामंच बापुडी थकतात त्यांच्यापुढं

(पूर्वप्रसिद्धी - ८ मार्च २०१२)

...


शनिवार, ६ मार्च, २०२१

‘सूर्योदया’चा सुवर्णमहोत्सव

 

ते वर्ष महत्त्वाचंच होतं. आता इतिहासात स्थान मिळवलेल्या अनेक घडामोडी त्या वर्षात घडल्या. उदाहरणार्थ, इदी अमिन ह्यांनी लष्करी उठाव करून युगांडाची सत्ता ताब्यात घेतली. चीननं अमेरिकेच्या टेबल टेनिस संघाला आमंत्रण देऊन पिंगपाँग डिप्लोमसी सुरू केली. अमेरिकेनं सव्विसावी घटनादुरुस्ती करून मतदाराचं वय १८ वर्षावर आणलं. भारत आणि सोव्हिएत रशिया ह्यांनी २० वर्षांच्या मैत्री करारावर स्वाक्षऱ्या केल्या. द न्यू यॉर्क टाइम्सनं पेंटॅगॉन पेपर्स प्रसिद्ध करून युद्धखोर अमेरिकी सरकारचा खोटारडेपणा उघडकीस आणला. वॉल्ट डिस्ने वर्ल्ड थीम पार्कचं उद्घाटन झालं. वगैरे वगैरे...

ते वर्ष होतं १९७१. हिमाचल प्रदेशाच्या रूपानं भारतात अठरावं राज्य निर्माण झालं. पश्चिम बंगालला महापुराचा आणि ओडिशाला (तेव्हा ओरिसा) वादळाचा महाभयंकर तडाखा बसला.

वरच्या सगळ्या घटना-घडामोडी महत्त्वाच्या आहेत. पण सर्वसामान्य भारतीयांसाठी त्याहून खूप खूप महत्त्वाचं असं ह्याच वर्षानं दिलं.

पूर्व पाकिस्तानातील मुक्ती वाहिनीच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या सैन्यदलानं पाकिस्तानची नांगी ठेचली ती हेच वर्ष संपता संपता. बांगला देशाला स्वातंत्र्य मिळालं!

ह्याच वर्षात भारतीय क्रिकेट संघानं परदेशांतील दोन मालिकांमध्ये विजय मिळविला. आधी वेस्ट इंडिजमध्ये, मग इंग्लंडमध्ये.

...आणि ह्याच वर्षात भारतीय क्रिकेटला नवं स्वप्न पडलं. दीड दशक खेळून नवनवे विक्रम नोंदविणाऱ्या ह्या स्वप्नाचं नाव सुनील मनोहर गावसकर. भारतीय संघासाठी, क्रिकेटप्रेमींसाठी लख्ख सनी डेज घेऊन आलेल्या गावसकर ह्यांच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात झाली, त्याचा आज (६ मार्च) सुवर्णमहोत्सव!

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून गावसकरांनी पदार्पण केलं. पहिल्याच कसोटीपासून त्यांचं नातं विक्रमांशी जडलं. वेस्ट इंडिजमध्ये भारतानं मिळविलेला हा पहिला विजय. सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये (दुसऱ्या डावात नाबाद) त्यांनी अर्धशतक झळकावत ह्या संस्मरणीय विजयात सिंहाचा वाटा उचलला. चारही सामन्यांतील त्यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्यांदाच मालिका जिंकता आली.

पन्नास, साठ आणि सत्तरीच्या दशकांमध्ये ज्यांचा जन्म झाला, त्या पिढ्यांमधले बहुतेक सारे सुनीलचे चाहते. त्या असंख्यांमधला मी एक. क्रिकेटच्या बातम्या वाचायला लागलो, सामन्यांचं धावतं वर्णन ऐकायला लागलो त्या शाळकरी वयापासून सुनील गावसकर हाच नायक. तो मुंबईकडून खेळतो म्हणून मी मुंबई संघाचा चाहता. त्या शाळकरी वयात एकदा त्याला पत्रही लिहिलं होतं. आंतर्देशीय. कुठून तरी त्याचा पत्ता मिळवून. प्रिय सुनीलदादा असा मायना लिहून. ते त्याच्यापर्यंत पोहोचलं नसावं. पोहोचलं असेल, तर त्यानं वाचलं नसावं. वाचलं असेल त्यानं कदाचित, तर त्याला उत्तर द्यावं वाटलं नसावं. त्याच्या फॅन मेलमध्ये कधी तरी आपला उल्लेख होईल, अशी (भाबडी) आशा होती तेव्हा.

पॅकर सर्कस चालू असताना वेस्ट इंडिजचा दुबळा संघ भारतात आला होता. पहिल्याच कसोटीत घरच्या मैदानावर सुनीलनं द्विशतक झळकावलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी दैनिकात पहिल्या पानावर आठ कॉलमांत त्याच्या त्या खेळीतील फटक्यांची प्रसिद्ध झालेली छायाचित्रं अजून लक्षात आहेत. इंग्लंडविरुद्धची त्याची २२१ धावांची खेळी रेडिओवर ऐकली. त्यानंतरही सामना जिंकता न आल्याची हळहळ वाटत राहिली. वेस्ट इंडिजविरुद्ध १९८२-८३च्या दौऱ्यात त्याला मुळीच सूर सापडला नव्हता. त्याचा त्रास होई. मग तिसऱ्या कसोटीत त्यानं १४७ धावांची खेळी केली, तेव्हा रेडिओवर उत्तररात्रीपर्यंत ती ऐकत होतो. माल्कम मार्शलला हूक मारण्याचं धाडस करत त्यानं केलेली आक्रमक खेळी आणि उपाहारापूर्वीच होता होता राहिलेलं शतकही लक्षात आहे. तेंडुलकर बाद झाल्यावर (वैतागून) टीव्ही. बंद करणारे अनेक जण होते. सुनील बाद झाला की, आम्ही रेडिओचा कान पिळत असू!

