सोमवार, १७ मार्च, २०२५

आजोबा सांगतात, ‘ॲक्ट पॉझिटिव्ह’



 डॉक्टर खास कौतुक करतात - ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू होतात. स्पेशल रूम आहे. दुपारपर्यंत चार-पाच सलाईन देतात. मग हे दोघं परत नगरला आणि तिथून मिळेल ती गाडी पकडून गावाकडे परततात. रविवारची दुपार सुरू होताच सुरू झालेली त्यांची ही दगदग सोमवारी रात्री कधी तरी संपते.
-------------
साधारण दहा-अकरा वर्षांचा नातू आणि (कागदोपत्री तरी!) पंचाहत्तरी पार केलेले आजोबा. त्यांचा दर आठवड्याचा प्रवास ठरलेला आहे. दोन टप्प्यांचा प्रवास. आजोबांच्या हातात काठी नाही. उलट त्यांचंच बोट धरून नातू असतो. अनुभवी आणि आश्वासक हातात कवळेपण.

हे असं खूप दिवसांपासून चाललेलं आहे. अंदाजे किती दिवस, आठवडे व महिने असं विचारायला नको. आजोबांकडे हिशेब आहे - आतापर्यंत सलग ११४ आठवडे त्यांनी हा प्रवास केला आहे. आताशी कुठे तो मध्यावर आलेलाय.

‘पॉझिटिव्ह थिंकिंग’चा डोस पाजणाऱ्या कोणत्याही खपावू पुस्तकापेक्षा अगदी थेट व्यावहारिक अनुभव आज मिळाला. कृपा ‘लाल परी’ची! तिच्यामुळे होत असलेल्या आरामदायी प्रवासाची.

नगरहून काल जाताना एस. टी. बस जेवण्यासाठी थांबली नाही. सगळे थांबे व्यवस्थित घेऊनही वेगाने धावली. तो सुखद धक्का जेमतेम पचनी पडत होता. परतताना मात्र बस थांबलीच. नगर २५ किलोमीटर राहिलेलं असताना. घरचं जेवण वाट पाहत असताना. रुई छत्तिशीजवळच्या थोडंस पुढे (चिंचोली कोयाळ फाटा?) असलेला हा ढाबा आता बहुतेक सर्व एस. टी. बससाठी हक्काचा थांबा बनला आहे.

‘जेवणासाठी गाडी १५-२० मिनिटं थांबेल,’ अशी घोषणा करून विसावा घेणारी ही बस तिसाव्या मिनिटाला पुन्हा फुरफुरू लागली. त्याच वेगाने इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी.

बस सुरू होता होता आजोबा आणि नातू प्रवेश करते झाले. बरेच प्रवासी आधीपासून उभे होते. ढाब्यापासून प्रवासी कसे काय घेतले, हा प्रश्न पडला. आजोबा नातवाला सांभाळून, जपून आणत होते. तो आजारी असावा, चालताना त्रास होत असल्याचं दिसलं.

पांडुरंगाचं दर्शनानं खूश होऊन कोल्हारला परत चाललेल्या मावशी शेजारी होत्या. त्यांची परवानगी गृहीत धरून ह्या मुलाला आमच्या मधली जागा देऊ केली. (कारण त्याच्या पाच मिनिटंच आधी त्यांनी आपल्या गाववाल्या शेजारणीला तिच्या आसनावर एका तरुण मुलीची सोय करून द्यायला बजावलं होतं.) ‘ओ पैलवान, ये बस इथं’, असं म्हणाल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर खुशी दिसली.

मुलगा आजारी दिसत असला, तरी त्याचे कपडे एकदम व्यवस्थित होते.  अंगात जीन्ससारखी पँट. पूर्ण बाह्यांचा सदरा. त्या बाह्या छान दुमडून किंचित वर घेतलेल्या. गोबरे गाल, वाटोळा चेहरा; पण त्यावर उदासवाणा भाव. वयाच्या मानाने चेहऱ्यावर असलेल्या पोक्तपणा जाणवणारा. कोवळेपणा कायम ठेवूनही.

आजोबांनी मला उठायला सांगितलं आणि आपल्या नातवाला हळूच तिथं बसवलं. ‘पलीकडं सरकून बस थोडं, बाबांना जागा दे बरं...’, असं मग ते नातवाला म्हणाले. तिकीट काढून झालं आणि आजोबांच्या गप्पा चालू झाल्या. अपंग म्हणून नातवाला ७५ टक्के सवलत आणि आजोबा पंचाहत्तरीपुढचे म्हणून मोफत. हे झालं नगरपर्यंतचं. मग तिथून पुढचा पुण्यापर्यंतचा प्रवास किती रुपयांना पडतो, हे त्यांनी सांगितलं. बस साधी नसेल, तर जास्त पैसे लागतात. पण आम्ही मिळेल त्या बसने जातो, अशी पुष्टी जोडली.

