Friday 20 March 2020

अण्णा ते अनामिका...

देशप्रिय अनामिकेस,
नमस्कार,चमत्कार वगैरे...
फार फार दिवसांनंतर,
वर्ष की दीड वर्षांनंतर
दिल्लीत पुन्हा जंतरमंतर
निदर्शनांचे तेच तंतर-मंतर
गाजते तर आहेच नवी दिल्ली
पण तुझीच चर्चा गल्लोगल्ली
धिक्काराचा घेऊन बावटा
आणि वळवित मनगटा
सूर निषेधाचा घुमतोय
केवढा असंतोष धुमसतोय!
विजयपथ ते रायसीना
चालून गेली तरुणसेना
प्रश्न एकच एक विचारतेय
इथे सत्ता कोणाची चालतेय?
ही मोगलाई की लोकशाही?
की कायद्याचे राज्यच नाही?
कँडलमार्च आणि मशालमोर्चा
अवघड बाईपणाची सारी चर्चा
वाढता टीआरपी, भडक मथळे
पुन:पुन्हा आमचे रक्त उसळे
बये, तुझ्याचमुळे हे घडले,
सारे थोडे भानावरती आले
कुणाला आठवते, मलाही तीन मुली
कारवाई करण्याची पक्की आहे बोली
जमल्यास फाशी, जन्मठेप नक्की
न्यायाची मिळते इथे खात्री पक्की
बये, बरी हो, पुढे चालू लाग
गिळून टाक ती मनातली आग
जमलेच तर विसर ती आठवण
माहितीये, मनावर राहतीलच वण!
.
.
.
मागे असेच होते झाले
अण्णा बोले आणि देश हाले
हद्दपार करणार होतो भ्रष्टाचार
गांधी टोपी घालून केला एल्गार
विझल्या ज्योती, विझले निखारे
म्हणती माझ्या मागल्या ये रे
अनामिके, आईशप्पथ सांगतो,
आत्ता मला येशू आठवतो
ज्याने केला नाही अत्याचार
दगड मारण्याचा त्यालाच अधिकार
खुपते मनाला, लाज वाटे फार
हाती मेणबत्ती, पायाखाली अंधार!
- हतबल आम आदमी
(२३ डिसेंबर २०१२)

No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...