तेव्हा लेख नाही, पण वाचकांच्या पत्रात लिहीत होतो. त्यानं एकोणतिसावं शतक करीत डॉन ब्रॅडमन ह्यांच्या विक्रमाची बरोबरी केली, नंतरचं शतक काढून नव्या विक्रमाची नोंद केली, त्या दोन्ही वेळा पत्रं लिहिली. तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेत मुंबईकर खेळाडूंवर अन्याय झाल्याची भावना वि. वि. करमकरकर ह्यांनी 'महाराष्ट् टाइम्स'मधून व्यक्त केली होती. ती फारच पटली. मग पत्र लिहिलं - ह्या स्पर्धेत भारत ज्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला, त्या दोन्हींमध्ये सुनीलचा संघात समावेश नव्हता. हा निव्वळ योगायोग नाही!आता हसू येतं त्या समर्थनाचं. ह्या साऱ्या पत्रांची कात्रणं तीन-साडेतीन वर्षांपूर्वी निकालात काढली. सुनील तेव्हा वीक पॉइंट होता. त्याला खेळताना प्रत्यक्ष पाहण्याची संधी एकदाच मिळाली. पुण्यातल्या नेहरू स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध. पत्रकार पक्षात बसून पाहिलेला भारताचा तो पहिलाच सामना. एकदम रद्दड झालेला. आपण हरलो. अवघ्या सात धावा काढून सुनील धावबाद झाला होता.

गावसकरांशी अगदी जवळून 'ओळख' होण्याचा योग नियती घेऊन आली. क्रीडांगण पाक्षिकात नोकरीसाठी अर्ज केला होता. नोव्हेंबर १९८६. अर्ज वाचून श्री. सर्जेराव घोरपडे ह्यांनी विचारलं, कधीपासून येताय?’ मी तयारच होतो. त्या आधी त्यांनी अनुभवाबद्दल विचारलं. शतायुषी दिवाळी अंकात काम केल्याचं सांगितल्यावर ते म्हणाले होते, दिवाळी अंकाचं काम काय वर्षभरात कधीही करता येतं हो! इथं तसं नसतं... (पुढे एका दैनिकातील मुलाखतीत क्रीडांगणचा अनुभव सांगितल्यावर ते संपादक म्हणाले होते, ते काम काय पंधरवड्यात कधीही करता येतं हो...)

क्रीडांगणमध्ये जाऊ लागलो तेव्हा तिथं तयारी सुरू होती सुनील गौरव अंक प्रसिद्ध करण्याची. म्हणजे बहुतेक लेखांचं काम झालं होतं. मांडणीचं काम चाललं होतं. किरकोळ मजकूर येणं बाकी होतं. छायाचित्रांच्या ओळी द्यायच्या होत्या. ते काम पाहताना छाती दडपून गेली. आपल्या (अत्यंत) आवडत्या खेळाडूबद्दल एकाच वेळी एवढं वाचायला मिळणार, त्याचे इतके फोटो पाहायला मिळणार, ह्यानं हरखून गेलो. थेट सुनीलची मुलाखत छापण्यापूर्वीच वाचायला मिळाली होती. त्याची पानं हाताळत होतो. मजकुराच्या ब्रोमाईड पट्ट्या चिकटवलेली जाड पानं. तेव्हा श्री. सर्जेरावांनी मंत्र सांगितला होता - Artwork should be handled like glass!

सुनील गौरव अंक म्हणजे श्री. सर्जेराव घोरपडे ह्यांचं मोठ्ठं स्वप्न होतं. हा अंक बाजारात आला की, क्रीडांगण पुन्हा उभारी घेईल, असं त्यांना मनोमन वाटत असावं. मासिकाच्या आकारातील २५६ पानं असलेल्या ह्या अंकात भरगच्च मजकूर होता. जवळपास ७० जणांनी त्यात लिहिलं होतं. त्यात सुनीलचे कुटुंबीय, मित्र, समकालीन खेळाडू, ज्येष्ठ क्रिकेटपटू, राजकारण-कला क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार असे सगळेच होते. इंग्लंडमधील विजयाची आठवण रंगवणारा खुद्द सुनीलचा लेख! शिवाय भरपूर छायाचित्रं. वाचकांसाठी मोठं आकर्षण म्हणजे सुनीलचे सहा रंगीत ब्लो-अप. त्यावर त्या वर्षाचं कॅलेंडर.

ह्या महत्त्वाकांक्षी विशेषांकाचे संयोजक-संपादक होते श्री. एस. डी. जोशी. अतिशय खुसखुशीत, चटकदार लिहिणारे. बहुतेक तेव्हा ते बजाज ऑटोच्या गृहपत्रिकेचे संपादक म्हणून काम करीत होते. औद्योगिक क्षेत्राएवढीच रुची त्यांना क्रिकेटबद्दलही होती. पुढे त्यांनी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे ह्यांच्याविषयीच्या एका पुस्तकाचं संपादन केल्याचंही पाहण्यात आलं. त्यांनीच सुनीलची मुलाखत घेतलेली. अगदी सविस्तर. जवळपास दीडशे छोटे-मोठे, किरकोळ-महत्त्वाचे प्रश्न विचारलेले. मूळ गाव कोणतं ते ब्रिटिश पत्रकारिता... असे नानाविध प्रश्न. काही प्रश्नांना सुनीलनं सविस्तर उत्तर दिलेली; तर काही दोन-चार शब्दांत बोलून वेल लेफ्ट केलेले.