शेजारच्या मावशींनी मुलाद्दल विचारलं आणि जणू त्याचीच वाट पाहत असल्यासारखे आजोबा सांगू लागले, ‘‘पुण्याला चाललोय. दीनानाथ मंगेशकरमध्ये. दर सोमवारी जातोय. ११४ आठवडे झाले. सलाईन द्यावे लागतेत चार-पाच. आज जायचं आणि उद्या परत यायचं.’’

त्या छोट्या मुलाचे कमरेखालचे स्नायू दुबळे होते. काही तरी मोठा आजार होता. त्या साठी दर आठवड्याला ह्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात. दसरा नाही, दिवाळी नाही आणि शिमगा नाही... उपचार सुरू झाले तेव्हापासून आजोबांनी एकदाही खाडा केला नाही त्याला तिथं नेण्यात. ‘फक्त एकदाच त्याला त्याचा बाप घेऊन गेल्ता,’ आजोबांनी प्रांजळपणे सांगितलं.

आमचा प्रवास जेमतेम अर्धा तास बाकी होता. तेवढ्या वेळात हा मुलगा, आजोबा आणि त्यांचं कुटुंब ह्यांची संपूर्ण माहिती मिळाली. ह्या कोवळ्या मुलाच्या आजारावर अजून उपचार सापडलेले नाहीत. एक अमेरिकी संस्था त्याबाबत संशोधन वा अभ्यास (आजोबांच्या भाषेत ‘रीसर्च’!) करीत आहे. त्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मदत घेतली जात असावी. ह्या उपचारांसाठी अशा दहा-बारा रुग्णांची निवड केलेली आहे. ते उपचार मंगेशकर रुग्णालयात होतात.

‘पांडुरंगाची कृपा!’, आजोबा कृतज्ञपणे म्हणाले आणि पुढं सांगू लागले, ‘‘आपल्याला काय परवडतंय हे न्हाई तर. किती खर्च असंल ह्याचा?’’, असा प्रश्न विचारून त्यांनीच पुढच्या क्षणाला उत्तर दिलं - १२ कोटी रुपये!

‘उमेश सरांची कृपा!’ नातवाला मिळत असलेल्या उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आजोबा अजिबात सोडत नव्हते. सर म्हणजे डॉक्टर हे लक्षात आलं. डॉ. उमेश कलाणे. बालकांच्या न्यूरोलॉजीचा विशेष अभ्यास असलेले डॉक्टर.

उपचारांबद्दल आजोबा म्हणाले, ‘‘उमेश सरांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं, एकदा यायला सुरुवात केली की, मधूनच सोडून चालणार नाही. नाही तर आमची सगळी मेहनत गेली बघा वाया. मी म्हणालो, ‘तुम्ही सांगान तवा येईल.’ तेव्हापासून दर आठवड्याला जातोय बघा. एकदा तर लक्ष्मीपूजन करून रात्री निघालो.’’

खंड पडू न देता दोन वर्षांहून अधिक काळ रुग्णाला नियमित आणणाऱ्या आजोबांचं उमेश सरांनी स्वाभाविकच कौतुक केलं. ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ ही माहिती देऊन मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू होतात. स्पेशल रूम आहे. दुपारपर्यंत चार-पाच सलाईन देतात. म्हणजे आपण समजून घ्यायचं की, शिरेतून विशेष औषधे दिली जात असावीत. दुपारपर्यंत औषधयोजना संपते. मग हे दोघं परत नगरला आणि तिथून मिळेल ती गाडी पकडून गावाकडे परततात. हमरस्त्यापासून काही किलोमीटरवर हे गाव. रविवारची दुपार सुरू होताच सुरू झालेली त्यांची ही दगदग सोमवारी रात्री कधी तरी संपते.

आणि ही दगदग, हा प्रवास ११४ आठवड्यांपासून चालू आहे. असं अजून किमान ९४ आठवडे त्यांना करायचं आहे. कारण ह्या उपचाराचा कालावधी चार वर्षांचा आहे.

ह्या दगदगीबद्दल आजोबांच्या बोलण्यात खेद, खंत, त्रास असं काही डोकावत नसतं. अतिशय शांतपणे, हसतमुखाने ते सांगत असतात. ‘बाकी काही नाही हो. ह्यो आपला गडी धडधाकट झाला पाहिजे. बघू त्या पांडुरंगाच्या मनात काय आहे ते,’ असं म्हणत ते पांडुरंगावर भार सोडून देतात.

नातवाचं कौतुक करताना आजोबा रंगतात. ‘‘तिथं हॉस्पिटलात चार-पाच वेळा सुया टोचतात सलाईनसाठी. गडी कधी हं की चूं करत नाही. रडायचं तर सोडाच! नर्सबाई पण लई कौतुक करताते ह्याचं.’’