ही दीर्घ मुलाखत पुण्यातच घेतलेली. दुलीप करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी सुनील आला होता तेव्हा ती झाली असावी बहुतेक. ह्या मुलाखतीने अंकातील २५ पानं व्यापली आहेत. शिवाय अधूनमधून छायाचित्रं असलेली पानं, ती सात-आठ. सुनीलची एवढी सविस्तर, त्याचा सगळा प्रवास सांगणारी मुलाखत त्या पूर्वी कोणत्याच दैनिकात प्रसिद्ध झाली नसावी. नंतरही ते भाग्य कुणाला लाभलं का, ह्याची शंकाच आहे.


ह्या मुलाखतीची मांडणी दस्तुरखुद्द श्री. सर्जेराव ह्यांनी केली होती. तेव्हाच्या आधुनिक इंग्रजी नियतकालिकांसारखी. वेगळी नि आकर्षक. पानात एकूण तीन रकाने. मधल्या रकान्यात सुनीलचं एक छायाचित्र आणि त्याच्या खाली त्या पानावर असलेल्या मजकुरातील वैशिष्ट्यपूर्ण तीन-चार वाक्यं. त्या छायाचित्राला जाड स्क्रीनची चौकट. मधल्या स्तंभात घेतलेल्या मजकुराचा टंक स्वतः श्री. घोरपडे ह्यांनी निवडलेला. तो त्यांच्या छापखान्यातील. ही वाक्यं/मजकूर निवडण्याचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलं होतं. आता ३४ वर्षांनंतर तो अंक पाहताना त्यातल्या (मी केलेल्या) काही चुका लक्षात येतात. त्या मधल्या रकान्यातील ठळक मजकुरात सुनीलचं म्हणणं येण्याऐवजी बऱ्याच ठिकाणी त्याला विचारलेले प्रश्नच आले आहेत. सर्जेरावांनाही ते का खटकलं नाही, ह्याचं आता आश्चर्य वाटतं. 'माझा कसोटीतला उत्तम भिडू म्हणजे चेतन चौहान. पण आदर्श भिडू म्हणाल तर... रामनाथ पारकर!', ब्रिटिश मासिकं फार पक्षपाती आहेत. त्यांना फक्त इंग्लिश क्रिकेट आणि क्रिकेटरबद्दलच रस आहे., सुदैवाने क्रिकेटर म्हणून खेळामधून थोडे-फार पैसे मिळवू शकतो. पण माझा खेळाकडे पाहायचा दृष्टीकोन प्रोफेशनलच आहे अशी काही चटकदार आणि त्या जागेला न्याय देणारी वाक्यंही आहेत. त्यातल्या शुद्धलेखनातील त्रुटींचंही आता आश्चर्य वाटतं. (नवोदित असल्यामुळं त्यात माझा वाटा चांगल्यापैकी असणार.)

आणखी एक गमतीची गोष्ट आता जाणवते, ती म्हणजे ह्या मुलाखतीचं शीर्षक. एवढ्या सविस्तर मुलाखतीचं शीर्षक आहे - इति सुनील उवाच! त्यातून नेमकं काहीच ध्वनित होत नाही. सुनीलच्या एवढ्या बोलण्यातून शीर्षकासारखं काहीच सापडलं कसं नाही? कुणी दिलं असावं ते? अगदी तीच गल्लत मीनल गावसकर ह्यांच्या मुलाखतीलाही झाली आहे. त्याचं शीर्षक आहे - सुनीलची आई. आता ती मुलाखत सुनीलच्या आईबद्दल काही सांगत नाही, तर ती आपल्या लाडक्या लेकाबद्दल सांगत आहे. ह्या दोन्ही चुका तेव्हा खटकल्या नाहीत किंवा लक्षातही आल्या नाहीत.

ह्या अंकाचं काम करताना अनेक गोष्टी कळल्या. लेखक म्हणून भाऊ पाध्ये हे नाव ठाऊक होतं. पण ते क्रिकेटवरही एवढ्या आवडीनं आणि ताकदीनं लिहितात, हे समजल्यावर धक्काच बसला. पब्लिकचा सुनील आणि सुनीलचं पब्लिक शीर्षकाचा त्यांचा लेख बऱ्यापैकी मोठा आहे. तो संपादन(?) करून मीच फोटोकंपोजला दिला होता. त्याची मूळ प्रत तेव्हा जपून ठेवली असती तर..? तंत्रशुद्ध खेळाडू नावापेक्षा बदनाम अधिक होतात..., आपला चाहता Creature of Extremes आहे, हे मात्र सुनीलच्या त्या वेळेस लक्षात आलं असेल, मला प्रथमच समजले की, या क्रिकेट खेळाडूंची एक युनियन आहे आणि या युनियनचा लीडर गावसकर आहे... ही  उदाहरणं भाऊ पाध्येंच्या लेखात काय दम आहे, हे दाखवून देण्यासाठी पुरेशी आहेत.

भाऊ पाध्ये नुसते चांगले लेखकच नव्हते, तर उत्तम पत्रकार होते, हेही  लेखातून ठळकपणे दिसतं. त्यांनी दिलेले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संदर्भ, सुनीलच्या खेळाचं-वागण्याचं काळाच्या संदर्भात केलेलं विश्लेषण फारच वेगळं आहे. हे भाऊ हा लेख वाचेपर्यंत मला माहीतच नव्हते. पुढे त्यांनी असाच एक धक्का दिला. सजती है यूँ ही महफील हे त्यांचं पुस्तक अचानक हाती आलं आणि त्यांना चित्रपटांचीही ही एवढी गोडी आहे, ह्याचा साक्षात्कार झाला. क्रिकेट (आणि सुनीलही!) आवडत नसलेल्यांनी भाऊंसाठी म्हणून हा लेख वाचलाच पाहिजे.

इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये असलेले राजू भारतन आणि संडे ऑब्झर्व्हरचे अरविंद लवाकरे हे दोन्ही नामांकित पत्रकार त्या काळात सुनील-विरोधक म्हणूनच ओळखले जात. त्यांचेही लेख गौरव अंकात आहेत. भारतन ह्यांनी सुनीलची तुलना टेनिसपटू बियॉन बोर्गशी केलेली आहे. सनी जसा आहे तसाच मला आवडतो, असं लवाकरे ह्यांनी म्हटलंय. त्या काळातील इंग्रजीतले स्टार पत्रकार अनिल धारकर ह्यांचीही मुलाखत अंकात आहे आणि तिचंही शीर्षक फसलेलं दिसतं. खास शिरीष कणेकरी शैलीतला 'सुनील माझ्या चष्म्यातून' लेख आजही ताजा टवटवीत वाटतो. तो कणेकर ह्यांच्या कुठल्या पुस्तकात कसा नाही?

विजय मर्चंट, विजय हजारे, राजसिंग डुंगरपूर, वासू परांजपे आदी खेळाडू, पिलू रिपोर्टर, स्वरूप किशन, माधव गोठोस्कर हे पंच, गंगाधर महांबरे व अनंत मनोहर असे प्रसिद्ध लेखक ह्या गौरव अंकाचे मानकरी आहेत. त्यात मला एक शब्दही लिहायला मिळाला नाही. पण तरीही तो अंक मला आजही 'आपला' वाटतो. त्यातील बहुसंख्य छायाचित्रांच्या ओळी देण्याचं काम मी केलं. त्या बऱ्यापैकी जमल्या आहेत. बऱ्याच लेखांचे 'लीड/इंट्रो' देण्याचं काम श्री. घोरपडे ह्यांनी मला सांगितलं होतं. ते काम फसल्याचं आता वाचताना जाणवतं. 'सनी कॅलिडिओस्कोप'मध्ये विविध क्षेत्रांतील नामवंतांना सुनीलबद्दल बोलतं करण्यात आलं. अंकाचं काम शेवटच्या टप्प्यात असताना त्यासाठी शरद पवार आणि विट्ठलराव गाडगीळ ह्यांचा मजकूर लिहून देण्याचं फर्मान श्री. घोरपडे ह्यांनी काढलं. ते ऐकून बावचळून गेलो. 'त्यांची भाषणं ऐकली नाहीत का कधी संपादक?', असं विचारत श्री. सर्जेराव ह्यांनीच अर्ध्या तासात त्या दोघांचा मजकूर तयार केला. अगदी त्यांच्या शैलीबरहुकूम!

ज्येष्ठ पत्रकार र. गो. सरदेसाई ह्यांनीही विक्रमादित्याबद्दल लिहिलं आहे. न्यूज प्रिंटच्या चतकोर आकाराच्या कागदांवर त्यांनी शाई पेनानं लिहिल्याचं आठवतंय. प्रत्येक पानात सारख्याच ओळी आणि शब्दसंख्याही साधारण तेवढीच. पण त्याहूनही त्यांची हृद्य आठवण आहे. अंक प्रकाशित झाल्यावर त्याची प्रत व मानधनाचा धनादेश त्यांना पाठविण्यात आला. योग असा की, सुनीलनं १० हजार धावांचा टप्पा गाठला, त्याचं धावतं वर्णन रेडिओवर ऐकत असतानाच सरदेसाई ह्यांना हे टपाल मिळालं. पोहोच देताना त्यांनी लिहिलेल्या पत्रात ह्याचा आवर्जून उल्लेख केला. हा मोठा, अनुभवी पत्रकार किती साधा-सरळ माणूस होता, हेच त्या आभाराच्या पत्रातून अनुभवायला मिळालं.

आता लक्षात येतं की, ह्या अंकात सुनीलच्या पत्नीनं काही लिहिलेलं नाही किंवा तिची मुलाखतही नाही. त्याच्या बहिणींचंही लेखन नाही. त्या वेळच्या महत्त्वाच्या मराठी वृत्तपत्रांतल्या एकाही क्रीडा-पत्रकाराला श्री. घोरपडे ह्यांनी लिहायला का सांगितलं नसावं, ह्या प्रश्नाचं उत्तरही मिळत नाही.

'सुनील गौरव अंक हॉट केकसारखा संपला' अशी मस्त जाहिरात श्री. सर्जेराव घोरपडे ह्यांनी स्वतःच तयार केली होती. प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अडीचशे पानांच्या, भरपूर छायाचित्रं आणि देखणं मुखपृष्ठ असलेल्या ह्या अंकाची किंमत २० रुपये होती. ती त्या काळाच्या मानाने कमी नव्हती; पण अगदी खिशाला न परवडणारीही नव्हती. हा अंक नियोजनापेक्षा थोडा उशिराच प्रसिद्ध झाला. जानेवारी १९८७. त्यानंतर काही काळानं सुनीलनं १० हजार धावांचा टप्पा गाठला. अंकाला अजून थोडा उशीर होऊन, तो त्या मुहूर्तावर प्रकाशित झाला असता तर? मग कदाचित श्री. घोरपडे ह्यांच्या जाहिरातीप्रमाणे त्याचा उठाव 'हॉट केक'सारखा झाला असता! अन्य काही गोष्टीही त्यांच्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं.