आजोबांचा नातू चौथीत आहे. इंग्रजी शाळेत घातलाय त्याला. ‘लय हुशार बघा. प्रत्येक विषयात तीसपैकी २८-२९ मार्क मिळवतोय. त्याच्या बाईपण खूशयेत त्याच्यावर.’ मग ते त्याच्या शाळेच्या बसचा खर्च, शाळेची फी सांगतात. चांगल्यापैकी रक्कम आहे ही. गावापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आपला दुबळा नातू तिथंच शिकला पाहिजे आणि उभा राहिला पाहिजे, ही आजोबांची इच्छा. नातू शाळेत अजिबात त्रास देत नाही, असं कौतुकाने सांगतात आणि हळूच म्हणतात, ‘हां, आता घरी आमाला देतो अधनंमधनं तरास. पण चालायचंच...’

एवढी सगळी कहाणी मस्त सांगत असताना आजोबांचा एकदाही कणसूर लागत नाही. परिस्थितीचं रडगाणंही ते गात नाहीत. कारण परिस्थिती तशी नाहीचंय मुळी. ते म्हणाले, ‘‘तसं बरं आहे आपलं. देवानं बरं चालवलंय. शेती आहे. दुधाचा धंदा आहे. सात-आठ गाया आहेत. ह्येचा बाप बघतो दुधाचा धंदा. परवाच त्याला ट्रॅक्टर घेऊन दिला. पांडुरंगाची कृपा...’’

गळ्यात तुळशीमाळ, आणिक कसल्या तरी एक-दोन बारीक मण्यांच्या माळा असणाऱ्या आजोबांचा पांडुरंगावर फार विश्वास. त्याला ते बोलण्यात घेऊन येतातच. पोराची आजी आता चार धाम यात्रेला चाललीये, असं ते शेजारच्या मावशीला सांगतात. ‘‘आलो परवाच १५ हजार रुपये भरून यात्रेचे. चांगले धा-बारा दिवस आहे. तिला म्हणलं, पाय चालतेत तोवर ये फिरून, बघून.’’

मग मावशींच्या कपाळीचा टिळा पाहून ‘कसं झालं पांडुरंगाचं दर्शन?’ विचारून आपल्या पंढरीच्या वारीचं वर्णन सांगतात. पुढे पुस्ती जोडतात, ‘‘आता एवढ्यात न्हाई गेलो. आता बघा ना आमचे दोन दिवस पुण्याला येण्या-जाण्यातच जातात. मग आठवड्याचे राहिले पाच दिवस. त्यात किती तरी कामं करायची असतात बघा...’’

मावशी आणि माझ्यामध्ये बसलेला नातू सगळं ऐकत असतो. पण गप्पगप्प. आजोबा ज्याला त्याला काय हे पुराण सांगतात उगीच, असा काही भाव त्याच्या चेहऱ्यावर नसतो. दहा वाक्यं आपण बोलावीत, पाच प्रश्न विचारावेत तेव्हा तो एखाद्या शब्दाचं उत्तर देतो. आवडीचा विषय इंग्रजी आहे असं सांगतो. त्याच्या सुंदर शर्टचं कौतुक केल्यावरही तो लाजत नाही किंवा चेहऱ्यावर कसलेही भाव उमटू देत नाही. त्यानं शर्टाच्या बाह्या खरंच फार छान दुमडलेल्या असतात. ते ऐकून आजोबांच्या मनात कौतुकाची नवी लाट येते, ‘त्याला हाप शर्ट आजिबात आवडत नाहीत. सगळेच्या सगळे फुल्ल बाह्यांचे आहेत.’

पुण्याच्या एवढ्या आठवड्यांच्या प्रवासात आलेला एक अनुभव आजोबा आवर्जून सांगतात, ‘‘गाडीला कितीबी गर्दी असूं द्या; आमच्या गड्याला कुणी ना कुणी बसायला जागा देतोच. ह्या पठ्ठ्याला एकदाबी उभं राहावं लागलं नाही. पांडुरंगच त्या जागा देणाऱ्याला तशी बुद्धी देत असंल बघा. आज नाही का तुम्ही बोलावलं चटसरशी, तसंच.’’

प्रवास संपतो. उतरणाऱ्यांना घाई असते. आजोबा, त्यांचा नातू ह्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. त्यांना एखादा धक्का बसतोच घाईचा. आजोबाच सांगतात त्याला, ‘बाळा, बाजूला राह्य बरं थोडा. त्यांना उतरूंदे.’

माळीवाड्याच्या स्टँडवर उतरल्यावर आजोबांना लाडक्या नातवाला घेऊन पुण्याची गाडी पकडण्याकरिता पाचशे मीटरवरच्या दुसऱ्या स्टँडकडे जावं लागणार आहे. नातवाला चालता येईल ना? ते म्हणतात, ‘सपाट जागा असली ना, आमचा गडी दोन किलोमीटरबी चालतोय.’