सुनील गावसकर आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचं लेखन. 'प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रूप'च्या माध्यमातून आपलं लेखन 'सिंडिकेट' पद्धतीनं देणारा तो पहिला क्रिकेटपटू. मराठीत त्याचं लेखन दोनच ठिकाणी प्रसिद्ध व्हायचं. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'क्रीडांगण'. त्यांचा लेख पहिल्यांदा अनुवादासाठी देताना श्री. घोरपडे ह्यांनी तंबी दिली होती, 'म. टा.मधलं उचलून जसंच्या तसं वापरायचं नाही.' सरळ बॅटनं खेळणारा हा माणूस लिहिताना मात्र व्यंग्योक्ती, उपहास, मिश्किल विनोद ह्याचा सढळपणे उपयोग करी. ते मराठीत आणताना खूप झगडावं लागे. तो अनुभवही वेगळा होता.

गावसकरांची ती शैली आजही दिसते. त्यांच्या स्तंभलेखनातून आणि कॉमेंटरीमधूनही. ह्या थोर खेळाडूच्या पदार्पणाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हे सारं आठवलं आणि लिहावं वाटलं.

ताजा कलम : एक वैशिष्ट्य सांगायचं राहूनच गेलं. 'सुनील तू असाच खेळत रहा!' असं आर्जव करणारी ना. के. ताले ह्यांची कविता अंकात अगदी सुरुवातीलाच आहे. दैनंदिन घडामोडींवर ताले कविता करीत व त्या एका दैनिकात की साप्ताहिकात त्या वेळी नियमित प्रसिद्ध होत, एवढं आठवतं. त्या कवितेच्या शेजारीच अंकनायकानं क्रीडांगणच्या वाचकांना स्वहस्ताक्षरात दिलेल्या शुभेच्छा आणि सही आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वाक्षरी मराठीत आहे! माझ्यासाठी अजून एक अप्रूप असं की, अजित वाडेकरांची सही त्या अंकावर घेतलेली आहे.

----


#SunilGavaskar
 #India 
#cricket #England #WestIndies #Kreedangan #IndianCricket #PackerCircus #PMG #BhauPadhye #GoldenJubilee #Ghorpade #Sunil_Gaurav_Ank #1971 #SeriesWin 

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

‘४२’च्या आठवणी

आकड्यांमधलं अंतर फक्त सहाचं. काळाचा फरक ४६ वर्षांचा. घटना घडलेल्या दोन शहरांमध्ये असलेलं अंतर १६ हजार किलोमीटरहून थोडं अधिकच. दोन गोलार्धांतली ही शहरं - लंडन आणि डलेड. जून १९ आणि डिसेंबर ०.

ह्या एवढ्या फरकानं काय वेगळं घडलं आहे?


 

 

 

डावीकडं लॉर्ड्सचा (१९७४) धावफलक आणि खाली नव्या नीचांकाची नोंद. डलेड २०२०.

 

 

 

पहिला नीचांक पुसून टाकत दुसऱ्या नीचांकाची नोंद. कसोटी क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघासाठी मागचा शनिवार (दि. १९) न करत्याचा वार ठरला. पण ह्या वारीही संघाकडून झाली एक (नकोशी) कामगिरी. कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या धावसंख्येचा तळ गाठण्यात आला. भारत सर्व बाद ३६. त्या आधीचा नीचांक क्रिकेट पंढरीतला - लॉर्ड्सच्या मैदानावर. दि. २४ जून १९. इंग्लंडविरुद्ध भारत सर्व बाद ४२.

इंग्लंडचा तो दौरा समर ऑफ ४२ म्हणून (कु)प्रसिद्ध आहे. त्या दौऱ्यातल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताचा दणदणीत पराभव झाला. कर्णधार अजित वाडेकरची विजयाची परंपरा खंडित झाली. ह्या पराभवामुळंच त्यानं (अकाली) निवृत्तीचा निर्णय घेतला.

सांघिक नीचांकी धावसंख्येची नोंद करणाऱ्या ह्या दोन सामन्यांमधल्या काही गोष्टी समान आणि गमतीशीर आहेत. आकड्यांमधून ती गंमत कळते. डलेडचा सामना अडीच दिवसांमध्येच संपला आणि त्यात दोन्ही संघांचे ३१ गडी बाद झाले. लॉर्ड्सवरचा सामना तुलनेनं लांबलेला; चार दिवस चालला आणि त्यात २९ फलंदाज बाद झाले. डलेडच्या लढतीत एकाही शतकाची नोंद नाही, तर तिकडे तीन इंग्लिश फलंदाजांनी पहिल्या डावामध्ये शतके झळकावली.

धावसंख्येचा नीचांक नोंदविणाऱ्या दोन्ही डावांमध्ये भारताचे नऊ-नऊच फलंदाज बाद झाले. ४२च्या डावात फिरकी गोलंदाज भागवत चंद्रशेखर जखमी असल्यामुळे खेळायला उतरला नव्हता. इकडे ३६च्या डावात अकराव्या क्रमांकावरचाच फलंदाज महंमद शमीला खेळताना गंभीर इजा झाली. त्यामुळे पुढे खेळता येणं शक्य नव्हतं. त्याला निवृत्त व्हावं लागलं नसतं, तर कदाचीत नीचांकी पायरी ओलांडली गेलीही असती. असो!