दोघांमध्ये इवलीशी जागा दिल्याबद्दल आजोबा दिलखुलास हसून माझे आभार मानतात. म्हणतात, ‘आपले तर प्रयत्न चालूयेत. यश द्यायचं त्या पांडुरंगाच्या हाती.’

पांडुरंग तुमच्या पदरात यश टाकणारच, असं कितव्या तरी वेळा सांगून निरोप घेतो. हार न मानणाऱ्या आजोबांची एक अतिशय सकारात्मक गोष्ट मनात रुजवून!
.......
(छायाचित्रं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने.)

मंगळवार, ११ मार्च, २०२५

खणखणीत आणि निर्विवाद

चॅम्पियन्स करंडक - 

अहमदाबादेतल्या ठसठसत्या जखमेवर दुबईत पुन्हा एकदा
हळुवार फुंकर मारण्यात आली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावून. उपान्त्य सामन्याचा जणू पुढचा अंक असावा, अशी ही दुबईतली लढत. आधी फिरकीनं ब्लॅक कॅप्सच्या नाड्या आवळल्या.
मग रोहित-गिल ह्यांची शतकी सलामी. संयमाच्या परीक्षेत अय्यर आणि राहुल उत्तीर्ण झाले. ह्या सांघिक परिश्रमाचं फळ म्हणजे दहा महिन्यांमधलं
दुसरं विश्वविजेतेपद!
----------------------
साधारण दहा महिन्यांच्या काळात दुसरं जागतिक विजेतेपद. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील मागच्या चोवीसपैकी २३ सामन्यांमध्ये विजय. पराभव एकमेव; पण त्याचा घाव न पुसला गेलेला. विश्वचषक स्पर्धेतील अहमदाबादच्या अंतिम सामन्यातील हार.

त्या घावावर मलम लागला २९ जून रोजी ब्रिजटाऊनमध्ये. टी-20 विश्वचषक भारतीय संघानं पटकावला.
आणि आता पुन्हा एकदा त्या ठसठसत्या जखमेवर हळुवार फुंकर मारली गेली दुबईतल्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये. आठ देशांच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतानं बाजी मारली. स्पर्धेतले पाचही सामने जिंकून कमावलेलं हे विजेतेपद. खणखणीत आणि निर्विवाद.

शेवटच्या सामन्यात न्यू झीलँड संघाचा प्रतिकार पद्धतशीरपणे मोडून काढत भारतानं गटात अव्वल स्थान मिळविलं. उपान्त्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ समोर असल्याचं दडपण झुगारून दिलं. चार गडी राखून विजय.

त्याच उपान्त्य सामन्याची थोडी-फार पुनरावृत्ती अंतिम सामन्यात झाली. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा नाणेफेक हरलेला. धावांचा पाठलाग करण्याची वेळ. पुन्हा एकदा लोकेश राहुल आणि रवींद्र जाडेजा ह्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलेलं.

राहुलचा कबुलीजबाब
अजून काही वर्षांनी निकाल सांगेल - भारत चार गडी राखून विजयी. तेव्हा असंही वाटेल कदाचीत की, सहज सोपा विजय होता. पण सामना किती चुरशीचा झाला, हे राहुलनं रविवारी कॅमेऱ्यासमोर काहीशा असभ्य भाषेत सांगितलेलं आहेच.

इंग्लंडमध्ये सहा वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अतिशय अटीतटीच्या लढतीत न्यू झीलँडला यजमान इंग्लंड संघानं हरवलं. तेव्हा चौकारांची संख्या महत्त्वाची ठरली होती. किवीज त्यातून काही शिकले असावेत बहुदा. ह्या अंतिम सामन्यात त्यांचे चौकार भारताहून दोन अधिकच होते. षट्कारांमध्ये मात्र ते मागे राहिले. पण निकाल ठरविण्यासाठी ते मोजण्याची वेळ आलीच नाही.

कुलदीप, वरुण, अक्षर आणि जाडेजा ह्या फिरकी चौकडीनं मधल्या षट्कांमध्ये न्यू झीलँडला बांधून ठेवलं होतं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकच फलंदाज गमावून संघानं ६९ धावांची मजल मारली होती. फिरकीचं आक्रमण सुरू झालं आणि त्या गतीला खीळ बसली.

चौकारांचा दुष्काळ
न्यू झीलँडच्या डावात चौकारांचा दुष्काळ दिसत होता. तब्बल ८१ चेंडू एकही फटका सीमेच्या पलीकडे गेला नाही. चौदाव्या षट्कातील दुसऱ्या चेंडूला डॅरील मिचेलने अक्षर पटेलला स्लॉग स्वीप मारून स्क्वेअर लेगला चौकार मिळवला. त्यानंतर थेट सत्ताविसाव्या षट्कातल्या कुलदीपच्या अखेरच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने षट्कार मारला. गती किती संथ झाली होती? तर नऊ ते त्रेचाळीस ह्या षट्कांमध्ये चारच चौकार गेले.