या दोन्ही डावांतली जी एकूण धावसंख्या आहे, ती आपल्या फलंदाजांची स्वकष्टार्जित कमाई आहे. म्हणजे नो-बॉल, वाईड, बाय, लेगबाय आदी स्वरूपात धावसंख्येत कोणतीही भर पडलेली नाही. फॉलोऑननंतर लॉर्ड्सवरचा आपला डाव चेंडूंमध्ये आटोपला. डलेडच्या मैदानावर आपला दुसरा डाव तुलनेनं अधिक काळ, म्हणजे १२८ चेंडूंपर्यंत चालला. २६ चेंडू अधिक खेळूनही सहा धावा कमीच. म्हणजे टी-० सामन्यांचा एवढा सराव असूनही आपल्या ह्या फलंदाजांना ४६ वर्षांपूर्वीच्या स्ट्राईक-रेटनंही खेळता आलं नाही तर! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही आणि तिघांना भोपळा फोडण्यात अपयश आलं. सर्वाधिक नऊ धावा काढल्या सलामीच्या मयांक अग्रवालनं (४० चेंडू) आणि त्याच्या पाठोपाठ होता सातव्या क्रमांकावर आलेला हनुमा विहारी (२२ चेंडूंमध्ये आठ). रात्रीचा रखवालदार म्हणून उतरलेल्या जसप्रीत बुमराहने १७ आणि वृद्धिमान साहाने १५ चेंडू खेळून काढले. बाकी सगळ्यांनी १० चेंडूंच्या आतच तंबूचा रस्ता धरला. एकूण चार वेळा चेंडू सीमापार झाला. त्यातला एक चौकार दहाव्या क्रमांकावर आलेल्या उमेश यादवचा होता. पृथ्वी शॉचा त्रिफळा, बाकी आठ फलंदाज झेलबाद झाले. त्यातले सात यष्ट्यांमागे झेल देऊन. पैकी पाच झेल यष्टिरक्षक टीम पेनचे. दोन्ही संघांकडून एक-एक षट्कार. त्यातला ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या चेंडूवर जो बर्न्सचा. विजयावर शिक्कामोर्तब करणारा!

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील त्या डावात फक्त एकाच फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली. तो म्हणजे सहाव्या क्रमांकावर उतरलेला डावखुरा एकनाथ सोलकर. त्यानं १७ चेंडूंमध्ये नाबाद १८ धावा केल्या. त्यात त्याचे दोन चौकार व एक षट्कार होता. दहा किंवा त्याहून अधिक चेंडू खेळलेल्या फलंदाजांची संख्या इथेही चारच होती. चेंडू खेळण्यात अव्वल क्रमांकावर सुनील गावसकर (६), मग सोलकर, इरापल्ली प्रसन्न (१) आणि ब्रिजेश पटेल (१०) ह्यांचा क्रमांक लागतो. गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ व प्रसन्न ह्यांनी प्रत्येकी पाच धावा केल्या. सलामीचा फारुख एंजिनीअर आणि दहाव्या क्रमांकावर आलेला बिशनसिंग बेदी ह्यांना मात्र भोपळा फोडता आला नाही. दोन फलंदाज पायचीत झाले व तिघांचा त्रिफळा उडाला. चार जण झेल देऊन बाद झाले आणि त्यातले तीन झेल होते यष्टिरक्षक लन नॉटचे. ह्या डावातील सर्वांत मोठी, ११ धावांची भागीदारी पाचव्या जोडीसाठी गावसकर-सोलकर ह्यांच्यात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सर्वांत मोठी भागीदारी आठ धावांची आणि दुसऱ्या जोडीसाठी होती!

शाम्पेनची वेळ. जेफ अर्नोल्ड आणि ख्रिस ओल्ड.फक्त पाच चेंडू.
 

 

 

 

 

 

 

प्रतिस्पर्धी संघांनी प्रत्येकी तीन गोलंदाज वापरले. त्यातील एकाला बळी मिळविता आला नाही. म्हणजे अंगणी आलेल्या वाहत्या गंगेतही तो कोरडाच राहिला. ऑस्ट्रेलियाच्या डावऱ्या मिशेल स्टार्कची पाटी सहा षट्कांनंतर कोरीच राहिली. इंग्लंडच्या माईक हेंड्रिकने फक्त एक षट्क टाकलं. त्यालाही बळी मिळाला नाही. सहज लक्षात येतं की, हे सगळे बळी उजव्या हाती जलदगती/मध्यमगती मारा करणाऱ्यांनी मिळविले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने पाच व पॅट कमिन्सने चार. इंग्लंकडून जेफ अर्नोल्डने पाच आणि ख्रिस ओल्डने चार गडी बाद केले.


हेझलवूड आणि पॅट कमिन्स. अफलातून मारा.

 

 

 

 

 

 

 

इंग्लंडने भारताविरुद्ध धावांचा डोंगर (६२९) उभा केला होता. बेदीला सहा बळींसाठी २२६ धावांचे व प्रसन्नला दोन बळींसाठी ६६ धावांचे मोल द्यावे लागले. भारतावर फॉलोऑनची आणि नंतर डावाच्या पराभवाची नामुष्की ओढवली. ह्याच्या उलट ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळविली होती. म्हणजे इंग्लंडविरुद्ध भारताचा डाव दडपणाखाली असताना गडगडला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्मविश्वास देणारी आघाडी मिळाल्यानंतर. हा फरक महत्त्वाचा आहे.

ह्या नीचांकी धावसंख्येसाठी, एवढ्या खराब कामगिरीसाठी कोणाला दोष द्यायचा? फलंदाजांची हाराकिरी म्हणायची की प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या तिखट माऱ्याचं मनापासून कौतुक करायचं? सुनील गावसकर ह्यांनी दोन्ही वेळा, आधी खेळाडू आणि आता समीक्षक म्हणून, भारतीय फलंदाजांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा मोह टाळलेला दिसतो. इंग्लंडविरुद्धच्या डावाबद्दल ते म्हणतात, ह्याचं अगदी साधं-सोपं उत्तर म्हणजे अर्नोल्ड आणि ओल्ड ह्यांनी पाच उत्कृष्ट चेंडू टाकले आणि त्यावर आमचे पहिले पाच फलंदाज बाद झाले. त्यानंतर आपल्या शेपटाने काही प्रतिकार केलाच नाही. प्रसिद्ध फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्न ह्यांचंही म्हणणं असंच आहे. वन मोअर ओव्हर आत्मकथेत ते लिहितात, खराब फलंदाजी हे काही कारण नाही. खरं सांगायचं तर अर्नोल्ड आणि ओल्ड ह्यांनी खरोखर अप्रतिम मारा केला.