फिरकी गोलंदाजांनी किवी फलंदाजांच्या नाकात दम आणला होता खरा. ही पकड अशीच राहती, तर न्यू झीलँडला निर्धारित षट्कांत जेमतेम सव्वादोनशेचा टप्पा गाठता आला असता.

पण मायकेल ब्रेसवेल ह्यानं कमाल केली. शेवटच्या सात षट्कांमध्ये ६७ धावा निघाल्या. त्यातही महंमद शमी आणि हार्दिक पंड्या ह्यांनी अखेरच्या तीन षट्कांमध्ये खैरातच केली. त्यांनी ३५ धावा दिल्या. सत्तेचाळिसावं षट्क संपलं तेव्हा ब्रेसवेलच्या ३५ धावा होत्या ३३ चेंडूंमध्ये. पुढं तो सुटला.

ब्रेसवेलची ही तोफ अखेरच्या षट्कातही धडाडावी म्हणून कर्णधार मिचेल सँटनरनं धावचित होणं पत्करलं. ब्रेसवेलच्या ४० चेंडूंमधील ५३ धावांच्या खेळीनं डॅरील मिचेलच संथ अर्धशतक स्वाभाविकच झाकोळून गेलं.

ढेपाळलेलं क्षेत्ररक्षण
भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण ह्या महत्त्वाच्या सामन्यातही ढेपाळलेलंच दिसलं. चार झेल सुटले. त्याची सुरुवात शमीनं केली आणि शेवट शुभमन गिल ह्यानं. श्रेयस अय्यर, रोहित शर्मा आणि गिल ह्यांच्या हातून सुटलेले झेले मिडविकेट, डीप मिडविकेट ह्याच क्षेत्रातले होते, ही एक गंमतच.


जादूगार...ग्लेन फिलिप्स
.......................

स्पेशल झेलानंतरची स्पेशल पोज...
................

बहुदा श्रेयसला ह्याची भरपाई प्रतिपक्षानं करून दिली. फक्त खातं उघडलेलं असताना काईल जेमिसन ह्यानं त्याचा झेल सोडला. तो कमनशिबी गोलंदाज कोण होता? ग्लेन फिलिप्स! ज्यानं अफलातून झेल घेत गिलचा ऑफ ड्राइव्ह पकडला होता. जादूगार हवेतून कबुतर काढून दाखवतो, त्या लीलया पद्धतीनं फिलिप्सनं चेंडू पकडला होता.

ह्याच जेमिसनच्या गोलंदाजीवर गिलला जीवदान मिळालं तेव्हा तोही एकच धाव काढून खेळत होता. न्यू झीलँडच्या पराभवाला तो झेल कारणीभूत ठरला का? कारण मग रोहित आणि गिल ह्यांनी शतकी भागीदारी केली. पहिल्या दोन षट्कांमध्ये २२ धावा करणारा भारतीय संघ पहिला पॉवर प्ले संपल्यावर धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या मागेच होता.

मधल्या षट्कांमध्ये न्यू झीलँडच्या फिरकी गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजीच्या नाड्या आवळल्या. ते दडपण घेऊनच रोहित पुढे सरसावला आणि रचिन रवींद्रला यष्टिचित झाला.

शतकी सलामी महत्त्वाची का, तर दुबईच्या स्टेडियमवर मधल्या षट्कांमध्ये धावा करणं कठीण होतं. तिथेच पाच सामने खेळलेल्या भारतीय संघाला ह्याची कल्पना असणं स्वाभाविकच. म्हणूनच त्या काळात दाखवावा लागतो संयम. श्रेयस, अक्षर, राहुल आणि पंड्या ह्यांनी तो दाखवला. त्या संयमाचं फळ म्हणून नाव सुखरूप पैलतिरी लागली. मॅट हेन्रीची उणीव ब्लक कॅप्सना नक्कीच जाणवली. त्याचं रडगाणं सँटनरनं काही गायिलं नाही, हे कौतुकास्पदच.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपान्त्य लढतीतील डावच जणू राहुलने पुन्हा सुरू केला होता. विजय मिळविताना आधी पंड्या आणि शेवटी जाडेजा हेच त्याचे पुन्हा सहकारी होते. रोहित सामन्याचा मानकरी ठरणं स्वाभाविक. स्पर्धेत दोन शतकं झळकावणारा रचिन रवींद्र स्पर्धेतील सर्वोत्तम ठरला. अफ्लातून झेल घेणाऱ्या ग्लेन फिलिप्सचा त्या साठी विचार करायला काही हरकत नव्हती.