कांगारूंविरुद्धच्या सामन्यात नव्या नीचांकाची नोंद होऊनही त्याचा दोष फलंदाजांना देणं गावसकर ह्यांना अन्यायकारक वाटतं. ते म्हणतात, ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाजांच्या त्रिकुटानं अफलातून मारा केला. भारताऐवजी अन्य कोणताही संघ असता, तर त्यांचा डाव ७२ किंवा फार तर ८०-९० धावांच्या आतच आटोपला असता.

सनी डेजमध्ये ह्या सामन्याबद्दल, दौऱ्याबद्दल गावसकर ह्यांनी सविस्तर लिहिलं आहे. त्यातली एक आठवण गमतीशीर आहे. गावसकर-सोलकर जोडी जमली आहे, असं वाटत होतं. गावसकर लिहितात, ख्रिस ओल्डच्या एका बाउन्सरवर एकनाथनं हूकचा षट्कार मारला. ते षट्क संपल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मला साथ दे. आपण पराभव टाळू, सामना वाचवू. पण त्यानंतरच्या अर्नोल्डच्या षट्कात मी बाद झालो. पॅव्हिलियनमध्ये येऊन लेग गार्ड काढत नाही, तोच मदनलाल आणि अबिद अली तंबूत परतलेले दिसले!


इंदूरमधील
'विजय बल्ला'. आधी आणि दगडफेकीनंतर डागडुजी केल्यावर.

वाडेकरच्या नेतृत्वाखाली संघाने १९मध्ये वेस्ट इंडिज व इंग्लंड ह्यांच्याविरुद्धच्या मालिका जिंकल्याची सुखद स्मृती म्हणून इंदूरच्या नेहरू स्टेडियमजवळच्या उद्यानात काँक्रिटची एक भव्य बॅट उभी करण्यात आली. त्यावर तेव्हाच्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंचा उल्लेख होता. ह्या आगळ्या स्मारकाचे उद्घाटन कर्णधार वाडेकरच्याच हस्ते झाले होते. पण तीन वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मिळालेल्या व्हाईट वॉशनंतर भारतातल्या क्रिकेटप्रेमींचा संताप संताप झाला. काही टवाळखोरांनी ह्या बॅटची नासधूस केली. भारतीय क्रिकेटशौकिनांचा स्वाभाविक संताप म्हणून त्याकडे त्या वेळी पाहिले गेले. काही काळानंतर त्या स्मारकाची पुन्हा डागडुजी करण्यात आली. भारतातला हा रागरंग पाहून खेळाडू एकत्र न येता गटागटांनी मायदेशी परतले.

कर्णधार वाडेकरच्या घरावरही दगडफेक झाल्याच्या बातम्या आल्या. त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते की, ह्यातल्या बहुतेक सगळ्या बातम्या अतिरंजित होत्या. माझं घर चौथ्या मजल्यावर आहे. तिथपर्यंत दगड फेकता येणाऱ्याची कसोटी संघातच निवड व्हायला हवी!

तो दौरा एवढ्या पराभवापुरताच मर्यादित राहिला नाही. आणखीही काही वादग्रस्त घटना घडल्या. भारतीय उच्चायुक्त बी. के. नेहरू ह्यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला भारतीय संघ उशिरा पोहोचला. संतापलेल्या उच्चायुक्तांनी कर्णधार वाडेकरला आल्या पावली परत पाठवलं. फलंदाज सुधीर नाईक ह्यांच्यावर शॉप लिफ्टिंगचा आरोप झाला. त्यांनी तो कसा आणि का मान्य केला, हे एक गूढच आहे.

क्रिकेट, ऑलिंपिक स्पर्धा ह्यात अपयश आलं की, लोकप्रतिनिधी त्याबद्दल चिंता व्यक्त करीत. खेळाबद्दल कळवळा वाटून ते संसदेत आवाज उठवित. त्या वेळी तशी पद्धतच होती मुळी! त्याच रिवाजानुसार इंग्लंडमधील दारूण पराभवाची चौकशी झाली. प्रसन्न आत्मचरित्रात लिहितात की, 'इकडे मायदेशी नेहमीप्रमाणे चौकशी समिती नेमण्यात आली होती. पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी खेळाडू परत येण्याची वाट अधिकारी पाहत होते. खेळाडू गटागटांनी भारतात परतले. चौकशी समितीचा निष्कर्ष होता - प्रतिकुल हवामान आणि खराब खेळ ह्यांमुळे संघाचा (दारूण) पराभव झाला. पण खेळाडूंमध्ये मतभेद असल्याचा उल्लेख (त्या चौकशी अहवालात) मुळीच नव्हता.'

इंग्लंडचा तो दौरा हंगामाच्या पूर्वार्धात होता. त्या काळात हवामान अतिशय त्रासदायक असतं, कमालीची थंडी असते, असा अनुभव आहेच. गावसकरांनी लिहिलं आहे की, बहुतेक खेळाडूंनी एकावर एक स्वेटर चढविले होते. स्लिपमध्ये उभे असलेले क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत हात खिशातून बाहेर काढत नसत. पण एवढी थंडी हेच एकमेव पराभवाचं कारण होतं? संघात बाकी सारं आलबेल होतं का?