आयसीसीनं निवडलेला संघ
अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ह्या ‘स्पर्धेचा संघ’ निवडला. विजेता कर्णधार रोहितला त्यात स्थान नाही. एवढंच काय, सहभागी आठपैकी पाच देशांचा एकही खेळाडू नाही. ह्या सर्वोत्तम संघाची धुरा न्यू झीलँडचा कर्णधार मिचेल सँटनर ह्याच्या हाती सोपविण्यात आली आहे. पहिलीच चॅम्पियन्स स्पर्धा खेळणाऱ्या अफगाणिस्तानचे दोन खेळाडू ह्या संघात आहेत.

हा संघ असा -
रचिन रवींद्र (न्यू झीलँड दोन शतकं), इब्राहीम जदरान (अफगाणिस्तान, एक शतक, सरासरी ७२), विराट कोहली (एक शतक, सरासरी ५४.५), श्रेयस अय्यर (दोन अर्धशतकं), के. एल. राहुल (यष्टिरक्षक, सरासरी १४०, तेवढ्याच धावा, तीन वेळा नाबाद. लक्ष्याचा पाठलाग करताना निर्णायक खेळी, यष्टिरक्षणाचंही कौतुक), ग्लेन फिलिप्स (न्यू झीलँड, ५९ सरासरीनं २१७ धावा, दोन बळी आणि पाच अफ्लातून झेल), अजमतुल्ला ओमरजाई (अफगाणिस्तान, १२६ धावा, एकूण सात बळी - एका सामन्यात पाच), मिचेल सँटनर (कर्णधार, न्यू झीलँड २६.६ सरासरीनं नऊ बळी. इकॉनॉमी ४.८०), महंमद शमी (नऊ बळी आणि एका सामन्यात पाच बळी), मॅट हेन्री (दहा बळी १६.७ सरासरीनं. एकदा पाच बळी), वरुण चक्रवर्ती (नऊ बळी, सरासरी १५.१, इकॉनॉमी ४.५३) आणि बारावा खेळाडू - अक्षर पटेल.
....
(सर्व छायाचित्रे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या संकेतस्थळावरून साभार.)
....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #अंतिम_सामना #भारत_न्यूझीलँड #रोहित_शर्मा #श्रेयस_अय्यर #फिरकीचे_जाळे #ग्लेन_फिलिप्स #राहुल #ICC_Champions_Trophy #Champions_Trophy_Final #Ind_NZ #Black_Caps #Rohit_Sharma #Shreyas_Iyer #Glenn_Phillips #Rachin_Ravindra
....

बुधवार, ५ मार्च, २०२५

पुनःपुन्हा...विराट आणि विजय!

 चॅम्पियन्स करंडक - ५


हा घ्या विजयाकडे नेणारा षट्कार...कांगारूंविरुद्ध हार्दिक.
(छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी.)

...............................

‘एक दिवशीय क्रिकेटमधला तो अफ्लातून खेळाडू आहे!’
‘त्यानं संघासाठी अशी कामगिरी अनेक वेळा केलेली आहे.’
अनुक्रमे गौतम गंभीर आणि रोहित शर्मा ह्यांची ही विधानं अर्थात
विराट कोहलीचं महत्त्व ठळक करणारी.
कांगारूंविरुद्ध विजय मिळवून वनवास संपवणाऱ्या भारतीय संघानं
दुबईत मंगळवारी एका दगडात बरेच पक्षी मारले.
----------------------
दोन्ही संघांची मिळून विजेतेपद मोजली तर ती १६ होतात. अशा दिग्गज संघांमधील उपान्त्य सामन्यात पाच झेल सुटत असतील तर काय म्हणावं! अर्थात ह्या लढतीचा निकाल कमी झेल सोडणाऱ्या संघाच्या बाजूनेच लागला.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या चॅम्पियन्स करंडकाच्या पहिल्या उपान्त्य सामन्यात भारतानं विजय मिळविला. हे करताना भारतीय संघानं एका दगडात बरेच पक्षी मारलेले दिसतात. आय. सी. सी.च्या कोणत्याही स्पर्धेत असं चित्र दिसलं आहे की, बाद पद्धतीच्या सामन्यात भारतीय संघ कांगारूंपुढे नांगी टाकतो. त्याचं ताजं उदाहरण विश्वचषक स्पर्धेतला अहमदाबादचा अंतिम सामना! 

संपता वनवास विजयाची गुढी
हा १४ वर्षांचा वनवास दुबईत संपला. विजयाची गुढी उभारली विराट कोहली, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या ह्यांनी. कांगारूंचं आणि त्यांच्याविरुद्धच्या पराभवाच्या इतिहासाचं दडपण त्यांनी घेतलं नाही.