त्या दौऱ्यात सहभागी असलेल्या गावसकर व प्रसन्न ह्यांनी आपापल्या पुस्तकांमध्ये ह्याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. 'सनी डेज'मधला हा उल्लेख पाहा - भरपूर मार बसत असूनही बेदीनं चेंडूला उंची देणं काही थांबवलं नाही. फलंदाज आक्रमकपणे खेळत आहेत म्हणून काही मी उंची देणं थांबवणार नाही, असं तो म्हणाला. खरं तर परिस्थिती अशी होती की, त्यानं (धावा थोपविण्यासाठी) अगदी कसून मारा करायला हवा होता. संघभावना नावाची काही गोष्टच नव्हती. त्या ऐवजी किरकोळ गोष्टींवरून, अत्यंत क्षुद्र कारणांवरून खटके उडालेले पाहायला मिळत होते. ते कुणाच्याच भल्याचं नव्हतं. अशा बऱ्याच घटनांनी संघाची बदनामीच झाली. हे सगळं आत्यंतिक निराश करणारं होतं.

'तुम्ही पतौडीची माणसं' असा शिक्का कर्णधारानेच मारलेल्या इरापल्ली प्रसन्न ह्यांनी 'one more over'मध्ये ह्या दौऱ्यावर एक प्रकरणच लिहिलं आहे - disaster in blighty. व्यवस्थापक कर्नल हेमू अधिकारी ह्यांच्यावर कडाडून टीका करताना त्यांनी कर्णधार अजित वाडेकरकडेही बोट दाखवलं आहे. पण हे करताना फलंदाज अजितचं कौतुक करायला ते विसरत नाहीत. ते लिहितात - दौऱ्याला जाण्यासाठी विमानात बसताच लक्षात आलं की, वाडेकर-बेदी ह्यांचे सूर काही जुळत नाहीत. दौऱ्यात आमची धुलाई होणार असं वाटत होतं. संघाचा आत्मविश्वास पार ढासळलेला दिसला. डेरेक रॉबिन्सन्स एलेव्हनविरुद्धच्या सामन्यात वाडेकर-बेदी ह्यांची चकमक उडाली. कडाक्याची थंडी, बोचरं वारं, सर्द वातावरण असं प्रतिकूल हवामान. खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना हतप्रभ करणाऱ्या होत्या. ह्या दौऱ्यात आम्हाला बिल्कुलच संधी नव्हती.

व्यवस्थापक कर्नल हेमू अधिकारी ह्यांना प्रसन्न ह्यांनी प्रामुख्यानं लक्ष्य केलं आहे. ते लिहितात की, शिस्तप्रिय व साधेपणाची आवड अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा तयार केली होती. १९च्या विजयाचं श्रेय घेण्यासाठी ते आघाडीवर होते. पराभवानंतर मात्र ते गायब झाले. संघात एकजिनसीपणा आणावा ह्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही. विजयाचं श्रेय ते घेत असतील, तर १९७४च्या पराभवाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारायला हवी. वाडेकरला त्यांनी पंगू बनवून सोडलं आणि आपला बोलका पोपट बनवलं.... अजितला अकाली निवृत्तीकडं अधिकारी ह्यांनीच ढकललं. त्यांच्यामुळेच वाडेकर खेळाडूंमध्ये अप्रिय बनला. संघाचं नेतृत्व करण्याऐवजी अजित व्यवस्थेचा माणूस बनला!

प्रसन्न ह्यांच्याप्रमाणेच अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेला आणि ऑफस्पिन गोलंदाजी करणारा रविचंद्रन अश्विन ह्यानं अजून चार-सहा वर्षांनंतर आत्मचरित्र लिहिलंच तर? त्यात तो कर्णधार विराट कोहलीबद्दल बरं लिहील की टीका करील? भारतीय संघात सगळं काही ठीकठाक नसल्याची चर्चा मागच्या विश्वचषक स्पर्धेपासून आहे. अशा चर्चांना आधी कुजबुजीच्या स्वरूपात असतात आणि त्यांच्या बातम्या होतात त्या पराभवानंतरच.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी सुरू होण्याच्या दोन दिवस आधी सुनील गावसकर ह्यांनी संघातील राजकारणाकडं थेट लक्ष वेधलं. संघाच्या बैठकीत स्पष्टपणे बोलणाऱ्या रविचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळविण्यासाठी झगडावं लागतं. एखाद्या सामन्यात बळी मिळाला नाही की, त्याला वगळलं जातं. हाच न्याय (काही) फलंदाजांना मात्र लावला जात नाही. थोडक्यात एकाला एक व दुसऱ्याला दुसरा न्याय, असा हा प्रकार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे. कोहली प्रसूतिपूर्व रजेवर आणि बाबा बनलेला नटराजन ऑस्ट्रेलियात, ह्या दुजाभावाकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
 
४२च्या प्रकरणानंतर भारतीय क्रिकेटमध्ये बरंच काही घडलं. वाडेकरांनी निवृत्ती पत्करली, एका मालिकेसाठी टायगर पटौदी पुन्हा कर्णधार बनले. क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला. डलेडमधील मानहानीनंतर पुतळे जाळ, दगडफेक असं काही घडलं नाही. क्रिकेटप्रेमींनी आपला सारा संताप, व्यथा सामाजिक माध्यमांतून त्याच दिवशी व्यक्त केली. सेहवागचे ओटीपी ट्वीट शेअर करून पराभव साजरा केला. अजून तीन कसोटी बाकी आहेत. त्यांचा निकाल लागल्यानंतरच शिमग्यानंतरचे कवित्व सुरू होईल किंवा कुणी सांगावं, कौतुकाचा महापूरही येईल.

(संदर्भ : ईएसपीएनक्रिकइन्फो, क्रिकेटकंट्री, स्पोर्ट्सस्टार व अन्य काही संकेतस्थळे)

(छायाचित्रे विविध संकेतस्थळांच्या सौजन्याने)

रो-को विजय

रोक सको तो रोक लो... तीन सामन्यांमध्ये दोन शतकं! ............ मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर पंधरवड्याच्या आतच भारताने दक्षिण आफ्रिकेवि...