ह्या विजयी दगडाने दुसरा पक्षी टिपला तो यजमान पाकिस्तानचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धेचं यजमानपद घेऊनही स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या देशात खेळला जाणार नाही, ह्याचं दुःख त्यांना दुसऱ्यांदा होईल. ह्या आधी आशियाई चषक स्पर्धेत तसंच झालं.

स्पर्धेचा दुसरा सामना लाहोरमध्ये होईल. त्यातील विजेत्याला अंतिम सामना खेळण्यासाठी हवाई मार्गाने दोन हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. त्यात त्यांची दमछाक होणं गृहीत आहे. त्यातही दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला, तर दुबईतला त्यांचा तो पहिलाच सामना असेल. भारतानं टिपलेला हा अजून एक पक्षी.

‘खरोखर अद्भुत खेळाडू!’, अशी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर ह्यांनी ज्याची स्तुती केली, तो विराट कोहली ह्या सामन्याचा मानकरी ठरला, ह्यात आश्चर्य नाही. लक्ष्याचा नियोजनपूर्वक पाठलाग कसा करायचा, हे त्यानं ह्या स्पर्धेत दुसऱ्यांदा दाखवून दिलं. त्याच्या ९८ चेंडूंच्या खेळीत (८४ धावा) फक्त पाच चौकार होते. त्याच्या तंदुरुस्तीला सलामच करावा लागेल.

विराटच्या महत्त्वाच्या भागीदाऱ्या
सलामीवीर झटपट परतल्यावर कोहलीनं डावाला आकार दिला. तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचत त्यानं धावसंख्येला आकार दिला आणि संघाला विजयाच्या दारापर्यंत नेलं. श्रेयस अय्यरबरोबर ९१, अक्षर पटेलबरोबर ४४ आणि के. एल. राहुल ह्याच्या बरोबर त्यानं ४७ धावांच्या भागीदाऱ्या केल्या. म्हणजे २०९ चेंडूंमध्ये ह्या चौघांनी १८२ धावांची भर घातली.

सामाजिक माध्यमांवर अलीकडच्या काळात जल्पकांचं सर्वाधिक आवडतं गिऱ्हाईक म्हणजे के. एल. राहुल. ‘केळ्या’ ही त्याची ओळख. ‘त्याला का खेळवतात? वशिल्याचा तट्टू म्हणून!’ ट्रोलरमंडळींनी काढलेला हा निष्कर्ष. पण राहुलची आजची फलंदाजी ह्या ट्रोलरना सीमापार करणारी होती.

चेंडूंपेक्षा धावा अधिक असं समीकरण भेडसावू लागल्यावर राहुल कोशातून बाहेर पडला. तन्वीर संघा ह्याला दोन चौकार आणि ॲडम झम्पा ह्याला उत्तुंग षट्कार मारत त्यानं इरादा स्पष्ट केला होता. म्हणूनच झम्पाला फटकावण्याच्या नादात कोहली बाद झाल्यावर राहुल काहीसा नाराज झालेला दिसला.

तणाव वाढवला नि संपवलाही!
पहिले सहा चेंडू शांतपणे खेळणाऱ्या हार्दिक पंड्याने तणाव काहीसा वाढविला होता. तो त्यानंच तीन षट्कार खेचत संपवला. गोलंदाजीत सर्वांत महागडा ठरलेल्या हार्दिकनं मोक्याच्या क्षणी फटकेबाजी केली. श्रेयस अय्यर ह्या स्पर्धेत प्रेयस खेळताना दिसतो आहे. त्यानं कोहलीबरोबर महत्त्वाची भागीदारी केलीच; त्या बरोबर भरात आलेल्या कॅरीला थेट फेकीवर धावचित करण्याची कामगिरीही बजावली.

कर्णधार रोहित शर्मानं सुरुवात तर झकास केली होती. तीन-तीन जीवदानं मिळूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही. कूपर कॉनली ह्यानं डावऱ्या फिरकीवर त्याला पायचित पकडलं. कॉनली ह्याच्यासाठी तो ह्या सामन्यातला सर्वांत आनंदाचा क्षण असावा.


आनंदाचा क्षण. कूपर कॉनली ह्यानं रोहितला पायचित केलं.
(छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी.)

...............
सलामीला नऊ चेंडू खेळून कॉनली ह्याला एकही धाव करता आली नाही. त्यातले सात चेंडू तर त्याच्या बॅटमधून हुकलेच. मग बेन ड्वारशुईस ह्याच्या गोलंदाजीवर त्यानं बॅकवर्ड पॉइंटवर रोहितचा झेल सोडला होता. त्याच रोहितला बाद केल्यावर त्याचा आनंद गगनात न मावणारा होता! प्रथम श्रेणी क्रिकेटमधला त्याचा हा पहिला बळी. पण त्याच्या निवडीबद्दल ऑस्ट्रेलियाई पत्रकारांनी व्यक्त केलेली शंका त्यानं सार्थ ठरवली एवढं खरं.

शमीनं सामन्याची सुरुवातच वाईड चेंडू टाकून केली, तेव्हा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची आठवण झाली. त्याचा कित्ता हार्दिक पंड्यानंही पहिल्याच षट्कात गिरवला. आपल्याच गोलंदाजीवर ट्रेव्हिस हेडचा झेल पकडण्यात शमीला यश आलं नाही. हे जीवदान महाग पडणार, असं वाटलं होतंच. हेडनं मग ३३ चेंडूंमध्ये ३९ धावा करताना कर्णधार स्टिव्हन स्मिथबरोबर अर्धशतकी भागीदारी केली. वरुण चक्रवर्तीनं त्याचा अडथळा दूर केला.

कोहलीप्रमाणंच स्मिथनेही तीन महत्त्वाच्या, अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या - आधी हेडला घेऊन, मग लाबुशेन ह्याच्या जोडीने ५६ धावांची आणि कॅरीला घेऊन ५४ धावांची. स्टिव्ह स्मिथ ७३ (९६ चेंडू) व ॲलेक्स कॅरी ६१ (५७ चेंडू) ह्यांनी भारतीय फिरकी चौकडीला चांगले तोंड दिले.

ह्या जोडीला सूर सापडला असताना भारताच्या मदतीला धावला महंमद शमी. त्यानं स्मिथचा त्रिफळा उडवला. ग्लेन मॅक्सवेलला अक्षर पटेलचा चेंडू यष्ट्यांवर आदळल्यावरच कळाला! ड्वारशुईस ह्यानं मात्र कॅरीच्या जोडीला उभं राहायचं ठरवलं होतं. जमू लागलेली ही भागीदारी वरुण चक्रवर्तीनं संपुष्टात आणली.

पाच षट्कांमध्ये चौघे बाद
अय्यरच्या अचूक फेकीनं कॅरी बाद झाला. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या पाच षट्कांमध्ये चार गडी गमावले ते फक्त २९ धावांची भर टाकून. जाडेजाने बऱ्याच दिवसांनी गोलंदाजीत चमक दाखविली. अलीकडे फारसा यशस्वी ठरत नसलेल्या मार्नस लाबुशेन व जोश इंग्लिस ह्यांचे बळी त्यानं मिळविले. शमीनं तीन गडी बाद करून आपली जबाबदारी चोख बजावली. त्यानं आपल्याच माऱ्यावर हेड आणि स्मिथचे झेल पकडले असते, तर कांगारूंच्या डावाचं चित्र विचित्र झालं असतं, एवढं नक्की. कुलदीपची पाटी मात्र आज कोरीच राहिली.

रोहितचा झेल लाबुशेन ह्यानं सोडला, तेव्हा अहमदाबादच्या सामन्याची आणि हेडनं घेतलेल्या अफलातून झेलाची आठवण होणं स्वाभाविकच. अर्धशतक पूर्ण केलेल्या कोहलीवरही मॅक्सवेलनं कृपा केली. तेव्हा दुर्दैवी गोलंदाज कॉनली होता!

धावांचा पाठलाग करताना पहिली सहा षट्कं भारत कांगारूंच्या पुढे होता. नंतर चाळिसाव्या षट्कापर्यंत पारडं थोडं इकडे, थोडं तिकडे झुकत राहिलं. चाळिसावं षट्क संपलं तेव्हा भारत १३ धावांनी मागं होता. जमेची बाजू म्हणजे आपण दोन गडी कमी गमावले होते. शेवटची पाच षट्क राहिली तेव्हा कांगारू दोन धावांनी पुढे होते. मग हार्दिकच्या षट्कारांनी धमाल केली.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या पहिल्या उपान्त्य सामन्याची ही कहाणी... सोडलेल्या झेलांची, विराटच्या हुकमी डावाची आणि भारताच्या सफाईदार विजयाची!
.....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #उपान्त्य_सामना #भारत_ऑस्ट्रेलिया #विराट_कोहली #एका_दगडात  #श्रेयस_अय्यर #स्टिव्ह_स्मिथ #कूपर_कॉनली #हार्दिक #ॲलेक्स_कॅरी #ICC_Champions_Trophy #ICC_Champions_Trophy #first_semifinal #Ind_Aus #Virat_Kohli #Shreyas_Iyer #Hardik_Pandya #Steve_Smith #Alex_Carey #Cooper_Connolly

...चला पुस्तकांचं सोनं लुटू!

  ‘वाचावं की वाचू नये’, असा ‘हॅम्लेट’ कधीच होत नाही माझा. ‘हे आधी वाचू की ते वाचू?’, असा प्रश्न असतो. तुम्हाला माहितीये का, पुस्तकं वाचणारा ...